![TrueAndTruth](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxjIB3JUiiu4Rnu21ASSXMneCDVmyuje0WIM36pj0n8lgi30juwbTxWmat6gR4Vi2Z7nH7kVyrwjvmBGVM_VUsFJVQtc5p34jJ91xRPO_rdJYK1iENxyiiNzxT9O0fmcVvHwagB93f7v-9P_aNsLGK4lByr1ddWclvfJvMBnFqC31wC0JcZDlbuKEzzA/s320/WhatIsTruth.jpg)
"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत! भंडारा कधी काळा, राखेसारखा असतो होय? तो असतो हळदीचा पिवळा जर्द."
"मग काय!, हा पिवळाच आहे की!" भुत्याने खवचटपणे हसून म्हटले.
"अरे, हा तर अगदी राखेसारखा काळाढुस्स आहे." रामण्णाने अगदी नेटाने स्पष्ट सांगितले.
"हे बघ पंडित, तू म्हणतोस हा काळा आहे, मी म्हणतो हा पिवळा आहे. म्हणजे हा भंडारा काळाही असेल, पिवळाही असेल, होय की नाही? पण तू अगदी छातीवर हात ठेवून तो काळाच आहे असं कसं सांगतोस? पाव्हण्या, जरा आजूबाजूला बघ, आहे आणखी कोणी तिसरं माणूस? तर नाही... अख्ख्या जगात तू आणि मीच आहो. तू एका बाजूला, मी एका बाजूला. तुझ्या बोलण्याला माझ्या बोलण्याची टक्कर! तेव्हा हा भंडारा काळाच आहे हे तू कोणाच्या साक्षीने ठरवणार? समज, इथं माझ्यासारखाच आणखी एक आंधळा माणूस आहे. त्याच्या साक्षीत मी ठरवलं की भंडारा पिवळाच आहे, म्हणून तेवढ्याने लगेच भंडारा पिवळा होऊन बसणार होय?
"मला डोळे आहेत बघायला, तुला तसलं काही नाही. एक तिरळा माणूसदेखील शंभर आंधळ्यांपेक्षा बराच म्हणायचा की!" रामण्णा आत्मविश्वासाने म्हणाला.
"असतील, असतील! तुला डोळे आहेत हे आताच दिसलं की!" हसू दाबत भुत्या म्हणाला. "परंतु तू रंगांधळा नाहीस कशावरून? आणखी तुझ्यामाझ्यापेक्षा निराळा असा एक चांगला शहाणा देवमाणूस आहे. त्याचे डोळे निराळेच आहेत. त्याला शंभर रंग दिसतात. तो तुला काय म्हणेल ठाऊक आहे? अरे वेडपटच आहे हे मेंढरू! या असल्या रंगाला हे काळा रंग म्हणत बसलंय! हुच्च! हा खरा रंग आहे अमुक, म्हणून तो एक नवीनच रंग सांगेल. आता सांग भंडार्याचा नक्की रंग कोणता?"१
रोजच्या जगण्यात आपण 'सत्य' हा शब्द किती बेफिकीरीने वापरतो नि अमुक एक गोष्ट 'सत्य आहे', ’खरं आहे’ असे किती सहजपणे नि ठामपणे म्हणतो. रामण्णाचे पहा ना. आपल्या डोळ्यांबरोबरच माहिती नि जाण यावर त्याचा अगदी ठाम विश्वास आहे. समोरच्या आंधळ्यापेक्षा डोळस असलेल्या आपल्याला रंग अधिक चांगले समजतात हे त्याचे गृहितक. दोन-चार वाक्यातच स्वत: आंधळ्या असलेल्या भुत्याने त्याचे भ्रम दूर केले आहेत.
'मुळात काळा रंग नि पिवळा रंग म्हणजे काय?', 'हा काळा नि तो पिवळा असे सर्वांना ते सारखेच दिसतात काय?', 'त्याबाबत निश्चित विधान करू पाहणार्याच्या आकलनक्षमतेलाच मर्यादा असेल तर त्याचे मत गृहित धरावे का?', 'एखादे विधान केवळ बहुसंख्येच्या निकषावर ’सत्य’ या संज्ञेला पात्र ठरते का?', 'एखाद्याला अधिक सूक्ष्म जाण असेल तर त्याचे मत अधिक ग्राह्य की त्याच्या विरोधात जाणारे पण बहुसंख्येचे?', असे प्रश्न निर्माण करत रामण्णाला खात्री असलेले साधेसोपे ’सत्य’ त्याने संशयाच्या आवर्तात नेऊन सोडले आहे.
मु़ळात एखादी गोष्ट ’सत्य आहे’, ’खरी आहे’ हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? त्यामागे विचार-अनुभव असतो की प्रेरणा-गृहितकाचाच अधिक प्रभाव असतो? आपण खरंच सत्यान्वेषी असतो की सत्य नावाचे काहीतरी आपल्याकडे असायला हवे किंवा आहे या विचाराने भावनिकदृष्ट्या आश्वस्त होतो म्हणून आपण त्याबाबत आग्रह धरतो? जर सत्यान्वेषी असू तर आपले सत्य पडताळणीचे करण्याचे निकष कोणते असतात? त्यात अनुभव-विचार-विश्लेषण-पडताळणीचा मार्ग असतो की अन्य असंलग्न अशा घटकांचा आपल्या निर्णयावर परिणाम होतो? हे आणि असे अनेक प्रश्न सत्यशोधाच्या वाटेवर विचारले जायला हवेत, त्यांची उत्तरे शोधायला हवीत.
परंतु त्यापूर्वी सर्वसाधारणपणे सत्यनिश्चितीचे प्रचलित निकष काय हे पाहणे उपयुक्त ठरेल.
सत्य-निश्चितीचे प्रचलित निकष:
१. बरीचशी सत्ये स्वयंसिद्ध नि पडताळणीच्या/मूल्यमापनाच्या पलिकडची असतात असा समज असतो. कधीकाळी कोणीतरी अधिकारी समजल्या गेलेल्या व्यक्तींनी ती मांडलेली असतात आणि ती तशीच गृहित-सत्ये म्हणून स्वीकारायची असतात.
ओशोंनी अशा गृहित-सत्याचे एक उदाहरण दिले आहे. एकदा एक फादर प्रवचन देत होते. स्त्रियांबद्दल आपली भूमिका मांडताना ते म्हणाले "स्त्रियांना देवाने पुरूषांपेक्षा दुय्यम भूमिका दिली आहे. बघा ना त्यांच्या तोंडात बत्तीसहून कमी दात असतात." यावर ओशोंनी ताबडतोब तिथल्या तिथेच त्या तथाकथित सत्याची पडताळणी करावी अशी मागणी केली. अर्थातच ’पाखंडी’ अशी संभावना करून ती फेटाळली गेली.२ त्यामुळे पडताळणी शक्य असेलच तरी पडताळून पाहण्याचे स्वातंत्र्य असेलच असेही नाही.
२. आपला 'समज' हे आपण सत्य मानून चालतो. बरेचदा अमुक एक गोष्ट सत्य असावी असे आपल्याला वाटते तिला आपण सत्य मानून चालतो.
हे तर सत्यनिश्चितीचे सर्वाधिक प्रचलित रूप आहे. या प्रकारच्या सत्यांच्या(?) साठवणीस सारी पृथ्वी अपुरी पडावी इतके रांजण भरून ठेवलेले असतात. अमुक भागात राहणारे सगळे अमुक एका प्रकारच्या प्रवृत्तीचे’च’ असतात, अमुक शाळेतून/विद्यापीठातून/संस्थेतून शिकलेले व्याख्येनुसारच इतरांपेक्षा हुशार असतात, अमक्या जातीचेच लोक डोक्याने हुशार असतात. धार्मिक, पारंपारिक बाबतीत असले समज अधिक आढळून येतात. आपला धर्म अमुक बाबतीत असे सांगतो/असा आहे ’असा आपला समज असतो'. पण आपण तसेच 'आहे' असे ठासून सांगतो. अनेकदा धार्मिक म्हणवणारी मंडळी सांगतात त्याहून अगदी विपरीत असे सत्य/विधान मूळ ग्रंथांमधून आढळून येते.
असाच काहीसा प्रकार आपल्या रोजगाराबाबत असतो वा अभ्यासक्रमाबाबत. आपल्या रोजगारातच किती कष्ट वा ताण असतात ’तुम्हाला काय कळणार ते’ असे अन्य कोणत्याही रोजगार करणार्याला सांगून आपण आपले स्थान उगाचच उंचावण्याचा प्रयत्न करतो किंवा समोरच्याला लायकीहून अधिक वा त्याच्या श्रमाच्या वाजवी मूल्याहुन अधिक परतावा मिळतो असे ठसवू पाहतो. एंजिनियरिंगवाला तर आपलाच अभ्यासक्रम सर्वात अवघड आहे हे सांगतोच पण अन्य पदवी/शिक्षण घेणारा कोणीही - अगदी समाजशास्त्र, तत्त्वज्ञानापासून गणितापर्यंत कोणत्याही विषयात - आपलाच विषय शिकायला अवघड नि बाजारात ’मागणी’ असलेला आहे हे ठासून सांगत असतो. मुख्य म्हणजे या प्रकारात पडताळणी शक्य असून ते करण्याची इच्छा नसते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते गृहित-सत्य आपल्या स्वार्थाला अनुकूल असते.
अर्थात हे समज वा गृहित-सत्य नेहमीच स्वार्थप्रेरित असतील असेही नाही. अनेकदा निव्वळ पडताळणीच्या आळसामुळे म्हणा, अथवा प्रत्येक बाबतीत आपल्याला सत्य माहित असलेच पाहिजे/मत असलेच पाहिजे या अट्टाहासातून म्हणा, किंवा निव्वळ ज्याला आपण प्राकृतात ’मतांच्या पिंका टाकणे’ म्हणतो तशा स्वभावामुळे अशी विधाने केली जातात.
आमच्या माजी बॉसने एकदा जेवणाच्या टेबलावर गप्पा चालू असताना बेदरकारपणे म्हटले,’...पण हल्ली हुंडा घेतो कोण?’ (थोडक्यात त्याच्या मते कोणीही घेत नाही वा क्वचित घेतला जातो.) मला धक्काच बसला होता. मी त्याला म्हटले "बॉस, या क्षणी इथे टेबलवर बसलेल्या विवाहित पुरूषांना - जे स्वत:ला समाजातील यशस्वी नि म्हणून श्रेष्ठ व्यक्ती समजतात - आपण विचारू या की त्यांनी हुंडा घेतला की नाही. आणि जे भविष्यात लग्नगाठ बांधणार आहेत त्यांना विचारा की हुंडा घेणार नाही हे ते आज ठामपणे सांगू शकतात का?"
काही क्षण तिथे भयाण शांतता होती नि ती बोलकी होती. अर्थात नंतर ’सासर्याने गाडी देणे हा काही हुंडा नाही, आपल्याच मुलीच्या सुखासाठी त्यांनी दिले तर काय बिघडले’ वगैरे नेहमीचे तर्क सुरू झाले. पण त्यात कारणमीमांसेपेक्षा आत्मसमर्थनाचा भागच अधिक दिसून येत होता. पण हे असे ताबडतोब खोडून काढता येईल इतके गृहित-सत्य बहुधा सोपे वा पडताळणी-सहज नसते. असलेच तरी तशी संधी क्वचितच मिळते. किंबहुना अनेकदा निर्णायक पडताळणी - वा खंडन - शक्य होत नाही तिथेच अशा गृहित-सत्यांचे प्राबल्य अधिक असते.
३. ते तथाकथित सत्य सांगणार्याच्या विश्वासार्हतेबद्दल आपले मत जसे असेल त्यानुसार ते आपण सत्य अथवा असत्य 'मानतो'.
ऑस्कर वाईल्डचा लॉर्ड हेन्री३ म्हणतो "इंग्लिश माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तो ती गोष्ट विश्वासार्ह आहे का या पेक्षा ती सांगणारा विश्वासार्ह आहे का हे अधिक महत्त्वाचे मानतो." ही प्रवृत्ती खरेतर बहुतेक संस्कृतींमधील माणसांमधे आढळून येईल. आपल्याला विश्वासार्ह न वाटणार्या एखाद्या व्यक्तीने सांगितलेली एखादी गोष्ट आपण किती गांभीर्याने घेतो? ती सत्य आहे की नाही हे अजमावून पाहण्याइतपत महत्व तिला देतो, याबाबत ज्याने त्याने आपल्यापुरता विचार करून पहावा.
काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा कर्ताधर्ता बिल गेट्स भारतात आला होता. इथे असताना त्याने एक विधान केले होते की "भारतीय शिक्षण पद्धती ही जगातील सर्वश्रेष्ठ जीवनपद्धती आहे." लगेच लोकांनी ’बघा बिल गेट्स पण म्हणतोय...’ म्हणत आपली पाठ थोपटून घ्यायला सुरूवात केली होती. आता बिल गेट्स म्हणतो म्हणून आपण लगेच मान्य करावे काय? थोडक्यात सांगणारा विश्वासार्ह आहे असे आपण समजतोय का? असल्यास उद्या बिल गेट्सनेच "भारतीय विद्यार्थी सर्वात आळशी असतात." असे विधान - पाठोपाठ वा स्वतंत्रपणे - केले असते तर ते ही आपण मान्य केले असते का? इथे साधा सोपा मुद्दा आहे, की हे सत्य ’असावे असे वाटते’ म्हणून आपण ते आहे असे मानतो. बिल गेट्स हा निमित्तमात्र. त्याने असे म्हटले नसते तरी ते गृहित-सत्य आपण कवटाळून ठेवले असतेच.
याच्या नेमके उलट उदाहरण जीएंच्या ’कळसूत्र’४ या कथेमधे दिसून येते. यातील गरुड जमातीचा नेता अखेर सत्य सांगून आपण आपल्या अनुचरांची केलेली प्रतारणा उघड करतो."पर्वतापलिकडे कोणताही सम्राट नाही, मला कोणतेही आदेश येत नव्हते, मी स्वत: कातडीबचाऊ वृत्तीने युद्ध करण्याचे टाळले आणि हा नि यासारखे इतर निर्णय सम्राटाच्या आदेशाने घेतले आहेत असे तुम्हाला खोटेच सांगितले होते." हे तो कबूल करतो.
इथे वास्तविक त्याने संपूर्ण सत्याचा उच्चार केला आहे. परंतु इतकी वर्षे त्याचा शब्द प्रमाण मानून जगणारे त्याचे अनुचर आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. उलट प्राचीन सत्याचा अधिक्षेप केला याबद्दल त्यालाच दूषणे देतात, दंडित करतात. इथे जे ’असावे वाटते’ ते सत्य मानले जाते.
पर्वतापलिकडे एखादा सम्राट (हे देव संकल्पनेचे रूपकच आहे) असावा. ज्याने आमच्यावर पाखर घालावी आमच्या हित-अहिताची जपणूक करण्यासाठी वेळोवेळी नेत्याला आदेश देऊन आमची काळजी वाहावी ही इच्छाच गृहित-सत्याचे रूप घेऊन समोर येते. थोडक्यात सत्य मानताना देखील सोयीच्या सत्याला आपण अधिक प्राधान्य देतो. शिवाय जगातील सार्याच संस्कृतींमधे समान असलेला प्राचीनत्वाला/ रुढीला सत्य समजण्याचा प्रघातही इतर सार्या निकषांना बाजूला सारतो हाही एक महत्त्वाचा मुद्दा. यात ’सत्य हे कालातीत’ असते हे गृहितक, ते ही भ्रष्ट स्वरूपात - म्हणजे ’कालातीत ते सत्य’ या व्यत्यासाच्या स्वरुपात - वापरले जाते.
४. बहुसंख्य लोकांना अमुक एक गोष्ट सत्य आहे असे वाटते, म्हणून आपण ते सत्य मानतो.
सत्य सिद्ध करताना बहुसंख्येचा निकष लावला जातो. तो कितपत ग्राह्य असावा? याच लेखाच्या सुरूवातीला दिलेल्या प्रसंगातील भुत्याने हा प्रश्न विचारलाच आहे. माझ्यासारखाच आणखी एक आंधळा इथे आहे नि आम्ही दोघे हा भंडारा पिवळाच आहे असे म्हटले, तर दोन विरुद्ध एक या न्यायाने तो पिवळा ठरतोच नि तुला ते मानावेच लागेल.
जीएंच्याच 'विदूषक'५ या कथेमधे एक उपकथानक आहे हंस आणि कावळ्यांचे. बहुसंख्येच्या जोरावर केल्या जाणार्या सत्यापलापाचे इतके सुंदर उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. (ते कथानक इथे वाचा) केवळ बहुसंख्येच्या जोरावर मानस सरोवर हे कावळ्यांचे आहे हे सिद्ध करणे, त्याहून पुढे जाऊन बहुसंख्येने असलेले काळ्या रंगाचे पक्षी हेच हंस आहेत हे सिद्ध करणे, पर्यायाने ’मानस सरोवर हंसांचे’ या नियमाचा आधार घेऊन त्यावर हक्क प्रस्थापित करणे... हे सारे वरकरणी असत्य वाटणारे सारे सत्य म्हणून सिद्ध होते. बहुसंख्येचा सत्यसिद्धतेसाठी होणारा वापर हा जीएंच्या अन्वेषणाचा लाडका विषय आहे. त्यांच्या ’यात्रिक’६ मधेही डॉन त्याला भेटलेल्या संन्याशाला विचारतो ’तुमचा धर्म सत्य होता म्हणून त्याला अनुयायी मिळाले की आधी तलवारीच्या जोरावर तो पसरला नि त्याच्या अनुयायांच्या बहुसंख्येवर तो सत्य ठरला?’
हा तर्क थोडा पुढे नेऊन एक प्रश्न विचारता येईल. समजा दोन परस्परविरोधी उमेदवार-सत्ये (candidate-truths) आपल्यासमोर आहेत नि बहुसंख्येच्या तत्त्वाचा वापर करून त्यातील एकाला दुसर्यापेक्षा ’एक मत’ अधिक मिळून ते सत्य सिद्ध झाले तर पुरेसे आहे का? उद्या या सत्याच्या एखाद्या पाठीराख्याने आपले मत बदलले नि दुसर्या उमेदवार-सत्याचा स्वीकार केला तर आता ते सत्य सिद्ध झाले ना? म्हणजे सत्य परिवर्तनीय असते का? बहुसंख्येने सत्य ठरवण्याच्या पद्धतीमधे हा अंतर्विरोध दिसून येतो. शिवाय मुळात जे विधान/सिद्धांत सत्य आहे की नाही याचे मूल्यमापन केले जाते, त्याला अनेकदा त्या विधानाच्या संदर्भातील विशिष्ट कौशल्याची/माहितीची/ज्ञानाची आवश्यकता असते. अशा कौशल्याचा अभाव अथवा आवश्यक माहिती/ज्ञानाबाबत पूर्णत: अनभिज्ञ असलेल्यांचे बहुमत सत्यान्वेषणास कुचकामी ठरते. आणि म्हणूनच अशा बहुमताचा निर्णय अग्राह्य ठरतो. विविध मिडीया चॅनेल्स नि संकेतस्थळावर बरेचदा अशाच प्रकारचे तथाकथित सर्वे घेतलेले दिसून येतात.
५. बहुसंख्येला अमुक एक सत्य आहे असे वाटते असा आपला समज असतो म्हणून आपण ते सत्य मानतो.
इथे पुन्हा एकदा वर दिले्ल्या हुंड्याबद्दलच्या भाष्याचेच उदाहरण घेऊ. इथे आमच्या बॉसला मुळातच आजच्या समाजात बहुसंख्येला हुंडा घेणे अयोग्य वाटते नि म्हणून आता ती पद्धत काहीशी कालबाह्य झालेली आहे असा त्याचा समज आहे नि तो त्याच्या दृष्टीने सत्याचे रूप घेऊन बसला आहे. ज्यांच्या बाबत त्याचा समज खरा असण्याची शक्यता खरेतर एकुण बहुसंख्येच्या तुलनेत अधिक असणे अपेक्षित होते अशा त्याच्या समोरच असलेल्या एक-दोन व्यक्तींच्या प्रतिसादातून तो केवळ समजच असल्याचे दिसून आले.
एका समाजघटकात, वा भूभागावर (शहरीभागात?) हे - कदाचित - अंशत: का होईना पण सत्य असेलही. पण म्हणून हे विधान सार्या समाजाला लागू होत नाही. अशा वेळी सत्याची व्याप्ती निश्चित करावी लागते. कालसापेक्षता, स्थलसापेक्षता, व्यवस्था-सापेक्षता आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे व्यक्तीसापेक्षता हा निश्चित विधानाचा, सत्याचा महत्त्वाचा पैलू असतो.
सत्यग्राह्यतेचे विविध निकष अथवा पद्धती आपण पाहिल्या. पण मुळात अन्वेषणाला आवश्यक असलेले ज्ञान, माहिती, पुरावे आपल्याला जमा करावे लागतात, ते तपासून पहावे लागतात. त्यासाठी त्यासंबंधी पुराव्यांचे संकलन, आकलन नि विश्लेषण आवश्यक ठरते.
सत्याचे स्वरूप/दर्शन/आकलन:
मुळात अमुक एक विधान, एखादी गोष्ट सत्य की असत्य याचा निवाडा करण्यासाठी ’ते पूर्णतः अनावृत, निर्लेप, अविकृत स्वरूपात आपल्यासमोर आले आहे याची आपल्याला खात्री देता येते का?’ या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थीच द्यावे लागते.
ते आपल्या समोर येते ते एखाद्या माध्यमातून; मग ते एखाद्या व्यक्तीचे भाष्य/निवेदन असेल, छायाचित्र असेल, घटनेचे केलेले वीडीयो शूटिंग असेल, त्याबाबत वृत्तपत्रात/चॅनेल्सवर आलेली बातमी असेल, एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून आलेले वर्णन असेल की आणखी काही. त्या त्या माध्यमाच्या मर्यादा, त्यात सहेतुक/अहेतुक झालेले बदल यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाहून वेगळे असे एक अवगुंठित, विलेपित असे नवे ’तथ्य’ आपल्यासमोर येत असते. अशा अवगुंठित, विलेपित रूपालाच आपण सत्य मानून अन्वेषणाच्या कसोटीवर पारखत बसू तर मग ते सत्य अनुत्तीर्ण होण्याची शक्यता वाढते.
एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेला साक्ष असलेली व्यक्ती त्याबद्दल सांगते तेव्हा तिचे निवेदन यथातथ्य असू शकते किंवा जाणीवपूर्वक सांगितलेले असत्यही. पण या दोन्ही शक्यतांपलिकडे भासमय सत्याची, खंडश: सत्याची तसेच अंशात्मक सत्याचीही शक्यता असू शकते.
प्रत्यक्ष निवेदन हे आपण प्रत्यक्षात जे पाहिलं त्या पेक्षा आपण जे पाहिलं असं आपल्याला वाटतं त्याबद्दल सांगू शकतं. हे ’भासमय’ सत्य! यात कदाचित न पाहिलेल्या पण आपल्या बुद्धीने भर घातलेल्या काही तपशीलांचा समावेश असू शकतो. मानसशास्त्रात एका गंमतीशीर प्रयोग करतात. ज्यात तुम्हाला पलंग, रात्र, दिवा, अंधार, चंद्र असे अनेक शब्द लिहिलेला एक कागद दिला जातो. नंतर तो काढून घेतात नि लगेचच केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर ते शब्द पुन्हा लिहून काढायला असे सांगतात. यात काही शब्द विसरले जातात (हे स्वाभाविकच आहे) पण त्या मूळ यादीत नसलेला 'झोप' हा शब्दही बरेचजण लिहून जातात. हे भासमय सत्याचे उदाहरण आहे. इतर शब्दांच्या संगतीचा आधार घेऊन आपला मेंदू काही रिकाम्या जागा भरून काढतो नि ही दुरूस्ती आपल्या दृष्टीने सत्याचा भाग होऊन जाते. ही व्यक्तीच्या आकलनशक्तीची एक मर्यादा आहे.
व्यक्तीच्या आकलनशक्तीला कुवतीचीही एक मर्यादा असू शकते. प्रत्येक व्यक्तीची आकलनक्षमता सारखीच असेल असे नाही. वर दिलेले भुत्या नि रामण्णाचे उदाहरण प्रामुख्याने या मुद्याला अधोरेखित करते. भुत्या अंध असल्याने त्याला रंग दिसण्याची मर्यादा तर रंगांधळेपण अथवा मर्यादित रंगांचीच ओळख असणार्या एखाद्याला त्याच्या क्षमतेबाहेरचे रंग न ओळखता येण्याची मर्यादा असतेच. (उदा. कुत्र्याला रंग वेगळे दिसत नाहीत. केवळ काळ्या-पांढ्र्या रंगांच्या छटाच तेवढ्या दिसतात असे प्राणिशास्त्र सांगते.)
![GodelEscherBachModel](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7RJO_vGc57ZDBJTirtBk70vxXnfszTpVPTlYkrq0U3drk4z4VADyiHdF8CJW1-OgJyLgkb3kjxOY9KReib3LErTsfqd3fs8mlQqyYuE7LnGBzsrFjPjLwgKBQifqu7fMJjXGLLtePA0qLcLAa5az4t6F0DTvcUfSd1mYZNkqxdI1XRrTvtLI9V19EqQ/s320/GodelEscherBachModel.jpg)
अशाच मर्यादा माध्यमांनाही असू शकतात. नव्या जगात इमेज प्रोसेसिंगच्या शास्त्रात एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या बाजून घेतलेल्या छायाचित्रांवरून मूळ व्यक्तीपर्यंत पर्यंत पोचता यावे, यादृष्टीने वेगवेगळी तंत्र विकसित केली जात आहेत. या प्रकारच्या तंत्राचा वापर हा गुन्ह्याच्या स्थळी कॅमेराबद्ध झालेल्या गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी केला जातो. आणि पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डमधे ज्याप्रमाणे समोरून स्थिर स्थितीतील छायाचित्र असते, अगदी तसेच- त्याच कोनातून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळेल हे अशक्यच असते. कॅमेरा हा गुन्हेगाराच्या उजवीकडून किंवा डावीकडून आणि त्याच्या डोक्याच्याही वरून एका कोनातून ते चित्र काढतो. त्याला रेकॉर्डमध्ये ज्या नेमक्या कोनातून काढलेले चित्र आहे, त्याच कोनातून प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्र मिळू शकत नाही. ही माध्यमाची मर्यादा आहे. ते छायाचित्र नि रेकॉर्डमधील चित्र असलेली व्यक्ती एकच हे सिद्ध करण्याचे तंत्र विकसित करावे लागते.
विलेपित, अवगुंठित नसलेला पण मूळ सत्याचा एखादा अंशच (अविकृत स्वरूपात) आपल्यासमोर येऊ शकतो. असं असेल तर मग सत्याच्या केवळ एका खंडाला, एका अंशालाच सत्य मानून पुढे जाण्याचा धोका राहतो. भारतीय अभिजात संगीतातील रागांच्या स्वरूपाबाबत कुमार गंधर्व असं म्हणायचे की रागाला एकाहुन अधिक ’प्रोफाईल’ असतात. त्यातल्या एका रूपालाच अनेक गायक पूर्ण राग समजून गातात नि आवृत्त गाणे गात राहतात. थोडक्यात दृश्यमान भागाच्या पलिकडे असलेल्या सत्याच्या अदृश्य भागाचा/खंडाचा शोध घेऊनच त्याचे पुरे आकलन होऊ शकते.
जीएंचा विदूषक म्हणतो "सत्य हे अंशाअंशानं प्रकट होत असतं, याची विस्मृती होता कामा नये. संपूर्ण सत्य पाहण्याचं भाग्य मानवाच्या दोन नेत्रांना कधीही लाभणार नाही, परंतु त्याला विविध अंश एकत्र करता येतील, विविध खंड बुद्धीच्या सहाय्यानं सांधता येतील; आणि एका खंडापेक्षा दोन साधित खंड अधिक सत्य असतात."
खंडश: सत्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असलेली ’आंधळे आणि हत्ती’ ही गोष्ट. प्रत्येक आंधळ्याच्या जाणिवेच्या कक्षेत असलेला आकार दोरी, पंखा, खांब इ. आकार सत्यच आहे, परंतु तो मूळ हत्तीचा एक भाग आहे, पूर्ण हत्ती नव्हे. इथे पाचही आंधळ्यांच्या जाणिवेच्या समष्टीतूनच संपूर्ण सत्याचे - त्या हत्तीचे - चित्र साकार होऊ शकते. कळीचा मुद्दा हा असतो की 'आपण सत्याचा एक भागच पाहतो आहे' याची जाणीव त्या आंधळ्यांना व्हायला हवी, अन्यथा प्रत्येकजण अट्टाहासाने आपल्या जाणिवेच्या मर्यादेतील चित्राला पूर्ण सत्याचे रूप मानून चालतो. हत्तीचे एकवेळ सोडा - ते केवळ जिज्ञासापूर्तीपुरते आहे - पण ते पाच भागधारक आहेत अशा एखाद्या सामूहिक हिताच्या निर्णयाबाबत काय घडेल हे तर्क करण्याजोगे आहे.
'अंशात्मक सत्य' हे मूळ सत्याचा काही भागच सांगते. यात उरलेला भाग अजाणता वा जाणीवपूर्वक दडपला जातो किंवा त्याचा अपलाप केला जातो. तरीही एकुणात ते सत्य वा असत्य मानता येणार नाही. इथे सत्य नि असत्याची सरमिसळ झालेली असते. त्या अर्थी खंडश: सत्यापेक्षा अंशात्मक सत्य वेगळे आहे. खंडश: सत्य हे तुकड्यातुकड्यातून येते पण त्यांची समष्टी केवळ सत्यच पूर्ण करते. अंशात्मक सत्यात प्रत्येक तुकड्यातून सत्याचा अंश वेगळा करून जमा करत न्यावा लागतो.
वर दिलेले भुत्याचे रंगाचे उदाहरण थोडे वेगळ्या प्रकारे मांडून पाहू. हिरवा रंग हा पिवळा नि निळ्या रंगाचे संयुग मानले जाते. आता पिवळा हे सत्य नि निळा हे असत्य मानले तर हिरव्याच्या सर्व छटा या निळ्या रंगाच्याही छटा असतात नि पिवळ्याच्याही. आता एखाद्याला हिरव्या रंगाची छटा दाखवली नि ही छटा पिवळ्या रंगाची की निळ्या रंगाची (निवड करण्यासाठी हे दोनच पर्याय दिले नि) असा प्रश्न केला (पक्षी: हे सत्य की असत्य याचा निर्णय करण्यास सांगितले) बघणार्याच्या दृष्टिकोनातील फरकानुसार तो त्यांना पिवळ्या वा निळ्या रंगाची छटा मानून चालेल. पण हाच प्रश्न एकाहुन अधिक लोकांना केला तर त्यांचे एकमत होण्याची शक्यता नाही. थोडक्यात सत्य शोधू पाहणार्याला प्रत्येक हिरव्या छटेतील पिवळ्या रंगाचे अस्तित्व वेगळे काढून पाहता यायला हवे. त्या छटेतील तेवढा भागच सत्यान्वेषणासाठी घेऊन पुढे जाता आले पाहिजे.
या सार्या अवगुंठनाच्या, विलेपित सत्याच्या, भासमय, खंडश: वा अंशात्मक सत्याच्या, माध्यमांच्या मर्यांदांच्याही पलिकडे शिल्लक राहतो तो स्वार्थप्रेरित अथवा हेतुत: केलेला संपूर्ण अपलाप. या लेखनाच्या उद्दिष्टात याचे फार महत्त्व नसल्याने फारसे तपशीलामधे जाण्याचे कारण नाही.
सत्यशोधाच्या या जंगलवाटा, शहरी रस्त्यांप्रमाणे थेटपर्यंत नजर जाईल अशा नसतात. वाटेत येणारी झाडे-झुडपे दूर करीत, प्रसंगी कठोरपणे छाटून काढीत पुढे जावे लागते. हे करीत असताना गगनाला भिडणार्या वृक्षांच्या फांद्यातून येणारे कवडशांचे भान ठेवावे लागते. कारण त्यांच्या अनुषंगानेच मूळ सहस्ररश्मीचा वेध आपल्याला घेता येतो. त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही पण कवडशांच्या अस्तित्वाने त्याचे अस्तित्व - सिद्ध नाही तरी - अनुमानित करता येते.
या जंगलवाटांवरील कवडशांच्या आधारे सत्यशोधाचा प्रवास 'रुनोसुको अकुतागावा' या जपानी लेखकाने आपल्या ’इन द ग्रोव्ह’ या छोटेखानी कथेमधे मांडला आणि त्या कथेच्या पायावर 'अकिरा कुरोसावा' या प्रसिद्ध दिग्दर्शकाने ’राशोमोन’ नावाचे अविस्मरणीय चित्रशिल्प उभे केले.
(क्रमशः)
पुढील भाग >> जंगलवाटांवरचे कवडसे - २ : दोन कथा, सहा माणसे
_____________________________________________________________________________________
१. कथा: ठिपका - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
२. 'बंडखोर' या प्रवचनंग्रहातून
३. 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' या 'ऑस्कर वाईल्ड'लिखित बहुचर्चित कादंबरीतील एक प्रमुख पात्र. (हा खुद्द ऑस्करचा alter-ego मानला जातो.)
४. कथा: कळसूत्र - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
५. कथा: विदूषक - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
६. कथा: यात्रिक - ले. जी.ए. कुलकर्णी (संग्रहः पिंगळावेळ)