गुरुवार, ६ जून, २०२४

आपले राष्ट्रीय खेळ

आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत... !

दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात.

मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात.

दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला धावाधाव करत असतात.

प्रत्येक सामन्यातील एक डाव दिवसा नि एक रात्री खेळला जातो... क्वचित पहाटेसुद्धा!

प्रत्येक सामन्यापूर्वी ‘प्रतिस्पर्धी कोण आहे’ याबरोबरच मैदानावरील ‘खेळपट्टी’ आणि ‘बाजूच्या हिरवळीची स्थिती’ आदि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून टीम निवडली जाते. चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांना प्राधान्य असते, तर अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांची चलती असते.

खेळ पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकांना इच्छा नसूनही, समोरील जाहिरातींमध्ये काही तथ्य नाही हे ठाऊक असूनही, त्या पाहाव्याच लागतात. समोरची प्रसिद्ध व्यक्ती जे ग्यान देते ते निमूट ऐकून घ्यावेच लागते.

पैसे खर्चणारे, एक टीम निवडून तिला प्रोत्साहन देणारे, विरोधी टीमच्या समर्थकांवर शाब्दिक वार करणारे, एकमेकांना भिडणारे प्रेक्षकच असतात.

‘ड्रिंक्स’ ब्रेकमध्ये परस्परविरोधी टीमचे खेळाडू एकाच आईस-बॉक्समधून पाणी नि कोल्ड्रिंक पितात. तसंच सामना संपल्यावर परस्परांसोबत डिनर पार्ट्या करतात.

प्रेक्षकांनी खर्चलेल्या पैशांतून खेळणार्‍या दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना, डग-आउटमध्ये नुसतेच बसलेल्या टीम सपोर्ट स्टाफला, त्यांच्या मालकांनाच काय पण टीव्हीवरील निवेदकांनाही(!) मानधन मिळून त्यांची चांदी होते.

सामना संपला, गुलाल उधळून झाला की प्रेक्षक आपला खिसा किती हलका झाला याचा अंदाज घेत-घेत पुढच्या काटकसरीची चिंता करत घरी जातात (किंवा टीव्ही बंद करतात.)

दोन्हींमध्ये मोजके स्थानिक/मूलनिवासी खेळाडू आणि बाकीचे थोडे देशातले, थोडे परदेशातले असे पैसे देऊन खरेदी करून एक टीम तयार केली जाते. पण ‘नालायक असले तरी स्पर्धेच्या/संघर्षाच्या प्रसंगी आपल्या जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, गावच्या माणसाची बाजू घ्यायला हवी’ या निष्ठेतून अशा ‘आपल्या नसलेल्या’ आपल्या टीमची बाजू सर्वसामान्य चाहते प्रसंगी आपल्याच माणसांशी वैर पत्करुनही लढवत असतात.

एक लहानसा फरक असा आहे की आयपीएलमध्ये खेळाडूंचा रीतसर लिलाव होतो, तर निवडणुकीत ‘होस्टाईल टेक-ओव्हर’देखील (Hostile Take-over) होते.

प्रत्यक्ष निवडणुकीआधी बाहेरुन नेते आयात करतात, निवडणुकीदरम्यान बाहेरुन नेते आयात करतात आणि निवडणूक झाल्यावरही बाहेरुन नेते आयात करतात. (अदानी जसे कंपनी शून्यापासून सुरु करण्याचे नि वाढवण्याचे कष्ट न घेता सरळ इतरांची बळकावतो तसेच.) थोडक्यात पळवापळवी हा राजकारणाच्या अनेक उपखेळांपैकी एक खेळ आहे.

... कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!

GameOrSport
https://www.sportsbusinessjournal.com/ येथून साभार.

प्रत्येकाचा एक संघ असतो नि एक लाडका खेळाडू असतो. हे दोन्ही जग्गात भारी आहेत असा त्याचा समज असतो. यांची कामगिरी खालावली तर ती ‘सदोष पंचगिरी’मुळेच असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ‘पंच बदला निकाल बदलेल’ या उक्तीवर त्यांचा ठाम विश्वास असतो. कारण...

आपलं पोरगं कोणत्या शाळेत नि कितव्या इयत्तेत शिकते याचा पत्ता नसलेल्यालाही फडणवीसांचा स्ट्राईक रेट किती नि त्यांनी कुठल्या पक्षातून किती नेते आयात केले याचे स्टॅटिस्टिक्स बिनचूक मुखोद्गत असते. आणि असे असून बीसीसीआय आपल्याला ईशान किशनप्रमाणेच करारापासून वंचित ठेवते याची त्याला खंत नसते. कारण...

उपकर्णधार म्हणून साधी स्वतंत्र रूम मागितली म्हणून सुरेश रैनाला स्पर्धेच्या मध्येच परदेशातून हाकलून लावले जाते. दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून जडेजासारख्या दिग्गज खेळाडूला एका आयपीएलचे तिकीट नाकारले जाते. पण ‘निवडून येण्याची क्षमता’ आणि ‘श्रेष्ठींशी नाते’ या गुणांच्या बळावर हार्दिक पांड्याला मात्र भाजपमधून शिंदेसेनेमध्ये प्रवेश केल्यावरही निलंबित केले जात नाही. तरीही...

दुसर्‍या पक्षातून येऊन थेट तिकीट मिळवलेला हार्दिक ‘कसा निवडून येतो बघतोच.’ असे म्हणत कुणी रामदास बुमराह बंड करतो. पण वरिष्ठांनी ‘समजावल्या’वर (समजूत घातल्यावर नव्हे, प्लीज नोट!) ‘संघ नि देशासाठी’ म्हणून निमूटपणे तिसरा गोलंदाज म्हणून चेंडू हाती घेतो. कारण...

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही ‘लोकसभेसाठी थेट उमेदवारी मिळणार नाही’ असे हायकमांड जाहीर करते. एवढेच नव्हे तर किमान एका ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनेल निवडून आणल्याखेरीज पक्षप्रवेशही होणार नाही असे बजावते. पण हार्दिक पांड्याचा थेट पक्षप्रवेश होऊन त्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदही बहाल केले जाते. तरीही...

‘आयुष्यातील इतकी वर्षे संघाला दिली. आता अशा बाहेरून आलेल्या नेत्यांसाठी आम्ही काय सीमारेषेवर पाण्याच्या बाटल्या घेऊन बसायचेच का?’ असा प्रश्न यापूर्वी अवघड मतदारसंघही जिंकून दिलेल्या रोहित शर्माला पडत असतो. तरीही...

ड्रीम-११ किंवा फँटसी-लीग सारख्या कंपन्या केवळ क्रिकेटसदृश मैदानी खेळांसाठी आभासी खेळ देऊ करतात. पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या– आणि चॅनेल माध्यमे ‘सिंहासन का क्वार्टर-फायनल’, ‘सिंहासन का सेमी-फायनल’ किंवा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ वगैरे नावांनी डायरेक्ट टेलेकास्ट करत असलेल्या निवडणुकांसारख्या सर्वाधिक लोकप्रिय खेळासाठी मात्र असा आभासी खेळ देत नाहीत. याचा निषेध केला जातो आहे. कारण...

‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेमध्ये केवळ दर पाच वर्षांनीच या खेळाची मजा लुटता येणार असल्याने अभिजित बिचुकले ‘जंतर मंतर’वर उपोषणास बसणार आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आरसीबी संघ त्याच्या व्यवस्थापनासह एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. कारण...

उलट ‘आयपीएलच्या धर्तीवर वार्षिक निवडणूक असायला हवी आणि ती ही पळण्याच्या शर्यतीप्रमाणे ‘सारे एकदम’ न लढवता आयपीएलच्या धर्तीवर ‘एकास एक’ पद्धतीने लढवावी– म्हणजे मनसेसारख्या पक्षांनाही एखाद-दुसर्‍या विजयाची संधी मिळू शकेल’ अशी मागणी मूळसेना-नेते भंजक खाऊच आणि गतस्वाभिमान-नेते हरिहर नानू खाणे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे केली आहे. कारण...

‘लोकांना सतत निवडणुकांच्या धामधुमीत नि उत्तेजित अवस्थेत ठेवण्याने आपल्या लाथाळीला मिळणारा वाव नाहीसा होईल’ या भीतीने बायचुंग भुतिया या फुटबॉल महाशक्तीने आपल्याला छुपा पाठिंबा दिल्याचा दावा या दोघांनी केला आहे. कारण...

आयपीएलच्या ’फॅन पार्क’ संकल्पनेमध्ये ज्याप्रमाणे सामने नसलेल्या शहरांत चाहत्यांना स्टेडियममध्ये एकत्र सामना पाहण्याचा आनंद दिला जातो, त्याच धर्तीवर आपापल्या नेत्याच्या अन्य शहरांतील सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळावी यासाठीही असे फॅन पार्क निर्माण करून तिथे मोठ्या स्क्रीनवर आपल्या लाडक्या नेत्याचे संपूर्ण भाषण लाईव्ह दाखवावे अशी मागणी सर्वपक्षीय फॅन्सतर्फे करण्यात आली आहे. कारण...

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांचे स्वत:चे चॅनेल्स व वेबसाईट्स असतात नि त्यावरून आपल्या लाडक्या संघ व खेळाडूंच्या जुन्या खेळी पुन्हा पुन्हा पाहून आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे आप-आपल्या लाडक्या नेत्यांची भाषणे, विरोधी नेत्यांच्या भाषणातील चुका अधोरेखित/निर्माण करणारे मीम्स आणि रील्स, चॅनेल-चर्चेमध्ये आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याला वा चॅनेल-प्रतिनिधीला कस्सला धुत्तला हे दाखवणारे असे सारे व्हिडिओज, माहिती, लेख वगैरे एकाच ठिकाणी देणारे चॅनेल्स आणि वेबसाईट्स असायला हव्यात अशी आग्रहाची मागणीही करण्यात आली आहे. कारण...

आयपीएलमध्ये प्रत्येक ओव्हरनंतर जाहिरात दाखवतात त्याच धर्तीवर निवडणुकीतील प्रचाराच्या भाषणांदरम्यान जाहिराती दाखवण्यात याव्यात अशी मागणी थडानी ग्रुप्स या मॉरिशसस्थित आफ्रिकन-अमेरिकन कंपनीने केली आहे. ‘म्हणजे अजून पैसा’ हे ध्यानात आल्यावर डोळे लकाकलेल्या बीसीसीआय प्रमुखांनी ‘एक देश एक निवडणूक’ अध्यादेशामध्ये या पुरवणी मागणीचा समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. कारण...

एका भाषणात दोनच बाउन्सर(!) अलौड असावेत, ‘रिव्हर्स’ स्वीप या फटक्यावर प्रचारामध्ये बंदी घालण्यात यावी. निवडणुकांचा प्रचार चालू असताना ऐनवेळी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून हार्दिक पांड्याप्रमाणे विरोधी उमेदवारच आपला उमेदवार म्हणून जाहीर करण्याची सोय असायला हवी... इत्यादि मागण्या ‘गुजरात जायन्ट्स’(!) संघाने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. कारण...

निवडणुका अधिक रोमांचकारी होण्यासाठी मागे फन्ना पाडारे(!) यांनी मागणी केल्याप्रमाणे, युक्रेनसोबत युद्ध पुकारल्यानंतर खेळणार्‍या रशियन खेळाडूंप्रमाणे अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्यात नि नंतर आयपीएलच्या धर्तीवर विजेत्यांचा लिलाव करून विविध संघांनी त्यांना विकत घ्यावे. जे सर्वाधिक खासदार विकत घेऊ शकतील त्यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करावे. कारण...

...कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!!

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, १५ मे, २०२४

शब्दांनी हरवुनि जावे

आठ-दहा दिवसांपूर्वी गलगोटिया विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता - बहुधा- मतदार असलेल्या हे विद्यार्थी आपण इथे काय करत आहोत, हाती धरलेल्या घोषणापत्रांवर काय लिहिले आहे वगैरे बाबत अनभिज्ञ दिसत होते. सद्य राजकीय सामाजिक स्थितीचे प्रतिबिंबच त्यांच्या वर्तनात दिसत होते असे म्हणता येईल.

या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब ही की या प्रतिनिधीने काही जणांना त्यांच्या स्वत:च्या हातात असलेल्या घोषणापत्रावर काय लिहिले आहे हे वाचण्यास सांगितले असता इंग्रजीमध्ये लिहिलेले तर सोडाच काहींना मातृभाषा हिंदीमध्ये लिहिलेली ती घोषणाही वाचता येत नव्हती. यावरून त्यांच्या शिक्षणाबद्दल, यांना मतदार म्हणून मान्यता देण्यात घाई होते आहे का इत्यादि प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. परंतु मला यात एका संक्रमणाची चाहूल दिसते आहे. यात बरे-वाईट परिणाम दिसतीलच, परंतु याचे संभाव्य दुष्परिणाम मला दिसतात जे अधोरेखित करावेत असे वाटते.

IAmConfused
https://www.freepik.com/ येथून साभार

यांना शब्दांचे अर्थ समजावेत ही अपेक्षा बाजूला ठेवूनही मला असा प्रश्न पडतो, ‘ज्या मुलांना सज्ञान झाल्यावरही ही चिरपरिचित लिपी बिनचूक वाचता येत नसेल तर याचे कारण काय असावे?’ लहानपणापासून नागरी लिपीतील मजकूर वाचणे त्यांच्या अंगवळणी पडलेले आहे. पहिल्या इयत्तेत मुळाक्षरे त्यांनी गिरवली आहेत, जाता-येता दुकानांचे बोर्ड वाचले आहेत, (निदान) क्रमिक पुस्तके वाचली आहेत. मग वय वाढू लागल्यावर हे ‘अनरिंगिंग ऑफ बेल’ किंवा हे ‘अनलर्निंग’ म्हणावे का? असेल तर हे का घडत असावे?

शाळेत असताना पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर मागील इयत्तांमध्ये आत्मसात केलेली माहिती (मी ‘ग्रहण केलेले ज्ञान’ म्हणण्याचे धाडस करत नाही) स्मरणातून सहज निसटून जाण्याला गंमतीने ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ असे म्हटले जाई. ही पाठांतरप्रधान, संस्कारप्रधान समाजात असलेली जन्मव्याधी आहे. आकलनाऐवजी अनुकरणाला, ग्रहण करण्याऐवजी पाठांतराला महत्त्व देणार्‍या पंतोजी शिक्षणपद्धतीमध्ये याहून वेगळे अपेक्षित नाही.

मागच्या स्तरावर नवा स्तर चढला की आधीच्या स्तराकडे पोहोचण्यास नव्या स्तराचा अडथळा तयार होतो. आकलन म्हटले तर प्रत्येक स्तरातील ज्ञानाची एक अनुक्रमणिका, what and where किंवा संगणकाच्या भाषेत सांगायचे तर मास्टर फाईल टेबल (MFT) तयार होऊन त्याआधारे हवे तेव्हा त्या स्तरातील माहिती उपसून काढण्याची सोय होत असते. पाठांतरप्रधान मंडळी कपड्यांच्या घड्यावर घड्या ठेवून नुसतेच ‘कोठावळे’ (hoarders) होऊन राहतात.

हे ‘अनलर्निंग’ त्याच्याही पुढचा टप्पा आहे का? जी वाक्ये त्यांनी शाळेत असताना सहज वाचली असती, ती आज त्यांना का वाचता येत नाहीत? त्यांनी स्वत:च्या बुद्धीने जे लिहिले असते त्याचेच आकलनही त्यांना का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, मला स्वत:चेच अनुभव जमेस घेऊन काही एक आकलन होऊ लागले. हे कितपत गंभीर आहे मला माहित नाही, परंतु ‘हे असे नाहीच’ वा ‘प्रमाण नगण्य आहे’ असे कुणी म्हणाले, ‘वडाची साल पिंपळाला लावतो आहेस’ (किंवा फेसबुक वा एकुण सोशल मीडिया नागरिकांच्या प्रवृत्तीला अनुसरून वैय्यक्तिक शेरेबाजी करत ‘तुझा छुपा अजेंडा आहे’) असे कुणी म्हणाले तर मी अजिबात मान्य करणार नाही हे नक्की.

माझ्या मते याला ‘दृश्यात्मकतेच्या आहारी जाणे’ हा मोठा दोष कारणीभूत आहे.माझी ब्लॉगयात्रा’ या मालिकेमध्ये मी अभिव्यक्तीच्या शब्द या माध्यमाची निवड मी का केली यावर थोडे भाष्य केले होते. त्याचबरोबर फेसबुकसह सर्वत्र फोटो/इमेज अथवा व्हिडिओ यांचे प्राबल्य असल्याने अभिव्यक्तीच्या काय समस्या निर्माण होतात याबाबतही थोडे लिहिले होते.

एक उदाहरण म्हणून माझी कालचीच फेसबुक-पोस्ट पाहता येईल. त्या पोस्टमध्ये मी सरमिसळ घटक अथवा confounding factors बाबत बोलत होतो. त्या मुद्द्याचे उदाहरण म्हणून एक भाष्यचित्र जोडले होते. सुरुवात जरी उपहासाने केली असली तरी माझ्या मते पोस्ट गांभीर्यपूर्वक मांडणी करणारी होती. (पोस्ट असल्याने मांडणी स्वैर होती हा दोष मान्य.) परंतु फेसबुक दृश्यात्मकतेला अवाजवी प्राधान्य देत असल्याने इमेजने व्यापलेली जागा मजकुराहून अधिक असते. यातून झाले असे की फेसबुकवर वा काही फेसबुककर नसलेल्या काहींना लिंक पाठवल्यावर हा: हा: अशी प्रतिक्रिया आली.

निव्वळ भाष्यचित्र पाहता ती वाजवी आहे... कदाचित. परंतु पोस्ट वाचल्यानंतर तशी येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे या प्रतिसादकांनी पुरी पोस्ट वाचली असण्याची शक्यता कमी आहे. चटकन इमेज पाहिली नि प्रतिसाद दिला असे झाले असण्याची शक्यता बरीच आहे. ‘लिहिले असेल नेहमीप्रमाणे लांबलचक, कशाला वाचा’ या विचारही एखाद्याने केला असेल (‘हा पाच मैल लिहितो, एवढे कोण वाचणार’ अशी एका मित्राची प्रतिक्रिया फार पूर्वी आलेली होती. तो दोष मान्य करून त्याच्या त्या प्रतिक्रियेमध्येच शब्दमाध्यमाबद्दलचा कंटाळा दिसतो हे नोंदवून ठेवतो.)

मी लिहितो म्हटल्यावर ‘समय के साथ चलो’ वाल्यांनी ‘लेखन अधिक पोहोचावे म्हणून संपूर्ण मजकूर फेसबुकवर टाकावा’ असा सल्ला दिला होता. त्याचा प्रतिवाद करताना मी फेसबुकच्या इमेज-मजकूर असमतोलाबद्दल आणि मांडणीच्या जाचक मर्यादेबद्दल नि त्याच्या परिणामांबद्दल लिहिले होते. ही मागची फेसबुक-पोस्ट याचे आणखी एक उदाहरण.

आज बहुसंख्येला मीम्स, रील्स, मायक्रो-व्हिडिओज वगैरे माध्यमांतूनच सारे काही हवे असते. त्यातून मग आकलनप्रधान, विश्लेषणप्रधान, मुख्य म्हणजे शब्दप्रधान मांडणी करणार्‍यालाही यू-ट्यूब चॅनेल चालू कर, छोटे व्हिडिओ बनव, पॉडकास्ट कर वगैरे सल्ले दिले जातात. शब्दाचे वाचन कमी कमी करत नेणार्‍या या पिढीमध्ये लिपीशी बांधिलकी विरत जाणार हे अपरिहार्य आहेच.

‘J1 झालं का?’ या सनातन प्रश्नापासून सुरु झालेली चॅट भरपूर प्रमाणात इमोजींचा वापर करते. टाईप कमी करावे लागावे हा उद्देश असतो. म्हणजे ‘मला हे आवडले नाही’ या वाक्याच्या जागी रागावलेली एक इमोजी टाकली की काम भागते. कदाचित लिपीप्रमाणेच पुढे या इमोजीचा अर्थ लावणेही मेंदू बंद करेल नि थेट त्यातील त्या-त्या भावनेचे निदर्शक असणारे केंद्र उद्दीपित करेल. हे कदाचित प्रासंगिक संवाद वा देवाणघेवाणीस पुरेसे असेलही, पण दस्तऐवजीकरणावर याचा काय परिणाम होईल याचा विचारही करायला हवा.

नफा हेच एकमेव उद्दिष्ट घेऊन उभे राहिलेली भांडवलशाही व्यवस्था भरपूर पैसे निर्माण करत असली तरी गुणवत्ता, वैविध्य आणि मुख्य म्हणजे पर्यावरण याची ऐशीतैशी करते; तसेच प्रासंगिक संवाद महत्त्वाचा नि बाकी सारे दुय्यम समजू लागणे घातक आहे का याचा विचार आवश्यक आहे का या प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारुन पाहायला हवा.

पोस्ट आधीच भरपूर लांबल्यामुळे फार उदाहरणे देत नाही. एकदोनच पाहू. समजा हे दृश्यप्रधान जगातील तरूण एखाद्या गुन्ह्याचे साक्षीदार असतील आणि पोलिसांच्या आरेखकाने यांना पाहिलेल्या गुन्हेगाराचे वर्णन विचारले अथवा घटनाक्रम नि गुन्ह्याच्या स्थानावरील जड वस्तूंच्या स्थितीबाबत विचारणा केली, तर वास्तवाच्या त्या अवकाशातील विविध घटकांसाठी नेमके शब्द यांना सापडतील, की मनात त्याला अनुरूप इमोजीच फक्त उमटतील? की वस्तुनिष्ठतेच्या नि दृश्यात्मतेच्या अवाजवी आहारी गेलेला माणूस संभाव्य मानवी वावराच्या परिसरातील प्रत्येक चौरस से. मी. वर विविध अँगलने पाहणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल, जेणेकरुन माणसाच्या वर्णनक्षमतेवर अवलंबूनच राहायला नको?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकाच्या पडद्यापलिकडे माणसाचा परस्परसंवाद - आज झाला आहे त्याहून - कमी होत जाईल. समोरासमोर बसून एकमेकांना ‘आयएम’ करणे अधिक सुलभ होईल का? कारण अनेक वाक्यांची रचना ही शब्दांऐवजी इमोजींनी करणे अंगवळणी पडलेले असेल. आजही लांबलचक मजकूर कुणी वाचायचा म्हणून बहुतेक अ‍ॅप्स, उपकरणे (devices) यांची लायसन्स-अग्रीमेंट्स आपण न वाचता अ‍ॅक्सेप्ट करुन पुढे जातो. या अधीर वृत्तीला अज्ञानाची जोड मिळून हे भूत आणखी किती विक्राळ रूप धारण करेल?

आज हा अतिरंजित कल्पनाविस्तार वा प्रलयघंटानाद वाटू शकेल, परंतु माझ्या मते हे वास्तव दूर असले तरी आपल्या वाटेवर आहे हे नक्की

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

मी लिंक टाकली

संसदीय निवडणुकांची धामधूम चालू असल्याने समाजमाध्यमांवर असणारे ट्रोल्स सक्रीय होत आहेत. सत्ताधार्‍यांच्या सोयीसाठी कोणत्याही मुद्द्याला हिंदू-मुस्लिम वादाचा तडका देण्यास ते तत्पर होऊ लागले आहे. अनेक तोंडांनी, हातांनी आणि अकाउंट्समधून प्रसवलेले प्रचारसाहित्य परस्परांच्या लेखन-लिंक्स नि दाखले देत वेगाने पसरवणे चालू आहे.पावसाळ्याच्या तोंडावर जसे बेडकांचे ड्रांव ड्रांव अधिक कर्कशपणे ऐकू येऊ लागते, तसेच यांचे दुर्दरगान निवडणुकीच्या पुढील टप्प्यांत अधिक कर्कश होत जाईल.

स्वत:च्या जिवाची बाजी लावून मालकाला संभाव्य धोका वाटणार्‍या प्रत्येकावर भुंकणार्‍या श्वानाप्रमाणे यांचे वर्तन होत असते. वारयोषिता स्वत:चे पोट जाळण्यासाठी चोळीची गाठ सोडते; हे मालकाला आपला दलाल मानून त्याच्यासाठी आपली चोळी त्यागतील नि आपल्या अब्रूला त्याच्या राजकीय समर्थनाच्या बाजारात उभी करतील.

अशांनी उघड व्यक्त न केलेले हे मनोगत.
---

InternetTroll
https://www.socialpilot.co/blog/social-media-trolls येथून साभार.
(कविवर्य ना. धों. महानोर यांची क्षमा मागून...)
    
मी लिंक टाकली
मी शिंक टाकली
मी गुडघी अक्कलेची, बाई पिंक टाकली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत वळवळ वळवळ केली
भर वादामधी जाळ, फुंकून ठिणगी फुलली

ह्या पोस्टींवरती
ते मीम पांघरती
मी फक्त हासले बाऽई, नाही कमेंट केली... नाही कमेंट केली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत, वळवळ वळवळ केली...

अंगात माझिया
घुसलाय फेकिया
मी भिंगरभिवरी त्याची गोऽ बटीक झाली
मी चाळीस पैशांसाठी बाई चोळी टाकली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत, वळवळ वळवळ केली...
 
- oOo -

हे वाचले का?

रविवार, २८ एप्रिल, २०२४

अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी

(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन केले. त्याच सुमारास भारतामध्ये झालेल्या नोटाबंदीच्या अनुषंगाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा थोडा विस्तार करुन लिहिलेली ही काल्पनिका.)
---

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महान भारतीय अर्थशास्त्री विजय मल्ल्या ऊर्फ मल्ल्यामहर्षी यांनी युरपमधून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे (अ.सं.सं.) गुपचूप गमन(१) केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बातमी तर गुप्त ठेवण्यात आलीच होती. अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’च्या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ नील्स बोर याला ज्या सफाईने अमेरिकेमध्ये नेण्यात आले होते त्याच सफाईने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले.

प्रथम एका कार्गो विमानाने मल्ल्यामहर्षींना डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. आधीच सूचना मिळाल्याप्रमाणे, विमानतळावरील अ.सं.सं.च्या अधिकार्‍यांनी इमिग्रेशन-चेक वगैरेचे सोपस्कार बाजूला ठेवून त्यांना थेट एका अति-सुरक्षित अशा लहानशा विमानाकडे नेले. हे विमान खुद्द अ.सं.सं. अध्यक्षांनीच पाठवले होते, हे नंतर प्रेस-ब्रिफिंगमध्ये उघड झाले. या विमानाने महर्षींना थेट रीगन विमानतळाकडे नेण्यात आले. तिथे मात्र त्यांचे आगमन जाहीर करण्यासाठी स्पेशल बँड आणवून वाजतगाजत त्यांना थेट राष्ट्राध्यक्ष निवासाकडे नेण्यात आले.

नील्स बोर याच्या आगमनाचे कारण बरेच उशीरा उघड झाले होते. तसेच मल्ल्यामहर्षींना कोणत्या मोठ्या ऑपरेशनसाठी ‘कमिशन’ करण्यात आले आहे यावर अ.सं.सं.च्या माध्यमांमधून घनघोर चर्चा सुरू झाल्या. भारतीय माध्यमांनी ‘फक्त आमच्याच चॅनेलला मिळालेली गुप्त बातमी’ म्हणून ‘मल्ल्यामहर्षींना अध्यक्षांचा ‘मद्य-सचिव’ म्हणून नेमण्यात येणार आहे’ यापासून ‘स्वदेशात अडचणीत आल्यास परदेशाश्रय कसा घ्यावा’ यावर व्हाईट हाऊसमध्ये निवडक रिपब्लिकन खासदारांना ते मार्गदर्शन करणार असल्याची’ ब्रेकिंग न्यूज – अर्थात ग्राफिक्स वगैरेसह – वाजवण्यास सुरुवात केली. भारतीय माध्यमांच्या पावलावर पाऊल टाकत अमेरिकन माध्यमांनी मल्ल्यामहर्षींचा सहभाग असलेल्या या संभाव्य गुप्त कार्यक्रमाला ‘ऑपरेशन रॉयल चॅलेंज’ असे नाव देऊन टाकले.

MallyaaAndTrump

मल्ल्यामहर्षी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पोहोचले. औपचारिक स्वागत झाल्यावर अध्यक्ष ट्रम्प नि मल्ल्यामहर्षी दोघेच त्यांच्या अति-सुरक्षित चर्चागृहात गेले. दोघांची जेमतेम दोनच मिनिटे चर्चा झाली. यावरून प्रस्तावित ऑपरेशनबाबत अध्यक्षांची मल्ल्यामहर्षींसोबत आधीच सविस्तर चर्चा झाली असल्याचे फॉक्स न्यूजने आळवण्यास सुरुवात झाली. चर्चागृहातून दोघेही बाहेर येऊन थेट पेंटगॉनकडे रवाना झाले. तासाभरातच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्याची आणि त्यांच्या उपाध्यक्षांनीही राजीनामा दिल्याची बातमी पसरली. सोबतच मल्ल्यामहर्षी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असल्याची बातमीही आली.

अ.सं.सं. मधील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोजगार धंदे सोडून लोक रस्त्यावर आले, एकमेकांना मिठ्या मारुन, जोर-जोरात घोषणाबाजी करत आणि मुख्य म्हणजे बीअर पीत ते आपला आनंद व्यक्त करत होते. ही भिकारडी जर्मन बीअर आपल्याला प्यावी लागणार नाही, अस्सल भारतीय बनावटीची बीअर मल्ल्यामहर्षी आपल्याला उपलब्ध करून देतील या कल्पनेनेच तरुणांचा जल्लोष सुरू झाला.

पदभार स्वीकारल्यानंतर मल्ल्यामहर्षींनी पहिलीच घोषणा केली ती ‘नोटाबंदीची’! वरिष्ठ सभागृह (Senate) तसंच प्रतिनिधी-गृहातील (House of Representatives) रिपब्लिकन सदस्यांनी धडाधड केलेल्या ट्विट्स, पोस्ट्स नि फेसबुक लाईव्हद्वारे ‘अमेरिका फर्स्ट’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा आता सुरु होत असल्याचे ढोल वाजवायला सुरुवात केली. भारतात अतिशय यशस्वी झालेल्या या उपायाची अंमलबजावणी करण्याचे जाहीर झाल्याने अ.सं.सं. मधील नागरिक आणखीनच खूश झाले आणि ‘आले रे आले, अच्छे दिन आले’ अशा घोषणांनी त्यांनी आसमंत दणाणून सोडले.

भारताप्रमाणेच अ.सं.सं. मधील विरोधकांचा आरडाओरडा सुरु झाला(२). पण मोदींप्रमाणेच मल्ल्यामहर्षींनी या विरोधाला भीक घातली नाही. रिपब्लिकन प्रतिनिधी, ट्रम्प-आर्मी, ‘फॉक्स’सारखी माध्यमे यांनी विरोधकांना ‘चीनचे हस्तक’ म्हणून हिणवण्यास सुरुवात केली. या गदारोळामध्ये फेडरल रिजर्वने केलेला विरोधही पाचोळ्यासारखा उडून गेला.

नोटाबंदी जाहीर झाल्याने जुन्या नोटांच्या बदली देण्यासाठी नव्या डॉलर नोटा(३) छापण्यास सुरुवात झाली. मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये काळा पैसा साठवला जात असल्याने रद्द केलेल्या पाचशे नि हजारच्या नोटांऐवजी दोन हजारच्या नोटा छापणार्‍या मोदींच्या पावलावर पाऊल टाकून मल्ल्यामहर्षीं काम करू लागले. त्यांनी अ.सं.सं.ला वेगाने श्रीमंत करण्याच्या उद्देशाने थेट पाच मिलियन डॉलर्सच्या नोटा छापण्याचचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला पंधरा मिलियन डॉलर्स सरकारतर्फे देण्याची घोषणा केली(४). पुढील दोन महिन्यांमध्ये हे वाटप व्हावे या दृष्टीने नियोजन करण्याचा आदेश त्यांनी दिला.

ज्या दिवशी हे वाटप सुरू होणार होते, त्या दिवशी भल्या पहाटेपासून लोकांनी एटीएम्ससमोर रांगा लावल्या होता. रांगेतले काळे, पांढरे, पिवळे, तांबडे, बुटके, उंच, काळ्या डोळ्याचे, निळ्या डोळ्यांचे, भुर्‍या डोळ्यांचे, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सारेच आनंदाने एकमेकांना मिठ्या मारत होते, शुभेच्छा देत होते. येऊ घातलेल्या ‘अच्छे दिनां’च्या चाहुलीने झालेला आनंद त्यांना आवरता येत नव्हता. अखेर ती वेळ आली. सकाळी सहा वाजता रेडिओवरून(५) सर्व एटीएम नव्या नोटांनी गच्च भरल्याची नि सर्वांसाठी ते खुले झाल्याची घोषणा मल्ल्यामहर्षींनी केली नि नागरिकांची आपल्या नेहमीच्या शिस्तीला विसरून एटीएममधे घुसण्याची अहमहमिका सुरू झाली.

वॉशिंग्टनच्या रस्त्यावर राहणार्‍या एका बेघर व्यक्तीने त्याच्या ‘घरा’शेजारच्या एटीएमसमोर दोन दिवसांपासून नंबर लावलेला होता. एटीएममधून पैसे काढून ती व्यक्ती बाहेर पडली आणि कॅमेर्‍यांचे क्लिकक्लिकाट चालू झाले. ‘आम्हीच पैले’ म्हणत त्याचा ‘बाईट’ घेण्यास धावलेल्या चॅनेल प्रतिनिधी आणि स्वयंघोषित यू-ट्युब चॅनेलशास्त्रींना धक्काबुक्की करत बाजूला करुन काही तरुण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. आनंदातिशयाने त्या भाग्यवंताला डोक्यावर घेऊन त्यांनी नाचायला सुरुवात केली. पहिला उत्साह ओसरल्यावर तिला खाली उतरवण्यात आले. नव्या नोटेस तिने उंच धरून सर्वांनी त्यासोबत सेल्फी काढावी असा प्रस्ताव एका तरुणाने मांडला नि तो उत्साहात नि एकमताने पास झाला.

ताबडतोब त्या ‘प्रथम-नोट-प्राप्त’ भाग्यवंताला मधे घेऊन त्याच्या आजूबाजूने बरेच लोक दाटीवाटीने उभे राहिले. त्या भाग्यवंताच्या शेजारी उभे असलेल्या तरुणाने मोबाईल समोर धरून सर्वांना ‘से बीअऽऽऽऽर’असे म्हणून क्लिक केले. त्याच वेळी समोरुन फोटो काढण्यासाठी सज्ज असलेल्या एकाने झूम थोडा कमी करून सर्वांना कव्हर करता यावे यासाठी स्क्रीनवर बोटे टेकवली. इतक्यात एटीएममध्ये नंबर लागून नोटा मिळालेला एकजण अत्यानंदाने धावत त्याच्या शेजारून गेला. जाता जाता त्याचा धक्का या कॅमेर्‍याधार्‍याला लागला नि वाईड अँगलऐवजी उलट कॅमेरा जास्तच झूम झाला. समोरचे सारे लोक आता आउट-ऑफ-फोकस जाऊन स्क्रीनवर फक्त नोट दिसत होती. त्यावर लिहिलेले वाक्यही स्पष्ट वाचता येत होते...

‘इन फ्रॉड वी ट्रस्ट’ (६)

- oOo -

टीपा :
(१). ‘पलायन केले’ असे म्हणणार होतो पण कुणाच्या तरी भावना दुखावल्या तर पंचाईत. (* टीप ६ पहा.)
(२). ‘तसंही या डेमोक्र्याट्यांना आरडाओरड करणं सोडून दुसरं येतंय काय?’ - सॅम-बिन पॅट्रोस, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, दक्षिण-पश्चिम न्यू हॅम्पशायर परगणा, गल्ली क्र. ८.
(३). तिकडे त्यांना बिल्स म्हणतात नि बिलाला चेक. पण ‘ज्याले ऑनर करु नही, त्याले चेक म्हनू नही’ असं सांगून अ.सं.सं.च्या लोकांचे हे उलटे डोकेही मल्ल्यामहर्षी लवकरच सरळ करतील.
(४). ‘त्यापेक्षा किंगफिशर माईल्डचे पंधरा क्रेट दिले असते तर अधिक उपयोगी ठरतील, या रिपब्लिकनांच्या देशात!’ - योशुआ सिनहॅम, ‘हिलरी इज किलरी’ या डेमॉक्रॅटिक पार्टी-अंतर्गत दबाव गटाचे निमंत्रक.
(५). ‘टीव्ही नव्हता का?’ बावळट प्रश्न विचारणार्‍याला ‘ग्वाटानामो बे**’ला डीपोर्ट करण्यात येईल. (** टीप ६ पहा.)
(६). ज्यांना संदर्भ माहीत नसेल, त्यांनी आपल्या धार्मिक/अधार्मिक श्रद्धेय पुस्तकांत सारे ज्ञान आहे या आपल्या दाव्याची सुरळी करून... ...माळ्यावर टाकून द्यावी.

---
संबंधित लेखन:

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’) >>
अशी ही पळवापळवी >>
---


हे वाचले का?

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

गजरा मोहोब्बतवाला

सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) .

माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला आहे.

‘याला किस्सा, अनुभव म्हणावे का?’ असा प्रश्न कुणाला पडेल. पुरे वाचल्यावर ‘ही एक नित्य घडणारी किरकोळ, अदखलपात्र घटना आहे’ असे बहुतेकांचे मत असेल. (आणि हे खरडणे खरं तर त्यांच्याच साठी आहे.) पण हा प्रसंग माझ्या डोक्यात कायमचा घर करून राहिलेला आहे याचे कारण– कदाचित– माझी पिंडात ब्रह्मांड पाहण्याची अगोचर वृत्ती असेल. ते काही असो, तो प्रसंग आणि त्या वेळी माझ्या मेंदूचे फसफसणे इथे मांडून मोकळा होणार आहे.

---

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी घरातून बाहेर पडलो, सोसायटीचे फाटक ओलांडून नि.र. वर आलो. इथून म.र.ला जोडणारे वळण काही फुटांवर आहे. भारतीय मंडळींचा वाईट सिव्हिक-सेन्स आणि इतरांच्या सोयीचा शून्य विचार यांचा सज्जड पुरावा पाहायचा तर ‘जरा विसावू या वळणावर’.

StreetFlowerSeller
https://scroll.in/ येथून साभार.

नि.र.कडून उजवीकडे वळणावरच एक गजरेवाला उभा आहे. त्याच्या समोर काही क्रेट्स आडवे टाकून त्यावर एक फळी टाकलेली आहे. त्यावर ओतलेल्या अनाकलनीय रंगाच्या मोगर्‍याच्या फुलांवर तो पाणी मारतो आहे. त्याच्या शेजारी एका फळवाल्याने त्याच पद्धतीने पथारी लावलेली आहे. त्याच्या पायाशी फळांच्या खोक्यांतून बाहेर पडलेले गुलाबी कागद, स्पंजची जाळी, पुठ्ठे वगैरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या दोघांनी मिळून उजवीकडे वळण्यास– आणि तिकडून नि.र.कडे आत वळण्यास अडथळा निर्माण केला आहे.

नुकताच गजरा किंवा मोगरा घेऊन निघालेली एक माता, कुणी एक आजी भेटल्यामुळे तिच्याशी गप्पा मारत फळवाल्यासमोरच उभी आहे. तिचे तीन-चार वर्षांचे मूल तिचे बोट पकडून असले तरी रस्त्याच्या मधोमध उभे आहे, याची तिला जाणीव नाही. या तिघांनी मिळून नि.र.चा अर्धा रस्ता अडवलेला आहे. या दोन विक्रेत्यांच्या समोरच्या बाजूला, म्हणजे डावीकडील वळणावर आणखी एक फळवाला आपले दुकान मांडून आहे. त्यामुळे हा फळवालाआणि ते पलीकडचे मूल यांच्या मधून जेमतेम एक रिक्षा कशीबधी जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक आहे. त्यातूनच मला बाहेर पडून इच्छित स्थळाकडे प्रयाण करायचे आहे.

मी तिथे पोहोचतो न पोहोचतो, तोच म.र. वरून उजव्या बाजूने एक कार येते नि थेट त्या गजरेवाल्याच्या शेजारी थांबते. आता म.र.कडून आमच्या नि.र. कडे वळण्यासाठी तिकडून येणार्‍यांना राँग साईडने जाऊन या कारच्या पुढून काटकोनात वळण घेण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आणि तसे केलेच तरी... माता, मूल आणि आजींच्या गप्पा चालू आहेत... दोन्ही फळवाल्यांसमोर कुणीतरी उभे आहे... म्हटल्यावर ते वळलेले वाहन उरलेला रस्ता बंद करत अडकून पडणार हे नक्की झाले.

पण ते जाऊ द्या. आपल्या वाहतूक नियमांबाबत बेशिस्त देशात (एक मिनिट– चुकलो हं. आमच्या बेशिस्त गावात– तुमचे गाव गुणी आहे, ओके?) यात काय नवीन असे तुम्ही म्हणणार हे मला ठाऊक आहे. महासत्ता होण्याच्या वाटेवर सिव्हिक-सेन्स– जबाबदार सार्वजनिक वर्तणूक हा मुद्दा आपण धरत नाही. किंबहुना एकुणातच इतिहासाचा चिखल चिवडणार्‍यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये नागरिकशास्त्र तसेही दहा-वीस गुणांपुरते अंग चोरून उभे असते; बहुतेकांनी ऑप्शनला टाकलेले असते.

त्या कारची काच ऐटीत सर्रकन खाली होते. खिडकीतून गॉगल लावलेला एक ऐटबाज चेहरा बाहेर डोकावतो. शेजारी त्याचं खटलं/पत्नी/पार्टनर/जोडीदार बसलेली आहे. ऐटबाज चेहरा गजरेवाल्याला दोन गजरे मागतो. गजरेवाला प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे एकुण वीस रुपये किंमत सांगतो. ऐटबाज चेहरा ‘छे: इतक्या लहानशा गजर्‍याचे दहा रुपये? काहीही काय सांगतोस. दहाला दोन दे.’ म्हणत घासाघीस सुरू करतो. गजरेवालाही ‘खरेदी पण एवढी नाही’ वगैरे सुरू करतो. अठरा रुपये, पंधरा रुपये वगैरे एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे सुरू होते. पण गजरेवाला अजिजीने नकार देत राहतो.

ऐटबाज व्यक्तीच्या कारने म.र. आणि नि.र. दोहोंचीही कोंडी केलेली असल्याने आसपास हॉर्न वाजू लागलेले असतात. ऐटबाज चेहर्‍याशेजारच्या पत्नीच्या चेहर्‍यावर वैतागाचे भाव दिसू लागतात. अखेर ‘दे चल.’ असे म्हणत ऐटबाज चेहरा दोन गजरे घेतो आणि बायकोकडे देतो. खिशातून पाकीट बाहेर काढतो नि गजरेवाल्याच्या हातावर पंधरा रुपये टिकवतो. गजरेवाला ‘अजून पाच रुपये द्या.’ म्हणू लागतो. पण ‘नाही नाही, हे बरोबर आहेत’ असे म्हणत ऐटबाज चेहरा आपल्या अष्टलक्षी गाडीला टाच मारून भरधाव वेगाने निघून जातो.

हतबुद्ध झालेला गजरेवाला गोठलेल्या अवस्थेत काही क्षण उभा असतो. भानावर येतो नि नशिबाला बोल लावत पैसे खिशात टाकून मोकळा होतो. दरम्यान म.र. नि नि.र. दोन्ही रस्ते मोकळे झाल्याने हुश्श: करत मागचे सारे मोकाट सुटतात. गजरेवाला पुढच्या गाडीवाल्याची वाट पाहात ताटकळत उभा राहतो.

---

ऐटबाज चेहर्‍यावरचा दीड-एक हजार रुपयांचा गॉगल, जोडीदाराच्या अंगावर असलेली पाच ते सात हजारांची साडी आणि पाच ते आठ लाखांची गाडी खरेदी करताना याला पैसे कमी पडले नसावेत. गजरेवाल्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला गाडी लावून विकले जाणारे शंभर-दीडशे रुपयांचे गॉगल त्याला ‘बिलो डिग्निटी’ वाटत असावेत. चांगल्या दर्जाचे, पण अन-ब्रँडेड कपडे त्याला चालत नसावेत. पैसे देताना– देणार्‍या हातात घातलेली अंगठी पितळेची आहे की सोन्याची हे त्याला स्वत:ला खात्रीपूर्वक सांगता आले नसते. त्यात घातलेला खडा वा हिरा खरा आहे की खोटा याचीही त्याला गंधवार्ता नसते. तरीही सुवर्णकाराने सांगितलेली (आणि वर डिस्काउंटची भाषा करून थातुरमातुर कमी केलेली) किंमत त्याने निमूट मोजली असेल. पण गजरेवाल्याचे पाच रुपये मारण्यासाठी भर चौकात चालत्या गाडीत बसून त्याने पेट्रोल जाळले होते, म.र. नि नि.र. दोहोंकडे अडकलेल्या वाहनांनाही जाळण्यास भाग पाडले होते. यातून पाच रुपयांहून अधिक रकमेची नासाडी त्याने केली होती. पण याची त्याला समजच नव्हती.

यावरून मला ‘डिस्काउंट असेल तरच पुस्तक खरेदी करणार, तीनशेहून अधिक रकमेचे पुस्तक खरेदी करणार नाही,’ म्हणणारे पण बारमध्ये बसल्यावर पुर्‍या बाटलीच्या किंमतीमध्ये एक पेग विकत घेताना कोणतीही घासाघीस न करणारे, वर वेटरला उदारहस्ते टिप देणारे मित्र आठवतात. ऋण काढून सण साजरे केल्यासारखे कुवत नसताना आयफोन, आयपॅड मिरवणारे, पण आरोग्य-विमा (health-insurance) मात्र ‘महाग आहे’ म्हणून न घेणारे मित्र आठवतात. इतरांकडे आहे म्हणून चार-चाकी गाडी घेऊन पेट्रोल– चुकलो, डीजल परवडत नाही म्हणून दारी शोभेची वस्तू म्हणून उभी करुन ठेवणारे, पण त्याचवेळी पैसे वाचवण्यासाठी अर्धा रविवार– कुटुंबाला न देता, स्कूटर हाणत मंडई वा मार्केटयार्डमध्ये जाऊन आठवड्याभराची स्वस्त(?) भाजी घेऊन येण्यावर खर्च करणारे आठवतात...

आपल्या जगण्याचे प्राधान्यक्रम गंडले आहेत असे यांना वाटत नसावे का? आरोग्य-विम्यापेक्षा आयफोन हवासा वाटत असेल, तर आपल्या गरजांची व्याख्या दुसरेच कुणी करते आहे याचे भान आपल्याला कधी येईल? मुळात ज्यांच्या आठवड्याभराच्या भाजीचे एकुण बिल दोनशेच्या वर जात नाही, त्यांचे किती पैसे घाऊक खरेदी केल्याने वाचणार आहेत?

त्यावर एक पळवाट असते की तिकडे चांगली भाजी मिळते म्हणे. सोने गुंतवणूक म्हणून फायदेशीर नाही हे दाखवून दिल्यावर, ‘पण ते ल्यायलाही मिळते’ ही पळवाट जशी काढली जाते तसेच हे. ते खरे असले तरी बरोबर घट नि घडणावळ नावाचे तोट्याचे हिस्से येतात, ते मात्र मोजायचे नसतात... जसे इथे वेळ नि ऊर्जा जमेस धरायची नसते. खरा धार्मिक-खोटा धार्मिक, आर्थिक मध्यमवर्गीय वि. मानसिकतेने मध्यमवर्गीय वगैरे पळवाटा याच जातीच्या. गैरसोयीच्या, तोट्याच्या बाजूकडे दुर्लक्ष करत आपले पूर्वग्रह जपणे हा ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून, सश्रद्ध म्हणून, नास्तिक म्हणून, पुरोगामी म्हणून, धर्मराष्ट्रवादी म्हणून आपल्या प्रत्येकाची सवय असतेच. तिथे पुन्हा ‘आपला गट सोडून ती इतरांमध्येच आहे’ हा एक जास्तीचा नि सामायिक पूर्वग्रहदेखील असतो.

कौतुकाने पत्नीसाठी गजरा घेताना तो मिळाल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अधिक सुखदायक, की पाच रुपये वाचवण्याच्या खटाटोपात तिच्या चेहर्‍यावर उमटलेला वैताग? चलनात मोजलेली किंमत हे सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे मोजमाप कधीपासून झाले याचा विचार कधी करावासा वाटतो का? विकत घेतलेला ‘गजरा मोहोब्बतवाला आहे, घासाघीसीचे पंधरा रुपयेवाला नाही’ याची जाणीव बायकोला झाली तर ती अधिक आनंदी होईल ना? त्यातून नाते अधिक दृढ होईल की आठ लाखाच्या कारमध्ये बसून, दहा मिनिटे खर्च करुन, वट्ट पाच रुपये वाचवल्यानंतर?

असे प्रसंग पाहिले, की बार्गेनिंग करणार्‍या जमातीबद्दलची माझ्या मनातील तिडिक अधिक तीव्र होत जाते. आपल्या महान देशांतील हे खुजे लोक, ‘घासाघीस केली नाही तर आपल्याला फसवतील, किंवा इतरांना स्वस्त मिळेल नि आपण जास्त पैसे देऊन येऊ’ या न्यूनगंडाने पछाडलेले असतात. दुसरीकडे घासाघीस या प्रकाराने जगण्यातील अनेक वस्तूंबाबत गुणवत्तेची ऐशीतैशी होते हे यांच्या ध्यानात येत नाही. सतत स्वस्त ते उचलायचे या एकांगी भूमिकेने गुणवत्ता असलेले पण अधिक किंमतीचे उत्पादन स्पर्धेबाहेर फेकले जाते. वर हे जीव ‘दोन्हींची गुणवत्ता सारखीच आहे’ असे अट्टाहासाने प्रतिपादन करत राहतात, कारण ‘आपण गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही’ हे ते स्वत:ला नि इतरांना पटवू पाहात असतात. (दुसरीकडे ‘महाग तेच गुणवत्ता असलेले’वाली जमात असते, पण हा लेख त्यांच्यासाठी नाही.)

इतिहास हा देशाच्या प्रगतीच्या वाटेवरली क्विकसँड किंवा दलदल आहे, तसेच बार्गेनिंग करणे ही ग्राहकाच्या मनोभूमिकेतील. ही विषवल्ली उपटून टाकली तर आपली ऊर्जा, वेळ तर वाचतोच, पण खरेदीतला, उपभोगातला आनंदही अधिक निष्कलंक, निर्भेळ होत जातो. बघा एकदा प्रयत्न करून.

-oOo-


हे वाचले का?

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

हे ही असेच होते...ते ही तसेच होते - २

(परस्परविरोधी विचारांचे(?) झेंडे घेतलेल्या दोघांचे अनुभव.)

जय श्रीराम

TwoFlagsAlike

आमच्या सोसायटीमध्ये सलग तीन इमारती आहेत. पैकी आमच्या शेजारील इमारतीमध्ये एक उतारवयाकडे झुकलेले गृहस्थ राहतात. अयोध्येमधील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच्या उन्मादात ते अक्षरश: लहान मुलांनी हंडीच्या वेळी अथवा गणेश-विसर्जन मिरवणुकीत नाचावे तसे नाचत होते. तिकडे प्रतिष्ठापना पुरी झाल्यावर हे सोसायटीतील घरोघरी जाऊन ‘पूजा केली का?’ विचारत होते नि देवघराचा फोटो काढत होते. मला विचारल्यावर मी ‘हो’ म्हणून वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘फोटो काढायचे आहेत’ म्हणत घरात घुसू लागले. त्यांना थोपवत मी आडवळणाने कारणे सांगून वाटेला लावले.

दाराशी आलेल्या प्रचारकांकडून स्वीकारलेली अक्षत आईने त्या दिवशी देवावर वाहिलीही होती हे तिने मला नंतर सांगितले. (मला छुपा मनुवादी म्हणण्यास उत्सुक नि होश्शियार बसलेल्या स्वयंघोषित पहिल्या धारेच्या पुरोगाम्यांसाठी हा दारूगोळा माझ्याकडून सप्रेम भेट.)

दुसर्‍या दिवशी सकाळी प्रभातफेरीहून परतताना पाहिले की हे महाशय येणार्‍या जाणार्‍या अपरिचितालाही ‘जय श्रीराम’ म्हणून अभिवादन करत नाचत होते. एखाद्याचे लक्ष नसेल तर तरातरा चालत जवळ जाऊन लक्ष वेधून घेत. बहुतेक सगळे प्रति-अभिवादन करत.

मलाही ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर मी हसून हात केला. ते आणखी दोन पावले पुढे येत म्हणाले, “जय श्रीराम”. मग मी “राम राम” म्हणून अभिवादन केले. त्यावर ते ‘जय श्रीराम’ म्हणा असा आग्रह धरू लागले. म्हटलं, “आम्ही वर्षानुवर्षे असे अभिवादन करत आलो आहोत. फोनवर बोलताना परिचित, जवळची व्यक्ती असेल तर मी ‘राम राम’ म्हणूनच संवाद सुरू करतो.” त्यांना एवढंही पुरेसं नव्हतं. “पण ‘जय श्रीराम’ म्हणायला काय हरकत आहे?”

मग माझं झाकण उडलं. मी ताडकन म्हटलं, “मी कसं अभिवादन करायचं हा माझा प्रश्न आहे. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही.”

एकुणात सश्रद्धांची जुलूमजबरदस्ती हा का नवा मुद्दा नाही. सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली रस्ते अडवून दहा-दहा दिवस मांडव घालणे नि आपल्या देवाचे भक्त नसलेल्या सरसकट सर्वांची वाट अडवणे, भलेमोठे स्पीकर्स लावून त्यावर ‘जलेबी बेबी’ वाजवत सर्वांना भक्तिभाव शिकवणे, मिरवणुकांमध्ये वा एरवीही फटाक्यांची आतषबाजी करून श्रद्धाळू, पर-श्रद्धाळू, अश्रद्ध सर्वांच्याच फुप्फुसात धूर सोडून त्यांना निर्जंतुक करणे वगैरे कामे हे लोक स्वयंस्फूर्तीने करत असतात.

मी त्यांना म्हटलं, “मी ‘जय श्रीराम’ का म्हणत नाही असा प्रश्न तुम्ही विचारत असाल, तर ‘तुम्ही सर्वसमावेशक ‘राम राम’ का म्हणत नाही?’ असा प्रश्न मी विचारू शकतो. ‘राम राम’ हे आपल्या वारकरी पंथाने दिलेले अभिवादन आहे, तर ‘जय श्रीराम’ हे द्वेषमूलक राजकारणाचं अपत्य आहे. कुणीतरी दिल्लीतून ऑर्डर सोडतो म्हणून आमचा वारसा आम्ही का सोडावा?”

तोंड वेडेवाकडे करीत, “हे एक नवीनच समजलं.” म्हणून ते जवळच्या तिसर्‍याकडेच त्याने सामील व्हावे अशा अपेक्षेने पाहू लागले. त्यावर तो बिचारा ही ब्याद नको म्हणून वेग वाढवून निघून गेला. मग मी ही वस्तरा घडी करून घरी परतलो.

जय संविधान

काही काळापूर्वी माझ्या एका मित्राकरवी मला एक दीर्घ असा व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड आला. यात एका तरुणाने आपला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनुभव लिहिला होता.

त्याची पत्नी आमच्या भागातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी अ‍ॅडमिट होती. त्यात काही गुंतागुंत होऊ लागली होती. सर्व योग्य पद्धतीने हाताळले जात असून आणि वरकरणी सर्व ठीक दिसत असूनही मुलाच्या हृदयाचे ठोके मंद होऊ लागले होते. अखेर त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने परिस्थिती गंभीर असल्याचे आणि पत्नी व मूल दोघांच्याही जिवाला धोका असल्याचे त्या तरुणाला सांगितले आणि एखाद्या अधिक अनुभवी तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान ‘सेकंड ओपिनियन’ म्हणून समोरच असलेल्या अन्य एका हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांशी हे डॉक्टर बोलले. त्यांनी त्या स्त्रीला तातडीने भरती करून घेतले. तपासणीअंती अत्यंत दुर्मीळ अशी स्थिती असल्याचे भाकित त्यांनी केले. त्यावर उपचारही सुरू केले. चोवीस तासांत त्या स्त्रीची सुखरूप सुटका झाली. मूलही सुदृढ निपजले.

हे दुसरे डॉक्टर रुग्णाला/नातेवाईकांना बारीक सारीक तपशीलासह, शक्य तितक्या सोप्या भाषेत परिस्थिती समजावून सांगत असल्याने ही पुरी केस त्यांनी त्यांनी त्या तरुणाला उलगडून सांगितली. तो तरुण बर्‍यापैकी शिक्षित असल्याने त्याला त्याचे गांभीर्य ध्यानात आले. त्याने तो सारा अनुभव लिहून काढला नि काही परिचितांना पाठवला. तो काही परिचितांमार्फत फिरत माझ्याकडे आला होता.

पहिल्या डॉक्टरकडे असता आशा सोडलेल्या त्या पती/बापाची जिवाची उलघाल, तो सारा प्रवास वाचून त्या अंती त्याची मानसिक अवस्था कशी असेल याचे दर्शन त्यातून घडत होते. हा तरुण लेखनक्षेत्राशी संबंधित नव्हता. कदाचित एरवी तो एखाद्या मुद्द्यावर सुसंगत लिहू/बोलूही शकला नसता. परंतु तो अनुभव अक्षरश: एकटाकी लिहिल्यासारखा प्रवाही भाषेत त्याने लिहिलेला होता.

यात आणखी एक वैय्यक्तिक आस्थेचा मुद्दा म्हणजे ते दुसरे डॉक्टर हे माझेही फॅमिली डॉक्टर आहेत.

हा अनुभव एका पुरोगामी, बुद्धिजीवी, लेखक वगैरेंच्या एका गटाला पाठवला. एका वंशपरंपरागत पुरोगाम्याचा तातडीने प्रतिसाद आला, “यात तो बाप ‘देवाच्या कृपेने आम्ही सारे यातून सुखरूप बाहेर पडलो.’ असे म्हणतो आहे. त्यावर तुझे काय म्हणणे आहे?” संपूर्ण अनुभव, त्यातील त्या बापाची तडफड, त्या डॉक्टरची चाणाक्ष बुद्धी व ज्ञान, पहिल्या डॉक्टरचे प्रसंगावधान यातील कशाचाही स्पर्श त्याला झाला नसावा. (कदाचित त्याने पुरे वाचलेही नसावे.) ते एक शेवटचे वाक्य धरून तो ‘जितं मया’चा डान्स करायला उगवला होता.

मी म्हटलं, “एकतर ज्याने तो मेसेज लिहिला आहे तो माझ्या मताचा असण्याची गरज आहे का? दुसरे, बोली भाषा ही नेहमीच विचारांशी कायम सुसंगत असते असे नाही. त्याक्षणी शब्दाच्या काटेकोरपणाऐवजी त्यामागची भावना लक्षात घ्यायला हवी.

“मी ही अनेकदा बोलण्याच्या ओघात ‘अरे देवा’ असा उद्गार काढतो किंवा ‘दुर्दैव’ हा शब्द वापरतो. याचा अर्थ मी त्याक्षणी देवाचा धावा करतो आहे असे नव्हे किंवा मी दैवावर विश्वास ठेवतो आहे असे नव्हे. भाषेवर परिसराचे, संवादाच्या दुसर्‍या बाजूच्या शब्दकळेचे काही संस्कार नकळत होत असतात.

माझ्या मते पुरोगामी वर्तुळात असे शब्दांशी खेळ करणं नि श्रद्धाळूंची कर्मकांडे यात काही फरक नसतो. वरच्या ‘जय श्रीराम’वाल्यासारखे कर्मठ पुरोगामी असतात. त्याला ‘राम राम’ चालत नाही, ‘जय श्रीराम’च हवा असतो, आणि इतरांनीही आपल्याच पद्धतीने अभिवादन करण्याचा अट्टाहास तो करतो. तसेच हे कर्मठ पुरोगामी तिथे ‘व्यासपीठ म्हणायचे नाही, विचारपीठ म्हणायचे’ असे बजावत असतात.

एकतर व्यासाने यांचे काय घोडे मारले मला माहित नाही. दुसरे म्हणजे खरंतर व्यासपीठ या शब्दाचा नि व्यासाचाही काही संबंध नाही. व्यस् म्हणजे मांडणे, रचना करणे- जिथे आपण बोलून मुद्द्यांची मांडणी करतो अशी पीठ म्हणजे आसनाची जागा. किंबहुना विखुरलेल्या वेदांची नीट रचना केली म्हणून व्यासाला ‘वेद-व्यास’ हे नाव पडलं(१). (त्यांचे मूळ नाव कृष्ण-द्वैपायन.) अर्थात पुरोगामी वर्तुळात एकुणच ब्राह्मण नि संस्कृत या दोहोंचेही वावडे असल्याने (एकदा मनुवादी व्हायचंच म्हटल्यावर हे ही लिहून टाकू. :) ) असा एकांगी दुराग्रह– ‘जय श्रीराम’ वाल्यासारखाच– केला जात असावा.

“पण त्या डॉक्टरचे श्रेय तो देवाला देतो आहे हे तुला खटकत नाही का?” त्याची गाडी त्याच्या स्वयंघोषित पुरोगामित्वावर (जे इतर अनेक ठिकाणी बाधित झालेले मीच दाखवून देऊ शकलो असतो) अडली होती.

मी म्हटलं,“हा एवढा दीर्घ अनुभव त्याने लिहिला त्यात कुठली पूजाअर्चा, अनुष्ठाने, गंडेदोरे केल्याचे तपशील आहेत की डॉक्टरने सांगितलेल्या माहितीचे, त्याने केलेल्या धडपडीचे? आपल्या आसपासच्या सार्‍यांशी हा अनुभव शेअर करावासा वाटला तो ‘देवाची कृपा’ म्हणून की एका डॉक्टरने दुर्मीळ स्थिती ओळखून योग्य उपचाराची तजवीज केली म्हणून?” (जी पहिल्या डॉक्टरच्या ध्यानात आलेली नव्हती, त्याला तो तर्क करता आला नव्हता. पण लगेच अडाणीपणाने ‘तो डॉक्टर कमी अकलेचा’ असा ग्रह यातून करून घ्यायचा नसतो.)

अर्थात देवाचे नाव आल्यावर त्याची पुरोगामी बाभळ बुडली ती बुडलीच. त्या व्यक्तीच्या भावना, डॉक्टरचे ज्ञान, एकुण त्या अनुभवातून दिसलेली माणसांची बांधिलकी याबद्दल बोलावे असे त्याला वाटले नाही. त्याचप्रमाणे ‘जय श्रीराम’ वाल्याला आपण आपली अभिवादनाची पद्धत दुसर्‍यावर लादणे चुकीचे आहे याचा गंधही नव्हता.

भावनेला दुय्यम मानणे हे ‘जय संविधान’ वाल्याचे लक्षण होऊ पाहते आहे, तर भावनेच्या फसफसणार्‍या फेसालाच आपले साध्य समजणे हे ‘जय श्रीराम’वाल्याचे. सदैव एकाच चष्म्यातून जगाकडे पाहात ते एकरंगी असल्याची तक्रार करण्याचा गाढवपणा मात्र दोहोंचा समान आहे.

-oOo-

(१). ही व्युत्पत्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग-प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांच्याकडून साभार.

हे वाचले का?

मंगळवार, १९ मार्च, २०२४

प्रोफाईल फोटो, आधार कार्ड आणि गणित

(स्वसोयीचा)इतिहास-भोगी, पाठांतरप्रधान अशा समाजामध्ये गणित हा विश्लेषणप्रधान विषय नावडता असणे ओघाने आलेच. गणिताची भाषा ही देश-कालाच्या सीमा उल्लंघून जाणारी असल्याने तिच्या व्याप्तीशी इमान राखायचे, तर तिचे व्याकरण स्थल-काल-समाज निरपेक्ष असावे लागते. जन्माला आल्याबरोबर अनायासे मिळालेल्या वंश, जात, धर्म, देश, समाज आदि गटांनी दिलेल्या खुंट्यांना वटवाघळासारखे उलटे लटकून जगणार्‍यांना ते परके वाटते हे ओघाने आलेच.

याशिवाय त्याच्या या सर्वसमावेशकतेमुळे त्याच्याबाबत वा त्याच्या साहाय्याने - भाषा, इतिहास, भूगोलाआधारे पेटवले जातात तसे- अस्मितेचे टेंभे वा पलिते पेटवणे शक्य नसते. त्यामुळे सदैव न्यूनगंडांच्या, भावनिक हिंदोळ्यांवर झुलणारा भारतीय समाज त्याच्याकडे पाहून नाके मुरडताना दिसतो. आणि कदाचित त्यामुळेच आजच्या वैज्ञानिक पाया असलेल्या विकासाच्या वाटेवर मैलाचा एकही दगड आपल्या नावावर करू शकत नाही. मग पाश्चात्त्य ज्ञान आणि चिनी उद्योजगता यांच्या भरवशावर चाललेल्या आपल्या जिण्यावर तथाकथित गौरवशाली इतिहासाची वाकळ पांघरून ते वास्तव झाकू पाहात असतो. आणि ते उघड करू पाहणार्‍यांना संख्याबळाच्या आधारे मुस्कटदाबी करून गप्प करत असतो.

पण ‘गणित शिकवताना संदर्भांचे स्थानिकीकरण अथवा समकालीनीकरण(१) केले तर कदाचित गणिताकडे अधिक लोक आकृष्ट होतील का?’ असा प्रश्न मला वारंवार पडतो. गणितातील बहुतेक संकल्पनांना वास्तव जगण्यातील संदर्भ असतात. वास्तवातील काही कोडी ते उलगडत असते. सर्वसामान्यांना ते समजत नसल्याने ‘गणिताचा आयुष्यात काय उपयोग?’ असा तद्दन अडाणी प्रश्न ते विचारत असतात. स्वदेशीच्या बाता मारणार्‍यांच्या घरात पाश्चात्त्य संशोधनावर आधारित चिनी उत्पादने ठासून भरलेली असतात, तसेच या अडाण्यांच्या जगण्याच्या प्रत्येक पैलूमागे गणित उभे असते. अडाण्यांचा आवाज नि संख्या नेहमीच विपुल असल्याने, बहुसंख्या हा निवाड्याचा निकष असतो तिथे हटकून अशा अडाण्यांचे अध्वर्यू अधिकारी होत असतात.

पण वर म्हटले तसे गणितानेही आपली मांडणी अधिक स्थानिक अवकाशात आणली, तर ते समजण्यास अधिक सोपे जाईल असा माझा होरा आहे. कधी कधी साध्या सोप्या गोष्टींमधून गणिताची एखादी संकल्पना चमकून जाते, तेव्हा मला ती धरून ठेवावीशी वाटते.

आजचा जमाना मोबाईल, समाजमाध्यमे, तंत्रज्ञान यांचा आहे. फोटो, रील्स, व्हिडिओ यांचा आहे. काही वेळा शाब्दिक विनोदाचे पारंपरिक माध्यमही या अर्वाचीन मंडळींमध्ये घुसखोरी करते. अशाच एका रीलमध्ये एक विनोद वाचण्यात आला. त्यात असं म्हटलं होतं की ‘तुम्ही तुमच्या (समाजमाध्यमी) प्रोफाईलमध्ये दिसता तेवढे देखणे नसता. पण तुम्ही तुमच्या आधारकार्डवरील फोटोमध्ये दिसता तेवढे कुरूपही नसता.’

TwoPhotos

समाजमाध्यमांवर आपले अवास्तव भौतिक वा वैचारिक व्यक्तिमत्त्व उभे करणार्‍यांवर यातून टीकेचा बाण सोडलेला होता. पण हे करतानाचा देशाच्या UIDAI या संस्थेतर्फे देशांतर्गत ओळखपत्र ऊर्फ ‘आधार कार्ड’(२) प्रसृत करण्यासाठी जी व्यवस्था उभी केली गेली आहे, त्यातील वैगुण्यावरही बोट ठेवते. सरकारी व्यवस्थेने देऊ केलेल्या भयानक गुणवत्तेच्या त्या कॅमेर्‍यांमधून निघालेले ते फोटो माणसाच्या मूळ चेहर्‍या-मोहर्‍यापासून इतके फटकून असतात, की त्या फोटोंच्या अनुषंगाने असंख्य विनोद प्रसृत होत असतात. वर उल्लेख केलेला त्यातीलच एक.

थोडक्यात हे दोनही फोटो तुमच्या मूळ चेहर्‍या-मोहर्‍याचे अनुक्रमे अति-देखणे आणि अति-विरूप असे संभाव्य-चित्र(possibility) असतात. सौंदर्य-विषयक मोजमापाचा विचार करता प्रत्यक्षात तुमचा चेहरा या दोहोंच्या मध्ये कुठेतरी असतो. हे डोक्यात आल्यावर मला गणितामधील convex-combination संकल्पनेची आठवण झाली.

A आणि B या दोन संख्यांच्या मधील कोणतीही संख्या(C) ही C= alpha*A + (1-alpha)*B या सूत्राने मांडता येते. alpha ही ० आणि १ यांच्यामधील संख्या असते. alpha चे मूल्य म्हणून कोणतीही संख्या घेतली तरी C चे मूल्य कायमच A आणि B यांच्या मूल्यांदरम्यान (min(A,B) <= C <= max(A,B))(३) राहात असते. गणितामध्ये आणि पुढे संगणकीय गणितामध्ये ‘शोध’ (search) ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते. आणि असा शोध अनेकदा या alpha चा शोध म्हणून रूपांतरित होतो. पण त्याकडे जाण्याचे आपल्याला कारण नाही.

तर पुन्हा फोटोंकडे यायचे झाले तर ढीगभर फोटोंमधून त्यातल्या त्यात चांगला निवडून अपलोड केलेला, फोटोशॉप केलेला वा फिल्टर लावून काढलेला तुमचा समाजमाध्यमी चेहरा हा तुमच्या चेहर्‍याची कमाल (best) शक्यता अथवा अंदाज आहे. उलट– निवडीची, फिल्टर लावण्याची, फोटोशॉप दुरुस्तीची कोणतीही सोय न मिळालेला (कदाचित) उठावदार नसलेली पार्श्वभूमी, पुरेसा नसलेला उजेड आणि मुख्य म्हणजे दुय्यम तंत्रज्ञान असलेला कॅमेरा यांनी काढलेला तुमचा आधार-कार्डवरील फोटो हा तुमच्या चेहर्‍याची किमान (worst) शक्यता अथवा अंदाज आहे.

आता समजा एखाद्या समाजमाध्यमी बबडूने त्याला आवडलेल्या एखाद्या बबडीच्या देखण्या फोटोंना लाईक कर-करून आणि मेसेजेसद्वारे ‘J1 झालं का?’ विचारून भेटण्यास रुकार मिळवला, नि नेमका त्यावेळी बबडीच्या माजी बंडूने त्याला बबडीच्या (त्याने चोरलेला ?) आधार कार्डचा फोटो पाठवला तर... त्यावरील फोटो पाहून बबडूचे चित्त द्विधा होईल. आधार आधारभूत मानले तर बबडूला भेटण्याची इच्छाच होणार नाही. तर तिच्या समाजमाध्यमी फोटोकडे पाहून ‘जातानाच अंगठी घेऊन जावी का?’ हा प्रश्न त्याच्या डोक्यात घोळू लागतो. मग आता त्याने काय करावे? उद्या खरोखरच भेटीची वेळ येईल, तेव्हा कितपत देखणेपण त्याने अपेक्षित ठेवावे?

मी सांगतो. गणिताचा आधार घ्यावा. वर सांगितलेल्या convex-combination संकल्पनेच्या आधाराने अंदाज घेण्यासाठी त्याने या दोन फोटोंमधला बबडीचा चेहरा कसा असेल याचा alpha किती असेल याचा अदमास घ्यावा. आता तुम्ही विचाराल, ‘तो कसा?’ तर गणितामध्ये अशा अ-ज्ञात (unknown) संख्यांच्या निश्चितीसाठी करतात तेच इथे करावे, डेटाचा आधार घ्यावा(४).

बबडीने स्वत:चे, इतरांसोबतचे, विविध ठिकाणांवरचे, होटेलमधले, टपरीवरचे असे अनेक फोटो अपलोड केलेले असतात ते पाहावेत. हे सारे वरच्या दोन टोकाचे रूप दाखवणार्‍यांच्या अधेमध्ये असतात, त्यांचे प्रत्येकाचे alpha असतात. आता या सार्‍या alpha ची सरासरी काढावी. आता देखणेपणामध्ये बबडीच्या आधार-कार्ड फोटोपासून या मिळालेल्या उत्तराइतक्या अंतरावर असलेला चेहरा डोळ्यासमोर आणा. हा अंदाज बबडीच्या मूळ चेहर्‍याशी बराचसा मिळताजुळता असेल असे गृहित धरायला हरकत नाही.

बघा, गणिताने जगण्यातील सर्वात अवघड प्रश्नही चुटकीसरशी सोडवला की नाही? पटलं तर घ्या. नाहीतर इतिहासाचे टेंभे-झेंडे आणि वर्तमानात डोक्यावर घेतलेल्या नेत्यांचे सदरे-टोप्या आहेतच मिरवायला.

-oOo -

(१). वैय्याकरणांनो, हा शब्द मंजूर करा प्लीज.
(२). ‘हे अमुक गोष्टींसाठी ग्राह्य नाही, तमुकसाठी ग्राह्य नाही’ असे अंतरिम फतवे वा खुलासे सरकारे करत असल्याने याच्या उपयुक्ततेची नक्की व्याप्ती काय हे ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकणार नाही.
(३). नाही, यात 2*A*B एस्क्ट्रा मिळत नाहीत!
(४). ‘आले याचे संख्याशास्त्र, तरी म्हटलं अजून घसरला कसा नाही’ असं कोण म्हणालं ते. ऐकलं मी.


हे वाचले का?

बुधवार, ६ मार्च, २०२४

दीक्षितांच्या जगन्नाथाप्रत–

(ज. के. उपाध्ये यांची क्षमा मागून...)

‘घसरतील पँट जरा, मम डाएट अनुसरता’।
वचने ही गोड-गोड देशि जरी आता ॥ध्रु.॥
	
सलाड समोरी आल्यावर भूक ही निमाली । 
चमचमीत खाद्य विविध, विविध पेयेही स्मरली ।
गुंतता तयांत, कुठे वचन आठविता ॥

स्वैर तू पतंग, जनि भाषण झोडणारा । 
‘सहजी होय वजन-घट’, नित ऐसे फेकणारा ।
दाविशी कुणी, ‘हा पाहा, कसा लठ्ठ होता’ ॥

जठरातील या भूक, तुज जाणवेल का रे ?
जिंव्हा नच, कृत्याच(१) कवण, उमगेल का रे ?
यापरता दृष्टिआड होऊनि जा आता ॥
 
- oOo -
(१). एक राक्षसी, विशिष्ट विध्वंसक हेतू मनात ठेवून तंत्रसाधनेच्या आधारे जिची निर्मिती वा आवाहन केले जाते.

हे वाचले का?

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

फेक-फेसबुक, फसवणूक आणि गुंतवणूक

गेल्या दोन वर्षांत भांडवल-बाजाराने दिलेला जोरदार परतावा पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे. एरवी ‘शेअर बाजार म्हणजे सट्टेबाजी’ असे टोकाचे मत घेऊन जगणार्‍यांचे कुतूहलही जागे झाले आहे... साधारण पंधरा वर्षांपूर्वीच्या ‘बुल-रन’च्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तेव्हा जसे घडले त्याच धर्तीवर या लालसा असलेल्या अडाण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाहून शिकार्‍यांची (scamsters) भूछत्रेही वेगाने उगवू लागली आहेत.

याचे प्रतिबिंब सध्या फेसबुक, ट्विटरसारख्या समाज(?)-माध्यमांवर दिसू लागले आहे. फेसबुकवरील फीडमध्ये तर सध्या फक्त शेअर-टिप्स देणार्‍या विविध तथाकथित पोर्टल्सच्या जाहिरातीच दिसत आहेत. बहुतेक सार्‍या फसव्या (scam/fraud) . इमेजमध्ये एखाद्या प्रसिद्ध ‘इकनॉमिक टाईम्स’सारखे अर्थपत्र वा गुंतवणूक-माध्यम व्यावसायिकाचे नाव दिसते, पण लिंक भलतीकडेच नेते असा प्रकार होतो आहे. ९०% जाहिराती अशाच आहेत.

अदानी१

काही महिन्यांपूर्वी ही जाहिरात फेसबुकने फीडमध्ये दाखवली होती! विशेष म्हणजे त्यात ज्या वेबसाईटचा उल्लेख आहे त्या नावाची वेबसाईट अस्तित्वातच नाही!  लिंकवर क्लिक केले असता भलतीच वेबसाईट ओपन होई, जी ट्रॅकर वा रिडायरेक्ट स्वरूपाची आहे. 

एखाद्या देशात वा भूभागामध्ये बंदी असलेल्या वेबसाईट्सकडे नेण्याचा छुपा मार्ग म्हणून हे ट्रॅकर काम करतात. पण हाच पर्याय वापरून फसवणूक करणारे तुम्हाला आपल्या जाळ्यात ओढत असतात.

अड्रेसमध्ये ट्रॅक हा शब्द दिसताक्षणीच मी ती बंद केली. मग मी ब्राउजरमध्ये थेट नाव टाईप केले, तरी सापडले नाही. अलिकडे www लावून पाहिले, तर मुलांच्या पुस्तकांची एक साईट ओपन झाली.

आणखी रोचक बाब ही, की ही जाहिरात देणारे Charly Bell Officiel हे पेज स्वतंत्रपणे शोधले, तर ते कुण्या गायिकेचे आहे असे दिसते. तिने अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची जाहिरात करण्याचे काहीच कारण दिसत नाही. तिला अदानी हे नावही माहित नसावे. तेव्हा हे अकाऊंट प्रेषित असलेली जाहिरात फेसबुकने कशी दाखवली हे गौडबंगाल आहे.

यात एकतर कुणी Charly Bell Officiel हे अकाउंट हॅक करुन वापरले असावे, किंवा बहुतेक सेलेब्रिटी करतात तसे पैसे घेऊन गायिकेनेच ते वापरायला दिले असावे, किंवा नावात Officiel असले तरी हे अकाउंट कुण्या भलत्याच्य व्यक्तीने काढलेले बनावट अकाऊंट असावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहिरातीचे पैसे मिळतात म्हटल्यावर, अकाउंट बनावट नाही ना याची खातरजमा करून न घेता मिळतील ते पैसे पदरात पाडून घ्यावेत या धोरणाने फेसबुक ही जाहिरात दाखवून मोकळे झाले असावे.

मुळात ‘अदानी एंटरप्रायजेस’सह प्रमुख अदानी कंपन्यांचे बहुसंख्य शेअर हे केवळ प्रवर्तकांसह विविध संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहेत (१). सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी ते फारसे उपलब्धच नाहीत. अगदी म्युचुअल फंडांनीही त्यात कणभर गुंतवणूक केलेली नाही, इतक्या कमी संख्येने ते उपलब्ध आहेत (किंवा त्यांच्या किंमतीचे वास्तव तेथे बसलेल्या गुंतवणूक-तज्ज्ञांना ठाऊक आहे.) मग या जाहिराती का दिल्या असाव्यात? उत्तर सोपं आहे. हेतू अदानीची काळवंडली बाजार-पत उजळण्याचा आहे!

तो का? तर त्यांचे अगदी मोजके असे जे शेअर बाजारात उपलब्ध आहेत, त्यांना खरेदी करण्यास झुंबड उडावी, लोकांनी अधिकाधिक पैसा त्यांच्यासाठी देऊ करावा, जेणेकरून त्यांच्या किंमती वेगाने वाढाव्यात. तसे झाले तर खुद्द अदानींसह इतर संस्थात्मक मंडळींकडे असलेल्या शेअर्सचे नक्त-मूल्य भरपूर वाढेल. फेसबुकपूर्वी याच हेतूने एका प्रथितयश मराठी वृत्तपत्राच्या पोर्टलने अक्षरश: दिवसाआड अदानीच्या शेअर्सनी कशी फीनिक्स पक्ष्यासारखी राखेतून झेप घेतली आहे हे ठसवणार्‍या बातम्यांची(?) झड लावली होती. अजूनही आपले हे काम ते इमानेइतबारे करत असते. अशा वाढलेल्या शेअर्सच्या मूल्यांच्या आधारे अदानींना मोठ्या संपत्तीचा आभास निर्माण करता येऊन त्याबदली बँकांकडून मोठी कर्जे उभारता येतील.

हिंडनबर्गने अदानींवर मूळ मूल्यांच्या कैकपट अधिक मत्ता दाखवल्याचा आरोप केलेलाच आहे. तो अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य नव्वद टक्क्यांपर्यंत घसरले होते. त्यामुळे अदानींच्या शेअर-मालमत्तेमध्ये वेगाने घसरण झाली. त्यातून अदानींनी कर्ज घेतलेल्या बँकांना दिलेल्या तारणाचे बाजार-मूल्य घटले आणि बँकांनी त्यांना अधिक तारणाची वा परतफेडीची मागणी करायला सुरुवात केली. त्यामुळे ‘मागणी वाढवा नि संपत्ती फुगवा’ या हेतूने हे कारभार चालू आहेत.

तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य ग्राहकाच्या साध्या-सुध्या पोस्टवर फेसबुक कम्युनिटी स्टँडर्डचा बडगा उगारत असते. इथे चक्क खोट्या जाहिराती पैसे घेऊन लोकांपर्यंत पोहोचवते आहे. याच स्वरूपाच्या या आणखी दोन जाहिराती पाहा. या दुसर्‍या जाहिरातीचे प्रेषित असणारे अकाउंट संपूर्ण रिकामे आहे. तिसरे प्रोफाईलही अदानींशी वा आर्थिक विषयाशी काहीही संबंध नसणारे आहे.

एकीमध्ये ‘इंडियन्स ओन्ली’ म्हणत राष्ट्रभावनेला साद घातली आहे. २०१४ पासून हे चाळे आपण पाहात आलो आहोतच. अदानीच्या ऑस्ट्रेलियन सीईओने हिंडेनबर्ग अहवालावर प्रतिक्रिया देताना पाठीमागे भारताचा तिरंगा लावून पत्रकार परिषद घेतलेली आपण आधीच पाहिली आहे.

अदानी२
अदानी३

कुठल्याशा टुकार टाईल्सची जाहिरात, ‘देश की मिट्टी से बनी टाईल’ अशी केली जाते. तिच्या अगदी अलिकडच्या जाहिरातीमध्ये हातात बंदुका घेतलेले सैनिक दिसतात ते पाऊल पुढे टाकतात नि चित्र बदलून टाईल्सच्या भिंतीआडून ही टॅगलाईन उच्चारत हिंदी हीरो अवतरत असतो. जणू यांच्या टाईल्स म्हणजे देशाच्या सीमेवर लढणारे सैनिकच.

एरवी हागल्या-पादल्याला देशाची अस्मिता, आपले सैनिक वगैरे कढ काढणारे नि कलाकारांच्या विरोधात कांगावा, थयथयाट करणारे माध्यमवीर उद्योगधंद्यांच्या असल्या चाळ्यांसमोर मात्र मूग गिळून बसतात. वरून ऑर्डरच तशी असावी. देशाचा पंतप्रधान एका पेमेंट अ‍ॅपसाठी ‘मॉडेलिंग’ करतो आणि ‘व्यापारी सीमेवरच्या सैनिकाहून जास्त रिस्क घेत असतो’ म्हणतो तेव्हा त्यांच्या पित्त्यांनाही ते प्राधान्यक्रम निमूटपणे स्वीकारावे लागतात. निर्बुद्ध, शरणागत वृत्ती हा भक्तीचा स्थायीभावच असतो.

एकुणात फसवणुकीचा झगा केवळ फेसबुकने नव्हे तर राज्यकर्त्यांनी, उद्योगव्यवसायांनी पुरेपूर अंगिकारला आहे.

या सार्‍या अ‍ॅड्स मी ‘misrepresentation’ म्हणून रिपोर्ट केल्या होत्या. त्यातील एक-दोन काढून टाकल्याचा संदेश मला फेसबुकने दिला होता. बाकी बहुसंख्य जाहिरातींमध्ये आक्षेपार्ह काहीही न आढळल्याचा निकाल दिला होता.

फेसबुक हे धंदेवाईक माध्यम असल्याने ते यांना आळा घालतील याची सुतराम शक्यता नाही. मुळात ते तुम्हाला रिपोर्ट करताना काही तपशील देण्याची संधीच देत नाहीत, जेणेकरून आक्षेप नेमकेपणे नोंदवता यावेत. तपासणी बहुधा संगणकीय असल्याने फारच ढोबळ असणार, तोच त्यांचा हेतूही असणार. त्यांना यातून उत्तम पैसा मिळत असल्याने ही चाळणी बहुतेक रिपोर्ट फेटाळेल अशाच दृष्टीने तिची रचना होत असणार. म्हणूनच अशा जाहिराती या वेगाने येत राहतात.

पण अशा जाहिराती केवळ उद्योगपतींच्या वा राजकीय नेत्यांच्या छबी उजळून घेण्यासाठीच असतात असे नाही. याचा उलट उपयोगही केला जाऊ शकतो.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीची करण थापर यांनी घेतलेली मोदींची ती प्रसिद्ध मुलाखत लोकांच्या स्मरणात चांगली ठसलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या नरसंहाराबाबत थेट प्रश्न विचारून त्यांनी मोदींना अडचणीत आणले होते.

आज माध्यमांना सर्वस्वी अंकित करून हवी तशी छबी घडवल्यानंतरही, मोदींना आणि मोदी समर्थकांना त्या मुलाखतीमधून मोदींनी घेतलेली माघार बोचत असते. विरोधकही पुन्हा-पुन्हा तेवढाच भाग प्रसिद्ध करून त्यावर मीठ चोळत असतात. तेव्हा याबाबत काहीतरी केले पाहिजे असे मोदींच्या प्रचारविभागाला वाटले असावे.

आता ही जाहिरात पाहा. शीर्षक असे चतुराईने दिले आहे की जणू त्या मुलाखतीबाबत करण थापर आता नाक घासून माफी मागत आहेत की काय अशी शंका यावी. बातमीला बीबीसीची लिंक आहे अशी बतावणीही केलेली आहे. पण प्रत्यक्षात त्यावर क्लिक केले असता भलतीच साईट ओपन होते. वरचा साईट अड्रेस भलताच पण ते पेज मात्र बीबीसीचे असल्याप्रमाणे रचना करण्यात आली आहे.

KaranThaparHoax
KaranThaparHoaxFakeNews

एक शक्यता म्हणजे ही साईट अग्रेगेटर(२) असेल म्हणून मी लेखाचे ते शीर्षक टाकून गुगल केले असता, बीबीसीवरच नव्हे, तर अन्यत्रही असा कोणताही लेख सापडला नाही. त्या बातमीमध्ये उल्लेख असलेली थापर यांनी घेतलेली Pujitha Devaraju यांची मुलाखतही शोधून सापडली नाही.

असल्या जाहिराती प्रसिद्ध करणारी बहुतेक अकाऊंट्स ही अगदी नुकतीच काढलेली दिसतात. अनेक अकाउंट पाश्चात्त्य कलाकार, खेळाडू यांच्या नावे काढलेली दिसतात. त्यांचे एखाद-दोन फोटोही अपलोड केलेले असतात. त्यापलिकडे त्या अकाउंटमध्ये काहीही नसते. ‘ही मंडळी भारतीय शेअर्स का रेकेमेंड करत आहेत?’ असा सोपा प्रश्न डोक्यात यायला हवा. विशेषत: अदानीचे शेअर्स रेकेमेंड करणारी मंडळी हटकून अशी निघतात. मी अशी अकाउंट नि जाहिराती न चुकता फसवी (scam/misrepresentation/fraud) म्हणून रिपोर्ट करत असतो.

आत्मस्तुती, परनिंदा या पलिकडे जाऊन अशा जाहिरातींतून फुकट पैसे देण्याच्या आदिम आमिषाचा वापरही केला जातो आहे. आता अशा अनेक जाहिराती दाखवून फेसबुक पैसे मिळवते आहे.

या चतुर फसवणूकदाराने आपला खुंटा हलवून कसा बळकट केला आहे पाहा. या जाहिरातीमध्ये क्लिक करण्यासाठी कमळ हे सत्ताधारी पक्षाचे निवडणूक-चिन्ह अगदी रंगसंगतीसह वापरले आहे. पाहणारा सत्ताधारी पक्षाचा सहानुभूतीदार असेल, तर त्याच्याही नकळत, नेणिवेतून तो यावर ‘मोदीकी गॅरंटी’ पाहणार आहे. हा प्रकार फ्रॉड असला तरी सरकारपक्षातील मंडळी या फुकटच्या जाहिरातीकडे काणाडोळा करण्याची शक्यता अधिक. दुसरीकडे ही जाहिरात देणारे प्रेषित अकाउंट पुन्हा ‘टाटा’ या भारतीयांच्या विश्वासार्ह ब्रँडच्या नावे तयार केले आहे. एकुणात जाळ्यात आमिष भलतेच आकर्षक लावले आहे. गंमत म्हणजे त्यात उल्लेख असलेल्या PhonePe या पेमेंट अ‍ॅपचा याच्याशी काही संबंध नाही (वर थापर यांच्याबाबत आहे, तसे त्यांच्या एखाद्या स्पर्धकाचा/विरोधकाचा असावा का?)

ClickKamaLAndWinMoney
ClickKamalAdProfile

लेखाच्या सुरुवातीला भांडवली बाजाराच्या जोरदार परताव्याचा उल्लेख केला आहे. त्याचा आधार घेऊन लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहेच, तो यशस्वी होतानाही दिसतो आहे. फेसबुककरांमध्येही अनेक मंडळींना अचानक शेअर गुंतवणूक करावी असे वाटू लागलेले दिसते आहे. त्यांना अचाट सल्ले देणारे स्वयंघोषित तज्ज्ञही उपटले आहेत. म्हणजे या जाहिरातींचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अशा वेळी त्यांना वास्तवाचे भान करून देणे आवश्यक आहे.

२००३ ते २००५ पर्यंत वेगाने वर गेलेला बाजार २००६ ते २००९ वेगाने घसरून त्या खालच्या स्तरावर रेंगाळला होता. पण पहिल्या दोन वर्षातील परताव्याचे आकडे दाखवत LIC ने (त्यांच्या पावलावर पाऊल टाकून इतर खासगी कंपन्यांनी) ULIP (Unit Linked Insurance Policy) विकून आपले उखळ पांढरे करून घेतले होते. एरवी भांडवली-बाजारात पैसे गुंतवण्यास घाबरणारे एलआयसीवर डोळे मिटून भरवसा ठेवत भरपूर परताव्याच्या आमिष दाखवणार्‍या मोठमोठ्या प्रीमियमच्या पॉलिसी घेऊन मोकळे झाले होते.

सुदैवाने (हो सुदैवानेच!) बाजाराची घसरण सुरू झाली नि ULIP चे वास्तव यांना लवकर समजले. अन्यथा ज्यांना खर्‍या अर्थाने विमा म्हणता येईल (‘विमा ही गुंतवणूक आहे’ हा भ्रामक प्रचार करून LIC ने भारतीय गुंतवणूकदारांना भलत्याच मार्गावर नेलेले आहे.)  अशा स्वस्त ‘टर्म पॉलिसी’ज ऐवजी स्वफायद्याच्या, अधिक प्रीमियमच्या ‘मनी-बॅक’ पॉलिसीज गळ्यात मारणारी LIC (३), त्याहून महागडा ULIP हा नवा पायंडा पाडण्यास करण्यास साहाय्यभूत ठरली असती.

या ULIP मध्ये आणखी धोके होते. एकतर पहिल्या तीन वर्षांत तुम्ही गुंतवलेल्या पैशांपैकी सुमारे अकरा ते तेरा टक्के रक्कम ते आधीच गुंतवणूक-खर्च म्हणून कापून घेत असत. शिवाय ‘आपण इन्शुरन्स विकतो, गुंतवणूक कंपनी नाही (ग्राहकांकडे मात्र नेमकी उलट भूमिका मांडली जाते) तेव्हा आम्हाला बाजार-नियंत्रकाचे (सेबी: Securities Exchange Board of India) नियंत्रण नसावे’(४) अशी मखलाशी करून त्यांनी लवादाकडून त्यावर मोहोरही उमटवून घेतली होती. म्हणजे म्युचुअल फंडांमध्ये असलेली पारदर्शकता यांच्या गुंतवणुकीबाबत बंधनकारक नव्हती. इतरही अनेक नुकसानकारक मुद्दे होते.

बाजाराच्या तत्कालीन कामगिरीच्या आधारे LIC एजंट ग्राहकांना वार्षिक २५% परतावा मिळण्याची लालूच दाखवत होते. एवढा दीर्घकालीन परतावा गुंतवणूक-तज्ज्ञांची फौज बाळगणार्‍या म्युचुअल फंड कंपन्याही क्वचित काही फंडांमध्ये देऊ शकल्या आहेत. एरवी हा फायदा केवळ तात्कालिक असतो नि सरासरीच्या नियमाने हे प्रमाण नंतर कमी होते.

माझ्या मते ही चक्क फसवणूक होती. माझ्या परिचितांपैकी काही जण याला बळी पडले. ‘एवढा परतावा मिळू शकत नाही, हे तात्कालिक आहे’ हा माझा सल्ला न ऐकता ‘एजंट काय खोटं सांगेल’ या अडाणी गृहितकाखाली त्यांनी आपला पाय खोलात घातला होता.

‘सध्या शेअर मार्केट भरपूर फायदा देते आहे म्हणून आता तिथे जावे’ हे उशीराचे शहाणपण आहे. जसे ‘घसरले म्हणून बाहेर पडावे’ हा घायकुतेपणा चुकीचा तसेच ‘फायदा दिसतो म्हणून आत शिरणे’ हा उतावीळपणाही.

अचानक जाहिराती दिसू लागल्या, बाजार सकारात्मक दिशा दाखवतो आहे म्हणून आपले गुंतवणूक-धोरण बदलणे चुकीचे आहे. भांडवली बाजाराशी निगडित पर्यायांमध्ये गुंतवणूक करून पैसे मिळवणे ही तात्कालिक नव्हे, नियमित करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते, धोक्याची जाणीव आणि त्यावर स्वार होण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची प्रवृत्तीही. जाहिराती तर सोडाच, पण इतर परिचितांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डोळे झाकून गुंतवणूक करणारेही - माझ्या मते - गाढव असतात. तुमचा एजंटही ‘त्याला फायद्याचा गुंतवणूक सल्ला देत असतो, तुमच्या फायद्याचा नव्हे’ हे विसरायचे नसते.

दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ.

- oOo -

(१). ‘त्यात खरेच पैसे आहेत की नाही, की मुळातच अदानींचे मूठभर पैसे फिरवून फिरवून पुन्हा पुन्हा भारतात आल्याचे दाखवले आहे?’ वगैरे प्रश्न हिंडनबर्ग अहवालानंतर विचारले जाऊ लागले आहेत.

(२). अग्रेगेटर म्हणजे एकप्रकारे `वेबसाईट्सचे वृत्तपत्र’ म्हणावे लागेल. विविध वेबसाईट्स– विशेषत: बातमीदार – वरील उल्लेखनीय मजकूर एकत्र करुन एकप्रकारे त्याचे संकलन इथे उपलब्ध करून दिलेले असते, जणू एक अनुक्रमणिका तयार केलेली असते.

(३). खासगी कंपन्यावर आगपाखड करण्यास जागा मोकळी सोडली आहे. त्यासाठीच फक्त LIC चे नाव घेतले आहे. ‘त्यांना सांगा की, तिकडे बघा की’ वाल्या आणि ‘एफडीप्रामाण्यवादी भारतीयांसाठी हा फुलटॉस आहे.

(४). इन्शुरन्स विक्रेत्या कंपनीवर इर्डाचे– Insurance Regulatory and Development Authority– नियंत्रण असते.


हे वाचले का?

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

दूध देणारे ईव्हीएम आणि बेकन खाणारा मित्र

आज सकाळी फिरुन येताना एक परिचित काका भेटले. हे काका वयानं नसले तरी मनाने अजूनही ‘सालं ब्रिटिशांचं राज्य बरं होतं. आपल्या लोकांच्या पाठीवर हंटरच हवा.’च्या वयाचे. काकांच्या हातात दांडी असलेली स्टीलची बरणी होती.

माझं ‘राम राम’ त्यांचा ‘जय श्रीराम’ झाल्यावर मी औपचारिकपणे विचारलं, “फिरायला का?” “नाही...” काका छाती एक से.मी. पुढे काढून म्हणाले– जणू ‘सकाळी फिरायला जाणे हे मेकॉलेच्या शिक्षणातून आलेले खूळ आहे’ हे वाक्य न बोलता माझ्या तोंडावर फेकत आहेत. “... दूध आणायला आलो होतो.” हातातील बरणी उंचावत ते म्हणाले.

“काय काका, पिशव्यांमध्ये घरपोच दूध येत असताना हा आटापिटा कशाला?” मी कळ काढली नि काका ‘हर हर महादेव...’ म्हणत माझ्यावर तुटून पडले. संतापाच्या भरात ‘जऽऽऽऽऽऽय श्रीऽराऽऽऽम.’ ही नवी रणघोषणा असल्याचा फतवा ते विसरले.

AngryKaKa
https://onlineresize.club/ येथून साभार.

पाश्चरायजेशनने दुधातील सकस तत्त्वे कशी जातात, पाश्चात्त्यांचे हे खूळ आपण स्वीकारल्याने भारतीय तरूण कसे शारीरिकदृष्ट्या दुर्बल होत चालले आहेत वगैरे नेहमीचे दळलेले मुद्दे तर होतेच. पण एक मुद्दा मात्र विशेष लक्षवेधी होता. काका म्हणाले, ‘पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध मिळते.’

मी जन्मजात अडाणी असल्याने म्हणालो, “काका, पिशव्यांमधील दुधातही भेसळ होऊ शकते हे मला मान्य आहे. पण खुल्या चरवीमध्ये दुधात भेसळ करणे अधिक सोपे नाही का? 

“शिवाय तुमचा स्थानिक डेअरीवाला असल्याने भेसळ सापडली म्हणून त्याचा फार गवगवा होऊन बदनामी झाल्याने धंद्याचे नुकसान होण्याची शक्यता नगण्य. फारतर तो जागा नि नाव बदलून थोड्या अंतरावर किंवा दुसर्‍या उपनगरात वा पेठेत नवी डेअरी सुरू करेल. जम बसायला थोडा काळ जाईल इतकेच. दूध जीवनावश्यक असल्याने– आणि तुमच्यासारख्यांच्या हाती व्हॉट्स-अ‍ॅप असल्याने– गाडी पुन्हा रुळावर येईलच. 

“पिशव्यांतून मोठ्या प्रमाणावर दूध वितरण करणार्‍या मोठ्या दूधसंघ वा डेअरीज्‌चे तसे नसते.  त्यांना आपल्या ब्रँडची काळजी घ्यावी लागते.”

“तुमच्यासारखे देशद्रोही लोक प्रत्येक पाश्चात्त्य कल्पनेचे असे समर्थन करतात म्हणून देश मागे पडला होता.” काका संतापाने फुलले होते. “द. जपानमधील बुर्किना फासो(१) शहरात पिशवीतील दुधावर बंदी आहे तर तिथे सर्व तरूण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. साठीच्या स्त्रियाही जिम्नॅस्टिक करतात (‘...आणि सत्तरीचे म्हातारे त्यांना न्याहाळत बसतात.’ - मी... अर्थात मनात) घरटी एक माणूस सैन्यात आहे...” (‘स्थानिक डेअरीचे दूध पिणारा काकांचा मुलगा सैन्यात जायचे सोडून अमेरिकेत का गेला?’ हा प्रश्न मी विचारू का नको या संभ्रमात पडलो.) “... आणि म्हणून जपान हा जग्गात भारी देश आहे.” काकांचे बोलणे एकदाचे संपले.

शेवटी ‘ ... म्हणून तो मला फारफार आवडतो’ एवढे म्हणाले असते तर काकांचा हा निबंध इयत्ता चौथीच्या मराठीच्या पेपरसाठी क्वालिफाय झाला असता. ‘दुधाच्या पिशव्यांत भेसळ होऊ शकते म्हणून खुल्या चरवीतले दूध घ्या’ म्हणणारे काका आणि ‘ईव्हीएम हॅक होऊ शकते म्हणून मतपत्रिकेवर निवडणुका घ्या’ म्हणणारे काका यांच्यातील फरक मला दिसेनासा झाला.

मग मला या दोन्ही काकांच्या नावे बोटेमोड करणारा नि टेट्रापॅकमधील दूध आणि बेकन अशी न्याहरी... नव्हे ब्रेकफास्ट करणारा मित्र आठवला. ‘निवडणुकाच घेऊच नका. आम्हीच सार्‍यांचे तारणहार आहोत, सबब थेट आम्हालाच सत्ता द्या’ म्हणत नेहमीप्रमाणे तिसरी भूमिका मांडेल नि वर मलाच ‘कुंपणावरचा कावळा’ म्हणेल याची मला खात्री आहे. 😀

- oOo -

(१) काकांनी इथे कुठलेसे अगम्य नाव घेतले होते. ते शहर/गाव/खेडे खरेच जपानमध्ये आहे का, मला माहित नव्हते. काकांनाही असण्याची शक्यता शून्य. हा सारा माल-मसाला काकांनी व्हॉट्‌सअ‍ॅपवरून मिळवला असणार. मला बुर्किना फासो हे एका देशाचे नाव काय लक्षात राहते. मी तेच इथे दडपून दिले आहे.


हे वाचले का?

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

‘व्हायरल’च्या नावचा मलिदा ऊर्फ प्रस्थापितांची फुकटेगिरी

फेसबुकवर मी काही दिवसांपूर्वी अरुणा ढेरे यांनी दिलेल्या लोककथेच्या आधारे एक पोस्ट लिहिली होती. त्या कथेमध्ये युद्धोत्तर अयोध्येमध्ये सीतेची नणंद तिला फसवून रावणाच्या अंगठ्याचे चित्र काढून घेते. मग त्याला जोडून पुरा रावण आरेखून त्याच्या आधारे रामाच्या मनात सीतेविषयी किल्मिष निर्माण करुन तिचा त्याग करण्यास उद्युक्त करते. या कथेच्या आधारे मी सर्वसामान्यांच्या ‘पराचा कावळा’ करण्याच्या वृत्तीबाबत नि एकुणात इतिहास हे स्वार्थ-साधक हत्यार म्हणून वापरण्याबाबत टिपण्णी करताना अखेरीस देवत्व संकल्पनेच्या उत्क्रांतीबाबत भाष्य केले होते.

आज कोकणातील एका स्नेह्यांकडून कौतुकाने माझा लेख वाचल्याचा मेसेज मिळाला. मी बुचकळ्यात पडलो. मी कुठलाच लेख कुणाला पाठवला नव्हता. मग त्यांनी दिलेल्या तपशीलावरून मी त्या वृत्तपत्राचा ई-अंक डाउनलोड केला नि अवाक्‌ झालो. त्यात चक्क माझा हा ‘लेख’ छापला होता. अरुणाताईंच्या फोटोखाली माझे नाव अशी करामतही करून दाखवली आहे. (ती लेखनाची इमोजी किती जणांना समजली असेल?)

KrushivalArticle

हे अर्थातच मला न विचारता, कल्पना न देता छापलेले आहे. वाईट म्हणजे सोबत जोडलेले पुस्तकाचे कव्हर चुकीच्या पुस्तकाचे आहे. मी उल्लेख केलेली लोककथा ही ‘लोक आणि अभिजात’ मधील आहे. शीर्षकही लेखनाच्या हेतूशी सर्वस्वी विसंगत दिले आहे. कहर म्हणजे सोबत अरुणाताईंचा फोटोही छापून दिला आहे. एकुणात आविर्भाव असा की यांनी हा लेख कमिशन केला असावा किंवा मी त्यांना पाठवला असावा. फक्त शेवटी हळूच ‘साभार’चे शेपूट जोडून आपले शेपूट सोडवून घेतले आहे.

काही वर्षांपूर्वी कोकणातीलच एका प्रथितयश दैनिकाच्या दिवाळी अंकात माझ्या ब्लॉगवरचा लेख असाच परस्पर छापलेला मला आढळला होता.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवरच मी राहुल गांधींच्या फोटोंवर भाष्य करणारी एक पोस्ट लिहिली होती. ती एका प्रसिद्ध नियतकालिकाने उचलून छापून टाकली, ‘व्हायरल’ या साळसूद स्तंभाखाली. एवढेच नव्हे तर त्याच्या संपादकांनी ते पान मला पाठवले. त्यांना बहुधा माझ्याकडून धन्यवाद मिळावेत अशी अपेक्षा असावी. चूक त्यांची नाही, कागदावर नाव दिसले की कृतकृत्य होणारे इतके लोक आसपास असताना तोच प्रघात पडला तर नवल नाही.

परंतु धन्यवाद देणे तर सोडाच, मी उलट नाराजी व्यक्त केल्यावर त्यांनी सारवासारव करत मानधन देण्याची तयारी दर्शवली. माझा मुद्दा त्यांच्या ध्यानातच येत नव्हता, बहुतेक लेखकांनाही येत नाही. मुद्दा मानधनाचा नाही (खरे तर तो ही आहे, पण माझ्यासारख्याच्या बाबत तो फार दुय्यम आहे.) तर लेखकाचे त्या लेखनाचे जनकत्व मानण्याचा आहे. स्वत: संपादक असूनही त्यांना लेखन-स्वामित्वाची जाण नसावी हे मला खटकले होते.

फेसबुक पोस्ट हे बहुतेक वेळा फारसे गंभीर लेखन नसते हे मला मान्य आहे. परंतु कसेही असले तरी एखाद्याने आपली थोडी बुद्धी, माहिती, दृष्टिकोन, विचार, अभ्यास, क्वचित व्यासंगही खर्ची घालून काहीतरी लिहिलेले असते. ते त्याचे अपत्य असते. ते परस्पर उचलून नेताना आपण त्याला मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत आहोत हे यांच्या गावी नसते.

व्हॉट्स-अ‍ॅप फॉरवर्ड्स म्हणून जाणारे लेखन मी समजू शकतो. तिथे फॉरवर्ड करणार्‍यांचा आर्थिक लाभ नसतो, क्वचित अजेंडा असतो. परंतु जी मंडळी वृत्तपत्र, नियतकालिक हे व्यावसायिक माध्यम चालवतात, त्यावर आर्थिक लाभ घेतात, त्यांनी लेखकांना असे गृहित धरणॆ अजिबात समर्थनीय नाही असे मी मानतो. दुर्दैवाने आपले लेखन कुणीतरी उचलले एवढ्यानेच धन्य होणारे लेखकु वारेमाप वाढल्याने, आपले काही चुकते असे या उचलेगिरी करणार्‍यांना जाणवतच नाही. त्यामुळे हल्ली मला या लेखक म्हणवणार्‍यांच्या लाचारीची चीड येते.

मी फेसबुकवर काही लिहिले तर ती माझी माध्यम-निवड आहे. अन्य माध्यमातून लिहिणे वा न लिहिणे हे ही माझ्याच निर्णयाने व्हायला हवे. तो माझा अधिकार आहे. सुचलेले मुद्दे ललित-निबंधाच्या माध्यमातून मांडावेत, लेखाच्या माध्यमांतून मांडावेत, कवितेच्या माध्यमांतून की कथेच्या हे लेखक ठरवतो तेव्हा त्यामागे काही एक आडाखा असतो. दुसरे माध्यम वा घाट निवडले नाहीत याचाच अर्थ त्यांच्यामार्फत आपले लेखन अपेक्षित ते पोहोचवू शकत नाहीत, किंवा त्याची परिणामकारकता पुरेशी असणार नाही असा त्याचा निर्णय असतो. चित्रकलेच्या क्षेत्रातही अभिव्यक्तीसाठी रंगाचे माध्यम कोणते निवडावे हे चित्रकार निवडत असतो. लहर लागली म्हणून जलरंग, लहर लागली म्हणून तैलरंग वा लहर लागली म्हणून पेस्टल्स असे नसते. त्या त्या माध्यमांतून आपण अधिक नेमके व्यक्त होऊ शकतो असा त्याचा आडाखा असतो.

हेच लेखनाबाबतही खरे आहे. माझ्या स्वत:च्या निर्णयाने मी बरेच लेखन मी फक्त ब्लॉगवर करतो, ते फेसबुकसारख्या समाज-माध्यमांत नेत नाही, पोर्टलसारख्या डिजिटल माध्यमांत नेत नाही की छापायलाही पाठवत नाही. तो माझा निर्णय असतो. त्यात परस्पर बदल करण्याचा अधिकार इतर कुणाला नसतो. मग परस्पर असा माध्यम-बदल करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? एखाद्या विशिष्ट माध्यमांत माझे लेखन नेण्यास माझा साफच विरोध असू शकतो ही शक्यताही आहे. अशा वेळी त्यांनी ते परस्पर छापणे हे सरळसरळ माझ्या नकाराधिकाराचे उल्लंघन आहे.

अनेकदा असे असते की फेसबुक-पोस्ट ही लेखकाच्या मनातील बीजच तेवढे असते. त्यावर आधारित विस्तृत लेखनाचा आराखडा त्याच्या मनात अथवा हातात असू शकतो. फेसबुक-पोस्ट ही मुद्द्याचा थोडक्यात वा मर्यादित विस्तार असलेली असते. मूळ मुद्द्याला अनुलक्षून काही नवा मुद्दा वा दृष्टिकोन कुणाला सापडतो का, किंवा त्या विषयाकडे पाहण्याचे वाचकाचे दृष्टिकोन आणि कोण-कोणते फाटे फोडणे शक्य आहे याचा अदमास घेण्याच्या दृष्टीने केलेली असते. त्यात लेखकाचा पुरा दृष्टिकोन आलेला नसतो. अशा वेळी ती प्रसिद्ध करून मोकळे होणे म्हणजे लेखकाच्या अर्धवट विचारांची जाहिरात करणे ठरू शकते. यातून लेखकाचा दृष्टिकोन उथळ वा अपुरा आहे असा आरोप त्याच्यावर होऊ शकतो.

याशिवाय विविध माध्यमांसाठी लिहिताना घाटाची, मांडणीची, भाषेची, संदर्भ देण्या/न देण्याची, सोबत डेटा/चित्रे/फोटो वगैरेची निवड वेगवेगळी असू शकते. जर तुम्हाला हा मजकूर हवा असेल तर तुमच्या माध्यमासाठी असे काही बदल त्यात आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ फेसबुकवर लिहिताना त्याच्या स्तंभस्वरूप मांडणीचा विचार करता लहान परिच्छेद करावे लागतात. तिथे मी तीन ते चार वाक्यांचे परिच्छेद करतो. तेच ब्लॉगवर लिहिताना थोडे मोठे– पण तरीही पुस्तकाच्या तुलनेत लहान परिच्छेद करावे लागतात. तिथे सहा ते आठ वाक्यांचे परिच्छेद करतो. फेसबुकवर लेखनाला अनुरूप इमेजेस जोडण्याचा पर्याय नसतो, कारण तिथे त्या मजकुराच्या खाली जातात आणि वाईट म्हणजे मजकुराहून कैकपट अधिक जागा व्यापतात. त्याने पोस्टचे केंद्रच (focus) बदलून जाते. याउलट ब्लॉगवर मजकूर, इमेज तसंच व्हिडिओ मांडणीचे अधिक स्वातंत्र्य घेता येते. (वेचित चाललो... वर याचा मी पुरेपूर वापर करून घेत असतो.)

ब्लॉग वा अन्य डिजिटल माध्यमांमध्ये मुद्रित माध्यमात उपलब्धच नसलेला व्हिडिओ जोडण्याचा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध असतो. असा व्हिडिओ लेखकाच्या हेतूशी सुसंगत अशी काही भर वाचक/प्रेक्षकाच्या आकलनात घालत असतो. आता हाच लेख मुद्रित माध्यमात न्यायचा झाला तर तो व्हिडिओ वगळला गेल्याने तुटलेली साखळी शाब्दिक मजकुराची भर घालून सांधून घ्यावी लागते.

याच धर्तीवर मुद्रित माध्यमेच असलेल्या वृत्तपत्र, नियतकालिक आणि पुस्तक यांच्यासाठी मांडणीचा वेगवेगळा विचार करावा लागतो. उचलला मजकूर नि दिला पेस्ट करून असे नसते. तसे केल्याने नव्या माध्यमामध्ये ते लेखन अनुरुपता गमावून बसत असते. संपादक म्हणवणार्‍यांना ही समज नसावी हे अनाकलनीय आहे. त्यापेक्षा संपादकाने लेखकाशी संपर्क केला तर लेखक स्वत: या दृष्टीने विचार करून माध्यमानुरूप मजकूर देऊ शकतो.

एकुणातच छापण्याला अनावश्यक प्रतिष्ठा आहे असे माझे ठाम मत आहे. पण तो मुद्दा फार व्यापक आहे म्हणून सोडून देतो. पण त्याने होते काय की तेथे बसलेल्यांना अकारण एक श्रेष्ठत्वाचा गंड निर्माण होतो. डिजिटल– त्यातही सोशल मीडियात लिहिणारे दुय्यम असतात नि त्यांचे लेखन उचलून आपण त्यांच्यावर उपकारच करत आहोत अशा आविर्भावात ते वागतात असा अनुभव आहे. एका प्रथितयश वृत्तपत्राच्या पुरवणी-संपादकाने ब्लॉग लेखनाची दखल घेण्याची बतावणी करत टोपणनावाने त्यांची टिंगलटवाळी करण्याचा उद्योग केला होता. माझ्यासह अनेक ब्लॉगलेखकांनी त्याला जशास तसे उत्तर दिल्यानंतर तो प्रकार लवकरच गुंडाळला गेला.

जोडीला दोन-चार लेख, एखादे पुस्तक छापून धन्य झालेली मंडळीही ‘ह्यॅ: ब्लॉग काही सीरियस लेखन नाही’ सारख्या पिंका टाकून या महाभागांना बळ पुरवत असतात.

व्हायरल झालेल्या वा सोशल मीडियातून मजकुराची उचल करणे हा म्हणूनच मला कोडगेपणा वाटतो. एकीकडे तुम्ही त्या माध्यमांना नाके मुरडता, ते गंभीर माध्यम नाही म्हणता आणि दुसरीकडे ‘व्हायरल’ या पळवाटेखाली तेथील मजकुराची उचलेगिरीही करता. हा दांभिकपणाही आहे.

या मंडळींना एक चांगली पळवाट कायम उपलब्ध असते. ते म्हणतात, ‘आम्हाला हे व्हॉट्स-अ‍ॅपवरून मिळाले’ किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरेवर कुणीतरी शेअर केले होते तेथून मिळते. आम्ही मूळचा कर्ता कोण कसे शोधणार?’ हे व्हिडिओंबाबत काही प्रमाणात समर्थनीय आहे. परंतु लेखनाबाबत मला साफ अमान्य आहे. शब्दाधारितच नव्हे तर इमेज वापरून केलेला गुगल-शोधही अत्यंत कार्यक्षम आहे असा माझा अनुभव आहे. तो मूळ लेखका/कर्त्यापर्यंत सहज पोचवू शकतो. मिळालेले मीम, चित्र वा व्हॉट्स-अ‍ॅप फॉरवर्डचा कर्ता मी अनेकदा शोधून काढला आहे. माझ्या दोनही ब्लॉगवर वापरलेल्या बहुतेक इमेजेसबाबत मी हे आवर्जून करत आलो आहे. हे अजिबात अवघड नाही.

इथे तर वर दिलेल्या दोन उदाहरणामधील एक संपादक हे मला व्यक्तिश: ओळखणारे आहेत, त्यांच्याकडे माझा फोन नं. आहे नि ते फेसबुक मित्रयादीतही आहेत. छापल्यानंतर कौतुकाने फोटो पाठवण्याऐवजी त्याच माध्यमातून आधी संपर्क करून अनुमती घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. आज संगणकक्रांतीच्या कृपेने शून्य पैशांत फोन करणे शक्य झाले असतानाही मूळ लेखकाची अनुमती घेण्यास एक फोन करण्यास त्रास होतो? फुकटात मजकूर तर मिळतो आहे, निदान लेखकाचा पाच पैसे लायकीचा मान तरी त्याला द्यावा असे का वाटत नसावे?

‘मुद्रित नाम पाहता मम, तेणे धन्य जाहलो गे माये’ म्हणणार्‍या लेखकुंनी आपली पत इतकी खालावली आहे. लेखक हा नगण्य, क्षुद्र, ढेकूण आहे. त्याला आपण उपकृत करत आहोत अशा आविर्भावात वावरणार्‍या या प्रस्थापित माध्यम-ठेकेदारांसमोर घालीन लोटांगण केल्याचे हे परिणाम आहे.

छापण्यासाठी घायकुतीला आलेले लेखक(?) हे वाचूनही सुधारतील अशी सुतराम शक्यता नाही. तरीही...

- oOo-


हे वाचले का?