शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४

<< मागील भाग
 
मग ती ही हळूहळू त्याच्यापासून दूर निघून जाते. (पुढे चालू)

आणखी काही दिवस गेले आहेत. आता छोटू आजारी आहे. पण त्याच्या आईने हे कालिबाबूंना किंवा छोटूच्या वडिलांपासून लपवून ठेवले आहे. त्यांना समजले तर पुढे काय होईल हे तिला स्वच्छ दिसते आहे. त्यांच्यापासून लपवून तिने वैद्याला बोलावले आहे. आल्याआल्या तो विचारतो की घरात साक्षात ’देवी’ असताना मला बोलावण्याचे काय कारण. बोलता बोलता तो हे ही सांगून टाकतो की देवीने त्याचे दीर्घकाळ त्रास देणारे दुखणे बरे केले आहे. तरीही तिच्या विनंतीवरून तो छोटूला तपासतो आणि औषधे पाठवून देण्याचे मान्य करतो. अर्थात या पेक्षा छोटूला देवीच्या पायावर घालणे अधिक चांगले हे सांगायलाही विसरत नाही. वैद्यबुवा बाहेर पडत असतानाच छोटूचे वडिल तिथे येतात आणि छोटूला आजारी पाहून कालिबाबूंना सांगायला धावतच बाहेर जातात. छोटूच्या आईला ज्याची भीती वाटत होती तेच घडते. बेशुद्धीतच ’काकीमॉ' च्या नावाचा धोशा लावलेल्या छोटूला कालिबाबू आणि तरपदा देवीच्या पायावर घालण्यासाठी घेऊन जातात. अनेक दिवसांनी भेटलेल्या छोटूला पाहून दया आनंदते. त्याची आई तिला सांगते कि जोपर्यंत तू त्याला मांडीवरून खाली ठेवत नाहीस तोवर त्याला मी घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा तू लवकर त्याला खाली ठेव. इथे दयाच्या मनातील माणूसपण उसळून वर येते. ती स्वार्थी होते. बर्‍याच काळानंतर मिळालेला छोटूचा सहवास तिला सहजासहजी सोडायचा नाहीये. तिची अनिच्छा छोटूच्या आईला समजते. इथे हताश होऊन ती विचारते, तू खरंच देवी आहेस का? खरंच तू माझ्या मुलाला बरं करू शकतेस का? कृपा करून माझ्या मुलाला बरं कर. आतापर्यंत दयाचे देवीपण मान्य न करणारी ती पुत्रवियोगाच्या धास्तीने विकल होऊन दयाकडेच त्याच्या आयुष्याची भीक मागते आहे. अखेर आजची रात्र छोटूला माझ्याकडे राहू दे, उद्या सकाळीच मी तुला तुझा मुलगा परत देईन असे आश्वासन दया छोटूच्या आईला देते.

दुसर्‍या दिवशी छोटूच्या आजाराची बातमी ऐकून कलकत्त्यावरून धावत आलेल्या उमाप्रसादला कळते ती छोटूच्या मृत्युची बातमी. देवीच्या गाभार्‍यासमोर बसलेल्या शोकमग्न वडिलांना उमाप्रसाद छोटूच्या मृत्युबद्दल जबाबदार धरतो आहे.. पण कालिबाबूंची श्रद्धा अढळ आहे. माझ्याकडून देवीच्या सेवेत काहीतरी चूक झाली असेल, एरवी इतक्या सर्वांवर अनुग्रह करणारी देवी माझा छोटू का हिरावून घेईल असा त्यांचा प्रश्न आहे. मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून देवीने मला यश दिले नाही, मला शिक्षा केली असे त्यांचे म्हणणे आहे. उमाप्रसाद त्यांना म्हणतो या सगळ्या प्रकारातून तुम्ही काय मिळवले मला माहित नाही पण तुम्ही दयाचे सर्वस्व हिरावून घेतले आहे.

इथे झाल्या घटनेबद्दल स्वत:ला दोष देणारे कालिबाबू हे सर्वसाधारण सश्रद्ध मनाचे प्रातिनिधिक रूप आहे. आधी संभ्रम आणि भीतीमधून स्वतःमधल्या देवत्वावर विश्वास ठेवणारी दया आणि आपल्या श्रद्धेला छेद देणारा पुरावा नाकारून स्वतःकडे दोष घेणारे कालिबाबू, श्रद्धेच्या व्यावहारिक जगातील प्रवासाची सर्वात सुसंगत कारणमीमांसा अधोरेखित करतात.

तिथून उमाप्रसाद आपल्या जावेचे सांत्वन करायला गेला आहे. त्याच्याकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकून ती एकच वाक्य बोलते, ’त्या चेटकीणीनं माझं मूल खाल्लं’. इथे दयाने छोटूला सांगितलेल्या विचित्र गोष्टीचा संदर्भ जुळून येतो.

यानंतर उमाप्रसाद दयाला भेटायला तिच्या खोलीकडे धावतो. त्याची अपेक्षा असावी -आणि आपलीही- की एवढा लळा असलेल्या छोटूच्या मृत्यूने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. त्या क्षणी तिला नवर्‍याच्या आधाराची अतिशय आवश्यकता असेल. पण दाराशी थबकलेल्या उमाप्रसादला दिसते ती संपूर्ण शृंगार केलेली दया. विविध दागदागिने, हातभर बांगड्या आणि भरजरी शालू ल्यायलेली ती. इथे आठवते चित्रपटाच्या सुरवातीच्या प्रसंगातील देवीची मिरवणूक. विसर्जनासाठी नेले जात असणारी देवीची सालंकृत मूर्ती. बुचकळ्यात पडलेला उमाप्रसाद तिला विचारतो, हे सगळे काय आहे. ती म्हणते ’मला जायचं आहे’. तो पुन्हा पुन्हा विचारत राहतो की ’कुठे जायचे आहे’, ती उत्तर न देता पुन्हा पुन्हा ’जायचं आहे’ असंच म्हणत राहते. आता पडद्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला फुलांचा ताटवा दिसतो आणि क्षितिजावर धुक्याची चादर. डाव्या बाजूकडून खालच्या कोपर्‍यातून दया धावत येते आणि त्या ताटव्यातून धावत जात धुक्यात विलीन होते. या पार्श्वभूमीवर उमाप्रसादचा प्रश्न प्रतिध्वनित होत राहतो 'पण कुठे?', 'पण कुठे?'

या प्रसंगात जाणीवपूर्वक प्रतीकाचा वापर आहे असे दिसते. छोटूच्या मृत्यूने दयाला तिच्यापुरते तिच्या देवत्वाबद्दलचे उत्तर सापडले असावे. आपल्या मनुष्यपणाचा पुरेसा पुरावा तिला मिळाला असावा. परंतु हे असूनही ज्यांना देवीच्या कृपेने काही चांगले झाल्याचा, दु:ख निवारण झाल्याचा अनुभव आला त्यांच्या दृष्टीने ती देवी आहेच. माझ्याकडून काही आगळीक घडली म्हणून माझा नातू मला दुरावला असे म्हणणार्‍या कालिबाबूंच्या दृष्टीने ती अजूनही देवी आहेच. तिचे देवी असणे वा नसणे हे केवळ तिच्या निर्णयावर अवलंबून नाही (तसेही ते तिच्या निर्णयावर अवलंबून नव्हतेच). त्यामुळे या आहे/नाही च्या संभ्रमात दयाचा मृत्यू हा अवतारकल्पनेचा मृत्यू नाहीच. मग तिच्यामधे असलेल्या संभाव्य देवीच्या अंशाचे काय. तो अंश जिथून आला त्या क्षितिजाच्या पार असलेल्या तिच्या मूळ स्थानी परत जाणे हाच संयुक्तिक शेवट होऊ शकतो. अखेरच्या प्रसंगाचा मला लागलेला अर्थ हा असा आहे.

आता पुन्हा पडद्यावर येतो तो सुरवातीला पाहिलेला मुखवटा, अनलंकृत. देवत्वाचा सारा साजशृंगार उतरून गेलेला, निव्वळ पुतळा म्हणून शिल्लक राहिलेला. इथे चित्रपट संपतो.

नमनाला अनेक घडे तेल खर्ची घातले आहे. पुढील भागात या अनुभवाला मी 'अस्वस्थ करणारा अनुभव' का म्हटले आहे याचे विवेचन थोडक्यात मांडण्याचा विचार आहे.


श्रेयनामावली:
चित्रपट: देवी
कथा: प्रभातकुमार मुखर्जी
पटकथा आणि दिग्दर्शनः सत्यजित रे
संगीतः उस्ताद अली अकबर खान


कलाकारः

दयामयी: शर्मिला टागोर
कालिबाबू: छबि बिस्वास
उमाप्रसादः सौमित्र चॅटर्जी
ताराप्रसादः पूर्णेंदू मुखर्जी
हरसुंदरी: करुणा बॅनर्जी
छोटू: अर्पण चौधुरी
 
  पुढील भाग >>

हे वाचले का?

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३

<< मागील भाग
 
इकडे एरवी या सगळ्या प्रकाराबद्दल केवळ कंटाळ्याची भावना असणार्‍या दयाच्या चेहर्‍यावर प्रथमच साशंक भाव येतो. (पुढे चालू)

हा प्रकार थांबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून उमाप्रसादने दयाला आपल्याबरोबर कलकत्त्याला नेण्याचा निर्णय घेतला आहे. कालिबाबूंच्या उपस्थितीत जाणे शक्य नसल्याने उत्तररात्री निघण्याचे ठरवून त्यासाठी त्याने बोटीची सोयही करून ठेवली आहे. पतीबरोबर जायला मिळणार या आनंदात दयाच्या चेहर्‍यावर स्मित उमटते. रात्री ते दोघे घाईघाईने नदीकिनार्‍याकडे येत असता ती अचानक थांबते. त्याला कळत नाही की ती का थांबलीये. तो तिला घाईने पाऊल उचलायला सांगतो आहे. पण ती स्तब्धच. अचानक नजर उचलून ती म्हणते ’पण माझ्यात जर खरंच देवीचा अंश असेल तर... तर मग माझ्या असे निघून जाण्याने माझे निहित कार्य मी टाळल्यासारखे होईल. त्यामुळे तुमच्यावर, आपल्या घरावर देवीचा कोप होईल.’ तो परोपरीने समजावू पाहतोय, पण ती म्हणते ’तो मुलगा केवळ तीर्थाने बरा कसा झाला हे खरेच ना?’. खरेतर तिला आपण देवीचा अवतार असण्याबद्दल किंवा आपल्यामधे देवीचा अंश असण्याबद्दल अजूनही खात्री नाही. परंतु आता तिच्या मनात संभ्रम आहे की कदाचित तसे असूही शकेल आणि भीतीही आहे की जर तसे असेल तर देवीने नेमून दिलेल्या कामात कुचराई केली म्हणून देवीचा कोप होऊ शकेल. अखेर संभ्रम आणि भीतीचा विजय होतो. उमाप्रसाद तिला घेऊन घरी परततो.

श्रद्धेचा उगम - आणि प्रसार - हा असा संभ्रम आणि भीतीपोटीसुद्धा होऊ शकतो.

आणखी एक सकाळ होते. ज्याचा मुलगा देवीने बरा केला होता तो नेहमीप्रमाणे हवेलीच्या पायरीवर बसून देवीस्तवन गातो आहे. भक्तांची गर्दी वाढू लागलीय. हवेलीसमोर भक्तांची रांग दिसते. कॅमेरा त्या रांगेचा वेध घेत पुढे सरकतो नि दाखवू लागतो समोरच्या माळावरून पुढे सरकणारी भक्तांची रांग, दूरपर्यंत गेलेली. रांगेत दिसते एक जराजर्जर वृद्धा, काठीचा आधार घेत कष्टाने एकएक पाऊल टाकत देवीच्या दर्शनाला जाणारी, तिच्या मागे आहे एक माता आपल्या मुडदुशी पोराला देवीच्या पायावर घालण्यासाठी घेऊन चाललेली, त्यांच्या मागे अशाच हीन दीन भक्तांचा जमाव, देवीच्या स्पर्शाने आपले दुरित हरावे अशी इच्छा घेऊन आलेला. एकुणच देवीच्या पंचक्रोशीत पसरलेल्या कीर्तीची व्याप्ती दाखविणारा.

घराबाहेर देवीची कीर्ती अशी वाढत असताना इकडे घरातही बराच बदल घडून आले आहेत. आता दया तिच्या उपासनेच्या कलावधीव्यतिरिक्त बहुतेक वेळ तिच्या तळमजल्यावरील खोलीत आराम करताना दिसते. एकदा अशीच ती आपल्या खोलीत पलंगावर पडून आराम करते आहे. बाहेर छोटू चेंडू खेळतो आहे. त्याचे खिदळणे दयाला ऐकू येते आहे. ती देवीचा अवतार आहे हे जाहीर झाल्यापासून तिला छोटूसाठी वेळ देणे अवघड झाले आहे. बाहेर एकटे खेळत असतानाही तो खिदळतो आहे. त्यावरून तिच्याशिवाय जगणे त्याच्या अंगवळणी पडले असावे असे दिसते. तिच्या मुद्रेवर खिन्नता दाटून येते. खेळता खेळता छोटूचा चेंडू तिच्या खोलीत येतो, चेंडूमागे धावत आलेला छोटू दाराशी थबकतो. कदाचित काकीमाँच्या खोलीत जायला त्याला मनाई असावी. पलंगावर पडलेली ती त्याला पाहून हसते. मानेनेच इशारा करून त्याला आत बोलावते. क्षणभर विचार करून छोटू धावत आत येतो आणि चेंडू उचलून धावत निघूनही जातो. तिला जाणवते की आयुष्यातील कोवळीक जपणारा हा लहानसा तुकडा देखील तिच्याकडून हिरावून घेतला गेला आहे. ते तुटलेपण जाणवून ती पुन्हा खिन्न होऊन पुन्हा भिंतीकडे मान वळवते. समोर दिसतो ’देवी’च्या गळ्यातून काढून ठेवलेला फुलांचा हार, तिच्या आयुष्यातील ओलाव्याप्रमाणेच आता सुकून गेलेला.

आता तिला आठवतो तिच्या लग्नाचा प्रसंग, अधोवदन उभ्या असलेल्या तिला बोलते करण्याचा त्याचा प्रयत्न, तिला आठवते शर्टचे बटण अडकल्याचा बहाणा करून तिला मिठीत घेण्याची धडपड. हे सारे सारे आता तिला परके होऊन गेलेले. ती खंतावते, अश्रू ढाळते मग त्याची पत्रे काढून त्याच्या आधारे तो भूतकाळ पुन्हा जगू पाहते. त्या भूतकाळाचा आणखी एक तुकडा सांधून घेण्यासाठी जेव्हा ती तिच्या लाडक्या पोपटाकडे जाते, त्याच्याशी पूर्वीप्रमाणे संवाद साधू पाहते तेव्हा पूर्वीप्रमाणे खाण्याबद्दल हट्ट करण्याऐवजी तो ही तिला माँ माँ अशी हाक मारत रहातो. पुन्हा एकवार तिच्या चेहर्‍यावर वेदना उमटते. मग ती ही हळूहळू त्याच्यापासून दूर निघून जाते.

(क्रमशः)
 
पुढील भाग >>

हे वाचले का?

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २

<< मागील भाग
 
या स्वप्नाआधारे चित्रपट एक निर्णायक वळण घेतो, किंवा इथेच खर्‍या अर्थाने चालू होतो म्हटले तरी चालेल. (पुढे चालू)

कालिबाबू आत्यंतिक श्रद्धाळू आहेत. गेली चाळीसएक वर्षे ते देवीची आराधना करताहेत. तिच्याच कृपेने घराची भरभराट झाली आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. या पारलौकिक श्रद्धेबरोबरच त्यांची आपल्या धाकट्या सुनेवरही श्रद्धा आहे. या घराचे सगळे चांगले होते ते तिच्या पायगुणाने किंवा खरेतर हातगुणाने. त्यामुळे कदाचित अर्धजागृत अवस्थेत त्यांच्या अबोध मनाने या दोन्ही प्रतिमा त्यांना एकामागोमाग दाखविल्या असाव्यात. पण आत्यंतिक श्रद्धेपोटी कालिबाबू यातून भलताच अर्थ काढतात. त्यांना वाटते की देवीनेच त्यांना दृष्टांत दिला आहे आणि ह्या देवीनेच आपल्या सुनेच्या रुपात अवतार घेतला आहेत. स्वप्नात जे पाहिले त्याने भारावलेले कालीबाबू उठून ’माँ’ ’माँ’ अशा हाका मारत तिच्या खोलीकडे धावतात. भर रात्री त्यांच्या हाका ऐकून बाहेर आलेल्या दयामयीच्या पायावर डोके ठेवतात. ती हतबुद्ध. त्यांच्या हा ऐकून बाहेर आलेल्या त्यांच्या थोरल्या मुलाला - तरपदाला - या प्रकाराचा अर्थच लागत नाही. तेव्हा त्या कालिबाबू आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात नि तिच्या पायावर डोके ठेवायला सांगतात. क्षणभर भांबावलेला तो निमूटपणे तिच्या पायावर डोके ठेवतो. पलिकडे आपल्या खोलीच्या दारात उभी असलेली त्याची पत्नी झाल्या प्रकाराने स्तंभित आणि क्षुब्ध झालेली. इथे सुरवात होते दयामयीच्या नव्या आय़ुष्याची, माणूसपण नाकारून देवत्वाची झूल पांघरून जगण्य़ाची.

इथे जाता जाता तरपदाबद्दल सांगितले पाहिजे. कालिबाबूंच्या थोरल्या मुलाला स्वतंत्र अस्तित्वच नाही. तो पोटापाण्याचा वा हौसेचा कोणता व्यवसाय करतो याबद्दल चित्रपटात काहीच उल्लेख नाही. बहुधा वडिलांची जमीनदारी सांभाळणे हेच त्याचे काम असावे. तसेच धाकट्या सुनेने सासर्‍याची मर्जी संपादन केल्याने त्याच्या पत्नीकरवी काही स्थान निर्माण होण्याची शक्यताही मावळलेली. अशा स्थितीत वडिलांच्या पैशावर जगत असल्याने त्यांच्या म्हणण्यापुढे मान तुकविण्याशिवाय पर्यायच नाही. दयाच्या पायावर डोके ठेवल्याने संतप्त झालेल्या पत्नीला तो सांगतो. की हे घर त्यांचे, जमीनदारी त्यांची, पैसा त्यांचा असल्याने मर्जी चालणार ती त्यांची. त्याविरुद्ध जाण्याचे धाडस माझ्यात नाही.

आता सासरा आपल्य सुनेचे देवीपण जाहीर करतो. तिची पूजाअर्चा/आरती, अनुष्ठाने वगैरे सुरू होतात. आता रोजच तिचे ’भक्त’ जमू लागतात. सकाळ संध्याकाळ देवीचे दर्शन, पूजाअर्चा, पाद्यपूजा इ. चालू होते. सततच्या दगदगीने तिने थकून जाऊ नये म्हणून तिच्या पहिल्या मजल्यावरील खोलीऐवजी तळ्मजल्यावरील एक खोली तिला देण्यात येते. एकंदरित रागरंग पाहून दयाची जाऊ उमाप्रसादला पत्र टाकून बोलावून घेते.

यानंतरचा प्रसंग अतिशय महत्वाचा. दयाच्या घरी दररोज पहाटे एक भिकारी येऊन देवीस्तुती गात असतो. या भिकार्‍याचा चार-पाच वर्षांचा मुलगा आठवडाभर आजारी आहे. किरकोळ उपचार करून झाले आहे. हताश होऊन तो ’देवी’च्या पायाशी येतो. कालिबाबू प्रथम त्याच्या मुलाची नाडी पाहतात नि सगळे काही ठीक होईल असा विश्वास देतात. [हा प्रसंग काही सुचविणार असावा, कदाचित कालिबाबूंना वैद्यक व्यवसायाचे ज्ञान असावे असे आधी वाटले. पण पुढील चित्रपट पाहता तसे नसावे.] त्या मुलाला देवीच्या पायावर घालून देवीचे तीर्थ (दूध, फुले इ. नी पादप्रक्षालन केल्यानंतर जमा झालेले पाणी) थेंब थेंब त्या मुलाच्या तोंडात घालायला सांगतात. इकडे जावेचे पत्र मिळाल्याने तातडीने निघालेला उमाप्रसाद हवेलीच्या दाराशी येऊन पोचलाय. त्याला समोर दिसते ती त्याची पत्नी, पुष्पमालांनी सजविलेली, पायाशी बसलेले तिचे भक्त आणि तिच्या समोर जमिनीवर निजवलेला तो मुलगा. हे दृष्य पाहून तो थिजून जातो. दाराशी चाहूल लागल्याने ती नजर तिकडे वळवते आणि त्याला पाहून तिचा चेहरा उजळतो आणि दुसर्‍याच क्षणी डोळ्यात अश्रू.

पुढचे मिनिटभर दोघे नजरेनेच बोलतात. इथे दोघांकडून अप्रतिम मुद्राभिनयाचे दर्शन घडते. प्रथम त्याच्या चेहर्‍यावर दिसते ते प्रश्नचिन्ह, हे सगळे काय चालले आहे असा शंकित भाव, चेहर्‍यावरचे - त्याला पाहून आलेले - स्मित मावळून त्याची नजर टाळू पाहणारी ती. तिच्या या वागण्याने बुचकळ्यात पडलेला तो, दुसर्‍याच क्षणी त्याच्या नजरेला नजर देऊन मूक याचना करणारी आणि आपली हताशा दर्शविणारी ती. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात फुललेला तो अंगार आणि या सगळ्या प्रकाराची चीड. हा संपूर्ण प्रसंग जेमतेम एक मिनिटभराचा, पण मनावर खोल कोरला जाणारा. याची कल्पना करावी फक्त रे बाबूंनीच. अर्थात त्या कल्पनेला उचलून धरणारे सशक्त अभिनेते त्यांना मिळाले हे ही तितकेच खरे.

संतापलेला उमाप्रसाद तातडीने आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांच्याशी वाद घालू पाहतो. केवळ स्वप्न हा दयाच्या देवीपणाचा पुरावा कसा आणि गेले तीन वर्षे मी जे संसारसुख भोगले ते काय खोटे, तिच्या माणूसपणाची मला पटलेली साक्ष काय खोटी असा प्रश्न विचारतो. वडील परंपरेचा, दार्शनिकतेचा आधार घेतात, मी खोटे का बोलेन असा भावनिक प्रश्नही करतात. यांचा असा वाद चालू असतानाच तिकडे तो आजारी मुलगा शुद्धीवर येतो. देवीच्या नावाच्या जयजयकार होतो. अशा स्थितीत वाद पुढे चालू ठेवणे उमाप्रसादला शक्यच नसते.

इकडे एरवी या सगळ्या प्रकाराबद्दल केवळ कंटाळ्याची भावना असणार्‍या दयाच्या चेहर्‍यावर प्रथमच साशंक भाव येतो.

(क्रमशः)
 
पुढील भाग >>

हे वाचले का?

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १

मागील शनिवारी NFAI च्या फिल्म क्लबमधे सत्यजित रेंचा ’देवी’ पाहिला. हा रेंचा तुलनेने कमी प्रसिद्धी मिळालेला चित्रपट, कोणाला ठाऊक असेलच तर तो त्यात प्रमुख भूमिका केलेल्या शर्मिला टागोरमुळे. एरवी पाथेर पांचाली, चारुलता, अभिजान वगैरेंच्या तुलनेत तसा बाजूला पडलेला. एखादा युरोपियन चित्रपट पाह्यला मिळेल अशी आशा असताना अचानक आपल्या मातीतील हा चित्रपट पहायला मिळाला आणि त्या अनुभवातून सुन्न होऊन बाहेर आलो. किती तरी वेळ त्यातून बाहेरच येता येईना. अंधश्रद्धा, बुवाबाजी इ. विषयांवरील अनेक भडक चित्रपट पाहण्यात आले आहेत. पण आत्यंतिक श्रद्धेतून झालेले स्त्रीचे दैवतीकरण आणि त्यातून ओढवलेला तिचा अंत हा अतिशय चटका लावून जाणारा अनुभव होता.

चित्रपटाच्या सुरवातीलाच एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा अनलंकृत पुतळा दिसतो. प्रथम त्याचे रेखीव डोळे अधोरेखित केले जातात, मग त्याच्या भालप्रदेशावर उमटतो एक बाण. हळूहळू देवीचे रूप साकार होऊ लागते. मग दिसते संपूर्ण देवी, सालंकृत सजवलेली अशी. आता कॅमेरा हळूहळू पॅन होत मागे येतो आणि आजूबाजूचे दृष्य दिसते. एका विशाल हवेलीमध्ये अनेक लोक जमले आहेत, दुर्गापूजा चालू आहेत. उच्चरवाने सर्व लोक देवीची आरती म्हणताहेत. या सर्व गर्दीच्या सर्वात पुढे नम्रपणे हात जोडून उभे आहेत त्या हवेलीचे मालक, चंडीपूरचे जमीनदार कालिकिंकर राय. आरतीचा सूर टिपेला पोहोचला आहे आणि इकडे मातेला बळी देण्यासाठी सज्ज असलेला डोंब आपले खड्ग उंचावतो आणि वेगाने खाली आणतो. तेवढ्यात बाहेर शोभेचे दारूकाम चालू होते. आकाशात नळे-चंद्रज्योती फुटताहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर ’काका’ अशी हा ऐकू येते. आता पडद्यावर दिसतो उमाप्रसाद - कालिबाबूंचा धाकटा मुलगा - त्याच्या खांद्यावर बसलेला आहे तो खोका - म्हणजे छोटू- त्याच्या मोठ्या भावाचा - तरपदा याचा - मुलगा. आपल्या पुतण्याला फटाक्यांची आरास दाखवायला उमाप्रसाद घेऊन आला आहे, सोबत आहे त्याची पत्नि दयामयी (शर्मिला टागोर). रोषणाई पहात असताना उमाप्रसाद हळूच दयाकडे एक कटाक्ष टाकतो, ती ही सलज्ज हसून त्याला प्रतिसाद देते. या एका कटाक्षातून त्यांचे परस्परांबद्दलचे प्रेम रेबाबू दाखवून देतात. कॅमेरा पुन्हा फिरतो. आता देवीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुर्गेच्या जयजयकार करीत सर्व मूर्ती एकएक करून विसर्जित केल्या जात आहेत. सुमारे पाच मिनिटाचा हा पहिला प्रसंग पुढे घडणार्‍या कथावस्तूचा आधार स्पष्ट करून ठेवतो.

यानंतर दिसतात उमाप्रसाद आणि दयामयी. दुर्गापूजेला सुटीवर आलेला उमाप्रसाद आता परत निघालेला आहे. स्वत:च्या कलकत्त्याचा पत्ता लिहिलेल्या लिफाफ्यांचा एक गट्ठाच तो तिच्या हवाली करतोय आणि रोज पत्र पाठवण्याबद्दल बजावतोय. ती - अर्थातच रुसलेली - अनेक कारणे पुढे करते आहे. ती विचारते की जर लिहिण्यासारखे काही घडलेच नसेल तर काय लिहू? तो म्हणतो मग तसेच - म्हणजे विशेष घडले नाही - असे लिहून कळव. पण पुढे जेव्हा लिहिण्याइतके महत्त्वाचे काही घडते तेव्हा तिला आपल्या जावेकडून ते कळविण्याची व्यवस्था करावी लागते.

उमाप्रसाद हा कालिबाबूंचा धाकटा मुलगा, कलकत्त्याला राहून शिक्षण घेत असलेला, कालिबाबूंच्या भाषेत नास्तिक पण खरेतर बुद्धिवादी म्हणावा असा. इंग्रजी शिकून उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याची उमेद बाळगणार्‍या तत्कालिन भद्रसमाजातील तरुणांचा प्रतिनिधी. दयामयी त्याला विचारते की इंग्रजी शिक्षण घ्यायचे, का तर चाकरी मिळवायची म्हणून आणि चाकरी मिळवायची ती पैसे मिळवायचे म्हणून. पण तुमच्या वडिलांकडे तर भरपूर पैसे आहेत, मग तुम्हाला हे इंग्रजी शिक्षण कशाला? ही बंगाली समाजातील साधीसुधी मुलगी. वयात येताच लग्न होऊन कालिबाबूंच्या घरात आलेली. बाहेरील जगाचा वारासुद्धा तिला लागलेला नाही. इतके स्थिरस्थावर असलेले घर सोडून विलायतेस जाण्याचे नवर्‍याचे स्वप्न तिला समजू शकत नाही. तो तिला तू माझ्याबरोबर येशील का असे विचारतो तेव्हा ती कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणे ताबडतोब उत्तर देते ’तुम्ही न्याल तिकडे मी येईन’. पण दुसर्‍याच क्षणी ती विचारते की पण मग तुमच्या वडिलांचे काय होईल? ते माझ्याशिवाय कसे राहू शकतील? आणि ते विलायतेस जायला परवानगी देतील? आणि छोटूसुद्धा माझ्याशिवाय कसा राहील?

या दोन प्रश्नातच तिचे घरातील स्थान काय आहे ते स्पष्ट होते. तिचा सासरा घरात तिच्यावर पूर्ण अवलंबून आहे. तो तिला खूप मान देतो. काही काळापूर्वी विकलांग अवस्थेत पडलेला असतानाच पत्निवियोगाचे दु:ख पदरी आल्याने आत्महत्येचा विचार करणार्‍या कालिबाबूंना या नव्या सुनेने सावरले. त्यांची मनोभावे सेवाशुश्रुषा केली आणि त्यांचे आरोग्य तर सुधारलेच पण कर्त्या स्त्रीविना पोरके झालेल घरही तिने तोलून धरले आहे. कालिबाबू तिला ’माँ’ अशी हाक मारतात नि स्वत:चा उल्लेख तिचे म्हातारे मूल असा करतात. अगदी घरातल्या पोपटानेसुद्धा डाळ-दाणे खावे तर छोट्या बहूच्या हातूनच. त्याचे मालक तिला ’माँ’ म्हणतात म्हणून तो ही तिला तशीच हाक मारतो. तर दुसर्‍या बाजूला तिच्या मोठ्या जावेचा मुलगा छोटू (बंगाली घरात बहुधा बडे, मंजे आणि खोका म्हणजे मोठा, मधला आणि छोटा अशी हाक मारण्याची नावे असतात. पण इथे घरातला सर्वात लहान म्हणून खोका) याचाही तिला लळा आहे, तो इतका की कधीकधी त्याच्या आईलाही याचा हेवा वाटावा. छोटू इतका बेरकी की आईने धपाटा घालून झोपवले नि आई कामाला बाहेर पडली की उशी उचलून याने सरळ ’काकीमाँ’ कडे पळ काढावा. मग सासर्याच्या औषधपाण्याची काळजी घेऊन परतलेल्या काकीमाँकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरावा. मग ती विचारते की कोणती गोष्ट सांगू, तर तो सांगतो ’ती मुलांचे मांस खाणार्‍या चेटकीणीची सांग’. ती गोष्ट सांगू लागते. इथे हवेलीचा दिवस संपतो.

इथे मी चरकलो, हे काय आहे. ही असली बीभत्स/क्रूर कथानकाची गोष्ट ती का सांगते आहे त्याला? त्याला त्यातील फॅंटसी आवडत असेल कदाचित, पण नेहमीच्या पर्‍यांच्या, जादूच्या गोष्टी सांगायच्या सोडून तिने अशी गोष्ट का सांगावी? त्याहून पुढचा प्रश्न म्हणजे रे बाबूंनी ही अशी गोष्ट का निवडली असेल? चित्रपट संपता संपता मला या गोष्टीचा उलगडा झाला. या कथेचा सांधा पुढे जोडून घेतल्यासारखा वाटला. अर्थात इथे या प्रतीकात्मतेच्या मोहात रे बाबूंनी पडायला नको होते असे वाटले.

असाच एक दिवस संपवून कालिबाबू झोपायला जातात. झोप नीटशी येत नाही, जरा चाळवलेलीच. अशा अर्धनिद्रित अवस्थेत त्यांना एक स्वप्न पडते. स्वप्नात त्यांना दिसते देवी, म्हणजे खरेतर तिचे डोळे आणि तिच्या भालप्रदेशावरील तो बाण. हळूहळू ते डोळे सजीव होऊ लागतात, डोळ्यांची सीमारेषा पुसट होत जाते आणि दिसतात ते दयामयीचे डोळे. नंतर बाण नाहीसा होऊन दिसते तिच सौभाग्यलेणे. हळूहळू तिचा पूर्ण चेहरा दृष्यमान होतो. कालिबाबू दचकून जागे होतात.

या स्वप्नाआधारे चित्रपट एक निर्णायक वळण घेतो, किंवा इथेच खर्‍या अर्थाने चालू होतो म्हटले तरी चालेल.

(क्रमशः)
 
पुढील भाग >>

हे वाचले का?

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

विठ्ठलाच्या स्त्रिया

(एका संस्थळावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने हा विषय पुन्हा समोर आला.)

विठोबा-रखुमाईचा गजर करणार्‍या महाराष्ट्रदेशी विठोबाच्या स्त्रिया हा विषय कदाचित आश्चर्यकारक वाटेल. पण लोकपरंपरेला तो तसा मुळीच नाही. आपल्या लाडक्या विठोबाचे नाव या ना त्या प्रकारे अनेक जणींशी जोडले गेले आहे. त्यात त्याची राणी रुक्मिणी तर आहेच, पण अभिजात परंपरेबाहेर त्याच्या पदुबाई उर्फ पद्मावती, तुळशीबाई या अन्य पत्नी तर आहेतच पण जनी सारखी साधीसुधी स्त्री सुद्धा आहे. इरावती कर्वेंसारखी एखादी विदुषी त्याला बॉयफ्रेंड म्हणून त्याच्याशी आधुनिक नातेही जोडू पाहते. यामुळे या विठोबाच्या स्त्रिया हा हा विषय दुर्गा भागवत, इरावती कर्वे आणि अरुणा ढेरे या तीन विदुषींच्या लिखाणाआधारे इथे मांडला आहे. (बरेचसे त्यांचे लिखाण जसेच्या तसे उद्धृत केले आहे, माझा सहभाग संपादक म्हणून.)

VithobaStatue

एका कथेनुसार विठोबा हा माळशिरसचा राजा, खंडोबाचा (ज्याच्या पुन्हा दोन बायका आहेत म्हाळसा नी बानू) मांडलिक. त्याची बायको पदुबाई (म्हणजे पद्मावती). एकदा विठोबाच्या एका भक्ताचा आदरसत्कार तिने जाणूनबुजून केला नाही असा गैरसमज झाल्याने विठोबाने तिला शाप दिला (तो शाप फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, पण विषयांतर नको म्हणून सोडून देऊ) त्यामुळे ती भ्रमिष्ट झाली आणि मरण पावली. इथे एक विचित्र संदर्भ आहे. विठोबाने कोणालाही तिच्या मृतदेहाला स्पर्श करू दिला नाही आणि घारी गिधाडांकरवी त्याची विल्हेवाट लावली. नंतर पावसाला बोलावून तिची हाडे समुद्रात वाहविली. पण ज्या भक्तासाठी हे घडले त्या भक्ताने थोर तप केले आणि समुद्राकडून ती हाडे परत मिळविली आणि पद्माळ्यात विसर्जित केली. अर्थात नंतर विठोबाला पश्चात्ताप झाला आणि तो ही भ्रमिष्टावस्थेत फिरत असताना पंढरपूरच्या पद्माळ्यात त्याला एक सुंदर कमळ दिसलं, ते खुडताच त्यातून पदुबाई साकार उभी राहिली. अर्थात विठोबाने तिच्याशी संसार करणार नाही अशी आण घेतली असल्याने तिला स्वतंत्र मंदिरात संसार थाटावा लागला.

तसा विठोबा हा मूळचा दक्षिणेकडिल, पण तो पंढरपुरात राहिला तो पुंडलिकामुळे असे संतपरंपरा सांगते. परंतु धनगर म्हणतात तो आला पदुबाईमुळे. किंबहुना पदुबाई ही मूळची राणी नि रुक्मिणी ही तिची छाया (किंवा पदुबाई हीच पुनर्जात रूपात रूक्मिणी) अशीही त्यांच्यात समजूत आहे. लोकधारणा आणि अभिजात संकल्पनेची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असू शकेल. किंवा अवैदिक विठोबाचे वैदिकीकरण होताना हा बदल झाला असेल.

अशीच कथा तुळशीची. ही कथा कुणबी परंपरेतील. एका दरिद्री ब्राह्मणाची काळी मुलगी, तिला वर मिळणार नाही असे भविष्य होते म्हणून बापाने तिला वाऱ्यावर सोडले. विठोबाने तिला आश्रय दिला. पण रुक्मिणीने मत्सरग्रस्त होऊन काही कारस्थान केले म्हणून ती जमिनीत गडप झाली. परंतु ती गडप होत असताना विठोबाने तिला केस धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर एक सावळे झाड वर आले. विठोबाच्या हातात मंजिऱ्या होत्या. मानवी तुळशीला दिलेले लग्नाचे वचन त्या झाडाशी लग्न करून विठोबाने पुरे केले. हा देव तसा अन्य गृहस्थधर्माला जागणारा आहे. तो कधीकधी भक्तांकडे चहापाण्यालाही जातो. मग त्याचा पाहुणचार केला जातो. मग रुक्मिणीला साडी-चोळी मिळते तर सत्यभामेला चोळीसाठी दोरव्याचे कापड. पण विट्ठलाला काय द्यायचे?

रुख्माईला साडी-चोळी, सत्यभामेला दोरवा ।
विठ्ठल देवराया, तुळशीबाईचा गारवा ॥

तुळशीबाईशीसे त्याचे -विवाहबाह्य का असेना - असलेले नाजूक नाते भक्तांनाही माहित आहे. म्हणून ते देवाची तुळसाबाईशी गाठ घालून देतात.

अरूणा ढेरेंच्या 'ओव्यांमधली रुक्मिणी' या लेखात तर त्यांनी विठोबाच्या अन्य स्त्रियांमुळे रुसलेल्या रुक्मिणीच्या काही ओव्याच उद्धृत केल्या आहेत. त्यातील एक दोन इथे देतो. इथे विठोबा हा मूळ कृष्णाचा अवतार असल्याचा संदर्भ अधिक ठळक होतो. इथे रुक्मिणी नाराज आहे ते विठोबाच्या राधेशी असलेल्या संबंधांबद्दल. त्याबद्दल आयाबाया दळताना म्हणतात:

राणी रुक्मिणी परीस राधिकेला रूप भारी
सावळा पांडुरंग नित उभा तिच्या दारी

अर्थात रुक्मिणी यामुळे त्या द्वारकेच्या राण्यावर रुसली आहे.

थोरली रुकमिण जशी नागीन तापली ।
देवाच्या मांडिवर तिने राहीला* देखली ॥

(* राधेला)

इथे रुक्मिणी ही गृहकृत्यदक्ष गृहिणी आहे. ती घरची नेहेमीची कामे तर करतेच, पण विठोबाच्या भक्तांसाठी बुक्का दळून ठेवते. त्यांच्या भक्तांची, नातेवाईकांची उस्तवार करते.

द्रौपदीने दिले घोडे पांडुरंगाहाती ।
नणंदेच्या नात्यानं रखुमाय पाय धुती ॥

असं असलं तरी विठोबा तिचा एकटीचा नाही. त्यामुळे ती विचारते:

इट्ठलाच्या पाया रखुमाई लोणी लावी ।
देवाला इचारती, 'जनी तुमाला कोण व्हवी' ॥

ही जनी - जनाबाई - विट्ठलाची लाडकी आहे. म्हणून असं म्हटले आहे:

रखुमाईच्या पलंगाला गाद्या गिरद्या बख्खळ ।
देवाला आवडती जनाबाईची वाकळ ॥

क्वचित कधी थोडी अधिक धीट होऊन रखुमाई पुसते:

रुक्मिण पुशिते, देव व्हते कुठं राती ।
शेल्याला डाग पडे, तुळशीची काळी माती ॥

रुक्मिण पुशिते, कुठं व्हते सारा वेळ ।
शेल्याला लागलं कुण्या नारीचं काजळ? ॥

पण विठोबा चतुर आहे, हरप्रयत्नाने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुक्मिणीला तो काहीच उत्तर देत नाही. इथे अरुणाबाईंनी रुक्मिणीविषयी एक अतिशय हृद्य वाक्य लिहिले आहे. त्या म्हणतात रुक्मिणीला सर्व काही कळले होते पण 'कळण्यानं दु:ख मिळतं, परिस्थिती बदलंत नाही हे ही तिला कळलं होतं'. अतिशय चटका लावणारं हे मूल्यमापन सर्व भारतीय स्त्रियांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

साऱ्या संतपरंपरेने मात्र विठोबाचा राजेपणा मोडला आणि त्याला आपल्यात ओढला. तो ही त्यांच्या प्रेमाने बांधला गेला. अनेक मार्गाने त्याने सर्वांच्या सुखदू:खात त्यांची सोबत केली. एखादी बाई दळिताकांडिता त्याला विचारत राहिली:

जिवाचं सुखदुक तुला सांगते विट्ठला।
माज्या पंढरीच्या हरी, कधी भेटशील एकला ॥

आणि तो तिला भेटत राहिला वास्तपुस्त करीत राहिला. म्हणून तर आपण त्याने रुक्मिणीवर केलेल्या अन्यायाची आठवण विसरू शकतो.

जनीशी विठ्ठलाचे सर्वात जवळचे नाते आहे.

माय गेली बाप मेला
आता सांभाळी विट्ठला
मी तुझे गा लेकरू
नको मजसी अव्हेरू

अशी विनवणी करणाऱ्या जनीला या दासीला त्याने सर्वस्वाने आपले म्हटले आहे. इतर कोणासाठी नाही, पण जनीसाठी विठोबा राबला आहे. जनीने झाडलोट केली की याने केर भरावा, दूर टाकावा, तिने साळी कांडायला काढल्या की याने उखळ साफ करून कांडपाला हातभार लावावा, कोंडा पाखडावा, पाणी भरावे अशी सगळी कामे विठोबाने तिच्यासाठी केली आहेत.

पण असे बापाचे नाते सांभाळणाऱ्या विठोबाला जनी कधी "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या' असेही म्हटले आहे. क्वचित ती त्या पोरट्याला आपल्या म्हातारीची काठी असेही म्हटले आहे.

पंढरीचा विठुराया, जसा पोरगा पोटीचा
मज आधार काठीचा, म्हातारीला
विठुराया पाठीवरी, हात फिरवे मायेने
पुसे लेकाच्या परीने, बये फार भागलीस?

तर याउलट तिच्या संबंधाने रखुमाईने विठोबाची शंकाही घेतली आहे. तर जनीनेच आणखी एक पाऊल पुढे टाकून 'डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी' असे म्हणत विठोबासाठी वेसवापणही स्वीकारले आहे. जनीचे विठोबाशी असे गुंतागुंतीचे नाते आहे. ते समजण्यासाठी ढेरेबाईंचा 'डोईचा पदर... ' (पुस्तकः कवितेच्या शोधात) हा लेख मुळातून वाचायला हवा.

- oOo -

संदर्भः

पैस- दुर्गा भागवत
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी: पृ. २३-२४
स्त्री आणि संस्कृती - अरुणा ढेरे
आठवणीतले अंगण - अरुणा ढेरे
कवितेच्या शोधात - अरुणा ढेरे
गंगाजल - इरावती कर्वे.


हे वाचले का?

रविवार, १८ एप्रिल, २०१०

नागर-गप्पा

तुम्हाला बिल गेट्सने पैसे दिले का?

दचकलात का? अहो पण दचकायला काय झालं? एक-दोन वर्षापूर्वी मी तुम्हाला एक ढकलपत्र नव्हते का धाडले, ज्यात आपला (हो निदान पैसे देतोय तर आपला म्हणायला काय हरकत आहे) बिल त्याचे पैसे वाटून टाकणार आहे असे म्हटले होते? मला नाही मिळाले अजून म्हणून म्हटलं इतर कोणा कोणाला मिळालेत ते विचारावे.

असो. थट्टेचा भाग बाजूला ठेवू या. पण माझी खात्री आहे हे ढकलपत्र प्रत्येक इ-मेल-पत्ताधारी व्यक्तीला किमान एकदा(पॉइंट टू बी नोटेड. मला किमान पाच जणांकडून आले. काय पण शेजार आहे नाही! ) तरी मिळालेच असणार. आणि कदाचित 'I know the truth, but just in case... ' असे म्हणत पुढे ढकललेही असेल, हो ना? माझ्या एका केरळी गणितविभाग-प्रमुख (म्हणजे मराठीत HOD हो) मित्राने प्रथम पाठवले. आणि त्याच्या 'cc' मध्ये जवळजवळ सव्वाशे नावे होती (हाय का आवाज? ). अर्थातच माझेही समाजसेवी पत्र (जे मी प्रत्येक खोट्या ढकलपत्राच्या 'प्रेषिता'ला पाठवतो) ते त्यांना पाठवून त्यांना "धन्यवाद" दिले. माझ्या एका सहकारी कन्येनेही 'just in case... ''म्हणत हेच पत्र पाठवले.

CommBankHoax

असेच एक ढकलपत्र आले त्यात एका विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियातील तथाकथित 'भयानक' अनुभव कथन केला होता (किडनी रॅकेटचा संदर्भ) आणि ऑस्ट्रेलियात जाणाऱ्यांनी सावध असावे असा सल्ला दिला होता. आणखी एकामध्ये एका प्रथितयश हॉस्पिटलचा संदर्भ देऊन (अगदी त्यांच्या संकेतस्थळाचा पत्ता, दूरध्वनी क्र. विभागप्रमुखांची नावे वगैरे) आणि खाली प्रेषक म्हणून डीनचे नाव होते. आणि प्रत्येक इ-पत्त्यामागे श्री. रतन टाटा रूग्णालयाला २००० रू (चु. भू. द्या घ्या) देणार आहेत असे लिहिले होते. (हो त्यांचा बिल देतो तर आमचे टाटा का मागे राहतील?)

९/११ च्या नंतर दैनिक "सकाळ" मध्ये आलेले छायाचित्र आठवते का? धडकणार्‍या विमानाचे अगदी दोन मिनिट आधीचे 'योगायोगाने' मिळालेले ते चित्र नंतर फोटोशॉपची किमया होती हे लक्षात आल्यानंतर सकाळने माफी मागितली होती. हे चित्रही ढकलपत्र म्हणून दोन-तीन दिवस वेगाने फिरत होते.

मला खात्री आहे अशी अनेक ढकलपत्रे पाठविली जातात. बहुतेक पत्रातून तुमच्या भावनेला आवाहन करून (गणपतीचे पत्र २१ जणाना पाठवा; हो मला विपत्र म्हणून आले होते), घाबरवून (ऑस्ट्रेलियातील अनुभव), वा तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून (खालील समाजसेवेचे उदाहरण पहा) पुढे ढकलण्याचे आवाहन केले जाते. बहुतेक वेळा खर्च पडत नाही म्हणून आपणही 'ढकला' चे बटण दाबून मोकळे होतो. यामुळे सर्व ढकलणाऱ्या मंडळींच्या इ-पत्त्याची साखळीच जालावर फिरू लागते. अर्थात यात मूळ प्रेषकाचा फायदा काय हा प्रश्न माझ्यासाठी तरी अनुत्तरितच आहे. अशा प्रकारात प्रत्यक्ष नुकसान होत नसले तरी, अनावश्यक जाहिरातींचा मारा होणे, जालावरील विपत्रांचे अनावश्यक ये-जा वाढणे असे अप्रत्यक्ष दुष्परिणाम होतातच.

यातील काही कथा प्रत्यक्ष नुकसान करणार्‍याही असतात. काही काळापूर्वी मला एक विरोप आला होता. त्यात वेगवेगळ्या देशात दर-माणशी खाण्याचे प्रमाण फटूंच्या सहाय्याने दाखवले होते. शेवटी भारतातील प्रमाण किती कमी आहे आणि आपण अन्न वाचवावे वा वाया घालवू नये असे आवाहन होते. शेवटी एका सामाजिक संस्थेचे नाव देऊन त्यांचा दूरध्वनी क्रमांकही दिला होता. आपण पार्टी वगैरे दिल्यानंतर उरलेले अन्न वाया न घालवता या संस्थेला द्यावे (त्यांचे स्वयंसेवक येऊन घेऊन जातील असे आश्वासन दिले होते). ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करते आणि हे अन्न त्या मुलांना मिळू शकेल जेणेकरून त्यांना चांगले अन्न मिळेल असा समाजसेवी सूर होता.

एखादी समाजसेवी संस्था असे ढोल वाजवून अन्न जमा करेल हे मला शंकास्पद वाटले म्हणून मी गुगलून पाहिले तर अशी संस्था खरेच अस्तित्वात होती व (अन्यत्र आलेल्या परिचयानुसार) चांगले कामही करीत होती. दिलेला दूरध्वनी क्रमांक ही बरोबर होता. परंतु त्यांनी आपण असे अन्न जमा करत असल्याचा स्पष्ट इन्कार केला होता (त्यांच्या संकेतस्थळावर तसेच अन्य काही फोरम्सवर). ही मेल उघडपणे खोटी होती. मग प्रश्न असा होता की मुळात अशी मेल पाठवणाऱ्याचा उद्देश काय असावा. अचानक मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तो दूरध्वनी क्रमांक 'टोल-फ्री' होता. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या कॉलचे बिल हे संस्थेकडून भरले जात होते. अशा मेल मुळे अनेक जण फोन करीत असल्याने संस्थेचे फोन-बिल विनाकारण वाढत जात असणार. संस्थेवर राग असणाऱ्या एखाद्या विघ्नसंतोषी माणसाने हे काम केले होते का? कुणास ठाऊक.

सामान्यपणे अशा पत्रांना नागर-गप्पा (Urban Legends) (गाव-गप्पा वरून हे भाषांतर सुचले) जाल-अफवा असे म्हटले जाते. काही संकेतस्थळे अशा नागर-गप्पांचा पाठपुरावा करतात. यात अर्बन लेजंडस (http://urbanlegends.about.com) व स्कॅमबस्टर्स (http://www.scambusters.com) या दोन स्थळांचा समावेश होतो. आपल्या 'आवडत्या' (favorites) संकेतस्थळांच्या यादीत यांचा समावेश असलेला चांगला.

सामान्यपणे अशा पत्रांच्या प्रेषकाला मी वरील दोन दुवे पाठवतो आणि काही ठोकताळे ज्यांच्या आधारे आलेल्या ढकलपत्राची शहानिशा करता येईल आणि तुमच्या मित्रांचे इ-पत्ते अनोळखी व्यक्तींच्या हाती पडण्याचे तुम्हाला टाळता येईल.

अ. सदर पत्रातील विषय/दावा विश्वासार्ह वाटतो का हे पाहणे (हो पण 'ज्याची त्याची बुद्धी आणि ज्याची त्याची जाणीव' आहेच. उदा. बिल गेटस त्याचे पैसे खरेच वाटणार आहे असे समजणाऱ्यांबद्दल काय बोलावे. )

ब. सदर ढकलपत्र नाही ढकलले तर काही नुकसान होणार आहे का ते पाहावे. नसेल तर न ढकलणे योग्य.

क. ढकलपत्रात उल्लेख केलेल्या संस्था, व्यक्ती अथवा मूळ प्रेषक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहभागाची खात्री करून घ्यावी.

ड. वरील दोन दुव्यांवर जाऊन सदर ढकलपत्राचा पाठपुरावा झालेला आहे का पाहणे.

ई. काही वेळा (उदा. स्थानिक संदर्भ, वरील अन्न जमा करण्याचे) या दुव्यांवर असा पाठपुरावा केला नसेल तर गुगलून पाहणे.

फ. जर यापैकी सर्व मार्गाने हे विपत्र बनावट असल्याचा पुरावा मिळाला नाही आणि पत्रातील मजकूर पुढे पाठविण्यालायक असेल तर :

१. पत्रातील सर्व इ-पत्ते काढून टाकावेत.
२. ज्यांना पाठवायचे आहे त्यांचे इ-पत्ते 'bcc' मध्ये टाकावेत.
३. कोणालाही त्यांच्या कार्यालयीन इ-पत्त्यावर ढकलपत्रे पाठवू नये.

वरील दोन दुवे तसेच (http://mashable.com/2009/07/15/internet-hoaxes/) येथे काही नागर-गप्पांचा उहापोह केलेला आहे. गंमत म्हणून कधीतरी वाचून पहा. त्यातील - वाकुड्या का होईना - कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटेल.

- oOo -


हे वाचले का?