मनुष्य जनावराच्या पातळीवरून टोळीच्या मानसिकतेत रूतलेला राहतो. त्यामुळे तो नागर झाला तरी सुसंस्कृत झाला आहे यावर माझा विश्वास नाही. टोळ्यांची व्याख्या बदललेली आहे इतकेच!
समोरच्याला एखाद्या गटाचा भाग म्हणूनच ओळखत, त्या गटाबद्दलचे आपले पूर्वग्रह त्याच्यावर लादतच आपण त्यांच्याशी आपली वर्तणूक कशी असावी हे ठरवतो. आपल्या पूर्वग्रहाला प्रतिकूल असे हजारो पुरावे त्याच्यासंदर्भात दिसून आले तरी ते सारे अपवाद म्हणून नाकारतो आणि आपल्या पूर्वग्रहाला अनुकूल असे हातभर वा बोटभर पुरावे दाखवून आपणच बरोबर असल्याचे स्वत:ला नि इतरांना पटवत राहतो.
एखाद्याने असल्या मूर्ख जमावांचा भाग न होणे हे ही एकसाचीकरणाच्या काडेपेट्यांत राहू पाहणार्यांना रुचत नाही. मग सतत ते तुम्हाला या ना त्या डबीत बसवू पाहात असतात. स्वत: खुजे असतात. तुम्हीही खुजे राहावे अशी अपेक्षा ठेवतात... नव्हे स्वत:च न्यायाधीश होत तसे जाहीरही करतात.
आपला झाडू घेऊन ही अवाढव्य गटारगंगा स्वच्छ करणे अशक्य होते तेव्हा अशा जमावांतील व्यक्तींशी संवाद थांबवणे हा एकच शहाणपणाचा आणि मन:शांतीचा उपाय असू शकतो.
जमावाच्या पाठिंब्याविना यातून तुम्ही इतरांसाठी शिरोधार्य असे तत्वज्ञान वा विचार रुजवू शकणार नाही कदाचित, पण एक उदाहरण नक्की समोर ठेवता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा