राजकारणी तर काय 'गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास' या मानसिकतेचेच असतात. ते त्यांच्या मार्गाने व्यावहारिक मार्ग काढतच असतात. त्यांच्या त्या स्वार्थलोलुप, भ्रष्ट वगैरे वर्तणुकीतूनही सामान्य जनतेपर्यंत काही पोचत असते. पाच मैल कॉंक्रीटच्या रस्त्याला लागेल इतका खर्च करुन एक मैल रस्ता बनवला जातो हे खरे, पण तो एक मैल का होईना जनतेच्या कामी येत असतो. तेव्हा चार मैलाचे पैसे खाल्ले हे सिद्ध करणे जितके आवश्यक तितकेच त्या एक मैलाची उपयुक्तता मान्य करणे. ती मान्य करुन पुढच्या वेळी एकाचे दोन, दोनाचे तीन, तिनाचे चार करण्यासाठी सक्रीय होता आले पाहिजे.
त्यांच्या वाटचालीतील स्वार्थाचा, व्यावहारिकतेचा भाग कमी करुन तत्त्वनिष्ठेचा वाढवायचा असेल तर तत्त्वनिष्ठ म्हणवणार्यांनी ठामपणे एक बाजू निवडून वर त्या बाजूच्या मंडळींच्या गैरकृत्यांचे समर्थन न करता ’मी तुझ्या बाजूचा आहे, पण या मुद्द्यावर तुला धारेवर धरणार आहे.’ असे ठामपणे सांगत राहायला हवे. ते करण्यासाठी व्यवस्थेत शिरुन व्यवस्थेच्या मर्यादा जाणून घेतल्या पाहिजेत, त्यावर तोड काढून दाखवली पाहिजे. केवळ ’पैसे खाऊ नका, भ्रष्टाचार करु नका’ असे सांगून उपयोग नाही. बाहेर बसून गमजा करणारे सरकारात आल्यावर मागच्यांच्या मार्गाने चालू लागले यावर टीका करा, पण त्याची कारणमीमांसाही करा, व्यवस्थेला बदलून टाकण्याची गर्जना करणारा व्यवस्थेत जाताच त्यातली बंधने समजून आपली तलवार म्यान करतो हे समजायला हवे.
वांझोट्या भाषणांनी कामे होत नाहीत हे राजकारण्यांना जसे लागू आहे तसेच विचारवंतानाही. सगळेच मूर्ख आहेत, आम्ही शाहाणे आहोत. म्हणून आम्ही त्यांच्यात सामील होणार नाही म्हणणारे मुळात त्याच समाजात असल्याने त्यांच्यात सामील असतातच, फक्त असल्या विश्वामित्री पवित्र्याने निर्णयप्रक्रियेतले आपले कणभर स्थानही मूर्खांना बहाल करुन टाकतात.
’सगळे सारखेच’ म्हणत आपल्या नैतिकतेच्या नि तत्त्वज्ञानाच्या दुलईत गाई गाई करणारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने कुचकामी असतात. व्याख्याने, पुस्तके नि परिषदा यातून मूठभरच बदलतात, दरम्यान त्यांच्या कैकपट अज्ञ जनता जन्म घेत असते. ही लढाई कायमच विषम असते. तेव्हा अधिकाराला बाणेदारपणे नाकारणारे प्रत्यक्षात पळपुटे असतात.
कुणी आधी प्रश्न मागवून आपलेच भाट लोक समोर बसवून प्रश्नोत्तराचे स्क्रिप्टेड नाटक पार पाडते, तर कुणी आपल्यासारख्याच मंडळींसमोर व्याख्याने ठोकून काहीतरी बदल घडवत आहोत या भ्रमात राहतात, इतकाच काय तो फरक राहतो.
-oOo-