रविवार, २८ एप्रिल, २०२४

अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी

(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन केले. त्याच सुमारास भारतामध्ये झालेल्या नोटाबंदीच्या अनुषंगाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा थोडा विस्तार करुन लिहिलेली ही काल्पनिका.)
---

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महान भारतीय अर्थशास्त्री विजय मल्ल्या ऊर्फ मल्ल्यामहर्षी यांनी युरपमधून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे (अ.सं.सं.) गुपचूप गमन(१) केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बातमी तर गुप्त ठेवण्यात आलीच होती. अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’च्या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ नील्स बोर याला ज्या सफाईने अमेरिकेमध्ये नेण्यात आले होते त्याच सफाईने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले.

प्रथम एका कार्गो विमानाने मल्ल्यामहर्षींना डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. आधीच सूचना मिळाल्याप्रमाणे, विमानतळावरील अ.सं.सं.च्या अधिकार्‍यांनी इमिग्रेशन-चेक वगैरेचे सोपस्कार बाजूला ठेवून त्यांना थेट एका अति-सुरक्षित अशा लहानशा विमानाकडे नेले. हे विमान खुद्द अ.सं.सं. अध्यक्षांनीच पाठवले होते, हे नंतर प्रेस-ब्रिफिंगमध्ये उघड झाले. या विमानाने महर्षींना थेट रीगन विमानतळाकडे नेण्यात आले. तिथे मात्र त्यांचे आगमन जाहीर करण्यासाठी स्पेशल बँड आणवून वाजतगाजत त्यांना थेट राष्ट्राध्यक्ष निवासाकडे नेण्यात आले.

नील्स बोर याच्या आगमनाचे कारण बरेच उशीरा उघड झाले होते. तसेच मल्ल्यामहर्षींना कोणत्या मोठ्या ऑपरेशनसाठी ‘कमिशन’ करण्यात आले आहे यावर अ.सं.सं.च्या माध्यमांमधून घनघोर चर्चा सुरू झाल्या. भारतीय माध्यमांनी ‘फक्त आमच्याच चॅनेलला मिळालेली गुप्त बातमी’ म्हणून ‘मल्ल्यामहर्षींना अध्यक्षांचा ‘मद्य-सचिव’ म्हणून नेमण्यात येणार आहे’ यापासून ‘स्वदेशात अडचणीत आल्यास परदेशाश्रय कसा घ्यावा’ यावर व्हाईट हाऊसमध्ये निवडक रिपब्लिकन खासदारांना ते मार्गदर्शन करणार असल्याची’ ब्रेकिंग न्यूज – अर्थात ग्राफिक्स वगैरेसह – वाजवण्यास सुरुवात केली. भारतीय माध्यमांच्या पावलावर पाऊल टाकत अमेरिकन माध्यमांनी मल्ल्यामहर्षींचा सहभाग असलेल्या या संभाव्य गुप्त कार्यक्रमाला ‘ऑपरेशन रॉयल चॅलेंज’ असे नाव देऊन टाकले.

MallyaaAndTrump

मल्ल्यामहर्षी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पोहोचले. औपचारिक स्वागत झाल्यावर अध्यक्ष ट्रम्प नि मल्ल्यामहर्षी दोघेच त्यांच्या अति-सुरक्षित चर्चागृहात गेले. दोघांची जेमतेम दोनच मिनिटे चर्चा झाली. यावरून प्रस्तावित ऑपरेशनबाबत अध्यक्षांची मल्ल्यामहर्षींसोबत आधीच सविस्तर चर्चा झाली असल्याचे फॉक्स न्यूजने आळवण्यास सुरुवात झाली. चर्चागृहातून दोघेही बाहेर येऊन थेट पेंटगॉनकडे रवाना झाले. तासाभरातच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्याची आणि त्यांच्या उपाध्यक्षांनीही राजीनामा दिल्याची बातमी पसरली. सोबतच मल्ल्यामहर्षी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असल्याची बातमीही आली.

अ.सं.सं. मधील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोजगार धंदे सोडून लोक रस्त्यावर आले, एकमेकांना मिठ्या मारुन, जोर-जोरात घोषणाबाजी करत आणि मुख्य म्हणजे बीअर पीत ते आपला आनंद व्यक्त करत होते. ही भिकारडी जर्मन बीअर आपल्याला प्यावी लागणार नाही, अस्सल भारतीय बनावटीची बीअर मल्ल्यामहर्षी आपल्याला उपलब्ध करून देतील या कल्पनेनेच तरुणांचा जल्लोष सुरू झाला.

पदभार स्वीकारल्यानंतर मल्ल्यामहर्षींनी पहिलीच घोषणा केली ती ‘नोटाबंदीची’! वरिष्ठ सभागृह (Senate) तसंच प्रतिनिधी-गृहातील (House of Representatives) रिपब्लिकन सदस्यांनी धडाधड केलेल्या ट्विट्स, पोस्ट्स नि फेसबुक लाईव्हद्वारे ‘अमेरिका फर्स्ट’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा आता सुरु होत असल्याचे ढोल वाजवायला सुरुवात केली. भारतात अतिशय यशस्वी झालेल्या या उपायाची अंमलबजावणी करण्याचे जाहीर झाल्याने अ.सं.सं. मधील नागरिक आणखीनच खूश झाले आणि ‘आले रे आले, अच्छे दिन आले’ अशा घोषणांनी त्यांनी आसमंत दणाणून सोडले.

भारताप्रमाणेच अ.सं.सं. मधील विरोधकांचा आरडाओरडा सुरु झाला(२). पण मोदींप्रमाणेच मल्ल्यामहर्षींनी या विरोधाला भीक घातली नाही. रिपब्लिकन प्रतिनिधी, ट्रम्प-आर्मी, ‘फॉक्स’सारखी माध्यमे यांनी विरोधकांना ‘चीनचे हस्तक’ म्हणून हिणवण्यास सुरुवात केली. या गदारोळामध्ये फेडरल रिजर्वने केलेला विरोधही पाचोळ्यासारखा उडून गेला.

नोटाबंदी जाहीर झाल्याने जुन्या नोटांच्या बदली देण्यासाठी नव्या डॉलर नोटा(३) छापण्यास सुरुवात झाली. मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये काळा पैसा साठवला जात असल्याने रद्द केलेल्या पाचशे नि हजारच्या नोटटांऐवजी दोन हजारच्या नोटा छापणार्‍या मोदींच्या पावलावर पाऊल टाकून मल्ल्यामहर्षीं काम करू लागले. त्यांनी अ.सं.सं.ला वेगाने श्रीमंत करण्याच्या उद्देशाने थेट पाच मिलियन डॉलर्सच्या नोटा छापण्याचचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला पंधरा मिलियन डॉलर्स सरकारतर्फे देण्याची घोषणा केली(४). दपुढील दोन महिन्यांमध्ये हे वाटप व्हावे या दृष्टीने नियोजन करण्याचा आदेश त्यांनी दिला.

ज्या दिवशी हे वाटप सुरू होणार होते, त्या दिवशी भल्या पहाटेपासून लोकांनी एटीएम्ससमोर रांगा लावल्या होता. रांगेतले काळे, पांढरे, पिवळे, तांबडे, बुटके, उंच, काळ्या डोळ्याचे, निळ्या डोळ्यांचे, भुर्‍या डोळ्यांचे, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सारेच आनंदाने एकमेकांना मिठ्या मारत होते, शुभेच्छा देत होते. येऊ घातलेल्या ‘अच्छे दिनां’च्या चाहुलीने झालेला आनंद त्यांना आवरता येत नव्हता. अखेर ती वेळ आली. सकाळी सहा वाजता रेडिओवरून(५) सर्व एटीएम नव्या नोटांनी गच्च भरल्याची नि सर्वांसाठी ते खुले झाल्याची घोषणा मल्ल्यामहर्षींनी केली नि नागरिकांची आपल्या नेहमीच्या शिस्तीला विसरून एटीएममधे घुसण्याची अहमहमिका सुरू झाली.

वॉशिंग्टनच्या रस्त्यावर राहणार्‍या एका बेघर व्यक्तीने त्याच्या ‘घरा’शेजारच्या एटीएमसमोर दोन दिवसांपासून नंबर लावलेला होता. एटीएममधून पैसे काढून ती व्यक्ती बाहेर पडली आणि कॅमेर्‍यांचे क्लिकक्लिकाट चालू झाले. ‘आम्हीच पैले’ म्हणत त्याचा ‘बाईट’ घेण्यास धावलेल्या चॅनेल प्रतिनिधी आणि स्वयंघोषित यू-ट्युब चॅनेलशास्त्रींना धक्काबुक्की करत बाजूला करुन काही तरुण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. आनंदातिशयाने त्या भाग्यवंताला डोक्यावर घेऊन त्यांनी नाचायला सुरुवात केली. पहिला उत्साह ओसरल्यावर तिला खाली उतरवण्यात आले. नव्या नोटेस तिने उंच धरून सर्वांनी त्यासोबत सेल्फी काढावी असा प्रस्ताव एका तरुणाने मांडला नि तो उत्साहात नि एकमताने पास झाला.

ताबडतोब त्या ‘प्रथम-नोट-प्राप्त’ भाग्यवंताला मधे घेऊन त्याच्या आजूबाजूने बरेच लोक दाटीवाटीने उभे राहिले. त्या भाग्यवंताच्या शेजारी उभे असलेल्या तरुणाने मोबाईल समोर धरून सर्वांना ‘से बीअऽऽऽऽर’असे म्हणून क्लिक केले. त्याच वेळी समोरुन फोटो काढण्यासाठी सज्ज असलेल्या एकाने झूम थोडा कमी करून सर्वांना कव्हर करता यावे यासाठी स्क्रीनवर बोटे टेकवली. इतक्यात एटीएममध्ये नंबर लागून नोटा मिळालेला एकजण अत्यानंदाने धावत त्याच्या शेजारून गेला. जाता जाता त्याचा धक्का या कॅमेर्‍याधार्‍याला लागला नि वाईड अँगलऐवजी उलट कॅमेरा जास्तच झूम झाला. समोरचे सारे लोक आता आउट-ऑफ-फोकस जाऊन स्क्रीनवर फक्त नोट दिसत होती. त्यावर लिहिलेले वाक्यही स्पष्ट वाचता येत होते...

‘इन फ्रॉड वी ट्रस्ट’ (६)

- oOo -

टीपा :
(१). ‘पलायन केले’ असे म्हणणार होतो पण कुणाच्या तरी भावना दुखावल्या तर पंचाईत. (* टीप ६ पहा.)
(२). ‘तसंही या डेमोक्र्याट्यांना आरडाओरड करणं सोडून दुसरं येतंय काय?’ - सॅम-बिन पॅट्रोस, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, दक्षिण-पश्चिम न्यू हॅम्पशायर परगणा, गल्ली क्र. ८.
(३). तिकडे त्यांना बिल्स म्हणतात नि बिलाला चेक. पण ‘ज्याले ऑनर करु नही, त्याले चेक म्हनू नही’ असं सांगून अ.सं.सं.च्या लोकांचे हे उलटे डोकेही मल्ल्यामहर्षी लवकरच सरळ करतील.
(४). ‘त्यापेक्षा किंगफिशर माईल्डचे पंधरा क्रेट दिले असते तर अधिक उपयोगी ठरतील, या रिपब्लिकनांच्या देशात!’ - योशुआ सिनहॅम, ‘हिलरी इज किलरी’ या डेमॉक्रॅटिक पार्टी-अंतर्गत दबाव गटाचे निमंत्रक.
(५). ‘टीव्ही नव्हता का?’ बावळट प्रश्न विचारणार्‍याला ‘ग्वाटानामो बे**’ला डीपोर्ट करण्यात येईल. (** टीप ६ पहा.)
(६). ज्यांना संदर्भ माहीत नसेल, त्यांनी आपल्या धार्मिक/अधार्मिक श्रद्धेय पुस्तकांत सारे ज्ञान आहे या आपल्या दाव्याची सुरळी करून... ...माळ्यावर टाकून द्यावी.

---
संबंधित लेखन:

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’) >>
अशी ही पळवापळवी >>
---


हे वाचले का?

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

गजरा मोहोब्बतवाला

सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) .

माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला आहे.

‘याला किस्सा, अनुभव म्हणावे का?’ असा प्रश्न कुणाला पडेल. पुरे वाचल्यावर ‘ही एक नित्य घडणारी किरकोळ, अदखलपात्र घटना आहे’ असे बहुतेकांचे मत असेल. (आणि हे खरडणे खरं तर त्यांच्याच साठी आहे.) पण हा प्रसंग माझ्या डोक्यात कायमचा घर करून राहिलेला आहे याचे कारण– कदाचित– माझी पिंडात ब्रह्मांड पाहण्याची अगोचर वृत्ती असेल. ते काही असो, तो प्रसंग आणि त्या वेळी माझ्या मेंदूचे फसफसणे इथे मांडून मोकळा होणार आहे.

---

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी घरातून बाहेर पडलो, सोसायटीचे फाटक ओलांडून नि.र. वर आलो. इथून म.र.ला जोडणारे वळण काही फुटांवर आहे. भारतीय मंडळींचा वाईट सिव्हिक-सेन्स आणि इतरांच्या सोयीचा शून्य विचार यांचा सज्जड पुरावा पाहायचा तर ‘जरा विसावू या वळणावर’.

StreetFlowerSeller
https://scroll.in/ येथून साभार.

नि.र.कडून उजवीकडे वळणावरच एक गजरेवाला उभा आहे. त्याच्या समोर काही क्रेट्स आडवे टाकून त्यावर एक फळी टाकलेली आहे. त्यावर ओतलेल्या अनाकलनीय रंगाच्या मोगर्‍याच्या फुलांवर तो पाणी मारतो आहे. त्याच्या शेजारी एका फळवाल्याने त्याच पद्धतीने पथारी लावलेली आहे. त्याच्या पायाशी फळांच्या खोक्यांतून बाहेर पडलेले गुलाबी कागद, स्पंजची जाळी, पुठ्ठे वगैरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या दोघांनी मिळून उजवीकडे वळण्यास– आणि तिकडून नि.र.कडे आत वळण्यास अडथळा निर्माण केला आहे.

नुकताच गजरा किंवा मोगरा घेऊन निघालेली एक माता, कुणी एक आजी भेटल्यामुळे तिच्याशी गप्पा मारत फळवाल्यासमोरच उभी आहे. तिचे तीन-चार वर्षांचे मूल तिचे बोट पकडून असले तरी रस्त्याच्या मधोमध उभे आहे, याची तिला जाणीव नाही. या तिघांनी मिळून नि.र.चा अर्धा रस्ता अडवलेला आहे. या दोन विक्रेत्यांच्या समोरच्या बाजूला, म्हणजे डावीकडील वळणावर आणखी एक फळवाला आपले दुकान मांडून आहे. त्यामुळे हा फळवालाआणि ते पलीकडचे मूल यांच्या मधून जेमतेम एक रिक्षा कशीबधी जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक आहे. त्यातूनच मला बाहेर पडून इच्छित स्थळाकडे प्रयाण करायचे आहे.

मी तिथे पोहोचतो न पोहोचतो, तोच म.र. वरून उजव्या बाजूने एक कार येते नि थेट त्या गजरेवाल्याच्या शेजारी थांबते. आता म.र.कडून आमच्या नि.र. कडे वळण्यासाठी तिकडून येणार्‍यांना राँग साईडने जाऊन या कारच्या पुढून काटकोनात वळण घेण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आणि तसे केलेच तरी... माता, मूल आणि आजींच्या गप्पा चालू आहेत... दोन्ही फळवाल्यांसमोर कुणीतरी उभे आहे... म्हटल्यावर ते वळलेले वाहन उरलेला रस्ता बंद करत अडकून पडणार हे नक्की झाले.

पण ते जाऊ द्या. आपल्या वाहतूक नियमांबाबत बेशिस्त देशात (एक मिनिट– चुकलो हं. आमच्या बेशिस्त गावात– तुमचे गाव गुणी आहे, ओके?) यात काय नवीन असे तुम्ही म्हणणार हे मला ठाऊक आहे. महासत्ता होण्याच्या वाटेवर सिव्हिक-सेन्स– जबाबदार सार्वजनिक वर्तणूक हा मुद्दा आपण धरत नाही. किंबहुना एकुणातच इतिहासाचा चिखल चिवडणार्‍यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये नागरिकशास्त्र तसेही दहा-वीस गुणांपुरते अंग चोरून उभे असते; बहुतेकांनी ऑप्शनला टाकलेले असते.

त्या कारची काच ऐटीत सर्रकन खाली होते. खिडकीतून गॉगल लावलेला एक ऐटबाज चेहरा बाहेर डोकावतो. शेजारी त्याचं खटलं/पत्नी/पार्टनर/जोडीदार बसलेली आहे. ऐटबाज चेहरा गजरेवाल्याला दोन गजरे मागतो. गजरेवाला प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे एकुण वीस रुपये किंमत सांगतो. ऐटबाज चेहरा ‘छे: इतक्या लहानशा गजर्‍याचे दहा रुपये? काहीही काय सांगतोस. दहाला दोन दे.’ म्हणत घासाघीस सुरू करतो. गजरेवालाही ‘खरेदी पण एवढी नाही’ वगैरे सुरू करतो. अठरा रुपये, पंधरा रुपये वगैरे एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे सुरू होते. पण गजरेवाला अजिजीने नकार देत राहतो.

ऐटबाज व्यक्तीच्या कारने म.र. आणि नि.र. दोहोंचीही कोंडी केलेली असल्याने आसपास हॉर्न वाजू लागलेले असतात. ऐटबाज चेहर्‍याशेजारच्या पत्नीच्या चेहर्‍यावर वैतागाचे भाव दिसू लागतात. अखेर ‘दे चल.’ असे म्हणत ऐटबाज चेहरा दोन गजरे घेतो आणि बायकोकडे देतो. खिशातून पाकीट बाहेर काढतो नि गजरेवाल्याच्या हातावर पंधरा रुपये टिकवतो. गजरेवाला ‘अजून पाच रुपये द्या.’ म्हणू लागतो. पण ‘नाही नाही, हे बरोबर आहेत’ असे म्हणत ऐटबाज चेहरा आपल्या अष्टलक्षी गाडीला टाच मारून भरधाव वेगाने निघून जातो.

हतबुद्ध झालेला गजरेवाला गोठलेल्या अवस्थेत काही क्षण उभा असतो. भानावर येतो नि नशिबाला बोल लावत पैसे खिशात टाकून मोकळा होतो. दरम्यान म.र. नि नि.र. दोन्ही रस्ते मोकळे झाल्याने हुश्श: करत मागचे सारे मोकाट सुटतात. गजरेवाला पुढच्या गाडीवाल्याची वाट पाहात ताटकळत उभा राहतो.

---

ऐटबाज चेहर्‍यावरचा दीड-एक हजार रुपयांचा गॉगल, जोडीदाराच्या अंगावर असलेली पाच ते सात हजारांची साडी आणि पाच ते आठ लाखांची गाडी खरेदी करताना याला पैसे कमी पडले नसावेत. गजरेवाल्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला गाडी लावून विकले जाणारे शंभर-दीडशे रुपयांचे गॉगल त्याला ‘बिलो डिग्निटी’ वाटत असावेत. चांगल्या दर्जाचे, पण अन-ब्रँडेड कपडे त्याला चालत नसावेत. पैसे देताना– देणार्‍या हातात घातलेली अंगठी पितळेची आहे की सोन्याची हे त्याला स्वत:ला खात्रीपूर्वक सांगता आले नसते. त्यात घातलेला खडा वा हिरा खरा आहे की खोटा याचीही त्याला गंधवार्ता नसते. तरीही सुवर्णकाराने सांगितलेली (आणि वर डिस्काउंटची भाषा करून थातुरमातुर कमी केलेली) किंमत त्याने निमूट मोजली असेल. पण गजरेवाल्याचे पाच रुपये मारण्यासाठी भर चौकात चालत्या गाडीत बसून त्याने पेट्रोल जाळले होते, म.र. नि नि.र. दोहोंकडे अडकलेल्या वाहनांनाही जाळण्यास भाग पाडले होते. यातून पाच रुपयांहून अधिक रकमेची नासाडी त्याने केली होती. पण याची त्याला समजच नव्हती.

यावरून मला ‘डिस्काउंट असेल तरच पुस्तक खरेदी करणार, तीनशेहून अधिक रकमेचे पुस्तक खरेदी करणार नाही,’ म्हणणारे पण बारमध्ये बसल्यावर पुर्‍या बाटलीच्या किंमतीमध्ये एक पेग विकत घेताना कोणतीही घासाघीस न करणारे, वर वेटरला उदारहस्ते टिप देणारे मित्र आठवतात. ऋण काढून सण साजरे केल्यासारखे कुवत नसताना आयफोन, आयपॅड मिरवणारे, पण आरोग्य-विमा (health-insurance) मात्र ‘महाग आहे’ म्हणून न घेणारे मित्र आठवतात. इतरांकडे आहे म्हणून चार-चाकी गाडी घेऊन पेट्रोल– चुकलो, डीजल परवडत नाही म्हणून दारी शोभेची वस्तू म्हणून उभी करुन ठेवणारे, पण त्याचवेळी पैसे वाचवण्यासाठी अर्धा रविवार– कुटुंबाला न देता, स्कूटर हाणत मंडई वा मार्केटयार्डमध्ये जाऊन आठवड्याभराची स्वस्त(?) भाजी घेऊन येण्यावर खर्च करणारे आठवतात...

आपल्या जगण्याचे प्राधान्यक्रम गंडले आहेत असे यांना वाटत नसावे का? आरोग्य-विम्यापेक्षा आयफोन हवासा वाटत असेल, तर आपल्या गरजांची व्याख्या दुसरेच कुणी करते आहे याचे भान आपल्याला कधी येईल? मुळात ज्यांच्या आठवड्याभराच्या भाजीचे एकुण बिल दोनशेच्या वर जात नाही, त्यांचे किती पैसे घाऊक खरेदी केल्याने वाचणार आहेत?

त्यावर एक पळवाट असते की तिकडे चांगली भाजी मिळते म्हणे. सोने गुंतवणूक म्हणून फायदेशीर नाही हे दाखवून दिल्यावर, ‘पण ते ल्यायलाही मिळते’ ही पळवाट जशी काढली जाते तसेच हे. ते खरे असले तरी बरोबर घट नि घडणावळ नावाचे तोट्याचे हिस्से येतात, ते मात्र मोजायचे नसतात... जसे इथे वेळ नि ऊर्जा जमेस धरायची नसते. खरा धार्मिक-खोटा धार्मिक, आर्थिक मध्यमवर्गीय वि. मानसिकतेने मध्यमवर्गीय वगैरे पळवाटा याच जातीच्या. गैरसोयीच्या, तोट्याच्या बाजूकडे दुर्लक्ष करत आपले पूर्वग्रह जपणे हा ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून, सश्रद्ध म्हणून, नास्तिक म्हणून, पुरोगामी म्हणून, धर्मराष्ट्रवादी म्हणून आपल्या प्रत्येकाची सवय असतेच. तिथे पुन्हा ‘आपला गट सोडून ती इतरांमध्येच आहे’ हा एक जास्तीचा नि सामायिक पूर्वग्रहदेखील असतो.

कौतुकाने पत्नीसाठी गजरा घेताना तो मिळाल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अधिक सुखदायक, की पाच रुपये वाचवण्याच्या खटाटोपात तिच्या चेहर्‍यावर उमटलेला वैताग? चलनात मोजलेली किंमत हे सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे मोजमाप कधीपासून झाले याचा विचार कधी करावासा वाटतो का? विकत घेतलेला ‘गजरा मोहोब्बतवाला आहे, घासाघीसीचे पंधरा रुपयेवाला नाही’ याची जाणीव बायकोला झाली तर ती अधिक आनंदी होईल ना? त्यातून नाते अधिक दृढ होईल की आठ लाखाच्या कारमध्ये बसून, दहा मिनिटे खर्च करुन, वट्ट पाच रुपये वाचवल्यानंतर?

असे प्रसंग पाहिले, की बार्गेनिंग करणार्‍या जमातीबद्दलची माझ्या मनातील तिडिक अधिक तीव्र होत जाते. आपल्या महान देशांतील हे खुजे लोक, ‘घासाघीस केली नाही तर आपल्याला फसवतील, किंवा इतरांना स्वस्त मिळेल नि आपण जास्त पैसे देऊन येऊ’ या न्यूनगंडाने पछाडलेले असतात. दुसरीकडे घासाघीस या प्रकाराने जगण्यातील अनेक वस्तूंबाबत गुणवत्तेची ऐशीतैशी होते हे यांच्या ध्यानात येत नाही. सतत स्वस्त ते उचलायचे या एकांगी भूमिकेने गुणवत्ता असलेले पण अधिक किंमतीचे उत्पादन स्पर्धेबाहेर फेकले जाते. वर हे जीव ‘दोन्हींची गुणवत्ता सारखीच आहे’ असे अट्टाहासाने प्रतिपादन करत राहतात, कारण ‘आपण गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही’ हे ते स्वत:ला नि इतरांना पटवू पाहात असतात. (दुसरीकडे ‘महाग तेच गुणवत्ता असलेले’वाली जमात असते, पण हा लेख त्यांच्यासाठी नाही.)

इतिहास हा देशाच्या प्रगतीच्या वाटेवरली क्विकसँड किंवा दलदल आहे, तसेच बार्गेनिंग करणे ही ग्राहकाच्या मनोभूमिकेतील. ही विषवल्ली उपटून टाकली तर आपली ऊर्जा, वेळ तर वाचतोच, पण खरेदीतला, उपभोगातला आनंदही अधिक निष्कलंक, निर्भेळ होत जातो. बघा एकदा प्रयत्न करून.

-oOo-


हे वाचले का?

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

हे ही असेच होते...ते ही तसेच होते

(परस्परविरोधी विचारांचे(?) झेंडे घेतलेल्या दोघांचे अनुभव.)

जय श्रीराम

TwoFlagsAlike

आमच्या सोसायटीमध्ये सलग तीन इमारती आहेत. पैकी आमच्या शेजारील इमारतीमध्ये एक उतारवयाकडे झुकलेले गृहस्थ राहतात. अयोध्येमधील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच्या उन्मादात ते अक्षरश: लहान मुलांनी हंडीच्या वेळी अथवा गणेश-विसर्जन मिरवणुकीत नाचावे तसे नाचत होते. तिकडे प्रतिष्ठापना पुरी झाल्यावर हे सोसायटीतील घरोघरी जाऊन ‘पूजा केली का?’ विचारत होते नि देवघराचा फोटो काढत होते. मला विचारल्यावर मी ‘हो’ म्हणून वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘फोटो काढायचे आहेत’ म्हणत घरात घुसू लागले. त्यांना थोपवत मी आडवळणाने कारणे सांगून वाटेला लावले.

दाराशी आलेल्या प्रचारकांकडून स्वीकारलेली अक्षत आईने त्या दिवशी देवावर वाहिलीही होती हे तिने मला नंतर सांगितले. (मला छुपा मनुवादी म्हणण्यास उत्सुक नि होश्शियार बसलेल्या स्वयंघोषित पहिल्या धारेच्या पुरोगाम्यांसाठी हा दारूगोळा माझ्याकडून सप्रेम भेट.)

दुसर्‍या दिवशी सकाळी प्रभातफेरीहून परतताना पाहिले की हे महाशय येणार्‍या जाणार्‍या अपरिचितालाही ‘जय श्रीराम’ म्हणून अभिवादन करत नाचत होते. एखाद्याचे लक्ष नसेल तर तरातरा चालत जवळ जाऊन लक्ष वेधून घेत. बहुतेक सगळे प्रति-अभिवादन करत.

मलाही ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर मी हसून हात केला. ते आणखी दोन पावले पुढे येत म्हणाले, “जय श्रीराम”. मग मी “राम राम” म्हणून अभिवादन केले. त्यावर ते ‘जय श्रीराम’ म्हणा असा आग्रह धरू लागले. म्हटलं, “आम्ही वर्षानुवर्षे असे अभिवादन करत आलो आहोत. फोनवर बोलताना परिचित, जवळची व्यक्ती असेल तर मी ‘राम राम’ म्हणूनच संवाद सुरू करतो.” त्यांना एवढंही पुरेसं नव्हतं. “पण ‘जय श्रीराम’ म्हणायला काय हरकत आहे?”

मग माझं झाकण उडलं. मी ताडकन म्हटलं, “मी कसं अभिवादन करायचं हा माझा प्रश्न आहे. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही.”

एकुणात सश्रद्धांची जुलूमजबरदस्ती हा का नवा मुद्दा नाही. सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली रस्ते अडवून दहा-दहा दिवस मांडव घालणे नि आपल्या देवाचे भक्त नसलेल्या सरसकट सर्वांची वाट अडवणे, भलेमोठे स्पीकर्स लावून त्यावर ‘जलेबी बेबी’ वाजवत सर्वांना भक्तिभाव शिकवणे, मिरवणुकांमध्ये वा एरवीही फटाक्यांची आतषबाजी करून श्रद्धाळू, पर-श्रद्धाळू, अश्रद्ध सर्वांच्याच फुप्फुसात धूर सोडून त्यांना निर्जंतुक करणे वगैरे कामे हे लोक स्वयंस्फूर्तीने करत असतात.

मी त्यांना म्हटलं, “मी ‘जय श्रीराम’ का म्हणत नाही असा प्रश्न तुम्ही विचारत असाल, तर ‘तुम्ही सर्वसमावेशक ‘राम राम’ का म्हणत नाही?’ असा प्रश्न मी विचारू शकतो. ‘राम राम’ हे आपल्या वारकरी पंथाने दिलेले अभिवादन आहे, तर ‘जय श्रीराम’ हे द्वेषमूलक राजकारणाचं अपत्य आहे. कुणीतरी दिल्लीतून ऑर्डर सोडतो म्हणून आमचा वारसा आम्ही का सोडावा?”

तोंड वेडेवाकडे करीत, “हे एक नवीनच समजलं.” म्हणून ते जवळच्या तिसर्‍याकडेच त्याने सामील व्हावे अशा अपेक्षेने पाहू लागले. त्यावर तो बिचारा ही ब्याद नको म्हणून वेग वाढवून निघून गेला. मग मी ही वस्तरा घडी करून घरी परतलो.

जय संविधान

काही काळापूर्वी माझ्या एका मित्राकरवी मला एक दीर्घ असा व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड आला. यात एका तरुणाने आपला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनुभव लिहिला होता.

त्याची पत्नी आमच्या भागातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी अ‍ॅडमिट होती. त्यात काही गुंतागुंत होऊ लागली होती. सर्व योग्य पद्धतीने हाताळले जात असून आणि वरकरणी सर्व ठीक दिसत असूनही मुलाच्या हृदयाचे ठोके मंद होऊ लागले होते. अखेर त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने परिस्थिती गंभीर असल्याचे आणि पत्नी व मूल दोघांच्याही जिवाला धोका असल्याचे त्या तरुणाला सांगितले आणि एखाद्या अधिक अनुभवी तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान ‘सेकंड ओपिनियन’ म्हणून समोरच असलेल्या अन्य एका हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांशी हे डॉक्टर बोलले. त्यांनी त्या स्त्रीला तातडीने भरती करून घेतले. तपासणीअंती अत्यंत दुर्मीळ अशी स्थिती असल्याचे भाकित त्यांनी केले. त्यावर उपचारही सुरू केले. चोवीस तासांत त्या स्त्रीची सुखरूप सुटका झाली. मूलही सुदृढ निपजले.

हे दुसरे डॉक्टर रुग्णाला/नातेवाईकांना बारीक सारीक तपशीलासह, शक्य तितक्या सोप्या भाषेत परिस्थिती समजावून सांगत असल्याने ही पुरी केस त्यांनी त्यांनी त्या तरुणाला उलगडून सांगितली. तो तरुण बर्‍यापैकी शिक्षित असल्याने त्याला त्याचे गांभीर्य ध्यानात आले. त्याने तो सारा अनुभव लिहून काढला नि काही परिचितांना पाठवला. तो काही परिचितांमार्फत फिरत माझ्याकडे आला होता.

पहिल्या डॉक्टरकडे असता आशा सोडलेल्या त्या पती/बापाची जिवाची उलघाल, तो सारा प्रवास वाचून त्या अंती त्याची मानसिक अवस्था कशी असेल याचे दर्शन त्यातून घडत होते. हा तरुण लेखनक्षेत्राशी संबंधित नव्हता. कदाचित एरवी तो एखाद्या मुद्द्यावर सुसंगत लिहू/बोलूही शकला नसता. परंतु तो अनुभव अक्षरश: एकटाकी लिहिल्यासारखा प्रवाही भाषेत त्याने लिहिलेला होता.

यात आणखी एक वैय्यक्तिक आस्थेचा मुद्दा म्हणजे ते दुसरे डॉक्टर हे माझेही फॅमिली डॉक्टर आहेत.

हा अनुभव एका पुरोगामी, बुद्धिजीवी, लेखक वगैरेंच्या एका गटाला पाठवला. एका वंशपरंपरागत पुरोगाम्याचा तातडीने प्रतिसाद आला, “यात तो बाप ‘देवाच्या कृपेने आम्ही सारे यातून सुखरूप बाहेर पडलो.’ असे म्हणतो आहे. त्यावर तुझे काय म्हणणे आहे?” संपूर्ण अनुभव, त्यातील त्या बापाची तडफड, त्या डॉक्टरची चाणाक्ष बुद्धी व ज्ञान, पहिल्या डॉक्टरचे प्रसंगावधान यातील कशाचाही स्पर्श त्याला झाला नसावा. (कदाचित त्याने पुरे वाचलेही नसावे.) ते एक शेवटचे वाक्य धरून तो ‘जितं मया’चा डान्स करायला उगवला होता.

मी म्हटलं, “एकतर ज्याने तो मेसेज लिहिला आहे तो माझ्या मताचा असण्याची गरज आहे का? दुसरे, बोली भाषा ही नेहमीच विचारांशी कायम सुसंगत असते असे नाही. त्याक्षणी शब्दाच्या काटेकोरपणाऐवजी त्यामागची भावना लक्षात घ्यायला हवी.

“मी ही अनेकदा बोलण्याच्या ओघात ‘अरे देवा’ असा उद्गार काढतो किंवा ‘दुर्दैव’ हा शब्द वापरतो. याचा अर्थ मी त्याक्षणी देवाचा धावा करतो आहे असे नव्हे किंवा मी दैवावर विश्वास ठेवतो आहे असे नव्हे. भाषेवर परिसराचे, संवादाच्या दुसर्‍या बाजूच्या शब्दकळेचे काही संस्कार नकळत होत असतात.

माझ्या मते पुरोगामी वर्तुळात असे शब्दांशी खेळ करणं नि श्रद्धाळूंची कर्मकांडे यात काही फरक नसतो. वरच्या ‘जय श्रीराम’वाल्यासारखे कर्मठ पुरोगामी असतात. त्याला ‘राम राम’ चालत नाही, ‘जय श्रीराम’च हवा असतो, आणि इतरांनीही आपल्याच पद्धतीने अभिवादन करण्याचा अट्टाहास तो करतो. तसेच हे कर्मठ पुरोगामी तिथे ‘व्यासपीठ म्हणायचे नाही, विचारपीठ म्हणायचे’ असे बजावत असतात.

एकतर व्यासाने यांचे काय घोडे मारले मला माहित नाही. दुसरे म्हणजे खरंतर व्यासपीठ या शब्दाचा नि व्यासाचाही काही संबंध नाही. व्यस् म्हणजे मांडणे, रचना करणे- जिथे आपण बोलून मुद्द्यांची मांडणी करतो अशी पीठ म्हणजे आसनाची जागा. किंबहुना विखुरलेल्या वेदांची नीट रचना केली म्हणून व्यासाला ‘वेद-व्यास’ हे नाव पडलं(१). (त्यांचे मूळ नाव कृष्ण-द्वैपायन.) अर्थात पुरोगामी वर्तुळात एकुणच ब्राह्मण नि संस्कृत या दोहोंचेही वावडे असल्याने (एकदा मनुवादी व्हायचंच म्हटल्यावर हे ही लिहून टाकू. :) ) असा एकांगी दुराग्रह– ‘जय श्रीराम’ वाल्यासारखाच– केला जात असावा.

“पण त्या डॉक्टरचे श्रेय तो देवाला देतो आहे हे तुला खटकत नाही का?” त्याची गाडी त्याच्या स्वयंघोषित पुरोगामित्वावर (जे इतर अनेक ठिकाणी बाधित झालेले मीच दाखवून देऊ शकलो असतो) अडली होती.

मी म्हटलं,“हा एवढा दीर्घ अनुभव त्याने लिहिला त्यात कुठली पूजाअर्चा, अनुष्ठाने, गंडेदोरे केल्याचे तपशील आहेत की डॉक्टरने सांगितलेल्या माहितीचे, त्याने केलेल्या धडपडीचे? आपल्या आसपासच्या सार्‍यांशी हा अनुभव शेअर करावासा वाटला तो ‘देवाची कृपा’ म्हणून की एका डॉक्टरने दुर्मीळ स्थिती ओळखून योग्य उपचाराची तजवीज केली म्हणून?” (जी पहिल्या डॉक्टरच्या ध्यानात आलेली नव्हती, त्याला तो तर्क करता आला नव्हता. पण लगेच अडाणीपणाने ‘तो डॉक्टर कमी अकलेचा’ असा ग्रह यातून करून घ्यायचा नसतो.)

अर्थात देवाचे नाव आल्यावर त्याची पुरोगामी बाभळ बुडली ती बुडलीच. त्या व्यक्तीच्या भावना, डॉक्टरचे ज्ञान, एकुण त्या अनुभवातून दिसलेली माणसांची बांधिलकी याबद्दल बोलावे असे त्याला वाटले नाही. त्याचप्रमाणे ‘जय श्रीराम’ वाल्याला आपण आपली अभिवादनाची पद्धत दुसर्‍यावर लादणे चुकीचे आहे याचा गंधही नव्हता.

भावनेला दुय्यम मानणे हे ‘जय संविधान’ वाल्याचे लक्षण होऊ पाहते आहे, तर भावनेच्या फसफसणार्‍या फेसालाच आपले साध्य समजणे हे ‘जय श्रीराम’वाल्याचे. सदैव एकाच चष्म्यातून जगाकडे पाहात ते एकरंगी असल्याची तक्रार करण्याचा गाढवपणा मात्र दोहोंचा समान आहे.

-oOo-

(१). ही व्युत्पत्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग-प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांच्याकडून साभार.

हे वाचले का?