बुधवार, ७ जुलै, २०२१

माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’

माध्यमे - १: 'खपते ते विकते' << मागील भाग
---

मागील लेखात इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या निमित्ताने चॅनेल-माध्यमांवरील कार्यक्रमांच्या विषय नि स्वरुपासंदर्भातील धंदेवाईकतेवर भाष्य केले होते. टीआरपीच्या स्पर्धेत शक्यतो जे खपते तेच विकण्याचे त्यांचे धोरण असते. पण हा काही केवळ दृश्य-माध्यमांचा दृष्टिकोन आहे असे म्हणता येणार नाही. अन्य माध्यमांचे धोरणही याच्याशी मिळतेजुळतेच असते.

काही काळापूर्वी एका वेबसाईटवर मी ’चेकर्स’ हा खेळ खेळत असे. अगदी ’तज्ज्ञ पातळीवरून’ खेळणार्‍या संगणकालाही आपण सहज हरवत आहोत असे काही सामन्यांतच लक्षात आले. संख्याशास्त्रीय दृष्टीने पाहू लागल्यावर ध्यानात आले, की प्रत्येक सामन्याच सरासरी वेळ हा तीन ते चार मिनिटे इतकाच आहे. इंटरनेटवर या प्रकारचा खेळ खेळणार्‍यांच्या करणार्‍यांच्या सहनशक्तीचा हा खेळ उपलब्ध करुन देणार्‍या मंडळींनी बहुधा अभ्यास करुन हा कालावधी निश्चित केला असावा. (यू-ट्यूबर व्हिडिओ अपलोड करताना त्याचा कालावधी किती असावा याचा विषय-वर्गवारीनुसार विचार केला जात असतो.) आणखी काही सामने वेगवेगळ्या प्रकारे खेळून पाहिल्यानंतर आलेली शंका खरी ठरली.

'असे का?' याचे उत्तर सोपे होते. खेळ चालू असताना दोन्ही समासांमध्ये जाहिरातींचे पट्टे उमटत होते. खेळाडू जितका वेळ त्या पानावर राहील, तितकी त्या वेबसाईटच्या मालकाला अर्थप्राप्ती होणार असे गणित आहे. म्हणून अगदी सुमार खेळाडूंनाही संगणक महाशय लिंबूटिंबूसारखे जिंकू देत होते, तज्ज्ञच असल्याचा समज करुन देत होते... अगदी इंडियन आयडॉलच्या संयोजकांप्रमाणेच.

सॅटेलाईट रेडिओ चॅनेल सुरु झाली तेव्हा ’फोन करा नि जिंका’ प्रकारच्या स्पर्धा सुरू झाल्या. यात विचारलेले प्रश्न इतके सामान्य असत, की ऐकणार्‍या बहुतेकांना त्याचे उत्तर ठाऊक असे. मग प्रथम कोण उत्तर देतो, याची अहमहमिका सुरू होई. पूर्वी असले प्रकार पोस्टकार्डाद्वारेही होत. नंतर ईमेलद्वारे होऊ लागले. आणि मोबाईलच्या आगमनानंतर अखेर एसएमएसद्वारे होऊ लागले. अशा छद्मस्पर्धांचा सुरुवातीचा उद्देश सोपा होता. बक्षीसाच्या लालसेने अधिकाधिक श्रोते, प्रेक्षक आपल्या कार्यक्रमाकडे आकृष्ट व्हावेत, असा कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा प्रयत्न होता. पुढे ’डेटागिरी’चा बोलबाला सुरु झाल्यावर स्पर्धकांची माहिती जमा करणे आणि त्याआधारे मार्केटिंगचे जाळे विणणे हा आणखी एक उद्देश त्याला जोडला गेला.

पण माध्यमांचेच का, सामान्य माणसेही यात मागे नाहीत. मागच्या महापालिका निवडणुकीपूर्वी आमच्या प्रभागातील नगरसेवकाने मतदारसंघात फिरुन ’जनसंपर्क सहज ठेवता यावा’ म्हणून सर्व मतदारांचे मोबाईल क्रमांक जमा केले. निकाल लागले आणि आमच्या मोबाईल्सवर नगरसेवकाला ’निवडणूक निधी’(!) देणार्‍या स्थानिक दुकानांचे मार्केटिंग मेसेजेस येऊन धडकू लागले.

पूर्वी चित्रपटांमधून एखादी टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, एखाद्या पंख्याचा क्लोज-अप घेत त्याचे नाव स्पष्ट दिसेल याची तजवीज केली जाई. या बदल्यात त्या उत्पादनाचा उत्पादक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आर्थिक हातभार लावत असे. याला 'Embedded Marketing’ म्हणजे ’प्रच्छन्न प्रचार’ अशी संज्ञा तेव्हा वापरली जात असे. आता टीआरपीच्या जमान्यामध्ये प्रच्छन्नतेची गरज न उरता या आर्थिक गणितामध्ये थेट कार्यकारणभावच प्रस्थापित झालेला आहे.

संगणकाच्या, इंटरनेटच्या जमान्यात थेट ग्राहकांकडून उत्पन्न मिळवण्यापेक्षा जाहिरातदारांकडून उत्पन्न मिळवण्यावर अधिक भर असतो. त्यामुळे बहुतेक चॅनेल अगदी बव्हंशी फुकट किंवा नगण्य मासिक वर्गणी प्रेक्षकांकडून घेत असतात. कार्यक्रमांदरम्यान अधेमध्ये ब्रेक घेऊन दाखवलेल्या, कार्यक्रम चालू असताना स्क्रीनच्या तळाला वा बाजूला स्तंभामध्ये दिसणार्‍या, कार्यक्रमांमध्येच मिसळून दिलेल्या ... अशा विविध प्रकारे जाहिरातींचा जो भडिमार होतो त्यांतूनच त्यांच्या उत्पन्नाचा बळकट स्रोत निर्माण होत असतो. या जाहिरातींचे दर निश्चित करण्यासाठी त्यांना या जाहिरातदारांना आपली ग्राहक-पोहोच किती आहे हे सिद्ध करुन दाखवावे लागते. आणि यासाठी मागील लेखात मांडलेले टीआरपीचे गणित कामी येते.

CastAwayVollyball
'Cast Away' या चित्रपटात विल्सन व्हॉलिबॉल्सची केलेली प्रच्छन्न जाहिरात.
हा व्हॉलिबॉल पुढे लिलावात तब्बल तीन लाख डॉलरला विकला गेला.

चॅनेल-माध्यमे तर सोडाच, यू-ट्यूबवरील लहान-लहान वाहिन्याही स्थानिक उत्पादकांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरात करुन आर्थिक लाभ पदरी पाडून घेत असतात. चॅनेलवरील मालिकांतून, निवेदकांच्या निवेदनातून तर सोडाच, पण एखाद्या खेळाच्या थेट प्रक्षेपणाच्यावेळी समालोचन करणार्‍यांनाही प्रायोजकांच्या उत्पादनाच्या जाहिरातींचा एक-दोन ओळींची मजकूर उच्चारणे सक्तीचे असते. या जाहिरातींनी कार्यक्रमांचा इतका कब्जा घेतला आहे की उलट दिशेने आता कार्यक्रमांनाच ’एम्बेडेड प्रोग्राम’ म्हणायची वेळ आली आहे. माध्यमांमध्ये जाहिरात हे धोरण मागे पडून जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या छापते ते वृत्तपत्र, जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या देणारी ती न्यूज-चॅनेल्स, जाहिरातींच्या अधेमध्ये मनोरंजन करणारी ती मनोरंजन माध्यमे अशा व्याख्या बदलून घ्यायला हव्या आहेत.

चॅनेल-माध्यमे ही मूर्तिमंत धंदेवाईकता आहे. अनेक राजकीय, सामाजिक, क्वचित बौद्धिक मंडळींमध्ये टकरीच्या सांडांप्रमाणे झुंजवून किंवा कुस्त्यांची दंगल लावावी तशा चर्चांचे फड लावून, अनेक मार्गांनी त्याचे दाम ते वसूल करत असतात. ('Tomorrow Never Dies' या बॉण्डपटातील Elliot Carver हा माध्यमसम्राट त्याच्या नव्या सॅटेलाईट वाहिनी-साखळीच्या उद्घाटनाला एक्स्लुजिव आणि सनसनाटी कव्हरेज देता यावे यासाठी दोन जागतिक महासत्तांमध्ये युद्धाची कलागत लावण्यासही कमी करत नाही. ) याव्यतिरिक्त विशिष्ट भूमिकेला झुकते माप देण्यासाठी त्या त्या बाजूच्या मंडळींकडून थेट अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात देणग्या स्वीकारतात... धंदा चोख करतात आणि ’प्रामाणिकपणाच्या बैलाला ढोल’ म्हणतात.

कोरोनिल या आपल्या औषधाने कोरोना बरा होतो असा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. त्याचे बाजार-अवतरण करण्याच्या दिवशी ’कोरोनावर जगातले एकमेव रामबाण औषध’ म्हणून बहुतेक भाट माध्यमांनी दिवसभर बातम्या वाजवल्या, चर्चा घडवल्या; बहुतेक वेळ बाबा आणि कोरोनिलचे खोके स्क्रीनवर झळकवले. पुढे उत्तराखंडच्या औषध प्रशासनाने 'कोरोनिलसाठी केवळ प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून परवाना मागितला नि दिला गेला' असल्याचे स्पष्ट केले. बाबांवर फसवणुकीचा खटला भरावा अशी मागणी सुरु झाली. त्यावरही चॅनेलवाल्यांनी चर्चा घडवून आणल्या. आधीच्या बातम्या नि त्या चर्चा दोन्हींचे प्रायोजक होते ’पतंजली आयुर्वेद’!

FullFrontalBJP

सर्वात जुने माध्यम असलेल्या वृत्तपत्रांची स्थितीही फार वेगळी नाही. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्यापासून आसपासच्याच काय, हजारो मैल दूरवरच्या घडामोडी काही सेकंदात समोर येत असल्याने वृत्तपत्रांची मूळ गरज घटत चाललेली आहे. खर्चाचे वाढते प्रमाण, ग्राहक राखण्यासाठी त्या तुलनेत कमी ठेवावे लागणारे दर, या कात्रीत सापडलेली माध्यमे जाहिरात-उत्पन्नावर भर देतात हे ओघाने आले.

पूर्वी पहिल्या पानावरील हेडलाईन ज्या बातमीला मिळे, ती बातमी आदल्या दिवशीची सर्वाधिक महत्वाची बातमी मानली जात असे. आता वृत्तपत्राचे पहिले पूर्ण पानच जाहिरातीने व्यापलेले असते. जाहिरात ही आदल्या दिवशीच्या सर्वात महत्वाच्या बातमीहून निर्णायकरित्या मोठी ठरली आहे. आतील पानांवर पाहिले तर, अन्य जाहिराती, छोट्या जाहिराती, निविदा सूचना वा ताळेबंदांसारख्या बहुसंख्य वाचकांच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्टी, -पैसे घेऊन छापल्या आहेत हे उघड गुपित असते अशा- राजकीय आणि व्यावसायिक ’बातम्या’ वगळल्या, तर निखळ बातम्या वा वाचकांना उपयुक्त असा मजकूर जेमतेम दहा ते पंधरा टक्के इतकाच उरतो.

इंग्रजी वृत्तपत्रांना संभाव्य ग्राहक अधिक असल्याने त्यांची स्थिती थोडी बरी असते. पण मराठीसारख्या स्थानिक भाषांतील वृत्तपत्रे आता केवळ जाहिरातींचे उत्पन्न मिळवण्यासाठी छापली जाणारी जाहिरातपत्रेच उरली आहेत. या दहा-पंधरा टक्क्यांत जागा भरण्यासाठी पहिला मान अग्रलेख लिहिण्या्ची हौस असलेल्या संपादकाला दिलेला. उरलेली जागा भरण्यासाठी वृत्तसंपादक मंडळींना फार प्रयत्न करावे लागत नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कृपेने हव्या त्या स्वरुपात बातम्या तयार मिळतात. आवश्यक तर संपादित करुन त्या चौकटीत बसवल्या की काम होते.

एक प्रथितयश मराठी वृत्तपत्र इंग्रजी पुस्तकांच्या परीक्षणाला दीड-दोन हजार शब्दांची मुभा देते. एकाच पुरवणीत अशा दोन पुस्तकांची परीक्षणे छापते. याउलट मराठी पुस्तकांच्या परीक्षणांना पाचशे शब्दांची एखादी पत्रावळ कशीबशी मिळते. आमच्या एका पुस्तकाचे परीक्षण एका नियतकालिकाकडे पाठवण्यापूर्वी शब्दसंख्या वगैरेची मर्यादा जाणून घेण्यासाठी फोन केला. पहिला प्रश्न होता, ’तुम्ही आम्हाला जाहिराती देता का?’ थोडक्यात त्या नियतकालिकातील परीक्षणेही ’अप्रत्यक्ष पेड’ असावीत असा अंदाज केला. पुढचे-मागचे काही अंक चाळल्यावर तो खराही ठरला. हे नियतकालिकही इंग्रजी पुस्तकांची परीक्षणे छापण्यातच धन्यता मानते.

'हे धोरण का चालते?' यावर विचार करताना मराठी पुस्तकांच्या प्रकाशकांकडेही नजर टाकायला हवी. तिथेही इंग्रजीतील गाजलेली, गाजत असलेली समकालीन पुस्तके शक्य तितक्या तातडीने अनुवादित करुन बाजारात आणण्याची अहमहमिका चालू असते. त्या घाईत अनुवादाचा दर्जा भयाण असलेली पुस्तके हाती पडत असतात. पण त्यात ना प्रकाशकाला लाज ना वाचकाला. मोजक्या चिकित्सक वाचकांकडून होणारा जोड्यांचा कार्यक्रम टाळण्यासाठी काही अनुवादांवर तर अनुवादकाचे नावही नसते. या सार्‍या व्यवसायाच्या यशाच्या मुळाशी मराठी भाषिकांचा न्यूनगंड आणि इंग्रजी बाजाराशी ’कदम मिलाके चलो’ची जमाव-दबावाने (peer pressure) निर्माण झालेली अपरिहार्यता असते. बुकरच्या स्पर्धेतील पुस्तक आपण वाचले असले पाहिजे हा अट्टाहास, पण इंग्रजी समजुतीचा नि म्हणून वाचनाचा वेग कूर्मगतीचा. यावर हा उपाय. हे कामचलाऊ अनुवादित पुस्तक वाचले तरी गोषवार्‍याने मूळ पुस्तक वाचल्याचा आव आणणे शक्य होते. वाचकाचे नि प्रकाशकाचे दोघांचे काम होते. याला वृत्तपत्र नि नियतकालिकेही हातभार लावून त्या नफ्याचे थोडे उदक आपल्याही हातावर सोडून घेतात, गुणवत्ता नि मराठी पुस्तके या दोन्हींला वार्‍यावर सोडून.

नफा वाढवण्यासाठी जाहिरातींचे उत्पन्न वाढवणे हा जसा उपाय आहे, तसाच खर्च कमी करणे हा दुसरा उपाय आहे. माध्यमांचे नोकर असलेल्यांचा पगार तर टाळता येत नसतो. मग तो शक्य तितका कमी ठेवणे आणि त्यांच्याकडून जास्तीतजास्त काम करवून घेणे हा भांडवलशाहीतील नियम आहे. त्या पलिकडे तात्कालिक सहभागी व्यक्तींना- वृत्तपत्रांतील लेखक, चॅनेलवरील चर्चक वगैरे- शक्यतो मानधनच न देणे या प्रकारांनी खर्चात काटछाट केली जाते.

चित्रपट, मासिक आदी अनेक क्षेत्रात उतरलेल्या एका चॅनेलकडून त्यांच्या मासिकातील एका फीचरसाठी एका फोटोग्राफर मित्राला त्याचे फोटो वापरण्याची ’विनंती’ करण्यात आली. तो व्यावसायिक फोटोग्राफर असल्याने त्याने मानधनाची चौकशी केली. त्यावर ’तुम्हाला प्रसिद्धी मिळेल की.’ असे निर्लज्ज उत्तर त्याला मिळाले. आता आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याचे बर्‍यापैकी नाव आहे अशा त्या मित्राला हे वीत-दीडवीत मराठी मासिक आणखी काय प्रसिद्धी देणार होते? त्याहूनही अस्वस्थ करणारी बाब म्हणजे प्रत्येक सेकंदाच्या बाष्कळ बडबडीला पैशात रूपांतरित करणारी ही धंदेवाईक मंडळी सर्जनशील कामाची मात्र एक दमडी देऊ इच्छित नाहीत. तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो ही उपकाराची भाषा करतात.

Multitasking

एका चॅनेलवरील दिवाळी अंकांवरील एका चर्चेत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रण होते. होकार दिल्यानंतर चॅनेलच्या बाजूने पुढचा आठवडाभर एकदम सामसूम. सकाळी नऊ वाजता होणार्‍या चर्चेच्या जेमतेम दीड तास आधी ती त्या चर्चेच्या सूत्रसंचालिकेचा फोन आला नि वट्ट पाच मिनिटे तुम्ही कशावर बोलणार वगैरे जुजबी चौकशी झाली. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा संपर्कच नाही.

नियमितपणे चॅनेल्सवर जाणार्‍या आमच्या कार्यकर्त्या, कलाकार, अभ्यासक मित्रांनाही एक पैशाचे मानधन मिळाल्याचे ऐकिवात नाही. आणि बातम्या देण्यापासून, विविध ठिकाणी बाईट्स घेणे, दिवाळीसारख्या निमित्ताने खास कार्यक्रम करणे, वगैरे सगळे काही करणार्‍या यांच्या नोकरांना मात्र नियमित पगार. ते ही बिचारे मूठभर पगारावर साहेब सांगेल ते निमूटपणे सगळे करतात. मी सहभागी झालेल्या चर्चेची सूत्रसंचा्लिका नंतर त्याच चॅनेलवर बातम्या देताना दिसली, किंबहुना तेच तिचे मुख्य काम आहे हे नंतर समजले. थोडक्यात ’झाडू मारण्यापासून ते कलाकार वा चर्चक पकडून आणण्यापर्यंत सर्व कामे करण्याची तयारी असेल तर आमच्याकडे तुम्हाला रोजगार मिळेल’ अशी धमकीवजा ऑफर चॅनेल-मालक मंडळी देत असावीत.

अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ’तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात. सोशल मीडियावर चार ओळी लिहिल्याने प्रशंसा झालेल्या, नि त्या अर्ध्या हळकुंडानेच पिवळ्याधम्मक होऊन बसलेल्यांची त्यांच्या दारी इतकी भाऊगर्दी आहे, की या माध्यमांना एक गेला दुसरा सहज मिळतो. ’पेपरमध्ये आपले नाव आले’ या बालीश आनंदाने ऊर भरून येणार्‍यांना पैसे दिले नाही तरी चालतात. ’दीड कॉलम भरून काढायला लेख पाहिजे’ किंवा ’चर्चेत साडेतीन मिनिटे वाजवायला एक तोंड पाहिजे’ एवढ्याच धंदेवाईक अपेक्षा असलेल्यांना ’कथा पुणे, मुंबई आणि सोलापूर इथे घडते. पात्ररचना विलोभनीय आहे’ वगैरे पुलंच्या ’सखाराम गटणे’ छापाचे किंवा चित्रपटाचा, कादंबरी/ कथांचा गोषवारा आपल्या शब्दांत मांडणारे परीक्षण लिहून देणारे समाजमाध्यमांतून सहज मिळत असल्याने काम भागते.

