शुक्रवार, १२ मे, २०२३

जल्पकांस--

(शाहीर रामजोशी यांच्या पायीच्या धूलिकणातून फुटलेला अंकुर)

CourtPowada
’कोर्ट’ चित्रपटामध्ये शाहिराच्या भूमिकेत वीरा साथीदार.
गटागटाने ट्विटा मारूनि सोटा धरिशी का मनीं
जगाची उठाठेव कां तरी?

पोस्टीत अथवा ट्विटेत हो का, रिळांत घ्या हो कधी
स्नेहाचे नांव निज अंतरी

काय मनांत धरूनि इतरांशी वाकडे
ही काय जगाचे हित करतिल माकडे
आंतून थरकती, बाहेर वीर फाकडे
अगा शेळपटा उगा स्वत:ला शूर म्हणविसी गड्या
करुनि फुकाच्या काड्या  

भला जन्म हा तुला लाभला मनुष्यप्राण्याचा
धरिशी का डूख अहिसारखा
ट्विटेट्विटेवर शिळा पडो या, बिळांत लपुनि फेका
तरिही न होय ’तयाची’ कृपा
दर्भ वृत्तीचा मनीं धरोनी टोचशी कोणा फुका
जाळिशी तव रुधिराला वृथा

गुंडउदंडउद्दंड झुंड झुंडीची कृपा
न सार्थक, वांझच सारे खपा
हे वार-वाग्बाण जराही येतील ना कामा
ह्या दुर्लभ नरदेहात ठेवी करुणा
श्रमवंत भुकेला, तू अस्मिता-चोळणा

वर्म कळेना, धर्म सुचेना, कर्माने तू गधा
बांधुनि घे कविरायाचा शिधा

- शाहीर लांबहोशी
	

१. ट्विट: ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवरील प्रासंगिक लेखन. २. रिळांत: Reel = इन्स्टाग्राम, टिकटॉक, मोज आदि मायक्रोव्हिडिओ साईट्स वा अ‍ॅपवरील छोटे व्हिडिओ. ३. सर्प. ४. सांगा कोणाची? ५. आखूड विजार.


हे वाचले का?

शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

कविचा वडा

BusyEating
https://pixers.hk/ येथून साभार.
"डोंगराला आग लागलेली आहे...
डोंगराला आग लागलेली आहे,
आणि तू बटाटेवडा खातो आहेस...?"

कविता सादर करणार्‍या कविने 
माझ्याकडे बोट दाखवले. 
मी दचकलो! 

बटाटेवडा निसटून चटणीमध्ये... 
आणि ड्रग्जचा व्हावा तसा 
मला चटणीचा ओव्हरडोस 

"... याला तूच जबाबदार आहेस!"
ऐकणार्‍या चार जणांकडे फिरवून  
कविने बोट ममाझ्यावर रोखले.

’पण मी कुठे लावली ती आग?’ 
मी वड्यापासून तिखट चटणी 
निपटून काढत विचारले.

"पण ती लागताक्षणीच 
विझवायला धावलाही नाहीस तू." 
कविने डोळे वटारत म्हटले.

’तू तरी कुठे विझवायला गेलास?’ 
मी हेत्वारोप कम व्हॉटअबाऊटरी 
असा दुहेरी राष्ट्रीय तर्क अनुसरला.

"पण मी कवी आहे 
आणि कविता वाचतो आहे." 
कवी छाती फुगवून म्हणाला.

’मी ही खादाड आहे 
आणि बटाटेवडा खातो आहे.’ 
मी कवितेचे पुस्तक मिटले.

- रमताराम

- oOo -
	

हे वाचले का?

सोमवार, २४ एप्रिल, २०२३

ह्याला भाजप आवडत नाही... (ऊर्फ इलेक्शनचा ’गारवा’)

(’ कुण्या एकाची सत्तागाथा’ या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा.)

DepressedDevendra
(कवि सौमित्र यांची क्षमा मागून...)

ह्याला भाजप आवडत नाही, त्याला भाजप आवडतो.
निकाल हाती आल्यावर हा त्याच्या तावडीत सापडतो.

’मी तुला आवडतो, पण भाजप आवडत नाही,
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.’

’भाजप म्हणजे चिखल सारा, एक तू सुदृढ कमळ.’
’भाजप म्हणजे हुकमी सत्ता, अमित किती प्रेमळ.’

’भाजप नंतर दगा देतो, भाजप दगाबाजी’  
’भाजप म्हणजे वॉशिंग-मशीन, भाजप तरती होडी.’

’भाजप म्हणजे मुरगळल्या माना, भाजप म्हणजे मुकी वरात.’
’भाजपमध्ये, तपासातून सुटून, मन होऊन बसतं निवांत.'

जेव्हा जेव्हा इलेक्शन येते, दरवेळी असं होतं
सरकारवरून भांडण होऊन, लोकांमध्ये हसं होतं
भाजप आवडत नसला, तरी तो ह्याला आवडतो
भाजपसकट आवडावा तो, म्हणून तो ही झगडतो.
रूसून मग तो निघून जातो, झुरत राहतो पक्षात.
ह्याचं त्याचं भांडण असं इलेक्शनच्या दिवसात.

- सन्मित्र

- oOo -
	

हे वाचले का?

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

जम्पकट - ४ : कुटुंबव्यवस्था आणि वारसा

टोळी ते समाज आणि माणूस<< मागील भाग
---

खाण तशी माती, झाड तशी कैरी

जी. ए. कुलकर्णींच्या ’बखर बिम्म’ची मध्ये बिम्म आंब्याच्या झाडाला विचारतो की, ’तुझ्या झाडाला आंबेच का लागतात?’ त्या प्रश्नाला झाडाने दिलेले उत्तर मार्मिक आहे. ते म्हणते, ’असेच काही नाही. माझ्या झाडाला संत्री, मोसंबी, सफरचंदे, केळी अशीही फळे लागतात. पण ती सर्व कैरीसारखीच दिसतात.’

LikeFatherLikeSon

तीन-चार वर्षे वयाच्या बिम्मची जिज्ञासू बुद्धी ज्या पातळीवर असते, त्याच पातळीवर टोळीमानवाचीही असावी. एखाद्या फळातून निघालेली बी रुजली तर त्यातून आलेल्या झाडाला परत तेच फळ येते, तसेच माणसाचे मूल हे माणसासारखेच असते हे त्याला समजत होते. अनुवांशिकतेचे वैज्ञानिक कोडे उकलण्यास अजून कित्येक सहस्रकांचा अवकाश असला, तरी निव्वळ निरीक्षणाच्या पातळीवर ती नोंद घेतली जात होती.

माणूस प्राणिजीवनातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होता, तेव्हा नर-मादी संबंध हे देहभोगाच्या पातळीवरच होते. त्याचा मूल होण्याशी असलेला संबंधही अद्याप माणसाला उलगडला नव्हता. पुढे व्यवस्था म्हणून एकास-एक असे नर-मादी संबंध प्रस्थापित झाले आणि तोवर पुर्‍या टोळीची असलेली मुले ही केवळ त्या दांपत्याची होऊ लागली, त्या मुलांची टोळीतील इतरांपेक्षा या जोडप्याशी अधिक जवळीक होत गेली.

जोडीदारांची निवड

कोणताही जीव वयात येतो तेव्हा त्याच्यामध्ये देहभोगाची जाणीव विकसित होते नि त्यासाठी त्याला जोडीदाराची गरज भासू लागते. जोडीदार मिळवण्याच्या पद्धती प्रत्येक प्रजातीमध्ये वेगवेगळ्या दिसतात. बहुसंख्य प्राण्यामध्ये मादीसाठी नरांमध्ये बाहुबलाचा संघर्ष होतो. पक्ष्यांमध्ये नर हा अनुनयाला अधिक महत्त्व देणारा असतो. तो घरटे बांधून, गाऊन, नृत्य करून मादीला समागमास राजी करतो. प्रत्यक्ष शरीरसंबंध न येणार्‍या माशांसारख्या प्रजातींमध्येही अनुनयालाच अधिक महत्त्व असते. प्राण्यांमध्ये नराचा सद्दी असते तर पक्ष्यांमध्ये मादीची. नराने बांधलेले घरटे तिला आवडले नाही, तर ते उखडून टाकून ती चालती होत असते. प्राण्यांमध्ये मादीला बहुतेक वेळा बलवान नराशी समागम करावाच लागतो.

माणूस हा प्राणिकुलातला, त्यातही शिकारी असल्याने त्याच्या टोळीमध्ये बलवंताची सद्दी होती. परंतु माद्यांसाठी झुंजणारे काळवीट शक्तिपात करून घेऊन भक्षकांची आयती शिकार होतात हे पाहिले असल्याने, आणि मादीवरून झालेली भांडणॆ टोळी फुटण्यास कारणीभूत ठरताना दिसत असल्यानेही, ती टाळणे शहाणपणाचे आहे माणसाच्या लक्षात आले. त्यातून एकास-एक अशी नर-मादी व्यवस्था उदयाला आली.

पण एकास-एक हे ठरले तरी ’कोणाचा जोडीदार कोण असावा?’ हा नवा प्रश्न निर्माण झाला. काळाच्या ओघात याच्या सोडवणुकीसाठी विविध पर्याय निर्माण झाले. परंतु सुरुवातीच्या काळात हे काम टोळीतील ज्येष्ठांचे किंवा अनुभवी व्यक्तींचे असे. ही व्यवस्था स्थिर झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील ज्येष्ठांचे मतही महत्त्वाचे ठरू लागले.

दुसरीकडे पक्ष्यांच्या नि प्राण्यांच्या पद्धतीचा काहीसा संकर करुन स्त्री ही वीर्यशुल्का ठरू लागली. अमुक प्राण्याची एकट्याने शिकार करुन आणल्यास मुलगा मादी मिळवण्यास पात्र ठरू लागला. भारतीय पौराणिक वाङ्मयात क्षत्रिय राजकन्या अशा वीर्यशुल्का असत. जोडीदार निवडण्यासाठी विशिष्ट कार्य करुन दाखवण्याचे आव्हान त्या पुरुषांना देत असत. परस्पर-संमतीने जोडीदार निवडणे अजून बरेच दूर होते.

लैंगिक संबंध

एकास-एक नर-मादी संबंध ही व्यवस्था प्रस्थापित झाल्यानंतर त्या एका जोडीदाराशीच लैंगिक संबंध ठेवणॆ बंधनकारक ठरले. माणसाने स्वत:ची ’गुहा’ स्वत: निर्माण करुन तिला आपले वसतीस्थान केले. टोळीअंतर्गत प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र गुहा- म्हणजे झोपडीसदृश निवारा तयार होऊ लागला. माणसांतील नर-माद्यांमधील देहभोग हा याच जागेमध्ये म्हणजे टोळीतील सदस्यांच्या नजरेआड होऊ लागला. पण त्यामुळे शरीरसंबंध ही एकांतात करण्याची कृती आहे हा परस्परसंबंध रूढ झाला नि भावनेच्या विस्ताराबरोबरच त्या क्रियेशी निगडित इंद्रिय्प्रदर्शनाबाबत शरमेची भावना रूढ होऊ लागली.

एकांतात शरीरसंबंध प्रस्थापित करणारा माणूस हा पहिला प्राणी ठरला. एरवी निसर्गामध्ये एकांत ही संकल्पनाच निसर्गात अस्तित्वात नाही. इतर प्राण्यांच्या दृष्टिने एकांत म्हणजे सुरक्षित ठिकाण इतकाच असतो. त्यातही जोडीदाराची अथवा कळपाच्या सदस्यांची साथ असते. माणसाची बुद्धी आणखी विकसित होत गेली तसतसे पुढे त्याने एकांताचा वापर चिंतन नि वैचारिक विकासासाठीही करून घेतला. त्यातून निर्माण झालेले बुद्धिजन्य ज्ञान ही माणसाला प्राणिविश्वापासून वेगळे करणारी सीमारेषा ठरली.

नग्नतेची जाणीव

AdamAndEve
Adam and Eve in the Garden of Eden, oil painting by Titian, c. 1550; in the Prado, Madrid.

नागर समाजात प्राधान्याने रुजलेली नग्नतेची जाणीव ही जननेंद्रियांच्या सार्वजनिक दर्शनासंदर्भात असते. अन्न आणि संरक्षण/निवारा या माणसाच्या आदिम काळातील गरजा. जंगलनिवासी असताना आसपास सारी जनावरेच असल्याने नग्नतेची जाणीव माणसाला नसणार. बायबलमध्ये कुणा तिसर्‍याने- सर्पाने, आदम-ईव्हला त्यांच्या नग्नतेची जाणीव करुन दिल्याची कथा आहे.

जननेंद्रिये हा शरीराचा सर्वात नाजूक भाग असतो. चार पायांवर चालणार्‍या जनावरांमध्ये त्यांना दोन पायांचे संरक्षण मिळत होते. माणसांचे इतर जनावरांहून वेगळे-- मागील दोन पायांवर चालणे, सुरू झाल्याने माणसाची जननेंद्रिये समोरच्या बाजूने उघडी पडली. जंगलातून माणूस दोन पायांवर चालत असताना पुढे चालणार्‍याच्या हातून निसटलेल्या एखाद्या लहानशा फांदीचा आघातही अतिशय वेदनादायक होत असणार.

हे टाळण्यासाठी माणसाने शिकारीतून मिळालेल्या जाड कातड्याने जननेंद्रिय झाकण्यास सुरुवात केली. वन्यजीवी मानवाची जाणीव लज्जा नव्हती आणि लज्जारक्षण ही गरज नव्हती, जाणीव वेदनेची होती तर संरक्षण ही गरज होती. म्हणून त्याची प्रावरणे ही जाड कातडी होती, अ‍ॅडम-ईव्हच्या कथेत दाखवतात तशी अंजिराची दुबळी पाने नव्हती.

माणूस नागर झाल्यावर आणि सामाजिक चालीरीतींमध्ये बरेच बदल घडल्यावर, नागर आयुष्यात जननेंद्रियांवरील आघाताची शक्यता/संभाव्यता नगण्य झाल्यावर, वेदना-संरक्षण जोडीला मागे ढकलून नग्नतेची जाणीव पुढे सरकली असावी.

अपत्य संगोपन

पुनरुत्पादनानंतर अपत्य-संगोपन हा पुढचा टप्पा येतो. विविध सजीवांमध्ये तो विविध प्रकारे हाताळला जातो. प्राण्यांमध्ये ही जबाबदारी बव्हंशी मादीची असते. नर क्वचितच त्यात सहभागी असतो. बर्‍याच पक्ष्यांमध्ये मात्र एकास-एक अशी नर-मादी जोडी असते नि अपत्य-संगोपनामध्ये दोघांचाही सहभाग असतो. माशांमध्ये अथवा कीटकांमध्ये मात्र अपत्य संगोपनामध्ये नर अथवा मादी दोहोंचाही सहभाग नाही.

माणसांमध्ये पक्ष्यांप्रमाणे एकास-एक जोडी प्रस्थापित झाल्यानंतर अपत्यसंगोपनात नरही आपली जबाबदारी उचलू लागला. इतर प्राण्या-पक्ष्यांपेक्षा माणसाचे पिलू बरेच अधिक काळ परावलंबी राहात असल्याने मादीला या मदतीची आवश्यकताही होती. सुरुवातीच्या काळात ही जबाबदारी म्हणजे प्रामुख्याने अन्नाची सोय एवढीच होती. पुढे अनुवांशिकतेची जाणीव जसजशी दृढ होत गेली तसतसे या अपत्य-संगोपनाला नातेसंबंधाच्या भावनेचे अस्तर मिळून गेले आणि त्याचे रूपांतर जबाबदारीतून कर्तव्यामध्ये होत गेले.

मम, आत्मन:

शिकारीतून अथवा संकलनातून मिळालेले अन्न हे पुर्‍या टोळीसाठी असे. मुलेही टोळीचा भाग असल्याने त्यांचाही वाटा त्यात असे. त्यामुळे परावलंबी मुलांना अन्न पुरवण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न नव्हता. ती पुर्‍या टोळीची जबाबदारी होती. टोळीअंतर्गत कुटुंबे तयार झाली आणि ती जबाबदारी त्या-त्या कुटुंबप्रमुखाची ठरली. त्यातून अन्न-संकलन हे टोळीचे सामूहिक काम हळूहळू कौटुंबिक पातळीवर सरकले.

त्याचबरोबर कुटुंबाने कमावलेले अन्न हे प्राधान्याने त्या कुटुंबाचे ठरू लागले. प्रत्येक जोडप्याने कमावलेल्या अन्नातील वाटा टोळीतील इतरांकडे जाण्यापूर्वी त्यांच्या मुलांकडे जाऊ लागला. यातून खासगी मालकीच्या संकल्पनेकडे माणसाची वाटचाल सुरू झाली. अशा तर्‍हेने अनुवांशिकतेची जाण निर्माण होण्याआधीच माणसामध्ये वारशाची जाणीव निर्माण झाली होती.

कुटुंब संकल्पनेचा विस्तार

मागील भागात म्हटल्याप्रमाणे माणसाचे शिकारीसह शेतीचे तंत्र आत्मसात केले नि जगण्यामध्ये आवश्यक तसंच उपयुक्त कौशल्यांची जंत्री वेगाने वाढली. शिकारीपासून कातडे कमावणे, तिला आवश्यक ती हत्यारे तयार करणे, भक्ष्याचा माग काढणे अशी विविध कौशल्ये शिकारीसाठी तर शेतीमध्ये शेतीयोग्य जमीन तयार करणे, तिची स्वच्छता, रुजवण्यास बीजे शोधणे व त्यांचा साठा करणे, जनावरांच्या धाडीपासून त्यांचे रक्षण करणे अशी अनेक पर्यायी कौशल्ये माणसाच्या जमातीमध्ये विकसित होऊ लागली.

ते विशिष्ट कार्य करणारा कुटुंबप्रमुख शिकार्‍यांप्रमाणेच आपण जमा केलेले त्यासंबंधीचे ज्ञान आपल्याच पुढच्या पिढीकडे वारसा म्हणून सोपवू लागला. यातून त्या-त्या कौशल्याआधारे कुटुंबे विस्तारली आणि विशिष्ट कामे करणार्‍या जमातींचा उदय झाला. यातून भारतातील वर्णव्यवस्था नि जातिव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली. टोळी विस्तारत विविध कुटुंबांच्या उतरंडींचा समाज निर्माण झाला.

एकविसाव्या शतकातील लग्नसंस्था

टोळीजीवनाच्या काळात प्रस्थापित झालेली एकास-एक नर-मादीची जोडी हे लग्नसंस्थेचे प्रारूप बव्हंशी स्थिर झालेले आहे. काळाच्या ओघात तिच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. खासगी मालमत्तेचेही कौशल्याप्रमाणेच वारशामध्ये रूपांतर झाल्यामुळे या लग्नसंस्था स्थिर होत गेली. त्याचबरोबर लग्नसंस्था ही धार्मिक व्यवस्थेने आणि राज्यव्यवस्थेनेही आपल्या व्यवस्था-उतरंडीमध्ये सामावून घेतल्याने ती अधिक बळकट होत गेलेली आहे. धार्मिकतेने तिच्याभोवती पावित्र्याची झूल पांघरली, तर राज्यव्यवस्थांनी तिच्या-आधारे खासगी मत्तेसंदर्भामध्ये वारसाहक्काचे नीतिनियम बांधत नेले आहेत.

बहुपत्नित्व ही पर्यायी व्यवस्था अस्तित्वात असली, तरी त्यांची संख्या एकुण लोकसंख्येच्या तुलनेत नगण्यच राहते. ही व्यवस्था प्रामुख्याने युयुत्सु समाजांतच उदयाला आली. माणसांनी शिकार म्हणून प्राण्यांशी केलेला संघर्ष बराच मागे पडून जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी माणसांच्या टोळ्या आपसात लढू लागल्या. त्यात बळी पडत असल्याने समाजातील पुरुषांची संख्या घटू लागली. त्यातून नर गमावलेल्या स्त्रीलाही नवा जोडीदार देणे आवश्यक ठरले. यामागे तिच्या उदरनिर्वाहाची सोय नि तिचे उत्पादक भूमी म्हणून असलेले स्थान अशी दोनही कारणे होती. आणि स्त्री-पुरूष संख्येतील असमतोलामुळे एक नर नि एकाहुन अधिक माद्या अशी व्यवस्था स्वीकारणे भाग पडले.

टोळीयुद्धांची वारंवारता कमी झाली, जगभरात लोकशाही राज्ये उदयाला आली आणि स्त्री-पुरुष गुणोत्तर पुन्हा एकास-एकच्या आसपास आल्यामुळे बहुपत्नित्व ही आता कालबाह्य झालेली व्यवस्था आहे. तरीही काही प्रमाणात ती टिकून आहे. त्यात याचे एक कारण बलवंताचा आश्रय घेऊन आपल्या मुलांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्याच्या स्त्रीच्या उपजत उत्क्रांतीवादी प्रेरणेत आहे. दुसरीकडे राजकीय आर्थिक नि सामाजिकदृष्ट्या बलवान असलेले राजे, सुलतान सरदार जसे एकाहुन अधिक स्त्रियांशी सहवास करत असत. त्याचा परिणाम म्हणून एकाहुन अधिक स्त्रिया भोगणे याला एकप्रकारे पौरुषाचे परिमाण मिळाले आहे. जे जाणीव-नेणिवेच्या पातळीवर सर्वसामान्यांतही रुजून बसले आहे.

स्वातंत्र्य, समता नि बंधुता या त्रिसूत्रींच्या आधारे उभ्या राहिलेल्या लोकशाहीने एकाधिकार स्वरूपाची शासनपद्धती मोडीत काढली. प्रजेची जनता झाली नि तिला आपले राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार मिळू लागला, त्याचप्रमाणे ज्येष्ठांचे अथवा मागील पिढीचे जोडीदार निवडण्याचे एकाधिकार संपुष्टात येऊन प्रत्येकाला ते स्वातंत्र्यही मिळू लागले.

चाचणी आणि विच्छेद

टोळीजीवनाच्या काळात विवाहविच्छेद होत असत का, असल्यास त्यांचे प्रमाण किती आणि त्यातून सुटे झालेले जोडीदार पुन्हा नव्या जोडीदारांचा शोध कसा घेत असत याबाबत मला फारशी माहिती मिळाली नाही. परंतु अर्वाचीन काळात पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये असो की मुस्लिम कायद्यामध्ये असो, विवाहविच्छेद नि पुनर्विवाह फारसे दोषास्पद मानले जात नाहीत. भारतीय समाजामध्ये मात्र अद्यापही योनिशुचिता आणि त्या अनुषंगाने लग्नसंस्थेला नेसवलेले पावित्र्याचे प्रेतवस्त्र यामुळे विवाहविच्छेद हा सामाजिक कलंक मानला जातो.

सुदैवाने नागरी नि महानगरी समाजात हे बंधन बरेचसे सैल होऊ लागले आहे. लग्न हा कायदेशीर करारही असल्याने त्याच्या संभाव्य विच्छेद हीदेखील कायदेशीर प्रक्रिया असते. त्याची संभाव्यता कमी करण्यासाठी ’विवाहपूर्व सहजीवन’ अर्थात लिव्ह-इन ही अनौपचारिक व्यवस्थाही हळूहळू रूढ होऊ लागली आहे. त्याहीपूर्वीची स्थिती म्हणजे परस्परांना अधिकृतपणे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड अशी जोडी जाहीर करुन बांधिलकीची औपचारिक घोषणाही केली जाऊ लागली आहे. काळाच्या ओघात लग्नसंस्थेची बंधने वा प्रारूप फारसे बदलले नसले तरी तिला अशी अनुषंगे मिळू लागली आहेत.

पर्यायी लैंगिकता

AlternateSexuality
.

मानवी इतिहासामध्ये प्रामुख्याने नर-मादी अशीच जोडी दिसत असे. या दोन्ही गटात न बसणारे सरसकट ’तृतीयपंथी’ समजले जात. त्यांना समाजात स्थान नसे. काही समाजांनी आपल्यातील एक मोठा भाग ’अस्पृश्य’ म्हणून गावकुसाबाहेर ठेवला होता. हे तृतीयपंथी त्यांच्याहूनही उपेक्षित मानले जात.

परंतु हा सरसकट एक वर्ग वा गट नाही हे आता पाश्चात्त्य समाजव्यवस्थांमध्ये मान्य होऊ लागलेले आहे. स्त्रीला स्त्री किंवा पुरुषाला पुरुष जोडीदारच हवासा वाटणे हे संख्येने कमी असले तरी अनैसर्गिक नाही हेही आता पुरेसे स्पष्ट होऊ लागले आहे. यातून समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेची मागणी लावून धरली जात आहे. अमेरिकेसारख्या देशातील काही राज्यांत ती मान्यही झालेली आहे.

टोळीजीवनात माणसाच्या जगण्याला फारसे पैलू नव्हते. नर-मादी संबंध हा केवळ देहभोगापुरता नि पुढे अपत्यसंगोपनापुरताच येत असे. आज मानवी बुद्धीच्या अफाट प्रगतीनंतर जगण्याला कला, विचार, अजैविक निर्मिती, समाजधारणा असे असंख्य पैलू निर्माण झाले आहेत. एखाद्या चतुरस्र व्यक्तीला यातील प्रत्येक पैलूमध्ये त्याचा/तिचा जोडीदार साथ देऊ शकेलच असे नाही. अशा वेळी त्या व्यक्तीचे एकाहुन अधिक जोडीदार का असू नयेत असा एक विचार मांडला जाऊ लागला आहे. सैद्धांतिक पातळीवर का होईना, पण एकास-एक या व्यवस्थेला आव्हान देणारी मांडणी होऊ लागलेली आहे.

कृत्रिम गर्भधारणा

अपत्याची आस माणसाला प्राणिजगतापासून वेगळे करणारी भावना आहे. पण सर्वच नर-मादी जोडप्यांना यात यश मिळेलच असे नाही. जर त्यांच्यामध्ये अपत्यसंभवासाठी आवश्यक असणार्‍या पुंबीज वा स्त्रीबीजाची कमतरता नाही, तरीही त्यांना मूल होत नाही अशी स्थिती असेल, तर कृत्रिम गर्भधारणा हा विज्ञानाने अशा जोडप्यांना दिलेला पर्याय आहे. त्या दोघांच्या बीजांचे बाह्य फलन घडवून आणून नंतर तो गर्भ थेट स्त्रीच्या गर्भाशयाकडे पुढील वाढीसाठी सोपवला जातो. यातून गर्भधारणा प्रक्रियेतील अडचणीला वळसा घालून पुढे जात आपल्याच बीजांचे मूल त्यांना मिळत असते.

या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष देहभोगाखेरीजही गर्भधारणा शक्य होते आहे. यामुळे समलैंगिक जोडप्यांना अपत्यसंभवासाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो आहे. यात दोघांकडेही स्त्री अथवा पुरुष यापैकी एकाच प्रकारचे बीज उपलब्ध असते. त्याचे फलन करणारे दुसर्‍या प्रकारचे बीज हे तिसर्‍या अन्य-लिंगी व्यक्तीकडून घेऊन अपत्यजन्म शक्य होऊ लागला आहे. या कृत्रिम गर्भधारणा प्रक्रियेमुळे त्या तिसर्‍या व्यक्तीशी थेट शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता राहात नाही.

एक बीज उसने आणून गर्भधारणा शक्य होऊ लागल्याने जोडीदार नसणार्‍यांनाही अपत्य जन्माला घालण्याचा पर्याय उपलब्ध झाला. अर्वाचीन समाजातील ’मला मूल हवे, मातृत्वाची आस आहे. पण त्यासाठी कुण्या पुरुषाचे दास्यत्व पत्करण्याची माझी इच्छा नाही.’ असे म्हणणार्‍या स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांना एखाद्या दात्याकडून पुंबीज घेऊन स्वत:च्या बीजाचे मूल जन्माला घालणे शक्य झाले आहे. अपत्यप्राप्तीसाठी आजवर अपरिहार्य मानल्या गेलेल्या लग्नसंस्थेला यातून आव्हान मिळू लागले आहे.

अन्य बीजापोटी

AdoptAChild

समलैंगिक जोडीदारांना किंवा एकल मातांना एका प्रकारचे बीज एखाद्या बाह्य दात्याकडून घेणे अपरिहार्य ठरते. परंतु अनेकदा नर-मादी जोडप्यामध्ये दोघांपैकी एक-जण अपत्यजन्मातील आपली भूमिका पार पाडू शकत नसेल, आणि तरीही त्यांचे परस्पर नाते दृढ असेल अपत्यसंभवासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय शिल्लक राहातात.

दोघांपैकी निदान एकाच्या बीजाचे मूल जन्माला घालण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. यातून समलैंगिक जोडप्याप्रमाणे जोडीदारांपैकी एकाचे बीज आणि त्रयस्थ विरुद्धलिंगी दात्याचे बीज यांचे फलन घडवून कृत्रिम गर्भधारणा घडवली जाते.

दुसरा पर्याय असतो दत्तक घेण्याचा. आधीच जन्मलेले वा गर्भात असलेले मूल अपत्याची आस असलेले हे भिन्न-लिंगी वा समलिंगी जोडपे दत्तक घेते. यात जोडीदारांपैकी एकाचेही बीज त्या गर्भाशी जोडले गेलेले नसते. दत्तक मूल हे सर्वस्वी वेगळ्या बीजांचे असते. ते जोडपे परस्परांना बांधिल असलेले, पण अपत्य-संगोपनाची कुवत नसलेले असू शकते, किंवा बांधिल नर-मादी नसून त्यांच्या केवळ प्रासंगिक देहभोगातून जन्मल्यामुळे ते मूल त्यांना नकोसे झालेले असू शकते. या ना त्या प्रकारे अपत्याचे मूळ आई व वडील त्या मुलाचे पालकत्व सोडून देत असतात.

दत्तक घेण्याचा पर्याय हा मानवाच्या कुटुंबसंस्थेतील सर्वात प्रागतिक पर्याय आहे असे म्हटले पाहिजे. कारण यात ’शुद्ध बीजापोटीच फळे रसाळ गोमटी’ हा दुराग्रही दावा नाकारला जातो. बीजासोबतच संगोपन आणि संस्कार यांचा त्या अपत्याच्या प्रगतीमध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा असतो हे यातून अनेकदा सिद्ध होत असते. अपत्याची आस असणारी जगभरातील जोडपी आपल्या वंश, देशाची नसलेली अपत्येही दत्तक घेऊन वाढवताना दिसतात. यातून हे भेदाभेद फारसे दुबळे झाले नसले तरी निदान आपल्यापुरत्या या भिंती पाडल्या जाऊ शकतात हे मात्र अधोरेखित होते आहे.

वर म्हटल्याप्रमाणे स्त्री जसे एकल-माता होण्याचा निर्णय घेऊ शकते तसेच एखादा पुरुषही लग्नसंस्थेशिवाय, स्त्रीसंगाशिवाय आपल्या पुंबीजाचे अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय घेऊ शकतो. फरक इतकाच की गर्भ धारण करण्याची क्षमता स्त्रीमध्ये असल्याने ती स्वत: ते मूल वाढवू शकते. पण एकल पुरुषाला मात्र जशी स्त्रीबीजदात्री आवश्यक असते तसेच त्यातून तयार होणारा गर्भ वाढवण्यासाठी एक दत्तक माताही.

दत्तक मातृत्व

जोडप्याने मूल दत्तक घेण्याप्रमाणेच मुलासाठी माता दत्तक घेणे हा ही एक पर्याय मानवी संस्कृतीमध्ये विकसित झालेला दिसतो. हे दत्तक मातृत्व हे दोन प्रकारचे दिसते.

लोकशाहीपूर्व काळात राजे, सरदार वगैरेंच्या पत्नी या आपल्या ’मालकांना’ मूल म्हणजे ’वारस’ देण्यास कटिबद्ध तर होत्या. परंतु हे ’नर’ समाजातील उच्चभ्रू, अन्य स्त्रियांसाठी - आजच्या भाषेत - ’डिझायरेबल’ नरही असल्याने ते अन्य स्त्रियांकडे आकर्षित होण्याचा धोकाही होता. त्यांनी आपण सोडून अन्य माद्यांकडे जाऊ नये यासाठी त्यांच्या अनुरंजनासाठी सतत सिद्ध राहणे या पत्नींना आवश्यक असे.

अपत्यसंगोपनाचा काळ हा त्या दृष्टीने गाफील काळ असे. त्यासाठी तो कमीत-कमी राखण्याकडे त्या स्त्रियांचा कल असे. त्यामुळे या मुलांसाठी दाई अथवा आया नेमून संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जात असे. पाश्चात्य जगतातील नॅनीज् हे यांचेच एक रूप. या दाई अनेकदा दूध-माताही असत. आपल्या मुलांबरोबर या दत्तक मुलाला आपले दूध पाजत असत. या श्रेष्टींच्या मुलांचे नि त्यांच्या दाईंचे आईखालोखाल विशेष असे नाते निर्माण होत असे.

दुसरे दत्तक मातृत्व हे सर्वस्वी शारीर पातळीवरचे. ज्याला ’सरोगसी’ असे म्हटले जाते. मूल आधी जन्माला घालून ते दाईकडे सोपवण्याऐवजी तिच्याच पोटी ते वाढवले तर...? अशी कल्पना अर्वाचीन विज्ञानाने केली. यातून गर्भधारणेच्या काळात येणारे परावलंबित्व, त्यातून होणारे शारीर बदल हे ही टाळता येतात. कृत्रिम गर्भधारणेचा पर्याय उपलब्ध होताच. आता फक्त तयार झालेला गर्भ मूळ मातेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित न करता एखाद्या अन्य स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ठेवला नि वाढवला तरी चालते. 

हे मूल, तो गर्भ मूळ माता-पित्यांच्या बीजातून जन्मलेला असल्याने तेच त्याचे जैविक माता-पिता असतात. गर्भाशय भाड्याने देणारी स्त्री मुलाच्या जन्मानंतर आपला मोबदला घेऊन निघून जाते. अमेरिकेमध्येच नव्हे तर भारतामधील करियरप्रधान समाजातील अनेक जोडपी अथवा एकटे स्त्री वा पुरूष या पर्यायाची निवड करताना दिसतात.

परित्यक्त, अनाथ मुले

एकास-एक असो वा बहुपत्नीत्व, जोडीदार निश्चित झाल्यावर त्याच्याखेरीज अन्य व्यक्तीसोबत देहभोग निषिद्ध मानला जाऊ लागला. भिन्न कारणांनी एकाहुन अधिक जोडीदार पसंत असतील तरीही त्यातील एकच निवडण्याचे बंधन निर्माण झाले. आधीच निवडलेल्या जोडीदाराहून अन्य जोडीदार हवासा वाटला तर विवाहविच्छेद तुलनेने सोपा झाला हे खरे, परंतु भारतीय समाजामध्ये पुनर्विवाह फारसा स्वीकारार्ह नसल्यामुळे त्यातून परित्यक्तांचा प्रश्न गंभीर झाला.

टोळीजीवनात एकास-एक नर-मादी अशी व्यवस्था नव्हती तेव्हा मुले ही सार्‍या टोळीची असत. माकडांच्या टोळीमध्ये लेकुरवाळ्या माकडिणीचे पिलू उचलून होऊ घातलेल्या आया वा वयात येऊ लागलेल्या माकडिणी अपत्य-संगोपनाचा सराव करत असतात. एकुणात टोळीमध्ये कोणतेही मूल हे अनाथ राहात नसते. एखाद्याची जैविक आई काही दगावली, तरी त्याच्या ’मावशा’ त्याचे संगोपन करताना दिसतात. एकास-एक जोडप्याचे कुटुंब आकाराला आले नि अनाथ मुलांचा प्रश्न निर्माण झाला, आणि अनौरस मुलांचाही.

वर उल्लेख केल्याप्रमाणॆ सुदैवाने अपत्य दत्तक घेण्याचे प्रमाण बरेच वाढल्यामुळे या मुलांना पालकांचे छत्र मिळण्याची शक्यताही वाढते आहे. जनावरांप्रमाणे मावशा नसल्या तरी अनाथांचे संगोपन ही लोकशाही व्यवस्थेने आपली जबाबदारी मानलेली आहे. त्यातून अनाथालयांसारख्या संस्था उभ्या राहात आहेत.

लेखाच्या सुरुवातीला बिम्मने आंब्याच्या झाडाला विचारलेल्या प्रश्नाचा आणि त्याला झाडाने दिलेल्या उत्तराचा उल्लेख केला आहे. वेगवेगळ्या फळांमध्ये वेगवेगळी बीजे असतात. पण त्या सार्‍यांचे संगोपन करणारे झाड एकच असू शकते ही कल्पना फक्त माणूसच करू शकला आहे.

WalkingAChild

- oOo -

    पुढील भाग >> अजन्मा जन्मासि आला (आगामी)


हे वाचले का?

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

कुण्या एकाची सत्तागाथा (एक राजकीय विरहगीत )

राजकीय आखाड्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या विरोधी पक्षनेत्याशी असणार्‍या साट्यालोट्याबद्दल सतत कुजबूज होत असते. एका पंच पंच उष:काली दोघांनी बांधलेली गाठ ज्येष्ठांच्या आशीर्वादाअभावी सोडावी लागल्यानंतर त्यांच्यातील संबंधांबद्दल अधूनमधून वावड्या उठत असतात. त्यात कितपत तथ्य आहे ते त्या दोघांनाच ठाऊक. एक नक्की, भूतकालातील त्या आशादायी पहाटेची आठवण काढत त्यांच्यातील एक जण संध्याकाळी उदास फिरताना दिसतो. एका हताश क्षणी त्याने शब्दबद्ध केलेली आपली विरहवेदना...

AjitToRajbhavan
https://www.bhaskar.com/ येथून साभार
(कविवर्य ’आरती प्रभू’ यांची क्षमा मागून...)
 
तो येतो आणिक जातो
येताना कधी सह्या आणितो
अन् जाताना चिठ्या मागतो 
येणे-जाणे, देणे-घेणे 
असते सारे जे न कधी तो सांगतो

येताना कधी आधी लपतो 
तर जाताना तो लपवितो
कळते काही, उगीच ते ही 
नकळत बोले पुशित बाही 
पदावाचून कधीच ’नाही... नाही...’ म्हणतो 

येताना त्याची खुलते कळी 
गुणगुणतो तोही भूपाळी* 
जाताना कधी करून बेत 
येण्यासाठीच फिरून येथ 
मध्येच येतो, निघून जातो... हे सलते

- oOo -

* प्रात:काली गाण्याचा एक प्रकार
	

हे वाचले का?

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ४ : आपल्या पक्ष्याचा शोध

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

प्रतिबिंबांचा प्रश्न << मागील भाग

---

एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. पिंजर्‍याचे दार मोडलेले होते, पक्ष्याचे अस्तित्त्व संपून गेले, पण रंग नि आतील दांडी नव्या पक्ष्याचे स्वागत करायला अजूनही उत्सुक होती. पूर्वी त्यात एक पिवळा पक्षी(१) होता हे आईकडून बिम्मला समजते. 'आता तो कुठे गेला?' हा प्रश्न ओघाने आलाच.

त्या पक्ष्याचे काय झाले असेल हे तर्क करण्याजोगे आहे. पण खरे ते सांगणे म्हणजे बिम्मच्या पुढच्या अवघड प्रश्नांना सामोरे जाणे आहे. साहजिकच 'त्याच्याशी खेळायला कोणी नव्हते म्हणून कंटाळा येऊन तो उडून गेला असेल.' असे सांगत आईने ते टाळले आहे. 'मग मी त्याला बोलावून आणतो.' असे म्हणून बिम्म त्या कामगिरीवर निघतो. मग मागील आवारातील आजोबांच्या मदतीने त्याने त्या पक्ष्याचा शोध सुरू करतो.

या आधीच्या भागांमध्ये सामोरे गेलेल्या ’मी कोण?’, ’यापैकी मी कोण?’ याचा पुढचा प्रश्न म्हणजे ’माझे कोण?’ या प्रश्नापाशी बिम्म आता पोहोचला आहे. नीनमला शोधायला बाहेर पडलेल्या बिम्मला आजोबा विचारतात, ’काय शोधतो आहेस? काय पाहिजे तुला?’ तेव्हा त्याचे उत्तर असते, ’मला आमचा पिवळा पक्षी पाहिजे.’ यात ’मला’ आणि ’आमचा’ असे दोनही शब्द येतात. आमचा म्हणताना आमच्या आई-वडिलांचा, बब्बीचा या सार्‍यांचा मिळून ’आमचा’ असे अभिप्रेत आहे. त्यामुळे एका दृष्टीने पाहिले तर तो पक्षी हा त्याचा वारसा आहे. जन्मलेल्या प्रत्येकाला आईवडिलांकडून जात, धर्म, संस्कार या खेरीज जड संपत्तीही मिळत असते. पण ते सारे फार पुढे. बिम्मच्या वयात पिवळ्या पक्ष्यासारख्या अलवार वारशाचे अप्रूपच अधिक असते.

ComeNeenam
http://www.cs4fn.org/ येथून साभार.

मग आजोबांनी दाखवलेल्या पक्ष्यांमध्ये कुरापती काढून त्यांना नाकारत जातो. कुणी पिवळा नाही, कुणी पुरेसा पिवळा नाही, कुणाची फक्त चोचच पिवळी आहे तर भारद्वाज हा तर 'बदामी कोट घातलेला कावळ्या'सारखा दिसतो आणि पिंजर्‍यात मावणार नाही म्हणून निकालात काढला जातो. बिम्मला त्यांचा संपूर्ण पिवळा पक्षीच हवा असतो.

’लैलाको मजनूं की नज़रसे देखना चाहिए’ असं म्हटलं जातं. त्यामागे हीच आस असते. इतरांना जे दुय्यम वाटतं, कुरूप वाटतं, सामान्य वाटतं त्यामध्ये एखाद्याला जगातील अद्वितीय सौंदर्य दिसू शकते. कारण त्या दृष्टीमध्ये त्याच्या भावनांचे, भावबंधांचे अस्तर असते. म्हणून ’लैलाहून देखणी नि बुद्धिमान पत्नी तुला सहज मिळेल’ हे सांत्वन मजनूंला पुरेसे ठरत नसते.

परिपूर्णतेचा ध्यास घेण्याचा, पूर्वनिश्चित साध्याशिवाय कोणत्याही अपुर्‍या, दुय्यम, कमअस्सल अथवा वेगळ्या पर्यायी साध्याबाबत असमाधानी असण्याचा बिम्मचा हा स्वभाव वय वाढते तसा कमीकमी होत जातो. अखेर ’मिळते तेच साध्य’ असे पटवून घेण्याचा/ देण्याचा खेळ सुरू होतो. एक पक्षी ’निघून’ गेल्यावर बिम्मची आई नवा पक्षी आणण्याची तसदी न घेता पिंजराच अडगळीत टाकून देते. बिम्म मात्र त्या हरवल्या साथीदाराला पुन्हा शोधून आणण्याची उमेद बाळगतो, कुठल्याही पर्यायाला हट्टाने नाकारतो. सान आणि थोरांच्या दृष्टिकोनातील हा फरक ध्यानात ठेवण्याजोगा.

आईपेक्षाही चार-दहा पावसाळे पाहिलेले आजोबा सुज्ञ असतात. जे वास्तवात अप्राप्य असते ते स्वप्न-साध्य असते हे त्यांना ठाऊक होते. म्हणून ते बिम्मला घरी जाऊन एक झोप घेण्याचा सल्ला देतात. ’तोवर नीनम आलाच तर मी त्याला तुझ्याकडे पाठवतो’ असे आश्वासनही देतात. खट्टू होऊन घरी आलेल्या बिम्मला आई बिम्मला झोपायला नेमकी पिवळी फुले असलेलीच एक उशी देते.

झोपलेल्या बिम्मच्या स्वप्नातही निळे पक्षी आले, गुलाबी पक्षी आले, पांढरे-काळे ठिपके मिरवणारे पक्षी आले, हिरवे पोपट आले, पांढर्‍या ढगातून पांढरे बगळेही आले. सारे रंग दिसले पण पण पिवळा काही दिसेना आणि नीनम काही भेटेना. नंतर आलेल्या कोंबडा, मोर, कबुतर यांच्यापाठोपाठ अखेर तो आला. त्याच्या आगमनाचे जीएंनी केलेले वर्णन बिम्मच्या कल्पनाविलासाचे दर्शन घडवणारे आहे. ते वाचल्यावर ’खाऊ किती हवा?’ ’तुझ्याकडे खेळणी किती आहेत?’ वगैरे प्रश्नांना ’इन्फिनिटीऽऽऽऽ’ असे उत्तर देणारा, त्या शब्दाचा अर्थही नेमका ठाऊक नसलेला, एका मित्राचा छोटा मुलगा आठवून गेला.

त्याच क्षणी स्वरांच्या जरकाड्या झाल्याप्रमाणॆ तीन अत्यंत सुरेल व रेखीव असे शिट्टीचे आवाज ऐकू आले आणि सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला. मग खिडकीत एक विशाल पिवळा पक्षी आला, आणि क्षणभर त्याने पंख उघडताच सारी खिडकी भरून जाऊन क्षणभर एक चौकोनी सूर्योदय झाल्यासारखे दिसले. त्याचा प्रकाश फार झळझळीत होता. त्याच वेळी पाच कोकीळ नि दोन कावळे तिथे आले नसते, त्यांनी आपल्या काळ्या रंगाने तो प्रकाश सौम्य केला नसता, तर सर्वांना डोळे उघडे ठेवणे अशक्य झाले असते.

भग्न वर्तमान मिरवणार्‍या जमातींना आपला भूतकाळ असा देदिप्यमान, सूर्योदयासारखा प्रखर आणि सारे आकाश व्यापणारा होता असे स्वप्न पाहायला आवडते. तसंच वास्तवातील आपले साध्य अप्राप्य राहिल्याने, ते मुळातच त्यांच्या कुवतीहून बरेच मोठे, असाध्य होते अशी कल्पना करणेही त्यांना सोयीचे वाटते. त्यातून एकीकडे त्याचा अभिमानही मिरवता येतो तर दुसरीकडे अपयशाचे न्यूनही झाकता येते. आपल्या भूतकाळाचे रूप इतके तेजस्वी आहे की ’त्याच्या असूयेने कुणी सैतान, कुणी मार, कुणी राक्षस त्याला ग्रासू पाहतो म्हणून त्याचे काळवंडलेले तेजच आपल्या नजरेस सहन करता येते’ अशा बढाया मारण्याची तजवीज करण्यासाठी ते आपले कोकीळ, आपले कावळेही निवडून ठेवत असतात.

त्या पिवळ्या पक्ष्याला पाहताच हाच नीनम आहे याची बिम्मला खात्रीच पटली. पण त्याने तो पिंजरा उचलला त्याला लक्षात आले की हा नीनम तर पिंजर्‍यापेक्षा बराच मोठा दिसतो. मग त्याने विचारले, 'नीनम, अरे तू एवढा मोठा आणि तुझे घर तर अगदी लहान आहे. आता कसे रे?" आता पिंजरा राखायचा तर पक्ष्याला सोडायला हवे आणि पक्षी राखायचा तर पिंजरा सोडावा लागणार असा पेच निर्माण झाला आहे.

तुम्ही-आम्ही या पेचातून सुटण्यासाठी काय करु? साहजिक मोठ्या पक्ष्यासाठी मोठा पिंजरा आणण्याचा विचार करु. (सजीवाला प्राधान्य हा नेणिवेतील नियम यामागे असावा.) पण त्यासाठी नवा पिंजरा आणण्यासाठी पैसे नि प्राधान्य दोन्ही हवे. विचार आणि कृती यांच्यामध्ये कुवत उभी असते. कुवतीपेक्षा मोठी स्वप्ने पाहण्यातून हा पेच निर्माण होतो. साध्य तर विशाल आहे, पण ते कवेत घेण्यास कुवत बहुधा कमी पडत असते.

आणखी एका दृष्टीने पाहता येते. पूर्वी कधीतरी हाती निसटून गेलेले जिवंत सख्य हे मधल्या काळात चक्रनेमिक्रमाने वाढून बसलेले असते. आपल्या मनातील त्याचा पिंजरा तेवढाच राहिलेला असतो, कदाचित आपण हेतुत: तसा जपलेला असतो. यासंदर्भात रणजित देसाईंच्या ’राधेय’मधील एक हृद्य प्रसंग आठवतो. गुरुगृही शिक्षणासाठी गेलेल्या कर्णाच्या आठवणीने व्याकुळ झालेले अधिरथबाबा त्याच्यासाठी रथ बनवू लागतात. तो रथही बिम्मच्या पिंजर्‍याप्रमाणे त्यांच्या मनातील कर्णाचे प्रतीकरूप आहे.

पण गंमत अशी होते बाल्यावस्थेमध्ये गुरुगृही गेलेला कर्ण परतून येतो तो ताडमाड वाढलेला, एक तरुण योद्धा म्हणून. त्याच्यासमोर तो रथ अगदी पिटुकला असतो... कारण तो वास्तव कर्णासाठी नव्हे तर अधिरथबाबांनी बाल्यरुपात मनात जपलेल्या कर्णासाठी असतो! बिम्मचा नीनमही परतला आहे तो वयाने नि शरीराने वाढूनच. ते पिंजर्‍याचे घर आता त्याला पुरणार नसते.

YellowBirdBeingFed
https://www.omlet.co.uk/ येथून साभार.

आता बिम्मला मोठा पक्षी नि लहान पिंजरा यात निवड करायची आहे. पण तो पिवळा पक्षी जसा बिम्मचा वारसा आहे नि तो पिंजराही. त्यामुळे त्याला ते दोघेही हवे आहेत. इथे एक गंमत होते आहे. मोठ्यांना उपलब्ध नसलेला पर्याय बिम्मला मात्र उपलब्ध आहे, आणि तो म्हणजे त्याची कल्पनाशक्ती! बिम्म चतुर आहे, त्याने पक्ष्यालाच पिंजर्‍याच्या आकारामध्ये लहान केले आहे.

तुम्ही म्हणाल, ’त्यात काय, मनात आणले असते ते पिंजराही मोठा करता आला असता. सगळे स्वप्नातच असेल तर सोयीचे घडायला काय हरकत आहे, नाही का?’ पण थांबा. बिम्म फारसा विचार न करताही नेमका निर्णय घेतो आहे. पिंजर्‍याला वास्तवाचे बंधन आहे. त्यामुळे पक्ष्यालाच लहान होणे भाग आहे.

नीनम ऊर्फ पिवळा पक्षीच बिम्मला सांगतो, "तू काळजी करू नको. घर बघून मी लहान-मोठा होतो." मग तो अगदी बिम्मच्या करंगळीहून लहान होतो नि पिंजर्‍यात जाऊन दांडीवर बसतो. बिम्मने त्याला दिलेला पेरूही पिंजर्‍याजवळ नेताच तोही एखाद्या फुटाण्याएवढा लहान होतो. नीनम त्याला सहजपणे एका पायाच्या बोटात धरून खाऊ लागला. नीनम पुढे म्हणतो, "तू झोपलास की मी येत जाईन तुझ्या सोबतीला. इतर वेळी मी आभाळात उडत राहीन." वास्तवात येऊ न शकलेल्या पक्ष्याला आता स्वप्नाच्या वाटेनेच यावे लागणार हे ओघाने आलेच.

बिम्मपणीची स्वप्ने नीनमसारखी विशाल असतात, तेजस्वी असतात. आपल्या आकाराने सारे आकाश व्यापून राहतात नि तेजाने सारा दिक्काल उजळू पाहतात. परंतु जसजसे मोठे व्हावे तसे व्यक्तीच्या, पिंजर्‍याच्या म्हणजे कुवतीच्या मर्यादा ध्यानात येऊ लागतात. सर्वांच्याच नशीबी आभाळाचे घर नसते. मग त्या स्वप्नांना लहान व्हावे लागते आणि मिळेल त्या पिंजर्‍यात निमूटपणे सावरून रहावे लागते. त्यांची भूकही पेरूइतकी असली, तरी एखाद्या फुटाण्यावर भागवून घ्यावे लागते. पण असे असले तरी ती स्वप्ने सहजी नष्ट होत नाहीत. जागेपणी तुमच्यापासून दूर असली, तरी निद्रेच्या साथीत तुम्हा-आम्हाला भेटायला येत असतातच. त्यांचा आपला ऋणानुबंध असा सहजासहजी तुटत नाही. आपला पक्षी पिंजर्‍यात नसला तरी स्वप्नात घर करून राहातो.

स्वप्न ही - बहुधा केवळ - माणसाला असलेली एक मोलाची देणगी आहे. माणसे झोपेमध्ये स्वप्ने पाहतात तशीच जागेपणीही. मागेपणीच्या स्वप्नांमध्ये काहीवेळा कुवतीपलिकडील, वास्तवात येण्याची सुतराम शक्यता नसलेली म्हणता येतील अशी दिवास्वप्ने असतात तशीच जगण्यातील असोशीला मूर्त रूप देऊ पाहणारीही. जिच्याशी वास्तवात संवाद साधण्याचे धैर्य गोळा करू न शकलेला एखादा मजनूं स्वप्नराज्यात तिच्याशी मनमोकळा संवाद साधत असतो. मग भाऊसाहेब पाटणकरांच्या रुबाईत म्हणतो तसा, ’स्वप्नातही येशील ऐसे स्वप्नात नव्हते वाटले.’ असे म्हणून लटका राग दाखवू शकतो.

सासणेंच्या राहीच्या स्वप्नांचा उलगडा करताना एका कादंबरीचा प्रवास होऊन जातो. "’स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही- नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात."(२) असं म्हणताना सासणे स्वप्नांना विचाराचे दालनही उघडून देत असतात.

एकुणात स्वप्ने ही माणसाच्या आयुष्यातील वास्तवाइतकीच महत्त्वाची असतात. त्यांच्याविना माणसाला वास्तवाची प्रखरता सहन करता येणे अवघड होत जाते. ’पाश’ची प्रसिद्ध कविता आहे ’सपनों का मर जाना’. त्यात तो म्हणतो,

घर से निकलना काम पर
और काम से लौटकर घर आना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना

पाशचे म्हणणे बिम्मला समजावे हे त्याचे वय नव्हे. पण बिम्मच्या बखरीतील कथांमध्ये जीएंनी ती वाचणार्‍या आई-वडिलांनाही सामील करुन घेतले आहे याची आठवण करुन देतो. या आईवडिलांना या कवितेचा अर्थ लगेच ध्यानात येईल. स्वप्ने नसतील तर अनेकांसाठी आयुष्याची चाकोरी अवजड भार होऊन राहील. म्हणून स्वप्ने पाहणे; राहीने म्हटले तसे ती सत्यात उतरवण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न करत राहणेही आवश्यक होऊन बसते.

पण मागच्या शतकामध्ये सिग्मंड फ्रॉईड नामे एक इसम होऊन गेला. ज्याने आपल्या सर्व स्वप्नांचा उगम नेहमीच आपल्या अतृप्त लैंगिक प्रेरणेत असतो असा दिव्य शोध लावला. (किंवा त्याच्या अभ्यासकांनी तसा अर्थ लावला.) पुढे कित्येक दशके वॉशिंग्टनच्या कुर्‍हाडीसारख्या त्याचा वापर करत, लोक स्वप्नांवर चित्रविचित्र लैंगिक धारणांचे आरोपण मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या नावाखाली करत राहिले. त्याद्वारे ती पाहणार्‍यांचे एकांगी मूल्यमापन करत राहिले. या काळात स्वप्नांमधली आस हरली नि आसक्तीच काय ती वास्तव मानली जाऊ लागली. बिम्मची, पाशची, राहीची स्वप्ने अवास्तव ठरली.

या प्रत्येकाचा नीनम वेगळा असतो. त्याचा रंग नेहमीच पिवळा, गुलाबी, जांभळा वा केशरी नसतो. त्यात त्या स्वप्नांचा पिंजरा असलेल्या व्यक्तिचे रंगही मिसळलेले असतात. आणि म्हणून प्रत्येकाचा नीनम वेगळा असतो. आई-वडिल वा कोणतेही आजोबा तो तुम्हाला देऊ शकत नाहीत. स्वप्नांच्या वाटेने का होईना, पण तो आपला आपणच शोधावा लागतो.

- oOo -

१. आयुष्यातून निसटून गेलेल्या, हव्याशा वाटणार्‍या गोष्टींचे प्रतीक म्हणून पिवळ्या पक्ष्याचे रूपक वापरणार्‍या अनेक कविता नि गाणी सापडतात. बहुतेकांमध्ये हा पिवळा पक्षी म्हणजे गोल्डन ओरिओल किंवा ज्याला आपल्याकडे कांचन, हळद्या किंवा पीलक म्हटले जाते. गाणार्‍या पक्ष्यांमध्ये ’कॅनरी’चा उल्लेख प्राधान्याने होतो. शकुनांवर विश्वास असणार्‍यांच्या मते स्वप्नात पिवळा पक्षी दिसणे हे शुभ असते. तर दुसरीकडे स्वप्नात ’पिवळा पक्षी खाणे’ हे येऊ घातलेल्या संपन्नतेचे चिन्ह असते. हरिधृव नावाच्या कुण्या आयुर्वेदिय ग्रंथामध्ये पिवळा पक्षी काविळीच्या निर्दालनाचे प्रतीक मानला जातो. एकुणात पिवळा पक्षी हा प्रतीकांच्या दुनियेतील लोकप्रिय प्रतीक दिसते आहे.

२. 'राहीच्या स्वप्नांचा उलगडा' (ले. भारत सासणे) या कादंबरीतून


हे वाचले का?

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

भाषा: राष्ट्र... आणि हत्यार!

(प्रसिद्ध उर्दू शायर नि कवी जावेद अख़्तर यांनी २०१५ मध्ये 'जश्न-ए-रेख़्ता' या वार्षिक ऊर्दू संमेलनामध्ये केलेल्या भाष्याचा व्हिडिओ यापूर्वी ’वेचित चाललो...’ वर शेअर केला होता. त्या अनुषंगाने भाषा, राष्ट्र ही संकल्पना आणि तदनुषंगिक विद्वेषाचे राजकारण यावर काही भाष्य केले होते. अख़्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्या लेखातील बहुसंख्य मुद्दे घेऊन ’तत्रैव’ नियतकालिकाच्या जाने-फेब्रु २०२३ च्या अंकासाठी लिहिलेला लेख.)

JavedAkhtar

पु. ल. देशपांडे यांनी एका दंगलीच्या काळातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. त्या काळात संघाचे स्वयंसेवक गस्त वगैरे घालत असत. एकदा पुलं नि त्यांचे काही मित्र रात्री उशीरा घरी परतत असताना एका अंधाऱ्या बोळातून आवाज आला, ’थांबा. कोण आहे, मित्र की शत्रू?’ पुलंनी खोडसाळपणे उत्तर दिले, ’शत्रू!’ काही क्षण शांतता होती. मग आवाज आला, ’जा.'

किस्सा गंमतीचा असला तरी त्यातून आपली मानसिकता दिसते. समोरून आलेली व्यक्ती ही आपली मित्र असू शकते किंवा शत्रू. याच्या अधले- मधले काही संभवतच नाही, असा बहुसंख्येचा समज असतो. आपल्याला हवे ते बोलले की कौतुक, न रुचणारे बोलले की बोलणारा देशद्रोही, अर्बन नक्षल किंवा उलट दिशेने छुपा मनुवादी, अंधभक्त वगैरे असल्याचे शिक्के मारून मोकळे होणे हा अलिकडच्या काळात प्रकर्षाने दिसू लागलेला प्रकार आहे.

खरंतर एखाद्याचे काही बाबतीत आपले एकमत झाले नाही याचा अर्थ तो थेट शत्रूपक्षात जातो असे नसते. किंबहुना एकुणात शत्रू-पक्ष वा मित्र-पक्ष असे ठोस गट पाडता येत नाहीत. काही वेळा त्याचे नि आपले एकमतही होते. ही परिस्थिती त्याचा द्वेष करण्यास अडचणीची होते. म्हणूनच मग द्वेषसंपृक्त मने जात, धर्म, देश यांसारखे आधीच निश्चित झालेल्या गटांच्या आधारे आपापल्या द्वेषाचे विरेचन करू पाहात असतात.

हे आठवण्याचे कारण हिंदुत्ववाद्यांचे लाडके शत्रू जावेद अख़्तर आहेत. त्यांनी नुकतेच पाकिस्तानात जाऊन पाकिस्तान नि पाकिस्तानी मंडळींना खडे बोल सुनावल्यामुळे त्यांना अचानक अख़्तर यांच्याबद्दल ममत्व वाटू लागले आहे. अगदी कंगना राणावत सारख्या ट्विटरब्रँड अभिनेत्रीनेही त्यांचे कौतुक केले आहे. आजवर आपण ज्यांना देशद्रोही, अर्बन नक्षल वगैरे त्यातल्या त्यात सभ्य नि इतर अश्लाघ्य विशेषणांनी गौरवले, त्याच व्यक्तीने देशाची बाजू थेट शत्रूच्या गोटातच जाऊन मांडल्याने नाईलाजाने का होईना त्यांना अख़्तर यांचे कौतुक करावे लागते आहे.

अख़्तर यांचे उर्दू भाषेवरील प्रेम आणि प्रभुत्व हे संस्कृतप्रेमींना रुचत नसते हे तर उघडच आहे. हिंदुत्ववाद्यांनी आपल्या धार्मिक राष्ट्रवादाला भाषिक राष्ट्रवादाची जोड देण्याचाही आटोकाट प्रयत्न चालवला आहे. त्यातून ’संस्कृत ही प्राचीन नि देवभाषा आणि हिंदी ही समस्त हिंदुस्थानची भाषा’ हा तर्क बहुसंख्येच्या गळी उतरवण्याचा आटापिटा चालू आहे. धार्मिक पातळीवर मुस्लिमांचे जसे खच्चीकरण चालू असते तसेच उर्दू या भाषेचेही. त्यासाठी मुस्लिम आणि उर्दू यांचे अभिन्नत्व वारंवार ठसवण्याचा प्रयत्न हिंदूराष्ट्रवाद्यांकडून होत असतो. २०१६ साली जश्न- ए-रेख़्ता (रेख़्ता = उर्दू) या वार्षिक उर्दू-महोत्सवामध्ये भाषा आणि धर्म यासंबंधी जावेद अख़्तर यांनी भाष्य केले होते. त्या निमित्ताने भाषा आणि राष्ट्र यांच्या परस्परसंबंधाने केलेली ही मांडणी.

राष्ट्र (nation) ही अखेर एक संकल्पना आहे. त्याच्या सीमारेषा तुम्हाला आखाव्या लागतात, समाजाच्या गळी उतरवाव्या लागतात. राष्ट्राच्या भौगोलिक, भाषिक, वांशिक अशा अनेक प्रकारच्या व्याख्या निर्माण केल्या गेल्या, रुजवल्या गेल्या. त्याआधारे राजकीय सत्ता उभ्या राहिल्या, देश (state) निर्माण झाले. 'आमच्या देशाला इतक्या वर्षांचा इतिहास आहे’ वगैरे वल्गना वर्तमानात कर्तृत्वाची वानवा असलेले, किंवा त्यासाठी करावे लागणारे कष्ट वा मेहनत करण्याबाबत आळशी असणारेच अधिक करत असतात. भविष्याची भीती गाडून टाकण्यास उत्सुक असणारे भूतकालभोगी समाजच असले आधारहीन दावे कुरवाळत बसतात. वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले, तर काळाच्या प्रवाहात देश निर्माण होत असतात, विखंडित होतात, विलयाला जातात, कधी ते पादाक्रांत केले जातात, आणि भूगोल बदलत राहतो...

अमुक काळात तमुक भूभाग हा ढमुक देशाचा भाग होता म्हणजे आज त्या वारशाने ढमुक देशाचा वारस मिरवणाऱ्या देशाने वा गटाने त्यावर हक्क सांगणे याला सोयीची भूमिका घेणेच म्हणता येते. इतिहासातील काळाचा कोणता तुकडा आपण निवडतो, त्यानुसार त्या भूभागाची मालकी या किंवा त्या - कदाचित त्या काळात अस्तित्वातही नसलेल्या - देशाच्या ओटीत टाकता येते. ही कृती स्वार्थप्रेरित आणि आपल्या गटाची पक्षपातीच असते. भारतामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभेसारख्या संघटनांनी धार्मिकतेला राष्ट्रवादात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. पण मध्यपूर्व आशियामध्ये पसरलेल्या ख्रिश्चनबहुल देशांकडे पाहिले तर धर्म हे राष्ट्र असल्याची संकल्पना मोडीत निघालेली दिसते. इथे राष्ट्र (nation) आणि देश (state) या दोन संकल्पनांतील फरक अधोरेखित होतो आहे. पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानपासून दूर होताना ’उर्दू = मुस्लिम’ हे गणित मोडीत काढले. तिथे भाषा हा राष्ट्रनिश्चितीचा निकष अधिक प्रबळ ठरला.

Hindustani

दोन देशांच्या निर्मितीनंतर हिंदूमहासभेचा प्रभाव ओसरत गेला. तिची जागा घेण्यास सरसावलेल्या संघ परिवाराने धार्मिक राष्ट्रवादासोबतच भाषिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे भारतातील मुस्लिम हे उर्दू भाषिक असल्याची हाकाटी पसरवण्यास सुरुवात केली.

या दाव्याचे महत्व मुस्लिम कट्टरवाद्यांनीही ओळखले होते. विविध स्थानिक भाषा संवादासाठी वापरणाऱ्या भारतीय मुस्लिमांना एकाच सूत्रात बांधण्यास हा धागा उपयुक्त ठरणार होता. हिंदुत्ववाद्यांना द्वेषाला सोयीचे असलेले गृहितकच कट्टरतावादी मुस्लिमांना आपला गट बांधण्यास उपयुक्त ठरत होते. थोडक्यात आपापले स्थान बळकट करण्यासाठी दोनही विरोधकांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या हातात हात घेऊन पावले टाकली... आजही टाकत आहेत. आणि सामान्य त्यांच्यामागे फरफटत जात आहेत.

भूतकालभोगी हिंदुत्ववाद्यांनी संस्कृत ही प्राचीन आणि हिंदी ही अर्वाचीन भाषा आपल्या भाषिक राष्ट्रवादाचे साधन म्हणून पुढे रेटायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी उर्दूला मागे रेटणे त्यांना अपरिहार्य ठरले. त्यासाठी याच देशात निर्माण झालेली, गंगा-जमनी संस्कृतीचे एक प्रतीक असलेली उर्दू त्यांनी मुस्लिम समाजाच्या ओटीत टाकली, नव्हे त्यांना करकचून बांधून टाकली. आणि मग ’त्या अमंगळ लोकांची’ भाषा आत्मसात करण्यापासून आपल्या लोकांना परावृत्त करणे सोपे झाले.

द्वेष रुजवणे हा सर्वात सोपा उपाय दोन्ही धार्मिक कट्टरतावादी वापरतात. तो सर्वाधिक परिणामकारकही असतो. एखाद्या झाडाच्या मुळाशी मोरचूद टाकून निश्चिंतपणे निघून जाणाऱ्या आणि त्या झाडाचा तिळतिळ होत जाणारा मृत्यू समाधानाने पाहात राहणाऱ्या विकृत लाकूडतोड्यासारखे हे दोघे गळ्यात गळा घालून या भाषिक लढाईतून समाजातील भेग वेगाने वाढत जाताना पाहून संतोष पावत असतात. माथेफिरु धर्मवेडापायी माणसांचे नरबळी देण्यासही न कचरणारे एखाद्या भाषेच्या हत्येबाबत संवेदनशील असतील ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे.

अमंगळ लोकांच्या भाषेचा मुद्दा आला आहे तर हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्या संस्कृतचा उल्लेखही अपरिहार्य आहे. सोयीचा इतिहास, समाजव्यवस्था, नीतिनियम रुजवणे, त्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रॉपगंडा ऊर्फ प्रचार-प्रसारासाठी माध्यमांचे महत्व ब्राह्मणांनी फार प्राचीन काळापासून चोख ओळखले होते. त्यामुळे देवांशी हॉटलाईन असल्याचा दावा करणाऱ्या त्या जमातीने देव-भाषा म्हणत तिला इतर अमंगळ समाजामध्ये फारसे रुजू दिले नाही. त्यातून पवित्र देव-भाषा विटाळेल असा त्यांचा दावा होता.

पुढे ब्रिटिशांसोबत आलेल्या इंग्रजी भाषेसोबत आलेल्या रोजगार संधीही सर्वप्रथम साधणाऱ्या याच समाजाने व्यवहारात संस्कृतचे बोट सोडले. त्यातून तिची पीछेहाट होत गेली. त्यांच्याच कर्माने मरु घातलेली ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि प्राचीनत्वाचा सोस मिरवण्यासाठी आता त्याबाबत आक्रोश सुरु आहे. विशेष म्हणजे तो करणारे स्वतः आपल्या पुढच्या पिढीला इंग्रजी आणि चोख व्यावहारिक शिक्षणच देत आहेत. संस्कृत ही भाषा त्यांच्या खांद्यावरचा एक अस्मितेचा झेंडा म्हणूनच शिल्लक राहिली आहे.

थोडक्यात संस्कृतच्या ठेकेदारांनी तिला आपल्याच लोकांपासून दूर ठेवून तिची वाढ खुंटवली, इंग्रजीच्या आगमनानंतर स्वत:ही तिचा हात सोडून तिला वाऱ्यावर सोडली. आता केवळ देव्हाऱ्यातल्या शाळिग्रामासारखी तिची पळभराची पूजा उरकून इंग्रजीची दिवसभराची चाकरी करायला ते चालते होतात.

हिंदुत्ववाद्यांनी आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांनी कितीही भेग पाडण्याचा प्रयत्न केला तरी, संस्कृतला ज्या दुर्भाग्याला सामोरे जावे लागले तसे उर्दूला सामोरे जावे लागलेले नाही. उर्दू ही भारतीय मुस्लिमांची भाषा ही हाकाटी दोन्ही बाजूंनी केल्याने, भाषांनी विभागलेल्या मुस्लिम समाजाला एक सामायिक ओळख मिळत असल्याने ती आनंदाने स्वीकारली हे खरे. पण असे असूनही तिच्यामध्ये निर्माण झालेल्या दर्जेदार साहित्यामुळे, विशेषत: शायरीमुळे, ती मुस्लिम समाजाबाहेरही अंगीकारली नि अभ्यासली गेली आणि वाढत गेली. भाषेच्या आणि लिपीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांनी आपल्याच भाषेची हत्या करणाऱ्यांच्या हाती उर्दूचा द्वेष करण्यापलिकडे काही उरलेले नाही.

जश्न-ए-रेख़्तामधील त्या मुलाखतीदरम्यान जावेद अख़्तर समोरच्या पंजाबी तरुणांना जावेद तळमळीने विचारतात, ’अरे तुम्ही सर्वाधिक उत्तम साहित्य यात निर्माण केले, ही तुमची भाषा आहे. मग तुम्ही असे कसे तिला इतरांच्या ओटीत टाकून मोकळे होतात, आपल्याच अपत्याला असे कसे नाकारता?’

खरंतर त्यांना हा प्रश्न पडायला नको. इथला करंटा हिंदू समाज 'बेड खाल्ला म्हणन त बाटलास' म्हणत आपल्याच लोकांना ख्रिश्चन धर्माच्या ओटीत टाकून मोकळा होत असे. एखाद्याची जबरदस्तीने सुन्नत केली गेली म्हणून, मूळ धर्म, देव-विचार-परंपरा-रीतीभाती यावरची श्रद्धा कितीही अभंग असली तरी त्याला मुस्लिम मानू लागे. यांना श्रद्धेतून, बांधिलकीतून निर्माण होणारी ओळख मान्य नाही. त्यांना ती कर्मकांडांच्या प्रांतातच शोधायची असते. काहीही नि कुणालाही आपलेसे करण्यापेक्षा दूर ढकलण्यास उत्सुक असलेला हा समाज आहे. त्यातील अगदी पुरोगामी मंडळींमध्येही मला हा दोष ओतप्रोत भरलेला दिसतो.

१७९८ मध्ये, म्हणजे जेमतेम सव्वादोनशे वर्षांपूर्वी कुराण उर्दूमध्ये प्रथम अनुवादित केले गेले. सिंधीतील त्यापूर्वी सातशे वर्षे (हा तपशील अख़्तर यांनी दिलेला, बरोबर चूक मला माहित नाही!) 'अशा अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले' म्हणून हे करणाऱ्याविरोधात मौलवींनी फतवा जाहीर केला होता! थोडक्यात मौलवी लोक अठराव्या शतकाच्या शेवटी उर्दूला अमंगळ भाषा मानत होते! ती मुस्लिमांची असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता! त्यामुळे द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांच्या सोयीसाठीच ती मुस्लिमांची भाषा ठरवली गेली हे उघड आहे.

अख़्तर यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे तो असा की बहुतेक भाषांमधले पहिले साहित्य हे धार्मिक आहे. उर्दू ही अशी पहिली आणि कदाचित एकमेव भाषा आहे जिचे पहिले साहित्य हे विद्रोही आहे. आणि अगदी अख़्तर म्हणतात ते शब्दशः खरे असले/नसले तिचा प्रचार-प्रसार हा शायरीच्या माध्यमातून झाला ज्यात तरक्कीपसंद शायरीचा वाटा मोठा आहे.

उर्दू ही या देशातच तयार झालेली भाषा आहे, सर्वात अर्वाचीन, सर्वात तरुण भाषा आहे. त्या अर्थी ती तरुणांची आहे, तशीच दार्शनिक शायरांचीही. एका धर्माच्या दावणीला तिला बांधणारे द्वेषाने आंधळे झालेले असतात. हे आधी द्वेष करतात, तो परिणामकारक ठरत नाही म्हटल्यावर मग ’ही आमचीच’ म्हणत त्याला आपल्या रंगाचा लेप देण्याचा प्रयत्न करत असतात.

मुळात सजीवांनी भाषा विकसित केली ती संवादासाठी, संदेशांच्या वा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी. माणसांची भाषा तर अधिक समृद्ध. अन्य सजीवांप्रमाणे तिला केवळ वर्तमानाचे बंधन नाही. भूतकाळाचे, भविष्यकाळाचे, इतकेच काय निखळ विचाराचेही पैलू तिला मिळत गेले आहेत. अशा वेळी तिला द्वेषाचे, फाटाफुटीचे साधन बनवणाऱ्या विकृतांच्या झुंडींचा विवेकी विरोध अतिशय महत्वाचा ठरत असतो. जावेद अख़्तर हे त्या विवेकी विरोधाचे एक अध्वर्यू म्हणून उभे आहेत.

त्यामुळे या झुंडींच्या सोयीची काही घडले म्हणून अख़्तरांचे कौतुक करणे हे तात्कालिकच असणार आहे. परंतु यातून ’बरेच मतभेद असणाऱ्यांचे नि आपले काही बाबतीत मतैक्यही असू शकते, त्याला थेट शत्रू मानण्याचे कारण नाही’ हे शहाणपण ही मंडळी शिकतील असे मुळीच नाही. नव्या मतभेदाच्या मुद्द्यावर अख़्तर यांना पुन्हा शिव्याशाप नि पाकिस्तानचे तिकीट(!) मिळेल यात शंका नाही. अख़्तर हे उर्दूचे पक्षपाती आहेत आणि त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम आहेत ही दोन कारणे या मंडळींना त्यांचा द्वेष करण्यास पुरेशी आहेत.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ३ : प्रतिबिंबांचा प्रश्न

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

हा बिम्म आहे << मागील भाग

---

BemmaAaniBimma
बेम्म आणि बिम्म ( https://www.nenko.com/ येथून साभार.)

एकदा एका कापडाच्या दुकानात बिम्मला दोन आरसे दिसले. एकात डोकावून पाहिले तर त्यात उंचच उंच काठीसारखा बिम्म दिसला, तर दुसर्‍यात तो हवा भरलेल्या फुग्यासारखा जाडजूड दिसला. आता हे दोघे कोण बुवा? असा प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य होतेच. 

मग घरी परत येईतो त्याच्या कल्पनेचा वारू उधळतो. त्यापैकी उंच माणसाचे नाव बेम्म आणि फुग्यासारख्याचे नाव बूम्म आहे असे निश्चित केले जाते.

घरी आल्यावर तो आईला हे सारे सांगून त्याच्या मते अवघड प्रश्न विचारतो, 'यातला खरा बिम्म कोण ते तुला ठाऊक आहे का?'

’मी कोण?’ या प्रश्नाचा हा पुढचा टप्पा दिसतो, ’यापैकी मी कोण?’!

बिम्म हा बब्बीचा भाऊ आहे, आईचा/बाबांचा मुलगा आहे, मागच्या आवारातील आजोबांचा मित्र आहे... आणखी बराच काही आहे. त्यापैकी खरा बिम्म कोण हा प्रश्न आहे. तो जीएंनी आरशांतील प्रतिबिंबांच्या रूपकातून विचारला आहे... आणि त्याचे उत्तरही शेवटी बिम्मच्याच तोंडून देऊन टाकले आहे.

गोष्टीमध्ये आरशांचा उल्लेख असला तरी त्याला एकुणात माणसाच्या वास्तविक ओळखीच्या व्याख्येचा संदर्भ आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. जन्मलेल्या प्रत्येक माणसाला जन्मत: नावाबरोबरच इतर काही ओळखी चिकटलेल्या असतात. तो कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाऊ असतो अथवा बहीण असते, कुणाचा नातू वा नात असते... 

या क्रमाने सामाजिक उतरंडीमध्ये त्याचे एक स्थान निर्माण झालेले असते. त्यामुळे ’अमुक व्यक्ती कशी आहे?’ या प्रश्नाचे चांगली, वाईट, मनमिळाऊ वगैरे उत्तरे देता येत असली, तरी ती त्या प्रश्नाप्रमाणेच ढोबळ राहतात. ती व्यक्ती ’भाऊ म्हणून कशी आहे?’, ’कुणाचे वडील म्हणून कशी आहे?’, ’कुणाची मुलगी म्हणून कशी आहे?’,’कुणाची मैत्रिण म्हणून कशी आहे?’ हे आनुषंगिक प्रश्न असतात, ज्यांची उत्तरे स्वतंत्रपणे शोधून त्यांची समष्टी अथवा सार हे मूळ प्रश्नाचे उत्तर म्हणून घेता येते. बिम्मच्या या प्रश्नाला जीएंनी आरशांचे रूपक वापरले आहे.

आरशात दिसणारे, हालचाल करणारे ’ते कुणी’ लहान मुलाच्या, घरातील पाळीव प्राण्या-पक्ष्यांच्या कुतूहलाचा भाग असते. समोर दिसते ते आपले प्रतिबिंब, आपण असे दिसतो याचा शोध लहानपणी जेव्हा लागतो, तेव्हा या नव्याने सापडलेल्या माध्यमातूनच माणसाचं पिलू स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करत असतं. पण ’काय खरं नि काय खोटं?’ या ढोबळ, काळ्या-पांढर्‍या विभागणीपाशी न थांबता, साक्षेपी चिकित्सक आणखी एक पाऊल पुढे टाकून ’किती खरं नि किती खोटं?’ हा पुढचा प्रश्न हाती घेत असतो.

बिंब आणि प्रतिबिंबातील खर्‍या-खोट्याचे भास नि सत्य-वास्तवाचे कोडे जीएंना नेहमीच मोहवत असावे असे दिसते. 'इस्किलार' मधल्या गारुड्याच्या तोंडी ते येते. त्यांच्या 'प्रवासी' मधला आंधळा शिकारी प्रतिबिंबांचे जाळे निर्माण करतो. त्याद्वारे मानवी दृष्टिला दिसणारे निश्चित वास्तव विस्तार पावल्यास संशयाच्या भोवर्‍यात सापडते, हे स्वत:ला अंधाहुन अधिक लायक समजणार्‍या डोळसांना दाखवून देतो. हे अंध-डोळसाचे तत्त्व त्यांच्या ’ठिपका’ मधे पुन्हा एकदा डोकावते. ’प्रवासी’मध्येच प्रवाशाला भेटलेला पांगळा जटाधारीही त्यासंबंधीचे एक आकलन त्याच्या ओटीत टाकून देतो.

त्यांच्या ’प्रवासी’मध्येच अकाल या दैत्याला मोह असलेले हिरवे रत्न त्याला प्राप्त होऊ शकत नाही, समोर आले तरी त्याला ते ओळखता येत नाही. कारण त्याच्या दृष्टिची मर्यादा, त्याचे रंगांधळेपण. परंतु त्यात पुन्हा एक पळवाट होती. तो रंगांधळा असला तरी आरशातील प्रतिबिंबांमध्ये त्याला सारे रंग दिसू शकतात. तो हिरवा रंगही त्याला आरशामध्ये- म्हणजे पुन्हा प्रतिबिंबामध्ये मात्र दिसू शकला असता.

हा उपाय त्याच्या भावाला- महाकालाला ठाऊक असूनही स्वार्थापोटी तो अकालास ते सांगत नाही. म्हणजे अकालाला त्याच्या भावाच्या नजरेतून दिसणारे स्वत:चे प्रतिबिंब यथातथ्य नाही, महाकालाच्या स्वार्थाने ते दूषित झालेले आहे. माणसाला स्वत:बद्दलचे पुरे आकलन वस्तुनिष्ठपणे करता येत नाही. यासाठी इतरांच्या नजरेने स्वत:कडे पाहण्यास सूचित करणारे हे रूपक जीएंच्या कथनातून वारंवार येत राहाते. ’बिम्म'च्या जीवनप्रवासाच्या सुरुवातीलाच हे प्रतिबिंबाचे कोडे त्याच्या पुढ्यात ठाकते, त्याच्या परीने तो ते सोडवतोही.

बिम्मचीच आई या प्रश्नाचे सरधोपट उत्तर देऊन टाकते. ती म्हणते, 'तूच खरा बिम्म. कारण तू तुझ्याइतकाच उंच आहेस नि तुझ्यासारखाच रुंद.' वरकरणी आईचे उत्तर बिनचूक आणि निरुत्तर करणारे आहे. पण बिम्म म्हणतो 'मुळीच नाही. आम्ही सगळेच खरे. फळीवरचे खाऊचे डबे काढतो तो उंच असलेला बेम्म. पण त्याला पोटच नाही. मग तो खाऊ खाण्यासाठी येतो तो बूम्म. ऐसपैस पोटाचा हा बूम्म सार्‍या खाऊचा चट्टामट्टा करतो. आता या दोघांची गरज संपली की बिम्म परत येतो.’ बिम्मच्या या खुलाशावर आई शरणचिट्ठी लिहून देण्यापलिकडे काही करूच शकत नाही.

ही तशी छोटीशी गोष्ट, बिम्मच्या वयाच्या मुलांची कल्पनेची भरारी लक्षात घेता अशा अचाट वाटणार्‍या कल्पना आपण त्यांच्याकडून ऐकत असतोच. पण बिम्मच्या बाबतीत हा कल्पनाविस्तार त्याच्या बाजूने निर्हेतुक असला, तरी त्या पलिकडे जाऊन जीएंनी त्यात बिम्मच्या आई-बापांसाठी काही ठेवून दिले आहे. इथे लहानांच्या नि मोठ्यांच्या विचारातला फरक पाहता येईल.

'या तीन बिम्म पैकी खरा कोण?' या प्रश्नाचे उत्तर शोधताना आईने तिच्या वाढल्या वयात घट्ट झालेल्या जाणीवांनुसार 'एकच बिम्म असू शकतो' हे गृहित धरून तो कोणता हे ठरवण्याचा प्रयत्न केला. हे तीनही खरे ही कल्पना तिच्या मनात उमटू शकली नाही. समोर दिसणारी तीन रूपे ही तीन वेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत आणि त्यातून आपल्याला निवड करायची आहे, हे आई सहज मान्य करते आहे. खर्‍या खोट्याला एक निश्चित चेहरा असतो, सार्‍यांना तो सारखाच दिसतो हे कुसंस्काराच्या ओझ्याखाली वाढल्या वयाच्या माणसांचे गृहितक सोबत घेऊनच ती पाहते आहे.

बिम्मच्या माध्यमातून या आईला जीए काही वेगळे सांगू पाहताहेत. ते दोन आरसे दाखवतात ती प्रतिबिंबे निव्वळ मूळ बिंबाचे 'जसे आहे तसे' प्रतिरूप नाहीतच. त्या पलिकडे जाऊन ते आपल्या - म्हणजे आरशांच्या - अंगभूत गुणांनुसार त्या बिंबाचे एक वेगळे प्रतिबिंब तुम्हाला दाखवतात. थोडक्यात एखादी व्यक्ती कशी आहे हे त्याच्या असण्या बरोबरच अनुभवणार्‍याच्या, ते तुमच्यापर्यंत पोचवणार्‍या दुसर्‍या - साक्षी असलेल्या - व्यक्तीच्या दृष्टिकोनावर, त्याच्या कुवतीवर आणि प्रामाणिकपणावरही अवलंबून असते.

दोन वेगळ्या व्यक्ती एकाच तिसर्‍या व्यक्तीबद्दल सर्वस्वी भिन्न चित्रे उभे करू शकतात ते त्यांच्या दृष्टिकोनामुळे, कुवतीमुळे आणि त्यात त्यांच्या मिसळलेल्या स्वार्थामुळे. ही चित्रे काहीशी बेम्म किंवा बूम्म सारखीच तर असतात, ते पूर्णांशाने बिम्म नसतात. पण त्यात थोडा थोडा बिम्म देखील असतो.

मग एकुणात 'बिम्म असा आहे' म्हणजे तरी नक्की काय. त्याचे असणे, ते पुरे चित्र, आसपासच्या इतरांच्या त्याच्याबाबत असणार्‍या अनुभवांच्या, मतमतांतराच्या निरपेक्ष असे उभे असते का? की यातला एक खरा नि इतर खोटे वा आभासी असे काही नसतेच? कदाचित असं म्हणू शकतो की हे सारेच बिम्म खरे असतात, त्यांच्या खरेपणाची व्याप्ती वेगवेगळी असते इतकेच !

Boomma
बूम्म (https://www.iStock.com/ येथून साभार).

बिम्मही त्या तिघांना एकाच व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती म्हणून पाहतो आहे, जे वास्तवही आहेच. बिम्म त्या आरशांसमोर उभा आहे तेव्हाच ते आरसे ती प्रतिबिंबे दाखवतात, आणि तेवढ्यापुरतेच त्या दोघांचे अस्तित्व असते. शिक्षण आणि संस्काराच्या चरकातून जाण्यापूर्वी, ’दोन भिन्न बिंदूंतून एक आणि एकच रेषा जाते’ यांसारख्या निश्चित विधानांच्या आधारे जगणे सुरू करण्यापूर्वी, माणसाच्या पिलाची दृष्टी अधिक नितळ असते, विभागणीऐवजी पैलूंचा, अनुषंगांचाही विचार करते, असे असावे का?

दुसर्‍या दृष्टीने पाहिले तर बूम्म आणि बेम्म ही बिम्म ची प्रतिबिंबे म्हणून न पाहता त्याचे एक एक अनुषंग (profile) म्हणून पाहिले तर आणखी एक वेगळाच दृष्टिकोन समोर येतो.

एकट्या बिम्मला जे साधणार नाही - फळीवरचे डबे खाली उतरवून खाऊ खाणे - ते बेम्म, बूम्म नि बिम्म मिळून पार पाडतात. नकळत का होईना सहकाराचे लहानसे तत्त्व कुठेतरी बिम्म शिकला आहे नि ते त्याच्या या कल्पनाविस्तारात डोकावते आहे. एकाच रूपातील बिम्म हा परिपूर्ण बिम्म नसतो, तर बूम्म, बेम्म आणि बिम्म मिळूनच एक पुरा बिम्म होत असतो.

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबाबत आपण बोलतो, तेव्हाही विशिष्ट संदर्भात बोलताना त्याच्यामधल्या एखाद्या बेम्मबद्दल वा बूम्मबद्दलच आपण बोलत असतो, त्याला जाणून घेत असतो. अन्य एखाद्या संदर्भात तो सर्वस्वी वेगळ्या रूपात समोर येऊ शकते. तोही बिम्म असू शकतो!

(क्रमश:)

- oOo -

पुढील भाग >> आपल्या पक्ष्याचा शोध


हे वाचले का?

शनिवार, १ एप्रिल, २०२३

पदवीधरा...

(एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने खुद्द पंतप्रधानांची पदवी दाखवावी अशी मागणी केली. त्यावर पंतप्रधानांच्या राज्यातील न्यायालयाने त्या मुख्यमंत्र्याला २५,०००/- चा दंड केला. या अनुभवावरून संगीताचार्य गो. ल. माल यांनी अशा प्रकारची मागणी करणार्‍यांना इशारा देणारे हे पद रचले.)

EDAttacks
(देवल मास्तरांची क्षमा मागून...) 
 
पदवीधरा हा बोध खरा
जिज्ञासा कबरीं पुरा ॥

संशय खट झोटिंग महा
देऊ नका त्या, ठाव जरा ॥

ईडीपिडा त्राटिका जशी ।
कवटाळिल ती, भीती धरा ॥

छिन्नमस्ता* ती बलशाली ।
आव मानितां, घाव पुरा ॥ 

---
* पूर्ण जीभ बाहेर काढलेलं महाकालीचं एक रूप. 

- oOo -

गीत/संगीत गो. ल. माल
नाटक: संशयलोळ
चाल: चल झूठे कैसी... 
	

हे वाचले का?

बुधवार, २९ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - २ : हा बिम्म आहे

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

पहिले पाऊल << मागील भाग

---

HaBimmaAahe
हा बिम्म आहे(https://riseandshine.childrensnational.org/ येथून साभार.)

’बखर बिम्मची’ हाती घेतल्या घेतल्या 'बिम्म' हे कथानायकाचे नाव ऐकूनच वाचक प्रथम बुचकळ्यात पडतो. वाटतं 'अरे, हे काय नावं आहे?' पण तुम्हा-आम्हालाच का, बिम्मलाही हाच प्रश्न पडायचा ना, 'आपले नाव 'बिम्म' असे का आहे?' असा. त्यावरचे उत्तर भलतेच मासलेवाईक आहे. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार ’बब्बीने - त्याच्या बहिणीने - प्रथम आपल्या या भावाला पाहिले तेव्हा ती म्हणाली 'हा बिम्म आहे!’ म्हणून त्याचे नाव बिम्म’.

हे पुस्तक वाचायला घेतले आणि या तिसर्‍याच वाक्याने मला खिशात टाकले होते. लहान मुलांचे जग किती सोपे असते. बब्बीला वाटले याचे नाव बिम्म, बस्स ठरले, हा बिम्म! पुढे बब्बीच्या पावलावर पाऊल ठेवत बिम्मने देखील कुत्र्याच्या पिलाला, घोड्याला, पिवळ्या पक्ष्याला अशीच नावे दिली आहेत, नव्हे ’त्यांची तीच नावे आहेत नि हे मला आधीपासून माहीत आहे’ असा दावा केलेला आहे.

माझी भाची पाच-सहा वर्षांची असताना अशीच इतर बच्चे कंपनीला ’नावे ठेवण्यात’ आघाडीवर असे. तिच्या नवजात आतेबहिणीला पाहताक्षणीच हिचे नाव 'रिया' असे तिने जाहीर करून टाकले होते. आईच्या एका मैत्रिणीच्या मुलीला पाहिल्यावरही हिचे नाव 'आकांक्षा' आहे असे तिने आपल्या आईला सांगितले. तिच्यामुळे बब्बी ही अगदी आपल्या घरातलीच आहे असे वाटून गेले.

आणि बब्बीचंच काय ते कौतुक करायचे, पूर्वीच्या काळी नाव ठेवण्याबाबत अति चोखंदळपणा तसाही नव्हता. चार दोन देवांच्या नावातले एक बरेसे निवडले की झाले. 'पूर्वी आई-वडील मुलांच्या नावाबाबत खल करण्यात वेळ दवडत नसत, ताबडतोब पुढच्या बारशाच्या तयारीला लागत असत.' असं एके ठिकाणी पुलंनी गमतीने म्हटलंय.

पण खरंच एखाद्याचे नावं ’बिम्म’ असलं म्हणून काय झालं? नाहीतरी समाज, इतिहास, संस्कृती नि भाषांचे संदर्भ माहीत नसणार्‍या एखाद्याला तुमचे आमचे नाव 'बिम्म' इतकेच निरर्थक वाटेल ना? अनेक नावे आज आपण सर्रास देतो त्यांना केवळ ऐतिहासिक संदर्भ असतात म्हणून ती आपल्याला बिम्म’ या नावाइतकी वैचित्र्यपूर्ण वाटत नाहीत. विचार करून पाहा, भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये ज्याचे नाव प्रथम राम असे ठेवले गेले, तेव्हा ते नाव त्या समाजात बिम्म’ इतकेच वैचित्र्यपूर्ण मानले गेले असेल. अब्राहम हे नावही टेन-कमांडमेंट्सच्या अवतरणापूर्वी असेच अनाकलनीय वाटले असेल.

आता आई-वडील एखादा वैश्विक प्रश्न असल्याप्रमाणे त्यावर खल करतात. बाजारातून '१००१ नावे' वगैरे सारखे पुस्तक आणतात नि त्यातून एखादे अपरिचित असे नाव शोधतात. इथेच न थांबता इंटरनेटवर असल्या नावांच्या याद्या देणार्‍या वेबसाईट्स धुंडाळतात. हे कमी म्हणून काय फेसबुकवर, मराठी संस्थळावर अथवा व्हॉट्स अ‍ॅपवर "ब अक्षराने सुरू होणारी नावे हवी आहेत" असा असे आवाहन करतात. सुदैवाने अजून या पाच नावातून निवडा, यावर वोट करा असा सर्वे चॅनेल्सवरून, अथवा एसेमेमधून अथवा फोनवरून आपले मत नोंदवा असा कौल टाकत नाही एवढे नशीब.

अलिकडच्या एक-दोन दशकांत वारशाने आलेली, प्राचीन संदर्भ असणारी नावे न ठेवता इतर कुण्णाकुण्णाचे नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण नावे देण्याचा आटापिटा सुरू झाला आहे. त्यासाठी बहुधा एखादे अनाकलनीय असे संस्कृतोद्भव नावे ठेवण्याचा प्रघात रूढ होतो आहे. एवढ्या सगळ्या आट्यापिट्यातून एखादे नावीन्यपूर्ण नाव शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण अनेकदा हे सगळं मुसळ केरात जातं नि बर्‍याच गमतीजमती घडतात.

'विखार' हे नाव ठेवायचे घाटत असलेले ऐकून मी निपचित पडलो होतो. हे त्या पोराचे सुदैव की मला त्याचा अर्थ सांगायची संधी बारशाआधीच मिळाल्याने त्याचा संभाव्य विखार शमला. याउलट 'शृगाल' या नावाने मिरवणार्‍या एका पोराची मला कायम कीव वाटत आली आहे. त्याचे दुर्दैव हे की शाळेत नाव घालेपर्यंत कोणीही त्याच्या नावाचा अर्थ त्याच्या दिवट्या आई-बापांना सांगितला नाही. आता जन्मभर ते पोरगे आई-बापांचे नावीन्यपूर्ण नाव ठेवण्याचे खूळ आपल्या माथी मिरवणार आहे. तेच दुर्दैव ’श्लेष्मा’ नावाच्या एका मुलीच्या वाट्याला आले आहे.

थोडक्यात काय, आमची बब्बी बिचारी शहाणी. तिने आपल्या भावाला पाहिल्या क्षणीच जे वाटले ते नाव ठेवून दिले. शेवटी नावाने माणूस ओळखला जाण्यापेक्षा माणसाने स्वकर्तृत्वाने ते नाव मोठे करणे अधिक महत्त्वाचे. पण हे जे बब्बीसारख्या शाळकरी पोरीला समजते, ते केवळ वयानेच वाढून बसलेल्या नि स्वतःला मोठे समजणार्‍यांना समजत नाही हेच तर खरे दुर्दैव.

कोऽहं

नावाचा घोळ निस्तरला, की बिम्म ’आपण कोण?’ या प्रश्नाकडे वळतो. लहान मूल रांगू-बसू लागल्याच्या वयाचे झाले, की त्याला आई-बापांचे बोलणेही बरेचसे समजू लागते, त्या बोलण्याला ते प्रतिसादही देऊ लागते. मग ’बबड्याचे कान कुठेत?’, ’बबड्याचे डोके कुठे आहे?’ वगैरे प्रश्न विचारुन त्याची शिकवणी सुरु होते. यात आद्य प्रश्न असतो तो ’बबड्या कुठे?’ हा. मग ते पोर छातीवर हात लावून उत्तर देते. त्याबद्दल त्याची वाखाणणी सुरु झाली, की त्या शब्दाचं - खरंतर ध्वनिचा म्हणू या, कारण भाषिक समज अजून बरीच दूर असते - नि आपलं काहीतरी नातं आहे इतके त्याला उमगू लागते.

आणखी थोडे मोठे झाल्यावर जेव्हा ते मूल - बिम्मसारखे - परिसराशी ओळख करुन घेऊ पाहते, त्यातील प्रत्येक गोष्टीला समजून घेऊ पाहते, तेव्हाच ते स्वत:लाही शोधू पाहते. आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ यांना ते कुठल्या ना कुठल्या भूमिकेत पाहात असते. त्यामुळे विचारांनी नाही तरी उपजत जिज्ञासेने, अजाणता का होईना ते स्वत:चाही शोध घेऊ लागते.

आपण आपल्या आई-वडिलांसारखे किंवा भावा-बहिणींसारखे दिसतो हे त्याला जाणवत असावे. पण असे का बरे ? या बिम्मला ’मी रस्त्यावरच्या खडीच्या एंजिनासारखा का नाही?’, ’आंब्याच्या झाडासारखा का नाही?’, किंवा ’छत्रीसारखा का नाही?’ असे प्रश्न पडत असतात. सजीव आणि निर्जीव वस्तूंमधला भेद समजून घेण्याची ही सुरुवात असेल. या प्रत्येक वस्तूला तिचा असा एक गुणधर्म आहे ज्याचा आपल्याला उपयोग होईल असे त्याला वाटत असते.

BimmaAndBabbi
बिम्म आणि बब्बी (https://www.wyethnutrition.com.my/ येथून साभार.)

म्हणजे एंजिन असतो तर मी रस्त्यावर धावू शकतो, (एरवी या ’एंजिना’ला रस्त्यावर एकट्याने जायला आईने मनाई केली आहे.) आंब्याचे झाड असतो तर एका जागी राहूनही कुणीही - अगदी बब्बीसुद्धा - मला तिथून ऊठ म्हणू शकणार नाही असा त्याचा होरा असतो. छत्रीला पावसात जाण्याची परवानगी असते, म्हणजे मी छत्रीसारखा असतो तर आई मला पावसात जाऊ देईल अशी त्याला आशा असते.

पण लवकरच याची दुसरी अडचणीची बाजूही त्याला दिसू लागते. ’एंजिन कुठे दूध पिते?’ किंवा ’आंब्याचे झाड कुठे बिस्किट खाते?’ असा खडा सवाल करुन बब्बी त्याचे खाणे बळकावण्याचा प्रयत्न करते. शिवाय एंजिन नि छत्री होऊनही रस्त्यावर किंवा पावसात न जाण्याचा नियम शिथिल करण्याचे आई नाकारते. तेव्हा मग त्याला आपले बिम्म असणेच बरे आहे असे वाटू लागते. माणसाचे कल्पनास्वातंत्र्य वास्तविक बंधनांनी जखडले जाण्याची ही सुरुवात म्हणावी लागेल.

वास्तव-कल्पनेच्या विश्वात नुकतेच पाऊल पडलेला बिम्म आपल्या आसपासच्या जगाशी आपले नाते हुडकण्याचा, जोडण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करतो. आसपासच्या ज्या गोष्टींबाबत त्याला अधिक कुतूहल निर्माण होते, त्याबाबत तो आपल्या इवल्याशा मेंदूद्वारे जमेल तेवढे समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यातही अधिक आकर्षक वा जवळच्या वाटणार्‍या गोष्टींबाबत समजून घेताना तो कल्पनेचा आधार घेतो. त्याद्वारे गोष्टींबाबत अनेक गाळल्या जागा भरून काढण्याचा, तो अनुभव वास्तवात घेण्याचा प्रयत्न करत राहतो.

(क्रमश:)

- oOo -

    पुढील भाग >> प्रतिबिंबांचा प्रश्न


हे वाचले का?

रविवार, २६ मार्च, २०२३

राजसा, किती दिसांत...

उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment...

( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी मोरीपर्यंत जाण्यासही उत्सुक नसतो. अति झालं म्हणजे त्याची पूर्वीची प्रिया नि आताचं खटलं त्याला निर्वाणीचा इशारा देते.)

HelgaAndHagar
(कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागून...)

आंघोळून टाक आज, विसळून अंग अंग
राजसा किती दिसांत न्हायला नाहीस सांग

त्या तिथे जुन्या खणात, पेंगतो तव गंजिफ्रॉक  
हाय रे नको तयाचे, झोपेतच होणे दुभंग  

दूर दूर राहतो बघ, रुसला तुझाच लेक 
साहवेना त्या जराही, प्राचीन तव देहगंध

गार गार या हवेत घेऊनी पंचा समेत
मोकळे करून टाक एकवार सर्व अंग

काय हा तुझा रे श्वास, दर्प हा इथे भकास
बोलावण्यास तुला, उठला पाण्यावरी तरंग

हे तुझे तुला कळेल, स्नान हे तुवा फळेल 
सांग ना अता खरेच...

(चाल बदलून)
... वाटते ना तुलाच फ्रेश ?

- रमताराम

- oOo -

(न्हाणीघर,  दि. २६ मार्च २०२३)
	

हे वाचले का?

गुरुवार, २३ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - १ : पहिले पाऊल

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

रांगते लहान मूल जेव्हा प्रथम एखाद्या गोष्टीला धरून दोन पावले टाकते, तेव्हा त्याला 'चालणे' या क्रियेचा वा हालचालीचा शोध लागतो. यात त्याने ज्या जड गोष्टीचा आधार घेतलेला असतो अशा - भिंत, टेबल, खुर्ची, पलंग वगैरे वस्तूंना पकडले, की आपण केवळ उभेच राहू शकतो असे नव्हे, तर पायांची हालचाल केल्यावरही पडत नाही इतका आधार मिळतो, याचे भान त्याला येत असते.

परंतु याने आधाराचे भान आले तरी 'खोली'चे येत नाही. म्हणून मग पलंगावर उभे राहून चालता चालता पलंगाच्या वा सोफ्याच्या कडेपाशी पोचते तेव्हा थांबावे हे त्याला समजत नाही. जेव्हा ते पायाखालची जमीन संपून धाडकन पडते, तेव्हाच त्याला पायाखाली नेहमीच आधार असतो असे नाही याचे भान येते. मग ते एक एक पाऊल टाकताना जमिनीकडे ध्यान ठेवायला शिकते.

भाषेबाबतही आपण पाहतो की भारतीय अनाथालयातून अमेरिकेत दत्तक गेलेले मूल हे इंग्रजी - वा आपल्या दत्तक पालकांची - भाषाच बोलते, ज्या भारतीय प्रदेशात जन्मले ती नव्हे. मुलाच्या जडणघडणीत 'खानदान की इज़्जत' वगैरे बाष्कळ संकल्पना बाळगणार्‍यांना अमान्य असलेला, परिसर घटकांचा आणि त्या मुलाच्या चुकांमधून, अनुभवातून, जाणिवेतून होणार्‍या विकासाचा भागच मोठा असतो. असे असूनही अगदी मुलांसाठीच म्हणून लिहिलेल्या साहित्यातूनही याचा मागमूस कुठे आढळताना दिसत नाही.

आपल्याकडे लहान मुलांसाठी म्हणून लिहिल्या जाणार्‍या साहित्याचा साधारण आराखडा ठरलेला आहे. यात स्वतः वयाने मोठ्या असलेल्या नि आपल्याला लहान मुलांचे भावविश्व समजते असा ’समज असणार्‍या’ लेखकांचा कल्पनाविस्तार असतो. यात अगदी लहान मुलांसाठी बडबडगीतांपासून जी सुरुवात होते ती परिकथा, काल्पनिक जग, अद्भुत कथा वगैरे प्रवास करत किशोरवयीन मुलांसाठी ऐतिहासिक-काल्पनिक हीरोंपर्यंत गाडी पोहोचते. 

काही मंडळी त्यापुढे जाऊन मुलांना अगदी सुसंस्कारित करण्याचे कंकण वगैरे बांधून बोधकथा, नीतिकथा लिहितात. याची मोठ्यांसाठीची थोडी सुधारित आवृत्ती म्हणजे पंचतंत्र, इसापनीती वगैरे प्रकारच्या तात्पर्यकथा.

कालानुरुप यात थोडे बदल होऊन आता यात लवकर वयात येऊ लागलेल्या नि मोठ्यांची 'पॉकेट-बुक एडिशन' असलेल्या नव्या पिढीला’ आवडते म्हणून यात मारधाड, हीरो, व्हिलन, परग्रहावरचे वा याच ग्रहावरचे आक्रमक मग त्यांना विरोध करण्यास उभा ठाकणारा आपला हीरो, त्याला मिळालेली अलौकिकाची किंवा जादूच्या एखाद्या साधनाची साथ, हे अनेक धर्मग्रंथातून वा ऐतिहासिक दस्तऐवजातून सापडणारे तपशीलच वेगळ्या संदर्भात मांडून आता मुलांचे मनोरंजन केले जाते. 

मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांमधून परी, राक्षस, राजकन्या, राजपुत्र, वर देणारे देव अथवा जिन यांची हकालपट्टी होऊन तिथे थेट समोरासमोर युद्ध करावे लागणारे चित्रविचित्र रंगांचे, आकाराचे, नावाचे व्हिलन आणि वीत-दीडवीत उंचीचा आपला हीरो यांच्यात हास्यास्पद पातळीवर होणारी लढाई वगैरे मालमसाला असतो.

चलत्-चित्राचे (Animation) माध्यमही याला अपवाद ठरलेले नाही. स्नोव्हाईट, सिंडरेला, हकलबेरी फिन, टॉम सॉयर वगैरे हीरो/हिरोईन्सची जागा आता ही-मॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन वगैरे ’ढिशुम-मॅन्स’नी घेऊनही जमाना झाला. आता बेन-१०, जस्टीस-लीग, सुपरहिरो-लीग वगैरे करत आपल्या या तथाकथित हीरोंनी-सुपरहीरोंनी आपले कार्यक्षेत्र पृथ्वीबाहेर विस्तारत नेले आहे. एकुणात सतत कुठल्या ना कुठल्या धोक्याशी, आक्रमणाशी, शत्रूशी लढणे त्याला नेस्तनाबूद करणे हाच या हीरो, सुपरहीरो महाभागांचा एकमेव कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू राहतो.

ढोबळमानाने एकाच कथेच्या सांगाड्यावर ’स्टार-वॉर्स’ मालिकेतले सात ते आठ चित्रपट आणि पाच-दहा मालिका सनसनाटीपणा आणि पोशाखीपणाप्रेमी प्रेक्षकांच्या ताटात पुन्हा-पुन्हा वाढून त्या प्रत्येक ताटाचे वेगळे दाम जॉर्ज लुकसने वसूल केले आहेत. जगण्यातील कुतूहलाचे, माहितीचे, विकासाचे, नात्या-गोत्यांचे इतर कोणतेही आयाम या कथानकांना नसतात; असलेच तर ते या तथाकथित हीरोगिरीसमोर किती दुय्यम ठरतात/ठरवावे लागतात हे दाखवण्यापुरतेच.

या सार्‍या तथाकथित प्रगतीच्या वाटेवर त्या मुलांच्या प्रत्यक्ष भावविश्वातील गोष्टींना कोणतेही स्थान नाही. एखादे मूल आयुष्यात वाढत जाते, तेव्हा त्याच्यावर होणारे विविध प्रकारचे संस्कार, त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे त्यातून त्याने अंगीकृत केलेले कौशल्य, जमा केलेली माहिती नि सिद्ध केलेले ज्ञान या मार्गाने त्या व्यक्तीची जडणघडण होत असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर अंगभूत गुणांबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या परिसर-घटकांचा परिणामही मोठा असतो. त्याचा विचार मुलांसाठी अथवा मुलांबद्दल लिहिल्या गेलेल्या बहुतेक पुस्तकांमधे, तयार केल्या गेलेल्या करमणूकप्रधान दृक्-श्राव्य कार्यक्रमात बहुधा नसतोच.

BakharBimmachi

'बखर बिम्मची' हे पुस्तक त्या अर्थाने आगळे वेगळे म्हणावे लागेल. लहान मूल ज्या विशिष्ट परिसरात, कौटुंबिक-सामाजिक पार्श्वभूमीवर जगत असते त्याचा परिणाम, प्रभाव त्याचा भावविश्वावर पडत असतो. त्याचबरोबर त्या लहान मुलाची कल्पनारम्यता हा आणखी एक मोठा घटक असतो. त्या लहान मुलाचे जग हे अशा वास्तव-कल्पनेच्या तीरावर उभे असते. जसजसे वय वाढते तसतसे माणूस वास्तवाशी अधिकाधिक जुळवून घेण्याचा प्रयत्न करत जातो, त्याच्या भावविश्वातील कल्पनारम्यतेचा भाग कमी होत जातो. त्या वयातील ही वास्तव-कल्पनेची सरमिसळ नेमकी हेरून ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकामध्ये जी.ए. कुलकर्णींनी बिम्मचे आयुष्य चितारले आहे.

याला 'बखर का म्हटले आहे?' असा पहिला प्रश्न मनात आला, तर समजावे हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. बखर हा साहित्यप्रकार इतिहासाची कालानुक्रमे नोंद घेणारा, प्रामुख्याने एका मुख्य व्यक्तिरेखेचा आयुष्याचा प्रवास नोंदवणारा. एरवी आपण बखरी वाचतो त्या ऐतिहासिक पुरुषांच्या आयुष्यावरच्या. पण बखरी फक्त राजे-रजवाड्यांच्या नि श्रेष्ठ पुरुषांच्याच असाव्यात असा नियम कुणी केलाय, केला असला तरी तो आपण का मानावा? शूरवीरांच्या लष्करी विजयांबद्दल जसे लिहिता येते तसेच सर्वसामान्यांच्या आयुष्यात पादाक्रांत केलेल्या एकेका टप्प्याची, विचार व जाणिवेतून सिद्ध नि अंगीकृत केलेल्या ज्ञानाची बखर का लिहू नये?

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जन्माला आलेले प्रत्येक मूल हे आपल्या आसपासच्या जगाचा आपल्या परीने, आपल्या मर्यादित कुवतीच्या मर्यादेत वेध घेत असते. त्यातून ते आपले निष्कर्ष काढते, आपल्या वर्तणुकीत त्याला अनुरूप बदल करत जाते. त्यामुळे माणसाच्या आयुष्याचा पाया आणि विस्ताराची क्षमता ही त्याच्या मूलपणात त्याने केलेल्या प्रवासावर बरीच अवलंबून असते.

अलीकडे मनोरंजनप्रधान माध्यमांकडून बहुसंख्येला प्रामुख्याने अपेक्षित असते तसे चित्तचक्षुचमत्कारिक, थरारक असे बिम्मच्या आयुष्यात काही नाही. पण तुमच्या आमच्या जगण्याची, बालपणीची नाळ तिथे जुळली आहे. मग असे वाटेल की 'मग त्यात काय वाचायचे?'. पण बखर बिम्मची तुमच्या बालपणीचेच वाटणारे किस्से मांडून, नेमक्या ठिकाणी काही अधोरेखिते वाढवून त्यांच्याकडे डोळसपणे पहायला भाग पाडते.

आता हे पुस्तक, त्यातील गोष्ट ती बिम्मच्याच वयाच्या - वय वर्षे दोन ते पाच - मुलांसाठी आहे असे वरकरणी दिसते. पण यात अडचण अशी की त्यांच्यात अद्याप वाचनाची क्षमता विकसित झालेली नसते. तेव्हा ते पालकांनी/मोठ्यांनीच त्यांच्यासाठी वाचायला हवे. याचा फायदा घेऊन जीएंनी बिम्मची ही गोष्ट दुपदरी ठेवली आहे, ऐकणार्‍या बिम्मबरोबरच वाचणार्‍या त्याच्या आई-वडिलांसाठी त्यात काही ठेवून दिले आहे. ही 'छोट्याची मोठी गोष्ट' वाचताना गोष्टीतल्या बिम्मप्रमाणेच ऐकणार्‍या बिम्मच्या मनात जसे काही उमटते, तसेच त्याच्यासाठी ते वाचणार्‍याच्याही मनातही काही उमटून जाऊ शकते. ’बिम्म'बरोबरच त्या बिम्मचे आई किंवा वडीलही या वाचनातून काही वेगळे गवसल्याचे समाधान उपभोगू शकतील असं मला वाटतं.

या द्विस्तर योजनेमुळेच कदाचित केवळ लहान मुलांचे पुस्तक म्हणून वाचताना काही गोष्टींचा - विशेषत: एक दोन प्रकरणातल्या शेवटांचा - उलगडा होणे किंचित अवघड जाते. तिथे थोडा तर्काचा आधार घ्यावा लागतो. कदाचित या दुसर्‍या स्तराचा शोध वाचकाने घ्यावा असे जीएंना अपेक्षित असावे. अर्थात हा जीएंचा मूळ उद्देश होता की माझा उगाच ’पिंडात ब्रह्मांड’ पाहण्याचा प्रयत्न आहे हे वाचकाने आपल्यापुरते ठरवावे.

बिम्म आणि बब्बी

बिम्म आणि त्याची मोठी बहीण बब्बी, हे आसपास दिसणार्‍या कोण्याही भावा-बहिणींसारखेच आहेत. बिम्म वाचा नि विचाराचे इंद्रिय नुकतेच जागे झालेला, तर बब्बीने 'शाळा' नावाच्या नव्या जगात नुकतेच पाऊल ठेवले आहे. हे दोघे आपापल्या वाट्याचे उपद्व्याप करतात नि एकमेकांचे उपद्व्याप आईच्या कानावर घालण्याचे काम मोठया आनंदाने करतात. त्याचे वडील कामानिमित्ताने परगावी असल्याने आपले घर, आई आणि बब्बी इतकेच बिम्मचे जग.

आयुष्यात काही टप्पे असे असतात जे पार केले असता इतका काळ बरोबर असलेल्यांप्रती अचानक एक सूक्ष्मसा तुच्छभाव, श्रेष्ठत्वाची भावना, एक अभावित अहंकार निर्माण करतात. यात शाळेत पाऊल टाकणे हा पहिला. मग महाविद्यालय ऊर्फ कॉलेजमध्ये जाणे नि पदवी मिळणे, पहिला रोजगार सुरू करणे, जोडीदार मिळणे वा मिळवणे, दारी पहिली गाडी येणे आणि मग नव्या जगातला सर्वोच्च वगैरे म्हणतात तो म्हणजे परदेशप्रवासाची संधी चालून येणे.

या प्रत्येक टप्प्यावर ती काल्पनिक रेषा पार केलेल्या प्रत्येकाच्या मनात मागे राहिलेल्यांबद्दल - ते ही यथावकाश पुढे येतील, येऊ शकतील हे ठाऊन असूनही - एक प्रकार अहंभाव निर्माण होतो. त्यांच्यापेक्षा आपला अधिकार अधिक आहे असे त्या व्यक्तीला वाटू लागते नि बरेचदा तो गाजवण्याच्या प्रयत्नही होत असतो. बब्बी शाळेत जात असल्याने ’बिम्मपेक्षा आपण अधिक शहाणे आहोत’ असा तिचा समज झाला आहे. त्याला अनुसरून बब्बी बिम्मवर जमेल तितकी दादागिरी करत असते.

याशिवाय त्यांच्या या जगात एक आजोबा आहेत. मागच्या आवारात भेटणारे हे आजोबा खरंच अस्तित्वात आहेत, की केवळ बिम्मच्या कल्पनेत हे जीएंनी स्पष्टपणे उलगडलेले नाही. कारण खुद्द बिम्म सोडून आईला अथवा बब्बीला ते कधीच दिसत नाहीत. पण त्याबाबतीत खरे-खोटे तपासण्याची आवश्यकताही नाही. त्याच्या भावविश्वात, त्याच्यापुरते ते आहेत नि त्या दोघांची छान मैत्रीही झाली आहे.

ते बिम्मला पतंगाला बांधून उडायचे - उडवायचे नव्हे! - कसे ते दाखवतात, पिवळ्या पक्ष्याच्या त्याचा शोधात मदत करतात, त्याच्यासाठी पेरू आणून देतात, बिम्मला सापडलेल्या किल्लीचे कुलूप शोधून देतात. थोडक्यात ज्या गोष्टींत आई अथवा बब्बी उपयोगी पडत नाहीत, तिथे ते बिम्मच्या मदतीला धावून येतात. बिम्मला त्यांच्या अस्तित्वाचा एवढा पुरावा पुरेसा आहे. त्याच्या वयाच्या मुलाला अस्तित्त्वाबाबतचे याहून अवघड प्रश्न मुळी पडतच नसतात. हीच तर बिम्मच्या जगाची गंमत आहे.

वडील परगावी असल्याने (अलीकडच्या नागरी जीवनात सतत कामात व्यग्र असल्याने) घरात जवळच्या वडिलधार्‍या पुरूष माणसाशी संवाद होत नसल्याने ती गरज हे आजोबा भागवत असावेत. वय वाढते तसे हे कल्पनेतले आजोबा तुमच्या आयुष्यातून हद्दपार होतात... आणि अनेकदा वास्तवातलेही!

बिम्मचे आयुष्य हे सुमारे दहा ते बारा टप्प्यात जीएंनी साकार केले आहे. यातील प्रत्येक टप्पा लहानसाच असला तरी बिम्मच्या वयातल्या मुलांच्या भावविश्वातील विविध वस्तू, गोष्टी, संकल्पना याबाबत बोलणारा आहे. हा बिम्म साधारणपणे चार दशके मागच्या जगातला आहे. त्याचे आयुष्य महानगरी नसल्यामुळे मनुष्य नि मनुष्यांनी अट्टाहासाने जवळ केलेल्या कुत्र्या-मांजराखेरीज अन्य सजीवसृष्टीशीही त्याची नाळ अजून घट्ट जुळलेली आहे. त्यामुळे त्याच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा प्रवास या जीवांना वाट पुसतु होतो आहे.

स्वत:च्या अस्तित्त्वाबद्दलच्या प्रश्नापासून नाते, रंग, आकार, उत्पत्ती पासून निव्वळ कल्पनारंजनापर्यंत अनेक बाबतीत बिम्मचे आयुष्य विहरते आहे. वाटेवर भेटलेल्या पिट्टूशी, चारा खाऊन दूध देणार्‍या गायीशी, वारशाने मिळालेल्या पिवळ्या पक्ष्याशी, स्वप्नांच्या वाटे भेटलेल्या इतर पक्ष्यांशी, आपल्या पाठीवर बसवून फिरवून आणणार्‍या हत्तीशी, बेहद्द आवडणारी कैरी देणार्‍या आंब्याच्या झाडाशी ऋणानुबंध जोडत जातो... बिम्म लहान मुलाचा ’छोटा माणूस’ होत जातो.

पैसे देऊन कुत्र्याचे पिलू अथवा गाणारा पक्षी विकत आणून स्वामित्वभावनेनेच त्याच्याशी नाते जोडणार्‍या, प्लॅस्टिकच्या पिशवीतून दूध विकत आणणार्‍या, हत्ती फक्त प्राणिसंग्रहालयात अथवा पुस्तकांत पाहणार्‍या नि कैरीची करकरीत अवस्था संपून लोणचे नामक बाजारात मिळणार्‍या पदार्थामध्ये तिची विकलांग अवस्थाच पाहणार्‍या नागरी अथवा महानगरी बिम्मला हे सारेच अपरिचित वाटणार आहे. पण बिम्मने जसा आपला पिवळा पक्षी शोधला, तसे आपल्या बापदाद्यांचे बिम्मपणातील आयुष्य कसे होते याबाबत त्यांना कुतूहल असेल तर ’बखर बिम्मची’ हे पुस्तक आणि ही लेखमाला त्यांच्यासाठीच आहे.

बिम्मच्या मागील आवारातील त्या आजोबांनी बिम्मला उडणारा नव्हे- तर उडवणारा पतंग दिला होता. त्यावर बसून आकाशात उडता येई. थोडे उंचावरून, थोडे दुरून पाहिले, की आपले जग किती वेगळे दिसते याचा अनुभव बिम्मला त्या पतंगाने दिला आहे. बिम्मने आता हा पतंग माझ्या हाती सोपवला आहे. त्यावर बसून मीही जगण्यात हरवून गेलेला माझ्यातील बिम्म कुठे दिसतो का ते पाहातो आहे.

(क्रमश:)

- oOo -

    पुढील भाग >> हा बिम्म आहे


हे वाचले का?

सोमवार, १३ मार्च, २०२३

जम्प-कट - ३ : टोळी ते समाज आणि माणूस

अन्नं वै प्राणिनां प्राणा<< मागील भाग

---

कळपातील सुरक्षितता

हरण काळवीटासारखे शाकाहारी प्राणी कळपाच्या स्वरूपात राहतात. असे असूनही त्यांच्यामध्ये परस्पर-सहकार्य असे फारसे नसते. कळपातील प्रत्येक प्राणी आपापले अन्न स्वतंत्रपणे मिळवत असतो. यांचे कळप करून राहाणे हे प्रामुख्याने कळपातील सुरक्षिततता (safety in numbers) मिळवण्याच्या हेतूनेच असते.

एकाच ठिकाणी अनेक भक्ष्यांचे पर्याय उपलब्ध झाल्याने शिकारी प्राण्याकडून त्यातील एका विशिष्ट प्राण्याची शिकार करण्याची संभाव्यता (probability) घटते. त्याचबरोबर काहीवेळा कळपातील प्राणी नेट धरून एकत्रितरित्या शिकार्‍याचा मुकाबला करु शकतात. कमी श्रमांत शिकार मिळवण्याच्या दृष्टिने शिकार्‍याचा रोख सामान्यत: कळपातील दुबळ्या भक्ष्याकडे अधिक जातो. त्यामुळे त्यातील सक्षम प्राणी निसटून जाऊ शकतात. यातून नैसर्गिक निवडीच्या तंत्राने भक्ष्य प्राण्यांमध्येही पुढे अधिकाधिक सक्षम पिढ्या उदयाला येऊ लागतात.

शिकारीचे नियोजन

MammothHunt
https://allthatsinteresting.com येथून साभार.

या शाकाहारी, भक्ष्य अथवा संग्राहक प्राण्यांना फारतर शिकार्‍यापासून अथवा मोठ्या प्राण्यापासून सावध राहणे इतपतच नियोजन करावे लागते. पण शिकारी प्राण्यांचे भक्ष्य हे पळ काढू शकणारे, प्रतिकार करु शकणारे, क्वचित माघार घेण्यास भाग पाडू शकेल इतपत बलवानही असू शकते. म्हणून टोळीने शिकार करणार्‍या प्राण्यांमध्ये कोळसुंदे अथवा लांडगे सुनियोजितपणे शिकार करताना दिसतात. यात टोळीतील प्राणी भक्ष्याचा पाठलाग करण्याची जबाबदारी टप्प्याटप्प्याने घेत स्वत:चा दमसास वापरून भक्ष्याचा शक्तिपात घडवून आणतात. अशा थकलेल्या प्राण्याला कोंडीत पकडता येईल अशा स्थानी हाकलत नेऊन त्याची शिकार साधली जाते.

माणसाने शिकार करण्यास सुरुवात केल्यावर तिचे नियोजन अशाच धर्तीवर केले जाऊ लागले. त्यातून वाघसिंहादी प्राण्यांनाही जमणार नाही अशा मोठ्या प्राण्यांची शिकारही साध्य करता येऊ लागली. मॅमथ या नावाच्या अजस्र हत्तीची शिकारही मानवी टोळ्यांनी केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. श्रमविभागणी आणि कामाचे नियोजन ही संकल्पना अशी शिकारीतून प्रथम निर्माण झालेली आहे. शिकारी प्राण्यांकडून उचललेली नियोजनाची ही संकल्पना माणसाने पुढे आपल्या सर्वच कामांतून वापरण्यास सुरुवात केली.

कळप, टोळी ते समाज

पण कोळसुंदे असोत की लांडगे, एकदा शिकार पुरी झाली की ’Everyone for itself’ या उक्तीप्रमाणे टोळीतील प्रत्येक प्राणी त्या शिकारीतील आपला वाटा मिळवण्यासाठी तुटून पडतो. अन्न-वाटपाचे निश्चित असे सूत्र त्यांच्यात नसते. शिकार गरजेपेक्षा अधिक मिळाली तर शिल्लक अन्न नंतर खाता यावे म्हणून लांडगे ते पुरून ठेवतात. चित्ता, वाघ यांसारखे प्राणीही खाऊन झाल्यावर उरलेली शिकार पाचोळ्याखाली दडवून ठेवतात. अस्वल हिवाळी झोपेपूर्वी भरपूर खाऊन घेते नि अन्नाला चरबी स्वरूपात अंगावरच साठवून घेते. खारीसारखे छोटे प्राणी, मुंग्यांसारखे कीटक आणि अर्थातच मधमाश्या अन्न-संग्रह करताना दिसतात.

CommunityLife
https://www.npr.org येथून साभार.

मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, शिकार जसजशी सुलभ होत गेली तसतसे अन्नाची उपलब्धता वाढल्याने शिलकीचा प्रश्न निर्माण झाला. मग माणसानेही याचप्रकारे अन्न साठवणुकीचा मार्ग अनुसरला असला पाहिजे. दुसरीकडे अन्नासाठीची वणवण कमी झाल्याने माणसाला मेंदूचा नि उर्जेचा वापर अन्य कामांसाठी करण्यास उसंत मिळाली. त्यातून मग अन्न-संग्रह करण्याचे अधिकाधिक चांगले मार्ग त्याने शोधले.

यातून संपूर्ण टोळीमध्ये विविध कामांची विभागणी होऊ लागली. शिकार करणारे, वाटप करणारे, संग्रहासाठी भाजणे अथवा मिठासारख्या पदार्थामध्ये मुरवणे वगैरे प्रक्रिया करणारे... अशी कामे वाटून दिली जाऊ लागली. टोळीमध्ये सलोखा राहायचा असेल तर शिकारबाह्य कामे करणार्‍यांसह सर्वांना शिकारीचा वाटा मिळणे आणि प्रत्येकाने आपले नेमून दिलेले काम नीटपणे पार पाडणे आवश्यक ठरले. अशा तर्‍हेने कळपातील व्यक्तींना जोडणारे बंध निर्माण झाले आणि त्याची टोळीकडे- एका व्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली.

उपव्यवस्था आणि समाज

टोळीअंतर्गत संघर्षाचे अन्नाखेरीज आणखी एका संभाव्य कारण होते आणि ते म्हणजे माद्यांशी जुगण्याचा हक्क मिळवणे. सिंहासारख्या शिकारी प्राण्यांपासून त्याचे भक्ष्य असणार्‍या आणि कळपाने राहणार्‍या शाकाहारी प्राण्यांपर्यंत सर्वांमध्ये या हक्कासाठी नरांमध्ये संघर्ष होत असतो. परंतु टोळीअंतर्गत असा संघर्ष टोळीमध्ये विसंवाद नि फूट पडण्यास कारणीभूत ठरू नये म्हणून मानवी टोळ्यांमध्ये नर-मादी अशा जोड्यांची व्यवस्था उदयाला आली.

त्यापूर्वी संपूर्ण टोळीचा भाग असणारी मुले आता त्या जोडीची म्हणून ओळखली जाऊ लागली. टोळीतील इतर सदस्यांपेक्षा या गटाचे- कुटुंबाचे- आपसांतील बंध अधिक दृढ होऊ लागले. यातून व्यवस्थेअंतर्गत उपव्यवस्था आकाराला येऊ लागली. पुढे कार्यविभागणीतून वाट्याला आलेले काम कुटुंब बव्हंशी वंशपरंपरागत करु लागले. त्या आधारानेही अन्य उप-व्यवस्था निर्माण होऊन टोळीचे हळूहळू व्यापक समाजामध्ये रूपांतर झाले.

टोळीचा नेता

टोळीने शिकार करणार्‍या लांडगे, कोळसुंदे वगैरे प्राण्यांमध्ये प्रत्येक टोळीचा एक नेता असतो(१). सामान्यपणे टोळीतील सर्वात बलवान प्राणी त्या टोळीचा नेता म्हणून वावरत असतो. या नेत्याकडे इतरांपेक्षा अधिक हक्क आणि कर्तव्ये असतात. त्याचे स्थान अन्य नराला हस्तगत करायचे असेल, तर त्याला आव्हान देऊन पराभूत- क्वचित टोळीतून हाकलून देऊन वा ठार मारूनच ते साध्य करावे लागते.

AlphaMale
Dreamstime.com येथून साभार.

पण टोळीचा नेता हा नेहमीच असा बाहुबलाने निवडला जातो असे नव्हे. त्या टोळीला जगण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य अधिक असलेला नेता म्हणून स्वीकारला जात असतो. प्रत्येक टोळीच्या आयुष्याचा आराखडा जसा असेल, तसे नेत्याला आवश्यक असणार्‍या गुणांची सूची बदलत जाते. रूढार्थाने शिकारी नसलेल्या आणि मानवजातीशी सर्वात जवळचे नाते असलेल्या चिंपांझींच्या टोळीमध्ये शिकार कौशल्यापेक्षा माफक मल्लयुद्ध आणि बव्हंशी दहशत निर्माण करण्याचे कौशल्य(२) पुरेसे असते. वयातही न आलेल्या एका चिंपांझीने एका रिकाम्या पत्र्याच्या डब्याच्या साहाय्याने ’गर्जना’ करत टोळीच्या नेत्यालाही पळवून लावत औटघटकेचे नेतेपद मिळवल्याचे एक गंमतीशीर उदाहरण जेन गुडाल(३) यांनी नोंदवले आहे.

शिकारी टोळी म्हणून वावरणार्‍या माणसामध्ये शिकारीचे नियोजन करू शकणारा, बाहुबलात नि शिकारी कौशल्यात निष्णात असलेला नेता म्हणून स्वीकारला जात असे. पुढे माणसाने अन्नासाठी केवळ शिकारीवर अवलंबून न राहता शेती आणि पशुपालन या दोन तंत्रांचा वापर सुरू केला. त्यातून आवश्यक कामांची जंत्री अनेकपट वाढली आणि टोळीची व्यवस्था अधिक व्यापक होत गेली. त्यामुळे कार्यविभागणी आणि त्यांची सांगड यांचे नियोजन अधिक महत्त्वाचे ठरत गेले.

माणसाच्या या व्यामिश्र समाजव्यवस्थेमध्ये निव्वळ शारीरबलापलिकडे संपत्ती, बुद्धी, तंत्रज्ञान, गवगवा (propaganda) यांसारख्या अन्य बलांचे महत्त्वही वाढत गेले. यातूनच पुढे राजकीय व्यवस्थेमध्ये राजा, अध्यक्ष वा पंतप्रधान; आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि धार्मिक व्यवस्थेमध्ये आचार्य, मौलवी, पोप यांसारखे धर्मोपदेशक हे कोणतेही प्रत्यक्ष श्रम न करणारे नेते उदयाला येत गेले.

अन्न, संघर्ष आणि अधिकारक्षेत्र

अन्नासाठी शिकारी प्राण्यांना शाकाहारी प्राण्यांच्या तुलनेत अधिक संघर्ष करावा लागतो. पहिला संघर्ष होतो तो भक्ष्य प्राण्याशी त्याच्या टोळीतील काही जागरुक सहकार्‍यांशीही. त्यामुळे शिकार ही नेहमीच यशस्वी होत नाही. त्यासाठी लागणारी ऊर्जाही तुलनेने अधिक असते. त्यातच संभाव्य भक्ष्यामध्ये वाटेकरी निर्माण झाले, तर अन्नाची उपलब्धता आणखी कमी नि दुष्कर होत जाते. ते टाळण्याच्या दृष्टिने अन्य शिकारी प्राण्यांना आपल्या प्रदेशापासून दूर ठेवणे आवश्यक होऊन बसते. हा त्यांचा दुसरा संघर्ष. एकट-दुकटा सिंह असो, वाघ असो वा लांडग्यांची टोळी, अन्नातले वाटेकरी कमी असावेत, शिकार पुरेशी मिळावी म्हणून सजातीय प्राण्यांशीही संघर्ष करुन त्यांना शक्य तितके दूर पिटाळण्याचा प्रयत्न करतात.

AreaMarking
https://ha.wikipedia.org येथून साभार.

या सजातीयांशी होणार्‍या संघर्षातून त्या शिकारी प्राण्यांमध्ये हद्दीची संकल्पना उदयाला आली. एखादा वाघ, लांडगा मूत्र-पिचकारीने आपली हद्द आरेखित करतात. त्या मूत्राचा तीव्र गंध अन्य सजातीय प्राण्यांना ’प्रवेश बंद’ची सूचना देत असतो. अन्य वाघाला, सिंहाला अथवा लांडग्यांच्या टोळीला या अधिकारक्षेत्राच्या आत शिकार करायची असेल, त्यातील भक्ष्यांवर आपला हक्क प्रस्थापित करायचा असेल, तर त्यांना या ’जमीनमालकांशी’ संघर्ष करुन त्यांना हाकलून लावत त्यांचे अधिकारक्षेत्र - संपूर्णपणे अथवा अंशत: - बळकावावे लागते.

माणसांच्या टोळ्यांमध्ये शिकारीचे तंत्र जसजसे प्रगत झाले, मुबलक अन्नामुळे आणि कार्यविभागणीमुळे टोळ्यांमध्ये व्यवस्था उदयाला येऊ लागली तसतसे टोळ्यांमधील मानवप्राण्यांची संख्याही वाढू लागली. यातून अन्नाची गरज वाढली आणि माणसांनाही अन्य शिकारी प्राण्यांप्रमाणे आपली हद्द निश्चित करण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्यांनी आपल्या पद्धतीने आपले शिकारक्षेत्र निश्चित करुन इतर टोळ्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी संघर्ष करण्यास सुरुवात केली.

पुढे मानव शेती नि पशुपालनाकडे वळल्यानंतर, जंगलाचा अधिवास सोडून नागर झाल्यावर ही अधिकारक्षेत्राची संकल्पना राज्य आणि देश या संकल्पनांमध्ये रूपांतरित झाली.

नैसर्गिक सामुग्रीवर एकाधिकार

पण अधिकारक्षेत्राची निर्मिती केवळ शिकार अथवा अन्नासाठीच झाली असे नव्हे. जगातील कोणत्याही सजीवाला अत्यावश्यक असलेल्या पाण्यावरील अधिकारासाठीही ते राखावे लागते. या मालिकेतील पहिल्या भागात उल्लेख केलेल्या ’ओडिसी’मधील प्रसंगातील संघर्षाचे कारणच मुळी पाणवठ्यावरील हक्क प्रस्थापित करणे हे आहे. अलिकडे येऊन गेलेल्या ’बुक ऑफ इलाय’ या चित्रपटातही विध्वंसोत्तर जगामध्ये पाण्याच्या स्रोतावर एकाधिकार राखून एक टोळीप्रमुख उरल्यासुरल्या मानवांवर अधिकार गाजवताना दिसतो.

ThatsMyWater
पाण्यासाठी झालेली हत्या (Lawrence of Arabia या चित्रपटातून)

’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटात एक संस्मरणीय असा प्रसंग आहे. लॉरेन्स एका स्थानिक टोळीवाल्याला वाटाड्या म्हणून सोबत घेऊन वाळवंटातून प्रवास करत असताना, वाटेत दिसलेल्या एका पाणवठ्यावर ते पाणी भरून घेतात. वायुवेगाने आलेला शरीफ अली त्या स्थानिकाला थेट गोळी घालतो. ’हे माझ्या टोळीचे पाणी आहे हे तुला ठाऊक नसले, तरी त्याला ठाऊक होते. त्याचा गुन्हा माफीपात्र नव्हता.’ असे तो लॉरेन्सला सांगतो. सुखवस्तू, इंग्लिश लॉरेन्सला या अपरिचित व्यवस्थेचे आकलन होण्याची ती सुरूवात असते.

अन्न, आणि पाणी या दोन गोष्टी नैसर्गिकरित्या पुनर्भरण होणार्‍या आहेत. अधिकारक्षेत्राची संकल्पना रुजल्यानंतर अधिकाराची जाणीव झालेल्या माणसाने आता व्याजाबरोबर मुदलावरही हक्क सांगायला सुरुवात केली आहे. वृक्षांपासून लाकूड मिळवण्यापासून सुरु झालेला माणसचा प्रवास तेल आणि अन्य खनिजांचा उपसा करण्यापर्यंत पोहोचला आहे.

पुरा तयांचा वंश खणावा (४)

सिंहासारख्या शिकारी प्राण्यांमध्ये जुन्या नेत्याची सद्दी खालसा केल्यावर सिंहिणींना अजूनही बिलगून जगणारी पिल्ले नवा नेता निष्ठुरपणे ठार मारतो. पिलांचे अस्तित्व माद्यांना माजावर येण्यापासून रोखत असते आणि त्यातून त्याला जुगण्याचा आपला हक्क बजावण्याची संधी मिळणार नसते. आईपासून सुटी झालेली पिले तो ठार मारत नाही. त्यातील फक्त नरांवर हल्ले करून त्यांना पिटाळून लावतो. कारण हे नर मोठे होऊन त्याच्या प्रभुत्वाला आव्हान देतील असा समज त्याच्या नेणिवेत रुजलेला असे.

InfantKilled
Larry Gonick यांच्या The Cartoon History of the Universe या पुस्तकातून साभार.

शिकारी प्राण्यांचा वारसा सांगणार्‍या माणसाचा दृष्टिकोनही याहून वेगळा नव्हता. आपल्या टोळीतील व्यक्ती वगळता इतर सर्वच प्राणी हे संभाव्य शत्रू मानले जात. एका टोळीला दुसर्‍या टोळीबद्दल भीतीची, अविश्वासाचीच भावना सर्वात प्रबळ असणारा तो काळ होता. स्वत:ला सुरक्षित राहायचे असेल तर इतरांना निखंदून काढले पाहिजे इतपतच बुद्धीचा विकास झालेला तो काळ होता. काहीही करुन प्रतिस्पर्धी टोळीचे बल खच्ची करावे, त्यातही पुरुष नि बालके यांची सरसकट हत्या करावी. अन्यथा ती बालके पुढे मोठी होऊन शस्त्रे परजून आपल्या टोळीला धोकादायक ठरतील असा सोपा समज होता.

नागर जीवनाकडे

मानवी संस्कृतीच्या उदयकाळात माणूस हा एकाच कळपाचा अथवा टोळीचा भाग होता. ती टोळी हीच त्याच्यासाठी राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि अर्थातच सामाजिक व्यवस्थाही होती. त्यामुळे त्या टोळीतील एक व्यक्ती अथवा एकक हीच त्याची एकमेव ओळख होती.

आज तशी स्थिती उरलेली नाही. या तीन व्यवस्था स्वतंत्र वाटेने पुढे जात आहेत. त्यामुळे माणसाला या प्रत्येक व्यवस्थेअंतर्गत वेगवेगळी ओळख मिळू लागली आहे आणि जेव्हा या व्यवस्थांचे हितसंबंध परस्परांना छेदून जातात, तेव्हा त्याच्या कर्तव्यांमध्ये अंतर्विरोध निर्माण होतो आहे. या नागर आयुष्याने माणसाला स्वत:शीच संघर्ष करण्यास भाग पाडले आहे.

आज व्यक्तीची गटनिरपेक्ष अशी स्वतंत्र ओळखही असू शकते किंवा जन्मदत्त गटांहून वेगळ्या अशा गटाचा सदस्य म्हणूनही. एखाद्या आध्यात्मिक, वैचारिक, वैज्ञानिक, कला अथवा व्यावसायिक परंपरेचा वारसा स्वीकारून ती व्यक्ती आपली ओळख स्वत: निर्माण करू शकते. परंतु तरीही माणसांतील बहुसंख्या ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच तिची ओळख करुन घेण्याचा प्रयत्न करत असते. कारण परस्पर-संवाद अथवा आचार-विचार हा आपापल्या गटाच्या भूमिकेला अनुसरूनच करायचा असतो असा तिचा समज आजही आहे.

टोळीजीवनाच्या काळात टोळीविना माणूस ही संकल्पनाच अतर्क्य होती. जंगलवासी माणूस हा दुबळा प्राणी सहकार्‍यांच्या मदतीशिवाय जिवंत राहणे जवळजवळ अशक्यच होते. त्यामुळेच टोळीतील आपली नेमून दिलेली कर्तव्ये पार न पाडणार्‍या अथवा तिच्या हिताविरोधात कृती करणार्‍या व्यक्तीला टोळीतून बहिष्कृत केले जात असे. पुढे नागर समाजातही या बहिष्काराचे प्रस्थ कायम राहिले. आज असा सामाजिक बहिष्कार किंवा ’वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते.

पण केवळ धार्मिक अथवा जातीय व्यवस्थांसारख्या जुनाट व्यवस्था अथवा त्यांचे पाईक तिचा वापर करतात असे नव्हे. ज्यांना अतिनागर म्हणता येईल असे नागरिकही समाजमाध्यमांमधून अमुक धर्मीयांकडून काही खरेदी करू नका, तमुक देशातील उत्पादनांवर बहिष्कार घाला, अमक्या कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमक्या अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ’जाती’च्या माणसांना देत असतात. प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता फारशी बदललेली नाही.

CharlieHebdoCartoon

टोळ्या होत्या तेव्हा विरोधी टोळीच्या स्त्रियांवर थेट बलात्कार होत, आता रंडी/रांड वगैरे शब्दातून होतात इतकाच फरक झाला आहे. तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची दृष्टी अजूनही बदललेली नाही. प्रतिस्पर्धी टोळीतील ”इतक्या लहान मुलाला का मारायचे?’ असा प्रश्न जेत्या टोळीच्या ’सैनिका’ला फारसा पडत नसे. ते वयाने वाढले की सुज्ञ होऊ शकेल यावर त्यांचा विश्वास नसे. मोठे होऊन ते ही हिंसाच करणार असा त्यांना ठाम विश्वास असे. त्यांच्या बुद्धीची कुवतच तेवढी असे, बहुसंख्येची आजही तितकीच आहे.

समूळ नाशाची ही प्रेरणा आपल्या मनाच्या तळाशी सतत खदखदत असते. या ना त्या प्रकारे ती उसळी मारुन वर येत असते. जमावाने ठार मारलेली व्यक्ती, एखादी बलात्कार झालेली अभागी स्त्री, अन्याय होऊनही न्यायव्यवस्थेकडून न्याय न मिळालेली दुर्दैवी व्यक्ती आपल्या गटाची नसेल तर बहुतेक वेळा आनंद, समाधान, निदान उदासीनता याच भावना दिसून येतात.

वारंवार बलात्कार करुन ठार मारलेल्या आठ वर्षांच्या मुलीबद्दल ’साली बडी हो के क्या करती, आतंकवादी बनती.’ असा विचार करणारे टोळीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नसतातच. त्यातूनच एखाद्या दीड-दोन वर्षाच्या पोराचे नाव तैमूर आहे, हा धागा पकडून ऐतिहासिक तैमूरच्या कृत्यांवरुन एखादी त्याच्या जमातीचा जहरी विद्वेष करणारी, त्याच्याच वयाच्या मुलाची आई त्या बालकाचे मूल्यमापन करणारी किळसवाणी विधाने करताना दिसते.

फ्रेंच नियतकालिक 'शार्लि हेब्दो’वर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करुन त्यातील अनेकांना कंठस्नान घातले याचा जगभर गवगवा झाला. परंतु पुढे याच शार्लि हेब्दोने दहशतवादापासून परागंदा झालेल्या आणि समुद्रावरच करुण अंत होऊन समुद्रकिनारी निष्प्राण सापडलेल्या अलान कुर्दी या छोट्याबद्दल अशीच अश्लाघ्य टिपण्णी करणारी एकाहुन अधिक भाष्यचित्रे प्रकाशित केली होती. हे नियतकालिक ’स्वातंत्र्य, समता, बंधुता’ ही त्रिमूल्यांची देणगी जगाला देणार्‍या फ्रान्समधील आहे हा दुर्विलास म्हणावा लागेल.

लढाई ते युद्ध

अधिकारक्षेत्रासाठी होणार्‍या लढायांना आज सर्वंकष अशा युद्धांचे स्वरूप आले आहे. टोळ्यांऐवजी अधिकारक्षेत्र म्हणून बस्तान बसलेले दोन देश परस्परांशी जमिनीच्या तुकड्यासाठी भाले, धनुष्यांहून कैकपट आधुनिक शस्त्रांनी युद्धे खेळत आहेत. त्यासाठी ग्लॅडिएटर्स पोसावेत तशी सैनिकांची फौज निर्माण करत आहेत. लढताना त्यांना त्वेष यावा यासाठी ’प्रतिस्पर्धी टोळीचा कुणीही आपला शत्रूच असतो नि त्याचा ’पुरा वंश खणावा’ हाच आपल्या प्रगतीचा रस्ता आहे’ हे आदिम तत्त्व (?) त्यांच्या मनावर बिंबवत आहेत. प्रत्यक्ष न लढणार्‍यांच्या वाचिवीरांच्या फौजांमध्ये त्यांचे ते कृत्य उदात्त वगैरे आहे ही भावना निर्माण करण्यासाठी अस्मितेचे, द्वेषाचे पीक रुजवत आहेत.

नागर समाजामध्ये टोळ्यांमध्ये नसलेली संघर्षाची अनेक नवनवीन कारणे निर्माण केली आहेत. स्वगटाबद्दलची अस्मिता हा सुस्थिर, नागर जगाने निर्माण केलेला मोठा विषडोह आहे. विशेष म्हणजे या अस्मितांचे स्रोत बव्हंशी प्राचीन असतात, ज्याची पडताळणी जवळजवळ अशक्यच असते. ’जे आपले आहे ते- नव्हे फक्त तेच - श्रेष्ठ आहे’ हा दुराग्रह असणारी ही जमात कोणत्याही समाजात बहुसंख्येनेच असते. न निवडलेल्या, अनायासे मिळालेल्या आपल्या गटाचे निर्विवाद श्रेष्ठत्व ती अत्यंत आक्रमकपणे प्रतिपादित असते.

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील असो की भारतासारख्या देशातील,बहुसंख्या ही ’एखाद्या गुन्ह्याचा गुन्हेगार अमुक जात वा धर्माचा आहे म्हणून त्या गटातील कुणालाही त्याची शिक्षा झाली तरी ते न्याय्य आहे’ असे मानणारी असते. नऊ सप्टेंबरला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड तेथील जनतेला हवा होता. अध्यक्ष बुश यांनी ’वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ची भुमका उठवून इराकचा- एका मुस्लिम राष्ट्राचा विध्वंस केला आणि जनतेला ते समाधान मिळवून दिले आणि अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाल पदरात पाडून घेतला.

वेदनेचा वारसा

हे सर्व घडवून आणणारे टोळीप्रमुख आज विविध देशांचे सुलतान, अध्यक्ष, पंतप्रधान, शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांचे मालक, माध्यमांचे मालक-संचालक बनून अधिकारक्षेत्राशिवायही भरपूर मलिदा पदरी पाडून घेत आहेत. टोळीयुद्धाप्रमाणेच या सर्वंकष युद्धांमधून पुढच्या पिढ्यांना वेदनेचा वारसा मिळतो आहे.

SashasEnd
'Enemy At the Gates' या चित्रपटातून.

छोट्या अ‍ॅन फ्रॅंकने तिच्या दैनंदिनीमार्फत(५) या पुढच्या पिढीची वेदना ग्रथित केली आहे. ’एनिमी अ‍ॅट द गेट्स’(२००१) मध्ये दोन महासत्तांच्या टकरीमध्ये बळी गेलेला साशाही तुम्हा-आम्हाला हेच सांगतो आहे. ’टर्टल्स कॅन फ्लाय’(२००४) मध्ये सुरुंग स्फोटात दोन्ही हात गमावलेला पंधरा सोळा वर्षांचा मुलगा युद्धातील अत्याचाराचे फळ वागवणार्‍या तेरा-चौदा वर्षांच्या पोरक्या बहिणीचा पोशिंदा होतो आहे... आणि तरीही घरबसल्या महासत्ता होण्याचा कैफ मिरवणार्‍यांमध्ये तारतम्य नावाचा गुण रुजताना दिसत नाही.

याचे एक कारण म्हणजे या वेदनेला प्रतिस्पर्धी टोळीच सर्वस्वी जबाबदार असल्याचे पटवून देत या पुढच्या पिढीलाही हत्यार म्हणून पुढच्या युद्धात वापरण्याचे नियोजन त्यांच्या टोळीचे मुखंड करत आहेत. त्यामुळे मनुष्य नागर झाला तरी सुसंस्कृत झाला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. टोळ्यांची व्याख्या बदललेली आहे इतकेच म्हणता येते आहे!

नात्यांचा प्रवास

प्रथम टोळी, मग नीतिनियमादि चौकटी अधिक काटेकोर होत तिचा बनलेला समाज, पुढे पुनरुत्पादन प्रक्रियेची समज आल्यानंतर रक्ताच्या नात्याने बांधले गेलेले व्यापक कुटुंब, आणि माणूस जसजसा शहरी जीवन अंगीकारता झाला तसे ते संकुचित होत उदयाला आलेली एककेंद्री कुटुंब-व्यवस्था... या मार्गे माणसाच्या नात्यांच्या प्रवास होत गेला आहे.

याचा पुढचा टप्पा बनू पाहात असलेले स्वकेंद्रितांचे दुभंग, विखंडित कुटुंब हे ‘फायनल डेस्टीनेशन’ ही अमेरिकेची संयुक्त संस्थानांची उरलेल्या जगाला देणगी आहे. विभक्त आई-वडील, शक्य तितक्या लवकर स्वतंत्र होऊ पाहणारी मुले, त्यातून भावनिक बंधांना येणारा कमकुवतपणा, कोरडेपणाही अपरिहार्यपणे येतो आहे. मग त्याची भरपाई करण्यासाठी अगदी पौगंडावस्थेपासून जोडीदाराचा शोध; नात्यांच्या वैविध्याच्या अभावामुळे त्याच्याकडून असलेल्या अनेक-पदरी आणि म्हणून अवास्तव अपेक्षा, आणि त्या अपेक्षाभंगातून येणारे टोकाचे वैफल्य... कळप-टोळी-समाज-कुटुंब या मार्गे सर्वस्वी वैय्यक्तिक जगण्यापर्यंत माणसाचा प्रवास चालला आहे!

MeMyselfAndI
https://www.freepik.com/ येथून साभार.

- oOo -

टीपा:
(१). तसे हरणे, काळवीट यांसारख्या तृणाहारींमध्ये मध्येही कळपाचा नेता असतो. पण तो प्रामुख्याने माद्यांवर हक्क प्रस्थापित करण्यापुरता असतो.
(२). बाहुबलाऐवजी आवाजी दहशत निर्माण करण्याचे कौशल्य या दोन नेतृत्वगुणांच्या आधारे नेता झालेल्यांध्ये साधारणत: राजा आणि गावगुंड यांच्यात असतो तितका फरक मानायला हवा. राजा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारीही घेतो, तर गावगुंड केवळ खंडणी गोळा करत असतो.
(३). चिंपांझी या वानरकुलातील प्राण्यांवर सुमारे साठ वर्ष अभ्यास केलेली विदुषी.
(४).
सत्तेस्तव नेत्यांस वधावे
असा जगाचा नवा शिरस्ता
पुरा तयांचा वंश खणावा
हा पुढचा प्रगतीचा रस्ता
(बा. भ. बोरकर यांच्या ’शैशविंचा व्रण तसाच वाहे’ या कवितेमधून)

(५).’डायरी ऑफ अ यंग गर्ल’ - अ‍ॅन फ्रॅंक या डच मुलीने नाझींपासून लपून राहिलेल्या दोन वर्षांच्या काळात लिहिलेली दैनंदिनी. जगभरातील ७० भाषांमध्ये तिचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.


हे वाचले का?