-
१. वार्धक्याची वाटप्रत्येक माणसाच्या प्रगतीचा आलेख हा दोन टोके धरून थोडे ताणलेल्या इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा असतो. लहानपणी परावलंबी काळात ती मंद असते, पौगंडावस्थेपासून ती वेगाने होते आणि एका टप्प्यानंतर, मध्यमवयानंतर तिचा वेग कमी होतो नि माणूस चढण सोडून सपाट रस्त्यावरुन आडव्या दिशेने पुढे सरकत जातो.
वृद्धपणी भौतिक नि मानसिक पातळीवर एक स्थैर्यावस्था आलेली असते. पण तरीही भवतालामध्ये, जगण्याच्या बहुतेक पैलूंमध्ये बदल होतच असतात. ते स्वीकारण्यासाठी लागणारी स्वतंत्र बुद्धी आता वृद्धांकडे राहिलेली नसते. त्यांच्याकडची शारीरिक, बौद्धिक पुंजी ही त्यांच्या उदयकाळातील बदलांशी झगडण्यात खर्च झालेली असते. त्यामुळे आता होणारे बदल स्वीकारण्यासाठी गुंतवणूक करावी अशी ऊर्जा त्यांच्याकडे शिल्लक नसते.
प्रगतीच्या नव्या वाटा जे बदल घडवून आणत असतात, त्यातून ‘त्यांचे जग’ म्हणता येईल अशी भौतिक, समाजिक, वैचारिक पातळीवरील त्यांची आकलनाची घडी विस्कटत असते. प्रवास करून एका निश्चित ठिकाणी पोहोचण्याची मानसिकता असलेल्या माणसाला, प्रगतीच्या वेगामुळे सतत प्रवासातच असल्याची, आपले असे कुठलेच स्थान नसल्याची, उपरेपणाची भावना निर्माण होते.
एरवी मनुष्यप्राणी अधिक प्रगतीशील असला, तरी जनावरातील स्थितीशीलताही त्याच्यात अगदी सर्वाधिक कार्यक्षम अशा तारुण्यातही शिल्लक असते. त्यामुळे होता होईतो बदलाला प्रतिरोध करण्याची प्रवृत्तीही त्याच्यामध्ये बलवान असते. याचा परिणाम म्हणू ‘भूतकाळामध्ये— फारतर आपल्या उमेदीच्या काळामध्ये झालेली प्रगती पुरेशी आहे, त्यातून निर्माण झालेल्या जगण्याच्या चौकटीचे आपल्याला आकलन झाले आहे, म्हणून समाजाने आता तिथेच थांबावे म्हणजे एक स्थितीशील आयुष्य आपल्याला मिळेल’ (जनावरांचे जसे आहार, भय नि मैथुन या तीन स्तंभांवर चालते तसे) अशी वृद्धांची धारणा होत असते.
त्या धारणेला अनुसरून ते बदलांना विरोध करु लागतात. ‘पूर्वीची स्थितीच योग्य होती, नवी घातक अथवा अनावश्यक आहे,’ अशी मखलाशी ते करू लागतात. मग ‘होणारे बदल हे चुकीचे, वाईट, घातक आहेत’ असा कांगावा करत, काळाचे चक्र उलट फिरवून, ते त्यांच्या आकलनाशी सुसंगत अशा स्थिर जगामध्ये नेऊ इच्छित असतात. शक्य झाल्यास प्रगतीच्या काही अनुषंगांवर बोळा फिरवून फळ्यावर पुन्हा जुनीच गणिते मांडावीत असा आटापिटा करतात. पुन्हा नवे आकलन साध्य करावे इतकी आकलनक्षमता, ऊर्जा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये उरलेली नसते.
प्रगतीच्या सर्वच वाटा वा अनुषंगे स्वीकारार्ह असतातच असेही नव्हे. म्हणून मी ‘बदल’ असा शब्द वापरला आहे. त्याचे इष्ट-अनिष्ट दोनही प्रकारचे परिणाम होत असतात. माझा मुद्दा सरसकट नकाराचा आणि मागे जाण्यालाच ‘उपाय’– तो ही ‘हुकमी’ वा ‘एकमेव’ समजण्याचा आहे.
२. प्रेषितांचा वारसाया माघारप्रेमी माणसांची ही परागती कुठवर नेऊ इच्छिते? हे परागती-समर्थक बव्हंशी इतिहासातील त्यांच्या देशाच्या, धर्माच्या तथाकथित, काल्पनिक अशा सुवर्णकाळापर्यंत मागे जाणे इष्ट मानतात. हा सुवर्णकाळ त्यांच्या धार्मिक, पौराणिक वा भाटांनी लिहिलेल्या ऐतिहासिक पुस्तकांतून नोंदवून ठेवलेला असतो. यात ठळक कथा मुख्यत: पारलौकिकावर आधारित असलेल्या देव नावाच्या संकल्पनेभोवती रचलेल्या असतात. या अध्याहृताचे माणसाशी असणारे बंध वा माध्यम म्हणून प्रेषितांची नेमणूक झालेली असते. हे प्रेषित देवांशी संवाद साधतात नि त्या अलौकिकाकडून वेचलेले ज्ञानाचे कण मर्त्य मानवांपर्यंत पोहोचवत असतात.
प्रेषितांनी दिलेले ज्ञान आज जवळजवळ सामान्य-ज्ञान (common sense) म्हणता येईल इतके मूलभूत आहे. किंबहुना तीच त्याची ताकद वा Unique Selling Point आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ते मांडले आहे. (उदाहणार्थ बिब्लिकल धर्मांतील ‘टेन कमांडमेंट्स’ पाहा.) त्यामुळे त्यांचा ‘ग्राहक’-विस्तार मोठा आहे. ‘देव-धर्म नको म्हणता तर कशाच्या आधारावर समाजधारणा करावी?’ या प्रश्नाला ‘संविधानाच्या आधारे’ असे – माझ्या मते अमूर्त, abstract – उत्तर देणारे पुरोगामी हा महत्त्वाचा मुद्दा विसरत असतात.
प्रेषितांनी दिलेल्या या सामान्य-ज्ञानाभोवती हळूहळू कर्मकांडांचे कोट उभे केले जातात. काही चलाख धंदेवाईक धार्मिक त्या कोटावर रोषणाई करुन त्याकडे अधिक ग्राहक आकर्षित व्हावेत, जे झाले ते दुसरीकडे वळू नयेत म्हणून पहारेकरी नेमतात. अन्य धर्मांतील, त्यांच्या प्रेषितांकडील ज्ञान(?) हे छद्मज्ञान असल्याचे धोक्याचे इशारे दिले जाऊ लागतात. त्यांचे प्रेषित हे दुय्यम असल्याच्या कहाण्या रचून तो धर्म, ती परंपरा, ती व्यवस्था दुय्यम असल्याचा आभास निर्माण केला जाऊ लागतो. प्रेषितांची ज्ञानाची, कल्याणाची आस बाजूला राहून त्या ज्ञानाची फोलपटे धर्म, कर्मकांड, परधर्मद्वेषाच्या रुपात पूजली जाऊ लागतात. आमच्या धर्मपरंपरेच्या सर्वोच्च पुस्तकात किंवा प्रेषिताकडे ‘अंतिम ज्ञानाचा एकाधिकार’ असल्याची द्वाही फिरवून ज्ञानाचा प्रवाह सीलबंद करुन देव्हार्यात ठेवला जातो.
आपणाला अंतिम ज्ञान झाले असा हर्ष होतो, तो क्षण तर केवळ पूर्ण आत्मवंचनेचा तरी असतो, किंवा आपल्या लहानशा आवाक्यात जास्तीतजास्त काय आले याची अखेर कबुली असते.
(जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रवासी’ या कथेमधून)
परंतु प्रश्न असा आहे, की ‘प्रेषितांच्या काळी ज्ञान नव्हते का?’ असलेच तर त्यांनी आपले ज्ञान, आपले आकलन मांडताना ‘आपल्या पूर्वसुरींचे ज्ञान पुरेसे नाही’ असेच सूचित केले नाही का? थोडक्यात ज्ञानाची वाट ही चालत राहण्याचीच आहे असा याचा अर्थ नाही का? मग त्यांचे ज्ञान अंतिम कसे? ‘त्याच्या अथवा तिच्या जिज्ञासेची पूर्ती’ या अर्थी ते त्या व्यक्तिच्या आयुष्यातील अंतिम ज्ञान असू शकेलही. पण सर्व समाजाच्या दृष्टिने ते अंतिम ज्ञान कसे म्हणावे. प्रत्येकाच्या जिज्ञासेची जातकुळी एकच कशी असेल? प्रत्येकाला जगण्याबद्दल पडणारे प्रश्न तेच नि तेवढेच कसे असतील?
ज्या समाजामध्ये प्रगतीशील, सर्जनशील, निर्मितीक्षम विचाराला दुय्यम लेखले जाते नि वारशाला शिरोधार्य मानले जाते अशा समाजात वृद्ध मानसिकता प्रबळ असते असे म्हणता येते. भारतीय समाज हा अशा वृद्ध मानसिकतेचा आहे. भारतच का, बहुतेक देशांमधून भूतकाळातील अशा तथाकथित ‘सुवर्णकाळाकडे’ नेणार असल्याचा दावा करणारे पंथ, चळवळी, राजकीय पक्ष, नेते यांची रेलचेल असते. या सार्यांना या सुवर्णकाळाचा आधार हटकून धर्मग्रंथांतून सापडतो आणि त्यांच्या तंतोतंत मार्गदर्शनाखाली वाटचाल केल्यास तो काळ पुनरुज्जीवित करता येईल असा यांचा दावा असतो.
आजची मानवी समाजाची स्थिती पाहिली तर भगव्या, हिरव्या, पांढर्या वा निळ्या कापडात बांधलेल्या धर्मग्रंथांना कवटाळले, की जमावातील सुरक्षितता पदरी पडते. लाल वेष्टणातील पुस्तकाला शिरी मिरवले की मॉडर्न विचाराची, प्रागतिकतेची पदवी पदरी पडते. पण या दोनही सनातनवृत्तींना छेद देणारी माहिती, ज्ञान, अनुभव, विश्लेषण, दुरुस्ती या मार्गाने जाणारी वाट खर्या अर्थाने प्रागतिक म्हणायला हवी. धर्माचे प्रेषित जे ज्ञान देतात ते ‘अंतिम ज्ञान’ आहे असे आपण ठरवतो, ते नव्हेत. त्यांच्या काळीही ज्ञान या पदवीला पात्र असणारे बरेच काही होते. पण ते ‘अंतिम’ आहे असे त्यांनी मानले नाही. दोन पावले पुढे टाकून त्यांनी ‘आपले’ अंतिम ज्ञान (जर तसे म्हणायचे तर) मिळवले. आपण मात्र त्यांच्या ज्ञानाच्या पोथीला कपड्याने गुंडाळून करकचून गाठ बांधून टाकली; ना आतले काही बाहेर येवो ना बाहेरचे काही आत जावो म्हणून.
प्रेषितांनी दिलेले ज्ञान हा त्यांचा वारसा नव्हे. जिच्या आधारे त्यांनी त्यांच्या काळच्या अंतिम ज्ञानाची सीमारेषा पुढे सरकवून दिली, ती जिज्ञासा हाच त्यांचा वारसा आहे. धार्मिक वारसा असो वा मार्क्सचा, तो तंतोतंत शिरोधार्य मानून त्यांवर बांधलेल्या कर्मकांडांच्या अलवाणाच्या आधारे मार्गक्रमणा करणारेच प्रेषितांचे खरे खुनी असतात.
प्रत्येकाची जिज्ञासा, त्याचे प्रश्न वेगळे असतील तर त्याचे/तिचे अंतिम ज्ञानही वेगळेच असणार ना. आणि जोवर जगात जिज्ञासू व्यक्ती जन्माला येत आहेत तोवर ते नवनव्या प्रश्नांना भिडणारच आहेत, अंतिम ज्ञानाच्या न भरणार्या पेल्यामध्ये आपापली ओंजळ वाढवत नेणारच आहेत. करंटे आपण आहोत, जे प्रेषितांनी आपल्या पूर्वसुरींच्या शहाणपणामध्ये भर घातली हे ध्यानात न घेता त्यांना झालेल्या आकलनाला ‘अंतिम ज्ञान’ असे संबोधून त्यांच्या पोथीचा गळा आवळतो आहोत. कारण आपण जन्मजात वृद्ध आहोत!
मग प्रेषितांच्या ज्ञानाला किंमत नाही का? नक्कीच आहे. त्यांनी नैतिकतेच्या बंधनांचे, चौकटीचे महत्त्व ओळखून जमावातून, टोळ्यांतून समाज घडवण्याचा प्रयत्न केला... पुढे तथाकथित प्रगत माणसांनी पुन्हा त्यांचे टोळ्यांत रूपांतर केले हा मुद्दा अलाहिदा. पण ‘प्रेषितांचा वारसा कुठला?’ असा प्रश्न विचारला तर ‘त्यांची जिज्ञासा’ हे त्याचे उत्तर आहे. त्यांनी दिलेले आकलन ‘अंतिम सत्य’ म्हणून जाहीर करुन आपण तिची हत्या करत आहोत आणि आपला संपूर्ण समाजच वृद्धपणाच्या मानसिकतेमध्ये जगतो आहे.
३. मार्क्स आणि नेहरुधार्मिकांचे प्रेषित प्राचीनत्वाच्या साखळदंडांनी बद्ध झाले आहेत. ज्याला सर्वाधिक अर्वाचीन प्रेषित म्हणता येईल तो कार्ल मार्क्स हा अधार्मिक प्रेषित, त्याने पारलौकिकाचा आधार झुगारून शोषित, पददलित समाजाच्या उत्थानाला केंद्रस्थानी ठेवून संभाव्य समाजरचनेची मांडणी केली.
हे करत असताना – जिचा तो कट्टर शत्रू आहे असा आभास निर्माण केला जातो ती – ‘भांडवलशाही ही मानवी प्रगतीमधील एक संक्रमणशील अवस्था आहे’ असे म्हणत पददलितांच्या, गुलामांच्या, भूदासांच्या मुक्तीमधील तिचे योगदान नाकारले नव्हते. त्यापुढे जाऊन समाजवादी व्यवस्था ही देखील त्याला अपेक्षित असलेल्या साम्यवादी व्यवस्थेकडे जाण्याच्या मार्गावरचा एक आवश्यक टप्पा आहे असेही तो मानत होता. आज शंभर वर्षांनंतर कदाचित त्याने आणखी नवी अपेक्षित व्यवस्था पुढे ठेवत साम्यवादी व्यवस्था ही त्या नव्या अपेक्षित व्यवस्थेच्या मार्गावरचा अपरिहार्य थांबा मानले असते अशी शक्यताही होती.
पूर्वसुरींच्या श्रेयाला सर्वस्वी न नाकारता त्यांच्या यशापयशाच्या, बलस्थानांच्या, वैगुण्यांच्या नोंदी करत स्वत:च्या ज्ञानामध्ये भर घालत राहण्याच्या, त्याच्या आधारे आपले आकलन सुधारून घेत राहाण्याच्या, खर्या अर्थाने पुरोगामी (पुढे जाण्याच्या) त्याच्या वृत्तीमुळे माझ्या दृष्टीने तो जगातला सर्वात शहाणा माणूस ठरतो. ज्या व्यवस्थांच्या मर्यादा दाखवत आपली व्यवस्थेचा पुरस्कार तो करत होता, त्या व्यवस्थांचे ऋण मानण्याइतका मनाचा मोठेपणा त्याच्यामध्ये होता. ‘काही शतकांपूर्वीच जगातील सर्व ज्ञान निर्माण झाले, त्याला आत्मसात करणे, अनुसरणे इतकेच आपले काम आहे’ या खुज्या मानसिकतेच्या बहुसंख्येमध्ये राहून त्याची उंची अधिकच प्रकर्षाने जाणवत राहाते.
पण गंमत अशी, की आज त्याचेही ज्ञान अंतिम असल्याचे सांगणारे काही ‘कॉम्रेड पुरोहित’ही आसपास दिसतात. एक प्रकारे त्याच्या ज्ञानमार्गाला बाजूला सारून त्याच्या ज्ञानाची पठडी नि त्याला प्रेषिताच्या पातळीवर नेऊन ठेवतात. त्याच्या विचारांना, पठडीला प्रश्न विचारले, की ते आक्रमक होतात. प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी प्रत्युत्तरे, हेत्वारोप यांचा आधार घेत प्रश्नकर्त्याला धुडकावून लावू पाहातात. ‘तुमचे ज्ञान तोकडे आहे, तुम्ही आधी मार्क्स नीट समजून घ्या.’ चे आहुत/ अनाहुत सल्ले देतात. डाव्या विचारवंतांचे लेखन वाचण्याची शिफारस करून अंग झटकतात. ‘तू वाचले आहेस, तर तू दे की या प्रश्नाचे उत्तर.’ या विनंतीवर मौन बाळगतात.
हे सारे आचरण धर्मनिष्ठ समाजनिर्मिती करु इच्छिणार्यांसारखेच दिसते, पोथी नि प्रेषित वेगळे इतकेच. धार्मिकांप्रमाणे तयार विचार नि त्यांची पठडी त्यांनी आत्मसात करुन घेतलेली असून, आकलनाच्या वार्यालाही उभे राहिलेले दिसत नाहीत. आत्मसात करणे नि आकलन होणे यातील फरक बहुतेकांच्या गावीही नसतो. असा अनुभव धार्मिक नि अधार्मिक अशा दोनही प्रकारच्या मंडळींमध्ये येत असतो.
स्वातंत्र्यपूर्वकालातील नेहरु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साम्यवादी विचारांनी– विशेषत: रशियाच्या प्रगतीने प्रभावित झाले होते. परंतु पुढे त्याच्या मर्यादाही त्यांना दिसू लागल्या. भांडवलशाही प्रारुप नि साम्यवादी प्रारुप या दोन्हींच्या संमीलनाने काहीशा संकरित दृष्टिकोनाचा पुरस्कार ते करु लागले.
पुढे स्वातंत्र्यानंतर भाक्रा-नांगल धरणाच्या उद्घाटनप्रसंगी त्याला ‘नव्या जगाची तीर्थक्षेत्रे’ म्हणून नावाजणारे नेहरु त्याच्या परिणामांचा एकुण आवाका स्पष्ट होऊ लागल्यावर अशा अजस्र प्रोजेक्ट्सना ‘विनाशाची केंद्रे’ म्हणू लागले. प्रगतीच्या वाटेवर एखाद्या साधनाची, प्रकल्पाची सकारात्मक बाजू पाहात असतानाच त्याच्या नकारात्मक परिणामांबाबत डोळस असणे हा दुर्मीळ गुण यातून दिसून आला. गृहितके, पूर्वसुरींनी दिलेली प्रारुपे, यांसोबतच अनुभवसिद्ध आकलनाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले होते.
मार्क्सप्रमाणेच पं. नेहरुंच्या अनेक अनुयायांमध्ये त्यांच्या विचारांऐवजी पठडीबाजपणा रुजला. त्यांची सत्तालोलुपता जसजशी बळकट होत गेली तसतसा तोही अस्तंगतही होत गेला...
माणूस वारसा मिरवतो तो माहितीस्वरूपात सुस्थिर झालेल्या ज्ञानाचा नि ज्ञानवंतांचा; त्यांनी ते ज्ञान सिद्ध करण्यासाठी आधारभूत मानलेल्या जिज्ञासा, अनुभवसिद्धता नि आकलनाकडे बव्हंशी दुर्लक्ष करुन! मी ‘वृद्ध मानसिकता’ म्हणतो ती ही.
(क्रमश:)
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
Vechit Marquee
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
बुधवार, १८ जून, २०२५
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १ : वृद्धत्वाची जेथ प्रचिती...
बुधवार, ११ जून, २०२५
काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता
-
(मागच्या पोस्टमध्ये ‘खाण्यावरती बोलू काही’ म्हणून जे बोलायचे ते बोलून घेतले. पण आता असे लक्षात आले की अजूनही थोडे बोलायचे राहिले आहे. एखादा पदार्थ आवडला की पोट भरल्यावरही भूक असल्याची भावना शिल्लक राहाते ना, तसे काहीसे. म्हणून ही खाद्यावरची दुसरी पोस्ट, वेगळ्या वाटेवरून जाणारी.)
मराठी काव्यक्षेत्र हे निरंतर फळते-फुलते– काहींच्या मते फसफसते (म्हणजे द्रव कमी नि फेस जास्त) असे क्षेत्र आहे. माझ्या फेसबुक वास्तव्या-दरम्यान दररोज किमान दहा मराठी कवितांचे आगमन होते असा अनुभव आहे. अशा संपृक्त जगात जी विषमता दिसते, त्याने आमचे मन नेहेमी विषण्ण असते(१).
अगदी रांगोळी टिंबांच्या कहाण्या, हिमालयाची उशी करुन झोपण्याच्या वल्गना करणार्या किंवा कवितेची चूळ थुंकून जगाला भस्म करुन टाकू इच्छिणार्या महत्त्वाकांक्षा... वगैरे ‘हायर कविते’चे क्षेत्र तर सोडाच, पारंपरिक काव्यालंकारामध्येही मला ही विषमता चटकन दिसून येते.
आता हेच पाहा ना. साधे उपमांचे क्षेत्र फुले, चंद्र, काटे, आदी केवळ दृश्य पैलूंमध्ये बंदिस्त आहे, याचा आम्हाला नेहमी विषाद वाटत आला आहे. माणसाला पंचेंद्रिये असतात (आणि तरीही १४५ कोटींच्या देशांत लोक सहाव्याच्याच अधिक आहारी गेलेले दिसतात... पण तो मुद्दा अलाहिदा.) रंग, गंध, स्पर्श, चव नि स्वर यापैकी इतर चार इंद्रियानुभव उपमेच्या क्षेत्रात सुखेनैव बागडत असतात. असे असता चवीला अथवा जिंव्हारसज्ञानाला मात्र यातून कायम दूर ठेवले गेले आहे. ‘असे का?’ हे सहज समजण्याजोगे आहे.
हे बघा: तो रंग... तो गंध.. तो स्पर्श... तो स्वर... पण ‘ती’ चव. आता कळले का कारण? नसेल तर आणखी थोडे पुढे जातो.
आता यांचा अनुभव ज्या इंद्रियांकडून घ्यावा लागतो ती इंद्रिये पाहा. तो डोळा/ते डोळे, ते नाक, तो हात, तो कंठ... आणि ‘ती’ जिंव्हा!
नाही कळले? यू ब्लडी एमसीपीग्ज(२), चव नि जिंव्हा दोघीही स्त्रीलिंगी आहेत म्हणून त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पुरुषी अहंकाराने लिप्त कवि-मंडळ यांना कटाक्षाने टाळत आले आहे.
आता हेच पाहा ना. आपल्या काल्पनिक प्रियेच्या ओठांनासुद्धा गुलाबाच्या पाकळ्यांची उपमा देणारे शायर कुठल्याही नाक्यावरच्या पानाच्या ठेल्यावर, रस्त्यावर पहुडलेल्या प्रत्येक सिगरेटच्या पाकीटामागे एक या दराने सापडतात. पण वास्तवातील प्रियेच्या ओठांना एखाद्या कविने साखरेच्या कणांचे हिमबिंदू पांघरलेल्या सुक्या गुलाबजामची उपमा दिलेली ऐकली आहे कधी? अजिबात नाही!
पण तुम्ही म्हणाल: “पण गुलाबजाम मानवनिर्मित आहे, त्याची उपमा आमच्या स्वर्गीय (म्हणजे कैलासवासी नव्हे, स्वर्गातूनच जणू उतरलेली या अर्थी) प्रेम-विषयाला— (“रमतारामभाऊ, इथे तरी प्राज्ञ मराठी सोडा. ‘प्रेम-विषय’ काय, शाळेत गेल्यासारखे वाटते आहे.”) म्हणजे माशुकाला (उर्दू साली लै चावट, नुसत्या शब्दाने अंगावर मोहोर उमटतो) द्यावी का?”
बरं मग सफरचंद घेऊ. हिमाचलातून येते आणि काश्मीरची गुलाबी आठवण करुन देते. पण नाही. त्याचीही धाव बालकाच्या गालापर्यंतच. पोर मोठी झाली की कविने उपमा भरुन ठेवलेल्या ड्रम वा टाकीतून सफरचंदे हद्दपार.
गालांवरून आठवले, आपण ओठांपासून गालावर घसरलो. पुन्हा ज्ञानेंद्रियांकडे येऊ. खाद्य पदार्थांकडून पेय पदार्थांकडे सरकलो तर स्थिती किंचित सुधारते. आपल्या प्रियेच्या डोळ्यांना ‘नशीली’ म्हणणारा, थोडा धीट प्रियकर हिंदी/ऊर्दूमध्ये सापडेल; पण तो ही अंगचोर; शराब– म्हणजे दारुचा स्पष्ट उल्लेख करण्याची शक्यता खूप कमी आहे. रणांगणाचे तोंड न पाहिलेले कविदेखील प्रियेच्या डोळ्यांवरच्या भुवयांना (की भिवयांना?) धनुष्याची उपमा देतात, पण दिवाळीत ज्यावर ताव मारतात त्या कानवले ऊर्फ करंज्यांची आठवण त्यांना का होत नसावी? चवीलाही गोड असतात ते.
Magicpin appच्या X-भिंतीवरुन साभार.प्रियेच्या नाकाला फार तर पोपटाच्या चोचीची उपमा दिलेली आम्ही वाचली आहे. पण एखाद्या कविने ‘काजूकतलीसारखे शुभ्र नि धारदार’ असे म्हटलेले तुमच्या स्मरणात आहे? किंवा गोलसर, कोबीच्या गड्ड्याच्या आकाराच्या नाकाला, जुन्या कवितेच्या काळात ‘नाकाची गुंजडी’ अशी उपमा आम्ही ऐकली होती. ही गुंजडी काय याची आम्हाला काही कल्पना नाही. बहुधा गुंज या शब्दाचे लडिवाळ रूप असावे. पण त्याऐवजी ‘फणसाच्या गर्यासारखे भक्कम नाक’ अशी उपमा दिली आहे कुणी?
प्रियेच्या कुरळ्या केसांचा उल्लेख न चुकता ‘कुंतल’ असा करणार्या काव्यकर्तनकारागीरांनी ‘एखाद्या मद्यप्याला सोबत करणार्या चकलीसारखे माझे सोबती– तुझे कुंतल’ असे म्हटले आहे कधी? किंवा नितंबांपर्यंत झुळझुळणार्या (अर्थात कल्पनेमध्ये) तिच्या केशसांभाराला ‘अंधारातील सुतरफेणी’ची उपमा दिली आहे कुणी?
कितीही उदाहरणे दिली तरी कमीच आहेत. काव्यकळपातील उपमा-क्षेत्रात असलेला हा भेदभाव नाहीसा व्हावा, यासाठी आम्ही विद्रोह पुकारत आहोत. इथून पुढे आम्ही कविता लिहू तेव्हा चव, जिंव्हा– आणि म्हणून खाद्य पदार्थ, यांना यथोचित सन्मान देण्याचे वचन देत आहोत. या वचनपूर्तीच्या वाटेवरील हा पहिला काव्य-मोतीचूर. (झेंडूच्या फुलांची वा एकुणच पुष्पगुच्छाची उपमा नाकारुन आम्ही बेसन-कळ्यांना सांधणार्या लाडवाची उपमा दिली आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहोत.)
---
काव्य-मोतीचूर
१. तळून ताटात ठेवलेल्या मैद्याच्या गोळ्यासारखा मी तुझ्या ओठांत उकळत असलेल्या साखरपाकात बुडण्यास अधीर झालेला दोघे मिळून गुलाबजामसारखे अद्वितीय व्हावे म्हणून २. लाडवांसाठी खरपूस भाजलेल्या रव्यासारखा जगण्याच्या तापलेल्या तव्यावरुन तुझ्यापर्यंत पोहोचलो मी पण तू? पाणी कमी पडलेल्या पाकासारखी एका य:कश्चित वेलचीसाठी रुसून बसलेली ३. बटाट्याला पोटात घेऊन, अंगभर बेसनाचा पदर लेवुन, काहिलीवरच्या तप्त कढईतही बेभान उडी घेतलेली— तुझ्यासाठी; बेसनाचा तो पदर दूर करुन, मला कधी कवळशील(३) अशी पर्युत्सुक मी; आणि... शेजारच्या हिरव्या मिरचीचा तोरा, नि लालभडक चटणीचा बडेजाव, यांच्याकडे अतीव प्रेमाने पाहात माझ्या आर्जवांना दूर सारणारा तू ४. दुरूनच जिचा गंध यावा, नि जिच्या लालभडक दर्शनाने आत्मा अधीर व्हावा, असा मिसळीचा कट तू आणि... बटाट्यांपासून पोह्यांपर्यंत, मटकीपासून वाटाण्यापर्यंत; सार्यांमध्ये संघर्ष, तुझ्या सहवासासाठी! यांच्या निवाड्याची वाट पाहात दिङ्मूढ बसलेला शालीन फरसाण मी आपल्या परिणय-प्रसंगी, यज्ञकुंडात आहुतीसाठी सज्ज समिधेसारखा निर्लेपपणे पहुडलेला कांदा... आणि... खाली ढणढणत पेटलेला गावगन्ना अस्मितेचा(४) जाळ... ५. तुझ्या आगमनाच्या प्रतीक्षेत दह्यासारखा टांगून घेतलेला मी आता चक्क्यासारखा फुलून आलो आहे तुझा गोडवा नजरेस पडताच रोमांचाचे केशर मिसळून श्रीखंडासारखा पक्व होऊन होईन
- oOo -
टीपा:
(१). अशाच एका किंकर्तव्यमूढ स्थितीमध्ये स्फुरलेली ‘खिन्न देखणा चेहरा माझा, हुश्श: मुखातुन निसटे’ ही माझी ओरिजिनल ओळ ग्रेसने ‘खिन्न देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातुन वाजे’ अशी बदलून घेतली नि गूढतेचा त्याचा लाडका पॉईंट सर केला. थकलेला, श्रमलेला, कंटाळलेला जीव हुश्श: करेल; बिगुल कुठून आणेल? काहीही लिहायचं उगाच. पण ते जाऊ दे. आपल्या माणसाला फुल फॉन्ट-साईझमध्ये दोष द्यायचा नसतो. [↑]
(२). MCP = Male Chauvinist Pig— पुरुषी अहंकाराने लिप्त व्यक्ती. [↑]
(३). येथील श्लेष ध्यानात घ्या. [↑]
(४). वास्तविक मिसळ हा पावभाजीप्रमाणेच पोटभरु पदार्थ, पण त्याचीही अस्मिता निर्माण करणारे किमान तीन गावचे लोक आहेत. एकुणात भारतीयांना अस्मिता फार प्रिय असते. भविष्यात आप-आपल्या अंडरवेअरच्या रंगांचाही झेंडा करुन त्यावर अस्मिता-युद्धे होतील याची खात्री आहे. सर्जकता नि रचनात्मक विचार याचा संपूर्ण अभाव असलेल्या समाजात अशा थिल्लर अस्मितेचे उद्भव व्हावेत हे अगदीच सयुक्तिक आहे.[↑]
---
संबंधित लेखन: चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही
शनिवार, ७ जून, २०२५
चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही
-
पुणे विद्यापीठ हे ‘गव्हर्नर हाऊस’ असण्याच्या काळात मुख्य इमारतीच्या बरोबर समोर, कुण्या ब्रिटिश साहेबाचा ऐसपैस डायनिंग हॉल होता, भक्कम दगडी बांधकामातला. काही शतकांपूर्वी मी पुणे विद्यापीठात शिकत असताना तिथे ‘ओल्ड कॅन्टिन’ या नावाने ओळखले जाणारे एक कॅन्टिन चालवले जात असे. घरचे जेवण नसेल तर कधीमधी दुपारच्या जेवणासाठी, आणि एरवी चहापानासाठी, तिथे फेरी होत असे.
तिथे एक पोरसवदा वेटर होता. तो सदैव घाईत असे. एखाद्या टेबलपाशी ऑर्डर घेण्यास पोहोचला, म्हणून टेबलवरील दोघे-चौघे एकमेकाला विचारून ऑर्डर त्याला सांगेपर्यंत तो लगेच भटारखान्याकडे तरी पळे किंवा दुसर्या टेबलकडे तरी. सोशल मीडियावर यथेच्छ टाईमपास करुन काही कामासाठी किंवा ज्येष्ठ नागरिक आई-वडिलांसाठी वेळ द्यायचा म्हटले, हटकून ‘आयॅम किनी सो बिज्जी बाबा. इतरांसोबत इतर कामांना म्हणजे बघा, टाईमंच मिळत नाही.’ म्हणणारे लोक पाहिले, की मला त्याची आठवण होते. इतर वेटर करत तितकेच इतकेच काम करे– कदाचित कमीच. पण उगा फिरता राहून ‘आपण कित्ती काम करतो’ हे ठसवण्याचे काम चाले. आयटी इंडस्ट्रीमध्ये दिवसभर इंटरनेटवर, स्पोर्ट्स एरियामध्ये टाईमपास करुन, संध्याकाळी काम करण्यास थांबून साहेबावर इम्प्रेशन मारणारे असतात, तसा.
त्याची सतत घाई करणे नि ‘गिर्हाईक कित्ती टाईमपास करते’ असा आविर्भाव पाहून आमच्यापैकी एक-दोघे त्याच्यावर उखडून होते. आमच्या कंपूत पंडित म्हणून आमच्याहून वयाने थोडे मोठे असे कम्प्युटर लॅब इन्चार्ज होते. ते ही त्याच्यावर वैतागले होते. एकदा असेच आम्ही तिघे-चौघेजण नुकते टेबल मिळून जेमतेम बसलोच होतो, तर हा गडी आला. टेबलवर पेनने टिकटिक करत, ‘हां बोलिये’ म्हणाला. आम्ही तोंड उघडतोय तोवर वळून निघू लागला. इतक्यात पंडितांनी मागून पटकन ऑर्डर सांगितली. भटारखान्याच्या दिशेने तरातरा चाललेल्या त्या वेटरने ती ऐकली आणि भटारखान्याच्या खिडकीत जाऊन जोरात आरोळी दिली, ‘चारऽर दहिवडा-सांबाऽऽऽऽऽर’.
भटारखाना क्षणभर स्तब्ध झाला नि मग तिथे जोरदार हशा उसळला. इतक्या जोरात ऑर्डर दिली होती, की ती ऐकलेली जवळच्या दोन-तीन टेबल्सवरील मंडळीही हसली. मग चिरंजीव तणतणत आले नि ‘काय भंकस करता’ म्हणून डाफरू लागले. मग पंडितांनी त्याला रीतसर दमात घेतला.
पंडितांचे ‘दहिवडा-सांबार’ नि हा सारा किस्सा आठवण्याचे कारण हे ‘फ्राईड चिकन आईस्क्रिम सॅण्डविच’. हे केवळ मीम नव्हे, गुगल केलेत तर काही फूड-चेन्स हा प्रकार विकतात असे दिसेल.
त्याच धर्तीवर फ्राईड-ओरिओ नावाचा प्रकारही मिळतो. याच्या तर एकाहुन अधिक रेसिपीज्(?) इंटरनेटवर सापडतील. आधीच क्रीम पोटात घेतलेले ओरिओ नावाचे हे बिस्किट बटाटेवड्यासारखे पिठात लपेटून तळून खायचे म्हणे.
असे काही दिसले, की या विषम-वितरणप्रधान जगात ज्यांच्या किमान गरजाही भागत नाहीत त्यांची क्षमा मागून, ‘माणूस हा अत्यंत माजलेला प्राणी आहे आणि त्याला विकासाची नव्हे, तर काही काळ अधोगतीची, दारिद्र्याची गरज आहे’ असे म्हणावेसे वाटू लागते. तरच ही अशी नावीन्याची खायखाय जरा कमी होईल, हे असे चाळे न सुचता पुन्हा गप मिळेल ते पोटात ढकलण्याची सवय लागेल.
बरं हा खाद्य-व्यभिचार आजचा आहे असे नव्हे. आम्रखंड, आंबा-बर्फी, आंबा-वडी, मँगो-ज्यूस वगैरे व्यभिचार किमान पाच-सहा दशकांपासून आपण सहन करत आलो आहोत. पाश्चिमात्त्य मंडळी चॉकलेट केक, चॉकलेट फज; चॉकलेट आईस्क्रीमच्या ब्लॅक करंटादि विविध प्रजाती, चॉकलेट मिल्क, चॉकलेट ब्राउनी, चॉकलेट पॅनकेक वगैरे भानगडी करुन ठेवतात. मग ‘आम्हीच का मागे राहावे?’ म्हणून पुणेरी-भारतीय ‘चॉकोखंड’ नावाचा अव्वल दर्जाचा गाढवपणा बाजारात आणतात. कहर म्हणजे काही बिनपट्ट्यांचे झेब्रे(१) तो खातातही.
आम्रखंड नि चॉकलेट-आईस्क्रिमच्या हलकट निर्मात्यांनो, एक लक्षात घ्या की आंबा/आमरस(२) आणि चॉकलेट हे दोन स्वर्गीय पदार्थ महाबली हनुमंतासारखे आजन्म ब्रह्मचारी आहेत. त्यांना श्रीखंड, आईस्क्रीम, चिकन, केक, फज, पॅनकेक, ब्राउनी वगैरे पदार्थांशी व्यभिचार करायला लावू नये. आधी तुम्ही आईस्क्रीममध्ये चॉकलेट घुसवून एकाच वेळी दोघांचाही विनयभंग केला तेव्हा मी वैतागलो, पण चिडलो नव्हतो. पण हे अती होते आहे. अत्यंत अनैतिक आहे ते. उद्या बासुंदी-वडा, चिकन-खंड, कोळंबी-आईस्क्रीम असं काहीही द्याल. काही लिमिट? माणसाला आचार-धर्माची जशी गरज आहे, तसेच आचारी-धर्माचीही गरज आहे असे आमचे ठाम मत झाले आहे. तरच पाकसिद्धीगृहांतून सर्रास घडणारे हे व्यभिचार थांबवता येतील.
या किचन-व्यभिचाराचे तीन मुख्य स्रोत आहेत:
पहिला, अर्थातच खाण्याबरोबर नावीन्याचीही खाय खाय सुटलेल्या ग्राहकांसाठी सदैव तत्पर राहून चित्रविचित्र नावाने विविध डिशेस सादर करणारे गल्ली-कोपर्यातल्या गाडीपासून चकचकीत फरशा, झगझगीत दिवे, एसीची थंड हवा यांसह त्या डिशेस सादर करणारी पंचतारांकित होटेल्स. इथे ग्राहक नावीन्याच्या मागे असला, तरी खरेदी करताना खिशाचा सल्ला घेऊनच पुढे जाणारा असतो. फक्त नेहमीच्या पदार्थांचे थोडेफार वेगळे अवतार त्याला अपेक्षित असतात.
इथे प्रामुख्याने ‘वेगळेपणाच्या घाईत’ असलेल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले जाते. गल्लीच्या कोपर्यावरची गाडी अंडा-भुर्जीचे बटर, कांदा, टोमॅटो, क्वचित सिमला मिरची, चीझ वगैरे घटकांचे विविध प्रकारे ‘मिक्स अॅण्ड ड्रॉप’ प्रकार करुन ग्राहकाला पर्याय देऊ करते. वड्याबरोबर चटणीचे प्रकार, कट किंवा सांबार, मिरची, स्वतंत्रपणे वा वड्यातच मिसळलेला ठेचा असे प्रकार मिळतात.
गाडीला मागे सोडून आपण एखाद्या एखाद्या लहानशा उपाहारगृहात शिरलो, तर इथे प्रत्येक खाद्यपदार्थ स्वतंत्रपणे न देता ग्राहकाला पोटभर व्हावे नि उपाहारगृहाला पैसे अधिक मिळावेत (गाडीपेक्षा दुकानाचे खर्च अधिक, तेव्हा प्रत्येक ग्राहकाकडून पैसेही अधिक मिळावेत) या दृष्टीने पदार्थांची ‘नेमणूक’ झालेली असते. बहुधा विश्वाच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात असलेला ‘राईस प्लेट’ हा यातला आद्य ‘कॉम्बो’. त्यात कोणते पदार्थ समाविष्ट असावेत हे अनेकदा उपाहारगृहाला तिची किंमत किती ठेवायची आहे यावरुन ठरते. ती किंमत ते उपाहारगृह कोणत्या परिसरात आहे, संभाव्य ग्राहक कोणता, त्याचा आर्थिक स्तर आदि गोष्टींवर ठरते.
काही महिन्यांपूर्वी मला मिसळ-थाळी या विषयावरील ‘अमुक-तमुक’ या पॉडकास्टचा हा व्हिडिओ मिळाला. यात मिसळ-थाळीचे उलट अर्थशास्त्र दोन वाक्यांत स्पष्ट केले आहे. राईस-प्लेट जर संभाव्य ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत देण्याची खटपट असेल, तर कनवटीला चार पैसे अधिक असलेल्या ग्राहकाची ऐट म्हणून, एरवी ‘पोटभरु अन्न’(३) असलेली मिसळ ही ‘मिसळ थाळी’चा अवतार घेत असते. थोडक्यात खाण्याला खिशाचे अस्तर कायमच लागलेले असते.
इथवर खाद्यगृहांनी तयार केलेले पदार्थ ग्राहकाशी इमान राखून राहतील याची बरीचशी खात्री देता येते. कारण इथवर येणारा ग्राहक मिसळ-थाळीची मागणी करत थोडाफार माज करेल, पण त्याचे मुख्य उद्दिष्ट उदरभरण हेच असते. त्याच्याशी तो तडजोड करत नाही.
पण उपाहारगृहांना चार किंवा त्याहून अधिक चाँद लागले, की शेफच्या प्रयोगशीलतेच्या नाकातील वेसण काढून घेतली जाते. मग पदार्थ खाद्य आहे की नाही हा मुद्दा दुय्यम होऊन जातो. ग्राहकांनी आपल्या पोटाची डागडुजी करुन तो खाद्य करुन घ्यावा लागतो. हा खाद्य-व्यभिचाराचा दुसरा स्रोत.
इथे एरवी आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीमध्ये वेगवेगळ्या जातिधर्माचे, ज्यांच्यामध्ये ‘रोटी-बेटी व्यवहार’ होत नाहीत, असे मानले गेलेले घटक पदार्थ एकत्र शिजवून किंवा न शिजवून ग्राहकाच्या माथी मारले जाते. मग तळलेले आईस्क्रीम, आमरस नि ऑलिव्ह ऑईल एकाच वेळी वापरून केलेला कसलेसे पदार्थ... वगैरे मार्केटिंगच्या तंत्राचा पुरेपूर वापर करुन गरजेपेक्षा अफाट फुगलेल्या खिशांमध्ये - दणकून किंमत लावून - ओतले जात असतात.
१९७० सालातील एका बीचवरील छायाचित्र. यात एकही पोट सुटलेली वा स्थूल व्यक्ती दिसत नाही. त्यानंतर मोकाट सुटलेल्या ‘फूड-इंडस्ट्री’ने स्थूलपणाबरोबच आरोग्याचे नवे प्रश्न निर्माण केले.इथे चवही फार महत्त्वाची राहात नाही. त्या पदार्थाची ‘exotic value' ऊर्फ ‘वैचित्र्य-मूल्य’ त्याच्या विक्रीचे मुख्य कारण असते. गरजेपेक्षा कैकपट कमावल्याने - वर मिसळ-थाळीबाबत म्हटले तसे - ‘प्रीमियम खाण्या’ची तहान लागलेला, आणि ज्याची ती तहान मिसळ-थाळीहून अधिक तीव्र आहे, तो याचा ग्राहक. हा ग्राहक ढीगभर पैसे ओतून हे वैचित्र्य-मूल्य असणारे पदार्थ घशाखाली लोटतो नि वर त्याची तोंडी जाहिरात (काही वेळा ‘मीच एकट्याने का सहन करावे?’ या सुप्त विचाराने) करतो; ती बोनस म्हणायची.
दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या असंख्य नागरिकांच्या भारतीय समाजात एखाद्या भंगार विकून पोट भरणार्या बापाच्या वा रस्त्यावर फुले विकून चरितार्थ चालवणार्या आईच्या मुलालाही सत्तर-ऐंशी हजाराच्या आयफोनची लालसा निर्माण होते नि त्या हातावरचे पोट असलेल्या जीवांना पोटच्या गोळ्यासाठी ती पुरवावीही लागते.
माणूस हा असा हपापलेला प्राणी आहे. तिथे ही ‘शेजार्याने’ केलेली जाहिरात ऐकून त्या अति-कमावत्या व्यक्तिच्या जगण्याच्या परिघातील, त्याच्याहून थोड्या खालच्या स्तरातील व्यक्तिंनाही त्या पदार्थांची ‘तहान’ लागते. माणसाच्या या हपापलेपणाचा फायदा घेत, वैचित्र्यपूर्ण पदार्थ विकून माणसांची पोटे नि आपला बँक बॅलन्स दोन्हीही सुजवण्यात ही ‘फूड-इंडस्ट्री’ यशस्वी होत जाते, आणि अन्न ही गरज न राहाता समस्या होऊन जाते.
हे पुरेसे नव्हते म्हणून, आता ‘अमुक तमुक शेफ’ या नावाने चॅनेलोचॅनली मोकाट सुटलेल्या तथाकथित स्पर्धांमध्ये तर पदार्थ खाण्यालायक असतील याचीही खात्री देता येत नाही. ही पुरी जमात हे ‘नसेल तिथे गरज रुजवा’ म्हणणार्या भांडवलशाहीचे अनौरस अपत्य आहे.
तिसरा स्रोत म्हणजे ‘डाएट फूड’ तयार करण्याचे कंकण बांधून उभे असलेले वीर. या मंडळींनी अनेक उत्तमोत्तम पदार्थांची थडगी उभारली आहेत. ‘बटाटेवडा: स्टीम्ड नॉट फ्राइड’ हा माझा विनोद (तो पदार्थ सुदैवाने अद्याप बाजारात आलेला नाही) या प्रकारातला. ही मंडळी अभिमानाने ‘बेक्ड, नॉट फ्राईड’ या घोषणेसह अनेक चविष्ट पदार्थांची डाएट-कुलोत्पन्न कलेवरे तुमच्या माथी मारू पाहतात. यात परदेशी वंशाच्या चिप्सपासून भारतीय वंशाच्या चकली, करंजीपर्यंत अनेक पदार्थ येतात.
अरे बाबांनो, त्या पदार्थांमध्ये असलेली चरबी नि मीठ हेच त्यांना चव प्रदान करत असते. तेच वगळले तर केवळ ‘मी अमुक पदार्थ खाल्ला’ हे खोटे समाधान काय ते मिळते. एखाद्या कर्मकांडासारखे झाले हे. म्हणजे रस्त्यावरुन गाडी हाकत जाता-जाता एका हाताने केलेला नमस्कार चारशे मीटरवरील देवस्थानातील देवांपर्यंत, मधल्या सगळ्या जड अडथळ्यांना यशस्वीरित्या पार करुन पोहोचला, असे म्हटल्यासारखे आहे. (आणि पोहोचत असेलच, तर घरी जाऊन निवांत कोचावर बसून कर ना बाबा. दोन अडथळे नि थोडे अंतर अधिक इतकेच.)
हे वीर खरवसामध्ये साखरेऐवजी चक्क गूळ घालून (वास्तविक गूळ नि साखर यात रासायनिक नि आहारशास्त्रदृष्ट्या कोणताही फरक नाही) बेचव असा डाएट खरवस सादर करतात. कहर म्हणजे शाकाहारी मंडळींतील दांभिकांना (यांत ‘विगन’(Vegan) म्हणून मिरवणारे(४) हे सर्वात सनातनी शाकाहारी, धर्मांमध्ये जसे जैन तसे) असलेली मांस खाण्याची लालसा भागवण्यासाठी चक्क ‘वनस्पतीजन्य मांस’ निर्माण करतात. हे म्हणजे डुकराला हत्ती समजून त्याच्या पाठीवर अंबारी चढवण्यासारखे आहे. डुकराकडे हत्तीची ऐटही नसते नि बुद्धीही नसते हे ध्यानात घ्यायला हवे.
हे सारे प्रकार पाहून सदोदित शेकायला शेगडीच्या शोधात असलेल्या आमच्या भावनाकाकू चिडल्या आहेत. त्यांनी आणि अस्मितावहिनींनी ‘आमरस-मुक्ती सेना’ आणि ‘चॉकलेट चॉवनिस्ट(५) ब्रिगेड’ स्थापन करुन या विरोधात खळ्ळ् खटॅक करण्याचा निर्धार केला आहे. मँगो वा चॉकलेट आईस्क्रिम किंवा श्रीखंड विकणार्यांनो सावधान, आम्ही येत आहोत.
- oOo-
टीपा:
(१) सध्या ‘ज्युनियर ब्रह्मे’चे ‘ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स’ हे पुस्तक वाचत असल्याने त्यातील झेब्रे माझी नजर चुकवून इथे घुसले आहेत. [↑]
(२). या शब्दाबाबत आमच्या मनात नेहेमीच मोठा संभ्रम असतो.
सदर शब्द मराठी असल्याने ‘आंब्याचा रस एटले आंबरस’ अशी व्युत्पत्ती असायला हवी. परंतु यात धोका असा की ‘आंब’ हा शब्द– आज नागर जीवनात फारसा प्रचलित नसला तरी– वेगळ्याच अर्थाने वापरला जातो. हरभरा वा तत्सम झुडुपांवर पहाटेचे दव पडल्यावर त्यावर कापसापासून बनवलेल्या, सहज शोषक असा कपडा टाकून ती शोषून घेतली जाते. पोटदुखीवर इलाज म्हणून तिचा वापर होतो. मग त्या ‘आंब पासून तयार केलेले औषध म्हणजे आंबरस’ असा अर्था लागू शकतो.
म्हणून ‘आमरस’ चालवून घ्यावा का? पण हिंदी ‘आम’पासून ‘आम का रस’ ही व्युत्पत्ती सिद्ध होते. तूर्त शाळेत हिंदी लादण्याविरोधात असणार्या आमच्यासारख्या मराठी बाण्याच्या माणसाला हे सहन होत नाही.
मग आता तिसरा पर्याय म्हणजे संस्कृतचा आधार घेणे. तिथे ‘आम्र’पासून ‘आम्ररस’ अशा शब्द मिळतो. त्याचा ‘अपभ्रंश म्हणून आमरस’ हे चालवोन घेता येते. परंतु ‘ह्या संस्कृतला तातडीने गाडल्याखेरीज सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही’वाल्यांना हे चालणार नाही; आणि ‘ण’ ला ‘ण’ म्हणणारे ‘अपभ्रंश’ म्हणून नाक मुरडणार. म्हणजे हा पर्याय दोन्ही पार्ट्या रद्द करणार.
इतकं कशाला जे कुणी आंबे रस करून न खाता ‘चिरुन’ (विळी हे आयुध/साधन लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने ‘कापून’ हा शब्द आता अधिक पापिलवार झाला आहे) खातात ते “मुळात शब्दकोषात ‘आमरस’ हा शब्द हवाच कशाला?” म्हणून हटून बसणार. [↑](३). पण असल्या सामान्य पातळीवरील पदार्थाभोवती काही गावांतील काही लोकांनी अस्मितेचे बुरुजही उभे केले आहेत. माणूस हा वैचारिकदृष्ट्या भरकटलेला प्राणी आहे याचे हे उत्तम उदाहरण. [↑]
(४). विगन असणे हे अनुसरण्यासाठी कमी, मिरवण्यासाठी नि चर्चा करण्यासाठी अधिक असते. [↑]
(५). Chauvinistचा आम्ही असाच उच्चार करतो. हे चूक म्हणालात तर ञ-मॅनला त्याची लष्कर-ए-व्याकरणची फौज घेऊन पाठवू. [↑]
---
संबंधित लेखन: काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता >>