रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

आपली महान(?) परंपरा

मध्यंतरी सकाळी दूध घेऊन येत असताना एका मित्राची गाठ पडली. तो गणपतीबाप्पाच्या उत्सवासाठी आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. सोबत त्याची पत्नी गौरी आगमनाची तयारीही करताना दिसत होती. त्या घरातील आजींचे तीनेक महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे परंपरेनुसार वर्षभर सणवारांना फाटा देणे अपेक्षित असल्याने याचे जरा आश्चर्य वाटले. घरी पोचल्यावर आईला सांगितले, तर ती सहजपणे ’हो ती काही आपल्या घराण्यातली नसल्यामुळे तिचे वर्षभर सुतक नसते.’ मला परंपरेचा संताप तर आलाच, पण त्याहून आईने जितक्या सहजपणे हे सांगितले त्याबद्दल आला.

मी स्वत: कोणतीही पूजा-अर्चा, कर्मकांड करीत नाही. तेव्हा हा माझ्या दृष्टिकोनाचा मुद्दाच नाही. मुद्दा श्रद्धेच्या परिघातच असलेल्या अन्यायाचा आहे.

SaffronGhoonghat

ती स्त्री आपले घर सोडून नव्या घरी येणार. नव्या घरच्या सार्‍या तथाकथित परंपरांचे जोखड तिच्याच शिरावर. तिच्याच बळावर इष्टुर-फाकड्यांचे हे तथाकथित 'घराणे' आपली कर्मकांडे चालवणार. कितीही नालायक, बेअक्कल, छळवादी असले तरी त्या घरच्या ज्येष्ठांना बाय डिफॉल्ट आदराने वागवायला हवे म्हणे. त्यांचा अनमान करता कामा नये. वर सार्‍या खस्ता काढत या नव्या घराची अवलाद तिने जन्माला घालायची, पोसायची. पण ती कार्टी नाव लावणार बापाचे. एवढे करुन बाई निजधामाला गेल्यावर एकच विशेष विधी, तो ही सधवेसाठी; म्हणजे पुन्हा नवरा नामक बैलाचाच मान करणारा. तो आधी खपला तर तो ही वगळला.

असल्या भिकारड्या परंपरा स्त्रियाच अधिक सांभाळून ठेवतात. स्वत:च्या शोषणाची ही रेघ स्वत:च कुरवाळत वाढवत नेतात. म्हणून मला संस्कृतीने त्यांना दिलेल्या दुय्यम भूमिकेपेक्षाही त्यांनी ती सहज स्वीकारली याचाच संताप अधिक येतो. वर बेशरम लाचारपणे ’आपली परंपरा’ पाळल्याचा निर्बुद्ध अभिमानही बाळगायचा.

बरं परंपरा काही असेल ती असू दे. आपण आपल्यापुरते सक्तीचे नसलेल्या गोष्टी टाळू शकत नाही? आजींच्या सुनेला हे का खटकले नसावे? ’दोन वर्षांपूर्वी सासरे गेले तेव्हा वर्षभराचे सुतक पाळले, मग एक स्त्री म्हणून सासूचेही पाळू’ असे का म्हटली नाही ती? 'सख्ख्या मुलालाही आईबाबत हा भेदभाव का खटकला नाही?' हा प्रश्न तर - तो पुरुष असल्याने - विचारतच नाही. शेवटी परंपरा नि संस्कृती मानवनिर्मितच असतात. जेमतेम शंभर वर्षांपूर्वीच्या चालीरिती पाहिल्या तर त्यातील अनेक आज अस्तंगत झालेल्या आहेत. तेव्हा नोकरदार स्त्रिया जसे श्रावणी शुक्रवारची सवाष्ण सोय म्हणून रविवारी जेवायला घालतात, त्या जेवणातला स्वयंपाक अनेकदा तयार आणतात. (एकदा तर थेट होटेलमध्येच सवाष्णभोजन, ते ही वर्तुळाच्या न्यायाने एकमेकींना दिलेले मी स्वत: पाहिले आहे.). इतपत मुरड घालतात, तर एक वर्ष गणेशोत्सव वा गौरी आवाहन केले नाही तर बाभळ बुडेल असे तिला का वाटते?

यांचा जास्तीतजास्त विद्रोह म्हणजे घराबाहेरच्या पुरुषांना ’तुम्ही पुरुष मेले असलेच’ म्हणून आगपाखड करायची. अग बाई तुझ्या घरातल्या त्या सांडाला सांग, मी हे पाळणार नाही म्हणून. उगा फेसबुकावर ’स्त्रिया कित्ती कित्ती सहन करतात’चे रडगाणे गाऊन काय बदल होणार आहे. तुझ्या भल्यासाठी तुझ्या घरातले बैल सुधारायला हवेत. शेजार्‍याच्या गोठ्यातला बैलांना प्रवचन देऊन काय उपयोग? बरे शेजारचे बैल तुमच्या मदतीसाठी आले, की तेव्हा घरच्या बैलाची बाजू घेऊन ’इतक्या वर्षांची परंपरा का सोडायची’, ’त्यांना सांगा की’ ’आमच्या घरच्या भानगडीत तुम्ही नाक खुपसू नका’ म्हणून शेपूट घालायची. मग या वांझोट्या फेसबुकी फुसकुल्या कशाला बायांनो? अंधारातली अधेली उजेडात शोधून उपयोग होत नाही. त्यासाठी जिथे ती हरवली तिथेच दिवा लावावा लागतो. आणि त्यासाठी सुरुवात आपणच करावी लागते. बाहेरचे माझ्या घरात दिवे लावत नाहीत म्हणून त्यांच्या नावे बोटे मोडून उपयोग नसतो.

हॅरिएट टबमन म्हणाली होती, ’मी कित्येक गुलामांना गुलामीतून मुक्त केले. त्याहून कित्येक पट गुलामांना मुक्त करु शकले असते. पण आपण गुलाम आहोत याची त्यांना जाणीवच नव्हती.’ माझ्या नवर्‍याने मला हिरे जडवलेल्या सोन्याच्या बेड्या आणल्या हे फुशारकीने शेजारणीला सांगणार्‍यांनी टबमनचे ऐकायला हवे.

मुळात देवळातच जाऊ नये, कर्मकांड हीच गुलामी, परंपरा पाळूच नयेत वगैरे टाईपच्या सनातनी-पुरोगाम्यांसाठी हे विचार नाहीत. माझे अश्रद्ध असणे,कर्मकांडविरहित जगणे ही जशी माझी, निवड, माझे स्वातंत्र्य, तसेच सश्रद्ध असणार्‍याचेही. त्याच्या परिघात त्याने दोषरहित असण्याचा प्रयत्न करावा. माझ्या परिघात मी करेन. स्त्रियांना कर्मकांड, परंपरा पाळण्याची सक्ती जितकी शोषक तितकी नास्तिकाने आपल्या पत्नीला ती न पाळण्याची केलेली सक्तीही. पुरोगामित्व हे कोणतेही मत लादण्यावर अवलंबून नसावे. एखाद्या स्त्रीने 'मी माझे शोषण करणारे, मला दुय्यम राखणारे संस्कृतीचे जोखड स्वत:हून स्वीकारले' असे म्हटले तर तिच्या निर्णयाचाही मी आदरच करेन. फक्त मग तिला ’स्त्री कित्ती शोषित, तुम्ही पुरुष मेले...’ या तर्काचा हक्क देणार नाही. ’मी तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारली स्वत:च्या निर्णयाने. माझी हाडे मोडली याला तूच जबाबदार. तू मला रोखले नाहीस हा तुझा गुन्हा’ असला उफराटा तर्क अजिबात ऐकून घेणार नाही इतकेच.

आणि हो ’आपल्या संस्कृतीत स्त्रीला आदराने वागवले जाते’ हा मूर्ख तर्क देणार्‍याच्या तर कानफटातच वाजवेन. ’निदान आम्ही बुरखे तरी घालायला लावत नाही’ म्हणणार्‍याच्या दोन कानफटात लावेन. जगातील समस्त संघटित-धर्म-प्रधान संस्कृती या स्त्री-शोषकच आहेत. नागर संस्कृती माणसाने स्वीकारली तेव्हा संघटित, काल्पनिक आणि पारलौकिकावर आधारित छद्म-धर्म उदयाला आले आणि सर्वांनी एकमुखाने स्त्रीला दास्यात ढकलले. याला कोणताही, अगदी कोणताही धर्म अपवाद नाही. तेव्हा गाढवाने डुकराकडे बोट दाखवून आपल्या गाढवपणाचे समर्थन करु नये. तुम्ही दोघेही मनुष्य नाही हे ध्यानात घ्या. तरच काही अक्कल सुधारली तर सुधारेल इतकेच.

- oOo -

लेखासोबत जोडलेले छायाचित्र indiatoday.in येथून साभार (त्यांनी त्याचे श्रेय Getty Imagesला दिले आहे.)

ताजा कलम :
शीर्षकातच मी ’आपली’ असे एकवचन वापरले आहेत. त्यामुळे सर्व परंपरा, संपूर्ण संस्कृतीबद्दलचे ते भाष्य नाही. सरसकटीकरण करणे. त्याच्या आजाने माझे पाणी उष्टावले ’असेल’ म्हणत नवजात कोकराला ठार मारणे ही धर्म०संस्कृती-जात-परंपरा यांच्या अस्मितेची मुळव्याध झालेल्यांची ’परंपरा’ आहे, माझी नाही.


हे वाचले का?

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

देवस्थान

DoorLookedTemple
एका प्रसिद्ध देवस्थानाने श्रद्धाळूंची स्पर्धा घेतली.
त्यात एकच प्रश्न होता, 
’देवस्थानातील देवाचे दर्शन कसे घेतले 
की अधिक पुण्य लाभते?’

एक म्हणाला, 
’मनोभावे हात जोडून घरुन केलेला नमस्कारही 
देवाला पोचतो.’; देवस्थानच्या ’कार्यकर्त्यांनी’ 
त्याला घरीच गाठला, यथास्थित पूजा करून 
इस्पितळात पोचवला.

दुसरा म्हणाला 
’घरच्या प्रतिरूप मूर्तीचे दर्शन घेतले तरी 
देवस्थानात जाऊन दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.’
देवस्थानने स्वामित्वहक्क कायद्याखाली त्याच्या
देव्हार्‍यातील मूर्ती जप्त करून नेली. 

तिसरा म्हणाला,
’रस्त्यावरुन गाडीवरुन जाताजाता एका हाताने
केलेला नमस्कारही पुरेसे पुण्य देऊ शकतो.’
देवस्थानने दारासमोर भिंत बांधून बाहेरुन
फुकट दर्शन घेणार्‍यांचा बंदोबस्त केला.

चवथा म्हणाला,
’आत पाऊल न टाकता दारात उभे राहून घातलेले
गार्‍हाणेही आतला देव सहज ऐकू शकतो.’
देवस्थानने गाभार्‍यासमोर असलेले दार चिणून
उजव्या बाजूने प्रवेश देणे सुरू केले.

पाचवा म्हणाला,
’देवस्थानात दर आठवड्याला षोडशोपचारे पूजा
केल्यानेच त्यातील देवाचा खरा अनुग्रह होतो.
देवस्थानने त्याला आठ पूजांच्या देणगीमध्ये
दहा पूजांचे पॅकेज देऊ केले.

सहावा म्हणाला,
’देवाच्या नावे दरमहा देवस्थानला देणगी 
दिल्यानेच देव अधिक प्रसन्न होतो.’
देवस्थानने भिंतीवरील देणगीदारांच्या यादीत
त्याचे नाव जाड टाईपात रंगवले.

सातवा म्हणाला,
’देवस्थानला सर्वस्व दान करून देवासमोर
नतमस्तक झाल्यानेच माणूस पुण्यवान होतो.’
देवस्थानने त्याच्या नावे काळ्या पाषाणाची
एक पायरी देवाच्या पायाशी बसवली.

आठवा म्हणाला,
’देवस्थानाला भरपूर देणग्या मिळवून देत
संपूर्ण कळस सोन्याने मढवला की देव
प्रसन्न होतो नि मरणोत्तर स्वर्गलाभ होतो.’
देवस्थानने त्याला ताबडतोब संचालकांमध्ये
सामावून करून घेतला.

नववा म्हणाला,
’श्रीमंतांच्या उत्पन्नाच्या सहा टक्के
देवस्थान कर सरकारने घ्यावा.’
त्याच्या निवडणूक खर्चाचा भार 
देवस्थान समितीने उचलला.

दहावा म्हणाला...
... 
तो काय म्हणाला, 
त्याला देव प्रसन्न झाला का,
ठाऊक नाही;
...
पण सध्या सारे संचालक मंडळ
त्याच्या दाराशी हात जोडून उभे असते.

- oOo -

कवितेसोबत जोडलेले छायाचित्र https://www.123rf.com/photo_27699327_locked-temple-door.html येथून साभार.


हे वाचले का?

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

कुंपण

TheFence
आम्हा दोघांच्या घरांमध्ये 
एक प्राचीन कुंपण ;
कधी घातले, कुणी घातले
आणि मुख्य म्हणजे का घातले...
ठाऊक नाही !
पण त्याचे घर तिकडचे
आणि माझे इकडचे,
इतके मात्र पक्के ठाऊक.

त्याला त्याचे आवार सुंदर हवे,
आणि मला माझे.
कुंपणाच्या माझ्या बाजूने
एक एक काटा उपसून
त्याच्या आवारात भिरकावला,
आणि फक्त फुले शिल्लक ठेवली.
त्यानेही तिकडच्या बाजूने 
नेमके तसेच केले असावे. 

आता माझ्या आवारात 
विविधरंगी फुलांचा सडा !
कुंपणावरुन डोकावून पाहिले
तर मी फेकलेले काटे
तो कुरवाळतो आहे.

त्याने माझ्या हातातील 
फुलांकडे पाहिले,
आणि हसून म्हटले,
’वेड्या, फुले सोडून काटे
का कुरवाळतो आहेस.’

आता आम्ही दोघेही दिङ्मूढ.
ऐतिहासिक कुंपण कुरवाळताना
हे काट्या-फुलांचे गणित
दोन्ही आवारात कसे चुकते आहे ?


- oOo -

हे वाचले का?

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

फूटपट्टी

DonkeyWithARuler
https://www.wonkeedonkeetools.co.uk/ येथून साभार.
कुणी म्हणतं,
’हे जग माझ्या हिरव्या फूटपट्टीने मोजले तर,
हवे त्याहून अधिक लांबीचे आहे, 
सबब ते पापी आहे.’ 

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या भगव्या फूटपट्टीने मोजले तर.
हवे त्याहून कमी लांबीचे आहे, 
सबब ते पापी आहे.’ 

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या लाल फूटपट्टीने मोजले तर,
हवे त्याहून जास्त रुंदीचे आहे, 
रुंद पंजाच्या माणसांना धार्जिणे आहे.’

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या निळ्या फूटपट्टीने मोजले तर, 
हवे त्याहून कमी रुंदीचे आहे, 
सामान्यांची मुस्कटदाबी करणारे आहे.



कुणी म्हणालं, ’
फूटपट्टी मला सोयीची मोजमापे देत नाही. 
सबब ती बदलली पाहिजे.’ 

कुणी म्हणालं,
’मोजणी केल्याने डावं-उजवं करण्यास प्रोत्साहन मिळते.
सबब फूटपट्टी शोषकांची हस्तक आहे.’

कुणी म्हणालं,
’लाकडीऐवजी प्लास्टिकची फूटपट्टी वापरुन 
मोजल्याने माझी उंची कमी मोजली गेली.’

कुणी म्हणालं, 
’बुटक्या लोकांनी तयार केलेली फूटपट्टी,
आम्ही उंच लोकांनी का वापरावी?’

कुणी म्हणालं, 
’फूटपट्टीची लांबी एक फूटच असली पाहिजे,
हा आमच्या विरोधकांचा कावा आहे.’ 

कुणी म्हणालं,
’तिच्यावरील मिलिमीटरच्या खुणा हा तिने
मेट्रिक व्यवस्थेशी केलेल्या व्यभिचाराचा पुरावा आहे.’ 

...

फूटपट्टीला कान नसतात ; तरी ती ऐकत असते,
सार्‍यांना समजावून सांगू पाहते. पण...
तोंडच नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार
सहन करीत निमूटपणे मोजणी करत राहते.

- oOo -

हे वाचले का?

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

थोरांची ओळख

शाळेत असताना एका वर्षी इतिहासातील महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासाला होती. अभ्यासक्रमाच्या या पुस्तकाचे शीर्षक होते ’थोरांची ओळख’. पण अलिकडे असे ध्यानात आले की आसपास इतके थोर लोक आहेत की त्या सार्‍यांची ओळख करुन द्यायची तर किमान शतखंडी ग्रंथच लिहावा लागेल. हे फारच खर्चिक नि वेळखाऊ काम आहे. एरवी टोमणेबाजी करणारी मीम्स बनवू म्हटले तर नको नको म्हटले तरी लोक मदतीला येतील. पण अशा उदात्त कामात सहकारी मिळणेही अवघड... अचानक मला आई म्हणायची तो एक श्लोक आठवला.

आदौ राम तपोवनादि गमनम् हत्वा मृगं कांचनम् |
वैदेही हरणम् जटायू मरणम् सुग्रीव संभाषणम् ||
वाली निर्दालनम् समुद्र तरणम् लंकापुरी दाहनम् |
पश्चात्‌ रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् ||

चार ओळीत संपूर्ण रामायण साररूपात सांगणारा हा श्लोक आठवला नि मी एकदम ’युरेका, युरेका’ म्हणत धावत सुटलो. सुदैवाने मी न्हाणीघरात नसल्याने अंगावर कपडे होते. भर चौकात आपल्या चारचाकी गाडीची काच खाली करुन गजरेवाल्याशी भावाची घासाघीस करणारा थोर इसम दिसला नि भानावर आलो.

घरी परतलो. छान शुचिर्भूत होऊन संगणकासमोर बसलो. बाजूला उदबत्ती लावली. समोर लेखन-गुरू केशवकुमारांचा फोटो ठेवून त्याला गुलालाचा टिळा लावला नि ही थोरांची ओळख लिहायला सुरुवात केली.

बटाटेवडा खाणार्‍यांपेक्षा, तो न खाणारे
नैतिकदृष्ट्या खूपच श्रेष्ठ असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

आपल्या इमारतीसाठी वापरलेल्या विटा 
शेजारच्या इमारतीहून भक्कम आहेत, 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

आपल्या कुंडीतील झाडे, शेजार्‍याच्या 
झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन सोडतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

’व्हीआयपी’ कंपनीचे बनियन वापरणारे
’रूपा’वाल्यांपेक्षा मनमिळावू असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

पहिल्या मजल्यावर राहणारे लोक
तळमजल्यावरच्यांपेक्षा क्रूर असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

दाढीमध्ये विषम संख्येने केस असणारे
सम संख्या असणार्‍यांपेक्षा शूर असतात 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

’अ’ आद्याक्षरवाल्यांपेक्षा ’म’वाल्यांना
साहित्यिक पुरस्कार अधिक मिळतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

टोपी घालणार्‍यांपेक्षा ती शिवणारे
अधिक बुद्धिमान असतात
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

चार मुलांना जन्म देणार्‍या बापापेक्षा
दशपुत्र-उत्पादक बाप महान असतो,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

पांढर्‍या कागदावर लिहिलेल्या कवितेपेक्षा
’खाकी’वरील कवितेला अधिक खोली असते
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

संत्र्याचा फोटो चिकटवलेल्या फोनला
टरबूजवाल्या फोनपेक्षा जास्त रेंज मिळते,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

माणसाच्या बाह्य कपड्यांवरुन
अंतर्वस्त्राचा रंग ओळखता येतो,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

रस्त्याच्या पूर्व बाजूला राहणारे
पश्चिमवाल्यांपेक्षा श्रीमंत असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

कॉसमॉस बॅंकेत काम करणारा माणूस
जनता बॅंकवाल्यापेक्षा अधिक चांगला गातो, 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

चार चाकी गाडीत बसल्याबसल्या
प्रत्येकी दहा रुपये किंमतीचे तीन गजरे
विक्रेत्याकडून वीस रू. ला मागतात...
... ते सर्व थोर असतात

हे सगळं कळलं, कळलं तरी 
वळलं नाही, वळलं तर उमगलं नाही,
असे ज्यांच्या बाबत होते...
... ते सर्व थोर असतात

सगळं काही कळलं, वळलं नि उमगलंही
आणि तरीही ’आम्ही नाही बुवा यातले’
असे ज्यांना वाटते...
... ते सर्वही थोरच असतात

- रमताराम

- oOo -

हे वाचले का?

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

ते म्हणतात...

TeMhanale
तो म्हणाला, "फलाण्याबाबतीत गणपाचे वागणे बरोबर नाही"
गणपा म्हणाला, "’त्या’बाबतीत गण्याला बोलत नाही, फाटते याची."

तो म्हणाला, "ढेकाण्याबाबतीत गण्याचे वागणे बरोबर नाही."
गण्या म्हणाला, "’त्या’बाबतीत गणपाला बोलत नाही, फाटते याची."

तो म्हणाला, "अमुक मुद्द्यावर गण्याची बाजू योग्य आहे."
ते म्हणाले, "हा छुपा मनुवादी आहे."

तो म्हणाला, "तमुक मुद्द्यावर गणपाची बाजू बरोबर आहे."
ते म्हणाले, " हा अर्बन-नक्षलवादी आहे.’

तो म्हणाला, "ढमुक मुद्द्यावर दोन्हीं बाजूंच्या दाव्यात तथ्य आहे."
ते म्हणाले, "हे समाजवादी लेकाचे कायम कुंपणावर."

तो म्हणाला, "टमुक मुद्द्यावर दोन्ही बाजूंची चूक दिसते."
ते म्हणाले, "हा साला दोन्हीं बाजूंनी बोलतो."

तो म्हणाला, "पामुक मुद्द्यावर ही तिसरी बाजू अधिक योग्य ठरेल."
ते म्हणाले, "याचं नेहमी तिसरंच असतं."

तो म्हणाला, "मुद्द्याला नेहमी दोनच बाजू असतात असे नाही."
ते म्हणाले, "हा नेहमी फाटेच फोडत असतो."

तो म्हणाला, "या धोरणांत गरीबांचे हित नाही."
ते म्हणले, ’हा साला कम्युनिस्ट आहे."

तो म्हणाला, "सारेच श्रीमंत शोषक नसतात."
ते म्हणाले, "हा भांडवलशाहीचा हस्तक आहे."

तो कंटाळून म्हणाला, "असल्या खुळचट आप्तांपेक्षा
एखादा शहाणा शत्रू बरा."
ते म्हणाले, "हा देशद्रोही आहे."

तो संतापून म्हणाला, "मुद्द्यांऐवजी  बाजू 
सांभाळणार्‍यांना फटकावले पाहिजे."
ते म्हणाले, "हा हिटलर आहे."

तो वैतागून म्हणाला, "असल्या मूर्खांसोबत राहण्यापेक्षा 
आत्महत्या केलेली काय वाईट?"
ते म्हणाले, "हा भेकड आहे."

...

आता तो काहीच म्हणत नाही. ते मात्र म्हणतात, 
"भित्रा लेकाचा, बोलण्याची हिंमत नाही."

- रमताराम


- oOo -

हे वाचले का?

बुधवार, १४ जुलै, २०२१

भोपळे

WalkingPumpkin
pngwing.com येथून साभार.
मोठ्ठ्या कलादालनात
मोठ्ठ्या कलाकाराचे
मोठ्ठे प्रदर्शन चालू 

आग्नेयेला 
एक चित्र
माणसाचं वाटणारं 
बिनधडाचं मुंडकं

नैऋत्येला 
एक शिल्प
एक लोभस स्नोमॅन
सनबाथ घेणारा

ईशान्येला 
एक कॅनव्हास
कचर्‍यातून कलेचा
उभा एक डोलारा

वायव्येला 
फक्त एक टेबल
त्यावर मधोमध
ठेवलेला भोपळा...


...एक दाढीवाला म्हणाला,
परीक्षा व्यवस्थेवरचे 
केवढे मौलिक भाष्य

एक झोळीवाला म्हणाला
हॅलोविनच्या पोकळतेचा
केवढा मार्मिक निषेध

एक जाड-भिंगवाला म्हणाला
अंतर्बाह्य रंगसंगतीचा
देखणा आविष्कार

एक बोकड-दाढी म्हणाली
आईन्स्टाईनच्या मेंदूचे
लक्ष्यवेधी इन्स्टॉलेशन


इतक्यात...
कुणी एक आला, तिथे  
पाण्याच्या बाटल्या ठेवून 
भोपळा घरी घेवोनि गेला

- oOo -
	

हे वाचले का?

रविवार, ११ जुलै, २०२१

विम्बल्डनचा पावित्र्यभंग

टेनिसच्या चाहत्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ही चारी धाम यात्रा. प्रत्येक धामी तयार केलेल्या कोर्टनुसार कुठे कुठल्या प्रकारचा खेळ पाहायला जावे याचा अंदाज त्यांना असतो. फ्रेंच स्पर्धेसाठी मातीची कोर्ट वापरली जात असल्याने वेगापेक्षा चौफेर खेळाला (territorial play) अधिक महत्व असते. खेळणारी खेळाडू चतुरस्र नसेल तर तिचीची डाळ तिथे शिजत नाही. त्याच्या उलट विम्बल्डनचे. इथे हिरवळीची कोर्ट असतात. त्यामुळे इथे सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली प्रकारचा खेळ अधिक होतो. यात चौफेर खेळापेक्षा अनेकदा बिनतोड (Ace) सर्व्हिस करणारी खेळाडू अधिक प्रभाव पाडत असते. त्याचबरोबर फ्रेंचमध्ये बेसलाईन (म्हणजे कोर्टाची कड) अधिक महत्वाची तर विम्बल्डनमध्ये नेटजवळ वर्चस्व गाजवू शकणार्‍या खेळाडूच्याला यशाची शक्यता अधिक असते. अमेरिकन स्पर्धेत कृत्रिम हार्डकोर्ट असतात. तिथे वेगवान खेळ करणे आवश्यक असते.

एका प्रकारच्या कोर्टवर बलवान असलेला खेळाडू अन्य प्रकारच्या कोर्टवर चाचपडताना दिसत असतो. आजचा महत्वाचा खेळाडू असलेला राफाएल नदाल हा फ्रेंच स्पर्धेचा सम्राट मानला जातो. तब्बल तेरा वेळा त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. चार वेळा अमेरिकन तर दोनदा विम्बल्डन विजेतेपदही त्याने मिळवले आहे. पण ऑस्ट्रेलियन भूमीवर मात्र तो एकदाच यशस्वी ठरला आहे. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन वगळता इतर तीन स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. पण ग्रॅंड-स्लॅम पुरे करण्यात तो अपयशी ठरला. याउलट सात वेळा विम्बल्डन आणि पाच वेळा अमेरिकन ओपन जिंकलेल्या पीट सॅम्प्रासला मातीच्या कोर्टवर अंतिम फेरीही गाठता आलेली नाही. आठ वेळा विम्बल्डन, सहा वेळा ऑस्ट्रेलियन, पाच अमेरिकन ओपन जिंकणारा आणि आज चाळीशीच्या उंबरठ्यावरही निम्म्या वयाच्या खेळाडूंना मात देणारा 'फेड-एक्स' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉजर फेडररला फ्रेंच स्पर्धा मात्र एकदा जिंकता आलेली आहे. त्यामुळे या चारही कोर्टवर जो खेळाडू प्रभुत्व गाजवू शकतो तो अधिक दर्जेदार मानला जातो. चारही स्पर्धा एकाच वर्षांत जिंकणॆ हे यशाचे परमोच्च शिखर मानले जाते. त्याला ’ग्रॅंड स्लॅम’ म्हटले जाते.

TennisBalls

विम्बल्डनच्या ग्रास-कोर्टवर 'सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली' प्रकारचा खेळ करणार्‍यांनी अनेक वर्षे वर्चस्व गाजवले आहे. त्या आधी पार पडलेल्या फ्रेंच स्पर्धेत प्रभुत्व गाजवलेले इथे कमी पडतात, नि विम्बल्डन वेगळाच विजेता देऊन जाते, ही जवळजवळ परंपराच आहे. बियॉन बोर्ग, त्या कोर्टवर बॉल-बॉय म्हणून आलेला नि विजेतेपदापर्यंत मजल मारलेला चिडकू मॅकन्रो, जर्मनीचा फायरब्रॅंड बोरिस बेकर, खेळातली आग देहबोलीमध्ये अजिबात न उतरू देणारे आंद्रे आगासी आणि पीट सॅंप्रास, आठ वेळा विजेता ठरलेला फेडरर हे या स्पर्धेतले आणि कोर्टवरचे नामांकित खेळाडू. महिलांच्या स्पर्धांमध्ये या प्रकारच्या खेळाची तीव्रता आणि वारंवारता तुलनेने कमी असली तरी बिली जीन किंग, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ आणि अलिकडे पुनरागमन केलेली टेनिस-मॉम सेरेना विल्यम्स या सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली प्रकारात निष्णात मानल्या जातात. सेरेनाची थोरली बहीण व्हीनस अन्य कोर्टवर अजिबात प्रभाव पाडू शकली नसली तरी पाच वेळा बिम्बल्डन विजेती ठरली आहे.

मागच्या वर्षीच्या खंडानंतर यावर्षी झालेल्या स्पर्धेत काल झालेला महिला एकेरीचा अंतिम सामना विस्मरणीय (नोंद: सुरुवातीला ’अ’ हे अक्षर नाही!) म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियन अश्ले बार्टी आणि झेक कारोलिन प्लिस्कोवा यांच्यातील हा सामना म्हणजे एकमेकींना गुण बहाल करण्याचा सामना होता असे म्हणावे लागेल. यात बार्टी हरली... आणि म्हणून बिचारीला नाईलाजाने विम्बल्डन चॅम्पियन म्हणून ती थाळी स्वीकारावी लागली.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या सामन्यात नेटपेक्षा बेसलाईनवरुन खेळ अधिक होतो हे समजण्याजोगे आहे. पण नेटजवळ जाण्यास बंदी घातल्यासारखा खेळ अनेक दिवसांनी पाहिला. इतकेच काय सेंटर-लाईन आणि बेसलाईन यांच्या संगमावर उभे राहून थोडे डावीकडे, थोडे उजवीकडे खेळत बसणे प्रथमच पाहिले. (वैचारिकदृष्ट्या मध्यममार्गी असलेल्या माझ्यासारख्यालाही याचा वैताग आला, आता बोला.) क्रॉसकोर्ट, डाऊन-द-लाईन शॉटस दोघीही बहुधा विसरल्या असाव्यात. चेंडू फक्त समोर टोलवणे नि प्रतिस्पर्ध्याची चूक झाली तर देवदयेने मिळाल्यासारख्या गुण घेणे असे चालले होते. बहुतेक गुण हे बेसलाईनबाहेर चेंडू मारल्यामुळे दिले (मिळवले म्हणणे मूर्खपणाचे ठरेल) गेले. साईडलाईन बहुधा कंटाळून झोपी गेली असावी.

WimbledonCourt

रॅकेटला वरच्या कडेवर चेंडू लागणे हा तर शिकाऊ वयातही क्वचित घडणारा प्रसंग आहे. या ग्रॅंड-स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो इतक्या वेळा घडला, की हा अंतिम सामना आहे की पात्रता फेरीचा अशी शंका आली. पहिल्या सात गेम्सपैकी पाच गेम्समध्ये सर्विस भेदली गेली यावरुन खेळ हा जिंकण्यासाठी नव्हे तर प्रतिस्पर्धी खेळाडूला उदारपणे गुण नि सामना देऊ करण्यासाठी खेळला जात होता हे सहज स्पष्ट होईल. प्रत्यक्ष सामना बघताना ते अधिकच स्पष्ट झाले. आपल्या सर्व्हिसवर सलग चार ’अनफोर्सड एरर’ (प्रतिस्पर्धाने काही कष्ट न करता आपणच वेडावाकडा फटका मारून गुण बहाल करणे) करुन गेम प्रतिस्पर्ध्याला देऊ करण्याचा खेळ दोघीही खेळल्या. ’एकमेका साह्य करु’ हे ब्रीद इतके चांगले आत्मसात केलेल्या दुसर्‍या व्यक्ती माझ्या पाहण्यात नाहीत. थोडक्यात हा सामना पाहताना यावर्षीपासून ’गोल्फ प्रमाणे सर्वात कमी गुण मिळवेल ती जिंकली’ असा उलटा नियम विम्बल्डनने केला की काय अशी शंका मला बराच वेळ येत होती. गुण कमावणे हा भागच कुठे दिसत नव्हता, मग बिम्बल्डनची ख्याती असलेला सर्व्ह-अ‍ॅंड-व्हॉलीच्या गतिमान खेळाची तर अपेक्षाही चुकीची होती.

निसरड्या कोर्टवरुन घसरुन पडल्याने माघार घेतलेली अमेरिकन सेरेना विल्यम्स, मानसिक स्वास्थ्यासाठी सहभागी न झालेली जपानची नाओमी ओसाका, उपांत्य सामन्यात पराभूत झालेली जर्मन अ‍ॅंजेलिक कर्बर, बेलारुसच्या एरिन सबालेन्का आणि व्हिक्टोरिआ अझारेन्का यांच्या अनुपस्थितीत अंतिम सामना इतका सुमार व्हावा हे विम्बल्डनचे दुर्दैव. त्याहून दुर्दैव हे की इतका सुमार खेळ केलेली बार्टी या स्पर्धेत आणि एकुणात एटीपी क्रमवारीतही अव्वल आहे. असे असेल तर महिला टेनिसचे भवितव्य फारसे चांगले आहे असे म्हणता येणार नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला कुणीतरी महिलांचा सामनाही पाच सेटचा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. हा सामना पाहिल्यावर (स्वयंघोषित फेमिनिस्टांकडून ’Male Chauvinist Pig ’ ही शिवी ऐकण्याची तयारी ठेवूनही) 'खरंतर एक सेटही पुरेसा होईल' असे म्हणावेसे वाटते. पाच सेटपर्यंत प्रेक्षकांची सहनशक्ती टिकेल की नाही याची मला खरोखरच शंका आहे.

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, १० जुलै, २०२१

माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे

माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ << मागील भाग
---

माध्यमांवरील या लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले एक वाक्य इथे संदर्भासाठी पुन्हा उद्धृत करतो आहे

दूरदर्शनच्या काळात अतिशय व्यापक असलेले मनोरंजनाचे क्षेत्र ’खपेल ते विकेल’ बाण्याच्या खासगी वाहिन्यांनी ऐतिहासिक-पौराणिक, विनोदी, कौटुंबिक आणि पोलिसी-कथा या चार विषयांत बंदिस्त करुन ठेवले.

खरंतर जेव्हा हे ध्यानात आले तेव्हापासूनच मी माध्यमांच्या वाटचालीकडे अधिक बारकाईने पाहू लागलो. पण या निरीक्षणाबाबत थोडे विस्ताराने लिहायला हवे. या चार विषयांपलिकडे असतेच काय?’ असा प्रश्न कदाचित या मनोरंजनाच्या आहारी गेलेल्यांना पडू शकेल. त्यासाठी थोडे मागे जाऊन ’दूरदर्शन’ या सरकारी माध्यमाकडे पाहता येईल. खासगी माध्यमे नव्हती तेव्हा टेलिव्हिजन मनोरंजनावर दूरदर्शनची एकहाती सत्ता होती. त्या वेळी त्यावरुन सादर झालेल्या कार्यक्रमांकडे नजर टाकली तर आजच्या तुलनेत त्यातील प्रचंड वैविध्य- आणि गुणवत्ताही सहज दिसून येते.

सर्वात पहिली मला आठवते ती ’कथासागर’ नावाची मालिका. या मालिकेत देशोदेशींच्या प्रथितयश लेखकांच्या कथांवर आधारित एपिसोड्स सादर केले जात. टॉलस्टॉय, चेकोव्ह, ओ हेन्री, हॅन्स अँडरसन वगैरे नावे आम्ही प्रथम यातच वाचली. जेन ऑस्टिनच्या प्रसिद्ध ’प्राईड अँड प्रिज्युडिस’ वर आधारित ’तृष्णा’ ही मालिका सादर झाली. रशियन लेखक अन्तोन चेकोव्हच्या कथांवर आधारित ’चेकोव्ह की दुनिया’ दूरदर्शनने आमच्यासाठी आणली होती.

याच धर्तीवर पुढे हिंदी, उर्दू नि बंगाली कथांवर आधारित 'किरदार' नावाची मालिका प्रसारित झाली. (ही यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.) शरत्‌चंद्र चॅटर्जी, मुन्शी प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू, श्रीलाल शुक्ल वगैरे प्रसिद्ध भारतीय लेखकांच्या कादंबर्‍यांवर आधारित श्रीकांत, शेषप्रश्न, नीम का पेड यांसारख्या मालिका चालू होत्या. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या चिंतनाचा सर्वात संहत आविष्कार असलेल्या ’गोरा’ या कादंबरीवर आधारित मालिकाही दूरदर्शनने सादर केली होती. (ही देखील यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.) एका गावाचे सात-आठ वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रण करणारी, आर.के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारित, ’मालगुडी डेज’ प्रचंड लोकप्रिय ठरली. (जिला मी मराठी भाषेतील मालगुडी डेज म्हणतो त्या ’सारे प्रवासी घडीचे’ या जयवंत दळवींच्या कादंबरीकडे मराठी निर्माता दिग्दर्शकांनी दुर्लक्षच केले आहे.)

राजकीय उपहासाचा दुर्मिळ आविष्कार असलेल्या ’राग दरबारी’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीवरही मालिका सादर होत असे. एवढेच कशाला औद्योगिक घराण्यांतील राजकारणावर आधारित ’शांती’ ही मालिकाही तिथेच प्रसारित झाली. एका सर्कसमधील लोकांच्या जीवनाभोवती फिरणारी ’सर्कस’ नावाची मालिका ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस प्रसारित झाली. आज ’किंग खान’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. ’पृथ्वीवरील स्वर्ग’ असे ज्याचे वर्णन केले जाई, त्या काश्मीरच्या पार्श्वभूमीवरील ’गुल गुलशन गुलफाम’ सारखी मालिका प्रसारित होई. आज खासगी वाहिन्यांवरुन प्रसिद्ध होणार्‍या अशा धर्तीच्या मालिका अथवा कार्यक्रमांची नावे आठवतात?

Nukkad

महानगराच्या रस्त्याच्या एका कोपर्‍यावरचे सारे आयुष्य कोणत्याही अभिनिवेश वा तत्वाची चौकट न घेता केवळ साक्षीभावाने टिपत जाणारी ’नुक्कड’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. त्यातील कादरभाई या भूमिकेने प्रकाशझोतात आलेला अवतार गिल पुढे चित्रपटांतून चमकत राहिला. याशिवाय जावेद खान (करीम), सुरेश चटवाल (दुखिया) यांनीही पुढे हिंदी चित्रपटांतून आपले बस्तान बसवले. पवन मल्होत्राचा हरी, समीर खक्करचा खोपडी नावाचा दारुडा, अजय वढावकरने साकारलेला गणपत हवालदार, किरकोळ दुरुस्तीचे दुकान चालवणारा आणि ’टीचरजी’वर जीव जडवून बसलेला दिलीप धवनने साकारलेला गुरु, अशी पात्रे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली. जगण्याशी निगडित असलेले अगदी किरकोळ पातळीवरचे व्यवसाय करणारे, कृषिप्रधानतेला मागे सारुन पुढे आलेल्या नव्या व्यवसायप्रधान जगातले बलुतेदार म्हणता येतील अशी ही माणसे. समाजव्यवस्थेच्या परिघावर राहणारी आणि तरीही तिचा पाया असणारी.

’और भी ग़म है ज़मानेमें’ या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एका सामाजिक प्रश्नाचा उहापोह केला जाई. याचा अलिकडे सादर झालेला अवतार म्हणजे आमीर खान या प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने सादर केलेला ’सत्यमेव जयते’. आमीर खान सादर करतो म्हणून लोक तो प्रथम पाहू लागले हे खरे असले, तरी हा कार्यक्रम मात्र लोकप्रिय झाला, त्याबाबत माणसे जागरुकतेने बोलत हे मान्य केले पाहिजे. असे असूनही बहुतेक माध्यमे चार खपाऊ विषयांपलिकडे असे नवे प्रयोग करण्यास नाखूष असतात हे दुर्दैवी आहे. त्या काळात चित्रपटही सामाजिक विषयांशी बांधिलकी राखून होते, त्यांची गाडी रोमान्स आणि हिंसा यांच्या डबक्यात अडकून पडलेली नव्हती. पुढे चित्रपटांनी शेक्सपिअरलाही अंडरवर्ल्डमध्ये नेऊन ठेवले आणि भूतकालभोगी माणसांकडून टीआरपी गोळा करण्यासाठी मालिकाही पाठ फिरवून पौराणिक-धार्मिक विषयांकडे पळत सुटल्या.

’फूल खिलें है गुलशन गुलशन’ नावाचा कार्यक्रम पूर्वी चित्रपटांतून बालकलाकार म्हणून भूमिका केलेली तबस्सुम सादर करत असत. कलाकारांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये ’कसं वाटतंय?’ ’अमुक अनुभव कसा वाटला?’ सारखे सबगोलंकार प्रश्न नसत. मार्मिक प्रश्न, हलकेफुलके किस्से यातून स्वत: तबस्सुमही त्या कार्यक्रमाच्या अविभाज्य भाग होऊन राहात. साबिरा मर्चंट यांचा ’व्हॉट्स द गुड वर्ड’ आणि सिद्धार्थ बसू (पुढे ’कौन बनेगा करोडपती’चे निर्माते) यांची ’क्विझ टाईम’, ’मास्टरमाईंड इंडिया’ सारख्या मुलांसाठी असलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धाही दूरदर्शन आयोजित आणि प्रसारित करत असे. ’यूटीव्ही डिजिटल’ या प्रसिद्ध चित्रपट वितरण संस्थेचे संस्थापक (आणि यू-मुम्बा या मुंबईच्या कबड्डी संघाचे मालक) रॉनी स्क्रूवाला हे ही असाच एक कार्यक्रम सादर करत असत असे स्मरते (दुर्दैवाने कार्यक्रमाचे नाव आठवत नाही).

आज किती खासगी वाहिन्या शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला आव्हान देणारे, त्यांच्या जिज्ञासेला उद्युक्त करणारे कार्यक्रम सादर करतात? कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियता त्यातून मिळणार्‍या माहितीसाठी अधिक होती की कोणी किती रक्कम जिंकली या रोकड्या अहमहमिकेचे साक्षीदार होण्यासाठी?

प्रासंगिक विषयांवर दूरदर्शनवर ’वर्ल्ड धिस वीक’ सारखा कार्यक्रम सादर होई. ज्यात रोजच्या बातम्यांमधील विषयांपलिकडे विविध क्षेत्रातील त्या आठवड्यातील घडामोडी अधोरेखित केल्या जात. आज स्वतंत्र वाहिनी असलेली एनडीटीव्ही तेव्हा केवळ निर्माता कंपनी होती. तिच्यामार्फत प्रणोय रॉय आणि अप्पन मेनन हा कार्यक्रम सादर करत असत. अप्रासंगिक विषयांवर ’सुरभि’ नावाने असाच कार्यक्रम सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे सादर करत. पुढे माफक अभिनेता म्हणून ओळख निर्माण केलेला शेखर सुमन त्या आठवड्यातील घडामोडींवर ’मूव्हर्स अ‍ॅंड शेकर्स’ नावाचा खुसखुशीत कार्यक्रम सादर करे. जगातील बहुतेक प्रथितयश वाहिन्यांवरुन आजही अशा स्वरुपाचे कार्यक्रम सादर होत असतात. उदाहरण द्यायचे तर सीबीएस या अमेरिकन चॅनेलवर जॉन ऑलिव्हर ’लास्ट वीक टुनाईट’सारखे कार्यक्रम आजही सादर करतात. त्यांना त्यांचा असा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. भारतीय माध्यमांनी मात्र या प्रकाराकडे पाठ फिरवलेली आहे.

चलच्चित्रे अथवा अ‍ॅनिमेशनच्या जगात कधी हिरव्या कधी जांभळ्या रंगाच्या चित्रविचित्र राक्षसांना केवळ लाडू खाऊन ढिशूम करणार्‍या बालिश हीरोंपेक्षा कैकपट अधिक चांगल्या मालिका सादर झाला. यात भारतीय परंपरेतील ’पंचतंत्र’ होते; एका छोट्या मुलीची स्वप्न-दुनिया चित्रित करणारी लुईस कॅरल या लेखकाची जगभर लोकप्रिय झालेली ’अ‍ॅलिस इन वंडरलॅंड’ होती; जंगलात लांडग्यांच्या टोळीत वाढलेल्या माणसाच्या पिल्लाचे जग समोर आणणारी एव्हरग्रीन ’जंगल बुक’ होती; बहुसंख्येला आज आठवणारही नाही अशी योहाना स्पायरी या स्विस लेखिकेच्या कादंबरीवर जपानी अ‍ॅनिमेटर्सनी बनवलेली ’हायडी, द गर्ल ऑफ आल्प्स’ ही एका पोरक्या मुलीची संवेदनशील कथाही होती. फिल्म्स डिव्हिजनने निर्माण केलेल्या ’अनेकतामें एकता’सारख्या बोधपटांचाही त्यात समावेश होता.

मराठी भाषेत चिं.वि.जोशींच्या चिमणराव गुंड्याभाऊ पासून फक्त मुलांसाठी असणार्‍या किलबिल, मध्यमवयीनांसाठी असणारा ’गजरा’, शेतकर्‍यांसाठी ’आमची माती आमची माणसं’ थ्रिलर प्रेमींसाठी श्वेतांबरा अशा वेगवेगळ्या आवडी असलेल्या गटाच्या माणसांसाठी कार्यक्रम सादर केले जात. हे ’Horses for courses’ तत्व सोडून देऊन खासगी वाहिन्या आता ’Courses for masses’ या तत्वाला चिकटून राहू लागल्या आहेत.

अर्थात हे कार्यक्रम सादर होत असताना वर उल्लेख केलेल्या चार प्रकारांतील कार्यक्रम सादर होत नसत असे नाही. ’बुनियाद’सारखी कौटुंबिक मालिका घराघरांत पोहोचलेली होती. ’ये जो है ज़िंदगी’ सारखी मालिका लोकांना हसवत होती. मराठीमध्ये ’तिसरा डोळा किंवा ’एक शून्य शून्य’ सारख्या डिटेक्टिव अथवा उकलकथा चित्रित करणार्‍या मालिका सादर होत होत्या.

BharatEkKhoj

पण त्याचवेळी प्रबोधन ही आपली जबाबदारी मानत असलेले ते माध्यम ’मिले सुर मेरा तुम्हारा’ किंवा ’सारा भारत ये कहे’ सारखी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी गाणी प्रसारित करत असे. त्याच संकल्पनेच्या रुजवणुकीसाठी पं. नेहरुंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ’भारत एक खोज’ ही मालिका प्रसारित होत होती. ऐतिहासिक पात्रांना घेऊन, अस्मिता कुरवाळून टीआरपीची चिल्लर गोळा करणार्‍या आजच्या मालिकांशी त्या मालिकेच्या पटकथेशी तुलना करुन पाहता येईल. मूळ पुस्तक केवळ आधार म्हणून, निवेदनाचा धागा म्हणून घेत संपूर्ण भारतभरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा पट अभ्यासून ती पटकथा साकार झाली होती. देशभरातील कथा, गीत, संगीत, इतिहास, पुराणकथा या सार्‍यांना एका सूत्रात बांधणारी दुसरी कलाकृती माझ्या पाहण्यात नाही.

राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना आता अस्तंगत होऊन तिची जागा राष्ट्रभक्तीने घेतली आहे. बांधिलकीच्या भावनेपेक्षा समर्पणभावी निष्ठा अधिक महत्वाची मानली जाऊ लागली आहे. यात निष्ठा ठेवणारा दुय्यम नि निष्ठाविषय श्रेष्ठ ठरत असतो. एकात्मतेमध्ये वैविध्याला वाव राहातो, भक्तीमध्ये लीनता, शरणभाव आणि म्हणून एकसाचीकरण असते हे ध्यानात न घेता हे विसरुन लोक ’लोटांगण घालिता’ जगू लागले आहेत.

सुरुवातीची काही दशके दूरदर्शनने धार्मिकतेचा बडिवार कटाक्षाने टाळला होता. धार्मिकतेचा बडिवार आणि संस्कृतीचा उत्सव यातील फरक बिनचूक ओळखून ती सीमा न ओलांडण्याचे धोरण राबवू शकणारे सुज्ञ नि जागरुक लोक त्या मॅनेजमेंटमध्ये होते. (’प्रॉफिट ही भगवान है’ म्हणणारे त्यात येऊन बसलेले नव्हते.) पण शहाबानो प्रकरणानंतर राजीव गांधींवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप होऊ लागला आणि तोल सांभाळण्यासाठी म्हणून दुसर्‍या बाजूला त्यांनी हिंदू तुष्टीकरणासाठी ’रामायण’, ’महाभारत’ यांसारख्या मालिकांना उत्तेजन दिले. मराठी साहित्याच्या क्षेत्रात शिवाजी सावंत यांच्या ’मृत्युंजय’ या कादंबरीने जे घडले तेच या दोन मालिकांमुळे घडले. त्या कादंबरीच्या यशानंतर महाभारतातले सापडेल ते पात्र पकडून त्यावर कादंबर्‍या लिहिण्याची जशी लाटच आली, तशाच प्रकारे खासगी वाहिन्यांनी रामायण, महाभारत यांचा धागा उचलून वाटचाल सुरू केली. भारतीय चॅनेल माध्यम गुणवत्तावादाकडून जमाववादी होण्याकडे वाटचाल सुरू झाली.

दर्जेदार, अभिनव कार्यक्रमापेक्षा लोकानुनयी लेखनाचे, कार्यक्रमांचे रतीब घालणे सुरू झाले. हिंदी चित्रपट जसे जागा, माणसे, घटनाक्रम बदलून एकाच कथानकावर अनेक चित्रपट निर्माण करुन गल्ला भरतात, तसेच मोजक्या तपास-कथांच्या आवृत्त्या काढत सीआयडी या मालिकेने एक दशकांहून अधिक काळ धुमाकूळ घातला. पात्रांचे व्यक्तिमत्व, स्वभाव बदलत कथानक वाटेल तसे फिरवत नेणारी एक मराठी मालिका तेच साध्य करुन गेली. यातून सोकावलेले प्रेक्षकही आता आपल्याला हवे तेच दाखवायला हवे असा आग्रह धरु लागले. त्यांना खुश करण्यासाठी कथानकाचे सातत्य, संगती वगैरे सरळ धाब्यावर बसवून लोकांना आवडेल त्या दिशेला कथानक वळवणारे निर्माते नि वाहिन्यांनी बस्तान बसवले. मग मेलेले पात्र जिवंत होण्यासारखे चमत्कारही घडू लागले. भंपकपणा सार्वत्रिक होऊ लागला.

लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बालिश कार्यक्रम सादर केले जात असले तरी त्यांचे जगणे, त्यांचे भावविश्व केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या कार्यक्रमांचाही आता अभाव दिसतो. दूरदर्शनवर कॉलेज-जीवनाकडे एका प्रिन्सिपलच्या नजरेतून पाहणारी चुनौती नावाची मालिका सादर झाली होती. पण हा अपवाद म्हणायला हवा. भारतीय शास्त्रीय अथवा रागसंगीताचा अध्वर्यू मानला गेलेला अमीर खुस्रो आणि उर्दू शायरीचा बादशहा मानला गेलेला मिर्ज़ा ग़ालिब यांच्यावर संस्मरणीय अशा चरित्रमालिका प्रसारित होत असत. या विषयप्रकाराला हात घालण्याचे धाडस त्यानंतर कोणत्या चॅनेल-माध्यमांनी केले?

यादी आणखी लांबवता येईल. पण मुद्दा असा की केवळ एक वाहिनी, तुटपुंज्या सरकारी साहाय्यावर, जाहिराती वगैरे तत्सम उत्पन्नाच्या आधाराशिवायही कार्यक्रमांच्या स्वरुपांचे, विषयांचे इतके अमाप वैविध्य आणि दर्जाही राखू शकत होती. विविध प्रकारच्या प्रेक्षकांसाठी काही ना काही देऊ करत होती. आज प्रचंड पैसा, जाहिरातीचे हुकमी उत्पन्न, तंत्रज्ञानाचा मोठा आधार, मोबाईलने प्रचंड वाढलेली ग्राहकसंख्या, कॉपी-कॅट मंडळींना इंटरनेटमुळे वेगाने उपलब्ध होणारा, त्यावर ’मेड इन इंडिया’चा शिक्का मारुन खपवता येणारा तयार माल... इतक्या सार्‍या संपन्नतेनंतरही गुणात्मक बाजूने मनोरंजनाचा दर्जा मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक गरीब होत चालला आहे. ही विसंगती डोळ्यांत भरणारी आहे.

Brahmaand

या नव्या नि जुन्या दोनही वाहिन्यांमध्ये अजिबात न दिसणारा एक विषय आहे तो म्हणजे विज्ञान. विज्ञान आणि विज्ञान काल्पनिका (सायन्स फिक्शन) हा विषय भारतीय मनोरंजन माध्यमाला संपूर्ण वर्ज्य आहे असे दिसते. डॉ. जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली फार पूर्वी प्रसारित केलेल्या ’ब्रह्मांड’ आणि प्रा. यशपाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक गिरीश कार्नाड सादर करील असलेल्या ’टर्निंग पॉईंट’ या दोन दूरदर्शनवरीलच मालिकांचा अपवाद. दूरदर्शने ’इंद्रधनुष’ नावाची विज्ञान-काल्पनिकाही सादर केली होती. त्यात जुजबी पातळीवर का होईना कालप्रवासाची संकल्पना वापरली होती. ही दोन-तीन उदाहरणे वगळता विज्ञानाधारित चित्रपटांचा, मालिकांचा भारतीय मनोरंजन माध्यमात संपूर्ण अभाव आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

अर्थात यात आश्चर्य काहीच नाही. कारण ’खपते ते विकते’ या मंत्रानुसारच ते व्यवसाय करतात, आणि मुळात भूतकालभोगी भारतीय समाजच विज्ञानाबद्दल सर्वस्वी उदासीन आहे. त्यांचा आवडता विषय आहे इतिहास ! तो घडून गेलेल्या घटनांची जंत्री मांडत असल्याने विचारशून्य पाठांतराला सोयीचा. बरे सुदूर भूतकाळात काय घडले यावर मतभेद व्यक्त करुन आपण म्हणतो तोच ’खरा इतिहास’ असे म्हणत आपापल्या जाती-धर्माच्या, राजकारणाच्या सोयीचा इतिहास खपवणेही शक्य होते. बोनस म्हणून अस्मितेचे टेंभेही त्यातून आयते मिळत असल्याने तो आणखी लाडका होऊन बसतो. विज्ञानाची वस्तुनिष्ठता आपल्या बहुसंख्येला नकोशीच असते आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्या माध्यमांतूनही पडलेले दिसले तर नवल नाही.

भारतीय मनोरंजन माध्यमे सध्या फक्त नफा आणि म्हणून टीआरपी या दोन गोष्टींचाच, सर्वस्वी धंदेवाईक विचार करतात. तिथे कलेला, कलाकाराला, सर्जनशीलतेला स्थान नाही. तिथे कार्यक्रम हे उत्पादन असते, क्रयवस्तू असते, कलानिर्मिती नसते. म्हणूनच केवळ शब्दांतून बोल बोल बोलणारी, किमान हालचाली करणारी पात्रे, पार्श्वभूमीवर ढणाणा वाजवणारे तथाकथित पार्श्वसंगीत आणि अधूनमधून झटका आल्यासारखा एकच दृश्य उगाचच तीन बाजूने दाखवणारा, पण एरवी बव्हंशी स्थिर असणारा कॅमेरा एवढ्यावर मालिकांचे रतीब सुरु आहेत. हे पाहिल्यावर पुलंच्या ’एका रविवारची कहाणी’ मधील रामा गड्याचे ’घरच्या कपड्यात करीयाचा ता सोसल’ हे विधान आठवून जाते. (सोशल नाटक म्हणजे काय तर ज्याला वेगळी ड्रेपरी लागत नाही ते, ही त्याची व्याख्या.)

एक स्थळ, समकालीन कपडे कपडे-पट म्हणून (त्यामुळे अनेकदा अभिनेते स्वत:च ते घेऊन येतात), कॅमेरा एवढे साहित्य पुरते. जाहिरातींच्या अधेमध्ये एपिसोड दाखवायचा असल्याने अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात जेमतेम सोळा-सतरा मिनिटे एपिसोड. त्यात पुन्हा 'ब्रेकनंतर' काय याची झलक जाहिरातींआधी आणि त्या ब्रेकनंतर 'आधी काय घडले' याची एक झलक वगळली तर बारा-पंधरा मिनिटांचा हा कार्यक्रम होतो. त्यात पुन्हा सनसनाटीपणा आणण्यासाठी कॅमेर्‍याच्या करामती आणि पार्श्वसंगीताला वाव दिलेला असतो तो वेगळा. थोडक्यात जेमतेम दहा मिनिटे ही पॅसेंजर गाडी चालू असते. बरे लेखनामध्ये लेखक सोडून चॅनेल-संबंधी इतर मंडळीही भर घालणार. टीआरपी वाढवण्यासाठी काय करावे याचे ’ग्यान’ त्यांनी द्यायचे नि लेखकाने त्यानुसार लिहायचे. अनेकदा तर लेखक नावाचा कुणी वेगळा असायचीही गरज नसते. निर्माता, त्यात भूमिका करणारा एखादा कलाकारच चार दोन एपिसोड खरडून काढतो. दहा मिनिटांमध्ये बोलण्यासाठी असे किती संवाद लागतात हो. आठ-दहा वाक्ये नि दोन प्रसंग लिहिले की काम भागते. उरलेली जागा कॅमेरा नि संगीत भरून काढतात. शेवटी काय जाहिरातींच्या मध्ये दाखवायला काहीतरी असले म्हणजे झाले.

समाजाच्या मनोरंजनाच्या अपेक्षेचा महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) समोर ठेवूनच त्यांचे उत्पादन चालू असते. रुचिभिन्नतेला ते खिजगणतीत धरत नाहीत. मग अशी भिन्न रुची असलेले प्रेक्षक नव्या माध्यमांकडे वळत आहेत. ओटीटी (Over the Top) अर्थात इंटरनेटवरुन मनोरंजनाचे माध्यम अशा प्रेक्षकांचे आधार होऊ लागले आहेत. हे प्रेक्षक हळूहळू तिकडे सरकू लागले आहेत. चॅनेलची मंडळी हे प्रेक्षक गमावतील असे दिसते वाटू शकते. पण असे होणार नाही. कारण ही मंडळी त्या माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रमांच्या आवृत्त्या इकडे तयार करत राहतीलच. तिकडचे इंग्रजीतले कार्यक्रम इकडे हिंदी वा स्थानिक भाषांत, त्या त्या पार्श्वभूमीवर सादर झाले, तर इथल्या काही प्रेक्षकांचीही सोय होईल. इंग्रजीच्या अडचणीने जे प्रेक्षक मूळ कार्यक्रम पाहू शकत नाहीत, त्यांना आपणही प्रसिद्ध कार्यक्रमाचे रसिक असल्याचे मिरवता येईल... प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद वाचून त्याबाबत माफक चर्चा करणार्‍या वाचकांसारखेच. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपी-कॅट चॅनेल निर्मात्यांना ’आपल्याला अशी मालिका हवी’ म्हणण्यासाठी ओटीटी माध्यमांच्या रूपाने नवा स्रोत उपलब्ध झालेला असेल.

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, ७ जुलै, २०२१

माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’

माध्यमे - १: 'खपते ते विकते' << मागील भाग
---

मागील लेखात इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या निमित्ताने चॅनेल-माध्यमांवरील कार्यक्रमांच्या विषय नि स्वरुपासंदर्भातील धंदेवाईकतेवर भाष्य केले होते. टीआरपीच्या स्पर्धेत शक्यतो जे खपते तेच विकण्याचे त्यांचे धोरण असते. पण हा काही केवळ दृश्य-माध्यमांचा दृष्टिकोन आहे असे म्हणता येणार नाही. अन्य माध्यमांचे धोरणही याच्याशी मिळतेजुळतेच असते.

काही काळापूर्वी एका वेबसाईटवर मी ’चेकर्स’ हा खेळ खेळत असे. अगदी ’तज्ज्ञ पातळीवरून’ खेळणार्‍या संगणकालाही आपण सहज हरवत आहोत असे काही सामन्यांतच लक्षात आले. संख्याशास्त्रीय दृष्टीने पाहू लागल्यावर ध्यानात आले, की प्रत्येक सामन्याच सरासरी वेळ हा तीन ते चार मिनिटे इतकाच आहे. इंटरनेटवर या प्रकारचा खेळ खेळणार्‍यांच्या करणार्‍यांच्या सहनशक्तीचा हा खेळ उपलब्ध करुन देणार्‍या मंडळींनी बहुधा अभ्यास करुन हा कालावधी निश्चित केला असावा. (यू-ट्यूबर व्हिडिओ अपलोड करताना त्याचा कालावधी किती असावा याचा विषय-वर्गवारीनुसार विचार केला जात असतो.) आणखी काही सामने वेगवेगळ्या प्रकारे खेळून पाहिल्यानंतर आलेली शंका खरी ठरली.

'असे का?' याचे उत्तर सोपे होते. खेळ चालू असताना दोन्ही समासांमध्ये जाहिरातींचे पट्टे उमटत होते. खेळाडू जितका वेळ त्या पानावर राहील, तितकी त्या वेबसाईटच्या मालकाला अर्थप्राप्ती होणार असे गणित आहे. म्हणून अगदी सुमार खेळाडूंनाही संगणक महाशय लिंबूटिंबूसारखे जिंकू देत होते, तज्ज्ञच असल्याचा समज करुन देत होते... अगदी इंडियन आयडॉलच्या संयोजकांप्रमाणेच.

सॅटेलाईट रेडिओ चॅनेल सुरु झाली तेव्हा ’फोन करा नि जिंका’ प्रकारच्या स्पर्धा सुरू झाल्या. यात विचारलेले प्रश्न इतके सामान्य असत, की ऐकणार्‍या बहुतेकांना त्याचे उत्तर ठाऊक असे. मग प्रथम कोण उत्तर देतो, याची अहमहमिका सुरू होई. पूर्वी असले प्रकार पोस्टकार्डाद्वारेही होत. नंतर ईमेलद्वारे होऊ लागले. आणि मोबाईलच्या आगमनानंतर अखेर एसएमएसद्वारे होऊ लागले. अशा छद्मस्पर्धांचा सुरुवातीचा उद्देश सोपा होता. बक्षीसाच्या लालसेने अधिकाधिक श्रोते, प्रेक्षक आपल्या कार्यक्रमाकडे आकृष्ट व्हावेत, असा कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा प्रयत्न होता. पुढे ’डेटागिरी’चा बोलबाला सुरु झाल्यावर स्पर्धकांची माहिती जमा करणे आणि त्याआधारे मार्केटिंगचे जाळे विणणे हा आणखी एक उद्देश त्याला जोडला गेला.

पण माध्यमांचेच का, सामान्य माणसेही यात मागे नाहीत. मागच्या महापालिका निवडणुकीपूर्वी आमच्या प्रभागातील नगरसेवकाने मतदारसंघात फिरुन ’जनसंपर्क सहज ठेवता यावा’ म्हणून सर्व मतदारांचे मोबाईल क्रमांक जमा केले. निकाल लागले आणि आमच्या मोबाईल्सवर नगरसेवकाला ’निवडणूक निधी’(!) देणार्‍या स्थानिक दुकानांचे मार्केटिंग मेसेजेस येऊन धडकू लागले.

पूर्वी चित्रपटांमधून एखादी टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, एखाद्या पंख्याचा क्लोज-अप घेत त्याचे नाव स्पष्ट दिसेल याची तजवीज केली जाई. या बदल्यात त्या उत्पादनाचा उत्पादक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आर्थिक हातभार लावत असे. याला 'Embedded Marketing’ म्हणजे ’प्रच्छन्न प्रचार’ अशी संज्ञा तेव्हा वापरली जात असे. आता टीआरपीच्या जमान्यामध्ये प्रच्छन्नतेची गरज न उरता या आर्थिक गणितामध्ये थेट कार्यकारणभावच प्रस्थापित झालेला आहे.

संगणकाच्या, इंटरनेटच्या जमान्यात थेट ग्राहकांकडून उत्पन्न मिळवण्यापेक्षा जाहिरातदारांकडून उत्पन्न मिळवण्यावर अधिक भर असतो. त्यामुळे बहुतेक चॅनेल अगदी बव्हंशी फुकट किंवा नगण्य मासिक वर्गणी प्रेक्षकांकडून घेत असतात. कार्यक्रमांदरम्यान अधेमध्ये ब्रेक घेऊन दाखवलेल्या, कार्यक्रम चालू असताना स्क्रीनच्या तळाला वा बाजूला स्तंभामध्ये दिसणार्‍या, कार्यक्रमांमध्येच मिसळून दिलेल्या ... अशा विविध प्रकारे जाहिरातींचा जो भडिमार होतो त्यांतूनच त्यांच्या उत्पन्नाचा बळकट स्रोत निर्माण होत असतो. या जाहिरातींचे दर निश्चित करण्यासाठी त्यांना या जाहिरातदारांना आपली ग्राहक-पोहोच किती आहे हे सिद्ध करुन दाखवावे लागते. आणि यासाठी मागील लेखात मांडलेले टीआरपीचे गणित कामी येते.

CastAwayVollyball
'Cast Away' या चित्रपटात विल्सन व्हॉलिबॉल्सची केलेली प्रच्छन्न जाहिरात.
हा व्हॉलिबॉल पुढे लिलावात तब्बल तीन लाख डॉलरला विकला गेला.

चॅनेल-माध्यमे तर सोडाच, यू-ट्यूबवरील लहान-लहान वाहिन्याही स्थानिक उत्पादकांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरात करुन आर्थिक लाभ पदरी पाडून घेत असतात. चॅनेलवरील मालिकांतून, निवेदकांच्या निवेदनातून तर सोडाच, पण एखाद्या खेळाच्या थेट प्रक्षेपणाच्यावेळी समालोचन करणार्‍यांनाही प्रायोजकांच्या उत्पादनाच्या जाहिरातींचा एक-दोन ओळींची मजकूर उच्चारणे सक्तीचे असते. या जाहिरातींनी कार्यक्रमांचा इतका कब्जा घेतला आहे की उलट दिशेने आता कार्यक्रमांनाच ’एम्बेडेड प्रोग्राम’ म्हणायची वेळ आली आहे. माध्यमांमध्ये जाहिरात हे धोरण मागे पडून जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या छापते ते वृत्तपत्र, जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या देणारी ती न्यूज-चॅनेल्स, जाहिरातींच्या अधेमध्ये मनोरंजन करणारी ती मनोरंजन माध्यमे अशा व्याख्या बदलून घ्यायला हव्या आहेत.

चॅनेल-माध्यमे ही मूर्तिमंत धंदेवाईकता आहे. अनेक राजकीय, सामाजिक, क्वचित बौद्धिक मंडळींमध्ये टकरीच्या सांडांप्रमाणे झुंजवून किंवा कुस्त्यांची दंगल लावावी तशा चर्चांचे फड लावून, अनेक मार्गांनी त्याचे दाम ते वसूल करत असतात. ('Tomorrow Never Dies' या बॉण्डपटातील Elliot Carver हा माध्यमसम्राट त्याच्या नव्या सॅटेलाईट वाहिनी-साखळीच्या उद्घाटनाला एक्स्लुजिव आणि सनसनाटी कव्हरेज देता यावे यासाठी दोन जागतिक महासत्तांमध्ये युद्धाची कलागत लावण्यासही कमी करत नाही. ) याव्यतिरिक्त विशिष्ट भूमिकेला झुकते माप देण्यासाठी त्या त्या बाजूच्या मंडळींकडून थेट अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात देणग्या स्वीकारतात... धंदा चोख करतात आणि ’प्रामाणिकपणाच्या बैलाला ढोल’ म्हणतात.

कोरोनिल या आपल्या औषधाने कोरोना बरा होतो असा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. त्याचे बाजार-अवतरण करण्याच्या दिवशी ’कोरोनावर जगातले एकमेव रामबाण औषध’ म्हणून बहुतेक भाट माध्यमांनी दिवसभर बातम्या वाजवल्या, चर्चा घडवल्या; बहुतेक वेळ बाबा आणि कोरोनिलचे खोके स्क्रीनवर झळकवले. पुढे उत्तराखंडच्या औषध प्रशासनाने 'कोरोनिलसाठी केवळ प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून परवाना मागितला नि दिला गेला' असल्याचे स्पष्ट केले. बाबांवर फसवणुकीचा खटला भरावा अशी मागणी सुरु झाली. त्यावरही चॅनेलवाल्यांनी चर्चा घडवून आणल्या. आधीच्या बातम्या नि त्या चर्चा दोन्हींचे प्रायोजक होते ’पतंजली आयुर्वेद’!

FullFrontalBJP

सर्वात जुने माध्यम असलेल्या वृत्तपत्रांची स्थितीही फार वेगळी नाही. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्यापासून आसपासच्याच काय, हजारो मैल दूरवरच्या घडामोडी काही सेकंदात समोर येत असल्याने वृत्तपत्रांची मूळ गरज घटत चाललेली आहे. खर्चाचे वाढते प्रमाण, ग्राहक राखण्यासाठी त्या तुलनेत कमी ठेवावे लागणारे दर, या कात्रीत सापडलेली माध्यमे जाहिरात-उत्पन्नावर भर देतात हे ओघाने आले.

पूर्वी पहिल्या पानावरील हेडलाईन ज्या बातमीला मिळे, ती बातमी आदल्या दिवशीची सर्वाधिक महत्वाची बातमी मानली जात असे. आता वृत्तपत्राचे पहिले पूर्ण पानच जाहिरातीने व्यापलेले असते. जाहिरात ही आदल्या दिवशीच्या सर्वात महत्वाच्या बातमीहून निर्णायकरित्या मोठी ठरली आहे. आतील पानांवर पाहिले तर, अन्य जाहिराती, छोट्या जाहिराती, निविदा सूचना वा ताळेबंदांसारख्या बहुसंख्य वाचकांच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्टी, -पैसे घेऊन छापल्या आहेत हे उघड गुपित असते अशा- राजकीय आणि व्यावसायिक ’बातम्या’ वगळल्या, तर निखळ बातम्या वा वाचकांना उपयुक्त असा मजकूर जेमतेम दहा ते पंधरा टक्के इतकाच उरतो.

इंग्रजी वृत्तपत्रांना संभाव्य ग्राहक अधिक असल्याने त्यांची स्थिती थोडी बरी असते. पण मराठीसारख्या स्थानिक भाषांतील वृत्तपत्रे आता केवळ जाहिरातींचे उत्पन्न मिळवण्यासाठी छापली जाणारी जाहिरातपत्रेच उरली आहेत. या दहा-पंधरा टक्क्यांत जागा भरण्यासाठी पहिला मान अग्रलेख लिहिण्या्ची हौस असलेल्या संपादकाला दिलेला. उरलेली जागा भरण्यासाठी वृत्तसंपादक मंडळींना फार प्रयत्न करावे लागत नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कृपेने हव्या त्या स्वरुपात बातम्या तयार मिळतात. आवश्यक तर संपादित करुन त्या चौकटीत बसवल्या की काम होते.

एक प्रथितयश मराठी वृत्तपत्र इंग्रजी पुस्तकांच्या परीक्षणाला दीड-दोन हजार शब्दांची मुभा देते. एकाच पुरवणीत अशा दोन पुस्तकांची परीक्षणे छापते. याउलट मराठी पुस्तकांच्या परीक्षणांना पाचशे शब्दांची एखादी पत्रावळ कशीबशी मिळते. आमच्या एका पुस्तकाचे परीक्षण एका नियतकालिकाकडे पाठवण्यापूर्वी शब्दसंख्या वगैरेची मर्यादा जाणून घेण्यासाठी फोन केला. पहिला प्रश्न होता, ’तुम्ही आम्हाला जाहिराती देता का?’ थोडक्यात त्या नियतकालिकातील परीक्षणेही ’अप्रत्यक्ष पेड’ असावीत असा अंदाज केला. पुढचे-मागचे काही अंक चाळल्यावर तो खराही ठरला. हे नियतकालिकही इंग्रजी पुस्तकांची परीक्षणे छापण्यातच धन्यता मानते.

'हे धोरण का चालते?' यावर विचार करताना मराठी पुस्तकांच्या प्रकाशकांकडेही नजर टाकायला हवी. तिथेही इंग्रजीतील गाजलेली, गाजत असलेली समकालीन पुस्तके शक्य तितक्या तातडीने अनुवादित करुन बाजारात आणण्याची अहमहमिका चालू असते. त्या घाईत अनुवादाचा दर्जा भयाण असलेली पुस्तके हाती पडत असतात. पण त्यात ना प्रकाशकाला लाज ना वाचकाला. मोजक्या चिकित्सक वाचकांकडून होणारा जोड्यांचा कार्यक्रम टाळण्यासाठी काही अनुवादांवर तर अनुवादकाचे नावही नसते. या सार्‍या व्यवसायाच्या यशाच्या मुळाशी मराठी भाषिकांचा न्यूनगंड आणि इंग्रजी बाजाराशी ’कदम मिलाके चलो’ची जमाव-दबावाने (peer pressure) निर्माण झालेली अपरिहार्यता असते. बुकरच्या स्पर्धेतील पुस्तक आपण वाचले असले पाहिजे हा अट्टाहास, पण इंग्रजी समजुतीचा नि म्हणून वाचनाचा वेग कूर्मगतीचा. यावर हा उपाय. हे कामचलाऊ अनुवादित पुस्तक वाचले तरी गोषवार्‍याने मूळ पुस्तक वाचल्याचा आव आणणे शक्य होते. वाचकाचे नि प्रकाशकाचे दोघांचे काम होते. याला वृत्तपत्र नि नियतकालिकेही हातभार लावून त्या नफ्याचे थोडे उदक आपल्याही हातावर सोडून घेतात, गुणवत्ता नि मराठी पुस्तके या दोन्हींला वार्‍यावर सोडून.

नफा वाढवण्यासाठी जाहिरातींचे उत्पन्न वाढवणे हा जसा उपाय आहे, तसाच खर्च कमी करणे हा दुसरा उपाय आहे. माध्यमांचे नोकर असलेल्यांचा पगार तर टाळता येत नसतो. मग तो शक्य तितका कमी ठेवणे आणि त्यांच्याकडून जास्तीतजास्त काम करवून घेणे हा भांडवलशाहीतील नियम आहे. त्या पलिकडे तात्कालिक सहभागी व्यक्तींना- वृत्तपत्रांतील लेखक, चॅनेलवरील चर्चक वगैरे- शक्यतो मानधनच न देणे या प्रकारांनी खर्चात काटछाट केली जाते.

चित्रपट, मासिक आदी अनेक क्षेत्रात उतरलेल्या एका चॅनेलकडून त्यांच्या मासिकातील एका फीचरसाठी एका फोटोग्राफर मित्राला त्याचे फोटो वापरण्याची ’विनंती’ करण्यात आली. तो व्यावसायिक फोटोग्राफर असल्याने त्याने मानधनाची चौकशी केली. त्यावर ’तुम्हाला प्रसिद्धी मिळेल की.’ असे निर्लज्ज उत्तर त्याला मिळाले. आता आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याचे बर्‍यापैकी नाव आहे अशा त्या मित्राला हे वीत-दीडवीत मराठी मासिक आणखी काय प्रसिद्धी देणार होते? त्याहूनही अस्वस्थ करणारी बाब म्हणजे प्रत्येक सेकंदाच्या बाष्कळ बडबडीला पैशात रूपांतरित करणारी ही धंदेवाईक मंडळी सर्जनशील कामाची मात्र एक दमडी देऊ इच्छित नाहीत. तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो ही उपकाराची भाषा करतात.

Multitasking

एका चॅनेलवरील दिवाळी अंकांवरील एका चर्चेत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रण होते. होकार दिल्यानंतर चॅनेलच्या बाजूने पुढचा आठवडाभर एकदम सामसूम. सकाळी नऊ वाजता होणार्‍या चर्चेच्या जेमतेम दीड तास आधी ती त्या चर्चेच्या सूत्रसंचालिकेचा फोन आला नि वट्ट पाच मिनिटे तुम्ही कशावर बोलणार वगैरे जुजबी चौकशी झाली. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा संपर्कच नाही.

नियमितपणे चॅनेल्सवर जाणार्‍या आमच्या कार्यकर्त्या, कलाकार, अभ्यासक मित्रांनाही एक पैशाचे मानधन मिळाल्याचे ऐकिवात नाही. आणि बातम्या देण्यापासून, विविध ठिकाणी बाईट्स घेणे, दिवाळीसारख्या निमित्ताने खास कार्यक्रम करणे, वगैरे सगळे काही करणार्‍या यांच्या नोकरांना मात्र नियमित पगार. ते ही बिचारे मूठभर पगारावर साहेब सांगेल ते निमूटपणे सगळे करतात. मी सहभागी झालेल्या चर्चेची सूत्रसंचा्लिका नंतर त्याच चॅनेलवर बातम्या देताना दिसली, किंबहुना तेच तिचे मुख्य काम आहे हे नंतर समजले. थोडक्यात ’झाडू मारण्यापासून ते कलाकार वा चर्चक पकडून आणण्यापर्यंत सर्व कामे करण्याची तयारी असेल तर आमच्याकडे तुम्हाला रोजगार मिळेल’ अशी धमकीवजा ऑफर चॅनेल-मालक मंडळी देत असावीत.

अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ’तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात. सोशल मीडियावर चार ओळी लिहिल्याने प्रशंसा झालेल्या, नि त्या अर्ध्या हळकुंडानेच पिवळ्याधम्मक होऊन बसलेल्यांची त्यांच्या दारी इतकी भाऊगर्दी आहे, की या माध्यमांना एक गेला दुसरा सहज मिळतो. ’पेपरमध्ये आपले नाव आले’ या बालीश आनंदाने ऊर भरून येणार्‍यांना पैसे दिले नाही तरी चालतात. ’दीड कॉलम भरून काढायला लेख पाहिजे’ किंवा ’चर्चेत साडेतीन मिनिटे वाजवायला एक तोंड पाहिजे’ एवढ्याच धंदेवाईक अपेक्षा असलेल्यांना ’कथा पुणे, मुंबई आणि सोलापूर इथे घडते. पात्ररचना विलोभनीय आहे’ वगैरे पुलंच्या ’सखाराम गटणे’ छापाचे किंवा चित्रपटाचा, कादंबरी/ कथांचा गोषवारा आपल्या शब्दांत मांडणारे परीक्षण लिहून देणारे समाजमाध्यमांतून सहज मिळत असल्याने काम भागते.

एका वृत्तपत्राच्या पोर्टलने तर महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून ब्यूटी टिप्स, लाईफस्टाईल या सदरातले लेख लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. ही मुले अर्थातच आपले नाव पाहून धन्य होत असल्याने गुगलबाबाच्या मदतीने इंग्रजी लिखाण शोधून, अनुवादित करुन दोन-अडीचशे शब्द सहज खरडून देत असतात. गण्या उतरला, गणपा चढला, तरी वृत्तपत्रांची, पोर्ट्ल्सची, नियतकालिकांची गाडी चालूच राहते. खर्च कमी करण्यासाठी पुस्तकविक्री क्षेत्रातील मंडळीही असेच मार्ग अवलंबत असतात. विक्रेते वितरकाचे, तर वितरक प्रकाशकाचे पैसे शक्यतो देऊच नयेत असा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम म्हणून- वा त्या बतावणीखाली, प्रकाशक लेखकाचे मानधन उंच शिंक्यावर टांगून ठेवतात.

आयटी इंडस्ट्रीत काम करत असताना एक्सेलपासून जावापर्यंत, बॅंकिंगपासून फार्मास्युटिकल्सपर्यंत सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअरवर तुम्हाला काम करता आले पाहिजे, टीम नावाची टोळी हाकता आली पाहिजे, आपल्याकडे अजिबात नसलेल्या अनुभव वा कौशल्याचा आभास क्लाएंटसमोर मिरवता आला पाहिजे हे सांगणारी मॅनेजर नावाची प्रजाती भेटली होती. त्या व्यवसायात ’माणूस’ हीच क्रयवस्तू बनलेली आहे. त्यामुळे तिला अधिकाधिक ग्राहक मिळवायचे तर आयटी सर्कसमध्ये तिला बेडूक‍उड्यांपासून ट्रॅपीझवरच्या उड्यांपर्यंत सर्व जमले पाहिजे.

पूर्वी बाजारात उभा केलेल्या गुलामाचे दात, शारीरबळ वगैरे अजमावून त्याला विकत घेतल्यास कमीतकमी अन्न खाऊन जास्तीतजास्त काम करेल ना हे पाहून एखादा धनको मालक पैसे देऊन त्याला विकत घेई.’क्लाएंट’ म्हणवणारे नव्या भांडवलशाही व्यवस्थेतले मालक अगदी तसेच त्यांना पारखून घेतात आणि त्यांच्या सध्याच्या मालकांना, म्हणजे आयटी कंपनीला रोख पैसे देऊन काही काळापुरते विकत घेतात. गुलाम विक्रीयोग्य राहणे जुन्या मालकाच्या दृष्टीने महत्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही क्लाएंटला विकता येईल असेच गुलाम, असेच मजूर त्यांना हवे असतात. त्यामुळे ही मंडळी 'तज्ज्ञ' नावाच्या व्यवस्थेला धुळीला मिळवत कामचलाऊ कामगारांच्या आधारे वेतन-खर्च कमीतकमी ठेवून, आपल्या मालकांचा पैसा वाचवण्याचे नि नफा वाढवण्याचे काम करतात.

मालक मंडळीही चतुर असतात. ते या लोकांना निव्वळ वेतनापलिकडे नफ्याचा थोडासा वाटा देऊ करतात. त्यामुळे ही मॅनेजमेंट नावाची सर्वस्वी अनुत्पादक कामे करणारी मंडळी ’प्रॉफिट ही भगवान है’ म्हणत वाटेल ते करुन तो वाढता राहील याची खटपट करत असतात. त्यादरम्यान गुणवत्तेची ऐशीतैशी झाली तरी त्यांना त्याचे सोयरसुतक असण्याचे काहीच कारण नसते. त्यातूनच सर्जनशील व्यक्तीला ’तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो, आणखी काय हवे?” असा निलाजरा उलट प्रश्न विचारण्याचा कोडगेपणा जन्माला येतो. मग ज्या लेखक-कलाकार, कामगार यांना आपल्या गुणवत्तेबद्दल आत्मविश्वास आहे अशी मंडळी दूर राहतात नि ही मॅनेजर मंडळी कामचलाऊ, हौशी मंडळींकरवी शक्यतो फुकट, नाहीच जमले तर नगण्य मानधन/वेतनावर कामे करवून घेत राहातात. अशा परिस्थितीत गुणवत्तेचे काय होत असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

- oOo -

पुढील भाग >> माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे


हे वाचले का?

रविवार, ४ जुलै, २०२१

माध्यमे - १: 'खपते ते विकते'

’इंडियन आयडॉल’ या तथाकथित गुणवत्ता-शोध स्पर्धेबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. मे महिन्यामध्ये त्यात स्व. किशोरकुमार यांना आदरांजली वाहणारा विशेष भाग सादर झाला. त्यात किशोरकुमार यांचे चिरंजीव आणि गायक अमितकुमार यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या कार्यक्रमातील गायकांचे कौतुक केले होते.

IndianIdolLogo-NoBg

पण हा कार्यक्रम संपल्यावर अनेक किशोरप्रेमींनी त्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठवली. या कार्यक्रमात किशोरदांच्या गाण्यांची पार वाट लावली असा सूर अनेक किशोरप्रेमींनी लावला. परीक्षक म्हणून बसलेल्या नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक यांच्यावर टीकेची झोड उठली. स्वत: अमितकुमार तिथे उपस्थित असून त्यांनी याबाबत स्पष्टपणे न बोलता, उलट सुमार गायन नि गायकांची प्रशंसा केल्याबद्दल लोकांनी त्यांनाही धारेवर धरले.

अखेर एका स्वतंत्र मुलाखतीमध्ये ’हा कार्यक्रम आपल्याला अजिबात आवडलेला नाही. तो अध्येच थांबवावा अशी माझी इच्छा होती.’ असे अमितकुमार यांनी कबूल केले. ’गायक कसाही गायला तरी त्याचे कौतुकच करायचे’ असे मला आयोजकांकडून सांगण्यात आले होते’ असा खुलासा त्यांनी केला. दोनच आठवड्यांनी या स्पर्धेतील एक परीक्षक गायिका सुनिधी चौहान यांनी ’फक्त स्तुतीच करायची’ या नियमाला कंटाळून या स्पर्धेतून माघार घेतली. माजी परीक्षक सलीम मर्चंट यांनीही आपल्यालाही असेच सांगण्यात आले होते असा दावा केला. काही वर्षांपूर्वी एका चॅनेलवरील मराठी गीत-संगीत स्पर्धेदरम्यान आपल्याला असेच बजावण्यात आले होते अशी नाराजी परीक्षक म्हणून काम केलेल्या गायिकेने व्यक्त केली होती.

पण हे आता तसे गुपित राहिलेले नाहीच. अशा तथाकथित गुणवत्ता-शोध कार्यक्रमांतून कोणताही परीक्षक कोणाही स्पर्धकाचे सादरीकरण अगदी सुमार झाले, तरी थेट टीका करताना वा त्याचे विश्लेषण करुन नेमका सल्ला देताना दिसत नाही. फार फार तर सुधारणेला वाव आहे इतपतच टिपण्णी केली जाते.

इंडियन आयडॉलच्या 'किशोर कुमार स्पेशल’ भागानंतर ’फादर्स डे स्पेशल’मध्ये स्पर्धकांच्या वडिलांना स्टुडिओत बोलावून छानपैकी ड्रामा करण्यात आला. स्पर्धकांच्या पितृप्रेमाने गहिवरलेले परीक्षक कधी ढसाढसा रडले, कधी त्यांनी डोळे पुसले. पण मेलोड्रामाप्रेमी भारतीय प्रेक्षकही या अतिरेकाला वैतागले नि त्यावर चौफेर टीका सुरू झाली. समाजमाध्यमांतून यावर मीम्सचा, विनोदांचा भडिमार सुरू झाला.

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी यावर मार्मिक टिप्पणी केली. 'टीका, गॉसिप जितके अधिक तितकी त्या कार्यक्रमाबद्दल चर्चा अधिक होणार नि त्यातूनही त्याला टीआरपीमध्ये फायदाच होणार' हे त्यांनी नमूद केले. ’देअर इज नथिंग लाईक बॅड पब्लिसिटी’ हा भांडवलशाहीचा मूलमंत्र आहे. चित्रपट अभिनेते वा अभिनेत्री जेव्हा एकमेकांवर टीका करतात तेव्हा ती छापणार्‍या वृत्तपत्रांचे वा चंदेरी नियतकालिकांचे, स्क्रीनवर दाखवणार्‍या चॅनेल माध्यमांचे उखळ तर पांढरे होत असतेच, पण त्या दोघांनाही माध्यमांत नि चर्चेत राहण्याचा फायदा मिळत असतो.

ा इंडियन आयडॉलचा ’बाप-शो’ असलेल्या अमेरिकन आयडॉलबद्दलही अशाच स्वरुपाच्या तक्रारी ऐकल्या होत्या. पण ते अधिक चलाख असल्याने म्हणा, वा त्यांचे प्रेक्षक वेगळे असल्याने म्हणा, त्यांच्याकडे परीक्षकही ’गुड परीक्षक, बॅड परीक्षक’चा खेळ खेळत असत. परीक्षकांना आयोजकांनीच भूमिका नेमून दिलेल्या असत. एखादा परीक्षक हा घणाघाती टीका करण्यासाठी बसलेला असे.

ज्यांना अन्य स्पर्धक जिंकावा अशी अपेक्षा आहे, समोरचा सादरकर्ता, गायक पराभूत व्हावा असे वाटते, अशा प्रेक्षकांना ही टीका मनापासून आवडत असे. त्यामुळे या टीकेतून समोरच्या नकोशा स्पर्धकाचे खच्चीकरण होऊन आपल्या पसंतीच्या स्पर्धकाला फायदा होईल, अशी त्यांना आशा असे. हा टीकाकार परीक्षक आपल्या लाडक्या स्पर्धकावरही अशीच टीका करतो हे त्यांच्या ध्यानात येत नसे. आणि आलेच तरी ती फारशी गंभीर नाही, उलट ’त्या दुसर्‍या स्पर्धकाला कस्सला फाडला’ असा समज ते करुन घेत.

भांडवलशाहीचा मूलाधार असलेल्या असलेल्या स्पर्धाव्यवस्थेत अधिकाधिक ग्राहक मिळवणे आणि त्यांच्याकडून जास्तीतजास्त उत्पन्न पदरी पाडून घेणे हे उद्दिष्ट असते. ग्राहकसंख्या जितकी अधिक तितका उत्पादनावर केलेल्या पायाभूत खर्चाचा त्यांना उचलावा लागणारा वाटा कमी. याचा परिणाम म्हणजे त्या उत्पादनाची विक्रीची किंमत कमी ठेवूनही अपेक्षित नफा मिळवणे शक्य होते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक मिळवण्यासाठी उत्पादनाचा पूर बाजारात सोडावा लागतो, नि हा प्रवाह वाटेवरल्या जास्तीत-जास्त घरांच्या उंबर्‍यापर्यंत कसा पोहोचेल याचा विचार करावा लागतो.

याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे समाजातील सर्वात तळाच्या वर्गातील व्यक्तीला प्रमाण मानून आपले धोरण आखावे लागते. आपले उत्पादन त्याला उपयुक्त ठरेल आणि त्याचवेळी आर्थिक, बौद्धिकदृष्ट्या त्याच्या आवाक्यात राहील हे पाहिले जाते. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी का होईना, भांडवलशाही उत्पादकाला हा ’समाजवादी’ मार्ग निवडावा लागतो. भांडवलशाहीच्या पोटातच असा समाजवाद असतो, त्याशिवाय तिला उभे राहता येणार नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले, तर गरीबांची संख्या वाढत राहून ग्राहकांची कमी होत जाईल. उत्पादनाचा पायाभूत खर्च वाटून घेणारे कमी झाल्याने दरडोई वाटा वाढेल. त्यातून उत्पादनाची विक्री किंमत वाढत जाईल. आता हे उत्पादन आणखी ग्राहकांच्या आर्थिक आवाक्याबाहेर जाईल नि ग्राहक-संख्या आणखी कमी होईल.... उत्पादन अव्यवहार्य होत जाईल.

TRP
thequint.com येथून साभार

आणि म्हणून ’खपते ते विकते’ हे भांडवलशाहीतील माध्यमांचेही सूत्र आहे. त्यांना गुणवत्तेपेक्षा विक्रीमूल्य अधिक महत्वाचे असते. टीआरपी (Television Rating Point) अर्थात बहुसंख्येने दिलेली श्रेणी हा त्यांचा ध्रुवतारा असतो. त्याच्याकडे नजर ठेवूनच ते वाटचाल करत असतात. सामान्य माणसे मृत्यूला घाबरत नाहीत, इतकी ही माध्यमे टीआरपीच्या नुकसानीला घाबरत असतात. म्हणून आपल्या संभाव्य ग्राहकांपैकी कुणालाही नाराज करणे ते टाळतात.

इंडियन आयडॉल वा तत्सम स्पर्धेमध्ये स्पर्धकांचे दोष स्पष्ट सांगितले, तर ते आणि त्या स्पर्धकांचा पक्षपाती प्रेक्षकांचा गट दुरावेल नि टीआरपी घटेल अशी भीती असते. याखेरीज ’भावना दुखवून घेण्यास तत्पर’ असणार्‍यांच्या या देशात जात, धर्म, शहर, भाषा वा तत्सम निकषांच्या आधारे पराभूत स्पर्धकाने वा त्याच्या समर्थकांनी रान उठवले, तर आणखी नुकसान सहन करावे लागणार असते. कारण मिळणारे उत्पन्न त्याच्या समप्रमाणात वाढत वा घटत असते. इतकी काळजी घेऊनही ’पुढच्या फेरीत पाठवण्यासाठी इतके पैसे मागत होते. मी स्पष्ट सांगितले; माझ्या गुणवत्तेवरच गेलो/गेले तर जाईन, एक पैसा देणार नाही.’ वगैरे खरी वा खोटी मखलाशी करत स्वत:ची इमेज उजळण्याची, आपल्या पराभवाचे खापर माध्यमावर फोडण्याची चलाखी हे स्पर्धक समाजमाध्यमांवर करत असतातच.

त्यामुळे दर्जेदार कार्यक्रम देण्यापेक्षा ’बहुसंख्य लोकांना हवे ते’ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि बहुसंख्य लोकांना काय हवे यासाठी माहिती जमा करण्यावर वेळ नि पैसा खर्च करत बसत नाहीत. आधीच प्रसिद्ध असलेल्या एखाद्या कार्यक्रमाच्या, मालिकेच्या कथानकात थोडेफार फेरफार करुन ते आपले कार्यक्रम उभे करतात.

मध्यंतरी 'एपिसोड्स' नावाची एक ब्रिटिश-अमेरिकन मालिका पाहण्यात आली. नव्या वर्षांतील कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी एका चॅनेलची बैठक सुरू असते. त्यात सहभागी असणारे सदस्य वेगवेगळ्या कल्पना सुचवत असतात. त्यावर चर्चा होत असते. थोडा वेळ शांत बसलेला नि अस्वस्थ झालेला प्रमुख त्यात हस्तक्षेप करतो. अन्य चॅनलवरील एका प्रसिद्ध मालिकेचा उल्लेख करतो आणि आपल्या सहकार्‍यांना म्हणतो की 'आपल्याला अशी मालिका हवी'. बस्स मीटिंग संपते!

MajhyaNavryachiBayko

मराठीमध्ये बाहेरख्याली नवरा आणि त्याची सर्वगुणसंपन्न बायको या समीकरणाने एक मराठी मालिका प्रसिद्ध होते आहे म्हटल्यावर लगोलग अन्य चॅनेल्सनी त्याच आधारावर दोन मालिका 'बाजारा'त आणल्या. प्रेक्षकांच्या पन्नास पिढ्या जन्मून सरून गेल्या तरी चिरतरुण राहिलेली एक सासू नि तिची गुणी सून यावर 'चार दिवस' चांगले जातात म्हटल्यावर अन्य चॅनेल्सनी त्या कथानकाचेही रतीब घातले. एकुणातच गुणी, सोशिक आणि शोषित सून मध्यवर्ती ठेवूनच बहुतेक मराठी मालिका टीआरपीचे गणित जमवू पाहतात. मध्यमवयीन स्त्रियांमधील मोठा वर्ग सासू वा एकुणातच सासरकडून शोषित असतो किंवा त्यांचा तसा समज असतो. या सुनेमध्ये तो स्वत:ला पाहात असतो. दुसरीकडे तरुण मुलींच्या महत्वाकांक्षांना चुचकारण्यासाठी याच सुनेला कर्तृत्ववान वगैरे दाखवून त्याही वर्गामध्ये टीआरपीचे गणित बसवले जाते. यातील नवरा जरी बाहेरख्याली रंगात रंगवलेला असला, तरी बहुतेक पुरुष प्रेक्षकांना पत्नीखेरीज प्रेमपात्र असणे यात शरमेपेक्षा पौरुषाचाच भास अधिक होत असल्याने, त्यांची त्याबद्दल तक्रार नसते. उलट त्याच्या कृतीमध्ये कदाचित ते आपली पुरी न झालेली महत्वाकांक्षा पाहात असावेत. एकुणात असे टीआरपीचे गणित चोख बसणारी ही चौकट थोड्याफार फरकाने चार ते पाच मालिका एकाच वेळी वापरत असतात.

ा मालिका जोरदार धंदा करत असताना महाराष्ट्रातील स्त्रियांच्या नि पददलितांच्या शोषणमुक्तीचे अध्वर्यू असलेल्या फुले पती-पत्नींच्या जीवनावरील ’सावित्री-ज्योती’ मालिका मात्र प्रेक्षकांअभावी, टीआरपीअभावी बंद केली जाते. इतिहासातील शूरवीरांची चरित्रे मिटक्या मारत पाहणार्‍या प्रेक्षकालाही याची लाज वाटत नाही. मग ती बंद करणार्‍या चॅनेलला का वाटावी? हिंदीमध्ये सागरांचे रामायण लोकप्रिय झाल्यावर पौराणिक-ऐतिहासिक मालिकांचा जो पूर आला त्यात तर सारे दर्जेदार, सुज्ञ मनोरंजन वाहून गेले, दिवंगत झाले. दूरदर्शनच्या काळात अतिशय व्यापक असलेले मनोरंजनाचे क्षेत्र ’खपेल ते विकेल’ बाण्याच्या खासगी वाहिन्यांनी ऐतिहासिक पौराणिक, विनोदी, कौटुंबिक आणि पोलिसी-कथा या चार विषयांत बंदिस्त करुन ठेवले.

खपते ते विकण्यात लाज पूर्णपणे कोळून प्यायलेली माध्यमे म्हणजे अर्थातच न्यूज-चॅनेल्स. वृत्तपत्रांना किंचित बांधिलकी वा प्रामाणिक व्यवसायाची बंधने पाळण्याची वृत्ती असते. इंटरनेट वेबसाईट्स त्या तुलनेत ’सैल चारित्र्याच्या’ असतात. न्यूज-चॅनेलमाध्यमे सरळ खिडकीत बसून प्रेक्षकांना डोळे मारण्यास निर्ढावलेली असतात, विधिनिषेध गुंडाळून बसलेली दिसतात. ’अमेरिकन आयडॉल’मध्ये रंगवलेला प्रयोग भारतीय वृत्त-चॅनेलवर राजकीय चर्चांच्या स्वरुपात सादर होतो. अर्थात इथे त्यांना सहभागी व्यक्तींना भूमिका नेमून देण्याची गरज नसते. मुळातच परस्परविरोधी भूमिका असलेल्यांना स्टुडिओच्या आखाड्यात सोडून चॅनेलमालक लढत सुरू झाल्याची घंटा वाजवत असतात. त्या मूर्ख चर्चकांच्या ’घमासान’ चर्चेला चॅनेल सबस्क्रिप्शन, जाहिराती, तो व्हिडिओ यू-ट्यूब वा तत्सम ठिकाणी अपलोड करुन पुन्हा टीआरपी आणि त्यातून आर्थिक लाभ अशा अनेक मार्गांनी मलिदा जमा करत असतात.

अयोध्या विवादाच्या निकालाच्या दिवशी चालू असलेल्या चर्चेमध्ये एका माध्यमाने तीन सुमार मॉडेल्सना भयाण मेकअप करुन राम, लक्ष्मण आणी सीतेच्या वेषात स्टुडिओत आणून बसवले होते. चर्चेदरम्यान मधून मधून हा कोदंडधारी श्रीराम ’मुझे न्याय कब मिलेगा’ असे अत्यंत करुण आवाजात विचारत होता. स्क्रीनवर चालते-बोलते श्रीराम पाहून धन्य-धन्य वाटणार्‍या शिक्षित अडाणी जनतेला प्रभू रामाचे हे बाजारीकरण अजिबात खटकले नाही. (गेल्या तीस वर्षांत बहुधा ते अंगवळणी पडले असावे.)

’इंडियन आयडॉल’सारख्या तथाकथित स्पर्धांच्या निकालांवर प्रेक्षक जात, गाव, विभाग याच्या आधारे पार्ट्या पाडून भांडणे लढवत असतात. दुसरीकडे चॅनेलवरील उथळ राजकीय चर्चांमधून होणार्‍या आरोप-प्रत्यारोपांना त्यात सहभागी असणार्‍यांच्या गटाचे लोक या-ना-त्या कारणाने पुन्हा समाजमाध्यमांत नेऊन गदारोळ करतात. त्यातून चॅनेल्सप्रमाणेच समाजमाध्यमांनी आपले उखळ पांढरे करुन घ्यायला सुरुवात केली.

या दरम्यान ’विविध जाती, धर्म, विभाग वगैरेंच्या आधारे गट बांधू पाहणार्‍या स्वयंघोषित समाजसेवकांना ’भावना दुखावणे’ या हुकमी हत्याराचा शोध लागला. कुठल्याशा मालिकेतील कुठल्याशा प्रसंगाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या, म्हणून कांगावा केला, की लगेच चॅनेल माध्यमे ’त्याची बाजू पण ऐकायला हवी’ म्हणत त्याला फुटेज देऊ लागल्या. त्या निमित्ताने वादंग शक्य तितका लांबवून ’ब्रेकिंग न्यूज’ची सोय करुन घेऊ लागल्या.

'चंदेरी दुनिया' म्हणत चित्रपट अभिनेत्यांच्या घरच्या नळाला पाणी आले नाही याचीही बातमी करणारी ही माध्यमे, एखाद्या लेखकाच्या, कवीच्या, नाटककाराच्या नव्या कलाकृतीबाबत बोलण्यास मात्र पाच मिनिटे देण्यास तयार नसतात. हपापलेपणे सतत सनसनाटीपणा, ’ब्रेकिंग न्यूज’च्या मागे धावणारे, ट्विटरवर कोणत्या अभिनेत्रीने कोणत्या अभिनेत्रीला खडसावले याची बातमी करणारे हे लोक, रचनात्मक, सर्जनशील कामांना जागा देण्यास नाखूश असतात.

मराठी माध्यमेही आता हळूहळू या प्रकाराला सरावू लागली आहेत. प्रथितयश वृत्तपत्रांची पोर्टल्स वृत्तपत्रीय चौकट सोडून टीआरपीच्या आखाड्यात केव्हाच धावू लागली आहेत. क्लिकबेटी शीर्षके (Click-bait titles) म्हणजे उत्सुकता वाढवणारी शीर्षके देऊन वाचकाला त्यावर क्लिक करण्यास, ती उघडण्यास भाग पाडणे हा पहिला टप्पा. दुसर्‍या टप्प्यात एकच बातमी एखादा परिच्छेद वा चार वाक्यांची भर घालून वेगळ्या शीर्षकाने प्रसिद्ध करुन त्यावर एकाहुन अधिक वेळा जाहिरातीचे पैसे वसूल करू लागली आहेत. तिसर्‍या टप्प्यात कमरेचे आणखी खाली सोडून म्हणजे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे ऑनलाईन विक्री करणार्‍या पोर्टल्सवरील डिस्काउंट सेलच्या जाहिराती, बातम्या म्हणून छापू लागली आहेत. बाजारात आलेल्या प्रत्येक मोबाईलची ’फीचर्स लीक झाली’, ’व्हिडिओ लीक झाला’ ही बातमी म्हणून छापत उत्पादकाकडून जाहिरातीचे पैसे वसूल करु लागली आहेत.

या पोर्टल्सवर पाहिले तर एक बातमी/लेख वाचून झाला की तळाला पोचताच लगेच दुसरा लेख चालू होतो. जगभरातील वेबसाईट्सवर ही युक्ती वापरली जाते. ’ते वाचून झाले, आता हे ही वाचा’ असे अप्रत्यक्षपणे उद्युक्त करुन वाचकाला आपल्या वेबसाईटवर आणखी वेळ व्यतीत करण्यास भाग पाडले जाते. याचा संबंध पुन्हा टीआरपीशी आणि जाहिरात उत्पन्नाशी आहे. चलाख मराठी पोर्टल्सवर अनुभव असा की भले तुम्ही राजकारण, समाजकारण, क्रीडा कोणत्याही विषयाशी संबंधित बातमी वाचली असेल, ही खाली येणारी बातमी हटकून अ‍ॅमेझॉन वगैरेंच्या सेलची किंवा ’तंत्रज्ञान’ विभागातील बातमी म्हणून छापलेल्या मोबाईलच्या नव्या मॉडेलची असते. थोडक्यात त्यांच्या उत्पन्नाच्या गाडीला जाहिरातींची अशी अनेक एंजिने जोडलेली असतात.

फोटो-धमाल वगैरे नावाखाली फक्त बिकिनीवेष्टित(?) अभिनेत्रींची, मॉडेल्सची छायाचित्रे छापणेही सुरु झाले आहे. एका वृत्तपत्राच्या वेबसाईटवर तर संपूर्ण नग्न स्त्री-पुरुष मॉडेल्सचे परस्परांना मिठी मारलेल्या स्थितीतील छायाचित्रही छापले होते. कॅमेर्‍याकडे पाठ असल्याने, दोघांची जननेंद्रिये झाकून नग्नतेच्या आरोपातून निसटण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. मी मुद्दाम ते छायाचित्र उतरवून घेऊन फेसबुकवर टाकले, नि मराठी वृत्तपत्रांची पोर्टल्स वयात आल्याची उपहासगर्भ पोस्ट टाकली. अपेक्षेप्रमाणे फेसबुकने ते छायाचित्र नग्नतेचा शिक्का मारून काढून टाकले. अमेरिकन संस्कृतीमधील फेसबुकसारख्या माध्यमालाही जे आक्षेपार्ह वाटले, ते विकून टीआरपीचे चार-चव्वल कमावण्याची आमच्या ’मित्रपत्र’ पोर्टलची तयारी होती.

धंदेवाईकपणा हा एक निसरडा रस्ता (slippery slope) आहे हे त्यांना ठाऊक नाही असे मुळीच नाही. पण टीआरपी नि त्यातून मिळणार्‍या पैशापुढे सारे काही क्षम्य आहे या मतापर्यंत ती पोचलेली आहेत. All is fair in love and war या म्हणीला त्यांनी All is fair in love, war and TRP असे बदलून घेतले आहे.

Fifteen%20million

'ब्लॅक मिरर’ या विज्ञान-काल्पनिकेच्या ’फिफ्टिन मिलियन मेरिट्स’ या एपिसोडमध्ये माध्यमांच्या धंदेवाईकपणावर भाष्य केले आहे... चॅनेल माध्यमात असणारे हे टीआरपीचे गणित आता वास्तव जीवनात येऊन बसले आहे. चलन नावाचा प्रकार नाहीसा होऊन त्याची जागा टीआरपीसदृश गुणांनी घेतली आहे. वेगवेगळी कामे करत हे गुण जमवायचे नि त्याआधारे जगण्यातले हवे ते मिळवायचे असे या जगात घडते आहे. ते ही मिळेलच असे नाही. आंघोळीच्या साबणासारख्या, कॉफीच्या एका कपासारख्या किमान गरजेच्या गोष्टी विकत घेण्यासाठी प्रथम काम करुन पुरेसे गुण मिळवावे लागतात.

कुणी कुठले कार्यक्षेत्र निवडावे हे कुणी संचालक निश्चित करत असतात. ते निवडण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला नसते. गायिका होण्यास आलेल्या एका स्त्रीला पोर्नोग्राफी म्हणजे लैंगिकसंबंध चित्रित करणार्‍या चित्रपटांमध्ये अभिनेत्री होण्यास फर्मावले जाते. या गुलामगिरीविरोधात संतापलेला कुणी ’बिंग’ तिरमिरीसरशी जाऊन त्वेषाने संचालकांना सुनावतो.

पण चतुर संचालक त्याचा हा विद्रोहच ’विक्रीयोग्य’ आहे ओळखतात. त्याला चॅनेलवर विद्रोही कार्यक्रम करण्यास निवडले जाते. सदैव कशा न कशा विरोधात आक्रमक विद्रोहाची त्याची भाषणे विकली जाऊ लागतात, प्रेक्षकांना आवडू लागतात. विद्रोहाचीच क्रयवस्तू होऊन संचालक आणि बिंग दोघेही त्याचा फायदा लुटू लागतात.

आपल्याला त्रासदायक असलेली, पण जी बदलणे आपल्या कुवतीच्या बाहेरचे आहे अशी परिस्थिती बदलण्याचा एल्गार कुणीतरी करतो आहे, हे पाहूनच सामान्य माणसांच्या मनावरील ताण हलका होतो. मग त्या माणसावर भार टाकून ती निश्चिंत होतात. म्हणूनच प्राचीन काळात जन्मलेल्या देव-संकल्पनेपासून सुरू होऊन चित्रपटांतील ’अ‍ॅंग्री यंग मॅन’च्या गोष्टींपर्यंत आणि एखाद्या राजकारणी नेत्याच्या देशाला महासत्ता बनवण्याच्या वल्गना हातोहात विकल्या जातात... बिंगच्या चौकटबद्ध विद्रोहासारख्या.

उत्क्रांतीच्या सर्वात अर्वाचीन टप्प्यावर 'आपल्याला जगातलं सग्गळं कळतं' असं समजणारी मॅनेजर ही प्रजाती निर्माण झाल्यावर सारे व्यावसायिक निर्णय तिच्या मुठीत एकवटले गेले आहेत. बाजारातले सारेच विषय पाच-पाच गुणांसाठी शिकलेली ही मंडळी त्या सर्वच विषयांतले तज्ज्ञ असल्याच्या थाटात वावरू लागली आहे. केवळ नफ्याचे आकडे वाढवणे या एकमेव निकषांवर निर्णयांचे गोंधळ घालू लागली आहे. त्यामुळे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात गुणवत्ता विरलेली साडी नेसून माजघरातल्या अंधारात दिवस दिवस कंठू लागली आहे, आणि धंदेवाईकता चेहरा रंगवून टेलिव्हिजनच्या रंगीत खिडकीत बसून प्रेक्षकांना डोळे मारू लागली आहे.

गुणवत्तेपेक्षा विक्रीमूल्य अधिक महत्वाचे ठरल्यावर, माध्यमांनी काही नवे देण्याचा, लोकांच्या लोकांची अभिरुचीला नवी वाट दाखवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वत:लाच त्यांच्या वर्तुळात बंदिस्त करुन घेऊन त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालत आवस मागितल्यासारखे 'पैसे वाढा वं माय' म्हणायला सुरुवात केली आहे.

आणि हे चालू असताना 'वादंग झाला म्हणून' इंडियन आयडॉल पाहायला जाणारे, चटपटीत शीर्षक पाहून बातमी वाचण्यासाठी क्लिक करणारे, ’सावित्री-ज्योती’ऐवजी एका नवर्‍याच्या चार बायकांची मालिका पाहणारे, बिंगशी बांधिलकी जाहीर करण्याऐवजी, त्याचा विद्रोह स्क्रीनवर पाहून ’वा: छान’ म्हणून आपापल्या कामाला लागणारे प्रेक्षकही या पापात तितकेच वाटेकरी म्हणावे लागतील.

- oOo -

पुढील भाग >>  माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’


हे वाचले का?

शनिवार, २६ जून, २०२१

आपले गिर्‍हाईक कोण?

पूर्वी पुण्याच्या कर्वेनगर भागात राहात असतानाची गोष्ट आहे. चौकात एक कळकट हॉटेल होते. जेमतेम चार बाकडी बसतील इतकी जागा पुढे, आत एक माणूस कसाबसा उभा राहील नि बाजूला एक लहानसे टेबल बसेल इतपत जागा ’किचन’ म्हणून. हॉटेल नावालाच, कारण सतत उकळणारा चहा, आदल्या दिवशी संध्याकाळी केलेले वडे, मिसळ, दगड झालेली इडली आणि सांबार असे अक्षरश: एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके पदार्थ तिथे मिळत. आमच्या ’बिडी’वाल्या मित्रांना शेजारच्या पानवाल्याकडे सिगारेट मिळे. मग त्यांची सिगारेट नि आम्हा 'फुंकसंप्रदायी' नसलेल्यांसाठी हॉटेलातून मागवलेला चहा यावर तिथे चकाट्या पिटणे चालत असे.

Shivdeep

हॉटेलचा मालक एक पैलवान होता (अगदी सुरुवातीच्या काळात होटेलच्या नावाखाली ’पैलवानाचे हॉटेल’ अशी ठसठशीत टॅगलाईनही होती.) नि त्याच्याहून निम्म्या उंची-रुंदीचा त्याचा धाकटा भाऊ बहुतेक वेळा हॉटेलात असे. हा भाऊ एकदम गप्पिष्ट. त्याचं नाव तात्या. त्याच्याशी गप्पा मारता मारता ’थांबा आधीचा उकळलेला चहा नको, तुम्हाला नव्याने बनवून देतो’ पर्यंत चांगली दोस्ती झालेली. एकदा त्याच्याशी गप्पा मारताना समजले, की त्या हॉटेलवर तिघा भावांचे संसार तर आरामात चालतातच, पण तिथे कर्वेनगरमध्येच त्यांनी छानपैकी प्रॉपर्टी बनवून ठेवली आहे. आमच्या त्यावेळच्या घराची लीज संपत आली म्हणून नवे घर शोधताना त्याने त्यातील एक घर दाखवायला नेले होते. आसपासच्या वस्तीच्या तुलनेत ते आरसीसी स्ट्रक्चरचे, अ‍ॅल्युमिनिअम विंडो नि ऑईल बाँड लावलेले घर एकदम ताजमहाल वाटत होते.

तसं पाहिलं हॉटेलचा दिवसभराचा धंदा हा एखाद्या सदाशिवपेठी उद्धट म्हातार्‍याच्या दुकानातील गोळ्या-बिस्किटांच्या विक्रीशी स्पर्धा करणारा होता... एकदम निवांत. पण संध्याकाळचे पाच-साडेपाच झाले की हॉटेल अंग झाडून धावू लागायचं. ज्याचा विस्तार थोरल्या भावासारखा सर्वांगीण न होता फक्त शरीराच्या मध्यभागातच झालेला होता, असा मालकाचा तिसरा भाऊ हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला तयार केलेल्या ओट्यावर भलीमोठी कढई ठेवून उभा राही. सायंकाळी साधारण साडेपाच ते नऊ या काळात तो तिथे दणादण बटाटवडे तळताना दिसत असे. सहापासून हॉटेलसमोर सायकलींची रांग लागे. शहराच्या विविध भागातून कर्वेनगर, शिवणे, उत्तमगर, वारजे, माळवाडी या भागात आपल्या वस्तीवर परतीच्या वाटेवर असलेले मजूर दोन दोन वडापाव खाऊन पुढे जात... तेच त्यांचे रात्रीचे जेवण!

तात्याशी एकदा बोलत असताना त्याने सहज सांगितले की या तीन तासांत सुमारे सहाशे ते सातशे वडा/वडापाव विकले जातात. तो आकडा ऐकून आमचे डोळे पांढरे झाले. ही वीसहून अधिक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे! तेव्हा जोशी वडेवाले वगैरे फिनोमेना नव्हते. त्यांच्या सधनपणाचे रहस्य तिथे उलगडले. पण किस्सा इथे संपत नाही.

एकदा तात्याला डिवचण्यासाठी म्हटले. ’तात्या, तुम्ही बंगला बांधला, फ्लॅट घेतले. मग हे हॉटेल असे कळकट का? किती वर्षांपूर्वीची आहेत ती बाकडी? कोपरे उडालेत, मायका निघालेला, भिंती पण ओशट झालेल्या आहेत. जरा सगळे नवीन करा, माणूस ठेवून रोजचे रोज स्वच्छता करा, म्हणजे हॉटेल आणखी चालेल.’ त्यावर तात्या गुदगुल्या केल्यासारखा हसला नि म्हणाला, "दादा, अहो संध्याकाळच्या तीन तासांत मला पैसे मिळवून देणारे लोक आहेत कष्टकरी समाजाचे. मी हॉटेल चकाचक केले तर त्यांना ते परके वाटेल. ( फाइव-स्टार होटेलमध्ये मला येणारा न्यूनगंड, आपण इथे उपरे आहोत अशी येणारी भावना आठवली नि त्याचे म्हणणे लगेच पटून गेले.) शिवाय हे सर्व केले तर माझा मासिक खर्च वाढेल, तो वसूल करताना मला वडापावची किंमत वाढवावी लागेल. दिवसाला अडीचशे रुपये मिळवणार्‍या माझ्या गिर्‍हाईकाला ते परवडेनासे होईल. हॉटेल जसे आहे तसे राहणे हेच बरोबर आहे. तुमच्यासारखी मंडळी काय किंवा आसपासच्या बंगल्यातली मंडळी काय, इथे हॉटेलात न बसता पार्सल घेऊन जातील; कारण आमचा वडा सर्वांना आवडतोच. मग माझा खर्च वाढवणारा, खप कमी करणारा हा उपद्व्याप का करु मी?" त्याचा मुद्दा बिनचूक होता, मुकाट्याने मान डोलावण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते.

तात्याच्या या दृष्टिकोनाच्या नेमके उलट उदाहरणही मला माहित आहे. चार-पाच वर्षांपूर्वी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर असलेले पुस्तकाचे प्रसिद्ध दुकान ’पॉप्युलर बुक हाऊस’ कायमचे बंद झाल्याची बातमी आली. दोन दशकांपूर्वी पुस्तक आणि सीडी-खरेदीसाठी मी त्या दुकानावर अवलंबून होतो. पुणे विद्यापीठातून परत येताना डेक्कन जिमखान्यावरुन बस बदलावी लागत असे. त्यामुळे अप्पा बळवंत चौकात ’रसिक’ला जाण्यापेक्षा तिथेच पॉप्युलरमधे जाणे सोयीचे होते. पण त्याशिवाय विक्रेत्याचे अगत्य हे ही एक कारण होते. पुस्तकांच्या जाहिरातीसाठी ईमेल बुलेटिन वापरणारे पॉप्युलरचे गाडगीळ हे पहिलेच असावेत. ’या आठवड्यात आलेली पुस्तके’ अशा सब्जेक्ट लाईनची ईमेल दर आठवड्याला येई. इतकेच काय पण अमुक एक सीडी वा पुस्तक हवे असेल, नि ते उपलब्ध नसेल, तर ते मागवून घेऊन फोन करुन कळवलेही जाई. अधिक संख्येने पुस्तके असूनसुद्धा अव्यवस्था, धूळ यांमुळे पाऊल टाकण्यास नकोसे वाटणार्‍या जवळच्या 'इंटरनॅशनल बुक हाऊस'च्या तुलनेत स्वच्छता नि नेटकेपणा हा ही एक महत्वाचा सेलिंग पॉईंट होता.

PopularBookHouse

काळ पुढे गेला तसे गाडगीळांनी बिजनेस मॉडेल हळूहळू बदलत नेले. दुकानाची मागची बाजू प्रथम इंग्रजी पुस्तकांनी भरली. मग काही रॅक्सवर केवळ महाविद्यालयीन उपयोगाची तांत्रिक पुस्तके आली. यथावकाश संगणकासंबंधी पुस्तके अवतीर्ण झाली. त्यांनी तर काही काळ इतका धुमाकूळ घातला, की इंग्रजी साहित्याच्या पुस्तकांनाही एक रॅक रिकामी करुन देऊन माघार घ्यावी लागली. या सार्‍या प्रकारात मराठी पुस्तकांसाठी एका कोपर्‍यातील दोन रॅक्स तेवढ्या उरल्या होत्या. मग सीडीज आल्या. दुकानाच्या डोक्यावर खेळण्यांचे दुकान सुरु झाले. एकुणात पुस्तकांच्या दुकानाचा पुस्तके आणि इतर अनेक गोष्टींचा मॉल झाला. यातून दुकानाचा चेहराच नाहीसा झाला. दुकानात सगळ्या प्रकारची पुस्तके आहेत, पण त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या पुस्तक-संख्येवर मर्यादा आल्या. मग नेमके हवे असलेले पुस्तक नाही हा प्रकार वारंवार घडायला लागला. आजच्या गुगलच्या नि व्हॉट्स-अ‍ॅपच्या जमान्यात माणसांच्या माहितीचा विस्तार वाढला, पण खोली कमी झाली आहे. ’पॉप्युलर’बाबत अगदी तसेच घडले. सर्व प्रकारची पुस्तके मिळतात, म्हणून कोणत्याही पुस्तकाची गरज असलेल्या लोकांची पावले तिकडे वळू लागली. पण हवे ते पुस्तक मिळण्याची शक्यता कमी आहे, हे ध्यानात आल्यावर पर्यायांच्या शोधात निघाली.

पॉप्युलर जरी अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा, संगणक विषयांची अद्ययावत पुस्तके विकत असले, तरी त्यांचे दर विद्यार्थ्यांना परवडणारे नसत. त्यातच या विद्यार्थ्यांना किफायतशीर भावात पुस्तके विकण्यासाठी अप्पा बळवंत चौकातील आणि कॅम्पमधील काही चतुर पुस्तक विक्रेत्यांनी अनोखे बिजनेस मॉडेल राबवायला सुरुवात केली. नवे पुस्तक विकत घेताना पूर्ण किंमत देऊन विकत घ्यायचे, वापरुन झाले की त्याच दुकानात परत करायचे नि त्याबदली साठ टक्क्यापर्यंत पैसे परत घ्यायचे. ही परत आलेली पुस्तके पुन्हा नव्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के भावात विकायची. आता गरीब विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक विकत घेण्यासाठी जुनी पुस्तके धुंडाळत वणवण करण्याची गरज संपली. 'नवे पुस्तक का जुने?' हा पर्याय एकाच दुकानात उपलब्ध झाला. त्यांनी तो आनंदाने स्वीकारला.

चलनी नाणे झालेल्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना अधिक उठाव असेल या अपेक्षेने चटकन तो नवा मार्ग स्वीकारलेल्या पॉप्युलरचा हा ग्राहक तिकडे फारसा फिरकेनासा झाला. आता सोवळे सोडले नि ओवळेही निसटले अशी स्थिती झाली. या दरम्यान दीक्षितांच्या इंटरनॅशनलची मालकी 'बुकगंगा' या ऑनलाईन विक्री करणार्‍या कंपनीकडे गेली. त्यांनी त्याचा व्यवस्थित जीर्णोद्धार केला. तिथे पुस्तकसंख्या बरीच असल्याने हवे ते पुस्तक मिळण्याची शक्यता वाढली आणि तिथून जेमतेम अर्धा कि.मी.वर असलेल्या पॉप्युलरला घरघर लागली. थोडक्यात सांगायचे तर ’इफ यू वॉण्ट टु प्लीज एवरीवन, यू एण्ड अप डिस्प्लिझिंग एवरीवन’ हे पॉप्युलरच्या बिजनेस मॉडेलचे सार म्हणता येईल. बदलांचा स्वीकार करायला हवा, पण तो डोळस हवा. अन्यथा बदलांचा अतिरेकी हव्यासही तुमच्या पतनास कारणीभूत होऊ शकतो हे या उदाहरणाने स्पष्ट झाले.

'आपले गिर्‍हाईक कोण?' हे व्यावसायिकाने ओळखणे आणि त्या गटाच्या दिशेने तोंड करुन व्यवसाय सुरु करणे हा यशस्वी व्यवसायाचा पाया आहे. आपले उत्पादन कुठले आहे, त्याची गरज कुणाला आहे, तो गट त्या उत्पादनविक्रीतून पुरेसा नफा मिळवून देऊ शकतो का, याचा अदमासही व्यवसायाच्या सुरुवातीलाच उत्पादकाला घ्यावा लागतो.

याच धर्तीवर विक्रेत्याला विक्रीसाठी कोणती जागा निवडावी याचाही विचार करावा लागतो. पुण्यातील अन्य एका प्रसिद्ध पुस्तक-विक्रेत्यांशी बोलताना त्यांनी त्याबाबत काही बारकावे मला सांगितले होते. मुख्य रस्त्याच्या दोनपैकी एका बाजूला बराच अधिक व्यवसाय होतो हे त्यांच्याकडून मला समजले. त्याची कारणमीमांसा त्यांनी केली होती. माणसे रोजगाराच्या दिशेने जाताना पुस्तके खरेदी करण्यासाठी रेंगाळत नाहीत, परतीच्या वाटेवर मात्र त्यांना वेळ असतो नि म्हणून त्या वाटेवर विक्री अधिक होते. तेव्हा रोजगारासाठीच्या प्रवासाची दिशा समजून घेणे आवश्यक असते. सकाळच्या घाईत घरी जेवण बनवणे शक्य न झाल्यास, जाताजाता दुपारसाठी जेवण बांधून नेणे सोयीचे पडत असल्याने पोळीभाजी केंद्रे पुस्तकविक्रीच्या नेमक्या उलट बाजूला अधिक चालतील. अशाच खाचाखोचा इतर व्यवसायांबाबतही असाव्यात.

पण केवळ व्यवसायांसाठीच हे आडाखे कामात येतात असे नव्हे. गैरव्यावसायिक क्षेत्रातही अर्थकारणाचे हे पैलू दिसतात. एक ठळक उदाहरण म्हणजे आपले प्रधानमंत्री मोदींचेच घेता येईल. बहुतेक निवडणुकांमधून त्या मतदारांच्या गटाच्या अस्मिता कुरवाळण्यासाठी त्यांच्यावरील कथित अन्यायाचे पाप कुणावर तरी फोडत आहेत. आणि हे साध्य करण्यासाठी दडपून खोटे बोलत आहेत. समाजमाध्यमांवरचे स्वयंघोषित मोदीविरोधक तंत्रज्ञानाच्या, माहितीच्या आधारे त्यांचे ते खोटे बोलणे उघडेही पाडत आले आहेत. आपण जे खोटे बोलतो, समाजाच्या एका जागरुक, माहितगार गटामध्ये आपले त्याचे हसे होते हे आज दोन मोठ्या विजयांनंतरही मोदींना समजले नसेल का? तेवढे चाणाक्ष ते नक्कीच आहेत. संपूर्ण देशाच्या राजकारणाचा प्रवाह बदलण्याची कुवत असलेले नेते आहेत. पण तरीही ते बदलत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांनी आपले होटेल चकाचक न करता, हेतुत:, तात्यासारखीच आपल्या होटेलची कळा राखली आहे... कारण त्यांच्या गिर्‍हाईकाला तिथे ’घरच्यासारखे' वाटते!

ModiGathering

ते तुमच्या-आमच्याशी नव्हे तर त्यांच्या सभेला आलेल्या, त्यांचे संभाव्य मतदार असलेल्या, तात्कालिक भावनिक प्रवाहात वाहात जाणार्‍या, ज्यांना भूतकाळातील आपला कुणी तरी माणूस भारी होता एवढा अभिमान पुरेसा आनंददायी असतो, अशांशी बोलत असतात. त्या कुण्या श्रेष्ठीला पुरेसे श्रेय न मिळण्यामागे कुणीतरी दुष्ट लोक कारणीभूत होते हे ऐकायला आवडते.

हा मोठ्या संख्येने आलेला मतदार मोदी बोलले ते बरोबर की चूक हे शोधायला जाणार नसतो. कदाचित उद्या त्याला कुदळ-फावडे घेऊन रोजंदारीवर जायचे असते, किंवा दुकानासाठी माल भरायला पहाटेच जायचे असते. एखाद्या घरच्या गृहिणीला पहाटे उठून पोरांना शाळेसाठी डबा करून द्यायचा असतो, कदाचित स्वत:देखील कामावर जायचे असते. या सामान्य जगण्यातील मोठ्या विवंचना सोडून, मोदी बोलले ते बरोबर होते की चूक याची ते उठाठेव करत नसतात.

मोदींनी हे अचूक ओळखले आहे. त्यांचे मतदार बहुसंख्येने असेच आहेत की ज्यांना समाजातील वाईट बाबींबाबत कुणावर तरी खापर फोडायला आवडते. इतिहासातील गैरसोयीच्या, न आवडलेल्या गोष्टी या ’अशा नाही तशा असत्या तर किती बरं झालं असतं’ असं त्यांना वाटत असतं. अशा वेळी 'त्या तशा आहेतच’ असं ठासून सांगणारा, नि एखाद्या मोठ्या पदावर असलेला मोदींसारखा माणूस त्यांना त्यांच्या अपेक्षांना, धारणांना, आकांक्षांना मूर्त रुप देण्यास मदत करतो. ’आम्ही तुमच्यासारखे शिकल्यालं अडानी न्हाई’ हे वाक्य ऐकवणार्‍या, प्रत्यक्षात आपल्या अशिक्षितपणाचा न्यूनगंड पुसू पाहणार्‍यांसारखी त्यांची अवस्था असते.

मोदींसारखे बोलभांड नेते अशा न्यूनगंडांना नेतृत्व देतात, त्या न्यूनगंडातून आक्रमक विध्वंसकता जन्माला घालतात; जेणेकरुन ज्यांच्याबाबत न्यूनगंड आहे त्यांचे नुकसान करुन त्या गर्दीला ’जिंकल्याची’ भावना जोपासता येते. त्यांना प्रतिष्ठा नकोच आहे, त्यांना हवे आहे ते गर्दीचे नेतृत्व! आणि ते कसे राखायचे हे त्यांना चोख ठाऊक आहे, कारण गर्दीची मानसिकता त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते जे बोलतात ते बरोबर की चूक हा प्रश्न गैरलागूच आहे, 'ते बोलणे त्यांनी जमवलेल्या गर्दीला रुचते की नाही?' एवढाच विचार ते करतात.

त्यांना 'सत्यमार्गी' हे बिरूद नको आहे, त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचे नाहीच. त्यांना निवडणुकीत समोरच्या व्यक्तीचे मत हवे आहे, सत्ता हवी आहे. आणि ती मिळावी म्हणून 'तू किती भारी, तुझा गट किती भारी आणि त्या अमक्याने किंवा त्यांच्या गटाने तुमच्यावर कसा अन्याय केला' अशी सहानुभूती दाखवणार्‍या गोष्टी रचून सांगत असतात. त्याबद्दल बुद्धिजीवींकडून खोटारडे म्हणवून घ्यायची त्यांची तयारी असते. कारण या तोट्यापेक्षा होणारा फायदा अधिक महत्वाचा असतो आणि एकुण ताळेबंद जमेच्या बाजूला शिल्लक दाखवत असतो.

व्याख्याने, लेख, विचार वगैरेंच्या मार्गाने जाऊन त्यांचे मूल्यमापन करणार्‍यांनी, त्यांना विरोध करणार्‍यांनी हे समजून घेण्याची गरज आहे. सत्तेचे गणित सद्गुणांवर, चुका सुधारण्यांवर नव्हे तर मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. आणि मतदार, कार्यकर्ते हे स्वत:च स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यापेक्षा, प्रसंगी नियम मोडूनही (किंबहुना नियम मोडूनच) ’आपली कामे करणारा’ ’आपल्या गटाला’ धार्जिणा नेताच अधिक हवासा वाटत असतो. त्यालाच ते जवळ करत असतात.

म्हणून सत्तालोलुप होऊन या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे नेते आपल्याला हास्यास्पद वाटत असले, तरी अनेकदा त्यांची ती अपरिहार्यता असते. आपल्या आसपासचे ’कार्यकर्ते’ टिकवून धरण्यासाठी त्यांना सत्ता हवी असते. ते त्यांचे गिर्‍हाईक असते. आणि त्याला हवे ते देण्यासाठी सत्तेचा आधार त्यांना आवश्यक असतो. ’आम्ही आमच्या नेत्याचे समर्थक. मग तो या पक्षातून उभा राहो की त्या.’ असे म्हणणारे विधिनिषेधशून्य कार्यकर्ते अप्रत्यक्षरित्या त्याला ’सत्तेच्या जवळ असलास तर आमच्या कामाचा, नाहीतर आम्हालाही पर्याय आहेत’ असेच सुचवत असतात, पक्षांतराला उद्युक्त करत असतात.

एका समाजवादी मंत्र्याने आपल्या कार्यकर्त्याच्या मुलाला नोकरी/शाळेत अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी शिफारस देणे हा भ्रष्टाचार आहे म्हणून नाकारल्यानंतर, ’आपली कामे करत नाही, तो कसला नेता’ म्हणणारे कार्यकर्ते गमावल्याचे किस्से ऐकले आहेत. थोडक्यात काही दोषच सत्ताकारणात कामी येतात. त्याचे गणित तुम्हा-आम्हा सत्तेच्या बाहेरच्यांना समजणे अवघड असते.

’आपले गिर्‍हाईक कोण’ हे अचूक माहीत असणे हेच धंद्यातील यशाचे इंगित असते. हातचे सोडून पळत्या पाठी न धावण्याचे शहाणपण यश देऊन जाते. 'गिर्‍हाईकाचा संतोष हीच आमची संपत्ती’ हे ध्वन्यर्थाने नव्हे वाच्यार्थानेही खरेच असते, हे तात्याने शिकवले. ’पॉप्युलर’च्या, मोदींच्या उदाहरणावरुन या धड्याचे चांगले आकलनही झाले.

बर्‍याच वर्षांनंतर पुन्हा तात्याच्या होटेलमध्ये गेलो होतो. आता शेजारचे दुकान घेऊन, मधली भिंत पाडून हॉटेल मोठे केले आहे. चार ऐवजी सहा टेबल्स आहेत; बाहेरही दोन टेबल आहेत नि शेजारी एक तारेने लटकवलेले बेसिनही. पैलवानाचा फोटो भिंतीवर हार घातलेल्या स्थितीत पाहिला, त्याचा पूर्वी इथे-तिथे लुडबुडणारा छोटा मुलगा आता बापाच्या आकाराचा होऊन त्याच्याच जागी गल्ल्यावर बसला होता. हॉटेलची कळा मात्र अजून तशीच आहे. 

कर्वेनगरच काय पण वारजे, माळवाडी, उत्तमनगर, शिवणे या सार्‍या मजूर-वस्त्यांच्या जागी पांढरपेशी घरे उभी राहून अनेक वर्षे उलटली आहेत. तात्या भेटता तर हॉटेलची संध्याकाळची गिर्‍हाईके आता कुठे गेली हे त्याला विचारले असते. परिस्थिती बदलली, वस्ती बदलली, की गिर्‍हाईक नवे दुकान शोधते. हा धडा तात्याला मिळाला की नाही ते माहीत नाही, पॉप्युलर बुक हाऊसला नक्कीच मिळाला; राजकारणात काँग्रेसही एव्हाना शिकली असावी अशी आशा आहे.

- oOo -

(सदर लेख प्रथम ’मिळून सार्‍याजणी’ मासिकाच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात भर घालून, थोडे संपादित करुन इथे प्रकाशित केला आहे.)


हे वाचले का?