-
१. वार्धक्याची वाटप्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो.
वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते.
प्रगतीच्या नव्या वाटा जे बदल घडवून आणत असतात, त्यातून ‘त्यांचे जग’ म्हणता येईल अशी भौतिक, समाजिक, वैचारिक पातळीवरील त्यांची आकलनाची घडी विस्कटत असते. प्रवास करून एका निश्चित ठिकाणी पोहोचण्याची मानसिकता असलेल्या माणसाला, प्रगतीच्या वेगामुळे सतत प्रवासातच असल्याची, आपले असे कुठलेच स्थान नसल्याची, उपरेपणाची भावना निर्माण होते.
एरवी मनुष्यप्राणी अधिक प्रगतीशील असला, तरी जनावरातील स्थितीशीलताही त्याच्यात अगदी सर्वाधिक कार्यक्षम अशा तारुण्यातही शिल्लक असते. त्यामुळे होता होईतो बदलाला प्रतिरोध करण्याची प्रवृत्तीही त्याच्यामध्ये बलवान असते. याचा परिणाम म्हणू ‘भूतकाळामध्ये— फारतर आपल्या उमेदीच्या काळामध्ये झालेली प्रगती पुरेशी आहे, त्यातून निर्माण झालेल्या जगण्याच्या चौकटीचे आपल्याला आकलन झाले आहे, म्हणून समाजाने आता तिथेच थांबावे म्हणजे एक स्थितीशील आयुष्य आपल्याला मिळेल’ (जनावरांचे जसे आहार, भय नि मैथुन या तीन स्तंभांवर चालते तसे) अशी वृद्धांची धारणा होत असते.
त्या धारणेला अनुसरून ते बदलांना विरोध करु लागतात. ‘पूर्वीची स्थितीच योग्य होती, नवी घातक अथवा अनावश्यक आहे,’ अशी मखलाशी ते करू लागतात. मग ‘होणारे बदल हे चुकीचे, वाईट, घातक आहेत’ असा कांगावा करत, काळाचे चक्र उलट फिरवून, ते त्यांच्या आकलनाशी सुसंगत अशा स्थिर जगामध्ये नेऊ इच्छित असतात. शक्य झाल्यास प्रगतीच्या काही अनुषंगांवर बोळा फिरवून फळ्यावर पुन्हा जुनीच गणिते मांडावीत असा आटापिटा करतात. पुन्हा नवे आकलन साध्य करावे इतकी आकलनक्षमता, ऊर्जा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये उरलेली नसते.
प्रगतीच्या सर्वच वाटा वा अनुषंगे स्वीकारार्ह असतातच असेही नव्हे. म्हणून मी ‘बदल’ असा शब्द वापरला आहे. त्याचे इष्ट-अनिष्ट दोनही प्रकारचे परिणाम होत असतात. माझा मुद्दा सरसकट नकाराचा आणि मागे जाण्यालाच ‘उपाय’– तो ही ‘हुकमी’ वा ‘एकमेव’ समजण्याचा आहे.
२. प्रेषितांचा वारसाया माघारप्रेमी माणसांची ही परागती कुठवर नेऊ इच्छिते? हे परागती-समर्थक बव्हंशी इतिहासातील त्यांच्या देशाच्या, धर्माच्या तथाकथित, काल्पनिक अशा सुवर्णकाळापर्यंत मागे जाणे इष्ट मानतात. हा सुवर्णकाळ त्यांच्या धार्मिक, पौराणिक वा भाटांनी लिहिलेल्या ऐतिहासिक पुस्तकांतून नोंदवून ठेवलेला असतो. यात ठळक कथा मुख्यत: पारलौकिकावर आधारित असलेल्या देव नावाच्या संकल्पनेभोवती रचलेल्या असतात. या अध्याहृताचे माणसाशी असणारे बंध वा माध्यम म्हणून प्रेषितांची नेमणूक झालेली असते. हे प्रेषित देवांशी संवाद साधतात नि त्या अलौकिकाकडून वेचलेले ज्ञानाचे कण मर्त्य मानवांपर्यंत पोहोचवत असतात.
प्रेषितांनी दिलेले ज्ञान आज जवळजवळ सामान्य-ज्ञान (common sense) म्हणता येईल इतके मूलभूत आहे. किंबहुना तीच त्याची ताकद वा Unique Selling Point आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ते मांडले आहे. (उदाहणार्थ बिब्लिकल धर्मांतील ‘टेन कमांडमेंट्स’ पाहा.) त्यामुळे त्यांचा ‘ग्राहक’-विस्तार मोठा आहे. ‘देव-धर्म नको म्हणता तर कशाच्या आधारावर समाजधारणा करावी?’ या प्रश्नाला ‘संविधानाच्या आधारे’ असे – माझ्या मते अमूर्त, abstract – उत्तर देणारे पुरोगामी हा महत्त्वाचा मुद्दा विसरत असतात.
प्रेषितांनी दिलेल्या या सामान्य-ज्ञानाभोवती हळूहळू कर्मकांडांचे कोट उभे केले जातात. काही चलाख धंदेवाईक धार्मिक त्या कोटावर रोषणाई करुन त्याकडे अधिक ग्राहक आकर्षित व्हावेत, जे झाले ते दुसरीकडे वळू नयेत म्हणून पहारेकरी नेमतात. अन्य धर्मांतील, त्यांच्या प्रेषितांकडील ज्ञान(?) हे छद्मज्ञान असल्याचे धोक्याचे इशारे दिले जाऊ लागतात. त्यांचे प्रेषित हे दुय्यम असल्याच्या कहाण्या रचून तो धर्म, ती परंपरा, ती व्यवस्था दुय्यम असल्याचा आभास निर्माण केला जाऊ लागतो. प्रेषितांची ज्ञानाची, कल्याणाची आस बाजूला राहून त्या ज्ञानाची फोलपटे धर्म, कर्मकांड, परधर्मद्वेषाच्या रुपात पूजली जाऊ लागतात. आमच्या धर्मपरंपरेच्या सर्वोच्च पुस्तकात किंवा प्रेषिताकडे ‘अंतिम ज्ञानाचा एकाधिकार’ असल्याची द्वाही फिरवून ज्ञानाचा प्रवाह सीलबंद करुन देव्हार्यात ठेवला जातो.
आपणाला अंतिम ज्ञान झाले असा हर्ष होतो, तो क्षण तर केवळ पूर्ण आत्मवंचनेचा तरी असतो, किंवा आपल्या लहानशा आवाक्यात जास्तीतजास्त काय आले याची अखेर कबुली असते.
(जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रवासी’ या कथेमधून)
परंतु प्रश्न असा आहे, की ‘प्रेषितांच्या काळी ज्ञान नव्हते का?’ असलेच तर त्यांनी आपले ज्ञान, आपले आकलन मांडताना ‘आपल्या पूर्वसुरींचे ज्ञान पुरेसे नाही’ असेच सूचित केले नाही का? थोडक्यात ज्ञानाची वाट ही चालत राहण्याचीच आहे असा याचा अर्थ नाही का? मग त्यांचे ज्ञान अंतिम कसे? ‘त्याच्या अथवा तिच्या जिज्ञासेची पूर्ती’ या अर्थी ते त्या व्यक्तिच्या आयुष्यातील अंतिम ज्ञान असू शकेलही. पण सर्व समाजाच्या दृष्टिने ते अंतिम ज्ञान कसे म्हणावे. प्रत्येकाच्या जिज्ञासेची जातकुळी एकच कशी असेल? प्रत्येकाला जगण्याबद्दल पडणारे प्रश्न तेच नि तेवढेच कसे असतील?
ज्या समाजामध्ये प्रगतीशील, सर्जनशील, निर्मितीक्षम विचाराला दुय्यम लेखले जाते नि वारशाला शिरोधार्य मानले जाते अशा समाजात वृद्ध मानसिकता प्रबळ असते असे म्हणता येते. भारतीय समाज हा अशा वृद्ध मानसिकतेचा आहे. भारतच का, बहुतेक देशांमधून भूतकाळातील अशा तथाकथित ‘सुवर्णकाळाकडे’ नेणार असल्याचा दावा करणारे पंथ, चळवळी, राजकीय पक्ष, नेते यांची रेलचेल असते. या सार्यांना या सुवर्णकाळाचा आधार हटकून धर्मग्रंथांतून सापडतो आणि त्यांच्या तंतोतंत मार्गदर्शनाखाली वाटचाल केल्यास तो काळ पुनरुज्जीवित करता येईल असा यांचा दावा असतो.
आजची मानवी समाजाची स्थिती पाहिली तर भगव्या, हिरव्या, पांढर्या वा निळ्या कापडात बांधलेल्या धर्मग्रंथांना कवटाळले, की जमावातील सुरक्षितता पदरी पडते. लाल वेष्टणातील पुस्तकाला शिरी मिरवले की मॉडर्न विचाराची, प्रागतिकतेची पदवी पदरी पडते. पण या दोनही सनातनवृत्तींना छेद देणारी माहिती, ज्ञान, अनुभव, विश्लेषण, दुरुस्ती या मार्गाने जाणारी वाट खर्या अर्थाने प्रागतिक म्हणायला हवी. धर्माचे प्रेषित जे ज्ञान देतात ते ‘अंतिम ज्ञान’ आहे असे आपण ठरवतो, ते नव्हेत. त्यांच्या काळीही ज्ञान या पदवीला पात्र असणारे बरेच काही होते. पण ते ‘अंतिम’ आहे असे त्यांनी मानले नाही. दोन पावले पुढे टाकून त्यांनी ‘आपले’ अंतिम ज्ञान (जर तसे म्हणायचे तर) मिळवले. आपण मात्र त्यांच्या ज्ञानाच्या पोथीला कपड्याने गुंडाळून करकचून गाठ बांधून टाकली; ना आतले काही बाहेर येवो ना बाहेरचे काही आत जावो म्हणून.
प्रेषितांनी दिलेले ज्ञान हा त्यांचा वारसा नव्हे. जिच्या आधारे त्यांनी त्यांच्या काळच्या अंतिम ज्ञानाची सीमारेषा पुढे सरकवून दिली, ती जिज्ञासा हाच त्यांचा वारसा आहे. धार्मिक वारसा असो वा मार्क्सचा, तो तंतोतंत शिरोधार्य मानून त्यांवर बांधलेल्या कर्मकांडांच्या अलवाणाच्या आधारे मार्गक्रमणा करणारेच प्रेषितांचे खरे खुनी असतात.
प्रत्येकाची जिज्ञासा, त्याचे प्रश्न वेगळे असतील तर त्याचे/तिचे अंतिम ज्ञानही वेगळेच असणार ना. आणि जोवर जगात जिज्ञासू व्यक्ती जन्माला येत आहेत तोवर ते नवनव्या प्रश्नांना भिडणारच आहेत, अंतिम ज्ञानाच्या न भरणार्या पेल्यामध्ये आपापली ओंजळ वाढवत नेणारच आहेत. करंटे आपण आहोत, जे प्रेषितांनी आपल्या पूर्वसुरींच्या शहाणपणामध्ये भर घातली हे ध्यानात न घेता त्यांना झालेल्या आकलनाला ‘अंतिम ज्ञान’ असे संबोधून त्यांच्या पोथीचा गळा आवळतो आहोत. कारण आपण जन्मजात वृद्ध आहोत!
मग प्रेषितांच्या ज्ञानाला किंमत नाही का? नक्कीच आहे. त्यांनी नैतिकतेच्या बंधनांचे, चौकटीचे महत्त्व ओळखून जमावातून, टोळ्यांतून समाज घडवण्याचा प्रयत्न केला... पुढे तथाकथित प्रगत माणसांनी पुन्हा त्यांचे टोळ्यांत रूपांतर केले हा मुद्दा अलाहिदा. पण ‘प्रेषितांचा वारसा कुठला?’ असा प्रश्न विचारला तर ‘त्यांची जिज्ञासा’ हे त्याचे उत्तर आहे. त्यांनी दिलेले आकलन ‘अंतिम सत्य’ म्हणून जाहीर करुन आपण तिची हत्या करत आहोत आणि आपला संपूर्ण समाजच वृद्धपणाच्या मानसिकतेमध्ये जगतो आहे.
३. मार्क्स आणि नेहरुधार्मिकांचे प्रेषित प्राचीनत्वाच्या साखळदंडांनी बद्ध झाले आहेत. ज्याला सर्वाधिक अर्वाचीन प्रेषित म्हणता येईल तो कार्ल मार्क्स हा अधार्मिक प्रेषित, त्याने पारलौकिकाचा आधार झुगारून शोषित, पददलित समाजाच्या उत्थानाला केंद्रस्थानी ठेवून संभाव्य समाजरचनेची मांडणी केली.
हे करत असताना – जिचा तो कट्टर शत्रू आहे असा आभास निर्माण केला जातो ती – ‘भांडवलशाही ही मानवी प्रगतीमधील एक संक्रमणशील अवस्था आहे’ असे म्हणत पददलितांच्या, गुलामांच्या, भूदासांच्या मुक्तीमधील तिचे योगदान नाकारले नव्हते. त्यापुढे जाऊन समाजवादी व्यवस्था ही देखील त्याला अपेक्षित असलेल्या साम्यवादी व्यवस्थेकडे जाण्याच्या मार्गावरचा एक आवश्यक टप्पा आहे असेही तो मानत होता. आज शंभर वर्षांनंतर कदाचित त्याने आणखी नवी अपेक्षित व्यवस्था पुढे ठेवत साम्यवादी व्यवस्था ही त्या नव्या अपेक्षित व्यवस्थेच्या मार्गावरचा अपरिहार्य थांबा मानले असते अशी शक्यताही होती.
पूर्वसुरींच्या श्रेयाला सर्वस्वी न नाकारता त्यांच्या यशापयशाच्या, बलस्थानांच्या, वैगुण्यांच्या नोंदी करत स्वत:च्या ज्ञानामध्ये भर घालत राहण्याच्या, त्याच्या आधारे आपले आकलन सुधारून घेत राहाण्याच्या, खर्या अर्थाने पुरोगामी (पुढे जाण्याच्या) त्याच्या वृत्तीमुळे माझ्या दृष्टीने तो जगातला सर्वात शहाणा माणूस ठरतो. ज्या व्यवस्थांच्या मर्यादा दाखवत आपली व्यवस्थेचा पुरस्कार तो करत होता, त्या व्यवस्थांचे ऋण मानण्याइतका मनाचा मोठेपणा त्याच्यामध्ये होता. ‘काही शतकांपूर्वीच जगातील सर्व ज्ञान निर्माण झाले, त्याला आत्मसात करणे, अनुसरणे इतकेच आपले काम आहे’ या खुज्या मानसिकतेच्या बहुसंख्येमध्ये राहून त्याची उंची अधिकच प्रकर्षाने जाणवत राहाते.
पण गंमत अशी, की आज त्याचेही ज्ञान अंतिम असल्याचे सांगणारे काही ‘कॉम्रेड पुरोहित’ही आसपास दिसतात. एक प्रकारे त्याच्या ज्ञानमार्गाला बाजूला सारून त्याच्या ज्ञानाची पठडी नि त्याला प्रेषिताच्या पातळीवर नेऊन ठेवतात. त्याच्या विचारांना, पठडीला प्रश्न विचारले, की ते आक्रमक होतात. प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी प्रत्युत्तरे, हेत्वारोप यांचा आधार घेत प्रश्नकर्त्याला धुडकावून लावू पाहातात. ‘तुमचे ज्ञान तोकडे आहे, तुम्ही आधी मार्क्स नीट समजून घ्या.’ चे आहुत/ अनाहुत सल्ले देतात. डाव्या विचारवंतांचे लेखन वाचण्याची शिफारस करून अंग झटकतात. ‘तू वाचले आहेस, तर तू दे की या प्रश्नाचे उत्तर.’ या विनंतीवर मौन बाळगतात.
हे सारे आचरण धर्मनिष्ठ समाजनिर्मिती करु इच्छिणार्यांसारखेच दिसते, पोथी नि प्रेषित वेगळे इतकेच. धार्मिकांप्रमाणे तयार विचार नि त्यांची पठडी त्यांनी आत्मसात करुन घेतलेली असून, आकलनाच्या वार्यालाही उभे राहिलेले दिसत नाहीत. आत्मसात करणे नि आकलन होणे यातील फरक बहुतेकांच्या गावीही नसतो. असा अनुभव धार्मिक नि अधार्मिक अशा दोनही प्रकारच्या मंडळींमध्ये येत असतो.
स्वातंत्र्यपूर्वकालातील नेहरु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साम्यवादी विचारांनी– विशेषत: रशियाच्या प्रगतीने प्रभावित झाले होते. परंतु पुढे त्याच्या मर्यादाही त्यांना दिसू लागल्या. भांडवलशाही प्रारुप नि साम्यवादी प्रारुप या दोन्हींच्या संमीलनाने काहीशा संकरित दृष्टिकोनाचा पुरस्कार ते करु लागले.
पुढे स्वातंत्र्यानंतर भाक्रा-नांगल धरणाच्या उद्घाटनप्रसंगी त्याला ‘नव्या जगाची तीर्थक्षेत्रे’ म्हणून नावाजणारे नेहरु त्याच्या परिणामांचा एकुण आवाका स्पष्ट होऊ लागल्यावर अशा अजस्र प्रोजेक्ट्सना ‘विनाशाची केंद्रे’ म्हणू लागले. प्रगतीच्या वाटेवर एखाद्या साधनाची, प्रकल्पाची सकारात्मक बाजू पाहात असतानाच त्याच्या नकारात्मक परिणामांबाबत डोळस असणे हा दुर्मीळ गुण यातून दिसून आला. गृहितके, पूर्वसुरींनी दिलेली प्रारुपे, यांसोबतच अनुभवसिद्ध आकलनाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले होते.
मार्क्सप्रमाणेच पं. नेहरुंच्या अनेक अनुयायांमध्ये त्यांच्या विचारांऐवजी पठडीबाजपणा रुजला. त्यांची सत्तालोलुपता जसजशी बळकट होत गेली तसतसा तोही अस्तंगतही होत गेला...
माणूस वारसा मिरवतो तो माहितीस्वरूपात सुस्थिर झालेल्या ज्ञानाचा नि ज्ञानवंतांचा; त्यांनी ते ज्ञान सिद्ध करण्यासाठी आधारभूत मानलेल्या जिज्ञासा, अनुभवसिद्धता नि आकलनाकडे बव्हंशी दुर्लक्ष करुन! मी ‘वृद्ध मानसिकता’ म्हणतो ती ही.
(क्रमश:)
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
बुधवार, १८ जून, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...
संबंधित लेखन
इतिहास
जिज्ञासा
भाष्य
समाज
ज्ञान
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा