गुरुवार, १४ जून, २०१२

शोध तुकारामाचा

तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव - निदान विशी उलटलेल्या - मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातील कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत.

पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार निवडक अभंग, त्याची 'कर्कशा' पत्नी आवली, त्याचा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी झालेला संघर्ष, इंद्रायणीतून पुन्हा वर आलेली त्याची गाथा नि त्याच्या सदेह वैकुंठागमनाचे गूढ एवढ्यात तुकोबारायाबद्दलची आपली माहिती - नि रुचीही - संपते.

एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्याची जडणघडण यावर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात. मानसशास्त्रात माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा बहुधा त्याच्या बालपणाच्या परिस्थितीपासून सुरू होतो. संस्कारक्षम वयात त्या व्यक्तीने जगलेले आयुष्य, त्याला मिळालेले कौटुंबिक संस्कार, सामाजिक वारसा, त्याच्या वाट्याला आलेला काळाचा नि भूगोलाचा तुकडा, इ. अनेक घटक त्याच्या व्यक्तिमत्त्वाला घडवत जातात. तुक्याचा तुकोबाराय होण्याचा प्रवास या घटकांच्या अनुषंगाने समजावून घ्यायला हवा.

वेगवेगळ्या चित्रपटांकडे पाहण्याचा/लिहिण्याचा दृष्टिकोन वेगळा असायला हवा असे मी मानतो. रावडी राठोडबद्दल लिहिणे/तो पाहणे नि बालगंधर्व किंवा नव्या ’तुकाराम’ बद्दल लिहिणे यात मूलभूत दृष्टिकोनाचाच फरक असायला हवा. तसा तो नसेल तर अपेक्षाभंग नक्की.

हिंदी चित्रपट किंवा समकालीन चित्रपट बहुधा एकसारख्या कथांच्या आधारे मांडणी करतात. तिथे कथा, पटकथा याबाबत फारसे डावे-उजवे करता येत नाहीच. मग तिथे बहुधा अभिनय, तांत्रिक बाजू, चित्रीकरण द. आफ्रिकेत केलं आहे की मॉरिशसमधे, आयटेम साँग कुठले आहे नि कोण डान्सर आहे, फाईट्स थरारक वगैरे आहेत की नाहीत अशा असाहित्यिक, मुद्द्यांवर मूल्यमापन सुरू होते.

बालगंधर्व किंवा तुकाराम (अगदी 'काकस्पर्श' देखील) मुळात स्वत:ची अशी कथा घेऊन येतात, त्यामागे लेखक-दिग्दर्शकाला काही सांगण्याचा हेतू असतो. या दोन चित्रपटांच्या बाबत त्या त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलचे संशोधन असते, एक निश्चित दृष्टिकोन असावा लागतो. उचलले चार प्रसंग नि बांधली जुडी चरित्राची हे चित्रपट धंद्याच्या उगवतीच्या, नावीन्याच्या काळी ठीक होते. आज तेवढ्याने भागत नाही.

इंटरनेटच्या क्रांतीनंतर आज गल्लीतल्या गणा-गणपालाही चित्रपटाबद्दल बरेचसे माहित होऊ लागले आहे, तो ही चित्रपटाची चिकित्सा करू लागला आहे. ती चिकित्सा शवविच्छेदकाच्या भूमिकेतून करायची की शिल्पकाराच्या याचे भान मात्र ज्याचे त्याने ठेवायला हवे. अशा चित्रपटांना संशोधनाचा, काही तुलनेने अधिक गंभीर दृष्टिकोनाचा पाया असतो. तो ध्यानात न घेता केवळ याने काम कसे केले, त्याने काम कसे केले 'बालगंधर्वांच्या काळात बोगनवेल होती का?' हे प्रश्न विचारत राहिले, तर 'यू विल मिस द ब्रॉडर पिक्चर'.

अशा पार्श्वभूमीचा चित्रपट हा मुळात एका सशक्त कथेचे सादरीकरण करू पाहत असतो, ते पुरे चित्र न पाहता एक एक धाग वेगळा करून हा कच्चा आहे, त्याचा रंग फिका आहे, इथे काटकोनाऐवजी ८९ अंशात छेद गेला आहे या बाबी नोंदवत बसण्यात हशील नाही. (पुरे चित्र पाहून झाल्यावर हे ही मुद्देही जरूर अभ्यासावेत) मुळात लेखक-दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे तेच कमकुवत असेल तर या तपशीलाची तशी गरजही नाही. थोडक्यात समकालीन हिंदी चित्रपट नि असे चित्रपट यांचे हेतू भिन्न, दृष्टिकोन भिन्न आणि म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा प्रेक्षकाचा, समीक्षकाचा दृष्टिकोनही भिन्नच असायला हवा.

चित्रपट पाहिलेल्यांकडून काही गंमतीशीर - खरं तर अपेक्षित - प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. पहिली म्हणजे 'जितेंद्र जोशी तुकाराम वाटत नाही'. या प्रश्नाचे मूळ पुन्हा आमच्या मनात ठसलेल्या विष्णुपंत पागनीसांच्या (आणि कदाचित स्वतंत्रपणे जितेंद्र जोशींच्याही) इमेज मधे आहे. खरे तुकाराम कसे दिसत होते, कसे बोलत होते हे आजच्या पिढीतील कुणी पाहिलंय? मग 'वाटणं' जे आहे त्याला प्रभातने दाखवलेल्या तुकारामशिवाय आधार काय? तुकाराम 'वाटावा' यासाठी काय जितेंद्र जोशीने पागनीसांसारखे मऊ मुलायम पातळ स्वरात बोलायला हवे होते? तरीही नक्कल करतोय हा आक्षेपही आलाच असता ना?

मुळात तुकोबाच्या आयुष्यातील जो कालखंड प्रभातच्या ’तुकाराम' ने प्रामुख्याने मांडला तो नि नव्या ’तुकाराम'ने मांडलेला कालखंड वेगळा नाही का? तिथे मध्यमवयातील तुकाराम चित्रपटाचा मोठा भाग व्यापतो तर इथे बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचा. या वेगवेगळ्या कालखंडात दिसणारी व्यक्ती, तिचे व्यक्तिमत्त्व वेगळे असणार नाही का? तरुण वयातील तुकारामानेही वयस्कर तुकारामासारखे वागावे/दिसावे ही अपेक्षा अस्थानी नव्हे काय? तरुणपणचा संसारी तुकोबा हा विरक्तीच्या वाटे चालणार्‍या मध्यमवयीन तुकोबापेक्षा वृत्तीने नि प्रवृत्तीनेही वेगळाच असणार ना.

किंबहुना तुकारामाचा शोध घेताना, त्याच्या मध्यमवयीन आयुष्याची रेघ मागे ओढून त्याचे तारुण्यातील आयुष्याबाबत तर्क करायचा तर लेखक-दिग्दर्शकाला कोणत्याही संशोधनाची गरज नाही की चित्रपट निर्माण करण्याचीही. हा पागनीसांचा तुकाराम नाही किंवा प्रभातचाही(!) हे ध्यानात ठेवूनच चित्रपट पहायला हवा.

दुसरा आक्षेप हा की हा पीरियड मूवी वाटत नाही. पुन्हा 'वाटत नाही' म्हणजे काय हे असे म्हणणार्‍याला नीटसे सांगता येत नाही. पीरियड मूवी वाटत नाही याचे बहुधा कारण रंगीत चित्रपट असणे हे असावे. ते रंग आपल्याला जुन्या काळाची नाळ जोडत नाहीत. त्याऐवजी काळा-पांढरा चित्रपट असता तर बहुतेकांच्या दृष्टिने तो पीरियड मूवी म्हणून चालवून घेता आला असता असता बहुधा.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर या गुगलच्या जमान्यात पीरियड मूवी वगैरे भाषा गल्लीतला गणा-गणपाही बोलत असला तरी त्याचा अर्थ नक्की काय हे बहुतेकांना ठाऊक नसावेसे दिसते. उगाच ’काकस्पर्श’ मधे उमा नंतरच्या काळातील बहिणाबाईचे गाणे कसे गुणगुणते, बालगंधर्वांच्या काळात अमूक प्रकारचे लुगडे अस्तित्त्वात होते का असले प्रश्न विचारणे म्हणजे पीरियड मूवीचे मूल्यमापन असा काहीसा ट्रेंड दिसतो. हे पाहून हसावे की रडावे तेच कळंत नाही.

अरेच्या, प्रभातचे तुकाराम तर विसाव्या शतकात शांताराम आठवल्यांनी लिहिलेले ’आधी बीज एकले’ गातात की, या 'तुकाराम’मधे तुकोबा एकविसाव्या शतकातील दासू वैद्यांची गाणी गातो. कवी समकालीन नसला तरी गाणे चित्रपटाच्या काळाशी सुसंगत असले तर कुठे बिघडले?

बालगंधर्वांच्या काळात अमुक प्रकारचे लुगडे नसेल, पण चित्रपटात बालगंधर्व बोलतात ती भाषा, त्यातील प्रसंग घडतात ती स्थाने ही देखील बिनचूक तेव्हाची असतात काय? यातील अनेक प्रसंग तर स्टुडिओत, सेटवर चित्रित होतात. ते सहज ओळखताही येतात. या पीरियड मूव्हीवाल्या शल्यचिकित्सकांच्या निकषांवर उतरायचे तर एखादे टाईम मशीन पैदा करून बालगंधर्वांच्या काळात जाऊनच चित्रिकरण करावे लागेल.

चित्रपटाबद्दल लिहिणे म्हणजे त्याची शिफारस करणे किंवा सालं काढणे असा काळा-पांढरा व्यवसाय करीत नाही मी. एखाद्या स्त्रीने सुरेख साडी आणली, ती आवडली, म्हणून नि नवरोबाच्या प्रशस्तीने ती चांगली दिसते आहे हे ही पटले, तर त्याच्या हजारभर आडव्या धाग्यांचे विणकाम किती बरोबर आहे, नेमका काटकोन साधला आहे की नाही याचा विचार करूनच चांगल्या वाईटाचा निवाडा करते का?

बरेचदा बाह्य रूपच इतके आवडते की फार खोलात जातही नाही आपण. मग सूक्ष्म रूप चांगले असेल वा वाईट. ते न पाहता 'स्पेक्युलेट' कशाला करायचे. 'पाहिले नाही' म्हणायचे नि जेवढे पदरी पडले ते साजरे करायचे हा माझा दृष्टिकोन. त्यामुळे बालगंधर्व असो वा तुकाराम, सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पीरियड मूव्हीतल्या चुका काढत मी बसलो नाही. 'बालगंधर्व'बाबत काही समीक्षकांनी हिरिरीने मांडल्याही होत्या, ’तुकाराम'बाबतही हे त्यांचे काम त्यांच्यावरच सोपवू आपण नि आपल्यापुरते प्रेक्षकाची भूमिका स्वीकारून चित्रपटाचा आनंद घेता आला तर पाहू.

चित्रपटाबद्दल बोलायचे तर चित्रपटाच्या पटकथेबद्दल आधी बोलायला हवे. मी जेव्हा चित्रपटाविषयी लिहितो तेव्हा सातत्याने आवर्जून मांडलेला मुद्दा असतो तो हा की पटकथालेखक-दिग्दर्शक तुम्हाला काय सांगू पहात आहे, दाखवू पहात आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे. आपला 'तुकाराम' आपण चित्रपटात शोधता कामा नये. तसे असेल तर हा तुकाराम पाहण्यापूर्वीच त्याच्याव 'नापास' चा शिक्का पडेल. कारण तुकोबारायाचे आयुष्य विविध माध्यमातून आपण पाहिले, आपल्या मनात ठसले, ते त्याच्या आयुष्यातील संतपदी पोहोचल्यानंतरचे, त्याचा गावच्या तुक्यापासून तुकोबाराय होण्यापर्यंतचा प्रवास बहुधा माहितीचा नसतो, असलाच तर फारसा महत्त्वाचा नसतो.

चित्रपटातून, कथा-कादंबर्‍यातून आपण तुकोबा पाहिला तो बव्हंशी तुक्याचा तुकोबाराय झाल्यानंतरचा. तुकोबाचे चरित्र म्हणजे बहुधा चार चमत्कारांचे गाठोडे, सोबतीला त्यांचे चार अभंग, तोंडी लावण्यास अद्भुताची जोडी, विनोद अथवा कारुण्य निर्मितीसाठी त्याच्या कर्कशा पत्नीचे आवलीचे पात्र नि अखेर स्वर्गारोहणाची हक्काची कथा.

मुळात तुक्याचा तुकोबा कसा झाला याचा प्रवास बहुधा आपल्या माहितीच्या, अनुभवाच्या कक्षेच्या बाहेरचा. माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक स्वभावपैलूंचा मागोवा त्याच्या बालपणातून घेता येतो, असे आधुनिक मानसशास्त्र मानते. त्यामुळे प्रशांत दळवी-अजित दळवी लिखित नि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ’तुकाराम’ची सुरवात होते ती तुकोबाच्या बालपणाचा वेध घेत. या चित्रपटात रंजनमूल्य अथवा स्मरणरंजनात्मक मूल्य शोधायला गेल्यास फसगत होणार आहे. किंबहुना तशी अपेक्षा असलेल्यांनी हा चित्रपट न पाहिलेला बरा. चित्रपटाचा उद्देश आहे तो तुकारामाचा, त्याच्या जडणघडणीचा शोध घेण्याचा, त्याच्या प्रेरणा उलगडून पाहण्याचा, तुका असतानाच्या त्याच्या पाउलखुणांचा वेध घेण्याचा.

TukobaPlaying

गावच्या मित्रमंडळींबरोबर, लगोर्‍याचा, आबाधुबीचा खेळ खेळणारा तुकोबा; कसल्याशा अनामिक प्रेरणेने विठ्ठलाच्या मूर्तीलाच कवटाळून ब्रह्मानंदी टाळी लागलेला विठोबा,'आपल्या गावच्या विठोबात नि पंढरपूरच्या विठोबात काय फरक आहे' असा प्रश्न अगदी लहानपणीच पडलेला तुकोबा, केवळ मडके घडवून पाहण्याचे कुतूहल शमवण्यासाठी हातीच्या दोन सलकड्यांपैकी एक सहजपणे हातावेगळे करणारा तुकोबा, आपल्या ऋणकोंबाबत बोलताना सावजीदादाच्या 'त्यांचे घर-दागिने आपल्याकडे गहाण पडलेले नाहीत, आपले पोट त्यांच्याकडे गहाण पडले आहे' या स्पष्टोक्तीने अंतर्मुख झालेला तुकोबा, आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल बाळगणारा नि ते शमवण्यासाठी असंख्य प्रश्न विचारून आई-वडिलांना भंडावून सोडणारा तुकोबा. तुकोबाचे हे असे बालपण आपण कधीच अनुभवलेले नसते, चिंतिलेले नसते.

तुक्याची घरची पार्श्वभूमीच मुळी विसंगतीचा वारसा घेऊन आलेली. वडील नित्यनेमाने पंढरीची वारी करणारे नि त्याचवेळी सावकारी करणारे. व्यवहाराच्या वेळी भक्तिमार्गाचा कळवळा अजिबात आड न येऊ देणारे, केवळ नजरेने धान्य तोलणारे नि दुष्काळाची चाहूल घेऊन ऋणवसुली आधीच करून घ्यायला पाहिजे हा भावनाशून्य चाणाक्षपणा असलेले.

या सार्‍या व्यवहाराकडे पाठ फिरवून बसलेला सावजीदादा हा थोरला बंधू. अशा व्यवहारशून्य ज्येष्ठ पुत्रामुळे व्यवहाराची जबाबदारी अगदी लहानपणीच तुकोबाच्या अंगावर आलेली आहे. हे व्यवहारी आयुष्य तुकोबाने लीलया अंगीकृत केलेले.

आयुष्याची व्यावहारिक, कौटुंबिक बाजू सांभाळत असतानाही मूळचा चिकित्सक नि सारासारविवेकाला प्राधान्य देणारा स्वभाव मात्र सोडून गेलेला नाही. गावच्या वेशीतून प्रवेश करताना द्यायच्या करात जातीच्या, व्यवसायाच्या आधारे डावेउजवे होण्याची शक्यता दिसताच, कराचे नियम सार्‍यांना समान असावेत असा आग्रह धरणारा, त्यासाठी कर देण्याचे ठामपणे नाकारणारा तुकोबा ’कठीण वज्रास भेदू ऐसे’ चा पहिला प्रत्यय देतो.

कौटुंबिक पातळीवर मधला असून थोरल्याची जबाबदारी स्वीकारून सार्‍या कुटुंबाचा जणू पोशिंदाच होतो. पाठच्या भावाला मदतीला घेऊन वडिलांचा व्यापार नि संसार दोन्हीची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा. यात तुकोबा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हे दुहेरी आयुष्य जगतो आहे.

TukobaWithWife

माणसाची जडणघडण जशी अंगभूत गुणांमधून कौटुंबिक संस्कारांतून होते, तशीच लाभलेल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थिती नि काळाच्या तुकड्यावर ती अवलंबून असते. तुकारामाच्या आयुष्यात निर्णायक भूमिका बजावली ती पडलेल्या दुष्काळाने. ऐन दुष्काळाच्या तोंडावर वार्धक्याने वडिलांचे नि त्यांच्या पाठोपाठ मातेचे निधन झालेले. थोरला भाऊ तर आधीच नि:स्संग. यातून पोशिंद्याच्या भूमिकेबरोबरच तुकोबाच्या खांद्यावर आलेले कर्तेपणाचे ओझे. यातच ज्याची चाहूल होती तो दुष्काळ येतोच.

दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत कुणी वृद्ध दामाजीपंतांची गोष्ट सांगतो. त्यावर ’आपल्या इथे असा सरकारी अधिकारी वा महाजन, कोणी नाही जो आपले कोठार गरीब गुरिबांसाठी खुले करेल’ असे कुणीसे म्हणतानाच तुकोबा अस्वस्थ होतो.

त्याला जाणवते की इथे ज्याच्या कडे कणग्या भरून धान्य आहे असा आपल्याखेरिज दुसरा आहेच कोण? यात आपणच पुढाकार घ्यायला हवा. ज्यांच्याकडे जे धान्य शिल्लक आहे ते सगळे खुले करावे नि सर्वांनी ते वाटून घ्यावे असा प्रस्ताव तो मांडतो. सूचना आपली त्यामुळे तिचा श्रीगणेशा आपणच करायला हवा या भावनेतून आपले कोठार खुले करतो.

पण धान्यवाटणीच्या वेळी पायली पायलीने वाटून न घेता हपापलेपणे हुल्लडबाजी करून स्वार्थीपणे आपली तुंबडी भरून घेणारे किडके म्हणा, अगतिक म्हणा असे लोक पाहून तो व्यथित होतो. कदाचित यातून त्याला जाणवले असेल की देणार्‍याची दानत पुरेशी नसतेच, घेणार्‍याचे शहाणपणही तेवढेच आवश्यक असते. हे शहाणपण नसले तर इथे रुजवले पाहिजे अशी खूणगाठ त्याने आपल्या मनाशी बांधली असावी. दुष्काळासारख्या तुटवड्याच्या वेळी माणसातलं जनावर जागं झालेलं पाहून, त्यांच्या उत्थानाची सुरुवात त्यांच्या मनातूनच व्हायला हवी हे त्याने मनी जाणले. इथूनच तुक्याचा तुकोबाराय होण्याचा प्रवास सुरू होतो.

याचवेळी कौटुंबिक पातळीवर पडलेली मृत्यूची कृष्णछाया त्याला अधिकच अंतर्मुख बनवते. पहिली पत्नी रखमा, भावजय यांच्या मृत्यूनंतर नि सावजीदादाच्या परागंदा होण्याचे घरात आलेले रितेपण त्याला वेढून राहते. सावजीदादाच्या मनात सारे आयुष्य घर करून राहिलेली विरक्तीची, भक्तिमार्गाची भावना (तुकोबाच्या दुसर्‍या पत्नीच्या भाषेत ’त्या काळ्याचा शाप’) प्रबळ होऊ लागते. आता तुकोबा त्याच्या समोरच्या मालावर डल्ला मारून पळणार्‍या चोराकडे दुर्लक्ष करून पोथी वाचण्यात गर्क झालेला दिसतो. इथे तो तो दहा-बारा वर्षांचा असताना सावजीदादाच्या आत्ममग्नतेने गमावलेले सामान नि ते वाहून नेणारी गाढवे आठवत राहतात.

थोडक्यात आवलीच्या भाषेत त्या घराण्यात असलेल्या ’काळ्याची शापाची’ छाया आता तुकोबाला वेढून घेते. तुकोबा आता सावकारी सोडून देतो, गहाण ठेवलेली शेते, दागिने मूळ मालकाला परत करतो. ज्यांचा यावरही विश्वास बसत नाही त्यांना ’आपले काही देणे लागत नाही’ असे लिहूनही देतो. आता तुक्याचे रुपांतर आपल्याला परिचित असलेल्या तुकोबामधे झालेले असते.

इथून पुढचा भाग बहुतेकांना माहित असलेलाच आहे. परंतु माहिती आणि सादरीकरण, माहिती आणि तपशील यातही काही बाबी, काही फरक नोंदवून ठेवाव्या लागतात.

शिवछत्रपतींची नि तुकोबांची भेट नि राजांनी राज्याच्या सनदा त्यांच्या झोळीत टाकणे वगैरे नाट्यमय भाग इथे येत नाही. राजे हे द्रष्टे नेते होते हे गृहित धरले तर अशा नि:संग संताच्या हाती ते राज्य सोपवतात हे तसे पटणारे नाहीच. भावनिकतेचा अतिरेक म्हणून ही प्रतीकात्मता येते, पण ते वास्तव नव्हे याचे भान लेखकांनी ठेवले आहे.

इथे शिवछत्रपतींच्या नि तुकोबांच्या तोंडी जे संवाद आहे ते दोन्ही ऐतिहासिक व्यक्तींच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असणे ठसवणारे. राजे म्हणतात ’आमच्या थोरल्या महाराजांनीही स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर तुम्हा संतांनी आमच्या प्रजेला जे आत्मभान दिले त्यातून आम्हाला लक्ष्मणासारखे स्वराज्याचे पाईक मिळाले. त्यामुळे हे श्रेय जितके आमचे तितकेच तुमचेही.’ यावर तुकोबा म्हणतात ’तुमच्या आईसाहेबांची इच्छा आमचा सन्मान करण्याची आहे. पण तुमच्या सारख्या राजाने अशा फकीराचे श्रेय मानणे हाच मोठा सन्मान आहे. तुम्ही तुमचे काम करत रहा आम्ही आमचे करत राहू.’ इथे ’सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान’ हे ध्वन्यर्थाने, लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते, शब्दश: नव्हे. हे भान लेखकद्वयाने राखले आहे.

Tokobaray

शेवटचा गाथा बुडवण्याचा प्रसंग चित्रपटाचा कळस मानावा. गाथा बुडली खरी पण ती तरली ती साध्याभोळ्या कष्टकरी विष्णुदासांच्या मनात. तुकोबा नदीकिनारी अन्नत्याग करून बसला ते - कदाचित - गाथा गमावल्याने आयुष्याचे सारे संचित गमावल्याच्या वैफल्याने. त्याचे प्रायोपवेशन हे नदीला घातलेले साकडे नव्हे तर विफलतेतून अंताकडे जाणार्‍या प्रवासाची वाटचाल होती.

पण तुकोबांनी शहाणे करून सोडलेले ’सकळ जन’ तुकोबाला असे कसे जाऊ देतील? हां हां म्हणता तुकोबाचे सहप्रवासी जमा होतात, त्याला सोबत करू लागतात. अचानक एका भक्ताच्या तोंडून एक अभंग प्रकटतो. त्यावरून दुसर्‍याला दुसरा आठवतो. पाहता पाहता ’अवघा रंग एकचि' होऊन सारे विष्णुदास अभंगगायनात तल्लीन होऊन जातात. वैफल्यग्रस्त होऊन बसलेल्या तुकोबाला जाणवते ’अरे आपण ज्याला आयुष्यभराचे संचित समजत होते ते होते चार कागद. अखेर ज्यांच्यासाठी ती गाथा अवतरली त्यांच्या मनात ती तरली आहेच की. आयुष्याचे खरे संचित म्हणायचे ते हे.’

सार्‍या आप्तगणांच्या सहाय्याने तुकोबा पुन्हा माणसात येतो. इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा वैष्णवांचा मेळा अवतरतो. तुकोबा आपल्या वीणेला नि चिपळ्यांना साथीला घेऊन विठ्ठलनामात दंग होऊन जातो, अवघा भावस्वरूप होतो. इथून पुढे त्याच्या जडदेहाचे पतन नक्की कसे झाले हा केवळ तपशीलाचा भाग उरतो.

- oOo -


हे वाचले का?

रविवार, १० जून, २०१२

पराभूत थोरवीच्या शोधात

कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात? एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सांगितले होते, की एका महानायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले 'हे गाणं जर बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता.'

महागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते. जी गत गायकांची तीच गायनप्रेमींची. गाण समजून-उमजून ऐकायला वेळ कोणाला आहे? आम्ही पैसे देतो, तुम्ही गा, आम्ही वा:, जै हो.

अनेक तथाकथित गायनप्रेमी मंडळी केवळ रोटरी किंवा तत्सम संस्थांच्या इव्हेंट मॅनेजमेंटमधून आयोजित केलेल्या कार्यक्रमालाच - तिकिट पाचेकशे पासून तीन हजारपर्यंत फक्त - हजेरी लावतात. आमच्या गरवारेमधे वट्ट पन्नास रुपये तिकिटात अगदी पं. भीमसेनजी, पं जसराज, पं. उल्हास कशाळकरांपर्यंत दिग्गज गाऊन जातात. "पण ते पन्नास रुपयांचे गाणे होऽ. तिथे हे गायक मनापासून गात नैत कै. ते काय शीरीयस गाणं थोडंच आहे?" पैसे अधिक द्यावे लागतात तेच चांगले असते असा उलटा प्रवास आता चालू झाला आहे.

असा उलट प्रवास सार्‍याच क्षेत्रात सुरू झालेला दिसतो. परवाच एका चर्चेत अमीरखान ला 'सत्यमेव जयते' च्या प्रत्येक भागासाठी तीन कोट रुपये मिळतात' ही माहिती पुरवणार्‍याला कुण्या अमीरखान किंवा सत्यमेव जयते’ प्रेमीने उसळून 'इतर कोणी का केली नाही त्याच्यासारखी समाजसेवा, तुम्ही करा मग तुम्हालाही देतील.' असे फटकारले होते. हे ऐकून आम्ही निर्वाणपदास पोहोचलो. बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन (सुटले बिचारे), अभय बंग, राजेंद्रसिंह वगैरे मंडळींना आता चित्रपटात जायला हरकत नसावी.

आजच्या केवळ पैसा एके पैसाच्या नि सांस्कृतिकदृष्ट्या खुरटलेल्या जमान्यात जगणारे आपल्या जाणीवाच खुरटलेल्या आहेत नि त्या विस्तारायला पैसे जमा करण्याच्या कामातून फुरसत नाही हे वास्तव उघड्या डोळ्याने स्वीकारत नाही. स्वतःसाठी विशिष्ट सांस्कृतिक, वैचारिक पातळी हवी यासाठी त्या पातळीलाच खेचून खाली आणण्याचे धंदे सुरू झाले आहेत. थोडक्यात हिमालयाची व्याख्या बदलून पैशाला पासरी असलेल्या टेकड्यांना हिमालय म्हणून सर्टिफाय करायचे नि ती पादाक्रांत करून आपण तेनसिंग नोर्गे किंवा एडमंड हिलरी असल्याचा समज करून घ्यायचा असे काहीसे घडते आहे. जगातील प्रत्येक गोष्ट 'मोनटाईज' करता येते, विकत घेता येते असा ठाम समज असलेली संस्कृती आज रुजते आहे. आपणही आर्थिक सुबत्ता हे एकमेव उद्दिष्ट ठेवून उरलेल्या सार्‍या घटकांची अवनती नजरेआड करतो आहोत.

या सार्‍या गदारोळात अस्सलता अशी कुठे नाहीच का? असे नसावे बहुधा. अमीरखान आपला थोर समाजसेवक असतो त्या जमान्यातही बाबा आमटेंची तिसरी पिढी त्यांचे कार्य करीत असतेच. नवे समाजसेवक पुढे येतच असतात. पण व्यवस्थेशी त्यांचा अपरिहार्यपणे संघर्ष होतो. आपल्याला भरपूर पैसे देणारी व्यवस्था, तिचे समर्थन आपण करायलाच हवे या भूमिकेतून मग हे समाजसेवक प्रथम 'समाजवादी', मग 'कम्युनिस्ट' नि अखेर 'प्रगतीविरोधी' ठरवून बाहेर फेकले जातात.

मग त्यांची जागा भरून काढायला रंगमंचावर अमीरखान अवतीर्ण होतो. त्याच्या त्या एपिसोडस् वर चर्चा करून लोकांना आपल्यालाही सामाजिक भान आहे बरं का असे पटवून घ्यायला नि 'अहो रूपम् अहो ध्वनिम्' न्यायाने इतरांना पटवून द्यायला सोपे जाते. ते एकदा झाले की मनातला अपराधगंड बराचसा कमी होतो नि आपण मॅक्डीमधे नवा कुठला बर्गर आलाय ते तपासायला जाऊ शकतो. लौकिकार्थाने पराभूत झालेले ते समाजसेवक, आपापल्या कलेशी बांधिलकी जपणारे कलाकार, विचारवंत, अडगळीत बसून का होईन आपले स्वीकृत कार्य निष्ठेने करत असतातच. गरज असते ती त्यांचा शोध घेण्याची. पण यांना सेलेब्रिटी मूल्य नसते आणि तसेही ज्या दिव्याच्या प्रकाशात आपले सांस्कृतिक, वैचारिक दारिद्र्य उघडे पडते तो दिवा आपणहून कोण घरात आणेल, नाही का?

ज्येष्ठ राजकीय नाटककार गो.पु. देशपांडे याच्या 'उद्ध्वस्त धर्मशाळा' या नाटकाला त्यांनी लिहिलेली (१९७४ मध्ये!) प्रस्तावना अतिशय उद्बोधक ठरावी. यातील काही भाग संकलित -नाटकांचे, तत्त्वज्ञानाचे संदर्भ वेगळे करून - करून इथे ठेवतो आहे.


('उद्ध्वस्त धर्मशाळा' - ले. गो. पु. देशपांडे, प्रस्तावनेतून)

Uddhvasta Dharmashaalaa

आपल्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक नेतृत्वाचा विचार करू जाता एक गोष्ट ठळकपणे जाणवते. या सगळ्या क्षेत्रात नेतृत्व फार लहान माणसांकडे आहे. त्यात पर्वतप्राय महत्तेचा माणूस कुणी दिसत नाही. आहेत त्या लहानलहान टेकड्या. त्यात पुन्हा घोटाळा असा आहे की, ह्या टेकड्यांनाही आपण हिमालय असल्याची स्वप्ने पडताना दिसतात. जुन्या काळातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड पद्धतीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर खेळणार्‍या धुरंधरांना आपण स्वतः लोकमान्य आहोत असे वाटत असावे! पाचपन्नास गीते लिहिणार्‍यांना स्वतःला महाकवी म्हणून घेणे आवडते. चारसहा शब्द जुळवणार्‍यांना ज्ञानदेवांसारखे आपले कवित्व आहे असे वाटते. दोन संवाद लिहिणार्‍यांना आपण शेक्सपीयर किंवा बेकेट (रुचिप्रमाणे) आहोत असा सुखद भास होत असावा. एखाददुसर्‍या जिल्ह्यात थोडी संघटना बांधणार्‍यांना ह्या साठ कोटींच्या देशात आपण क्रांती घडवून आणित आहोत अशी स्वप्ने पडू लागतात. चार गावात चळवळ चालवणारांना या देशाचा जगन्नाथाचा रथ आपल्यामुळे पुढे चालला आहे असा भ्रम आहे. पंधराशे ओळींचा राजकीय लेख लिहिणारांना आपण प्रबोधनाचे उद्गाते आहोत - शक्य तर अखिल भारतीय - असा भास होतो आहे. सारांश, मोठेपणाच्या टेकड्या जागोजागी उभ्या राहिलेल्या आहेत....

त्याचा परिणाम म्हणजे विचाराचे दारिद्र्य. घोषणा नि धोपटशब्द (क्लिशे) ह्यात मराठी इतकी अडकून कधी पडली नव्हती. शब्द जड गोळे झाले आहेत. निव्वळ अर्थशून्य पाषाण. ते फक्त मोठ्यांच्या तोंडातून परिचित लयीत, परिचित लकबीत बाहेर पडत आहेत. असे वाटते की टाळ्यासुद्धा सवयीनेच परिचित लयीत, परिचित लकबीत वाजवल्या जात आहेत. आपमतलबी तत्त्वज्ञ हौतात्म्याचे पवाडे गात आहेत. स्वतःची तितकीच फसवणूक करून घेणारा एखादा कवि 'छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही' असे म्हणत न लाभलेल्या आनंदाचे उत्सव मांडित आहे.

अर्थात मोठेपण नाहीच असा याचा अर्थ नव्हे. परंतु ते बरेचसे (काही अपवाद वगळता) पराभूत मोठेपण आहे. कुठे चमक दिसलीच, कुठे खिळवून टाकणारा विचार दिसला, कुठे दूरवर कोपर्‍यात मुळे रुजलेली चळवळ दिसलीच तर ती बहुधा या पराभूतांमुळे आहे. ही मंडळी नवीन भविष्य निर्मू शकत नाहीत. परंतु आज ना उद्या नवीन भविष्य येईल एवढा आशावाद ही मंडळी जागा ठेवून आहेत. आजच्या यशस्वी लेखकांपेक्षा, राजकारणधुरंधरांपेक्षा, सामजिक प्रबोधनाच्या मिरासदारांपेक्षा बरेच मोठे ह्या मंडळींनी अनुभवलेले आहे. पराभूत असूनही, दुर्लक्षित असूनही.

या पराभूतांच्या जयजयकार करण्याचा माझा मनसुबा नाही. शेवटी पराभव हा पराभवच असतो. त्या पराभवाला अगदी तर्कसंगत स्पष्ट कारणे असतात. पराभवांपाठी-मागे व्यक्तींची व त्या व्यक्ती ज्या सामाजिक शक्तींचे प्रातिनिधित्व करतात त्या शक्तींची कमजोरी असतेच. ती कमजोरी नाकारून जयजयकार करणे ही पुन्हा फसवणूकच. कारण अगदी साधे आहे. कमजोरांचे जयजयकार होत नसतात, होऊ नयेत. त्याने फक्त हळवेपणा येतो, दुसरे काही नाही! फक्त या प्रासादशिखरस्थ कावळ्यांच्या गर्दीत काही गरूड होते-आहेत ह्याचे भान ठेवावे.

हॅना आरंट यांनी 'मेन इन डार्क टाईम्स' या पुस्तकात अशी कल्पना मांडली आहे की 'सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात (असे वैचारिक ) झाकोळ मधून मधून येत असतात. या झाकोळाचे एक वैशिष्ट्य असे की नेत्र दिपवून टाकणारे मोठेपण कुठेच दिसत नाही. किंबहुना मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याचवेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणसे ठळकपणे दिसू लागतात. त्यांचे दुर्दैव असे असते मी जरा थांबून पहात रहावे असे त्यांचे मोठेपण असते खरे, परंतु यशाच्या कल्पना बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात नसते. अवतीभवतीच्या कावळ्यांच्या गर्दीत हे उदास गरुड जबरा मोह घालतात ह्या शंका नाही.

ह्या झाकोळातली ही माणसे सारखी कुठल्या ना कुठल्या तरी कक्षेच्या शोधात असतात. बरेच वेळा अखेरपर्यंत त्यांना कक्षाच सापडत नाही. मौज अशी की त्यांना कक्षा सापडत नाही हे खरे पाहता त्यांच्या समाजाचेच अपयश असते. 'मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो. त्या जमान्यात तीव्र संवेदनशीलता आणि द्रष्टेपणा यांचा बहुधा पराभव होत असतो. हे मी त्या पराभूतांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणत नाही. ते होणे कदाचित अटळच असते. फक्त ह्या गरुडांच्या प्रकाशात बाकीच्या मिडिऑक्रिटिज् स्वच्छ नि स्पष्ट दिसायला लागतात हे महत्त्वाचे. 'खाली झेपावणे' हा दृष्टान्त ही मंडळी त्यांच्या आयुष्यात काही थोर परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत हे समजावून देण्यापुरता उपयुक्त आहे. तथापि ज्या टकड्या हिमालयाचा दिमाख मिरवित असतात त्या टेकड्यांच्या तुलनेने हे 'खाली झेपावणे' तरीही आकाशगंगेच्या काठावरच असते. नंतर आलेल्या यशस्वी द्रष्ट्यांनी ह्या मधल्या पराभूतांची योग्य ती कदर करायची असते.

दरम्यान आपल्या हाती फक्त शोध घेण्याचे काम उरते. तूर्त अवतीभवतीच्या थोरांमधे जनमान्य अशा टेकड्या कोणत्या आणि द्रष्टेपणाचा परिसस्पर्श झालेले पराभूत आत्मे कोणते हा शोध, हा प्रश्न महत्वाचा आहे, तो पुनः पुन्हा विचारला गेला पाहिजे.

- oOo -


हे वाचले का?