गुरुवार, २६ मे, २०१६

वादे वादे जायते वादंग:

(एका - बहुधा तथाकथित सवर्ण वर्गात मोडणार्‍या - फेसबुकमित्राने एका पोस्टमध्ये असा मुद्दा मांडला होता, की 'सवर्ण असलेल्या माणसांना आपण आंबेडकरांचे विचार मानतो किंवा घटनेला प्रमाण मानतो किंवा आंबेडकरवादी आहोत हे पटवून द्याव लागतं, तेही वारंवार.'

एरवी जात या विषयावर न लिहिण्याचा माझा दंडक मोडून त्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे.
)

---

अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. पण अलिकडे याबाबत मी काहीसा हताश आहे. याबाबत सांगून काही होत नसतं. 'इतकी वर्ष आम्ही सहन कसं केलं असेल' हे उत्तर देऊन तोंड बंद केलं जात आहे.

एक महत्त्वाचं ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाजात, जातीत, भाषिक गटात, धर्मात असेही लोक आहेत, तसेही लोक आहेत. त्यातल्या टीकेच्या सोयीचे प्रकारचे लोक हे 'प्रातिनिधिक' समजून वागत गेलो तर धागे जुळणारच नाही.

एक नक्की की द्वेषाचे पेरणी अधिक सोपी नि सोयीची असल्याने तीच अधिक केली जाते. द्वेषाच्या आधारे जमाव लवकर जमतो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणून आरक्षणाने देशाचे वाटोळे होत आहे म्हणून गळे काढणारी सुमार बुद्धीची ब्राह्मणांतली पोरे असोत, की शंभर मुद्द्यावर एकमत असलेला ब्राह्मण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर असहमती दाखवतो म्हणून लगेच, "बरोबर आहे, शेवटी तुम्हाला काय कळणार 'आमची' बाजू" म्हणून त्याची जात काढणारा, सुखवस्तू आयुष्य जगणारा दलित/पूर्वास्पृश्य हे एकाच पंथाचे मानले पाहिजेत.

गंमत म्हणजे यासंबंधी विषयांवरील चर्चेमध्ये ब्राह्मणेतर उच्चवर्णीय आणि ज्यांना ओबीसी म्हटले जाते त्या गावगाड्यातील पूर्वाश्रमीच्या अलुतेदार, बलुतेदार जातींचा उल्लेखही येत नाही. जणू ते या संघर्षाचा भागच नाहीत. हे कधी स्वत:ला बहुजन म्हणवत पूर्वास्पृश्यांच्या बाजूला आपले वजन टाकतात नि ब्राह्मणी व्यवस्थेचा विरोध करत असल्याची मखलाशी करतात. पण कदाचित ब्राह्मणही करत नसतील इतक्या निष्ठेने सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेची जोपासनाही करतात.

मुळात एकदा 'ते' आणि 'आपण' वेगळे मानून चालू लागलो की तिथेच सहकाराची शक्यता मावळते. केवळ दोषारोपासाठी मुद्दे शोधण्यात सारा वेळ नि ऊर्जा खर्च होत राहते. आणि यावर प्रत्येक बाजूकडून 'मग त्यांनी पण हे समजून घ्यायला नको का, त्यांना आधी सांगा' म्हणत आपली जबाबदारी झटकून टाकली जाते. मग ते ण ला ण म्हणणारे असोत की जगातला प्रत्येक प्रश्न ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाकडे ओढून नेऊन वाद घालणारे एकांगी असोत.

मूळ मुद्द्याच्या एक पाऊल मागे जाऊन असे विचारतो, की मुळात 'मी अमुकवादी आहे' हे सांगण्याची गरज का पडावी? मी आंबेडकरवादी आहे असे नुसते म्हटल्याने मी तसा होतो का? आणि तसे न म्हणताही मी त्यांच्या तत्त्वांना अनुसरून - जाणीवपूर्वक वा अजाणता - वागत असेन तर मी आंबेडकरवादी नसतो का?

दुसरा मुद्दा, मुळात आपल्याला एखादा विचार पटला म्हणून मी अनुसरत असेन, तर कुणी एखादा मला 'आंबेडकरवादी' असल्याचे प्रमाणपत्र नाकारत असेल तर मी त्याला का महत्त्व द्यावे? ते देणारा देण्यासाठी आवश्यक ते मूल्यमापन करण्यास लायक आहे हे कसे ठरते? जसे मोदीभक्तांना राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटायचा ठेका दिलेला नाही तसाच स्वतःला आंबेडकरवादी 'म्हणवणार्‍या' कुणाला तो दिलेला नाही.

मग तो म्हणाला की तू आंबेडकरवादी नाहीस, तर मी त्याला म्हणेन तू 'डॉकिन्सवादी नाहीस', क्विट्स. कारण ही दोन्ही वाक्ये वांझ आहेत. त्यांना काडीचाही आधार नाही. कुठेही वस्तुनिष्ठ मूल्यमापन नाही. मी असल्या शेरेबाजांना काडीची किंमत देत नाही. दुसर्‍यावर शेरे मारणे हे केवळ आपले स्थान बळकट करण्यासाठीच असते असे मी समजतो. इतरांना राष्ट्रद्रोही ठरवल्याने आपली राष्ट्रभक्ती सिद्ध होते असे अनेकांना वाटते, तसेच समोरचा आंबेडकरवादी नाही, किंवा छुपा संघिष्ट आहे, असे म्हटले की आपले आंबेडकरवादी असणे आपोआप सिद्ध होते त्याची धारणा असावी.

NotBeliefs

शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मुळात मी अमुकवादी आहे असे कानाच्या पाळीला हात लावून घराणे सांगण्याची गरज का पडावी? आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक असावे. ते सतत तपासून घेत रहावे, चूक सापडली तर दुरुस्त करत राहावेत. विचार नि मूल्यमापनाची पद्धत अधिकाधिक समृद्ध होत रहावी म्हणून आंबेडकरांसह जगातील सर्वच सुज्ञ माणसांचे विचार वाचत राहावेत, तपासून पाहावेत. कोणते आपल्या परिस्थितीत, कुवतीत अंमलात आणता येतात ते पाहावे, अंमलात आणावेत.

माझे विचार हे माझे आहेत, माझ्या विचारातून सिद्ध झाले आहेत याचा अभिमान का बाळगू नये? मग कदाचित असे होईल की तुमचे विचार बरेचदा आंबेडकरांकडून आलेले असतील, उत्तम आहे. कधी ते रिचर्ड डॉकिन्सकडून आले असतील, कधी मार्क्सकडून तर, कधी एखाद्या उपनिषदातून. स्रोतावरूनच अस्पृश्यता पाळणे हा दोष जोवर जात नाही तोवर अशी 'विचारांच्या घराण्यांची' गरज आपल्याला पडत राहणार आहे आणि त्या सार्‍याच घराण्यांचे टोळ्यांमधे रूपांतर होत राहणार आहे.

टोळ्यांना फक्त मित्र कोण नि शत्रू कोण इतकेच समजते. त्यांना घराण्याचा विचार पुढे नेण्यासाठी विचार करायची गरज वाटत नाही. जे तसे करू पाहतात त्यांना 'परंपरा मोडल्याचा' आरोप सहन करावा लागतो. याला आंबेडकरवादी म्हणवणारे (मी 'म्हणवणारे' असा उल्लेख यासाठी करतो आहे की तसे म्हणवणारे वास्तवात असतीलच असेही नाही. 'आहेत की नाही' हे तपासायचे कसे मला ठाऊक नाही, नि मला तो अधिकारही नाही. ) अपवाद नसतात, संघ स्वयंसेवकांसारखे स्वयंघोषित हिंदुत्ववादी अपवाद नसतात, की सर्व समस्यांचे पाप मध्यमवर्गीयांच्या माथी मारले की आपण आपोआप अस्सल वाणाचे कॉम्रेड ठरतो असे समजणारेही.

आपल्या जगण्याची चौकट घडवण्यासाठी अनेक स्रोतांचा अभ्यास करावा इतका वेळ नि ऊर्जा सर्वांनाच उपलब्ध असेलच असे नाही. मग बहुतेक सारे पूर्वसुरींनी दिलेल्या काही विचारव्यूहांच्या आधारे ते आपले जगणे उभे करतात- निदान तसा दावा करतात. मग कुणाला आंबेडकरांचे, कुणाला गांधींचे, कुणाला सावरकरांचे, कुणाला मार्क्सचे, कुणाला लोहियांचे विचार पटतात, आवडतात वा भारी वाटतात. आणि म्हणून ते त्या-त्या विचारांचा, विचारवंतांचा झेंडा खांद्यावर घेऊन चालू लागतात.

अगदी धर्माचेही घ्याल तर जगण्याची तयार चौकट म्हणूनच तिची निर्मिती झाली आहे. परमेश्वरी शब्द, अंतिम सत्य वगैरे आवरणे त्याच्या अनुयायांना 'आपण स्वीकारले त्याला भक्कम आधार आहे हं’ हा आत्मविश्वास देण्यासाठीच असतात. शिवाय त्यांचा संबंध पारलौकिकाशी जोडून ती अभेद्य केलेली असतात.

ज्याला स्वतःची चौकट घडवण्याची कुवत नाही, इच्छा नाही, ताकद नाही, त्याने साधकबाधक विचाराने उपलब्ध धर्मातून एक निवडावी असे अपेक्षित आहे. बहुतेक लोक ती तसदीही न घेता वाडवडिलांनी उचललेला झेंडाच उचलून चालू लागतात.

धर्माची अथवा विचारव्यूहाची उपलब्ध पर्यायांतून निवड करणे हे बाजारातून ३४, ३६ किंवा ३८ च्या मापाचा तयार सदरा आणण्यासारखे आहे हे. यातील एका प्रमाण- मापाचा सदरा बहुतेकांच्या शारीर प्रमाणाशी बर्‍यापैकी सुसंगत असा सापडतो नि ते तो उचलून वापरू लागतात. काही जण वाडवडील अमुक दुकानातून अमुक कापडाचा सदरा आणत म्हणून स्वत:ही त्याच दुकान नि कापडाशी एकनिष्ठ राहतात. यात सोय असली तरी त्याची अस्मिता बनवण्याचे काही कारण दिसत नाही.

एखाद्या आडमाप देहाला तयार प्रमाणबद्ध सदरा बसत नाही, त्याने स्वतःच्या मापाचा सदरा शिवून घ्यावा. त्याने तयार मापांतून निवडला नाही म्हणून त्याला आपण दोष देऊ का? मग अमुकच एक विचारव्यूहाला तुम्ही स्वीकारले नाही म्हणजे तुम्ही दुय्यम, घातक वृत्तीचे असे समजायचे कारण नाही. त्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष आचरणाचेच मूल्यमापन व्हायला हवे, निव्वळ घोषणेचे नव्हे. शिवाय मी अमुकवादी आहे याचा उद्घोष कुणी करू लागतो, तेव्हा तो तसा नसण्याची आणि ते झाकण्यासाठी अधिक उच्चरवाने ते ठसवू पाहात असल्याचीच शक्यता अधिक असते.

आता माझे वैयक्तिक मत सांगतो. मी स्वतः माझे विचार विकसित करण्यावर विश्वास असलेला माणूस आहे. लोकशाही-समाजवादी विचारांबद्दल मला आस्था असली तरी 'मी समाजवादी आहे' असे मुळीच म्हणणार नाही. मला अशा तयार ३६ मापाच्या सदर्‍याची गरज आहे असे मला वाटत नाही. माझा सदरा मी शिवून घेणार आहे. त्यात आंबेडकरवादाचे धागे असतील, सावरकरांचा ठणकावून सांगणारा विज्ञानवाद असेल, मार्क्सचे द्रष्टेपण असेल, गांधीबाबाची दूरदृष्टी असावी अशी इच्छा असेल, नेहरुंचा वास्तवाचे भान असलेला व्यवहारी दृष्टिकोनही.

हे ही पुन्हा अगदी ढोबळ वर्गीकरण आहे आणि इतर अनेक व्यक्ती नि विचारव्यूहांची नावे यात आलेली नाहीत. शिवाय प्रत्येकाच्या अनुयायांना खुष करण्यासाठी यातील प्रत्येकाचे प्रत्येक अमुक इतके ग्रॅम विचारच घेईन असेही नाही. माझ्या विचारात या सार्‍या पूर्वसुरींच्या विचारांची प्रतिबिंबे दिसतील, पण ते पूर्णांशाने त्यांचे नसतील, नसावेत. 'मी अमुकवादी आहे' असे म्हटले तर मी ही एकसाचीकरणाच्या मार्गाने चाललो आहे असे मला वाटेल नि ते मला कधीच आवडणार नाही.

तेव्हा मुद्दा हा की माझे पुरेसे आंबेडकरवादी (आणि/किंवा मार्क्सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी) नसणे कुणाला खटकत असेल, तर मी तसा आहे हे सिद्ध करायला मी मुळीच जाणार नाही.

---

(२५ एप्रिल २०१९ रोजी अन्य एका चर्चेदरम्यान लिहिलेल्या मुद्द्यांची भर घालतो आहे.)

लेखाच्या प्रस्तावनेतील मुद्द्यामध्ये जसे सवर्णांनी आंबेडकरवादी असणे ही सतत सिद्ध करत बसण्याची तक्रार आहे तसेच :

१. मुस्लिमांनी देशभक्त असणे सतत सिद्ध करावे लागते. तसे असले तरी एक मुस्लिम गुन्हेगार वा दहशतवादी सापडला की ज्याच्या जाती/धर्मात महामूर गुन्हेगार आहे अशी व्यक्तीदेखील ज्याला आपण दीर्घकाळ ओळखतो अशा त्या मुस्लिम व्यक्तीकडेही अधिक(!) संशयाने पाहणे सुरु करते.

२. ब्राह्मणाने पुरोगामित्व सतत सिद्ध करत राहावे लागते. स्वत: अब्राह्मण असल्याने जन्मजात पुरोगामी आहोत असे समजणार्‍यांपैकी प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात. ती परस्परविरोधी असू शकतात. त्या सार्‍यांशी एकाच वेळी सहमती दाखवावी लागते, जे शक्यच नसते. मग ज्याच्याशी असहमती दाखवतो तो त्या ब्राह्मणाचा ’छुपा मनुवादी वा संघी’ म्हणून ’सत्कार’ करतो. पुढच्या मुद्द्यावर त्याच्याशी सहमत होऊन अन्य कुणाशी असहमती झाली की त्या सत्काराची जबाबदारी तो उचलतो.

३. 'गुन्हेगार जमाती' म्हणून ब्रिटिशांनी शिक्का मारलेल्या जातींमधला कुणी स्वकष्टाने प्रगती करुन मोठा झाला तरीही असहमतीच्या क्षणी पुन्हा त्याच्या जातीचा उद्धार त्याला सहन करावा लागतो. त्या धोक्याचा विचार करुन आयुष्यभर त्याला सतत आपल्या मुळांपासून दूर झाल्याचे सिद्ध करत राहावे लागते. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपल्या समाजापासून तो दूर जातो आणि ’आता तू बामण झालास.’ हा आरोप स्वजातीयांकडून सहन करावा लागतो.

४. ९५ - ९९ टक्के सहमत असलेला उरलेल्या पाच-एक टक्क्यावर असहमत असेल तर लगेच तो ’छुपा तिकडचा’ ठरतो. (तो आपल्या जातीचा, धर्माचा नसेल तर मग नक्कीच). हा अनुभव स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून अधिक येतो. ते तुम्हाला जवळ करण्यापेक्षा दूर ढकलण्यास अधिक उत्सुक असतात.

... यादी भरपूर लांबेल. तूर्त इतके पुरे.

कोणतही इझम परिपूर्ण नसतो. तसेच तो एखाद्या तो ब्लू-प्रिंट स्वरुपात, काटेकोर नसतो. त्यातही मूल्यमापनाचे सापेक्षत्व अनुस्यूत असतेच. संस्कृती, विचार नि विचारव्यूह हे प्रवाहीच असावे लागतात. एकच नाव मिरवणार्‍या विचारधारेच्या विविध प्रवाहांत भौगोलिक, सामाजिक, कालसापेक्षता असतेच. रशियातल्या कम्युनिजमची जातकुळी वेगळी नि चीनच्या वेगळी. क्यूबामधला आणखी तिसर्‍या प्रकारचा. त्यांच्यात परस्परात अंतर्विरोध असणारच.

हिंदू धर्म या नावाने काही संघटना काहीतरी अभंग, एकसंघ आहे असा दावा करतात. पण हिंदू म्हटल्या जाणार्‍या परंपरांमध्ये तर प्रचंड अंतर्विरोध आहेत. त्या उपप्रवाहांचेही पुन्हा परस्पर-संघर्ष होतच राहतात.

उदाहरणार्थ, सध्या शाकाहाराचे हुकूमशहा तो उरलेल्या हिंदूंवर लादू पाहात आहेत. वैदिक आणि वैष्णव पंथीय हे आपापली भूमी वाढवताना हिंदू धर्मांतर्गत अन्य प्रवाहांची भूमी बळकावत चालले आहेत. त्यासाठी आधी अवतार नि मग दशावतारांसाठी क्लृप्ती ते वापरत आहेत.

अशा वेळी मी अमुक गटाचा, जातीचा वा धर्माचा हे विधानही तसे भोंगळच असते. त्याला एखाद्या पत्रावर बाहेरून चिकटवलेल्या स्टॅंप इतकेच महत्त्व असते. हे बहुसंख्येला ठाऊक असल्याने कर्मकांडांच्या प्रदर्शनातून ही गट-बांधिलकी ते स्वत:ला नि इतरांना पुन्हा-पुन्हा पटवून देत असतात.

दुसरे असे की ’मी अमुकवादाचा वा तमक्या विचारवंताच्या मांडणीचा अभ्यास केला आहे म्हणजे तो मला तंतोतंत समजला आहे आणि मी तो तंतोतंत आचरणात आणतो आहे’ हा समज एका बाजूने भाबडेपणाचा किंवा धूर्तपणाचा असतो. बरेचदा अज्ञानमूलकही असतो. बहुसंख्य मंडळी ज्या विचाराची मांडणी करतात तो विचार ते आचरणात आणत असतीलच असे नाही. याला त्यांची त्या विचारांची समज, कुवत, गाफीलपणा, परिस्थिती, ज्यांच्याशी सहजीवन जगावे लागते अशा इतरांच्या विचार-वर्तनामुळे पडणारी बंधने अशी अनेक कारणे असू शकतात.

हे सारे लक्षात न घेता स्वत:च स्वत:ला ठेका बहाल करत ’हे आमच्या संस्कृतीत/विचारात बसत नाही.’ म्हणणारे, किंवा तू अमुकवादी नाहीस असे म्हणणारे दुराग्रही किंवा अज्ञानी असतात. मी अमुकवादी आहे हे केवळ झेंडा मिरवणे आहे.जात, धर्म आणि स्वीकृत इझम याचा गजर करणे, त्याच्या अस्मितेच्या ढेकरा देणे हे कम-अस्सल लोकांचे काम आहे. ज्यांना शहाणपण रुजवून दाखवता येत नाही ते मिरवून दाखवतात इतकेच.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा