बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

राज्यांतील निवडणुका आणि मोदीलाट

देशाच्या विधानसभांमधून भाजप कसा आता हद्दपार झाला आहे म्हणून ’मोदी लाट हटली’ किंवा ’मोदींची कामगिरी पाहा’ म्हणणार्‍यांनो जरा थांबा.

मोदींचे मूल्यमापन मोदी ज्या भूमीवर लढतात तिथेच व्हायला हवे.

ModiWinsAgain

पोटनिवडणुकांमध्ये अगदी उ.प्र.च्या मुख्यमंत्री नि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पराभूत झाला होता, पण २०१९ च्या मध्यावधी निवडणुकांत उ.प्र. मध्ये पुन्हा भाजपने ९०% जागा जिंकल्या.

राजस्थान, म.प्र., छत्तीसगड मध्येही विधानसभा गमावूनही मोदींच्या भूमीवर म्हणजे लोकसभा निवडणुकीत जवळजवळ १००% यश मिळवले आहे.

गंमत म्हणजे महाराष्ट्राचे हे नाट्य रंगलेले असताना राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थातून काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारत २३ ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन केले, तर भाजप फक्त सहा ठिकाणी सत्ताधारी झाला.

गुजरातमध्ये काही काळापूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून राजीनामा देऊन आलेले ठाकोर समाजाचे नेते अल्पेश ठाकोर पराभूत झाले होते...

थोडक्यात कुठल्या निवडणुकीत मोदींकडून आशा ठेवायची नि कोणत्या नाही याचे गणित विश्लेषकांपेक्षा जनता अधिक काटेकोरपणे करताना दिसते. तेव्हा चिलॅक्स डूड.
---

भक्तांनो,

२०१४ लोकसभा निवडणुकीत सेना आमचा बालमित्र, विधानसभा निवडणुकीत सेना दगाबाज म्हणून अफवामशीन चालवा; पुढे २०१९ लोकसभेपर्यंत सतत काडीमोडाच्या उंबरठ्यावर असल्यासारखे कधी मिठ्या कधी ठोसा असे संभ्रमात; लोकसभेत पुन्हा सेना कित्ती गुणी गं बाय आमच्या हिंदुत्वाची लेक, तिला बोलू नका म्हणून विरोधाची तलवार- म्यान नाही तरी उगाच आपली गालावर टेकवल्यासारखी वापरायची ती विधानसभेपर्यंत. आता युतीचे सरकार येत नाही म्हणून सेनेच्या नावे शंख नि अफवामशीन पुन्हा जोरात चालू. आता अजित पवार आपल्या बाजूला आले धावाधाव करुन त्यांच्या मुतण्याच्या कमेंट ’ओन्ली मी’ करा, तीन दिवसात परत गेले की परत पब्लिक करा... अरे तुमच्यापेक्षा वातकुक्कुटे दिशा बदलण्यास थोडा जास्तच वेळ घेत असतील. नेत्यापायी आपली अब्रू का वेशीवर टांगताय?

सेनेकर्‍यांनो,

तुमची भूमिकाही काही वेगळी नाही. भक्तांच्या सारखी, तुमचा नेता नि पक्ष वेगळा इतकेच. दुसरे असे की फार नाच करण्यापूर्वी, उद्धव ठाकरे अद्याप विधिमंडळाचे सदस्य नाहीत, त्यांना सहा महिन्यात निवडून यावे लागणार आहे हे विसरु नका. ते विधानपरिषदेवर गेले तर ’मागच्या दाराने मुख्यमंत्री’ आणि त्यांच्यासाठी कुणी राजीनामा देऊन विधानसभेची पोटनिवडणूक घेतली तर ’निवडणूक लादल्याचा आरोप’ भाजपकडून होणार आहे त्याचा विचार करा. (भाजपवाले आरोप करण्यात एकदम तयार. निव्वळ तेवढ्या तेवढ्या बळावर दोन लोकसभा निवडणुका जिंकल्यात त्यांनी.) शिवाय पोटनिवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता विसरु नका. तसे झाले आज जितका उन्माद आहे त्याच्या दसपट वेगाने भक्तांप्रमाणेच बिळात पळावे लागेल. (शक्यतांचा विचार करायची आणि आपल्या गैरसोयीचे घडणारच नाही असा फाजिल आत्मविश्वास टाळण्याची सवय लावून घ्या.)

राष्ट्रवादीक‍र्‍यांनो,

थोरले पवार निष्णात राजकारणी आहेत हे सर्वांना माहित आहे, ते पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. पण या एका यशाने लगेच पंतप्रधानपदाचे उमेदवार, राष्ट्रपती, स्टार वॉर्सच्या डार्थ व्हेडरला पराभूत करण्यास सक्षम असा एकमेव योद्धा वगैरे कल्पनेचे वारू फार ताणू नका. नेता मोठा असला तरी पक्षाला कधीही महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करता आलेले नाही हे विसरु नका. ही किमया ममता बॅनर्जी, मायावती, नवीन पटनाईक (४ वेळा), चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या बळाचा विचार करा नि विस्ताराच्या दृष्टीने राष्ट्रवादी कुठे नि का कमी पडली याचे मूल्यमापन करा.

काँग्रेसवाल्यानो,...

नाही नको. मी इथे अगदी अमेरिकेच्या एखाद्या पक्षाबद्दल वा नेत्याबद्दल लिहिले तरी हटकून खाली ’ते काँग्रेसवाले तर...’ चा प्रतिसाद-पो टाकणारे अवतीर्ण होतातच. मग हे कष्ट त्यांनाच घेऊ द्या. कायै लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नये असे मला प्रामाणिकपणे वाटते. आणि मी काँग्रेसवर लिहिलेच तर ’ते कम्युनिस्ट तर...’ किंवा ’समाजवादी तर...’ म्हणून पो टाकणारच आहेत. त्यापेक्षा त्यांना काँग्रेसवरच पोटभर पो टाकू द्या. आयटीसेलकडून त्यांना रसदही मिळते त्यावर. काहीतरी बरे लिहितील.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा