बुधवार, १७ एप्रिल, २०२४

गजरा मोहोब्बतवाला

सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) .

माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला आहे.

‘याला किस्सा, अनुभव म्हणावे का?’ असा प्रश्न कुणाला पडेल. पुरे वाचल्यावर ‘ही एक नित्य घडणारी किरकोळ, अदखलपात्र घटना आहे’ असे बहुतेकांचे मत असेल. (आणि हे खरडणे खरं तर त्यांच्याच साठी आहे.) पण हा प्रसंग माझ्या डोक्यात कायमचा घर करून राहिलेला आहे याचे कारण– कदाचित– माझी पिंडात ब्रह्मांड पाहण्याची अगोचर वृत्ती असेल. ते काही असो, तो प्रसंग आणि त्या वेळी माझ्या मेंदूचे फसफसणे इथे मांडून मोकळा होणार आहे.

---

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी घरातून बाहेर पडलो, सोसायटीचे फाटक ओलांडून नि.र. वर आलो. इथून म.र.ला जोडणारे वळण काही फुटांवर आहे. भारतीय मंडळींचा वाईट सिव्हिक-सेन्स आणि इतरांच्या सोयीचा शून्य विचार यांचा सज्जड पुरावा पाहायचा तर ‘जरा विसावू या वळणावर’.

StreetFlowerSeller
https://scroll.in/ येथून साभार.

नि.र.कडून उजवीकडे वळणावरच एक गजरेवाला उभा आहे. त्याच्या समोर काही क्रेट्स आडवे टाकून त्यावर एक फळी टाकलेली आहे. त्यावर ओतलेल्या अनाकलनीय रंगाच्या मोगर्‍याच्या फुलांवर तो पाणी मारतो आहे. त्याच्या शेजारी एका फळवाल्याने त्याच पद्धतीने पथारी लावलेली आहे. त्याच्या पायाशी फळांच्या खोक्यांतून बाहेर पडलेले गुलाबी कागद, स्पंजची जाळी, पुठ्ठे वगैरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या दोघांनी मिळून उजवीकडे वळण्यास– आणि तिकडून नि.र.कडे आत वळण्यास अडथळा निर्माण केला आहे.

नुकताच गजरा किंवा मोगरा घेऊन निघालेली एक माता, कुणी एक आजी भेटल्यामुळे तिच्याशी गप्पा मारत फळवाल्यासमोरच उभी आहे. तिचे तीन-चार वर्षांचे मूल तिचे बोट पकडून असले तरी रस्त्याच्या मधोमध उभे आहे, याची तिला जाणीव नाही. या तिघांनी मिळून नि.र.चा अर्धा रस्ता अडवलेला आहे. या दोन विक्रेत्यांच्या समोरच्या बाजूला, म्हणजे डावीकडील वळणावर आणखी एक फळवाला आपले दुकान मांडून आहे. त्यामुळे हा फळवालाआणि ते पलीकडचे मूल यांच्या मधून जेमतेम एक रिक्षा कशीबधी जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक आहे. त्यातूनच मला बाहेर पडून इच्छित स्थळाकडे प्रयाण करायचे आहे.

मी तिथे पोहोचतो न पोहोचतो, तोच म.र. वरून उजव्या बाजूने एक कार येते नि थेट त्या गजरेवाल्याच्या शेजारी थांबते. आता म.र.कडून आमच्या नि.र. कडे वळण्यासाठी तिकडून येणार्‍यांना राँग साईडने जाऊन या कारच्या पुढून काटकोनात वळण घेण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आणि तसे केलेच तरी... माता, मूल आणि आजींच्या गप्पा चालू आहेत... दोन्ही फळवाल्यांसमोर कुणीतरी उभे आहे... म्हटल्यावर ते वळलेले वाहन उरलेला रस्ता बंद करत अडकून पडणार हे नक्की झाले.

पण ते जाऊ द्या. आपल्या वाहतूक नियमांबाबत बेशिस्त देशात (एक मिनिट– चुकलो हं. आमच्या बेशिस्त गावात– तुमचे गाव गुणी आहे, ओके?) यात काय नवीन असे तुम्ही म्हणणार हे मला ठाऊक आहे. महासत्ता होण्याच्या वाटेवर सिव्हिक-सेन्स– जबाबदार सार्वजनिक वर्तणूक हा मुद्दा आपण धरत नाही. किंबहुना एकुणातच इतिहासाचा चिखल चिवडणार्‍यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये नागरिकशास्त्र तसेही दहा-वीस गुणांपुरते अंग चोरून उभे असते; बहुतेकांनी ऑप्शनला टाकलेले असते.

त्या कारची काच ऐटीत सर्रकन खाली होते. खिडकीतून गॉगल लावलेला एक ऐटबाज चेहरा बाहेर डोकावतो. शेजारी त्याचं खटलं/पत्नी/पार्टनर/जोडीदार बसलेली आहे. ऐटबाज चेहरा गजरेवाल्याला दोन गजरे मागतो. गजरेवाला प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे एकुण वीस रुपये किंमत सांगतो. ऐटबाज चेहरा ‘छे: इतक्या लहानशा गजर्‍याचे दहा रुपये? काहीही काय सांगतोस. दहाला दोन दे.’ म्हणत घासाघीस सुरू करतो. गजरेवालाही ‘खरेदी पण एवढी नाही’ वगैरे सुरू करतो. अठरा रुपये, पंधरा रुपये वगैरे एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे सुरू होते. पण गजरेवाला अजिजीने नकार देत राहतो.

ऐटबाज व्यक्तीच्या कारने म.र. आणि नि.र. दोहोंचीही कोंडी केलेली असल्याने आसपास हॉर्न वाजू लागलेले असतात. ऐटबाज चेहर्‍याशेजारच्या पत्नीच्या चेहर्‍यावर वैतागाचे भाव दिसू लागतात. अखेर ‘दे चल.’ असे म्हणत ऐटबाज चेहरा दोन गजरे घेतो आणि बायकोकडे देतो. खिशातून पाकीट बाहेर काढतो नि गजरेवाल्याच्या हातावर पंधरा रुपये टिकवतो. गजरेवाला ‘अजून पाच रुपये द्या.’ म्हणू लागतो. पण ‘नाही नाही, हे बरोबर आहेत’ असे म्हणत ऐटबाज चेहरा आपल्या अष्टलक्षी गाडीला टाच मारून भरधाव वेगाने निघून जातो.

हतबुद्ध झालेला गजरेवाला गोठलेल्या अवस्थेत काही क्षण उभा असतो. भानावर येतो नि नशिबाला बोल लावत पैसे खिशात टाकून मोकळा होतो. दरम्यान म.र. नि नि.र. दोन्ही रस्ते मोकळे झाल्याने हुश्श: करत मागचे सारे मोकाट सुटतात. गजरेवाला पुढच्या गाडीवाल्याची वाट पाहात ताटकळत उभा राहतो.

---

ऐटबाज चेहर्‍यावरचा दीड-एक हजार रुपयांचा गॉगल, जोडीदाराच्या अंगावर असलेली पाच ते सात हजारांची साडी आणि पाच ते आठ लाखांची गाडी खरेदी करताना याला पैसे कमी पडले नसावेत. गजरेवाल्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला गाडी लावून विकले जाणारे शंभर-दीडशे रुपयांचे गॉगल त्याला ‘बिलो डिग्निटी’ वाटत असावेत. चांगल्या दर्जाचे, पण अन-ब्रँडेड कपडे त्याला चालत नसावेत. पैसे देताना– देणार्‍या हातात घातलेली अंगठी पितळेची आहे की सोन्याची हे त्याला स्वत:ला खात्रीपूर्वक सांगता आले नसते. त्यात घातलेला खडा वा हिरा खरा आहे की खोटा याचीही त्याला गंधवार्ता नसते. तरीही सुवर्णकाराने सांगितलेली (आणि वर डिस्काउंटची भाषा करून थातुरमातुर कमी केलेली) किंमत त्याने निमूट मोजली असेल. पण गजरेवाल्याचे पाच रुपये मारण्यासाठी भर चौकात चालत्या गाडीत बसून त्याने पेट्रोल जाळले होते, म.र. नि नि.र. दोहोंकडे अडकलेल्या वाहनांनाही जाळण्यास भाग पाडले होते. यातून पाच रुपयांहून अधिक रकमेची नासाडी त्याने केली होती. पण याची त्याला समजच नव्हती.

यावरून मला ‘डिस्काउंट असेल तरच पुस्तक खरेदी करणार, तीनशेहून अधिक रकमेचे पुस्तक खरेदी करणार नाही,’ म्हणणारे पण बारमध्ये बसल्यावर पुर्‍या बाटलीच्या किंमतीमध्ये एक पेग विकत घेताना कोणतीही घासाघीस न करणारे, वर वेटरला उदारहस्ते टिप देणारे मित्र आठवतात. ऋण काढून सण साजरे केल्यासारखे कुवत नसताना आयफोन, आयपॅड मिरवणारे, पण आरोग्य-विमा (health-insurance) मात्र ‘महाग आहे’ म्हणून न घेणारे मित्र आठवतात. इतरांकडे आहे म्हणून चार-चाकी गाडी घेऊन पेट्रोल– चुकलो, डीजल परवडत नाही म्हणून दारी शोभेची वस्तू म्हणून उभी करुन ठेवणारे, पण त्याचवेळी पैसे वाचवण्यासाठी अर्धा रविवार– कुटुंबाला न देता, स्कूटर हाणत मंडई वा मार्केटयार्डमध्ये जाऊन आठवड्याभराची स्वस्त(?) भाजी घेऊन येण्यावर खर्च करणारे आठवतात...

आपल्या जगण्याचे प्राधान्यक्रम गंडले आहेत असे यांना वाटत नसावे का? आरोग्य-विम्यापेक्षा आयफोन हवासा वाटत असेल, तर आपल्या गरजांची व्याख्या दुसरेच कुणी करते आहे याचे भान आपल्याला कधी येईल? मुळात ज्यांच्या आठवड्याभराच्या भाजीचे एकुण बिल दोनशेच्या वर जात नाही, त्यांचे किती पैसे घाऊक खरेदी केल्याने वाचणार आहेत?

त्यावर एक पळवाट असते की तिकडे चांगली भाजी मिळते म्हणे. सोने गुंतवणूक म्हणून फायदेशीर नाही हे दाखवून दिल्यावर, ‘पण ते ल्यायलाही मिळते’ ही पळवाट जशी काढली जाते तसेच हे. ते खरे असले तरी बरोबर घट नि घडणावळ नावाचे तोट्याचे हिस्से येतात, ते मात्र मोजायचे नसतात... जसे इथे वेळ नि ऊर्जा जमेस धरायची नसते. खरा धार्मिक-खोटा धार्मिक, आर्थिक मध्यमवर्गीय वि. मानसिकतेने मध्यमवर्गीय वगैरे पळवाटा याच जातीच्या. गैरसोयीच्या, तोट्याच्या बाजूकडे दुर्लक्ष करत आपले पूर्वग्रह जपणे हा ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून, सश्रद्ध म्हणून, नास्तिक म्हणून, पुरोगामी म्हणून, धर्मराष्ट्रवादी म्हणून आपल्या प्रत्येकाची सवय असतेच. तिथे पुन्हा ‘आपला गट सोडून ती इतरांमध्येच आहे’ हा एक जास्तीचा नि सामायिक पूर्वग्रहदेखील असतो.

कौतुकाने पत्नीसाठी गजरा घेताना तो मिळाल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अधिक सुखदायक, की पाच रुपये वाचवण्याच्या खटाटोपात तिच्या चेहर्‍यावर उमटलेला वैताग? चलनात मोजलेली किंमत हे सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे मोजमाप कधीपासून झाले याचा विचार कधी करावासा वाटतो का? विकत घेतलेला ‘गजरा मोहोब्बतवाला आहे, घासाघीसीचे पंधरा रुपयेवाला नाही’ याची जाणीव बायकोला झाली तर ती अधिक आनंदी होईल ना? त्यातून नाते अधिक दृढ होईल की आठ लाखाच्या कारमध्ये बसून, दहा मिनिटे खर्च करुन, वट्ट पाच रुपये वाचवल्यानंतर?

असे प्रसंग पाहिले, की बार्गेनिंग करणार्‍या जमातीबद्दलची माझ्या मनातील तिडिक अधिक तीव्र होत जाते. आपल्या महान देशांतील हे खुजे लोक, ‘घासाघीस केली नाही तर आपल्याला फसवतील, किंवा इतरांना स्वस्त मिळेल नि आपण जास्त पैसे देऊन येऊ’ या न्यूनगंडाने पछाडलेले असतात. दुसरीकडे घासाघीस या प्रकाराने जगण्यातील अनेक वस्तूंबाबत गुणवत्तेची ऐशीतैशी होते हे यांच्या ध्यानात येत नाही. सतत स्वस्त ते उचलायचे या एकांगी भूमिकेने गुणवत्ता असलेले पण अधिक किंमतीचे उत्पादन स्पर्धेबाहेर फेकले जाते. वर हे जीव ‘दोन्हींची गुणवत्ता सारखीच आहे’ असे अट्टाहासाने प्रतिपादन करत राहतात, कारण ‘आपण गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही’ हे ते स्वत:ला नि इतरांना पटवू पाहात असतात. (दुसरीकडे ‘महाग तेच गुणवत्ता असलेले’वाली जमात असते, पण हा लेख त्यांच्यासाठी नाही.)

इतिहास हा देशाच्या प्रगतीच्या वाटेवरली क्विकसँड किंवा दलदल आहे, तसेच बार्गेनिंग करणे ही ग्राहकाच्या मनोभूमिकेतील. ही विषवल्ली उपटून टाकली तर आपली ऊर्जा, वेळ तर वाचतोच, पण खरेदीतला, उपभोगातला आनंदही अधिक निष्कलंक, निर्भेळ होत जातो. बघा एकदा प्रयत्न करून.

-oOo-


हे वाचले का?

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

हे ही असेच होते...ते ही तसेच होते

(परस्परविरोधी विचारांचे(?) झेंडे घेतलेल्या दोघांचे अनुभव.)

जय श्रीराम

TwoFlagsAlike

आमच्या सोसायटीमध्ये सलग तीन इमारती आहेत. पैकी आमच्या शेजारील इमारतीमध्ये एक उतारवयाकडे झुकलेले गृहस्थ राहतात. अयोध्येमधील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच्या उन्मादात ते अक्षरश: लहान मुलांनी हंडीच्या वेळी अथवा गणेश-विसर्जन मिरवणुकीत नाचावे तसे नाचत होते. तिकडे प्रतिष्ठापना पुरी झाल्यावर हे सोसायटीतील घरोघरी जाऊन ‘पूजा केली का?’ विचारत होते नि देवघराचा फोटो काढत होते. मला विचारल्यावर मी ‘हो’ म्हणून वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘फोटो काढायचे आहेत’ म्हणत घरात घुसू लागले. त्यांना थोपवत मी आडवळणाने कारणे सांगून वाटेला लावले.

दाराशी आलेल्या प्रचारकांकडून स्वीकारलेली अक्षत आईने त्या दिवशी देवावर वाहिलीही होती हे तिने मला नंतर सांगितले. (मला छुपा मनुवादी म्हणण्यास उत्सुक नि होश्शियार बसलेल्या स्वयंघोषित पहिल्या धारेच्या पुरोगाम्यांसाठी हा दारूगोळा माझ्याकडून सप्रेम भेट.)

दुसर्‍या दिवशी सकाळी प्रभातफेरीहून परतताना पाहिले की हे महाशय येणार्‍या जाणार्‍या अपरिचितालाही ‘जय श्रीराम’ म्हणून अभिवादन करत नाचत होते. एखाद्याचे लक्ष नसेल तर तरातरा चालत जवळ जाऊन लक्ष वेधून घेत. बहुतेक सगळे प्रति-अभिवादन करत.

मलाही ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर मी हसून हात केला. ते आणखी दोन पावले पुढे येत म्हणाले, “जय श्रीराम”. मग मी “राम राम” म्हणून अभिवादन केले. त्यावर ते ‘जय श्रीराम’ म्हणा असा आग्रह धरू लागले. म्हटलं, “आम्ही वर्षानुवर्षे असे अभिवादन करत आलो आहोत. फोनवर बोलताना परिचित, जवळची व्यक्ती असेल तर मी ‘राम राम’ म्हणूनच संवाद सुरू करतो.” त्यांना एवढंही पुरेसं नव्हतं. “पण ‘जय श्रीराम’ म्हणायला काय हरकत आहे?”

मग माझं झाकण उडलं. मी ताडकन म्हटलं, “मी कसं अभिवादन करायचं हा माझा प्रश्न आहे. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही.”

एकुणात सश्रद्धांची जुलूमजबरदस्ती हा का नवा मुद्दा नाही. सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली रस्ते अडवून दहा-दहा दिवस मांडव घालणे नि आपल्या देवाचे भक्त नसलेल्या सरसकट सर्वांची वाट अडवणे, भलेमोठे स्पीकर्स लावून त्यावर ‘जलेबी बेबी’ वाजवत सर्वांना भक्तिभाव शिकवणे, मिरवणुकांमध्ये वा एरवीही फटाक्यांची आतषबाजी करून श्रद्धाळू, पर-श्रद्धाळू, अश्रद्ध सर्वांच्याच फुप्फुसात धूर सोडून त्यांना निर्जंतुक करणे वगैरे कामे हे लोक स्वयंस्फूर्तीने करत असतात.

मी त्यांना म्हटलं, “मी ‘जय श्रीराम’ का म्हणत नाही असा प्रश्न तुम्ही विचारत असाल, तर ‘तुम्ही सर्वसमावेशक ‘राम राम’ का म्हणत नाही?’ असा प्रश्न मी विचारू शकतो. ‘राम राम’ हे आपल्या वारकरी पंथाने दिलेले अभिवादन आहे, तर ‘जय श्रीराम’ हे द्वेषमूलक राजकारणाचं अपत्य आहे. कुणीतरी दिल्लीतून ऑर्डर सोडतो म्हणून आमचा वारसा आम्ही का सोडावा?”

तोंड वेडेवाकडे करीत, “हे एक नवीनच समजलं.” म्हणून ते जवळच्या तिसर्‍याकडेच त्याने सामील व्हावे अशा अपेक्षेने पाहू लागले. त्यावर तो बिचारा ही ब्याद नको म्हणून वेग वाढवून निघून गेला. मग मी ही वस्तरा घडी करून घरी परतलो.

जय संविधान

काही काळापूर्वी माझ्या एका मित्राकरवी मला एक दीर्घ असा व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड आला. यात एका तरुणाने आपला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनुभव लिहिला होता.

त्याची पत्नी आमच्या भागातील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी अ‍ॅडमिट होती. त्यात काही गुंतागुंत होऊ लागली होती. सर्व योग्य पद्धतीने हाताळले जात असून आणि वरकरणी सर्व ठीक दिसत असूनही मुलाच्या हृदयाचे ठोके मंद होऊ लागले होते. अखेर त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने परिस्थिती गंभीर असल्याचे आणि पत्नी व मूल दोघांच्याही जिवाला धोका असल्याचे त्या तरुणाला सांगितले आणि एखाद्या अधिक अनुभवी तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान ‘सेकंड ओपिनियन’ म्हणून समोरच असलेल्या अन्य एका हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांशी हे डॉक्टर बोलले. त्यांनी त्या स्त्रीला तातडीने भरती करून घेतले. तपासणीअंती अत्यंत दुर्मीळ अशी स्थिती असल्याचे भाकित त्यांनी केले. त्यावर उपचारही सुरू केले. चोवीस तासांत त्या स्त्रीची सुखरूप सुटका झाली. मूलही सुदृढ निपजले.

हे दुसरे डॉक्टर रुग्णाला/नातेवाईकांना बारीक सारीक तपशीलासह, शक्य तितक्या सोप्या भाषेत परिस्थिती समजावून सांगत असल्याने ही पुरी केस त्यांनी त्यांनी त्या तरुणाला उलगडून सांगितली. तो तरुण बर्‍यापैकी शिक्षित असल्याने त्याला त्याचे गांभीर्य ध्यानात आले. त्याने तो सारा अनुभव लिहून काढला नि काही परिचितांना पाठवला. तो काही परिचितांमार्फत फिरत माझ्याकडे आला होता.

पहिल्या डॉक्टरकडे असता आशा सोडलेल्या त्या पती/बापाची जिवाची उलघाल, तो सारा प्रवास वाचून त्या अंती त्याची मानसिक अवस्था कशी असेल याचे दर्शन त्यातून घडत होते. हा तरुण लेखनक्षेत्राशी संबंधित नव्हता. कदाचित एरवी तो एखाद्या मुद्द्यावर सुसंगत लिहू/बोलूही शकला नसता. परंतु तो अनुभव अक्षरश: एकटाकी लिहिल्यासारखा प्रवाही भाषेत त्याने लिहिलेला होता.

यात आणखी एक वैय्यक्तिक आस्थेचा मुद्दा म्हणजे ते दुसरे डॉक्टर हे माझेही फॅमिली डॉक्टर आहेत.

हा अनुभव एका पुरोगामी, बुद्धिजीवी, लेखक वगैरेंच्या एका गटाला पाठवला. एका वंशपरंपरागत पुरोगाम्याचा तातडीने प्रतिसाद आला, “यात तो बाप ‘देवाच्या कृपेने आम्ही सारे यातून सुखरूप बाहेर पडलो.’ असे म्हणतो आहे. त्यावर तुझे काय म्हणणे आहे?” संपूर्ण अनुभव, त्यातील त्या बापाची तडफड, त्या डॉक्टरची चाणाक्ष बुद्धी व ज्ञान, पहिल्या डॉक्टरचे प्रसंगावधान यातील कशाचाही स्पर्श त्याला झाला नसावा. (कदाचित त्याने पुरे वाचलेही नसावे.) ते एक शेवटचे वाक्य धरून तो ‘जितं मया’चा डान्स करायला उगवला होता.

मी म्हटलं, “एकतर ज्याने तो मेसेज लिहिला आहे तो माझ्या मताचा असण्याची गरज आहे का? दुसरे, बोली भाषा ही नेहमीच विचारांशी कायम सुसंगत असते असे नाही. त्याक्षणी शब्दाच्या काटेकोरपणाऐवजी त्यामागची भावना लक्षात घ्यायला हवी.

“मी ही अनेकदा बोलण्याच्या ओघात ‘अरे देवा’ असा उद्गार काढतो किंवा ‘दुर्दैव’ हा शब्द वापरतो. याचा अर्थ मी त्याक्षणी देवाचा धावा करतो आहे असे नव्हे किंवा मी दैवावर विश्वास ठेवतो आहे असे नव्हे. भाषेवर परिसराचे, संवादाच्या दुसर्‍या बाजूच्या शब्दकळेचे काही संस्कार नकळत होत असतात.

माझ्या मते पुरोगामी वर्तुळात असे शब्दांशी खेळ करणं नि श्रद्धाळूंची कर्मकांडे यात काही फरक नसतो. वरच्या ‘जय श्रीराम’वाल्यासारखे कर्मठ पुरोगामी असतात. त्याला ‘राम राम’ चालत नाही, ‘जय श्रीराम’च हवा असतो, आणि इतरांनीही आपल्याच पद्धतीने अभिवादन करण्याचा अट्टाहास तो करतो. तसेच हे कर्मठ पुरोगामी तिथे ‘व्यासपीठ म्हणायचे नाही, विचारपीठ म्हणायचे’ असे बजावत असतात.

एकतर व्यासाने यांचे काय घोडे मारले मला माहित नाही. दुसरे म्हणजे खरंतर व्यासपीठ या शब्दाचा नि व्यासाचाही काही संबंध नाही. व्यस् म्हणजे मांडणे, रचना करणे- जिथे आपण बोलून मुद्द्यांची मांडणी करतो अशी पीठ म्हणजे आसनाची जागा. किंबहुना विखुरलेल्या वेदांची नीट रचना केली म्हणून व्यासाला ‘वेद-व्यास’ हे नाव पडलं(१). (त्यांचे मूळ नाव कृष्ण-द्वैपायन.) अर्थात पुरोगामी वर्तुळात एकुणच ब्राह्मण नि संस्कृत या दोहोंचेही वावडे असल्याने (एकदा मनुवादी व्हायचंच म्हटल्यावर हे ही लिहून टाकू. :) ) असा एकांगी दुराग्रह– ‘जय श्रीराम’ वाल्यासारखाच– केला जात असावा.

“पण त्या डॉक्टरचे श्रेय तो देवाला देतो आहे हे तुला खटकत नाही का?” त्याची गाडी त्याच्या स्वयंघोषित पुरोगामित्वावर (जे इतर अनेक ठिकाणी बाधित झालेले मीच दाखवून देऊ शकलो असतो) अडली होती.

मी म्हटलं,“हा एवढा दीर्घ अनुभव त्याने लिहिला त्यात कुठली पूजाअर्चा, अनुष्ठाने, गंडेदोरे केल्याचे तपशील आहेत की डॉक्टरने सांगितलेल्या माहितीचे, त्याने केलेल्या धडपडीचे? आपल्या आसपासच्या सार्‍यांशी हा अनुभव शेअर करावासा वाटला तो ‘देवाची कृपा’ म्हणून की एका डॉक्टरने दुर्मीळ स्थिती ओळखून योग्य उपचाराची तजवीज केली म्हणून?” (जी पहिल्या डॉक्टरच्या ध्यानात आलेली नव्हती, त्याला तो तर्क करता आला नव्हता. पण लगेच अडाणीपणाने ‘तो डॉक्टर कमी अकलेचा’ असा ग्रह यातून करून घ्यायचा नसतो.)

अर्थात देवाचे नाव आल्यावर त्याची पुरोगामी बाभळ बुडली ती बुडलीच. त्या व्यक्तीच्या भावना, डॉक्टरचे ज्ञान, एकुण त्या अनुभवातून दिसलेली माणसांची बांधिलकी याबद्दल बोलावे असे त्याला वाटले नाही. त्याचप्रमाणे ‘जय श्रीराम’ वाल्याला आपण आपली अभिवादनाची पद्धत दुसर्‍यावर लादणे चुकीचे आहे याचा गंधही नव्हता.

भावनेला दुय्यम मानणे हे ‘जय संविधान’ वाल्याचे लक्षण होऊ पाहते आहे, तर भावनेच्या फसफसणार्‍या फेसालाच आपले साध्य समजणे हे ‘जय श्रीराम’वाल्याचे. सदैव एकाच चष्म्यातून जगाकडे पाहात ते एकरंगी असल्याची तक्रार करण्याचा गाढवपणा मात्र दोहोंचा समान आहे.

-oOo-

(१). ही व्युत्पत्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग-प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांच्याकडून साभार.

हे वाचले का?

मंगळवार, १९ मार्च, २०२४

प्रोफाईल फोटो, आधार कार्ड आणि गणित

(स्वसोयीचा)इतिहास-भोगी, पाठांतरप्रधान अशा समाजामध्ये गणित हा विश्लेषणप्रधान विषय नावडता असणे ओघाने आलेच. गणिताची भाषा ही देश-कालाच्या सीमा उल्लंघून जाणारी असल्याने तिच्या व्याप्तीशी इमान राखायचे, तर तिचे व्याकरण स्थल-काल-समाज निरपेक्ष असावे लागते. जन्माला आल्याबरोबर अनायासे मिळालेल्या वंश, जात, धर्म, देश, समाज आदि गटांनी दिलेल्या खुंट्यांना वटवाघळासारखे उलटे लटकून जगणार्‍यांना ते परके वाटते हे ओघाने आलेच.

याशिवाय त्याच्या या सर्वसमावेशकतेमुळे त्याच्याबाबत वा त्याच्या साहाय्याने - भाषा, इतिहास, भूगोलाआधारे पेटवले जातात तसे- अस्मितेचे टेंभे वा पलिते पेटवणे शक्य नसते. त्यामुळे सदैव न्यूनगंडांच्या, भावनिक हिंदोळ्यांवर झुलणारा भारतीय समाज त्याच्याकडे पाहून नाके मुरडताना दिसतो. आणि कदाचित त्यामुळेच आजच्या वैज्ञानिक पाया असलेल्या विकासाच्या वाटेवर मैलाचा एकही दगड आपल्या नावावर करू शकत नाही. मग पाश्चात्त्य ज्ञान आणि चिनी उद्योजगता यांच्या भरवशावर चाललेल्या आपल्या जिण्यावर तथाकथित गौरवशाली इतिहासाची वाकळ पांघरून ते वास्तव झाकू पाहात असतो. आणि ते उघड करू पाहणार्‍यांना संख्याबळाच्या आधारे मुस्कटदाबी करून गप्प करत असतो.

पण ‘गणित शिकवताना संदर्भांचे स्थानिकीकरण अथवा समकालीनीकरण(१) केले तर कदाचित गणिताकडे अधिक लोक आकृष्ट होतील का?’ असा प्रश्न मला वारंवार पडतो. गणितातील बहुतेक संकल्पनांना वास्तव जगण्यातील संदर्भ असतात. वास्तवातील काही कोडी ते उलगडत असते. सर्वसामान्यांना ते समजत नसल्याने ‘गणिताचा आयुष्यात काय उपयोग?’ असा तद्दन अडाणी प्रश्न ते विचारत असतात. स्वदेशीच्या बाता मारणार्‍यांच्या घरात पाश्चात्त्य संशोधनावर आधारित चिनी उत्पादने ठासून भरलेली असतात, तसेच या अडाण्यांच्या जगण्याच्या प्रत्येक पैलूमागे गणित उभे असते. अडाण्यांचा आवाज नि संख्या नेहमीच विपुल असल्याने, बहुसंख्या हा निवाड्याचा निकष असतो तिथे हटकून अशा अडाण्यांचे अध्वर्यू अधिकारी होत असतात.

पण वर म्हटले तसे गणितानेही आपली मांडणी अधिक स्थानिक अवकाशात आणली, तर ते समजण्यास अधिक सोपे जाईल असा माझा होरा आहे. कधी कधी साध्या सोप्या गोष्टींमधून गणिताची एखादी संकल्पना चमकून जाते, तेव्हा मला ती धरून ठेवावीशी वाटते.

आजचा जमाना मोबाईल, समाजमाध्यमे, तंत्रज्ञान यांचा आहे. फोटो, रील्स, व्हिडिओ यांचा आहे. काही वेळा शाब्दिक विनोदाचे पारंपरिक माध्यमही या अर्वाचीन मंडळींमध्ये घुसखोरी करते. अशाच एका रीलमध्ये एक विनोद वाचण्यात आला. त्यात असं म्हटलं होतं की ‘तुम्ही तुमच्या (समाजमाध्यमी) प्रोफाईलमध्ये दिसता तेवढे देखणे नसता. पण तुम्ही तुमच्या आधारकार्डवरील फोटोमध्ये दिसता तेवढे कुरूपही नसता.’

TwoPhotos

समाजमाध्यमांवर आपले अवास्तव भौतिक वा वैचारिक व्यक्तिमत्त्व उभे करणार्‍यांवर यातून टीकेचा बाण सोडलेला होता. पण हे करतानाचा देशाच्या UIDAI या संस्थेतर्फे देशांतर्गत ओळखपत्र ऊर्फ ‘आधार कार्ड’(२) प्रसृत करण्यासाठी जी व्यवस्था उभी केली गेली आहे, त्यातील वैगुण्यावरही बोट ठेवते. सरकारी व्यवस्थेने देऊ केलेल्या भयानक गुणवत्तेच्या त्या कॅमेर्‍यांमधून निघालेले ते फोटो माणसाच्या मूळ चेहर्‍या-मोहर्‍यापासून इतके फटकून असतात, की त्या फोटोंच्या अनुषंगाने असंख्य विनोद प्रसृत होत असतात. वर उल्लेख केलेला त्यातीलच एक.

थोडक्यात हे दोनही फोटो तुमच्या मूळ चेहर्‍या-मोहर्‍याचे अनुक्रमे अति-देखणे आणि अति-विरूप असे संभाव्य-चित्र(possibility) असतात. सौंदर्य-विषयक मोजमापाचा विचार करता प्रत्यक्षात तुमचा चेहरा या दोहोंच्या मध्ये कुठेतरी असतो. हे डोक्यात आल्यावर मला गणितामधील convex-combination संकल्पनेची आठवण झाली.

A आणि B या दोन संख्यांच्या मधील कोणतीही संख्या(C) ही C= alpha*A + (1-alpha)*B या सूत्राने मांडता येते. alpha ही ० आणि १ यांच्यामधील संख्या असते. alpha चे मूल्य म्हणून कोणतीही संख्या घेतली तरी C चे मूल्य कायमच A आणि B यांच्या मूल्यांदरम्यान (min(A,B) <= C <= max(A,B))(३) राहात असते. गणितामध्ये आणि पुढे संगणकीय गणितामध्ये ‘शोध’ (search) ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते. आणि असा शोध अनेकदा या alpha चा शोध म्हणून रूपांतरित होतो. पण त्याकडे जाण्याचे आपल्याला कारण नाही.

तर पुन्हा फोटोंकडे यायचे झाले तर ढीगभर फोटोंमधून त्यातल्या त्यात चांगला निवडून अपलोड केलेला, फोटोशॉप केलेला वा फिल्टर लावून काढलेला तुमचा समाजमाध्यमी चेहरा हा तुमच्या चेहर्‍याची कमाल (best) शक्यता अथवा अंदाज आहे. उलट– निवडीची, फिल्टर लावण्याची, फोटोशॉप दुरुस्तीची कोणतीही सोय न मिळालेला (कदाचित) उठावदार नसलेली पार्श्वभूमी, पुरेसा नसलेला उजेड आणि मुख्य म्हणजे दुय्यम तंत्रज्ञान असलेला कॅमेरा यांनी काढलेला तुमचा आधार-कार्डवरील फोटो हा तुमच्या चेहर्‍याची किमान (worst) शक्यता अथवा अंदाज आहे.

आता समजा एखाद्या समाजमाध्यमी बबडूने त्याला आवडलेल्या एखाद्या बबडीच्या देखण्या फोटोंना लाईक कर-करून आणि मेसेजेसद्वारे ‘J1 झालं का?’ विचारून भेटण्यास रुकार मिळवला, नि नेमका त्यावेळी बबडीच्या माजी बंडूने त्याला बबडीच्या (त्याने चोरलेला ?) आधार कार्डचा फोटो पाठवला तर... त्यावरील फोटो पाहून बबडूचे चित्त द्विधा होईल. आधार आधारभूत मानले तर बबडूला भेटण्याची इच्छाच होणार नाही. तर तिच्या समाजमाध्यमी फोटोकडे पाहून ‘जातानाच अंगठी घेऊन जावी का?’ हा प्रश्न त्याच्या डोक्यात घोळू लागतो. मग आता त्याने काय करावे? उद्या खरोखरच भेटीची वेळ येईल, तेव्हा कितपत देखणेपण त्याने अपेक्षित ठेवावे?

मी सांगतो. गणिताचा आधार घ्यावा. वर सांगितलेल्या convex-combination संकल्पनेच्या आधाराने अंदाज घेण्यासाठी त्याने या दोन फोटोंमधला बबडीचा चेहरा कसा असेल याचा alpha किती असेल याचा अदमास घ्यावा. आता तुम्ही विचाराल, ‘तो कसा?’ तर गणितामध्ये अशा अ-ज्ञात (unknown) संख्यांच्या निश्चितीसाठी करतात तेच इथे करावे, डेटाचा आधार घ्यावा(४).

बबडीने स्वत:चे, इतरांसोबतचे, विविध ठिकाणांवरचे, होटेलमधले, टपरीवरचे असे अनेक फोटो अपलोड केलेले असतात ते पाहावेत. हे सारे वरच्या दोन टोकाचे रूप दाखवणार्‍यांच्या अधेमध्ये असतात, त्यांचे प्रत्येकाचे alpha असतात. आता या सार्‍या alpha ची सरासरी काढावी. आता देखणेपणामध्ये बबडीच्या आधार-कार्ड फोटोपासून या मिळालेल्या उत्तराइतक्या अंतरावर असलेला चेहरा डोळ्यासमोर आणा. हा अंदाज बबडीच्या मूळ चेहर्‍याशी बराचसा मिळताजुळता असेल असे गृहित धरायला हरकत नाही.

बघा, गणिताने जगण्यातील सर्वात अवघड प्रश्नही चुटकीसरशी सोडवला की नाही? पटलं तर घ्या. नाहीतर इतिहासाचे टेंभे-झेंडे आणि वर्तमानात डोक्यावर घेतलेल्या नेत्यांचे सदरे-टोप्या आहेतच मिरवायला.

-oOo -

(१). वैय्याकरणांनो, हा शब्द मंजूर करा प्लीज.
(२). ‘हे अमुक गोष्टींसाठी ग्राह्य नाही, तमुकसाठी ग्राह्य नाही’ असे अंतरिम फतवे वा खुलासे सरकारे करत असल्याने याच्या उपयुक्ततेची नक्की व्याप्ती काय हे ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकणार नाही.
(३). नाही, यात 2*A*B एस्क्ट्रा मिळत नाहीत!
(४). ‘आले याचे संख्याशास्त्र, तरी म्हटलं अजून घसरला कसा नाही’ असं कोण म्हणालं ते. ऐकलं मी.


हे वाचले का?

बुधवार, ६ मार्च, २०२४

दीक्षितांच्या जगन्नाथाप्रत–

(ज. के. उपाध्ये यांची क्षमा मागून...)

‘घसरतील पँट जरा, मम डाएट अनुसरता’।
वचने ही गोड-गोड देशि जरी आता ॥ध्रु.॥
	
सलाड समोरी आल्यावर भूक ही निमाली । 
चमचमीत खाद्य विविध, विविध पेयेही स्मरली ।
गुंतता तयांत, कुठे वचन आठविता ॥

स्वैर तू पतंग, जनि भाषण झोडणारा । 
‘सहजी होय वजन-घट’, नित ऐसे फेकणारा ।
दाविशी कुणी, ‘हा पाहा, कसा लठ्ठ होता’ ॥

जठरातील या भूक, तुज जाणवेल का रे ?
जिंव्हा नच, कृत्याच(१) कवण, उमगेल का रे ?
यापरता दृष्टिआड होऊनि जा आता ॥
 
- oOo -
(१). एक राक्षसी, विशिष्ट विध्वंसक हेतू मनात ठेवून तंत्रसाधनेच्या आधारे जिची निर्मिती वा आवाहन केले जाते.

हे वाचले का?

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

फेक-फेसबुक, फसवणूक आणि गुंतवणूक

गेल्या दोन वर्षांत भांडवल-बाजाराने दिलेला जोरदार परतावा पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे. एरवी ‘शेअर बाजार म्हणजे सट्टेबाजी’ असे टोकाचे मत घेऊन जगणार्‍यांचे कुतूहलही जागे झाले आहे... साधारण पंधरा वर्षांपूर्वीच्या ‘बुल-रन’च्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तेव्हा जसे घडले त्याच धर्तीवर या लालसा असलेल्या अडाण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाहून शिकार्‍यांची (scamsters) भूछत्रेही वेगाने उगवू लागली आहेत.

याचे प्रतिबिंब सध्या फेसबुक, ट्विटरसारख्या समाज(?)-माध्यमांवर दिसू लागले आहे. फेसबुकवरील फीडमध्ये तर सध्या फक्त शेअर-टिप्स देणार्‍या विविध तथाकथित पोर्टल्सच्या जाहिरातीच दिसत आहेत. बहुतेक सार्‍या फसव्या (scam/fraud) . इमेजमध्ये एखाद्या प्रसिद्ध ‘इकनॉमिक टाईम्स’सारखे अर्थपत्र वा गुंतवणूक-माध्यम व्यावसायिकाचे नाव दिसते, पण लिंक भलतीकडेच नेते असा प्रकार होतो आहे. ९०% जाहिराती अशाच आहेत.

अदानी१

काही महिन्यांपूर्वी ही जाहिरात फेसबुकने फीडमध्ये दाखवली होती! विशेष म्हणजे त्यात ज्या वेबसाईटचा उल्लेख आहे त्या नावाची वेबसाईट अस्तित्वातच नाही!  लिंकवर क्लिक केले असता भलतीच वेबसाईट ओपन होई, जी ट्रॅकर वा रिडायरेक्ट स्वरूपाची आहे. 

एखाद्या देशात वा भूभागामध्ये बंदी असलेल्या वेबसाईट्सकडे नेण्याचा छुपा मार्ग म्हणून हे ट्रॅकर काम करतात. पण हाच पर्याय वापरून फसवणूक करणारे तुम्हाला आपल्या जाळ्यात ओढत असतात.

अड्रेसमध्ये ट्रॅक हा शब्द दिसताक्षणीच मी ती बंद केली. मग मी ब्राउजरमध्ये थेट नाव टाईप केले, तरी सापडले नाही. अलिकडे www लावून पाहिले, तर मुलांच्या पुस्तकांची एक साईट ओपन झाली.

आणखी रोचक बाब ही, की ही जाहिरात देणारे Charly Bell Officiel हे पेज स्वतंत्रपणे शोधले, तर ते कुण्या गायिकेचे आहे असे दिसते. तिने अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची जाहिरात करण्याचे काहीच कारण दिसत नाही. तिला अदानी हे नावही माहित नसावे. तेव्हा हे अकाऊंट प्रेषित असलेली जाहिरात फेसबुकने कशी दाखवली हे गौडबंगाल आहे.

यात एकतर कुणी Charly Bell Officiel हे अकाउंट हॅक करुन वापरले असावे, किंवा बहुतेक सेलेब्रिटी करतात तसे पैसे घेऊन गायिकेनेच ते वापरायला दिले असावे, किंवा नावात Officiel असले तरी हे अकाउंट कुण्या भलत्याच्य व्यक्तीने काढलेले बनावट अकाऊंट असावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहिरातीचे पैसे मिळतात म्हटल्यावर, अकाउंट बनावट नाही ना याची खातरजमा करून न घेता मिळतील ते पैसे पदरात पाडून घ्यावेत या धोरणाने फेसबुक ही जाहिरात दाखवून मोकळे झाले असावे.

मुळात ‘अदानी एंटरप्रायजेस’सह प्रमुख अदानी कंपन्यांचे बहुसंख्य शेअर हे केवळ प्रवर्तकांसह विविध संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहेत (१). सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी ते फारसे उपलब्धच नाहीत. अगदी म्युचुअल फंडांनीही त्यात कणभर गुंतवणूक केलेली नाही, इतक्या कमी संख्येने ते उपलब्ध आहेत (किंवा त्यांच्या किंमतीचे वास्तव तेथे बसलेल्या गुंतवणूक-तज्ज्ञांना ठाऊक आहे.) मग या जाहिराती का दिल्या असाव्यात? उत्तर सोपं आहे. हेतू अदानीची काळवंडली बाजार-पत उजळण्याचा आहे!

तो का? तर त्यांचे अगदी मोजके असे जे शेअर बाजारात उपलब्ध आहेत, त्यांना खरेदी करण्यास झुंबड उडावी, लोकांनी अधिकाधिक पैसा त्यांच्यासाठी देऊ करावा, जेणेकरून त्यांच्या किंमती वेगाने वाढाव्यात. तसे झाले तर खुद्द अदानींसह इतर संस्थात्मक मंडळींकडे असलेल्या शेअर्सचे नक्त-मूल्य भरपूर वाढेल. फेसबुकपूर्वी याच हेतूने एका प्रथितयश मराठी वृत्तपत्राच्या पोर्टलने अक्षरश: दिवसाआड अदानीच्या शेअर्सनी कशी फीनिक्स पक्ष्यासारखी राखेतून झेप घेतली आहे हे ठसवणार्‍या बातम्यांची(?) झड लावली होती. अजूनही आपले हे काम ते इमानेइतबारे करत असते. अशा वाढलेल्या शेअर्सच्या मूल्यांच्या आधारे अदानींना मोठ्या संपत्तीचा आभास निर्माण करता येऊन त्याबदली बँकांकडून मोठी कर्जे उभारता येतील.

हिंडनबर्गने अदानींवर मूळ मूल्यांच्या कैकपट अधिक मत्ता दाखवल्याचा आरोप केलेलाच आहे. तो अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य नव्वद टक्क्यांपर्यंत घसरले होते. त्यामुळे अदानींच्या शेअर-मालमत्तेमध्ये वेगाने घसरण झाली. त्यातून अदानींनी कर्ज घेतलेल्या बँकांना दिलेल्या तारणाचे बाजार-मूल्य घटले आणि बँकांनी त्यांना अधिक तारणाची वा परतफेडीची मागणी करायला सुरुवात केली. त्यामुळे ‘मागणी वाढवा नि संपत्ती फुगवा’ या हेतूने हे कारभार चालू आहेत.

तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य ग्राहकाच्या साध्या-सुध्या पोस्टवर फेसबुक कम्युनिटी स्टँडर्डचा बडगा उगारत असते. इथे चक्क खोट्या जाहिराती पैसे घेऊन लोकांपर्यंत पोहोचवते आहे. याच स्वरूपाच्या या आणखी दोन जाहिराती पाहा. या दुसर्‍या जाहिरातीचे प्रेषित असणारे अकाउंट संपूर्ण रिकामे आहे. तिसरे प्रोफाईलही अदानींशी वा आर्थिक विषयाशी काहीही संबंध नसणारे आहे.

एकीमध्ये ‘इंडियन्स ओन्ली’ म्हणत राष्ट्रभावनेला साद घातली आहे. २०१४ पासून हे चाळे आपण पाहात आलो आहोतच. अदानीच्या ऑस्ट्रेलियन सीईओने हिंडेनबर्ग अहवालावर प्रतिक्रिया देताना पाठीमागे भारताचा तिरंगा लावून पत्रकार परिषद घेतलेली आपण आधीच पाहिली आहे.

अदानी२
अदानी३

कुठल्याशा टुकार टाईल्सची जाहिरात, ‘देश की मिट्टी से बनी टाईल’ अशी केली जाते. तिच्या अगदी अलिकडच्या जाहिरातीमध्ये हातात बंदुका घेतलेले सैनिक दिसतात ते पाऊल पुढे टाकतात नि चित्र बदलून टाईल्सच्या भिंतीआडून ही टॅगलाईन उच्चारत हिंदी हीरो अवतरत असतो. जणू यांच्या टाईल्स म्हणजे देशाच्या सीमेवर लढणारे सैनिकच.

एरवी हागल्या-पादल्याला देशाची अस्मिता, आपले सैनिक वगैरे कढ काढणारे नि कलाकारांच्या विरोधात कांगावा, थयथयाट करणारे माध्यमवीर उद्योगधंद्यांच्या असल्या चाळ्यांसमोर मात्र मूग गिळून बसतात. वरून ऑर्डरच तशी असावी. देशाचा पंतप्रधान एका पेमेंट अ‍ॅपसाठी ‘मॉडेलिंग’ करतो आणि ‘व्यापारी सीमेवरच्या सैनिकाहून जास्त रिस्क घेत असतो’ म्हणतो तेव्हा त्यांच्या पित्त्यांनाही ते प्राधान्यक्रम निमूटपणे स्वीकारावे लागतात. निर्बुद्ध, शरणागत वृत्ती हा भक्तीचा स्थायीभावच असतो.

एकुणात फसवणुकीचा झगा केवळ फेसबुकने नव्हे तर राज्यकर्त्यांनी, उद्योगव्यवसायांनी पुरेपूर अंगिकारला आहे.

या सार्‍या अ‍ॅड्स मी ‘misrepresentation’ म्हणून रिपोर्ट केल्या होत्या. त्यातील एक-दोन काढून टाकल्याचा संदेश मला फेसबुकने दिला होता. बाकी बहुसंख्य जाहिरातींमध्ये आक्षेपार्ह काहीही न आढळल्याचा निकाल दिला होता.

फेसबुक हे धंदेवाईक माध्यम असल्याने ते यांना आळा घालतील याची सुतराम शक्यता नाही. मुळात ते तुम्हाला रिपोर्ट करताना काही तपशील देण्याची संधीच देत नाहीत, जेणेकरून आक्षेप नेमकेपणे नोंदवता यावेत. तपासणी बहुधा संगणकीय असल्याने फारच ढोबळ असणार, तोच त्यांचा हेतूही असणार. त्यांना यातून उत्तम पैसा मिळत असल्याने ही चाळणी बहुतेक रिपोर्ट फेटाळेल अशाच दृष्टीने तिची रचना होत असणार. म्हणूनच अशा जाहिराती या वेगाने येत राहतात.

पण अशा जाहिराती केवळ उद्योगपतींच्या वा राजकीय नेत्यांच्या छबी उजळून घेण्यासाठीच असतात असे नाही. याचा उलट उपयोगही केला जाऊ शकतो.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीची करण थापर यांनी घेतलेली मोदींची ती प्रसिद्ध मुलाखत लोकांच्या स्मरणात चांगली ठसलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या नरसंहाराबाबत थेट प्रश्न विचारून त्यांनी मोदींना अडचणीत आणले होते.

आज माध्यमांना सर्वस्वी अंकित करून हवी तशी छबी घडवल्यानंतरही, मोदींना आणि मोदी समर्थकांना त्या मुलाखतीमधून मोदींनी घेतलेली माघार बोचत असते. विरोधकही पुन्हा-पुन्हा तेवढाच भाग प्रसिद्ध करून त्यावर मीठ चोळत असतात. तेव्हा याबाबत काहीतरी केले पाहिजे असे मोदींच्या प्रचारविभागाला वाटले असावे.

आता ही जाहिरात पाहा. शीर्षक असे चतुराईने दिले आहे की जणू त्या मुलाखतीबाबत करण थापर आता नाक घासून माफी मागत आहेत की काय अशी शंका यावी. बातमीला बीबीसीची लिंक आहे अशी बतावणीही केलेली आहे. पण प्रत्यक्षात त्यावर क्लिक केले असता भलतीच साईट ओपन होते. वरचा साईट अड्रेस भलताच पण ते पेज मात्र बीबीसीचे असल्याप्रमाणे रचना करण्यात आली आहे.

KaranThaparHoax
KaranThaparHoaxFakeNews

एक शक्यता म्हणजे ही साईट अग्रेगेटर(२) असेल म्हणून मी लेखाचे ते शीर्षक टाकून गुगल केले असता, बीबीसीवरच नव्हे, तर अन्यत्रही असा कोणताही लेख सापडला नाही. त्या बातमीमध्ये उल्लेख असलेली थापर यांनी घेतलेली Pujitha Devaraju यांची मुलाखतही शोधून सापडली नाही.

असल्या जाहिराती प्रसिद्ध करणारी बहुतेक अकाऊंट्स ही अगदी नुकतीच काढलेली दिसतात. अनेक अकाउंट पाश्चात्त्य कलाकार, खेळाडू यांच्या नावे काढलेली दिसतात. त्यांचे एखाद-दोन फोटोही अपलोड केलेले असतात. त्यापलिकडे त्या अकाउंटमध्ये काहीही नसते. ‘ही मंडळी भारतीय शेअर्स का रेकेमेंड करत आहेत?’ असा सोपा प्रश्न डोक्यात यायला हवा. विशेषत: अदानीचे शेअर्स रेकेमेंड करणारी मंडळी हटकून अशी निघतात. मी अशी अकाउंट नि जाहिराती न चुकता फसवी (scam/misrepresentation/fraud) म्हणून रिपोर्ट करत असतो.

आत्मस्तुती, परनिंदा या पलिकडे जाऊन अशा जाहिरातींतून फुकट पैसे देण्याच्या आदिम आमिषाचा वापरही केला जातो आहे. आता अशा अनेक जाहिराती दाखवून फेसबुक पैसे मिळवते आहे.

या चतुर फसवणूकदाराने आपला खुंटा हलवून कसा बळकट केला आहे पाहा. या जाहिरातीमध्ये क्लिक करण्यासाठी कमळ हे सत्ताधारी पक्षाचे निवडणूक-चिन्ह अगदी रंगसंगतीसह वापरले आहे. पाहणारा सत्ताधारी पक्षाचा सहानुभूतीदार असेल, तर त्याच्याही नकळत, नेणिवेतून तो यावर ‘मोदीकी गॅरंटी’ पाहणार आहे. हा प्रकार फ्रॉड असला तरी सरकारपक्षातील मंडळी या फुकटच्या जाहिरातीकडे काणाडोळा करण्याची शक्यता अधिक. दुसरीकडे ही जाहिरात देणारे प्रेषित अकाउंट पुन्हा ‘टाटा’ या भारतीयांच्या विश्वासार्ह ब्रँडच्या नावे तयार केले आहे. एकुणात जाळ्यात आमिष भलतेच आकर्षक लावले आहे. गंमत म्हणजे त्यात उल्लेख असलेल्या PhonePe या पेमेंट अ‍ॅपचा याच्याशी काही संबंध नाही (वर थापर यांच्याबाबत आहे, तसे त्यांच्या एखाद्या स्पर्धकाचा/विरोधकाचा असावा का?)

ClickKamaLAndWinMoney
ClickKamalAdProfile

लेखाच्या सुरुवातीला भांडवली बाजाराच्या जोरदार परताव्याचा उल्लेख केला आहे. त्याचा आधार घेऊन लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहेच, तो यशस्वी होतानाही दिसतो आहे. फेसबुककरांमध्येही अनेक मंडळींना अचानक शेअर गुंतवणूक करावी असे वाटू लागलेले दिसते आहे. त्यांना अचाट सल्ले देणारे स्वयंघोषित तज्ज्ञही उपटले आहेत. म्हणजे या जाहिरातींचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अशा वेळी त्यांना वास्तवाचे भान करून देणे आवश्यक आहे.

२००३ ते २००५ पर्यंत वेगाने वर गेलेला बाजार २००६ ते २००९ वेगाने घसरून त्या खालच्या स्तरावर रेंगाळला होता. पण पहिल्या दोन वर्षातील परताव्याचे आकडे दाखवत LIC ने (त्यांच्या पावलावर पाऊल टाकून इतर खासगी कंपन्यांनी) ULIP (Unit Linked Insurance Policy) विकून आपले उखळ पांढरे करून घेतले होते. एरवी भांडवली-बाजारात पैसे गुंतवण्यास घाबरणारे एलआयसीवर डोळे मिटून भरवसा ठेवत भरपूर परताव्याच्या आमिष दाखवणार्‍या मोठमोठ्या प्रीमियमच्या पॉलिसी घेऊन मोकळे झाले होते.

सुदैवाने (हो सुदैवानेच!) बाजाराची घसरण सुरू झाली नि ULIP चे वास्तव यांना लवकर समजले. अन्यथा ज्यांना खर्‍या अर्थाने विमा म्हणता येईल (‘विमा ही गुंतवणूक आहे’ हा भ्रामक प्रचार करून LIC ने भारतीय गुंतवणूकदारांना भलत्याच मार्गावर नेलेले आहे.)  अशा स्वस्त ‘टर्म पॉलिसी’ज ऐवजी स्वफायद्याच्या, अधिक प्रीमियमच्या ‘मनी-बॅक’ पॉलिसीज गळ्यात मारणारी LIC (३), त्याहून महागडा ULIP हा नवा पायंडा पाडण्यास करण्यास साहाय्यभूत ठरली असती.

या ULIP मध्ये आणखी धोके होते. एकतर पहिल्या तीन वर्षांत तुम्ही गुंतवलेल्या पैशांपैकी सुमारे अकरा ते तेरा टक्के रक्कम ते आधीच गुंतवणूक-खर्च म्हणून कापून घेत असत. शिवाय ‘आपण इन्शुरन्स विकतो, गुंतवणूक कंपनी नाही (ग्राहकांकडे मात्र नेमकी उलट भूमिका मांडली जाते) तेव्हा आम्हाला बाजार-नियंत्रकाचे (सेबी: Securities Exchange Board of India) नियंत्रण नसावे’(४) अशी मखलाशी करून त्यांनी लवादाकडून त्यावर मोहोरही उमटवून घेतली होती. म्हणजे म्युचुअल फंडांमध्ये असलेली पारदर्शकता यांच्या गुंतवणुकीबाबत बंधनकारक नव्हती. इतरही अनेक नुकसानकारक मुद्दे होते.

बाजाराच्या तत्कालीन कामगिरीच्या आधारे LIC एजंट ग्राहकांना वार्षिक २५% परतावा मिळण्याची लालूच दाखवत होते. एवढा दीर्घकालीन परतावा गुंतवणूक-तज्ज्ञांची फौज बाळगणार्‍या म्युचुअल फंड कंपन्याही क्वचित काही फंडांमध्ये देऊ शकल्या आहेत. एरवी हा फायदा केवळ तात्कालिक असतो नि सरासरीच्या नियमाने हे प्रमाण नंतर कमी होते.

माझ्या मते ही चक्क फसवणूक होती. माझ्या परिचितांपैकी काही जण याला बळी पडले. ‘एवढा परतावा मिळू शकत नाही, हे तात्कालिक आहे’ हा माझा सल्ला न ऐकता ‘एजंट काय खोटं सांगेल’ या अडाणी गृहितकाखाली त्यांनी आपला पाय खोलात घातला होता.

‘सध्या शेअर मार्केट भरपूर फायदा देते आहे म्हणून आता तिथे जावे’ हे उशीराचे शहाणपण आहे. जसे ‘घसरले म्हणून बाहेर पडावे’ हा घायकुतेपणा चुकीचा तसेच ‘फायदा दिसतो म्हणून आत शिरणे’ हा उतावीळपणाही.

अचानक जाहिराती दिसू लागल्या, बाजार सकारात्मक दिशा दाखवतो आहे म्हणून आपले गुंतवणूक-धोरण बदलणे चुकीचे आहे. भांडवली बाजाराशी निगडित पर्यायांमध्ये गुंतवणूक करून पैसे मिळवणे ही तात्कालिक नव्हे, नियमित करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते, धोक्याची जाणीव आणि त्यावर स्वार होण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची प्रवृत्तीही. जाहिराती तर सोडाच, पण इतर परिचितांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डोळे झाकून गुंतवणूक करणारेही - माझ्या मते - गाढव असतात. तुमचा एजंटही ‘त्याला फायद्याचा गुंतवणूक सल्ला देत असतो, तुमच्या फायद्याचा नव्हे’ हे विसरायचे नसते.

दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ.

- oOo -

(१). ‘त्यात खरेच पैसे आहेत की नाही, की मुळातच अदानींचे मूठभर पैसे फिरवून फिरवून पुन्हा पुन्हा भारतात आल्याचे दाखवले आहे?’ वगैरे प्रश्न हिंडनबर्ग अहवालानंतर विचारले जाऊ लागले आहेत.

(२). अग्रेगेटर म्हणजे एकप्रकारे `वेबसाईट्सचे वृत्तपत्र’ म्हणावे लागेल. विविध वेबसाईट्स– विशेषत: बातमीदार – वरील उल्लेखनीय मजकूर एकत्र करुन एकप्रकारे त्याचे संकलन इथे उपलब्ध करून दिलेले असते, जणू एक अनुक्रमणिका तयार केलेली असते.

(३). खासगी कंपन्यावर आगपाखड करण्यास जागा मोकळी सोडली आहे. त्यासाठीच फक्त LIC चे नाव घेतले आहे. ‘त्यांना सांगा की, तिकडे बघा की’ वाल्या आणि ‘एफडीप्रामाण्यवादी भारतीयांसाठी हा फुलटॉस आहे.

(४). इन्शुरन्स विक्रेत्या कंपनीवर इर्डाचे– Insurance Regulatory and Development Authority– नियंत्रण असते.


हे वाचले का?