गुरुवार, १७ मार्च, २०१६

ते म्हणाले...

YouMustObey
ते म्हणाले,
तुम्ही 'भारतमाता की जय' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
'जय जगत्', कुणी म्हणाले, 'आम्ही म्हणणार नाही.'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
'शिवाजी महाराज की जय' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
'केम?', कुणी म्हटले 'आम्ही म्हणणार नाही'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
गोल टोपीवाले म्हणाले, 'आम्ही म्हणणार नाही.'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही तिरंगा उंच फडकवलाच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
तळमजल्यावरचे म्हणाले 'आम्हाला शक्य नाही.'
तळमजल्यावरच्यांना त्यांनी 'निलंबित' केले.

ते म्हणाले,
'जय श्रीराम, जय रामराज्य' म्हटलेच पाहिजे
थोडे कुणी बरेच काही खुश झाले
वैतागले कुणी म्हटले, 'ज्जा. म्हणणार नाही.
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'जय महिषासुर' म्हणताच कामा नये
थोडे कुणी थोडे काही खुश झाले,
एक म्हणाला 'गर्वाने म्हणणार आहे.'
तसे म्हणणार्‍याला त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणताच कामा नये
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
असे कुणी, तसे कुणी म्हणून मोकळे झाले
त्यातल्या फक्त 'परक्यां'नाच त्यांनी निलंबित केले.

दरम्यान दोन तहानबळी, काही भूकबळी पडले
उन्हाळ्याच्या सुटीसाठी ते उटी, स्वित्झर्लंडला गेले
हे म्हणा, ते म्हणू नका करता करता अधिवेशन सरले
तीन महिने गेले, पुन्हा नवे अधिवेशन आले.

ते म्हणाले,
आता कसे सगळे रान साफ झाले, करू हवे तसे
काय करू नि कसे करू तेवढेच नव्हते समजले
अरेच्या, आता झाली पंचाईत, काम करणे आले
काय करावे, कसे करावे इथेच गाडे अडले.

बराच खल केला, 'श्रेष्ठीं'चा सल्लाही मागितला
आत बाहेर, संस्थांमधून बरेच चिंतन मंथन झाले
त्या मंथनातून अखेर अमृतमय उपाय काढले
नवे अधिवेशन आले, सारे सज्ज झाले

एका फटक्यात त्यांनी सारी निलंबने रद्द केली आणि
'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे'ची पुन्हा घोषणा केली
सारे पुन्हा सुरू झाले, जुनेच सारे पुन्हा नवे झाले
दरम्यान चार भूकबळी, तहानबळी, कर्जबळी पडले

देशात राष्ट्रप्रेमाचे अमाप पीक काढले
पोटभर खाऊन माणसे, ढोरे तृप्त झाले
एकाच उपायाने देश आबादीआबाद झाला
वेदातील विमाने उडवून अंतराळी पोचला

ओबामा दाती तृण धरून शरण आला
शरीफ तर दारचा दरवान झाला.
दुष्ट चीनचा पाऽर सफाया झाला
पायघड्या घालत पुतीन स्वागताला आला.

राष्ट्राचा डंका सार्‍या विश्वात वाजू लागला
दशलक्षी कोटावर तिरंगा झळकू लागला
पण' देश म्हणजे 'माणूस की भूमी?' हा
अवघड प्रश्न मात्र कायमचा अडगळीत पडला
 
- oOo - 
	

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा