गुरुवार, ६ जून, २०२४

आपले राष्ट्रीय खेळ

आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत... !

दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात.

मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात.

दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला धावाधाव करत असतात.

प्रत्येक सामन्यातील एक डाव दिवसा नि एक रात्री खेळला जातो... क्वचित पहाटेसुद्धा!

प्रत्येक सामन्यापूर्वी ‘प्रतिस्पर्धी कोण आहे’ याबरोबरच मैदानावरील ‘खेळपट्टी’ आणि ‘बाजूच्या हिरवळीची स्थिती’ आदि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून टीम निवडली जाते. चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांना प्राधान्य असते, तर अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांची चलती असते.

खेळ पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकांना इच्छा नसूनही, समोरील जाहिरातींमध्ये काही तथ्य नाही हे ठाऊक असूनही, त्या पाहाव्याच लागतात. समोरची प्रसिद्ध व्यक्ती जे ग्यान देते ते निमूट ऐकून घ्यावेच लागते.

पैसे खर्चणारे, एक टीम निवडून तिला प्रोत्साहन देणारे, विरोधी टीमच्या समर्थकांवर शाब्दिक वार करणारे, एकमेकांना भिडणारे प्रेक्षकच असतात.

‘ड्रिंक्स’ ब्रेकमध्ये परस्परविरोधी टीमचे खेळाडू एकाच आईस-बॉक्समधून पाणी नि कोल्ड्रिंक पितात. तसंच सामना संपल्यावर परस्परांसोबत डिनर पार्ट्या करतात.

प्रेक्षकांनी खर्चलेल्या पैशांतून खेळणार्‍या दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना, डग-आउटमध्ये नुसतेच बसलेल्या टीम सपोर्ट स्टाफला, त्यांच्या मालकांनाच काय पण टीव्हीवरील निवेदकांनाही(!) मानधन मिळून त्यांची चांदी होते.

सामना संपला, गुलाल उधळून झाला की प्रेक्षक आपला खिसा किती हलका झाला याचा अंदाज घेत-घेत पुढच्या काटकसरीची चिंता करत घरी जातात (किंवा टीव्ही बंद करतात.)

दोन्हींमध्ये मोजके स्थानिक/मूलनिवासी खेळाडू आणि बाकीचे थोडे देशातले, थोडे परदेशातले असे पैसे देऊन खरेदी करून एक टीम तयार केली जाते. पण ‘नालायक असले तरी स्पर्धेच्या/संघर्षाच्या प्रसंगी आपल्या जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, गावच्या माणसाची बाजू घ्यायला हवी’ या निष्ठेतून अशा ‘आपल्या नसलेल्या’ आपल्या टीमची बाजू सर्वसामान्य चाहते प्रसंगी आपल्याच माणसांशी वैर पत्करुनही लढवत असतात.

एक लहानसा फरक असा आहे की आयपीएलमध्ये खेळाडूंचा रीतसर लिलाव होतो, तर निवडणुकीत ‘होस्टाईल टेक-ओव्हर’देखील (Hostile Take-over) होते.

प्रत्यक्ष निवडणुकीआधी बाहेरुन नेते आयात करतात, निवडणुकीदरम्यान बाहेरुन नेते आयात करतात आणि निवडणूक झाल्यावरही बाहेरुन नेते आयात करतात. (अदानी जसे कंपनी शून्यापासून सुरु करण्याचे नि वाढवण्याचे कष्ट न घेता सरळ इतरांची बळकावतो तसेच.) थोडक्यात पळवापळवी हा राजकारणाच्या अनेक उपखेळांपैकी एक खेळ आहे.

... कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!

GameOrSport
https://www.sportsbusinessjournal.com/ येथून साभार.

प्रत्येकाचा एक संघ असतो नि एक लाडका खेळाडू असतो. हे दोन्ही जग्गात भारी आहेत असा त्याचा समज असतो. यांची कामगिरी खालावली तर ती ‘सदोष पंचगिरी’मुळेच असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ‘पंच बदला निकाल बदलेल’ या उक्तीवर त्यांचा ठाम विश्वास असतो. कारण...

आपलं पोरगं कोणत्या शाळेत नि कितव्या इयत्तेत शिकते याचा पत्ता नसलेल्यालाही फडणवीसांचा स्ट्राईक रेट किती नि त्यांनी कुठल्या पक्षातून किती नेते आयात केले याचे स्टॅटिस्टिक्स बिनचूक मुखोद्गत असते. आणि असे असून बीसीसीआय आपल्याला ईशान किशनप्रमाणेच करारापासून वंचित ठेवते याची त्याला खंत नसते. कारण...

उपकर्णधार म्हणून साधी स्वतंत्र रूम मागितली म्हणून सुरेश रैनाला स्पर्धेच्या मध्येच परदेशातून हाकलून लावले जाते. दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून जडेजासारख्या दिग्गज खेळाडूला एका आयपीएलचे तिकीट नाकारले जाते. पण ‘निवडून येण्याची क्षमता’ आणि ‘श्रेष्ठींशी नाते’ या गुणांच्या बळावर हार्दिक पांड्याला मात्र भाजपमधून शिंदेसेनेमध्ये प्रवेश केल्यावरही निलंबित केले जात नाही. तरीही...

दुसर्‍या पक्षातून येऊन थेट तिकीट मिळवलेला हार्दिक ‘कसा निवडून येतो बघतोच.’ असे म्हणत कुणी रामदास बुमराह बंड करतो. पण वरिष्ठांनी ‘समजावल्या’वर (समजूत घातल्यावर नव्हे, प्लीज नोट!) ‘संघ नि देशासाठी’ म्हणून निमूटपणे तिसरा गोलंदाज म्हणून चेंडू हाती घेतो. कारण...

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही ‘लोकसभेसाठी थेट उमेदवारी मिळणार नाही’ असे हायकमांड जाहीर करते. एवढेच नव्हे तर किमान एका ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनेल निवडून आणल्याखेरीज पक्षप्रवेशही होणार नाही असे बजावते. पण हार्दिक पांड्याचा थेट पक्षप्रवेश होऊन त्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदही बहाल केले जाते. तरीही...

‘आयुष्यातील इतकी वर्षे संघाला दिली. आता अशा बाहेरून आलेल्या नेत्यांसाठी आम्ही काय सीमारेषेवर पाण्याच्या बाटल्या घेऊन बसायचेच का?’ असा प्रश्न यापूर्वी अवघड मतदारसंघही जिंकून दिलेल्या रोहित शर्माला पडत असतो. तरीही...

ड्रीम-११ किंवा फँटसी-लीग सारख्या कंपन्या केवळ क्रिकेटसदृश मैदानी खेळांसाठी आभासी खेळ देऊ करतात. पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या– आणि चॅनेल माध्यमे ‘सिंहासन का क्वार्टर-फायनल’, ‘सिंहासन का सेमी-फायनल’ किंवा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ वगैरे नावांनी डायरेक्ट टेलेकास्ट करत असलेल्या निवडणुकांसारख्या सर्वाधिक लोकप्रिय खेळासाठी मात्र असा आभासी खेळ देत नाहीत. याचा निषेध केला जातो आहे. कारण...

‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेमध्ये केवळ दर पाच वर्षांनीच या खेळाची मजा लुटता येणार असल्याने अभिजित बिचुकले ‘जंतर मंतर’वर उपोषणास बसणार आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आरसीबी संघ त्याच्या व्यवस्थापनासह एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. कारण...

उलट ‘आयपीएलच्या धर्तीवर वार्षिक निवडणूक असायला हवी आणि ती ही पळण्याच्या शर्यतीप्रमाणे ‘सारे एकदम’ न लढवता आयपीएलच्या धर्तीवर ‘एकास एक’ पद्धतीने लढवावी– म्हणजे मनसेसारख्या पक्षांनाही एखाद-दुसर्‍या विजयाची संधी मिळू शकेल’ अशी मागणी मूळसेना-नेते भंजक खाऊच आणि गतस्वाभिमान-नेते हरिहर नानू खाणे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे केली आहे. कारण...

‘लोकांना सतत निवडणुकांच्या धामधुमीत नि उत्तेजित अवस्थेत ठेवण्याने आपल्या लाथाळीला मिळणारा वाव नाहीसा होईल’ या भीतीने बायचुंग भुतिया या फुटबॉल महाशक्तीने आपल्याला छुपा पाठिंबा दिल्याचा दावा या दोघांनी केला आहे. कारण...

आयपीएलच्या ’फॅन पार्क’ संकल्पनेमध्ये ज्याप्रमाणे सामने नसलेल्या शहरांत चाहत्यांना स्टेडियममध्ये एकत्र सामना पाहण्याचा आनंद दिला जातो, त्याच धर्तीवर आपापल्या नेत्याच्या अन्य शहरांतील सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळावी यासाठीही असे फॅन पार्क निर्माण करून तिथे मोठ्या स्क्रीनवर आपल्या लाडक्या नेत्याचे संपूर्ण भाषण लाईव्ह दाखवावे अशी मागणी सर्वपक्षीय फॅन्सतर्फे करण्यात आली आहे. कारण...

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांचे स्वत:चे चॅनेल्स व वेबसाईट्स असतात नि त्यावरून आपल्या लाडक्या संघ व खेळाडूंच्या जुन्या खेळी पुन्हा पुन्हा पाहून आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे आप-आपल्या लाडक्या नेत्यांची भाषणे, विरोधी नेत्यांच्या भाषणातील चुका अधोरेखित/निर्माण करणारे मीम्स आणि रील्स, चॅनेल-चर्चेमध्ये आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याला वा चॅनेल-प्रतिनिधीला कस्सला धुत्तला हे दाखवणारे असे सारे व्हिडिओज, माहिती, लेख वगैरे एकाच ठिकाणी देणारे चॅनेल्स आणि वेबसाईट्स असायला हव्यात अशी आग्रहाची मागणीही करण्यात आली आहे. कारण...

आयपीएलमध्ये प्रत्येक ओव्हरनंतर जाहिरात दाखवतात त्याच धर्तीवर निवडणुकीतील प्रचाराच्या भाषणांदरम्यान जाहिराती दाखवण्यात याव्यात अशी मागणी थडानी ग्रुप्स या मॉरिशसस्थित आफ्रिकन-अमेरिकन कंपनीने केली आहे. ‘म्हणजे अजून पैसा’ हे ध्यानात आल्यावर डोळे लकाकलेल्या बीसीसीआय प्रमुखांनी ‘एक देश एक निवडणूक’ अध्यादेशामध्ये या पुरवणी मागणीचा समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. कारण...

एका भाषणात दोनच बाउन्सर(!) अलौड असावेत, ‘रिव्हर्स’ स्वीप या फटक्यावर प्रचारामध्ये बंदी घालण्यात यावी. निवडणुकांचा प्रचार चालू असताना ऐनवेळी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून हार्दिक पांड्याप्रमाणे विरोधी उमेदवारच आपला उमेदवार म्हणून जाहीर करण्याची सोय असायला हवी... इत्यादि मागण्या ‘गुजरात जायन्ट्स’(!) संघाने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. कारण...

निवडणुका अधिक रोमांचकारी होण्यासाठी मागे फन्ना पाडारे(!) यांनी मागणी केल्याप्रमाणे, युक्रेनसोबत युद्ध पुकारल्यानंतर खेळणार्‍या रशियन खेळाडूंप्रमाणे अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्यात नि नंतर आयपीएलच्या धर्तीवर विजेत्यांचा लिलाव करून विविध संघांनी त्यांना विकत घ्यावे. जे सर्वाधिक खासदार विकत घेऊ शकतील त्यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करावे. कारण...

...कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!!

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, १५ मे, २०२४

शब्दांनी हरवुनि जावे

आठ-दहा दिवसांपूर्वी गलगोटिया विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता - बहुधा- मतदार असलेल्या हे विद्यार्थी आपण इथे काय करत आहोत, हाती धरलेल्या घोषणापत्रांवर काय लिहिले आहे वगैरे बाबत अनभिज्ञ दिसत होते. सद्य राजकीय सामाजिक स्थितीचे प्रतिबिंबच त्यांच्या वर्तनात दिसत होते असे म्हणता येईल.

या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब ही की या प्रतिनिधीने काही जणांना त्यांच्या स्वत:च्या हातात असलेल्या घोषणापत्रावर काय लिहिले आहे हे वाचण्यास सांगितले असता इंग्रजीमध्ये लिहिलेले तर सोडाच काहींना मातृभाषा हिंदीमध्ये लिहिलेली ती घोषणाही वाचता येत नव्हती. यावरून त्यांच्या शिक्षणाबद्दल, यांना मतदार म्हणून मान्यता देण्यात घाई होते आहे का इत्यादि प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. परंतु मला यात एका संक्रमणाची चाहूल दिसते आहे. यात बरे-वाईट परिणाम दिसतीलच, परंतु याचे संभाव्य दुष्परिणाम मला दिसतात जे अधोरेखित करावेत असे वाटते.

IAmConfused
https://www.freepik.com/ येथून साभार

यांना शब्दांचे अर्थ समजावेत ही अपेक्षा बाजूला ठेवूनही मला असा प्रश्न पडतो, ‘ज्या मुलांना सज्ञान झाल्यावरही ही चिरपरिचित लिपी बिनचूक वाचता येत नसेल तर याचे कारण काय असावे?’ लहानपणापासून नागरी लिपीतील मजकूर वाचणे त्यांच्या अंगवळणी पडलेले आहे. पहिल्या इयत्तेत मुळाक्षरे त्यांनी गिरवली आहेत, जाता-येता दुकानांचे बोर्ड वाचले आहेत, (निदान) क्रमिक पुस्तके वाचली आहेत. मग वय वाढू लागल्यावर हे ‘अनरिंगिंग ऑफ बेल’ किंवा हे ‘अनलर्निंग’ म्हणावे का? असेल तर हे का घडत असावे?

शाळेत असताना पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर मागील इयत्तांमध्ये आत्मसात केलेली माहिती (मी ‘ग्रहण केलेले ज्ञान’ म्हणण्याचे धाडस करत नाही) स्मरणातून सहज निसटून जाण्याला गंमतीने ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ असे म्हटले जाई. ही पाठांतरप्रधान, संस्कारप्रधान समाजात असलेली जन्मव्याधी आहे. आकलनाऐवजी अनुकरणाला, ग्रहण करण्याऐवजी पाठांतराला महत्त्व देणार्‍या पंतोजी शिक्षणपद्धतीमध्ये याहून वेगळे अपेक्षित नाही.

मागच्या स्तरावर नवा स्तर चढला की आधीच्या स्तराकडे पोहोचण्यास नव्या स्तराचा अडथळा तयार होतो. आकलन म्हटले तर प्रत्येक स्तरातील ज्ञानाची एक अनुक्रमणिका, what and where किंवा संगणकाच्या भाषेत सांगायचे तर मास्टर फाईल टेबल (MFT) तयार होऊन त्याआधारे हवे तेव्हा त्या स्तरातील माहिती उपसून काढण्याची सोय होत असते. पाठांतरप्रधान मंडळी कपड्यांच्या घड्यावर घड्या ठेवून नुसतेच ‘कोठावळे’ (hoarders) होऊन राहतात.

हे ‘अनलर्निंग’ त्याच्याही पुढचा टप्पा आहे का? जी वाक्ये त्यांनी शाळेत असताना सहज वाचली असती, ती आज त्यांना का वाचता येत नाहीत? त्यांनी स्वत:च्या बुद्धीने जे लिहिले असते त्याचेच आकलनही त्यांना का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, मला स्वत:चेच अनुभव जमेस घेऊन काही एक आकलन होऊ लागले. हे कितपत गंभीर आहे मला माहित नाही, परंतु ‘हे असे नाहीच’ वा ‘प्रमाण नगण्य आहे’ असे कुणी म्हणाले, ‘वडाची साल पिंपळाला लावतो आहेस’ (किंवा फेसबुक वा एकुण सोशल मीडिया नागरिकांच्या प्रवृत्तीला अनुसरून वैय्यक्तिक शेरेबाजी करत ‘तुझा छुपा अजेंडा आहे’) असे कुणी म्हणाले तर मी अजिबात मान्य करणार नाही हे नक्की.

माझ्या मते याला ‘दृश्यात्मकतेच्या आहारी जाणे’ हा मोठा दोष कारणीभूत आहे.माझी ब्लॉगयात्रा’ या मालिकेमध्ये मी अभिव्यक्तीच्या शब्द या माध्यमाची निवड मी का केली यावर थोडे भाष्य केले होते. त्याचबरोबर फेसबुकसह सर्वत्र फोटो/इमेज अथवा व्हिडिओ यांचे प्राबल्य असल्याने अभिव्यक्तीच्या काय समस्या निर्माण होतात याबाबतही थोडे लिहिले होते.

एक उदाहरण म्हणून माझी कालचीच फेसबुक-पोस्ट पाहता येईल. त्या पोस्टमध्ये मी सरमिसळ घटक अथवा confounding factors बाबत बोलत होतो. त्या मुद्द्याचे उदाहरण म्हणून एक भाष्यचित्र जोडले होते. सुरुवात जरी उपहासाने केली असली तरी माझ्या मते पोस्ट गांभीर्यपूर्वक मांडणी करणारी होती. (पोस्ट असल्याने मांडणी स्वैर होती हा दोष मान्य.) परंतु फेसबुक दृश्यात्मकतेला अवाजवी प्राधान्य देत असल्याने इमेजने व्यापलेली जागा मजकुराहून अधिक असते. यातून झाले असे की फेसबुकवर वा काही फेसबुककर नसलेल्या काहींना लिंक पाठवल्यावर हा: हा: अशी प्रतिक्रिया आली.

निव्वळ भाष्यचित्र पाहता ती वाजवी आहे... कदाचित. परंतु पोस्ट वाचल्यानंतर तशी येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे या प्रतिसादकांनी पुरी पोस्ट वाचली असण्याची शक्यता कमी आहे. चटकन इमेज पाहिली नि प्रतिसाद दिला असे झाले असण्याची शक्यता बरीच आहे. ‘लिहिले असेल नेहमीप्रमाणे लांबलचक, कशाला वाचा’ या विचारही एखाद्याने केला असेल (‘हा पाच मैल लिहितो, एवढे कोण वाचणार’ अशी एका मित्राची प्रतिक्रिया फार पूर्वी आलेली होती. तो दोष मान्य करून त्याच्या त्या प्रतिक्रियेमध्येच शब्दमाध्यमाबद्दलचा कंटाळा दिसतो हे नोंदवून ठेवतो.)

मी लिहितो म्हटल्यावर ‘समय के साथ चलो’ वाल्यांनी ‘लेखन अधिक पोहोचावे म्हणून संपूर्ण मजकूर फेसबुकवर टाकावा’ असा सल्ला दिला होता. त्याचा प्रतिवाद करताना मी फेसबुकच्या इमेज-मजकूर असमतोलाबद्दल आणि मांडणीच्या जाचक मर्यादेबद्दल नि त्याच्या परिणामांबद्दल लिहिले होते. ही मागची फेसबुक-पोस्ट याचे आणखी एक उदाहरण.

आज बहुसंख्येला मीम्स, रील्स, मायक्रो-व्हिडिओज वगैरे माध्यमांतूनच सारे काही हवे असते. त्यातून मग आकलनप्रधान, विश्लेषणप्रधान, मुख्य म्हणजे शब्दप्रधान मांडणी करणार्‍यालाही यू-ट्यूब चॅनेल चालू कर, छोटे व्हिडिओ बनव, पॉडकास्ट कर वगैरे सल्ले दिले जातात. शब्दाचे वाचन कमी कमी करत नेणार्‍या या पिढीमध्ये लिपीशी बांधिलकी विरत जाणार हे अपरिहार्य आहेच.

‘J1 झालं का?’ या सनातन प्रश्नापासून सुरु झालेली चॅट भरपूर प्रमाणात इमोजींचा वापर करते. टाईप कमी करावे लागावे हा उद्देश असतो. म्हणजे ‘मला हे आवडले नाही’ या वाक्याच्या जागी रागावलेली एक इमोजी टाकली की काम भागते. कदाचित लिपीप्रमाणेच पुढे या इमोजीचा अर्थ लावणेही मेंदू बंद करेल नि थेट त्यातील त्या-त्या भावनेचे निदर्शक असणारे केंद्र उद्दीपित करेल. हे कदाचित प्रासंगिक संवाद वा देवाणघेवाणीस पुरेसे असेलही, पण दस्तऐवजीकरणावर याचा काय परिणाम होईल याचा विचारही करायला हवा.

नफा हेच एकमेव उद्दिष्ट घेऊन उभे राहिलेली भांडवलशाही व्यवस्था भरपूर पैसे निर्माण करत असली तरी गुणवत्ता, वैविध्य आणि मुख्य म्हणजे पर्यावरण याची ऐशीतैशी करते; तसेच प्रासंगिक संवाद महत्त्वाचा नि बाकी सारे दुय्यम समजू लागणे घातक आहे का याचा विचार आवश्यक आहे का या प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारुन पाहायला हवा.

पोस्ट आधीच भरपूर लांबल्यामुळे फार उदाहरणे देत नाही. एकदोनच पाहू. समजा हे दृश्यप्रधान जगातील तरूण एखाद्या गुन्ह्याचे साक्षीदार असतील आणि पोलिसांच्या आरेखकाने यांना पाहिलेल्या गुन्हेगाराचे वर्णन विचारले अथवा घटनाक्रम नि गुन्ह्याच्या स्थानावरील जड वस्तूंच्या स्थितीबाबत विचारणा केली, तर वास्तवाच्या त्या अवकाशातील विविध घटकांसाठी नेमके शब्द यांना सापडतील, की मनात त्याला अनुरूप इमोजीच फक्त उमटतील? की वस्तुनिष्ठतेच्या नि दृश्यात्मतेच्या अवाजवी आहारी गेलेला माणूस संभाव्य मानवी वावराच्या परिसरातील प्रत्येक चौरस से. मी. वर विविध अँगलने पाहणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल, जेणेकरुन माणसाच्या वर्णनक्षमतेवर अवलंबूनच राहायला नको?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकाच्या पडद्यापलिकडे माणसाचा परस्परसंवाद - आज झाला आहे त्याहून - कमी होत जाईल. समोरासमोर बसून एकमेकांना ‘आयएम’ करणे अधिक सुलभ होईल का? कारण अनेक वाक्यांची रचना ही शब्दांऐवजी इमोजींनी करणे अंगवळणी पडलेले असेल. आजही लांबलचक मजकूर कुणी वाचायचा म्हणून बहुतेक अ‍ॅप्स, उपकरणे (devices) यांची लायसन्स-अग्रीमेंट्स आपण न वाचता अ‍ॅक्सेप्ट करुन पुढे जातो. या अधीर वृत्तीला अज्ञानाची जोड मिळून हे भूत आणखी किती विक्राळ रूप धारण करेल?

आज हा अतिरंजित कल्पनाविस्तार वा प्रलयघंटानाद वाटू शकेल, परंतु माझ्या मते हे वास्तव दूर असले तरी आपल्या वाटेवर आहे हे नक्की

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

मी लिंक टाकली

संसदीय निवडणुकांची धामधूम चालू असल्याने समाजमाध्यमांवर असणारे ट्रोल्स सक्रीय होत आहेत. सत्ताधार्‍यांच्या सोयीसाठी कोणत्याही मुद्द्याला हिंदू-मुस्लिम वादाचा तडका देण्यास ते तत्पर होऊ लागले आहे. अनेक तोंडांनी, हातांनी आणि अकाउंट्समधून प्रसवलेले प्रचारसाहित्य परस्परांच्या लेखन-लिंक्स नि दाखले देत वेगाने पसरवणे चालू आहे.पावसाळ्याच्या तोंडावर जसे बेडकांचे ड्रांव ड्रांव अधिक कर्कशपणे ऐकू येऊ लागते, तसेच यांचे दुर्दरगान निवडणुकीच्या पुढील टप्प्यांत अधिक कर्कश होत जाईल.

स्वत:च्या जिवाची बाजी लावून मालकाला संभाव्य धोका वाटणार्‍या प्रत्येकावर भुंकणार्‍या श्वानाप्रमाणे यांचे वर्तन होत असते. वारयोषिता स्वत:चे पोट जाळण्यासाठी चोळीची गाठ सोडते; हे मालकाला आपला दलाल मानून त्याच्यासाठी आपली चोळी त्यागतील नि आपल्या अब्रूला त्याच्या राजकीय समर्थनाच्या बाजारात उभी करतील.

अशांनी उघड व्यक्त न केलेले हे मनोगत.
---

InternetTroll
https://www.socialpilot.co/blog/social-media-trolls येथून साभार.
(कविवर्य ना. धों. महानोर यांची क्षमा मागून...)
    
मी लिंक टाकली
मी शिंक टाकली
मी गुडघी अक्कलेची, बाई पिंक टाकली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत वळवळ वळवळ केली
भर वादामधी जाळ, फुंकून ठिणगी फुलली

ह्या पोस्टींवरती
ते मीम पांघरती
मी फक्त हासले बाऽई, नाही कमेंट केली... नाही कमेंट केली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत, वळवळ वळवळ केली...

अंगात माझिया
घुसलाय फेकिया
मी भिंगरभिवरी त्याची गोऽ बटीक झाली
मी चाळीस पैशांसाठी बाई चोळी टाकली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत, वळवळ वळवळ केली...
 
- oOo -

हे वाचले का?

रविवार, २८ एप्रिल, २०२४

अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी

(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन केले. त्याच सुमारास भारतामध्ये झालेल्या नोटाबंदीच्या अनुषंगाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा थोडा विस्तार करुन लिहिलेली ही काल्पनिका.)
---

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महान भारतीय अर्थशास्त्री विजय मल्ल्या ऊर्फ मल्ल्यामहर्षी यांनी युरपमधून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे (अ.सं.सं.) गुपचूप गमन(१) केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बातमी तर गुप्त ठेवण्यात आलीच होती. अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’च्या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ नील्स बोर याला ज्या सफाईने अमेरिकेमध्ये नेण्यात आले होते त्याच सफाईने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले.

प्रथम एका कार्गो विमानाने मल्ल्यामहर्षींना डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. आधीच सूचना मिळाल्याप्रमाणे, विमानतळावरील अ.सं.सं.च्या अधिकार्‍यांनी इमिग्रेशन-चेक वगैरेचे सोपस्कार बाजूला ठेवून त्यांना थेट एका अति-सुरक्षित अशा लहानशा विमानाकडे नेले. हे विमान खुद्द अ.सं.सं. अध्यक्षांनीच पाठवले होते, हे नंतर प्रेस-ब्रिफिंगमध्ये उघड झाले. या विमानाने महर्षींना थेट रीगन विमानतळाकडे नेण्यात आले. तिथे मात्र त्यांचे आगमन जाहीर करण्यासाठी स्पेशल बँड आणवून वाजतगाजत त्यांना थेट राष्ट्राध्यक्ष निवासाकडे नेण्यात आले.

नील्स बोर याच्या आगमनाचे कारण बरेच उशीरा उघड झाले होते. तसेच मल्ल्यामहर्षींना कोणत्या मोठ्या ऑपरेशनसाठी ‘कमिशन’ करण्यात आले आहे यावर अ.सं.सं.च्या माध्यमांमधून घनघोर चर्चा सुरू झाल्या. भारतीय माध्यमांनी ‘फक्त आमच्याच चॅनेलला मिळालेली गुप्त बातमी’ म्हणून ‘मल्ल्यामहर्षींना अध्यक्षांचा ‘मद्य-सचिव’ म्हणून नेमण्यात येणार आहे’ यापासून ‘स्वदेशात अडचणीत आल्यास परदेशाश्रय कसा घ्यावा’ यावर व्हाईट हाऊसमध्ये निवडक रिपब्लिकन खासदारांना ते मार्गदर्शन करणार असल्याची’ ब्रेकिंग न्यूज – अर्थात ग्राफिक्स वगैरेसह – वाजवण्यास सुरुवात केली. भारतीय माध्यमांच्या पावलावर पाऊल टाकत अमेरिकन माध्यमांनी मल्ल्यामहर्षींचा सहभाग असलेल्या या संभाव्य गुप्त कार्यक्रमाला ‘ऑपरेशन रॉयल चॅलेंज’ असे नाव देऊन टाकले.

MallyaaAndTrump

मल्ल्यामहर्षी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पोहोचले. औपचारिक स्वागत झाल्यावर अध्यक्ष ट्रम्प नि मल्ल्यामहर्षी दोघेच त्यांच्या अति-सुरक्षित चर्चागृहात गेले. दोघांची जेमतेम दोनच मिनिटे चर्चा झाली. यावरून प्रस्तावित ऑपरेशनबाबत अध्यक्षांची मल्ल्यामहर्षींसोबत आधीच सविस्तर चर्चा झाली असल्याचे फॉक्स न्यूजने आळवण्यास सुरुवात झाली. चर्चागृहातून दोघेही बाहेर येऊन थेट पेंटगॉनकडे रवाना झाले. तासाभरातच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्याची आणि त्यांच्या उपाध्यक्षांनीही राजीनामा दिल्याची बातमी पसरली. सोबतच मल्ल्यामहर्षी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असल्याची बातमीही आली.

अ.सं.सं. मधील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोजगार धंदे सोडून लोक रस्त्यावर आले, एकमेकांना मिठ्या मारुन, जोर-जोरात घोषणाबाजी करत आणि मुख्य म्हणजे बीअर पीत ते आपला आनंद व्यक्त करत होते. ही भिकारडी जर्मन बीअर आपल्याला प्यावी लागणार नाही, अस्सल भारतीय बनावटीची बीअर मल्ल्यामहर्षी आपल्याला उपलब्ध करून देतील या कल्पनेनेच तरुणांचा जल्लोष सुरू झाला.

पदभार स्वीकारल्यानंतर मल्ल्यामहर्षींनी पहिलीच घोषणा केली ती ‘नोटाबंदीची’! वरिष्ठ सभागृह (Senate) तसंच प्रतिनिधी-गृहातील (House of Representatives) रिपब्लिकन सदस्यांनी धडाधड केलेल्या ट्विट्स, पोस्ट्स नि फेसबुक लाईव्हद्वारे ‘अमेरिका फर्स्ट’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा आता सुरु होत असल्याचे ढोल वाजवायला सुरुवात केली. भारतात अतिशय यशस्वी झालेल्या या उपायाची अंमलबजावणी करण्याचे जाहीर झाल्याने अ.सं.सं. मधील नागरिक आणखीनच खूश झाले आणि ‘आले रे आले, अच्छे दिन आले’ अशा घोषणांनी त्यांनी आसमंत दणाणून सोडले.

भारताप्रमाणेच अ.सं.सं. मधील विरोधकांचा आरडाओरडा सुरु झाला(२). पण मोदींप्रमाणेच मल्ल्यामहर्षींनी या विरोधाला भीक घातली नाही. रिपब्लिकन प्रतिनिधी, ट्रम्प-आर्मी, ‘फॉक्स’सारखी माध्यमे यांनी विरोधकांना ‘चीनचे हस्तक’ म्हणून हिणवण्यास सुरुवात केली. या गदारोळामध्ये फेडरल रिजर्वने केलेला विरोधही पाचोळ्यासारखा उडून गेला.

नोटाबंदी जाहीर झाल्याने जुन्या नोटांच्या बदली देण्यासाठी नव्या डॉलर नोटा(३) छापण्यास सुरुवात झाली. मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये काळा पैसा साठवला जात असल्याने रद्द केलेल्या पाचशे नि हजारच्या नोटांऐवजी दोन हजारच्या नोटा छापणार्‍या मोदींच्या पावलावर पाऊल टाकून मल्ल्यामहर्षीं काम करू लागले. त्यांनी अ.सं.सं.ला वेगाने श्रीमंत करण्याच्या उद्देशाने थेट पाच मिलियन डॉलर्सच्या नोटा छापण्याचचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला पंधरा मिलियन डॉलर्स सरकारतर्फे देण्याची घोषणा केली(४). पुढील दोन महिन्यांमध्ये हे वाटप व्हावे या दृष्टीने नियोजन करण्याचा आदेश त्यांनी दिला.

ज्या दिवशी हे वाटप सुरू होणार होते, त्या दिवशी भल्या पहाटेपासून लोकांनी एटीएम्ससमोर रांगा लावल्या होता. रांगेतले काळे, पांढरे, पिवळे, तांबडे, बुटके, उंच, काळ्या डोळ्याचे, निळ्या डोळ्यांचे, भुर्‍या डोळ्यांचे, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सारेच आनंदाने एकमेकांना मिठ्या मारत होते, शुभेच्छा देत होते. येऊ घातलेल्या ‘अच्छे दिनां’च्या चाहुलीने झालेला आनंद त्यांना आवरता येत नव्हता. अखेर ती वेळ आली. सकाळी सहा वाजता रेडिओवरून(५) सर्व एटीएम नव्या नोटांनी गच्च भरल्याची नि सर्वांसाठी ते खुले झाल्याची घोषणा मल्ल्यामहर्षींनी केली नि नागरिकांची आपल्या नेहमीच्या शिस्तीला विसरून एटीएममधे घुसण्याची अहमहमिका सुरू झाली.

वॉशिंग्टनच्या रस्त्यावर राहणार्‍या एका बेघर व्यक्तीने त्याच्या ‘घरा’शेजारच्या एटीएमसमोर दोन दिवसांपासून नंबर लावलेला होता. एटीएममधून पैसे काढून ती व्यक्ती बाहेर पडली आणि कॅमेर्‍यांचे क्लिकक्लिकाट चालू झाले. ‘आम्हीच पैले’ म्हणत त्याचा ‘बाईट’ घेण्यास धावलेल्या चॅनेल प्रतिनिधी आणि स्वयंघोषित यू-ट्युब चॅनेलशास्त्रींना धक्काबुक्की करत बाजूला करुन काही तरुण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. आनंदातिशयाने त्या भाग्यवंताला डोक्यावर घेऊन त्यांनी नाचायला सुरुवात केली. पहिला उत्साह ओसरल्यावर तिला खाली उतरवण्यात आले. नव्या नोटेस तिने उंच धरून सर्वांनी त्यासोबत सेल्फी काढावी असा प्रस्ताव एका तरुणाने मांडला नि तो उत्साहात नि एकमताने पास झाला.

ताबडतोब त्या ‘प्रथम-नोट-प्राप्त’ भाग्यवंताला मधे घेऊन त्याच्या आजूबाजूने बरेच लोक दाटीवाटीने उभे राहिले. त्या भाग्यवंताच्या शेजारी उभे असलेल्या तरुणाने मोबाईल समोर धरून सर्वांना ‘से बीअऽऽऽऽर’असे म्हणून क्लिक केले. त्याच वेळी समोरुन फोटो काढण्यासाठी सज्ज असलेल्या एकाने झूम थोडा कमी करून सर्वांना कव्हर करता यावे यासाठी स्क्रीनवर बोटे टेकवली. इतक्यात एटीएममध्ये नंबर लागून नोटा मिळालेला एकजण अत्यानंदाने धावत त्याच्या शेजारून गेला. जाता जाता त्याचा धक्का या कॅमेर्‍याधार्‍याला लागला नि वाईड अँगलऐवजी उलट कॅमेरा जास्तच झूम झाला. समोरचे सारे लोक आता आउट-ऑफ-फोकस जाऊन स्क्रीनवर फक्त नोट दिसत होती. त्यावर लिहिलेले वाक्यही स्पष्ट वाचता येत होते...

‘इन फ्रॉड वी ट्रस्ट’ (६)

- oOo -

टीपा :
(१). ‘पलायन केले’ असे म्हणणार होतो पण कुणाच्या तरी भावना दुखावल्या तर पंचाईत. (* टीप ६ पहा.)
(२). ‘तसंही या डेमोक्र्याट्यांना आरडाओरड करणं सोडून दुसरं येतंय काय?’ - सॅम-बिन पॅट्रोस, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, दक्षिण-पश्चिम न्यू हॅम्पशायर परगणा, गल्ली क्र. ८.
(३). तिकडे त्यांना बिल्स म्हणतात नि बिलाला चेक. पण ‘ज्याले ऑनर करु नही, त्याले चेक म्हनू नही’ असं सांगून अ.सं.सं.च्या लोकांचे हे उलटे डोकेही मल्ल्यामहर्षी लवकरच सरळ करतील.
(४). ‘त्यापेक्षा किंगफिशर माईल्डचे पंधरा क्रेट दिले असते तर अधिक उपयोगी ठरतील, या रिपब्लिकनांच्या देशात!’ - योशुआ सिनहॅम, ‘हिलरी इज किलरी’ या डेमॉक्रॅटिक पार्टी-अंतर्गत दबाव गटाचे निमंत्रक.
(५). ‘टीव्ही नव्हता का?’ बावळट प्रश्न विचारणार्‍याला ‘ग्वाटानामो बे**’ला डीपोर्ट करण्यात येईल. (** टीप ६ पहा.)
(६). ज्यांना संदर्भ माहीत नसेल, त्यांनी आपल्या धार्मिक/अधार्मिक श्रद्धेय पुस्तकांत सारे ज्ञान आहे या आपल्या दाव्याची सुरळी करून... ...माळ्यावर टाकून द्यावी.

---
संबंधित लेखन:

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’) >>
अशी ही पळवापळवी >>
---


हे वाचले का?

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

गजरा मोहोब्बतवाला

सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) .

माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला आहे.

‘याला किस्सा, अनुभव म्हणावे का?’ असा प्रश्न कुणाला पडेल. पुरे वाचल्यावर ‘ही एक नित्य घडणारी किरकोळ, अदखलपात्र घटना आहे’ असे बहुतेकांचे मत असेल. (आणि हे खरडणे खरं तर त्यांच्याच साठी आहे.) पण हा प्रसंग माझ्या डोक्यात कायमचा घर करून राहिलेला आहे याचे कारण– कदाचित– माझी पिंडात ब्रह्मांड पाहण्याची अगोचर वृत्ती असेल. ते काही असो, तो प्रसंग आणि त्या वेळी माझ्या मेंदूचे फसफसणे इथे मांडून मोकळा होणार आहे.

---

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी घरातून बाहेर पडलो, सोसायटीचे फाटक ओलांडून नि.र. वर आलो. इथून म.र.ला जोडणारे वळण काही फुटांवर आहे. भारतीय मंडळींचा वाईट सिव्हिक-सेन्स आणि इतरांच्या सोयीचा शून्य विचार यांचा सज्जड पुरावा पाहायचा तर ‘जरा विसावू या वळणावर’.

StreetFlowerSeller
https://scroll.in/ येथून साभार.

नि.र.कडून उजवीकडे वळणावरच एक गजरेवाला उभा आहे. त्याच्या समोर काही क्रेट्स आडवे टाकून त्यावर एक फळी टाकलेली आहे. त्यावर ओतलेल्या अनाकलनीय रंगाच्या मोगर्‍याच्या फुलांवर तो पाणी मारतो आहे. त्याच्या शेजारी एका फळवाल्याने त्याच पद्धतीने पथारी लावलेली आहे. त्याच्या पायाशी फळांच्या खोक्यांतून बाहेर पडलेले गुलाबी कागद, स्पंजची जाळी, पुठ्ठे वगैरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या दोघांनी मिळून उजवीकडे वळण्यास– आणि तिकडून नि.र.कडे आत वळण्यास अडथळा निर्माण केला आहे.

नुकताच गजरा किंवा मोगरा घेऊन निघालेली एक माता, कुणी एक आजी भेटल्यामुळे तिच्याशी गप्पा मारत फळवाल्यासमोरच उभी आहे. तिचे तीन-चार वर्षांचे मूल तिचे बोट पकडून असले तरी रस्त्याच्या मधोमध उभे आहे, याची तिला जाणीव नाही. या तिघांनी मिळून नि.र.चा अर्धा रस्ता अडवलेला आहे. या दोन विक्रेत्यांच्या समोरच्या बाजूला, म्हणजे डावीकडील वळणावर आणखी एक फळवाला आपले दुकान मांडून आहे. त्यामुळे हा फळवालाआणि ते पलीकडचे मूल यांच्या मधून जेमतेम एक रिक्षा कशीबधी जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक आहे. त्यातूनच मला बाहेर पडून इच्छित स्थळाकडे प्रयाण करायचे आहे.

मी तिथे पोहोचतो न पोहोचतो, तोच म.र. वरून उजव्या बाजूने एक कार येते नि थेट त्या गजरेवाल्याच्या शेजारी थांबते. आता म.र.कडून आमच्या नि.र. कडे वळण्यासाठी तिकडून येणार्‍यांना राँग साईडने जाऊन या कारच्या पुढून काटकोनात वळण घेण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आणि तसे केलेच तरी... माता, मूल आणि आजींच्या गप्पा चालू आहेत... दोन्ही फळवाल्यांसमोर कुणीतरी उभे आहे... म्हटल्यावर ते वळलेले वाहन उरलेला रस्ता बंद करत अडकून पडणार हे नक्की झाले.

पण ते जाऊ द्या. आपल्या वाहतूक नियमांबाबत बेशिस्त देशात (एक मिनिट– चुकलो हं. आमच्या बेशिस्त गावात– तुमचे गाव गुणी आहे, ओके?) यात काय नवीन असे तुम्ही म्हणणार हे मला ठाऊक आहे. महासत्ता होण्याच्या वाटेवर सिव्हिक-सेन्स– जबाबदार सार्वजनिक वर्तणूक हा मुद्दा आपण धरत नाही. किंबहुना एकुणातच इतिहासाचा चिखल चिवडणार्‍यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये नागरिकशास्त्र तसेही दहा-वीस गुणांपुरते अंग चोरून उभे असते; बहुतेकांनी ऑप्शनला टाकलेले असते.

त्या कारची काच ऐटीत सर्रकन खाली होते. खिडकीतून गॉगल लावलेला एक ऐटबाज चेहरा बाहेर डोकावतो. शेजारी त्याचं खटलं/पत्नी/पार्टनर/जोडीदार बसलेली आहे. ऐटबाज चेहरा गजरेवाल्याला दोन गजरे मागतो. गजरेवाला प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे एकुण वीस रुपये किंमत सांगतो. ऐटबाज चेहरा ‘छे: इतक्या लहानशा गजर्‍याचे दहा रुपये? काहीही काय सांगतोस. दहाला दोन दे.’ म्हणत घासाघीस सुरू करतो. गजरेवालाही ‘खरेदी पण एवढी नाही’ वगैरे सुरू करतो. अठरा रुपये, पंधरा रुपये वगैरे एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे सुरू होते. पण गजरेवाला अजिजीने नकार देत राहतो.

ऐटबाज व्यक्तीच्या कारने म.र. आणि नि.र. दोहोंचीही कोंडी केलेली असल्याने आसपास हॉर्न वाजू लागलेले असतात. ऐटबाज चेहर्‍याशेजारच्या पत्नीच्या चेहर्‍यावर वैतागाचे भाव दिसू लागतात. अखेर ‘दे चल.’ असे म्हणत ऐटबाज चेहरा दोन गजरे घेतो आणि बायकोकडे देतो. खिशातून पाकीट बाहेर काढतो नि गजरेवाल्याच्या हातावर पंधरा रुपये टिकवतो. गजरेवाला ‘अजून पाच रुपये द्या.’ म्हणू लागतो. पण ‘नाही नाही, हे बरोबर आहेत’ असे म्हणत ऐटबाज चेहरा आपल्या अष्टलक्षी गाडीला टाच मारून भरधाव वेगाने निघून जातो.

हतबुद्ध झालेला गजरेवाला गोठलेल्या अवस्थेत काही क्षण उभा असतो. भानावर येतो नि नशिबाला बोल लावत पैसे खिशात टाकून मोकळा होतो. दरम्यान म.र. नि नि.र. दोन्ही रस्ते मोकळे झाल्याने हुश्श: करत मागचे सारे मोकाट सुटतात. गजरेवाला पुढच्या गाडीवाल्याची वाट पाहात ताटकळत उभा राहतो.

---

ऐटबाज चेहर्‍यावरचा दीड-एक हजार रुपयांचा गॉगल, जोडीदाराच्या अंगावर असलेली पाच ते सात हजारांची साडी आणि पाच ते आठ लाखांची गाडी खरेदी करताना याला पैसे कमी पडले नसावेत. गजरेवाल्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला गाडी लावून विकले जाणारे शंभर-दीडशे रुपयांचे गॉगल त्याला ‘बिलो डिग्निटी’ वाटत असावेत. चांगल्या दर्जाचे, पण अन-ब्रँडेड कपडे त्याला चालत नसावेत. पैसे देताना– देणार्‍या हातात घातलेली अंगठी पितळेची आहे की सोन्याची हे त्याला स्वत:ला खात्रीपूर्वक सांगता आले नसते. त्यात घातलेला खडा वा हिरा खरा आहे की खोटा याचीही त्याला गंधवार्ता नसते. तरीही सुवर्णकाराने सांगितलेली (आणि वर डिस्काउंटची भाषा करून थातुरमातुर कमी केलेली) किंमत त्याने निमूट मोजली असेल. पण गजरेवाल्याचे पाच रुपये मारण्यासाठी भर चौकात चालत्या गाडीत बसून त्याने पेट्रोल जाळले होते, म.र. नि नि.र. दोहोंकडे अडकलेल्या वाहनांनाही जाळण्यास भाग पाडले होते. यातून पाच रुपयांहून अधिक रकमेची नासाडी त्याने केली होती. पण याची त्याला समजच नव्हती.

यावरून मला ‘डिस्काउंट असेल तरच पुस्तक खरेदी करणार, तीनशेहून अधिक रकमेचे पुस्तक खरेदी करणार नाही,’ म्हणणारे पण बारमध्ये बसल्यावर पुर्‍या बाटलीच्या किंमतीमध्ये एक पेग विकत घेताना कोणतीही घासाघीस न करणारे, वर वेटरला उदारहस्ते टिप देणारे मित्र आठवतात. ऋण काढून सण साजरे केल्यासारखे कुवत नसताना आयफोन, आयपॅड मिरवणारे, पण आरोग्य-विमा (health-insurance) मात्र ‘महाग आहे’ म्हणून न घेणारे मित्र आठवतात. इतरांकडे आहे म्हणून चार-चाकी गाडी घेऊन पेट्रोल– चुकलो, डीजल परवडत नाही म्हणून दारी शोभेची वस्तू म्हणून उभी करुन ठेवणारे, पण त्याचवेळी पैसे वाचवण्यासाठी अर्धा रविवार– कुटुंबाला न देता, स्कूटर हाणत मंडई वा मार्केटयार्डमध्ये जाऊन आठवड्याभराची स्वस्त(?) भाजी घेऊन येण्यावर खर्च करणारे आठवतात...

आपल्या जगण्याचे प्राधान्यक्रम गंडले आहेत असे यांना वाटत नसावे का? आरोग्य-विम्यापेक्षा आयफोन हवासा वाटत असेल, तर आपल्या गरजांची व्याख्या दुसरेच कुणी करते आहे याचे भान आपल्याला कधी येईल? मुळात ज्यांच्या आठवड्याभराच्या भाजीचे एकुण बिल दोनशेच्या वर जात नाही, त्यांचे किती पैसे घाऊक खरेदी केल्याने वाचणार आहेत?

त्यावर एक पळवाट असते की तिकडे चांगली भाजी मिळते म्हणे. सोने गुंतवणूक म्हणून फायदेशीर नाही हे दाखवून दिल्यावर, ‘पण ते ल्यायलाही मिळते’ ही पळवाट जशी काढली जाते तसेच हे. ते खरे असले तरी बरोबर घट नि घडणावळ नावाचे तोट्याचे हिस्से येतात, ते मात्र मोजायचे नसतात... जसे इथे वेळ नि ऊर्जा जमेस धरायची नसते. खरा धार्मिक-खोटा धार्मिक, आर्थिक मध्यमवर्गीय वि. मानसिकतेने मध्यमवर्गीय वगैरे पळवाटा याच जातीच्या. गैरसोयीच्या, तोट्याच्या बाजूकडे दुर्लक्ष करत आपले पूर्वग्रह जपणे हा ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून, सश्रद्ध म्हणून, नास्तिक म्हणून, पुरोगामी म्हणून, धर्मराष्ट्रवादी म्हणून आपल्या प्रत्येकाची सवय असतेच. तिथे पुन्हा ‘आपला गट सोडून ती इतरांमध्येच आहे’ हा एक जास्तीचा नि सामायिक पूर्वग्रहदेखील असतो.

कौतुकाने पत्नीसाठी गजरा घेताना तो मिळाल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अधिक सुखदायक, की पाच रुपये वाचवण्याच्या खटाटोपात तिच्या चेहर्‍यावर उमटलेला वैताग? चलनात मोजलेली किंमत हे सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे मोजमाप कधीपासून झाले याचा विचार कधी करावासा वाटतो का? विकत घेतलेला ‘गजरा मोहोब्बतवाला आहे, घासाघीसीचे पंधरा रुपयेवाला नाही’ याची जाणीव बायकोला झाली तर ती अधिक आनंदी होईल ना? त्यातून नाते अधिक दृढ होईल की आठ लाखाच्या कारमध्ये बसून, दहा मिनिटे खर्च करुन, वट्ट पाच रुपये वाचवल्यानंतर?

असे प्रसंग पाहिले, की बार्गेनिंग करणार्‍या जमातीबद्दलची माझ्या मनातील तिडिक अधिक तीव्र होत जाते. आपल्या महान देशांतील हे खुजे लोक, ‘घासाघीस केली नाही तर आपल्याला फसवतील, किंवा इतरांना स्वस्त मिळेल नि आपण जास्त पैसे देऊन येऊ’ या न्यूनगंडाने पछाडलेले असतात. दुसरीकडे घासाघीस या प्रकाराने जगण्यातील अनेक वस्तूंबाबत गुणवत्तेची ऐशीतैशी होते हे यांच्या ध्यानात येत नाही. सतत स्वस्त ते उचलायचे या एकांगी भूमिकेने गुणवत्ता असलेले पण अधिक किंमतीचे उत्पादन स्पर्धेबाहेर फेकले जाते. वर हे जीव ‘दोन्हींची गुणवत्ता सारखीच आहे’ असे अट्टाहासाने प्रतिपादन करत राहतात, कारण ‘आपण गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही’ हे ते स्वत:ला नि इतरांना पटवू पाहात असतात. (दुसरीकडे ‘महाग तेच गुणवत्ता असलेले’वाली जमात असते, पण हा लेख त्यांच्यासाठी नाही.)

इतिहास हा देशाच्या प्रगतीच्या वाटेवरली क्विकसँड किंवा दलदल आहे, तसेच बार्गेनिंग करणे ही ग्राहकाच्या मनोभूमिकेतील. ही विषवल्ली उपटून टाकली तर आपली ऊर्जा, वेळ तर वाचतोच, पण खरेदीतला, उपभोगातला आनंदही अधिक निष्कलंक, निर्भेळ होत जातो. बघा एकदा प्रयत्न करून.

-oOo-


हे वाचले का?