रविवार, २६ जानेवारी, २०२०

जग जागल्यांचे ०२ - रोशचा रोष : स्टॅन्ले अ‍ॅडम्स

व्यवस्था आणि माणूस << मागील भाग
---

२००९ मध्ये भारतात ’स्वाईन फ्लू’चा उद्रेक झाला. या आजाराने झालेल्या मृत्यूंची संख्या हजारांत पोचली. यावर परिणामकारक ठरणारे एकच औषध होते, त्याचे नाव ’टॅमिफ्लू’. हे औषध १९९९ साली बाजारात आणले गेले, आणि उत्पादकाचा त्यावरील एकाधिकार संपण्याच्या सुमारास या आजाराचा जगभर उद्रेक झाला. या योगायोगाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला होता. या औषधाची निर्माती होती स्वित्झर्लंड-स्थित ’हॉफमान-ला-रोश’, जिच्याबद्दल असा संशय घेण्यास पुरेसा इतिहास होता.

संशोधन-खर्च भरून येण्यासाठी औषध निर्मिती कंपन्यांना औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. ब्रिटनमध्ये व्हॅलियम आणि लिब्रियम या उपशामक (tranquilizers ) औषधांचे रोशकडे असलेले एकाधिकार संपल्यावरही रोशने अन्य उत्पादकांना त्याचे उत्पादन-अधिकार देण्याच्या ब्रिटिश स्पर्धा आयोगाच्या निर्णयाला विरोध केला. स्पर्धक उत्पादकांना ग्राहक मिळू नये यासाठी बदनामीपासून, उत्पादन फुकट वाटण्यापर्यंत अनेक उपाय वापरले. इतकेच काय बेरोजगारीसाठी प्रख्यात भागात उत्पादन केंद्र उभारण्याची लालूच दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही केला.

देशोदेशी असलेल्या आपल्या उपकंपन्याचा आणि उत्पादन केंद्रांचा वापर करुन रोश आपल्या नफ्याचे नियोजन करण्यासाठी 'ट्रान्स्फर प्राईसिंग'चा (Transfer Pricing) वापर करत असे. जिथे तीव्र स्पर्धा आहे तिथे दर कमी ठेवून, तर जिथे एकाधिकार आहे तिथे चढ्या दराने विक्री करतानाच नफा कमी दाखवण्यासाठी एकाच उत्पादनाची स्थानिक कंपन्यांना वेगवेगळ्या दराने विक्री केली जाई. उत्पादकही रोशच असल्याने विकत घेताना दिलेला पैसाही पुन्हा मूळ कंपनीकडेच जाई. पण स्थानिक कंपनीचा नफा नगण्य राही. स्वित्झर्लंडसारख्या करचुकव्यांच्या नंदनवनात रोशला कर भरावा लागत नसल्याने, हा पैसा बिनबोभाट त्यांच्या तिजोरीत जमा होई.

StanleyAdams

या रोशच्या व्हेनेझुएलामधील कंपनीत सॅम्युअल अ‍ॅडम्स हा ब्रिटिश नागरिक १९६७-६८ मध्ये रुजू झाला आणि कंपनीच्या कारभाराची त्याला जवळून ओळख होऊ लागली. रोश हजार हातांनी फायदा लाटत असताना याविरुद्ध कोणीच आवाज उठवत नव्हतं. रोशने आपल्या व्यवसायवृद्धीसाठी ’युरपियन इकनॉमिक कमिटी’ (ई.ई.सी.)शी करार केला आणि अॅडम्सला ही संधी मिळाली. २५ फेब्रुवारी १९७३ रोजी ई.ई.सी.च्या स्पर्धानियमन विभागाच्या आयुक्तांना रोशच्या गैरकारभाराबद्दल माहिती देणारं पहिल पत्रं पोस्ट केलं नि त्याच्या लढ्याला प्रारंभ झाला. पुढे आपल्या अधिकाराचा वापर करून ई.ई.सी.चे अधिकारी मागतील ती माहिती गोळा करून त्याने वेळोवेळी ती त्यांना पुरवली.

उल्लेखनीय बाब म्हणजे ई.ई.सी.चे तपास अधिकारी स्वत: स्विस सीमेच्या आत कधीही प्रवेश करत नसत. स्वित्झर्लंड हा ई.ई.सी. चा सदस्य देश नसल्याने आवश्यक त्या अधिकृत कागदपत्राशिवाय त्यांना अशी चौकशी करणे, माहिती मागवणे शक्य नव्हते. आणि अशी परवानगी स्विस सरकारकडे मागणे, म्हणजे रोशला सावध करण्यासारखेच होते. त्यामुळे जी माहितीची देवाणघेवाण होत होती, ती स्विस कायद्यानुसार एका प्रकारे बेकायदेशीर ठरत होती. त्यामुळे स्वतः स्वित्झर्लंडमधे येऊन अ‍ॅडम्सला भेटणं म्हणजे अटकेला आमंत्रण दिल्यासारखेच होते. पण या धोक्यापासून त्यांनी अ‍ॅडम्सला मात्र सावध केले नाही.

१९७४ च्या अखेरीस स्विस पोलिसांनी अ‍ॅडम्सला अटक केली. स्विस व्यवस्था ही उद्योगांची बटीक असल्याने अ‍ॅडम्सची सारी चौकशी ही रोशच्या संपूर्ण नियंत्रणाखालीच चालू होती. अ‍ॅडम्स जरी ब्रिटिश नागरिक असला, तरी अन्य देशातील नागरिकांना मिळणारी अ‍ॅम्नेस्टी स्विस कायद्यात नाही. दुसरा गंभीर मुद्दा म्हणजे स्वित्झर्लंडमधे मोठ्या उद्योगांवर द्रोह हा देशाशी केलेला द्रोह मानला जातो. त्यामुळे अ‍ॅडम्सवर स्विस कायद्याच्या ’व्यापारविषयक गुप्तता अटींचे उल्लंघन आणि राष्ट्रद्रोह या दोन कलमांखाली आरोप ठेवण्यात आला.

त्याच्या पत्नीच्या चौकशी दरम्यान एका पोलिस अधिकार्‍याने अ‍ॅडम्सला किमान वीस वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते हे सूचित केले. याशिवाय त्याला रोशच्या बालेकिल्ल्यात, म्हणजे बाझल् येथे हलवण्यात येणार असल्याचं समजले. या दोन बातम्या ऐकून खचलेल्या तिने दुसर्‍या दिवशी पहाटेच गळफास लावून आपली इहलोकीची यात्रा संपवली. इथून अ‍ॅडम्सची कौटुंबिक परवड चालू झाली. पुढे त्याची एक मुलगीही उपचाराअभावी दगावली.

स्विस तुरुंगातून जामिनावर बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेला पैसा युरपिय आयोगाने आश्वासन देऊनही दिला नाही. त्याला झालेला मानसिक त्रास, बुडालेलं उत्पन्न, कौटुंबिक आपत्ती इ. बाबत भरपाई पोटी सुमारे ’पाच लाख पौंड’ देण्यात यावेत असे कायदेतज्ञांचे मत होते. पुढे नुकसानभरपाई तर सोडाच जेमतेम वीस हजार पौंड ’मानवतेच्या दृष्टिकोनातून’ देऊन आयोगाने आपले शेपूट सोडवून घेतली. इतकेच नव्हे तर, ’अॅडम्स याने ई.ई.सी.ला रोश संबंधी माहिती पुरवली’ ही बातमीही अॅडम्स ज्याच्याबरोबर संपर्कात होता त्या ’विली श्लीडर’नेच रोशला दिली! अॅडम्सने दिलेली कागदपत्रे ई.ई.सी.ने रोशच्या प्रतिनिधींना दाखवली, एवढेच नव्हे तर त्यांची छायाचित्रेही घेऊ दिली.

व्यवस्थांची साखळी पूर्ण झाली होती! रोशच्या विरुद्ध अॅडम्स आयोगाला पुरावे देत होता, आयोगाचा अधिकारी ही बातमी रोशला देत होता, रोश आपला स्वार्थ जपण्यासाठी स्विस सरकारचा वापर करून घेत होती, स्विस न्यायव्यवस्था स्विस सरकारच्या तालावर नाचत होती आणि एका व्यक्तीसाठी आपले व्यापारी संबंध पणाला लावण्यास युरपिय आयोग कां-कूं करत होता. एका व्यक्तीच्या विरोधात एवढ्या व्यवस्था उभ्या राहिल्या होत्या.

अ‍ॅडम्सच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या ब्रिटिश मजूर पक्षाचे नेते जॉन प्रेस्कॉट यांच्या चिकाटीमुळे स्विस सरकारशी आणि रोशशी असलेला संघर्ष माफक ठेवू पाहणार्‍या आयोगाला नमते घ्यावे लागले. या सार्‍या गोंधळाचे निराकरण करण्यासाठी नेमलेल्या आयोगाने दिलेल्या ’दोनेझ’ अहवालाने अ‍ॅडम्सवरील सारे आरोप पुसून टाकले. १९८६ साली अ‍ॅडम्सने आपल्या आयुष्याचा लेखाजोखा ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’ या पुस्तकातून मांडला. १९८५ मध्ये त्याच्या संघर्षावर ’अ साँग ऑफ युरप’ नावाचा एक टीव्ही-पटही तयार करण्यात आला होता.

एके काळी सुखवस्तू कुटुंबात जन्मलेला आणि लठ्ठ वेतनाचा रोजगार असलेल्या अ‍ॅडम्सला आर्थिक चणचण संपवण्यासाठी पत्नीच्या इन्शुरन्सच्या पैशाचा आधार घेण्याची वेळ आली. तिसर्‍या पत्नीच्या हत्येसाठी मारेकरी घातल्याबद्दल १९९४ साली त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली.

(मुख्य आधार: ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’, १९८७. राजहंस प्रकाशन)

>-oOo-

( पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी, दिनांक २६ जानेवारी २०२० )

    पुढील भाग >> जिन्हे नाज़ था हिंद पर... : सत्येंद्र दुबे


हे वाचले का?

रविवार, १२ जानेवारी, २०२०

जग जागल्यांचे ०१ - व्यवस्था आणि माणूस

WhistleblowerTitleBar

मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासून माणूस कळपांमध्ये अथवा टोळ्यांमध्ये राहात असे. त्याच्या आयुष्यातील आहार आणि निद्रा वगळता इतर सर्व कामे, जसे शिकार, अन्नवाटप, संरक्षण, अपत्य संगोपन ही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या सामूहिक सहभागानेच होत असत. शिकारीसारखे काम करत असताना हाकारे घालणे, कळप उठवणे, ठार मारणे, शिकार वस्तीच्या स्थानी वाहून नेणे, तिचे वाटप करणे... ही आणि यापुढची कामे विविध व्यक्तींना वाटून दिलेली असत. एका कामाच्या पूर्तीसाठी यात श्रमविभागणीचे तत्त्व अंगिकारले जात असे.

पुढे शिकारीचे एक कार्य जर छोटी छोटी उप-कार्ये साध्य केल्याने साध्य होत असेल तर व्यक्तीच्या कार्यकौशल्याच्या एकत्रीकरणाने मोठी कार्ये सिद्ध करता येतील, असा शोध माणसाला लागला. या श्रम-संमीलनाचा तत्वाचा वापर करुन माणसांनी पुढे यापूर्वी कल्पनाही न केलेली मोठी कामे सिद्धीस नेण्यास सुरुवात केली. या कार्यांचा विस्तार आणि सहभागी व्यक्तींची संख्या जसजशी वाढली तसतशी अशा कार्यसिद्धीसाठी नियंत्रक यंत्रणेची गरज निर्माण झाली. केवळ टोळीप्रमुख आणि भगत असलेल्या टोळ्यांना मग राज्यव्यवस्था आणि धर्मव्यवस्था मिळाली. याशिवाय उत्पादनव्यवस्था, व्यापारव्यवस्था, बाह्य धोक्यांपासून संरक्षण देणारी सैन्यदलासारखी व्यवस्था, अंतर्गत नियमनासाठी न्यायव्यवस्था... अशा अनेक व्यवस्था हळूहळू उदयाला आल्या.

परंतु यापूर्वी मनुष्याने न कल्पिलेली अशी एक महत्त्वाची गोष्ट यातून घडली ती म्हणजे, अशा व्यवस्थांचे स्वतःचे असे काही हक्क आणि स्वार्थ निर्माण झाले! हे हक्क पुढे भस्मासुरासारखे त्याच्या जन्मदात्यावरच उलटले. मनुष्याचे हित हा मूळ हेतू मागे पडून, व्यवस्थेचे हित जपण्याच्या दृष्टीने माणसाची पावले पडू लागली. एखाद्या बुद्धिभेद केलेल्या गुलामाप्रमाणे या व्यवस्थांचे हित जपण्यासाठी माणसाने स्वत:च्या हितावर पाणी सोडले, प्रसंगी त्यासाठी शस्त्रही हाती घेतले.

माणसांच्या टोळ्यांना नीतिनियमांची चौकट देऊन त्या जमावाचे समाजात रूपांतर करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या धर्मव्यवस्थेने ’स्वधर्मे निधनं श्रेय:’ सारख्या कल्पना माणसाच्या मनात रुजवल्या आणि ’माणसासाठी धर्म’ या मूळ कल्पनेकडून ’धर्मासाठी माणूस’ या कल्पनेकडे माणूस केव्हा सरकला. त्या व्यवस्थेचा धिक्कार करत उभ्या राहिलेल्या पर्यायी व्यवस्थेनेही तिच्याच पावलावर पाऊल टाकून हिंसेचे माजवलेले थैमान रशिया, चीन, युगोस्लाव्हिया, पूर्व जर्मनी आदी देशांतून पाहिले.

औद्योगिक क्रांतीपश्चात भांडवली व्यवस्था ही धर्म नि राज्यव्यवस्थांइतकी प्रभावी बनली आहे. तिचा अविभाज्य भाग असणार्‍या उत्पादक व्यवस्थेचे मूळ उद्दिष्ट माणसाच्या गरजा भागवण्यासाठी उत्पादन असे असणे अभिप्रेत होते. परंतु तिने ’नफ्यासाठी उत्पादन’ असे नवे उद्दिष्ट स्वीकारले, जे ग्राहकाच्या नव्हे तर व्यवस्थेच्या हिताचे संरक्षण करणारे आहे. उपभोग्य वस्तू ही क्रयवस्तू झाल्यापासून तिचा पुरवठा अधिकाधिक नफा मिळेल अशा ठिकाणी प्राधान्याने होऊ लागला. त्यातून कुणाची गरज भागवली जाते, मुळात भागवली जाते का, याच्याशी उत्पादकाचे सोयरसुतक उरले नाही.

एकदा उत्पादनव्यवस्था उभी राहिली की तिला सतत बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून गरजा ’निर्माण केल्या’ जाऊ लागल्या. त्यात एका बाजूने ग्राहकांसाठी जाहिरातव्यवस्था तर वितरक नि विक्रेत्यांसाठी मार्केटिंग आणि लॉबिंग सुरु झाले. त्याचवेळी स्पर्धक उत्पादकांचे खच्चीकरण करण्यासाठी जाहिरातव्यवस्थेनेच (अप-) प्रचारव्यवस्थेची झूल पांघरली. राज्यव्यवस्था जमिनीवर युद्ध खेळत असत, अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकांनी ते व्यापाराच्या मैदानावर खेळायला सुरुवात केली. नैतिक अनैतिक मार्गांनी नफा वाढवण्याची चढाओढ सुरु झाली. अन्य दोन व्यवस्थांच्या ठेकेदारांनाही यात ओढून घेतले. आजच्या जगात अर्थसत्ता ही देशोदेशीच्या राज्यव्यवस्था आणि धर्मव्यवस्थांनाही कह्यात ठेवताना दिसते आहे. काही प्रमाणात या दोन व्यवस्थाही तिच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्या तरी बव्हंशी त्या अर्थसत्तेशी जुळवून घेण्याचेच धोरण स्वीकारताना दिसतात.

व्यवस्थांची निर्मिती ही मूलत: माणसाच्या हिताची कार्ये सिद्धीस नेण्यासाठी झाली. पण आता उलट दिशेने माणसाच्या हिताचे काय हे या व्यवस्थाच निश्वित करू लागल्या आहेत. तीनही प्रमुख व्यवस्थांची अनुषंगे या ना त्या प्रकारे माणसावर अधिराज्य गाजवत असतात. व्यवस्थेकडून माणसाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषण केले जात आहे. सर्वसामान्य माणसापेक्षा व्यवस्थेचे हित मोठे आणि व्यवस्थेच्या हिताहून तिच्या संचालकांचे हित अधिक मोठे, अशी उतरंड निर्माण झाली आहे. या उतरंडीत तळाला राहिलेल्या सामान्य माणसाचे हित साधले जाण्याची शक्यता कमी कमी होत जात आहे.

अशा वेळी या व्यवस्थांच्या विरोधात सामान्य माणसापुढे फार पर्याय नसतात. लोकशाही असलेल्या देशात - आभासी का होईना, राज्यव्यवस्थेत आपले प्रतिनिधी निवडण्याचे कणभर स्वातंत्र्य राहते. अर्थव्यवस्थेतही ते राज्यव्यवस्थेप्रमाणेच आभासीच राहते. गरजेसाठी आवश्यक वस्तूचे उत्पादन ही पद्धत मोडीत काढून उपलब्ध उत्पादनांतून गरजेला जास्तीतजास्त अनुकूल वस्तूची निवड इतपत स्वातंत्र्यच माणसाला उरत असते. धर्मव्यवस्थेमध्ये तर त्याचे अस्तित्वच उरत नाही, ती माणसाचे एकतर्फी नियंत्रण करताना दिसते.

व्यवस्थांचे हे नियंत्रण सहनशक्तीबाहेर वाढले की माणसे बंड करतात. व्यवस्थांकडून अशा बंडांचे दमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असतो. राज्यव्यवस्थेविरोधातील आणि धर्मव्यवस्थेविरोधातील बंडांचा इतिहास अगदी शालेय जीवनापासून आपण अभ्यासत आलेलो आहोत. परंतु अर्थव्यवस्थेतील अन्यायकारी, अनैतिक अशा गोष्टींविरोधातील बंडांबाबत मात्र आपण एकतर अज्ञानी वा उदासीन तरी असतो किंवा त्या बंडांना ’विकासविरोधी’ म्हणत व्यवस्थेचीच बाजू लढवत असतो.

त्यामुळे असे लढे लढणारे सैनिक बहुधा एकांडॆ लढतात. ज्यांच्याविरोधात लढतात त्यांच्याकडून ’स्पर्धकांचे हस्तक’ म्हणून हिणवले जातात. विरोधातील व्यवस्थेचे बळ मोठे असेल तर ते बहुधा आयुष्यातून उठतात, व्यवस्थेने केलेल्या बदनामीचे जोखड घेऊन वंचित आयुष्य जगतात. तुरुंगाच्या कोठडीत सडत पडतात किंवा पार कणा मोडलेल्या अवस्थेत बाहेर येऊन भकास आयुष्य जगतात. ज्यांच्यासाठी ते लढले, त्या सर्वसामान्य माणसाला मात्र त्याच्या आयुष्यापेक्षा चित्रपटातील एखाद्या नटीच्या आयुष्यातबद्दल कैकपट अधिक कुतूहल असते.

अशा काही माणसांचे म्हणजे व्हिसलब्लोअर्सचे अर्थात ’जागल्यांचे’ जग धुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे. ते या स्तंभातून समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी, दिनांक १२ जानेवारी २०२०)

    पुढील भाग >> रोशचा रोष: स्टॅन्ले अ‍ॅडम्स


हे वाचले का?

दाद द्या अन् शुद्ध व्हा

जेमतेम सकाळ. चहा घेऊन डोळ्यातली उरली-सुरली झोप घालवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता नि फोन वाजतो. नंबर अपरिचित. सोशल मीडियाबाहेर संपूर्ण अ‍ॅंटि-सोशल असलेल्याने अपरिचित क्रमांकावरुन फोन येण्याची शक्यता जवळजव्ळ शून्य. तेव्हा बहुधा राँग नंबर असावा असे गृहित धरुन अनिच्छेनेच उचलता. बोलणारा नाव नि गाव सांगतो नि आपला तर्क बरोबर ठरणार याची खात्री होऊ लागते. पण बोलणारा अचानक परिचित विषयावर बोलू लागतो नि तुमची झोप ताबडतोब पळून जाते.

फोन करणारी व्यक्ती पंढरपूर जवळच्या एका गावातील शेतमजूर असते, दलित चळवळीत सक्रीय असणारी आणि स्वत: पूर्वी 'लोकमत’सारख्या वृत्तपत्रांतून थोडेफार लेखन केलेली. पण कौटुंबिक कारणाने शहराकडून पुन्हा गावाकडे परतलेली. तुमचा लेख सकाळी वाचून तातडीने फोन करुन तो आवडल्याचे सांगतानाच त्या अनुषंगाने त्यांचे स्वत:चे विचार मांडत जाते.

व्यवस्थेने केलेल्या शोषणाचा अनुभव लहान गावांतून राहणार्‍या दलित समाजातील व्यक्तीइतका दाहक कुणाचा असणार. पण आपले लेखन जरी अर्थकारणाशी निगडित असले तरी त्याबद्दलची भूमिका ही सामाजिक दमनाबाबतही कशी लागू पडते हे सांगणारी ही व्यक्ती नकळत आपण त्याच्या दृष्टीशी, अनुभवाशी कुठेतरी हलकासा धागा विणून आलो आहोत हे दाखवून देते. संपूर्ण शहरी आणि आता सुखवस्तू आयुष्य जगणारा मी कुठेतरी त्याच्या जाणिवेला स्पर्श करुन गेलो, याचा अर्थ आपण अगदीच असंवेदनशील नाही ही जाणीव सुखावणारी.

Appreciated

पण या स्तुतीसुखाचा भर ओसरल्यावर अचानक अशी जाणीव झाली की, असे वाचल्या-वाचल्या तातडीने सोडा, पण नंतरही एखादे लेखन आवडल्याचे आपण कुणाला कधी कळवले आहे का? उत्तर नकारार्थी आले. म्हणजे एखादा लेख, पुस्तक, गाणे, कविता, चित्रपट, मालिका वा एपिसोड आवडल्याचे गांवभर अनेकांना - कदाचित पुन्हा पुन्हा- सांगत फिरलो असेन, पण मूळ कर्त्याशी संपर्क करुन आवर्जून आपला आनंद वा प्रतिसाद त्याच्यापर्यंत थेट कधी पोचवला होता? एकदाही नाही! फारतर प्रतिसाद लिहून, रिव्यू स्वरुपात कळवला असेल, पण थेट संवाद नाही.

हा माझा अंगचोरपणा म्हणायचा की लेखनातील नेमकेपणा संवादात साधत नाही या अडचणीवर माझ्यातल्या ओसीडीवाल्याने काढलेला मध्यममार्ग? त्यात आता सोशल मीडियाने धुमाकूळ घातल्यावर मूळ लेखक/कर्त्यालाही कळवायची तसदी घेतली जात नाही. सरळ भिंतीवर टाकून दिले की काम झाले. वाचतील काय पाच-पंचवीस लोक वाचायचे तर.

हातात लेखणी घेऊन जगाला शिकवायला निघालेल्या व्यक्तीला सकाळी सकाळी जमिनीवर आणणारा असा अनुभव आवश्यकच असतो. तान्हाजी चित्रपटाचा इतिहासभक्तीचा धुमाकूळ चालू असताना, वर्तमानातील महाराष्ट्राच्या एका लहानशा गावात राहणार्‍या या तान्हाजीची थेट नाही पण फोनभेट अधिक मोलाची असते.

आरती प्रभूंनी सांगून ठेवले आहे. ’ही निकामी आढ्यता का?, दाद द्या अन् शुद्ध व्हा’. त्यांचे बोल मनावर घ्यायला हवेत.

-oOo-


हे वाचले का?

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

मालवीयांची ’टुकडे टुकडे गँग’ आणि जेएनयू

जेएनयू म्हटले मालवीय आणि त्यांच्या टुकडे टुकडे गँगची टेप ’देशद्रोही घोषणा’ या दोन शब्दांवर अडकते.

चला, क्षणभर मान्य करु की कन्हैया आणि त्याच्या काही साथीदारांनी देशद्रोही घोषणा दिल्या...

चला, क्षणभर मान्य करु की जेएनयू मध्ये दरवर्षी असे देशद्रोही विद्यार्थी शिक्षण घेत असतात...

JNUProtests
Photo: Shirin Rai.

ज्यांना मारहाण झाली त्यातील किती जणांनी या घोषणा दिल्या होत्या असे तुमचे म्हणणे (तुमचे म्हणणे हं, पुरावेदेखील मागत नाही मी.) आहे? जर त्यातील निदान काही जणांनी (माझ्या मते एकानेही नाही, कारण जिथे मालवीय आणि त्यांची टुकडे टुकडे गँग बूच बसल्यासारखी अडकली आहे तो प्रसंग भूतकाळातला आहे.) तरी नसावी, बरोबर ना? मग त्यांना मारहाण झाली त्याचे काय? आणि शिक्षकांचे काय? त्यांनीही त्या घोषणा दिल्या होत्या? की ’तुझ्या आज्याने माझे पाणी उष्टावले’ म्हणून मी त्याचा पुरा वंश खणावा या मताचा आहे म्हणून सारे विद्यापीठ दोषी ठरते? आणि समजा ठरले तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करायची नाही? सरकार आणि पोलिस तुमचेच आहेत ना? ते अकार्यक्षम आहेत म्हणायचे आहे का? उद्या पुणॆ विद्यापीठात चार दोन लोकांनी अशा देशद्रोही घोषणा दिल्या म्हणून ते ही उध्वस्त करायचे का?

संशयित (आरोपी नाही, गुन्हेगार असल्याचे सिद्ध होण्याचा प्रश्नही नाही) बलात्कार्‍याला उडवलेल्या पोलिस अधिकार्‍यांचे समर्थन केले तुम्ही. मग हे दोन्ही एकत्र करुन ज्या पक्षात असे संशयितच काय पण आरोपी असणारे आमदार, खासदार आहेत त्या पक्षातील कुणालाही (तो आरोपी वा संशयित असो वा नसो) जेएनयू प्रमाणॆ नुसती मारहाणच नव्हे तर हत्या करणॆही समर्थनीय असेल ना? कुलदीप सेंगर पासून निहालचंद पर्यंतची नावे तुमच्या ओळखीची असतील (इतर पक्षांनाही तोच न्याय लावावा लागेल हे तुम्ही ’तिकडे बघा की’ हा नेहमीचा हर मर्ज की दवा डिफेन्स आणण्याआधीच सहमत म्हणून टाकतो.) तुमच्या न्यायाने या पक्षातील कुणालाही मारहाण नव्हे त्याची हत्या करण्याचा हक्कही मला आहे हे मान्य आहे ना?

चला हे ही मान्य करु की कायदेशीर मार्गाने न्याय मिळणार नाही असे तुमचे म्हणणे आहे. म्हणजे जर कुणाला असे वाटले की कायदेशीर मार्गाने न्याय मिळणार नाही तर त्याने कायदा हातात घेऊन विध्वंस मारहाण करणे योग्य नसले तरी समर्थनीय आहे असे तुमचे म्हणणे आहे? असणारच. पन्नास जणांनी घेरुन मारलेल्या माणसाच्या जिवापेक्षा त्याच्याकडे गोमांस होते की नव्हते यावर मैला मैलाचे समर्थन देणारी अवलाद तुमची.

सगळॆ डावे देशद्रोही आहेत, सगळे जेएनयू डाव्यांनी भरलेले आहे, म्हणून पुरे जेएनयू उध्वस्त करणे योग्य आहे मग भले त्यातील डावे नसलेले, देशद्रोही घोषणा न देणारे बळी पडले तरी बेहत्तर असे तुमचे म्हणणे असेल तर...

...'सारी लोकशाही व्यवस्थाच देशद्रोही आहे, म्हणून ती उध्वस्त केली पाहिजे आणि त्यात तिच्याशी निगडित सर्व व्यक्तींना नष्ट करणे आवश्यक' मानणारे नक्षलवादीही तुमच्यासारखेच म्हणत आहेत, ते तुमचे भाऊबंद म्हणावे लागतील. तुम्हाला नि त्यांना अभिप्रेत असलेली व्यवस्था वेगळी असली तरी विरोधकांना वाटेल त्या मार्गाने नष्ट केले पाहिजे या मतावर तुमचे त्यांचे एकमत आहे. थोडक्यात अर्बन नक्षल या पदवीला तुम्हीच अधिक लायक आहात.

...एखाद्याच्या मते संघ भाजपचे लोक सतत द्वेष रुजवतात, आमच्या देशात अशांतता माजवतात आणि अमुक एका विद्यापीठात वा बॅंकेत ते बहुसंख्य आहेत म्हणून ते विद्यापीठ, ते कॉलेज अथवा ती बॅंक उध्वस्त करणार असे एखादा कम्युनिस्ट, काँग्रेसवाला, सेनावाला, तृणमूलवाला म्हणू लागला तर तुमच्या कृतीप्रमाणेच ते ही समर्थनीय असेल.

मुळात तुमच्या डोक्यात मेंदू आहे की शेण भरले आहे? अगदी चार-दोन देशद्रोही असले तरी पुरे विद्यापीठ देशद्रोही, करा उध्वस्त म्हणताना अक्कल कुठे गहाण टाकलेली असते? माणसे आहात की टोळीने शिकार करणारे कुत्रे? आमच्या बाजूचा नसलेल्याला काही करुन नष्ट करणे समर्थनीय मानणारे.

बेअक्कल माणसांनो, विद्यापीठे ही भावी पिढीच्या उन्नतीची स्थाने असतात. आपल्या बाजूची नाहीत म्हणून ती उध्वस्त करा म्हणणार्‍या तुमच्यात आणि तुम्ही ज्यांचा द्वेष करता त्या मुस्लिम आक्रमकांत काय फरक आहे? ते ही काफीर स्थान म्हणून न पटणारे उध्वस्त करत नेतात. ते दहशतवादी तसेच तुम्हीही. आणि आपल्या समाजाला कह्यात ठेवण्यासाठी ते ही शिक्षणांपासून सामान्यांना दूर ठेवून विचारांचे इंद्रिय छाटून सर्वांना त्यांच्या तंत्रावर चालणारे गुलाम बनवू पाहतात. तुम्हीही तुमच्या मताच्या विरोधातील सारे काही खुडून फक्त तुमचेच विचार(?) शिल्लक राहतील यासाठी हिंसेचा, हत्येचा पर्यायही समर्थनीय मानतात.(तुमचे आदर्श सावरकर बलात्काराचेही एक हत्यार म्हणून समर्थन करतात.)

थोडक्यात तुमचे राजकारण सूडाचे आहे, 'ते' करतात ते सर्व आमच्या बाबतही समर्थनीय माना असा तुमचा आग्रह आहे. तो आम्ही या ठिकाणी मान्य करुन तुम्ही तंतोतंत मुस्लिम आक्रमकांची कॉपी आहात असे सर्टिफिकेट देत आहोत. कृपया स्वीकार व्हावा.

कसला बोडख्याचा देशद्रोह? कुण्या चार दोन माणसांनी दोन घोषणा - समजा!- दिल्या की माणूस देशाचा द्रोह होतो? अरे आमचा देश काय इतका तकलादू आहे का की दोन पोराटोरांनी असल्या घोषणा दिल्या म्हणून लगेच डळमळीत व्हायला. अरे ब्रिटिशांचे हस्तक असणार्‍यांनाही माफ करुन त्यांना मुख्य धारेत येऊ देण्याइतका सहिष्णु देश आहे. शक, हुणांपासून मुघलांपर्यंत सार्‍यांचे आक्रमण पचवून तो उभा आहे. उगा कुणीतरी काहीतरी घोषणा दिल्या म्हणून वा कुठलासा झेंडा फडकावला म्हणून त्याची कोणतीही वीट ढिली होणार नाही. तुमच्यासारख्या उंदरांनी पाया खणला तर मात्र खात्री देता येणार नाही. कधी तरी घडलेल्या एका प्रसंगाचे एक स्वयंघोषित व्हर्शन घेऊन वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांचा द्वेष करणारे, त्यांच्या विद्यापीठाचा द्वेष करणारे तुम्ही काय लायकीचे आहात?

जेएनयू सतत उत्तम शिक्षणाबद्दल अव्वल श्रेणी मिळवत आले आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या किंवा कोणत्याशा उत्खननात सापडलेल्या एन्टायर पोलिटिकल सायन्सच्या डिग्रीधार्‍यांना आजवर त्या तोडीचे विद्यापीठ का उभे करता आलेले नाही. वर्षानुवर्षे संघ देशाच्या कानाकोपर्‍यात काम करतो असे ऐकतो. शंभर वर्षांत असे एकही विद्यापीठ का उभे करु शकला नाही तो? आमच्या पुण्यात इतरांनी उभारलेल्या, कष्ट करुन वाढवलेल्या शिक्षणसंस्था मात्र आयत्या ताब्यात घेतल्या. नेत्यांपासून शिक्षणसंस्थांपर्यंत दुसर्‍याचे ताट आयते ओढून घेणे हे व्यवच्छेदक लक्षणच त्यांचे.

पुतळे उभारण्याच्या पैशाचे गणित समजावणारे तेच पैसे वापरुन वैदिक ज्ञानावर आधारिक शिक्षण देणारे एक विद्यापीठ उभारा' असे का म्हणत नाहीत? परकीय तंत्रज्ञानाच्या बुलेट ट्रेन वर खर्चण्याऐवजी तोच पैसा वापरुन व्हॉट्स अ‍ॅपवर नुसतेच फिरवले जाणारे ’संस्कृत कम्प्युटरला सर्वात बेष्ट भाषा’ किंवा ’आमच्याकडे विमाने होती’ वगैरे दावे प्रत्यक्षात का आणत नाही? जे पाश्चात्यांनी अद्याप लावले नाहीत असा एखादा वैदिक शोध प्रत्यक्षात आणून आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी हा पैसा खर्च करावा असा आग्रह निदान शिक्षित भक्त का धरत नाहीत?

'सीएए, एनआरसी'चे आर्थिक गणित मी मांडल्यावर तो पैसा कसा उभा करता येईल हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणार्‍यांना, ’अरे पण इतका पैसा वापरुन प्राचीन भारतीय ज्ञानाचा प्रचार-प्रसार-प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठांची साखळी निर्माण करता येईल की’ असा शहाणपणा का सुचत नाही? मूर्खासारखे ’आम्ही ते ही करु’ म्हणताना दोन्हींसाठी लागणारा अधिकचा पैसा कुठून येणार याचा विचार का करत नाहीत? शिक्षणापासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत सर्वत्र तुटवडा असलेला, आणि नेहरु-काँग्रेसने उभ्या केलेल्या कंपन्या विकून उभा करावा लागत असताना, या गोष्टींना लागणारा पैसा कोण तुमचे तीर्थरुप देणार का? तुमचे सारे पर्याय पुतळ्यांसारखे वांझ, एनआरसी-सीएए सारखे द्वेषमूलक किंवा जेएनयू प्रकरणासारखे विध्वंसक का असतात? रचनात्मक कार्याचे प्रबळ उदाहरण का देता येत नाही?

बसला आहात ती खुर्ची क्षणभर सोडा. दूर उभे राहा नि त्या खुर्चीकडे पाहा. आपण एका व्यक्तीसाठी गेल्या सहा वर्षांत कशा कशाचे समर्थन करत आलो आहोत याकडे पाहण्यासाठी त्या खुर्चीकडे पाहा. आपल्यातले किती माणूसपण आपण खर्ची घातले याचा अदमास घ्यायचा प्रयत्न करा. बरं ती किंमत ज्याच्यासाठी मोजली त्याच्याकडेही पाहा. ताळेबंद नफ्याच्या दिसतो की तुटीचा याचा विचार स्वत:शीच एकदा करुन पाहा. माणूस म्हणून जगायचे की नवनवे शत्रू निर्माण करत टोळीने शिकार करत राहायचे याचा निर्णय लवकर घ्या.

सध्या आपली टोळी मोठी म्हणजे आपण सेफ आहोत असा विचार करत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात. सीएए प्रकरण दाराशी आल्यावर शहाणपण आलेल्या, इतके दिवस अक्षरश: मोदींच्या दारचा बुलडॉगची भूमिका वठवणार्‍या अर्णब गोस्वामीकडे पाहा. आजच अंजना ओम कश्यपने सीएए आणि एनआरसी हे कॉम्बिनेशन धोकादायक असल्याचे केलेले विधान पाहा. तुम्हीही त्यांच्याप्रमाणेच द्वेषाचा गाडा तुमच्या दारात, घरात येईपर्यंत वाट पाहणार आहात का? आणि तसे असेल तर त्याक्षणी आपण कुणाचे साहाय्य मागू शकतो याचा अदमास घेऊन ठेवा. कदाचित एका व्यक्तिचे माथेफिरु समर्थन करता करता तुम्ही जवळचे अनेक लोक गमावलेले असतील, तुमच्या आसपास कुणी उरलेले नसेल.

-oOo-


हे वाचले का?

रविवार, ५ जानेवारी, २०२०

संग्राम बारा वर्षांचा आहे...

संग्राम बारा वर्षांचा आहे...

संग्रामच्या वडिलांची कार एजन्सी आहे, त्यांच्या मालकीचा एक पेट्रोल-पंप आहे, ते बिल्डर आहेत आणि मुख्य म्हणजे ते समाजसेवक आहेत. ’संग्रामराजे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य विविध क्षेत्रात चालू असते.

संग्राम त्यांना बाबा, डॅड न म्हणता ’दादा’ म्हणतो, कारण आसपासचे सारेच लोक त्यांना दादा म्हणतात. त्यांचा उच्चभ्रू वस्तीमध्ये तीन हजार स्क्वेअर फुटाचा ऐसपैस बंगला आहे. दाराशी दोन एसयूव्ही आणि एक एक्सयूव्ही कार आहे. बंगल्यात दादांचा स्वत:चा बार आहे. आणि दहा बाय दहाचे प्रशस्त देवघरही. दारासमोर पोट खपाटीला गेलेला एक दरवान आहे आणि त्याच्या शेजारी दोन गलेलठ्ठ कुत्रे बांधलेले आहेत.

संग्रामच्या वडिलांच्या गळ्यात पाच तोळ्यांची चेन आणि डाव्या हातात सात तोळ्यांचे सोन्याचे कडे आहे. हाताच्या दहा बोटांपैकी सहा बोटांमध्ये सोन्यामध्ये मढवलेल्या विविध खड्यांच्या अंगठ्या आहेत. गळ्यात एक वाघनखाचे आणि एक साईबाबांचा फोटो असलेले लॉकेट् आहे.

संग्रामचे वडील नेहमी जाकीट कुर्ता नि पायजमा या वेषात असतात. कुर्ता नि पायजमा कायम पांढरा असला तरी भेटायला येणार्‍या पाहुण्यानुसार जाकीटाचा रंग वेगवेगळा असतो. ते खास बनवून घेतलेल्या कोल्हापुरी चपलाच वापरतात, ज्यांची किंमत काही हजारांत आहे असे त्यांचे नोकर नि कार्यकर्ते कौतुकाने सांगत असतात.

संग्रामच्या घरी सत्यनारायण, साईबाबांची जयंती, दादांची श्रद्धा असलेल्या नारायणबाबांचा दरबार, झालंच तर गणेशोत्सव, नवरात्र, जागर, गोंधळ इत्यादि धार्मिक कार्यक्रम यथासांग पार पडत असतात. आणि या दरम्यान घरात मांसाहारी पदार्थांना सक्त मज्जाव असतो. त्यावेळी फ्रीजमध्ये असलेले सारे सामिष पदार्थ फेकून देऊन तो गोमूत्राने पवित्र करुन घेतला जातो.

संग्रामच्या घरात स्वयंपाकाला दोन माणसे आहेत. विधवा आत्येच्या शाकाहारी स्वयंपाकासाठी ब्राह्मण स्वयंपाकीणबाईंची नेमणूक आहे, तर इतरांसाठी अन्न शिजवण्यास स्वतंत्र स्वयंपाकी आहे. कालानुरूप हवे तेव्हा धान्य बाजारात उपलब्ध होत असले, तरी संग्रामच्या घरी आजही वर्षभराचा धान्यसाठा दिवाळीनंतर भरून ठेवण्याची पद्धत आहे. त्यासाठी बंगल्याच्या मागील बाजूस स्वतंत्र कोठीची खोली आहे. त्यामध्ये गावाकडून आलेले धान्य साठवले जाते.

GoldenKid
छायाचित्र केवळ प्रातिनिधिक आहे. indiatoday.in येथून साभार.

संग्रामच्या आजोबांची गावी भरपूर शेती आहे. उसाच्या शेतीच्या शिडीवरुन ते प्रथम सहकारात शिरले, त्यातून कारखान्याच्या राजकारणात आणि अखेरीस झेडपी सदस्य अशी मजल त्यांनी मारली आहे. त्याआधारे चालू केलेल्या सावकारीतून त्यांच्या मालकीच्या जमिनीचा आणि हाताखाली असणार्‍या कार्यकर्त्यांच्या जमावाचा विस्तार वाढत चालला आहे. गावात रावसाहेबांना मोठा मान आहे. गावच्या देवस्थानचे ते मुख्य ट्रस्टी तर आहेतच, पण ग्रामदैवताच्या अग्रपूजेचा मानही त्यांच्याचकडे आहे.

संग्राम या ’मोठ्या दादांच्या’ गावी जाण्यास नेहमी उत्सुक असतो. तिथे रावसाहेबांचा नातू म्हणून गावकर्‍यांकडून मिळणारा मान त्याला हवाहवासा वाटतो. घरच्या नि शेतावरच्या नोकरांवर आजोबांप्रमाणेच डाफरत तो सत्तेची माफक गुर्मी दाखवत असतो. त्यातून त्याचा इगो इवलासा अहंकार पेटून उठतो. गावच्या जत्रेच्या काळात तर तो हमखास गावी जातो आणि आजोबांसोबत मानकरी म्हणून मिरवत असतो. एरवी शहरात असताना घरातील नोकरांवर दाखवतो त्याहून कैकपट रुबाब त्याला या गावातील नोकरांसमोर दाखवता येत असतो.

संग्राम वेदांगच्या शाळेत शिकतो. वेदांगच्या दोन वर्षे पुढे असला तरी दोघांची माफक मैत्री आहे. कधीमधी एकमेकांच्या घरी त्यांचे येणे-जाणे होत असते. वेदांगच्या शेजार्‍यांच्या मुलाशी न खेळण्याचा वेदांगचा निर्णय त्याला एकदम पटतो. ’पायीची वहाण पायी बरी’ असा त्याचाही बाणा आहे. आणि घरी त्याच्या दादांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. वेदांगच्या डॅडची गाडी एकदम ओल्ड फ्याशन्ड आहे असे संग्रामला वाटते. कधीमधी दादांच्या एखाद्या गाडीची किल्ली पळवून तो ती गाडी बंगल्याच्या आवारातल्या आवारात पुढे मागे फिरवत असतो. त्याचे हे प्रताप आईला नापसंत असले तरी ’अरे वाघाचा बच्चा आहे, एका गाडीची काय भीती’ म्हणत दादा त्याला प्रोत्साहन देत असतात. पण दादांच्या हातून चुकून टीपॉयवर राहिलेल्या पाकीटामधील एखादी सिगरेट कमी झालेली दिसली, तर मात्र त्यांचे हे प्रोत्साहन कुठल्याकुठे पळून जाते.

संग्रामचे वडील समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणाचा सोपान चढू पाहात असतात. घरात होणार्‍या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी सलगी ठेवून सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. ’संग्रामराजे प्रतिष्ठान’प्रमाणेच वडिलांच्या नावे उभ्या केलेल्या पतपेढीच्या माध्यमांतून ते सामान्य नागरिकाची सेवा करत आहेत.

संग्रामची आई घरची मालकीण आहे...

संग्रामनेही वेदांगप्रमाणे एका खणाच्या खोलीत दाटीवाटीने राहणारे कुटुंब कधी पाहिलेले नाही. गावाकडे आजोबांकडे गेला तरी भावकीतल्या सधन लोकांखेरीज इतर घरांमध्ये त्याने पाऊल टाकू नये याची खातरजमा रावसाहेबांचे नोकर करुन घेत असतात. धाकल्या धनीसाहेबांना हवे ते मिळावे याची खात्री करुन घेण्याची तंबी त्यांना रावसाहेबांच्या पत्नीने- म्हणजे संग्रामच्या आजीने त्यांना दिलेली असते. घरची सारी सफाई करणार्‍या, प्रसंगी दारु पिऊन वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेली घाण साफ करणार्‍या, वडिलांच्या वयाच्या शिदबाला एकेरी हाक मारतानाच काय पण आई-बहिणीवरुन कचकावून शिवी देताना त्याची जीभ अजिबात कचरत नाही. आपल्या बापाला या बालकासमोर लाचार उभे राहिलेले पाहून घाबरुन गेलेल्या त्याच्या चार वर्षांच्या पोरीच्या डोळ्यातील भीती त्याला एक प्रकारचा आनंद देऊन जाते.

संग्रामही वेदांगप्रमाणेच चोख देशभक्त आहे. फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्स अ‍ॅपवर सक्रीय राहून तो देव, देश अन् देशभक्ती साजरी करत असतो. सोशल मीडियावर तो छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे फोटो, त्यांच्या पुतळ्याच्या पायी उभा असलेले आपले फोटो सदैव अपलोड करत असतो. समाजातील विषमतेबद्दल त्याच्या मनात प्रचंड चीड आहे. आणि तो ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमितपणे व्यक्त करत असतो. या सार्‍याला ब्राह्मिनिकल व्यवस्थाच जबाबदार आहे हे त्याचे- दादांचे ऐकून पक्के झालेले मत आहे. तसे तो शिदबासह अन्य नोकरमंडळींना आणि त्यांच्या ज्ञातिबांधवांना आवर्जून पटवून देत असतो.

संग्रामच्या वडिलांप्रमाणेच त्याच्या तोंडी ’फुले, शाहू आंबेडकरांचे’ नाव सतत येत असते. वडिलांप्रमाणेच बेरजेच्या राजकारणार विश्वास असल्याने तो आपल्या ज्ञातिबांधवांच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावत असतो. वडिलांप्रमाणेच समाजसेवा करुन किंवा करण्यासाठी राजकारणात जाण्याचे त्याने पक्के ठरवले आहे. त्याच्या वाढदिवसाचे आणि सार्वजनिक उत्सवांसारख्या इतर प्रसंगांचे फ्लेक्स त्याच्या भल्यामोठ्या फोटोसह मुख्य रस्त्यावर अधूनमधून झळकत असतात.

संग्रामची शाळा संपल्यावर तो राजकारणाची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थी संघटनांच्या राजकारणात उतरणार आहे. त्यासाठी त्याला कुठल्यातरी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. उपस्थितीचे सक्तीचे झंझट शक्यतो टाळता येईल अशा ठिकाणी प्रवेश घेण्याची त्याची इच्छा आहे, जेणेकरुन समाजकार्यासाठी त्याला पुरेसा मोकळा वेळ मिळू शकेल. कौटुंबिक पातळीवर दादा आणि माई सांगतील त्या मुलीशी लग्न करुन संसारात पडण्याचे झंझट उरकून टाकण्याचे त्याने ठरवून टाकले आहे. तसेही राजकारणात असल्यावर सारा समाजच आपले कुटुंब असते असा दादांचाच उच्च विचार अंगीकारण्याचे त्याने निश्चित केले आहे.

वेदांगप्रमाणेच संग्रामनेही आपल्या दोन मुलांची नावे निश्चित केली आहेत. थोरल्याचे नाव ’विक्रमराजे’ आणि धाकट्याचे नाव ’त्रिविक्रमराजे’ ठेवण्याचे त्याने नक्की केले आहे. मुलगी झाली तर तिचे नाव ’क्रांती’ ठेवण्याचे पक्के केले आहे.

...संग्राम बारा वर्षांचा आहे.

-oOo- 

 संबंधित लेखन:  वेदांग दहा वर्षांचा आहे...


हे वाचले का?

वेदांग दहा वर्षांचा आहे...

वेदांग दहा वर्षांचा आहे...

वेदांगचे आईवडील संगणकक्षेत्रात काम करतात. दोघांचे उत्पन्न छाऽन आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्यांचा दीड हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे. सोसायटीमध्ये लॉन आहे, क्लब हाऊस आहे. सोसायटीच्या दाराशी येणार्‍या जाणार्‍याकडे संशयाने पाहणारा दाराशी दरवान... चुकलो सिक्युरिटी मॅनेजर आहे. सोसायटीमध्ये राहणार्‍यांच्या घरी निरोप देता यावा म्हणून त्या सिक्युरिटी मॅनेजरच्या तीन-बाय-तीनच्या ’केबिन’मध्ये इंटरकॉम आहे. त्यावरुन कोणत्याही फ्लॅटमधून दुसर्‍या फ्लॅटमध्ये बोलणे शक्य असले तरी तसा वापर कुणी करत नाही.

प्रत्येकाकडे मोबाईल आहे. वेदांगच्या आईबाबांकडे आयफोन आहे. त्याचे नवे व्हर्शन जूनमध्ये येणार आहे. ’ही बातमी शेअर करताना ’फीलींग एक्सायटेड’ असे स्टेटस वेदांगच्या बाबांनी... चुकलो डॅडनी टाकले आहे. वेदांगची मम्मी अजूनही ’इट वॉज जऽस्ट येष्टरडे’ अशा शीर्षकाखाली वेदांगचे लंगोटातले फोटो शेअर करत असते. खाली न चुकता ’शेअर्ड फ्रॉम माय आयफोन’ अशी तळटीप आलेली असते.

वेदांग राहतो त्या सोसायटीमध्ये दहा इमारती... अम्म्, बिल्डिंग्ज आहेत. त्यातून एकुण एकशेचाळीस कुटुंबे राहतात. सोसायटीमधील निवडक महिलांना बोलावून त्याची मम्मी हळदीकुंकू समारंभ साजरा करते. वर्षातून एकदा न चुकता त्याचे डॅड, 'बाबा' होऊन सत्यनारायण करतात. त्यालाही सोसायटीमधील निवडक लोकांनाच बोलावतात. कद/सोवळे नेसलेला उत्तरीयविहीन फोटो न चुकता अपलोड करुन ’ट्रडिशन नेव्हर गोज आऊट ऑफ फॅशन’ असे शीर्षक देऊन ह्या: ह्या: हसणारी स्मायली टाकतात.

वेदांगच्या शेजारी राहणार्‍यांच्या मुलांशी खेळण्याची वेदांगला बंदी आहे. ’कितीही पैसेवाले झाले म्हणून काय आमची बरोबरी करतील की काय. शेवटी संस्कार महत्वाचे’ अशी डॅड-मॉमची कुजबूज वेदांगने ऐकली आहे.

BoyInCoat
छायाचित्र केवळ प्रातिनिधिक आहे. Dreamstime.com येथून साभार.

वेदांग कुठल्याशा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातो. त्याला घराशी पिक-अप करायला आणि ड्रॉप करायला बस येते. बस हे वाहन फक्त शाळेच्याच मालकीचे असते असा वेदांगचा समज आहे. डॅडच्या कारमधून जाताना अधेमध्ये तडमडणार्‍या आणि समोरच्या बाजूला ड्याम मराठीमधून कुठलीशी पाटी मिरवणार्‍या गाड्यांना ’बस’ का म्हणतात याचे कोडे त्याला अजून उलगडलेले नाही.

वेदांगच्या शाळेत फक्त उच्च दर्जाचे आणि विशिष्ट समाजगटाचे लोकच शिकतात. वेदांगच्या डॅडने तशी खात्री करून घेऊनच शाळा निवडली आहे. ’इन फ्युचर’ उपयोगात येईल म्हणून घरात इंग्रजीतच संभाषण करण्याची, आणि रविवारी फक्त आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतूनच बोलण्याची वेदांगला सक्ती आहे.

वेदांगने आठव्या वर्षी गीतेचा सोळावा अध्याय आणि नवव्या वर्षी अठरावा अध्याय चोख पाठ केला होता. दोन्हींचा अर्थ त्याच्या संस्कार-शिक्षकांनाही माहित नसल्याने त्यालाही माहित नाही. वेदांगला आठवड्यातून एकदा मॅकडी बर्गर, पंधरा दिवसांतून एकदा पिझ्झा आणि महिन्यातून एकदा इंटरनॅशनल क्विझिन खाण्याची सवय आहे. त्याचे मित्र हल्ली सीसीडीमध्ये ’चिल आऊट’ करत असताना होमवर्क सोबतच आपापल्या ब्याकवर्ड प्यारेंट्सशी डील करण्याचे पॉईंट्स शेअर करत असतात.

वेदांगला आपल्या ग्रॅम्मा आणि ग्रॅम्पाना भेटायला जायला आवडत नाही. त्यांच्या गावाकडच्या घरी साधे केबल नाही. गावात एकही मल्टिप्लेक्स नाही की पिझ्झा-हट वा सीसीडीही. घरात साधा टीव्ही नाही. चार वेळा ’लीव्ह मी अलोन’ म्हणून स्पष्ट सांगितलं तरी दोघेही पुन्हा पुन्हा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करून त्याला डिस्टर्ब करत राहतात.

वेदांगने एका खणाच्या खोलीत दाटीवाटीने राहणारे कुटुंब कधी पाहिलेले नाही. गावाकडे राहणारे तर सोडाच पण मुंबईसारख्या महानगरातूनही असे असंख्य लोक राहतात याची त्याला कल्पना नाही. अमुक एक गोष्ट हवी म्हटल्यावर ’पुरेसे पैसे नाहीत. बोनस आल्यावर घेऊ’ अशी समजूत घालणारा केविलवाणा बाप वेदांगने पाहिलेला नाही. आई रोजंदारीवर गेलेली असताना रांगत्या भावंडाला सांभाळणारी पाच-सहा वर्षांची ताई वेदांगच्या नजरेस कधी पडलेली नाही. दिवाळीत घाटावर केलेल्या दिव्यांची आरास दुरूनच डोळे विस्फारून पाहणारी, दिवे विझल्यावर त्यांत उरलेले तेल उद्या मिरचीच्या खरड्यासोबत खाण्यासाठी काळजीपूर्वक जमा करत जाणारी फाटक्या कपड्यातील कुणी धुरपदा आपल्याच समाजाचा भाग आहे याची त्याला जाणीव नाही.

वेदांगच्या डॅड-मॉमने अभावाचे जिणे म्हणजे काय याची कल्पना त्याला येऊ दिलेली नाही. पाणी प्यायचे असेल तर वॉटर-फिल्टरचा नळ सोडून ग्लास भरुन घेतो तसे खिशातले पैसे संपले की एटीएममधून काढायचे असतात, दोन्ही नळांना कायम पाणी असतेच असा त्याचा अनुभव आहे.

वेदांग चोख देशभक्त आहे. फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्स अ‍ॅपवर तो सक्रीय देव, देश अन् देशभक्ती साजरी करत असतो. शेजारी राहणार्‍या मुलाचा चेहराही आठवत नसला तरी ती कसर तो सोशल मीडियावर ’हिंदू सारे बंधू’ असे लिहिलेले प्रेरणादायी मेसेज फिरवून भरून काढत असतो. वेदांग ’संस्कृत ही कम्प्युटरसाठी श्रेष्ठ भाषा आहे’ हे सांगणारे इंग्रजी भाषेत लिहिलेले मेसेज न चुकता मित्रांना पाठवत असतो.

वेदांगची शाळा संपल्यावर तो इन्टिग्रेटेड कोर्समध्ये अ‍ॅडमिशन घेणार आहे. तिथून अमेरिकेच्या युएसमध्ये हायर एज्युकेशनसाठी जाण्याचे त्याने नक्की केले आहे. ते संपले की तिथेच सेटल होऊन ’नासा’मध्ये किंवा ’सीआयए’मध्ये काम करण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे. योग्य वयात लग्न करुन, सर्व वेळच्या वेळी व्हावे म्हणून तातडीने दोन मुले जन्माला घालण्याचे त्याने ठरवून टाकले आहे. पत्नी समजूतदार मिळाली तर ’देव देश अन् धर्मापायी’ दोन ऐवजी चार मुले जन्माला घालण्याचा निर्धार त्याने आल्रेडी केलेला आहे.

कुणीतरी मित्राने ती तयार नसेल तर चार मुलांसाठी ’चार जणींशी लग्न कर’ असा केलेला विनोद त्याला भयंकर अपमानकारक वाटला होता. 'आम्ही काय त्यांच्यासारखे आहोत काय’ असे संतापाने विचारत त्याने त्या मित्राला तातडीने अनफ्रेंड केले होते.

आपल्या दोन मुलांची नावे ’आर्य’ आणि ’आर्या’ ठेवण्याचे त्यांने निश्चित केले आहे. वरच्या बोनस दोन मुलांची नावे ’विकास’ आणि ’संस्कृती’ ठेवण्याचेही त्याने योजून ठेवले आहे.

...वेदांग दहा वर्षांचा आहे.

- oOo -

संबंधित लेखन: संग्राम बारा वर्षांचा आहे...

हे वाचले का?

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

'आठवडी बाजारा’ची मुशाफिरी

(राज कुलकर्णी यांच्या ’आठवडी बाजार आणि समाजजीवन’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना)

आपल्या देशातील शिक्षणक्रमातील इतिहासाच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने राजकीय आणि प्राचीन इतिहासावर भर असतो. जगण्याशी निगडित असणाऱ्या जड वस्तूच्या, आयुधांच्या आणि माणसाच्या जीवनशैलीचा जो अतूट संबंध असतो, त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. याचे कारण ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्या त्या काळचे शासनकर्ते, राज्ये, साम्राज्ये आदींचा सनावळीसह काटेकोर उल्लेख असला, आणि त्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक इतिहासाची काही पानेही जोडलेली असली, तरी त्या काळी प्रचलित असणाऱ्या वस्तू आणि मनोरंजनादि पैलूंचा वेध घेणाऱ्या जड वस्तूच्या इतिहासाची, विकासाची प्रामुख्याने उपेक्षाच दिसते. क्वचित कुठे असली, तरी विद्यार्थीच काय अभ्यासकांपैकी बहुसंख्य व्यक्तीदेखील त्यांना फार महत्त्व देताना दिसत नाही. अलीकडे इतिहास हा प्रामुख्याने अस्मितेची आणि अधिक्षेपाची स्थाने नि व्यक्ती शोधण्यापुरता अभ्यासला आणि लिहिला जाऊ लागल्यानंतर ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे असे म्हणावे लागेल.

AthavadiBazaar

वास्तविक पाहता एखाद्या संस्कृतीमध्ये, एखाद्या समाजामध्ये लढाईसाठी वापरल्या जाणाऱ्या आयुधांपासून एखाद्या घरातील नित्यकर्मांना सहाय्यभूत होणाऱ्या हत्यारांपर्यंत, रोज वापरण्याची सर्वसाधारण वस्त्रे आणि विशिष्ट प्रसंगी परिधान करावयाचे पेहराव, रोजच्या आहारातील धान्ये आणि विशिष्ट सणाशी निगडित असणारी विशिष्ट पक्वान्ने यांचा अभ्यास त्या त्या काळाशी निगडित इतिहासाचा एक तुकडा असतो. त्याचा अभ्यास त्या समाजाच्या, काळाच्या, भूभागाच्या जीवनशैलीबाबत अमूल्य अशी माहिती देत असतो. संस्कृती-अभ्यासाचा तो ही एक महत्त्वाचा भाग असतो. परस्परांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असणाऱ्या समाजांमध्ये भाषेतील शब्द, वापरले जाणारे हत्यार, आहारपद्धती आदिंमध्ये काही सामायिक सापडले, तर 'त्यांच्यात काही संपर्क होता का?' हे कुतूहल निर्माण होते, आणि कुतूहल अभ्यासाला चालना देते. हे आदानप्रदान कसे नि केव्हा झाले असेल, त्याचा प्रवाह एकाच दिशेने होता की खऱ्या अर्थाने ही देवाणघेवाण होती, असा प्रश्न विचारता येतो. सामान्यपणॆ असे दिसते, की जित आणि जेते यांच्याबाबतीत एकदिश असा संबंध दिसण्याची शक्यता असते, तर व्यापारी संबंधांमध्ये देवाणघेवाण होताना दिसते. थोडक्यात या भौतिक जीवनाचे सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासामध्ये पडलेले प्रतिबिंबही इतिहासात महत्त्वाचे ठरते.

नव्वदीच्या दशकात भारतात खुले आर्थिक धोरण, जागतिकीकरण आणि संगणकीकरण हे परवलीचे शब्द झाले आणि भारतीय समाज, जीवनपद्धती वेगाने बदलू लागली. संगणकीकरणाने केवळ आर्थिक स्थिती सुधारली असेच नव्हे तर उघडलेल्या दारांतून गुंतवणुकीसोबतच अन्य संस्कृती – विशेषत: पाश्चात्य – संस्कृतीने देशात प्रवेश केला. सांस्कृतिक सरमिसळीतून महानगरी समाजाची जीवनशैली अतिशय वेगाने बदलली. त्यांचा पेहराव बदलला, जगण्यातील आकांक्षा बदलल्या, घरात विविध कामांसाठी वापरली जाणारी उपकरणे, आयुधे बदलली, करमणुकीची साधने वेगाने सामूहिकतेकडून वैयक्तिक होऊ लागली. आर्थिक राजकीय बदलांनी त्यांच्या वैयक्तिक, भौतिक जीवनात एक मोठी वावटळ आणली, जिथे एक दोन दशकातच जगण्यातील अनेक वस्तू कालबाह्य करून विस्मृतीमध्ये फेकून दिल्या.

असे असले तरी काळ सर्व भूभागांवर सारखा असत नाही. एकाच मुंबईत उच्चभ्रू वस्तीतला ‘आज’ आणि धारावी सारख्या वस्तीतला ‘आज’ सर्वस्वी वेगळा असतो. वेगवेगळी शहरे, गावे, इतकेच काय डोंगरदऱ्यांतले पाडे-वस्त्या यांच्या जगण्याचे पैलू वेगवेगळे असतात. ते वेगवेगळ्या जीवनशैलीच्या सांस्कृतिक वारशांचे जतन करताना दिसतात. एका भूभागावर अथवा समाजात माघार घेत असलेल्या अथवा घेण्यास भाग पाडलेल्या जीवनशैलीचे अनेक आयाम हे अन्य कुठे भक्कम पाय रोवून, तर कुठे तग धरून असतात. एकाच काळातला, राजकीयदृष्ट्या एकच भूमी असलेल्या भूभागावरचे जगण्याचा हे पट अभ्यासणे रोचक असते. बहुतेक सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या ‘आठवडी बाजारापासून’ ते बिग बझार अथवा ‘डी-मार्ट’सारखे रीटेल स्टोअर्सपर्यंतचा प्रवास किराणा माल, कपडे, खाद्यपदार्थ इ. साठी स्वतंत्र दुकाने या मधल्या टप्प्यामार्फत होत असतो. हे तीनही प्रकार एकाच वेळी, एकाच शहरात अस्तित्वात असतात, आणि वेगवेगळे प्राधान्यक्रम असणाऱ्या, कदाचित विशिष्ट सामाजिक-आर्थिक गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समूहाच्या गरजा भागवत असतात.

आठवड्याचे कामाचे संपूर्ण दिवस बहुधा कार्यालयीन कामातच व्यतीत करावा लागत असल्याने, महिन्यातून एकदाच ‘बिग बझार’मध्ये जाऊन महिन्याचे सारे आवश्यक जिन्नस एकदाच खरेदी करून आणणारा समाज उच्चमध्यमवर्गीय असतो. हीच मानसिकता असणारा, परंतु आवश्यकतेहून अधिक खरेदी न करता, खरेदीची सांगड उपलब्धतेपेक्षा गरजांशी अधिक जोडणारा मध्यमवर्गीय समाज हा जवळच्या किराणा भुसार दुकानातून महिन्याची एकदम खरेदी करतो. हाच समाज मोठ्या शहरांऐवजी लहान शहरे, गावे यांतून राहात असेल तर उलट दिशेने पीककाढणीनंतर म्हणजे दिवाळीनंतर वर्षभराचे धान्य भरून ठेवण्याकडे त्याचा कल असतो. हा कृषी संस्कृतीचा वारसा! तर दैनंदिन अथवा आठवडी रोजगारावर काम करणारा श्रमजीवी त्या आठवड्याचे वेतन पदरी पडले की पुढील आठवड्याची तजवीज करण्यासाठी आठवडी बाजाराची वाट धरतो. माणसांचे हे प्राधान्यक्रम नकळत त्यांच्या आर्थिक स्तराचे, भौगोलिक मागणी-पुरवठा व्यवस्थेचे निदर्शक ठरत असतात.

आठवडी बाजारात दिसणारे छत्री दुरुस्तीचे दुकान स्वतंत्रपणे बाहेर एक नियमित व्यवसाय म्हणून फार तग धरत नाही. त्याला अन्य आनुषंगिक व्यवसायांची जोड द्यावी लागते. रीटेल स्टोअर्समध्ये येणारा समाज हा बव्हंशी ‘जुने मोडले की नवे घ्या’ मानसिकतेचा असल्याने तिथे तर त्याला स्थानच नाही. अशी आणखी अनेक उदाहरणे देता येतील. प्रत्येक टप्प्यावरील या विक्रेत्यांकडे काय उपलब्ध असते हे त्यांचे ग्राहक कोण आणि त्यांची मागणी काय यावर अवलंबून असते. आणि त्यांचे ग्राहक कोण हे त्यांच्या गरजांवरून ठरत असते. एकुणात पाहिले तर प्रत्येक व्यवसाय हा एका सांस्कृतिक-आर्थिक गटाचे प्रतिबिंब असतो. आणि इतिहासाचा अभ्यास करताना त्या प्रतिबिंबाची दखल घेणे आवश्यक असते. अन्यथा काही महत्त्वाचे पैलू दुर्लक्षित राहण्याचा धोका असतो.

साधारण दोन वर्षांपूर्वी राज कुलकर्णीची ‘आठवडी बाजार’ ही मालिका वाचण्यात आली. सुरुवातीला सुटे सुटे वाटणारे लेख हळूहळू एक सूत्र समोर आणताना दिसू लागले. त्यामुळे एका व्यक्तीचे कुतूहल एक महत्त्वाचे दस्तऐवजीकरणात रूपांतरित होईल का याची उत्सुकता निर्माण झाली. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवण्यापासून माणूस सुरुवात करतो आणि नंतर एक एक करून जमतील तशा अन्य गरजांना सामावून घेत जातो. राज कुलकर्णीच्या ‘आठवडी बाजारा’च्या मुशाफिरीमध्ये यातील बहुतेक गरजांचा उल्लेख येतो आहे.

आज वडापावच्या जमान्यात कदाचित माघार घेऊ लागलेले, फिरत फिरत खाता येणारे आणि आहारदृष्ट्या पौष्टिक भाजलेले दाणे नि फुटाणे असोत, स्वातंत्र्यदिनासारख्या विशेष सणाच्या दिवशी अनोन्य संबंध निर्माण केलेली जिलेबी असो की प्रोटिनची गरज भागवणाऱ्या उसळींसाठी आवश्यक असणारी मोड आलेली कडधान्ये आदी अन्नपदार्थ हे घरात बनवण्याऐवजी विक्रीयोग्य क्रयवस्तूंमध्ये रूपांतरित झालेले इथे दिसून येतात. जुन्या कपड्यांचा बाजार हा आठवड्याच्या उत्पन्नाच्या आधारे नियोजन करणाऱ्या ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतोच. त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तूंमध्ये भारतीय आहारात महत्त्वाचे असणारे पीठ बनवण्यासाठी लागणारे जाते, उखळ-मुसळाची जोडी, घरच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे झाडू, केरसुणी आदी वस्तू, कधीमधी परवडणारे कोंबडी-मासे यांसारखे मांसाहारी पदार्थ या अन्न-वस्त्रांपासून तंबाखू-चुन्यासारख्या माफक व्यसनपूर्तीची दुकाने, स्त्रियांसाठी किमान शृंगार असलेल्या बांगड्या विकणारी दुकानेही या मुशाफिरीमध्ये सामील झालेली आहेत. इतकेच नव्हे तर विकत घेतलेल्या अन्नाची नासाडी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी उंदीर मारण्याची औषधे वगैरे माणसांच्या किमान गरजांच्या भोवती निर्माण झालेल्या गरजा भागवणाऱ्या वस्तुविक्रीचाही आढावा घेतला आहे.

माणसाच्या गरजा भागवण्यासाठी प्राचीन काळीच श्रमविभागणीतून व्यवस्था साकळत गेल्या, कुठे त्या कृत्रिमरित्या निर्माण केल्या गेल्या. त्यातील बलुतेदारी ही एक व्यवस्था आपल्या देशात बराच काळ बळकट होती. त्यातून विशिष्ट कामांना वंशपरंपरागत जबाबदारीचे स्वरूप आले. आज जागतिकीकरणामुळे उत्पादन आणि उपभोगाचे वर्तुळ कमालीचे व्यापक झाल्याने ही व्यवस्था हळूहळू नामशेष होत जात असली तरी तिचे बरेवाईट अवशेष आठवडी बाजारातील व्यवसायांतून दिसतात हे राजच्या अनुभवातून दिसून आले. मूळ बारा बलुत्यांपलिकडेही काही कामे ही विशिष्ट जात, विशिष्ट समाज वंशपरंपरागत पद्धतीने करत येताना दिसतात. त्यांची दखल घेत राज कुलकर्णीने त्यांचा इतिहास, त्यांच्या उत्पादन आणि विक्रीचे धोरण आदी बाबींवर प्रकाश टाकत सर्व बाजूंचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. बाजाराचा अभ्यास करताना या सामाजिक नोंदींची गरज ओळखली आहे. त्याबद्दल त्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. सुरूवातीला म्हटले तसे राजकीय, सांस्कृतिक इतिहास या त्याच्या जीवनशैलीपासून सुटा अभ्यासताना काही पैलू निसटण्याची आणि त्यामुळे काही संगती तुटून जाण्याची शक्यता असते. म्हणून त्या माणसाचा ग्राहक म्हणून अभ्यास करताना त्याच्या जीवनशैलीशी होणारा परिचय हा ही त्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग मानायला हवा.

राज कुलकर्णीने निवडलेल्या अभ्यासविषयाचे दस्तऐवजीकरण सामान्यपणे रिपोर्ताज या शैलीमध्ये करणे अपेक्षित असते. यात मूल्यमापनापेक्षा निरीक्षणांच्या काटेकोर नोंदींना अधिक महत्त्व द्यावे लागते. अभ्यासकाच्या दृष्टिकोनामुळे हे दस्तऐवजीकरण दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. राजने ते बव्हंशी साधले आहे. जात्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूविषयी लिहिताना मात्र थोडे स्वातंत्र्य घेत त्याने ओव्यांचा उल्लेख केला आहे, जो अपरिहार्य तर होताच, पण समर्पकही आहे. लेखनाची तात्कालिक प्रेरणा असलेल्या नोटाबंदी धोरणाचा उल्लेख हा तात्कालिक म्हणून येतो. केवळ रोखीने व्यवहार होणाऱ्या या बाजारावर मोठा परिणाम घडवणारी ती घटना असल्याने तिची दखल घेणे आवश्यक होतेही. कदाचित त्याच्या परिणामांवर थोडा अधिक भर दिला असता तर या बाजारातील रोकड विनिमयाबद्दलही थोडे विस्ताराने लिहिणे शक्य झाले असते.

या मुशाफिरीतून आणि दस्तऐवजीकरणातून आणखी काही संभाव्य अभ्यासविषय निर्माण होतात. त्यांचाही वेध राजने घ्यावा अशी अपेक्षा करतो. वर म्हटल्याप्रमाणे आठवडी बाजार आणि बिग बझार सारखे रीटेल स्टोअर्स हे दोनही प्रकार ‘एका छत्राखाली सारे काही’ स्वरुपाची विक्री केंद्रे आहेत. पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंतचा प्रवास हा ग्राहक, विक्रेते यांच्या गरजा, आर्थिक स्तर, मानसिकता यांच्या बदलाचा प्रवास आहे तसाच तो गरजेनुसार खरेदीपासून उपलब्धतेनुसार खरेदीपर्यंतच्या बदलांचा प्रवासही आहे. असे विविध पैलू घेऊन या प्रवासाचा वेध घेता येईल. या संक्रमणामध्ये सांस्कृतिक, आर्थिक आणि वर्गीय संक्रमणाचे प्रवाह दिसू शकतील. त्यांचा एकत्रित आणि स्वतंत्रपणे वेध घेणेही रोचक ठरू शकेल.

-oOo-


हे वाचले का?