सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

न भावलेला ’आषाढातील एक दिवस’

कविकुलगुरु कालिदास हा भरतखंडातील कविश्रेष्ठांचाही मेरुमणि. त्याच्या मेघदूताने देशकालाच्या, भाषेच्या सीमा ओलांडून अनेकांना भुरळ घातली, आकर्षित केले. अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने एकेक दृष्टीकोन घेऊन त्यातील सौंदर्य, त्यातील छंदशास्त्र, त्यातील भूगोल उलगडण्याच्या यथामती प्रयत्न केला, काही कविंनी आपल्यापुरते आपले 'मेघदूत' लिहून काव्यक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेत गदिमांनी या विरहाला चिरविरहाच्या पातळीवर नेऊन एक अजोड कविता लिहिली.

अनेकांनी त्याचे आपापल्या भाषांतून कुठे स्वैर, कुठे समश्लोकी अनुवाद करून त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करून पाहिला तर काहींनी याही पुढे जाऊन या सार्‍या अनुवादांच्या तौलनिक अभ्यासातून कुणाला किती कालिदास सापडतो याचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचे तर भारतीय साहित्याला पडलेले कालिदास हे चिरवांच्छित स्वप्न बनून राहिले आहे.

AashaadhPoster

नव्या जमान्यात कलाकारातला माणूस शोधण्याच्या काळात कालिदास हा वैयक्तिक आयुष्यात व्यक्ति म्हणून कसा होता, आसपासच्या लोकांना कसा दिसत असे हे तपासणेही अभ्यासाचे एक अंग समजले जाणे ओघाने आलेच. समीक्षकांनी आपल्या कोरड्या मापदंडांच्या आधारे हा कालिदास उभा केला असेलच. पण ललित साहित्याच्या क्षेत्रातही असे प्रयत्न झाले आहेत. कालिदासाच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे मोहन राकेश यांचे 'आषाढ का एक दिन' हा भारतीय नाट्यक्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जातो.

तसं पाहिलं तर या नाटकात ऐतिहासिक सत्य किती नि नाट्यनिर्मितीसाठी घेतलेले स्वातंत्र्य किती हे मला ठाऊक नाही, नाटकाचा आस्वाद घेऊ पाहणार्‍याला त्याची आवश्यकताही नसावी. मेघदूत या काव्यातून दिसणारा प्रेमिकांचा विरह हा कदाचित कालिदासाच्या वैयक्तिक अनुभवाचा भाग असावा असे गृहित धरून मोहनबाबूंनी मल्लिका नावाची त्याची सखी, प्रणयिनी निर्माण केली, त्या दोघांचा सवंगडी, मित्र असलेला नि त्या दोघांना नजरेसमोर नकोसा झालेला असा विलोम निर्माण केला आणि त्या तिघांच्या भोवती कालिदासाच्या आयुष्याची मांडणी केली.

या तीन अंकी नाटकात प्रत्येक अंक हा ढोबळ मानाने कालिदासाच्या आयुष्यातील एकेका टप्प्याचे अवलोकन करतो. पहिल्या अंकात कालिदास, मल्लिका नि विलोम यांच्या गावातील आयुष्याचा. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व नि परस्पर नात्यांची ओळख करून देणारा. या अंकाच्या शेवटीच कालिदासाच्या आयुष्यात एक निर्णायक वळण येते नि पुढच्या अंकातील त्याच्या आयुष्याची पायाभरणी करून जाते.

दुसर्‍या अंकात कालिदास हा प्रथम उज्जैनचा राजकवी, मग राजकन्या प्रियंगुमंजरीशी विवाह करून गुप्त कुळाचा जावई नि अखेर - कदाचित त्याचेच बक्षीस म्हणून - 'मातृगुप्त' हे नाव धारण करून काश्मीराधिपती म्हणून तिथे राज्य करू लागतो. परंतु या अंकात कालिदास कुठेच येत नाही, त्याच्या आयुष्यातील या घटना अन्य पात्रांच्या तोंडूनच मल्लिकेला समजत जातात.

त्याच्या विविध काव्यांच्या प्रती देखील तिला उज्जैनहून येणार्‍या व्यापार्‍यांकडून मागवून घ्याव्या लागतात. कालिदास पुढे कितीही स्वत:चे समर्थन करू पाहत असला तरी त्याने उज्जैनला आल्यापासून रचलेल्या एकाही काव्याची प्रत स्वत: मल्लिकेसाठी धाडलेली नाही.

तिसर्‍या अंकात आपल्या राजकीय आयुष्यात पराभूत झालेला कालिदास परतून आपल्या प्रतिभेचा मूलस्रोत असलेल्या आपल्या गावी येतो, मल्लिकेकडे येतो. हे सारे प्रामुख्याने मल्लिकेचे आयुष्य मांडते. त्या अर्थाने हे नाटक हा मेघदूताचा अँटिथिसिस म्हणावा लागेल. मेघदूताच्या माध्यमातून जर कालिदासाने आपल्या प्रियेविना कंठाव्या लागणार्‍या आयुष्याची कर्मकहाणी आपल्या प्रियेसाठी लिहिली असेल, तर त्याने एकाकी सोडलेल्या त्याच्या प्रियेची कैफियत कुणी मांडावी? ती तर कायमच मूकपणे त्याला साथ देण्यास कटिबद्ध असते, अंबिकेच्या - आपल्या आईच्या - वात्सल्ययुक्त संतापालाही भीक न घालता. हे नाटक त्या मल्लिकेची जीवनकहाणी मांडून एक वर्तुळ पुरे करते. तीन अंकाच्या प्रवासात हळूहळू ढासळत जाणारे तिचे घर हे जणू तिच्या हरत चाललेल्या आयुष्याचेच प्रतीक बनून राहते.

अतुल पेठेंनी उभा केलेला असल्याने कालच्या प्रयोगाकडून खूपच अपेक्षा होत्या. कदाचित आधीच उंचावलेल्या अपेक्षा बहुधा निराशा पदरी आणतात तसेच काहीसे घडले. लेखाच्या मर्यादेत किती विस्ताराने मांडता येईल ठाऊक नाही, पण दोन तीन ढोबळ गोष्टी नोंदवून ठेवतो.

कालिदासाचा मागे राहिलेला भाग म्हणून उभा असलेला विलोम कायिक नि वाचिक अभिनयात संपूर्ण छाप पाडून गेला. ज्याने केवळ पार्श्वभूमी, परिप्रेक्ष्य प्रदान करावे ते पात्रच नाटकाच्या सादरीकरणाचा गाभा बनून राहिल्यासारखे भासले. मेघदूतातला मेघ ही जशी कालिदासाची अजरामर निर्मिती आहे तसेच हा विलोम मोहनबाबूंची ही कल्पक निर्मिती आहे.

VilomConfronts
विलोम कालिदासाला जाब विचारतो आहे.

हा विलोम म्हणजे कालिदासाचा मागे राहिलेला भाग आहे. एके ठिकाणी तो स्वत:च म्हणतो की ’कालिदास म्हणजे यशस्वी विलोम, आणि विलोम म्हणजे अयशस्वी कालिदास’. हा एकाच वेळी कालिदासाचा प्रतिस्पर्धी आहे आणि मित्रही. असे असूनही त्याच्या खलनायकी वृत्ती नाही. असलीच तर एक आपलेपणा असलेल्या टीकाकाराची.

बालपणीचे सवंगडी असलेले हे दोघे, एक पुढे गेला तर ऊर्जा, कुवत कमी पडल्याने तो मागे राहिला. अशा मागे राहिलेल्यांच्या मनात त्याबाबत विषाद उरतोच, विलोमच्या मनातही तो आहे. पण त्याचबरोबर कालिदासाला नेमके ओळखणारा तोच आहे. वेळोवेळी नेमके प्रश्न विचारून तो कालिदासाला अडचणीत टाकतो. असे असूनही त्याच्या मनात कालिदासाबाबत तिरस्कार नाही, राग नाही. आहे ती केवळ त्याच्याबद्दलची असूया. तीही कालिदासाच्या कवि म्हणून मिळालेल्या यशामुळे अधिक, मल्लिकेच्या मनातील त्याला हवा असलेला कोपरा कालिदासाने आधीच पटकावल्याने आलेल्या निराशेतून अधिक, की अलौकिक काव्यांचा निर्माता म्हणून कालिदासाच्या पायी चालत आलेल्या राजैश्वर्यामुळे अधिक हे सांगता येणे अवघड आहे.

परंतु या तीनहीपेक्षा मोठे शल्य आहे ते मित्र खूप उंचीवर पोहोचल्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही,त्यातून आपला जिवाभावाचा सखा आपण गमावला याचे. त्यामुळेच त्याच्या स्वरात उपहास आहे, कालिदासाच्या वर्तणुकीतील बेजबाबदार आत्ममग्न वृत्तीला थेट उघडे पाडण्याची आस आहे, त्याच्या आत्मकेंद्रित वृत्तीची चीड आहे, पण तिरस्कार नाही, कुटीलपणा नाही.

कालिदास उज्जैनला जाणार तो 'मल्लिकेशी विवाह करून का?' हा रोखठोक प्रश्न विचारण्यामागचे हेतू हे आहेत. कारण खरंच तसं झालं तर मल्लिकेला आपलीशी करण्याचा त्याची स्वतःची इच्छा धुळीला मिळणार असते. कदाचित मल्लिकेच्या कालिदासाशी असलेल्या नात्यावर समाजमान्यतेची मोहोर उमटावी असा सद्‌हेतूही असावा. फक्त तो तसा शब्दातून व्यक्त होत नाही. उलट एखाद्याला टोचून उद्युक्त करावे तसा उपहासातून होतो.

कारण कदाचित मनाच्या तळाशी तो कितीही सत्शील नि कालिदास, मल्लिका यांचा हितैषी असला तरी खेळगडी असलेल्या त्या तिघांत तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचताना तो परका झाला; आधी कालिदासाने त्याला तसा मानला नि मल्लिकेलाही तसे मानण्यास भाग पाडले या विषादाचा तवंग त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या पृष्ठभागी तरंगतो आहे. मनाच्या तळातून येणारी त्याची सद्भावना या तवंगाचे अस्तर घेऊनच बाहेर येत आहे नि त्याच्या हेतूपेक्षा वृत्तीच्या मलीनतेचा दोषच तेवढा पदरी येतो आहे.

अखेर कालिदासाला समाजमान्य स्वरूपात न गवसलेली मल्लिका तो मिळवतो नि आपल्यापुरता कालिदासावरचा एक छोटासा - कदाचित बिनमहत्त्वाचा हे त्यालाही ठाऊक आहे असा -विजय तो मिळवतो. पण तरीही त्याबाबत कालिदासाला हिणवण्याइतक्या क्षुद्र पातळीवर तो उतरत नाही. उलट परतून आलेला कालिदास नि मल्लिका यांना एकांतात बोलण्याची संधी देऊन कालिदासाला आणखीनच उपकृत करून ठेवतो. (कदाचित हा ही आणखी एक छोटा विजय मिळवण्याचा प्रयत्न असू शकेल. कालिदासाने मल्लिकेच्या संदर्भात विलोमच्या उपस्थितीबाबत नेहमीच नाराजी व्यक्त केलेली आहे नि मल्लिकेलाही तेच मत स्वीकारायला भागही पाडले आहे. तेव्हा त्या तुलनेत मल्लिकेबरोबर एकांतात राहण्यास कालिदासाला अनुमती देऊन विलोमने त्यावर कडी करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो.)

कालच्या प्रयोगातला विलोम या सार्‍या वैशिष्ट्यांसह उभा राहिलेला दिसला. उपहासाला कुत्सितपणाच्या नि कडवटपणाला तिरस्काराच्या पातळीवर उतरू न देता विलोम उभा करणे ही तो साकार करणार्‍या ओम भुतकरच्या अभिनयगुणांना दाद द्यायलाच हवी.

KalidaasConfession
कालिदासाचे आत्मविलोकन.

तिसर्‍या अंकात गावाकडे, मल्लिकेकडे परतून आलेल्या कालिदासाचे दीर्घ भाषण, मोनोलॉग अपेक्षित उंची गाठण्यास अपयशी ठरले असे वाटले. हे उरी फुटून निघालेल्या, सर्वस्व हरलेल्या संवेदनशील, कवि मनाच्या व्यक्तीचे आक्रंदन न भासता निव्वळ एक अकॅडेमिक डिस्कोर्स वाटला. भावनेचा पूर्ण अभाव असलेला. कालिदासाचे काम करणार्‍या आलोक राजवाडेला कदाचित त्यातील नेमके मर्म सापडले नसावे. या दीर्घ मोनोलोग मधे अनेक छोटे छोटे चढ-उतार आहेत. एखादा कसलेला अभिनेता त्याचे सोने करील. फार कशाला विलोम’चे काम करणारा ओम भुतकर जसे त्या व्यक्तिमत्त्वाचे छोटे छोटे कंगोरे व्यवस्थित दाखवून जातो, त्या मानाने हा कालिदास अगदीच एकसुरी.

कालिदासाच्या या दीर्घ भाषणाला अनेक पैलू आहेत. आपल्याकडून घडलेल्या अनेक चुकांची तो कबुली देतो आहे. काश्मीराधिपती झाल्यावर, कालिदासाचा 'मातृगुप्त' झाल्यावरही एकदा तो आपल्या गावी आला होता, पण तेव्हा त्याने मल्लिकेची भेट घेणे टाळले होते. त्यामागे आपला दुबळेपणा कसा होता हे सांगून तो तिला मोठेपणा देऊ पाहतो नि बदल्यात प्रामाणिकपणाचे श्रेय घेऊ पाहतो. अंबिकेने आपल्या स्वार्थी, आत्मकेंद्रित नि आसक्त वृत्तीबाबत केलेले मूल्यमापन किती योग्य होते हे काळाच्या ओघात आपल्याला दिसून आले, हे देखील तो सांगतो, आणि याच वेळी मुळात अंबिकेपेक्षाही ज्याने हे अधिक नेमकेपणे ओळखले होते त्या विलोमचा उल्लेख चलाखीने टाळतो.

अंबिकेलाच नव्हे तर आपल्या स्वत:लाही जी भीती वाटत होती त्या आपल्या सुखलोलुपतेला लाखोली वाहताना, त्या परिस्थितीत आपली कशी घुसमट होत होती हे मल्लिकेला पटवून देताना जर विक्रमादित्य महाराजांच्या मृत्यूनंतर गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले नसते, केवळ गुप्त कुळाचा जावई या एकाच गुणावर (आणि कदाचित कवी असल्याने, राजकारणात रस नसल्याने डोईजड होण्याची भीती बाळगण्याचे कारण नसण्याने) काश्मीराधिपती झालेल्या मातृगुप्ताला आपल्या राज्यात बंडाळीचा सामना करावा लागला नसता. आणि अंगभूत नेतृत्वाचा अभाव असल्याने परागंदा व्हावे लागले नसते, 'तर' ही उपरती त्याला झाली असती का, तो असा परतून आला असता का हा प्रश्न अनुत्तरितच ठेवतो. मल्लिकाही सुज्ञपणे हा प्रश्न त्याला विचारत नाहीच, तो फक्त तुम्हा आम्हा प्रेक्षकांच्या मनातच उमटतो.

एकाच वेळी आपल्या मागच्या आयुष्याचे सिंहावलोकन, मूल्यमापन करताना, आपल्या हातून घडलेल्या चुका, प्रमाद यांचा धांडोळा घेताना, त्यांची कबुली देताना, ते जुने जग त्याला पुन्हा मूळ स्थितीत हवे आहे हे अप्रत्यक्षपणे तो सूचित करतो आहे.

आपल्या सार्‍या यशाचे श्रेय इथल्या भूमीला, आपल्या प्रेरणेला - मल्लिकेला - देताना मनात कुठेतरी ती प्रेरणा पुन्हा गवसावी हा सुप्त हेतू आहे. म्हणूनच तर तो काश्मीरमधून परागंदा होऊन आपल्या मूळ भूमीत परतला आहे, तो त्या आपल्या प्रतिभेच्या त्या मूलस्रोताच्या शोधात. त्याने स्वतःच मल्लिकेकडे कबुली दिली आहे की तिथे असताना जे काही त्याने निर्मिले त्यांचे भांडवल त्याने इथूनच नेले होते, तिथले असे काहीच नवे त्याला गवसले नव्हते.

तेव्हा कविकुलगुरु म्हणून आदरणीय असलेला कालिदास आपल्या त्या काव्य-प्रतिभेच्या, त्या मूळ भूमीतून नेलेले सारे संचित वापरून संपल्यावर, त्या आधारे मिळालेले सुखवस्तू, कीर्तिसंपन्न आयुष्य गमावल्यावर पुन्हा नवे संचित मिळवण्याच्या हेतूनेच तो परतून आला आहे. हे सारे प्रामाणिक भासणारे कथन त्या स्वार्थी हेतूने कायम वेटाळून राहिलेले आहे.

पण पूर्वीच्या ज्या निर्भर आयुष्यात तो परतून येऊ पाहतोय तिथे स्थान मिळावे इतका तो निर्भर राहिला आहे का, याची खुद्द त्याच्याच मनात शंका आहे (तुम्हा आम्हा सामान्यांच्या मनात तर ती ही नसते.) शिवाय जिथे तो परतून येऊ पाहतोय ते तेच आहे का जे तो मागे सोडून गेला होता? इथे सर्वशक्तिमान काळाने त्याचे ते जगही पुरे बदलून टाकल्याची प्रचीती त्याला येते आहे. इंग्रजीतील You can't go home again या उक्तीची पुरेपूर जाणीव त्याला तिथे होते आहे. काळाचे चक्र आपण कितीही प्रयत्न केला तरी मागे फिरवता येत नाही ही विदारक जाणीच घेऊनच त्याला आता पुढचा प्रवास करावा लागणार आहे हे ही त्याला उमजले आहे.

हे सारे गुंतागुंतीचे, एकाच वेळी सत्यकथन करणारे, थोडे प्रामाणिक, थोडे अप्रामाणिक, स्वार्थलोलुप तरीही गमावल्या संचिताच्या वेदनेचे क्रंदन असलेले व्यामिश्र स्वरूपाचे भाषण हा नाटकाचा परमोत्कर्षबिंदू. कालिदासाच्या आयुष्यातील दोनही प्रवाह इथे अधेमधे दृश्यमान व्हायला हवेत. जिला आपण सखी मानले पण सहचरी मानले नाही, भावनेच्या हिंदोळ्यावरील नात्याला स्त्री-पुरूषाच्या, नर-मादीच्या नात्याच्या पातळीवर येऊ दिले नाही हा दावा करताना, मल्लिकेला ते पटवून देताना अंबिकेचा, आर्य मातुलांचा रोष नि विलोमच्या टीकेला तो सामोरा गेला, तो अखेरच्या क्षणी मल्लिकेला सवत्स स्थितीत पाहून तिथून निघून जातो, निव्वळ माणसाच्या पातळीवर उरतो. त्याचे हे दुभंग, दुटप्पी व्यक्तिमत्त्व या दीर्घ भाषणातून उलगडून यायला हवे. कालच्या सादरीकरणात हे सारेच केवळ शब्दातून समजून घ्यावे लागले असे खेदाने म्हणावे लागते.

एक सहज जाताजाता नोंदवून ठेवण्याजोगी बाब म्हणजे पहिल्या अंकात मल्लिका, तर तिसर्‍या अंकात आर्य मातुल नि खुद्द कालिदास हे मुसळधार पावसात भिजून आलेले आहेत. परंतु इतक्या मुसळधार पावसात भिजून आल्यानंतरही हे लोक एकदोनदा कपडे झटकण्यापलिकडे त्याचा परिणाम कुठेच दाखवत नाहीत. याउलट विलोम बोलता बोलता चिखल झटकतो, उत्तरीय पिळून काढतो, ते काढून दोन्ही हातात धरून झटकतो विविध हालचालीतून भिजलेपणाचे नि त्या निमित्ताने पावसाचे अस्तित्व दर्शवतो.

हे खास करून उल्लेखनीय ही आवश्यकही. आवश्यक यासाठी की पेठेंनी प्रयोग उभा करताना जड वस्तूंच्या अस्तित्वाला संपूर्ण फाटा दिलेला आहे. अंबिका धान्य कांडत असलेले उखळ, तिच्या हातीचे मुसळ, ज्या चुलीवर मल्लिकेसाठी दूध गरम करून ठेवले ती चूल, मल्लिका पुढे राजवधू प्रियंगुमंजरीला द्रोणातून पाणी देते तो पानांचा द्रोण हे सारे केवळ मुद्राभिनयातून उभे करणे अपेक्षित आहे नि बरेचसे साधलेही आहे.

परंतु पावसाचे अस्तित्व- विलोम वगळता - कुणीही जाणिवेच्या पातळीवर दाखवून देत नाही. 'आषाढातील एक दिवस' हे शीर्षक देऊन मोहन राकेश यांनी त्या पावसाचे कहाणीतील अतूट स्थान आधीच अधोरेखित करून ठेवले असताना हे अधिकच खटकणारे. याशिवाय संस्कृत कविकुलगुरु कालिदासाच्या तोंडून अधूनमधून येणारे न्हवतं, म्हाईती या वळणाचे उच्चार खटकले. अर्थातच ही नाटककाराची समस्या नव्हे, तर अभिनेत्याचा, दिग्दर्शकाचा गाफीलपणा म्हणावा लागेल.

एकुणात सांगायचे तर हा आषाढातील एक दिवस नेटकेपणे उभा केला खरा, आम्हाला भावला मात्र नाही.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ३० जुलै, २०१३

काही नि:शब्दकथा

(कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी. जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी नोंदवणारा अर्ज करता येईल.)

प्राचीन:

WoldAndTheLamb
https://steemit.com/ येथून साभार

एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. "तू माझ्या पाण्याला तोंड लावून ते उष्टे करत आहेस." लांडगा कोकरावर खेकसला.

"असं कसं होईल वृकराज. मी तर प्रवाहाच्या खालच्या बाजूला पाणी पीत आहे, इकडून पाणी उलट तुमच्या दिशेने कसे जाईल."

"तू तर भलताच उद्धट दिसतोस, वर्षभरापूर्वीही तू माझ्याशी असेच उद्धट वर्तन केले होतेस." लांडगा संतापाने ओरडला.

"छे हो. मी कसा असेन तो, मी तर जेमतेम सहा महिन्याचा आहे हो." भयाने कापत असलेलं कोकरू कसंबसं बोललं.

"तू नाही तुझा बाप असेल तो. " लांडगा गरजला. "शेवटी तू ही त्याचाच मुलगा. त्याच्याहून उद्धट दिसतोस. थांब तुला तुझ्या उद्धटपणाचा चांगलाच धडा शिकवतो आता."

असे म्हणून लांडग्याने एका झेपेत कोकराला खाली पाडले नि त्याचा चट्टामट्टा केला.

आधुनिकपूर्व:

’देवभूमी' म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात देवाच्या कृपेने सारं काही आलबेल होतं. वर्षभर असणारा भक्तांचा राबता नि वर्षातून एकदा होणारी 'वारी' यांची हुशारीने मेंदूपेरणी करून देवाने आपल्या भूमीतल्या लोकांची पोटापाण्याची किमान सोय करून दिली होती.

शिवाय यात हल्ली भरणा झालेल्या हौशी, उच्चशिक्षित वारकर्‍यांचा भरणाही झाल्याने त्यांना आवश्यक असणार्‍या अद्ययावत सोयीदेखील आता तिथे उपलब्ध झाल्या होत्या. शिवाय परकीय चलन म्हणजे जणू 'देवाचा प्रसाद'च मानून त्यासाठी शासनाने, प्रशासनाने बाहेरून येणार्‍या पर्यटकांसाठी हिरव्या डोंगरांवर लाल गालिचा अंथरला होता.

कसं कोण जाणे (कदाचित इंटलिजन्स फेल्युअर असावं) पण - म्हणे - देव या सार्‍यांवर चिडला. त्याने खुद्द वरुणराजाला (त्यातही ही पावर वरुणाची की इन्द्राची यावर दोघांनी शड्डू ठोकले, 'आज या तो तुम नहीं या मैं नहीं' हा निर्वाणीचा इशारा दिला. अखेर देवबप्पाने दोघांना दहा मिनिटे अंगठे धरून उभे राहण्याची शिक्षा दिली नि अखेर वरुणाचे 'टेंडर' मंजूर केले, म्हणे.) आणि या भूमीत अतिवृष्टी करण्याची आज्ञा दिली.

झालं. देवभूमीत न भूतो न भविष्यती असा पाऊस कोसळला. जोडीला धरणीकंप पाठवण्याचा पण विचार होता पण तोवर देवाचा राग शांत झाल्याने पावसावर निभावले. प्रदेशातल्या सार्‍या नद्यांना पूर आले, आसपासच्या प्रदेशाला कवेत घेऊन त्या धावू लागल्या, बाजूच्या डोंगरांना धडका देत त्यांनी त्यांचे अंग-प्रत्यांग ओरबाडून काढले. मोठेमोठे वृक्षराज धराशायी झाले, तिथे त्यांच्यासमोर किडामुंगीसारख्या जगणार्‍या माणसांची काय कथा. हजारो दुर्दैवी भक्तगणांची वाताहत झाली.

जवळजवळ दोन आठवडे पावसाने उसंत दिली नाही. हजारो जीवांना अजस्र प्रवाहांनी गिळंकृत केले. अनेकांचे मृतदेह आसपासच्या प्रदेशात विखुरले गेले. असंख्य लोकांचा पत्ताच लागला नाही. डोंगरकपारीत कसेबसे तग धरून असलेले जीव अनेक दिवसांच्या उपासमारीने नि त्या कराल नि अक्राळविक्राळ संकटाने मृत्यू लवकर यावा यासाठी देवाची प्रार्थना करू लागले.

HelicopterToTheRescue
छायाचित्र: https://www.ibtimes.co.in/ येथून साभार.

सुदैवाने नवे तंत्रज्ञान मदतीला आले. डोंगरकपारीत तग धरून असलेले अनेक जीव अशा जीवघेण्या वातावरणातून बाहेर काढले गेले. तशा परिस्थितीत त्या अडकून पडलेल्या अनामिकांसाठी जीव धोक्यात घालून निष्ठा वगैरे जुनाट कल्पना कवटाळून बसलेल्या काही प्रतिगामी लोकांनी आपले स्वीकृत कार्य पार पाडले.

बंडोपंत हा सारा भयावह घटनाक्रम आपल्या दिवाणखान्यात बसून डिश-टिव्हीच्या माध्यमातून हाय-डेफिनिशन वर पहात असल्याने त्यांना सारे तपशील अगदी स्पष्ट दिसत होते. जीव वाचलेल्या काही 'भक्तांची' मुलाखत समोर चालू होती.

"जीव वाचल्यामुळे तुम्हाला आता कसं वाटतंय?" एचडीटीव्हीच्या वार्ताहराने... नव्हे 'करस्पाँडंट'ने नेहमीचा प्रश्न विचारला.

"देवाच्या कृपेनेचे आम्ही वाचलो..." पार्श्वभूमीवर शेवाळी-खाकी कपड्यातले जवान पुढच्या उड्डाणाला सज्ज होताना दिसत होते.

बंडोपंतांमधला विवेकी जागा झाला. "ज्याने जीव वाचवला त्याच्याबद्दल या भामट्याला काहीच नाही, नि ज्याने मुळात संकटात लोटले त्यानेच म्हणे याला वाचवले." त्यांनी संतप्त होत्साते आपले पुरोगामी तत्त्वज्ञान बायकोला ऐकवले, नि त्या संतापाच्या भरात चॅनेल बदलले.

'दांडिया टीव्ही' वरही तीच दृश्ये दाखवली जात होती. त्यांचा करस्पाँडन्ट एका मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या एका अतिशय शोकाकुल अशा व्यक्तीची मुलाखत घेत होता.

"तुमचे वडील या प्रलयात मरण पावले. काय वाटतं तुम्हाला?" त्यानेही 'धडाऽ पहिला' गिरवला.

"देवाची मर्जी. जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला. शेवटी चांगल्या माणसांना देव आपल्याकडे बोलावून नेतो. देवभूमीत त्यांना मरण आलं. सोनं झालं त्यांचं." याच वेळी 'देवभूमीत हेलिकॉप्टर कोसळून चार जवान ठार' अशी ब्रेकिंग न्यूज देणारी लहानशी पट्टी या दृश्याच्या खालच्या बाजूला झळकू लागलेली होती.

या भक्तांचे जीव वाचवण्यासाठी ज्या बायकांचे घरधनी देवभूमीत गेलेल्या त्या प्रतिकूल हवामानाशी झुंज घेत होते त्या जीव मुठीत घेऊन देवाचाच धावा करीत होत्या.

पूर्व-आधुनिक:

"रुपया आज पुन्हा घसरला बघ. आता पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होणार." हापिसातून नुकतेच घरी येऊन दिवाणखान्यातल्या कोचावर घरंगळलेले बंडोपंत त्यांना पाहताच लगबगीने चहा टाकण्यासाठी किचनमधे घुसलेल्या बायकोला ओरडून सांगत होते. बायकोने कोचावरच सोडलेला रिमोट उचलून दिवसाचा आढावा घेण्यासाठी आल्याआल्या टीव्ही लावायचा हा रोजचा शिरस्ताही त्यांनी बिनचूक पाळला होता.

Bandopant
छायाचित्र: https://www.freepik.com/ येथून साभार.

"सालं हे काँग्रेसचं राज्य म्हणजे गरीबांची परवड नुसती. एखादा हुकूमशहाच यायला हवा आता." गळ्यातली टायची गाठ सैल करता करता त्यांनी निर्णय देऊन टाकला. पावसाळ्याच्या दिवसात सुंठ वा आलं न घालता चहा दिल्याबद्दल बायकोला त्यांनी ताबडतोब एक 'शो-कॉज' नोटिस देऊन टाकली आणि सीआयआयच्या वार्षिक सभेत चालू असलेले अर्थमंत्र्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण ते बिजनेस-टीवी वर लाईव पाहू लागले.

देशांतर्गत डॉलरची मागणी फार वाढल्याने रुपया घसरत असल्याबद्दल अर्थमंत्री चिंता व्यक्त करत होते. यात भारतीयांना असणार्‍या पिवळ्या धातूच्या आकर्षणामुळे त्या धातूची सातत्याने करावी लागणारी आयात नि त्यासाठी खर्ची पडणारे परकीय चलन हे या घसरणीचे एक मुख्य कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

"बघ. मी तुला म्हणत नव्हतो, उगाचच सोन्याची खरेदी करून जमा करून ठेवल्याने देशाच्या तिजोरीवर ताण पडतो म्हणून." बंडोपंत चहा आणून ठेवणार्‍या बायकोला विजयी मुद्रेने म्हणाले.

"परदेशातून येणार्‍या मित्रांकडून तुमची आवडती इम्पोर्टेड विस्की आणायची बंद केलीत तर जास्त परकीय चलन वाचेल." शोएब अख्तरचा १४० कि.मी. वेगाने उसळून आलेला बाउन्सर सचिन तेंडुलकरने केवळ बॅटच्या एका स्पर्शाने थर्डमॅन सीमेबाहेर फेकून दिला.

"ते महत्त्वाचं नाही..." बंडोपंतांनी ताबडतोब गाडी वळवून मूळ विषयावर आणली. "मुद्दा हा आहे की भारतीयांना पिवळ्या धातूचे अगदी एक विकृत म्हणावे असे आकर्षण आहे. सोने ही सेफ इन्वेस्टमेंट आहे, अडीअडचणीला कामात येते वगैरे खोट्या, कालबाह्य कल्पनांना चिकटून आपण भारंभार सोनं जमा करतो त्यामुळे ही वेळ आली आहे."

विश्लेषक बंडोपंतांचे भाषण सुरू झाल्याने टीवीवर बोलणारे अर्थमंत्री आपले भाषण थांबवून बंडोपंतांचे भाषण ऐकू लागले. "खरं म्हणजे काही काळासाठी सोन्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घातली पाहिजे. म्हणजे ते सारे परकीय चलन वाचेल नि रुपया पुन्हा नियंत्रणात येईल." टीवीवरून बंडोपंतांचं भाषण ऐकणारे अर्थमंत्री बंडोपंतांचा हा उपाय ऐकून एकदम खुश झाले नि तो उपाय अंमलात आणल्याची घोषणा करतच त्यांनी आपले थांबलेले भाषण पुढे सुरू केले.

सोन्यावरील आयात बंदी जाहीर होताच अपेक्षेप्रमाणे सर्व थरातून निषेध झाला. ग्राहकांनी आपल्या मूलभूत हक्कांवर अर्थमंत्री गदा आणत आहेत असा ओरडा केला. सराफ बाजाराने लगेच मागणी घटल्याने सोन्याची कारागिरी करणार्‍या गरीब मजुरांच्या उत्पन्नात घट होईल, काही मजुरांना बेकारीला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला असलेल्या स्थानिक व्यावसायिकांच्या हितासाठी सरकारने गरीब मजुरांच्या हिताचा बळी दिल्याचा आरोप करत संसदेत धुमाकूळ घातला नि संसद 'अनिश्चित कालके लिए' तहकूब करायला भाग पाडले.

अपेक्षेप्रमाणे सोन्याचे भाव वाढू लागले. " बघा म्हणत नव्हतो मी, सोनं ही बेष्टं इन्वेस्टमेंट आहे. तुम्हाला सांगत होतो तुम्ही ऐकलं नाही." शेजारचे मेजर सावंत (खरंतर ते मेजर होते की लष्कराच्या क्यान्टिनमधे आचारी अशी शंका त्यांच्या ओघळत्या पोटावरून सार्‍यांनाच येत असे. पण आपण लष्कराच्या चाकरीत मेजर असल्याची ओळख ते करून देत नि वर्षातले दहा महिने घरीच राहून सीमेवरच्या आपल्या शौर्याच्या कथा शेजार्‍यापाजार्‍यांना सांगत असत.) ऑफिसमधून घरी परतणार्‍या बंडोपंतांना अडवून सांगत होते.

"आमच्या शकूच्या लग्नाच्या वेळी सहा हजार रुपयाने सोनं घेतलं, आता जेमतेम सहा महिने झालेत, तर भाव नऊ हजारापर्यंत गेलाय." "मग विकून टाका नि करा मोकळे पैसे." बंडोपंत काहीतरी बोलायलाच हवे म्हणून बोलले. "वेडे आहात का तुम्ही बंडोपंत. अजून दोन महिन्यात बारा हजारावर जाईल भाव. आहात कुठं."

सावंतांना कसंतरी वाटेला लावून बंडोपंत घरात पाऊल टाकतात तर, "बघा मी म्हणत नव्हते..." बायकोने सावंतांची ष्टोरी परत ऐकवली. मेजर सावंताचं त्याच्या दुप्पट आकाराचं अर्धांग बायकोच्या कानी लागलं असावं हे समजायला तर्काची गरज नव्हती. "तेव्हाच घेऊन ठेवले असले सोने तर आज दीडपट झाले असे पैसे. ('आणि मला सावंतीणीसारखा हारही मिळाला असता' हे वाक्य मनातल्या मनात) कसलं बोडख्याचे विकृत आकर्षण म्हणे. चार चव्वल हातात आणून देते ते खरं. आता तरी ऐका माझं. सोनं बारा हजार होण्याच्या आत हार विकत घेऊन टाकू." बंडोपंतांनी निमूटपणे नव्या हाराची नोंदणी सराफाकडे केली नि आपले व्यवहारज्ञान पराभूत झाल्याचे दु:ख त्यांनी नवीन इम्पोर्टेड विस्कीच्या बाटलीतील दोन पेगांबरोबर गिळून टाकलं.

अखेर व्हायचे तेच झाले. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्याने मागणी घटल्याची ओरड सराफ बाजाराने सुरू केली. त्यातच कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्याने आणि आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात वाढू लागल्याने डॉलरची मागणी चढीच राहिली आणि रुपया घसरायचा काही थांबला नाहीच. अर्थमंत्र्यांवर चहूकडून टीका सुरू झाली.

अखेर निरुपाय होऊन त्यांनी सोन्यावरील आयात-बंदी उठवल्याची घोषणा केली. सराफ बाजाराने ताबडतोब समाधान व्यक्त केले. विरोधकांनी 'अर्थमंत्र्यांनी एक प्रकारे आपली चूक कबूल केल्याने' त्या दरम्यान झालेल्या गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. 'नैतिकता म्हणजे काय हे विरोधकांना कसे काय ठाऊक?" असा खोचक उलट-प्रश्न विचारून अर्थमंत्र्यांनी ती फेटाळून लावली.

"ऐकलं का, मी काय म्हणते..." ऑफिसातून परतलेल्या बंडोपंतांना चहा देतादेता बायकोने प्रस्तावना केली. "सावंत वहिनी सांगत होत्या, सोनं स्वस्तं झालंय म्हणून. नऊ हजारावरून आठ-साडेआठ हजारावर उतरलंय. किंमती पुन्हा वाढण्याच्या आत रांकाकडून दोन नवीन बांगड्या करून घेऊ या, पुन्हा बारा हजाराकडे जाण्याच्या आत." नवी ऑर्डर नोंदवणे नि इम्पोर्टेड विस्कीच्या नव्या बाटलीचे उद्घाटन पुन्हा एकदा जोडीनेच झाले.

उत्तर-आधुनिक:

"सालं हे काँग्रेसचं राज्य म्हणजे गरीबांची परवड नुसती. एखादा हुकूमशहाच यायला हवा आता." बंडोपंतांचे नुक्तेच पदवीधर झालेले चिरंजीव समीर मूठ आपटून ओरडले. अर्थात मूठ आपटताना ती समोरच्या लॅपटॉपच्या की-बोर्डवर न आपटता बाजूच्या टेबलवर आपटण्याची खबरदारी त्याने घेतली होती. त्याने त्वेषाने समोरच्या कागदाचा चोळामोळा करून संतापाने फेकून दिला. पंतप्रधान किंवा अर्थमंत्रीच जणू त्याच्या ताब्यात सापडले आहेत नि त्यांना तो किडामुंगीसारखा चिरडतो आहे असा त्याचा आविर्भाव होता.

Sameer1
छायाचित्र: https://www.dreamstime.com/ येथून साभार.

प्रत्यक्षात त्याला ती संधी मिळाली नसली तरी फेसबुकवर त्याने त्या दोघांचा शब्दांनी, इतरांनी काढलेल्या आणि आणखी कुणी कुणी शेअर केलेल्या कार्टून्सच्या सहाय्याने कोथळा काढलेला होताच.

फेसबुकवर मित्रांनी शेअर केलेल्या लिंकवरची चित्रे आणि चरित्रे चवीचवीने पहात असता अचानक त्याला एका मित्राने शेअर केलेली लिंक दिसली. 'देवभूमीत झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीचे वेळी 'विकासप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा राबवून फक्त आपल्या प्रदेशातून देवभूमीत गेलेल्यांना चुटकीसरशी बाहेर काढले. केंद्राची प्रशासन-यंत्रणा, लष्कराचे जवान नि हेलिकॉप्टर्सना जे जमलं नाही ते विकासपुरुषाने काही चारचाकी गाड्यांच्या सहाय्याने करून दाखवलं...' 'पत्र नव्हे विकासमित्र' असे बिरुद मिरवणार्‍या वृत्तपत्राने लिहिले होते. खुशीत येऊन समीरने ताबडतोब ती लिंक शेअर केली आणि झाडून सार्‍यांना टॅग करून टाकले.

'पप्पा, तुम्ही नेहमी बोंब मारता ना विकासपुरुषाच्या नावे. एक लिंक शेअर केलीय बघा फेसबुकवर, ती बघा.' बाहेर हॉलमधे टीवीवर इंग्लिश चित्रपटांच्या च्यानेलवर जेम्स बाँडचा नवा चित्रपट पहात आपले इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करत बसलेल्या बंडोपंतांना त्याने ओरडून सांगितले. 'षोडशे वर्षे प्राप्ते...' वगैरे वर विश्वास असलेले बंडोपंत मुलाशी फेसबुक-मैत्रीपूर्ण संबंध राखून होते.

चार दिवस त्या लिंकने फेसबुकवर धुमाकूळ घातला. विकासपुरुषाच्या पीआर फर्मने आणि एरवी ट्विटर टिवटिव करून आपल्या विकासकामांना जनतेसमोर आवर्जून मांडणार्‍या विकासपुरुषाने त्यावर सोयीस्कर मौन बाळगले होते. अचानक एक दिवस एका दुष्ट काँग्रेसधार्जिण्या पत्रकाराने विकासपुरुषाचा दावा अव्यवहार्य असल्याने सप्रमाण दाखवून दिले. झालं.

विकासपुरुषाच्या विरोधकांना आयतं कोलितंच मिळालं. सर्वत्र विकासपुरुषाच्या विकासाच्या दाव्यांबाबत शंका घेणारे लेख येऊ लागले. आता या गदारोळाला उत्तर द्यायला हवे या हेतूने विकासपुरुषाला जणू सार्‍यांना भाकरी देण्यासाठी अवतार घेतलेला गोदोच समजणार्‍या त्याच्या पक्ष-प्रवक्तीने तो रॅम्बोगिरीचा दावा शक्यतेच्या पातळीवर कसा आहे हे सांगण्याचा दुबळा प्रयत्न करणारा लेख लिहिला. "घ्या लेको. साले काँग्रेसी, स्वतःला काही जमत नाही म्हणून इतरांनाही जमत नाही असा दावा करत होते नाही का. हा घ्या पुरावा." म्हणत समीर नि समीरच्या मित्रांनी तोही ताबडतोब शेअर करून टाकला.

पण दुर्दैवाने आकडेवारीची करामत अंगाशी येऊन त्या लेखातील दावेही खोडून काढण्यात आले. विकासपुरुष गप्पच होता. इतक्यात सदर लेख हा काँग्रेसी हस्तकांनीच छापून आणून आमच्या नेत्याची बदनामी केल्याचा कट केल्याचा दावा विकासपुरुषाच्या पक्ष-प्रवक्त्याने केला. "बघा मी आधीच म्हटलं होतं, हा सगळा काँग्रेसी कावा आहे." समीर विजयी मुद्रेने आपल्या बापाचे सामान्यज्ञान वाढवित म्हणाला. ताबडतोब ही माहिती देखील सर्वसामान्य अज्ञ जनांपर्यंत पोचावी म्हणून त्याने ती बातमीही शेअर करून टाकली. (आणि हे करत असताना हळूच पहिली लिंक शेअर करताना लिहिलेली पोस्ट डिलिट करून टाकली.) अजूनही विकासपुरुष गप्पच होता.

पण तरीही विकासपुरुषाबाबत उठलेला गदारोळ शमण्याचे चिन्ह दिसेना. शेवटी मूळ लेख लिहिलेल्या पत्रकाराला 'उपरती झाली'(?) आणि हा आपण विकासपुरुषाने दिलेल्या माहितीवर आधारित नसून त्याच्या पक्षातील कुण्या कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिला असल्याचे त्याने स्पष्ट केले. पत्राने पत्रकाराला नि पक्षाने कार्यकर्त्याला हाकलले नि सगळं शांत झालं.

तसा काही प्रगतीविरोधी पत्रकारांनी त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याची ओरड केली. पण समीरसकट सार्‍या प्रगतीच्या वारकर्‍यांनी हा त्यांचा दावा 'मूर्खपणाचा' म्हणून निकालात काढला. पुन्हा एकदा "आपण हे आधीच बोललो होतो" असा दावा करत समीरने हे ही शेअर करून टाकलं. विकासपुरुष अजूनही गप्पच होता.

सारं धुमशान विरलं तरी विकासपुरुष अजूनही गप्पच होता. "त्याला बोलायची काय गरज, त्याची पीआर फर्म सगळं त्याला हवं ते छापून आणते नि तुझ्यासारखे लोक त्याचा आयता प्रसार करतातच की. रुजली बातमी तर ठीकच; नाहीतर परत मी असा दावा केलाच नाही म्हणायला मोकळा. त्याचं म्हणजे ’चित भी मेरी, पट भी मेरी और अंटा मेरे बाप का' तसं आहे." हा बंडोपंतांच्या टोमणा 'म्हातारा चळलाय. चार दिवस राहिलेत त्याचे, उगाच कशाला वाद घाला.' अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत समीरने कानाआड केला.

आधुनिकोत्तर:

"डोन्ट बी अ फूऽल डॅऽड." टेबलावरचा ग्लास उचलता उचलताच दुसर्‍या हाताने समोरच्या बशीतला भाजलेला बदाम उचलून तोंडात टाकत समीर बंडोपंतांना म्हणाला. बंडोपंत आणि समीर त्यांची नवी कोरी शेवर्ले गाडी सिंगल माल्टच्या साथीने सेलेब्रेट करत होते.

"तू सावंताशी स्वतःला कम्पेऽर का करतोस." 'षोडशे वर्षे प्राप्ते...' स्थिती पार होऊन बरीच वर्षे झाली नि पोरगं 'हाताशी आल्यावर' बंडोपंतांनी त्याला '...मित्रवदाचरेत्' च्या ष्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्या आज्ञाधारक पणे पाळत एव्हाना तो 'तुम्ही' वरून 'तू' वर पोचला होता. सावंतांनी चार-पाच लाखात सर्व सुखसोयीनी युक्त अशी चारचाकी घेतलेली त्यांनी पाहिली होती. त्या तुलनेत दीडपट पैसे खर्चून समीरने गाडी आणल्यामुळे बंडोपंत थोडे नाराज होते.

Sameer2
छायाचित्र: https://www.alamy.com/ येथून साभार.

"लुक अ‍ॅट धिस डार्लिंग आय बॉट यू. साला व्हॉट अ क्यूट बेऽबी. ड्राईव करून बघ तू, मख्खन रे मख्खन. अँड इट कम्स विद ऑल द लेटेस्ट टेक्नॉलजी. स्साला त्या सावंताच्या गाडी जीपीएस नाही साधा. यू कॉल दॅट ए काऽर?" जेनेरेशन गॅप नावाचं कायससं प्रकरण असल्यामुळे आपण आपले मत समीर ऊर्फ सॅमला पटवून देऊ शकत नाही अशी आपली समजूत करून घेत बंडोपंतांनी तिसरा पेग भरला.

जरी खर्चाच्या बाबत जरी त्यांना सॅमशी 'डिफरन्स ऑफ ओपिनियन' असले तरी सावंतापेक्षा भरी कार आपल्याकडे आल्याने ते आणि खास करून त्यांच्या सौ. अत्यंत खुशीत होते. त्या आनंदात सौ. सावंतांना पेढे देण्याच्या मिषाने त्यांचा पडलेला चेहरा पोटभर पाहून घेण्याच्या नादात सौं. नी चक्क रोजची 'मैं तुम्हारी नहीं तो किसी और की कैसे बन सकती हूँ? और तुम मेरे नहीं तो करीनाके कैसे बन सकते हो?' असा -डब्बल - खडा सवाल टाकणारं शीर्षक असलेली मालिका चुकवली होती.

एक महिन्यानंतरची संध्याकाळ. नेहमीप्रमाणे संध्याकाळची फेरी आटपून आलेल्या बंडोपंतांनी नोकरीच्या दिवसांपासून असलेला घरात येताच कोचावर घरंगळून प्रथम टीवी लावण्याचा आपला शिरस्ता प्रथमच मोडला. आले तेच मुळी काही तरी प्रचंड धक्कादायक पाहिल्याचे भाव चेहर्‍यावर घेऊन. बंडोपंत आत आल्याआल्या त्यांच्यासाठी चहा आणण्याचा आपला नेम सौंनी मात्र बिनचूक पाळला. चहा घेऊन बाहेर येतात तो टीवी अजून बंदच पाहून त्यांना काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. लगबगीने येत त्यांनी चहा समोर ठेवला, फुल्ल स्पीड मधे फॅन चालू केला नि सार्‍या खिडक्या उघडून टाकल्या.

नवर्‍याजवळ बसून कातर स्वरात विचारत्या झाला 'काय झालं हो? बरं नाही का वाटंत?" "मला काय धाड भरलीये?" बंडोपंत त्यांच्यावर एकदम खेकसले. पूर्वी ऑफिसच्या दगदगीनंतरही हसतमुख असणारे बंडोपंत चक्क खेकसतायत हे पाहून सौ. चिंताक्रांत झाल्या. "वय झालं आता. लहान सहान त्रास व्हायचेच." हे वाक्य चुकून त्यांच्या तोंडून निसटलं नि बंडोपंत त्यांच्यावर दुप्पट उखडले.

दहा मिनिटांच्या भडिमारानंतर चौथ्या मजल्यावरच्या गुप्तांनी नवी कोरी एसयूवी गाडी घेतली नि त्यात ऑटोपायलट, ऑटोगिअर, ऑटो स्विच नि बरंच काय काय ऑटो आहे नि लेटेस्ट i20 मायक्रोप्रोसेसर का काय तो आहे असा सौ बंडोपंतांना साक्षात्कार झाला.

"हूं त्यात काय एवढं. शिंचं या पुण्यातल्या खड्यात कसला डोंबलाचा ऑटोपायलट काम करणारे? आणि ऑटोगिअर म्हणजे अगदीच डाउन-मार्केट की नाही. त्यापेक्षा आपल्या गाडीचे मॅन्युअल गिअर म्हणजे असे एकदम रॉयल, तुम्ही ते गिअर टाकताना म्हणजे कसे ऐटबाज दिसता. आता गिअर नाहीतर म्हटल्यावर कसं होणार."

"तेच तर म्हणतो मी. उगाच सालं नव्या गाडीत यंव आहे नि त्यंव आहे. हवंय कशा कौतुक. शेवटी ओल्ड इज गोल्ड. आमची गाडी अजून १२ चं अ‍ॅवरेज देते. आणि ही नवीकोरी गाडी म्हणे ९चे अ‍ॅवरेज देणार." कधी नव्हे ते पती-पत्नींचं पाच मिनिटात एकमत झालं होतं.

- oOo -

ता.क.: कथा महत्त्वाच्या नाहीत तर कथा'सूत्र' महत्त्वाचे असे आमच्या साहित्यातील गुरू आणि ज्येष्ठ...(अर्रर्र चुकलो.) ... श्रेष्ठ समीक्षक डॉ. सौ. समीक्षा नेटके यांचे मत होते. (त्यांचे आजचे मत काय हे ठाऊक नसल्याने रिस्क न घेता 'होते' असा भूतकालवाचक शब्दप्रयोग केला आहे.) ते ही शिंचे वादग्रस्तच. पण दोन समीक्षक, दोन डॉक्टर किंवा दोन मेकॅनिक यांचं एकमत कधी झालंय का. ते असो. मुद्दा काय, तपशीलाची चटणी वाटण्यापेक्षा मूळ पदार्थाशी सलगी केल्यास रसपरिपोष अधिक चांगला व्हावा ही अपेक्षा.

ता.क. २: यांना नि:शब्दकथा का म्हटले असा प्रश्न येईल. याला बरीच उत्तरे आहेत. उत्तर देण्याच्या फंदात न पडता गप्प बसणे हे एक. बाकीची -आवश्यक वाटल्यास -वाचकांनी शोधावीत.


हे वाचले का?

रविवार, ७ जुलै, २०१३

आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड

आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्‍याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या welcome - आनंदाने स्वीकाराव्यात अशा - ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्‍याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो.

गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली. हाती घबाड गवसल्याचा किंवा भर उन्हाळ्यात कुणीतरी कलिंगडाच्या गराड्यात नेऊन बसवल्याचीच भावना झाली. सुदैवाने रमतगमत का होईना त्यातल्या दोन पुस्तकांची 'नैया पार' झाली. योगायोग असा की ही दोन्ही आत्मचरित्रे आणि दोनही रंगकर्मींबाबत मला सारखाच आदर. तेव्हा त्या अनुभवातून जाताना जे गवसलं ते इथे थोडक्यात मांडतो आहे.

पहिले हाती लागले ते डॉ. लागूंचे 'लमाण'. खरंतर हे पुस्तक तसे दहा वर्षांपूर्वीचे, पण कोण जाणे कसे राहून गेलेले. अलिकडे 'रूपवेध' आणल्यानंतरच आपण ’लमाण’ वाचले नाही याची जाणीव झाली. त्याच सुमारास कार्नाडांचे 'आडाडता आयुष्य' देखील उमा कुलकर्णीच्या अनुवादाच्या माध्यमातून अतिशय वाजतगाजत अवतीर्ण झाले. तेव्हा ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी 'गृहप्रवेश' करती झाली. हा योगायोग अतिशय चांगलाच ठरला म्हणावे लागेल. कारण यामुळे ती दोन्ही आगेमागे वाचण्याचा फायदा उठवता आला. पहिल्या भागात लिहितोय ते खरंतर मागाहून वाचलेल्या पुस्तकाबाबत, 'आडाडता...' बाबत, नि पुढच्या भागात लिहिन ते 'लमाण' बाबत. मांडणीच्या दृष्टीने हे अधिक सोयीचे वाटले इतकेच.

गिरीश कार्नाड यांचे 'तुघलक' काही काळापूर्वी माधव वझे यांनी रंगभूमीवर आणलेले पाहिले होते. इतिहासाने 'मूर्ख' अशी संभावना करून सोडून दिलेल्या तुघलकाच्या आयुष्याचा एक वेगळाच अन्वयार्थ लावून कार्नाडांनी समोर ठेवला होता, तो पाहून मी स्तिमित झालो होतो. (अशीच काहीशी अवस्था जीएंनी मांडलेला 'डॉन क्विक्झोट' वाचून झाली होती.) तेव्हाच प्रथम या माणसाच्या लेखनाचा मागोवा घ्यायला हवा अशी खूणगाठ मी बांधून ठेवली होती. पुढे मग 'ययाती'. 'हयवदन', 'नागमंडल' यांच्या मार्फत तो प्रवास पुढे चालू राहिला.

मागल्याच वर्षी लागू दांपत्यांतर्फे रंगकर्मींना दिला जाणारा 'तन्वीर सन्मान' जेव्हा कार्नाडांना देण्यात आला तेव्हा या दोन व्यक्तींचा चाहता असल्याने तिथे उपस्थित असणे अनिवार्यच होते. तेव्हा 'आडाडता...' च्या अनुवादाच्या जाहिराती सुरू झाल्या तेव्हापासून माझी उत्सुकता ताणली गेली होती. प्रत्यक्ष पुस्तक हाती लागले नि आधाशासारखे वाचून काढले. थोडक्यात सांगायचे तर या चरित्राने माझी पूर्ण निराशा केली असे खेदाने म्हणावे लागेल.

AdaadataaAayushya

कार्नाडांनी कौटुंबिक नि वैयक्तिक आयुष्याची बाजू अतिशय तपशीलवार नि प्रांजळपणे मांडलेली आहे. आपल्या जन्मापूर्वी आपले आईवडील 'हे मूल नको' या निर्णयाप्रत येऊन गर्भपाताची तयारी करत होते नि केवळ डॉक्टरीणबाई न आल्याने आपला या जगात प्रवेश झाला हे ऐकून स्वतःला बसलेला धक्का, त्यातून 'हे जग आपल्याविनाही असेच चालू राहिले असते' हा - अस्वस्थ करणारा - झालेला बोध अतिशय प्रत्ययकारी उमटला आहे. (सदर आत्मचरित्र त्या अनुपस्थित राहून आपल्या अस्तित्वाला कारण ठरलेल्या डॉ मधुमालती गुणे यांनाच अर्पण केले आहे.)

एकुणच कथनाचा सूर सर्वसाधारण आत्मचरित्रात असतो त्याहून खूपच प्रांजळ नि प्रामाणिकपणाचा. अगदी आपल्या विवाहपूर्व लैंगिक संबंधांबाबत (तेही भावनिक बाजूचा पूर्ण अभाव असलेले) कोणताही गंड (एका बाजूने अपराधगंड नाही, तसेच आपण स्त्रिया कशा 'पटवल्या' वगैरे सांगण्यातला अभिनिवेश वा अहंगंडही) न बाळगता केलेले कथन. भारतीय समाजातच काय अगदी तुलनेने याबाबत अधिक स्वतंत्र विचाराच्या मानल्या जाणार्‍या कलाक्षेत्रातदेखील हे उदाहरण दुर्मिळ मानावे लागेल. परंतु हे सारे कुठेही त्यांच्या जगण्याशी धागा जुळवून घेत नाही. तात्कालिक मानसिक असमतोलातून सावरण्यापलिकडे त्या संबंधातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कोणताही प्रभाव त्यातून पडलेला दिसत नाही. त्या अर्थाने त्यांचे चरित्रातील स्थान गौणच मानावे लागेल.

ऑक्सफर्डमधील दिवसांचे वर्णनही असेच खोगीरभरती स्वरूपाचे. एकुणच पुस्तकाचे स्वरूप आठवणींची मोळी बांधल्यासारखे. कथनप्रवाहाच्या अधेमधे वाट वाकडी करून, कालविपर्यास करून एखाद्या व्यक्तिमत्त्वाबाबत, त्याच्या जडणघडणीबाबत काही अधिक तपशील देऊन ती व्यक्ती, ती घटना, तो परिणाम अधिक नेमका वा ठसठशीत करणे हा बव्हंशी प्रस्थापित झालेला कथनप्रकार आहे. परंतु या कथनातील मूळ कालानुक्रमाचा, घटनाक्रमाचा धागाच अधिक ठळक दिसायला हवा, अन्यथा वाचकाचा गोंधळ उडू शकतो. 'आडाडता...' मधे बरेचदा असे घडते आहे.

बरे इंग्रजीत ज्याला डीटोऽर (detour) म्हटले जाते तसे हे तात्कालिक वळण मूळ कथनाच्या वाटेवरचे काही धागे ठळक करत असेल तर त्याचे प्रयोजन सफल झाले म्हणावे. उगाचच एखाद्या पात्राची कुटुंबाची माहिती, पूर्वीचे आयुष्य, पुढचे आयुष्य याची भरताड देऊन परत गाडं रुळावर येत असेल तर त्या व्यक्तिमत्त्वाचा एकुण कथनात, चरित्रनायकाच्या वाटचालीमध्ये, जडणघडणीमध्ये कुठे प्रभाव असेल, काही निर्णायक वळणावर त्याचा सहभाग असेल तर हे सारे अपसव्य कामी आले असे म्हणता येईल. 'आडाडता...' मधे अशी भरताड भरपूर असली तरी ती बहुधा पुढे कुठेच न दिसणार्‍या, परिणाम घडवणार्‍या पात्रांबाबत अथवा घटनांबाबत आहे.

कार्नाडांच्या वैचारिक जडणघडणीचा प्रवास यात फारसा दिसत नाही. कलाक्षेत्रातील प्रवासात वाटेवर आलेल्या आपल्या अपयशांची, कळत न नकळत आपण केलेल्या अन्यायाची वा चुकांची थेट कबुली त्यांनी प्रांजळपणे दिलेली असली, तरी त्याची डॉ. लागूंनी 'लमाण' मधे केली तशी कारणमीमांसा वा चिकित्सा केलेली दिसत नाही. त्यामुळे त्यातून त्यांच्या विचारसरणीवर, पुढील वाटचालीवर झालेला परिणाम त्यांनी स्वतःच न तपासल्याने वाचकाला उपलब्ध होणे दूरच राहिले आहे.

गिरीश कार्नाड म्हटले की मिथकांची वर्तमानाशी सांगड घालून उभ्या राहिलेल्या त्यांच्या अजोड नाटकांची आठवण होणारच. यातील 'ययाती' नि 'तुघलक' तर भारतीय नाट्यक्षेत्रात मैलाचे दगड ठरलेली नाटके. कलाक्षेत्रात सर्वात उशीरा दाखल झालेल्या चित्रपटाच्या वावटळीत नाटकांचे स्थान नि वैशिष्ट्ये घट्ट टिकवून ठेवणारी जी मूठभर नाटके होती त्यात या दोन नाटकांचे स्थान फार मोठे आहे.

याशिवाय 'हयवदन' सारखे जगण्यातील मूलभूत प्रश्नांना भिडणारे नाटक, 'नागमंडल', 'अग्नि मत्तु मळै' (ज्यावर 'अग्निवर्षा' नावाचा हिंदी चित्रपटही येऊन गेला, त्याची दखलही कुणी घेतली नाही हे अलाहिदा.) आणि 'इन्सेस्ट' सारखा नाजूक विषय मांडणारे 'अन्जु मळिगे' सारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर अतिशय सखोल जाणिवेची नाटके लिहिणारे कार्नाड त्या नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेबाबत बोलतील, त्या वेळच्या आपल्या वैचारिक आंदोलनांची, त्यावर परिणाम घडवणार्‍या व्यक्तिंची, घटकांची, विचारव्यूहाची मांडणी करतील, अशी अपेक्षा होती.

परंतु या बाबत हे आत्मचरित्र पूर्ण निराशा करते. ययाती नि तुघलक चा निर्मितीचा केवळ फक्त कालक्रम सांगून नि त्यातील व्यावहारिक तपशील देऊन इतर नाटकांना तर जवळजवळ पूर्णपणे उपेक्षित ठेवले आहे. केवळ जाताजाता आयुष्यात भेटलेल्या एखाद्या व्यक्तिचे वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधी घडलेली घटना याचा उपयोग वा परिणाम एखाद्या नाटकाशी असेल तर तेवढा एक दोन वाक्यात नोंदवून ते पुढे जाते. कार्नाड नि नाटक यांचे असलेले अतूट नाते लक्षात घेता हे फारच निराशाजनक ठरते.

अपवाद आहे तो अनंतमूर्तींच्या 'संस्कार' नि 'वंशवृक्ष' या भैरप्पांच्या कादंबरीवरील चित्रपटांवरील प्रकरणाचा. फक्त एवढ्या एकाच ठिकाणी या आत्मचरित्राने माझे थोडेफार समाधान झाले असे म्हणू शकेन. चित्रपटाच्या प्रवासाचे अतिशय विचक्षण भूमिकेतून मूल्यमापन कार्नाडांनी केलेले दिसते. यात प्रत्यक्ष कादंबरीतील पात्रांचा, पार्श्वभूमीचा विचार वगैरे अभ्यासपूर्ण भाग येतो तसेच चित्रपटाशी संबंधित निर्मितीमूल्ये, कलेशी संबंधित विवेचन, चित्रपटाशी संबंधित व्यक्तिंचे मानापमान, त्यातून होणारे संघर्ष नि या खडतर प्रवासातून तयार होऊन सर्वत्र नावाजलेल्या चित्रपटाबाबत सकारण व्यक्त केलेले असमाधान. हे एकच प्रकरण अतिशय भावले असे म्हणावे लागेल.

उमा कुलकर्णींच्या अनुवादाचा दर्जा देखील धक्कादायक रित्या घसरलेला दिसून आला. यापूर्वी त्यांनी केलेल्या भैरप्पांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद अतिशय वाचनीय झाले होते. परंतु इथे त्यांच्या भाषेवर व्यवहारात प्रचलित होऊ पाहणार्‍या काहीशा संकरित भाषेचा प्रभाव पडू लागल्याचे जाणवले.

उदाहरणादाखल एक वाक्य असे आहे 'तेव्हा वसंतदादा अविवाहित होता.' तांत्रिकदृष्ट्या हे वाक्य बरोबर असले तरी 'अविवाहित असणे' ही वाक्यरचना बहुधा जन्मभर अविवाहित असणार्‍यांच्या संदर्भात वापरली जाते, यात ही आजन्म स्थिती अपेक्षित असते. इथे साधारणपणे 'तेव्हा वसंतदादाचे लग्न झालेले नव्हते.' अशी वाक्यरचना केली जाणे - मला तरी - अपेक्षित होते.

हे एक किंवा दुसरे एक वाक्य 'माझ्या जीवनातली ही घटना अशा काही मोजक्या घटनांपैकी आहे, ज्यांनी मला वैयक्तिक आनंद दिला.' आधी दिलेल्या वाक्यावर हिंदी वाक्यरचनेचा प्रभाव तर इथे इंग्रजी. इथे साधे सोपे मराठी वाक्य असे काहीसे लिहिता आले असते 'ज्यांनी मला वैयक्तिक आनंद दिला अशा माझ्या जीवनातील काही मोजक्या घटनांपैकी ही एक आहे.' यामुळे जागोजागी वाचताना अडखळत होतो नि वाचनाच्या गतीला खीळ बसत होती.

जिथे अपेक्षा अधिक असतात तिथे अपेक्षाभंगाचे दु:ख अधिक तीव्र असते हे ओघाने आलेच.

- oOo -


हे वाचले का?