मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ९ : Foot that fits

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

पाऊस << मागील भाग

---

काही वर्षांपूर्वी ‘सिंडरेला’ या गाजलेल्या परीकथेवर आधारित एक चित्रपट पाहिला होता. मध्यरात्रीचे टोले ऐकून घाईने निघून गेलेल्या सिंडरेलाचा काचेचा(१) बूट निसटून पडतो. तिच्या प्रेमात पडलेला राजपुत्र तो घेऊन तिचा शोध घेण्याचा मनोदय जाहीर करतो. ‘इतक्या सार्‍या प्रजेमध्ये हा बूट कुणाचा असेल हे कसे शोधणार?’ या प्रश्नावर राजपुत्र म्हणतो, ‘Every shoe has a foot that fits.’ आणि तो त्या बुटाच्या मालकिणीच्या शोधात निघतो.

आज भांडवलशाहीच्या जमान्यामध्ये विशिष्ट व्यक्तिच्या पायाच्या नेमक्या मापानुसार पादत्राणे, बूट शिवणारे चर्मकार दुर्मिळ झाले आहेत. पावलांच्या निव्वळ लांबीवरून बारा-चौदा आकारांत ठोक वर्गीकरण करून जगभरातील सर्व माणसांसाठी पादत्राणांचे घाऊक उत्पादन करणार्‍या ‘उत्पादकांनी’ त्यांची जागा घेतली आहे. दुसरीकडे अगदी लहान शहरांतूनही एखाद्या विशिष्ट बुटाशी सोयरिक करू शकतील अशी शेकडो ’पावले’ सापडतील. त्यामुळे एखादा बूट हाती घेऊन आपल्या ‘ड्रीमगर्ल’च्या शोधात निघालेल्या प्रिन्स चार्मिंगची कदाचित एखाद्या ‘क्रुएला’शी(२) गाठ पडण्याची शक्यता आहे.

ConfusedKey

परंतु तुम्ही बिम्मच्या वयाचे असता, तेव्हा तुम्हाला जगाच्या या व्यापाची फारशी समज नसते. त्यामुळे त्या वयात सिंडरेलाची कथा वाचलेली असो वा नसो, या बुटाची मालकीण कोण असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पडू शकतो का– पडलाच होता. एकदा त्याला एक पितळी किल्ली सापडली. त्याने ती घरातील प्रत्येक कुलुपाला लावून पाहिली. पण तिने कुठलेच कुलूप उघडेना. शेवटी तो आईकडे आला नि म्हणाला ‘आई, या किल्लीचे कुलूप कुठे आहे?’

पुस्तकामध्ये बिम्मचा हा प्रश्न वाचल्यावर वाचणार्‍याच्या चेहर्‍यावर हमखास हसू फुटते. ‘ दाराच्या कुलुपाची किल्ली कुठे पाहिलीस का?’ ‘माझ्या गाडीची किल्ली...’ ‘ तिजोरीची किल्ली...’ असा किल्लीचा परावलंबी उल्लेख ऐकण्याची आपल्याला सवय असते. आपल्याला कपाट उघडायचे असते, गाडी चालू करायची असते, तिजोरीमध्ये पैसे ठेवायचे वा त्यातून काढायचे असतात... म्हणून आपण त्या त्या वस्तूची किल्ली शोधतो. हे प्रश्न आपल्याला परिचित असल्याने, ‘या किल्लीचे कुलूप कुठे आहे?’ हा उलट प्रश्न हास्यास्पद असल्याचा ‘प्रथमश्रवणी’ ग्रह होत असतो. असा विचार करणार्‍या बिम्मला आपण हसत असतो. काचेचा बूट घेऊन आपल्या प्रेमिकेला शोधत जाणार्‍या राजपुत्राची कथा परीकथा– अवास्तव म्हणून सोडून देत असतो.

पण बिम्मचा हा हास्यास्पद वाटणारा प्रश्न तुम्हीही कधी न कधी, वेगळ्या संदर्भात विचारलेला असतो. फक्त तो तुमच्या ध्यानात आलेला नसतो. किल्ल्यांच्या जुडग्यामध्ये, किल्ली ठेवण्याच्या बोर्डवर अथवा ड्रॉवरमध्ये एखादी अपरिचित किल्ली दिसली तर ‘ही कशाची– कुठल्या कुलुपाची किल्ली आहे?’ असे आपण विचारतो ना? प्रश्न तोच असला, तरी रोख उलट असतो. ‘हिने एखादे कुलूप उघडत असेल तरच तिचा उपयोग, एरवी ती इथे का सांभाळून ठेवली आहे?’ असा या प्रश्नाचा रोख असतो. यात किल्ली ही दाराच्या कुलुपापेक्षा, गाडीपेक्षा, तिजोरीपेक्षा दुय्यम, परावलंबी वस्तू मानली जाते. तिच्या अस्तित्वाचे कारण तिचे उपयुक्ततामूल्यच हेच असते, आणि ते मूल्य या अन्य वस्तूंच्या संदर्भातच निश्चित होत असते.

माणसांच्या बहुतेक समाजांत स्त्रीची ओळख तिच्या पुरुषाची जोडीदार इतकीच असते. तिला स्वतंत्र ओळख या सामाजिक व्यवस्था देत नाहीत. जिच्या पोटी मूल जन्माला आलेले नाही अथवा येऊ शकत नाही अशा विवाहित स्त्रीचे अथवा पतीचे निधन झाल्याने निरूपयोगी(!) ठरलेल्या स्त्रीचे सामाजिक स्थान शून्य होऊन जाते. आपल्या कुटुंबाचा भाग असलेल्या, समाजाच्या अर्धा हिस्सा असलेल्या जिवांकडे अशा दृष्टीने पाहिले जाते, तिथे किल्लीसारख्या जड वस्तूंकडे याच दृष्टिकोनातून पाहिले जाणार हे उघडच आहे.

पण हे संस्कारांचे, व्यवस्थांचे जोखड मानगुटी बसण्यापूर्वी तुम्ही बिम्म असता. या संस्कारांनी, व्यवस्थांनी लादलेल्या तयार उत्तरांच्या वैचारिक शृंखला अद्याप तुमच्या मेंदूंना वेटोळे घालू शकलेल्या नसतात. अनुभवांना नाकारून, पोथ्यांना वास्तव मानून चालण्याची झापडबंद वृत्ती अद्याप पुरेशी प्रबळ झालेली नसते... जगण्याने समोर ठेवलेल्या प्रश्नांना भिडण्याची तुमची तयारी असते.

बिम्मच्या वयात स्वार्थ समजू लागला असला, तरी व्यक्तिनिरपेक्ष अशी ’मालकी हक्क’ ही संकल्पना फारशी ठळक झालेली नसते. त्यामुळे ही किल्ली दुसर्‍या कुणाच्या कुलुपाची असेल ही शक्यता त्याच्या डोक्यात येणे अवघड आहे. त्याच्या विचारशक्तीवर अद्यापही जिज्ञासेचा बराच प्रभाव शिल्लक असतो. त्यामुळे हा उलट शोध बिम्मला घ्यायचा असतो.

प्रत्येक कुलुपाला किल्ली असेल तर प्रत्येक किल्लीचे एक कुलूप असणारच की! किंबहुना कुलूप आधी तयार होणार नि नंतर त्याच्यासाठी किल्ली बनवली जाणार हे उघड आहे. त्यामुळे प्रत्येक किल्लीला तिचे असे एक कुलूप असायलाच हवे. मग एखाद्या कुलुपाची हरवलेली किल्ली शोधण्यात हसण्याजोगे काही नसेल, तर एखाद्या किल्लीचे कुलूप शोधण्यात हसण्यासारखे काय आहे? न जाणो, काचेच्या बुटाची मालकीण शोधताना एखाद्या बिम्मला एखादी सिंडरेला भेटेलही.

बिम्मच्या या प्रश्नासारखे इतर काही प्रश्न तुमच्या बिम्मपणीही परिचयाचे असतात आणि ते उपयुक्तही असतात. उदाहरणार्थ, ‘अमुक शर्ट कुणाचा आहे, बिम्मचा की त्याच्या बाबांचा?’ या प्रश्नामध्ये शर्ट हा एखाद्या किल्लीसारखा किंवा सिंडरेलाच्या बुटासारखा नाही का? तो बिम्मचा असेल तर तो बाबांच्या अंगावर बसणार नाही. म्हणजे तो त्या कुलुपाची किल्ली नाही. त्यामुळे तो शर्ट जर नीट घडी करून कपाटात ठेवलेला नसेल, तर त्याबद्दल बिम्मला रागे भरावे की बाबांना, हे आईला समजते की नाही? शर्टऐवजी तिथे एखादा फ्रॉक असेल, तर तो या दोघांचाही नसून बब्बीचा आहे हे आईला ठाऊक असते की नाही? म्हणजे एकप्रकारे ‘किल्ली पाहून याचे कुलूप कुठले’ हे आई ओळखते की नाही?

आता तुम्ही म्हणाल,“पण या ‘किल्ल्या’ अनेक कुलुपे उघडतात. तसंच एका कुलुपाच्या एकाहुन अधिक किल्ल्या असतात/असू शकतात. बिम्मचा शर्ट त्याच्याच अंगकाठीच्या एखाद्या मुलाला– अथवा मुलीलाही वापरणे शक्य आहे. त्यामुळे हे एकास-एक नाते नाही.” पण बिम्म प्रत्येक किल्लीला कुलूप असण्याबद्दल बोलतो आहे. ‘एकही किल्ली अनाथ नाही, तिला ‘किमान’ एक कुलूप असते. आणि हे खरे असल्याने ते कोणते आहे?’ असा त्याचा प्रश्न आहे. ‘ती एकच किल्ली एकाहुन अधिक कुलुपे उघडते का?’ याबद्दल तो बोलत नाही. कदाचित तो प्रश्न त्याला अजून पडलेला नाही. एक अनायासे हाती आलेली किल्ली असे एकाहुन अधिक प्रश्न तुमच्यासमोर उभे करू शकते, त्यांना सामोरे जाण्याची तयारी मात्र हवी.

You-Tube वा त्यासारख्या व्हिडिओ-शेअरिंग साईट्सवर मांजरांचे, माकडांचे वा अन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सापडतात. त्यातील काहींमध्ये त्यांना आरशासमोर अथवा टीव्हीसमोर उभे केले असता त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होतात त्या टिपलेल्या असतात. त्यामध्ये आरशाच्या, टीव्हीच्या वा संगणकाच्या पडद्याच्या मागे डोकावून पाहणे ही एक प्राधान्याने दिसते.

प्रत्येक गोष्टीला, सजीवाला पुढची, समोरची बाजू असते तशीच मागची बाजूही असणार असा सामान्य प्राण्यांचा कयास असतो. कारण ते कायमच त्रिमित जगात जगत असतात. संस्कारांनी, शिक्षणाने विचाराची एक मिती नाहीशी करून आरसा वा संगणकासदृश द्विमितीमध्ये फिरणार्‍या मानवी दृष्टिकोनाशी त्यांचा फारसा परिचय नसतो. त्यामुळे आरशात दिसणारा सजातीय प्राणी तिथे आहेच असे समजून एखादे मांजर अथवा कुत्रे त्या आरशाच्या मागे जाऊन पाहात असते. टीव्हीच्या पडद्यावरून दिसेनासा झालेला एखादा प्राणी त्याच्या मागे कुठे दडला आहे, हे ती मांजर वा कुत्रे डोकावून पाहात असते.

माणूस हा प्राणी मात्र बहुतेक वेळा जे आणि जेवढे पाहातो, ऐकतो तेवढेच तंतोतंत खरे मानून चालतो. त्याच्या रूपाचे पुरे आकलन होण्यासाठी विश्लेषण-विचाराच्या साहाय्याने त्याची पाठीमागची बाजू तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. विचार करून पाहा– ‘समोर दिसणार्‍या जगातील नियमांच्या उलट असेल तर काय घडेल?’ किंवा ‘आपण अनुसरतो त्या क्रियांचा क्रम बदलला, उलट करून पाहिला तर परिणाम काय असेल?’ असा विचार तुमच्या मनात येऊन किती दिवस झाले?

हा एक व्हिडिओ पाहा. ब्राझीलमध्ये घडलेली घटना आहे ही. अर्थात त्या विशेष आहे असे नाही. कारण हैदराबादपासून पंजाबपर्यंत अनेक ठिकाणचे अगदी नेमक्या याच प्रकारे अडचणीत सापडलेल्या मुलांचे व्हिडिओ मी पाहिले आहेत.

मांजर, कुत्रे अथवा मूल खिडकीच्या, जिन्याच्या गजांमध्ये आपले डोके अडकवून घेणे हा देशोदेशी पसरलेला ‘आजार’ आहे. पश्चातबुद्धीने पाहिले, तर सोपा वाटणारा त्यावरील उपाय बहुतेकांना बराच उशीरा सापडलेला दिसतो.‘जिथून डोके आत गेले, तिथूनच ते बाहेर काढावे लागेल’ या धोपटमार्गी विचाराने यातील बहुतेक वय वाढलेले चकले आहेत. पठडीबाज विचार म्हणायचा तो हा. डोके मागे ओढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी उरलेल्या शरीराला डोक्याकडे पाठवावे हे उत्तर सुचण्यास बहुतेकांना बराच वेळ गेला आहे... ब्राझीलमधील या वडिलांना तब्बल दोन तास लागले.

बिम्मच्या वयात असताना कदाचित त्याच्यामध्ये ते कुतूहल, ती जिज्ञासा, तो पर्यायी विचार (lateral thinking) जिवंत असेल. पुढे संस्कार-शिक्षणाची झापडे लागली, विचारांची पठडी निश्चित झाली की त्याला नजरेच्या टप्प्यात आहे तेवढेच पाहण्याची, एखाद्या घोड्याप्रमाणे त्या चाकोरीतूनच पुढे जाण्याची सवय अंगवळणी पडून जाते. त्याचबरोबर त्याची जिज्ञासाही त्या घोडागाडीच्या चाकांवर लावलेल्या लोखंडी धावेसारखी जशी एका केंद्राभोवती फिरत राहते. 

आपल्या संस्कार-शिक्षणाचा उद्देशच मुळी तुमच्या-आमच्या मनातील ही स्वतंत्र, पर्यायी विचारांची शक्यता खुडून तुमच्या विचारक्षमतेला एका पठडीमध्ये बांधून घालण्याचा असतो असे म्हणता येईल. त्यामुळे या ‘पर्यायी विचारा’साठी तुम्हा-आम्हाला खास क्षमता विकसित करावी लागते.

लहानांच्या परीकथांमधे वा मोठ्यांच्या भयकथा वा गूढकथांमधे – ज्यांना अलीकडे हास्यास्पद शौर्यकथांचे स्वरूप आले आहे– अवास्तव असे भौतिक नियम आपण पाहतो. त्यात अमानवी अथवा अलौकिक पातळीवर जगणारे हीरो, त्यांचे विरोधक अथवा व्हिलन, चित्रविचित्र प्रकारचे प्राणी वगैरे गोष्टींबाबत वगैरेंबाबत आपण वाचतो वा पाहतो. परंतु ‘ते जग आपले नाही’, ‘वास्तव नाही’ याची पक्की खूणगाठ आपल्या मनात बांधलेली असते. त्यामुळे आपल्या अनुभूतीच्या वा विचार-मूल्यमापनाच्या पातळीवर ते कधीच येत नाहीत.

पण बिम्मसारख्या ‘शेजारघरच्या मुला’च्या (a boy next door) बाबतीत आपण हे वाचतो, तेव्हा ते सारे आपल्या अगदी जवळचे भासते. आता त्याच्याकडे पाहण्याचा, त्याबाबात विचार करण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो. मग आपण सापडलेल्या एखाद्या किल्लीचे कुलूप कुठले असावे असा विचार करून पाहतो, आसपास दिसणार्‍या विविध रंगांच्या उत्पत्तीचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करून पाहातो. पक्ष्याचा नि पिंजर्‍याचा आकार यांचा मेळ बसत नसेल, तर दोहोंपैकी एकाच्या आकारमानानुसार दुसरा आणण्याऐवजी पक्ष्याला पिंजर्‍याच्या आकाराचे होण्यास भाग पाडतो आणि उडणार्‍या नव्हे तर ‘उडवणार्‍या’ पतंगाला लटकून आभाळाची सैर करून येतो.

बिम्म वयाने वाढतो, यथावकाश बाबांच्या वयापर्यंत पोहोचतो, तोवर एका बुटाच्या आधाराने माणूस शोधण्यामध्ये असलेली यशाची नगण्य शक्यता त्याला जाणवू लागलेली असते. त्याचबरोबर तिच्या आधारे लिहिलेल्या परीकथेतला त्याचा रसही संपून गेलेला असतो. ‘पिनोकिओ’सारखा एखादा लांबनाक्या बिम्म तर सिंडरेलाच्या कथेला ’हुं: मेलोड्रामा सगळा.’ म्हणून उडवूनही लावतो. एका दुबळ्या धाग्याच्या आधारे गमावलेल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचण्यातली असोशी, जिद्द वा प्रेम त्याच्या जाणिवेतून हद्दपार झालेले असते. जगण्याऐवजी आता त्याची वाटचाल जिवंत राहण्याकडे, चोख व्यावहारिक जिण्याकडे वळलेली असते. माणसाचा पुन्हा मनुष्यप्राणी होण्याकडे वाटचाल सुरू झालेली असते.


(क्रमश:) पुढील भाग >> (आगामी)     

-oOo-

(१). तो काचेचा असण्यातही एक औचित्य आहे का? असा एक प्रश्न मला पडलेला आहे. जगभरातील सर्व समाज, सर्व काळ चामड्यांचीच पादत्राणे वापरत आलेला आहे. मानवी संस्कृतीच्या उदयकाळात शिकारी मानवाला वस्त्रप्रावरणांसाठीही चामडेच उपलब्ध नि उपयुक्त असे. त्यामुळे पादत्राणेही चामड्याची असणे अपरिहार्यच होते. परंतु आज प्रगत मानवी समाजातही - प्रक्रिया केलेले का होईना- चामडेच वापरले जाते हे विशेष

या खेरीज काच हा पदार्थ बव्हंशी मानवनिर्मित आणि तसा प्रकृतीने नाजूक असल्याने पादत्राणांसाठी सर्वस्वी निरुपयोगी. पण सिंडरेलाच्या कथेमध्ये हा उल्लेख महत्त्वाचा आहे. कारण अनेक ठिकाणी त्या कथेचे शीर्षकच मुळी ‘ द लिट्‌ल ग्लास स्लिपर’ असे आहे. इसवी शतकाच्या सुरूवातीला ग्रीक तत्त्वज्ञ स्ट्राबोच्या लेखनात तिचे आद्य रूप सापडते. त्यानंतर या कथेची विविध रूपे जगभरातील अक्षरश: प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये लोकप्रिय झालेली आहेत.

(२). क्रुएला डी’विल: डोडी स्मिथ हिच्या ’हंड्रेड अँड वन दाल्मेशिअन्स’ या कादंबरीतील एक प्रमुख पात्र. ज्यांचे बाह्यरूप आवडले अशा प्राण्यांना ठार मारून त्यांच्या कातड्यांपासून विविध प्रकारची वस्त्र-प्रावरणे व आभूषणे तयार करून मिरवणारी स्त्री.


हे वाचले का?

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ८: पाऊस

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन << मागील भाग

---

सध्या पाऊस देशातून माघार घेण्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जीवनदायी पाण्याचा मुख्य स्रोत हा मोसमी पाऊसच असतो. अगदी गेल्या शतकाअखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून. त्यामुळे पाण्याबरोबरच अन्नाचा पुरवठाही त्याच्यावरच अवलंबून.

या टप्प्यावर ’या वर्षी पावसाने काय दिले?’ याचा आढावा घेतला जात असतो. पाऊस पुरेसा पडला की अधिक पडला, ओला दुष्काळ की कोरडा दुष्काळ, याबाबतचे आडाखे घेण्यास आता सुरुवात होईल. कारण पाऊस हा ‘पुरेसा’ कधीच होत नाही. कधी- वा कुठे, तो जेमतेम तहान भागवण्याइतक्या पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहायला लावतो, तर कधी शेतातील उभे हिरवे वैभव एका झपाट्यासारशी नाहीसे करून शेतकर्‍याच्या तोंडचा घास हिरावून घेतो. शृंगार काव्यामध्ये पावसाभोवती कितीही रम्य वर्णने विणली गेली असली, तरी वास्तवात पाऊस हा या ना त्या प्रकारे माणसाच्या जीवनावर आघातही करतो. याचा अनुभव अलीकडच्या काही दशकांत अधिक प्रकर्षाने येऊ लागलेला आहे.

पण हा झाला एकुण समाजाच्या वा भूगोलाच्या संदर्भातील सरासरी अथवा व्यापक विचार. विशिष्ट व्यक्तींना पाऊस कसा दिसतो, जाणवतो, त्याचे पैलू कसे असतात याचे चित्र आणखी वेगळे दिसू शकते. वर म्हटले तसे वयात आलेल्या तरुण-तरुणींच्या मनात त्याच्या आगमनाने कुठल्या भावना उमटतात; शाळकरी मुलांकडून पावसाचे स्वागत कसे केले जाते, ज्यांचे रोजगार हे आकाशाच्या उघड्या छताखाली चालणार्‍या व्यवसाय/रोजगारावर अवलंबून असते त्यांची त्याच्याबद्दल काय भावना असते आणि या सार्‍यांपलिकडचे सारे आयुष्यच उघड्यावरचे असणार्‍यांसाठी हा पाऊस काय घेऊन येतो... या सार्‍या प्रश्नांची उत्तरे नेहमीच एकमेकांना छेद देऊन जात असतात.

नुकत्याच चालत्या-बोलत्या झालेल्या, स्वत:हून घराबाहेर पाऊल टाकू लागलेल्या बिम्मच्या दृष्टीने पाऊस कसा असतो? जंगलजीवी प्राण्यांचे जग सर्वस्वी निसर्गाधीन असत, निसर्गातील घडामोडींचे त्यांच्याशी अतूट नाते असते. माणूस नागर झाल्यानंतर त्याचा निसर्गाशी असलेला संबंध संपला. चार भिंतींच्या आत राहणार्‍या बिम्मचे आयुष्य आई-वडिलांच्या सोबत सुरू होत असते. हे जग बव्हंशी स्थिर असते. आई-वडील असोत की घरातील इतर व्यक्ती- त्यांचे चेहरे दिवसचे दिवस तसेच असतात. त्याच्या पाळण्याची जागा, घरातील विविध वस्तू या आपापल्या जागा न सोडता कायम एका जागी वस्तीला असतात.

ते मूल जेव्हा पहिले पाऊल घराबाहेर टाकते तेव्हा परिसराची ओळख करुन घेऊ लागते. आता त्याला मोठी माणसे झाडावर उमललेले फूल, दारी आलेले एखादे आगंतुक कुत्र्याचे, मांजराचे वा शेळीचे पिलू काही अशा `दोन हात दोन पाय’ नसलेल्या गोष्टींची ओळख करुन देऊ लागतात. हे जग तितके स्थिर नसते. काल दारी असलेले मांजर आज दिसत नाही- कदाचित तिथे एखादे वासरू येऊन बसलेले असते. झाडावर काल पाहिलेले देखणे वा सुगंधी फूल आज तिथून नाहीसे झालेले असते. भवतालामध्ये होणार्‍या बदलांची ओळख बिम्मला होऊ लागलेली असते.

विशिष्ट मोसमात येणारा पाऊस ही बिम्मला होणारी निसर्गाची आणि ‘तो स्थिर नसतो, त्यात सतत स्थित्यंतरे होत असतात’ याची पहिली भक्कम ओळख असते. जगातील काही गोष्टी आपल्या आई-वडिलांच्या नियंत्रणाबाहेर असतात, निसर्गात होणारे बदल आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवू शकतात याची ही पहिली चुणूक असते. पावसाने ओढ दिल्याने पाण्याची होणारी चणचण किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचे नि वाहतुकीचे नुकसान होऊन पर्यायाने झालेली तुटवड्याची परिस्थिती यावर आई-वडील बोलतात, बिम्मला ते समजू लागते तेव्हा त्याला पावसाचे- आणि पर्यायाने निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान समजू लागते.

निसर्ग-मानव संबंधांचा विचार करायचा तर माणसाने निसर्गातील बहुतेक घटकांना ’आपलेसे’ केले आहे नि त्यांचा साधन म्हणून वापर केला आहे. अगदी सर्वदाहक अशा अग्निलाही ’माणसाळवून’ अनेक प्रकारे त्याचा उपयोग केला आहे, करतो आहे. अपवाद आहे तो पावसाचा आणि चक्रवातादि काही घटकांचा. आदिमानवाने आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवणारे हे घटक देवत्व देऊन, त्या अनुषंगाने काही देवाणघेवाण करुन अंकित करण्याचा प्रयत्न केला होता. हा एक प्रकारे विनिमयाचा करार होता. परंतु यथावकाश माणसाने अग्निवर नियंत्रण मिळवले, नि जगभरातून अग्निदेवाचे महत्त्व लयाला गेले. यथावकाश नागर झालेल्या माणसाने सार्‍याच प्राकृतिक देवांशी नाते तोडले आणि स्व-रूपातील देवतांची पिढी जन्माला घातली.

TheMandanRainDance
अमेरिकेतील मँडन इंडियन जमातीचा टोळीप्रमुख पर्जन्याला आवाहन करतो आहे.
चित्रकार: जॉर्ज कॅटलिन.

अग्निवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपण पावसावरही नियंत्रण मिळवू शकतो असा भ्रम त्याला झाला असावा. त्यामुळे बहुतेक प्राचीन समाजांतून पर्जन्यनृत्यासारख्या विधींची निर्मिती झाली. जे प्रामुख्याने पर्जन्याला आमंत्रित करत असे, आवाहन करत असे. जीएंच्या ’कळसूत्र’मध्ये लाल गरुडाच्या टोळीने पावसाला आवाहन करण्यासाठी केलेल्या नृत्याचे मनोवेधक वर्णन आहे(१).

परंतु हे नियंत्रण श्रद्धेच्या पातळीवरच राहिले. आपली कृती नि पावसाचे आगमन अथवा माघार यांमध्ये कार्य-कारणभाव प्रस्थापित करण्यास माणसाला अपयश आले. प्राकृतिक दैवतांकडून माणूस नागर वा अध्याहृत मानवी देवत्वाकडे सरकला आणि पर्जन्यनृत्यांची जागा यातुविधिंनी घेतली. या विधींचे अवशेष म्हणा की अवतार म्हणा, हे आजच्या तथाकथित प्रगत समाजातही कुठे-कुठे मूळ धरून राहिले आहेत.

आजच्या एकविसाव्या शतकातील मानवालाही पावसाला लगाम घालणे शक्य झालेले नाही. तो जास्तीत जास्त त्याच्या आगमनाचा नि व्याप्तीचा वेध घेऊ शकतो; त्याने वर्षिलेल्या पाण्याचे नियोजन करू शकतो. तो कुठे नि किती पडेल यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. हवे तेव्हा हुकमी पाऊस पाडू शकत नाही की ’आता पुरेसा झाला’ म्हणून नळ बंद करावा तसा थांबवूही शकत नाही. म्हणजे अग्निप्रमाणे पावसाचा साधन म्हणून वापर करण्यात आजवर अपयशच आलेले आहे.

पण समजा- समजा माणसाने पावसालाही अंकित केले तर... ही कल्पना तशी आश्वासक आहे आणि दाहकही! तिचा विचार करण्यास भाग पाडले ते बिम्मच्या एका कृतीमुळे. यापूर्वी बिम्मने पत्र आणि चित्र यांचा वापर जसा हवे ते पदरी पाडून घेण्यासाठी साधन म्हणून केला आहे. या दोन्ही गोष्टी त्याची स्वत:ची निर्मिती आहेत. पण पुढे चक्रनेमिक्रमाने येणार्‍या पावसाचा वापरही त्याने अशाच प्रकारे केलेला आहे. त्याद्वारे त्याने बब्बीच्या मैत्रिणींवर हुकुमत गाजवली आहे.

आयुष्याच्या त्या इतक्या परावलंबी टप्प्यावरदेखील बिम्मसारख्या मुलावर संघर्षाचे प्रसंग येतात. इतक्या सुरक्षित जगातही एखादा लहानसा कोपरा लढून पाय रोवून उभा राहण्याचा असतो. त्याचा खाऊ हिरावून घेणार्‍या चंद्रीशी नि तिच्या गँगशी आपला खाऊ वाचवण्यासाठी बिम्मला संघर्ष करावाच लागतो. त्यासाठी बिम्मकडे कोणतेही प्रत्यक्ष साधन उपलब्ध नसते. त्यासाठी मग तो त्याच्या हुकुमासरशी धावून येणार्‍या पावसाचे काल्पनिक हत्यार वापरतो.

IBroughtThatRain
I Brought That Rain. (Image Credit: Getty Images)

एकीकडे बिम्मची आई नि इतर बायका पावसाने ओढ दिल्याबद्दल बोटे मोडत असतात. त्यांना हवा तेव्हा पाऊस आलेला नाही. पण बिम्मला हवा तेव्हा मात्र तो येतो. ‘पाऊस पाडून तुमचा खेळ बंद पाडतो’ या त्याने दिलेल्या पोकळ धमकीनंतर योगायोगाने तो येतो आणि त्यातून हवा तेव्हा पाऊस पाडण्याच्या बिम्मच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होते. वयाने आणि शारीरबळाने वरचढ असलेल्या त्या मुलींवर हुकूमत गाजवण्यासाठी त्याला एक हत्यार मिळून जाते.

इतक्या लहान वयात बिम्मने प्राचीन समाजातील पर्जन्यनृत्यांच्या वा प्राकृतिक घटकांवर नियंत्रण मिळवण्याच्या गोष्टी ऐकल्या असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरीदेखील त्याचा विचार नेमक्या त्याच मार्गाने जातो आहे. जे अनायासे घडते ते हेतुत: घडवू इच्छिणार्‍या मानवाच्या संस्कृती-प्रवाहाचा तो ही एक भाग होतो आहे.

प्रथम त्या मुलींनी आपल्याला खेळायला घेतले नाही म्हणून बिम्मने पाऊस पाडण्याची धमकी दिली होती. त्याच्यापुरती ती एक पोकळ धमकी होती. त्यामध्ये कोणताही कार्य-कारणभाव त्याला अपेक्षितही नव्हता. परंतु प्रत्यक्षात पाऊस पडल्याने त्याच्या त्या शक्तीबाबत त्या मुलींचा संशय फिटला आहे. आता त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती बिम्मला खुणावते आहे. आपण बोलावल्याने पाऊस आलेला नाही हे कदाचित बिम्मच्या वयाच्या मुलालाही ध्यानात आले असेल. पण जे घडले त्याने ‘त्याची धमकी सत्यात आणता येऊ शकते’ असा संभ्रम त्या मुलींच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि त्या संभ्रमाचा फायदा आता बिम्म घेणार असतो.

अशा काल्पनिक हत्याराचे यश प्रामुख्याने त्याचे अस्तित्व, त्याची भीती समोरच्याचा मनात निर्माण करण्यावर अवलंबून असते. त्या काल्पनिकतेची वास्तव परिणामांशी सांगड घालून तिच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करता येतो. योगायोगाने पडलेल्या पावसाने बिम्मला त्यात यश मिळून जाते. इथे मला शाळेत असताना 'आपली पण गँग आहे, तुला बघून घेईन.' अशी बतावणी(bluff) वा पोकळ धमकी देऊन दांडगट पोरांपासून आपला बचाव करू पाहणारी दुबळी मुले आठवतात.

बिम्मच्या 'सामर्थ्या'चा पुरावा त्या पोरींना आता समोर दिसला आहे. बाजी उलटली आहे. आता बिम्मच त्या मुलींना पाऊस पाडून त्यांचा खेळ विसकटण्याची धमकी देतो आहे. आता केवळ खेळायला घेण्यापलिकडे जाऊन त्याला त्यांच्यावर हलकासा सूड उगवायचा आहे. आजवर त्याच्या खिशातील खाऊ लुटणार्‍या त्या ढालगज पोरींना त्याला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तो आता त्यांना त्यांच्याकडील सारा खाऊ आपल्याला मिळावा अशी मागणी करतो नि प्रत्येकीच्या खाऊचा अगदी शेवटचा कण तो वसूल करतो.

पण या सार्‍यात विजूसारखी एक मुलगी अशी निघतेच, जी बिम्मच्या या धमकीला भीक घालत नाही. मग तिच्याऐवजी भेदरलेली यास्मिन त्याला तिच्या वाटचा खाऊ द्यायचे कबूल करते नि बिम्ममहाराजांचा 'कोप' शांत करते. शिवाय दांडगट चंद्रीही विजूला पकडून तिची सारी करवंदे बिम्मला द्यायला लावते.

GiveYourFoodToHim
Give your food to him.(Image Credit: Getty Images)

विजूला काल्पनिक बळाची भीती नाही, पण चंद्रीच्या शारीरबळाची आहे. कदाचित तिने ते अनुभवले आहे. याउलट शारीरबळात तिच्यापेक्षा उजवी असलेली चंद्री मनोबलात तिच्यापेक्षा दुबळी आहे. बिम्मसारख्या धिटुकल्या मुलाच्या पाऊस पाडण्याच्या धमकीला केवळ एकाच अनुभवावरून ती बळी पडली आहे.

एकाच निरीक्षणातून- अथवा त्याच्या आभासातून कार्य-कारणभाव सिद्ध झाल्याचे मानणारी, वारंवारतेच्या आवश्यकतेला नाकारणारी उतावीळ, एकांगी वा मनोदुर्बल माणसे आपल्या आसपास अनेक दिसतील. त्या अर्थी चंद्री ही एका मोठ्या समाजगटाचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या या मानसिक दुर्बलतेमुळे विजूला नमवण्याचे बिम्मचे काम झाले आहे. प्रत्यक्ष बळापेक्षा त्यावरील अप्रत्यक्ष नियंत्रणही अनेकदा आपले काम करून देऊ शकते. (जुन्या तमाशापटांतून धिप्पाड शरीराचे बेरड अथवा रामोशी अंकित ठेवून त्यांच्या बळावर सत्ता गाजवणारे पाटील आठवा.) त्यातून त्या दोघींपेक्षा सर्वच दृष्टीने दुबळा बिम्मच अखेर वरचढ ठरुन जातो. हा धडा तितकी विचाराची झेप अजून विकसित न झालेल्या बिम्मला जरी कळला नाही, तरी तो त्याच्या आईच्या वयातल्या एखाद्या वाचकाला उमगायला हवा.

’देव’ नावाच्या कुण्या काल्पनिक सत्तेची ठेकेदारी करत सर्वसामान्यांवर वर्चस्व गाजवणारा सर्वधर्मीय पुरोहितवर्ग याहून वेगळे काय करत असतो? पाच-पंचवीस भाकितांपैकी एखादे अनमानधपक्याने खरे ठरले, की त्याच्या आधारे त्यांची दैवी ठेकेदारी सामान्यांच्या मनात रुजून जाते. तरीही शिल्लक राहिलेल्या विवेकी विजूसारख्यांचा नि:पात करण्याचे काम मानसिक गुलाम झालेल्या चंद्रीसारख्या बाहुबली पार पाडत असतात.

बिम्मच्या निरागस पातळीवरही पावसाचे- काल्पनिक का होईना, एक हत्यार हाती आल्याने उफाळून आलेल्या वर्चस्ववादी प्रेरणेला तो उपभोगतो आहे. इथे जीएंनीच अनुवाद केलेल्या विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ची आठवण होते. माणसाच्या पिलांमध्ये कोणत्याही नियंत्रक व्यवस्थेअभावी ही वर्चस्ववादी प्रेरणा किती हिंस्र पातळीवर उतरते याचे स्तिमित करणारे दर्शन त्यात गोल्डिंगने घडवले आहे. संस्कार-शिक्षणाने माणसाच्या जिज्ञासेची निरभ्रता काळवंडून जात असली तरी त्यातूनच मनुष्यप्राण्याचा माणूसही होत जातो.

‘पावसालाही अंकित केले तर...’ ही कल्पना तशी आश्वासक आहे आणि दाहकही असे वर का म्हटले याची एक अत्यंत लहानशी चुणूक बिम्मने दाखवली आहे. कारण पाऊस नियंत्रित करता आला तर तो अग्निप्रमाणेच हवा तिथे, हवा तितकाच वर्षेल अशी तजवीज करता येईल, तसेच त्या साधनाला हत्याराचे रूप देऊन इतर कुणाला पीडा देण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकेल. 

माणसाच्या हिंसेला भौतिक शस्त्रे पुरेशी न वाटून त्याने रासायनिक, जैविक माहितीला, ज्ञानाला, निर्मितीला हत्यारांचे रूप देऊन आपल्यातील मि. हाईडला(२) आणखी बळ पुरवले आहे. कल्पना करा एखाद्या राष्ट्राने मोसमी पावसाच्या ढगांवर नियंत्रण मिळवून शेजारी, शत्रूराष्ट्रामध्ये पाऊसच पडणार नाही याची तजवीज केली तर... माणसातल्या माणूसपणाचा तो अंत तर ठरेलच पण मनुष्यप्राण्याने मानव होताना अन्य प्राणिमात्रांहून प्रगती नव्हे तर अधोगतीचा मार्ग निवडला आहे यावरही शिक्कामोर्तब होईल.

‘पाऊस आला की मुलींचा खेळ थांबतो, त्यांना दु:ख होते.’ हे पाहून त्यांना दु:ख देण्यासाठी पाऊस पाडला पाहिजे याची जाणीव बिम्मच्या मनात उमटणे हा त्याच्यातील मि. हाईडचा जन्म म्हटला पाहिजे. हेतुत: कुणाला दु:ख देण्याचा, सूडाची भावना त्याच्या मनात उदयाला आली ती जीवनदायी पावसाचे बोट धरून. माणसाच्या आयुष्यातील प्रगतीचे प्रत्येक पाऊल हे पुढे नेणारे असते तसेच मागेही याचे हे उत्तर निदर्शक म्हणावे लागेल.

पण बिम्म नि पावसाची गोष्ट इथे संपत नाही...

पाऊस आल्याने घरात येऊन, मुलींचा सारा खाऊ गट्ट करुन ताजेतवाने झालेल्या बिम्मला शाळेच्या आवारात आपल्या गाठोड्याशेजारी बसून रडणार्‍या पमी पठाणची आठवण होते. ’अशा पावसात ती अडकली असेल की आधीच घरी गेली असेल?’ असा प्रश्न त्याला पडतो. तो प्रश्न ऐकून त्याची आईदेखील अचानक गंभीर होऊन जाते. तिने गंभीर का व्हावे हे पुन्हा थोडे तर्काने जाणून घ्यावे लागते.

पमी ही पहिल्याच इयत्तेत अनेकदा नापास होऊन शाळा सुटलेली, इतर मुलींप्रमाणे बिम्मचा खाऊ हिसकावून न घेणारी. बाकीच्या मुली शाळेत गेल्यावर करण्यासारखे काहीच नसल्याने शाळेच्या आवारात स्वतःशीच बोलत बसणारी. बब्बी तिच्याशी खेळे, पण तिला घरी बोलावत नसे. आसपासच्या आयाबाया तिच्याकडून कामे करून घेत, क्वचित तिची मस्करीही करत. ती मात्र ती मस्करी मनावर न घेता स्वत:वरच हसे नि ती गंमत इतरांना सांगून त्यांनाही हसवी.

`तिचे कपडे तिच्या मापाचे कधीच नसत'. या एकाच वाक्यात जीएंनी तिची सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. जरी स्पष्टपणे लिहिले गेलेले नसले तरी पमी ही बेघर/अनाथ किंवा अतीव दरिद्री घरातील असावी असा तर्क सहज करता येतो. तसे असेल तर इतरांच्या दृष्टीने अमृतधारा होऊन वर्षणारा तो धुवांधार पाऊस तिच्या जगण्यातील खडतर मोसमाची सुरुवात करणारा ठरतो. कदाचित हे जाणवल्यामुळेच बिम्मची आई गंभीर झाली असावी. आपल्या हाती केवळ तर्कच उरतो.

WhenWillTheRainStop
हा पाऊस कधी थांबेल?
(श्रीनगरच्या एका रस्त्यावरील छायाचित्र).

‘पावसाने कुणाच्या आयुष्यातील समस्यांचा निरास होतो, तर कुणासाठी त्यांची सुरुवात होत असते’ हे एक वास्तव, पमी पठाणमुळे बिम्मच्या विचारात नसले तरी जाणिवेत शिरत असते. पावसाला हत्यार म्हणून वापर करणार्‍या, त्याच्या साहाय्याने कुणावर सूड घेण्याची कल्पना सुचलेल्या बिम्मच्या मनात त्या हिसेंवर करुणेचे शिंपण करणारे ते दोन थेंबही शिंपडले जातात. तो पाऊस महत्त्वाचा तसाच हा ही.


(क्रमश:) पुढील भाग >> Foot that fits     

-oOo-

(१). केवळ आवाहनासाठीच नव्हे काही वेळा वर्षा-स्वागताची नृत्येही केली जात असावीत. प्रसिद्ध अभ्यासक जेन गुडाल हिने चिम्पान्झी माकडांच्या अभ्यासादरम्यान त्यांनी पावसाच्या स्वागतासाठी केलेल्या वर्षा-नृत्याची नोंद केलेली आहे. पुढे मानवाने शेतीप्रधान जीवन स्वीकारले आणि ही वर्षा-हर्ष नृत्ये सुगीच्या मोसमापर्यंत पुढे सरकली असावीत.

(२) रॉबर्ट लुई स्टीव्हनसन या लेखकाच्या ’द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाइड’ या लघुकादंबरीतील एक पात्र. एखाद्या सप्रवृत्त व्यक्तिच्या मनात दडून असलेल्या दुष्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून याच्याकडे पाहिले जाते.


हे वाचले का?

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ७: अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

रंगांचे कोडे << मागील भाग
---

बिम्मच्या पतंगावरून आतापावेतो झालेल्या प्रवासामध्ये त्याने प्रतिबिंब, सावली, पक्षी, रंग, फळे यांच्या संदर्भात निरीक्षण-शक्तीचा उपयोग केला आहे. त्याद्वारे भवतालाचे आकलन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या सर्व टप्प्यांमध्ये तो केवळ निरीक्षक आहे, जिज्ञासू आहे. त्याची भूमिका अकर्मक आहे. भवतालावर परिणाम घडवणारी कोणतीही कृती त्याने अद्याप केलेली नाही. निरीक्षणांकडून अनुकरणाकडे जाण्याची, अकर्मकता झाडून सकर्मक होण्याची, कृतीप्रवण होण्याची वेळ आता आलेली असते.

आयुष्याचा प्रवास बिम्म जेव्हा सुरु करतो तेव्हा स्वत:हून केलेली पहिली कृती असते ती पहुडल्या ठिकाणी पालथे पडणे. ही पहिली कृती घरच्या मोठ्यांकडून नावाजली गेली आणि त्यातून भवतालाकडे पाहण्याचा - शब्दश: - वेगळा दृष्टिकोन मिळतो हे उमगले की त्याला स्वावलंबी आयुष्याची चाहूल लागते. त्यातून स्वप्रेरणेने आणखी काही कृती करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होतात. मग यथावकाश उठून बसणे, रांगणे, पलंग वा खुर्चीसारख्या एखाद्या भक्कम वस्तूला धरून उभे राहणे, त्यानंतर तो आधार न सोडता पाऊल पुढे टाकणे नि अखेर केवळ स्वत:च्या पायांचा भरवसा धरून तो आधारही सोडून चालू लागणे, ही माणसाच्या पिलाने स्वावलंबी आयुष्याकडे टाकलेली पहिली काही पावले.

पण निव्वळ स्वप्रेरणेपलिकडे बाह्य प्रेरणेनेही ते काही कृती साधू लागते. आपले बोट, खुळखुळा वा pacifier यांसारख्या गोष्टी आई-वडील त्याच्या हाती देत असतात. मग त्या प्रेरणेने पालथे पडलेले असताना समोरचे खेळणे वा अन्य काही पकडण्याचा प्रयत्न करते. ते मूल बसते झाल्यावर आई-वडीलही फळांच्या फोडी वा तत्सम हाती पकडता येतील असे खाद्यपदार्थ त्याच्यासमोर ठेवून ते स्वहस्ते खाण्यास उद्युक्त करतात. मग ते मूल हाती सापडेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करू लागते. भुकेचा निरास हे एकमेव सुख तोवर त्याच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये आलेले असते आणि हे सुख तोंड या अवयवामार्फत साध्य होत असते. त्यामुळे जे आवडते त्याचा आस्वाद तोंडाने घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होतो. सुख मिळवण्यासाठी ती एकच कृती त्याला ठाऊक असते. जे आवडेल ते सारे त्या कृतीच्या कक्षेत आणून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात असतो.

समोर येईल ती गोष्ट तोंडात घालण्यास सुरुवात झाली, की तिची जिभेला जाणवलेली चव किंवा आई-वडिलांनी त्याला दिलेले प्रोत्साहन वा केलेला प्रतिरोध यातून काय तोंडात घालावे नि काय नाही याची समज विकसित होत जाते. पुढे बरेच मोठे नि कमावते झाल्यावर आवडलेल्या वस्तूचे स्वामित्व मिळवण्याची- ती विकत घेण्याची वा इतर कुणाकडून हिरावून घेण्याची प्रवृत्ती ही मूलपणातील काहीही आवडले की उचलून तोंडात घालण्याचा प्रयत्न करण्याची आवृत्ती म्हणावी लागेल. कारण तोवर स्वामित्व मिळवणे ही कृती सर्वाधिक सुखाचा स्रोत म्हणून मनुष्यप्राण्याने निश्चित केलेली असते.

हे बसते-रांगते मूल बिम्मच्या वयात येते- म्हणजे चालू-बोलू लागते, घराचे कुंपण ओलांडून बाह्य जगाची ओळख करून घेऊ लागते, तेव्हा त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावतात. आता निव्वळ प्रेरणेपलीकडे जाऊन जाणीवपूर्वक काही कृती ते करू लागते. पहिली कृती ही स्वतंत्र विचारातून न येता अनुकरणातून येत असते आणि अनुकरणाआधी निरीक्षण आवश्यक असते. निरीक्षण हे प्रामुख्याने आपल्यासारख्या दोन हात नि दोन पाय असलेल्या जीवांचे - प्रामुख्याने कुटुंबातील व्यक्तींचे - केले जात असते, तसेच आसपासच्या जीवमात्रांचे, निर्जीव वस्तूंचे, घटनांचेही. त्यातून माहिती, साधर्म्यसंगतीचे भान आणि अखेरीस आकलन या मार्गाने प्रवास होत जातो.

डोळे, नाक, कान, जिंव्हा आणि स्पर्श या पाच ज्ञानेंद्रियांच्या आधारे आकलनाचा प्रवास बिम्मपणात पाऊल ठेवण्याच्या बराच आधी सुरू झालेला असतो. मूल पालथेही पडत नसते तेव्हा त्याचे डोळे नि कान भवतालाशी नाते जोडत असते. माणसाच्या संवादी भाषेतील ज्यांना शब्द म्हणून मान्यता आहे असा ध्वनिसमूह त्याच्या तोंडून बाहेर पडण्यापूर्वीच त्याची अभिव्यक्ती कार्यरत झालेली असते. त्याच्या आई-वडिलांना, घरच्या इतर व्यक्तींना अगम्य वाटणार्‍या अशा ध्वनिसमुच्चयातून ती प्रसारित होत असते.

पण त्यातून संवाद प्रस्थापित होत नाही हे ध्यानात आल्यावर इतरांच्या तोंडून निघणार्‍या ध्वनिसंकेतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरु होतो. त्यासाठी आधी इतरांच्या तोंडून ऐकू येणार्‍या या ध्वनिसंकेतांचा अर्थ लावणे सुरू होते. त्यासाठी या मुलांचा मेंदू कार्यरत होतो. मग आई-वडिलांची भाषा नि त्या मुलाची भाषा यांचा द्वैभाषिक संवाद सुरू होतो.

माझी भाची साधारण सहा महिने-वर्षभराच्या वयाची असताना भूक लागली की मँ, अँ अशी स्वरावली तिच्या तोंडून निघत असे. तिकडे लक्ष दिले नाही की आरडाओरडा सुरू होई. ती दंगा करु लागली की आम्ही खाण्याचा आविर्भाव करत विचारायचो, ’मँ का?’ त्यावर ’हो’ या अर्थाचा एक ’अँ’ वा ’हँ’च्या दरम्यानचा उच्चार येई. याचा अर्थ आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे आकलन तिच्या मेंदूद्वारे होत असे आणि आमच्याच भाषेत नाही तरी तिच्या गळ्याला साध्य झालेल्या ध्वनिसंकेतांतून उत्तरही दिले जात असे.

काही वेळा मी मुद्दाम पेडगांवला जाऊन एखादे खेळणे दाखवून ’हे का?’ असे विचारले की हाच उच्चार जरा जोरकस नि पुनरावृत्त होत जाई, साधारणपणे ’अँ हँ हँ हँ...’ असा. त्याचा अर्थ ’नाही’ असा होता. काही वेळा जरा अधिक ताणून धरण्यासाठी आणखी एक-दोनदा हा प्रकार केला असता आवाजाबरोबरच त्याचवेळी हातपाय वेगाने हालचाल करत. याचा अर्थ ’अजिबात नाही’ किंवा ’एकदा सांगितलं ना नाही म्हणून’ असा होता. मग पुन्हा ’मँ का?’ या प्रश्नाला अँ वा हँ ने उत्तर देतानाच त्या सोबत पोट उचलून दुजोरा दिला जाई. म्हणजे ध्वनिद्वारे दिलेल्या उत्तराला शारीर हालचालींनी अधिक ठळक करण्यात येत असे.

या प्रकारे बहुपर्यायी प्रश्नोत्तरे होऊन मुलाला काय हवे ते मोठ्यांना समजू लागते. परंतु मोठी माणसे वापरतात तेच ध्वनिसंकेत भाषा या संज्ञेला पात्र असतात असा आपला समज असतो. हे दुभाष्याखेरीज होणारे दोन भाषांमधले संभाषण आहे हे आपल्याला ध्यानात येत नाही. कारण आई-वडिलांची भाषा अद्याप आत्मसात न केलेल्या मुलाची स्वत:ची अशी भाषा विकसित होऊ लागलेली आहे याची जाणीव आपल्याला होत नसते.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की आजवर कधीही, कुठल्याही प्रकारे परस्परांशी संपर्क न आलेल्या दोन भाषिक समूहातील व्यक्तींमध्ये होणारे संभाषण साधारण असेच सुरू होईल नि हळूहळू संवादाचा पूल बांधला जाईल. संवादाचे हे माध्यम जेव्हा सर्वच सहभागी संवादकर्त्यांच्या आकलनाच्या कक्षेत येते तेव्हाच संवाद सुकर होत असतो. त्यामुळे भाषा ही नेहमीच एका समूहाचे संवाद-माध्यम म्हणून रुजत जाते. त्यामुळे भाषा या संज्ञेला पात्र होण्यासाठी ध्वनिसंकेतांच्या समुच्चय किमान दोन व्यक्तींना आकलनयोग्य असायला हवा. (आयनेस्कोच्या ’र्‍हिनसोरस’मध्ये ’माझी भाषा माझ्याशिवाय कुणालाच समजत नसेल तर तिला भाषा म्हणता येईल का?’ असा प्रश्न बेहॉन्जेला (Berenger) पडलेला आहे.)

मुलाची ही ’भाषा’ त्याला स्वत:ला सोडून इतरांना- अगदी आई-वडिलांनाही उमगत नसल्याने संवादास निरुपयोगी ठरते. ती सोडून त्याला निमूटपणे आपल्या घरातील इतरांची भाषा स्वीकारणे भाग पडते. यथावकाश ते मूल आई-वडिलांना उमगणारा पहिला शब्द उच्चारते. तो बहुधा आई, बाबा, मामा, पापा असा स्वरप्रधान किंवा द्विरुक्तीप्रधान असतो. त्या मुलाने उच्चारलेला तो पहिला कुटुंबमान्य अधिकृत शब्द ठरतो आणि ते मूल ’माणसांत’ आल्याचा जल्लोष होतो. मोठ्यांच्या उच्चारांचे अनुकरण ही त्या मुलाची स्वप्रेरणेने केलेली पहिली ठोस भाषिक कृती म्हणता येईल. त्यानंतर त्या मुलाची प्रगती त्याच मार्गावरून होऊ लागते.

माणसांमध्ये भाषा ही अगदी अमूर्त, अनुपस्थित, वर्तमानापलिकडील गोष्टींबाबतही बोलावे इतपत प्रगत झालेली असली, तरी इतर प्राण्यांतही त्यांच्या आपसांतील संवादास पुरेशी अशी भाषा वा संवाद-माध्यम विकसित झालेले असते. आदिम माणसामध्ये प्राण्यांहून अधिक प्रगत अशी संवाद-भाषा विकसित होत होती तेव्हाच त्याने अभिव्यक्तीला निरपेक्ष पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक गुंफाचित्रांमधून एक वर्तुळ नि पाच रेषांनी काढलेला मानव, अशाच रेषासमुच्चयाच्या आधारे रेखाटलेले हरीण वगैरे चित्रे सापडलेली आहेत. हा ही अनुकरणाचाच एक मार्ग म्हणता येईल.

इथे ध्वनिसंकेतांऐवजी रेखाटनांचा आधार घेतला आणि हेतू संवादाऐवजी दस्तऐवजीकरणाचा दिसतो. मी हरीण पाहिले, ते मला कसे दिसले त्याला प्रातिनिधिक स्वरूपात मी रेखाटतो नि त्यातून - उदाहरणार्थ - शिकारीचे पाहिलेले दृश्य गुहेच्या भिंतीवर नोंदवून ठेवतो असा त्याचा पहिला माफक हेतू होता. पुढे या रेखाटनांतून निर्माण झालेल्या काही आकृतींची तोंडून निघणार्‍या ध्वनिसंकेतांशी सांगड घालून भाषेला लिपी देण्यात आली. (त्याही पूर्वी काही चित्रांना अंकांचे स्वरूप मिळाले.)

लिपी मिळाली आणि माणसाच्या अभिव्यक्तीची व्याप्ती वाढली. कारण लिखित संवाद साधण्यासाठी दोन्ही - अथवा एकाहुन अधिक - संवादी एकाच ठिकाणी अस्तित्वात असण्याची गरज संपली. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये अभिव्यक्तीने माध्यम गुंफा-भिंत, शिळा यांसारखे अचल माध्यम सोडून भूर्जपत्रे, कागद यांसारख्या सुटसुटीत, माणसासोबत सहजपणे स्थलांतर करू शकणार्‍या माध्यमांचा स्वीकार केला. आता अभिव्यक्ती एका वेळी, एका ठिकाणी, तर तिचा ग्राहक, तिचे आकलन व तिचा प्रतिसाद अन्य वेळी, अन्य ठिकाणी अशी किमया साधली गेली. लिपीमुळे नि माध्यमबदलामुळे मनुष्य-संवाद स्थल-कालाच्या बंधनातून मुक्त झाला.

मनुष्यप्राण्याने स्थलकालापलिकडचा पहिला संवाद हा पत्ररूपाने केला होता. असंगत (asynchronous) संवादाचे हे आद्य माध्यम आज वैय्यक्तिक संवादाच्या दृष्टीने बव्हंशी कालबाह्य झालेले असले, तरी व्यावसायिक व प्रशासनिक देवाणघेवाणीसाठी अजूनही वापरात आहे. याचे कारण लिखित दस्तऐवजाला अधिकृततेचा जो दर्जा आहे तो संगणकीय माध्यमांतील दस्तांना अजूनही मिळालेला नाही.

बिम्मचे वडील परगावी राहात. त्याकाळी टेलेफोन हे माध्यमही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हते. त्यामुळे आई-वडिलांचा संवाद हा प्रामुख्याने पत्रामार्फतच चाले. वडिलांकडून आलेले पत्र नि आईने त्यांना उत्तरादाखल लिहिलेले पत्र हे बिम्मच्या निरीक्षणाचा भाग होते. आणि अनुकरणाच्या एका टप्प्यावर तो ही वडिलांना पत्र लिहिणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.

TheWokeBaby
स्वत: लिहिलेला घोषणाफलक उंचावणारी सॅम सोरीची मुलगी.

काही काळापूर्वी मला एक हृद्य छायाचित्र पाहायला मिळाले होते. त्यात एक-दीड वर्षांची एक लहान मुलगी पुठ्ठ्यावर ओढलेल्या रंगीबेरंगी रेघोट्यांचा एक फलक घेऊन आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसलेली होती. हे छायाचित्र एका निषेध मोर्चामध्ये काढलेले होते. त्याच्या मागची कथा अतिशय रोचक होती. सॅम सोरी हा बाप नि त्याच्या पत्नीने आपल्या मुलीच्या हाती तिने स्वत:च रंगवलेला हा फलक दिलेला होता. या दांपत्याने त्या मागची आपली भूमिका पुढे विशद केली. (ती ’जागी झालेली मुले’ या ’वेचित चाललो...’ वरील लेखात वाचता येईल. )

आज संगणकाच्या नि मोबाईलच्या जमान्यात जन्मलेल्या बिम्मना आई-वडील हाताने काही लिहित आहेत, चित्र काढत आहेत हे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे बिम्मच्या आयुष्याचे हे अनुषंग आता जवळजवळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पण अगदी एक-दीड दशकांपूर्वी मुलांच्या कुतूहलाचा आणखी एक विषय होता तो म्हणजे आईबापाचे अनुकरण करत त्यांचे पेन-पेन्सिल घेऊन कागदावर ‘अब्याश करणे’ किंवा ‘चित्लं काढणे’ या नावाखाली काहीतरी बरबटून ठेवणे. (आता आई-वडिलांचा मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहात बसतात. हे ही अनुकरणच. ) बिम्मही याला अपवाद नव्हता.

परगावी असलेल्या बाबांना आई पत्र लिहिते, तसेच तिकडून बाबांनी लिहिलेले पत्रही येते हे बिम्मने पाहून ठेवले होते. त्यांच्या पत्रातून आईला घरासंदर्भात अनेक गोष्टींबाबत सूचना केलेल्या असत यांची नोंदही त्याने घेतलेली होती. मग एकदा एक कोरा कागद घेऊन त्याने बाबांच्या नावे आईला एक पत्र लिहिले नि लिफाफ्यात टाकून आईच्या हाती ठेवले. तिने ते पत्र उघडले तर त्यात सॅम सोरीच्या त्या छोटीप्रमाणेच आडव्या उभ्या रेघांचे कडबोळे खरडून ठेवलेले असते.

अशा वेळी बहुधा आई बहुधा ‘कामात आहे, नंतर वाचते हां’ वगैरे काहीतरी कारण काढून बोळवण करेल, ते त्यानेच लिहिलेले आहे हे ठाऊक असल्याने उगाचच ‘बाबांचे अक्षर छान आहे’ वगैरे आडवळणी खोटी स्तुती करेल; फारच कामात असेल तर वैतागेल, बिम्मला कामाची खोटी केल्याबद्दल रागे भरेल. पण बिम्मची आई हुशार होती. पत्र कागदावर नाही तर मनात प्रथम उमटते हे तिला ठाऊक होते. कागदावरचे जाऊ द्या, निदान मनातले तरी काढून घ्यावे म्हणून ती आपण कांदे चिरत असल्याने डोळ्यात पाणी आले असल्याने नीट वाचता येणार नाही अशी बतावणी करते आणि म्हणून ‘तूच ते वाचून दाखव बघू.’ असे सुचवते. (सार्‍यांच्या आया इतक्या सुज्ञ झाल्या तर पोरे किती सुखी होतील नाही?)

BabyWritingLetter

त्या पत्रात बाबांनी सारे काही बिम्मबाबतच लिहिलेले असते. ’बिम्मला मागेल त्यावेळी लाडू द्यावा, त्याला त्रास देण्याबद्दल बब्बीला रागवावे, त्याला कुठली कुठली फळे घेऊन द्यावीत, बाहेर जाताना बरोबर न्यावे वगैरे 'ऑर्डर्स' आईला दिलेल्या असतात. वडिलांनी आईला नि आईने वडिलांना पत्र लिहिणे हा त्यांच्या संवादाचा, देवाणघेवाणीचा भाग आहे. पण बिम्मचे पत्र हे केवळ त्याच्या स्वत:च्या संदर्भातच आहे. इतकेच नव्हे तर ते पत्र स्वत: बिम्मने लिहिलेले नाही, बाबांनी लिहिले आहे अशी बतावणी त्याने केली आहे.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की बाबांनी केलेल्या सूचना आई वाचते, अनेकदा त्यानुसार आई वागते हे एव्हाना त्याच्या लक्षात आले असावे. मग त्यामध्ये बाबांनी बिम्मला हवे ते सारे करण्याची सूचना आईला दिली तर आई त्या पाळेल असा त्याचा अंदाज आहे. आता बाबांच्या नावे आपण आपल्याला हवे ते पदरात पाडून घेऊ शकतो इतपत स्वार्थाची जाणीव त्याला झालेली आहे. आईवडिलांच्या दृष्टीने संवाद-माध्यम असलेल्या पत्राला त्याने स्वार्थ साधण्याचे साधन म्हणून रूपांतरित केले आहे. निरीक्षणातून रुजलेल्या आकलनातून साधनांचा वापर कसा करावा हे बिम्म शिकू लागला आहे.

पेन वा पेन्सिल घेऊन कागदावर काहीतरी खरडणे बिम्मला जमत असले, तरी त्याला आकाराचे ज्ञान अजून झालेले नसते. ते होईल तेव्हाही त्याला कागदावर उतरवणे हे एक वेगळेच कौशल्य असते, जे स्वतंत्रपणे आत्मसात करावे लागते. पण लिपी म्हणजे अनेकांना ओळखता येणार्‍या मोजक्या चित्रांची जंत्री एकापुढे एक मांडून त्यांना अर्थ देणेच असते. त्यामुळे अक्षराआधी ओळख व्हावी लागते ती आकारांची आणि त्यांतून तयार होणार्‍या चित्रांची. आणि आदिमानवाने चित्रे काढण्यासाठी जसे आसपास दिसणारे प्राणी, सजीव व साधने यांची निवड केली तसेच आधुनिक बिम्मच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये ’मॉडेल’ म्हणून घरातील माणसांची वर्णी लागत असते.

एकदा बिम्मने आई आणि बब्बीचे चित्र काढले. माणूस म्हटले की एक डोके नि हातापायांची प्रत्येकी एक जोडी एवढे प्रातिनिधिक रूप तूर्त पुरे असा त्याचा बाणा असतो. पण हे ’चित्रीकरण’ एवढ्यावर थांबत नाही. पूर्वी एकदा खरोखरच्या बेडकीने बब्बीच्या पायावर उडी मारली तेव्हा ती घाबरुन किंचाळली होती हे त्याने ध्यानात ठेवले होते. त्यामुळे ते चित्र अधिक वास्तववादी होण्यासाठी त्याने बब्बीच्या तिच्या पायावर बेडूक काढून ठेवलेला होता. (ते चित्र काय आहे हे आईला नि बब्बीला आधी समजावून सांगावे लागले इतके अप्रतिम होते हा भाग वेगळा.) त्या चित्रातही आपल्या पायावर बेडूक आहे हे समजल्यावर बब्बी पुन्हा एकवार पाय झाडत किंचाळली.

या चित्राची आणखी एक गंमत म्हणजे त्या चित्रात आई बब्बीच्या गुडघ्याइतक्या आकाराची होती. याचे कारण आई आणि बब्बी या दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहतो आहे नि त्यांचे चित्र काढतो आहे. त्या दोघी एकत्रितरित्या एका मोठ्या देखाव्याच्या, वास्तवाच्या भाग आहे याचे आकलन त्याला अद्याप झालेले नाही, आणि झाले असले तरी ते कागदावर उतरवण्याचे कौशल्य त्याला अद्याप आत्मसात झालेले नाही. दोन वस्तू सोबतीने अस्तित्वात असण्यामध्ये असलेले प्रमाणाचे वा गुणोत्तराचे भान त्याच्याकडे अजून नाही. पुढे मोठे झाल्यावर ते झाले तरी ते कागदावर उमटवणे जमेलच असेही नसते. कागदावर वा भिंतीवर मनाला वाटेल तशा रेघा मारण्यापासून सुरू झालेली वाटचाल आकार, प्रमाण, प्रातिनिधिक रूपे, सह-अस्तित्वाची इतर परिमाणे या मार्गाने चालू राहते आणि अखेर अनुकरणाचे अथवा वास्तवाचे बोट सोडून कल्पनेच्या साम्राज्यात प्रवेश करते.

FinalDestination
Credit: Getty Images/Dennis Hallinan

पत्र असो वा चित्र, त्याची वास्तवाशी कुठेतरी सांगड घातलेली असते हे बिम्मला समजते. बाबांच्या नावावर पत्र लिहून स्वार्थ साधण्याचा त्याचा प्रयत्न आईने उधळून लावला होता. पण चित्रात आपल्या पायावर बेडूक बसलेला पाहून बब्बी पुन्हा किंचाळल्याने त्याने चित्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वत:चे चित्र काढून त्याच्या हाती दोन लाडू काढून ठेवले नि ते आईला दाखवले. वास्तवाचे चित्रांत रूपांतर करता येत असेल तर चित्राचेही वास्तवात रूपांतर व्हायला काय हरकत आहे, नाही का? ...आईच्या समंजसपणाने या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळते!

पत्र हे आज्ञार्थक होते, फसवणूक करणारे होते; तर चित्र हे अप्रत्यक्ष विनंती करणारे आणि प्रामाणिक होते. कदाचित म्हणून दोहोंच्या यशापयशाची शक्यताही वेगवेगळी होती हे पुढे मोठे झाल्यावर बिम्मला समजणार असते.


(क्रमश:) पुढील भाग >> पाऊस     

-oOo-


हे वाचले का?

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ६ : रंगांचे कोडे

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

खेळ सावल्यांचा << मागील भाग

---

एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. ही वस्तू बिम्मने प्रथमच पाहिली. ते काय आहे नि त्याचा उपयोग काय असा प्रश्न चौकस बिम्मला पडला नसल्यासच नवल. तो एक पिंजरा आहे नि ते एका ’पिवळ्या’ पक्ष्याचे घर आहे.’ असे आईने त्याला सांगितले. मागच्या आवारात वा बागेत खेळताना त्याने अनेक पक्षी पाहिले होते, त्यामुळे त्याला पक्षी ठाऊक होते. पण आईने वापरलेला ’पिवळा’ हा शब्द, ही गोष्ट काय असावी असा प्रश्न त्याला पडला असेल. त्यातून वस्तू वा जीवमात्रांमध्ये दिसणारे रंग हे त्याच्या कुतूहलाच्या कक्षेत येऊ लागले असतील.

बिम्मच्या वयाचं मूल घरात रांगू लागतं, भिरभिर फिरु लागतं, घराबाहेर पाऊल टाकतं तेव्हा त्याला ते रंग दिसत असतात. तेव्हा रंग म्हणजे काय हे त्याला समजत नसले, तरी विविध गोष्टींचे वेगळेपण त्याच्या मनात नोंदले जात असेल. नीनमच्या- त्या पिवळ्या पक्ष्याच्या शोधात भटकताना बिम्मला वेगवेगळ्या रंगांचे पक्षी भेटले. त्यातून विविध रंगांची ओळख त्याला झाली. पण रंग हे काही फक्त पक्ष्यांनाच असतात असे नाही. आजूबाजूच्या सजीव-निर्जीव सर्वच गोष्टींना रंग असतात असे हळूहळू लक्षात येऊ लागते. ज्याप्रमाणे आईच्या बोलण्यात ’पिवळा’ हा शब्द पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणून आला, तसेच शर्ट, पिशवी, पडदे, उशीचे अभ्रे वगैरे गोष्टींच्या संदर्भात हिरवा, लाल, पांढरा, काळा वगैरे उल्लेख आले असतील.

CrowAndCuckoo
काक: कृष्ण: पिक: कृष्ण:

मग रंगाचे नाव नि वस्तू अथवा पक्ष्यांसारखे सजीव यांची सांगड बसू लागते. आतापावेतो तो रंग हीच पक्ष्याची ओळख असते. नीनम पिवळा होता, कोकीळ काळा होता, राघू हिरवा. ओळख सोपी होती. पण पुढच्या टप्प्यामध्ये ’कोकीळही काळा नि कावळाही काळा’ असे लक्षात येते. हा जरा गडबडीचा मामला होतो. पंचाईत अशी होते की दोघांनाही एकच रंग असेल तर या नावे वेगळी कशी? असा प्रश्न उभा राहतो. त्यातून त्याला वस्तू वा जीवापासून रंग हे वेगळे असे काही असते नि विविध वस्तूंमध्ये ते एकाच वेळी दिसू शकते याचे आकलन होऊ लागते. नीनमच्या शोधात भटकणारा बिम्मला ’भारद्वाज हा बदामी कोट घातलेला कावळा आहे’ असे म्हणतो किंवा ’साळुंकीची चोचच फक्त पिवळी का असते?’ असे प्रश्न पडतात, तेव्हा एकच रंग अनेकांत जसा दिसतो तसेच एका सजीव वा वस्तूंमध्ये एकाहुन अधिक रंगांची सरमिसळही असू शकते याचे आकलन त्याला झालेले असते.

त्यानंतर पडलेला प्रश्न असतो तो ’अमक्या वस्तूला, पक्ष्याला, प्राण्याला अमुकच रंग का असतो?’ म्हणजे ’कावळा काळाच का असतो, पिवळा का नाही?’ ’कोंबड्याचा तुरा लाल का असतो, हिरवा का नाही?’ ’ढगांत मात्र वेगवेगळ्या वेळी पांढरे नि काळे असे दोन रंग दिसतात, काहीवेळा आणखी मधला-अधला तिसराच रंग दिसतो. असे का?’ ’गायींना, कुत्र्यांना वेगवेगळे रंग एकाच वेळी मिळतात; पण म्हैस मात्र नेहमीच काळी का?’ असे प्रश्न निर्माण होत असतील. जीएंच्या बिम्मला हे प्रश्न पडले असणारच. यातील काही प्रश्नांची उत्तरे वय वाढून बसलेली मोठी माणसेही देऊ शकणार नाहीत. ती जिज्ञासा हरवलेले लोक कुण्या ’आकाशातील कर्त्याची मर्जी’ असे शरणागत वृत्तीचे उत्तर देऊन मोकळे होतात. पण जीए आपल्याला थेट यापुढील प्रश्नांकडे घेऊन जातात.

GreenCow
हिरवे गवत खाल्ल्यानंतरची गाय.

बिम्म वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतो. त्यासाठी त्याच्याकडे विविध रंगांचे, नक्षीचे एकाहुन अधिक बुशकोट, शर्ट वा चड्ड्या असतात. बिम्मला आई वा वडील शर्ट, चड्डी वा इतर गोष्टी आणून देतात. त्यातील हिरवा शर्ट चढवला की बिम्म हिरवा दिसू लागतो. त्याने पिवळा शर्ट घातला की तो त्या रंगाचा दिसू लागतो. पण त्याने पाहिलेले पक्षी वा प्राणी कायम एकाच रंगाचे कसे दिसतात. त्यांनाही ’कपडे’ बदलावेसे वाटत नसावेत का? हे कुतूहल डोके वर काढते. एखादी गाय वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रंग परिधान करते का? आणि ’गायीला रंग बदलावासा वाटला तर ती कसा बदलत असेल?’ असा एक प्रश्न डोक्यात येऊन त्याचे उत्तर बहुधा त्याच्या मनात तयार होत असावे. गायीच्या अंगावर नवा रंग चढायचा असेल वा तयार व्हायचा असेल, तर बिम्मच्या शर्टप्रमाणे बाहेरून चढवायला हवा. मग आता गायीला तो कशाकरवी मिळावा? थोडक्यात या गायीला ’शर्ट’ कसा चढवायचा?

हे प्रश्न गायीसंदर्भात पडले आहेत. मग त्यांची उत्तरेही तिलाच ठाऊक असायला हवीत. आणि उत्तरे गायीने द्यायची म्हणजे ती प्रथम बिम्मच्याच डोक्यात तयार व्हायला हवी हे ओघाने आलेच. त्यामुळे तिची कल्पनाशक्तीही बिम्मसारखीच स्वैर फिरत असते. ती त्याला सांगते की गवत खाऊन ती हिरवी होते. मग तो घालवण्यासाठी कुरकुरीत ऊन खाल्ले की तिला पिवळा रंग मिळतो.

बिम्म बाहेरुन शर्ट चढवतो नि आपला रंग बदलतो. आता बाहेरून गायीकडे (पोटात) काय जाते तर अन्न. मग अन्नाच्या रंगानुसार तिचा रंग बदलायला हवा. म्हणजे बघा, गाय कडबा खाते, गवत खाते. कडबा पिवळा असतो, गवत हिरवे असते. हे दोन्ही गायीच्या पोटात जाते तेव्हा हे रंग कुठे जाणार ? बिम्मने हिरवा शर्ट परिधान केल्यावर तो हिरवा दिसू लागतो. तसे हिरवे गवत खाल्लेली गायही हिरवी व्हायला हवी असा निष्कर्ष बिम्मच्या मेंदूने काढलेला दिसतो. कृती आणि परिणामांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न त्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरत असतो.

पण हे हिरव्या नि पिवळ्या रंगाचे झाले. तिच्या अंगावर आधीच असलेला तपकिरी, पांढरा हे रंग कुठून मिळाले? तसंच ती कधी काळी होते का? असे आनुषंगिक प्रश्नही जिज्ञासू बिम्मला पडलेले आहेत. त्यावर गायीच्या म्हणण्यानुसार रात्री झोपताना भरपूर अंधार पिऊन घेतला की ती काळी होते नि झोपते. पण तोवर अंधार पडल्याने आणि रात्री आई बाहेर जाऊ देत नसल्याने साहजिकच बिम्मला ती दिसत नाही.

गाय अंधारात बसते तशीच ती उन्हात हिंडते. ती ज्या परिसरात असेल त्याचा पिवळा वा काळा रंग ती लेवून राहात असते. माणसाच्या पिलाचेही असेच नसते का? ज्या आई-वडिलांच्या छत्राखाली ते राहते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, संस्काराचे रंग घेऊन ते वाढत असते. पुढे खेळगडी, शाळेतील शिक्षक, ज्या समाजात वा गावात राहते तो समाज वा गाव यांच्या धारणा, अस्मिता-अभिमान व वारशाचे रंग घेऊनच ते वाढत असते. उन्हासाठी पिवळी नि अंधारासाठी काळी असणार्‍या गायीसारखे ते आई-वडिलांचे मूल असते, बहिणीचा भाऊ असते, शाळेत विद्यार्थी असते, झुंडीत त्या त्या जातीचे अथवा धर्माचे असते, बायकोचा नवरा होते, मुलाचे वडील होते... आयुष्यभरात असे वेगवेगळे रंग त्याला परिधान करावे लागत असतात. जिथे जो रंग आवश्यक वा सोयीचा असतो तो परिधान केला जात असतो.

रंगांची ओळख होत असताना आगेमागेच बिम्मला आकार (shape), व्याप्ती (size), परिमाणे (dimensions) आणि इतर पैलू (aspects) यांच्याबाबत समज वाढू लागते. फक्त रंगाचा विचार केला तर काळा पक्षी दिसला की तो कावळा असतो, कोकीळ असतो वा भारद्वाज. पण त्यांच्यामधील सर्वात लहान आकाराचा किंवा लहान चोचीचा पक्षी हा कोकीळ, त्याहून थोडा मोठा नि जाड चोचीचा हा कावळा आणि आकाराने सर्वात मोठा- लांब शेपटी असलेला नि भगवा कोट घातलेला तो भारद्वाज अशी ओळख पटवली जात असते. कोकीळ नि कावळा यांचे आकार सारखे असते, तर त्यांच्या तोंडून येणारा ध्वनी हा आणखी एक निकष वापरून त्यांची ओळख पटवता आली असती. या कोकीळाच्या बायकोचा धूर्तपणा ध्यानात येण्यासाठी बिम्मला पुढे शाळेत पाऊल ठेवावे लागते. तिथे कदाचित तो-

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेद: पिककाकयो:।
वसन्तकाले सम्प्राप्ते काक: काक: पिक: पिक:।।

-हे सुभाषित शिकणार असतो. पण त्यापूर्वीच त्या दोहोंतला भेद केवळ निरीक्षणाने त्याला समजलेला असतो.

कावळा नि कोकीळाप्रमाणेच रेडाही काळाच असतो, पण दोहोंचा आकार नि परिमाणे वेळी असतात. उडण्याच्या कौशल्याच्या आधारे फरक करायचा, तर राजकारणातील त्या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ’उडाला तो कावळा, खाली राहिला तो रेडा’ असे म्हणता येईल. गोळाबेरीज ही की ’रंग हे सजीव-निर्जीवांच्या अंगभूत वैशिष्ट्यांपैकी केवळ एकच वैशिष्ट्य आहे’ हे बिम्मच्या आकलनात रुजत जाते.

या सार्‍या चक्षुर्वैसत्यम्‌ गुणवैशिष्ट्यांपलिकडच्या- म्हणजे सजीवांच्या नि विशेषत: मनुष्यप्राण्यांच्या अन्य ज्ञानेंद्रियांच्या कक्षेतील गुणवैशिष्ट्येही हळूहळू जाणीवेत मुरत जात असतात. डोळे, नाक, कान, स्पर्श आणि जिंव्हा या पाच ज्ञानेंद्रियांच्या खिडक्यांतून माणसाला त्याच्या जगातील माहिती वा ज्ञानाची ओळख होत असते. मुख्य वाटा अर्थातच डोळ्यांचा नि कानांचा. रंग, आकार, व्याप्ती हे या डोळ्यांनीच अनुभवण्याचे पैलू. यांचे दर्शन माणसाच्या पिलाला अगदी जन्मापासून होत असले तरी आकलन थोडे उशीरा होत असते. त्या पूर्वी जाणीवेच्या कक्षेत येते ती चव. कारण आहार हा जन्मापासूनच सुरू होतो.

RawMangoAndGuava
कैरी हिरवी, पेरूही हिरवा

पक्ष्यांच्या रंग-रूपाबाबत बिम्मला जे प्रश्न पडले आहेत काहीसे तसेच प्रश्न फळांच्या संदर्भात पडले असल्यास आश्चर्य नाही. कावळा नि कोकीळ जसे एकाच रंगाचे, तसेच फळांमध्येही पेरूही हिरवा नि कैरीही हिरवी असल्याने दोघांत फरक कसा करायचा? पक्ष्यांप्रमाणे हे दोघे काही ध्वनी निर्माण करत नाहीत. त्यामुळे तो निकष बाद आहे. आकार हा निकष वापरला जाऊ शकतो, परंतु एकाच जातीचे प्रत्येक फळ चोख एका आकाराचे वा व्याप्ती असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे हे दोन निकष पुरेसे नाहीत. पण हे दोन्ही ’खाद्य’ असल्याने त्यांची चव हा आणखी एक नवा निकष बिम्मला उपलब्ध होतो आहे. मग हिरवा पेरू नि हिरव्या कैरीच्या या भेदावर संस्कृत जाणणारा एखादा बिम्म वर दिलेल्या सुभाषिताच्या धर्तीवर एखादे सुभाषित लिहूनही काढेल कदाचित.

पण बिम्मच तो. मग त्याला पुढचे प्रश्न पडू लागतात. (सर्वच मुले इतकी जिज्ञासू असतील तर काय बहार येईल.) फळे झाडावर जन्माला येतात नि वाढतात हे त्याने पाहिले आहे. पण नारळाचे झाड वेगळे, पेरूचे वेगळे नि आंब्याचे आणखी वेगळे. आता बिम्मला ही सारी फळे खायची असतील तर दारी फळे तितकी झाडे लावावी नि वाढवावी लागतील. हे फारच कष्टाचे काम झाले ना. पण प्रश्न असा की एकाच झाडावर कैरी, संत्रे, सफरचंदे अशी सारीच फळे आली तर काय बहार होईल. तेवढे एकच झाड सांभाळले की झाले.

आता गायीच्या रंगाचे कोडे गायीकडूनच सोडवून घ्यावे लागते तसेच फळझाडाबद्दलचा प्रश्न एखाद्या फळझाडानेच सोडवायला हवा. मग बिम्मने आपला हा प्रश्न परसातल्या आंब्याच्या झाडाकडेच नेला. हे झाडही गायीसारखेच मिश्किल असल्याने ते बिम्मला सांगते, ’मला सगळीच फळे येतात. फक्त ती सारी कैरीसारखीच दिसतात. तुला संत्रे खायचे असेल तर एक कैरी तोड, ती खाताना डोळे मिटून घे नि आपण संत्रे खात आहोत असे समज. मग तुला ती संत्र्यासारखी लागेल.’

आता हा किस्सा, हा प्रसंग एवढाच आहे. पण ते उत्तर मार्मिक आहे. फळ हे खाद्य आहे. तेव्हा त्याची चव हेच त्याचे व्यवच्छेदक तसंच दखलपात्र वैशिष्ट्य आहे. आकार वा रंग कोणताही असला तरी जोवर चव तीच आहे तोवर त्या फळाची ओळख अबाधित राहाते. तीच बाब बहुतेक खाद्य म्हणून वापरल्या जाणार्‍या नैसर्गिक उत्पादनांची. म्हणूनच आज तथाकथित सेंद्रिय उत्पादनांच्या काळात हिरव्या रंगाला सोडचिठी देऊन पिवळी, लाल, जांभळी वस्त्रे परिधान केलेली ढोबळी/सिमला मिरची आपली मूळ ओळख राखून असते.

दुसरा अर्थ असा की वास्तव जगामध्ये अनेकदा प्राप्य ते साध्य नसते. अशा वेळी जे साध्य असते त्याच्यावरच प्राप्य असण्याचा शिक्का मारून समाधान करुन घ्यावे लागते. आकांक्षांना मुरड घालण्याची सुरुवात त्या वयातच व्हावी लागते.

MultiFruitTree
अनेक फळांचे पोशिंदे झाड

एखादा वय वाढूनही बिम्मची जिज्ञासा न सोडलेला कुणी यातून असा प्रश्न विचारेल, की ’जर सर्व फळांना पोसणारे जीवनद्रव्य एकच असते तर त्यांना पोसणारे झाड एकच का असू शकत नाही?’ पण वय वाढते तसे वैशिष्ट्यांपेक्षा विभागणीकडे माणसांचा कल वाढत जातो आणि जिज्ञासेचा मैलाचा दगड मागे सोडून तो पुढे धावू लागतो. मग तो ’आंब्याचे झाड लावू की संत्र्याचे?’ असा परिस्थितीशरण प्रश्न सोडवण्याच्या मागे लागतो.

माणसाच्या जीवनप्रवासात बिम्मच्या वयात असतानाच अधिक प्रश्न पडतात. त्यांची मोठ्यांनी दिलेले उत्तरे बहुधा पटत नसतात. मग तो आपल्या तत्कालीन मर्यादित बुद्धिनुसार, आकलनानुसार ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. ’काळा म्हणजे अशुभ आणि पांढरा म्हणजे शुभ’ किंवा ’अमुक रंग हा विशिष्ट व्यक्तिला अधिक लाभ देणारा (लकी) असतो’ वगैरे माणसाने रंगांचे केलेले अशास्त्रीय मूल्यमापन त्याच्या जाणीवेमध्ये अद्याप पोहोचलेले नसते. तिच्या निरभ्रतेला तो तडा जाण्यासाठी अजून थोडा काळ जावा लागणार असतो. 

पुढे संस्कार नि शाळा यांसारख्या बाबींचे जू खांद्यावर बसले, की प्रश्न पडणे कमी होत जाते आणि पिवळा सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर नाहीशा होणार्‍या गायीच्या हिरव्या रंगासारखी जिज्ञासाही विरून जाते आणि एका दारी येणार्‍या आंब्याच्या पेटीतले आंबे झाडावर तयार होतात की कुठल्या कारखान्यात याबाबतही बिम्म उदासीन होत जातो.

FruitSalad
शहरी बिम्मची फळांशी नि रंगांशी होणारी ओळख: फ्रूट सॅलड

जीएंच्या बिम्मला पक्ष्यांच्या निमित्ताने रंगांचे कोडे पडले आहे. आकाराचे कोडे अप्रत्यक्षपणे ’प्रतिबिंबांचे प्रश्न’ मध्ये पडलेले आहे. चवीचे कोडे आंब्याच्या झाडाने सोडवले आहे. पण गंधाचे कोडे मात्र जीएंच्या बिम्मला पडलेले दिसत नाही. बिम्मच्या बखरीमध्ये तो एका टप्पा राहून गेला आहे.

(क्रमश:) पुढील भाग >> अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन     

-oOo-


हे वाचले का?

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ५ : खेळ सावल्यांचा

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

आपल्या पक्ष्याचा शोध << मागील भाग

---

माणसाचे मूल जन्मत: परावलंबी असते. सुरुवातीचे काही महिने ते पूर्णपणे आई-वडिलांच्या निर्णयांच्या नि कृतीच्या अधीन असते. काय खावे, केव्हा खावे, काय परिधान करावे वगैरे किमान निर्णयही पालकांच्या अधीन असतात. पुढे मूल बसते, चालते झाले की त्याला स्वत:च्या निर्णयाने जागा बदलता येते- पण तरीही त्या निवडीला घराचे भौतिक बंधन असतेच. त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्याहून अधिक काळ पालकांच्या अधीन असतो. या टप्प्यातच त्याचा घराबाहेरील सजीव निर्जीव गोष्टींशी परिचय होत जातो. परिचय दृढ झाला की त्यातून त्यांच्याशी बंध वा नाते प्रस्थापित होत जातात. आणि असे बंध स्मरणांच्या स्वरूपात त्याच्यासोबत मनात नि घरात प्रवेश करत असतात.

यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये बिम्म ’मी कोण?’, ’यापैकी मी कोण?’, ’माझे कोण?’ या प्रश्नांना सामोरे गेला होता. सावल्यांचा वेध घेताना तो जन्मत:च मिळालेल्या नात्यागोत्यांच्या पलिकडे जाऊन स्वनिर्णयाने ती जोडण्याच्या- म्हणजे निवडीच्या टप्प्याकडे सरकतो आहे.

मांजराला किंवा एखाद्या लहान मुलाला प्रतिबिंबाइतकेच सावल्यांचेही कुतूहल असते. भिंतीला वा एखाद्या मोठ्या वस्तूला धरून मूल जेव्हा उभं राहतं तेव्हा त्याचा सावलीशी प्रथम परिचय होतो. त्यासाठी ते आकलनाच्या विविध टप्प्यांतून जात असते. यू-ट्यूब, इन्स्टाग्राम वा तत्सम ठिकाणी नुकत्याच बसू, चालू वा बोलू लागलेल्या बालकांचे आपल्या सावलीचा वेध घेणारे व्हिडिओ सापडतील. यात ती मुले आपल्याच सावलीबाबत भीती, वैताग, कुतूहल, आपुलकी अशा विविध भावना व्यक्त करताना दिसतात. सुरुवातीचा भीतीचा टप्पा ओसरल्यावर कुतूहलाचा टप्पा नि त्यातून झालेल्या आकलनाच्या टप्प्यावर ते पोहोचते.

मूळ वस्तू नि सावली यांचा परस्परसंबंध त्याला समजला नाही, तरी हळूहळू सावल्या वेगवेगळ्या आकाराच्या दिसतात हे त्याला समजू लागते. त्या काळ्या डागाला सावली म्हणतात हे त्याला समजत नसेल एकवेळ, पण स्वत:प्रमाणेच हलत्या वस्तूंपाशी कधीकधी जमिनीवर एक हलणारा डाग दिसतो याचे त्याला आकलन होते. मग हलणार्‍याच नव्हे तर स्थिर असलेल्या प्रत्येक वस्तूला अशी सावली असते हे त्याला समजते. त्यातून त्याच्या मनात वस्तू/व्यक्ती/जीव नि त्यांची सावली यांच्यातील परस्परसंबंधाची नि अतूट अशा अद्वैताची जाणीव निर्माण होते.

बिम्म या टप्प्याच्याही थोडा पुढे आलेला आहे. वस्तू/व्यक्ती/जीव नि त्यांची सावली हे जर वेगवेगळे असतील, तर त्याच्या कल्पनेच्या जगात त्याने त्यांना भिन्न अस्तित्वही बहाल केले आहे. सावलीला मूळ वस्तूशिवाय असलेले अस्तित्व आणखी पुढे नेऊन तिला मूळ वस्तूशिवाय हालचालीचे, स्थानांतर करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे.

थोडा विचार केला तर हे अगदीच हास्यास्पद नाही असे लक्षात येईल. ते मूल कपडे घालतं, बुटु घालतं, टोपी घालतं तसंच स्वेटर, रेनकोटही. काम झाले की हे सारे त्याच्या शरीरापासून दूर होऊन कपाटासारख्या जागी जाऊन बसतात हा अनुभव त्याच्या जमेस असतो. मग ’केवळ उजेडातच जिचे काम आहे, ती सावलीही काम संपले की दुसरीकडे जाऊन बसते’ असा विचार केला, तर तो वास्तव नसला तरी तर्कसंगत म्हणावा लागेल. बिम्मच्या वयाच्या मुलाच्या संदर्भात तर्कसंगत हा शब्द तसा जड होईल, पण माहिती-विश्लेषणाच्या(Data Mining) तंत्रात ज्याला ’साधर्म्यसंगती’(association rule) म्हणतात तसे नक्कीच म्हणता येईल.

सावलीला स्वतंत्र अस्तित्व बहाल करणे ही अगदीच दुर्मिळ कल्पना नाही. अद्भुत-कथांमधून ती अनेकदा वापरली गेली आहे. डिस्ने स्टुडिओज्‌च्या ’डकटेल्स’ चलच्चित्रमालिकेमध्ये ’अंकल स्क्रूज’ नावाचा एक कंजूष धनाढ्य आहे. त्याची शत्रू असलेली कुणी ’मॅजिका’ नावाची जादूगार आपल्या सावलीला स्वत:पासून वेगळे करुन स्क्रूजचे लकी नाणे चोरण्यास पाठवते. ही सावली असल्याने स्क्रूजची सारी अद्ययावत सुरक्षा यंत्रणा तिच्यासमोर कुचकामी ठरते अशी कल्पना एका भागामध्ये रंगवलेली आहे.

माझ्या आठवणीत राहिलेली आणखी एक सावली आहे ती डिस्नेच्याच ’स्नोव्हाईट अँड द सेव्हन ड्वार्फस्‌’ या प्रसिद्ध चलच्चित्रपटातील. प्रसंग असा आहे की, सात बुटके आपल्या कामावरून परतले आहेत. दार उघडताच वरच्या मजल्यावर काहीतरी/कोणीतरी आहे याची चाहूल त्यांना लागते. आता वर जाऊन पाहणे आले. तू जा, तू जा करता-करता अखेर एक बुटका मेणबत्ती घेऊन वरच्या खोलीचे दार हळूहळू उघडतो. दार उघडत असता, आतील बाजूस उजेड जसजसा प्रवेश करतो, तसतसे आतल्या बाजूस पडलेली दाराची सावली माघार घेताना दिसते. बुटका प्रथम हातातील मेणबत्ती हळूहळू आत सरकवतो. त्याबरोबर जमिनीवर त्याच्या हाताची, मेणबत्तीची सावलीही आत सरकते.

अज्ञाताच्या भीतीने थरथरणार्‍या त्या बुटक्याच्या हातातील मेणबत्तीी थरथरत असते. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याला अनुसरून भिंतीवरची दाराची आणि जमिनीवरची दिव्याची नि त्या बुटक्याची सावलीही थरथरत असते. (संगणकपूर्व जमान्यातील त्या चलच्चित्रपटात इतके कलाकुसरीचे काम पाहून मी ताबडतोब मनातल्या मनात त्यांना सॅल्यूट करुन टाकला होता.) तुमच्या मनातील भावनांचे प्रतिबिंबही तुम्हाला दिसणार्‍या त्या सावल्यांमध्ये पडत असते... आठवणींचेही असेच असते!

AnimalShadows
https://emmaowl.com/animal-shadow-drawing/ येथून साभार.

आता सजीव, निर्जीव व्यक्तींच्या सावल्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे हे मान्य केले. मग बिम्म काय करतो, तर अशा बर्‍याच वस्तूंच्या, व्यक्तींच्या, प्राण्यांच्या सावल्याच गोळा करून आणतो. एका भिंतीजवळ उभा असलेल्या पांढर्‍या वासराची, एक वाकडे पाय करून उभ्या असलेल्या टांग्याच्या घोड्याची आणि तारेवर बसलेल्या चार चिमण्यांची जमिनीवर पडलेली सावली उचलून आणतो. पूर्वी एकदा तो रस्त्यावरून कुत्र्याच्या एका छोट्या पिलाला - 'पिट्टू'ला - घेऊन आला होता, तेव्हा त्याची तिथेच राहून गेलेली सावलीही घेऊन येतो. बिम्मचे कुतूहल आता स्वत:चा परीघ सोडून इतरांचा वेध घेऊ लागले आहे.

आपण भानावर असू, तर ही वाचता वाचता यातील गर्भित मुद्दा आपल्या ध्यानात येईल. सावली हे एकप्रकारे आठवणीचे रूपक आहे. या सार्‍यांना बिम्म कुठे न कुठे भेटला आहे, त्यांच्या संदर्भातील आठवणींच्या सावल्या त्याच्या मनात पडलेल्या आहेत. प्रकाशाचा कोन बदलल्यावर अथवा तो नाहीसा झाल्यावर वास्तविक सावल्या लुप्त होतात तशा त्यांच्या पुन्हा संपर्कात आला नाही, तर कालानुक्रमे त्या विरत जाणार आहेत. आपल्या बिम्मला वाचून ही गोष्ट दाखवत असता त्याच्या आई अथवा बाबांसाठी हा अन्वयार्थ ठेवून दिला आहे.

आणखी एका दृष्टीने पाहिले तर सावल्या हे अप्राप्य गोष्टींचे रूपक म्हणूनही पाहता येईल. वासरू असो, घोडा असोत की चिमण्या, हे सारे कायम आपल्यासोबत असावेत असे बिम्मला वाटत असावे. पण वास्तवात ते शक्य नाही. मग निदान त्यांच्या सावल्या आपल्याजवळ असाव्यात म्हणजे अप्रत्यक्षपणे ते आपल्या आयुष्यात राहतील असा त्याचा कयास असेल. आपणही जे आवडले पण प्राप्य नाही, त्यांचे फोटो, चित्रे, भित्तीचित्रे (poster) या स्वरूपात आपण त्यांना जवळ करत असतो. तरुण वयात आवडलेला हीरो अथवा हीरोईन, एखाद्या आदरणीय व्यक्तीचा फोटो, सही वा त्यांच्याशी संबंधित जड वस्तूंना त्यांचे प्रतीक म्हणून आपण सोबत ठेवत असतो.

खरंतर हे रूपक बिम्मपेक्षा त्याच्या आईवडिलांना अधिक नेमके समजेल. दिवंगत आई, वडील वा आजी, आजोबा आदिंचे फोटो भिंतीवर लावून माणसे अप्रत्यक्षणे त्यांना आपल्या आयुष्यात जागा देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या रोजगाराच्या ठिकाणी टेबलवर अथवा संगणकाच्या पडद्यावर आपल्या पत्नी/पती अथवा मुलांचे फोटो ठेवणारे तो निव्वळ तात्कालिक विरहदेखील त्यांच्या फोटोंनी भरून काढू पाहात असतात. वार्धक्यामध्ये दूर गेलेल्या मुला-नातवंडांचे फोटो सोबत बाळगणे हा ही याचाच प्रकार. काही जण आपल्या बालपणातील अनेक वस्तू जतन करून ठेवतात. इतकेच नव्हे तर तारुण्यातील काही हळव्या आठवणीही वस्तुरूपात साठवल्या जातात.

आज मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांचा पहिला शब्द, पहिले पाऊल यांपासून सुरूवात होत वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस या क्रमाने आठवणी फोटोबद्ध वा व्हिडिओबद्ध केल्या जातात. त्या भूतकाळाच्या सावल्याच तर असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आधार घेत असलेल्या सावल्या वेगवेगळ्या असतात. तेव्हा बिम्मने सावल्या जमा केल्या म्हणून त्याला हसण्याचे कारण नाही.

आता या सावल्या जमा केल्या खर्‍या, पण आता त्यांचे करायचे काय असा प्रश्न थोड्याच वेळात बिम्मला पडला असणार. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये अशा एकाच खेळात रमण्याचा काळ फारसा दीर्घ असत नाही. मग या ना त्या मार्गाने त्या सावल्यांपासून सुटका व्हायला हवी.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा बिम्मचा शर्ट, हा बिम्मचा रेनकोट अशा उल्लेखांतून बिम्मला अन्योन्य संबंधांचे प्राथमिक ज्ञान झाले आहे. बिम्मचा शर्ट वा रेनकोट बब्बी घालणार नाही की आई वा वडीलही. त्यांचे स्वत:चे कपडे असतात. ते बिम्म वापरत नाही. त्याचप्रमाणे वासराची, घोड्याची वा चिमण्यांची सावली ही फक्त त्यांची आहे. ती बिम्मच्या उपयोगाची नाही’ अशी संगतीही त्याला लागत असेल. मग कपड्यांचे, रेनकोटचे वा पायीच्या बुटांचे जसे निश्चित काम असते; ते नसतील तर बिम्मची अडचण होते हे ही त्याला समजले असेल. त्यातून मग त्याने त्याच्या लहानशा मेंदूने या सावल्या नसतील तर या आपल्या प्राणिमित्रांना काय अडचण येईल याचा तर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.

मग बिन-सावलीच्या वासराला त्याचे मित्र खेळायला घेत नाहीत, बिन-सावलीच्या घोड्याला टांग्याला कसे जोडणार म्हणून त्याचा मालक त्याला हाकलून देतो आहे, रात्री झोपताना पांघरायला चिमण्यांना त्यांच्या सावल्या हव्या आहेत अशी विविध कारणे निर्माण करून तो त्या सावल्या ज्याच्या त्याला देऊन टाकतो. ज्याचे उपद्व्याप पाहून आईने त्याला लाकूड अड्ड्यावरच्या नारायणला देऊन टाकले होते, त्या पिट्टूची सावली गिरणीत जाईन तेव्हा त्याला देऊन टाकण्याचे आई कबूल करते.

पण आई गिरणीतून परत येते ती उतरलेला चेहरा घेऊन. आल्याबरोबर ओलावल्या डोळ्यांनी बिम्मला जवळ घेऊन ती बजावते की 'आता यापुढे कध्धी कध्धी कुणाची सावली काढून आणायची नाही.' बिम्मच्या खेळात, गंमतीजमतीत सहभागी होत असताना तिने असे अचानक भावुक का व्हावे असा प्रश्न पडू शकतो. इथे जीएंनी थोडेसे मोठ्यांच्या समजुतीवर सोडलेले आहे.

जर पिट्टूला लाकडाच्या वखारीतल्या नारायणला दिले होते. त्या वखारीत लाकडांच्या ढिगार्‍याजवळ खेळताना पिट्टूबाबत काही अघटित घडले असावे. ते बिम्मला समजू नये, हे जसे त्याच्या आईला ठाऊक होते. सर्वच सावल्या- आठवणी या सुखद नसतात, काहींसोबत वेदनाही वास्तव्याला येत असते. बिम्मची गोष्ट वाचणार्‍या छोट्यांना ते समजू नये, पण त्यांच्यासाठी ती गोष्ट वाचणार्‍या त्यांच्या मोठ्यांना मात्र ते उमगावे इतके सूचक ते जीएंनी ठेवले आहे.

लहानांना नि मोठ्यांना दिसणारे, जाणवणारे जग कसे वेगवेगळ्या पातळ्यांवर असते. बिम्मचे कल्पना-वास्तवाच्या सीमेवरचे, तर आईचे वास्तवात घट्ट पाय रोवलेले. हे सारे पुस्तक अशा जाणिवेच्या दोन स्तरांवर लिहिले गेले आहे, ते तसेच अनुभवावे लागते. कल्पनेच्या पातळीवर जगताना उचलून आणलेल्या सावल्या बिम्म सहजपणे परत देऊ शकतो, पण पिट्टूसारख्या काही जणांची सावली मात्र त्याची आई परत देऊ शकत नाही. ती कायमची काळवंडून जात असते. त्या दोन जगातील हा फरक मोठे होताना बिम्मला समजून घ्यावा लागणार असतो.

(क्रमश:) पुढील भाग >> रंगांचे कोडे     

- oOo -


हे वाचले का?