बुधवार, २९ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - २ : हा बिम्म आहे

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

पहिले पाऊल << मागील भाग

---

HaBimmaAahe
हा बिम्म आहे(https://riseandshine.childrensnational.org/ येथून साभार.)

‘बखर बिम्मची’ हाती घेतल्या घेतल्या ‘बिम्म’ हे कथानायकाचे नाव ऐकूनच वाचक प्रथम बुचकळ्यात पडतो. वाटतं ‘अरे, हे काय नावं आहे?’ पण तुम्हा-आम्हालाच का, बिम्मलाही हाच प्रश्न पडायचा ना, ‘आपले नाव बिम्म का आहे?’ असा. त्यावरचे उत्तर भलतेच मासलेवाईक आहे. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार ‘बब्बीने – त्याच्या बहिणीने – प्रथम आपल्या या भावाला पाहिले तेव्हा ती म्हणाली, ‘हा बिम्म आहे!’ म्हणून त्याचे नाव बिम्म.’

हे पुस्तक वाचायला घेतले आणि या तिसर्‍याच वाक्याने मला खिशात टाकले होते. लहान मुलांचे जग किती सोपे असते. बब्बीला वाटले याचे नाव बिम्म, बस्स ठरले, हा बिम्म! पुढे बब्बीच्या पावलावर पाऊल ठेवत बिम्मने देखील कुत्र्याच्या पिलाला, घोड्याला, पिवळ्या पक्ष्याला अशीच नावे दिली आहेत, नव्हे ‘त्यांची तीच नावे आहेत नि हे मला आधीपासून माहीत आहे’ असा दावा केलेला आहे.

माझी भाची पाच-सहा वर्षांची असताना अशीच इतर बच्चे कंपनीला ‘नावे ठेवण्यात’ आघाडीवर असे. तिच्या नवजात आतेबहिणीला पाहताक्षणीच हिचे नाव ‘रिया’ असे तिने जाहीर करून टाकले होते. आईच्या एका मैत्रिणीच्या मुलीला पाहिल्यावरही हिचे नाव ‘आकांक्षा’ आहे असे तिने आपल्या आईला सांगितले. तिच्यामुळे बब्बी ही अगदी आपल्या घरातलीच आहे असे वाटून गेले.

आणि बब्बीचंच काय ते कौतुक करायचे, पूर्वीच्या काळी नाव ठेवण्याबाबत अति चोखंदळपणा तसाही नव्हता. चार दोन देवांच्या नावातले एक बरेसे निवडले की झाले. ‘पूर्वी आई-वडील मुलांच्या नावाबाबत खल करण्यात वेळ दवडत नसत, ताबडतोब पुढच्या बारशाच्या तयारीला लागत असत.’ असं एके ठिकाणी पुलंनी गमतीने म्हटलंय.

पण खरंच एखाद्याचे नावं ‘बिम्म’ असलं म्हणून काय झालं? नाहीतरी समाज, इतिहास, संस्कृती नि भाषांचे संदर्भ माहीत नसणार्‍या एखाद्याला तुमचे आमचे नाव 'बिम्म' इतकेच निरर्थक वाटेल ना? अनेक नावे आज आपण सर्रास देतो त्यांना केवळ ऐतिहासिक संदर्भ असतात म्हणून ती आपल्याला ‘बिम्म’ या नावाइतकी वैचित्र्यपूर्ण वाटत नाहीत. विचार करून पाहा, भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये ज्याचे नाव प्रथम राम असे ठेवले गेले, तेव्हा ते नाव त्या समाजात ‘बिम्म’ इतकेच वैचित्र्यपूर्ण मानले गेले असेल. अब्राहम हे नावही टेन-कमांडमेंट्सच्या अवतरणापूर्वी असेच अनाकलनीय वाटले असेल.

आता आई-वडील एखादा वैश्विक प्रश्न असल्याप्रमाणे त्यावर खल करतात. बाजारातून ‘१००१ नावे’ वगैरे सारखे पुस्तक आणतात नि त्यातून एखादे अपरिचित असे नाव शोधतात. इथेच न थांबता इंटरनेटवर असल्या नावांच्या याद्या देणार्‍या वेबसाईट्स धुंडाळतात. हे कमी म्हणून काय फेसबुकवर, मराठी संस्थळावर अथवा व्हॉट्स अ‍ॅपवर “ब अक्षराने सुरू होणारी नावे हवी आहेत” असा असे आवाहन करतात. सुदैवाने अजून या पाच नावातून निवडा, यावर वोट करा असा सर्वे चॅनेल्सवरून, अथवा एसेमेमधून अथवा फोनवरून आपले मत नोंदवा असा कौल टाकत नाही एवढे नशीब.

अलिकडच्या एक-दोन दशकांत वारशाने आलेली, प्राचीन संदर्भ असणारी नावे न ठेवता इतर कुण्णाकुण्णाचे नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण नावे देण्याचा आटापिटा सुरू झाला आहे. त्यासाठी बहुधा एखादे अनाकलनीय असे संस्कृतोद्भव नावे ठेवण्याचा प्रघात रूढ होतो आहे. एवढ्या सगळ्या आट्यापिट्यातून एखादे नावीन्यपूर्ण नाव शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण अनेकदा हे सगळं मुसळ केरात जातं नि बर्‍याच गमतीजमती घडतात.

‘विखार’ हे नाव ठेवायचे घाटत असलेले ऐकून मी निपचित पडलो होतो. हे त्या पोराचे सुदैव की मला त्याचा अर्थ सांगायची संधी बारशाआधीच मिळाल्याने त्याचा संभाव्य विखार शमला. याउलट ‘शृगाल’ या नावाने मिरवणार्‍या एका पोराची मला कायम कीव वाटत आली आहे. त्याचे दुर्दैव हे की शाळेत नाव घालेपर्यंत कोणीही त्याच्या नावाचा अर्थ त्याच्या दिवट्या आई-बापांना सांगितला नाही. आता जन्मभर ते पोरगे आई-बापांचे नावीन्यपूर्ण नाव ठेवण्याचे खूळ आपल्या माथी मिरवणार आहे. तेच दुर्दैव ‘श्लेष्मा’ नावाच्या एका मुलीच्या वाट्याला आले आहे.

थोडक्यात काय, आमची बब्बी बिचारी शहाणी. तिने आपल्या भावाला पाहिल्या क्षणीच जे वाटले ते नाव ठेवून दिले. शेवटी नावाने माणूस ओळखला जाण्यापेक्षा माणसाने स्वकर्तृत्वाने ते नाव मोठे करणे अधिक महत्त्वाचे. पण हे जे बब्बीसारख्या शाळकरी पोरीला समजते, ते केवळ वयानेच वाढून बसलेल्या नि स्वतःला मोठे समजणार्‍यांना समजत नाही हेच तर खरे दुर्दैव.

कोऽहं

नावाचा घोळ निस्तरला, की बिम्म ‘आपण कोण?’ या प्रश्नाकडे वळतो. लहान मूल रांगू-बसू लागल्याच्या वयाचे झाले, की त्याला आई-बापांचे बोलणेही बरेचसे समजू लागते, त्या बोलण्याला ते प्रतिसादही देऊ लागते. मग ‘बबड्याचे कान कुठेत?’, ‘बबड्याचे डोके कुठे आहे?’ वगैरे प्रश्न विचारुन त्याची शिकवणी सुरु होते. यात आद्य प्रश्न असतो तो ‘बबड्या कुठे?’ हा. मग ते पोर छातीवर हात लावून उत्तर देते. त्याबद्दल त्याची वाखाणणी सुरु झाली, की त्या शब्दाचं– खरंतर ध्वनिचं म्हणू या, कारण भाषिक समज अजून बरीच दूर असते – नि आपलं काहीतरी नातं आहे इतके त्याला उमगू लागते.

आणखी थोडे मोठे झाल्यावर जेव्हा ते मूल – बिम्मसारखे – परिसराशी ओळख करुन घेऊ पाहते, त्यातील प्रत्येक गोष्टीला समजून घेऊ पाहते, तेव्हाच ते स्वत:लाही शोधू पाहते. आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ यांना ते कुठल्या ना कुठल्या भूमिकेत पाहात असते. त्यामुळे विचारांनी नाही तरी उपजत जिज्ञासेने, अजाणता का होईना ते स्वत:चाही शोध घेऊ लागते.

आपण आपल्या आई-वडिलांसारखे किंवा भावा-बहिणींसारखे दिसतो हे त्याला जाणवत असावे. पण असे का बरे ? या बिम्मला ‘मी रस्त्यावरच्या खडीच्या एंजिनासारखा का नाही?’, ‘आंब्याच्या झाडासारखा का नाही?’, किंवा ‘छत्रीसारखा का नाही?’ असे प्रश्न पडत असतात. सजीव आणि निर्जीव वस्तूंमधला भेद समजून घेण्याची ही सुरुवात असेल. या प्रत्येक वस्तूला तिचा असा एक गुणधर्म आहे ज्याचा आपल्याला उपयोग होईल असे त्याला वाटत असते.

BimmaAndBabbi
बिम्म आणि बब्बी (https://www.wyethnutrition.com.my/ येथून साभार.)

म्हणजे एंजिन असतो तर मी रस्त्यावर धावू शकतो, (एरवी या ‘एंजिना’ला रस्त्यावर एकट्याने जायला आईने मनाई केली आहे.) आंब्याचे झाड असतो तर एका जागी राहूनही कुणीही– अगदी बब्बीसुद्धा – मला तिथून ऊठ म्हणू शकणार नाही असा त्याचा होरा असतो. छत्रीला पावसात जाण्याची परवानगी असते, म्हणजे मी छत्रीसारखा असतो तर आई मला पावसात जाऊ देईल अशी त्याला आशा असते.

पण लवकरच याची दुसरी अडचणीची बाजूही त्याला दिसू लागते. ‘एंजिन कुठे दूध पिते?’ किंवा ‘आंब्याचे झाड कुठे बिस्किट खाते?’ असा खडा सवाल करुन बब्बी त्याचे खाणे बळकावण्याचा प्रयत्न करते. शिवाय एंजिन नि छत्री होऊनही रस्त्यावर किंवा पावसात न जाण्याचा नियम शिथिल करण्याचे आई नाकारते. तेव्हा मग त्याला आपले बिम्म असणेच बरे आहे असे वाटू लागते. माणसाचे कल्पनास्वातंत्र्य वास्तविक बंधनांनी जखडले जाण्याची ही सुरुवात म्हणावी लागेल.

वास्तव-कल्पनेच्या विश्वात नुकतेच पाऊल पडलेला बिम्म आपल्या आसपासच्या जगाशी आपले नाते हुडकण्याचा, जोडण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करतो. आसपासच्या ज्या गोष्टींबाबत त्याला अधिक कुतूहल निर्माण होते, त्याबाबत तो आपल्या इवल्याशा मेंदूद्वारे जमेल तेवढे समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यातही अधिक आकर्षक वा जवळच्या वाटणार्‍या गोष्टींबाबत समजून घेताना तो कल्पनेचा आधार घेतो. त्याद्वारे गोष्टींबाबत अनेक गाळल्या जागा भरून काढण्याचा, तो अनुभव वास्तवात घेण्याचा प्रयत्न करत राहतो.

(क्रमश:) पुढील भाग >> प्रतिबिंबांचा प्रश्न     

- oOo -


हे वाचले का?

रविवार, २६ मार्च, २०२३

राजसा, किती दिसांत...

उशीरा केलेल्या आंघोळीदरम्यान पकडलेला Eureka moment...

( लग्नापूर्वी प्रियेसाठी चंद्रावर जाण्यास सिद्ध असलेला प्रियकर नवरा नि बाप झाला की स्नानासाठी मोरीपर्यंत जाण्यासही उत्सुक नसतो. अति झालं म्हणजे त्याची पूर्वीची प्रिया नि आताचं खटलं त्याला निर्वाणीचा इशारा देते.)

HelgaAndHagar
(कविवर्य सुरेश भट यांची क्षमा मागून...)

आंघोळून टाक आज, विसळून अंग अंग
राजसा किती दिसांत न्हायला नाहीस सांग

त्या तिथे जुन्या खणात, पेंगतो तव गंजिफ्रॉक  
हाय रे नको तयाचे, झोपेतच होणे दुभंग  

दूर दूर राहतो बघ, रुसला तुझाच लेक 
साहवेना त्या जराही, प्राचीन तव देहगंध

गार गार या हवेत घेऊनी पंचा समेत
मोकळे करून टाक एकवार सर्व अंग

काय हा तुझा रे श्वास, दर्प हा इथे भकास
बोलावण्यास तुला, उठला पाण्यावरी तरंग

हे तुझे तुला कळेल, स्नान हे तुवा फळेल 
सांग ना अता खरेच...

(चाल बदलून आर्जवी स्वरात)
... वाटते ना तुलाच फ्रेश ?

- रमताराम

- oOo -

(न्हाणीघर,  दि. २६ मार्च २०२३)
	

हे वाचले का?

गुरुवार, २३ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - १ : पहिले पाऊल

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

रांगते लहान मूल जेव्हा प्रथम एखाद्या गोष्टीला धरून दोन पावले टाकते, तेव्हा त्याला ‘चालणे’ या क्रियेचा वा हालचालीचा शोध लागतो. यात त्याने ज्या जड गोष्टीचा आधार घेतलेला असतो अशा– भिंत, टेबल, खुर्ची, पलंग वगैरे वस्तूंना पकडले, की आपण केवळ उभेच राहू शकतो असे नव्हे, तर पायांची हालचाल केल्यावरही पडत नाही इतका आधार मिळतो, याचे भान त्याला येत असते.

परंतु याने आधाराचे भान आले तरी ‘खोली’चे येत नाही. म्हणून मग पलंगावर उभे राहून चालता चालता पलंगाच्या वा सोफ्याच्या कडेपाशी पोचते तेव्हा थांबावे हे त्याला समजत नाही. जेव्हा ते पायाखालची जमीन संपून धाडकन पडते, तेव्हाच त्याला पायाखाली नेहमीच आधार असतो असे नाही याचे भान येते. मग ते एक एक पाऊल टाकताना जमिनीकडे ध्यान ठेवायला शिकते.

भाषेबाबतही आपण पाहतो की भारतीय अनाथालयातून अमेरिकेत दत्तक गेलेले मूल हे इंग्रजी – वा आपल्या दत्तक पालकांची – भाषाच बोलते, ज्या भारतीय प्रदेशात जन्मले ती नव्हे. मुलाच्या जडणघडणीत– ‘ख़ानदान की इज़्जत’ वगैरे बाष्कळ संकल्पना बाळगणार्‍यांना अमान्य असलेला, परिसर घटकांचा आणि त्या मुलाच्या चुकांमधून, अनुभवातून, जाणिवेतून होणार्‍या विकासाचा भागच मोठा असतो. असे असूनही अगदी मुलांसाठीच म्हणून लिहिलेल्या साहित्यातूनही याचा मागमूस कुठे आढळत नाही.

आपल्याकडे लहान मुलांसाठी म्हणून लिहिल्या जाणार्‍या साहित्याचा साधारण आराखडा ठरलेला आहे. यात स्वतः वयाने मोठ्या असलेल्या नि आपल्याला लहान मुलांचे भावविश्व समजते असा ‘समज असणार्‍या’ लेखकांचा कल्पनाविस्तार असतो. यात अगदी लहान मुलांसाठी बडबडगीतांपासून जी सुरुवात होते ती परिकथा, काल्पनिक जग, अद्भुत कथा वगैरे प्रवास करत किशोरवयीन मुलांसाठी ऐतिहासिक-काल्पनिक हीरोंपर्यंत गाडी पोहोचते.

काही मंडळी त्यापुढे जाऊन मुलांना अगदी सुसंस्कारित करण्याचे कंकण वगैरे बांधून बोधकथा, नीतिकथा लिहितात. याची मोठ्यांसाठीची थोडी सुधारित आवृत्ती म्हणजे पंचतंत्र, इसापनीती वगैरे प्रकारच्या तात्पर्यकथा.

कालानुरुप यात थोडे बदल होऊन आता यात लवकर वयात येऊ लागलेल्या नि मोठ्यांची ‘पॉकेट-बुक एडिशन असलेल्या नव्या पिढीला’ आवडते म्हणून यात मारधाड, हीरो, व्हिलन, परग्रहावरचे वा याच ग्रहावरचे आक्रमक मग त्यांना विरोध करण्यास उभा ठाकणारा आपला हीरो, त्याला मिळालेली अलौकिकाची किंवा जादूच्या एखाद्या साधनाची साथ, हे अनेक धर्मग्रंथातून वा ऐतिहासिक दस्तऐवजातून सापडणारे तपशीलच वेगळ्या संदर्भात मांडून आता मुलांचे मनोरंजन केले जाते.

मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांमधून परी, राक्षस, राजकन्या, राजपुत्र, वर देणारे देव अथवा जिन यांची हकालपट्टी होऊन तिथे थेट समोरासमोर युद्ध करावे लागणारे चित्रविचित्र रंगांचे, आकाराचे, नावाचे व्हिलन आणि वीत-दीडवीत उंचीचा आपला हीरो यांच्यात हास्यास्पद पातळीवर होणारी लढाई वगैरे मालमसाला असतो.

चलत्-चित्राचे (Animation) माध्यमही याला अपवाद ठरलेले नाही. स्नोव्हाईट, सिंडरेला, हकलबेरी फिन, टॉम सॉयर वगैरे नायक/नायिकांची जागा आता ही-मॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन वगैरे ’ढिशुम-मॅन्स’नी घेऊनही जमाना झाला. आता बेन-१०, जस्टीस-लीग, सुपरहिरो-लीग वगैरे करत आपल्या या तथाकथित हीरोंनी-सुपरहीरोंनी आपले कार्यक्षेत्र पृथ्वीबाहेर विस्तारत नेले आहे. एकुणात सतत कुठल्या ना कुठल्या धोक्याशी, आक्रमणाशी, शत्रूशी लढणे त्याला नेस्तनाबूद करणे हाच या महाभागांचा एकमेव कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. ढोबळमानाने एकाच कथेच्या सांगाड्यावर ‘स्टार-वॉर्स’ मालिकेतले सात ते आठ चित्रपट आणि पाच-दहा मालिका सनसनाटीपणा आणि पोशाखीपणाप्रेमी प्रेक्षकांच्या ताटात पुन्हा-पुन्हा वाढून त्या प्रत्येक ताटाचे वेगळे दाम जॉर्ज लुकसने वसूल केले आहेत.

जगण्यातील कुतूहलाचे, माहितीचे, विकासाचे, नात्या-गोत्यांचे इतर कोणतेही आयाम या कथानकांना नसतात; असलेच तर ते या तथाकथित हीरोगिरीसमोर किती दुय्यम ठरतात/ठरवावे लागतात हे दाखवण्यापुरतेच.

या सार्‍या तथाकथित प्रगतीच्या वाटेवर त्या मुलांच्या प्रत्यक्ष भावविश्वातील गोष्टींना कोणतेही स्थान नाही. एखादे मूल आयुष्यात वाढत जाते, तेव्हा त्याच्यावर होणारे विविध प्रकारचे संस्कार, त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे त्यातून त्याने अंगीकृत केलेले कौशल्य, जमा केलेली माहिती नि सिद्ध केलेले ज्ञान या मार्गाने त्या व्यक्तीची जडणघडण होत असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर अंगभूत गुणांबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या परिसर-घटकांचा परिणामही मोठा असतो. त्याचा विचार मुलांसाठी अथवा मुलांबद्दल लिहिल्या गेलेल्या बहुतेक पुस्तकांमधे, तयार केल्या गेलेल्या करमणूकप्रधान दृक्-श्राव्य कार्यक्रमात बहुधा नसतोच.

BakharBimmachi

‘बखर बिम्मची’ हे पुस्तक त्या अर्थाने आगळे वेगळे म्हणावे लागेल. लहान मूल ज्या विशिष्ट परिसरात, कौटुंबिक-सामाजिक पार्श्वभूमीवर जगत असते त्याचा परिणाम, प्रभाव त्याचा भावविश्वावर पडत असतो. त्याचबरोबर त्या लहान मुलाची कल्पनारम्यता हा आणखी एक मोठा घटक असतो. त्या लहान मुलाचे जग हे अशा वास्तव-कल्पनेच्या तीरावर उभे असते. जसजसे वय वाढते तसतसे माणूस वास्तवाशी अधिकाधिक जुळवून घेण्याचा प्रयत्न करत जातो, त्याच्या भावविश्वातील कल्पनारम्यतेचा भाग कमी होत जातो. त्या वयातील ही वास्तव-कल्पनेची सरमिसळ नेमकी हेरून या छोटेखानी पुस्तकामध्ये जी.ए. कुलकर्णींनी बिम्मचे आयुष्य चितारले आहे.

‘याला बखर का म्हटले आहे?’ असा पहिला प्रश्न मनात आला, तर समजावे हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. बखर हा साहित्यप्रकार इतिहासाची कालानुक्रमे नोंद घेणारा, प्रामुख्याने एका मुख्य व्यक्तिरेखेचा आयुष्याचा प्रवास नोंदवणारा. एरवी आपण बखरी वाचतो त्या ऐतिहासिक पुरुषांच्या आयुष्यावरच्या. पण बखरी फक्त राजे-रजवाड्यांच्या नि श्रेष्ठ पुरुषांच्याच असाव्यात असा नियम कुणी केलाय, केला असला तरी तो आपण का मानावा? शूरवीरांच्या लष्करी विजयांबद्दल जसे लिहिता येते तसेच सर्वसामान्यांच्या आयुष्यात पादाक्रांत केलेल्या एकेका टप्प्याची, विचार व जाणिवेतून सिद्ध नि अंगीकृत केलेल्या ज्ञानाची बखर का लिहू नये?

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जन्माला आलेले प्रत्येक मूल हे आपल्या आसपासच्या जगाचा आपल्या परीने, आपल्या कुवतीच्या मर्यादेत वेध घेत असते. त्यातून ते आपले निष्कर्ष काढते, आपल्या वर्तणुकीत त्याला अनुरूप बदल करत जाते. त्यामुळे माणसाच्या आयुष्याचा पाया आणि विस्ताराची क्षमता ही त्याच्या मूलपणात त्याने केलेल्या प्रवासावर बरीच अवलंबून असते.

अलीकडे मनोरंजनप्रधान माध्यमांकडून बहुसंख्येला प्रामुख्याने अपेक्षित असते तसे चित्तचक्षुचमत्कारिक, थरारक असे बिम्मच्या आयुष्यात काही नाही. पण तुमच्या आमच्या जगण्याची, बालपणीची नाळ तिथे जुळली आहे. मग असे वाटेल की ‘मग त्यात काय वाचायचे?’. पण बखर बिम्मची तुमच्या बालपणीचेच वाटणारे किस्से मांडून, नेमक्या ठिकाणी काही अधोरेखिते वाढवून त्यांच्याकडे डोळसपणे पहायला भाग पाडते.

आता हे पुस्तक, त्यातील गोष्ट ती बिम्मच्याच वयाच्या – वय वर्षे दोन ते पाच – मुलांसाठी आहे असे वरकरणी दिसते. पण यात अडचण अशी की त्यांच्यात अद्याप वाचनाची क्षमता विकसित झालेली नसते. तेव्हा ते पालकांनी/मोठ्यांनीच त्यांच्यासाठी वाचायला हवे. याचा फायदा घेऊन जीएंनी बिम्मची ही गोष्ट दुपदरी ठेवली आहे, ऐकणार्‍या बिम्मबरोबरच वाचणार्‍या त्याच्या आई-वडिलांसाठी त्यात काही ठेवून दिले आहे. ही ‘छोट्याची मोठी गोष्ट’ वाचताना गोष्टीतल्या बिम्मप्रमाणेच ऐकणार्‍या बिम्मच्या मनात जसे काही उमटते, तसेच त्याच्यासाठी ते वाचणार्‍याच्याही मनातही काही उमटून जाऊ शकते. या बिम्मबरोबरच त्या बिम्मचे आई किंवा वडीलही या वाचनातून काही वेगळे गवसल्याचे समाधान उपभोगू शकतील असं मला वाटतं.

या द्विस्तर योजनेमुळेच कदाचित केवळ लहान मुलांचे पुस्तक म्हणून वाचताना काही गोष्टींचा – विशेषत: एक दोन प्रकरणातल्या शेवटांचा – उलगडा होणे किंचित अवघड जाते. तिथे थोडा तर्काचा आधार घ्यावा लागतो. कदाचित या दुसर्‍या स्तराचा शोध वाचकाने घ्यावा असे जीएंना अपेक्षित असावे. अर्थात हा जीएंचा मूळ उद्देश होता की माझा उगाच ‘पिंडात ब्रह्मांड’ पाहण्याचा प्रयत्न आहे हे वाचकाने आपल्यापुरते ठरवावे.

बिम्म आणि बब्बी

त्याचे वडील कामानिमित्ताने परगावी असल्याने आपले घर, आई आणि बब्बी इतकेच बिम्मचे जग. बिम्म आणि त्याची मोठी बहीण बब्बी, हे आसपास दिसणार्‍या कोण्याही भावा-बहिणींसारखेच आहेत. बिम्म वाचा नि विचाराचे इंद्रिय नुकतेच जागे झालेला, तर बब्बीने ‘शाळा’ नावाच्या नव्या जगात नुकतेच पाऊल ठेवले आहे. हे दोघे आपापल्या वाट्याचे उपद्व्याप करतात नि एकमेकांचे उपद्व्याप आईच्या कानावर घालण्याचे काम मोठया आनंदाने करतात.

आयुष्यात काही टप्पे असे असतात जे पार केले असता इतका काळ बरोबर असलेल्यांप्रती अचानक एक सूक्ष्मसा तुच्छभाव, श्रेष्ठत्वाची भावना, एक अभावित अहंकार निर्माण करतात. यात शाळेत पाऊल टाकणे हा पहिला. मग महाविद्यालय ऊर्फ कॉलेजमध्ये जाणे नि पदवी मिळणे, पहिला रोजगार सुरू करणे, जोडीदार मिळणे वा मिळवणे, दारी पहिली गाडी येणे आणि मग नव्या जगातला सर्वोच्च वगैरे म्हणतात तो म्हणजे परदेशप्रवासाची संधी चालून येणे.

या प्रत्येक टप्प्यावर ती काल्पनिक रेषा पार केलेल्या प्रत्येकाच्या मनात मागे राहिलेल्यांबद्दल – ते ही यथावकाश पुढे येतील, येऊ शकतील हे ठाऊन असूनही – एक प्रकार अहंभाव निर्माण होतो. त्यांच्यापेक्षा आपला अधिकार अधिक आहे असे त्या व्यक्तीला वाटू लागते नि बरेचदा तो गाजवण्याच्या प्रयत्नही होत असतो. बब्बी शाळेत जात असल्याने ‘बिम्मपेक्षा आपण अधिक शहाणे आहोत’ असा तिचा समज झाला आहे. त्याला अनुसरून बब्बी बिम्मवर जमेल तितकी दादागिरी करत असते.

याशिवाय त्यांच्या या जगात एक आजोबा आहेत. मागच्या आवारात भेटणारे हे आजोबा खरंच अस्तित्वात आहेत, की केवळ बिम्मच्या कल्पनेत हे जीएंनी स्पष्टपणे उलगडलेले नाही. कारण खुद्द बिम्म सोडून आईला अथवा बब्बीला ते कधीच दिसत नाहीत. पण त्याबाबतीत खरे-खोटे तपासण्याची आवश्यकताही नाही. त्याच्या भावविश्वात, त्याच्यापुरते ते आहेत नि त्या दोघांची छान मैत्रीही झाली आहे.

ते बिम्मला पतंगाला बांधून उडायचे – उडवायचे नव्हे! – कसे ते दाखवतात, पिवळ्या पक्ष्याच्या त्याचा शोधात मदत करतात, त्याच्यासाठी पेरू आणून देतात, बिम्मला सापडलेल्या किल्लीचे कुलूप शोधून देतात. थोडक्यात ज्या गोष्टींत आई अथवा बब्बी उपयोगी पडत नाहीत, तिथे ते बिम्मच्या मदतीला धावून येतात. बिम्मला त्यांच्या अस्तित्वाचा एवढा पुरावा पुरेसा आहे. त्याच्या वयाच्या मुलाला अस्तित्वाबाबतचे याहून अवघड प्रश्न मुळी पडतच नसतात. हीच तर बिम्मच्या जगाची गंमत आहे.

वडील परगावी असल्याने (अलीकडच्या नागरी जीवनात सतत कामात व्यग्र असल्याने) घरात जवळच्या वडिलधार्‍या पुरूष माणसाशी संवाद होत नसल्याने ती गरज हे आजोबा भागवत असावेत. वय वाढते तसे हे कल्पनेतले आजोबा तुमच्या आयुष्यातून हद्दपार होतात... आणि अनेकदा वास्तवातलेही!

बिम्मचे आयुष्य हे सुमारे दहा ते बारा टप्प्यात जीएंनी साकार केले आहे. यातील प्रत्येक टप्पा लहानसाच असला तरी बिम्मच्या वयातल्या मुलांच्या भावविश्वातील विविध वस्तू, गोष्टी, संकल्पना याबाबत बोलणारा आहे. हा बिम्म साधारणपणे चार दशके मागच्या जगातला आहे. त्याचे आयुष्य महानगरी नसल्यामुळे मनुष्य नि मनुष्यांनी अट्टाहासाने जवळ केलेल्या कुत्र्या-मांजराखेरीज अन्य सजीवसृष्टीशीही त्याची नाळ अजून घट्ट जुळलेली आहे. त्यामुळे त्याच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा प्रवास या जीवांना वाट पुसतु होतो आहे.

स्वत:च्या अस्तित्त्वाबद्दलच्या प्रश्नापासून नाते, रंग, आकार, उत्पत्ती पासून निव्वळ कल्पनारंजनापर्यंत अनेक बाबतीत बिम्मचे आयुष्य विहरते आहे. वाटेवर भेटलेल्या पिट्टूशी, चारा खाऊन दूध देणार्‍या गायीशी, वारशाने मिळालेल्या पिवळ्या पक्ष्याशी, स्वप्नांच्या वाटे भेटलेल्या इतर पक्ष्यांशी, आपल्या पाठीवर बसवून फिरवून आणणार्‍या हत्तीशी, बेहद्द आवडणारी कैरी देणार्‍या आंब्याच्या झाडाशी ऋणानुबंध जोडत जातो... बिम्म लहान मुलाचा ‘छोटा माणूस’ होत जातो.

पैसे देऊन कुत्र्याचे पिलू अथवा गाणारा पक्षी विकत आणून स्वामित्वभावनेनेच त्याच्याशी नाते जोडणार्‍या, प्लॅस्टिकच्या पिशवीतून दूध विकत आणणार्‍या, हत्ती फक्त प्राणिसंग्रहालयात अथवा पुस्तकांत पाहणार्‍या नि लोणचे नामक बाजारात मिळणार्‍या पदार्थामध्ये कैरीची करकरीत अवस्था संपून येणारी तिची विकलांग अवस्थाच पाहणार्‍या नागरी अथवा महानगरी बिम्मला हे सारेच अपरिचित वाटणार आहे. पण बिम्मने जसा आपला पिवळा पक्षी शोधला, तसे आपल्या बापदाद्यांचे बिम्मपणातील आयुष्य कसे होते याबाबत त्यांना कुतूहल असेल तर ‘बखर बिम्मची’ हे पुस्तक आणि ही लेखमाला त्यांच्यासाठीच आहे.

बिम्मच्या मागील आवारातील त्या आजोबांनी बिम्मला उडणारा नव्हे– तर उडवणारा पतंग दिला होता. त्यावर बसून आकाशात उडता येई. थोडे उंचावरून, थोडे दुरून पाहिले, की आपले जग किती वेगळे दिसते याचा अनुभव बिम्मला त्या पतंगाने दिला आहे. बिम्मने आता हा पतंग माझ्या हाती सोपवला आहे. त्यावर बसून मीही जगण्यात हरवून गेलेला माझ्यातील बिम्म कुठे दिसतो का ते पाहातो आहे.

(क्रमश:) पुढील भाग : >> हा बिम्म आहे    

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, १३ मार्च, २०२३

जम्प-कट - ३ : टोळी ते समाज आणि माणूस

अन्नं वै प्राणिनां प्राणा<< मागील भाग

---

कळपातील सुरक्षितता

हरण काळवीटासारखे शाकाहारी प्राणी कळपाच्या स्वरूपात राहतात. असे असूनही त्यांच्यामध्ये परस्पर-सहकार्य असे फारसे नसते. कळपातील प्रत्येक प्राणी आपापले अन्न स्वतंत्रपणे मिळवत असतो. यांचे कळप करून राहाणे हे प्रामुख्याने कळपातील सुरक्षिततता (safety in numbers) मिळवण्याच्या हेतूनेच असते.

एकाच ठिकाणी अनेक भक्ष्यांचे पर्याय उपलब्ध झाल्याने शिकारी प्राण्याकडून त्यातील एका विशिष्ट प्राण्याची शिकार करण्याची संभाव्यता (probability) घटते. त्याचबरोबर काहीवेळा कळपातील प्राणी नेट धरून एकत्रितरित्या शिकार्‍याचा मुकाबला करु शकतात. कमी श्रमांत शिकार मिळवण्याच्या दृष्टिने शिकार्‍याचा रोख सामान्यत: कळपातील दुबळ्या भक्ष्याकडे अधिक जातो. त्यामुळे त्यातील सक्षम प्राणी निसटून जाऊ शकतात. यातून नैसर्गिक निवडीच्या तंत्राने भक्ष्य प्राण्यांमध्येही पुढे अधिकाधिक सक्षम पिढ्या उदयाला येऊ लागतात.

शिकारीचे नियोजन

MammothHunt
https://allthatsinteresting.com येथून साभार.

या शाकाहारी, भक्ष्य अथवा संग्राहक प्राण्यांना फारतर शिकार्‍यापासून अथवा मोठ्या प्राण्यापासून सावध राहणे इतपतच नियोजन करावे लागते. पण शिकारी प्राण्यांचे भक्ष्य हे पळ काढू शकणारे, प्रतिकार करु शकणारे, क्वचित माघार घेण्यास भाग पाडू शकेल इतपत बलवानही असू शकते. म्हणून टोळीने शिकार करणार्‍या प्राण्यांमध्ये कोळसुंदे अथवा लांडगे सुनियोजितपणे शिकार करताना दिसतात. यात टोळीतील प्राणी भक्ष्याचा पाठलाग करण्याची जबाबदारी टप्प्याटप्प्याने घेत स्वत:चा दमसास वापरून भक्ष्याचा शक्तिपात घडवून आणतात. अशा थकलेल्या प्राण्याला कोंडीत पकडता येईल अशा स्थानी हाकलत नेऊन त्याची शिकार साधली जाते.

माणसाने शिकार करण्यास सुरुवात केल्यावर तिचे नियोजन अशाच धर्तीवर केले जाऊ लागले. त्यातून वाघसिंहादी प्राण्यांनाही जमणार नाही अशा मोठ्या प्राण्यांची शिकारही साध्य करता येऊ लागली. मॅमथ या नावाच्या अजस्र हत्तीची शिकारही मानवी टोळ्यांनी केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. श्रमविभागणी आणि कामाचे नियोजन ही संकल्पना अशी शिकारीतून प्रथम निर्माण झालेली आहे. शिकारी प्राण्यांकडून उचललेली नियोजनाची ही संकल्पना माणसाने पुढे आपल्या सर्वच कामांतून वापरण्यास सुरुवात केली.

कळप, टोळी ते समाज

पण कोळसुंदे असोत की लांडगे, एकदा शिकार पुरी झाली की ’Everyone for itself’ या उक्तीप्रमाणे टोळीतील प्रत्येक प्राणी त्या शिकारीतील आपला वाटा मिळवण्यासाठी तुटून पडतो. अन्न-वाटपाचे निश्चित असे सूत्र त्यांच्यात नसते. शिकार गरजेपेक्षा अधिक मिळाली तर शिल्लक अन्न नंतर खाता यावे म्हणून लांडगे ते पुरून ठेवतात. चित्ता, वाघ यांसारखे प्राणीही खाऊन झाल्यावर उरलेली शिकार पाचोळ्याखाली दडवून ठेवतात. अस्वल हिवाळी झोपेपूर्वी भरपूर खाऊन घेते नि अन्नाला चरबी स्वरूपात अंगावरच साठवून घेते. खारीसारखे छोटे प्राणी, मुंग्यांसारखे कीटक आणि अर्थातच मधमाश्या अन्न-संग्रह करताना दिसतात.

CommunityLife
https://www.npr.org येथून साभार.

मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, शिकार जसजशी सुलभ होत गेली तसतसे अन्नाची उपलब्धता वाढल्याने शिलकीचा प्रश्न निर्माण झाला. मग माणसानेही याचप्रकारे अन्न साठवणुकीचा मार्ग अनुसरला असला पाहिजे. दुसरीकडे अन्नासाठीची वणवण कमी झाल्याने माणसाला मेंदूचा नि उर्जेचा वापर अन्य कामांसाठी करण्यास उसंत मिळाली. त्यातून मग अन्न-संग्रह करण्याचे अधिकाधिक चांगले मार्ग त्याने शोधले.

यातून संपूर्ण टोळीमध्ये विविध कामांची विभागणी होऊ लागली. शिकार करणारे, वाटप करणारे, संग्रहासाठी भाजणे अथवा मिठासारख्या पदार्थामध्ये मुरवणे वगैरे प्रक्रिया करणारे... अशी कामे वाटून दिली जाऊ लागली. टोळीमध्ये सलोखा राहायचा असेल तर शिकारबाह्य कामे करणार्‍यांसह सर्वांना शिकारीचा वाटा मिळणे आणि प्रत्येकाने आपले नेमून दिलेले काम नीटपणे पार पाडणे आवश्यक ठरले. अशा तर्‍हेने कळपातील व्यक्तींना जोडणारे बंध निर्माण झाले आणि त्याची टोळीकडे– एका व्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली.

उपव्यवस्था आणि समाज

टोळीअंतर्गत संघर्षाचे अन्नाखेरीज आणखी एका संभाव्य कारण होते आणि ते म्हणजे माद्यांशी जुगण्याचा हक्क मिळवणे. सिंहासारख्या शिकारी प्राण्यांपासून त्याचे भक्ष्य असणार्‍या आणि कळपाने राहणार्‍या शाकाहारी प्राण्यांपर्यंत सर्वांमध्ये या हक्कासाठी नरांमध्ये संघर्ष होत असतो. परंतु टोळीअंतर्गत असा संघर्ष टोळीमध्ये विसंवाद नि फूट पडण्यास कारणीभूत ठरू नये म्हणून मानवी टोळ्यांमध्ये एकास-एक नर-मादी अशा जोड्यांची व्यवस्था हळूहळू उदयाला आली.

त्यापूर्वी संपूर्ण टोळीचा भाग असणारी मुले आता त्या जोडीची म्हणून ओळखली जाऊ लागली. टोळीतील इतर सदस्यांपेक्षा या गटाचे– कुटुंबाचे– आपसांतील बंध अधिक दृढ होऊ लागले. यातून व्यवस्थेअंतर्गत उपव्यवस्था आकाराला येऊ लागली. पुढे कार्यविभागणीतून वाट्याला आलेले काम कुटुंब बव्हंशी वंशपरंपरागत करु लागले. त्या आधारानेही अन्य उप-व्यवस्था निर्माण होऊन टोळीचे हळूहळू व्यापक समाजामध्ये रूपांतर झाले.

टोळीचा नेता

टोळीने शिकार करणार्‍या लांडगे, कोळसुंदे वगैरे प्राण्यांमध्ये प्रत्येक टोळीचा एक नेता असतो(१). सामान्यपणे टोळीतील सर्वात बलवान प्राणी त्या टोळीचा नेता म्हणून वावरत असतो. या नेत्याकडे इतरांपेक्षा अधिक हक्क आणि कर्तव्ये असतात. त्याचे स्थान अन्य नराला हस्तगत करायचे असेल, तर त्याला आव्हान देऊन पराभूत- क्वचित टोळीतून हाकलून देऊन वा ठार मारूनच ते साध्य करावे लागते.

AlphaMale
Dreamstime.com येथून साभार.

पण टोळीचा नेता हा नेहमीच असा बाहुबलाने निवडला जातो असे नव्हे. त्या टोळीला जगण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य अधिक असलेला नेता म्हणून स्वीकारला जात असतो. प्रत्येक टोळीच्या आयुष्याचा आराखडा जसा असेल, तसे नेत्याला आवश्यक असणार्‍या गुणांची सूची बदलत जाते. रूढार्थाने शिकारी नसलेल्या आणि मानवजातीशी सर्वात जवळचे नाते असलेल्या चिंपांझींच्या टोळीमध्ये शिकार कौशल्यापेक्षा माफक मल्लयुद्ध आणि बव्हंशी दहशत निर्माण करण्याचे कौशल्य(२) पुरेसे असते. वयातही न आलेल्या एका चिंपांझीने एका रिकाम्या पत्र्याच्या डब्याच्या साहाय्याने ‘गर्जना’ करत टोळीच्या नेत्यालाही पळवून लावत औटघटकेचे नेतेपद मिळवल्याचे एक गंमतीशीर उदाहरण जेन गुडाल(३) यांनी नोंदवले आहे.

शिकारी टोळी म्हणून वावरणार्‍या माणसामध्ये शिकारीचे नियोजन करू शकणारा, बाहुबलात नि शिकारी कौशल्यात निष्णात असलेला नेता म्हणून स्वीकारला जात असे. पुढे माणसाने अन्नासाठी केवळ शिकारीवर अवलंबून न राहता शेती आणि पशुपालन या दोन तंत्रांचा वापर सुरू केला. त्यातून आवश्यक कामांची जंत्री अनेकपट वाढली आणि टोळीची व्यवस्था अधिक व्यापक होत गेली. त्यामुळे कार्यविभागणी आणि त्यांची सांगड यांचे नियोजन अधिक महत्त्वाचे ठरत गेले.

माणसाच्या या व्यामिश्र समाजव्यवस्थेमध्ये निव्वळ शारीरबलापलिकडे संपत्ती, बुद्धी, तंत्रज्ञान, गवगवा (propaganda) यांसारख्या अन्य बलांचे महत्त्वही वाढत गेले. यातूनच पुढे राजकीय व्यवस्थेमध्ये राजा, अध्यक्ष वा पंतप्रधान; आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि धार्मिक व्यवस्थेमध्ये आचार्य, मौलवी, पोप यांसारखे धर्मोपदेशक हे कोणतेही प्रत्यक्ष श्रम न करणारे नेते उदयाला येत गेले.

अन्न, संघर्ष आणि अधिकारक्षेत्र

अन्नासाठी शिकारी प्राण्यांना शाकाहारी प्राण्यांच्या तुलनेत अधिक संघर्ष करावा लागतो. पहिला संघर्ष होतो तो भक्ष्य प्राण्याशी त्याच्या टोळीतील काही जागरुक सहकार्‍यांशीही. त्यामुळे शिकार ही नेहमीच यशस्वी होत नाही. त्यासाठी लागणारी ऊर्जाही तुलनेने अधिक असते. त्यातच संभाव्य भक्ष्यामध्ये वाटेकरी निर्माण झाले, तर अन्नाची उपलब्धता आणखी कमी नि दुष्कर होत जाते. ते टाळण्याच्या दृष्टिने अन्य शिकारी प्राण्यांना आपल्या प्रदेशापासून दूर ठेवणे आवश्यक होऊन बसते. हा त्यांचा दुसरा संघर्ष. एकटा-दुकटा सिंह असो, वाघ असो वा लांडग्यांची टोळी, अन्नातले वाटेकरी कमी असावेत, शिकार पुरेशी मिळावी म्हणून सजातीय प्राण्यांशीही संघर्ष करुन त्यांना शक्य तितके दूर पिटाळण्याचा प्रयत्न करतात.

AreaMarking
https://ha.wikipedia.org येथून साभार.

या सजातीयांशी होणार्‍या संघर्षातून त्या शिकारी प्राण्यांमध्ये हद्दीची संकल्पना उदयाला आली. एखादा वाघ, लांडगा मूत्र-पिचकारीने आपली हद्द आरेखित करतात. त्या मूत्राचा तीव्र गंध अन्य सजातीय प्राण्यांना ’प्रवेश बंद’ची सूचना देत असतो. अन्य वाघाला, सिंहाला अथवा लांडग्यांच्या टोळीला या अधिकारक्षेत्राच्या आत शिकार करायची असेल, त्यातील भक्ष्यांवर आपला हक्क प्रस्थापित करायचा असेल, तर त्यांना या ’जमीनमालकांशी’ संघर्ष करुन त्यांना हाकलून लावत त्यांचे अधिकारक्षेत्र - संपूर्णपणे अथवा अंशत: - बळकावावे लागते.

माणसांच्या टोळ्यांमध्ये शिकारीचे तंत्र जसजसे प्रगत झाले, मुबलक अन्नामुळे आणि कार्यविभागणीमुळे टोळ्यांमध्ये व्यवस्था उदयाला येऊ लागली तसतसे टोळ्यांमधील मानवप्राण्यांची संख्याही वाढू लागली. यातून अन्नाची गरज वाढली आणि माणसांनाही अन्य शिकारी प्राण्यांप्रमाणे आपली हद्द निश्चित करण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्यांनी आपल्या पद्धतीने आपले शिकारक्षेत्र निश्चित करुन इतर टोळ्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी संघर्ष करण्यास सुरुवात केली.

पुढे मानव शेती नि पशुपालनाकडे वळल्यानंतर, जंगलाचा अधिवास सोडून नागर झाल्यावर ही अधिकारक्षेत्राची संकल्पना राज्य आणि देश या संकल्पनांमध्ये रूपांतरित झाली.

नैसर्गिक सामुग्रीवर एकाधिकार

पण अधिकारक्षेत्राची निर्मिती केवळ शिकार अथवा अन्नासाठीच झाली असे नव्हे. जगातील कोणत्याही सजीवाला अत्यावश्यक असलेल्या पाण्यावरील अधिकारासाठीही ते राखावे लागते. या मालिकेतील पहिल्या भागात उल्लेख केलेल्या ‘ओडिसी’मधील प्रसंगातील संघर्षाचे कारणच मुळी पाणवठ्यावरील हक्क प्रस्थापित करणे हे आहे. अलिकडे येऊन गेलेल्या ‘बुक ऑफ इलाय’ या चित्रपटातही विध्वंसोत्तर जगामध्ये पाण्याच्या स्रोतावर एकाधिकार राखून एक टोळीप्रमुख उरल्यासुरल्या मानवांवर अधिकार गाजवताना दिसतो.

ThatsMyWater
पाण्यासाठी झालेली हत्या (Lawrence of Arabia या चित्रपटातून)

लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटात एक संस्मरणीय असा प्रसंग आहे. लॉरेन्स एका स्थानिक टोळीवाल्याला वाटाड्या म्हणून सोबत घेऊन वाळवंटातून प्रवास करत असताना, वाटेत दिसलेल्या एका पाणवठ्यावर ते पाणी भरून घेतात. वायुवेगाने आलेला शरीफ अली त्या स्थानिकाला थेट गोळी घालतो. ‘हे माझ्या टोळीचे पाणी आहे हे तुला ठाऊक नसले, तरी त्याला ठाऊक होते. त्याचा गुन्हा माफीपात्र नव्हता.’ असे तो लॉरेन्सला सांगतो. सुखवस्तू, इंग्लिश लॉरेन्सला या अपरिचित व्यवस्थेचे आकलन होण्याची ती सुरूवात असते.

अन्न, आणि पाणी या दोन गोष्टी नैसर्गिकरित्या पुनर्भरण होणार्‍या आहेत. पण अधिकारक्षेत्राची संकल्पना रुजल्यानंतर अधिकाराची जाणीव झालेल्या माणसाने आता व्याजाबरोबर मुदलावरही हक्क सांगायला सुरुवात केली आहे. वृक्षांपासून लाकूड मिळवण्यापासून सुरु झालेला माणसचा प्रवास तेल आणि अन्य खनिजांचा उपसा करण्यापर्यंत पोहोचला आहे.

पुरा तयांचा वंश खणावा (४)

सिंहासारख्या शिकारी प्राण्यांमध्ये जुन्या नेत्याची सद्दी खालसा केल्यावर सिंहिणींना अजूनही बिलगून जगणारी पिल्ले नवा नेता निष्ठुरपणे ठार मारतो. पिलांचे अस्तित्व माद्यांना माजावर येण्यापासून रोखत असते आणि त्यातून त्याला जुगण्याचा आपला हक्क बजावण्याची संधी मिळणार नसते. आईपासून सुटी झालेली पिले तो ठार मारत नाही. त्यातील फक्त नरांवर हल्ले करून त्यांना पिटाळून लावतो. कारण हे नर मोठे होऊन त्याच्या प्रभुत्वाला आव्हान देतील असा समज त्याच्या नेणिवेत रुजलेला असे.

InfantKilled
Larry Gonick यांच्या The Cartoon History of the Universe या पुस्तकातून साभार.

शिकारी प्राण्यांचा वारसा सांगणार्‍या माणसाचा दृष्टिकोनही याहून वेगळा नव्हता. आपल्या टोळीतील व्यक्ती वगळता इतर सर्वच प्राणी हे संभाव्य शत्रू मानले जात. एका टोळीला दुसर्‍या टोळीबद्दल भीतीची, अविश्वासाचीच भावना सर्वात प्रबळ असणारा तो काळ होता. स्वत:ला सुरक्षित राहायचे असेल तर इतरांना निखंदून काढले पाहिजे इतपतच बुद्धीचा विकास झालेला तो काळ होता. काहीही करुन प्रतिस्पर्धी टोळीचे बल खच्ची करावे, त्यातही पुरुष नि बालके यांची सरसकट हत्या करावी. अन्यथा ती बालके पुढे मोठी होऊन शस्त्रे परजून आपल्या टोळीला धोकादायक ठरतील असा सोपा समज होता.

नागर जीवनाकडे

मानवी संस्कृतीच्या उदयकाळात माणूस हा एकाच कळपाचा अथवा टोळीचा भाग होता. ती टोळी हीच त्याच्यासाठी राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि अर्थातच सामाजिक व्यवस्थाही होती. त्यामुळे त्या टोळीतील एक व्यक्ती अथवा एकक हीच त्याची एकमेव ओळख होती.

आज तशी स्थिती उरलेली नाही. या तीन व्यवस्था स्वतंत्र वाटेने पुढे जात आहेत. त्यामुळे माणसाला या प्रत्येक व्यवस्थेअंतर्गत वेगवेगळी ओळख मिळू लागली आहे. जेव्हा या व्यवस्थांचे हितसंबंध परस्परांना छेदून जातात, तेव्हा त्याच्या कर्तव्यांमध्ये अंतर्विरोध निर्माण होतो आहे. या नागर आयुष्याने माणसाला स्वत:शीच संघर्ष करण्यास भाग पाडले आहे.

आज व्यक्तीची गटनिरपेक्ष अशी स्वतंत्र ओळखही असू शकते किंवा जन्मदत्त गटांहून वेगळ्या अशा गटाचा सदस्य म्हणूनही. एखाद्या आध्यात्मिक, वैचारिक, वैज्ञानिक, कला अथवा व्यावसायिक परंपरेचा वारसा स्वीकारून ती व्यक्ती आपली ओळख स्वत: निर्माण करू शकते. परंतु तरीही माणसांतील बहुसंख्या ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच तिची ओळख करुन घेण्याचा प्रयत्न करत असते. कारण परस्पर-संवाद अथवा आचार-विचार हा आपापल्या गटाच्या भूमिकेला अनुसरूनच करायचा असतो असा तिचा समज आजही आहे.

टोळीजीवनाच्या काळात टोळीविना माणूस ही संकल्पनाच अतर्क्य होती. जंगलवासी माणूस हा दुबळा प्राणी सहकार्‍यांच्या मदतीशिवाय जिवंत राहणे जवळजवळ अशक्यच होते. त्यामुळेच टोळीतील आपली नेमून दिलेली कर्तव्ये पार न पाडणार्‍या अथवा तिच्या हिताविरोधात कृती करणार्‍या व्यक्तीला टोळीतून बहिष्कृत केले जात असे. पुढे नागर समाजातही या बहिष्काराचे प्रस्थ कायम राहिले. आज असा सामाजिक बहिष्कार किंवा ‘वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते.

पण केवळ धार्मिक अथवा जातीय व्यवस्थांसारख्या जुनाट व्यवस्था अथवा त्यांचे पाईक तिचा वापर करतात असे नव्हे. ज्यांना अतिनागर म्हणता येईल असे नागरिकही समाजमाध्यमांमधून अमुक धर्मीयांकडून काही खरेदी करू नका, तमुक देशातील उत्पादनांवर बहिष्कार घाला, अमक्या कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमक्या अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ‘जाती’च्या माणसांना देत असतात. प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता फारशी बदललेली नाही.

CharlieHebdoCartoon

टोळ्या होत्या तेव्हा विरोधी टोळीच्या स्त्रियांवर थेट बलात्कार होत, आता रंडी/रांड वगैरे शब्दातून होतात इतकाच फरक झाला आहे. तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची दृष्टी अजूनही बदललेली नाही. प्रतिस्पर्धी टोळीतील “इतक्या लहान मुलाला का मारायचे?” असा प्रश्न जेत्या टोळीच्या ‘सैनिका’ला फारसा पडत नसे. ते वयाने वाढले की सुज्ञ होऊ शकेल यावर त्यांचा विश्वास नसे. मोठे होऊन ते ही हिंसाच करणार असा त्यांना ठाम विश्वास असे. त्यांच्या बुद्धीची कुवतच तेवढी असे, बहुसंख्येची आजही तितकीच आहे.

समूळ नाशाची ही प्रेरणा आपल्या मनाच्या तळाशी सतत खदखदत असते. या ना त्या प्रकारे ती उसळी मारुन वर येत असते. जमावाने ठार मारलेली व्यक्ती, एखादी बलात्कार झालेली अभागी स्त्री, अन्याय होऊनही न्यायव्यवस्थेकडून न्याय न मिळालेली दुर्दैवी व्यक्ती आपल्या गटाची नसेल तर बहुतेक वेळा आनंद, समाधान, निदान उदासीनता याच भावना दिसून येतात.

वारंवार बलात्कार करुन ठार मारलेल्या आठ वर्षांच्या मुलीबद्दल ‘साली बडी हो के क्या करती, आतंकवादी बनती.’ असा विचार करणारे टोळीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नसतातच. त्यातूनच एखाद्या दीड-दोन वर्षाच्या पोराचे नाव तैमूर आहे, हा धागा पकडून ऐतिहासिक तैमूरच्या कृत्यांवरुन एखादी त्याच्या जमातीचा जहरी विद्वेष करणारी, त्याच्याच वयाच्या मुलाची आई त्या बालकाचे मूल्यमापन करणारी किळसवाणी विधाने करताना दिसते.

फ्रेंच नियतकालिक ‘शार्लि हेब्दो’वर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करुन त्यातील अनेकांना कंठस्नान घातले याचा जगभर गवगवा झाला. परंतु पुढे याच शार्लि हेब्दोने दहशतवादापासून परागंदा झालेल्या आणि समुद्रावरच करुण अंत होऊन समुद्रकिनारी निष्प्राण सापडलेल्या अलान कुर्दी या छोट्याबद्दल अशीच अश्लाघ्य टिपण्णी करणारी एकाहुन अधिक भाष्यचित्रे प्रकाशित केली होती. हे नियतकालिक ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ ही त्रिमूल्यांची देणगी जगाला देणार्‍या फ्रान्समधील आहे हा दुर्विलास म्हणावा लागेल.

लढाई ते युद्ध

अधिकारक्षेत्रासाठी होणार्‍या लढायांना आज सर्वंकष अशा युद्धांचे स्वरूप आले आहे. टोळ्यांऐवजी अधिकारक्षेत्र म्हणून बस्तान बसलेले दोन देश परस्परांशी जमिनीच्या तुकड्यासाठी भाले, धनुष्यांहून कैकपट आधुनिक शस्त्रांनी युद्धे खेळत आहेत. त्यासाठी ग्लॅडिएटर्स पोसावेत तशी सैनिकांची फौज निर्माण करत आहेत. लढताना त्यांना त्वेष यावा यासाठी ‘प्रतिस्पर्धी टोळीचा कुणीही आपला शत्रूच असतो नि त्याचा ‘पुरा वंश खणावा’ हाच आपल्या प्रगतीचा रस्ता आहे’ हे आदिम तत्त्व (?) त्यांच्या मनावर बिंबवत आहेत. प्रत्यक्ष न लढणार्‍या वाचिवीरांच्या फौजांमध्ये त्यांचे ते कृत्य उदात्त वगैरे आहे ही भावना निर्माण करण्यासाठी अस्मितेचे, द्वेषाचे पीक रुजवत आहेत.

नागर समाजामध्ये टोळ्यांमध्ये नसलेली संघर्षाची अनेक नवनवीन कारणे निर्माण केली आहेत. स्वगटाबद्दलची अस्मिता हा सुस्थिर, नागर जगाने निर्माण केलेला मोठा विषडोह आहे. विशेष म्हणजे या अस्मितांचे स्रोत बव्हंशी प्राचीन असतात, ज्याची पडताळणी जवळजवळ अशक्यच असते. ‘जे आपले आहे ते– नव्हे फक्त तेच श्रेष्ठ आहे’ हा दुराग्रह असणारी ही जमात कोणत्याही समाजात बहुसंख्येनेच असते. न निवडलेल्या, अनायासे मिळालेल्या आपल्या गटाचे निर्विवाद श्रेष्ठत्व ती अत्यंत आक्रमकपणे प्रतिपादित असते.

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील असो की भारतासारख्या देशातील,बहुसंख्या ही ‘एखाद्या गुन्ह्याचा गुन्हेगार अमुक जात वा धर्माचा आहे म्हणून त्या गटातील कुणालाही त्याची शिक्षा झाली तरी ते न्याय्य आहे’ असे मानणारी असते. नऊ सप्टेंबरला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड तेथील जनतेला हवा होता. अध्यक्ष बुश यांनी ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ची भुमका उठवून इराकचा- एका मुस्लिम राष्ट्राचा विध्वंस केला आणि जनतेला ते समाधान मिळवून दिले... आणि अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाल पदरात पाडून घेतला.

वेदनेचा वारसा

हे सर्व घडवून आणणारे टोळीप्रमुख आज विविध देशांचे सुलतान, अध्यक्ष, पंतप्रधान, शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांचे मालक, माध्यमांचे मालक-संचालक बनून अधिकारक्षेत्राशिवायही भरपूर मलिदा पदरी पाडून घेत आहेत. टोळीयुद्धाप्रमाणेच या सर्वंकष युद्धांमधून पुढच्या पिढ्यांना वेदनेचा वारसा मिळतो आहे.

SashasEnd
'Enemy At the Gates' या चित्रपटातून.

छोट्या अ‍ॅन फ्रँकने तिच्या दैनंदिनीमार्फत(५) या पुढच्या पिढीची वेदना ग्रथित केली आहे. ‘एनिमी अ‍ॅट द गेट्स’(२००१) मध्ये दोन महासत्तांच्या टकरीमध्ये बळी गेलेला साशाही तुम्हा-आम्हाला हेच सांगतो आहे. ‘टर्टल्स कॅन फ्लाय’(२००४) मध्ये सुरुंग स्फोटात दोन्ही हात गमावलेला पंधरा सोळा वर्षांचा मुलगा युद्धातील अत्याचाराचे फळ वागवणार्‍या तेरा-चौदा वर्षांच्या पोरक्या बहिणीचा पोशिंदा होतो आहे... आणि तरीही घरबसल्या महासत्ता होण्याचा कैफ मिरवणार्‍यांमध्ये तारतम्य नावाचा गुण रुजताना दिसत नाही.

याचे एक कारण म्हणजे या वेदनेला प्रतिस्पर्धी टोळीच सर्वस्वी जबाबदार असल्याचे पटवून देत या पुढच्या पिढीलाही हत्यार म्हणून पुढच्या युद्धात वापरण्याचे नियोजन त्यांच्या टोळीचे मुखंड करत आहेत. त्यामुळे मनुष्य नागर झाला तरी सुसंस्कृत झाला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. टोळ्यांची व्याख्या बदललेली आहे इतकेच म्हणता येते आहे!

नात्यांचा प्रवास

प्रथम टोळी, मग नीतिनियमादि चौकटी अधिक काटेकोर होत तिचा बनलेला समाज, पुढे पुनरुत्पादन प्रक्रियेची समज आल्यानंतर रक्ताच्या नात्याने बांधले गेलेले व्यापक कुटुंब, आणि माणूस जसजसा शहरी जीवन अंगीकारता झाला तसे ते संकुचित होत उदयाला आलेली एककेंद्री कुटुंब-व्यवस्था... या मार्गे माणसाच्या नात्यांच्या प्रवास होत गेला आहे.

याचा पुढचा टप्पा बनू पाहात असलेले स्वकेंद्रितांचे दुभंग, विखंडित कुटुंब हे ‘फायनल डेस्टीनेशन’ ही अमेरिकेची संयुक्त संस्थानांची उरलेल्या जगाला देणगी आहे. विभक्त आई-वडील, शक्य तितक्या लवकर स्वतंत्र होऊ पाहणारी मुले, त्यातून भावनिक बंधांना येणारा कमकुवतपणा, कोरडेपणाही अपरिहार्यपणे येतो आहे. मग त्याची भरपाई करण्यासाठी अगदी पौगंडावस्थेपासून जोडीदाराचा शोध; नात्यांच्या वैविध्याच्या अभावामुळे त्याच्याकडून असलेल्या अनेक-पदरी आणि म्हणून अवास्तव अपेक्षा, आणि त्या अपेक्षाभंगातून येणारे टोकाचे वैफल्य... कळप-टोळी-समाज-कुटुंब या मार्गे सर्वस्वी वैय्यक्तिक जगण्यापर्यंत माणसाचा प्रवास चालला आहे!

MeMyselfAndI
https://www.freepik.com/ येथून साभार.

- oOo -

टीपा:
(१). तसे हरणे, काळवीट यांसारख्या तृणाहारींमध्ये मध्येही कळपाचा नेता असतो. पण तो प्रामुख्याने माद्यांवर हक्क प्रस्थापित करण्यापुरता असतो.
(२). बाहुबलाऐवजी आवाजी दहशत निर्माण करण्याचे कौशल्य या दोन नेतृत्वगुणांच्या आधारे नेता झालेल्यांध्ये साधारणत: राजा आणि गावगुंड यांच्यात असतो तितका फरक मानायला हवा. राजा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारीही घेतो, तर गावगुंड केवळ खंडणी गोळा करत असतो.
(३). चिंपांझी या वानरकुलातील प्राण्यांवर सुमारे साठ वर्ष अभ्यास केलेली विदुषी.
(४).
सत्तेस्तव नेत्यांस वधावे
असा जगाचा नवा शिरस्ता
पुरा तयांचा वंश खणावा
हा पुढचा प्रगतीचा रस्ता
(बा. भ. बोरकर यांच्या ’शैशविंचा व्रण तसाच वाहे’ या कवितेमधून)

(५).‘डायरी ऑफ अ यंग गर्ल’ - नाझींपासून घराच्या पोटमाळ्यावर लपून राहिलेल्या अ‍ॅन फ्रँक या डच मुलीने त्या दोन वर्षांच्या काळात लिहिलेली दैनंदिनी. जगभरातील ७० भाषांमध्ये तिचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
---

    पुढील भाग >> > कुटुंबव्यवस्था आणि वारसा


हे वाचले का?

रविवार, ५ मार्च, २०२३

’देस’: वैचारिक गोंधळाच्या कृतिशून्यतेचे नाटक

गेल्या दशका-दोन दशकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्र, देश, देशभक्ती वगैरे विचार नि भावनांचे चलनात रुपांतर झाले आहे, आणि आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एखाद्या देशाच्या चलनाप्रमाणे त्याचे अवमूल्यनही. साधारण २०१४ ते १९ दरम्यान यांचा वापर अक्षरश: सुट्या पैशांसारखा अरत्र-परत्र सर्वत्र होत होता.

पण देशभक्ती म्हणजे काय? ती केवळ एक भावना आहे, की तिला कृतीची जोडही हवी? की त्याहून पुढचे पाऊल म्हणजे कुण्या ‘गुरुजीं’च्या आदेशानुसार केलेली ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’? त्याहीपूर्वीचे प्रश्न ‘देश म्हणजे काय?’, ‘माझा देश कोणता? या दोनही प्रश्नांचे उत्तर सैद्धांतिक, बौद्धिक पातळीवर द्यायचे की केवळ अनुसरणाच्या, हा ज्याच्या त्याचा निर्णय असतो. बहुसंख्या ही अर्थातच अनुसरणाचा मार्ग निवडते.

Des

पण पुढचा प्रश्न असा असतो की ज्यांना आपण अनुसरतो, जे अनुसरतो, ते निर्दोष आहे की नाही? ज्या साध्यासाठी आपण दिलेला आदेश शिरोधार्य मानतो, त्या अनुषंगाने आवश्यक कृती विचारांचे इंद्रिय बंद करून तंतोतंत पार पाडतो, ते साध्य नि ती कृती यांचा मुळात काही मेळ असतो की नसतो? बरे हा प्रश्न विचारण्याची अनुमती अनुयायाला असते का? नसेल तर, असा मेळ अथवा कार्य-कारणभाव या दोहोंमध्ये आहे या गृहितकामागे, तो आदेश देणारे मुळात पुरेशा कुवतीचे आहेत की नाहीत याची खातरजमा हे विचारशून्य अनुयायी कशी करून घेऊ शकतात? तशी खातरजमा करायची तर प्रश्न विचारावे लागतात, विश्लेषण करावे लागते आणि अनुयायांना सैनिक मानणार्‍यांमध्ये ते त्यांना त्याची परवानगी नसते! 

ही कॅच-२२ परिस्थिती कशी सोडवायची हा बहुतेक विचारसरणींमधील मोठा तिढा असतो. कारण अनुयायाने विचार केला तर त्याचे नेत्यांशी मतभेद होऊ शकतात, आणि संघटनेमध्ये छिद्रे निर्माण होतात. आणि विचार नाही केला, तर नेत्यांच्या कुवतीवर संपूर्ण भरवसा ठेवून संघटनेचे सारे बळ पणाला लागते. नेता सुमार निघाला की पुर्‍या संघटनेची वाताहत होऊ शकते.

राष्ट्रभक्ती, धर्म आदि भावनाप्रधान बैठकीवर संघटन उभारणारे बहुधा अनुयायांना सैनिक म्हणूनच पाहात असतात. त्यांच्या संघटनेमध्ये नेता हा त्राता असतो. तो सर्वज्ञानी, श्रेष्ठ व्यक्ती मानला जातो. त्याच्या आदेशानुसार ‘राजा बोले दळ हाले’ अशी स्थिती असते. डाव्या विचारांत हे अभिप्रेत नसूनही बहुतेक डाव्या राजवटीही अशाच अधिकारारूढ झालेल्या आहेत नि चालत आहेत.

२०१४ पासून देशभक्ती, देशासाठी... वगैरे बाता फेसबुकवरच चोख स्वार्थी लोकही भरपूर उधळत होते. ‘नळाला पाणी आले नाही..’ या तक्रारीला ‘सीमापे जवान मर रहै है, और तुम एक दिन पानी के बिना रह नहीं सकते’ असे उत्तर मिळू लागले होते. एकुणात देशभक्ती हे ‘कायम चूर्ण’ किंवा ‘कैलास जीवन’ सारखी हर मर्ज की दवा म्हणून कुणीही चाटवू लागले होते.

त्याचबरोबर देशात जे काही वाईट आहे, जे काही बिघडले आहे त्याला कारण कुठला एक धर्म, कुठला एक पक्ष, कुठला एक समाज जबाबदार आहे या तर्काला बळकटी देण्याचे काम चालू होते. (पुरोगामी वर्तुळात सामाजिक, राजकीय प्रश्नांतही मध्यमवर्गीयांना ओढून आणून केलेली खापरफोड याहून काही वेगळी नाही.)

पण समाज, पक्ष, वा धर्म यांची व्याप्ती बरीच असते. त्यांना नमवण्यासाठी मोठ्या आयुधांची आणि दीर्घकालीन लढ्याची गरज असते. पण सामान्य माणूस झटपट न्यायाची अपेक्षा ठेवत असतो. बुलडोजर फिरवण्याने अथवा एखाद्याचा एन्काउन्टर करण्याने त्याला ते समाधान मिळत असते. मग ज्यांच्यावर ही कारवाई झाली तेच दोषी होते का? त्यांची बाजू ऐकणे गरजेचे नव्हते का? असे प्रश्न त्यांना - त्यातील सुशिक्षितांनाही! - पडत नसतात.

मग हे नेते लोक या गटांऐवजी त्यांचा कुठलासा एक नेता प्रातिनिधिक म्हणून निवडतात नि त्याला धडा शिकवण्याचा मार्ग शोधून काढतात. आणि देश, धर्म वगैरे आधारे आपली सत्ता प्रस्थापित करणार्‍यांचे साधन बहुधा बुद्धी नसते, ते असते झुंड आणि हत्यार! मग एखाद्याची हत्या करून ते जनतेला आपण झटपट न्याय देऊ शकतो हे ठसवू पाहतात. गंमत म्हणजे या हत्येचे हत्यार म्हणून त्याच झुंडीतल्या कुणाला चेतवून स्वत: नामानिराळे राहात असतात. ही स्ट्रॅटेजी त्यांच्या दृष्टीने ‘अपयशाचे लोकशाहीकरण आणि यशाचे केंद्रीकरण’ करण्याची असते. अपयश आले तरी खर्ची पडलेल्या मोहर्‍याच्या बदली एकाहुन अधिक उभे केले जाऊ शकतात. पण यशाचा मंदिल मात्र नेत्याच्या शिरी असतो. दुर्दैव हे की अनुयायी, भक्त म्हणवणार्‍यांना ‘त्याग आपला नि भर नेत्याची’ हे वास्तव दिसत नसते, उमजत नसते.

या शत्रूलक्ष्यी मांडणीची व्याप्ती जरी अलिकडे वाढली असली, तरी विचाराची ही पद्धत स्वातंत्र्यपूर्वकालापासून अस्तित्वात आहेच. ‘हा खरा स्वातंत्र्यलढा नाहीच’, ‘माझा देश विकला’, ‘माझ्या देशात मला ‘त्यांच्या’ हुकुमतीखाली राहावे लागणार’ वगैरे कांगावा काही संघटना तेव्हापासून करत आल्या आहेत. आजही तंतोतंत हीच हास्यास्पद नि विधाने ऐकायला मिळतात हे मौजेचे आहे.

हे सारे आठवले ते काल पाहिलेल्या ‘देस’ या हिंदी नाटकामुळे. १४ ऑगस्ट १९४७ ची मध्यरात्र जवळ येते आहे, देशाच्या स्वातंत्र्याची पहाट काही क्षणांवर येऊन पोहोचली आहे. अशा वेळी गोबेल्सला देव मानणारा कुणी एक ‘पुरुषोत्तम’ घराची नि मनाची खिडकी बंद करुन बसला आहे. त्याच्या कुण्या गुरुजींच्या आज्ञा तो तंतोतंत पाळत असतो. पण अधूनमधून तो साशंकही असतो. पण ते साशंक होणे योग्य नाही म्हणून तो पुन्हा निर्धाराने गुरुजींच्या शिकवणुकीला अनुसरण्याचा प्रयत्न करत असतो.

त्याची पत्नी ही नेहरु-गांधींना मानणारी. त्याच्या विचारातील अंतर्विरोध, त्याचे वास्तवाशी सांगड न बसणे आदि गोष्टी त्याच्या समोर ठेवत राहाते. त्यातून त्याच्या दृष्टिकोनाला आव्हान देत राहाते. परंतु समोर कधीच न येणार्‍या कुण्या गुरुजींनी देश, आपला देश, तुझा देश, तुझे कर्तव्य याबाबत वेळोवेळी मारलेल्या कोलांटउड्या सहज दिसूनही त्याचे कमकुवत मन एक भक्कम आधार म्हणून पुन्हा पुन्हा त्यांच्याकडेच वळताना दिसते.

सतत झुंडीचा भाग होऊन सुरक्षितता शोधू पाहणारा पण त्या न्यूनगंडाला झाकण्यासाठी शौर्याच्या बाता मारणारा पुरुषोत्तम हा एकुणात त्या गटातील मंडळींचा प्रतिनिधी आहे. त्याचे वास्तवाचे भान, वास्तवातील महत्त्वाच्या संक्रमणात आपला वाटा, सहभाग नसल्याने केवळ अट्टाहासाने त्याचे महत्त्व नाकारणारे गुरुजींसारखे पडद्याआडचे ‘नेते’ आणि त्यांच्या दुराग्रही आणि अतिरेकी विचारांना प्रमाण मानणारे असे अनेक पुरुषोत्तम ही या देशाची शोकांतिका आहे.

परस्परविरोधी विचारांचे पती-पत्नी नि त्यांचे द्वंद्व अशी मांडणी नुकतीच ‘प्रस्थान ऊर्फ  Exit’ या नाटकात पाहिली होती. तिथे ती प्रामुख्याने वैय्यक्तिक नि वैचारिक होती. दोन दीर्घ मोनोलॉगच नाटक हा शिक्का मारून ऐकवले गेले होते. इथे तिला आसपासच्या वास्तवाची पार्श्वभूमी आहे. ‘देस’ त्या मानाने अधिक ‘नाटक’ आहे. निव्वळ भाषण-विचारांपलिकडे जाऊन त्याला अनेक-पदरी पार्श्वभूमी आहे. शिवाय मांडणी वैचारिकतेपेक्षा प्रहसनाकडे झुकलेली आहे. पुरुषोत्तमचे विचार हास्यास्पद होत असताना ते अपेक्षितच आहे. ‘प्रस्थान’मध्ये पती-पत्नींचे दृष्टिकोन समांतर जातात, त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. इथे त्यांचा छेद जातो, ताळेबंद मांडून शिलकीचा विचारही केला जातो आहे.

थोडा खटकलेला भाग म्हणजे याचबरोबर पात्रांचा लागलेला चढा आवाज नि त्यांच्या पथनाट्याला अधिक अनुरूप असणार्‍या हालचाली. नाटक ज्या ‘द बेस’च्या लहानशा ऑडिटोरियममध्ये झाले असल्याने एरवी सर्वसाधारण क्षमतेच्या थिएटरमध्ये लावली जाणारी आवाजाची पट्टी इथे लाऊड वाटली असण्याची शक्यता आहे. दुसरे असे की गोबेल्सचा उल्लेख जरी स्पष्ट असला तरी तो हिटलरचा कुणी अधिकारी इतपतच ओळख स्पष्ट झाली. केवळ एखाद-दोन वाक्यात त्याचे म्हणणे सांगितले गेल्याने त्याचा फोटो नक्की का असा प्रश्न त्याला नाटकापूर्वी न ओळखणार्‍या प्रेक्षकाला नक्की पडणार आहे. नाटकाच्या जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख असल्याने (आणि नाटकाचा गाभा त्याच्या दृष्टिकोनाभोवती फिरत असल्याने) त्याचे व्यक्तिमत्त्व – पात्र म्हणून नव्हे– अधिक ठळक व्हायला हवे होते असे मला वाटले.

दुसरा मला – म्हणजे विचाराने एका विशिष्ट बाजूला झुकलेल्या व्यक्तीला – खटकलेला भाग म्हणजे परस्पर-समांतर कृतींना समोरासमोर ठेवून पुरूची लंगडी बाजू अधोरेखित करताना सापेक्षतेचा मुद्दा नीट विचारात न घेतल्याने एक-दोन ठिकाणी नाटककाराचा तर्क उलटला (backfired) असे माझे मत झाले. पण तेवढा अपवाद वगळता हलक्या प्रहसनाच्या स्वरूपातही वैचारिक गोंधळाचा मुख्य मुद्दा ‘देस’ने व्यवस्थित पोहोचवला एवढं मात्र नक्की.

 - oOo -

नाटक: देस
लेखक: अभिषेक मजुमदार
दिग्दर्शिका: रसिका आगाशे


हे वाचले का?