एका वृत्तपत्राच्या पोर्टलने तर महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून ब्यूटी टिप्स, लाईफस्टाईल या सदरातले लेख लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. ही मुले अर्थातच आपले नाव पाहून धन्य होत असल्याने गुगलबाबाच्या मदतीने इंग्रजी लिखाण शोधून, अनुवादित करुन दोन-अडीचशे शब्द सहज खरडून देत असतात. गण्या उतरला, गणपा चढला, तरी वृत्तपत्रांची, पोर्ट्ल्सची, नियतकालिकांची गाडी चालूच राहते. खर्च कमी करण्यासाठी पुस्तकविक्री क्षेत्रातील मंडळीही असेच मार्ग अवलंबत असतात. विक्रेते वितरकाचे, तर वितरक प्रकाशकाचे पैसे शक्यतो देऊच नयेत असा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम म्हणून- वा त्या बतावणीखाली, प्रकाशक लेखकाचे मानधन उंच शिंक्यावर टांगून ठेवतात.

आयटी इंडस्ट्रीत काम करत असताना एक्सेलपासून जावापर्यंत, बॅंकिंगपासून फार्मास्युटिकल्सपर्यंत सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअरवर तुम्हाला काम करता आले पाहिजे, टीम नावाची टोळी हाकता आली पाहिजे, आपल्याकडे अजिबात नसलेल्या अनुभव वा कौशल्याचा आभास क्लाएंटसमोर मिरवता आला पाहिजे हे सांगणारी मॅनेजर नावाची प्रजाती भेटली होती. त्या व्यवसायात ’माणूस’ हीच क्रयवस्तू बनलेली आहे. त्यामुळे तिला अधिकाधिक ग्राहक मिळवायचे तर आयटी सर्कसमध्ये तिला बेडूक‍उड्यांपासून ट्रॅपीझवरच्या उड्यांपर्यंत सर्व जमले पाहिजे.

पूर्वी बाजारात उभा केलेल्या गुलामाचे दात, शारीरबळ वगैरे अजमावून त्याला विकत घेतल्यास कमीतकमी अन्न खाऊन जास्तीतजास्त काम करेल ना हे पाहून एखादा धनको मालक पैसे देऊन त्याला विकत घेई.’क्लाएंट’ म्हणवणारे नव्या भांडवलशाही व्यवस्थेतले मालक अगदी तसेच त्यांना पारखून घेतात आणि त्यांच्या सध्याच्या मालकांना, म्हणजे आयटी कंपनीला रोख पैसे देऊन काही काळापुरते विकत घेतात. गुलाम विक्रीयोग्य राहणे जुन्या मालकाच्या दृष्टीने महत्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही क्लाएंटला विकता येईल असेच गुलाम, असेच मजूर त्यांना हवे असतात. त्यामुळे ही मंडळी 'तज्ज्ञ' नावाच्या व्यवस्थेला धुळीला मिळवत कामचलाऊ कामगारांच्या आधारे वेतन-खर्च कमीतकमी ठेवून, आपल्या मालकांचा पैसा वाचवण्याचे नि नफा वाढवण्याचे काम करतात.

मालक मंडळीही चतुर असतात. ते या लोकांना निव्वळ वेतनापलिकडे नफ्याचा थोडासा वाटा देऊ करतात. त्यामुळे ही मॅनेजमेंट नावाची सर्वस्वी अनुत्पादक कामे करणारी मंडळी ’प्रॉफिट ही भगवान है’ म्हणत वाटेल ते करुन तो वाढता राहील याची खटपट करत असतात. त्यादरम्यान गुणवत्तेची ऐशीतैशी झाली तरी त्यांना त्याचे सोयरसुतक असण्याचे काहीच कारण नसते. त्यातूनच सर्जनशील व्यक्तीला ’तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो, आणखी काय हवे?” असा निलाजरा उलट प्रश्न विचारण्याचा कोडगेपणा जन्माला येतो. मग ज्या लेखक-कलाकार, कामगार यांना आपल्या गुणवत्तेबद्दल आत्मविश्वास आहे अशी मंडळी दूर राहतात नि ही मॅनेजर मंडळी कामचलाऊ, हौशी मंडळींकरवी शक्यतो फुकट, नाहीच जमले तर नगण्य मानधन/वेतनावर कामे करवून घेत राहातात. अशा परिस्थितीत गुणवत्तेचे काय होत असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

- oOo -

पुढील भाग >> माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा