शनिवार, १९ एप्रिल, २०२५

हट्टमालाच्या पल्याड... ज्याचा त्याचा युटोपिया!

  • Hattamaalaa

    कित्येक वर्षांपूर्वी पालेकरांनी साजर्‍या केलेल्या ‘बादल सरकार महोत्सवा’च्या सीडीज मिळाल्या होत्या. त्यात ‘हट्टमालार आपोरे’ या शीर्षकाचे नाटक पाहण्यात आले होते. त्याचा तपशील इतक्या वर्षांनी विस्मरणात गेला असला तरी, ‘चलन/पैसा या संकल्पनेवर हलकेफुलके भाष्य करणारे नाटक’ आहे इतपतच ध्यानात होते. काल पुन्हा एकवार त्याचा प्रयोग पाहिला नि डोक्यात उजेड पडला.

    काही काळापूर्वी कॉ. दत्ता देसाईंशी तीन दिवस गप्पांचा कार्यक्रम आम्ही केला होता. त्यात मार्क्सला अपेक्षित समाजव्यवस्थेवर बोलणे झाले होते. त्याच्या मते खासगी मालमत्ता ही संकल्पना रद्दबातल केली की, माणसाला आज करावे लागते तसे ऊर फुटेतो काम करावे लागणार नाही. अन्न, वस्त्र, निवास यांची हमी व्यवस्थेनेचे घेतली, तर त्याला त्या व्यवस्थेप्रती आपले देणे म्हणून जे काम करावे लागेल, ते आज करावे लागते त्याहून कैकपट कमी असेल. त्यातून जो वेळ शिल्लक राहील, त्यात त्याला आवडेल ते काम करण्याची मोकळीक असेल.

    ‘हट्टमालार आपोरे’ मध्ये हट्टमाल या गावाच्या– म्हणजे आपल्या आजच्या जगाच्या, शेजारी एक नदी आहे नि तिच्या पल्याड एक अज्ञात प्रदेश आहे. हट्टमालाची मंडळी कधीही नदी ओलांडून पलिकडे जात नाहीत. त्यामुळे पलिकडे काय आहे हे त्यांना ठाऊक नाही... आजच्या माणसाला जसे चलनविरहित जग ठाऊक नाही. नदी हे व्यवस्थेतील अनुल्लंघनीय बंधन ही संकल्पना अनेक कथांमधून वापरली गेली आहे. (गौतमीपुत्र कांबळेंच्या ‘परिव्राजक’मध्ये अशीच एक कथा वाचल्याचे स्मरते.) प्रथम पाहिले तेव्हा मला ही 'वैय्यक्तिक मालकीविरहित, चलनविरहित जगाची' संकल्पना आकर्षक वाटली होती... मार्क्सच्या काळातील अर्थकारणाचा विचार करता ती कदाचित व्यवहार्य असेलही.

    पण कॉम्रेड देसाईंशी गप्पा मारण्याचा योग येईतो मेंदूत विचारांचे यंत्र बर्‍यापैकी विकसित झाले होते. आता मला ही व्यवस्था युटोपियन वाटू लागली. त्याच्या ढोबळ मर्यादाही ध्यानात येऊ लागल्या. त्यातील काही शंका कॉम्रेडना विचारल्या. त्यांनी त्याची सविस्तर उत्तरेही दिली. परंतु उत्तरांवर नवे प्रश्न नि त्यांतून स्वत: शोधून काढलेल्या उत्तरांवर पुन्हा नवे प्रश्न यात गुरफटत गेलो.

    यात redundancy नावाचा प्रकार अस्तित्वात नसल्याने संशोधनाला नैसर्गिक चालना मिळणे अवघड दिसते. शासनावर, व्यवस्थेवर अर्थकारणाला इंधन पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी पडत असल्याने अशी व्यवस्था केवळ हुकूमशाही अथवा एकाधिकारशाही व्यवस्थाच असू शकते, लोकशाहीवर आधारित असू शकत नाही. आवडते काम करण्यास मोकळीक राहील हे खरे, पण असे काम करण्यास ती व्यक्ती लायक असेलच असे नाही.

    अशा आवडत्या कामाला कच्च्या मालाची आवश्यकता असणार, तो एकाच व्यवस्थेअंतर्गत उत्पादित होणार. मग लायक नसलेल्या व्यक्तिला, कुवत नसताही त्याची नासाडी करण्यास मोकळीक देता येईल का? की त्यावर गुणवत्ता सिद्ध करण्याचे पूर्वबंधन राहील? आणि असे असेल तर आजच्या व्यवस्थेहून ती फार वेगळी राहील का?... हे नि असे अनेक प्रश्न, त्यांची संभाव्य उत्तरे नि पुन्हा प्रश्न या चक्रवातामध्ये भेलकांडत गेलो.

    एका टप्प्यावर असे ध्यानात आले की यात केवळ खासगी मालमत्ता ही आजची एकच संकल्पना सोडून द्यावी इतके सोपे नाही. त्या अनुषंगाने उभे राहिलेल्या अनेक उपव्यवस्थांची स्थिती नि त्यातून मिळणारे फायदे यांवर तिलांजली द्यावी लागणार आहे, केवळ केंद्रीय व्यवस्था यांची योग्य जबाबदारी उचलेल या गृहितकावर विसंबून. थोडक्यात केंद्रीकरण हा गाभा असला की विकेंद्रीकरणाचे फायदेही नाकारावे लागणार आहेत...

    ...यावर वाद-प्रतिवाद भरपूर होतील. कॉम्रेड मंडळींना माझे म्हणणे अर्थातच पटणार नाही. पण तो वाद-विवाद दीर्घ नि अनिर्णित असेल याची मला खात्री आहे. तेव्हा माझ्यापुरते ही संकल्पना तत्कालिन स्थितीशी सुसंगत, परंतु आजच्या काळाशी तुलना करता युटोपियन आहे असा निर्णय घेऊन मी थांबलो आहे. There is only so much time and energy I can invest, and I have already done it.

    गंमत म्हणजे असाच एक युटोपिया आपल्या देशात वैचारिकदृष्ट्या विरुद्ध अक्षावर असणारे हिंदुत्ववादी कुरवाळताना दिसतात. त्याला ते ‘अखंड हिंदुस्तान’ म्हणतात. सध्या ही मंडळी सत्ताधारी असल्याने याची विस्तृत चिकित्सा मी आधीच मांडून ठेवली आहे. ही आमच्या एका संघ-मित्राला पाठवल्यावर, ‘तरीपण अखंड हिंदुस्तान होणारच्चं. तुम्ही कितीही आपटा’ म्हणून त्रागा केला होता. त्यावर ‘अरे मी कुठं म्हणतोय होणार नाही म्हणून, तसं झालं तर... हे गृहित धरुनच मी प्रश्न विचारतो आहे.’ पण त्याने संवाद तिथेच थांबवला.

    काहीतरी जादू होईल नि आपली लाडकी व्यवस्था नुसती उभीच राहील असे नाही तर त्यातील अंतर्विरोध आपोआप नाहीसे होतील नि सगळे छान होईल असा भाबडेपणा डावे, उजवे, भगवे, हिरवे, निळे, पांढरे सगळेच राखून असतात. वास्तवात सामाजिक, राजकीय, भू-राजकीय पैलू इतक्या प्रचंड संख्येने असतात की असा एक वरवंटा सारी व्यवस्था आमूलाग्र नि बिनचूकपणे बदलू शकतो यावर माझा विश्वास नाही. म्हणून या सार्‍यांना अपेक्षित असणार्‍या व्यवस्थांकडे मी युटोपिया म्हणूनच पाहातो.

    आपण आहारामध्ये तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने अशा विविध घटकांचा अंतर्भाव असलेला आहार घेतो. यातील केवळ एकाच प्रकारचे अन्न माणूस खात नाही. कदाचित या जाणिवेसकट नि डोळसपणॆ जगत असल्याने संपूर्ण शाकाहारी अथवा संपूर्ण मांसाहारी जीवांपेक्षा मनुष्यप्राणी अधिक प्रगती साधू शकला असावा असे मला वाटते. म्हणून भांडवलशाही अमेरिकेत समाजवादी दृष्टिकोनाशी नाते सांगणारी सोशल सिक्युरिटी असते, किमान-वेतन कायदा असतो; चीनपासून क्यूबापर्यंत समाजवादी राज्यव्यवस्था प्रस्थापित झाल्या असल्या तरी त्यांना मार्क्सला अभिप्रेत असणारी सामाजिक-आर्थिक व्यवस्था प्रस्थापित करता आलेली नाही; इस्लामवर आधारित राज्यव्यवस्थाही पाश्चात्त्य संशोधन नि चिनी उद्योजगता यांच्या आधाराखेरीज तग धरू शकत नाहीत हे वास्तव आहे. तेव्हा डावे, उजवे वा विविध रंगांचे युटोपिया माझ्या जिज्ञासेचे विषय असले तरी शिरोधार्य उरलेले नाहीत.

    हे सारे पुन्हा ज्यामुळे पृष्ठभागावर आले त्या नाटकाच्या प्रयोगाबद्दल थोडेसे: बांग्ला भाषेतून मराठीत आणला तो कोंकणी बंधूंनी. त्यामुळे त्यांच्याकडील नाटकाच्या पठडीतून ते समोर आले. कोंकणी मंडळी गाणी नि लय याला बांधलेला. त्यांच्या दशावतारी नाटकांत सुरुवातीला आशीर्वाद देण्यास आलेला गणपतीबाप्पाही नाचत, गात येतो नि आशीर्वाद देऊन जातो (त्याने मुंबई-पुण्यातील त्याच्या भक्तांचे नाचणे(?) पाहिले तर दोन्हींवर बंदी घालण्याचा आदेशच काढील असा होरा आहे.) त्यामुळे संगीतिका स्वरूपात ते मांडले गेले.

    Hattmala2

    मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो नेपथ्य कल्पनेचा. IKEA या प्रसिद्ध फर्निचर कंपनीने यांचे नेपथ्य प्रायोजित केले असावे असा गंमतीशीर विचार डोक्यात आला. रंगवलेले छोटे-छोटे पडदे दोन चौकोनांभोवती गुंडाळून, प्रसंगाच्या आवश्यकतेनुसार ते उलगडणे ही संकल्पना मला आवडली. कथानक जसजसे पुढे सरकते तसतसे त्याच्या आवाक्यात येणार्‍या एक-एक मूलभूत गरजेला अधोरेखित करण्यासाठी तो प्रत्येक टप्पा एका कट-आउटच्या स्वरूपात एका पडद्यावर चिकटवत जाण्याची– ज्यातून अखेरीस मूलभूत मानवी गरजांची जंत्री नेपथ्यावरही टप्प्याटप्प्याने उलगडत नेण्याची कल्पना दाद देण्याजोगी.

    भारतीय नाट्यसृष्टीवर डाव्या विचारांचा प्रभाव असलेल्या काळातील हे नाटक. पण चलन/पैसाविरहित समाज ही त्यातील संकल्पना वगळता त्यात त्या विचाराचा कुठलाही प्रभाव नाही. नाही म्हणायला एकदा भांडवलशाही हा शब्द येऊन जातो. पण डाव्या नसलेल्यांनी तेवढा दुर्लक्षित ठेवून पाहायला हरकत नाही. मांडणी वैचारिक तर नाहीच.

    कदाचित बालनाट्याच्या बाजाचे असे म्हणता आले असते, पण आजच्या नव्या जेन-झी का काय म्हणतात (ही मंडळी नाटक– ते ही मराठी– पाहायला येतात का मला शंका आहे.) त्यांच्यासाठी कचकून शिव्यांची (माफकच) टॉपिंग्ज असल्याने तसे म्हणत नाही. पण विकु (विकणारा यावरुन असावे) नि चिकु (चिक्कु किंवा धन-संग्राहक या अर्थी) अशी नावे असणारे ‘चोर’ ही संकल्पना तशी बाळबोध डावी म्हणायला हवी. (बादल सरकारांच्या मूळ नाटकात त्यांची नावी ‘केना’ नि ‘बेचा’ म्हणजे ग्राहक नि विक्रेता अशी आहेत.)

    या चोरांनी सावकाराला लुटण्याचा केलेला असफल प्रयत्न, त्यातून नदीपारच्या (आपोरे) त्या अगम्य जगात परागंदा व्हावे लागणे नि तिथे संपत्तीनिर्मिती वा संग्रह याला दूर ठेवू गरजपूर्ती हे उद्दिष्ट ठेवून उभी केलेल्या त्या व्यवस्थेशी त्यांचा होत गेलेला परिचय असे साधारण कथानक आहे. तीनही सहभागी अभिनेत्यांनी ते व्यवस्थित तोलूनही धरले आहे. त्या मागचा विचार माझ्या दृष्टीने युटोपियन आहे हे खरे, पण नाटकाचा अनुभव त्याने उणावत नाही.

    - oOo-


हे वाचले का?

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

स्वप्नात पाहिले जे ...

  • श्री. वि. कुलकर्णींच्या ‘सोन्याचा पिंपळ’ वाचत होतो. त्यातील एका लेखामध्ये ‘...या स्वप्नांचा अर्थ काय?’ असा एक प्रश्न निवेदक वडिलांना विचारतो. इथे मी थबकलो. हा प्रश्न कधीकाळी, लहानपणी मलाही पडला असेल. पण आता विचारांचे इंद्रिय अधिक विकसित झाल्यावर आणि त्याची व्याप्ती विस्तारल्यावर या प्रश्नावरही प्रश्न पडू लागले. ‘अर्थ’ हा शब्दच मुळी माणसाच्या भाषेची आणि जाणिवेची उपज आहे. या अर्थाचा अर्थ केवळ माणसांनाच उमगू शकेल. प्राण्यांची, जनावरांची धाव माणूस ज्याला ‘आकलन’ म्हणतो तिथवरच राहाते. आणि आकलन हे वास्तवाचे, घटिताचे असते. त्याच्या कार्यकारणभावाची नि आपल्या जगण्याशी निगडित फायद्या-तोट्याची समज पदरी पडली की जनावरांची जिज्ञासा जिरते. कारण त्यांच्या जगण्याला तेवढे पुरेसे असते. ते त्यापुढे जात नाहीत.

    जीएंचा सॅन्को म्हणतो(१) ‘गाढव गाढवजातीच्या भवितव्याची चिंता करत बसत नाही.’ माणसाचे तसे नाही. माणसाला शेती नि पशुपालन साध्य झाले आणि त्याचा अन्नासाठीचा संघर्ष कैकपट मवाळ होऊन गेला. नागर आयुष्याने संरक्षणासाठी संघटन-बळ दिले, तर श्रमविभागणीने व्यवस्था नि सैन्य या स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन बाह्य धोक्यांपासून संरक्षणाची जबाबदारीही व्यवस्थेने आपल्याकडे घेतली. आता व्यवस्थाअंतर्गत माफक संघर्ष वगळता, माणसाच्या जगण्यातून आदिम नि नैसर्गिक संघर्ष हद्दपार होत गेले. पोट भरले की प्राणी निवांत होतो, या नियमाने मनुष्यप्राणी इतर जिवांपेक्षा अधिक निवांतपणा अनुभवू लागला. आणि या निवांतपणामुळे त्याच्या वाढत्या मेंदूने अनुभवांचे बोट धरुन विचारांची रुजवणूक केली. तो वास्तवाच्या पलिकडे जाऊन अमूर्ताचाही वेध घेऊ लागला.

    BeyondRealWorld
    https://thelawofattraction.com/ येथून साभार.

    स्वप्न ही संकल्पनाच सर्वस्वी सापेक्ष; त्याचे आयुष्यही काही पळांचे. माणसाच्या मेंदू नावाच्या अवयवामध्ये ते जन्माला येते, तिथेच त्याचा अंत होतो. त्या अंतानंतर खुद्द त्या व्यक्तीच्या स्मृतीतूनही ते घरंगळून नाहीसे होते– मृत्यूनंतर जिवलगांच्या स्मृतीतूनही माणसाची स्मृती धूसर होत जाते तसे. अशा अल्पजीवी गोष्टीचा– तिला संकल्पना म्हणावे का, कारण तिचे अस्तित्व केवळ मनात असते, तिला जड अस्तित्वाची जोड नाही– ‘अर्थ’ काय हा प्रश्न त्या व्यक्तिच्याच कुतूहलाचा असू शकतो. हे कुतूहल तरी का, कारण त्या स्वप्नाने दाखवलेले जग तिच्या वास्तविक, जड जगाशी सांधेजोड दाखवत नाही. क्वचित ते सर्वस्वी काल्पनिक(?) म्हणता येईल अशा जगाची सफर घडवते, तर काहीवेळा वास्तविक आयुष्याचे तुकडे वेगळ्याच क्रमाने जोडून, त्यात तिच्या जगण्यातील अपेक्षा वा लालसांची भेसळ करुन, न अनुभवलेले कथानक दाखवून जाते(२).

    या अतर्क्य नसलेल्या, पण वास्तविकही नसलेल्या ‘स्वप्नातील कथानकाची’ निर्मिती काय हेतूने झाली?’, ’कुणी केली?’ अथवा ‘वास्तविक जगाशी त्याचा सांधा कसा जुळतो?’असा वास्तविक जगात सामोरे आलेले प्रश्न या भासमान जगाला माणसाने चिकटवले यात आश्चर्य नाही. 

    गंमत म्हणजे या प्रश्नांचा मागोवा घेणार्‍या माणसाने त्यांची सांधेजोड कायम भूतकाळाशी (मानसशास्त्र) किंवा भविष्याशी (आध्यात्मिक बुवा-बाबा वा रमलादि विद्यांचे(?) अभ्यासक) करुन पाहिली आहे. ज्या वर्तमानाचा भाग असलेल्या दिवसामध्ये या स्वप्नाची– त्यातील कथन,कथा वा प्रसंगाची अभिव्यक्ती होते आहे त्या वर्तमानाशी जोडून पाहण्याचा प्रयत्न मात्र क्वचितच होतो आहे.

    गंमतीचा भाग म्हणजे इतर सजीवांच्या आकलनाचे क्षेत्र मात्र वर्तमानात घट्ट रोवलेले राहाते. त्यांनाही स्वप्ने पडतात का– कुत्र्या-मांजरांचे काही व्हिडिओ पाहता पडत असावीत पण– त्यावर त्यांना प्रश्न पडतात का, जागेपणी त्याचा ते वेध घेतात का ठाऊक नाही. की सॅन्को म्हणतो तसा गाढवजातीच्या उद्धाराचा विचार करता या स्वप्नाचा काय अर्थ आहे असा प्रश्न त्याला पडतच नाही? माणूस मात्र त्याच्या अर्थाच्या मागावर जाऊ पाहातो. एवढेच नव्हे या अर्थाचा पाठलाग करताना जिज्ञासूसाठी ज्ञानाच्या नि भयपीडितांसाठी दिलासा म्हणून आध्यात्माच्या शाखा विकसित करत नेतो.

    अज्ञाताला अर्थ चिकटवून ‘आता ते ज्ञाताच्या कुंपणाच्या आत प्रवेश करते झाले आहे’ असा दिलासा स्वत:ला द्यायला माणसाला आवडते. कारण माणसाला अज्ञाताची भीती वाटते. प्राण्यांना जिवाची आणि प्राकृतिक धोक्यांचीच काय ती भीती असते. पण माणसाचा मेंदू विकसित होत गेला, तस-तसा त्याच्या ज्ञानाचा प्रदेश– आणि म्हणून अज्ञाताचा प्रदेशही! – विस्तारत गेला. या अज्ञाताची अतिरिक्त भीती माणसाचा ताबा घेऊ लागली. स्वप्नांचा अर्थ लावणे, फासे टाकून वा कुठल्याशा आकारांमध्ये भविष्याचा वेध घेणे वगैरे मार्फत या अज्ञाताला ज्ञाताच्या कक्षेत खेचण्याचा प्रयत्न अज्ञ मानवाने केला.

    त्यातील कल्पनारम्यता नि खोटे आश्वासन हवेसे वाटू लागल्याने लिखित साहित्यामध्ये मुख्य स्थान असलेल्या कथानकप्रधान (fiction) मांडणीचा प्रादुर्भाव वेगाने झाला. या संकल्पनांचा पुढे माणसाने देव, देवता, अवतार-कल्पना, देव-मनुष्य संवाद, त्या भोवती धर्माची उभी केलेली तटबंदी, मग धार्मिक स्थळांच्या रूपाने सुरू केलेला धंदेवाईक वापर... असे टप्पे पादाक्रांत करत मानवी मनाने आपल्या कुतूहलाचा – आणि त्याआधारे स्वार्थाचाही– प्रवाह मोकाट सोडला आहे. दुर्दैव इतकेच की त्याला ज्ञानाऐवजी छद्मज्ञान अथवा कल्पनाविस्ताराच्या उतारावर मोकाट सोडून दिले आहे. त्याला नेमक्या घाटरस्त्याने मजल दरमजल करीत इच्छित स्थानी पोहोचू देण्याऐवजी कड्यावरून खाली फेकून दिले आहे. या आततायी मार्गाच्या यशाचे उदाहरण म्हणून धबधब्यांकडे बोट दाखवले आहे. स्वप्नांच्या अर्थाचा मागोवा याच मार्गाचा एक लहानसा प्रवाह आहे.

    कुराणातील हजरत युसुफ (ख्रिस्ती: जोसेफ) या व्यक्तीच्या आयुष्यात या स्वप्नांच्या अर्थ लावण्याच्या शक्तीमुळे मोठे स्थित्यंतर घडून आले असा उल्लेख आहे. वडिलांच्या लाडक्या युसुफला लहानपणी भावांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना विहिरीत फेकण्यात आहे. नंतर ते गुलाम म्हणून विकले गेले. नंतर मालकाच्या पत्नीच्या भोगप्रस्ताव नाकारल्याने उलट आरोपांचे धनी झाले. परंतु त्यांच्या अंगी असलेल्या स्वप्नांचा अर्थ लावण्याच्या सिद्धीमुळे हळूहळू प्रसिद्ध होत अखेर ईजिप्तच्या फारोचे दरबारी अधिकारी झाले(३).

    सुरुवातीला उल्लेख केलेल्या श्री.वि. यांच्या ‘सोन्याचा पिंपळ’ बरेच लेख हे अंतर्गामी म्हणता येतील असे. वास्तवाचे अवास्तवाच्या आधारे मूल्यमापन करु पाहाणारे. कथानायक नि त्याचे कुटुंबिय स्वप्नांचा जागेपणी वेध घेतात, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, त्या आधारे वास्तवात काही निर्णयही घेतात. हा सारा आध्यात्मिक बाज असणारा प्रवास. अर्वाचीन विचाराचे म्हणवणारी मंडळी फ्रॉईड नावाची ‘वॉशिंग्टनची कुर्‍हाड’(४) घेऊन कुणाच्याही मानसिक अवस्थेवर तसंच स्वप्नांच्या तपशीलावर मारत बसतात. एखाद्या तथाकथित भविष्यवेत्त्याने भविष्याला ओंजळभर आकाराच्या भविष्यगोलकातून पाहावे, तसे हे लोक मानसिक पातळीवर जे जे दिसते त्या सार्‍याला ‘लैंगिक भावना’ नि ‘बालपणीचे (विदारक) अनुभव’ या दोन लिटमस पेपरने तपासू पाहतात. जणू मानवी भावना या द्रवाला ‘आम्ल की आम्लारी?’ या वर्गीकरणात बसवावे तशा पद्धतीने दोनच संभाव्य शक्यतांकडे पाहतात. आध्यात्मिक दृष्टिकोन घेऊन पाहाणार्‍यांचे मूल्यमापन पाहिले तर कार्य-कारणभावाचा अभाव असल्याने अनेकदा केवळ अमूर्ताची चूष म्हणून शिल्लक राहाते.

    जे कमकुवत मनाचे असतात ते अशा भयप्रद वा लालसा उत्पन्न व्हावी इतपत आशादायी स्वप्नांच्या आहारी जातात. असे लोक अलगदपणे स्वप्नांचा अर्थ लावण्याचा दावा करणार्‍या धूर्तांच्या तावडीत सापडतात. हे विविध धर्मीय कफन्या घालून बसलेले बुवा-बाबा किंवा सिद्धीप्राप्त असल्याचे दावे करणारे संभावित नागारिकअसतात. ग्रीक पुराणांतील हेदिस जसा मर्त्य मानवांच्या मनातील भीतीवर पोसला जातो तसे हे धूर्त लोक या कमकुवत वा लालसामय सामान्यांच्या अधीर मनांवर पोसले जातात.

    पण समाजातील प्रत्येक मनुष्य हा काही असा बौद्धिक वा आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वप्नांकडे पाहिल असे नव्हे. त्यासाठी विशेष रिकामटेकडा माणूस हवा. :) सामान्य माणसे स्वप्ने पाहतात नि सोडून देतात. फारतर भयावह स्वप्नाने दचकून उठतात, पुढच्या दिवसाचा काही काळ त्याने दिलेल्या अनुभवाच्या प्रभावाखाली व्यतीत करतात नि पुन्हा वास्तविक जगात मुरून जातात. त्या पलिकडे त्यांना महत्त्व देण्याची गरज त्यांना वाटत नाही किंवा उसंत मिळत नाही.

    ElevatorDream
    https://sarahscoop.com/ येथून साभार.

    एक गंमतीशीर स्वप्न माझा बराच काळ पाठलाग करत होते. एखाद्या मॉलसदृश चकचकीत इमारतीमधील लिफ्ट आहे. मी त्यात शिरतो. लिफ्ट बंद होते. मी हव्या त्या मजल्याचे बटण दाबतो. लिफ्ट सुरु होते. अचानक लक्षात येते की लिफ्ट सुरु तर झाली आहे, पण आता थांबणार नाही. कारण लिफ्टमध्ये असणार्‍या इतर दोघांना ज्या मजल्यावर उतरायचे होते तिथे ती थांबलीच नाही. एखाद्या फास्ट ट्रेनप्रमाणे तिचा वेग वाढतो आहे. आता सारं संपलं आहे हे जाणवून मी मनाची तयारी करतो. लिफ्टमधील इतर दोघे कुठे गायब झाले मला कळलेले नाही. अखेर प्रचंड वेगाने लिफ्ट वर जाते नि छत फोडून हवेत उसळी घेते. आता हे प्रचंड धूड माझ्यासह कित्येक मजले उंचीवरुन खाली आदळणार नि माझा सपाट पराठा होणार हे निश्चित झाल्याने मी त्याची वाट पाहातो आहे. इतक्यात लिफ्टचा ऊर्ध्वगामी प्रवास संपतो नि आता ती खाली जाणार या कल्पनेने माझ्या पोटात गोळा येतो. इतक्यात असं ध्यानात येतं की लिफ्ट वेगाने खाली जातच नाही. ती एखाद्या पिसासारखी तरंगत, हेलकावत, दिशा बदलत हळूहळू खाली उतरते आहे. अखेर ती शेजारच्या एका इमारतीच्या छतावर उतरत असतानाच मला जाग येई.

    काही वेळा ही लिफ्ट सुरु झाल्यावर वरच्या दिशेने न जाता आडवी म्हणजे भिंतीतून प्रवास सुरु करे. त्यातही विशेष म्हणजे तिची गती सरळ रेषेत नव्हे, तर एखाद्या तरंगासारखी खाली-वर होत जाणारी असे. भिंतही सरळ रेषेत नव्हे तर एखाद्या वर्तुळकंसाप्रमाणे (arc) असे. मला घेऊन जाणारी ही लिफ्ट एखाद्या मजल्यावर(?) किंवा स्थानकावर पोहोचण्याआधीच स्वप्नाची इतिश्री झालेली असे.

    स्वप्नांचे केवळ बौद्धिक वा आध्यात्मिक वेधच घेतले जातात असे नाही. मनोरंजनाच्या क्षेत्रातही त्यात काही कल्पनाविस्तार दिसून येतो. काही ‘अ‍ॅलिस इन वन्डरलँड’मधील त्या खट्याळ अ‍ॅलिससारखी स्वप्नप्रदेशाची सफरच करतात. जीएंचा बिम्म ‘कालच्या स्वप्नात वाट पाहूनही न आलेला पिवळा पक्षी आज तरी भेटेल’ या निर्धाराने निद्रेला नि स्वप्नाला सामोरा जात असतो. ‘फ्युचुरामा’ नावाच्या एक विक्षिप्त चलच्चित्र मालिकेचा एक एपिसोड ‘भविष्यातील भांडवलशाही जगात संभाव्य ग्राहकांच्या स्वप्नातही जाहिरातींचे प्रक्षेपण केले जाईल’ अशी कल्पना मांडतो. काही चित्रपट वा मालिका अनेकदा स्वप्नाचा वापर मुख्य कथानकाच्या प्रवाहात न बसणारा एखादा कथाभाग घुसडण्यासाठी वा काही व्यावहारिक कारणांनी (सहभागी अभिनेत्याची अनुपलब्धता, पुढे कथानकाला द्यावयाच्या एखाद्या वळणाला पार्श्वभूमी तयार करणे वगैरे) स्वप्न हे डिव्हाईस म्हणून वापरतात. साधारणपणे फ्लॅशबॅकप्रमाणेच; परंतु इथे भूतकाल नव्हे तर पर्यायी वास्तवाची योजना करता येते.

    IHaveADream

    माणसाची आसक्ती, ध्येय हे देखील स्वप्न हे डिव्हाईस वापरताना दिसते. ‘स्वप्नसुंदरी’, ‘स्वप्नातले घर’ वगैरे संकल्पना रूढ झालेल्या आहेच. आपल्या अपेक्षांचे संकल्पनाचित्र म्हणजे स्वप्न असे साधारणपणे म्हटले जाते. ‘स्वप्नातही येशील ऐसे, स्वप्नात नव्हते वाटले' असे चक्क स्वप्नसुंदरीला सांगत भाऊसाहेब पाटणकर प्रेम-विरहाची रूढ चौकट मोडणारा वेगळाच स्वप्नवेध समोर ठेवतात. तर या सर्वस्वी भौतिक स्वप्नांपलिकडे जाऊन एखादा मार्टिन ल्यूथर किंग ‘आय हॅव अ ड्रीम’ म्हणून समस्त मानवजातीच्या कल्याणाचे स्वप्नही पाहातो.

    आपल्या ‘मीरा मधुरा’ या नाटकामध्ये वसंतराव कानेटकर, भक्तीला वेदनेच्या धूप-दीपांनी सजवणार्‍या मीरेचे निव्वळ आसक्तीचे नव्हे, तर परिपूर्तीचे स्वप्न, ‘स्वप्नात सये मी वरिला कृष्ण सावळा । स्वप्नातचि पाहियला लग्नसोहळा ।’ या नाट्यगीतातून समोर ठेवतात... आणि त्याचवेळी ‘स्वप्नात पाहिले जे, ते राहू देत स्वप्नी’ म्हणणारा, तिच्यावर वास्तव जगात प्रेमाचा वर्षाव करु इच्छिणारा भोजराजाही तिच्या समोर उभा करतात. स्वप्नाचे काय करायचे याचे हे दोन दृष्टिकोन, तुमच्या-आमच्या स्वप्नांसाठीही.

    - oOo -

    टीपा:

    (१). “म्हणजे तुझे सगळे तत्त्वज्ञान तुझ्या पोटात साठवले आहे तर !” डॉन रागाने म्हणाला, “मग तुझ्यात आणि तुझ्या त्या गाढवात फरक तो काय राहिला ? त्याच्यापेक्षा तुला आयुष्यात काही जास्त दिसत नाही की काय ?”

    “त्याच्यापेक्षा का जास्त दिसावे, मालक?” गाजर समाधानाने खात सॅन्कोने उत्तर दिले. “त्याच्याएवढे दिसले तरी पुष्कळ आहे. हां, गाढव अनेकदा चावते, नेमकी, निःसंशय अशी लाथ मारते हे खरे, पण ते स्वतःला काहीतरी त्रासदायक होते, तेव्हाच, आयुष्याचा निषेध म्हणून काही ते तसे करत नाही, की दाढी वाढवून एखाद्या गुहेत उपवास करत ते समस्त गाढवजातीच्या भवितव्याची चिंता करत बसत नाही!”

    (कथा: ‘यात्रिक’ ; लेखक: जी. ए. कुलकर्णी ; पुस्तक: पिंगळावेळ )

    (२). कम्प्युटर या आयुधाच्या अंतर्गत रचनेबद्दल माहितगार असलेल्यांसाठी: माझ्या मते स्वप्न हे File Allocation Table (FAT) अथवा हार्डडिस्कची अनुक्रमणिका ही हरवलेल्या किंवा विस्कळित झालेल्या फाईलसारखे असते. हे FAT काय करते, तर एखादी फाईल किती तुकड्यांत ठेवली आहे नि हे तुकडे हार्ड-डिस्कवर कुठे-कुठे ठेवलेले आहेत याची नोंद ठेवते. आता ही नोंदच विस्कळित (करप्ट) झाली तर, या नोंदी चुकतील. यातून होईल असे की ती फाईल वाचताना भलत्याच ठिकाणांहून ते तुकडे वाचले जातील. आणि ते जोडून जेव्हा फाईल तयार होईल तेव्हा ती मूळ फाईल नसेल, त्यात भलतेच काही सापडेल. आता हे काल्पनिक नाही पण वास्तवही नाही असा तिढा आहे.

    कम्प्युटर मध्ये तुमची ऑपरेटिंग सिस्टम ‘Idle Task’ नावाची काही कामे तुमच्या माघारी (background) करत असते. यात Indexing नावाचा एक टास्क असतो. या टास्कमधून अशी फाईल्सची अनुक्रमणिका वरचेवर अपडेट केली जात असते. मानवी स्मृतींसाठी झोप नेमके हेच काम करत असते. त्या वेळी तुमचा मेंदू स्मृतींची पानांचा नीट घडवण्याच्या कामी लागलेला असतो. अशा वेळी तुम्ही मध्येच तो डेटा अ‍ॅक्सेस केला, तर तो क्रमाने नसल्याने त्याचा झालेला गुंता तुम्हाला स्वप्नरूपाने दिसत असावा असा माझा तर्क आहे.

    (३). ब्राझिलियन लेखक ‘पॉल कोएलो याने लिहिलेल्या नि अतिशय गाजलेल्या ‘अल्केमिस्ट’ या पुस्तकातील सँतियागो या मुख्य पात्रामध्ये या हज़रत युसुफ यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

    (४). त्याचे `Interpretation of Dreams' हे पुस्तक जणू गॉस्पेल-ट्रुथ असल्याच्या गृहितकाखाली कित्येक दशके वापरले गेले आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीसच त्याची मानसशास्त्रावरील मगरमिठी सैल झालेली दिसते.


हे वाचले का?

सोमवार, ७ एप्रिल, २०२५

दिशाभुलीचे गणित

  • अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारा-दरम्यान आणि निवडून आल्यानंतरही बर्‍याच देशांना ‘धडा शिकवण्या’चा मनसुभा ट्रम्प यांनी वारंवार बोलून दाखवला होता. ‘हे देश अमेरिकेकडून आयात होणार्‍या मालावर अवाच्या सवा कर आकारतात; त्या तुलनेत अमेरिकेत त्यांच्याकडून आयात मालावर बराच कमी कर आकारला जातो. यातून त्या देशांतील निर्यातदारांना अधिक फायदा होतो आहे आणि पर्यायाने अमेरिका नि त्या देशांत होणार्‍या व्यापारामध्ये अमेरिकेचे नुकसान होते आहे’ अशी त्यांची तक्रार होती. ‘मी यावर तोडगा काढेन, अमेरिकेवर अन्याय करणार्‍या या देशांना धडा शिकवेन’ असे आश्वासन ते देत होतो.

    सामान्य नागरिकांना ‘तुमच्यावर अन्याय होतो आहे’, ‘तुमचे हित धोक्यात आहे’, ‘याला बाहेरचे लोक जबाबदार आहेत’, ’मी हा अन्याय झटक्यात दूर करेन’ अशा घोषणा आवडतात. आपल्या दुरवस्थेला इतर कुणीतरी– विशेषत: आपल्या टोळीबाहेरचे लोक जबाबदार आहेत ही अतिशय सोयीची भूमिका त्यांना आवडत असते. समाजात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली, की अशा वल्गना करणार्‍यांकडे सामान्य लोक आशेने पाहू लागतात. माणसाला बाहुबलाचे आकर्षण अजूनही आहे, कारण त्याच्यामध्ये टोळीभावना अजून जिवंत आहे. प्रत्यक्ष बाहुबलाचा अहिंसक अवतार म्हणजे असा बोलभांडपणा त्याला आकर्षक वाटतो. याचाच फायदा घेऊन देशोदेशी असे वल्गनावीर सध्या सत्तारूढ झाले आहेत.

    आशाळभूत अमेरिकनांनी भरभरून पाठिंबा दिलेले ट्रम्प अध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर, ‘हा बहुप्रतिक्षित बडगा कधी उगारला जातो’ याची अमेरिकन नागरिक चातकासारखी वाट पाहात होते. (पण त्याआधी ट्रम्प यांचा वजीर म्हणून मिरवणार्‍या इलॉन मस्क याने त्यांच्या पायाखालची जमीन खेचून काढण्यास सुरुवात केली नि परदेशातील नागरिकांआधी स्वदेशातील नागरिकांनाच बडगा दाखवला.) हे टॅरिफ दोन तारखेला वाजतगाजत आले (अशा वाचाळवीरांचे सारे काही वाजतगाजतच येत असते.). खुद्द ट्रम्प यानी भर पत्रकार-परिषदेमध्ये भलामोठा तक्ता दाखवून हा प्रसंग साजरा केला.

    या सार्‍या घटनाक्रमाचे "Trump says he’s punishing foreign countries. He’s mostly punishing Americans" या शीर्षकाचे विश्लेषण ‘सीएनएन’वर वाचत होतो. ‘इतरांना धडा शिकवताना ट्रम्प हे खुद्द अमेरिकेचे नि अमेरिकनांचेच नुकसान ओढवून घेत आहेत’ असा लेखाचा सूर होता. तो विश्लेषणाचा दृष्टीकोन क्षणभर बाजूला ठेवू. त्यात मला रोचक वाटलेला उल्लेख होता तो हे टॅरिफचे दर कसे निश्चित केले याबाबतचा.

    चीन, भारतासह अनेक देशांवर विविध दराने टॅरिफ अर्थात प्रत्युत्तरादाखलचा कर लागू करण्यात आला. या दरांची तुलना केली असता अर्थतज्ज्ञ काही दरांबाबत बुचकळ्यात पडले. हे दर कसे निश्चित केले असावेत हे त्यांना उमजेना. ‘सरकारने सांगितलेले दर कसे बरोबर आहेत’ एवढाच विचार करणारे तथाकथित तज्ज्ञ नि सोशल मीडिया सैनिक अमेरिकेमध्ये नसल्याने, त्यातील काही जणांनी याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.

    त्यांनी असे सिद्ध केले की यात अर्थव्यवस्था, अंतर्गत गरजा, त्या-त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची नि चलन-स्थिती वगैरे बाबी यात कुठेच जमेस धरलेल्या नाहीत. हे अतिशय सामान्य पातळीवरचे अंकगणित आहे! ट्रम्प महाशयांच्या प्रशासनाने इतकेच केले आहे, की ज्या देशावरील टॅरिफ-दर निश्चित करायचा आहे त्या देशाशी असलेली व्यापार-तूट (trade-deficit) घेतली, त्या आकड्याला अमेरिकेला त्या देशाकडून होणार्‍या एकुण निर्यातीने भागले. आता या आकड्याला दोनने भागले की जो आकडा मिळाला, तितका कर त्यांनी त्या देशावर लावून टाकला. किती सोपे! अर्थव्यवस्थेतील साऽरी गुंतागुंत बघायलाच नको.

    MouseInTheMaze

    अर्थात हे जाहीर झाल्यावर ट्रम्प प्रशासनाने या समीकरणानुसार दर-निश्चिती केल्याचा साफ इन्कार केला. त्यानंतर पारदर्शकतेचा आव आणत त्यांनी एक गुंतागुंतीचे समीकरण देऊन ‘यानुसार दर-निश्चिती झाल्याचे’ जाहीर केले. पण पुन्हा, तिथले सारेच तज्ज्ञ नि माध्यमे सरकारी भाट नसल्याने ताबडतोब त्या समीकरणाची चिकित्सा झाली. असे सिद्ध करण्यात आले, की वर दिलेल्या सोप्या समीकरणातून मिळणारे उत्तर नि या अवघड समीकरणातून मिळणारे उत्तर सारखेच होते. थोडक्यात ट्रम्प प्रशासनाने सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी गणित विनाकारण गुंतागुंतीचे करुन मांडले होते.

    यावरून मला माझाच एक जुना अनुभव आठवला. काही काळापूर्वी एका कंपनीबरोबर काम करत असताना, एक मोठी अमेरिकन इन्शुरन्स कंपनी आमचा क्लाएंट होती. आमच्या टीममधला एकजण त्यांच्याबरोबर काम करत असे. मी कंपनीत आलो, तेव्हा सुमारे आठ-दहा जणांची टीम माझ्याकडे आली. त्यात हा ही होता. नव्या कामाशी जुळवून घेताना प्रत्येकाचा क्लाएंट नि त्याचे काम समजावून घेताना या क्लाएंटची वेळ आली. त्यांचे काम ऐकून मी सर्दच झालो. त्यांचे एक (संख्याशास्त्रीय) भाकित (prediction) मॉडेल होते ते 'अवघड करण्याचे' काम आमच्याकडे होते.

    संख्याशास्त्राचा विद्यार्थी असताना फारसा प्रभाव नसलेले घटक काढून टाकून सुटसुटीत (parsimonious) - त्यामुळे कदाचित थोडी कमी कार्यक्षम (efficient) - मॉडेल्स तयार करण्याचं बाळकडू आम्हाला मिळालं होतं. त्यामुळे संख्याशास्त्रामध्ये परिणामकारकता चाचणी (tests of hyptheses) चा प्रसार झाला होता, ज्यांतून फारसे प्रभाव नसलेले घटक (covariates) वजा करता येतील का याचा निवाडा केला जात असे.

    मग यांचे असे काय होते की यांना सोपे मॉडेल अवघड करून हवे होते? की ‘कितीही अवघड होऊ दे पण कार्यक्षमता अधिकाधिक हवी असा बाणा होता?’ पण असेही दिसले नाही.

    थोडी चौकशी करता असे दिसून आले, की ज्या नियमांनुसार, जी मॉडेल्स वापरून ते हप्ता (premium), भरपाई(compensation) इ. गोष्टी ते ठरवतात, ती मॉडेल्स सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सर्वांसाठी खुले करण्याचे तिथे कायदेशीर बंधन होते. आता पंचाईत ही, की हे असे साधे सोपे मॉडेल खुले केले, तर स्पर्धक कंपन्या आयतेच ते उचलणार, नि त्याचा वापर करून कदाचित यांच्यापेक्षा चांगले 'डील' ऑफर करून क्लाएंटस पळवणार हे उघड होते. म्हणून मग ते मॉडेल 'कुचकामी/गैरलागू घटक' (redundant factors) घालून सहजासहजी समजणार नाही इतके गुंतागुंतीचे करत न्यायचे, पण त्याच वेळी मूळ मॉडेल नि हे मॉडेल यातून मिळणारे निकाल तेच असावेत याची काळजी मात्र घ्यायची... ट्रम्प प्रशासनानेही टॅरिफ-दरांबाबत नेमके हेच केलेले दिसते.

    'जगण्यातील सोप्या गोष्टी जाणीवपूर्वक अवघड करत नेणे' हा स्पर्धा व्यवस्थेचा आणखी एक अनाकलनीय नि नकारात्मक परिणाम मला पुन्हा अनुभवायला मिळाला. मी ‘पुन्हा’ म्हणालो, याचे कारण हा काही पहिला अनुभव नव्हता. खासगी उद्योगांचा नव्हे, तर चक्क एका सरकारी संस्थेचा असाच अनुभव मला यापूर्वी आलेलाच होता.

    SatteliteImages
    A sattellite image with noise and de-noised
    researchgate.net येथून साभार

    मी विद्यापीठामध्ये शिकवित असताना नव्यानेच उदयाला आलेल्या ‘इमेज प्रोसेसिंग’ या विषयावर आधारित एक अभ्यासक्रम तयार करण्याच्या आम्ही खटपटीत होतो. मी सर्वात तरुण प्राध्यापक असल्याने संगणकाशी संबंधित सर्व गोष्टी माझ्या खांद्यावर ठेवल्या जात. त्या न्यायाने याला लागणारा आवश्यक तो संगणकीय डोलारा उभा करण्याचे काम माझ्याकडे आले.

    तेव्हा इमेज प्रोसेसिंग म्हणजे प्रामुख्याने ‘सॅटेलाईट इमेज प्रोसेसिंग’ इतकेच अभिप्रेत होते. आता या इमेजेस मिळवण्याचा एकच मार्ग आपल्या देशात उपलब्ध होता नि तो म्हणजे दस्तुरखुद्द सरकारमहर्षींकडेच मागणी करणे. कारण इन्सॅट(१)च्या इमेजेसवर सरकारचे संपूर्ण नियंत्रण होते. त्यामुळे आमचा हेतू विशद करुन त्या इमेजेसच्या व्यवस्थापक राष्ट्रीय संस्थेकडे (National Remote Sensing Agency) प्रशिक्षणास सोयीच्या अशा एक-दोन सॅटेलाईट इमेजेसची मागणी नोंदवली.

    पैसे भरुन विकत घेतलेली इमेज ही ‘बिघडवलेली’ होती हे आम्हा हौशी संगणकपटूंनाही सहज समजत होते. त्यावर आम्ही विचारणा केली असता, ‘सिक्युरिटीसाठी आम्ही प्रत्येक इमेज ही white-noise भरुनच देत असतो’ असे स्पष्टीकरण देण्यात आले. बरं हे पैसे घेताना वा भरुन देण्याच्या फॉर्मवर कुठेही स्पष्ट केलेले नव्हते. पण यांच्याशी डोकेफोड करण्यात अर्थ नाही हे ध्यानात येऊन आम्ही त्यांचा नाद सोडला.

    थोडी शोधाशोध करता (तेव्हा गुगल इतके कार्यक्षम नव्हते, ना आमचे इंटरनेट) हीच काय, पण दर पाच मिनिटांनी घेतलेल्या सर्व इन्सॅट इमेजेस नासाच्या वेबसाईटवर फुकट डाऊनलोड करण्यास ठेवल्या आहेत असे लक्षात आले. (इन्सॅट मालिकेतील उपग्रहांनी घेतलेल्या इमेजेस प्राधान्य-हक्काने मिळाव्यात असा नासाने करारच केलेला होता.) मग आम्ही आयुकातील(२) मित्राकरवी हव्या तितक्या इमेजेस नासाच्या साईटवरून फुकट डाउनलोड केल्या. (तेव्हा थेट डाउनलोडची सोय नव्हती, FTP नामे पर्याय वापरावा लागे.आणि आमच्याकडे तेवढे वेगवान इन्टरनेट नव्हते.)

    हा विनोद मला कळला नव्हता. भारत सरकार आपल्याच देशातील अभ्यासकांना पैसे घेऊन इमेजेस विकत होते, त्याही बिघडवलेल्या. उलट ज्याच्याकडे इंटरनेट आहे, अशा जगभरातील कुणालाही त्या फुकट नि निर्दोष मिळत होत्या. सर्वसामान्यांना अज्ञानी समजण्याचा उद्दामपणा होता, की हे त्यांचेच अज्ञान होते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आज एकविसाव्या शतकातील पावशतक उलटत असताना, अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रातही ट्रम्प तोच प्रकार करतात हे पाहाता, आजही विकसनशील देश असणार्‍या भारताच्या दोन-अडीच दशकांपूर्वीच्या सत्ताधार्‍यांना फार काही बोल लावण्यात अर्थही दिसत नाही.

    लहानपणी तुम्ही ‘या मांजरीला दुधाच्या वाटीपर्यंत पोहोचण्यास मदत करा’ किंवा ‘या उंदराला चीझच्या तुकड्यापर्यंत पोहोचण्यास मदत करा’ अशा शीर्षकाची कोडी सोडवली असतील. तो प्राणी नि त्याचे ते खाद्य एका चौकोनाच्या कर्णाच्या दोन टोकांना दिसत नि मध्ये वेड्यावाकड्या रस्त्यांचे जाळे अथवा चक्रव्यूह (maze) असे. त्यातून वाट काढत या कोपर्‍यातून त्या कोपर्‍यात पोहोचणारा रस्ता तुम्हाला शोधून काढायचा असे. हा मधला चक्रव्यूह नसता, तर सरळ कर्णावरुन जाऊन त्या प्राण्याला आपले ईप्सित साध्य करणे शक्य होते. पण कोडे तयार करणार्‍याने त्या बिचार्‍या प्राण्याची वाट अवघड केलेली असे. भरीला हे कोडे तुमच्या माथी मारून तुमचा वेळही त्यात खर्ची पडेल याची तजवीज केलेली असे. ट्रम्प आणि त्यांच्यासारखे इतर राजकारणीही हाच मार्ग अवलंबताना दिसत आहेत.

    - oOo -

    (१). इन्सॅट (INSAT: Indian Remote Sensing Sattellite) भारताची दूरसंचार उपग्रह मालिका. आजची स्थिती ठाऊक नाही, पण तेव्हा जगभरात सर्वाधिक उत्तम दर्जाची उपग्रह-प्रतिमा या उपग्रहांकडून मिळत असे. याच कारणाने नासाने इन्सॅटकडून येणार्‍या प्रतिमा प्राधान्याने विकत मिळण्यासाठी करार केला होता. एक वदंता अशीही होती की उत्तम प्रतिमा आयत्या मिळत असल्याने पुढे त्यांनी दूरसंचार उपग्रह सोडण्याचे प्रोजेक्ट रद्द करुन, त्याऐवजी आधुनिक संशोधनात्मक संशोधनावर लक्ष केंद्रित करणार्‍या उपग्रहाधारित प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित केले.
    (२). आयुका (IUCAA: Inter University Center for Astronomy and Astrophysics): प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुढाकाराने पुणे विद्यापीठाच्या परिसरात स्थापन झालेले खगोल नि खगोलभौतिकी संशोधन केंद्र.


हे वाचले का?