मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

काही भारतीय माझे बांधव नाहीत

डार्विनची थिअरी सिद्ध झालेली नाही... आणि म्हणून आमचे ’वेदवाक्य’च बरोबर आहे असे सत्यपालसिंग म्हणतात.

एखादा कम्युनिस्ट हातभर लेख लिहून समाजवाद्यांचे पसाभर दोष दाखवतो... आणि म्हणून आमची मार्क्सची पोथी स्वीकारा म्हणतो.

एखादा वाचाळ नेता प्रतिस्पर्धी पक्षाचे खरे खोटे दोष सातत्याने उगाळत बसतो... आणि मी असा नाही म्हणून मला निवडा म्हणतो.

AssumeYouAreWrong

एखादा सरकारपुरस्कृत व्यवसाय करणारा प्रतिस्पर्धी उत्पादनांत ’हानिकारक केमिकल’ आहेत असे सांगत बसतो... आणि म्हणून आमची उत्पादने खरेदी करा म्हणतो.

एखादा धर्माभिमानी ज्या धर्मावर दांत धरुन असतो त्या धर्मातील खर्‍या खोट्या दोषांची सतत उजळणी करत बसतो... आणि म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणतो.

एखादा जात्याभिमानी अन्य जातींच्या स्वार्थीपणाचे, लायकीहून अधिक मिळवत असल्याच्या तक्रारी करत बसतो... आणि म्हणून आता आमच्या जातीला प्राधान्य मिळण्याची गरज आहे असे प्रतिपादन करतो.

एखादा पांडू अमुक गाव अख्खेच्या अख्खे मूर्ख आहे, ओवररेटेड आहे... म्हणून आमचे गाव लै भारी आहे अशा फुशारक्या मारतो.

---

माझ्या दृष्टीने हे सारेच दावे चुकीचे आहेत. याच्यामागे एकतर अडाणीपणा दिसतो, दांभिकपणा दिसतो किंवा स्वार्थ!

समोरचा चूक ठरल्याने आपली बाजू आपोआप बरोबर ठरते ही मखलाशी साफ चुकीची आहे !!!

जे तिला बळी पडतात ते एकतर भोळे आहेत किंवा मूर्ख.

---

सत्यपालसिंहांनी उत्पत्तीची वेदप्रणित गोष्ट सांगायला हवी, ती योग्य कशी याबाबत विवेचन करायला हवे.

समाजवादाचे जे दोष कम्युनिस्टाने सांगितले ते कम्युनिझम किंवा कम्युनिस्टांत कसे नाहीत हे कम्युनिस्टाने सांगायला हवे, किंवा एकुणातच कम्युनिजम ही योग्य व्यवस्था आहे याचे विवेचन द्यायला हवे.

वाचाळ नेत्याने मागचे लोक ज्या चुका करत होते त्या आपण कशा टाळणार आहोत याचा रीतसर प्रस्ताव सर्वांसमोर ठेवायला हवा. मी काहीतरी करतो आहे नि ते योग्यच आहे, पण तुम्ही मूढ असल्याने तुम्हाला कळत नाही हा दंभभाव सोडायला हवा.

सरकारपुरस्कृत व्यावसायिकाने आपली उत्पादने गुणवत्तापूर्ण का व कशी हे स्वतंत्रपणे सिद्ध करायला हवे.

धर्माभिमानी माणसाने आपला धर्म श्रेष्ठ कसा याबाबत मांडणी केली पाहिजे.

जात्याभिमानी माणसाने आपल्या जातीला प्राधान्य मिळायला हवे या मागणीच्या पुष्टर्थ वस्तुनिष्ठ पुरावा सादर करायला हवा.

पांडूने आपल्या गावातील प्राचीन, अर्वाचीन किंवा जड अथवा सांस्कृतिक अशा अभिमानास्पद, अनुकरणीय गोष्टीं वा चालीरीतींबद्दल बोलून त्याचे महत्त्व वा त्याच्या श्रेष्ठत्वाचा दावा करायला हवा.

---

आणि मुळात जर हे जमत असेल, तर मग विरोधक, पर्याय यांच्याबाबत नकारात्मक बोलायची गरजच पडत नाही. चांगले नि वाईट यांच्यात निवड करायची असेल तर चांगल्याचा गुण सांगून भागते. वाईट आणि अति-वाईट यांच्यात निवड करायची असेल तरच समोरचा अधिक वाईट हे सिद्ध करायची वेळ येते. थोडक्यात अशी नकारात्मक प्रचारपद्धती वापरणारा आपण केवळ ’अमक्यापेक्षा कमी वाईट’ आहोत हेच सिद्ध करु पाहतो... आपणही वाईट पर्यायच देतो आहोत हे त्याला मनात कुठेतरी मान्यच असते.

पण एकुणच वरील उदाहरणे पाहता जर नकारात्मक प्रचारच तुम्हाला आवश्यक वाटत असेल आणि परिणामकारक ठरत असेल, तर एकुण समाजच नकारात्मक प्रवृत्तीचा आहे. जिथे निर्मितीपेक्षा भंजनाचा विचार अधिक प्रबळ असतो तो समाज कसला डोंबलाचा महासत्ता होणार?

जिथे आपल्या आयुष्यावर थेट परिणाम घडवणार्‍या घटकांपेक्षा चित्रपटाच्या नट-नट्यांचे खासगी आयुष्य अधिक चर्चिले जाते, त्या समाजात प्रगतीच्या वाटा कोण शोधणार? स्वत:च्या आयुष्यातील चुकांपेक्षा इतरांच्या चुकांचा पाढा अधिक उत्साहाने वाचणारे आपल्या चुका सुधारुन पुढे कसे सरकणार?

जगण्यातील सर्व काही परकीय शोधांवर, कल्पनांवर आधारित असूनही कुठल्या मसण्या ग्रंथात ते आधीच लिहून ठेवले आहे या काही खोटारड्यांनी पसरवलेल्या भ्रामक कल्पनेला स्वीकारुन आळशीपणे निलाजरे, परपुष्ट जगणार्‍यांना इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचा दावा करण्याचा काय अधिकार? आणि केलाच तर तर तसे करणार्‍याचा मूर्खपणाच जाहीर होतो असे समजण्यास काही आक्षेप का असावा?

आणि हे असे आसपास दिसून येत असताना ’भारत माझा देश आहे, पण सारेच भारतीय माझे बांधव नाहीत!’ असे म्हणण्याचा अधिकार मला का नसावा? गिधाडांसारखे इतरांचे लचके तोडूनच ज्यांना जगता येते अशांना नाकारण्याचा अधिकार मी का बजावू नये? (वरीलपैकी प्रत्येक उदाहरणातील व्यक्ती, उक्तीने नसली तरी वर्तनाने हेच दर्शवून देत असते.)

वरीलपैकी प्रत्येक व्यक्ती/समाज समोर बोट दाखवून ’तो तसा आहे असे म्हणून मी असा आहे.’ ही पळवाट सांगतो तेव्हा तो आपले खुजेपण, स्वार्थी वृत्ती, मनातील द्वेष नि हिंसेचे अस्तित्व अप्रत्यक्षपणे मान्यच करतो- नव्हे मी ती सोडणार नाही असे म्हणतो हे मी का मानू नये? आणि असे आहे तर त्याच्याशी संवाद थांबवण्याचा माझा हक्क का बजावू नये?

तूर्त विराम...

- (भारतातील केवळ मूठभरांचाच बांधव म्हणवणारा)

-oOo -


हे वाचले का?

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

कोटीच्या कोटी उड्डाणे*...

जर्मनीत अठराव्या शतकात जन्मलेला सॅम्युअल हनिमान भारतीय वंशातला होता. हनिमान हे त्याचे कुलनाम ’हनुमान’ याचे जर्मन रूप. हा रामायणकालीन हनुमानाचा वंशज होता. आफ्रिकेत जसे प्रत्येक वंशाचे जमातीचे एक झाड असते, नि तो वंश त्या झाडाच्या नावे ओळखला जातो तसे भारतात मूळ पुरुषाच्या नावाने हे तर जगजाहीर आहेच. (त्यातून पुढे गोत्र संकल्पना आली.)

SamuelHahnemann

खरा इतिहास हा की हनुमान हा वन्यज होता, पण तो वानर नव्हता. हिंदू नि हिंदुस्तानद्वेष्ट्या पाश्चात्त्य लोकांनी रामायणात प्रक्षेप करुन तसे लिहिले नि त्याचे महत्व कमी केले. पण हे करतानाच त्याचे कार्य, त्याचे ग्रंथ चोरुन नेऊन त्यातील ज्ञान, शोध, माहिती आपल्या नावावर खपवली.

दुसरा एक ’खरा इतिहास’ असा आहे की वैदिकांनी आपल्या रामाचे महत्व वाढवण्यासाठी द्रविड वंशीय, मूलनिवासी हनुमानाला वानर बनवले, आणि त्याला केवळ रामाचा दुय्यम सहकारी बनवून टाकले. राम-रावण युद्धाचे वेळी त्याने आपल्या वनौषधीवर आधारित उपचारपद्धतीचा वापर करुन, आदले दिवशी रणात जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमा एका रात्रीत भरुन, दुसर्‍या दिवशी दुप्पट ताकदीने रणात उतरतील याची सोय केली होती. रावणाच्या पार्टीत असा धन्वंतरी नसल्याने हळूहळू त्याचे पारडे हलके होत गेले हा खरा इतिहास आहे.

तिसरा ’खरा इतिहास’ असा आहे की तो खरंतर वैदिक ऋषीच होता. पण त्याने चार वेद दुय्यम असून आयुर्वेद हाच वेद सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादन करायला सुरुवात केली. त्यामुळे चिडून जाऊन अन्य वैदिकांनी त्याला वेदद्रोही, कलीचा अवतार ठरवून त्याला नि त्याच्या वंशाला जातिबहिष्कृत केले. म्हणूनच पुढे त्याच्या वंशाला जर्मनीत परागंदा व्हावे लागले. पण तिकडे जाऊन त्यांनी आर्यवंशाची मुहूर्तमेढ रोवली, जी अलिकडे भरतभूच्या काही वंशजांना मूळ वंशापेक्षा अधिक शुद्ध नि आदर्श वाटत असते.

चौथा ’खरा इतिहास’ असा आहे की तो खरंतर वैदिक ऋषीच होता. एक दावा असा आहे की बृहस्पतीने जसे राक्षसांमध्ये मिसळून बुद्धिभेद करणारे लोकायत अथवा चार्वाक तत्त्वज्ञान सांगितले; जेणेकरुन त्यांचे बळ खच्ची होऊन देवांना राक्षसांवर विजय मिळवणे सोपे झाले. तीच भूमिका हनुमानाने रोगोपचार पद्धतीबाबत स्वीकारली होती. वन्य जमातींत राहून त्यांचा विश्वास संपादन करुन दुय्यम उपचार पद्धतीचा वापर करुन त्यांना शारीरिकदृष्ट्या दुबळे करत नेले नि बुद्धिभेदातून आपल्या जमातीला अनुकूल करुन घेतले. (आठवा: लंकेच्या युद्धात रामाच्या बाजूने लढलेले सुग्रीव, अंगद, नल, नीलादि ’वानर’) हीच दुय्यम उपचारपद्धती वनातून परागंदा झालेल्या काही वन्यजांनी आपल्यासोबत जर्मनीमध्ये नेली. मूळचा, अस्सल आयुर्वेद मात्र भारतातच शिल्लक राहिला.

पाचवा ’खरा इतिहास’ हा की हनुमान हा मूळ जर्मनवंशीयच होता. पण त्या कुळातील एका पुरुषाने जपानी स्त्रीच्या प्रेमात पडून विवाह केला. दोनही देशांतील धर्मसंसदांनी त्या युगुलाला जातिद्रोहाबद्दल देहान्त सुनावला. पण ते जोडपे तिथून निसटले नि मध्य भारतातील वनात लपून राहिले. जर्मनी-जपान-भारत एवढ्या मोठ्या पल्ल्याचा प्रवास केला म्हणून वेगवान प्रगती, प्रवास वा तर्काच्या कार्यकारणभावविहीन विस्ताराला हनुमान-उडी म्हटले जाऊ लागले. (त्याचा लंका ते द्रोणागिरी प्रवासाशी काही संबंध नाही. ती केवळ एक दंतकथा आहे.) जर्मन हे पुरुषसत्ताक असल्याने त्यांच्या वंशजांना पैतृक घराण्याकडून हनिमान हे कुलनाम, तर जपानी हे मातृसत्ताक असल्याने मातुल कुलाकडून मारुती हे कुलनाम मिळाले. हा मूळपुरुष आपल्यासोबत जे वैद्यकीय ज्ञान घेऊन आला त्याच्या आधारे त्याने वन्य जमातींमध्ये मुख्य वैद्य ही भूमिका स्वीकारली नि पुढे - भारतीय प्रथेप्रमाणे - हे त्यांचे वंशपरंपराग काम होऊन बसले.

ही उपचार पद्धती भारतीय ज्ञानपरंपरेनुसार बापाकडून मुलाकडे अशा मौखिक परंपरेने पुढे जात राहिली. पण सॅम्युअलला मुलगा नसल्याने ही ज्ञानधार कुंठित होईल अशी भीती त्याला वाटली. मुलीला वारस न मानण्याच्या भारतीय वृत्तीमुळे ते ज्ञान तिला देण्याऐवजी ते ग्रथित करुन सर्व जगासाठी त्याने ते ज्ञानभांडार खुले केले. आणि केवळ होमो सेपिअन्स अर्थात दोन पायावर चालणार्‍या वानरासाठीच असल्याने तिला 'होमिओपॅथी' असे नाव दिले.

अशा तर्‍हेने हनिमान हा हनुमानकुलोत्पन्न असल्याने, 'त्याने निर्माण केली' असा दावा असलेली होमिओपॅथी नामे उपचारपद्धती भारतातूनच तिथे गेलेली आहे हे सिद्ध होते. जी चौथ्या खर्‍या इतिहासानुसार स्थानिक आयुर्वेदाहून दुय्यम आहे हे ही सिद्ध होते. (तो पाचवा खरा इतिहास हे स्थानिक कम्युनिस्ट इतिहासकारांचे षडयंत्र आहे हे आता सर्वमान्य झाले आहे.)

- oOo -

श्रेय:

सदर संशोधनास वर्ल्ड बॅंक, युरपिय बॅंक, खरा भारत निर्माण अभियान, फूलनिवासी भारतीय, हवाई भारतीय, वैद्यवादिनी शिक्षणोत्तेजक सभा, वेदभूगोल मंडळ, ब्रह्मावर्त मुक्ती समाज आदि संस्थांनी अर्थसाहाय्य केले आहे. नासा नि युनेस्कोच्या प्रत्येकी तीन वेगळ्या समित्यांनी सदर संशोधन अनेक वर्षे पुन्हा पुन्हा तपासून चुका काढण्याचा प्रयत्न करूनही न जमल्याने अखेर ’बरोबर आहे’ असा कबुलीजबाब दिला आहे. भारताच्या आयुष मंत्रालयाने या संशोधनाबद्दल ’आम्ही हेच म्हणत होतो’ अशी ट्विटू प्रतिक्रिया दिली आहे नि आम्हांस 'भारतरत्न’हून वरचा 'भारत-कोहिनूर' असा नवा पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस केली आहे.

(संशोधनाच्या पुढील टप्प्यात ’बाराक्षार पद्धती, युनानी पद्धती यांचे भारतीय मूळ’ याविषयावर संशोधन होत आहे. याला देखील वरील सर्व संस्थांसह रुसी मुक्ति ब्रिगेड, क्रायमिया क्रायसिस सेंटर, माओरी हितकारिणी सभा, बुशमेन ब्रिगेड, आयडॅहो एकीकरण समिती आदि संस्थांचे पाठबळ लाभणार आहे.)

---

(’अ.भा. छद्मविज्ञान काँग्रेस’च्या सहा हजार आठशेव्या वार्षिक अधिवेशनात सादर केलेला शोधनिबंध)

*टीप: संशोधकांने जरी हे शीर्षक दिले असले तरी काही वाचक मात्र ’क्रोधे उत्पाटिला बळे’ म्हणतील अशी दाट शंका आहे.


हे वाचले का?

रविवार, १४ जानेवारी, २०१८

आयुर्वेदाच्या नावे गोरखधंदा

आयुर्वेद ही स्वदेशी चिकित्सापद्धती आहे या एकाच मुद्द्याला धरून, तिला राष्ट्रप्रेमाशी जोडून घेऊन आणि ’त्यातील औषधांचे साईड इफेक्ट्स नसतात’ या भंपक दाव्याची पुंगी सदोदित वाजवत अनेक तथाकथित औषधे आयुर्वेदिक - खरंतर आयुर्वेदिय म्हणायला हवे- आहेत असा दावा करत खपवली जातात.

Ayurved

ज्यांची ना कुठली क्लिनिकल ट्रायल होते ना कुठला अभ्यास. पुन्हा काही साईड इफेक्ट्स दिसून आलेच तर ’हे आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट्स नसतात. तुमचे ते त्रास दुसर्‍याच कशामुळे झाले असणार’ असे म्हणत हात वर करता येतात. अलीकडे राष्ट्रभक्तीच्या पेहरावात नटून थटून वावरणारी आयुर्वेदाची ही नवी ब्रँच आरोग्याशी - अर्थात अडाणी रुग्णांच्या - खेळत असते.

एका क्लिनिकल ट्रायलला किती काळ लागतो, किती पैसा लागतो किती अद्ययावत यंत्रणा लागते याची कणभरदेखील कल्पना आपल्याला नसते. प्रथम एखादे संयुग हे औषध म्हणून तपासण्यासाठी त्याच्या भौतिक-रासायनिक गुणांआधारे प्रस्ताव उभा करावा लागतो, त्यातून मग प्राण्यांवरचे प्रयोग, मग घातक परिणाम तपासण्याचा टप्पा, त्यानंतर धडधाकट स्वयंसेवकांवरचे प्रयोग, त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोग - जो दीर्घकाळ उपचाराचा असतो- काल औषध दिले नि आज बरे वाटले असे नसते, ज्यातून ते औषध म्हणून सिद्ध होते.

या प्रयोगात मग लैंगिक विभागणी, वांशिक विभागणी, वयोगट, जगण्याचे आणखी काही संभाव्य आयाम आणि मुख्य म्हणजे पेशंटच्या अन्य आजारांची व औषधोपचारांची स्थिती (उदा. दमा असलेल्या पेशंटला ब्रुफेन देता येत नाही.) इ. ना सोबत घ्यावे लागते. त्यानंतर औषधाचे स्वरुप (पिल, कॅप्सूल, इन्जेक्शन डोस इ.) निश्चित करावे लागते . त्यानंतर परिणामकारक डोस निश्चित करावे लागतात. या सार्‍या प्रक्रियेबाबत लिहायचे तर एक लेखमालाच लिहावी लागेल.

थोडक्यात सांगायचे तर हा दीर्घकाळ चालणारा नि खर्चिक प्रयोग असतो. शिवाय सारेच प्रयोग यशस्वी ठरतात असे नाही. एक ढोबळ अनुमान आहे की ४०० संयुगे तपासत गेल्यास एक औषध पदरी पडते (हे प्रमाण वाढवण्यासाठी विविध प्रयत्न चालू असतात) तेव्हा ३९९ संयुगे विविध टप्प्यांवर बाद झालेली असतात. यामुळे खर्च भागिले विक्रीयोग्य वस्तू संख्या बरोबर किंमत हे अडाणी गणित चुकीचे असते. उरलेल्या ३९९ वरचा खर्चही या एकाने भागवायचा असतो. 'घेतले काहीतरी, केला काहीतरी प्रयोग नि झाले औषध' हा बाष्कळपणा असतो. हा प्रकार आजारी व्यक्तीच्या जिवावर बेतणारा असू शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ट्रायल्स उत्पादक स्वत: करत नाहीत, त्या अन्य तटस्थ संस्थेने करायच्या असतात. (उत्पादकानेच केल्या तर चारशेपैकी साडेतीनशेच्या आसपास औषधे तयार होतील हे वेगळे सांगायला नकोच.) आणि त्याहून महत्वाचे म्हणजे या औषधांसंबंधी - साईड इफेक्ट्ससह - सर्व तपशील सर्वसामान्यांना पाहता याव्यात यासाठी ’पब्लिक डोमेन’ मध्ये असतात... कुठल्याशा अगम्य भाषेत लिहिलेल्या ग्रंथात असून फक्त त्या धर्माचा ’प्रेषित’च तो वाचू शकेल अशी स्थिती नसते.

गंमत म्हणजे इतक्या काटेकोर प्रयोगातून तयार झालेल्या मॉडर्न मेडिसीनमधील औषधाबाबत साशंक असणारे केवळ ’हे औषध आयुर्वेदिक आहे’ या एका दाव्यावर काय वाटेल ते ’पोटात घ्यायला’ तयार असतात, हा विनोद मला नेहमीच त्रास देतो.

ते औषध आयुर्वेदिक असेल तर तुम्ही म्हणता तसे खरोखर ग्रेट नि साईड इफेक्ट्स नसलेले आहे हे क्षणभर मान्य करु या. पण मुळात हे खरोखरच आयुर्वेदिक आहे म्हणजे काय, तसे जाहीर करण्याचे निकष कुठले? बाजारातील अन्य औषधांना जोडलेल्या ’केमिकल’ या घाबरवून टाकणार्‍या शब्दावर रामदेवबाबा तुम्हाला आयुर्वेदिक या नावाखाली जे विकतो ते डोळे झाकून तुम्ही विकत घेता ते कोणत्या अर्थाने आयुर्वेदिक असते?

झाडपाल्यापासून बनवलेले कोणतेही औषध आयुर्वेदिक म्हणायचे का? तसे असेल तर प्राण्यांपासून बनवलेल्या (हो, शाकाहाराच्या बाताड्यांनो काही प्राचीन आयुर्वेदिक औषधेही प्राणिजन्य असतात, तुमच्या परिचित आयुर्वेदिक वैद्याला खासगीत विचारून पहा) औषधांचे काय? आणि केवळ नैसर्गिक घटकांपासून बनवलेले ते आयुर्वेदिक असेल तर मग मॉडर्न मेडिसीन मधील औषधेही या ना त्या प्रकारे नैसर्गिक घटकांपासूनच बनलेली असतात ना? कृत्रिम औषधांचे मूल-घटक शेवटी नैसर्गिकच असतात.

शिवाय नियंत्रित माध्यमांत उत्पादन केलेले औषध अधिक नेमके असेल, की कुण्या नैसर्गिक स्रोतातून पर्यावरणीय घटकांच्या परिणामासह आलेले? बेटामेथासोन हे प्रत्येक गोळीमध्ये बेटामेथासोनच असणार नि नेमक्या पोटन्सीचेही. याउलट सातपुड्याच्या जंगलातून आणलेली नि निलगिरीच्या जंगलातून आणलेली दोन वर्षे किंवा दहा वर्षे वयाच्या झाडापासून मिळवलेली लेंडी पिंपळी शंभर टक्के एकाच गुणधर्माची आहे, तितक्याच तीव्रतेची आहे याची खात्री देता येईल?

मुळात प्रत्येक उपचारपद्धती - माणसासारखेच- ही आपापले गुणदोष घेऊन येते, तिच्यासकट तिचा वापर व्हायला हवा. आयुर्वेदिय औषधांना अनेक वर्षांच्या ’अनुभवांचा, परिणाम-मागोव्या’चा (empirical evidence) आधार असतो/ असावा. तर अर्वाचीन औषधांना अधिक नियंत्रित नि काटेकोर संशोधन नि उत्पादन यांचा. यासाठीच प्रशिक्षित वैद्य वा डॉक्टर असतात. निव्वळ औषध तयार आहे म्हणजे कोणीही घ्यावे असे नसते. ते अमुक एका रोग्याला द्यावे की नाही, दिल्यास किती द्यावे याचा निर्णय त्या प्रशिक्षितांनी घ्यायचा असतो. ’तो अमका डॉक्टर मूर्ख आहे, पैसेखाऊ आहे’ वगैरे दावे समजा खरे असले तरीही उपचारांबाबत त्यालाच तुमच्याहून अधिक अक्कल असते.

या तथाकथित औषधाच्या जाहिराती डिश टीव्हीच्या बेस चॅनेलवर जोरात चालू आहेत. जे मुळात औषध आहे की नाही याचाच पुरेसा पुरावा नाही, त्याचा जोरदार पुरस्कार चालू आहे. गंमत म्हणजे भारतात जाहिरातीस परवानगी असलेल्या मोजक्या ’ऑफ-द-शेल्फ’ औषधांत प्रामुख्याने बाह्योपचारांची - मलम, बाम आदि - औषधे असतात. अन्य औषधांना अशी जाहिरात करण्यास परवानगी नसते. त्याचे कारणच हे की ती केवळ प्रशिक्षितांच्या शिफारसीनेच घ्यायची असतात. असे असून मधुमेहासारख्या ’अनेक आजारांचे उगमस्थान’ मानल्या गेलेल्या औषधाची केवळ खुली विक्रीच नव्हे तर अशी जाहिरातही होते आहे हे अतिशय धोकादायक नि नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे.

तसे पाहिले तर बाजारात अनधिकृत अशी आयुर्वेदिक म्हणवणारी औषधे उपलब्ध असतातच (उदा. दक्षिणेतले दम्यावरचे हुकमी असा दावा केले जाणारे, माशाच्या पोटातून घेण्याचे औषध.) मग आताच का विरोध असा नेहमीचा प्रतिवाद येईल. पण मुद्दा असा आहे की ते औषध प्रमाणित नाही हे जगजाहीर असते. इथे ही औषधे ’सीएसआयआर’ नि आयुष प्रमाणित ’खूप संशोधन करुन नि पैसे खर्च करुन तयार केल्याचा’ दावा केला जातो आहे. एक प्रकारे सरकारी अधिकृततेची मोहोर त्यावर मारलेली आहे. आणि हे अधिक गंभीर आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'सीएसआयआर' (CSIR) ही संशोधकांना आर्थिक रसद देणारी संस्था आहे.  ’वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद’ या तिच्या नावातच तिच्या कामाची व्याप्ती स्पष्ट आहे. ती औषधे प्रमाणित करीत नाही, तिला तो अधिकार नाही. त्यासाठी अमेरिकेच्या FDAच्या धर्तीवर 'केंद्रीय औषध प्रमाणीकरण संस्था (CDSCO)' असते. )

सुज्ञ नि विचाराने वागू इच्छिणार्‍यांसाठी हा खटाटोप. बाकी सुई नि सर्जरीला घाबरून ’तथाकथित’ परंपरागत औषधी वा साबुदाण्याच्या गोड गोळ्यांच्या तथाकथित परिणामकारकतेबाबत निश्चिंत राहून स्वत:च्या आरोग्याशी खेळ करणार्‍यांना शुभेच्छा.

- oOo -

'आयुष’च्या नि 'सीएसआयआर'च्या हवाल्याने जोरदार जाहिराती करुन विकल्या जाणार्‍या मधुमेहाच्या औषधांचा अल्ट्न्यूज.कॉम ने केलेला पंचनामा: https://www.altnews.in/bgr-34-ime-9-drugs-safe-effective-diabetes/


हे वाचले का?