शुक्रवार, १४ मे, २०१०

होते कुरूप वेडे (कथा)

(Italo Calvino यांच्या The Black Sheep या कथेचा स्वैर अनुवाद.)

कोण्या एका गावी सगळेच चोर होते.

प्रत्येकजण रात्री आपली पिशवी आणि काजळी धरलेले कंदिल घेऊन बाहेर पडत आणि एखाद्या शेजाऱ्याचे घर लुटून पहाटे जेंव्हा आपल्या घरी परतून येत तेंव्हा आपलेही घर लुटले गेलेले त्यांना आढळून येई.

अशा तऱ्हेने सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. या व्यवस्थेत कुणाचेच नुकसान होत नसे वा कुणाचा फायदा. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करे, तर दुसरा तिसऱ्याच्या. अशा तऱ्हेने चालू रहात पुन्हा अखेरचा पहिल्याच्या घरी चोरी करून साखळी पूर्ण करी. गावातील व्यापारही सर्वस्वी फसवण्याच्या कलेवर अवलंबून होता. विक्रेते आणि ग्राहक दोघेही तिचा यथाशक्ती वापर करीत. येथील नगरपालिका ही एक गुंडांचा अड्डाच होती. तिचे शासक आपल्या नागरिकांना छळण्याचे आपले एकमेव काम मोठ्या निष्ठेने करीत असत. तर नागरिकही आपल्या परीने त्याना ठकवण्याचे काम करीत असत. अशा तऱ्हेने या गावातील जीवन सुरळित चालू होते.

कुठून कोण जाणे, पण एके दिवशी त्या गावात एक प्रामाणिक माणूस राहण्यास आला.

TheBlackSheep

रात्री आपली पिशवी आणि कंदिल घेऊन लुटण्यास बाहेर पडण्याऐवजी तो घरीच धूम्रपान करीत पुस्तक वाचत बसला. काही चोर त्याचे घर लुटण्यास आले आणि घरात दिवा चालू असलेला पाहून हात हलवित परतले.

असे काही दिवस गेले. अखेर गावच्या काही 'प्रतिष्ठित' मंडळी त्या प्रामाणिक माणसाला भेटायला गेली. त्यांनी त्याला तेथील सर्व परिस्थिती नीट समजावून सांगितली. त्याला जर इतराना लुटण्याची इच्छा नसेल तर किमान त्याने घरी राहून इतरांच्या लुटण्याच्या आड येऊ नये असे सुचवले. त्या प्रामाणिक माणसाकडे या तर्काला काही उत्तरच नव्हते.

त्या दिवशी पासून त्यानेही इतरांप्रमाणेच रात्री बाहेर पडून पहाटे घरी परत येण्याचा क्रम सुरू केला. फक्त त्याने इतर कोणालाही कधी लुटले नाही. रात्री तो आपल्या घराजवळच्या नदीवरील पुलावर जाऊन बसे आणि चांदण्यात नदीचे पात्र न्याहाळत राही. पहाटे जेंव्हा तो घरी परते तेंव्हा आपले घर लुटले गेल्याचे त्याला आढळून येई.

जेमतेम एकाच आठवड्यात तो प्रामाणिक माणूस पूर्ण निष्कांचन झाला. त्याच्याकडे खायला काही नव्हते आणि त्याचे घर पूर्ण रिकामे होते. अर्थातच त्याबद्दल तो कोणालाही दोष देऊ शकत नव्हता कारण ही परिस्थिती त्यानेच ओढवून घेतली होती.

परंतु यामुळे गावात एक वेगळीच समस्या निर्माण झाली.

तो प्रामाणिक माणूस इतर कोणाचेही घर न लुटता स्वतःचे घर मात्र लुटू देत होता. त्यामुळे दररोज पहाटे गावात एक माणूस असा असे की जो इतर कोणाचे घर लुटून घरी परते तेंव्हा आपले घर लुटले गेलेले नाही असे त्याला दिसून येई. हे घर खरेतर त्या प्रामाणिक माणसाने लुटणे अपेक्षित होते आणि आपले हे 'काम' त्याने केलेले नसे.

अशा तऱ्हेने ज्यांचे घर लुटले जात नव्हते ते इतरांपेक्षा अधिक श्रीमंत झाले. आता इतरांपेक्षा अधिक पैसा जमा झाल्याने त्यांना इतरांचे घर लुटण्यासाठी जाण्याची गरज वाटेनाशी झाली. तसेच दुसर्या बाजूला जे लोक त्या प्रामाणिक माणसाचे घर लुटण्यास येत, त्यांना तिथे

दरम्यान जे अधिक श्रीमंत झाले होते त्यापैकी काहीना रात्री पुलावर फिरायला जाणे हे प्रतिष्ठेचे वाटू लागले. त्यांनीही मग रात्री पुलावर जाऊन चांदण्यात नदीचा प्रवाह न्याहाळत बसायला सुरवात केली. यामुळे तर गोंधळात अधिकच भर पडली. पुलावर जाऊन बसणाऱ्यांची घरे वारंवार लुटली गेल्यामुळे आणखी काही लोक श्रीमंत झाले, तसेच उरलेले श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. याचा परिणाम असा झाला की आणखी काही लोक गरीब झाले. पण अजूनही ते सर्व चोर होते आणि एकमेकाना लुटत होते.

आता आणखी श्रीमंत झालेल्यांनाही पुलावर फिरायला जावेसे वाटू लागले. पण आता अनुभवातून त्यांच्या हे लक्षात आले की जर आपण तसे केले तर आपणही गरीब होऊ. त्यावर त्यांनी एक तोडगा शोधून काढला. आधीच गरीब झालेल्या काही जणांना त्यांनी आपल्यासाठी लुटण्यास पाठवायला सुरवात केली. त्यासाठी त्या गरीबांना त्यांनी वेतन, भत्ता इ. देऊ केले. आता ते निश्चिंतपणे पुलावर फिरायला जाऊ लागले. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिक गरीब. पण अजूनही ते सर्व चोरच होते आणि एकमेकाना लुटत होते.

असेच काही दिवस गेल्यानंतर काही श्रीमंत इतके श्रीमंत झाले की त्यांना स्वतः लुटायला जाण्याची वा इतरांना त्यासाठी पाठवण्याची गरजच उरली नाही. पण जर त्यांनी इतरांना लुटणे थांबवले तर ते स्वतः गरीब होण्याचा धोका होता. कारण ते इतरांना लुटणार नसले ती इतर लोक त्यांना लुटणारच होते.

हे टाळण्यासाठी त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला. काही अगदी गरीब लोकाना शोधून काढून त्यानी आपल्या घराची निगराणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. याची परिणती पोलिस यंत्रणा निर्माण करण्यात आणि तुरुंग बांधण्यात झाली.

अशा तऱ्हेने तो प्रामाणिक माणूस त्या गावात आल्यानंतर काही वर्षातच लोक लुटण्याचे वा लुटले जाण्याचे नाव काढेनासे झाले. आता ते फक्त श्रीमंती आणि गरीबीबद्दल बोलत. पण अजूनही ते सर्व चोरच होते.

त्या प्रामाणिक माणसाचे प्राण मात्र उपासमारीने पूर्वीच लुटून नेले होते.

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, ५ मे, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५

<< मागील भाग
 
सत्यजित रे यांच्या चित्रपटांची एक दोन परिच्छेदात ओळख करून देणारे एक लहानसे पुस्तक वाचले होते. लेखक अमृत गंगर (प्रकाशक लोकवाङ्मय गृह). त्यांनी हा चित्रपट भारतातील अंधश्रद्धेवर आसूड ओढणार होता असे म्हटले आहे. तसेच तो प्रकाशित झाला तेव्हा अनेक धार्मिक संघटनांनी त्याविरुद्ध गदारोळ केला अशी माहिती दिली आहे. आता डावे नि उजवे यांचे ज्यावर एकमत झाले आहे त्याबाबतच मी मतभेद व्यक्त करू इच्छितो. मला वाटते इथे आपले टिपिकल भारतीय मन विचार करते आहे. आपल्याला जसे असावे असे वाटते तसे 'आहे' असा आपला समज असतो. वरवर न पाहता, थोडे वस्तुनिष्ठ होऊन बारकाईने पाहणे आपल्याला जमत नाही. चटकन एक शिक्का मारला की आपण 'वा' म्हणायला किंवा दगड मारायला मोकळे होतो.

मुळात ही शोकांतिका ही व्यक्ती-समष्टीची लढाई आहे, माणसे निमित्तमात्र आहेत, मूळ कारण आहे ती परिस्थिती नि या सार्‍याची पार्श्वभूमी असलेला नि तुमच्या आमच्या आयुष्यावर अदृष्य बंधने घालणारा समाज. इथे कुणाला नियतिवाद दिसू शकेल. इथे शोकांतिका आहे ती आहे ती दयाचे माणूस म्हणून जगण्याचे हक्क हिरावून घेतले जातात ही. आता इथे ज्या काळात हा चित्रपट केला त्या काळाच्या संदर्भात - नि अन्य काही संदर्भ अधिक ठळक व्हावेत म्हणून - देवत्वाचे संदर्भ आले आहेत. अन्यथा हीच कथा एखाद्या अन्य पार्श्वभूमीवर अन्य समाजिक स्थितीतही दाखविता आली असती. चित्रपटातील हिरो/हिरोईन, खेळाडू यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या प्रसिद्धीचाच दबाव येतो. कल्पना करा अमिताभ बच्चन, किंवा सचिन तेंडुलकर निवांत चौपाटीवर बसून भेळ खाऊ शकेल? हरवलेले स्वातंत्र्य ही त्या यशाची मोजलेली किंमत असते. हीच प्रसिद्धी कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी किंमत मोजायला लावते. 'आंधी' आठवतो का? राजकारणात शिखरावर पोचलेली पण त्यामुळे विलक्षण प्रेम करणार्‍या पण ध्येयहीन पतीपासून नि मुलीपासून दुरावलेली आरती ही दयाचीच एक प्रतिमा म्हणता येईल.आणखी एक चित्रपट होता (नाव विसरलो) ज्यात चित्रपटाची नायिका ही साध्यासुध्या घरातून आलेली, आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर चित्रपटात मोठे नाव कमावते पण तिला अगदी लहानपणापासून साथ देणार्‍या प्रेमिकापासून दुरावत जाते. चित्रपटाचे नाव आठवत नाही, पण नायिका बहुधा जरीन वहाब होती, याचा एक 'मिथुन रिमेक' पण आला होता 'सितारा' नावाने. आणि आपला गाईडमधील वहिदाची वाटचाल थोडीशी अशाच मार्गाने होणारी (पण तिथे देवला जरा काळ्या रंगात रंगवून तिला झुकते माप दिले आहे). या सर्व नायिका नि देवीतील दया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे. या सर्व नायिकांनी आपले आयुष्य, ते यश, ती प्रसिद्धी स्वतः जाणीवपूर्वक नि हेतुतः निवडलली आहे. तो त्यांच्या ध्येयाचा भाग आहे. परंतु दयाचे तसे नाही. हे देवत्त्व तिच्यावर लादले गेले आहे. ते नाकारण्याचे स्वातंत्र्य तिला नाही, किंवा खरंतर असे म्हणता येईल की त्या स्वातंत्र्याची जाणीव तिला नाही. भोवतालची परिस्थितीही अशी आहे की ते स्वातंत्र्य जाणवले तरी त्याचा वापर ती करू शकणार नाही.

इथे आणखी एका अजोड कलाकृतीचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. जी. एं. ची एक अप्रतिम कथा आहे 'स्वामी' नावाची. या कथेशी 'देवी'ची तुलना करण्याचा, त्यातील मूळ तत्त्वातील कमालीचे साम्य अधोरेखित करण्याचा मोह आवरत नाही. या कथेत एका श्रांत वाटसरूला अन्न/निवास यांची लालूच दाखवून एक मठात नेले जाते. त्याची सर्वप्रकारे सेवा करून अखेर विश्रांतीसाठी एका लहानशा खोलीत नेले जाते. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की तो आता त्या लहानशा खोलीत बंदिवान झाला आहे. खोली किती तर जेमतेम आडवा होता येईल इतकी, उंची किती तर जेमतेम तो बसू शकेल इतकी. बाजूला तेवढीच लहान खोली जी न्हाणीघर म्हणून वापरायची. अन्नाचे ताट आत सरकवण्यासाठी एक दाराला एक लहानशी फट नि छतामधे हवा येण्याइतके लहानसे छिद्र, तेही इतके उंच गेलेले की त्याचा शेवट खालून दिसणे दुरापास्तच. बराच आरडाओरडा केल्यानंतर त्याला सांगण्यात येते की आता तो आता त्या मठाचा महंत आहे आणि उरलेले आयुष्य त्याला तिथेच काढायचे आहे. त्याच्यासाठी उंची वस्त्रे नि सुग्रास अन्न सदैव तयार असेल, पण ते त्याला त्याच्या खोलीतच मिळेल. त्याच्या मृत्युनंतर त्याचे कलेवरच तेथून बाहेर येईल नि अशाच एखाद्या वाटसराची त्याच्याजागी वर्णी लागेल. ही एक विलक्षण रिपल्सिव (समर्पक मराठी प्रतिशब्द सुचला नाही, क्षमस्व) कथा आहे (वाचताना छातीवर विलक्षण दडपण आल्यासारखे वाटले पण वाचणे थांबवू शकलो नाही. आमच्या एका मित्राचे वडील कार्यक्रमानिमित्ताने गावोगाव हिंडत असतात. ते म्हणाले ही कथा वाचल्यावर आता आडगावी एस्टी स्टँडवर थांबण्याची आता भीती वाटते.) पण त्याचे सार देवीशी बरेचसे मिळतेजुळते आहे. महंत बनणे म्हणजे एका अर्थी लौकिक जीवनाचा त्याग करून, जगण्याचे इतर सारे पैलू नाकारून एका छोट्या खोलीत बंदिस्त होणेच तर असते. एकदा तिथे गेलात की परतीची वाट बंद असते, तसा प्रयत्न केलेल्यांचे काय होते ते आईबापांचे छत्र गमावलेल्या त्या चार पोरक्या पोरांना विचारा.

सामान्यपणे समजायला सोपे म्हणून जी मांडणी आपण अपेक्षित ठेवतो तशी सुष्ट/दुष्टाची लढाई इथे नाही. तसे इथे कोणीच सुष्ट वा दुष्ट नाही नि तशा काळ्या पांढर्‍याच्या तथाकथित लढाईतून येणारा बटबटीतपणा/भडकपणा सुद्धा नाही. सबकुछ पु.ल. असलेला 'गुळाचा गणपती' आठवतो का? ती 'देवी' ची एक भ्रष्ट नक्कल म्हणावी लागेल. नायकाला गरीब बिचारा दाखवून नि त्याला बुवा बनविणार्‍यांना खलपुरूष दाखवून, नि नायकाला प्रेमपात्र देऊन (एखाद्या चांगल्या गाजलेल्या परदेशी वा देशी पण स्थानिक भाषेतील चित्रपटांवरून हिंदी चित्रपट बनविताना जे जे करतात ते ते सर्व करून) अंती सत्याचा विजय वगैरे भाबड्या नि गल्लाभरू शेवटाकडे नेला आहे. पण 'देवी' मधे कोणीही विलन नाही, अगदी ही शोकांतिका ज्यांच्या एका स्वप्नातून परिणत झाली ते कालिबाबूही नव्हेत. कारण त्यांचे स्वप्न खरेच आहे, आवई नाही; भक्तीही खरीखुरीच आहे, बनाव नाही. त्यांचा खरोखरच असा विश्वास आहे की दया ही कालिमाता आहे. यात तिच्या देवत्त्वाचा गवगवा असला तरी त्यांनी तिचा - गुळाचा गणपतीप्रमाणे - बाजार मांडलेला नाही, उलट या देवीच्या उपासनेची संधी इतरांनाही मिळावी असाच त्यांचा हेतू आहे. इथे उमाप्रसाद नास्तिक/बुद्धिवादी आहे पण त्यानेही कुठे या टोकाच्या श्रद्धेला प्रत्यक्ष विरोध केलेला नाही. तो फक्त दयाला त्यातून सोडवू पाहतो ते तिचे मूळचे माणूस म्हणून असलेले जगणे तिला परत मिळावे म्हणून, प्रत्यक्ष श्रद्धेबद्दल वा अंधश्रद्धेबद्दल कोणतेही भाष्य तो करीत नाही. त्याचे बुद्धिवादी असणे हे फक्त कालिबाबूंच्या वाक्यातूनच तुमच्या-आमच्या पर्यंत पोचते आहे. एखाद्या उथळ दिग्दर्शकाने लगेच इथे आस्तिक/नास्तिक, बाप/मुलगा असा संघर्ष कदाचित उभा केला असता. दयाला आपल्याबरोबर नेण्याचा उमाप्रसादचा डाव हाणून पाडण्यासाठी कालिबाबूंनी दयाच्या देवी असण्याची हाकाटी पिटण्याचा नि त्यायोगे तिला हवेलीतच ठेवून घेण्याचा डाव केल्याचेही दाखवले असते. पण इथेच सत्यजित रे इतरांहून वेगळे आहेत. त्यांना काय म्हणायचे आहे ते त्यांना नेमके ठाऊक आहे. त्याहून वेगळा किंवा दुय्यम असा एखादा पैलू चुकून सुद्धा डोईजड होऊ नये म्हणून ते अतिशय काळजीपूर्वक पटकथा लिहिताहेत. त्याबाबतचे आणखी काही मुद्दे पुढील भागात.

(क्रमशः)

हे वाचले का?