सोमवार, ३० एप्रिल, २०१८

This, is us!

KevinAndHisNieces

विषयसंगतीमुळे हा लेख ’वेचित चाललो...’ वर हलवला आहे. थोडे संस्करण केलेला हा लेख 'जीवनाचे पोर्ट्रेट या शीर्षकाखाली इथे वाचता येईल.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

समाजमाध्यमातले गुंड

सामाजिक बहिष्कार किंवा प्राकृतात ’वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते. केवळ या ब्रह्मास्त्रामुळे अनेक निरपराधांना जातपंचायतीच्या अन्यायकारक निर्णयांपुढे मान तुकवावी लागत असे/लागते. यातून जातपंचायत ही एक शोषक व्यवस्था म्हणून उदयाला आली. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचे प्रारूप असलेली जातपंचायत आज विसर्जित करण्यासाठी चळवळ करण्याची वेळ आली आहे.

SocialMediaTroll

या जुनाट परंपरेचा आविष्कार नव्या स्वरूपात होतो आहे. जे फेसबुकवरून अमुक कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमुक अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका. अमके अ‍ॅप ताबडतोब अन-इन्स्टॉल करा... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ’जाती’च्या माणसांना देत असतात. उपभोगाची, प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता तशीच मध्ययुगीन, संख्याबळावर एखाद्याचे शोषण करण्याची आहे.

आपल्याला हवे तसे त्याने वागावे, आपल्यासमोर मान तुकवावी यासाठी बुद्धिहीन झुंडीचा वापर हत्यार म्हणून करण्याची पद्धत, विरोधकांऐवजी त्यांच्या स्त्रियांची नालस्ती करण्याची डरपोक वृत्ती ही मनुष्य टोळ्या करुन राहात होता त्यावेळच्या माणसाच्या बुद्धीची मागास पातळी दाखवते.

टोळ्या होत्या तेव्हा विरोधी टोळीच्या स्त्रियांवर थेट बलात्कार होत, आता रंडी/रांड वगैरे शब्दातून होतात इतकेच. त्या काळी लढाईत जेत्या टोळीचे लोक जित टोळीच्या स्त्रियांवर बलात्कार करत, किंवा त्यांना उत्पादक भूमी म्हणून त्यांना गुलाम करून त्यांच्या मार्फत आपली संख्या वाढवत. त्याचबरोबर त्या टोळीतील लहान मुले - विशेषत: पुरुष - सरसकट ठार मारले जात. (म्हणूनच बहुधा आणीबाणीच्या प्रसंगी स्वत:ऐवजी प्रथम मुलांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण झाली असावी का? त्यांना स्वत:च्या जिवाचा धोका तुलनेने कमी, मुलांना अधिक म्हणून.)

”इतक्या लहान मुलाला का मारायचे?’ असा प्रश्न जेत्या टोळीच्या ’सैनिका’ला फारसा पडत नसे. हे मूल मोठं होऊन आपल्या टोळीला मारक ठरेल असा सरळ हिशोब होता. (माणूस वयाने वाढला की सुज्ञ होतो यावर त्यांचा विश्वास नसे. तो मोठा होऊन हिंसाच करणार हा ठाम विश्वास असे त्यांचा. त्यांच्या बुद्धीची कुवतच तेवढी असे, आजही अनेकांची तितकीच आहे.) वारंवार बलात्कार करुन ठार मारलेल्या आठ वर्षांच्या मुलीबद्दल ’साली बडी हो के क्या करती, आतंकवादी बनती.’ असा विचार करणारे टोळीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नसतातच. थोडक्यात हे सर्वस्वी रानटी लोक... वर स्वत:ला संस्कृतीचे ठेकेदार म्हणवतात हा या देशातला सर्वात मोठा विनोद आहे; आणि त्यांचा तो दावा मान्य करणारे सुशिक्षित नि स्वयंघोषित सभ्य लोक ही या देशाची शोकांतिका आहे.

ज्या फ्रेंच नियतकालिक 'शार्लि हेब्दो’वर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करुन त्यातील अनेकांना कंठस्नान घातले याचा जगभर गवगवा झाला. परंतु याच शाली हेब्दोने दहशतवादापासून दूर पळणार्‍या आणि समुद्रावरच करुण अंत होऊन किनार्‍यावर निष्प्राण पहुडलेल्या अलान कुर्दी या छोट्याबद्दल अश्लाघ्य भाष्यचित्र प्रकाशित केले होते. हे टोळी मानसिकतेचे उत्तम उदाहरणच म्हणता येईल (ते चित्र आणि त्याला जॉर्डनची राणी रानिया हिने दिलेले सडेतोड उत्तर इथे पाहता येईल)

त्या टोळीचा माणूस म्हणजे नक्की वाईट, त्याला ठार मारले तर काय बिघडले अशा टोळीची मानसिकता असणार्‍या रानटी जमातीला प्रत्यक्ष बलात्कार करता येत नाहीत, सरसकट वंशविच्छेद करता येत नाही, ही गेल्या सत्तर वर्षांत रुजवलेल्या लोकशाहीची देणगी!

- oOo -


हे वाचले का?

गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

पांचामुखी...

(कोणतीही चौकशी, कोणताही तपास न होता, केवळ चार न्यायाधीशांच्या ’मता’नुसार जस्टिस लोयांचा मृत्यू संशयास्पद नाही, एवढे त्या मृत्यूची चौकशी करण्यास नकार देण्यास पुरेसे आहे असा अनाकलनीय निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.)

आपल्याकडे ’पांचामुखी परमेश्वर’ अशी म्हण आहे. चार शहाण्या माणसांचं जसं म्हणणं पडेल ते योग्य समजून पुढे जावे असा ढोबळ अर्थ घेऊ या. त्यातूनच मग पंचायत ही संकल्पना आली. समाजातील पाच प्रतिष्ठित नि सुज्ञ माणसे पंच म्हणून एकत्र बसत नि समाजातील समाजातील समस्यांचा निवाडा करत. पुढे जातींचे समाज बनले आणि जातपंचायत उदयाला आली.

अर्थात कुणाला सुज्ञ म्हणायचे, शहाणा म्हणायचे हा प्रश्न होताच. पण तरीही काही काळ कदाचित ही व्यवस्था परिणामकारक ठरली असेल. बरं या पंचांना निवाडा करण्यासाठी कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज वा मदत फारशी नसे. बहुतेक सारे काही साक्षी आणि माणसांच्या शपथेवरील साक्षी यावर ठरे. आणि यात पंचाचे पूर्वग्रह मिसळले कि निवाडा तयार होई. तो ’न्याय’ असेलच असे नाही.

Panchayat

पण यातून मग पंचांचा पक्षपात, गुन्हेगाराऐवजी फिर्यादीलाच शिक्षा असे प्रकार सुरु झाले. तोडग्यासाठी पंचांना द्यावयाच्या मोबदल्याच्या निमित्ताने शोषणव्यवस्था उभी राहिली. बलात्कारितेच्या कुटुंबालाच वाळीत टाकण्यापासून दंड करण्यापर्यंत प्रकार अजूनही घडतात. माणूस पंच झाला, प्रतिष्ठित असला म्हणून त्याचा निवाडा निर्दोष असेलच असे नाही, त्यात त्याचा स्वार्थ नि पूर्वग्रह अडकलेले नसतीलच असेही नाही. त्यामुळे त्याचा निर्णय पक्षपाती असू शकतो. जातीमधला श्रीमंत माणूस सरळ पंचांना पैसे चारुन विकत घेई किंवा पोसलेल्या गुंडांच्या सहाय्याने धमकावून सोयीचा निवाडा पदरात पाडून घेई.

एखादी व्यक्ती पंच झाली म्हणजे ती सर्वस्वी विश्वासार्ह आहे, त्याचा निर्णय निरपेक्षच असेल, असे समजणे धोकादायक ठरु लागले. त्यातून झालेल्या अन्यायांची संख्या इतकी वाढली की जातपंचायती बरखास्त करण्यासाठी चळवळ सुरु करण्याची वेळ आली.

थोडक्यात पंचांना काय वाटते, किंवा त्यांचे ’मत’ काय आहे एवढ्यावरच निर्णय घ्यायचा झाला तर तो पक्षपाती असण्याची शक्यता बरीच आहे. म्हणून मग जगभरात वस्तुनिष्ठ पुराव्यांना महत्व आले, न्यायवैद्यकासारखी शाखा उदयाला आली. केवळ साक्ष पुरेशी न ठरता त्यांना वस्तुनिष्ठ, जड आणि तर्कनिष्ठ पुराव्यांची जोड आवश्यक होऊन बसली. त्यातून निवाड्यातील पक्षपात कमी होऊ लागला. चार लोकांना गुन्हा घडला की नाही याबद्दल काय ’वाटते’ यापेक्षा प्रत्यक्ष आणि निरपेक्ष पुराव्यांचे महत्व अधिक ठरते. साक्षीपलीकडे जाऊन ती साक्ष पुराव्याने सिद्ध करणेही महत्वाचे ठरले.

जातपंचायती रद्द करणे आवश्यक ठरत असताना, चार पंचांना काय ’वाटते’ यावर निवाडा करणे, हे उलट काळात मागे नेणारे ठरते.

-oOo-


हे वाचले का?

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

शेणकिड्यांचा समाज माझा

अनेक दिवसांनी फेसबुकवर काल थोडा वेळ घालवला नि पश्चात्ताप झाला. आपण किती क्षुद्र, नृशंस, किळसवाणे लोक आहोत याचे पुरेपूर दर्शन घडले. आपले संस्कार किडके आहेत, माणसे किडकी आहेत.

आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवत नाही. त्याच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम, ब्राह्मण किंवा दलित, आमच्या ग्रेट ओसाडवाडी पेक्षा दुय्यम असलेल्या उकिरडावाडीचा माणूस, स्त्री नव्हे मादी- मग ती आठ वर्षांची असो वा सत्तर वर्षांची, असे पाहायला शिकवतो. आपल्या बिनअकली सुमारपणाचे खापर आपण अन्य गटांवर फोडून कांगावा करतो.

आठ वर्षांच्या पोरीवर झालेल्या बलात्काराची बातमी ऐकूनही आमची पहिली चिंता असते ती आमचा नेता, आमचा धर्म, आमचा दगडी देवबाप्पा वाचवण्याची. असल्या किळसवाण्या मानसिकतेला धारण करणार्‍या कुडीला माणूस तर सोडा, जनावर म्हणणे हा जनावराचा घोर अपमान आहे.

आमची संस्कृती महान आहे म्हणणारे आपल्या नृशंस लोकांना पाठीशी घालताना आम्ही पाहतो, वर ’त्यांनी केले तेव्हा कुठे होतात’ हे आत्यंतिक मूर्खपणाचे- नव्हे क्रूरतेचे समर्थन देताना पाहतो. त्यांनी जे केले ते ते सारे तुम्ही केले तर क्षम्य मानावे असे असेल तर भिकारड्यांनो तुमची संस्कृती त्यांच्या सारखीच झाली, मग कुठल्या मसण्या श्रेष्ठतेच्या पिपाण्या नि पुंग्या वाजवता आहात.

DungBeetleFight

हिंदुत्ववादी ही क्रूर, माथेफिरु जमात सत्ताधारी झाल्यापासून हिंदू दहशतवाद - होय ’हिंदू द-ह-श-त-वा-द' - मुजोर झाला आहे. संस्कृतीचे नि सहिष्णुतेचे बडिवार माजवणारे हे हरामखोर; केवळ सत्ता हाती नव्हती म्हणून त्यांचे क्रौर्य नि गलिच्छ मानसिकता दबून राहिली होती, नि त्यालाच सहिष्णुतेचे आवरण चढवून ते विकत होते हे आता निर्विवादपणॆ सिद्ध झाले आहे.

मुस्लिम दहशतवाद अधिक पसरला कारण त्या धर्माचे अनुयायी अनेक राष्ट्रांत सत्ताधारी होते, इथे सत्ता नसल्याने हिंदू माथेफिरु तथाकथित सहिष्णुतेचे बडिवार माजवत आपल्या मनातील हिंसा, क्रौर्य दडवून ठेवत होते इतकेच. सत्ता अनुकूल होताच ते सारे त्यांनी मोकळे करून थैमान सुरु केले आहे.

सर्वात हताश करणारा मुद्दा हा की मी ह्याच लोकांच्या आसपास खेळलो वाढलो आहे. आपल्या आसपासचेच लोक इतके क्रूर, गलिच्छ नि हिंसक असतात हे समोर येते, तेव्हा तो धक्का अन्य कुठल्या गटाचे हेच दुर्गुण समोर येतात तेव्हा बसलेल्या धक्क्याहून कैकपट अधिक असतो.

उच्चशिक्षित, स्वत:ला जन्मजात श्रेष्ठ समजणारी ही जमात एका लहान मुलीच्या बलात्काराबाबतही प्रथम आपला धर्म, जात, नेता, देव आदिंना प्राधान्य देते तेव्हा तेंडुलकरांना, 'मला बंदूक द्या, यांना गोळ्या घालतो’ असे म्हणावे लागावे इतका तीव्र संताप का आला होता हे समजून येते.

हे मी हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलतो आहे म्हणजे मुस्लिम माथेफिरु नाहीत असे मुळीच नाही. जगभर पसरलेला मुस्लिम दहशतवाद मी पाहतोच आहे. पण त्यांच्या क्रौर्यापेक्षा मला माझ्याच माणसांच्या- त्याही तथाकथित संभावितांच्या, सभ्य गृहस्थांच्या मनातले हे विष अधिक संतापजनक वाटते. शेजार्‍याचं पोरगं गुंडगिरी करतं यापेक्षा माझं पोरगं गुंडगिरी करतं ही माझ्या दृष्टीने अधिक चिंतेची बाब असते. त्याच्या ढुंगणावर लाथा घालणं हे माझं काम आणि कर्तव्य दोन्ही आहे.

माझ्या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष हा गुंडांचा, धनदांडग्यांचा बटीक आहे हे मला ठाऊक आहेच. पण हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष हे अधिक क्रूर आहेत, कारण देशात घडणार्‍या गुन्ह्यांना, बलात्कारांना, सर्व प्रकारच्या कृष्णकृत्यांना यांचा अघोषित पाठिंबा आहे. यांचे पदाधिकारीच अमक्याचे मुंडके आणून द्या, तमकीचे नाक कापा, मुस्लिम स्त्रियांना कबरीतून बाहेर काढून त्यांच्यावर बलात्कार करा अशा घोषणा करतात. त्यांच्यावर कायदेशीर सोडाच, पक्ष पातळीवरही काही कारवाई होत नाही.

आणि माझ्या आसपासच्या पारंपरिक भाजप समर्थकांना- ज्यांत भाजप हा ’सुसंस्कृत’ पक्ष आहे म्हणून आम्ही वर्षानुवर्षे यांना पाठिंबा देतो म्हणणारे स्वयंघोषित संभावित अधिक आहेत, काडीची शरम तर वाटतच नाही वर ’त्यांच्या वेळी नव्हते का?’, ’तिकडे बघा की’ असे निलाजरे समर्थन ते करत असतात.  

जे अडाणी असंस्कृत असतात त्यांच्यातले क्रौर्य निदान नैसर्गिक असते, ते जसे आहे तसे दिसते; या सुसंस्कृतांचे क्रौर्य अधिक धोकादायक आहे. कारण ते त्या क्रौर्याला तत्त्वाचे लिंपण करुन त्याची अधिक रुजवणूक करतात, त्याचा व्यापार करतात. ते क्रौर्याचे तणकट देशभर पोचवतात नि त्याचे चोख दामही वसूल करतात.

मी हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलतो आहे म्हणजे इतर पक्षीयांनी खूष व्हायचे कारण नाही. नुकतेच समोर आलेले नगरचे उदाहरण हे सर्वपक्षीयांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारे आहे. शिक्षा झालेला महापौर काँग्रेसचा, खुनाचा आरोप असणारे राष्ट्रवादी आणि भाजपचे. ज्यांचे खून झाले त्या शिवसेनेची ख्यातीच खळ्ळ खटॅक ची. तिथे त्या प्रवृत्तीचे समर्थन करणारे - आज राजकीय दुरावा आला म्हणून - भाजपवर टीका करतात तेव्हा आपला दांभिकपणाच सिद्ध करत असतात. 

राष्ट्रवादीचा आमदार आरोपी आहे म्हटल्यावर ’कायद्याप्रमाणे होऊ द्या’ असे न म्हणता ’आमच्याविरुद्ध षड्यंत्र आहे ’ असे धाकटे पवार म्हणतात. फडणवीसांनी चालू केलेल्या क्लीन चिट वाटपाच्या कार्यक्रमापेक्षा हे काही वेगळे नसते.

राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या - आणि फेसबुकवर त्यांची फुकट फौजदारी करणार्‍या बिनडोकांचाही, कायद्यावर काडीचा विश्वास नसतो. कायद्याला आपले काम करु द्या हे फक्त विरोधकांना सांगण्यासाठी असते, ते आपल्यावर बंधनकारक नसते हे सर्वांनी आपल्या मनाशी जोखून ठेवले आहे. इतरांच्या पार्टीतले गुन्हेगार सत्तेसाठी बिनदिक्कत आत घ्यायचे नि बलात्कारासारखा गुन्हा केला की मग त्याच्या ’मूळ संस्कृती’वर खापर फोडायचे हा निलाजरा स्वार्थी प्रकार सर्वांनीच यथेच्छ वापरला आहे. सध्या भाजपचे फेसबुकी मोकाट गुंड याच तर्काचा आधार दोन्ही बलात्काराच्या संदर्भात घेत आहेत.

यात काँग्रेसचे नाव आले नाही हे काही भिकार मानसिकतेच्या माणसांनी मनात नोंदवलेले असेल, सरसावून ’त्यांना कसे अचूक विसरता’ म्हणत मी काँग्रेसी असल्याचे आरोप करायला सरसावलेही असतील. याच भिकार मानसिकतेने आपला देश इतका ’महान’ करुन ठेवला आहे. वर उल्लेख केलेल्या सार्‍या पक्षांतील गुन्हेगारांचा मूलस्रोत काँग्रेसच आहे. पण ते सध्या नि:सत्व, प्रभावहीन झाल्याने त्याबद्दल बोलून काही फायदाही नाही. तीच गत रस्त्यावरच्या पाणीपुरीवाल्यांना बडवून आपले शौर्य दाखवणार्‍या पोचट मनसेची.

माझा समाज भिकार आहे, माझ्या समाजाचे अध्वर्यू समजणारे त्याहून भिकार आहेत. माझा देव, माझा धर्म, माझी जात, माझा टिनपाट नेता, माझ्या घराच्या छपराचे ग्रेट पत्रे, माझ्या मोरीत लावलेला गटाराचा ब्रॅंडॆड पाईप, आमच्या वंशात वीस पिढ्या जपलेला दगड, माझ्या डोक्यावर असलेला एकमेव सोनेरी केस, ढमक्याच दुकानातून वर्षानुवर्षे खरेदी केलेला बनियन इत्यादि दळभद्री अभिमानाच्या स्थानांमध्ये आम्ही गुरफटले आहोते. माणूस व्हायला आम्हाला अजून कित्येक शतके जावी लागणार आहेत.

तोवर विरुद्ध जातीच्या/धर्माच्या पोरींवर बलात्कार करा, आमच्या धर्माच्या/जातीच्या पोरीवर झालेला बलात्कार हा आमच्या धर्मा/जातीवरचा आहे म्हणून कांगावा करा, ’त्यांची’ माणसे मारा, मारेकर्‍यावर सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार करा, ’त्यांची’ घरे जाळा, त्यांना’ आपल्या वस्तीत घरे मिळू देऊ नका. हे सगळॆ तुम्ही करालच. कारण तुमची तेवढीच लायकी आहे. उच्च संस्कृती म्हणून मिरवणारे डुक्कर आहात तुम्ही, चिखलात लोळणारे. माणूस व्हायची लायकी नाही तुमच्यात.

नाही, माझी संस्कृती, माझे संस्कार बिलकुल महान नाहीत. (त्यांचे बघा की म्हणत येणारे हे सिद्धच करतील.) माझ्या समाजात पसरलेल्या या किडक्या मानसिकतेचा मला बिलकुल अभिमान नाही. जगण्यातील सर्वच गरजा बाहेरुन आयात गोष्टींनीच भागवणारे आणि प्रत्येक नवा उपयुक्त शोध हा ’आमच्या बापाचाच माल होता’ हे कुठल्याशा मसण्या जुन्या ग्रंथाचा किंवा बिनडोक नेत्याचा हवाला देऊन स्वत:ला नि इतरांना पटवून देत ’आम्ही श्रेष्ठ’ म्हणून आपल्या मूर्खपणात मश्गुल राहणारे भारतीय माझे बांधव नाहीत, असूच शकत नाहीत. असल्या समाजाचा देश कधीच महान नसतो, होण्याची शक्यताही नसते.

-oOo-


हे वाचले का?

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सीसल आणि ससुल्या

तुम्ही कार्टुन्स पाहता की नाही ठाऊक नाही. वॉर्नर ब्रदर्स’च्या प्रसिद्ध बग्स बनी या पात्राचा सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये ससा-कासवाच्या त्या प्रसिद्ध शर्यतीची कथा सांगितली होती.

'बग्स बनी’ला मूळ कथा आधीच माहीत असल्याने, कुठेही विश्रांती घ्यायची नाही असे ठाम ठरवून तो ते साध्यही करतो. पण तरीही बिचारा ती शर्यत हरतोच...

CecilAndBugs

...त्याचे कारण असतो तो सीसल नावाचा चलाख टर्टल, ज्याच्याशी बग्सने शर्यत लावलेली असते. या सशाला दोन कासवांमध्ये काही फरक चटकन दिसत नसल्याचा फायदा घेत, शर्यतीच्या वाटेवर एकुण दहा कासवे उभी केलेली असतात. कितीही वेगाने धावला, कासवाला मागे टाकले तरी, पुढे जावे तो कासव पुन्हा आपल्या पुढेच पाहून बग्सला हे कसे घडते ते कळत नाही. शक्य तितका वेग वाढवत तो फिनिश लाईन पार करतो. बघतो तर सीसल तिथे आधीच हजर असतो. निमूटपणे पैजेचे दहा डॉलर बग्स त्याला देतो.

मूळ कथेमध्ये ’स्लो अ‍ॅंड स्टेडी विन्स द रेस’ हा संदेश दिला होता. पण या कार्टुन एपिसोडमध्ये सीसल टर्टल हे चक्क संख्याबळाचा आधार घेऊन चीटिंग करुन रेस जिंकते असे दाखवले आहे.

मूळची ससा-कासवाची कहाणी वॉर्नर ब्रदर्स अशा ’अर्वाचीन’ मूल्यव्यवस्थेत आणतात तेव्हा गंमत तर वाटतेच पण त्याचबरोबर ती अंतर्मुखही करते. 'स्लो अ‍ॅंड स्टेडी विन्स द रेस’ हे मूल्य म्हणून इतिहासजमा झाले आहे का? असा प्रश्न राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्वच क्षेत्रांतील सद्यस्थितीबाबत पडत असताना कदाचित ’चीटर्स विन द रेस’ हे नवे मूल्य आहे का अशी भीती भेडसावू लागते.

पण खरी गंमत पुढेच आहे. पुढेही पहिल्या दोन तीन एपिसोडमध्ये अशा तर्‍हेने सीसल टर्टल हे पात्रच हीरो म्हणून, मुख्य पात्र म्हणून पुढे आणायचे घाटत असताना प्रेक्षकांना मात्र पसंत पडला तो बग्स. मग पुढचे एपिसोड 'बग्स बनी’लाच केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेले आणि त्यांनी इतिहास घडवला. 'डिस्ने'च्या मिकी माऊस, डोनाल्ड डक, प्लूटो कुत्रा आणि गूफी यांच्याप्रमाणेच 'वॉर्नर ब्रदर्स’च्या बग्स बनी आणि त्यांच्या सोबत आलेल्या पोर्की पिग, डॅफी डक आणि एल्मर फड यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.

वॉर्नर ब्रदर्सने सीसल प्रमाणेच कासव जिंकावे अशा तर्‍हेने रेसचे नियोजन केले होते... पण त्यांनाही अपेक्षित नसताना फिनिश लाईन पार केली ती बग्सनेच!

म्हणजे आज जरी 'चीटर्स विन द रेस’ असे असे दिसत असले तरी जर प्रेक्षकांनी ठरवले तर बग्स शर्यत जिंकू शकतो. आपण संख्याबळापुढे, फसवणुकीपुढे मान तुकवायची की ठामपणे ताठ मानेने उभे रहायचे हे मात्र ठरवायला हवे.

आणि हो, मुख्य म्हणजे सशाने दोन कासवांमधील फरक नीट ओळखायला हवा!
---

डिस्ने असोत की वॉर्नर ब्रदर्स, त्यांच्या साध्या कार्टुन्समधूनही छोट्यांबरोबर मोठ्यांसाठीही काही ठेवून दिलेले असते. त्यामुळे प्रत्येक एपिसोड हा तितक्याच उत्सुकतेने पाहिला जातो, लहान-मोठे कुणीही तो एन्जॉय करु शकतात.

फक्त रंग, आकार आणि स्थान बदलून निरनिराळे ’नवे’ विलन निर्माण करुन एका ठोशात त्यांना लोळवणारा हास्यास्पद हीरो निर्माण करणार्‍या आपल्याकडील एनिमेटर्सना कुणीतरी हे सांगायला हवे.

- oOo -


हे वाचले का?