रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

प्रस्थान ऊर्फ Exit : दोन भाषणांचे नाटक

मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये उजव्या विचारांचे बोल्सेनारो यांचा पराभव होऊन डाव्या विचारांचे नेते लुला डि’सिल्वा यांची भावी अध्यक्ष म्हणून निवड झाली. याउलट गेली दोन दशके अस्थिर राजकीय परिस्थिती अनुभवणार्‍या इस्रायलमध्ये पाच वर्षांत चौथ्यांदा निवडणूक होऊन उजव्या विचारांचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू निसटत्या बहुमताने निवडून येत पुन्हा एकवार पंतप्रधान होऊ घातले आहेत.

लोकशाही राष्ट्रांमध्ये सत्तेचा लंबक असा इकडून तिकडे फिरणे ही नित्याची बाब आहे. समाजातील मूठभर व्यक्ती विशिष्ट वैचारिक भूमिकेशी बांधील असतात. अमका नेता वा पक्ष हा अमुक विचारसरणीचा आहे म्हणून त्याला निवडून देणारे बहुसंख्य लोक त्या वैचारिक भूमिकेबद्दल अज्ञानीच असताना दिसतात. याशिवाय मोठ्या संख्येने नागरिक अथवा मतदार हे प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करत असतात. त्यांनी केलेल्या निवडीमागे वैचारिक भूमिकेपेक्षा ’सद्यस्थितीत राजकीय सत्ता राबवण्यास सक्षम कोण?’ याचे त्यांनी शोधलेले उत्तरच तेवढे असते. राजकीय चित्र बदलण्यास प्रामुख्याने ही मंडळी कारणीभूत असतात.

परंतु राजकीय सत्तेचा विचार बाजूला ठेवून केवळ वैचारिक भूमिकेशी बांधील असणार्‍यांकडे पाहिले, तर बदलत्या राजकीय परिस्थितीतही आपली वैचारिक बांधिलकी टिकवून धरण्यामागे त्या-त्या वैचारिक भूमिकेचा अथवा विचारप्रवाहाचा अभ्यास कारणीभूत असतो, की एक चूष म्हणून त्यांनी तो झेंडा खांद्यावर घेतलेला असतो?

समाजातील असंख्य समस्यांना भांडवलदार वा भांडवलशाही जबाबदार आहे म्हणणार कम्युनिस्ट चोख सुखवस्तू आयुष्य जगतो, तेव्हा तो इतरांना केलेला वर्गविहीन (de-class) होण्याचा उपदेश सोयीस्कररित्या विसरून जात असतो. मार्क्सने एका संदर्भात दोषी ठरवलेल्या मध्यमवर्गीयांवर सर्व सामाजिक समस्यांचे खापर फोडणारा स्वयंघोषित पुरोगामी स्वत: चोख मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतो. आणि हे करत असताना ’त्याची व्याख्या आर्थिक नव्हे तर प्रवृत्तीप्रधान आहे’ अशी - धार्मिकाची ’खरा धार्मिक नि खोटा धार्मिक” वर्गवारी असते तशी - पळवाट काढून ठेवतो.

अखंड हिंदुस्तानचे बिल्ले मिरवणार्‍या हिंदुत्ववाद्याची त्याच्या व्याख्येतील सारा भूभाग भारतात सामील केला, तर ते हिंदूराष्ट्र तर सोडाच हिंदूबहुलही राहात नाही, हे समजून घेण्याची तयारी नसते. किंवा देवबाप्पाच्या कृपेने काहीतरी होऊन मुस्लिम आपोआप नाहीसे होतील, असा भाबडा समज त्याच्या नेणिवेत असतो. निश्चित वैचारिक भूमिका स्वीकारल्याचे जाहीर करणारे बहुतेक वेळा केवळ उक्ती-कृतीच नव्हे तर वैचारिक पातळीवरच्याही अंतर्विरोधाचा सामना करतात. स्वत:च्या आयुष्यातील अंतर्विरोधाकडे न पाहता दांभिकपणे डोळे मिटून घेतात आणि विरोधकाच्या कुसळाचे मुसळ करुन त्याचा गवगवा करत बसतात.

हे वैचारिक मतभेद एका हाताच्या अंतरावरुन बघताना सुखवस्तूपणे पाहता येतात. एकमेकांना दांभिक म्हणून उडवून टाकता येते. परंतु एकाच घरात जेव्हा दोन परस्परविरोधी भूमिकांचा वावर असतो, तेव्हा संघर्ष अपरिहार्य असतो. विशेषत: हे दोन विचार पती-पत्नींनी स्वीकारले असतील तर समस्या अधिकच जटील व्हायला हवी.

परंतु आपल्या पुरुषप्रधान समाजात असं म्हटलं जातं की ’आस्तिकाच्या पत्नीला श्रद्धेची सक्ती असते तर नास्तिकाच्या पत्नीला अश्रद्धतेची’. तिचे वेगळे मत असूच शकत नाही असा पुरुषांचा समज असतो. आंतरजातीय विवाहांनंतरही जातिव्यवस्था कणभरही दुबळी होत नाही याचेही हेच कारण आहे. कुटुंबाच्या आपल्या व्याख्येत अजूनही नवर्‍याचे कुटुंब समाविष्ट असल्याने ती नवर्‍याच्या घरच्या चालीरीती नि परंपरांचा स्वीकार करते नि माहेरच्या परंपरांचा अनायासे त्याग करते. अप्रत्यक्षत्यरित्या पत्नीची जात बदलण्यापलिकडे त्यातून काहीच बदल घडत नसतो.

परंतु नागरी आयुष्यामध्ये विकेंद्री कुटुंबात जिथे पती-पत्नी नि त्यांची मुले एवढेच घर प्रामुख्याने असते तिथे मात्र पती नि पत्नी परस्परविरोधी वैचारिक भूमिका स्वीकारल्याचा दावा करत असतील तर मात्र संघर्ष अटळ असतो. त्याची तीव्रता किती नि व्याप्ती किती हे त्यांच्या परस्पर नात्याची वीण किती घट्ट आहे त्यावर तर अवलंबून असतेच पण त्याचबरोबर त्यांची वैचारिक निष्ठा कितपत भरीव आहे, कितपत पोकळ आहे यावरही अवलंबून असते.

Prasthaan

अशाच एका पती-पत्नींच्या आयुष्यावर आधारित ’प्रस्थान ऊर्फ Exit' हे मकरंद साठे लिखित नाटक नुकतेच पाहण्यात आले. साठेंसारखा नाटककार म्हटल्यावर बर्‍याच अपेक्षा होत्या. परंतु नाटक पाहिल्यावर पुरा भ्रमनिरास झाला असे म्हटले तर फार अतिशयोक्ती होणार नाही.

अगदी स्पष्ट सांगायचं तर हे नाटकच नव्हे असे माझे मत आहे. पण आशयाशी विसंगत अशा नवनवीन घाटांशी (forms) खेळणे हे अर्वाचीन नाटकाचे - आणि कथा, कादंबरीसारख्या कथनात्म साहित्याचे सुद्धा- वैशिष्ट्य होत चालल्यामुळे साठे नि त्यांच्यासारखे लोक मला ’मग काय तुम्हाला सारखा ड्रामाच हवा असतो.’ म्हणून जुनाट ठरवून झाडून टाकतील हे मला ठाऊक आहे. पण माझे - निदान माझ्या मते- नेमके आक्षेप आहेत.

विचारांचे, जगण्याचे दोन प्रवाह स्वीकारलेले, दीर्घकाळ सोबत असणार्‍या दोघांचे एकमेकांच्या दृष्टिकोनाबाबत, दांभिकतेबाबतचे मतप्रदर्शन हे मी समजू शकतो. पण त्या दोघांचा छेद जाऊन नाट्य उभेच राहिले नाही. ("ह्यॅ: काळे, तुम्ही जुनाट मानसिकतेचे. याला नरेटिव ड्रामा म्हणतात..” बरं.) इथे सरळ दोन दीर्घ monologs होते. दोघांना दमसास टिकवण्यास सोय म्हणून ते प्रत्येकी दोन भागात विभागले होते. आणि एकसुरीपणा टाळण्यासाठी मृत्युदूत हा तिसरा गडी अधेमध्ये आणला होता इतकेच. हे दोघे एक प्रकारे त्याच्यासमोर आपल्या जोडीदाराची कैफियत मांडत आहेत अशा तर्‍हेने दोघे बोलत असल्याने त्यांच्या भाषणाला स्वगत म्हणता येत नाही इतकेच. पण या पलीकडे या तिसर्‍याला भूमिकाच नाही.

बरे monologs ही एकसुरी होते. समजा आपण म्हणू की आमच्यासारख्या जुनाट ड्रामा वा मेलोड्रामावाल्यांना अपेक्षित नाट्य नाही त्यात. तो उद्देशच नाही त्यांचा. चला हरकत नाही. पण ते monologsही केवळ एकाने दुसर्‍याचे केलेले वरवरचे मूल्यमापन इतकेच राहिले. विशिष्ट घटना, प्रसंग यांच्या साहाय्याने - भले narrative मध्ये का असेना- दोघांच्या भूमिकेतील विरोधाभास, वैय्यक्तिक पातळीवरील उक्ती-कृतीमधील अंतर्विरोध हे ठळक करता आले असते, तेही केलेले नाही. एकाच्या दृष्टिकोनातून दुसरा इतकेच त्याचे स्वरूप राहिले.

त्यात पुन्हा मूल्यमापन करणार्‍याच्या पूर्वग्रहांची छाया कुठे दिसली नाही. म्हणजे असं पाहा, की एखाद्याची अंतर्विरोध नसलेली, वस्तुनिष्ठ भूमिका दुसर्‍याच्या विचारांशी सुसंगत नसल्याने त्याला आवडत नाही. त्यातून त्याच्या/तिच्या दृष्टीने मूल्यमापनातही निर्दोष ठरूनही तो त्याचे उघड मूल्यमापन वा मतप्रदर्शन अट्टाहासाने नकारात्मक ठेवतो, असेही बरेचदा घडत असते. नवरा-बायको असोत की मित्र असोत, परस्परांच्या काही भूमिकांबद्दल मतभेद असून आदर - किंवा दुर्लक्ष करणे- असते, तसेच काही बाबतीत असा दुराग्रहाचा नकारही त्यात असतो. तो इथे दिसला नाही, निदान मला आठवत नाही.

डावा विचार नि उजवा विचार याबाबत साठेंनी समोरून केलेले काहीसे तटस्थ मूल्यमापन दोन पात्रांच्या तोंडी घालून त्यांना रंगमंचावर उभे करण्यापलीकडे यात काही नव्हते असे मला प्रामाणिकपणे वाटते. केवळ ते पती-पत्नी आहेत म्हणून सेक्सचा उल्लेख तर हास्यास्पदरित्या वरवरचा होता. डाव्या विचारात विवाह-संस्था ही देखील एक व्यवस्थाच असल्याने शोषक मानली आहे. तर उजव्या विचारात तिला पावित्र्याची (sacrosanct) झूल चढवलेली आहे. पन्नास वर्षे संसार झाल्यावरी त्यासंदर्भात त्या दोघांचा निदान शाब्दिक संघर्ष होऊ नये हे पटण्याजोगे नाही. त्यासंदर्भात सेक्सचा विचार मांडला असता तर त्याला काही पाया मिळाला असता.

पती-पत्नी हे दोघेही परस्परविरोधी (?) विचारांचे झेंडे घेऊन उभे असले तरी ते केवळ झेंडेच आहेत. त्यांत विचारांची फार खोल रुजवणूक नाही. शाब्दिक भपका किंवा भाषणबाजी यातून ते चटकन प्रभावित होतात इतके ते उथळ दिसतात. दोघांनी एकमेकांच्या संदर्भात केलेल्या मूल्यमापनात हे सरधोपट दृष्टिकोन बर्‍यापैकी उतरले आहेत. एकुणात चूष म्हणून एक विचार स्वीकारल्याची द्वाही फिरवायची इतकेच बहुसंख्य मंडळी करत असतात. साठेंना हाच दृष्टिकोन मांडायचा होता असा माझा समज झाला आणि तो चांगला जमला आहे असे मत झाले.

नाटकात उल्लेख आल्याप्रमाणॆ साठच्या दशकात कम्युनिझम वा डावा विचार ही बुद्धिमंतांची चूष होती. सध्या राष्ट्रवाद (म्हणजे रे काय भाऊ?) आणि/किंवा हिंदुत्ववाद ही चूष आहे. एकुणात माणसांच्या मनातील न्यूनगंड त्याला कुठल्या ना कुठल्या कळपाशी बांधून घेण्यास भाग पाडतात. बहुतेक वेळा त्या त्या काळात चलनी नाणे असलेल्या विचाराच्या गटाशी संलग्न होणे अधिक सुरक्षित असते असा त्यांचा होरा असतो. म्हणून समाजात विचारांचे संक्रमण होत नाही, वारे एकदम फिरतात नि झेंड्यांचे रंग वेगाने बदलतात. बंगालमध्ये पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या कम्युनिस्टांची दोनच निवडणुकांत पुरी धूळदाण होते ती त्यामुळे. वारे बदलते आहे म्हणून माणसे गट बदलू लागतात आणि माणसे गट बदलू लागतात म्हणून वार्‍यांचा वेग वाढतो असे चक्र आहे ते.

पती हा पुरुष असल्याने बाहुबलाच्या बाता मारणारे त्याला अधिक भावतात हे समजण्याजोगे आहे. त्यामुळे त्याला हिटलरच्या तथाकथित राष्ट्रवाद त्याला पसंत आहे. खरे तर तो केवळ विस्तारवादच होता. आजही मोदींचा राष्ट्रवाद हा महासत्तेची पिपाणी वाजवतो. कल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांच्याकडे वा त्यांच्या मातृसंस्थेकडे नाही. त्यांचा मुद्दा ’विकासा’चा आहे. तो सर्वसमावेशक असेल का याची फिकीर ते करत नाहीत. तिथे सरळ समाजवादी दृष्टिकोन स्वीकारुन शेतकर्‍याला २००० रू. दान करतात. दुसरीकडे उद्योगपतींना मोकाट सोडतात. यातून राष्ट्राचं ’आपोआप’ भलं होईल असा त्यांचा होरा असतो. मातृसंस्थेने तर हिंदूराष्ट्र झाले की सगळे आलबेल होईल हा हास्यास्पद दृष्टिकोन स्वीकारला आहे. राष्ट्रवादाच्या आपल्या ठेकेदारांची ही स्थिती आहे. या वरवरच्या उथळ राष्ट्रवादाचे प्रतिबिंब नवर्‍याच्या विचारात उतरले आहे हे वास्तवदर्शी आहे.

पुरोगामी वर्तुळात जो अंतर्विरोध आहे तोही साठेंनी अचूक नोंदला आहे. माणूस एकाच वेळी गांधी, नेहरु, आंबेडकर यांना पूज्य मानू शकतो हे खरे. पण तो एकाच वेळी गांधीवादी नि आंबेडकरवादी असू शकतो हे पटण्याजोगे नाही. गांधींच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतील अनेक त्रुटी आंबेडकरवादामध्ये अधोरेखित केल्या जातात. दुसरीकडे आंबेडकरवादी - स्वत: आंबेडकर नव्हेत- विद्रोहाच्या अति-प्रेमात आहेत. ते व्यवस्थेचा विचार करत नाही, निर्मितीविचार त्यात अनुपस्थित आहे. त्यांचे सारे बळ, सार्‍या समस्यांचे मूळ ब्राह्मणी व्यवस्थेत शोधण्यात खर्च होते. ’मग तुम्हाला अभिप्रेत व्यवस्था कुठली?’ या प्रश्नाला ’संविधानावर आधारित’ असे गुळमुळीत उत्तर येते. कम्युनिस्टांना अभिप्रेत व्यवस्थेचा आदर्शवादच तिला अस्थिर करणारा आहे, हा आक्षेप ते झाडून टाकतात तसेच हे ही.

वास्तविक संविधान हे व्यवस्था म्हणून विचार करते, समाज म्हणून नाही. ते शेजार्‍याशी तुम्ही कसे वागावे हे सांगत नाही. तुम्ही अस्पृश्यता पाळलीत तर त्या गुन्ह्याला काय शिक्षा आहे हे ते सांगेल. पण अस्पृश्यता का वाईट, त्यातून सामाजिक एकसंघतेला कसे नुकसान पोहोचते वगैरे प्रबोधनात्मक प्रवचन ते देत नसते. हा जनजागृतीचा भाग असतो आणि तो अलिखित सामाजिक प्रवृत्तींबाबत असतो. संविधान नियमांपलिकडच्या सामाजिक व्यवस्थेबद्दल सांगणारच नसते. असो. हा मुद्दा फारच मोठा आहे. पण गोळाबेरीज ही की माणूस एकाच वेळी इतक्या इझमचा अनुयायी असू शकत नाही. नीरक्षीरविवेकाने यातील काही, त्यातील काही तो स्वीकारू शकतो.

’मी अमुकवादी आहे’ म्हणणार्‍यांपासून मी स्वत: कायम चार हात दूर राहणे पसंत करतो. कारण अशा व्यक्ती बुद्धिबंद (मंद नव्हे!) असतात असा माझा अनुभव आहे. त्यांच्याशी संवाद होऊ शकत नाही.

दुसरीकडे तथाकथित राष्ट्रवाद्यांमध्ये बाहुबलाचे असणारे निर्बुद्ध आकर्षण आणि डाव्यांचे क्रियाशून्य शब्दसुखी असणे हे परस्परविरोधी दृष्टिकोन मला नेहमीच अस्वस्थ करतात. पण नाटकाची प्रकृती पाहता त्यांचे अधांतरी असणे आणि तरीही ठोस विधानांमधून व्यक्त होणे या पलीकडे काहीच दिसत नाही. त्यांच्या परिणामांची कारणमीमांसा तर दिसत नाहीतच, पण परिणामांचे उल्लेखसुद्धा नाहीत.

म्हणून मी वर म्हटले तसे हे केवळ साठेंनी दोन बाजूंचे - खरेतर त्या बाजू स्वीकारल्याचा दावा करणार्‍यांचे - केलेले मूल्यमापन आहे इतकेच. सुरुवातीपासून त्यांनी स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी निवडलेले माध्यम नाटक हे आहे, म्हणून त्यांनी त्याचे नाटक केले इतकेच. पण मुळात त्या विषयामध्ये, दृष्टिकोनामध्ये नाटकाची प्रकृतीच नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.

विचारांनी कदाचित दुसर्‍या बाजूला असलेल्या अभिराम भडकमकर या नाटककाराचे ’ज्याचा त्याचा प्रश्न’ हे नाटक मला इथे आठवते. नास्तिकता-आस्तिकतेचा उहापोह करत असतात त्यांनी वास्तविक प्रसंगांशी, कथनाशी त्या मुद्द्याची सांगड घातली होती. त्यामुळे त्यात नाटक होते. अर्थात दुसरी बाजू म्हणजे ते साठेंच्या डाव्या-उजव्या विचारांच्या मूल्यमापनाइतके खोल उतरू शकले नव्हते. मुळात नाटकासारख्या सादरीकरण माध्यमात एखाद्या विश्लेषणात्मक अथवा भाष्य करणार्‍या लेखामध्ये असते तेवढी खोली अपेक्षित ठेवता येत नाही हे ही तितकेच खरे.

तंत्राच्या बाजूमध्ये स्क्रीन प्रोजेक्शन ही सध्याची चूष नाटककारांमध्ये दिसते. ती पुन्हा तंत्राशी खेळणे या उद्दिष्टापलीकडे तसे अस्थानीच असते असे माझे मत आहे. बहुतेक वेळा त्यावर अगम्य अशा काही विचित्र-चित्रांची मालिका दाखवली जात असते. ज़ौकचे शिष्य ग़ालिबच्या शायरीबाबत ’या तो ये जाने या ख़ुदा जाने’ म्हणत तसे हे प्रोजेक्शनही अनेकदा ’या तो बनानेवाला जाने या ख़ुदा जाने’ टाईपचेच असते. गेल्या दशकात पोस्ट-मॉडर्निझम ही एक चूष उफाळून आली होती त्या काळात बस्तान बसवलेला हा प्रकार आहे.

त्याचा सुसंगत उपयोग मी आळेकरांच्या ’एक दिवस मठाकडे’मध्ये पाहिला होता. (त्याचे दिग्दर्शन बहुधा निपुण धर्माधिकारीने केले होते.) त्यात स्क्रीन प्रोजेक्शमधून त्या मठाचे वास्तव-कल्पिताच्या सीमारेषेवर असणे, त्याकडे जाणार्‍या वाटेची चढण. आदी बाबींमधून एक आभास निर्माण केला होता. जो संवादातून उभ्या राहणार्‍या शब्दचित्राला एक दृश्य रूप देत होता. त्यानंतर ओम भूतकरच्या ’मी ग़ालिब’मध्ये शेर आणि त्यांचे अर्थ दाखवण्यासाठी वापरले गेले. भाषिक फरकामुळे ते उपयुक्त ठरले. पण असे अपवाद. त्यानंतर ही चूष बरीच पसरली. (याचे मूळ बहुधा क्युब्रिकच्या ’२००१ ओडिसी’ या गाजलेल्या चित्रपटात असावे.)

मृत्युदूताचे प्रयोजनच मुळी वर म्हटले तसे एकसुरीपणा कमी करण्यासाठी, ज्याला तात्पुरते वळण (detour) म्हणतात तसे असल्याने त्याचे स्क्रीन-प्रोजेक्शन नि पुढचे अ‍ॅप वगैरे उल्लेख फारसे कामाचे नाहीतच. तसेही शेवटच्या काही सेकंदाच्या एका प्रसंगासाठी त्या अभिनेत्याला रंगमंचावर आणलेच होते. म्हणजे प्रत्येक प्रयोगाला तो हजर असणारच आहे. मग इतर संवादही त्याला प्रत्यक्ष रंगमंचावर आणून घेता आले असते. तो प्राणहरण करण्यास येतो नि त्याला मोबाईलवर फोन येऊन काहीतरी चूक झाल्याचा संदेश मिळतो तो ऐकून परत जातो किंवा तो फोन घेण्यास बाहेर जातो असेही दाखवता आले असते. स्क्रीन प्रोजेक्शनचे खूळ विनाकारण घातले आहे. संगणकावरील प्रोग्रामच्या चार ओळी सरकताना दाखवता आल्या इतका त्याचा माफक उपयोग झाला आहे.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा. शेवटी उजव्या विचारांचा पाईक असल्याचा दावा करणार्‍या पतीला मृत्युदूत घेऊन जातो. (यात अप्रत्यक्षपणे मोदीराज्याचा अंत सूचित करण्याचा प्रयत्न आहे असा माझा समज झाला. पण तो सोडून देऊ.). दोघांच्याही भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या कोणत्याही त्रयस्थ मूल्यमापनाखेरीज केलेला निवाडा म्हणून तो पक्षपाती तर वाटलाच, पण केवळ निरास हवा या अट्टाहासातून आणल्यासारखा वाटला.

विशेष म्हणजे नाटकाच्या शीर्षकाशी या उपर्‍या प्रसंगाचाच संबंध जुळतो. एरवी ते शीर्षकही तसे अधांतरीच म्हणावे लागेल. दोघांना भूमिका मांडण्यासाठी प्रासंगिक कारण म्हणून ’नक्की कुणाची वेळ भरली आहे?’ हा प्रश्न उपस्थित करुन दोघांनी एकमेकांविरोधात साक्ष दिल्यासारखी केलेली भाषणे एवढेच नाटकाचे स्वरूप राहिले आहे. एखाद्या कोर्टरूम ड्रामाचा हा घाट दिसतो. परंतु वास्तव घटनांशी त्याची फारशी सांगड बसत नसल्याने त्याचे स्वरूप परस्पर-मूल्यमापनाच्या स्वरूपाचे चार दीर्घ monologs एवढेच शिल्लक राहते.

- oOo -


हे वाचले का?

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (उत्तरार्ध) : स्वरूप, दर्शन व आकलन

प्रचलित निकष << मागील भाग.
---

अमुक एक विधान, एखादी गोष्ट सत्य की असत्य याचा निवाडा करण्यासाठी ’ते पूर्णतः अनावृत, निर्लेप, अविकृत स्वरूपात आपल्यासमोर आले आहे याची आपल्याला खात्री देता येते का?’ या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थीच द्यावे लागते

ते आपल्या समोर येते ते एखाद्या माध्यमातून; मग ते एखाद्या व्यक्तीचे भाष्य अथवा निवेदन असेल, छायाचित्र असेल, घटनेचे केलेले व्हिडीयो शूटिंग असेल, त्याबाबत वृत्तपत्रात किंवा चॅनेल्सवर आलेली बातमी असेल, एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून आलेले वर्णन असेल की आणखी काही. त्या त्या माध्यमाच्या मर्यादा, त्यात सहेतुक वा अहेतुक झालेले बदल यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाहून वेगळे असे एक अवगुंठित, विलेपित असे नवे ’तथ्य’ आपल्यासमोर येत असते. अशा अवगुंठित, विलेपित रूपालाच आपण सत्य मानून अन्वेषणाच्या कसोटीवर पारखत बसू तर मग ते सत्य अनुत्तीर्ण होण्याची शक्यता वाढते.

RashomonPoster

प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाच्या ’राशोमोन’ चित्रपटात या मुद्द्याची सुरेख मांडणी केली आहे. एका रानातून चाललेल्या सामुराई नि त्याची पत्नी यांच्याबाबत अघटित घडले आहे. त्यात सामुराईच्या पत्नीचा त्या रानातील कुप्रसिद्ध डाकू ताजोमारु याने भोग घेतला आहे. आणि सामुराईचा मृत्यू झाला आहे. या दोन घटनांबाबत ताजोमारू, सामुराईची पत्नी, सामुराईचा आत्मा, इतकेच काय त्या घटना घडून गेल्यानंतर तिथे आलेला एक लाकूडतोड्या या चारही संबंधितांच्या साक्षी वेगवेगळ्या आहेत(१).

ताजोमारू-सामुराईची पत्नी यांचा आलेला शरीरसंबंध (सहमतीने की बलात्काराने?), त्यानंतर सामाजिकदृष्ट्या त्या स्त्रीचे स्थान काय असावे (स्त्रीने पतीसोबत जावे की ताजोमारूसोबत याचा निर्णय कुणी वा कसा करावा?) आणि सामुराईचा मृत्यू (आत्महत्या, हत्या, हाराकिरी की द्वंद्वात आलेले मरण?) याबाबत प्रत्येकाची साक्ष वेगवेगळा कार्यकारणभाव वा वास्तवाची संगती मांडतो आहे. कुरोसावाने या सार्‍या साक्षी कॅमेर्‍याकडे- म्हणजेच प्रेक्षकांकडे तोंड करुन द्यायला लावल्या आहेत. एक प्रकारे प्रेक्षकालाच न्यायाधीशाच्या भूमिकेत बसवून ’कर निवाडा याचा’ असे आव्हान दिले आहे.

एकाच घटनेमध्ये सहभागी वा साक्षी असलेल्या व्यक्तींचे कथन वेगवेगळे असते. परंतु त्यात सामायिक असा काही भाग असतो, जिथे प्रत्येकाच्या कथनाचा वास्तवाशी वा सत्याशी सांधा जुळलेला असतो. त्यामुळे ते सर्वस्वी खरे नसते तसेच सर्वस्वी खोटेही. त्यातून सत्याचा अंश वेगळा करुन एकत्र पाहावा लागतो, त्यानंतरच निवाडा शक्य होतो. एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेला साक्ष असलेली व्यक्ती त्याबद्दल सांगते तेव्हा तिचे निवेदन यथातथ्य असू शकते किंवा जाणीवपूर्वक सांगितलेले असत्यही. पण या दोन्ही शक्यतांच्याही अधेमध्ये भासमय सत्य (Perceived), खंडश: सत्य (Fragmented) तसेच अंशात्मक सत्य (Fractional) अशा अन्य शक्यताही असतात.

प्रत्यक्ष निवेदन हे आपण प्रत्यक्षात जे पाहिलं त्या पेक्षा आपण जे पाहिलं ’असं आपल्याला वाटतं’ त्याबद्दल सांगू शकतं. हे ’भासमय’ सत्य! यात दृष्टी ते आकलन या प्रवासामध्ये झालेल्या बदलांचा, चकव्याचा प्रभाव पडतो. त्याखेरीज मेंदूने केलेले आकलन आणि भाषेमार्फत केलेले त्याचे सादरीकरण या माध्यमांतराचा परिणामही त्यावर होतो.यात कदाचित न पाहिलेल्या, पण आपल्या बुद्धीने भर घातलेल्या काही तपशीलांचा समावेश असू शकतो.

मानसशास्त्रात एका गंमतीशीर प्रयोग करतात. ज्यात तुम्हाला पलंग, रात्र, दिवा, अंधार, चंद्र असे अनेक शब्द लिहिलेला एक कागद दिला जातो. नंतर तो काढून घेतात नि लगेचच केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर ते शब्द पुन्हा लिहून काढायला असे सांगतात. यात काही शब्द विसरले जातात (हे स्वाभाविकच आहे) पण त्या मूळ यादीत नसलेला 'झोप' हा शब्दही बरेचजण लिहून जातात. हे भासमय सत्याचे उदाहरण आहे. इतर शब्दांच्या संगतीचा आधार घेऊन आपला मेंदू काही रिकाम्या जागा भरून काढतो नि ही दुरूस्ती आपल्या दृष्टीने सत्याचा भाग होऊन जाते. ही व्यक्तीच्या आकलनशक्तीची मर्यादा आहे.

ज्याचा-त्याचा रंग वेगळा

TrueAndTruth

लेखात सुरुवातीलाच दिलेले उदाहरण पाहिले, तर भुत्या अंध असल्याने त्याला रंग दिसण्याची मर्यादा आहे. त्याचप्रमाणे तर रंगांधळेपण अथवा मर्यादित रंगांचीच ओळख असणार्‍या एखाद्याला त्याच्या क्षमतेबाहेरचे रंग न ओळखता येण्याची मर्यादा असतेच. उदाहरणार्थ, कुत्र्याला रंग वेगळे दिसत नाहीत. केवळ काळ्या-पांढ्र्‍या रंगांच्या छटाच तेवढ्या दिसतात असे प्राणिशास्त्र सांगते.

आपल्या आकलनाला आपल्या माहितीच्या, बुद्धीच्या, विचारव्यूहाच्या मर्यादा असतात. एकच छायाचित्र (photograph, image) वेगवेगळ्या संगणकांवर, मोबाईल फोन्सवर, टेलिव्हिजनवर पाहा. त्या प्रत्येक उपकरणाच्या रंग दाखवण्याच्या कुवतीमध्ये आणि पद्धतीमध्ये फरक असतो. त्यामुळे त्या चित्रातील विविध रंगांच्या छटांमध्ये फरक दिसेल. त्यातील एखाद्या रंगाला काय नाव द्यावे याबद्दल मतांतरे निर्माण होतील. वास्तव, जड जगात आपणही आपल्या डोळ्यातील भिंगाच्या आधारे पाहात असतो. त्याच्या कुवतीनुसार आपल्या रंगांचे आकलनही वेगवेगळे असते. इतकेच नव्हे तर रंगांबरोबर पोत (texture) मुळे देखील त्याच्या दृश्य आकलनामध्ये फरक पडतो.

आपण एखाद्या वस्तूकडे पाहताना तिच्यावर पडलेल्या प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाच्या त्या रेषेने पाहणार्‍याच्या दृष्टीबरोबर साधलेला कोन, त्या वस्तूच्या आसपास असणार्‍या अन्य वस्तूंचे अस्तित्व आणि तिच्याकडे पाहणार्‍याच्या दृष्टीने त्या वस्तूशी केलेला कोन, त्याच्या/तिच्या मनात त्याक्षणी ठळक असणारी अन्य प्रभावशाली वस्तू वा तिचे आकलन या सार्‍या घटकांच्या आधारेच त्या वस्तूचे आकलन होते हे विसरता कामा नये.

माध्यमांच्या मर्यादा

अशाच मर्यादा (प्रसार-)माध्यमांनाही असू शकतात. आपली माध्यमे वेगवेगळ्या प्रकारची शीर्षके देऊन एकाच बातमीबाबत वा घटनेबाबत वाचकांच्या मनात वेगवेगळी भावना वा आकलन निर्माण करु शकतात. बातमीच्या आतील निवेदनामध्ये विशेषणांच्या यथायोग्य वापराने एकच बातमी विविध माध्यमांतून आपापल्या सोयीच्या रंगांत रंगवलेली पाहायला मिळते. हे माध्यमकर्त्यांचे प्रदूषण(contamination) म्हणता येईल.

अलीकडे व्यावसायिक ठिकाणी तर सोडाच, अगदी रहिवासी इमारतींमध्येही 'सीसीटीव्ही' ही अत्यावश्यक व अपरिहार्य झालेली गोष्ट आहे. महानगरांमध्ये अशा ’रहिवासी इमारतींमध्ये घडलेल्या गुन्ह्यांची नोंद तिथे सीसीटीव्ही नसेल तर केली जाणार नाही ’ असे पोलिस यंत्रणेकडून सांगितले जाऊ लागले आहे. असा सीसीटीव्ही कॅमेरा हा एका जागी स्थिर असतो. त्यामुळे तो गुन्हेगाराच्या उजवीकडून किंवा डावीकडून आणि त्याच्या डोक्याच्याही वरून, जो मिळेल त्या कोनातून ते छायाचित्र वा व्हिडिओ काढतो. पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डमधे ज्याप्रमाणे गुन्हेगाराचे समोरून स्थिर स्थितीतील छायाचित्र असते, अगदी तसेच त्याच कोनातून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळेल हे अशक्यच असते. ही या माध्यमाची मर्यादा आहे.

आता ते छायाचित्र नि रेकॉर्डमधील चित्र असलेली व्यक्ती एकच हे सिद्ध करण्याचे तंत्र विकसित करावे लागते. तंत्रज्ञानाच्या ’इमेज प्रोसेसिंग’ नामक शाखेमध्ये यासाठी वेगवेगळ्या तर्कपद्धती(algorithm) व साधने तयार केली जात आहेत.

आंधळे आणि हत्ती

काही वेळा विलेपित, अवगुंठित नसलेला पण मूळ सत्याचा एखादा अंशच (अविकृत स्वरूपात) आपल्यासमोर येऊ शकतो. असं असेल तर मग सत्याच्या केवळ एका खंडाला, एका अंशालाच सत्य मानून पुढे जाण्याचा धोका राहतो. भारतीय अभिजात संगीतातील रागांच्या स्वरूपाबाबत कुमार गंधर्व असं म्हणायचे की रागाला एकाहुन अधिक ’प्रोफाईल’ असतात. त्यातल्या एका रूपालाच अनेक गायक पूर्ण राग समजून गातात नि आवृत्त गाणे गात राहतात. थोडक्यात दृश्यमान भागाच्या पलिकडे असलेल्या सत्याच्या अदृश्य भागाचा अथवा खंडाचा शोध घेऊनच त्याचे पुरे आकलन होऊ शकते.

जीएंचा विदूषक(२) म्हणतो "सत्य हे अंशाअंशानं प्रकट होत असतं, याची विस्मृती होता कामा नये. संपूर्ण सत्य पाहण्याचं भाग्य मानवाच्या दोन नेत्रांना कधीही लाभणार नाही, परंतु त्याला विविध अंश एकत्र करता येतील, विविध खंड बुद्धीच्या सहाय्यानं सांधता येतील; आणि एका खंडापेक्षा दोन साधित खंड अधिक सत्य असतात."

QuestionsAroundTruth

खंडश: सत्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असलेली ’आंधळे आणि हत्ती’(३) ही गोष्ट. प्रत्येक आंधळ्याच्या जाणिवेच्या कक्षेत असलेला आकार दोरी, पंखा, खांब इ. आकार सत्यच आहे, परंतु तो मूळ हत्तीचा एक भाग आहे, पूर्ण हत्ती नव्हे. इथे पाचही आंधळ्यांच्या जाणिवेच्या समष्टीतूनच संपूर्ण सत्याचे - त्या हत्तीचे - चित्र साकार होऊ शकते.

कळीचा मुद्दा हा असतो की 'आपण सत्याचा एक भागच पाहतो आहे' याची जाणीव त्या आंधळ्यांना व्हायला हवी, अन्यथा प्रत्येकजण अट्टाहासाने आपल्या जाणिवेच्या मर्यादेतील चित्राला पूर्ण सत्याचे रूप मानून चालतो. हत्तीचे एकवेळ सोडा - ते केवळ जिज्ञासापूर्तीपुरते आहे - पण ते पाच भागधारक आहेत अशा एखाद्या सामूहिक हिताच्या निर्णयाबाबत काय घडेल हे तर्क करण्याजोगे आहे.

असत्याचे प्रदूषण

TrueFalseAndBetween

'अंशात्मक सत्य' हे मूळ सत्याचा काही भागच सांगते. यात उरलेला भाग अजाणता वा जाणीवपूर्वक दडपला जातो किंवा त्याचा अपलाप केला जातो. तरीही एकुणात ते सत्य वा असत्य मानता येणार नाही. इथे सत्य नि असत्याची सरमिसळ झालेली असते. त्या अर्थी खंडश: सत्यापेक्षा अंशात्मक सत्य वेगळे आहे. खंडश: सत्य हे तुकड्या-तुकड्यातून येते, पण त्यांची समष्टी केवळ सत्यच पूर्ण करते. अंशात्मक सत्यात प्रत्येक तुकड्यातून सत्याचा अंश वेगळा करून जमा करत न्यावा लागतो. ’राशोमोन’मधील साक्षींच्या आधारे प्रेक्षकाने निवाडा करताना या पद्धतीने जावे लागते.

लेखाच्या सुरुवातीलाच दिलेले भुत्याचे रंगाचे उदाहरण थोडे वेगळ्या प्रकारे मांडून पाहू. हिरवा रंग हा पिवळा नि निळ्या रंगाचे संयुग मानले जाते. पिवळा हे सत्य नि निळा हे असत्य मानले, तर हिरव्याच्या सर्व छटा या निळ्या रंगाच्याही छटा असतात नि पिवळ्याच्याही. एखाद्याला हिरव्या रंगाची छटा दाखवली नि ही छटा पिवळ्या रंगाची की निळ्या रंगाची असा प्रश्न केला बघणार्‍याच्या दृष्टिकोनातील फरकानुसार तो त्यांना पिवळ्या वा निळ्या रंगाची छटा मानून चालेल. पण हाच प्रश्न एकाहुन अधिक लोकांना केला तर त्यांचे एकमत होण्याची शक्यता नाही. थोडक्यात सत्य शोधू पाहणार्‍याला प्रत्येक हिरव्या छटेतील निळ्या रंगाचे अस्तित्व वेगळे काढून पाहता यायला हवे. त्या छटेतील तेवढा भागच सत्यान्वेषणासाठी घेऊन पुढे जाता आले पाहिजे.

सत्य-चित्र रेखाटताना

QuestionsAroundTruth
science.howstuffworks.com येथून साभार;

पूर्वी ज्याला मेकॅनो म्हटले जाई नि आता लेगो म्हटले जाते, त्या खेळाचे उदाहरण घेऊ. यात विविध आकाराचे तुकडे दिलेले असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकाराने जोडून त्यातून तुम्ही बस तयार करु शकता, इमारत बनवू शकता वा एखादी गाडीही. तुम्ही कुठले तुकडे निवडता, कुठले सोडून देता आणि जुळणी कुठल्या क्रमाने करता यावरुन कोणती वस्तू तयार होणार हे ठरत असते.

त्याचप्रमाणे अंशात्मक व खंडश: सत्यांचे तुकडे घेऊन सत्याचे अथवा वास्तवाचे तुकडे घेऊन त्यातून पुर्‍या सत्याचे चित्र निर्माण करताना त्या जुळणीची पद्धतही त्या चित्रावर परिणाम घडवत असते. सत्याचे सारेच खंड उपलब्ध नसतील, तर जुळणी करताना गाळलेल्या जागा कशा भरल्या जातात यातून चित्राचे स्वरूप वेगवेगळे दिसू शकते. याचे एक उत्तम उदाहरण अलिकडे 'ब्रॉडचर्च' या मालिकेमध्ये पाहायला मिळाले.

एका छोट्या गावात एका लहान मुलाची हत्या झाली आहे. शहरी जीवनाच्या तुलनेत अशा लहान वस्तीमध्ये असतात बहुतेक नागरिकांचे परस्परांशी निदान औपचारिक पातळीवरचे का होईना संबंध येतात. अशा गर्हणीय कृत्याने समाजाचा तो तुकडा ढवळून निघतो. तपास जसजसा वेगवेगळी वळणे घेत जातो, तसतसे त्यात परस्पर-अविश्वास, संशय यांचे भोवरे तयार होतात. अखेरीस तपास-अधिकारी असणारी एली मिलर तिच्या पतीला- 'जो मिलर'लाच या हत्येबद्दल आरोपी म्हणून अटक करते.

SheronBishop_Broadchurch
ब्रॉडचर्च: शेरॉन बिशप न्यायालयात पर्यायी शक्यतेची मांडणी करताना

आता प्रेक्षकांनी घटनाक्रम संपूर्णपणे पाहिला आहे. शिवाय खुद्द एलीनेच तपास केलेला असल्याने तो खरा आहे याची तिला आणि तिचा तपासातील सहकारी अलेक हार्डी यांना माहित आहे. पण... न्यायालयासमोर मात्र तो पुराव्यांच्या आधारे मांडलेली घटनाक्रमाची एक ’शक्यता’च असते. न्यायालयामध्ये जो मिलरची बाजू लढवणारी शेरॉन बिशप ही त्याच पुराव्यांच्या आधारे एक पर्यायी घटनाक्रमाची शक्यता मांडून दाखवते.

त्यामुळे आता न्यायाधीश आणि ज्युरी यांच्यासमोर त्याच पुराव्यांच्या आधारे उभ्या केलेल्या दोन प्रतिस्पर्धी शक्यता आहेत. आणि त्यांना त्यातील एकीची ’अधिक संभाव्य’ म्हणून निवड करायची आहे. वास्तव काय हे त्या घटनाक्रमातील सहभागी व्यक्तींखेरीज कुणालाच नेमके समजलेले, खरेतर दिसलेले नसते. आकलनाची, स्वार्थाची, पूर्वग्रहाची छाया घेऊनच ते त्यांच्याही मनात रुजते. वास्तवाचे दूषित होणे तिथूनच सुरू होते. त्यामुळे न्यायाधीश, ज्युरी, तिथे उपस्थित अन्य व्यक्तीच नव्हे, तर आपण प्रेक्षकही पाहतो ते कुणीतरी त्यांचे, त्यांना आकलन झालेल्या वास्तवाचे आपल्यासमोर मांडलेले कवडसेच फक्त असतात.

शेरॉन आपल्या वकीली कौशल्याचा वापर करुन आपला घटनाक्रम, आपले मूल्यमापन अधिक विश्वासार्ह असल्याचे ज्युरींना पटवून देते. आणि ज्याच्या पत्नीनेच त्याला अटक केली, जो गुन्हेगार आहे हे तिला नक्की ठाऊक आहे, अशा जो मिलरला आरोपमुक्त केले जाते.

थोडक्यात काही वेळा सत्याचे आकलन पुरेसे नसते, त्याची सिद्धताही तितकीच महत्त्वाची असते. सत्याचे ते आकलन आवश्यक तिथे इतरांना पटवून देता यावे लागते. त्याचे कौशल्य आणखी वेगळे असते. त्या कौशल्याच्या सहाय्याने जगाच्या कल्याणाचा मार्ग सापडलेला एखादा प्रेषित आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकतो...

...आणि त्याच कौशल्याचा आधाराने एखादा द्वेषसंपृक्त राजकारणी जनमानसात प्रक्षोभक संदेश रुजवून लोककल्याणाऐवजी सामाजिक विध्वंसाची आखणी करु शकतो!

या सार्‍या अवगुंठनाच्या, विलेपित सत्याच्या, भासमय, खंडश: वा अंशात्मक सत्याच्या, माध्यमांच्या मर्यांदांच्याही पलिकडे शिल्लक राहतो तो स्वार्थप्रेरित अथवा हेतुत: केलेला संपूर्ण अपलाप. मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये याबद्दल इतके लिहिले आहे की आता यावर कुणी फार नवा प्रकाश टाकू शकेल ही शक्यता नगण्यच आहे. आणि असे असूनही त्याच्या आकलनाबाबत मानवी समाज बव्हंशी उदासीन राहून दोषारोप नि हेत्वारोप यांच्या आधारे स्वत:ची जबाबदारी झटकून टाकण्यातच धन्यता मानताना दिसतो.

सत्यशोधाच्या या जंगलवाटा, शहरी रस्त्यांप्रमाणे थेटपर्यंत नजर जाईल अशा नसतात. वाटेत येणारी झाडे-झुडपे दूर करीत, प्रसंगी कठोरपणे छाटून काढीत पुढे जावे लागते. हे करीत असताना गगनाला भिडणार्‍या वृक्षांच्या फांद्यातून येणारे कवडशांचे भान ठेवावे लागते. कारण त्यांच्या अनुषंगानेच मूळ सहस्ररश्मीचा वेध आपल्याला घेता येतो. त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही पण कवडशांच्या अस्तित्वाने त्याचे अस्तित्व - सिद्ध नाही तरी - अनुमानित करता येते.

(समाप्त)

- oOo -

टीपा:

१. ’जंगलवाटांवरचे कवडसे’ ही ’राशोमोन’वरील मालिका याच ब्लॉगवर वाचता येईल.
२. कथा: विदूषक - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
३. खरे तर ही कथा ’डोळे बांधलेल्या व्यक्ती आणि हत्ती’ अशी असायला हवी. मुळातून आंधळे असलेल्या व्यक्तींना सर्प, झाड, पंखा आदी वस्तूही दिसत नसल्याने त्यांची नि हत्तीची तुलना करणे शक्य नाही. अर्थात या व्यक्ती जन्मांध नसून आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर अंध झालेल्या असल्या तर गोष्ट वेगळी. त्या परिस्थितीत असे आयुष्यातील डोळस असतानाचा कालखंडात त्यांनी हत्ती पाहिलेला नाही, परंतु इतर गोष्टी पाहिल्या असणे शक्य आहे.


हे वाचले का?

सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष

प्रास्ताविक:

एका वास्तवात अनेक सत्ये दडलेली असतात. प्रत्येकाच्या नजरेला दिसणारे, आकलनात येणारे सत्य निराळे. जीएंच्या कथा असोत वा कुरोसावाचा राशोमान हा सिनेमा, सत्याचे पापुद्रे संपता संपत नाहीत. म्हणूनच ओशोंसारखा एखादा योगी सत्याच्या पडताळणीचा जोरकस आग्रह लावून धरतो, तर जे. कृष्णमूर्ती ‘Truth is a pathless land’ असे म्हणून आपल्याला हतबुद्ध करतात. अशात सत्य नेमके कशाला म्हणायचे, कसे ते जाणायचे हा सनातन पेच काळागणिक अधिक गुंतागुंतीचा होत जातो. त्यावरचे हे विवेचन...
---

"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत! भंडारा कधी काळा, राखेसारखा असतो होय? तो असतो हळदीचा पिवळा जर्द."
"मग काय!, हा पिवळाच आहे की!" भुत्याने खवचटपणे हसून म्हटले.
"अरे, हा तर अगदी राखेसारखा काळाढुस्स आहे." रामण्णाने अगदी नेटाने स्पष्ट सांगितले.
"हे बघ पंडित, तू म्हणतोस हा काळा आहे, मी म्हणतो हा पिवळा आहे. म्हणजे हा भंडारा काळाही असेल, पिवळाही असेल, होय की नाही? पण तू अगदी छातीवर हात ठेवून तो काळाच आहे असं कसं सांगतोस? पाव्हण्या, जरा आजूबाजूला बघ, आहे आणखी कोणी तिसरं माणूस? तर नाही... अख्ख्या जगात तू आणि मीच आहो. तू एका बाजूला, मी एका बाजूला. तुझ्या बोलण्याला माझ्या बोलण्याची टक्कर! तेव्हा हा भंडारा काळाच आहे हे तू कोणाच्या साक्षीने ठरवणार? समज, इथं माझ्यासारखाच आणखी एक आंधळा माणूस आहे. त्याच्या साक्षीत मी ठरवलं की भंडारा पिवळाच आहे, म्हणून तेवढ्याने लगेच भंडारा पिवळा होऊन बसणार होय?
"मला डोळे आहेत बघायला, तुला तसलं काही नाही. एक तिरळा माणूसदेखील शंभर आंधळ्यांपेक्षा बराच म्हणायचा की!" रामण्णा आत्मविश्वासाने म्हणाला.
"असतील, असतील! तुला डोळे आहेत हे आताच दिसलं की!" हसू दाबत भुत्या म्हणाला. "परंतु तू रंगांधळा नाहीस कशावरून? आणखी तुझ्यामाझ्यापेक्षा निराळा असा एक चांगला शहाणा देवमाणूस आहे. त्याचे डोळे निराळेच आहेत. त्याला शंभर रंग दिसतात. तो तुला काय म्हणेल ठाऊक आहे? अरे वेडपटच आहे हे मेंढरू! या असल्या रंगाला हे काळा रंग म्हणत बसलंय! हुच्च! हा खरा रंग आहे अमुक, म्हणून तो एक नवीनच रंग सांगेल. आता सांग भंडार्‍याचा नक्की रंग कोणता?"
(१)
QuestionsAroundTruth

रोजच्या जगण्यात आपण 'सत्य' हा शब्द किती बेफिकीरीने वापरतो, नि अमुक एक गोष्ट 'सत्य आहे', ’खरं आहे’ असे किती सहजपणे नि ठामपणे म्हणतो. रामण्णाचे पहा ना. आपल्या डोळ्यांबरोबरच माहिती नि जाण यावर त्याचा अगदी ठाम विश्वास आहे. समोरच्या आंधळ्यापेक्षा डोळस असलेल्या आपल्याला रंग अधिक चांगले समजतात हे त्याचे गृहितक. दोन-चार वाक्यातच स्वत: आंधळ्या असलेल्या भुत्याने त्याचे भ्रम दूर केले आहेत.

मुळात काळा रंग नि पिवळा रंग म्हणजे काय, हा काळा नि तो पिवळा असे सर्वांना ते सारखेच दिसतात काय, त्याबाबत निश्चित विधान करू पाहणार्‍याच्या आकलनक्षमतेलाच मर्यादा असेल तर त्याचे मत गृहित धरावे का, एखादे विधान केवळ बहुसंख्येच्या निकषावर ’सत्य’ या संज्ञेला पात्र ठरते का, एखाद्याला अधिक सूक्ष्म जाण असेल तर त्याचे मत अधिक ग्राह्य की त्याच्या विरोधात जाणारे पण बहुसंख्येचे, असे प्रश्न निर्माण करत रामण्णाला खात्री असलेले साधेसोपे ’सत्य’ त्याने संशयाच्या आवर्तात नेऊन सोडले आहे.

एखादी गोष्ट ’सत्य आहे’, ’खरी आहे’ हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? त्यामागे विचार-अनुभव असतो की प्रेरणा-गृहितकाचाच अधिक प्रभाव असतो? आपण खरंच सत्यान्वेषी असतो की 'सत्य नावाचे काहीतरी आपल्याकडे असायला हवे किंवा आहे' या विचाराने भावनिकदृष्ट्या आश्वस्त होतो म्हणून आपण त्याबाबत आग्रह धरतो? जर सत्यान्वेषी असू तर आपले सत्य पडताळणीचे करण्याचे निकष कोणते असतात? त्यात अनुभव-विचार-विश्लेषण-पडताळणीचा मार्ग असतो की अन्य असंलग्न अशा घटकांचा आपल्या निर्णयावर परिणाम होतो? हे आणि असे अनेक प्रश्न सत्यशोधाच्या वाटेवर विचारले जायला हवेत, त्यांची उत्तरे शोधायला हवीत.

परंतु त्यापूर्वी सर्वसाधारणपणे सत्यनिश्चितीचे प्रचलित निकष काय हे पाहणे उपयुक्त ठरेल.

सत्य-निश्चितीचे प्रचलित निकष:

१. बरीचशी सत्ये स्वयंसिद्ध नि पडताळणीच्या/मूल्यमापनाच्या पलिकडची असतात असा समज असतो. कधीकाळी कोणीतरी अधिकारी समजल्या गेलेल्या व्यक्तींनी ती मांडलेली असतात आणि ती तशीच गृहित-सत्ये म्हणून स्वीकारायची असतात.

ओशोंनी अशा गृहित-सत्याचे एक उदाहरण दिले आहे. एकदा एक फादर प्रवचन देत होते. स्त्रियांबद्दल आपली भूमिका मांडताना ते म्हणाले "स्त्रियांना देवाने पुरूषांपेक्षा दुय्यम भूमिका दिली आहे. बघा ना, त्यांच्या तोंडात बत्तीसहून कमी दात असतात." यावर ओशोंनी ताबडतोब तिथल्या तिथेच त्या तथाकथित सत्याची पडताळणी करावी अशी मागणी केली. अर्थातच ’पाखंडी’ अशी संभावना करून ती फेटाळली गेली.(२) म्हणजे पडताळणी शक्य असेलच तरी पडताळून पाहण्याचे स्वातंत्र्य असेलच असे नाही.

२. आपला 'समज' हे आपण सत्य मानून चालतो. बरेचदा अमुक एक गोष्ट सत्य असावी असे आपल्याला वाटते तिला आपण सत्य मानून चालतो.

हे तर सत्यनिश्चितीचे सर्वाधिक प्रचलित रूप आहे. या प्रकारच्या सत्यांच्या(?) साठवणीस सारी पृथ्वी अपुरी पडावी इतके रांजण भरून ठेवलेले असतात. अमुक भागात राहणारे सगळे अमुक एका प्रकारच्या प्रवृत्तीचे असतात, अमुक शाळेतून, विद्यापीठातून वा संस्थेतून शिकलेले व्याख्येनुसारच इतरांपेक्षा हुशार असतात, अमक्या जातीचेच लोक डोक्याने हुशार असतात. धार्मिक, पारंपारिक बाबतीत असले समज अधिक आढळून येतात. आपला धर्म अमुक बाबतीत असे सांगतो वा असा आहे ’असा आपला समज असतो'. पण आपण तसेच 'आहे' असे ठासून सांगतो. अनेकदा धार्मिक म्हणवणारी मंडळी सांगतात त्याहून अगदी विपरीत असे सत्य वा विधान मूळ ग्रंथांमधून आढळून येते.

असाच काहीसा प्रकार आपल्या रोजगाराबाबत असतो वा अभ्यासक्रमाबाबत. आपल्या रोजगारातच किती कष्ट वा ताण असतात ’तुम्हाला काय कळणार ते’ असे अन्य कोणत्याही रोजगार करणार्‍याला सांगून आपण आपले स्थान उगाचच उंचावण्याचा प्रयत्न करतो, किंवा समोरच्याला लायकीहून अधिक वा त्याच्या श्रमाच्या वाजवी मूल्याहुन अधिक परतावा मिळतो असे ठसवू पाहतो. एंजिनियरिंगवाला तर आपलाच अभ्यासक्रम सर्वात अवघड आहे हे सांगतोच पण अन्य पदवी/शिक्षण घेणारा कोणीही - अगदी समाजशास्त्र, तत्त्वज्ञानापासून गणितापर्यंत कोणत्याही विषयात - आपलाच विषय शिकायला अवघड नि बाजारात ’मागणी’ असलेला आहे हे ठासून सांगत असतो. मुख्य म्हणजे या प्रकारात पडताळणी शक्य असून ते करण्याची इच्छा नसते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते गृहित-सत्य आपल्या स्वार्थाला अनुकूल असते.

अर्थात हे समज वा गृहित-सत्य नेहमीच स्वार्थप्रेरित असतील असेही नाही. अनेकदा निव्वळ पडताळणीच्या आळसामुळे म्हणा, अथवा प्रत्येक बाबतीत आपल्याला सत्य माहित असलेच पाहिजे, त्यावर आपल्याकडे मत असलेच पाहिजे या अट्टाहासातून म्हणा, किंवा निव्वळ ज्याला आपण प्राकृतात ’मतांच्या पिंका टाकणे’ म्हणतो तशा स्वभावामुळे अशी विधाने केली जातात.

आमच्या माजी बॉसने एकदा जेवणाच्या टेबलावर गप्पा चालू असताना बेदरकारपणे म्हटले,’...पण हल्ली हुंडा घेतो कोण?’ (थोडक्यात त्याच्या मते कोणीही घेत नाही वा क्वचित घेतला जातो.) मला धक्काच बसला होता. मी त्याला म्हटले "एक काम कर. या क्षणी इथे टेबलवर बसलेल्या विवाहित पुरूषांना - जे स्वत:ला समाजातील यशस्वी नि म्हणून श्रेष्ठ व्यक्ती समजतात - आपण विचारू या की त्यांनी हुंडा घेतला की नाही. आणि जे भविष्यात लग्नगाठ बांधणार आहेत त्यांना विचार की हुंडा घेणार नाही हे ते आज ठामपणे सांगू शकतात का?"

काही क्षण तिथे भयाण शांतता होती नि ती बोलकी होती. अर्थात नंतर ’सासर्‍याने गाडी देणे हा काही हुंडा नाही, आपल्याच मुलीच्या सुखासाठी त्यांनी दिले तर काय बिघडले’ वगैरे नेहमीचे तर्क सुरू झाले. पण त्यात कारणमीमांसेपेक्षा आत्मसमर्थनाचा भागच अधिक दिसून येत होता. पण हे असे ताबडतोब खोडून काढता येईल इतके गृहित-सत्य बहुधा सोपे वा पडताळणी-सहज नसते. असलेच तरी तशी संधी क्वचितच मिळते. किंबहुना अनेकदा निर्णायक पडताळणी - वा खंडन - शक्य होत नाही तिथेच अशा गृहित-सत्यांचे प्राबल्य अधिक असते.

३. ते तथाकथित सत्य सांगणार्‍याच्या विश्वासार्हतेबद्दल आपले मत जसे असेल त्यानुसार ते आपण सत्य अथवा असत्य 'मानतो'.

BillGatesHonoredInIndia
time.com येथून साभार.

ऑस्कर वाईल्डचा लॉर्ड हेन्री(३) म्हणतो "इंग्लिश माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तो ती गोष्ट विश्वासार्ह आहे का या पेक्षा ती सांगणारा विश्वासार्ह आहे का हे अधिक महत्त्वाचे मानतो." ही प्रवृत्ती खरेतर बहुतेक संस्कृतींमधील माणसांमधे आढळून येईल. आपल्याला विश्वासार्ह न वाटणार्‍या एखाद्या व्यक्तीने सांगितलेली एखादी गोष्ट आपण किती गांभीर्याने घेतो? ती सत्य आहे की नाही हे अजमावून पाहण्याइतपत महत्व तिला देतो, याबाबत ज्याने त्याने आपल्यापुरता विचार करून पहावा.

काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा कर्ताधर्ता बिल गेट्स भारतात आला होता. इथे असताना त्याने एक विधान केले होते की "भारतीय शिक्षण-पद्धती ही जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षण-पद्धती आहे." लोकांनी लगेच ’बघा बिल गेट्स पण म्हणतोय...’ म्हणत आपली पाठ थोपटून घ्यायला सुरूवात केली होती. आता बिल गेट्स म्हणतो म्हणून आपण लगेच मान्य करावे काय? थोडक्यात सांगणारा विश्वासार्ह आहे असे आपण समजतोय का? असल्यास उद्या बिल गेट्सनेच "भारतीय विद्यार्थी सर्वात आळशी असतात." असे विधान - पाठोपाठ वा स्वतंत्रपणे - केले असते तर ते ही आपण मान्य केले असते का? इथे साधा सोपा मुद्दा आहे, की हे सत्य ’असावे असे वाटते’ म्हणून आपण ते तसे आहे असे मानतो. बिल गेट्स हा निमित्तमात्र. त्याने असे म्हटले नसते तरी ते गृहित-सत्य आपण कवटाळून ठेवले असतेच.

याच्या नेमके उलट उदाहरण जीएंच्या ’कळसूत्र’(४) या कथेमधे दिसून येते. यातील गरुड जमातीचा नेता अखेर सत्य सांगून आपण आपल्या अनुचरांची केलेली प्रतारणा उघड करतो. "मी तुमच्या आधीच्या नेत्याच मुलगा नाही. पर्वतापलिकडे कोणताही सम्राट नाही, मला कोणतेही आदेश येत नव्हते, मी स्वत: कातडीबचाऊ वृत्तीने युद्ध करण्याचे टाळले, हा नि यासारखे इतर निर्णय सम्राटाच्या आदेशाने घेतले आहेत असे तुम्हाला खोटेच सांगितले होते."

वास्तविक इथे त्याने संपूर्ण सत्याचा उच्चार केला आहे. परंतु इतकी वर्षे त्याचा शब्द प्रमाण मानून जगणारे(!) त्याचे अनुचर आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. उलट प्राचीन सत्याचा अधिक्षेप केला याबद्दल त्यालाच दूषणे देतात, दंडित करतात. इथे जे ’असावे वाटते’ ते सत्य मानले जाते.

पर्वतापलिकडे एखादा सम्राट (हे देव संकल्पनेचे रूपकच आहे) असावा. ज्याने आमच्यावर पाखर घालावी आमच्या हित-अहिताची जपणूक करण्यासाठी वेळोवेळी नेत्याला आदेश देऊन आमची काळजी वाहावी ही इच्छाच गृहित-सत्याचे रूप घेऊन समोर येते. थोडक्यात सत्य मानताना देखील सोयीच्या सत्याला आपण अधिक प्राधान्य देतो. शिवाय जगातील सार्‍याच संस्कृतींमधे समान असलेला प्राचीनत्वाला, रुढीला सत्य समजण्याचा प्रघात इतर सार्‍या निकषांना बाजूला सारतो हाही एक महत्त्वाचा मुद्दा. यात ’सत्य हे कालातीत’ असते हे गृहितक, ते ही भ्रष्ट स्वरूपात - म्हणजे ’कालातीत ते सत्य’ या व्यत्यासाच्या स्वरुपात - वापरले जाते.

४. बहुसंख्य लोकांना अमुक एक गोष्ट सत्य आहे असे वाटते, म्हणून आपण ते सत्य मानतो.

KaajaLmaayaa

सत्य सिद्ध करताना बहुसंख्येचा निकष लावला जातो. तो कितपत ग्राह्य असावा? याच लेखाच्या सुरूवातीला दिलेल्या प्रसंगातील भुत्याने हा प्रश्न विचारलाच आहे. माझ्यासारखाच आणखी एक आंधळा इथे आहे नि आम्ही दोघे हा भंडारा पिवळाच आहे असे म्हटले, तर दोन विरुद्ध एक या न्यायाने तो पिवळा ठरतोच नि तुला ते मानावेच लागेल.

जीएंच्याच 'विदूषक'(५) या कथेमधे हंस आणि कावळ्यांचे एक उपकथानक आहे. बहुसंख्येच्या जोरावर केल्या जाणार्‍या सत्यापलापाचे इतके सुंदर उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. केवळ बहुसंख्येच्या जोरावर मानस सरोवर हे कावळ्यांचे आहे हे सिद्ध करणे, त्याहुन पुढे जाऊन बहुसंख्येने असलेले काळ्या रंगाचे पक्षी हेच हंस आहेत हे सिद्ध करणे, पर्यायाने ’मानस सरोवर हंसांचे’ या नियमाचा आधार घेऊन त्यावर हक्क प्रस्थापित करणे... हे सारे वरकरणी असत्य वाटणारे सारे सत्य म्हणून सिद्ध होते.

बहुसंख्येचा सत्यसिद्धतेसाठी होणारा वापर हा जीएंच्या अन्वेषणाचा लाडका विषय आहे. त्यांच्या ’यात्रिक’(६) मध्येही डॉन त्याला भेटलेल्या संन्याशाला विचारतो ’तुमचा धर्म सत्य होता म्हणून त्याला अनुयायी मिळाले की आधी तलवारीच्या जोरावर तो पसरला नि त्याच्या अनुयायांच्या बहुसंख्येवर तो सत्य ठरला?’

हा तर्क थोडा पुढे नेऊन एक प्रश्न विचारता येईल. समजा दोन परस्परविरोधी उमेदवार-सत्ये (candidate-truths) आपल्यासमोर आहेत नि बहुसंख्येच्या तत्त्वाचा वापर करून त्यातील एकाला दुसर्‍यापेक्षा ’एक मत’ अधिक मिळून ते सत्य सिद्ध झाले तर पुरेसे आहे का? उद्या या सत्याच्या एखाद्या पाठीराख्याने आपले मत बदलले नि दुसर्‍या उमेदवार-सत्याचा स्वीकार केला तर आता ते सत्य सिद्ध झाले ना? म्हणजे सत्य परिवर्तनीय असते का? बहुसंख्येने सत्य ठरवण्याच्या पद्धतीमधे हा अंतर्विरोध दिसून येतो.

शिवाय मुळात जे विधान अथवा सिद्धांत सत्य आहे की नाही याचे मूल्यमापन केले जाते, त्याला अनेकदा त्या विधानाच्या संदर्भातील विशिष्ट कौशल्याची, माहितीची व ज्ञानाची आवश्यकता असते. अशा कौशल्याचा अभाव अथवा आवश्यक माहिती व ज्ञानाबाबत पूर्णत: अनभिज्ञ असलेल्यांचे बहुमत सत्यान्वेषणास कुचकामी ठरते. आणि म्हणूनच अशा बहुमताचा निर्णय अग्राह्य ठरतो. विविध मिडीया चॅनेल्स नि संकेतस्थळावर बरेचदा अशाच प्रकारचे तथाकथित सर्वे घेतलेले दिसून येतात.

५. बहुसंख्येला अमुक एक सत्य आहे असे वाटते असा आपला समज असतो म्हणून आपण ते सत्य मानतो.

इथे पुन्हा एकदा वर दिले्ल्या हुंड्याबद्दलच्या भाष्याचेच उदाहरण घेऊ.'आजच्या समाजात बहुसंख्येला हुंडा घेणे अयोग्य वाटते नि म्हणून आता ती पद्धत काहीशी कालबाह्य झालेली आहे' असा आमच्या बॉसचा समज आहे नि तो त्याच्या दृष्टीने सत्याचे रूप घेऊन बसला आहे. ज्यांच्याबाबत तो समज खरा असण्याची शक्यता बहुसंख्येच्या तुलनेत अधिक होती, अशा त्याच्या समोरच असलेल्या एक-दोन व्यक्तींच्या प्रतिसादातून तो केवळ समजच असल्याचे दिसून आले.

कदाचित एखाद्या समाजघटकात, वा भूभागावर (शहरीभागात?) हे अंशत: का होईना पण सत्य असेलही. पण म्हणून हे विधान सार्‍या समाजाला लागू होत नाही. अशा वेळी सत्याची व्याप्ती निश्चित करावी लागते. कालसापेक्षता, स्थलसापेक्षता, व्यवस्था-सापेक्षता आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे व्यक्तिसापेक्षता हा निश्चित विधानाचा, सत्याचा महत्त्वाचा पैलू असतो.

सत्यग्राह्यतेचे विविध निकष अथवा पद्धती आपण पाहिल्या. पण मुळात अन्वेषणाला आवश्यक असलेले ज्ञान, माहिती, पुरावे आपल्याला जमा करावे लागतात, ते तपासून पहावे लागतात. त्यासाठी त्यासंबंधी पुराव्यांचे संकलन, आकलन नि विश्लेषण आवश्यक ठरते.

(क्रमश:)

- oOo -

    पुढील भाग >> स्वरूप, दर्शन व आकलन

संदर्भ:

१. कथा: ठिपका - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
२. 'बंडखोर' या प्रवचनसंग्रहातून
३. 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' या 'ऑस्कर वाईल्ड'लिखित बहुचर्चित कादंबरीतील एक प्रमुख पात्र. (हा खुद्द ऑस्करचा alter-ego मानला जातो.)
४. कथा: कळसूत्र - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
५. कथा: विदूषक - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
६. कथा: यात्रिक - ले. जी.ए. कुलकर्णी (संग्रहः पिंगळावेळ)

या कथेमध्ये जीएंनी सर्वांतिसच्या डॉन क्विक्झोटला ख्रिस्त, बुद्ध यांसारख्या प्रेषितांच्या, इतिहासातील सर्वात मोठा दगाबाज मानल्या गेलेल्या ज्युडाससारख्या ऐतिहासिक पात्रांसमोर आणून उभे केले आहे. त्या निमित्ताने ’अंतिम सत्य’, धर्म वगैरे संकल्पनांची चिकित्सा केली आहे. विशेषत: यातील ’अंतिम सत्य’ या संकल्पनेबाबत डॉनने विचारलेले प्रश्न मार्मिक आहेत.

७. प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा याने दिग्दर्शित केलेला ’राशोमोन’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. रुनोसुको अकुतागावा या लेखकाच्या दोन छोटेखानी कथांची वीण त्याने अशी घातली, की त्यातून एक अजोड चित्रशिल्प साकार झाले. त्या चित्रपटावर आस्वादक मालिका लिहिताना वाचकाची मनोभूमिका तयार करण्यासाठी एक उपोद्घात-स्वरूप एक प्रकरण लिहिले होते. त्याचा विस्तार करुन सविस्तर मांडणी केलेला हा लेख ’मुक्त-संवाद’ या नियतकालिकाच्या २०२२ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.

जंगलवाटांवरचे कवडसे’ ही ’राशोमोन’वरील मालिका याच ब्लॉगवर वाचता येईल.

---

संबंधित लेखन:

द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च
बिम्मच्या पतंगावरून - ३ : प्रतिबिंबांचा प्रश्न


हे वाचले का?

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे

१९९२ मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेमध्ये उपान्त्य सामन्यामध्ये द. आफ्रिका इंग्लंडशी खेळत होती. वंशभेदी धोरणांमुळे सुमारे बावीस वर्षे क्रिकेट जगतातून बाहेर ठेवल्यानंतर १९९१ मध्ये त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सामावून घेतले गेले होते. उपान्त्य सामन्यामध्ये पोचण्यापूर्वी त्यांनी पाच सामने जिंकून- त्यातही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन- आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

ही विश्वचषक स्पर्धा- त्याकाळात ज्याला एकदिवसीय सामना म्हटले जाई तशा सामन्यांची असे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक डाव खेळायला मिळे आणि जो संघ अधिक धावा करेल, तो विजयी होत असे. परंतु या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मध्यांतराच्या वेळेपर्यंत इंग्लंडला ४५ षटकेच खेळायला मिळाली. त्यांत त्यांनी २५२ धावा केल्या. उत्तरादाखल दुसरा डाव खेळताना द. आफ्रिकेने अगदी सहज खेळ केला. पण ४२ षटके आणि पाच चेंडूंचा खेळ झालेला असताना पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. वाया गेलेला नि खेळासाठी शिल्लक राहिलेला वेळ विचारात घेता या डावातील षटकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पुढे जाण्यापूर्वी क्रिकेट आणि फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी वा तत्सम अन्य लोकप्रिय आंतरराष्ट्रीय खेळांमधला फरक अधोरेखित करुन ठेवू या. अन्य खेळांमध्ये प्रत्येक खेळाडू नियमानुसार खेळला तर (किंवा संघाने बदली खेळाडू उतरवला नाही तर) सामन्यात संपूर्ण वेळ खेळू शकतो. क्रिकेटप्रमाणे ’खेळाडू बाद होणे’ हा प्रकार त्यात नसतो. त्यामुळे दोन्ही संघांचे खेळाडू सारख्याच संख्येने मैदानावर असतात, तेवढाच वेळ नि बव्हंशी एकाच कौशल्याचा खेळ खेळत असतात. याचा अर्थ संधीचा विचार केला तर दोनही संघांना नेहमीच सारखी संधी मिळत असते.. क्रिकेटखेरीज बहुधा केवळ बेसबॉल हा एकच खेळ असा असावा ज्यात दोन संघ एका डावात एकच कौशल्य वापरत असतात. या दोन्हींमध्ये प्रत्येक संघ फलंदाजी आणि गोलंदाजी (बेसबॉल/ सॉफ्टबॉलमध्ये ’पिचिंग’) असे वेगवेगळे डाव आलटून-पालटून खेळत असतात. बाकी फुटबॉल वगैरे खेळांत असा बाजूबदल नसतो.

क्रिकेटशी तुलना करता बेसबॉलसह बहुतेक खेळांच्या सामन्याचा एकुण वेळ मोजक्या तासांचाच असतो. त्यामुळे पावसाचा व्यत्यय आला तरी पाऊस थांबल्यावर उरलेला वेळ भरुन काढणे शक्य असते. क्रिकेटचा एकदिवसीय सामना हा इतर कोणत्याही प्रचलित खेळापेक्षा दीर्घकाळ खेळला जातो. प्रत्येकी चार तासांचे दोन डाव असा अंदाजे आठ तासांचा खेळ होत असतो. जवळजवळ संपूर्ण दिवसच खेळ होत असल्याने वाया गेलेला वेळ भरून काढण्याइतका वेळ सामन्यानंतर शिल्लक राहील याची शक्यता फारच कमी उरते.

त्यात जर दुसरा डाव पहिल्यापेक्षा कमी वेळेचा अशी स्थिती निर्माण झाली, तर खेळाचा समतोल बिघडतो. त्यामुळे दुसर्‍या डावातील संधीच्या प्रमाणात पहिल्या डावातील कामगिरीतही काटछाट करणे अपरिहार्य होऊन बसते. क्रिकेटमध्ये षटकांच्या मोजमापात खेळ होत असतो. त्यामुळे जेवढी षटके दुसर्‍या डावात खेळणे शक्य आहे, तितकीच पहिल्या डावात खेळली गेली असती तर पहिल्या संघाची कामगिरी काय असावी याचे गणित करावे लागते. त्यानुसार त्या संघालाही मागाहून खेळणार्‍या संघाला मिळणार्‍या संधीच्या पातळीवर आणावे लागते.

वर उल्लेख केलेल्या विश्वचषक उपान्त्य सामन्याच्या काळात हे गणित दोन प्रकारे केले जात असे. पहिले म्हणजे त्या पहिल्या डावातील एकुण धावांची सरासरी काढून जेवढी षटके कमी झाली त्यातून त्या सरासरीनुसार धावा कमी केल्या जात, आणि ते नवे लक्ष्य पुढच्या संघाला विजयासाठी दिले जाई. सरासरी हा शब्द असल्याने वरवर पाहता हा न्याय्य नियम वाटू शकेल. पण वास्तविक हा नियम प्रथम खेळलेल्या संघावर अन्याय करणारा आहे.

यात मागाहून खेळणार्‍या संघाला पहिल्यापासून एका निश्चित सरासरीने खेळता येते. पाऊस पडल्यामुळेही त्यात काही बदल होत नाही. षटके कमी झाल्याचा उलट त्यांना फायदाच मिळतो. कारण षटके कमी झाली, तरी तेवढेच खेळाडू खेळत असल्याने त्यांना अधिक धोका पत्करण्याची संधी मिळते. उलट प्रथम खेळलेल्या त्यांच्या दहा खेळाडूंना पन्नास षटके खेळण्याचे नियोजन करावे लागत असल्याने धोका पत्करण्याची क्षमता सुरुवातीला कमी असते. (फुटबॉल वगैरे खेळांत खेळाडू बाद होणे हा प्रकारच नसल्याने ही शक्यताच निर्माण होत नाही. दोन्ही संघ सारख्याच पातळीवर खेळत असतात.)

याबाबत दुसरा नियम होता तो केवळ ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये वापरला जात असे. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होत असल्याने त्यातही हाच नियम लागू करण्यात आला होता. त्यानुसार दुसरा डाव चालू असताना पाऊस आला, तर जेवढी षटके कमी करावी लागतील, तेवढीच षटके पहिल्या डावातूनही कमी करावीत. पण सरासरीचा नियम न वापरता पहिल्या डावात सर्वात कमी धावा झालेली षटके आधी वगळावीत असा नियम होता. हा पहिल्या डावात खेळलेल्या संघाला न्याय देण्याचा थोडा प्रयत्न होता.

यामागचा तर्क असा की आता षटके कमी झाल्यामुळे दुसरा डाव खेळणार्‍या संघाला कमी षटके खेळण्यासाठी तेवढेच फलंदाज शिल्लक आहेत. थोडक्यात त्यांची धोका पत्करण्याची क्षमता अनायासे वाढली आहे. त्यामुळे पारडे समतोल करण्यासाठी पहिला डाव खेळलेल्या संघाला झुकते माप मिळायला हवे. त्यादृष्टीने हे उद्दिष्ट योग्यच होते. फक्त या उपान्त्य सामन्यात त्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या सामन्यांत द. आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात पावसाचा व्यत्यय आला, तेव्हा आफ्रिकेला विजयासाठी १३ चेंडूंत २२ धावा आवश्यक होत्या. पाऊस थांबला तेव्हा उरलेल्या वेळेचे गणित करुन दोन षटके कमी करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी इंग्लंडच्या डावातून कमीत कमी धावा झालेली दोन षटके वगळण्यात येणार होती.

GoochAndMcMillan
विजयी(?) इंग्लंडचा कर्णधार ग्रॅहम गूच आणि नाबाद आफ्रिकन फलंदाज ब्रायन मॅकमिलन.

इंग्लंडच्या डावामध्ये द. आफ्रिकेच्या मेरिक प्रिंगल याने दोन षटके निर्धाव टाकली होती. ती वगळल्यामुळे इंग्लंडच्या एकुण धावांमधून एकही धाव कमी झाली नाही. परिणामी राहिलेल्या एकाच चेंडूमध्ये २२ धावा काढण्याचे अशक्यप्राय आव्हान आफ्रिकेला देण्यात आले. थोडक्यात पाऊस येण्यापूर्वी शक्यतेच्या पातळीवर असलेला आफ्रिकेचा मध्ये आलेल्या पावसाने अशक्य होऊन बसला होता.

वर म्हटले तसे, वास्तविक हा नवा नियम सरासरी नियमापेक्षा अधिक समतोल होता. तरीही हे असे का झाले? याचे कारण असे की हे दोनही नियम तसे सरधोपट आहेत. क्रिकेटसारख्या गुंतागुंतीच्या खेळातील फलंदाजी, गोलंदाजी या दोनही क्षेत्रांतील बर्‍याच शक्यतांचा विचार ते करत नाहीत.

इथलेच उदाहरण पाहिले तर, एखादे षटक निर्धाव खेळले जाणे हे फलंदाजाने धोका न पत्करल्याचे निदर्शक असेल, तसेच ते गोलंदाजाने उत्तम गोलंदाजी केल्याचेही असू शकेल. त्यामुळे त्या निर्धाव षटकांचा फायदा इंग्लंडला देताना ती निर्धाव षटके टाकणार्‍या प्रिंगलवर अन्याय झाला होता. वास्तविक इतर सर्व गोलंदाज प्रति-षटक सरासरी पाचहून अधिक धावा देत असताना, प्रिंगलने दोन षटके निर्धाव टाकतानाच जेमतेम चारच्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्याने इतर गोलंदाजांहून सरस कामगिरी केली होती. ज्याचा त्याच्या संघाला उलट तोटाच झाला.

क्रिकेटचा सामना ५० षटकांचा आहे की २० षटकांचा आहे की पाच दिवसांचा यावरुन फलंदाज नि गोलंदाजांचे खेळाचे नियोजन असते. ५० षटकांच्या सामन्यात पुरी षटके फलंदाजी व्हावी, ती पुरेपूर वापरली जावीत याचे नियोजन केले जात असते. त्यातून शक्य असलेल्या धोका पत्करुन ज्या वेगाने खेळाडू खेळू शकतील, त्याहून २० वा ३० षटकांमध्ये खेळताना, फलंदाजांची संख्या तेवढीच असल्याने, अधिक धोका पत्करू शकतात. त्यामुळे अधिक वेगाने धावा करण्याची संधी त्यांना मिळत असते. त्यामुळे सुरुवात ५० षटकांचा डाव गृहित धरुन केली, पण पावसासारख्या कारणाने एखादा डाव मध्ये कमी झाला, की तो खेळणार्‍यांचे नियोजन - त्यांची चूक नसता- बिघडते.

याउलट नंतर खेळणार्‍या संघाला किती धावा करायच्या, नि किती षटकात याचे नेमके लक्ष्य आधीच मिळते. त्यामुळे फलंदाजीतील क्रमवारी बदलण्यापासून अनेक फायदे त्यांना घेता येतात. पण फायदा केवळ नंतर फलंदाजी करणार्‍या संघालाच होतो असेही नाही. गोलंदाजी करणार्‍या संघालाही होऊ शकतो. अशा एकदिवसीय सामन्यांत पन्नास षटकांपैकी 'जास्तीत जास्त दहा षटके (वीस टक्के) एका गोलंदाजाला दिली जाऊ शकतात' असा नियम आहे. दुसर्‍या डावात पावसाचा व्यत्यय आल्याने षटके कमी झाली, तर ही संख्याही कमी व्हायला हवी. पण पंचाईत अशी, की पाऊस येण्यापूर्वीच एखाद्या गोलंदाजाने आपली दहा षटके पुरी केली असणेही शक्य आहे. त्याचे काय करायचे?

त्याची जास्तीची षटके धावफलकातून (scorecard) रद्द करायची? आणि तसे केले तर मग त्या षटकांत काढल्या गेलेल्या धावांचे काय? त्या ही फलंदाजांच्या धावांमधून वजा करायच्या? त्याहून वाईट म्हणजे त्या रद्द केलेल्या षटकांमध्ये बाद झालेल्या फलंदाजांचे काय करायचे? त्यांना खेळायला परत बोलवायचे? तसे असेल तर नंतर इतर गोलंदाजांची षटके यांना खेळायला मिळालेली नव्हती ती परत टाकायची? पण मग त्यातून सामना लांबेल त्याचे काय?...

की त्याबाबत काहीच न करता त्यातील धावाच तेवढ्या वगळायच्या? तसे असेल तर पावसाची चिन्हे दिसत असेल तर दुसर्‍या डावात गोलंदाजी करणार्‍या संघाचा कर्णधार आपल्या हुकमी गोलंदाजांची षटके आधी पुरी करुन घेऊ शकतो. (हीच संधी पहिल्या डावातही घेता येईल.) जेणेकरुन प्रतिस्पर्धी संघाला अवघड षटके अधिक खेळावी लागतील.

पण यात एक धोकाही आहे. कारण पाऊस आलाच नाही, तर दुय्यम गोलंदाजांना शेवटाकडे अधिक गोलंदाजी करावी लागेल नि फलंदाजी करणारा संघ शिल्लक फलंदाजांच्या संख्येनुसार अधिक धोका पत्करुन त्याचा फायदा करुन घेऊ शकतील. पण हल्ली हवामानाचे अंदाज बरेचसे अचूक ठरत असल्याने तो धोका पत्करणे सहज शक्य होते.

हे सारे विवेचन सामन्यातील ’पहिल्या डावात पावसाने पुरा खेळ झाला नाही तर’ या एकाच शक्यतेभोवती फिरते. या पलिकडे मुळात पहिला डाव पुरा हौन दुसरा डाव सुरु होण्यासच उशीर झाला, किंवा तो ही सुरू होऊन मध्येच व्यत्यय आला किंवा व्यत्ययानंतर खेळच झाला नाही .... अशा आणखी शक्यता आहेत. प्रत्येक वेळी दोन्ही संघांना समान संधीच्या पातळीवर आणण्याची पद्धत वेगवेगळी असणार आहे.

गोळाबेरीज सांगायची तर खेळादरम्यान अशा अनेक शक्यता उद्भवतात. त्या प्रत्येकीचा फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर होणारा परिणाम जोखता आला पाहिजे, त्यानंतर त्यांचा धावांच्या स्वरूपात रूपांतरित करता आले पाहिजे. गणित करता आले पाहिजे. विविध शक्यता (possibilities) आणि त्यांच्या संभाव्यता (probabilities) मांडणे, त्यांचे धावांच्या रूपात मूल्य काढणे आणि ते सारे एकत्रितरित्या वापरून सुधारित लक्ष्य देणे हे आव्हानात्मक होते. यासाठीची सुधारित नियमावली फ्रॅंक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन शक्यताविज्ञानाच्या अभ्यासकांनी तयार केली आणि पुढे प्रा. स्टर्न यांनी त्यात भर घातली.

त्यांनी डावाच्या प्रत्येक टप्प्यावर दोन्ही संघांना उपलब्ध असणारी खेळाची 'मानवी सामुग्री' (resources) मोजून, त्यानुसार प्रत्येक संघ समान संधीच्या पातळीवर असण्यासाठी किती धावा असायला हव्यात त्याचे गणित मांडले. या ’सामुग्री’मध्ये गोलंदाजांची उपलब्ध षटके आणि फलंदाजीस उपलब्ध असणार्‍या खेळाडूंची संख्या यांचा समावेश होता. पुढचे गणित जरी समजून घेतले नाही, तरी त्यामागचा दृष्टिकोन समजून घेतला तरी त्याबद्दल अज्ञानमूलक शेरबाजी करणे टाळता येईल.

पण स्वत:च्या अस्मिता, अहंकार नि गटाच्या सोयीच्या इतिहासाच्या आवृत्त्यांमध्ये रमलेल्या भूतकालभोगी नि पाठांतरप्रधान भारतीय समाजात गणित हा विषय मुळातच आधी नावडता असतो. त्यातच असा शक्यतांचा विचार करणे ही काळे-पांढरे, चांगले-वाईट, देव-सैतान अशा द्विदल भूमिकाच घेऊ शकणार्‍या मेंदूंना शिक्षाच असते. जे आपल्याला समजत नाही ते मुळातच वाईट, चुकीचे वा घातक असते हा सोपा निवाडा बहुसंख्य निवडत असतात. त्याला अनुसरून ’डकवर्थ-लुईस नियमावली ही एक चेटकी आहे आणि पावसाने वा अन्य कारणाने वेळ वाया गेला की तिची ताकद वाढून ती एका संघावर हल्ला करते.’ असा काहीसा सार्वजनिक समज आहे.

माध्यमे हाती असलेले त्याच समाजातून येत असल्याने त्यांची स्थितीही वेगळी नाही. एवढेच नव्हे तर ’आधीच मर्कट...’ तशी त्यांची गत असते. माध्यमे हाती असल्याने ’आपण लिहू ते सत्य’ अशी काहीशी त्यांची धारणा असते. त्यातच ’नफा हेच सर्वस्व’ मानणार्‍या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये या मर्कटाला वृश्चिकदंशही झाल्याने त्यांच्या लीला अगाध असतात. आता हेच उदाहरण पाहा.

DuckworthLewis

नुकताच म्हणजे २७ जुलै २०२२ या दिवशी वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन’च्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात असाच प्रत्येकी ५० षटकांचा सामना खेळला गेला. भारत पहिला डाव खेळत असताना वारंवार पावसाचा व्यत्यय येत होता. अखेर या डावात भारताला ३६ षटकेच फलंदाजी करता आली. त्यांत भारताने ३ गडी गमावून २२५ धावा केल्या. षटके कमी केल्यामुळे दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या वेस्ट इंडिजसाठी डकवर्थ-लुईस नियमानुसार २५८ धावांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.

२५८ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव जेमतेम २६ षटकांत १३६ धावांतच संपुष्टात आला. म्हणजे सुधारित लक्ष्य तर सोडाच, पण भारताने केलेल्या २२५ धावांच्या जवळपासही तो संघ पोहोचू शकला नव्हता. भारताच्या केवळ पाच फलंदाजांनी मिळून केलेल्या धावा वेस्ट इंडिजच्या अकरा जणांनाही करता आल्या नव्हत्या. त्यांना पुरी छत्तीस षटके फलंदाजीही करता आलेली नव्हती, तब्बल दहा षटके शिल्लक असतानाच त्यांचा डाव संपला होता. क्रिकेटच्या इतिहासात ज्यांना दणदणीत म्हणावेत असे जे विजय असतात त्यातील हा एक. पण दुसर्‍या दिवशी लोकसत्ता’च्या पोर्टलवर (कदाचित छापील वृत्तपत्रातही) या बातमीचे शीर्षक होते....डकवर्थ-लुईस नियमाने केला यजमानांचा घात.’

'घात करणे’ याचा अर्थच मुळी ते कारण नसते तर ज्याचा घात झाला आहे त्याची परिस्थिती वेगळी/चांगली असती, त्याला वा तिला यश मिळण्याची शक्यता असती किंवा असलेली वाढली असती असा असतो. डकवर्थ-लुईस नियम नसता, तरीही इथे वेस्ट-इंडिजचा दारुण पराभवच झालेला आहे. एकवेळ वेस्ट-इंडिजने २२५ हून जास्त पण २५७ हून कमी धावा केल्याने ते पराभूत झाले असते तर ’कदाचित’ हे शीर्षक देता आले असते. माझ्या मते तरीही ते चूकच ठरले असते. पण एखाद्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाचा वापर झाला, की अशा वृत्त-जुळार्‍यांच्या जगात त्याच्या बातमीच्या शीर्षकात त्याचा उल्लेख अपरिहार्य असतो. शास्त्र असते ते.

सामन्याच्या धावफलकाकडे पाहिले तर ९८ धावांवर नाबाद राहिल्याने शतक हुकलेल्या शुबमन गिलचा घात झाला आहे. पुरी पन्नास षटके सोडा, अजून एखादे षटक खेळायची संधी मिळाली असती तरी त्याला तो टप्पा पार करता आला असता. पण तो डकवर्थ-लुईस नियमाने नव्हे तर पावसाने केला आहे. १९९२ च्या त्या उपान्त्य सामन्यात त्यावेळच्या त्या जुन्या नियमाने मेरिक प्रिंगलचा घात केला आहे. कारण त्या नियमामुळे त्याने केलेली उत्कृष्ट गोलंदाजी संघाला हितकारक ठरण्याऐवजी अपायकारक ठरल्यामुळे तो नायक ठरण्याऐवजी खलनायक ठरला आहे.

डकवर्थ-लुईस नियम ही शिक्षा नव्हे. ती वस्तुनिष्ठ मूल्यांकनातून गणित करणारी नियमावली आहे. २०१० मधले १०० रुपये नि आजचे १०० रुपये यांचे मूल्य एकसमान नसते. मधल्या काळात परिस्थिती बदलते, महागाई वाढते, आंतरराष्ट्रीय बाजारामुळे रुपयाचे मूल्य कमी-जास्त होते. त्यातून त्याच शंभर रुपयात किती टक्के जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात याचे गणित बदलते. त्यामुळे वेतन/श्रममूल्यही बदलावे लागते. या बदलाची व्याप्ती २०१०-२०२२ या दरम्यान जितकी असेल त्यापेक्षा २०२०-२०२२ या दोनच वर्षांच्या टप्प्यात कमी असेल. हे समजत असेल तर बर्‍यापैकी विचार करु शकणार्‍याला डकवर्थ-लुईस नियमावली मागचे धोरण समजण्यास अवघड जाऊ नये.

या भारत-वेस्ट इंडिज सामन्यात झाले तसे प्रथम फलंदाजी केलेल्या संघाने ’प्रत्यक्षात केलेल्या धावांपेक्षा त्यांनी अधिक धावा केल्या असत्या’ हे संभाव्यतेचे गणित बहुतेकांच्या पचनी पडत नाही. अशा स्थितीत मागाहून फलंदाजी करणार्‍या संघावर अन्याय केला जातो आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. याचे कारण आपण त्या संघाला नाकारल्या गेलेल्या संधींचा विचार केलेला नसतो. याच सामन्याच्या धावफलकाकडे पाहिले तर भारताचे फक्त पाचच फलंदाज मैदानावर उतरू शकले होते. सुरुवातीलाच सामना ३६ षटकांचा आहे असे ठाऊक असते, (जसे वेस्ट इंडिजला दुसर्‍या डावात ठाऊक होते) तर हेच पाच फलंदाज अधिक धोका पत्करून अधिक धावा जमवण्याचा प्रयत्न करु शकले असते. त्यातून २२५ हून अधिक धावा जमवणे शक्य होते.

पण इथे बाद झालेल्या खेळाडूंचा विचारही करायला हवा. भारताचे तीन फलंदाज बाद न होता, सहा फलंदाज बाद झाले असते गणित वेगळे झाले असते. कारण शिल्लक सहा फलंदाज उरलेल्या १४ षटकांत जितका धोका पत्करुन खेळू शकले असते तितके शिल्लक तीन फलंदाज खेळू शकले नसते. तीन अधिक बळी घेतल्याचे श्रेय मिळून वेस्ट इंडिजचे सुधारित लक्ष्य २४२ धावांचे म्हणजे २५८ हून बरेच कमी असते. वेस्ट इंडिजने भारताचे अनुक्रमे आठ किंवा नऊ फलंदाज बाद केले असते तर हेच लक्ष्य २११ आणि १९३ म्हणजे भारताने केलेल्या एकुण धावांहून कमी असते! (प्रत्यक्ष सामन्यात हे १९३ धावांचे लक्ष्यदेखील वेस्ट इंडिजला पार करता आलेले नाही!) म्हणजे हा नियम केवळ एकाच बाजूला फायदेशीर ठरतो असे नाही.पण इतके समजून घेण्याची तसदी कोण घेतो.

बातमीबार पोर्टल्सचा आलेला महापूर, क्लिकवर आधारित उत्पन्न, सतत नव्या बातम्या वा पोस्टची खायखाय... या लोंढ्यामध्ये पत्रकार केव्हाच मेले, बातमीदारही अस्तंगत होत आहेत. आता हे बसल्याबसल्या संगणकावर बातम्यांची जुळणी करणारे जुळारी (compositor) उरले आहेत. सनसनाटीकरण, वैय्यक्तिक अज्ञान, ते जाहीर करण्याची खुमखुमी, एका बातमीच्या चार बातम्या खरडण्याचे कौशल्य... या अलिकडे बातमी-जुळार्‍यांसाठी अर्हता (eligibility) असाव्यात.

एका वृत्तपत्राच्या पोर्टलवरचे एक क्रीडावृत्त-जुळारी प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी आज कुणाला डच्चू मिळणार याचे भाकित नव्हे, निर्णय जाहीर करत असतात. पण त्यांचा हा अभ्यासू निर्णय न जुमानता दुष्ट भारतीय कर्णधार भलत्याच कुणाला डच्चू देतात, किंवा मागचाच संघ कायम ठेवतात. पण त्यांना वा त्यांच्या वृत्तपत्र-पोर्टलला त्याने काही फ़रक पडत नाही. कारण दरम्यानच्या काळात क्लिकार्थ साधून त्यांच्या वृत्तपत्र-पोर्टलने आपला खिसा भरुन घेतलेला असतो. मैदानावर वा पॅव्हेलियन वा डग-आऊटमध्ये कुणाची कणभर तीव्र प्रतिक्रिया दिसली, वा कुणी मतभेद व्यक्त करताना दिसले, की हे महाशय त्याची भलीमोठी बातमी करतात नि शीर्षकातच त्यांचा फार लाडका शब्द ’राडा’ वापरून पुन्हा क्लिकार्थ साधतात. बातमीच्या शीर्षकात डकवर्थ-लुईस नामक चेटकीचा उल्लेख हा ही असाच वाचकाने क्लिक करावे म्हणून लावलेला सापळा असतो. ’नफा हेच मुख्य नि अंतिम उद्दिष्ट आणि क्लिकार्थ हे साध्य' मानणार्‍यांच्या अहमहमिकेमध्ये माध्यमांची विश्वासार्हता लयाला जाणे हे ओघाने आलेच.

बहुतेक सार्‍या शक्यता विचारात घेऊन शक्यताविज्ञान (Statistics) नियम बनवत असते. केवळ चार ओळी लिहिता येतात म्हणून वाटेल ते खरडणार्‍या या बातमी-जुळार्‍यांसारखे मन:पूत निवाडे देणे त्याला परवडत नाही. ज्यांना त्यातील काही कळत नाही, शक्यतांची भाषाच समजत नाही, अशा अडाण्यांनी कितीही आगपाखड केली तरी जगण्यातले बहुतेक सारे हे त्या नियमांच्या आधारेच सुरळित चालत असते.

- oOo -

१. डकवर्थ-लुईस-स्टर्न लक्ष्याचे गणित https://www.omnicalculator.com/sports/duckworth-lewis येथून साभार.

२. बातमीबार पोर्टल्स = बातमीचे बार काढणारी पोर्टल्स

३. क्लिकार्थ - वाचकाने क्लिक(click) करण्यातून मिळालेले अप्रत्यक्ष उत्पन्न.

---

संबंधित लेखन:

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
बा कपिल देवा
क्रिकेट आणि टीकाकार


हे वाचले का?

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

अर्थ-साक्षरता - २ : उत्पन्न आणि खर्च

अर्थ-साक्षरता - १ : अर्थ-साक्षरता आणि मी << मागील भाग
---

उत्पन्नाचे नियोजन करता येत नाही, खर्चाचे करता येते.

उत्पन्न आणि खर्च

दरमहा उत्पन्न किती हाती यावे याचे नियोजन फार थोड्या व्यक्तींना करता येते. मासिक अथवा त्रैमासिक व्याज देणार्‍या मुदत-ठेवी, म्युच्वल फंडांच्या अथवा पोस्टाच्या ’मासिक परतावा योजना’ अथवा मालकीच्या घरांवरील ’रिव्हर्स मॉर्टगेज’सारख्या योजनांमधून नेमकी रक्कम दरमहा हाती पडेल अशी सोय करुन ठेवता येते.पण हा निवृत्तीनंतरचा विचार झाला, तोवर बचत आणि गुंतवणुकीचा विचार बव्हंशी कालबाह्य झालेला असतो.

एरवी फारतर वेतनधारी मंडळींना दरमहा किती रक्कम हाती पडेल हे ठाऊक असते, ’किती पडावी’ यावर त्यांचेही फार नियंत्रण नसते. व्यावसायिक मंडळींना तेही शक्य नसते. तेव्हा आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा हा ’सरासरी मासिक उत्पन्नाचा अदमास घेणे’ हा असायला हवा. कारण हाती पैसा किती येणार याचा ठोकताळा नसेल, तर त्यातून होणार्‍या खर्चाचे नि बचतीचे नियोजन शक्यच नसते.

ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आयुष्याच्या सुरुवातीला बळकट असतो (उदा. खेळाडू, अभिनेते), त्यांची जीवनशैली अधिक खर्चिक बनून राहते. पण काळ पुढे जाईल तसा बहुतेकांचा उत्पन्नाचा प्रवाह आटत जातो. अशा व्यक्तींना काळाबरोबर जीवनशैलीमध्ये खर्चिकपणावर नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक असते. विशेषत: वाढत्या वयाबरोबर आरोग्याशी संबंधिक खर्चांची वाढ होत जाते, तसतसे इतर खर्चांवर लगाम लावण्याची गरज निर्माण होत असते. काहींना हे साधत नाही आणि त्यांच्या उत्तर-आयुष्यात परवड होत जाते.

IncomeAndSpending

या अनिश्चिततेवर एक सोपा तोडगा म्हणजे असे बरेच लोक बहुधा पैसे आल्यावरच खर्च वा बचतीचा विचार करतात. हे ’Don't count your chicken before they hatch’ धोरण वर्तमानाला सोयीचे असले, तरी भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेलच असे नाही. कारण यात भविष्याचा विचार केवळ वर्तमान उत्पन्नाच्या आधारेच केला जात असतो. त्याकाळची संभाव्य परिस्थिती आणि गरजा यांचा विचार यात करता येत नाही, केला तरी तात्कालिक असतो आणि भविष्यातील परिस्थिती बदलली की कालबाह्य ठरतो.

बरेच खेळाडू, सैन्यदलामध्ये सेवा करणारे लोक हे त्यांच्या मुख्य कार्यक्षेत्रातून फार लवकर निवृत्त होतात. अभिनयाच्या क्षेत्रातही अनेक कलाकार फार लवकर बाजूला पडतात किंवा त्यांना मिळणार्‍या कामाची वारंवारता नि मोबदला घटत जातो. या सार्‍यांना त्यानंतरचा प्रवास हा त्या सर्वाधिक कार्यक्षम काळात कमावलेल्या आर्थिक बळाच्या आधारेच करावा लागत असतो.

त्यातील काही जण त्या पुंजीतून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी अन्य व्यवसायामध्ये पाऊल ठेवतात.पण आयुष्याच्या मध्यावर रोजगाराचे क्षेत्र, आर्थिक स्रोत बदलले की त्या क्षेत्राशी जुळवून घेणे, त्यातील खाचाखोचा शिकून घेत त्यातून अपेक्षित उत्पन्न सातत्याने निर्माण करणे हे तुलनेने अवघड असते. त्यातून त्या क्षेत्रातील सल्लागारांवर अवलंबून राहणे अपरिहार्य होत जाते. हे टाळायचे असेल तर सुरुवातीपासून आवक नि जावक यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची सांगड घालण्याचे नियोजन करणे अधिक उपयुक्त ठरते.

ामान्यपणे सर्वच व्यक्ती आर्थिक स्थिती सुधारली वा बिघडली की त्यानुसार खर्चाचा हात सैल सोडणे वा आखडता घेणे हे ढोबळमानाने करत असतातच. आल्या पैशातून बचत किती करु आणि भविष्यासाठी किती राखून ठेवू याचा विचार करतच असतात. याच विचाराला थोडे अधिक वस्तुनिष्ठ स्वरूप द्यायचे तर भविष्यातील गरज, बचत यांची रकमेच्या स्वरूपात मोजणी करावी लागते. त्यातून निव्वळ आज हातात असलेल्या पैशांवरुन नव्हे तर उत्पन्नातील बदलाची दिशा ध्यानात घेऊन खर्चाचे प्रमाण निश्चित करता येते. पहिल्या भागाच्या सुरुवातीला दिलेली एक-दोन उदाहरणांतून असे दिसते, की बरीच माणसे नेमके इथेच फसत असतात.

पण त्याला एक महत्त्वाची पूर्वअट ही आहे की तशी ती सुधारते आहे किंवा बिघडते आहे हे ध्यानात यायला हवे!

उत्पन्नाचा अंदाज

पण आर्थिक नियोजन करताना ’खर्च नि बचतीचे नियोजन करण्यासाठी मासिक/वार्षिक उत्पन्नाची आधारभूत रक्कम कशी ठरवायची?’ असा प्रश्न निर्माण होतो. त्यावर काही सोप्या गणिती पद्धतींचा वापर करता येतो. यासाठी उत्पन्न सुरू झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे प्रत्यक्ष उत्पन्नाचे आकडे पाहून त्याआधारे वार्षिक अथवा मासिक सरासरी उत्पन्नाचा ठोकताळा मांडावा लागतो.

एरवी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये अनेकांच्या कामगिरीचे प्रातिनिधिक मूल्यमापन करण्यासाठी साधी सरासरी (Average अथवा Arithmetic Mean) वापरली जाते. उदाहरणार्थ एकाच वर्गातील सर्वच विद्यार्थी एकच विषय, एकाच शिक्षकाकडून शिकत असल्याने प्रत्येक त्यांची पार्श्वभूमी एकच असते. सर्व विद्यार्थी पेपर स्वतंत्रपणे लिहित असल्याने प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र एकक असतो. त्यामुळे त्यांची सरासरी कामगिरी त्यांच्या गुणांची बेरजेला एकुण विद्यार्थीसंख्येने भागून सहजपणे काढता येते.

परंतु एकाच विद्यार्थ्याच्या गुणांची विविध इयत्तांमधील कामगिरी पाहात गेलो, तर त्यामध्ये तो विद्यार्थी सामायिक असल्याने त्याला प्रत्येक इयत्तेमध्ये मिळालेले गुण हे सर्वस्वी स्वतंत्र नसतात. असाच काहीसा प्रकार शेअर्सच्या किंमतीबाबत असतो. उद्याची किंमत दहा दिवसांपूर्वीच्या किंमतीपेक्षा आजच्या किंमतीशी अधिक सलगी ठेवून असते. यासाठी काळात जसजसे पुढे जावे तसतसे सरासरी काढताना मागच्या किंमतींचे महत्त्व कमी करत न्यावे लागते. यासाठी सरकती सरासरी (moving average) या संख्याशास्त्रीय संकल्पनेचा वापर केला जातो.

MovingAverage

सरकती सरासरी या संकल्पनेमागचे धोरण सोपे आहे. आज नि काल या परस्परांशी जोडलेल्या दोन दिवशी असलेले मूल्य जितके परस्परांशी जोडलेले आहे तितके काल नि उद्याचे नाही. काल आणि दहा दिवसांनंतरच्या मूल्यांचा परस्परसंबंध फारच थोडा उरलेला असेल. त्यामुळे सरासरी काढायची झाली तर ती ’जवळच्या’ मोजमापांची वा मूल्यांची काढावी. यात सलग (समजा) पाच दिवसांची सरकती सरासरी वापरायची असेल, तर पाचव्या दिवसांपासून या सरकती सरासरी काढण्यास सुरुवात होते. पाचव्या दिवसाची सरकती सरासरी म्हणजे मागच्या पाच दिवसांची साधी सरासरी असते. सहाव्या दिवशी सरासरी काढताना पहिला दिवस वगळला जातो आणि सरासरी दोन ते सहा या दिवसांची काढली जाते...

त्यामुळे पाचव्या दिवसापासून पुढे प्रत्येक दिवसाचे वास्तव मूल्य/किंमत आणि त्याची सरकती सरासरी अशी दोन निरीक्षणे अभ्यासकाला उपलब्ध असतात. काळाच्या अक्षावर ती मांडत गेले असता दोन ग्राफ मिळतात. या दोनपैकी सरकती सरासरी कमी चढ-उतार दाखवते.त्यामुळे वास्तव किंमतींच्या तुलनेत त्यातून बदलत्या दिशेचे आकलनही अधिक चांगले होऊ शकते.

सरकती सरासरी हे कालानुरूप होत जाणार्‍या बदलाच्या दिशेचे (trend) आकलन करण्यासाठी एकमेव तंत्र नाही. परंतु सर्वसामान्यांना समजणारे आणि सहज वापरता येणारे तंत्र आहे. तुमचे उत्पन्नही शेअर्सच्या किंमतीप्रमाणे काळाबरोबर बदलत जात असल्याने त्याची दिशा समजण्यास आणि भविष्यातील उत्पन्नाचा अदमास घेण्यास उपयुक्त आहे. गेल्या पाच अथवा वर्षांची सरासरी हे पुढील वर्षीचे उत्पन्न धरुन त्या वर्षीच्या खर्च नि बचतीचे नियोजन करणे शक्य आहे.

एकदा तुमच्या उत्पन्नाचा अंदाज तुमच्या हाती आला की पुढच्या टप्प्यात खर्चाचे- आणि बचतीचेही- नियोजन करण्याचा विचार करु शकता.

खर्चाचे नियोजन : दोन दृष्टिकोन

सर्वसामान्यपणे खर्चाचे नियोजन ही संकल्पनाच बहुतेकांना आश्चर्यकारक वाटते. गंमत म्हणजे बरीच मंडळी होऊन गेलेल्या खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवणारी असतात. मग उरलेल्या पैशातून बचतीचा आणि गुंतवणुकीचा विचार करत असतात. परंतु खर्च नि बचत यांचा विचार असा वेगवेगळा करता येत नाही. बचत ही भावी खर्चासाठीच असते. तिची तशी सांगड घातली की वर्तमानातील खर्चाचा विचारही अधिक नेमकेपणे करता येतो.

परंतु खर्चाला नेहमीच उत्पन्नाशी प्रामाणिक राहावे लागते. त्यामुळे सुरुवातीलाच पुढील वर्षी हाती येऊ घातलेल्या उत्पन्नाचा किती हिस्सा या वर्षीच्या खर्चांसाठी आणि किती हिस्सा भविष्यातील खर्चांसाठी (म्हणजेच बचतीसाठी) राखून ठेवावा हे ठरवावे लागते. आणि ही विभागणी कशी असावी हे काहीसे सापेक्ष असते. ती विभागणी करण्यामागचे दोन ढोबळ दृष्टिकोन दिसतात.

एक गट असा विचार करतो की उत्पन्न सुरू झाले त्या तरुण वयातच आयुष्य अधिक सक्षमपणे भोगता येते. त्यामुळे सुरुवातीच्या वर्षांत खर्चाचे प्रमाण अधिक, तर बचतीचे प्रमाण कमी राखले जाते. घर लवकर विकत घेणे, त्यासाठी कर्ज काढणे, आर्थिक स्तर मध्यम वा त्याहून वरचा असेल तर चारचाकी गाडी घेणे आदी निर्णय यात आयुष्याच्या अलिकडच्या टप्प्यावर घेतले जातात. टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर आदी गृहोपयोगी गोष्टी टप्प्याटप्प्याने घेण्याऐवजी मासिक हप्त्यांसारख्या (EMI) कर्जाच्या आवृत्त्यांचा वापर करुन एकदम विकत घेण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. यात भविष्यातील उत्पन्नाचा वापर वर्तमानातील मोठ्या खर्चांसाठी केला जातो. याचा तोटा म्हणजे उपभोगाचा कालावधी वाढत असला, तरी भविष्यासाठी आर्थिक भार लवकर निर्माण केला जातो.

वर उल्लेख केलेल्या ’Don't count your chicken before they hatch’ दृष्टिकोनाच्या नेमका उलट असा हा दृष्टिकोन आहे. साधारणत: वायदे बाजारासारखा. अजून अंडीही हाती आलेली नसताना भविष्यात हाती येणारी ब्रॉयलर पिल्ले विकणारा, भांडवलशाही व्यवस्थेला अनुरूप मानसिकतेचे प्रतिबिंब पडलेला. यात उद्याचा आर्थिक भार पेलण्याइतपत उत्पन्न न वाढण्याचा धोका असतो. परंतु तरुण वयामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता नि कुवत अधिक असल्याने तो स्वीकारणे शक्य असते. पण त्यासाठी यांना आर्थिक नियोजन अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक होऊन बसते.

दुसरा गट असा विचार करतो की कमावत्या आयुष्याच्या सुरुवातीला केलेली बचत अधिक काळ गुंतवता येत असल्याने चक्रवाढव्याजाचा फायदा होऊन वेगाने वाढते. तेव्हा सुरुवातीच्या काळात शक्य तितकी बचत केली, तर भविष्यातील खर्चांसाठी अधिक रक्कम जमा करणे शक्य होईल. हा गट कमावत्या आयुष्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचा अधिक हिस्सा बचतीसाठी राखून ठेवत असतो. पुढे जसजसे जबाबदार्‍या नि गरजा वाढतील तसतसा खर्चाचा हिस्सा वाढवत नेऊन बचतीचा हिस्सा कमी करत नेतात.

हा दृष्टिकोन पहिल्यापेक्षा अधिक ’आस्ते कदम’ जाणारा आहे, वर्तमानापेक्षा भविष्याला झुकते माप देणारा आहे. मागच्या पिढ्यांमध्ये आधी बचत नि त्या बचतीमधून निवृत्तीनंतर घर बांधण्याचा प्रघात मोठा होता. हा त्याचाच थोडा पुढारलेला अवतार. तो अवतार अंड्यांमधून पिल्ले जन्मल्यावर त्यांना ग्राहक शोधणारा, तर हा अंडी हाती आल्यावर त्यातील किती टक्क्यांतून पिले बाहेर येतील याचा अदमास घेऊन तेवढ्या विक्रीसाठी ग्राहक आधीच शोधून ठेवणारा.

यात आर्थिक फटका बसण्याची संभाव्यता पहिल्या पर्यायापेक्षा बरीच कमी होते. त्याचबरोबर उपभोगाचा कालावधीही कमी होत असतो. अर्थकारणाच्या भाषेत याला ट्रेड-ऑफ (trade-off) म्हणतात. पुढे गुंतवणुकीचा विचार करत असताना याला पुन्हा एकवार सामोरे जावे लागते. अधिक धोका पत्करल्यास अधिक फायदा पण त्याचबरोबर अधिक तोट्याची संभाव्यता वाढते. उलट बचतीच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले, तर संभाव्य परतावाही कमी होत जातो. आहारामध्ये चमचमीत खाणे बहुधा आरोग्यास अपायकारक होत जाते, तर आरोग्यदायक खाणे बहुधा चवीच्या बाबतीत फारसे लोकप्रिय होत नसते, तसेच हे ही. चव आणि आरोग्य या जशा व्यस्तप्रमाणात वाढणार्‍या बाबी आहेत, तसेच आर्थिक सुरक्षा आणि गुंतवणूक परतावा याही. तुमच्या आर्थिक नि मानसिक कुवतीनुसार तुम्हाला स्वत:साठी यांची विभागणी कशी असावी याचा निर्णय करावा लागतो.

दोनही पर्यायांमध्ये आयुष्याच्या सुरुवातीला खर्च नि बचत यांचे गुणोत्तार कालानुरूप बदलत जात असते. पहिल्या पर्यायामध्ये सुरुवातीच्या काळात ते खर्चाला अनुकूल असते तर दुसर्‍यामध्ये बचतीला. जसजसे काळ जातो तसतसे त्यांची दिशा बदलत जाऊन उलट होत असते. अगदी सुरुवातीला या गणिताला सामोर जायचे नसेल तर एक ढोबळ निर्णय म्हणून उत्पन्नाचे सरळ दोन सारखे भाग करुन वर्तमान आणि भविष्यकालीन खर्चाला नेमून द्यावेत.

Golden Budget Rule अथवा ५-३-२ चा नियम

MagicDistribution

आपल्या उत्पन्नापैकी किती टक्के खर्च नि किती बचत करावी यासाठी अनेक ठिकाणी एक जादूचे गुणोत्तर सांगितले जाते. यात असे म्हणतात की तुमच्या उत्पन्नाचे ५०%, ३०% आणि २०% असे तीन भाग करा. यातील पहिला नियमित वा गरजांशी निगडित खर्चांसाठी ठेवा. दुसरा चैनीसारख्या वरकड खर्चांसाठी नेमून द्या आणि उरलेला २०% भाग हा बचत म्हणून राखून ठेवावा. माझ्या मते हा नियम अजिबात पाळू नये!

ढोबळ नियम म्हटला तरीही यात चुकीची गृहितके आहेत. एकच विभागणी-नियम सर्व वयोगटाच्या, सर्व आर्थिक गटांच्या, सर्व सामाजिक परिस्थितीमधल्या व्यक्तींना लागू पडेल असे तो समजतो. अगदी टक्केवारीच्या दृष्टीने पाहिले तरी हे पटणारे नाही. नुकत्याच कमावत्या झालेल्या व्यक्तीसाठी, कुटुंबवत्सल मध्यमवयीन व्यक्तीसाठी आणि कौटुंबिक गरजा पुर्‍या होऊनही कमावत्या राहिलेल्या नववृद्धासाठी अशा सार्‍यांसाठी एकच नियम लागू पडत नाही. एखाद्या निम्नवर्गीयाला उत्पन्नाचा जितका हिस्सा गरजांवर खर्च करावा लागतो, तितकाच हिस्सा एखाद्या श्रीमंताला करावा लागतो हे पटणारे नाही. इथे आपण चैन आणि गरजा वेगळ्या मोजतो आहोत हे ध्यानात घ्या. उत्पन्न वाढेल तसे गरजांवरचे खर्च वाढवण्यास उद्युक्त करणारा हा नियम एकप्रकारे भांडवलशाहीच्या ’गरज नसेल तिथे निर्माण करा’ प्रवृत्तीला चालना देणारा आहे.

बचतीसाठी उत्पन्नातील सर्वात कमी हिस्सा ठेवणे हे अमेरिकेसारख्या सोशल सिक्युरिटी असणार्‍या देशातच शक्य आहे. कदाचित त्यामुळेच या नियमामध्ये बचत हा भाग केवळ वृद्धापकाळीचा खर्च एवढ्या एकाच उद्देशाने केलेला दिसतो. गरज, चैन आणि वृद्धापकाळासाठी तरतूद या तीनही संकल्पना या दोन समाजात वेगवेगळ्या प्रकारे पाहिल्या जात असतात. मी बचत ही देखील भविष्यकालीन खर्चासाठी केलेली तरतूद म्हणूनच पाहात असतो. त्यामुळे तिला ढोबळमानाने वृद्धापकाळाची तरतूद म्हणू शकत नाही. त्या काळच्या गरजा नि चैन यांची सांगड मी त्या तरतुदीशी घालत असतो.

भारतामध्ये वृद्धापकाळ हा बव्हंशी कार्यक्षम काळातील बचतीच्या आधारेच व्यतीत केला जात असतो. त्यासाठी सुरवातीपासून बचत नि गुंतवणूक करणे आवश्यक असते. शिवाय भारतीय समाजात केवळ स्वत:च्याच नव्हे तर आई-वडिलांच्या वृद्धापकाळातील खर्चाचा विचारही नियोजनात समाविष्ट असावा लागतो. त्याचबरोबर उलट दिशेने मुलेही तुलनेने अधिक वर्षे आई-वडीलांवर अवलंबून असतात. त्यामुळे उत्पन्नाचा केवळ पाचवा हिस्सा बचतीसाठी पुरेसा ठरण्याची शक्यता फार कमी आहे.

मुळात हा नियम आधी वाटणी करुन मग त्यात खर्चांचा विचार करतो. भारतीय दृष्टीने आपण प्रथम गरजा, त्यांसाठी लागणारा खर्च, त्यांसाठी बचत या क्रमाने खालून वर जात असतो. खर्च नेमका कशासाठी आहे, त्याला किती आर्थिक तरतुदीची गरज आहे आणि मुख्य म्हणजे ती करण्यासाठी किती काळ हाती आहे हे आधी पाहावे लागते. आपल्या उत्पन्नाच्या (बदलाच्या) दिशेचा विचार करता ते साध्य करण्याची संभाव्यता किती हे पडताळून पाहावे लागते. मग चैनीसाठी ३०% सोडाच कदाचित पाच टक्के रक्कमही उरणार नाही.

चैनीसाठी आधीच रक्कम राखून ठेवणे गृहित धरणारा हा नियम अमेरिकन अर्थकारणाचा वारसा आहे आणि भारतीय सामाजिक-आर्थिक संदर्भात तो स्वीकारणे चूकच नव्हे, तर कदाचित धोकादायकही ठरेल.

आर्थिक विचाराचे दोन दृष्टिकोन वर दिले आहेत. अधिक बारकाईने विचार करणारे आणखी काही पर्याय देऊ शकतील. उत्पन्नाची विभागणी विविध व्यक्तींसाठी, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि विविध सामाजिक, भौगोलिक तसेच आर्थिक पर्यावरणामध्ये वेगवेगळी असू शकते- नव्हे असायलाच हवी हे ध्यानात ठेवले तरी पुरे.

या वर्षातील खर्च आणि भविष्यातील खर्च (किंवा त्यासाठी केलेली बचत) या दोहोंचा वाटा निश्चित झाला की या दोन्हींचे अंदाजपत्रक तयार करायला हवे. आणि त्यासाठी दोनही प्रकारच्या गरजांची सूची तयार करुन त्यांचा प्राधान्यक्रम, अपेक्षित खर्च नि खर्चाचा काळ निश्चित करायला हवा. त्यासबंधी अधिक विवेचन पुढच्या भागात करु.

- oOo -

१. जवळच्या म्हटले तर किती जवळच्या. दोन, तीन, पाच की दहा? याला सोपे उत्तर नसते. त्याच्यासाठी वेगळे तंत्र आहे. पण तो या लेखमालेचा विषय नाही.

पुढील भाग >> (आगामी)


हे वाचले का?

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

अर्थ-साक्षरता - १: अर्थ-साक्षरता आणि मी

मागील आठवड्यात माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची बातमी आली होती. त्यापूर्वीही अशा अनेक प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर अथवा उतारवयामध्ये सहन कराव्या लागणार्‍या आर्थिक चणचणीच्या बातम्या आलेल्या होत्या. यात अगदी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान, जुन्या जमान्यातील यशस्वी अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचाही यांचाही समावेश होता. त्यानिमित्ताने उतारवयातील खर्चाची तरतूद म्हणून बचत आणि आर्थिक-नियोजन याबाबत बालक-पालक नावाचा एक लेख इथेच लिहिला होता.

मुद्दा असा होता की कारकीर्दीच्या शिखरावर असताना अमाप- निदान सामान्यांपेक्षा कैकपट- पैसा मिळवणारी ही मंडळी आर्थिक विपन्नावस्थेत जातात याचे कारण न केलेले, अथवा करुन फसलेले आर्थिक नियोजन असते. चार गाड्या बाळगणार्‍या, एकाहुन अधिक घरे मालकीची असणार्‍या सेलेब्रिटीला आपली शिल्लक घसरते आहे हे दिसत नसेल, त्याला थेट दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आल्यावरच भान येत असेल, तो दोष त्याचाच असतो. (अपवाद गंभीर आजारामुळे वेगाने घसरलेल्या परिस्थितीचा. पण त्यालाही आरोग्य-विम्यासारखे उपाय असतात.) आपली आर्थिक स्थिती नियमितपणे तपासत राहिले तर येऊ घातलेल्या आर्थिक संकटाची चाहूल बरीच अलिकडे ऐकू येते नि त्यावरच्या उपायांना लवकर चालना देता येते. त्यासाठी आपल्या आर्थिक ताकदीकडे कायमच बारकाईने लक्ष द्यावे लागते.

AllThisIsMyMoney

दुसरीकडे, हे घडू नये म्हणून घायकुतीला आल्यासारखे मिळतात तोवर, मिळतील तितके, पैसे मिळवत जाणे हा मार्ग बहुसंख्य लोक स्वीकारतात. आठ वर्षांपूर्वी मी रोजगार सोडला, तेव्हा अनेक मित्रांनी मला ’अरे पण तुला इतके पैसे मिळतात तर मिळवत का नाहीस?’ असा प्रश्न विचारला होता. 'मिळवणे' या क्रियापदाची पैशाशी घट्ट सांगड बसली आहे हे या प्रश्नामागचे कारण आहे. मिळवण्याजोगे इतर काही असते, हे बहुतेकांच्या गावीच नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एक उघडपणे बोलले गेले नाही तरी, 'पैसे असले की काहीही मिळवता येते' हा बहुसंख्येच्या मनात दृढ झालेला एक अत्यंत चुकीचा समज.

आमचे आयटीमधले मित्र रात्री दहा-बारा वाजेपर्यंत काम करुन, क्वचित नाईट मारून सकाळी परत कस्टमर कॉलवर बसतात, तेव्हा मी विचारतो, ’हवा तेव्हा वेळ मिळू शकतो का रे तुला? आज जरा पोराशी दंगामस्ती करायचा तुझा किंवा पोराचा मूड आहे... मिळेल वेळ?' आपल्या आनंदाचे क्षणही ऑफिसच्या सोयीनेच निवडावे लागत असतील, तर त्या पैशाचे काय लोणचे घालायचे आहे? आपले आनंद नि सुख यांचेही नियोजन करावे लागत असेल तर तो आनंद, ते सुख हे सेल्फीसारखे किंवा इन्स्टाग्रामच्या रीलसारखेच ’एक पॉईंट सर झाल्याइतकेच महत्त्व असणारे’ नसेल का?

’मॉडर्न टाईम्स’मधल्या चार्ली चॅप्लिनसारखे अमुक वेळेला नट पिळायला सुरुवात करायचा, नि घंटी वाजली की ते काम सोडून टिफिन उघडायचा. दुसरी घंटी होताच पुन्हा स्क्रू पिळण्याच्या कामावर रुजू व्हायचे... तुमचे यंत्र झाले आहे असे कधी वाटते का तुम्हाला? चार्ली एक दिग्गज म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. पण ऐंशी साली रिलीज झालेला ’गॉड्स मस्ट बी क्रेझी’ म्हणून एक सुरेख चित्रपट आजच्या पिढीने तर सोडाच, माझ्याही पिढीने पाहिला असण्याची शक्यता नाही. हा चित्रपट यू-ट्यूबवर आहे. जमल्यास त्यातील पहिली वीस मिनिटे तरी पाहा.

आपले आयुष्य ही खरेच प्रगती आहे का? असा प्रश्न एकदा विचारून पाहा. त्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आपण जी किंमत मोजतो, ती केवळ पैशातच पाहात असतो. तो पैसा निर्माण करण्यासाठी आपण कशा-कशा स्वरूपात किंमत मोजतो, याचे गणितही ध्यानात घ्यायला हवे. त्यानंतर एकुण ताळेबंद शिलकीचा राहतो की तोट्याचा याचा विचार करायला हवा.

मिळवताना गरजा काय हे ठरवून त्या प्रमाणात मिळवण्याचे नियोजन करण्याऐवजी, हपापल्याप्रमाणे मिळेल तितके मिळवत जायचे नि वेळ व ऊर्जा शिल्लक राहिली तर ती भोगण्याचा विचार करायचा; नाहीतर आपल्या नावावरची संपत्ती वाढत चाललेली पाहून, त्या वाढीबरोबर आपले सुख वाढते आहे अशा भ्रमात राहायचे... असा मार्ग आपण निवडला आहे. किंवा मग अधिक पैसे आहेत म्हणून अधिक मोठे घर घ्यायचे, अधिक किंमतीची गाडी घ्यायची, केरळ ऐवजी कॅलिफोर्नियाला फिरायला जायचे असा उलटा प्रकार सुरू होतो. हे सारे ’मला हवे’ असे आधीच निश्चित केले असले तर गोष्ट वेगळी. पण पैसे वाढले म्हणून गरजा वाढवायच्या, त्यातून खर्च वाढवायचा आणि मग गरज वाढली म्हणून आणखी पैशाच्या मागे ऊर फुटेतो धावत सुटायचे, हा न संपणारा प्रवास आहे.

रोजगाराच्या सोयीने आनंदाचे नियोजन करण्यापेक्षा, नियोजन बचत नि गुंतवणुकीचे करुन आनंदाला मुक्त केलेले अधिक चांगले असे माझे मत आहे. पैसे मिळवत राहून मग 'त्यांचे काय करायचे?' या प्रश्नाला सामोरे जाण्याऐवजी, उलट आधी आपल्या गरजा कोणत्या अधिक आपल्याला काय हवे हे निश्चित करुन, मग त्याला अनुसरून पैसे मिळवण्याचे नियोजन करणे, हे अधिक सयुक्तिक आहे असे मला वाटते.

मी गेली आठ वर्षे रोजगाराविनाही मध्यमवर्गीय सुखवस्तू आयुष्य जगू शकतो आहे. मला हे जमते म्हणजे गुपचूप आणि वेगाने पैसे मिळवण्याची काहीतरी युक्ती मला सापडली आहे, असा माझ्या परिचितांपैकी अनेकांचा समज आहे. ’आम्हाला पण नियोजन करायचे आहे, तुझा अनुभव सांग.’ म्हणत आडूनआडून ही ’जादू’ कोणती, किंवा मला मोहरांचा हंडा नक्की कुठे सापडला, हे माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात.

अर्थ-साक्षर व्हायचे आहे ही केवळ बतावणी असते. कारण मला सापडलेली युक्तीच नव्हे, तर आठ-दहा वर्षांच्या मेहनतीने तयार केलेला गुंतवणूक-ट्रॅकरही (tracker) मी लोकांना फुकट दिला आहे. अद्याप एकानेही तो गांभीर्याने वापरला असल्याचा पुरावा माझ्याकडे नाही. त्यावर वेळ घालवण्याची त्यांची तयारी नाही. त्यांना जादूचा दिवा हवा आहे, जो घासला की त्यातून आलेला जिन त्यांचे आर्थिक नियोजन चोख करुन देईल. दुर्दैवाने मला असा कुठला दिवा सापडला नाही, त्यामुळे त्यांना देऊ करणे मला शक्य नाही. पण माझा मार्ग मी त्यांना सांगू शकतो. त्यात त्यांचा मेंदू, वेळ, ऊर्जा यांची आधी गुंतवणूक करण्याचे त्यांनी मनावर घ्यायला हवे.

आर्थिक नियोजन हीच मला सापडलेली युक्ती आहे, आणि यात बचतीबरोबरच खर्चाचे नियोजनही समाविष्ट आहे. आपल्या गरजा कोणत्या ते प्रथम निश्चित करणे महत्त्वाचे. त्यासाठी आपण पुढील आयुष्याचा मार्ग कसा आखत आहोत याचे एक ढोबळ का होईना चित्र डोळ्यासमोर असायला हवे. वारा फिरेल त्या दिशेने पाठ फिरवणार्‍यांचे हे काम नव्हे. त्यानंतर त्या आयुष्यातील आपल्या गरजा कोणत्या, त्याच्याशी निगडित खर्च कोणते नि केव्हा येणार आहेत, आपले संभाव्य उत्पन्न काय असेल, त्यातील किती पैसा आपण नियमितपणे बचत म्हणून बाजूला काढू शकतो, खर्चासाठी तसंच बचतीसाठी आपले प्राधान्यक्रम कोणते या गोष्टींचा विचार सुरुवातीपासूनच करायला हवा.

उत्पन्नाचा स्रोत हा अत्यंत सापेक्ष मुद्दा आहे. परंतु तरीही बचत त्यातूनच होत असल्याने आर्थिक नियोजनाची सुरुवात ही सरासरी उत्पन्नाच्या आधारेच करावी लागते. ज्यांचे उत्पन्न किमान गरजांनाही पुरे पडत नाही अशा दुर्दैवी व्यक्तींच्या आयुष्यात बचत, गुंतवणूक वा अर्थ-साक्षरता या संकल्पनाही गैरलागू ठरतात. त्यामुळे हे सारे लेखन त्यांच्यासाठी नाही. पण जे बचत करू शकतात, त्यांनी आपल्या वर्तमान गरजा किती याचा अदमास घेऊन, त्यानुसार उत्पन्नाचा कितवा हिस्सा आपण बचतीकडे वळवू शकतो, हा पहिला विचार करायला हवा. पण उलट दिशेने असेही होऊ शकते, की वर्तमान गरजा भागवण्यामध्येच बरेचसे उत्पन्न खर्ची पडते आणि बचतीला वावच राहात नाही. अशा वेळी आपल्या गरजांच्या यादीकडे पाहून त्यातील काही वगळता येतील का याचा अदमास घ्यावा लागतो.

यात काही नवीन नाही. ’नियोजन’ हा शब्दही न वापरता बहुतेक लोक हे करतच असतात. पण बहुसंख्या काय करत नाही, तर या निर्णयांना वस्तुनिष्ठ निकषांच्या चौकटीत बसवत नाही. त्यामुळे पुढचा प्रवास अनमानधपक्याने वा तात्कालिक निर्णयांच्या आधारे होत राहातो. आपल्या गुंतवणुकीची एकुण स्थिती आणि भविष्यकालीन गरजांशी तिची सांगड घालणे शक्य होत नाही, आणि बहुतेकांना त्याचे भानही नसते. बचत आवश्यक असते, तसेच गरजांवरचे खर्चही. मग प्रश्न असा पडतो, की उत्पन्नातील किती वाटा या दोहोंना द्यावा? आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये याचा निर्णय करायला हवा. एक ढोबळ नियम असा, की निम्मे उत्पन्न हे कायमच भविष्यकालीन गरजांसाठीची तरतूद म्हणून बचतीमध्ये टाकावे. तुमच्या एकुण उत्पन्नानुसार, आणि भविष्यातील तुमच्या योजनांनुसार हे थोडे कमी-जास्त होऊ शकते. आता बचतीचा प्रश्न निकालात निघाला की बचत केलेले धन नुसते ठेवून उपयोग नाही, तर वाढवायचे कसे याचा विचार सुरू करायला हवा.

बचत किती करणार वा होणार हे निश्चित झाले, की ते पैसे गुंतवण्याचा टप्पा येतो. आणि गुंतवण्यासाठी कोणते गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत नि त्यातील कोणता पर्याय निवडावा, याचा विचार करावा लागतो. इथेही बहुसंख्य लोक मुदत-ठेवीपासून सुरुवात करत, विमा पॉलिसी आणि अधूनमधून सोने अशा अनमानधपक्याने घेतलेल्या निर्णयांच्या आधारे गुंतवणूक करत जातात. यात कुठेही गरजा नि गुंतवणूक यांची सांगड घातलेली नसते. तसेच गुंतवणुकीचा अमुक पर्याय का निवडावा याच विचार केलेला नसतो. अर्थ-साक्षरतेमध्ये तो ही करावा लागतो.

माझे आयटीमधले, दिवसाचे आठ-दहा तास संगणकासमोर आणि आणखी अधिकचा वेळ मोबाईलसमोर असणारे मित्रही जेव्हा ’सोने ही सुरक्षित गुंतवणूक’ म्हणतात तेव्हा कपाळावर हात मारून घेऊ, की आत्महत्या करु असा मला प्रश्न पडतो. क्रेडिट/डेबिट कार्ड, चोवीस तास चालू असणार्‍या एटीएम्सच्या जमान्यात सोने ’अडी-अडचणीला कामात येते’ हे समर्थन देतात तेव्हा त्या अडाणीपणाचे मला वैषम्य वाटते. ’बाळा, अरे नको रे असे करूस. दिवसाला पाच-सहा तास जे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर वाया घालवतोस ना, त्यातला एखादा तास वापरुन त्याच इंटरनेटवर ज्यांची भरपूर माहिती आहे असे गुंतवणुकीचे पर्याय, त्यांचे मूल्यमापन कसे करावे, आपली गुंतवणूक ट्रॅक कशी करावी, वगैरे बाबींवर वाचन कर रे.’ असे त्यांना सांगावेसे वाटते.

पण हे लोक फक्त सोयीच्या वेळी जागे होऊन ’तुमचा निर्णय कसा चुकला’ हे सांगण्याचा आटापिटा करण्यापलिकडे वाचन करत नाहीत. आमचे एक फेसबुक-मित्र आहेत. मी म्युच्वल फंडात गुंतवणूक करण्याबद्दल काही पोस्ट केली होती. उच्चशिक्षित असलेल्या त्या काकांच्या गुंतवणूक शहाणपणावर बहुधा त्या पोस्टमुळे मी नकळत प्रश्नचिन्ह निर्माण केले असावे. कोरोना उद्रेकाच्या आदल्या वर्षी शेअर-मार्केट घसरले, तेव्हा त्यांनी मला कुत्सितपणे, ’हं, मग क्काऽय? आता काय म्हणतात तुमचे फंडं?’ अशा थाटात प्रश्न विचारला होता. ’घसरत्या मार्केट्मध्ये अदमास घेऊन आणखी पैसे गुंतवेन.’ असे ठामपणे त्यांना सांगितले होते. तसे केलेही. पुढची दोन वर्षे मिळून सरासरी पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स माझ्या फंडांनी दिले. त्यानंत्र सहा-आठ महिने घसरण झाली. ऑगस्टपासून बाजाराने पुन्हा वरची वाट पकडली आहे.

’चढ-उतार हा कोणत्याही गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे’ हे त्या काकांना आणि त्यांच्यासारख्या मंडळींना माहित नसते. त्यांच्या मुदत-ठेवीचे मूल्यही महागाई-निर्देशांकानुसार, बाजार-मागणीनुसार कमी-जास्त होतच असते. फक्त ते यांना दिसत नसते इतकेच. प्रत्येक गुंतवणूक - अगदी तुमची सोने किंवा विमा पॉलिसीसुद्धा! - काहीएक धोका घेऊनच येते. इतरांवर विश्वास ठेवायला नको म्हणून घरात हंडा पुरून ठेवला, तरी पावसात पाणी तुंबून त्यातील पैशाचा चिखल होऊ शकतो. (किंवा नोटाबंदी होऊ शकते. :) ) सोने चोरीला जाऊ शकते, त्याची किंमत बाजाराच्या नियमाने कोसळू शकते- नव्हे कोसळतेच. सुरक्षित गुंतवणूक ही फक्त डोळ्यावर पट्टी बांधून गुंतवणूक करणार्‍यांनाच सापडते. कारण त्यांनी त्यातील धोके न पाहण्याचा मार्ग स्वीकारलेला असतो. हीच मंडळी अमुक पदार्थ वा औषध ’केमिकल फ्री’ आहे या तद्दन खोट्या दाव्यावरही तसाच विश्वास ठेवत असतात.

गुंतवणूक कशासाठी करत आहोत हे विचारात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय निवडणे, त्याच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन वाटचालीवर नजर ठेवणे, ठराविक काळानंतर प्रत्येक गुंतवणुकीचे मूल्यमापन करण्याची शिकवणी प्रत्येक कमावत्या व्यक्तीला असायला हवी. त्यासाठी आपले काही पूर्वग्रह प्रथम दूर करायला हवेत.

१. संपूर्ण सुरक्षित गुंतवणूक हे मृगजळ आहे हे मान्य करणे हा आर्थिक-नियोजनाच्या पथावरचा पहिला टप्पा आहे. गुंतवणूक जितकी सुरक्षित तितका परतावाही कमी मिळत असतो.

२. ’अधिक परतावा म्हणजे तो गुंतवणूक पर्याय अधिक चांगला’ हा दुसरा भ्रम दूर व्हायला हवा.

३. निश्चित परतावा देणार्‍या योजना अधिक फलदायी, निदान पैसे कमी होत नाहीत हा तिसरा भ्रम दूर करायला हवा.

४. निव्वळ परतावा (आणि तथाकथित सुरक्षितता) हा एकच निकष गुंतवणूक-पर्याय निवडीसाठी पुरेसा आहे हा ग्रहदेखील सोडून द्यायला हवा.

५. करबचतीसाठी गुंतवणूक करायची नसते, गुंतवणुकीवर करबचत करण्याचा प्रयत्न करायचा असतो.

६. याखेरीज बचतीतले अनेक ’गोल्डन रूल्स’देखील गणित करुन, तपासून पाहिल्याखेरीज अंमलात न आणण्याची शिस्त अंगी बाणायला हवी. किंबहुना असे ’गोल्डन रुल्स’ नावाचे काही नसतेच. तो आळशांचा मार्ग आहे, अर्थ-साक्षर होण्याचा उद्देशच ती अंधश्रद्धा दूर करण्याचा असतो.

ROI_HouseInvestment

उदाहरणार्थ, सरकारने गृहकर्जाच्या व्याजावर कर वजावट दिली म्हणून घरे घेऊन ’कराचे तीस टक्के वाचवण्यासाठी गृहकर्जाचे व्याज (गृह-किंमतीच्या अंदाजे पन्नास टक्के जास्त खर्च) दान करण्यापूर्वी यात नक्त फायदा किती याचे - निदान संभाव्य - गणित केल्याखेरीज त्यात उडी मारणे चूक आहे. त्यातून मिळालेला परतावा मोजताना त्यावर खर्च केलेला मेन्टेनन्स, भरलेले किमान वीज बिल, दोन्ही वेळा केलेला नोंदणी खर्च, गृहकर्जावरचे व्याज, त्या वेळी तारणासाठी वगैरेसाठी केलेला खर्च, प्रोसेसिंग फी या आर्थिक बाजू लक्षात घ्यायला हव्यात. पण त्याचबरोबर घर निवडण्यावर, नोंदणी वगैरे प्रशासकीय बाजूंवर, तसेच संभाव्य खरेदीदारांसोबत खर्ची पडलेला वेळ नि ऊर्जा हे सगळे खर्च गणितामध्ये समाविष्ट करायला हवेत. याखेरीज त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यादरम्यान वाढलेल्या महागाईचा विचार करुन, आपल्याला सरासरीने किती परतावा मिळाला याचे गणित करायचे असते. याचप्रमाणे ’सोने ही अडीनडीला उपयोगी पडणारी आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.’ हे गृहितक आजच्या काळातही लागू आहे की कालबाह्य झाले आहे?’ या प्रश्नालाही सामोरे जायला हवे.

गणित हा आयुष्यात अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन 'मंगोलांच्या काळात तर मुद्दलही नाहीसे होत असे, तेव्हा नाही बोललात तुम्ही' किंवा ’त्यापेक्षा तर मुदत-ठेव बरी ना?’ म्हणणार्‍या, आणि हा वाजवी प्रतिवाद आहे असे समजणार्‍या भूतकालभोगी समाजाकडून अर्थ-साक्षरतेची अपेक्षाच गाढवपणाची आहे हे मला मान्य आहे, परंतु एकाचा निर्णय बहुसंख्येचा होऊन त्याची ’सोने ही सुरक्षित, अडी-नडीला कामात येणारी गुंतवणूक आहे’ सारखी परंपरा निर्माण होऊ नये यासाठी हे सांगत राहावे लागते.

महाराजांच्या टायंबाला मोरे सरकारांच्या सैन्यात असलेल्या कुण्या शिलेदाराच्या तिसर्‍या पत्नीच्या दुसर्‍या मुलाच्या जीवनावरचा बायोपिक पाहण्यासाठी लोक पैसा नि वेळ खर्च करतील, त्यावर फेसबुक वा ट्विटरवर युद्धे लढवतील. पण आपल्या उत्पन्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यातील दहावा हिस्साही खर्च करणार नाही.

माणसे विचार करत नाहीत, गणित करत नाहीत आणि माहिती करुन घेत नाहीत. सर्वात वाईट म्हणजे माहिती आणि अनुभवाऐवजी पूर्वग्रहांवर किंवा आपल्यासारख्याच अज्ञानी मंडळींच्या सल्ल्यावर विसंबून आयुष्य जगतात. सगळं काही सुरक्षित हवं या मृगजळाचा पाठलाग करता करता थकतात, पण थांबत नाहीत, कारण थांबलो तर कायमचे बसू ही ’असुरक्षिततेची’ भावना त्यांच्या मनातच असते. त्यापासून त्यांची अखेरपर्यंत सुटकाच होत नाही.

(क्रमश:)

- oOo -

    पुढील भाग >> अर्थ-साक्षरता - २ : गरजा, खर्च आणि बचतीचे नियोजन


हे वाचले का?