गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

समीक्षक

Sameekshak
(अनुभवातून...)
                 
अमुकचे नवीन विनोदी पुस्तक आले...
तो म्हणाला...
’ह्यॅ: सगळा मध्यमवर्गीय कचरा.
यात सामाजिक खोली नाही.’

तमुकची सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली.
तो म्हणाला...
’ह्यॅ: संकुचित परिघात फिरते.
तिला वैश्विक परिमाण नाही.’

ढमुकचा नवा कथासंग्रह आला.
तो म्हणाला...
’ह्यॅ: उगाच आव आणणारे लेखन.
घाटाचा नीट अभ्यास नाही.’

मामलुकचा नवा कवितासंग्रह आला
तो म्हणाला...
’ह्यॅ: पोज घेऊन केलेले लेखन.
त्याला अनुभवसंपृक्ततेची जोड नाही.

चापलूसचा नवा चारोळीसंग्रह आला
तो म्हणाला...
’ह्यॅ: नुसत्या अनुभवाच्या रांगोळ्या.
त्याला वैचारिक बैठक नाही.’

पामुकची नवी कादंबरी आली.
पानेही न फाडता तो म्हणाला...
’ह्यॅ: आपल्याकडे कुणाला जमणार नाही.
कथानक असे खोल उतरले पाहिजे.’


आणि...

बटाट्याच्या चाळीतला म्हाळसाकांत पोंबुर्पेकर 
आता ज्येष्ठ समीक्षक होऊन सरकारी
बिगरसरकारी पुरस्कार कमिट्यांतून
पुरस्कारासाठी लेखन निवडू लागला.

- रमताराम

- oOo - 
	

ता.क. :
सदर लेखनाची वर्गवारी 'खविटा’ हा रमताराम यांनी जगप्रसिद्ध केलेला लेखनप्रकार* आहे. चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणून स्वतंत्र स्थान मिळाले, जोगकंस हा जोडराग नसून त्याला स्वतंत्र प्रकृती आहे म्हणत कुमारांनी जसे त्याला कौशी म्हटले तद्वत रमतारामांनी खवट कवितांना खविटा म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली... नासाने देखील त्यांची दखल घेतली आहे. युनेस्को पुढच्या वर्षीपासून जागतिक खविटा-स्पर्धा सुरू करणार आहे.

* 'ह्यॅ: याला कविता म्हणता येणार नाही. याला मीटर, सेंटीमीटर काहीच नाही.’ असे प्रसिद्ध समीक्षक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर म्हटल्यामुळे त्यांनी फक्त लेखनप्रकार म्हटले आहे, काव्यप्रकार नव्हे.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा