रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ५ : खेळ सावल्यांचा

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

आपल्या पक्ष्याचा शोध << मागील भाग

---

माणसाचे मूल जन्मत: परावलंबी असते. सुरुवातीचे काही महिने ते पूर्णपणे आई-वडिलांच्या निर्णयांच्या नि कृतीच्या अधीन असते. काय खावे, केव्हा खावे, काय परिधान करावे वगैरे किमान निर्णयही पालकांच्या अधीन असतात. पुढे मूल बसते, चालते झाले की त्याला स्वत:च्या निर्णयाने जागा बदलता येते– पण तरीही त्या निवडीला घराचे भौतिक बंधन असतेच. त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्याहून अधिक काळ पालकांच्या अधीन असतो. या टप्प्यातच त्याचा घराबाहेरील सजीव निर्जीव गोष्टींशी परिचय होत जातो. परिचय दृढ झाला की त्यातून त्यांच्याशी बंध वा नाते प्रस्थापित होत जातात. आणि असे बंध स्मरणांच्या स्वरूपात त्याच्यासोबत मनात नि घरात प्रवेश करत असतात.

यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये बिम्म ‘मी कोण?’, ‘यापैकी मी कोण?’, ‘माझे कोण?’ या प्रश्नांना सामोरे गेला होता. सावल्यांचा वेध घेताना तो जन्मत:च मिळालेल्या नात्यागोत्यांच्या पलिकडे जाऊन स्वनिर्णयाने ती जोडण्याच्या– म्हणजे निवडीच्या टप्प्याकडे सरकतो आहे.

मांजराला किंवा एखाद्या लहान मुलाला प्रतिबिंबाइतकेच सावल्यांचेही कुतूहल असते. भिंतीला वा एखाद्या मोठ्या वस्तूला धरून मूल जेव्हा उभं राहतं तेव्हा त्याचा सावलीशी प्रथम परिचय होतो. त्यासाठी ते आकलनाच्या विविध टप्प्यांतून जात असते. यू-ट्यूब, इन्स्टाग्राम वा तत्सम ठिकाणी नुकत्याच बसू, चालू वा बोलू लागलेल्या बालकांचे आपल्या सावलीचा वेध घेणारे व्हिडिओ सापडतील. यात ती मुले आपल्याच सावलीबाबत भीती, वैताग, कुतूहल, आपुलकी अशा विविध भावना व्यक्त करताना दिसतात. सुरुवातीचा भीतीचा टप्पा ओसरल्यावर कुतूहलाचा टप्पा नि त्यातून झालेल्या आकलनाच्या टप्प्यावर ते पोहोचते.

मूळ वस्तू नि सावली यांचा परस्परसंबंध त्याला समजला नाही, तरी हळूहळू सावल्या वेगवेगळ्या आकाराच्या दिसतात हे त्याला समजू लागते. त्या काळ्या डागाला सावली म्हणतात हे त्याला समजत नसेल एकवेळ, पण स्वत:प्रमाणेच इतर हलत्या वस्तूंपाशी कधीकधी जमिनीवर एक हलणारा डाग दिसतो याचे त्याला आकलन होते. मग हलणार्‍याच नव्हे, तर स्थिर असलेल्या प्रत्येक वस्तूला अशी सावली असते हे त्याला समजते. त्यातून त्याच्या मनात वस्तू/व्यक्ती/जीव नि त्यांची सावली यांच्यातील परस्परसंबंधाची नि अतूट अशा अद्वैताची जाणीव निर्माण होते.

बिम्म या टप्प्याच्याही थोडा पुढे आलेला आहे. वस्तू/व्यक्ती/जीव नि त्यांची सावली हे जर वेगवेगळे असतील, तर त्याच्या कल्पनेच्या जगात त्याने त्यांना भिन्न अस्तित्वही बहाल केले आहे. सावलीला मूळ वस्तूशिवाय असलेले अस्तित्व आणखी पुढे नेऊन तिला मूळ वस्तूशिवाय हालचालीचे, स्थानांतर करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे.

थोडा विचार केला तर हे अगदीच हास्यास्पद नाही असे लक्षात येईल. ते मूल कपडे घालतं, बुटु घालतं, टोपी घालतं तसंच स्वेटर, रेनकोटही. काम झाले की हे सारे त्याच्या शरीरापासून दूर होऊन कपाटासारख्या जागी जाऊन बसतात, हा अनुभव त्याच्या जमेस असतो. मग ‘केवळ उजेडातच जिचे काम आहे, ती सावलीही काम संपले की दुसरीकडे जाऊन बसते’ असा विचार केला, तर तो वास्तव नसला तरी तर्कसंगत म्हणावा लागेल. बिम्मच्या वयाच्या मुलाच्या संदर्भात तर्कसंगत हा शब्द तसा जड होईल, पण माहिती-विश्लेषणाच्या(Data Mining) तंत्रात ज्याला ‘साधर्म्यसंगती’(association rule) म्हणतात तसे नक्कीच म्हणता येईल.

सावलीला स्वतंत्र अस्तित्व बहाल करणे ही अगदीच दुर्मिळ कल्पना नाही. अद्भुत-कथांमधून ती अनेकदा वापरली गेली आहे. डिस्ने स्टुडिओज्‌च्या ‘डकटेल्स’ चलच्चित्रमालिकेमध्ये ‘अंकल स्क्रूज’ नावाचा एक कंजूष धनाढ्य आहे. त्याची शत्रू असलेली कुणी ‘मॅजिका’ नावाची जादूगार आपल्या सावलीला स्वत:पासून वेगळे करुन स्क्रूजचे लकी नाणे चोरण्यास पाठवते. ही सावली असल्याने स्क्रूजची सारी अद्ययावत सुरक्षा यंत्रणा तिच्यासमोर कुचकामी ठरते अशी कल्पना एका भागामध्ये रंगवलेली आहे. माझ्या आठवणीत राहिलेली आणखी एक सावली आहे ती डिस्नेच्याच ‘स्नोव्हाईट अँड द सेव्हन ड्वार्फस्‌’ या प्रसिद्ध चलच्चित्रपटातील.

प्रसंग असा आहे की, सात बुटके आपल्या कामावरून परतले आहेत. दार उघडताच वरच्या मजल्यावर काहीतरी/कोणीतरी आहे याची चाहूल त्यांना लागते. आता वर जाऊन पाहणे आले. तू जा, तू जा करता-करता अखेर एक बुटका मेणबत्ती घेऊन वरच्या खोलीचे दार हळूहळू उघडतो. दार उघडत असता, आतील बाजूस उजेड जसजसा प्रवेश करतो, तसतसे आतल्या बाजूस पडलेली दाराची सावली माघार घेताना दिसते. बुटका प्रथम हातातील मेणबत्ती हळूहळू आत सरकवतो. त्याबरोबर जमिनीवर त्याच्या हाताची, मेणबत्तीची सावलीही आत सरकते.

अज्ञाताच्या भीतीने थरथरणार्‍या त्या बुटक्याच्या हातातील मेणबत्ती थरथरत असते. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याला अनुसरून भिंतीवरची दाराची आणि जमिनीवरची दिव्याची नि त्या बुटक्याची सावलीही थरथरत असते. (संगणकपूर्व जमान्यातील त्या चलच्चित्रपटात इतके कलाकुसरीचे काम पाहून मी ताबडतोब मनातल्या मनात त्यांना कुर्निसात करुन टाकला होता.) तुमच्या मनातील भावनांचे प्रतिबिंबही तुम्हाला दिसणार्‍या त्या सावल्यांमध्ये पडत असते... आठवणींचेही असेच असते!

AnimalShadows
https://emmaowl.com/animal-shadow-drawing/ येथून साभार.

आता सजीव, निर्जीव व्यक्तींच्या सावल्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे हे मान्य केले. मग बिम्म काय करतो, तर अशा बर्‍याच वस्तूंच्या, व्यक्तींच्या, प्राण्यांच्या सावल्याच गोळा करून आणतो. एका भिंतीजवळ उभा असलेल्या पांढर्‍या वासराची, एक वाकडे पाय करून उभ्या असलेल्या टांग्याच्या घोड्याची आणि तारेवर बसलेल्या चार चिमण्यांची जमिनीवर पडलेली सावली उचलून आणतो. पूर्वी एकदा तो रस्त्यावरून कुत्र्याच्या एका छोट्या पिलाला– ‘पिट्टू’ला – घेऊन आला होता, तेव्हा त्याची तिथेच राहून गेलेली सावलीही घेऊन येतो. बिम्मचे कुतूहल आता स्वत:चा परीघ सोडून इतरांचा वेध घेऊ लागले आहे.

आपण भानावर असू, तर ही वाचता वाचता यातील गर्भित मुद्दा आपल्या ध्यानात येईल. सावली हे एकप्रकारे आठवणीचे रूपक आहे. या सार्‍यांना बिम्म कुठे न कुठे भेटला आहे, त्यांच्या संदर्भातील आठवणींच्या सावल्या त्याच्या मनात पडलेल्या आहेत. प्रकाशाचा कोन बदलल्यावर अथवा तो नाहीसा झाल्यावर वास्तविक सावल्या लुप्त होतात. तशाच या आठवणींच्या सावल्या– तो त्यांच्या पुन्हा संपर्कात आला नाही– तर कालानुक्रमे विरत जाणार आहेत. आपल्या बिम्मला वाचून ही गोष्ट दाखवत असता त्याच्या आई अथवा बाबांसाठी हा अन्वयार्थ ठेवून दिला आहे.

आणखी एका दृष्टीने पाहिले तर सावल्या हे अप्राप्य गोष्टींचे रूपक म्हणूनही पाहता येईल. वासरू असो, घोडा असोत की चिमण्या, हे सारे कायम आपल्यासोबत असावेत असे बिम्मला वाटत असावे. पण वास्तवात ते शक्य नाही. मग निदान त्यांच्या सावल्या आपल्याजवळ असाव्यात, म्हणजे अप्रत्यक्षपणे ते आपल्या आयुष्यात राहतील असा त्याचा कयास असेल. आपणही जे आवडले पण प्राप्य नाही, त्यांची छायाचित्रे (photo), चित्रे, भित्तीचित्रे (poster) या स्वरूपात आपण त्यांना जवळ करत असतो. तरुण वयात आवडलेला हीरो अथवा हीरोईन, एखाद्या आदरणीय व्यक्तीचा फोटो, सही वा त्यांच्याशी संबंधित जड वस्तूंना त्यांचे प्रतीक म्हणून आपण सोबत ठेवत असतो.

खरंतर हे रूपक बिम्मपेक्षा त्याच्या आईवडिलांना अधिक नेमके समजेल. दिवंगत आई, वडील वा आजी, आजोबा आदिंचे फोटो भिंतीवर लावून माणसे अप्रत्यक्षणे त्यांना आपल्या आयुष्यात जागा देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या रोजगाराच्या ठिकाणी टेबलवर अथवा संगणकाच्या पडद्यावर आपल्या पत्नी/पती अथवा मुलांचे फोटो ठेवणारे तो निव्वळ तात्कालिक विरहदेखील त्यांच्या फोटोंनी भरून काढू पाहात असतात. वार्धक्यामध्ये दूर गेलेल्या मुला-नातवंडांचे फोटो सोबत बाळगणे हा ही याचाच प्रकार. काही जण आपल्या बालपणातील अनेक वस्तू जतन करून ठेवतात. इतकेच नव्हे तर तारुण्यातील काही हळव्या आठवणीही वस्तुरूपात साठवल्या जातात.

आज मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांचा पहिला शब्द, पहिले पाऊल यांपासून सुरूवात होत वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस या क्रमाने आठवणी फोटोबद्ध वा व्हिडिओबद्ध केल्या जातात. त्या भूतकाळाच्या सावल्याच तर असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आधार घेत असलेल्या सावल्या वेगवेगळ्या असतात. तेव्हा बिम्मने सावल्या जमा केल्या म्हणून त्याला हसण्याचे कारण नाही.

आता या सावल्या जमा केल्या खर्‍या, पण ‘आता त्यांचे करायचे काय?’ असा प्रश्न थोड्याच वेळात बिम्मला पडला असणार. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये अशा एकाच खेळात रमण्याचा काळ फारसा दीर्घ असत नाही. मग या ना त्या मार्गाने त्या सावल्यांपासून सुटका व्हायला हवी.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा बिम्मचा शर्ट, हा बिम्मचा रेनकोट अशा उल्लेखांतून बिम्मला अन्योन्य संबंधांचे प्राथमिक ज्ञान झाले आहे. बिम्मचा शर्ट वा रेनकोट बब्बी घालणार नाही की आई वा वडीलही. त्यांचे स्वत:चे कपडे असतात. ते बिम्म वापरत नाही. त्याचप्रमाणे ‘वासराची, घोड्याची वा चिमण्यांची सावली ही फक्त त्यांची आहे. ती बिम्मच्या उपयोगाची नाही’ अशी संगतीही त्याला लागत असेल. मग कपड्यांचे, रेनकोटचे वा पायीच्या बुटांचे निश्चित काम असते. गरजेच्या प्रसंगी ते नसतील तर बिम्मची अडचण होते, तशीच या प्राण्यांचीही होईल हे ही त्याला समजले असेल. त्यातून मग त्याने त्याच्या लहानशा मेंदूने या सावल्या नसतील तर या आपल्या प्राणिमित्रांना काय अडचण येईल याचा तर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.

मग ‘बिन-सावलीच्या वासराला त्याचे मित्र खेळायला घेत नाहीत’, ‘बिन-सावलीच्या घोड्याला टांग्याला कसे जोडणार’ म्हणून त्याचा मालक त्याला हाकलून देतो आहे, रात्री झोपताना पांघरायला चिमण्यांना त्यांच्या सावल्या हव्या आहेत... अशी विविध कारणे निर्माण करून तो त्या सावल्या ज्याच्या त्याला देऊन टाकतो. ज्याचे उपद्व्याप पाहून आईने त्याला लाकूड अड्ड्यावरच्या नारायणला देऊन टाकले होते, त्या पिट्टूची सावली गिरणीत जाईन तेव्हा त्याला देऊन टाकण्याचे आई कबूल करते.

पण आई गिरणीतून परत येते ती उतरलेला चेहरा घेऊन. आल्याबरोबर ओलावल्या डोळ्यांनी बिम्मला जवळ घेऊन ती बजावते, ‘आता यापुढे कध्धी कध्धी कुणाची सावली काढून आणायची नाही.’ बिम्मच्या खेळात, गंमतीजमतीत सहभागी होत असताना तिने असे अचानक भावुक का व्हावे असा प्रश्न पडू शकतो. इथे जी.एं.नी थोडेसे मोठ्यांच्या समजुतीवर सोडलेले आहे.

पिट्टूला लाकडाच्या वखारीतल्या नारायणला दिले होते. त्या वखारीत लाकडांच्या ढिगार्‍याजवळ खेळताना पिट्टूबाबत काही अघटित घडले असावे. ते बिम्मला समजू नये हे जसे त्याच्या आईला ठाऊक होते, तसेच ते बिम्मची कथा वाचणार्‍या आई-वडिलांनाही. सर्वच सावल्या– आठवणी या सुखद नसतात, काहींसोबत वेदनाही वास्तव्याला येत असते. बिम्मची गोष्ट वाचणार्‍या छोट्यांना ते समजू नये, पण त्यांच्यासाठी ती गोष्ट वाचणार्‍या त्यांच्या मोठ्यांना मात्र ते उमगावे इतके सूचक ते जी.एं.नी ठेवले आहे.

लहानांना नि मोठ्यांना दिसणारे, जाणवणारे जग कसे वेगवेगळ्या पातळ्यांवर असते. बिम्मचे कल्पना-वास्तवाच्या सीमेवरचे, तर आईचे वास्तवात घट्ट पाय रोवलेले. हे सारे पुस्तक अशा जाणिवेच्या दोन स्तरांवर लिहिले गेले आहे, ते तसेच अनुभवावे लागते. कल्पनेच्या पातळीवर जगताना उचलून आणलेल्या सावल्या बिम्म सहजपणे परत देऊ शकतो, पण पिट्टूसारख्या काही जणांची सावली मात्र त्याची आई परत देऊ शकत नाही. ती कायमची काळवंडून जात असते. त्या दोन जगातील हा फरक मोठे होताना बिम्मला समजून घ्यावा लागणार असतो.

(क्रमश:) पुढील भाग >> रंगांचे कोडे     

- oOo -


संबंधित लेखन

४ टिप्पण्या: