शुक्रवार, २४ जुलै, २०२०

त्याला खुर्ची आवडते

TheThrone
https://seenpng.com/ येथून साभार.
(कवी सौमित्र यांची क्षमा मागून)
                   
ह्याला खुर्ची आवडते, त्याला खुर्ची आवडते
आघाडीत विसंवाद झाला की मन म्हणते,
’आधीच खुर्ची माझ्यापासून फार दूर नाही,
सत्तेचं ह्याचं गणित खरंच मला कळत नाही.’

खुर्ची म्हणजे ऊब सारी, खुर्ची म्हणजे परिमळ
खुर्चीविना राहायचे म्हणजे व्हायची नुसती परवड
म्हणे- खुर्ची नियत खराब करते, खुर्ची जबाबदारी
पण खुर्चीसोबत मिळते ना चोख जहागिरदारी

खुर्ची करी आपली कामे, खुर्ची म्हणजे सर्व सुखात 
गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं केंद्रात.
दरमहा संधी येते, दरमहा असं होतं
खुर्चीवरुन निसटून पडून लोकांमध्ये हसं होतं

हा आवडत नसला तरी खुर्ची त्याला आवडते
ह्याने लवकर सोडावी म्हणून तो ही झगडतो
रूसून मग तो निघून जातो, टीका करतो पत्रांत
ह्याचं त्याचं भांडण असं कोरोनामयी दिवसात.

... मंदार काळे

- oOo -

हे वाचले का?

गुरुवार, १६ जुलै, २०२०

शनिवार, ११ जुलै, २०२०

कला, कलाकार आणि माध्यमे

TaylorDavis

विषयसंगतीमुळे हा लेख ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल.

- oOo -


हे वाचले का?

गुरुवार, ९ जुलै, २०२०

खुनी सुरा

( प्रेरणा: कुसुमाग्रजांची `खुनशी सुरे’ ही कविता )

BloodyDagger
भरचौकात एका सुर्‍याने
एका माणसाची हत्या केली
पोलिसाच्या हाताने मग
त्या सुर्‍याला अटक केली.

सुरा धरणारा हात म्हणे,
’खून करणारा सुराच,
त्याच्यावर माझे काहीच
नियंत्रण राहिले नाही*.’

कलम धरलेल्या हाताने
सुरा धरलेल्या हाताचा
युक्तिवाद मान्य करत
त्याला निर्दोष मुक्त केला.

दशकांनंतर निकाल आला
सुरा संपूर्ण दोषी ठरला
’मरेपर्यंत वितळवण्याची
शिक्षा हवी’ जमाव गर्जला.

’असे समाजविघातक सुरे
अशांतीचे दूत असतात.’
म्हणत कलमवाल्या हाताने
त्यावर शिक्का उमटवला.

सुर्‍याच्या शिक्षेसाठी मग
सुरा बनवणारा हात आला
’नव्यांसाठी हा कच्चा माल’
म्हणून जुना घेऊन गेला

समारंभपूर्वक त्याने मग
सुरा भट्टीत झोकून दिला
’शांतिदूत हा’ बघ्यांनी-
त्यावर पुष्पवर्षाव केला

वितळल्या सुर्‍यांमधून
अनेक नवे तयार केले.
सुरा धरणार्‍या हातांनी,
मोल मोजून घरी नेले.

त्या सुर्‍याचे रक्त आता
नव्यांमधून वाहात आहे
सुरा धरणारे हात मात्र
त्यामुळे निश्चिंत आहेत.

- रमताराम

- oOo -

* भारतात अतिशय गाजलेल्या खटल्यातील एका डरपोक आरोपी नेत्याचा युक्तिवाद.


हे वाचले का?

रविवार, ५ जुलै, २०२०

जग जागल्यांचे १० - पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर

मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष << मागील भाग
---

१९७४ सालच्या मे महिन्यात इलिनॉय राज्यात तीन गायी अचानक मृतावस्थेत आढळून आल्या. पोस्टमॉर्टेममध्ये त्यांचा मृत्यू सायनाइडच्या विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले. सायनाइड हे नैसर्गिक वातावरणात आढळून येणारे रसायन नव्हे. तपासाअंती असे दिसून आले की तेथील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सायनाइड, कॅडमिअम, शिसे, निकेल, जस्त वगैरे घातक द्र्व्ये मुरलेली आहेत. यांचा उगम होता जवळच असलेल्या ’बायरन सॅल्वेज यार्ड’मध्ये.

’बायरन सॅल्वेज यार्ड’ ही कचरा-डेपो (landfill) म्हणजे जमिनीवर कचरा जिरवण्याची जागा होती. बहुतेक उत्पादनप्रक्रियांदरम्यान निसर्गाला नि मानवालाही घातक अशी टाकाऊ द्रव्ये वा कचरा तयार होतो. अशा अनेक उद्योगांची उत्सर्जिते जिरवण्याची सेवा ही कंपनी पुरवीत होती. त्यांच्या ग्राहकांमध्ये तेलशुद्धिकरण कंपन्या, रंगनिर्मात्या कंपन्या, धातूच्या वस्तू बनवणारे कारखाने होते. या उत्पादकांचा कचरा योग्य त्या प्रक्रियेशिवाय जमिनीत गाडला जात होता. त्यातून अनेक घातक द्रव्ये आसपासच्या जमिनीत झिरपली होती.

WilliamSanjour

या विल्हेवाटीचे काही निसर्गसंरक्षक नियम शासनातर्फे बनवलेले असतात. या नियमांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकेत Environmental Protection Agency (EPA) ही संस्था काम करते. इलिनॉयमधील घटनेचा तपास करण्याचे काम विल्यम सँजुअर या तिच्या अधिकार्‍याकडे होते. औद्योगिक कचरा विल्हेवाट करणार्‍या अशा सुमारे ६०० कचरा-डेपोंबाबत धोक्याचे इशारे देणारे अहवाल सँजुअरच्या पुढाकाराने पुढच्या दोन-तीन वर्षांत तयार झाले. या अहवालांकडे खुद्द EPAने जरी दुर्लक्ष केले असले, तरी यातून निर्माण होणार्‍या भयानक परिस्थितीची जाणीव झालेल्या अनेक शास्त्रज्ञ, पर्यावरण-तज्ज्ञ आणि सँजुअरसारखे EPAचे अधिकारी यांनी शासनावर दबाव वाढवला. यातून १९७५ साली शासनाने ’Resource Conservation and Recovery Act (RCRA)’ कायदा पास केला. सँजुअरच्या कार्यकाळातले हे पहिले महत्वाचे यश होते.

सँजुअर काम करत असलेली EPA ही शासकीय संस्था आहे. तिचा उद्देशच पर्यावरणाच्या संरक्षणाचा आहे, जो साहजिकच औद्योगिक उत्पादकांच्या हिताच्या विरोधात जातो. कारण पर्यावरणविषयक बंधने उत्पादकांच्या दृष्टीने अनुत्पादक खर्चाला भाग पाडत असतात. हे उद्योजकच राजकारण्यांचे घोषित/अघोषित आर्थिक पाठीराखे असल्याने, त्यांच्या सोयीचे नियम आणि कायदे संसदेत आणि EPA सारख्या नियंत्रक संस्थांमध्ये केले जातील यासाठी ते ही उद्योगांना साहाय्य करत असतात. उद्योजकांच्या सोयीचे नियम, पळवाटा आणि संशोधन या संस्था, आणि उद्योजकांचे भाडोत्री संशोधक तयार करुन देताना दिसतात.

१९७८ मध्ये अमेरिकेत महागाईचा भडका उडाला आणि देश आर्थिक मंदीच्या वाटे चालू लागला होता. याला आळा घालण्यासाठी उद्योगांना चालना देणे आवश्यक ठरले. उद्योगांनी अर्थातच पहिली मागणी केली पर्यावरणविषयक निर्बंध शिथिल करण्याची. अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या आशीर्वादाने EPAचे असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर टॉम योर्लिंग यांनी घातक कचरा विल्हेवाटीबद्दलचे निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले. या सल्ल्याला न जुमानता आव्हान देण्याचे सँजुअरने ठरवले. याबाबत अमेरिकन सेनेटने नेमलेल्या चौकशी समितीसमोर १९७९ मध्ये त्याची साक्ष झाली. त्यात त्याने टॉम यॉर्लिंगने RCRA कायद्यातील तरतुदी दुबळ्या करण्याबाबत दिलेल्या सूचनांबाबत सेनेटला माहिती दिली. यात पेट्रोलियम आणि ऊर्जा कंपन्यांच्या सदोष कचरा व्यवस्थापनाबाबत कारवाई न करण्याचा निर्णयही समाविष्ट होता.

तब्बल पाच वर्ष उशीराने १९८२मध्ये EPAने एक तोळामासा प्रकृती असलेला ’घनकचरा नियंत्रण अधिनियम’ प्रसिद्ध केला. उद्योगस्नेही, अतिउत्साही माध्यमांनी ताबडतोब त्याची भलामण सुरु केली. परंतु त्यासंदर्भातील सँजुअरच्या अमेरिकन सेनेटसमोरील साक्षीने या प्रचारातील हवा काढून घेतली. सँजुअरच्या साक्षीदरम्यान त्याने सुचवलेल्या अनेक सुधारणा अंतर्भूत केलेला ’घातक घनकचरा अधिनियम’ पुढे दोन वर्षांनी अमेरिकन संसदेने पास केला.

यापुढेही घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेल्या पैसा घेऊन उद्योगांनी त्यांच्या केवळ जागा बदलणे, अशा कचर्‍यामुळे नजीकच्या गावा-शहरांमधील दूषित पाण्याच्या प्रश्न, सांडपाण्याचा खत म्हणून वापर करण्यातले धोके, RCRAच्या अंमलबजावणीबाबत केलेली टाळाटाळ, पर्यावरणीय निर्बंध शिथिल करण्याचे वा त्यात सूट देण्याचे राज्य पातळीवर प्रयत्न, अशा अनेक समस्यांबाबत सँजुअर आवाज उठवत राहिला. पर्यावरणविषयक मुद्द्यांबाबत जागृती करण्यासाठी विविध व्यासपीठांवरुन प्रयत्न केले.

EPA-building

असा चळवळ्या कर्मचारी EPAला ’नाकापेक्षा मोती जड’ वाटू लागला नसता तरच नवल. त्यातून त्याच्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न सुरु झाला. संस्थेशी संबंधित विषयांबाबत बाहेरील व्यासपीठांवरुन बोलण्यास त्याला बंदी घालण्यात आली. या बंधनांमुळे अमेरिकन घटनेच्या पहिल्या परिशिष्टाच्या अंतर्गत देऊ केलेल्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असल्याचा दावा त्याने दाखल केला. ’सँजुअर विरुद्ध EPA’ हा अमेरिकेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा खटला मानला जातो. हा खटला सँजुअर याने जिंकला. या विजयाने कर्मचार्‍याला आपल्या मालक संस्था/उद्योगांतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्याचा हक्क अधोरेखित झाला. गैरकृत्ये, चुका या गुप्ततेच्या नियमांवर बोट ठेवून झाकता येणार नाहीत हे स्पष्ट झाले. पुढे अशाच स्वरुपाच्या अनेक खटल्यांमधे या खटल्याचा संदर्भ वारंवार घेतला गेला.

२००१ मध्ये सँजुअर निवृत्त झाला आणि EPA तसंच उद्योगांतील पर्यावरण-घातक प्रकारांविरोधात आवाज उठवण्याचे नि त्यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम करण्यास तो मोकळा झाला. आपल्या अनुभवांवर आणि संघर्षांवर आधारित ’Why EPA Is Like It Is and What Can be Done About It' हा दीर्घ मेमो आणि ’From The Files Of A Whistleblower: Or how EPA was captured by the industry it regulated.’ हे पुस्तक लिहिले आहे.

अमेरिकेसारख्या विकसित देशांपेक्षाही विकसनशील देशांत पर्यावरणाच्या र्‍हासाचा वेग अधिक असतो. कारण तिथे त्या विकासाची गरजही अधिक असते. आपल्या देशात अलिकडच्या काही वर्षांत उद्योगांच्या सोयीसाठी अभयारण्यातील उद्योगांवरील बंधने, समुद्रालगत खारफुटीच्या जंगलांवरील निर्बंध शिथिल करणे वगैरे पर्यावरण-घातक निर्णय विकासाच्या नावाखाली घेतले गेले आहेत. सध्या अवजड उद्योग मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय एकाच व्यक्तीकडे आहे; ते कशासाठी हे वेगळे सांगायची गरज नाही!

पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि त्याचे होणारे घातक परिणाम यांचे परिणाम काही पिढ्या पुढे दिसणार असतात. त्या पिढ्यांचे आणि निसर्गाचे वकीलपत्र घेऊन आज कुणी उभे राहू शकत नाही. सॅंजुअरसारखा एखादा राहिलाच, तर त्या विकासाचे लाभधारक असलेले सामान्य लोकही त्याला ’विकास-विरोधक’ म्हणून झटकून टाकत असतात.

- oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ५ जुलै २०२०)

        पुढील भाग >> ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स


हे वाचले का?

शनिवार, ४ जुलै, २०२०

मी एक मध्यमवर्गीय पुरोगामी(?)

संघ-भाजपने मुस्लिम/काँग्रेसने (सामाजिक/राजकीय) देशाचं/धर्माचं वाटोळं केलं म्हणायचं, ब्राह्मणांनी दलितांच्या आरक्षणाच्या नावे बेंबीच्या देठापासून बोंब मारायची, दलित विचारवंत म्हणवणार्‍यांनी सगळ्या सामाजिक समस्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेमुळे आहेत म्हणायचे, पुस्तकी-फेमिनिस्टांना सगळे काही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाप दिसते, संघाची वाढ हा समाजवाद्यांचा गुन्हा म्हणून कम्युनिस्ट पाच मैलाचा लेख लिहितात... आणि ’स्त्री जात तेवढी निमकहराम’ म्हणणार्‍या 'पुण्यप्रभाव’मधल्या सुदामसारखे यच्चयावत पुरोगामी ’मध्यमवर्ग तेवढा निमकहराम’चा जप करत असतात.

डावी असोत वा उजवी, माणसं शत्रूलक्ष्यी मांडणीच्या मानसिकतेतून बाहेरच यायला तयार नाहीत. मूळ व्याधीचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधण्याऐवजी हा जो खापरफोडेपणा सर्वव्यापी झाला आहे, तीच आपल्या समाजाच्या प्रगतीमधील प्रचंड मोठी धोंड आहे असे मी मानतो.

SaveTheMiddleClass

पुरोगाम्यांच्या उठसूठ मध्यमवर्गीयांच्या नावे खडे फोडण्याला कंटाळून मी अनेक गटांपासून दूर झालो. बरं शिंचे हे ’मध्यमवर्गीय’ म्हणताना नक्की कुठला गट वा वर्ग हे प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे असते. त्या वर्गाच्या नावे शंख करणार्‍या चार-पाच पुरोगाम्यांना ’मध्यमवर्गीय म्हणजे नक्की कोण रे?’ असा प्रश्न विचारुन जरा खोलात नेण्याचा प्रयत्न केला. बहुतेकांना कुणीतरी ’ते’ लोक इतकेच समजले आहे असे दिसते.

छानपैकी फ्लॅट, गाडी वगैरे बाळगणारे, मुलांना उत्तम विद्यापीठात शिकवणारे मध्यमवर्गीयांच्या नावे शंख करताना पाहून हसायला येते. अरे बाळा, इतरांचे सोड. किमान तू तरी बाहेर पड की यातून. कम्युनिस्टांचे ते डी-क्लास का काय म्हणतात ते होऊन मग बोल. उगा लोहिया वा मार्क्सची जपमाळ ओढून त्यातून बाहेर पडल्याचा आव कशाला? कदाचित सगळ्यांनी एकसमयावच्छेदेकरुन (हा सावरकरांचा, पुरोगाम्यांच्या सैतानाचा लाडका शब्द बरं का... आणि हो ते ही शिंचे मध्यमवर्गीय. :) ) मध्यमवर्गीय होणे ही डी-क्लास होण्याची नवी व्याख्या असावी.

एका डाव्या पत्रकाराने मजेशीर पळवाट काढली. ती म्हणे, ’अरे मध्यमवर्गीय असणे ही मानसिकता आहे. आर्थिक स्थितीचा काही संबंध नाही.’ हे म्हणजे ’तुमची खरी श्रद्धा असेल तर फळ मिळेल, अन्यथा फळ मिळत नाही’ टाईपचे आर्ग्युमेंट झाले. कारण यात तुम्हाला फळ मिळाले नाही की खरी श्रद्धा नाही असे जाहीर करण्याची सोय आहे. (एक आवाज: रमताराम, तुम्ही पाखंडी आहात.) किंवा आधी ब्राह्मणांच्या नावे दोषारोप करुन मुद्दा अंगाशी आल्यावर ’मी ब्राह्मणांबद्दल नव्हे, ब्राह्मण्यवादी मानसिकतेबद्दल बोलत होतो.’ म्हणून शेपूट सोडवण्यासारखे आहे. (एक आवाज: रमताराम मनुवादी आहेत) किंवा ’संघ प्रामाणिकपणे समजावून घेतलात तर तुम्हाला समजेल’ म्हणत, जोवर तुम्ही संघ श्रेष्ठ म्हणत नाही तोवर तुमचे प्रयत्न प्रामाणिक नाहीत असे म्हणण्याची सोय करून ठेवली आहे. (एक आवाज: रमताराम अर्बन नक्षलवादी आहेत.)

विधानातच, व्याख्येतच मेख मारुन कार्यकारणभाव हा वर्तुळाकृती तर्कात बांधून टाकलेला असतो.

उजवे राष्ट्रवादी विचारवंत पु.ग. सहस्रबुद्धे (विचारवंतात उजवे किंवा उजव्यांमध्ये विचारवंत असूच शकत नाहीत असे समज असणारे सो-कॉल्ड डावे त्यांना तसे मानणार नाहीत हा मुद्दा अलाहिदा) यांच्या 'नरोटीची उपासना’ या लेखाची मला राहून राहून आठवण होते. चितोड स्वतंत्र होईतो गवतावर झोपू ही प्रतिज्ञा सुखासीन आयुष्यात गादीखाली गवताच्या चार काड्या ठेवून सिद्ध होते असे मानणार्‍या चितोड राजघराण्यातील मुघल मांडलिकांचे उदाहरण त्यांनी दिले होते. तसेच हे मध्यमवर्गीय पुरोगामी. लेखनात, तोंडाने मध्यमवर्गीय ताडन केले की यांचे डावेपण सिद्ध होते.

प्रत्येक विचाराचा, धर्माचा एक देव नि एक सैतान असतो. तसे मार्क्स वा लोहियांच्या जोडीला मध्यमवर्ग नावाचा सैतान ठेवून दिला की उरला वेळ छान उबदार मध्यवर्गीय आयुष्य जगायला मोकळे, असे असावे बहुधा. अमेरिकेत राहून वर्षाला एक सत्यनारायण घातला की ’आपल्या मुळांना विसरले नाहीत हं’चे सर्टिफिकेट पदरात पाडून घेणार्‍यांसारखे, वर्षातून एकदा मध्यमवर्गीयांवर आगपाखड करणारा लेख वा व्याख्यान झोडले की उरलेले मध्यमवर्गीय आयुष्य सुखाने व्यतीत करता येते. वर पुन्हा धार्मिकांच्या ’खरा धार्मिक सत्प्रवृत्त असतो. तो अमुक सत्प्रवृत्त नाही म्हणाजे तो खरा धार्मिक नाही.’ या तत्वाचा व्यत्यास म्हणजे, ’मी मनाने मध्यमवर्गीय नाही. आर्थिक स्थितीचा वृत्तीशी काही संबंध नाही.’ हा उफराटा तर्क द्यायला तयार.

आता मी ’मध्यमवर्गीय... फख्र है’ नावाचे नाटकच लिहिणार आहे, मध्यवर्गीय समाज हा एकुणात व्यवस्थेचा कणा असतो हे सिद्ध करणारे. मध्यमवर्गीयांच्या नावे खापर फोडणारे ’अ‍ॅण्टी-मध्यमवर्गीय-वर्ग-द्रोही’ असतात, छान मध्यमवर्गीय आयुष्य जगतात. जगोत बापडे. हे हायक्लासही होऊ नयेत वा डी-क्लास.

विचाराने मी पुरोगामी आहे असा माझा समज आहे. पण धर्म, राष्ट्र, शिवछत्रपती, आंबेडकर, मार्क्सापर्यंत सर्वांचे जे ठेकेदार असतात, जे तुम्ही ’खरे इकडचे की छुपे तिकडचे’ याचा निवाडा - फुल टाईम - करत असतात. या सर्वगटीय ठेकेदारांचे ’आम्ही छुपे तिकडचे आहोत’ यावर एकमत आहे, असे आम्हाला सगळीकडच्या आतल्या गोटातून समजले आहे. तेव्हा आता आम्ही आपले ज्ञानोबावादी, ’जो जे वांच्छिल तो ते लाहो’ म्हणणारे. ’फक्त मलाच लाहो, त्याला न लाहो’ म्हणण्यासारखा क्षुद्रपणा दाखवला नाहीत तरी पुरे, एवढी माफक अपेक्षा ठेवणारे. :)

-oOo-


हे वाचले का?