गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

आभासी विश्व आणि हिंसा

ज्याने कुणी इंटरनेटला Virtual World (याचा 'आभासी विश्व' असा अतिशय वाईट अनुवाद केला जातो) असा शब्द प्रथम वापरला त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस उगवलेल्या 'वर्ल्ड वाईड वेब' या संकल्पनेतून केवळ एकाच भूभागावरचे नव्हे तर जगभरात पसरलेले संगणक परस्परांना जोडण्याची सोय झाली. त्यातून कल्पनांचा विस्फोट झाला आणि माणसाचे जग त्याने उलटे पालटे करून टाकले.

या इंटरनेटने एका बाजूने माणसाला आजवर कधीही सापडले नव्हते असे प्रचंड व्याप्ती असलेले 'माध्यम' दिले तर दुसरीकडे थेट एक मानवनिर्मित, कृत्रिम असे 'विश्व'च निर्माण केले. आज माणसाच्या जगातील माहितीशी निगडित बहुसंख्य जबाबदार्‍या हे माध्यम जग लीलया पेलून धरते आहे, तर हे नवे विश्व माणसाच्या अद्याप विकसितही न झालेल्या पैलूंना नवी क्षितीजे प्रदान करते आहे.

या नव्या माध्यमाने अनेक नव्या शक्यतांचे एक दालन उघडून दिले आहे. एकाच वेळी दोनही व्यक्तींना दोन टोकाला उपस्थित असण्याचे टेलिफोनचे बंधन मोडीत काढत 'ईमेल'ने asynchronous किंवा भिन्न स्थलकालातील व्यक्तींना संवादाचे माध्यम उपलब्ध करून दिले; लिखित संवादाचे माध्यम असलेल्या पत्रव्यवहारातील माध्यमाने - पत्रानेच - प्रवास बंधन नाहीसे करत 'चॅट'ने संगणकाच्या माध्यमातून संवादाची थेट नि synchronous सोय करून दिली. 'डेटाबेस'च्या संकल्पनेने प्रचंड माहिती साठवून ठेवण्याची आणि त्याच्या सहजपणे प्रती करण्याची झालेली सोय इंटरनेटच्या माध्यमातून जुनी क्षितीजे सहज पार करून गेली. बँकेचे व्यवहार, खरेदी-विक्री, बातम्या व माहिती, ज्ञान, पुस्तके, संगीत, चित्रपट, अन्य दृक्-श्राव्य कला यांना इंटरनेटने आपल्या कवेत घेतले... पाहता पाहता आपल्या गरजांपासून करमणुकीपर्यंत सारे काही आता इंटरनेटच्या ताब्यात गेले. ही प्रगती माणसाच्या उत्क्रांतीइतकीच उत्कंठावर्धक, पण त्याहून कैकपट वेगाने घडलेली. १९८९ मधे प्रथम इंटरनेटची संकल्पना मांडली गेली आणि आज जेमतेम पंचवीस वर्षातच हे माणसाच्या जगण्याचा अविभाज्य होऊन बसले आहे.

एका बाजूने माध्यम म्हणून असे विकसित होत असतानाच इंटरनेटवर एक नवे विश्व आकाराला येऊ लागले होते. वास्तवातील एखाद्या व्यक्तीची या नव्या जगातील 'ईमेल' ही पहिली ओळख किंवा प्रतिनिधी. आभासी विश्वातले ते अस्तित्वच. त्या जगातला संवाद होणार तो एका ईमेल अड्रेसचा दुसर्‍या ईमेल अड्रेसशी, माणसाचा माणसाशी नव्हे. कारण त्या जगात माणसे नाहीतच. स्वतःचे दोन किंवा त्याहून अधिक ईमेल अड्रेस निर्माण करणे किंवा एकच ईमेल अड्रेस एकाहुन अधिक व्यक्तींनी वापरणेही शक्य आहे. त्यामुळे या नव्या जगातील 'व्यक्तीं'चा वास्तव जगातील व्यक्तींशी एकास एक संबंध नाही.

पण हा चेहराविहीन संवाद, देहबोलीच्या अभावामुळे परिणामकारक होईना. शिवाय दोन व्यक्ती - किंवा खरंतर ईमेल अड्रेसेस - आपले म्हणणे, मुद्दे वेगवेगळ्या वेळेला मांडत असल्याने यात कालापव्ययदेखील होतो. त्यामुळे जरी व्यावसायिक पातळीवरच्या देवाणघेवाणीसाठी ते उपयुक्त ठरले तरी भावनिक संवादांसाठी ते पुरेसे ठरेना. मग 'चॅट'चा पर्याय देऊन इंटरनेटच्या जगात एकाच वेळी दोन बाजूने संवाद साधण्याची सोय केली गेली. यथावकाश वीडिओ चॅटचा पर्याय उपलब्ध होऊन देहबोलीसह संवादाची शक्यता वास्तवात आली. हजारो किमी दूरवर असलेल्या दोन व्यक्ती आता जणू समोरासमोर बसून बोलत असल्याइतक्या सहज संवाद साधू लागल्या.

पण असे असले तरी माणूस म्हणजे काही फक्त संवादाचे अस्तित्व नव्हे. अन्य प्राणिमात्रांपासून माणूस वेगळा आहे तो त्याने विकसित केलेल्या निर्मिती कौशल्यामुळे. मग या नव्या जगात माणसांना निर्मितीची आस लागली. विविध गेम्सच्या स्वरूपात संगणकावर तो आपली हौस भागवून घेत होता ती त्याने इंटरनेटच्या माध्यमातही आणली. 'फार्मविल' सारखे खेळ तुम्हाला आभासी जगात शेतीसारखे 'खेळ' देऊ लागले. 'रायजिंग सिटीज्' सारखा खेळ तुम्हाला तुमची शहरे निर्माण करण्याची संधी देऊ लागली. या खेळांची साधने, त्यावर परिणाम करणारे घटक, वास्तव जगासारखाच 'व्यक्तीं'मधे तिथेही होणारा वस्तू आणि चलनाचा विनिमय इ. गोष्टी हळूहळू विकसित होत जणू विश्वामित्राची प्रतिसृष्टीच तिथे निर्माण झाली.

'अवतार' चित्रपटातील पांगळा जेक वेगळ्या सृष्टीत नवे नाव, नवे शरीर, नवे अस्तित्व घेऊन उभा राहतो. तथाकथित वास्तव जगात व्हीलचेअरच्या सहाय्याने खुरडत जगणारा तो 'पँडोरा'च्या विश्वात थेट आकाशभ्रमण करतो. त्याच धर्तीवर फेसबुक, ट्विटर वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपल्याला हवी तशी ओळख निर्माण करणे शक्य झाले आहे.

"अचानक ही दोन विश्वे वेगळी झाली, संगणकांचे जाळे 'स्वतंत्र' झाले आणि त्यांनी माणसांशी संबंध तोडून टाकले तर..." ही विज्ञानकथांमधे मधे येणारी कल्पना जर वास्तवात उतरली तर आपले वास्तव जग चक्क गतिरूद्ध होऊन बसेल. इतके आपले तथाकथित वास्तव आता या आभासी जगावर अवलंबून आहे.

संगणक माणसाविरुद्ध बंड करतील ही जरी कविकल्पना असली, तरी माणसे माणसाविरुद्ध बंड करत आलेली आहेत. त्यासाठी त्यांनी सतत नवनवी हत्यारे, युद्धासाठी नवनवी भूमी शोधली आहे. फसवणूक, चोरी, हल्ला, हत्या, लढाया, युद्ध या वास्तव जगातल्या गुन्ह्यांना आभासी जगाचे नवे परिमाण दिले आहे. अर्थात माणसे थेट इथवर पोचलेली नाहीत. ईमेल पासून सुरू झालेला प्रवास सोशल माध्यमांतून व्यक्तिमत्त्व तयार करण्यापर्यंत वास्तवाची नक्कल करण्यापर्यंत पोचला आहे, तसाच आभासी जगातल्या माणसांच्या संघर्षाचा इतिहासही टप्प्याटप्प्यानेच पुढे सरकला आहे.

माणसाने अंतराळात झेप घेतली आणि ज्ञानाचे नवे क्षितीज माणसाने पादाक्रांत केले. पण याच प्रगतीच्या ठेकेदारांनाच ताबडतोब त्या ज्ञानाचा विध्वंसासाठी, इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी उपयोग करता येईल याचा शोध लागला आणि 'स्टार वॉर्स' या कल्पनेचा जन्म झाला. (आपल्या सुदैवाने काही काळाने शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि त्यावर होणार्‍या खर्चाच्या अव्यवहार्यतेमुळे ही नृशंस कल्पना प्रत्यक्षात उतरू शकली नाही.) इंटरनेटच्या जगातही हिंसा नवनव्या रूपात सामोरी येताना दिसते.

व्हायरस हा प्रकार संगणकाचे, नेटवर्कचे नुकसान करणारा पहिला धोका. सुरुवातीच्या काळातील असे व्हायरस हे फक्त वैयक्तिक संगणकांत साठवलेली माहिती पुसून टाकणे, त्याचे काम करण्याचे तंत्र बिघडवणे असे केवळ खोडसाळ म्हणता येतील अशी कामे करत. परंतु इंटरनेटच्या शोधानंतर त्या संगणकांवरची माहिती चोरून नेण्याचे तंत्र विकसित केले गेले. इंटरनेटच्या माध्यमातून त्यावरची माहिती आपल्या संगणकाकडे वळवणे शक्य झाले होते. यातून त्या व्यक्तीच्या संगणकाबद्दलची माहिती चोरून नेणे शक्य होऊ लागले.

ते जग आभासी म्हटले तरी त्याची आपल्या वास्तवाशीही सांगड घातली गेली आहे. तेथील पडझड या वास्तव जगातही परिणाम घडवून आणते. ईमेलच्या माध्यमातून दुसरेच कुणी - बँक अथवा गुंतवणूक सल्लागाराचे अधिकृत प्रतिनिधी- असल्याचे भासवून माहिती चोरून त्याआधारे लुटले जाऊ लागले. आता निव्वळ संगणकाबाबत नव्हे तर त्या संगणकाच्या मालकाची वैयक्तिक माहितीदेखील चलाखीने चोरली जाऊ लागली, इतकेच नव्हे तर तिचा वापर करून प्रत्यक्ष आर्थिक नुकसान करणे शक्य झाले. पण अजूनही अशा प्रकारच्या कामात आपल्या हल्ल्याचा बळी जाणारी व्यक्ती कुठली हे हल्ला करणार्‍याला आधीच ठाऊक नसते. काहीसे मासे पकडणार्‍या जाळ्यासारखे काम ते करत असतात. जाळ्यात सापडेल तो मासा आपला! आणि म्हणूनच या प्रकाराला 'फिशिंग' म्हटले जाऊ लागले. चॅटचे माध्यम लहान मुलांना फसवून आपल्या विकृत लैंगिक खेळात ओढण्यासाठी वापरले जाते. स्त्रियांना, पुरुषांना पोर्नोग्रफीसारख्या व्यवसायात ओढले जाऊ लागले.

व्हायरस तयार करणार्‍याला थेट असा कोणताही फायदा होत नसे. पण आता अशा 'फिशिंग'च्या माध्यमातून आर्थिक फायदाही करून घेता येऊ लागला. यात आभासी जगातील, त्या पातळीवर हिंसा असली तरी दुश्मनी, वैयक्तिक हेवेदावे वा वैर नाही किंवा विशिष्ट व्यक्तीला वा समुदायाला लक्ष्य करणारा एखादा पूर्वनियोजित हेतूही नाही. या 'फिशिंग' प्रकारच्या हल्ल्यात हेतू निव्वळ स्वार्थी आहे, तो साधण्यासाठी इतर कुणाचे(ही) नुकसान झाले तरी त्याबद्दल तो हल्लेखोर बेफिकीर असतो इतकेच.

InternetViolence

सोशल मीडियाचे अवाढव्य माध्यम तर अनेक शक्यतांचे आगरच. हे जग आभासी असल्याचा फायदा उठवून वास्तवातील कुणी व्यक्ती असल्याची बतावणी करत स्वार्थ साधणे अथवा त्याच्या/तिच्या स्वार्थाला धक्का पोहोचवणे हे तर नित्याचेच. पण केवळ वैयक्तिक लाभालाभापलिकडे विशिष्ट अजेंडा घेऊन तो विविध प्रकारे राबवलाही जातो. आपल्याहून वेगळे मत असलेल्या, किंवा ज्याचे अस्तित्व आपल्याला खुपते अशा व्यक्ती, विचार वा गटावर हल्ले करणे, किंवा सरळ सरळ दोन विरुद्ध राजकीय पक्षांचे समर्थक विविध परस्परांशी भिडणे अशा प्रकारांतून झुंडशाहीदेखील इथे अवतरली आहे.

इंटरनेटच्या 'आदिम काळात' जसे एकच व्यक्ती अनेक ईमेल अड्रेसचा वापर करू शके तसे आता सोशल मीडियातून एकच व्यक्ती अनेक 'प्रोफाईल' उभे करू शकते. यातून आभासी जगातल्या युद्धासाठी मोठे सैन्य अनायासे उभे करता येते. त्यामुळे एखाद दोन व्यक्तीदेखील जनमताच्या पाठिंब्याचा वा विरोधाचा आभास निर्माण करू शकतात, त्यायोगे पाठिंबा वा विरोध या दोन्ही कळपात नसलेल्या कुंपणावरच्या व्यक्तींना या 'तथाकथित बहुमता'कडे झुकवण्यासाठी बुद्धिभेद करू शकतात.

नुकतेच डी पी मंडल या पुरोगामी लेखकाचे फेसबुक अकाउंट त्यांची मते न पटणार्‍या व्यक्तींच्या आभासी झुंडीने घातक किंवा आक्षेपार्ह म्हणून रिपोर्ट करून ब्लॉक करण्यास भाग पाडले. तांत्रिकदृष्ट्या हा कायदेशीर मार्ग होता पण अशीच मुस्कटदाबी प्रसिद्ध पत्रकार रविश कुमार यांच्याबाबत करताना सरळसरळ 'हॅकिंग' (संगणकीय घुसखोरी) हा बेकायदेशीर मार्ग अवलंबण्यात आला. या मार्गाने घुसखोरांनी त्यांना न पटणारी मते मांडणारा रविश यांचा 'कस्बा' हा ब्लॉग बंद पाडला.

वेबसाईट्स, ब्लॉग्स, सर्वर्स यावर हल्ले करून ते बंद पाडणे, संवेदनशील माहिती चोरणे ('पेंटगॉन'च्या सर्वरमधे झालेली घुसखोरी, 'गुगल'ची अकाउंट हॅक होणे, विकीलीक्स), परदेशाच्या वा व्यावसायिक शत्रूच्या वेबसाईट ऐन मोक्याच्या क्षणी बंद पाडणे अशा अनेक मार्गांनी आभासी जगातील हिंसेची वाटचाल होताना दिसते आहे.

८ जुलै २०१५ रोजी एकाच दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज, वॉल स्ट्रीट जर्नल या त्यांच्या भांडवलशाही व्यवस्थेचे आधारस्तंभ मानल्या गेलेल्या व्यवस्थांच्या आणि युनायटेड एअरलाईन्स या जगातील सर्वाधिक ठिकाणी सेवा पुरवणार्‍या विमानसेवेच्या नेटवर्कमधे एकाच वेळी 'बिघाड' निर्माण झाला. या बिघाडामुळे स्टॉक एक्स्चेंज'चे काम तब्बल चार तास थांबवावे लागले होते. अधिकृत पातळीवर जरी हे सारे 'तांत्रिक बिघाड' असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी या तिघांचे अर्थव्यवस्थेतले स्थान पाहता हा नियोजनपूर्वक नि जाणीवपूर्वक केलेला बिघाड होता याबाबत सायबर विश्वातील आणि जागतिक अर्थतज्ज्ञांना शंकाच नाही.

या पलिकडे जाऊन आता या युद्धांना दोन देशातील युद्धांचे स्वरूपही हळूहळू येऊ लागले आहे. अजून अधिकृतरित्या समोर आलेले नसले तरी युद्धासाठी उभ्या केलेल्या सैन्याप्रमाणेच शत्रूच्या नेटवर्कमधे घुसून संवेदनशील माहिती चोरणे (वास्तवातील हेरगिरीच्या धर्तीवर), त्याचे काम बंद पाडणे वा त्यात बाधा निर्माण करणे यासाठी 'सायबर आर्मीज' काम करत आहेत.

मागच्या वर्षी जून महिन्यात 'सोनी पिक्चर्स एन्टरटेनमेंट'ने आपल्या 'The Interview' या नव्या चित्रपटाचे ऑफिशल ट्रेलर रिलीज केले. उ. कोरियाच्या अध्यक्षांच्या हत्येवर आधारित चित्रपट असल्याने आणि एकच गदारोळ उसळला. उ. कोरियाचे लष्करी शासन खवळले. केवळ निषेधाने काही होत नाही, चित्रपटावर बंदी घालण्याच्या आपल्या मागणीला अमेरिकन सरकार भीक घालत नाही म्हटल्यावर अनधिकृत पातळीवर त्यांचे सायबर सैनिक कामाला लागले. चित्रपटाचे निर्माते नि वितरक असलेल्या सोनी एंटरटेनमेंट्च्या सर्वरमधे नि वेबसाईट्सवर घुसून त्यांनी त्यांचे बरेच नुकसान केले आणि धोक्याचे इशारे देणारे संदेश त्यांच्या वेबसाईटवर नोंदवून ठेवले.

वास्तव जगात सावधपणे व्यक्त होणारी व्यक्ती इथे - विशेषतः सोशल मीडियामधून - अतिशय आक्रमकपणे व्यक्त होताना दिसते. समोरासमोर झालेल्या वादांत आपल्या शारीरिक, मानसिक दुबळेपणाने बोटचेपी भूमिका घेणारी व्यक्ती इथे प्रतिकार केवळ शाब्दिकच असल्याने त्याची फारशी फिकीर न करता मनातील सारी हिंसा बिनधोकपणे ओतताना दिसते. या बिनधोकपणाला अनेक कारणे आहेत.

एक म्हणजे सायबरविश्वातील गुन्ह्याबाबत कायदे कदाचित अजून पुरेसे विकसित झालेले नाहीत, दुसरे म्हणजे असलेच तरी त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेली पुरेशी व्यापक आणि सजग यंत्रणा नाही, जी आहे त्यातील व्यक्तींमधे त्या कायद्यांविषयी पुरेशी जागरुकता नाही किंवा संभ्रम आहेत, तिसरे म्हणजे गुन्हेगार आणि ज्याच्या संदर्भात गुन्हा घडला ते जगभरात कुठेही असू शकत असल्याने कायद्याच्या अधिकारक्षेत्राबाबत असलेला गोंधळ गुन्हेगाराला कायद्याच्या कचाट्यात आणण्याची शक्यता खूपच धूसर करत जातो.

जशी वास्तव जगात महायुद्धे दूर गेली आहेत असे म्हणतात तसेच इथे असे सर्वंकष युद्ध होण्याची शक्यता कमी आहे. पण उलट 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' आहे. कारण संवेदनशील, महत्त्वाची माहिती असलेले संगणक अहोरात्र चालू असतात, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचणे शक्य असते. जगाच्या दुसर्‍या टोकाला बसलेला कुणी हॅकर केव्हाही त्यावर हल्ला करून नुकसान घडवू शकतो. यासाठी त्यांच्या सुरक्षिततेची यंत्रणाही सतत जागरूक आणि अद्ययावत असावी लागते. हे एकप्रकारे निरंतर चालणारे युद्धच आहे. इथे युद्ध असते ते केवळ बुद्धीचे, हानी होते तीही शारीरिक नव्हे तर माहिती स्वरूपात आणि त्याचा परिणाम म्हणून आर्थिक वा सुरक्षिततेच्या प्रश्नांच्या स्वरूपात.

या जगात सानथोर सार्‍यांनाच आपापली युद्धे लढवता येतात, आपले प्रतिस्पर्धी निवडता येतात, आपले युद्धमैदान निश्चित करता येते. यातून माणसाच्या मनातील हिंसेचा निचरा होतो की तिचा सराव होतो हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे.

माणूस कल्याणासाठी लावलेल्या शोधांतही विध्वंसाची बीजे शोधत असतो, जिज्ञासेतून झालेल्या ज्ञानाचा वापर ज्ञानाच्या दुसर्‍या शाखेला उध्वस्त करण्यासाठी करत असतो. हिंसेची ही प्रेरणा 'प्रगत' म्हणवणार्‍या माणसांत अप्रगत जनावरांपेक्षाही अधिक तीव्र झालेली दिसून येते. कदाचित याचे कारण माणसाकडे अन्न, मादी आणि अधिकारक्षेत्र या संघर्षाच्या तीन मूलभूत मुद्द्यांपलिकडेही गमावण्याजोगे बरेच काही निर्माण झाले आहे. निर्मितीच्या नव्या शक्यतांबरोबरच विध्वंसाच्या नव्या शक्यताही जन्म घेत असतात. किंबहुना निर्मितीचे हत्यारच अनेकदा विध्वंसाचे हत्यारही होऊन बसते; डोंगर फोडून माणसासाठी नवा रस्ता बनवण्यासाठी निर्माण केलेले सुरुंग माणसांच्या निर्मितीला आणि खुद्द माणसांनाही नष्ट करण्यास वापरले जातात तसे.

- oOo -

(पूर्वप्रकाशित: 'पुरोगामी जनगर्जना' दिवाळी २०१५)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा