रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

अर्थ-साक्षरता - २ : उत्पन्न आणि खर्च

अर्थ-साक्षरता - १ : अर्थ-साक्षरता आणि मी << मागील भाग
---

उत्पन्नाचे नियोजन करता येत नाही, खर्चाचे करता येते.

उत्पन्न आणि खर्च

दरमहा उत्पन्न किती हाती यावे याचे नियोजन फार थोड्या व्यक्तींना करता येते. मासिक अथवा त्रैमासिक व्याज देणार्‍या मुदत-ठेवी, म्युच्वल फंडांच्या अथवा पोस्टाच्या ’मासिक परतावा योजना’ अथवा मालकीच्या घरांवरील ’रिव्हर्स मॉर्टगेज’सारख्या योजनांमधून नेमकी रक्कम दरमहा हाती पडेल अशी सोय करुन ठेवता येते.पण हा निवृत्तीनंतरचा विचार झाला, तोवर बचत आणि गुंतवणुकीचा विचार बव्हंशी कालबाह्य झालेला असतो.

एरवी फारतर वेतनधारी मंडळींना दरमहा किती रक्कम हाती पडेल हे ठाऊक असते, ’किती पडावी’ यावर त्यांचेही फार नियंत्रण नसते. व्यावसायिक मंडळींना तेही शक्य नसते. तेव्हा आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा हा ’सरासरी मासिक उत्पन्नाचा अदमास घेणे’ हा असायला हवा. कारण हाती पैसा किती येणार याचा ठोकताळा नसेल, तर त्यातून होणार्‍या खर्चाचे नि बचतीचे नियोजन शक्यच नसते.

ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आयुष्याच्या सुरुवातीला बळकट असतो (उदा. खेळाडू, अभिनेते), त्यांची जीवनशैली अधिक खर्चिक बनून राहते. पण काळ पुढे जाईल तसा बहुतेकांचा उत्पन्नाचा प्रवाह आटत जातो. अशा व्यक्तींना काळाबरोबर जीवनशैलीमध्ये खर्चिकपणावर नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक असते. विशेषत: वाढत्या वयाबरोबर आरोग्याशी संबंधिक खर्चांची वाढ होत जाते, तसतसे इतर खर्चांवर लगाम लावण्याची गरज निर्माण होत असते. काहींना हे साधत नाही आणि त्यांच्या उत्तर-आयुष्यात परवड होत जाते.

IncomeAndSpending

या अनिश्चिततेवर एक सोपा तोडगा म्हणजे असे बरेच लोक बहुधा पैसे आल्यावरच खर्च वा बचतीचा विचार करतात. हे ’Don't count your chicken before they hatch’ धोरण वर्तमानाला सोयीचे असले, तरी भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेलच असे नाही. कारण यात भविष्याचा विचार केवळ वर्तमान उत्पन्नाच्या आधारेच केला जात असतो. त्याकाळची संभाव्य परिस्थिती आणि गरजा यांचा विचार यात करता येत नाही, केला तरी तात्कालिक असतो आणि भविष्यातील परिस्थिती बदलली की कालबाह्य ठरतो.

बरेच खेळाडू, सैन्यदलामध्ये सेवा करणारे लोक हे त्यांच्या मुख्य कार्यक्षेत्रातून फार लवकर निवृत्त होतात. अभिनयाच्या क्षेत्रातही अनेक कलाकार फार लवकर बाजूला पडतात किंवा त्यांना मिळणार्‍या कामाची वारंवारता नि मोबदला घटत जातो. या सार्‍यांना त्यानंतरचा प्रवास हा त्या सर्वाधिक कार्यक्षम काळात कमावलेल्या आर्थिक बळाच्या आधारेच करावा लागत असतो.

त्यातील काही जण त्या पुंजीतून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी अन्य व्यवसायामध्ये पाऊल ठेवतात.पण आयुष्याच्या मध्यावर रोजगाराचे क्षेत्र, आर्थिक स्रोत बदलले की त्या क्षेत्राशी जुळवून घेणे, त्यातील खाचाखोचा शिकून घेत त्यातून अपेक्षित उत्पन्न सातत्याने निर्माण करणे हे तुलनेने अवघड असते. त्यातून त्या क्षेत्रातील सल्लागारांवर अवलंबून राहणे अपरिहार्य होत जाते. हे टाळायचे असेल तर सुरुवातीपासून आवक नि जावक यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची सांगड घालण्याचे नियोजन करणे अधिक उपयुक्त ठरते.

ामान्यपणे सर्वच व्यक्ती आर्थिक स्थिती सुधारली वा बिघडली की त्यानुसार खर्चाचा हात सैल सोडणे वा आखडता घेणे हे ढोबळमानाने करत असतातच. आल्या पैशातून बचत किती करु आणि भविष्यासाठी किती राखून ठेवू याचा विचार करतच असतात. याच विचाराला थोडे अधिक वस्तुनिष्ठ स्वरूप द्यायचे तर भविष्यातील गरज, बचत यांची रकमेच्या स्वरूपात मोजणी करावी लागते. त्यातून निव्वळ आज हातात असलेल्या पैशांवरुन नव्हे तर उत्पन्नातील बदलाची दिशा ध्यानात घेऊन खर्चाचे प्रमाण निश्चित करता येते. पहिल्या भागाच्या सुरुवातीला दिलेली एक-दोन उदाहरणांतून असे दिसते, की बरीच माणसे नेमके इथेच फसत असतात.

पण त्याला एक महत्त्वाची पूर्वअट ही आहे की तशी ती सुधारते आहे किंवा बिघडते आहे हे ध्यानात यायला हवे!

उत्पन्नाचा अंदाज

पण आर्थिक नियोजन करताना ’खर्च नि बचतीचे नियोजन करण्यासाठी मासिक/वार्षिक उत्पन्नाची आधारभूत रक्कम कशी ठरवायची?’ असा प्रश्न निर्माण होतो. त्यावर काही सोप्या गणिती पद्धतींचा वापर करता येतो. यासाठी उत्पन्न सुरू झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे प्रत्यक्ष उत्पन्नाचे आकडे पाहून त्याआधारे वार्षिक अथवा मासिक सरासरी उत्पन्नाचा ठोकताळा मांडावा लागतो.

एरवी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये अनेकांच्या कामगिरीचे प्रातिनिधिक मूल्यमापन करण्यासाठी साधी सरासरी (Average अथवा Arithmetic Mean) वापरली जाते. उदाहरणार्थ एकाच वर्गातील सर्वच विद्यार्थी एकच विषय, एकाच शिक्षकाकडून शिकत असल्याने प्रत्येक त्यांची पार्श्वभूमी एकच असते. सर्व विद्यार्थी पेपर स्वतंत्रपणे लिहित असल्याने प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र एकक असतो. त्यामुळे त्यांची सरासरी कामगिरी त्यांच्या गुणांची बेरजेला एकुण विद्यार्थीसंख्येने भागून सहजपणे काढता येते.

परंतु एकाच विद्यार्थ्याच्या गुणांची विविध इयत्तांमधील कामगिरी पाहात गेलो, तर त्यामध्ये तो विद्यार्थी सामायिक असल्याने त्याला प्रत्येक इयत्तेमध्ये मिळालेले गुण हे सर्वस्वी स्वतंत्र नसतात. असाच काहीसा प्रकार शेअर्सच्या किंमतीबाबत असतो. उद्याची किंमत दहा दिवसांपूर्वीच्या किंमतीपेक्षा आजच्या किंमतीशी अधिक सलगी ठेवून असते. यासाठी काळात जसजसे पुढे जावे तसतसे सरासरी काढताना मागच्या किंमतींचे महत्त्व कमी करत न्यावे लागते. यासाठी सरकती सरासरी (moving average) या संख्याशास्त्रीय संकल्पनेचा वापर केला जातो.

MovingAverage

सरकती सरासरी या संकल्पनेमागचे धोरण सोपे आहे. आज नि काल या परस्परांशी जोडलेल्या दोन दिवशी असलेले मूल्य जितके परस्परांशी जोडलेले आहे तितके काल नि उद्याचे नाही. काल आणि दहा दिवसांनंतरच्या मूल्यांचा परस्परसंबंध फारच थोडा उरलेला असेल. त्यामुळे सरासरी काढायची झाली तर ती ’जवळच्या’ मोजमापांची वा मूल्यांची काढावी. यात सलग (समजा) पाच दिवसांची सरकती सरासरी वापरायची असेल, तर पाचव्या दिवसांपासून या सरकती सरासरी काढण्यास सुरुवात होते. पाचव्या दिवसाची सरकती सरासरी म्हणजे मागच्या पाच दिवसांची साधी सरासरी असते. सहाव्या दिवशी सरासरी काढताना पहिला दिवस वगळला जातो आणि सरासरी दोन ते सहा या दिवसांची काढली जाते...

त्यामुळे पाचव्या दिवसापासून पुढे प्रत्येक दिवसाचे वास्तव मूल्य/किंमत आणि त्याची सरकती सरासरी अशी दोन निरीक्षणे अभ्यासकाला उपलब्ध असतात. काळाच्या अक्षावर ती मांडत गेले असता दोन ग्राफ मिळतात. या दोनपैकी सरकती सरासरी कमी चढ-उतार दाखवते.त्यामुळे वास्तव किंमतींच्या तुलनेत त्यातून बदलत्या दिशेचे आकलनही अधिक चांगले होऊ शकते.

सरकती सरासरी हे कालानुरूप होत जाणार्‍या बदलाच्या दिशेचे (trend) आकलन करण्यासाठी एकमेव तंत्र नाही. परंतु सर्वसामान्यांना समजणारे आणि सहज वापरता येणारे तंत्र आहे. तुमचे उत्पन्नही शेअर्सच्या किंमतीप्रमाणे काळाबरोबर बदलत जात असल्याने त्याची दिशा समजण्यास आणि भविष्यातील उत्पन्नाचा अदमास घेण्यास उपयुक्त आहे. गेल्या पाच अथवा वर्षांची सरासरी हे पुढील वर्षीचे उत्पन्न धरुन त्या वर्षीच्या खर्च नि बचतीचे नियोजन करणे शक्य आहे.

एकदा तुमच्या उत्पन्नाचा अंदाज तुमच्या हाती आला की पुढच्या टप्प्यात खर्चाचे- आणि बचतीचेही- नियोजन करण्याचा विचार करु शकता.

खर्चाचे नियोजन : दोन दृष्टिकोन

सर्वसामान्यपणे खर्चाचे नियोजन ही संकल्पनाच बहुतेकांना आश्चर्यकारक वाटते. गंमत म्हणजे बरीच मंडळी होऊन गेलेल्या खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवणारी असतात. मग उरलेल्या पैशातून बचतीचा आणि गुंतवणुकीचा विचार करत असतात. परंतु खर्च नि बचत यांचा विचार असा वेगवेगळा करता येत नाही. बचत ही भावी खर्चासाठीच असते. तिची तशी सांगड घातली की वर्तमानातील खर्चाचा विचारही अधिक नेमकेपणे करता येतो.

परंतु खर्चाला नेहमीच उत्पन्नाशी प्रामाणिक राहावे लागते. त्यामुळे सुरुवातीलाच पुढील वर्षी हाती येऊ घातलेल्या उत्पन्नाचा किती हिस्सा या वर्षीच्या खर्चांसाठी आणि किती हिस्सा भविष्यातील खर्चांसाठी (म्हणजेच बचतीसाठी) राखून ठेवावा हे ठरवावे लागते. आणि ही विभागणी कशी असावी हे काहीसे सापेक्ष असते. ती विभागणी करण्यामागचे दोन ढोबळ दृष्टिकोन दिसतात.

एक गट असा विचार करतो की उत्पन्न सुरू झाले त्या तरुण वयातच आयुष्य अधिक सक्षमपणे भोगता येते. त्यामुळे सुरुवातीच्या वर्षांत खर्चाचे प्रमाण अधिक, तर बचतीचे प्रमाण कमी राखले जाते. घर लवकर विकत घेणे, त्यासाठी कर्ज काढणे, आर्थिक स्तर मध्यम वा त्याहून वरचा असेल तर चारचाकी गाडी घेणे आदी निर्णय यात आयुष्याच्या अलिकडच्या टप्प्यावर घेतले जातात. टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आदी गृहोपयोगी गोष्टी टप्प्याटप्प्याने घेण्याऐवजी मासिक हप्त्यांसारख्या (EMI) कर्जाच्या आवृत्त्यांचा वापर करुन एकदम विकत घेण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. यात भविष्यातील उत्पन्नाचा वापर वर्तमानातील मोठ्या खर्चांसाठी केला जातो. याचा तोटा म्हणजे उपभोगाचा कालावधी वाढत असला, तरी भविष्यासाठी आर्थिक भार लवकर निर्माण केला जातो.

वर उल्लेख केलेल्या ’Don't count your chicken before they hatch’ दृष्टिकोनाच्या नेमका उलट असा हा दृष्टिकोन आहे. साधारणत: वायदे बाजारासारखा. अजून अंडीही हाती आलेली नसताना भविष्यात हाती येणारी ब्रॉयलर पिल्ले विकणारा, भांडवलशाही व्यवस्थेला अनुरूप मानसिकतेचे प्रतिबिंब पडलेला. यात उद्याचा आर्थिक भार पेलण्याइतपत उत्पन्न न वाढण्याचा धोका असतो. परंतु तरुण वयामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता नि कुवत अधिक असल्याने तो स्वीकारणे शक्य असते. पण त्यासाठी यांना आर्थिक नियोजन अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक होऊन बसते.

दुसरा गट असा विचार करतो की कमावत्या आयुष्याच्या सुरुवातीला केलेली बचत अधिक काळ गुंतवता येत असल्याने चक्रवाढव्याजाचा फायदा होऊन वेगाने वाढते. तेव्हा सुरुवातीच्या काळात शक्य तितकी बचत केली, तर भविष्यातील खर्चांसाठी अधिक रक्कम जमा करणे शक्य होईल. हा गट कमावत्या आयुष्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचा अधिक हिस्सा बचतीसाठी राखून ठेवत असतो. पुढे जसजसे जबाबदार्‍या नि गरजा वाढतील तसतसा खर्चाचा हिस्सा वाढवत नेऊन बचतीचा हिस्सा कमी करत नेतात.

हा दृष्टिकोन पहिल्यापेक्षा अधिक ’आस्ते कदम’ जाणारा आहे, वर्तमानापेक्षा भविष्याला झुकते माप देणारा आहे. मागच्या पिढ्यांमध्ये आधी बचत नि त्या बचतीमधून निवृत्तीनंतर घर बांधण्याचा प्रघात मोठा होता. हा त्याचाच थोडा पुढारलेला अवतार. तो अवतार अंड्यांमधून पिल्ले जन्मल्यावर त्यांना ग्राहक शोधणारा, तर हा अंडी हाती आल्यावर त्यातील किती टक्क्यांतून पिले बाहेर येतील याचा अदमास घेऊन तेवढ्या विक्रीसाठी ग्राहक आधीच शोधून ठेवणारा.

यात आर्थिक फटका बसण्याची संभाव्यता पहिल्या पर्यायापेक्षा बरीच कमी होते. त्याचबरोबर उपभोगाचा कालावधीही कमी होत असतो. अर्थकारणाच्या भाषेत याला ट्रेड-ऑफ (trade-off) म्हणतात. पुढे गुंतवणुकीचा विचार करत असताना याला पुन्हा एकवार सामोरे जावे लागते. अधिक धोका पत्करल्यास अधिक फायदा पण त्याचबरोबर अधिक तोट्याची संभाव्यता वाढते. उलट बचतीच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले, तर संभाव्य परतावाही कमी होत जातो. आहारामध्ये चमचमीत खाणे बहुधा आरोग्यास अपायकारक होत जाते, तर आरोग्यदायक खाणे बहुधा चवीच्या बाबतीत फारसे लोकप्रिय होत नसते, तसेच हे ही. चव आणि आरोग्य या जशा व्यस्तप्रमाणात वाढणार्‍या बाबी आहेत, तसेच आर्थिक सुरक्षा आणि गुंतवणूक परतावा याही. तुमच्या आर्थिक नि मानसिक कुवतीनुसार तुम्हाला स्वत:साठी यांची विभागणी कशी असावी याचा निर्णय करावा लागतो.

दोनही पर्यायांमध्ये आयुष्याच्या सुरुवातीला खर्च नि बचत यांचे गुणोत्तार कालानुरूप बदलत जात असते. पहिल्या पर्यायामध्ये सुरुवातीच्या काळात ते खर्चाला अनुकूल असते तर दुसर्‍यामध्ये बचतीला. जसजसे काळ जातो तसतसे त्यांची दिशा बदलत जाऊन उलट होत असते. अगदी सुरुवातीला या गणिताला सामोर जायचे नसेल तर एक ढोबळ निर्णय म्हणून उत्पन्नाचे सरळ दोन सारखे भाग करुन वर्तमान आणि भविष्यकालीन खर्चाला नेमून द्यावेत.

Golden Budget Rule अथवा ५-३-२ चा नियम

MagicDistribution

आपल्या उत्पन्नापैकी किती टक्के खर्च नि किती बचत करावी यासाठी अनेक ठिकाणी एक जादूचे गुणोत्तर सांगितले जाते. यात असे म्हणतात की तुमच्या उत्पन्नाचे ५०%, ३०% आणि २०% असे तीन भाग करा. यातील पहिला नियमित वा गरजांशी निगडित खर्चांसाठी ठेवा. दुसरा चैनीसारख्या वरकड खर्चांसाठी नेमून द्या आणि उरलेला २०% भाग हा बचत म्हणून राखून ठेवावा. माझ्या मते हा नियम अजिबात पाळू नये!

ढोबळ नियम म्हटला तरीही यात चुकीची गृहितके आहेत. एकच विभागणी-नियम सर्व वयोगटाच्या, सर्व आर्थिक गटांच्या, सर्व सामाजिक परिस्थितीमधल्या व्यक्तींना लागू पडेल असे तो समजतो. अगदी टक्केवारीच्या दृष्टीने पाहिले तरी हे पटणारे नाही. नुकत्याच कमावत्या झालेल्या व्यक्तीसाठी, कुटुंबवत्सल मध्यमवयीन व्यक्तीसाठी आणि कौटुंबिक गरजा पुर्‍या होऊनही कमावत्या राहिलेल्या नववृद्धासाठी अशा सार्‍यांसाठी एकच नियम लागू पडत नाही. एखाद्या निम्नवर्गीयाला उत्पन्नाचा जितका हिस्सा गरजांवर खर्च करावा लागतो, तितकाच हिस्सा एखाद्या श्रीमंताला करावा लागतो हे पटणारे नाही. इथे आपण चैन आणि गरजा वेगळ्या मोजतो आहोत हे ध्यानात घ्या. उत्पन्न वाढेल तसे गरजांवरचे खर्च वाढवण्यास उद्युक्त करणारा हा नियम एकप्रकारे भांडवलशाहीच्या ’गरज नसेल तिथे निर्माण करा’ प्रवृत्तीला चालना देणारा आहे.

बचतीसाठी उत्पन्नातील सर्वात कमी हिस्सा ठेवणे हे अमेरिकेसारख्या सोशल सिक्युरिटी असणार्‍या देशातच शक्य आहे. कदाचित त्यामुळेच या नियमामध्ये बचत हा भाग केवळ वृद्धापकाळीचा खर्च एवढ्या एकाच उद्देशाने केलेला दिसतो. गरज, चैन आणि वृद्धापकाळासाठी तरतूद या तीनही संकल्पना या दोन समाजात वेगवेगळ्या प्रकारे पाहिल्या जात असतात. मी बचत ही देखील भविष्यकालीन खर्चासाठी केलेली तरतूद म्हणूनच पाहात असतो. त्यामुळे तिला ढोबळमानाने वृद्धापकाळाची तरतूद म्हणू शकत नाही. त्या काळच्या गरजा नि चैन यांची सांगड मी त्या तरतुदीशी घालत असतो.

भारतामध्ये वृद्धापकाळ हा बव्हंशी कार्यक्षम काळातील बचतीच्या आधारेच व्यतीत केला जात असतो. त्यासाठी सुरवातीपासून बचत नि गुंतवणूक करणे आवश्यक असते. शिवाय भारतीय समाजात केवळ स्वत:च्याच नव्हे तर आई-वडिलांच्या वृद्धापकाळातील खर्चाचा विचारही नियोजनात समाविष्ट असावा लागतो. त्याचबरोबर उलट दिशेने मुलेही तुलनेने अधिक वर्षे आई-वडीलांवर अवलंबून असतात. त्यामुळे उत्पन्नाचा केवळ पाचवा हिस्सा बचतीसाठी पुरेसा ठरण्याची शक्यता फार कमी आहे.

मुळात हा नियम आधी वाटणी करुन मग त्यात खर्चांचा विचार करतो. भारतीय दृष्टीने आपण प्रथम गरजा, त्यांसाठी लागणारा खर्च, त्यांसाठी बचत या क्रमाने खालून वर जात असतो. खर्च नेमका कशासाठी आहे, त्याला किती आर्थिक तरतुदीची गरज आहे आणि मुख्य म्हणजे ती करण्यासाठी किती काळ हाती आहे हे आधी पाहावे लागते. आपल्या उत्पन्नाच्या (बदलाच्या) दिशेचा विचार करता ते साध्य करण्याची संभाव्यता किती हे पडताळून पाहावे लागते. मग चैनीसाठी ३०% सोडाच कदाचित पाच टक्के रक्कमही उरणार नाही.

चैनीसाठी आधीच रक्कम राखून ठेवणे गृहित धरणारा हा नियम अमेरिकन अर्थकारणाचा वारसा आहे आणि भारतीय सामाजिक-आर्थिक संदर्भात तो स्वीकारणे चूकच नव्हे, तर कदाचित धोकादायकही ठरेल.

आर्थिक विचाराचे दोन दृष्टिकोन वर दिले आहेत. अधिक बारकाईने विचार करणारे आणखी काही पर्याय देऊ शकतील. उत्पन्नाची विभागणी विविध व्यक्तींसाठी, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि विविध सामाजिक, भौगोलिक तसेच आर्थिक पर्यावरणामध्ये वेगवेगळी असू शकते- नव्हे असायलाच हवी हे ध्यानात ठेवले तरी पुरे.

या वर्षातील खर्च आणि भविष्यातील खर्च (किंवा त्यासाठी केलेली बचत) या दोहोंचा वाटा निश्चित झाला की या दोन्हींचे अंदाजपत्रक तयार करायला हवे. आणि त्यासाठी दोनही प्रकारच्या गरजांची सूची तयार करुन त्यांचा प्राधान्यक्रम, अपेक्षित खर्च नि खर्चाचा काळ निश्चित करायला हवा. त्यासबंधी अधिक विवेचन पुढच्या भागात करु.

- oOo -

१. जवळच्या म्हटले तर किती जवळच्या. दोन, तीन, पाच की दहा? याला सोपे उत्तर नसते. त्याच्यासाठी वेगळे तंत्र आहे. पण तो या लेखमालेचा विषय नाही.

पुढील भाग >> (आगामी)


संबंधित लेखन

३ टिप्पण्या:

  1. अर्थ साक्षरता भाग 3 ची link चालत नाहिये. Please update if possible

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. क्षमस्व. अन्यत्र स्तंभलेखन चालू केल्याने ही मालिका जरा बाजूला पडली आहे. तिसरा भाग लवकरच अपलोड करेन.

      हटवा