सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

मुंबईत वीज गेली...

  • NoElectricityNoDebate
    मुंबईत वीज गेली म्हणून
    फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना
    आणखी एक निषेधाचे पत्र लिहिले
    चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट घेतली
    दरेकरांनी गेटवेवर अर्धा तास उपोषण केले
    आणि एका राणेंनी पत्रकार परिषद घेऊन
    आदित्य ठाकरेंना जबाबदार धरले
    
    पंजाबमधील शेतकर्‍यांना पाठिंबा देणारा
    नवा लेख संजय राऊत यांनी लिहिला.
    कंगनाने ट्विट करुन त्यातील
    व्याकरणाच्या चुका जाहीर केल्या
    
    काँग्रेस नि राहुल गांधींनी काय करावे
    यावर कम्युनिस्ट विचारवंताने
    एकशे तेरावा लेख लिहिला
    आणि सायक्लोस्टाईल करुन
    आपल्या मित्रांना पाठवला
    
    माहिती अधिकाराचा वापर करुन
    मोराच्या पिसांची संख्या
    राहुल गांधीनी माहिती करुन घेतली
    कपिल सिब्बल यांनी त्याबाबत
    सोनियांकडे तक्रार केली
    
    आपले तिकिट कापण्यामागे
    मुंबई पोलिसाचे षडयंत्र असल्याचा
    गुप्त अहवाल मिळाल्याचा दावा
    गुप्तेश्वर पांडॆंनी केला आणि
    सीबीआय चौकशीची मागणी केली
    
    आपले कालचे विधान मिसक्वोट केले
    काश्मीरी जनता चीनमध्ये नव्हे
    अफगाणिस्तानमध्ये जाण्यास
    उत्सुक असल्याचा खुलासा
    फारुक अब्दुल्लांनी केला
    
    बलात्कार्‍यांना जामीन मिळाल्याची
    बातमी गायब होऊन तिथे
    'पतंजलीचे अधिकृत शेण खा
    आणि कोरोनाला पळवून लावा'
    म्हणणारी जाहिरातपट्टी
    फिरु लागली.
    
    ...
    
    वीज गेली हे तर बरेच झाले.
    टीव्हीवर हे सारे पाहण्याऐवजी
    डोळॆ फोडून घेण्याचे वाचले
    म्हणून मुंबईकर खूष झाले.
    
    - रमताराम
    
    - oOo -

संबंधित लेखन

५ टिप्पण्या: