शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ८: पाऊस

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास.)

अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन << मागील भाग

---

सध्या पाऊस देशातून माघार घेण्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जीवनदायी पाण्याचा मुख्य स्रोत हा मोसमी पाऊसच असतो. अगदी गेल्या शतकाअखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून. त्यामुळे पाण्याबरोबरच अन्नाचा पुरवठाही त्याच्यावरच अवलंबून.

या टप्प्यावर ‘या वर्षी पावसाने काय दिले?’ याचा आढावा घेतला जात असतो. पाऊस पुरेसा पडला की अधिक पडला, ओला दुष्काळ की कोरडा दुष्काळ, याबाबतचे आडाखे घेण्यास आता सुरुवात होईल. कारण पाऊस हा ‘पुरेसा’ कधीच होत नाही. कधी– वा कुठे, तो जेमतेम तहान भागवण्याइतक्या पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहायला लावतो, तर कधी शेतातील उभे हिरवे वैभव एका झपाट्यासारशी नाहीसे करून शेतकर्‍याच्या तोंडचा घास हिरावून घेतो. शृंगार काव्यामध्ये पावसाभोवती कितीही रम्य वर्णने विणली गेली असली, तरी वास्तवात पाऊस हा या ना त्या प्रकारे माणसाच्या जीवनावर आघातही करतो. याचा अनुभव अलीकडच्या काही दशकांत अधिक प्रकर्षाने येऊ लागलेला आहे.

पण हा झाला एकुण समाजाच्या वा भूगोलाच्या संदर्भातील सरासरी अथवा व्यापक विचार. विशिष्ट व्यक्तींना पाऊस कसा दिसतो, जाणवतो, त्याचे पैलू कसे असतात याचे चित्र आणखी वेगळे दिसू शकते. वर म्हटले तसे वयात आलेल्या तरुण-तरुणींच्या मनात त्याच्या आगमनाने कुठल्या भावना उमटतात; शाळकरी मुलांकडून पावसाचे स्वागत कसे केले जाते, ज्यांचे रोजगार हे आकाशाच्या उघड्या छताखाली चालणार्‍या व्यवसाय/रोजगारावर अवलंबून असते त्यांची त्याच्याबद्दल काय भावना असते (लिंक झिपर्‍या) आणि या सार्‍यांपलिकडचे सारे आयुष्यच उघड्यावरचे असणार्‍यांसाठी हा पाऊस काय घेऊन येतो... या सार्‍या प्रश्नांची उत्तरे नेहमीच एकमेकांना छेद देऊन जात असतात.

नुकत्याच चालत्या-बोलत्या झालेल्या, स्वत:हून घराबाहेर पाऊल टाकू लागलेल्या बिम्मच्या दृष्टीने पाऊस कसा असतो? जंगलजीवी प्राण्यांचे जग सर्वस्वी निसर्गाधीन असत, निसर्गातील घडामोडींचे त्यांच्याशी अतूट नाते असते. पण माणूस नागर झाल्यानंतर त्याचा निसर्गाशी असलेला संबंध संपला. बिम्मचे आयुष्य आई-वडिलांच्या सोबत नि चार भिंतींच्या आत सुरू होत असते. हे जग बव्हंशी स्थिर असते. आई-वडील असोत की घरातील इतर व्यक्ती, त्यांचे चेहरे दिवसचे दिवस तसेच असतात. त्याच्या पाळण्याची जागा, घरातील विविध वस्तू या आपापल्या जागा न सोडता कायम एका जागी वस्तीला असतात.

ते मूल जेव्हा पहिले पाऊल घराबाहेर टाकते, तेव्हा परिसराची ओळख करुन घेऊ लागते. आता त्याला मोठी माणसे झाडावर उमललेले फूल, दारी आलेले एखादे आगंतुक कुत्र्याचे, मांजराचे वा शेळीचे पिलू काही अशा ‘दोन हात नि दोन पाय’ नसलेल्या गोष्टींची ओळख करुन देऊ लागतात. हे जग तितके स्थिर नसते. काल दारी असलेले मांजर आज दिसत नाही. कदाचित तिथे एखादे वासरू येऊन बसलेले असते. झाडावर काल पाहिलेले देखणे वा सुगंधी फूल आज तिथून नाहीसे झालेले असते. भवतालामध्ये होणार्‍या बदलांची ओळख बिम्मला होऊ लागलेली असते.

विशिष्ट मोसमात येणारा पाऊस ही बिम्मला होणारी निसर्गाची आणि ‘तो स्थिर नसतो, त्यात सतत स्थित्यंतरे होत असतात’ याची पहिली भक्कम ओळख असते. जगातील काही गोष्टी आपल्या आई-वडिलांच्या नियंत्रणाबाहेर असतात, निसर्गात होणारे बदल आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवू शकतात, याची ही पहिली चुणूक असते. पावसाने ओढ दिल्याने पाण्याची होणारी चणचण किंवा अतिवृष्टीमुळे शेतीचे नि वाहतुकीचे नुकसान होऊन पर्यायाने झालेली तुटवड्याची परिस्थिती यावर आई-वडील बोलतात, बिम्मला ते समजू लागते तेव्हा त्याला पावसाचे– आणि पर्यायाने निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान समजू लागते.

निसर्ग-मानव संबंधांचा विचार करायचा तर माणसाने निसर्गातील बहुतेक घटकांना ‘आपलेसे’ केले आहे नि त्यांचा साधन म्हणून वापर केला आहे. अगदी सर्वदाहक अशा अग्निलाही ‘माणसाळवून’ अनेक प्रकारे त्याचा उपयोग केला आहे, करतो आहे. अपवाद आहे तो पावसाचा आणि चक्रवातादि काही घटकांचा. आदिमानवाने आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवणारे हे घटक देवत्व देऊन, त्या अनुषंगाने काही देवाणघेवाण करुन अंकित करण्याचा प्रयत्न केला होता. हा एक प्रकारे विनिमयाचा करार होता. परंतु यथावकाश माणसाने अग्निवर नियंत्रण मिळवले, नि जगभरातून अग्निदेवाचे महत्त्व लयाला गेले. यथावकाश नागर झालेल्या माणसाने सार्‍याच प्राकृतिक देवांशी नाते तोडले आणि स्व-रूपातील देवतांची पिढी जन्माला घातली.

TheMandanRainDance
अमेरिकेतील मँडन इंडियन जमातीचा टोळीप्रमुख पर्जन्याला आवाहन करतो आहे.
चित्रकार: जॉर्ज कॅटलिन.

अग्निवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपण पावसावरही नियंत्रण मिळवू शकतो असा भ्रम त्याला झाला असावा. त्यामुळे बहुतेक प्राचीन समाजांतून पर्जन्यनृत्यासारख्या विधींची निर्मिती झाली. जे प्रामुख्याने पर्जन्याला आमंत्रित करत असे, आवाहन करत असे. जी.एं.च्याच ‘कळसूत्र’मध्ये लाल गरुडाच्या टोळीने पावसाला आवाहन करण्यासाठी केलेल्या नृत्याचे मनोवेधक वर्णन आहे(१).

परंतु हे नियंत्रण श्रद्धेच्या पातळीवरच राहिले. आपली कृती नि पावसाचे आगमन अथवा माघार यांमध्ये कार्य-कारणभाव प्रस्थापित करण्यास माणसाला अपयश आले. प्राकृतिक दैवतांकडून माणूस नागर वा अध्याहृत मानवी देवत्वाकडे सरकला आणि पर्जन्यनृत्यांची जागा यातुविधिंनी घेतली. या विधींचे अवशेष म्हणा, की अवतार म्हणा, हे आजच्या तथाकथित प्रगत समाजातही कुठे-कुठे मूळ धरून राहिले आहेत.

आजच्या एकविसाव्या शतकातील मानवालाही पावसाला लगाम घालणे शक्य झालेले नाही. तो जास्तीत जास्त त्याच्या आगमनाचा नि व्याप्तीचा वेध घेऊ शकतो; त्याने वर्षिलेल्या पाण्याचे नियोजन करू शकतो. तो कुठे नि किती पडेल यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. हवे तेव्हा हुकमी पाऊस पाडू शकत नाही, की ‘आता पुरेसा झाला’ म्हणून नळ बंद करावा तसा थांबवूही शकत नाही. म्हणजे अग्निप्रमाणे पावसाचा साधन म्हणून वापर करण्यात आजवर अपयशच आलेले आहे.

पण समजा— समजा माणसाने पावसालाही अंकित केले तर... ही कल्पना तशी आश्वासक आहे आणि दाहकही! तिचा विचार करण्यास भाग पाडले ते बिम्मच्या एका कृतीमुळे. यापूर्वी बिम्मने पत्र आणि चित्र यांचा वापर हवे ते पदरी पाडून घेण्यासाठी साधन म्हणून केला आहे. या दोन्ही गोष्टी त्याची स्वत:ची निर्मिती आहेत. पण पुढे चक्रनेमिक्रमाने येणार्‍या पावसाचा वापरही त्याने अशाच प्रकारे केलेला आहे. त्याद्वारे त्याने बब्बीच्या मैत्रिणींवर हुकुमत गाजवली आहे.

आयुष्याच्या त्या इतक्या परावलंबी टप्प्यावरदेखील बिम्मसारख्या मुलावर संघर्षाचे प्रसंग येतात. इतक्या सुरक्षित जगातही एखादा लहानसा कोपरा लढून, पाय रोवून उभा राहण्याचा असतो. त्याचा खाऊ हिरावून घेणार्‍या चंद्रीशी नि तिच्या गँगशी आपला खाऊ वाचवण्यासाठी बिम्मला संघर्ष करावाच लागतो. त्यासाठी बिम्मकडे कोणतेही प्रत्यक्ष साधन उपलब्ध नसते. त्यासाठी मग तो त्याच्या हुकुमासरशी धावून येणार्‍या पावसाचे काल्पनिक हत्यार वापरतो.

IBroughtThatRain
I Brought That Rain. (Image Credit: Getty Images)

एकीकडे बिम्मची आई नि इतर बायका पावसाने ओढ दिल्याबद्दल बोटे मोडत असतात. त्यांना हवा तेव्हा पाऊस आलेला नाही. पण बिम्मला हवा तेव्हा मात्र तो येतो. ‘पाऊस पाडून तुमचा खेळ बंद पाडतो’ या त्याने दिलेल्या पोकळ धमकीनंतर योगायोगाने तो येतो आणि त्यातून हवा तेव्हा पाऊस पाडण्याच्या बिम्मच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होते. वयाने आणि शारीरबळाने वरचढ असलेल्या त्या मुलींवर हुकूमत गाजवण्यासाठी त्याला एक हत्यार मिळून जाते.

इतक्या लहान वयात बिम्मने प्राचीन समाजातील पर्जन्यनृत्यांच्या वा प्राकृतिक घटकांवर नियंत्रण मिळवण्याच्या गोष्टी ऐकल्या असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरीदेखील त्याचा विचार नेमक्या त्याच मार्गाने जातो आहे. जे अनायासे घडते ते हेतुत: घडवू इच्छिणार्‍या मानवाच्या संस्कृती-प्रवाहाचा तो ही एक भाग होतो आहे.

प्रथम त्या मुलींनी आपल्याला खेळायला घेतले नाही म्हणून बिम्मने पाऊस पाडण्याची धमकी दिली होती. त्यामध्ये कोणताही कार्य-कारणभाव त्याला अपेक्षितही नव्हता. पाऊस पडला की मुलींना खेळ बंद करावा लागतो एवढे निरीक्षणच काय ते त्या धमकीमागे होते. त्याच्यापुरती ती एक पोकळ धमकी होती. परंतु प्रत्यक्षात पाऊस पडल्याने त्याच्या त्या शक्तीबाबत त्या मुलींचा संशय फिटला आहे. आता त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती बिम्मला खुणावते आहे. ‘आपण बोलावल्याने पाऊस आलेला नाही’ हे कदाचित बिम्मच्या वयाच्या मुलालाही ध्यानात आले असेल. पण जे घडले त्याच्यामुळे ‘त्याची धमकी सत्यात आणता येऊ शकते’ असा संभ्रम त्या मुलींच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि त्या संभ्रमाचा फायदा आता बिम्म घेणार असतो.

अशा काल्पनिक हत्याराचे यश प्रामुख्याने त्याचे अस्तित्व, त्याची भीती समोरच्याचा मनात निर्माण करण्यावर अवलंबून असते. त्या काल्पनिकतेची वास्तव परिणामांशी सांगड घालून तिच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करता येतो. योगायोगाने पडलेल्या पावसाने बिम्मला त्यात यश मिळून जाते. इथे मला शाळेत असताना ‘आपली पण गँग आहे, तुला बघून घेईन.’ अशी बतावणी(bluff) वा पोकळ धमकी देऊन दांडगट पोरांपासून आपला बचाव करू पाहणारी दुबळी मुले आठवतात.

बिम्मच्या ‘सामर्थ्या’चा पुरावा त्या पोरींना आता समोर दिसला आहे. त्याचा खाऊ बळकावणार्‍या, त्याला खेळायला न घेणार्‍या मुलींवर बाजी उलटली आहे. आता बिम्मच पाऊस पाडून त्यांचा खेळ विसकटण्याची धमकी देतो आहे. पण केवळ खेळायला घेण्यापलिकडे जाऊन त्याला त्यांच्यावर हलकासा सूड उगवायचा आहे. आजवर त्याच्या खिशातील खाऊ लुटणार्‍या त्या ढालगज पोरींना त्याला धडा शिकवायचा आहे. त्यामुळे तो आता त्यांना त्यांच्याकडील सारा खाऊ आपल्याला मिळावा अशी मागणी करतो नि प्रत्येकीच्या खाऊचा अगदी शेवटचा कण तो वसूल करतो.

पण या सार्‍यात विजूसारखी एक मुलगी अशी निघतेच, जी बिम्मच्या या धमकीला भीक घालत नाही. मग तिच्याऐवजी भेदरलेली यास्मिन त्याला तिच्या वाटचा खाऊ द्यायचे कबूल करते नि बिम्ममहाराजांचा ‘कोप’ शांत करते. शिवाय दांडगट चंद्रीही विजूला पकडून तिची सारी करवंदे बिम्मला द्यायला लावते.

GiveYourFoodToHim
Give your food to him.(Image Credit: Getty Images)

विजूला काल्पनिक बळाची भीती नाही, पण चंद्रीच्या शारीरबळाची आहे. कदाचित तिने ते अनुभवले आहे. याउलट शारीरबळात तिच्यापेक्षा उजवी असलेली चंद्री मनोबलात तिच्यापेक्षा दुबळी आहे. बिम्मसारख्या धिटुकल्या मुलाच्या पाऊस पाडण्याच्या धमकीला केवळ एकाच अनुभवावरून ती बळी पडली आहे.

एकाच निरीक्षणातून– अथवा त्याच्या आभासातून– कार्य-कारणभाव सिद्ध झाल्याचे मानणारी, वारंवारतेच्या आवश्यकतेला नाकारणारी उतावीळ, एकांगी वा मनोदुर्बल माणसे आपल्या आसपास अनेक दिसतील. त्या अर्थी चंद्री ही एका मोठ्या समाजगटाचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या या मानसिक दुर्बलतेमुळे विजूला नमवण्याचे बिम्मचे काम झाले आहे. प्रत्यक्ष बळापेक्षा त्यावरील अप्रत्यक्ष नियंत्रणही अनेकदा आपले काम करून देऊ शकते. (जुन्या तमाशापटांतून धिप्पाड शरीराचे बेरड अथवा रामोशी अंकित ठेवून त्यांच्या बळावर सत्ता गाजवणारे पाटील आठवा.) त्यातून त्या दोघींपेक्षा सर्वच दृष्टीने दुबळा बिम्मच अखेर वरचढ ठरुन जातो. हा धडा तितकी विचाराची झेप अजून विकसित न झालेल्या बिम्मला जरी कळला नाही, तरी तो त्याच्या आईच्या वयातल्या एखाद्या वाचकाला उमगायला हवा.

‘देव’ नावाच्या कुण्या काल्पनिक सत्तेची ठेकेदारी करत सर्वसामान्यांवर वर्चस्व गाजवणारा सर्वधर्मीय पुरोहितवर्ग याहून वेगळे काय करत असतो? पाच-पंचवीस भाकितांपैकी एखादे अनमानधपक्याने खरे ठरले, की त्याच्या आधारे त्यांची दैवी ठेकेदारी सामान्यांच्या मनात रुजून जाते. तरीही शिल्लक राहिलेल्या विवेकी विजूसारख्यांचा नि:पात करण्याचे काम मानसिक गुलाम झालेल्या चंद्रीसारख्या बाहुबली पार पाडत असतात.

बिम्मच्या निरागस पातळीवरही पावसाचे– काल्पनिक का होईना, एक हत्यार हाती आल्याने उफाळून आलेल्या वर्चस्ववादी प्रेरणेला तो उपभोगतो आहे. इथे जी.एं.नीच अनुवाद केलेल्या विल्यम गोल्डिंगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ ची आठवण होते. कोणत्याही नियंत्रक व्यवस्थेअभावी माणसाच्या पिलांमध्ये ही वर्चस्ववादी प्रेरणा किती हिंस्र पातळीवर उतरते याचे स्तिमित करणारे दर्शन त्यात गोल्डिंगने घडवले आहे. संस्कार-शिक्षणाने माणसाच्या जिज्ञासेची निरभ्रता काळवंडून जात असली तरी त्यातूनच मनुष्यप्राण्याचा माणूसही होत जातो.

‘पावसालाही अंकित केले तर... ही कल्पना तशी आश्वासक आहे आणि दाहकही’ असे वर का म्हटले याची एक अत्यंत लहानशी चुणूक बिम्मने दाखवली आहे. कारण पाऊस नियंत्रित करता आला तर तो अग्निप्रमाणेच हवा तिथे, हवा तितकाच वर्षेल अशी तजवीज करता येईल, तसेच त्या साधनाला हत्याराचे रूप देऊन इतर कुणाला पीडा देण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकेल.

माणसाच्या हिंसेला भौतिक शस्त्रे पुरेशी न वाटून त्याने रासायनिक, जैविक माहितीला, ज्ञानाला, निर्मितीला हत्यारांचे रूप देऊन आपल्यातील मि. हाईडला(२) आणखी बळ पुरवले आहे. कल्पना करा एखाद्या राष्ट्राने मोसमी पावसाच्या ढगांवर नियंत्रण मिळवून शेजारी, शत्रूराष्ट्रामध्ये पाऊसच पडणार नाही याची तजवीज केली तर... माणसातल्या माणूसपणाचा तो अंत तर ठरेलच, पण मनुष्यप्राण्याने मानव होताना अन्य प्राणिमात्रांहून प्रगती नव्हे तर अधोगतीचा मार्ग निवडला आहे यावरही शिक्कामोर्तब होईल.

‘पाऊस आला की मुलींचा खेळ थांबतो, त्यांना दु:ख होते.’ हे पाहून त्यांना दु:ख देण्यासाठी पाऊस पाडला पाहिजे याची जाणीव बिम्मच्या मनात उमटणे हा त्याच्यातील मि. हाईडचा जन्म म्हटला पाहिजे. हेतुत: कुणाला दु:ख देण्याचा, सूडाची भावना त्याच्या मनात उदयाला आली, ती जीवनदायी पावसाचे बोट धरून. माणसाच्या आयुष्यातील प्रगतीचे प्रत्येक पाऊल हे पुढे नेणारे असते तसेच मागेही याचे हे उत्तर निदर्शक म्हणावे लागेल.

पण बिम्म नि पावसाची गोष्ट इथे संपत नाही...

पाऊस आल्याने घरात येऊन, मुलींचा सारा खाऊ गट्ट करुन ताजेतवाने झालेल्या बिम्मला शाळेच्या आवारात आपल्या गाठोड्याशेजारी बसून रडणार्‍या पमी पठाणची आठवण होते. ‘अशा पावसात ती अडकली असेल की आधीच घरी गेली असेल?’ असा प्रश्न त्याला पडतो. तो प्रश्न ऐकून त्याची आईदेखील अचानक गंभीर होऊन जाते. तिने गंभीर का व्हावे हे पुन्हा थोडे तर्काने जाणून घ्यावे लागते.

पमी ही पहिल्याच इयत्तेत अनेकदा नापास होऊन शाळा सुटलेली, इतर मुलींप्रमाणे बिम्मचा खाऊ हिसकावून न घेणारी. बाकीच्या मुली शाळेत गेल्यावर करण्यासारखे काहीच नसल्याने शाळेच्या आवारात स्वतःशीच बोलत बसणारी. बब्बी तिच्याशी खेळे, पण तिला घरी बोलावत नसे. आसपासच्या आयाबाया तिच्याकडून कामे करून घेत, क्वचित तिची मस्करीही करत. ती मात्र ती मस्करी मनावर न घेता स्वत:वरच हसे नि ती गंमत इतरांना सांगून त्यांनाही हसवी.

‘तिचे कपडे तिच्या मापाचे कधीच नसत’ या एकाच वाक्यात जी.एं.नी तिची सामाजिक पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. जरी स्पष्टपणे लिहिले गेलेले नसले, तरी पमी ही बेघर/अनाथ किंवा अतीव दरिद्री घरातील असावी असा तर्क सहज करता येतो. तसे असेल तर इतरांच्या दृष्टीने अमृतधारा होऊन वर्षणारा तो धुवांधार पाऊस तिच्या जगण्यातील खडतर मोसमाची सुरुवात करणारा ठरतो. कदाचित हे जाणवल्यामुळेच बिम्मची आई गंभीर झाली असावी. आपल्या हाती केवळ तर्कच उरतो.

WhenWillTheRainStop
हा पाऊस कधी थांबेल?
(श्रीनगरच्या एका रस्त्यावरील छायाचित्र).

‘पावसाने कुणाच्या आयुष्यातील समस्यांचा निरास होतो, तर कुणासाठी त्यांची सुरुवात होत असते’ हे एक वास्तव, पमी पठाणमुळे बिम्मच्या विचारात नसले तरी जाणिवेत शिरत असते. पावसाला हत्यार म्हणून वापर करणार्‍या, त्याच्या साहाय्याने कुणावर सूड घेण्याची कल्पना सुचलेल्या बिम्मच्या मनात त्या हिसेंवर करुणेचे शिंपण करणारे ते दोन थेंबही शिंपडले जातात. तो पाऊस महत्त्वाचा तसाच हा ही.


(क्रमश:) पुढील भाग >> Foot that fits     

-oOo-

(१). केवळ आवाहनासाठीच नव्हे काही वेळा वर्षा-स्वागताची नृत्येही केली जात असावीत. प्रसिद्ध अभ्यासक जेन गुडाल हिने चिम्पान्झी माकडांच्या अभ्यासादरम्यान त्यांनी पावसाच्या स्वागतासाठी केलेल्या वर्षा-नृत्याची नोंद केलेली आहे. पुढे मानवाने शेतीप्रधान जीवन स्वीकारले आणि ही वर्षा-हर्ष नृत्ये सुगीच्या मोसमापर्यंत पुढे सरकली असावीत.

(२) रॉबर्ट लुई स्टीव्हनसन या लेखकाच्या ’द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाइड’ या लघुकादंबरीतील एक पात्र. एखाद्या सप्रवृत्त व्यक्तिच्या मनात दडून असलेल्या दुष्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून याच्याकडे पाहिले जाते.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा