नातवाला चौथीत
नव्वद टक्केच मिळाले
’फार लाडावून ठेवलाय
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
नातवाला पाचवीत
अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले
’अभ्यासाच्या अतिरेकात मूल चिणेल
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
शाळेतल्या गॅदरिंगमध्ये
नातीच्या नाचाचा कार्यक्रम झाला
’अभ्यास सोडून नसते धंदे,
आमच्यावेळी असं नव्हतं...' नाना म्हणाले
नातीला चौथीत
स्कॉलरशिप मिळाली.
’पुस्तकी किडे झालेत सगळे,
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
मागच्या वर्षी पाऊस
दोन दिवस उशीरा आला...
’हल्ली सदा दुष्काळच असतो
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
यावर्षी पाऊस
दीड दिवस आधी आला
’सारे ग्लोबल वॉर्मिंगचे पाप
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
एक वर्षी पूर आला,
लोक उध्वस्त झाले
’हल्ली नियोजनच नसते
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
एक वर्षी अवर्षण आले,
लोक घायकुतीला आले
’कृत्रिम पाऊस पाडा की,
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
पीक जळून गेले
शेतकरी उध्वस्त झाला,
’शेतकर्याकडे दुर्लक्ष होते आहे
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
पीक महामूर आले, भाव पडले,
सरकारने हमी भाव दिला
’शेतकरी माजलेत साले,
आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
वैतागली पुढची पिढी म्हणाली,
तुम्हीच आता घर चालवा.
’सर्वांच्या हितासाठीच मी,
आमच्यावेळी असंच होतं...’ खुशीत येऊन नाना म्हणाले
... आणि घरात पुन्हा नानांचे राज्य आले!
- रमताराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा