शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

नॉस्ट्याल्जिआ ऊर्फ आमचाही गणेशोत्सव

पुण्यात शुक्रवार पेठेत मंडईजवळ एका रहात असताना आम्हा पोराटोरांनीही आमचे स्वतःचे एक मंडळ स्थापन केले होते. सार्‍या गल्लीत तेवढे एकच मुलांचे गणेशोत्सव मंडळ होते. (पाच-सहा वर्षांनंतर आणखी एका वाड्यात तसा प्रयत्न झाला पण तो फसला. 'फाटाफूट नि आम्ही लै भारी' हे तेव्हाही अनुभवत होतो. :) ) सार्‍या गल्लीभर फिरून वर्गणी जमा केली जाई.

त्या परिसरात 'अखिल मंडई मंडळा'सह एकुण 'आठ' मंडळे होती/आहेत. मंडईचे मंडळ जरी वर्गणी गोळा करत नसले तरी उरलेल्या मंडळांना वर्गणी द्यावीच लागे. आजच्या प्रमाणे मंडळे थेट राजकारणी गुंडांच्या ताब्यात गेली नसली, तरी स्थानिक पुंडांच्या ताब्यात होतीच. तेव्हा तिथल्या लोकांना गणेशोत्सव म्हटले की पोटात गोळाच येत असणार. (अर्थातच आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांना ते समजावं हे वय नव्हतं.). तरीही एखाद-दुसरा खवट म्हातारा वगळला, तर बहुतेक ठिकाणी पोरांच्या गणेशोत्सवाला वर्गणी देण्यास खळखळ केली जात नसे.

छे: पण मी फारच पुढे गेलो. वर्गणी गोळा करणे हे फार पुढचे झाले.

त्या आधी श्रावणात गणेशोत्सवाचे वेध लागत. मग एक दिवस पहिली 'मीटिंग' बोलावण्यात येई. त्यावेळी मंडळाचे सारे पदाधिकारी वय वर्षे सहा पासून वय वर्षे पंधराचे असत. याहुन मोठ्यांना आमच्या 'बाल मित्र मंडळा'त प्रवेश नव्हता. अर्थात कालेजात जाऊ लागलेल्या एक दोघा मोठ्यांचे 'मार्गदर्शक मंडळ' आमच्या वेळीही होतेच. त्यांच्या 'अनुभव' वगैरे उपयोगात यावा अशी वेळोवेळी गरज पडे, विशेषतः वर्गणी जमा करताना.

पहिल्या मीटिंगचा अजेंडा अर्थातच या वर्षीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे निवडणे. आणि मंडळी सांगायला अतिशय अभिमान वाटतो एकदाही निवडणूक न होता आमचे पदाधिकारी निवडले गेले आहेत. (म.सा.प. वाल्यांनी आमच्या अनुभवातून शिकायला हवे.)

मग या 'पदाधिकार्‍यां'समोर पहिला प्रश्न असे तो डेकोरेशन काय करायचे. त्यावर थोडा खल झाल्यावर अखेर एखाद्या थोड्या अधिक 'प्रोफेशनल' कार्यकर्त्याला लक्षात येई की आपण अजून बजेट ठरवलेलेच नाही. मग वर्गणी किती जमेल, जमायला हवी याचा अंदाज घेण्यासाठी मागच्या वर्षीचं 'रेकॉर्ड' काढून पाहिले जाई. तेव्हा इन्फ्लेशन वगैरे भानगड ठाऊक नव्हती, तरीही 'या वर्षी याहून जास्त जमायला हवी.' यावर लगेचच एकमत होई.

मग वर्गणी जमा करायला कोणी जावे याची निवड करण्याचा प्रसंग येई. इथे मात्र दीर्घकाळ वाटाघाटी होऊनही काही निर्णय होत नसे. कारण हे लचांड कोणालाच गळ्यात नको असे. अखेर दादा पुता करत एक दोघांना घोड्यावर बसवण्यात येई. पण हे वीर काँग्रेसी कार्यकर्ते बनण्याच्या मार्गावर असल्याने निवांत रहात नि चार दिवसांवर उत्सव आला तरी चार दमड्या जमलेल्या नसत. मग युद्धपातळीवर सारे पदाधिकारीच झडझडून कामाला लागत नि दारोदार जाऊन वर्गणी जमा करू लागत.

माझे लक्ष आरास करण्याचे काम पदरी पाडून घेण्याकडे असे. राजू नावाचा आणखी एक प्राणी नि मी आम्हाला हे काम बहुधा मिळे. याचे एक कारण म्हणजे सुरुवातीला जरी हे खूप मानाचे वा भारी वाटले तरी ते किचकट नि दीर्घकाळ चालणारे आहे असे ध्यानात आले की एक एक करून बाकीचे पळ काढत.

हे असे घडावे म्हणून आम्ही दोघे मुद्दामच थर्माकोलचे काही बनवण्याचा बूट काढायचो. कारण साध्या ब्लेडने सरळ रेषेत थर्माकोल कापणे आम्हा दोघांनाच त्यातल्या त्यात बरे जमत असे. कधी इंजेक्शनच्या बाटल्या जमा करून त्याचे मंदिर बनवण्याचा बूट निघे. मग समोर राहणार्‍या डॉ. लेल्यांच्या वशिल्याने अनेक डॉक्टरांकडे जाऊन त्या बाटल्या जमा केल्या जात. (याच वेळी चौकातले मंडळ बीअरच्या बाटल्यांचे मंदिर बनवे, पण तेव्हा 'संस्कृतीरक्षकां'ना त्याचे काही वाटत नसे.)

मग त्यांना धुण्यासाठी कार्यकर्ते पकडून आणावे लागत. अशा वेळी बहुतेक कार्यकर्त्यांना 'मला अमूक काम हवे होते ते दिले नाही, मग मी यावर्षी मंडळात नाही.', 'अरे चाचणी परीक्षेचा अभ्यास आहे.' 'घरच्या गणपतीची आरास करायची आहे.' वगैरे एकाहुन एक सरस कारणे सुचत. मग बहुधा आम्ही एकदोघेच हे काम उरकत असू. आरास करताना कधी क्रेपच्या गुंडाळ्या आणून त्यापासून फुले बनवणे, जिलेटिन पेपर नि फर्निचरसाठी वापरल्या जाणार्‍या लिपिंग पट्ट्या वापरून एखादे लहानसे मंदिर बनवणे, त्याचा कळस बनवण्यासाठी तुळशीबागेतून जडावाच्या काचा आणून त्या एका चेंडूवर चिकाटीने चिकटवत बसणे असे उद्योग चालत.

बाप्पांसाठी करायचे पहिले काम म्हणजे मंडप उभारणे. मंडईतील बुरुड आळी जवळच असल्याने हवे तसे बांबू मिळणे खरे तर सहज शक्य असायचे. पण वेळीच हालचाल न केल्याने आणि अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवासाठी बुरुडांची जागाच ताब्यात घेतली जात असल्याने ऐनवेळी त्यांची टंचाई निर्माण होई.

मग वाड्यात असलेल्या एकदोन माळ्यांवर शोधाशोध सुरू होई. हे माळे वर्षांतून एकदाच उघडले जात. तिथे पाय ठेवला की काही सेंटिमीटर आत जातील इतकी धूळ साठलेली असे. आमचा वाडा पेशव्यांचे सरदार पानसे यांच्या वंशजांचा. तेव्हा आम्ही गमतीने पानपतावरची धूळ तिथे आणून ठेवली आहे असे म्हणायचो. तिथल्या धुळीत शिंकत खोकत शोधाशोध सुरू होई. लहान मोठ्या आकाराचे, अधेमधे खिळे असलेले, काही पोचट काही बळकट बांबू तपासून पाहिले जात. एका मापाचे चार बांबू कधीच मिळत नसत. मग त्यातल्या त्यात जुळणारे बांबू घेऊन मंडळी खाली उतरत.

बांबूची धसकटे, अधेमधे असणारे खिळे लागून झालेल्या जखमांची पर्वा न करता हे मावळे मंडपाच्या कामाला लागत. एखादा 'परफेक्शनिस्ट' गडी म्हणे 'आपण करवत आणून आधी हे सारे एका मापाचे करून घेऊ.' पण मालकीणबाईंना विचारल्याखेरीज हे कसे करायचे. हजारो वर्षे वापरात नसले तरी ते त्यांच्या मालकीचे. क्वचित याची भीती न बाळगता थेट करवत काणून कापाकापी चालू होई. पण चारही बांबूंवर करवत चालवून देखील ते एका मापाचे होत नसत. कधी कापण्याच्या फंदात न पडता तसेच वापरले जात. आमच्या मंडपाचा एखादा बांबू इतरांपेक्षा मीच मोठा म्हणून मिरवताना दिसे.

प्रत्यक्ष गणेश चतुर्थीच्या दिवशी मात्र झाडून सारे कार्यकर्ते हजर असत. सकाळपासून नुसती धांदल चालू असे. काम फार नसले, तरी आव मात्र सार्‍या जगाचा गाडा आमच्याचमुळे चालतो आहे असा असायचा.

सकाळी सकाळी मंडईत जाऊन फुले, हार नि पत्री आणली जाई. तेव्हा निवडलेल्या दुर्वांच्या तयार जुड्या मिळण्यातकी 'प्रगती' झालेली नसल्याने 'दुर्वा' नावाने आणलेली गवताची पेंडी निवडत बसणे हे काम असे. इथे महिला मंडळाला सामील करून घेतले जाई. प्रत्येकी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होई. तीन तीन पत्रे असलेल्या दुर्वा निवडून त्यांच्या जुड्या बांधल्या जात. कितीही मोठी पेंडी आणली तरी एकवीस जुड्या बनवायला ती कमीच पडे. मग कुण्या एखाद्या कार्यकर्त्याला आणखी एक आणायला धाडले जाई. तो बेटा धावत पळत जाऊन दुसर्‍या मिनिटाला पेंडी घेऊन हजर होई. काम पुढे सुरु होई.

ही पेंडी संपूनही पुरेशा जुड्या बनतच नसत. 'मी आता पुन्हा जाणार नाही.' असा दम आधीचा कार्यकर्ता देई. इतर सारे आधीच कुठल्या ना कुठल्या कारणाने पसार झालेले असत. इतक्यात एकवीस जुड्या नसल्या तरी विषम संख्येच्या चालतात, त्यांचा हार पुरेसा असतो याला 'शास्त्राधार' आहे कुणीतरी 'दुर्वानिवडक' कार्यकर्ता करून देई नि हा प्रश्न एकदाचा निकालात निघायचा.

हे सारे गोंधळ निस्तरेतो बारा वाजत. आता 'उत्सव मूर्ती' आणायला जायची वेळ होई. इतक्यात 'अध्यक्ष' कुठे दिसत नाहीत असे ध्यानात येई. थोडी शोधा शोध करता ते महाराज कोण्या नातेवाईकाच्या घरी गणपती बसवायला गेले आहेत असे ध्यानात येई. मग अध्यक्षांवर तात्पुरता अविश्वास ठराव संमत करून उपाध्यक्ष व खजिनदार उपस्थित कार्यकर्त्यांना घेऊन उत्सव मूर्ती आणायला निघत.

KidsAtGaneshotsav
छायाचित्र प्रातिनिधिक (HindustanTimes.com येथून साभार)

बारा वाजले तरी अजून गणपती का बसला नाही याची पृच्छा करायला वाड्याच्या मालकीणबाईंसह (गल्लीत फक्त आपल्याच वाड्यात गणेशोत्सव साजरा होतो याचा यांना फार मोठ्ठा अभिमान असे.) 'माडीवरची मंडळी' खाली अंगणात येत. उत्सव मूर्ती आणल्यावर प्रतिष्ठापनेची (हा शब्द तेव्हा उच्चारणे फारच थोड्यांना नेमके जमत असल्याने सरळ 'गणपती बसवणे' असा प्राकृत वाक्प्रचार वापरला जाई) तयारी सुरु होई. पूजा सुरू होणार इतक्यात 'पंचफळांचा प्रसाद' आणलेलाच नाही हे मालकीणबाई निदर्शनास आणून देत. मग याचे खापर सर्वानुमते गायब असलेल्या अध्यक्षावर फोडून एखादा कार्यकर्ता त्या कामासाठी पिटाळला जाई. मग जमतील त्या भाडेकरू नि वर्गणीदारांच्या उपस्थितीत बाप्पा एकदाचे स्थानापन्न होऊन जात.

पुढचे दहा दिवस सकाळी एकदा नि संध्याकाळी एकदा अशी दोनदा आरती केली जाई. आरतीसाठी प्रसाद बनवण्याचे काम वर्गणीदारांना आलटून पालटून देण्यात येई. इथे आश्चर्यकारक चढाओढ असे. दहातला पहिला नि शेवटचा दिवस वगळून आठ वा नऊ दिवसाचे सोळा व अठरा स्लॉट वाटून देणे हे आणखी मोठे दिव्य असे. अनेकदा एकाच स्लॉटवर एकाहुन अधिक जणांचा दावा येई. त्यामुळे कधी कधी एकाच आरतीला दोन दोन प्रसाद अशी गंमतही घडत असे.

पण पहिले दोन तीन दिवस उलटले, बाहेर सार्वजनिक मंडळांचे देखावे पुरे होऊ लागले की आरतीला येणार्‍या कार्यकर्त्यांच्या संख्येला ओहोटी लागे. संध्याकाळी तर अनेकदा मालकीणबाई मला (गर्दीचा नि प्रदूषणाचा मला त्रास होत असल्याने मी घरातच सापडायचो) नि आणखी एखाद्याला पकडून आरती उरकून घेत. किंवा त्या दिवशी प्रसाद पाठवण्याची ज्यांची पाळी असे ते कुणीच न आल्याने शेवटी स्वतःच येऊन आठवण करत नि आरती उरकून घ्यायची विनंती करत.

गणेशोत्सवाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम नि स्पर्धा. सांस्कृतिक कार्यक्रमात सार्‍या गल्लीतली पोरेसोरे 'विविधगुणदर्शन' सादर करत. हौशे-नवशे काहीही सादर करत असले तरी त्यांची कधी टर उडवली गेलेली स्मरणात नाही. हा कार्यक्रम बहुधा आमच्या वाड्याच्या अंगणात होई. गणपतीबाप्पासमोर एक सतरंजी टाकून 'स्टेज' तयार होई. बैठक प्रत्येकाने आपापली आणायची. मग खुर्च्यांपासून, चटया, सतरंज्या एवढेच काय अगदी आयत्यावेळेला आलेला एखादा महाभाग चक्क पेपर पसरून त्यावर बैठक मारायचा. एवढ्याशा अंगणात फार लोकांना बसता येत नसेच. मग काही मंडळी पहिल्या मजल्यावरच्या घरांतील खिडक्यांचा आधार घेत. कुठे सज्जा वा गच्ची नसल्याने खिडक्यांतच दाटीवाटीने बसून कार्यक्रम बघत असत.

स्पर्धा म्हटल्या तर एकदम जोरदार असत. बुद्धिबळ, कॅरम, चमचा लिंबू, पत्ते वगैरे स्पर्धा तर घेतल्या जातच पण त्याच बरोबर निबंध स्पर्धाही घेतली जाई. त्यासाठी शेजारच्या दुकानाचा बोर्ड चार पाच दिवस ताब्यात घेऊन त्यावर स्पर्धेचा तपशील लिहून तो वाड्याच्या दारावर लावून स्पर्धा 'खुली' असल्याचे जाहीर केले जाई.

बुद्धिबळात नि निबंधलेखन स्पर्धेला तर चक्क मोठा गट नि छोटा गट असे स्वतंत्र गट असायचे. बक्षीसे म्हणून पुस्तकांपासून ते मंडईतून बनवून आणलेल्या पदकांपर्यंत काय वाटेल ते दिले जाई. 'एकदा हात लावलेले प्यादे सोडून वजीर हलवला. हे चीटिंग आहे. नाहीतर मी जिंकलो असतो.', 'अमक्याने पार्शालिटी केली, ढमक्याला सगळी कामाची पानं दिली.', 'माझाच निबंध ग्रेट होता. नंबर लावणार्‍या काकांनी आपल्या वाडयातल्या मुलाला बक्षीस देऊन पार्शालिटी केली.' वगैरे कवित्व पुढचे वर्षभर चालायचे.

एक दिवस अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवला जाई. हा बहुधा स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला जोडून घेतला जाई. यात जे पदार्थ द्यायचे ते 'कार्यकर्ते' स्वतः बनवत. भेळ, पाव सँपल वगैरे बनवण्याचा घाट घातला जाई. आसपासच्या आयाबाया अर्थातच नजर ठेवून असत. ज्या घरात हा सगळा घाट घातला जाई, त्या घरच्या बाईला अधेमध्ये हस्तक्षेप करत ते खाण्यालायक राहिल याची दक्षता घ्यावी लागे. जी मंडळी उपस्थित राहू शकत नसत त्यांच्या घरी त्यांचा वाटा पोहोचता करण्यात येई.

अखेर बाप्पांच्या जाण्याचा दिवस उजाडे. हा पहिल्या दिवसाइतकाच धांदलीचा असणे अपेक्षित असे. पण याच्या उलट परिस्थिती असे. एकतर सुरुवातीचा उत्साह दहा दिवस टिकत नसे. दुसरे म्हणजे आदल्या रात्री उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने मंडळी रात्रभर जास्तीत जास्त मंडळांचे गणपती बघण्याचा प्रयत्न करत हिंडल्याने सकाळी दहापर्यंत कुणी अंथरुण सोडतच नसे.

त्यातच आणखी एक समस्या अशी असे की त्या काळी गणेशविसर्जनाची मिरवणूक फक्त आमच्या दारावरूनच जात असे. (काही काळानंतर मग टिळक रोडला दुसरी स्वतंत्र मिरवणूक सुरु झाली.) तिथे आदल्या रात्रीपासूनच अनेक बाप्पा 'नंबर' लावायला सुरुवात करत. तेव्हा सकाळी उठल्यावर आमची कार्यकर्ते मंडळी जेमतेम आन्हिके उरकून कुठले कुठले गणपती रांगेला लागलेत ते पहायला पसार होत.

दहा दिवसांची रोषणाई वा आरास या पलिकडे जाऊन खास मिरवणुकीसाठी वेगळी आरास केली जाई. कोणत्या मंडळाने मिरवणुकीसाठी काय आरास केली आहे ते आपण प्रथम पाहून येऊन इतरांना सांगण्याचे क्रेडिट घेण्याची चढाओढ चाले. आता आपल्या बाप्पाच्या विसर्जनाकडे कोणाचे लक्षच नसे. पुन्हा एकदा पहिल्या दिवसाप्रमाणेच सारी धावपळ करून बाप्पांना निरोप द्यायची सोय करावी लागे. या दिवशी तर अधिकच घाई करावी लागे. कारण दुपारी एकदा का रस्त्यावरची मिरवणूक सुरू झाली, की वाड्यातून बाहेर पडणे मुश्कील होई. आणि एकदा ती सुरु झाली की आमचे कार्यकर्ते विविध मोक्याच्या ठिकाणी जे ठिय्या देऊन बसत ते दिवसभर तिथून हलत नसत.

सर्वात दुर्लक्षिलेले काम म्हणजे मंडप उतरवणे. एकतर आता सारा उत्साह ओसरलेला, त्यातच मंडळींना सहामाही परीक्षेचे वेध लागलेले असत. तेव्हा तो बिचारा मंडप किमान महिनाभर तरी तसाच केविलवाणा उभा राही. दिवाळीची सुटी सुरु झाली म्हणजे कधीतरी फटाके उडवायला अंगण मोकळे हवे हे ध्यानात आले की तो हटवला जाई.

या सार्‍या धामधुमीत कधी पैसे देऊन ऑर्केस्ट्रा आणलाय, चित्रपट दाखवला आहे, कुणी 'बाहेरचा' येऊन काही सादर करतो आहे असे घडत नसे. अगदी अल्पोपहारासाठी द्यायच्या पदार्थापासून ते मंडप उभा करणे वा उतरवणे हे सारे करायचे ते आपले आपणच. उत्सव शेवटी आपला आहे. 

उत्सव संपल्यावरही अध्यक्षाने अध्यक्षाचे म्हणावे असे नक्की कोणते काम केले वा खजिनदाराने दुर्वा का निवडायच्या असा प्रश्न कधी पडत नव्हता. अधूनमधून रुसवे फुगवे वगैरे झाले, तरी पुढच्या वर्षीच्या पहिल्या मीटिंगला नव्या उत्साहाने सारे हजर व्हायचे.

- oOo -


संबंधित लेखन

1 टिप्पणी: