-
भाग - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी << मागील भाग
---मागील भागात ज्यांचा उल्लेख केला तो कालिदास असो वा आरती देवी, त्यांच्या सामाजिक आयुष्यातील साध्ये सिद्ध करण्यासाठी आपल्या जिवाभावाच्या जोडीदारांना विरह-वेदनेला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. हवे ते साध्य करण्यासाठी मूळ स्थानापासून दूर जाताना, जिवाभावाच्या व्यक्तीपासूनही दूर जाणे अपरिहार्य नव्हते. कालिदासाला मल्लिकेशी विवाह करून तिलाही सोबत नेणे शक्य होते. विलोमने– त्यांच्या सामायिक मित्राने– त्याला त्यावर पुन्हा पुन्हा डिवचलेही आहे.
परंतु जोडीदाराला अर्ध्या वाटेत सोडणे हा सर्वस्वी स्वार्थी निर्णय म्हणता येणार नाही, कारण त्या निर्णयप्रक्रियेत त्या दोघांचीही बाजू येतेच. त्यामुळे कुठल्याही कौटुंबिक निर्णयात तो त्यांना अनुकूल घेतला जाण्याची एक शक्यता असतेच. परंतु परतुनि जाण्याच्या असोशीने, इतर कुणाचा बळी घेऊन वा त्यांच्याच खांद्यावर त्या प्रवासाचे जू ठेवून जाऊ पाहणार्यांची उदाहरणेही साहित्यात कमी नाहीत.
ययाती आणि फेडोरा:
महाभारतातील (?) ययाती राजाची कथा सर्वश्रुत आहे. शुक्राचार्यांच्या शापाने वृद्ध झालेल्या या सम्राटाची सुखोपभोगाची लालसा त्याच्या जर्जर शरीराच्या विपरीत अशी तरुण राहिलेली असते. त्या भोगांच्या पूर्तीसाठी त्याला तारुण्य हवे असते. जो कुणी आपले तारुण्य देऊ करेल, त्याला आपले राज्य देण्याचा प्रस्ताव तो आपल्या पाचही पुत्रांसमोर ठेवतो. त्यांपैकी पुरू तो प्रस्ताव नि राजाचे वार्धक्य स्वीकारून, राजाला त्याची भोगलालसा पुरे करु शकेल असे तारुण्य देऊ करतो.
अन्य एका कथेमध्ये विश्वामित्र-शिष्य गालव त्याच्या गुरुदक्षिणेसाठी आवश्यक असणारे ‘एकच कान काळा असणारे शुभ्र रंगाचे घोडे कसे मिळवावेत?’ ही विवंचना घेऊन ययातीकडे येतो. परंतु अशा प्रकारचे घोडे सम्राटाकडे नसतात. मग ययाती त्याला आपली मुलगी माधवी देऊ करतो. अशा प्रकारचे घोडे ज्यांच्याकडे आहेत अशा तीन राजांशी, आणि अखेरीस विश्वामित्राशी रत होऊन ती गुरुदक्षिणा फेडण्याचे काम माधवी पुरे करते. यातून सम्राटाच्या शिरी येऊ शकणारे ‘दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवण्याचे पातक’ निवारले जाते. अशा तर्हेने या महान(?) सम्राटाने आपल्या आयुष्यातील उपभोगाचा, तसंच सन्मानाचा अशा दोनही बाजूंचा भार आपल्या मुलांच्या शिरी दिलेला आहे.
अमेरिकन चित्रपट ‘फेडोरा’ची कथा काहीशी ययातीच्या कथेशी मिळतीजुळती आहे. फेडोरा नावाची प्रसिद्ध अभिनेत्री वय नि सौंदर्य उतरणीला लागल्याची चाहूल लागून अचानक निवृत्त होते. अमेरिका सोडून इटलीजवळील एका लहानशा बेटावर अज्ञातवासात जगू लागते. चाहत्यांच्या मनातील आपली तरुण, सौंदर्यवती अशीच प्रतिमा कायम राहावी, म्हणून जुन्या जगाशी संपर्क जवळजवळ तोडते.
परंतु ज्या जगाने तिला कीर्ती, संपत्ती दिली तो तिच्या आयुष्याचा कणाच असतो. त्यामुळे ते सारे पुन्हा हस्तगत करण्याची तिची आस कायम असते. त्या दृष्टीने कुण्या सौंदर्यतज्ज्ञ म्हणवणार्या डॉक्टरकडून ती उपचार घेत असते. त्यातील एक उपाय उलटतो नि तिचा चेहरा कायमचा विरूप होऊन जातो. तिची परतुनि येण्याची आस धुळीला मिळते. त्या हव्याशा वाटणार्या भूतकाळाकडे परतण्याचा तिचा पहिला प्रयत्न अयशस्वी होतो. खानदानी युरपिय स्त्रिया घेतात त्या झिरझिरीत अवगुंठणाआड आपला विरूप चेहरा दडवून ती काउंटेस सॉब्रिन्स्की या नावाने तिथे वावरू लागते.
अँटोनिया: ‘फेडोरा’च्या कारकीर्दीच्या दुसर्या अध्यायाची सुरुवातअशात तिच्या चित्रपटीय कामगिरीचा गौरव करणारा एक पुरस्कार तिला जाहीर होतो. आता पुरस्कार स्वीकारायचा तर जाहीर कार्यक्रमात जाणे आले. पण कॅमेर्यांच्या नजरेखाली असलेल्या चित्रपटांच्या झगमगीत जगात चेहरा झाकून जाणे शक्य नसते. त्यावर तोडगा म्हणून, तिच्या तरुणपणीची प्रतिकृतीच म्हणावी अशी तिची मुलगी अँटोनिया– हिलाच फेडोरा म्हणून पाठवण्याचा निर्णय फेडोरा घेते. या कार्यक्रमात अँटोनिया ही फेडोरा म्हणून इतकी सहज खपून जाते, की तिला नव्याने चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागतात.‘फेडोरा’चा पुनर्जन्म होतो, तिच्या चंदेरी आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू होतो.
सुरुवातीला आईच्या नावावर मिळालेल्या यशाने हुरळून गेली असली, तरी अँटोनिया तरुण असते, नि त्या आयुष्याच्याही काही मागण्या असतात. मायकेल नावाचा एक तरुण तिच्या आयुष्यात येतो. या स्त्रीबद्दल त्याला आकर्षण असूनही, वयाने एवढ्या मोठ्या स्त्रीच्या प्रेमात पडल्याचा संकोच त्याला भेडसावत असतो. वास्तव काय ते सांगून त्याची ती शंका दूर करण्याचे अँटोनिया ठरवते. पण यातून आपल्या नव्या कारकीर्दीचा शेवट होईल, हे ध्यानात आलेली फेडोरा त्यांच्या नात्याला विरोध करते. इतकेच नव्हे तर, ती नि तिचे जवळचे सुहृद मिळून अँटोनियाची वंचना करणारा डाव खेळतात. या दुहेरी आयुष्याचा आणि आपले मूळ व्यक्तित्व कायमस्वरूपी आपल्या आईच्या व्यक्तित्वाचे गुलाम होऊन राहिल्याचा ताण असह्य होऊन अँटोनिया अखेर आत्महत्या करते(१).
फेडोराचा दिग्दर्शक-पटकथालेखक असलेल्या बिली वाइल्डरच्याच ‘सनसेट बुलेवार्ड’मधील(२) नॉर्मा ही मूकपटाच्या जमान्यातील लोकप्रिय अभिनेत्री. बोलपटांच्या आगमनानंतर मूकपटांची नि त्या जगातील अभिनेत्यांची सद्दी वेगाने उतरणीला लागते, ते विस्मृतीमध्ये जातात. नॉर्माही त्यातलीच एक. पण ती पुनरागमन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. त्यासाठी तिला एका उत्तम पटकथेची आवश्यकता आहे. त्यासाठी तिने ज्यू राजा हेरॉड याची मुलगी, नि छोट्या आर्मेनियाची राणी ‘सलोमी’ची कथा निवडलेली आहे. त्यावर ती काम करते आहे. केवळ अपघातानेच तिच्या घरी पोहोचलेल्या ‘जो मिलर’ या पटकथालेखकाला वेठीस धरते. तो तिच्या घरचा बंदिवान होऊन राहातो. त्याचवेळी ती त्याला भावनिक पाशातही अडकवून ठेवते.
एकदा ही पटकथा पुरी झाली की, प्रसिद्ध दिग्दर्शक सीसल बी डि’मिल यांच्या दिग्दर्शनाखाली ती पडद्यावर येईल, मग आपले हे पुनरागमन प्रेक्षक कसे साजरे करतील, वगैरे मनचे मांडे खाण्यात नॉर्मा रमते. परंतु जो आणि तिचा माजी पती मॅक्स यांना वास्तवाचे भान आहे. नॉर्माशी औपचारिक बोलत असलेल्या डि’मिल यांच्या चेहर्यावरचा स्पष्ट नकार त्यांची वाचलेला आहे. एक भावनिक उद्रेकाच्या क्षणी जो याची जाणीव नॉर्माला करून देतो आणि चित्रपटाबरोबर नॉर्माची वाटचालही शेवटाकडे होऊ लागते. या कथेचा अंतही जोच्या मृत्यूनेच होतो.
परतुनि जाण्याचा नॉर्मा नि फेडोराचा अट्टाहास अनुक्रमे अँटोनिया आणि जो मिलर यांचा बळी घेऊन विफल ठरतो. या दोघींप्रमाणेच विस्मृतकाळातील अभिनेत्री असलेली, भारत सासणे यांच्या ‘रेस्ट इज सायलन्स’(३) या कथेमधील कम्मो मात्र वेगळी वाट निवडते. ती परतुनि जाण्याचा अट्टाहास करतच नाही. उलट स्वत:साठी नि तिच्याप्रमाणेच निवृत्त केल्या गेलेल्या सहप्रवाशांसाठी या नव्या जगाच्या एका कोपर्यात त्यांच्या जगाचा एक तुकडा राखून ठेवते. तिथे त्यांचे जगणे, तो काळ एक प्रकारे गोठवून ठेवते. ‘वर्तमानाचे भान’ नावाच्या खिडकीतून बाहेरचे स्पष्ट दिसू नये म्हणून, त्यावर एक पडदा सरकवून दोन जगांची फारकत घडवून आणते.
भूतकाळातील तथाकथित वा वास्तविक वैभवाचा, सुखाचा, प्रसिद्धीचा वा यशाचा पाठलाग करणार्या कालिदास, आरती देवी, फेडोरा, नॉर्मा या सार्यांचा तो प्रयत्न अयशस्वी होऊन हे सारेच वैफल्याचे धनी झाले आहेत. कांदिदची अवस्था ‘यशाचे कलेवरच हाती आले’ अशी आहे. या सार्यांची अतृप्ती, साध्य हस्तगत केल्यानंतरही राहिलेले अपुरेपण, हे You cannot go back home' या उक्तीला सार्थ करणारे.
मी वर ‘परिपूर्तीनंतर परतुनि’ येण्याचा निर्णय घेण्याचा उल्लेख केला आहे. मागील भागात उल्लेख केलेल्या आँधी या चित्रपटामधील आरती देवींचे उदाहरण अशा स्वरूपाच्या निर्णयाचे म्हणता येईल. परंतु तो निर्णय खरेच घेतला होता, की एक राजकारणी डावपेच होता, हे सांगणे कठीण आहे. तो राजकारणी डावपेच होता म्हटले तरीही तो स्वार्थी आहे आणि खरोखरच परतून येणे झाले असते तरीही ते स्वार्थप्रेरितच– कौटुंबिक आयुष्य हवे म्हणून– ठरले असते. परतुनि येणार्या आरती देवींच्या मनात साफल्याची नव्हे, तर आणखी काही हवे असण्याची आसच राहिली असती. परिपूर्ती हा शब्द तेव्हाच वापरता येईल, जेव्हा हे परतणे निरपेक्ष असेल. सुदैवाने असे सुरेख उदाहरण मला गोनीदांच्या बुधामध्ये(४) सापडले.
बुधा:
पुण्याजवळील राजमाची किल्ल्याचा वंशपरंपरागत वतनदार असलेला बुधा चर्हाटे पोटाच्या पाठीमागे मुंबईसारख्या महानगरामध्ये स्थलांतरित होतो. चाकरमानी होऊन आयुष्य काढतो. आता त्याचा मुलगा भिवा कर्ता झाला आहे, जोडीला सूनही आली आहे. नातवाची पावले ऐकू येऊ लागली आहेत. त्याच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात असतात ती जगण्याची बहुतेक कर्तव्ये बुधाने पार पाडली आहेत. महानगरात राहण्याची गरज आता संपली आहे.
‘अमेरिकन ड्रीम’च्या मागे लागलेल्या, किंवा एक साध्य हाती आले की हपापलेपणे नव्या साध्याच्या मागे लागणार्या, नागरी मानसिकतेचा स्पर्शही त्याला झालेला नाही. महानगराकडे येण्यापूर्वी आपले नि आपल्या मागील पिढ्यांचे पोषण करणार्या मातीला पोरके करून आपण आलो आहोत, याचे भान त्याच्या मनात जिवंत आहे. त्या मातीचे देणे देण्यासाठी परतुनि जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
वरील सार्यांच्या ‘परतुनि ये घरा’ निर्णयामध्ये नि बुधाच्या निर्णयामध्ये हा एक मोठा फरक आहे. इतर सार्यांचा तो निर्णय स्वत:साठी, स्वार्थी दृष्टिकोनातून घेतला गेलेला आहे. पूर्वी जे मिळाले ते त्यांना पुन्हा हवेसे वाटते आहे. याउलट माचीकडे परतणार्या बुधाच्या मनात अपुरेपणाची नव्हे, तर साफल्याची भावना आहे. आपल्या जिण्याची परिपूर्ती झाल्याची भावना घेऊन तो परततो आहे. माचीकडून काही घेण्यासाठी नव्हे, तर तिचे देणे देण्यासाठी तो जातो आहे. माचीला, तेथील निसर्गाला तो आपल्या सोयीने वळवू इच्छित नाही. उलट त्या मातीचे, दारीच्या ‘आवळीबाय’चे, खारीचे, कुत्र्याचे सार्यांचे देणे देत जातो. स्वत:ला निसर्गाच्या स्वाधीन करतो, त्याच्यामध्ये विलीन होतो.
ऑर्फियसला, कांदिदला जगण्याच्या चक्रवातामध्ये हरवलेलं, तर ऑर्फियसला त्याच्याही सीमा ओलांडून गेलेलं त्याचं प्रेम परत हवं होतं. कालिदासाला त्याची हरवलेली प्रेरणा परत हवी होती, तर आरती देवींना नात्याचे बळ नि ऊब. फेडोरा आणि नॉर्मा यांचा गमावलेली कीर्ती पुन्हा हवी होती, तर ययातीला झडलेले तारुण्य. नचिकेता मात्र कोणतेही मागणे घेऊन मृत्युला सामोरा जात नव्हता, उलट तो स्वत:च अस्तित्वाचे दान घेऊन मृत्यूसमोर हजर झाला होता. पण त्याच्या जाण्यालाही वचनपूर्तीच्या हेतूची प्रेरणा होती, बुधाचा प्रवास मात्र ‘इदं न मम’ या सर्वस्वी निरामय हेतूने झालेला आहे.
मला वाटतं बुधाची कथा ही सार्या मानवजातीचीच कथा ठरायला हवी. पोटभर अन्न, निरोगी अथवा आरोग्यपूर्ण जीवन, कुटुंबासोबत असलेले भावनिक बंध हे जगण्याचे मूलभूत आधार हे आजच्या नागरी नि महानगरी आयुष्यात माणसांनी दुय्यम ठरवून टाकले आहेत. श्रीमंती, आणखी पैसे, आणखी- आणखी पैसे, ‘मागचा मोबाईल वीस हजाराचा होता आता लाखभराचा हवा, भले त्यांच्या कामांत फार फरक नसेना’, ‘घड्याळ वेळ तीच दाखवत असले तरी सोन्याची साखळी असणारे वा हिरे जडवलेले मिळवले की माझे यश वाढले’... या मार्गाने माणसाची वाटचाल चालू आहे.
गेल्या दोन पिढ्यांनी पुढील कित्येक पिढ्यांच्या वाट्याची निसर्गसंपत्ती स्वाहा केली याची फिकीर भांडवलशाही जगात राहणार्या माणसाला नाही. ‘अजून हवे, अजून हवे’ हा मंत्र घोकणार्या, त्यासाठी आपण निसर्गाची किती नि कशी धूळदाण करतो आहोत याबद्दल अनभिज्ञ असणार्या, नि हेतुत: तसे राहू इच्छिणार्यांच्या पिढ्या उदयाला येत आहेत. बुधाप्रमाणे त्या मातीचे, निसर्गाचे देणे देण्याची बातच सोडा, त्याबद्दल सजग राहण्याचेही माणसे नाकारत आहे.
कीर्ति, संपत्ती नि सत्तेप्रमाणेच ‘मालकी हक्काची भावना’ ही माणसाच्या मनात रुजलेली सर्वात घातक भावना आहे. तिची खाय खाय संपत नाही. तिला पोसण्यासाठी माणूस बेफाम वेगाने धावतो आहे, उरस्फोड करतो आहे. त्यासाठी वेळच्या वेळी अन्नसेवन, आरोग्यदायी अन्नसेवन सोडून खाण्यातही फॅशन किंवा अस्मितेचे झेंडे लावतो आहे. हे साध्य करण्यासाठी कमावण्याचे, कामाचे तास वाढवून, विश्रांतीचे नि कौटुंबिक सहवासाचे घटवत नेतो आहे. यातून शारीरिक नि मानसिक अनारोग्याकडे अनायासे चालत जातो आहे. हे विषारी वर्तुळ आहे हे त्याच्या ध्यानातच येत नाही.
मालक म्हणून आपले नाव मिरवणार्या स्थावर, जंगम मिळकतीचा विस्तार त्याला सुखावतो आहे. त्यातील किती आपण नक्की भोगू शकतो वा भोगतो? असा प्रश्न त्याला पडत नाही. ‘मालकी असणे म्हणजेच भोगणे नव्हे’ याचे भान त्याला येत नाही. आणि या सार्या प्रवासामध्ये तो निसर्गाच्या पुनर्भरणाच्या कुवतीच्या कैकपट अधिक विध्वंस करत जंगलांना वाळवंटांत आणि मैदानी प्रदेशांना चिखल-राडेच्या प्रदेशात (swamp) रूपांतरित करतो आहे. आणि हे बदल समोर दिसत असूनही डोळे मिटून वा भांडवलशाहीच्या भाट माध्यमांतून येणारा ‘ऑल इज वेल’चे तथाकथित संशोधन मांडणारे पडदे डोळ्यावर ओढून घेत आहेत.
विकास, प्रगती या शब्दांवर उड्या मारणारे संभावित ‘याची किंमत किती मोजायची आहे, कुणी मोजायची आहे?’ या प्रश्नाला सामोरे जाण्याचे धाडस करत नाहीत. एक प्रकारे आपल्या आयुष्यात शक्य ते सारे भोगून घेण्याची लालसा बाळगून ते जगत आहेत. त्यासाठी जी काय किंमत मोजायची, ती पुढच्या पिढ्या मोजतील, त्याची आपण फिकीर करण्याचे कारण नाही, अशा आविर्भावात त्यांचे जगणे आहे. एकविसाव्या शतकाच्या उदयानंतर जगभरातील ही विकासाची, प्रगतीची खायखाय प्रचंड वाढली नि पर्यावरणाच्या र्हासाबाबत आवाज उठवणार्यांचा आवाज क्षीण झाला. ज्यांनी त्यांना बळ द्यायचे, ते संभावितच त्यांना प्रगतीविरोधक, विकासविरोधक म्हणून हिणवू लागले, संपत्तीसाधकांच्या रांगेत आपला कटोरा घेऊन उभे राहिले आहेत.
वाईट एवढेच की, या वा भविष्यातील पिढ्यांना आता परतुनि जावेसे वाटले तरीही जाणे शक्य होणार नाही. पृथ्वीवरील स्वर्ग मानल्या गेलेल्या कॅलिफोर्नियामध्ये पाचेक वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाने या भयानक भविष्याची चाहूल दिलेली आहे. पण तिथेही आज डोनाल्ड ट्रम्पसारखा माथेफिरु ‘विकास... विकास... अजून पैसा... अजून पैसा!’ म्हणणार्या अमेरिकनांनी निवडून दिला आहे. त्याने सत्तेवर येताक्षणीच निसर्गरक्षणापासून आरोग्यव्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रांना दुय्यम करणारी पावले टाकली आहे. विध्वंसाचा गेल्या पंचवीस वर्षांत वाढलेला वेग, ट्रम्प आणि जगभर उदयाला आलेल्या त्याच्यासारख्या अन्य माथेफिरु सत्ताधीशांच्या काळात आणखी तीव्र होणार आहे.
अशा समाजात ‘हे एवढे माझे साध्य. तेवढे पदरी पडले की मी अधिक काही मागणार नाही.’ असा निर्णय घेऊन त्याला अनुसरून वागणारे, आवश्यक तेवढे मिळाले की निसर्गाचे देणे देऊन, आपली मातीही त्यात मिसळून देणारे बुधा सापडणे अवघड आहे. आणि म्हणून भूतकाळ कितीही समृद्ध असला, तरी परतून जाण्याची इच्छा असलेल्या पिढ्या आता अस्तंगत झाल्या आहेत. मानवजातीचा परतुनि जाण्याचा मार्गही त्यांसोबतच बंद झालेला आहे.
I Wish I could go back.
Image Credit: stockcake.com- oOo -
टीपा:
(१). तिच्या आत्महत्येचा प्रसंग टॉलस्टॉयच्या अना कारेनिनाच्या मृत्युची आठवण करून देतो.
(२). या दोनही जुन्या चित्रपटांची ओळख मला शांताबाई शेळकेंनी लिहिलेल्या ‘चित्रकथा’या पुस्तकामार्फत झाली. शांताबाईंनी काही काळ चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले होते. त्या काळात त्यांना हे चित्रपट पाहण्याची संधी मिळाली असावी. यात शांताबाईंनी फेडोराला चित्रपटतारका न म्हणता ‘चित्रपटचंद्रिका’ असे सुरेख विशेषण वापरले आहे.
(३). पुस्तक: ऐसा दुस्तर संसाऽर - ले. भारत सासणे. प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
(४). पुस्तक: माचीवरला बुधा - ले. गो. नी. दाण्डेकर. प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन.
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती      
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - ३ (अंतिम) : ययाती, बुधा आणि... माणूस
रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी
-
भाग - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता << मागील भाग
---तुरुंगवारी अथवा मृत्युदर्शन हे टोकाचे नि वेदनादायक वळण आहे. आयुष्यात अपरिहार्यपणे अथवा अनाहुतपणे येणार्या इतर काही प्रमाथी नि आवेगी वळणांनाही, माणसे आपल्या इच्छाशक्ती, कुवत, कौशल्य नि चिकाटीने वळशामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात. जगण्याची गाडी पुन्हा मूळ स्थानी नेऊन प्रवास सुरू करण्याचा अट्टाहास, आटापिटा करताना दिसतात. त्यांचा तो आटापिटा अनेकदा 'You can never go back home' या उक्तीचा अनुभव देऊन जात असतो.
कांदिद:
प्रसिद्ध विचारवंत वोल्तेअरच्या ‘कांदिद’ची कथा काहीशी मागील भागात सांगितलेल्या ऑर्फियस-युरिडिसीच्या वळणाची. पण त्याचे संघर्ष कैकपट व्यापक. त्याचे त्याच्या देखण्या आतेबहिणीवर– Cunégonde– प्रेम आहे. परंतु तिचे वडील बॅरन(१) म्हणजे उमराव घराण्यातील आहेत. आपल्या सामाजिक स्थानाचा विचार करता, बहिणीच्या या ‘अनौरस पुत्रा’शी आपल्या मुलीचे लग्न करण्यास तिच्या वडिलांचा ठाम विरोध आहे.
Candide by Voltaire
Artist: Umberto Brunelleschi (1879 - 1949).इथून पुढे दोघांचे आयुष्य अतिशय वादळी ठरते. कांदिदची हद्दपारी, नैसर्गिक नि राजकीय आपत्ती, ‘जमिनीवरील स्वर्गा’त (El Dorado) पोहोचून त्यातून प्रचंड संपत्ती जमा करणे, परंतु तितक्याच सहजपणे तिचे विरून जाणे, कुनिगोंदेच्या स्त्रीत्वाचे निघालेले धिंडवडे, तिच्या संरक्षणासाठी तिच्या दोन मालकांची हत्या करून पुन्हा परागंदा झालेला कांदिद, एका उमरावाची मुलगी असलेल्या कुनिगोंदेवर य:कश्चित नोकर म्हणून आयुष्य कंठण्याची आलेली वेळ ... या सार्या फरफटीच्या अखेर काही वर्षांनी ते एकत्र येतात.
इतकी वर्षे जिची आस धरून जगण्याला वादळवाटेवर भिरकावून दिले, तिच्याबद्दल कांदिदला आता तेवढी असोशी राहिलेली नसते. तरीही पूर्वी केलेल्या वाङनिश्चयाखातर तो तिच्याशी लग्न करतो. पण प्रेयसीची आता पत्नी झालेली ती, आयुष्याच्या वाटेवर इतकी वादळे नि वर्षे पचवून आलेली असते. शारीर सौंदर्य तर वयोमानापरत्वे उतरणीला लागलेले असतेच, पण जगण्यातील – युरिडिसीप्रमाणेच– भोगांनी आयुष्याबाबत तेवढी सकारात्मकही राहिलेली नसते. त्याने प्रेम केलेल्या उत्फुल्ल, सुंदर कुनिगोंदेऐवजी एका सुमार देहसौंदर्याची, किरकिरी, निराशावादी स्त्रीशी उरलेले आयुष्य काढावे लागणार आहे, याची जाणीव त्याला होते.
जीएंच्या कथेतील ऑर्फियस आणि कांदिद यांच्यात हा एक महत्त्वाचा फरक राहतो. जे साध्य म्हणून हाती आले नाही, ते जबाबदारी म्हणून, भागधेय म्हणून कांदिदने स्वीकारले आहे. या उलट ऑर्फियसने मात्र मळभ आलेल्या मानसिकतेच्या युरिडिसीला– तात्पुरते का होईना– नाकारले आहे.
कांदिदच्या आयुष्याकडे पाहिले तर, पुराच्या पाण्यात अडकलेल्या, जिवाच्या आकांताने किनार्याकडे पोहोचू पाहणार्या, पण प्रवाहाच्या रेट्याने पुन्हा-पुन्हा दूर फेकल्या जात असलेल्या असाहाय्य होडक्याची उपमा देता येईल. त्याच्या साध्यापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास प्रामुख्याने भवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीने नियंत्रित केला आहे. परिस्थिती बदलली, की बदललेल्या आव्हानाशी नव्याने संघर्षाची सुरुवात करण्यापलिकडे त्याच्या हातात फारसे काही नाही. त्याचे संघर्ष त्याने निवडलेले नाहीत, परिस्थितीच ते त्याच्यासमोर आणून उभे करते आहे. त्याच्या प्रिय कुनिगोंदेकडे परतण्यास प्रतिबंध करत आहेत.
कालिदास:
मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’(२) मधील कालिदासही त्याच्या प्रियेकडे– मल्लिकेकडे परतून येऊ इच्छितो. पण त्याची परिस्थिती कांदिदहून सर्वस्वी वेगळी आहे. कांदिदच्या आयुष्यातील विरह परिस्थितीजन्य, तर कालिदासाच्या आयुष्यातील विरह(?) सर्वस्वी त्याच्या निर्णयाने आलेला. प्रियेकडे परतण्यासाठी कांदिदने उभ्या आयुष्याचा संघर्ष मांडलेला, तर कालिदासाने या तथाकथित विरहकालात कीर्ती, धनसंपत्ती, राजकीय सत्ता आणि सुंदरीचे बाहुपाश या सर्व प्रकारच्या सुखांनी परिपूर्ण असे आयुष्य भोगले आहे.
राजकृपा, राजकवीपदाचा मान, त्याआधारे मिळालेले सुखवस्तू आयुष्य, राजकन्येशी झालेला विवाह, राजाच्या जावयाला साजेसे म्हणून दिले गेलेले काश्मीरचे राजेपद... या सार्या स्वार्थासाठी बालपणापासून त्याच्यावर जीव जडवून बसलेल्या मल्लिकेला कालिदास सोडून जातो. त्या आयुष्यातून तिचे अस्तित्व वजा करून टाकतो. इतके की, जी त्याच्या काव्याची मुख्य प्रेरणा, तिच्याकडे त्याच्या प्रसिद्ध ग्रंथांच्या प्रती पाठवण्याचे भानही त्याला राहात नाही. या सुखासीन आयुष्याच्या काळात कालिदासाला मल्लिकेचा संपूर्ण विसर पडलेला आहे.
याउलट कांदिद त्याच्या प्रेयसीशी एकनिष्ठ आहे, तिच्या प्राप्तीसाठी त्याने आयुष्याचे वाळवंट केले आहे. अनेकवार दूर फेकले जाऊनही, आपली दिशा बदलून आकांताने तो पुन्हा तिच्याकडे येतो आहे, कारण तेच त्याचे साध्य आहे. कालिदासाचे असे नाही. प्रेरणास्वरूप असलेल्या मल्लिकेकडून, गावच्या निसर्गाकडून जमा केलेले सारे संचित ओतून घडवलेली त्याची साहित्यशिल्पे मनोहारी ठरली, त्यांनी त्याला हरप्रकारे सुखासीन आयुष्य दिले. कदाचित तेच त्याचे साध्य होते.
परंतु आता ते संचित संपले आहे, राजकीय उलथापालथीचा परिणाम म्हणून, सारे ऐश्वर्यही हरवून गेले आहे. असा कालिदास, आता जुन्या आधारासाठी परतून आला आहे. तो ‘मल्लिकेवरील प्रेमाखातर’ असे म्हणणे सयुक्तिक ठरेल असे वाटत नाही. (म्हणूनच वर मी विरह या शब्दापुढे एक प्रश्नचिन्ह ठेवून दिले आहे.) तो परत आला आहे तो, त्याची ती रिती ओंजळ पुन्हा भरण्याच्या हेतूने. ‘ज्या मल्लिकेने आणि निसर्गाने ती पूर्वी भरली होती, ते दोघे ती पुन्हा भरतील’ या आशेने तो परतून आला आहे. त्याचे परतणे विरह-व्याकुल प्रियकराचे नव्हे, तर रिक्तहस्त सुखवस्तूचे स्वार्थी परतणे आहे.
आयुष्यातील एक नवा डाव पुरेपूर भोगून झाल्यावर, त्याला पुन्हा एकवार ते जुने उबदार, संघर्षहीन आयुष्य खुणावते आहे. त्याला ते परत हवे आहे. त्यासाठी तो मल्लिकेकडे नि आपल्या गावी परतून आला आहे. आपल्या सार्या प्रमादांबद्दल– कदाचित अप्रामाणिकपणे– तो तिची क्षमायाचना करतो (स्वार्थ साधणे हा हेतू योजून). पण त्याचे ते जग आता पूर्वीसारखे राहिलेले नसते. आपल्या माघारी त्या जगाला, मल्लिकेच्या आयुष्याला – आपल्याइतकी नसली तरी– गती होती. ते ही एका वेगळ्या वाटेवर पुढे निघून गेले आहे, याचे भान त्याला येते.
आयुष्यात अशी ‘स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ घेण्याची इच्छा अनेकांना होत असते. सार्वजनिक, व्यावसायिक अथवा व्यक्तिगत आयुष्यात प्रगतीच्या हेतूने, आसक्तीने पुढे टाकलेली काही पावले मागे घेण्याची इच्छा अनेकदा होते. याची एकाहुन अधिक कारणे असू शकतात. कदाचित त्या पावलांनी, उपायांनी अपेक्षित परिणाम वा साध्य जवळ आलेले दिसत नसते. आणि त्यासाठी मागच्या टप्प्यावर जे सोडले, ते ही दूर जाताना दिसू लागलेले असते. अशा वेळी ‘सोवळे सुटले नि ओवळे सापडले नाही’ अशी त्रिशंकू अवस्था होते.
याशिवाय वर्तमानातील जगण्यातील अडचणी, अडथळे नि संघर्ष हे समोरच ठाकलेले असल्याने अधिक ठळकपणे दिसतात. त्यांनी दिलेले दु:ख, वेदना अधिक अधिक प्रकर्षाने जाणवतात. त्या तुलनेत दूर गेलेल्या भूतकालातील दु:खाची, वेदनांची जाणीव आता बोथट झालेली असते. अशा वेळी भूतकाळातील ते सोवळे, होते त्याहून अधिक आकर्षक भासू लागले. त्यामुळे वर्तमानापेक्षा भूतकाळ हा अधिक सुखद वा हवाहवासा वाटू लागतो. मग वर्तमानाला पाठ दाखवून त्या भूतकाळातील देदिप्यमान, सुखद, उबदार, हवेसे जगणे, ती दुलई पांघरून सुरक्षित, सुखी होण्याची आस वाढू लागते. त्यातून ‘परतुनि जा घरा’ ही ओळ कानात कुणी गुणगुणत असल्याचा भास तीव्र होतो. मग ते जुने सोनेरी दिवस ओढून आणण्याची, किंवा तेव्हाच्या काही सोनेरी स्वप्नांचा पुन्हा एकवार पाठलाग करता यावा, म्हणून, पुन्हा त्या आरंभबिंदूपाशी जाण्याची असोशी घेऊन ते जगतात.
खरे तर तेव्हाचे जगही आजच्याहून अधिक सुखी, आनंदी, वैभवशाली वगैरे असत नाही. त्या काळाच्या म्हणून काही समस्या असतातच. त्यावर मात करून, वा त्यांना वळसा घालूनच वाटचाल करावी लागलेली असते. पण काळात इतके पुढे आल्यावर त्या संघर्षाची, त्याने दिलेल्या वेदनांची जाणीव बोथट झालेली असते. त्यातील यशाची, सुखांची, वैभवाची स्मृती मात्र तुलनेने ठळक शिल्लक राहते. याचे कारण, पुस्ती गिरवावी तशी पुन्हा पुन्हा कुरवाळून माणसांनी, इतिहासाने ती ठळक केलेली असते, त्यावर स्मरणरंजनाची, अस्मितेची प्रावरणे पांघरून त्यांना अधिक भरजरी केलेले असते.
एखाद्या व्यक्तिलाच कशाला, आपला भूतकाळ देदिप्यमान, सोनेरी, वैभवशाली होता, असे जगभरातील सर्वच राष्ट्रातील नागरिकांना वाटत असते. आफ्रिकेपासून आशियापर्यंत सर्वच मागास देशांतील नागरिकांमध्ये हा समज दृढ झालेला असतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना- निदान आजच्या युरपिय वंशाचे प्राबल्य असलेल्या- फारसा दीर्घ इतिहासच नाही. मग तो वैभवशाली, सोनेरी वगैरे आहे का याबाबत बोलणे सयुक्तिकही नाही. पण गंमत म्हणजे तिथेही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा कुणी अमेरिकेला ‘पुन्हा एकदा’ ग्रेट करु या म्हणून साद घालतो, नि अमेरिकन्स त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. मग भारतासारख्या भूतकालभोगी देशात तर संघ-भाजपचा हा प्रचार परिणामकारक ठरतो यात नवल नाही.
या गमावलेपणाच्या, अपुरेपणाच्या अतृप्तीप्रमाणेच परतुनि जाण्याची इच्छा व्हावी याचे कारण ‘परिपूर्ती’ची भावनाही असू शकते. जे साध्य करण्यासाठी आपला स्थायी थांबा (base camp) सोडून पुढे झेप घेतली, ते आता साध्य झाले आहे. त्यामुळे आता हा प्रवास पुढे चालू ठेवण्यात अर्थ नाही. जे साध्य झाले त्याचे संचित सोबत घेऊन मूळ स्थानी परतावे अशी साफल्यजनक भूमिका घेतली जात असते. पण अतृप्तीच्या तुलनेत याचे प्रमाण नगण्य म्हणावे इतके कमी आहे.
बहुतेक माणसे साध्याच्या दिशेने वाटचाल सुरु करताना, आपल्या आकलनाच्या कलाने प्रवासाची दिशा नि मार्ग निश्चित करतात, त्यावर चालू लागतात. त्या मार्गावर त्यांना अपेक्षित थांब्यावर ते पोहोचतातही. पण आता त्या प्रवासाचा कैफ त्यांना थांबू देत नाही. मग मार्ग न बदलता, त्याच मार्गावरचा पुढचा एखादा थांबा ते नवे साध्य म्हणून स्वीकारतात नि मार्गक्रमणा चालू ठेवतात. हे करत असताना ‘आपल्या आरंभबिंदूपासून अधिक दूर चाललो आहोत’ याची रुखरुख सोबत घेऊन ते वाटचाल करत असतात.
यावर उपाय म्हणून मग ते स्वत:ला– त्यापेक्षाही इतरांना ‘आपण लवकरच परतुनि येणार’ असल्याचे सातत्याने ठसवत राहतात. आर्थिक संपन्नतेच्या ‘अमेरिकन स्वप्ना’कडे उडत उडत गेलेले भारतीय ‘मी काही वर्षांनी परत येणार आहे.’ असे स्वत:ला नि आसपासच्या मंडळींना ठसवत असतात, त्याला अधिक ठळक करण्यासाठी इकडे घर अथवा जमीन विकत घेऊन ठेवतात. ज्यातून आपली मुळे आपण विसरलो नाही हे स्वत:ला पटवत इतरांसमोर मिरवत राहतात. तेवढे पुरेसे वाटले नाही तर, स्वदेशातील काही कर्मकांडे तिकडेही साजरी करत त्या समजाला अधिक ठळक करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांची - माझ्या मते अकारण असलेली - ती रुखरुख मवाळ करण्यास एवढे पुरेसे ठरुन पुढचा प्रवास अधिक निर्धास्तपणे करणे शक्य होते.
आरती देवी:
कालिदासाप्रमाणेच ‘आँधी’ या चित्रपटातील ‘आरती देवी’ तिला हवे तिथे पोहोचली आहे. कीर्ती, संपत्ती नि सत्ता या तीनही क्षेत्रात तिने भरपूर कमावले आहे. त्या बाबतीत साफल्याची भावना तिच्या मनात रेंगाळते आहे. पण एका टप्प्यावर कालिदासाप्रमाणेच तिलाही परतून यावेसे प्रकर्षाने वाटते. फरक इतकाच की कालिदासाप्रमाणे ते संचित गमावल्यामुळे तिच्या मनात ती भावना उमटलेली नाही.
कालिदास जसे त्याचे पूर्वीचे जग मागे सोडून आला होता, तसेच ती ही आपले एक जग मागे सोडून आलेली आहे. एका धनाढ्य उद्योगपती नि राजकारण्याची ही तरुण मुलगी, अपघातानेच जे.के.च्या प्रेमात पडते. प्रेम होते, लग्न होते, मूल होते, तारुण्याचे देणे पुरे होते. आता तिला वडिलांचा वारसा खुणावतो आहे. तो सोडून एका य:कश्चित सामान्य माणसासोबत तिने आयुष्य काढणे त्यांनाही मान्य नाहीच. आपल्या परीने ते ही तिला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर आपल्या प्रेरणेला होकार देऊन ती वडिलांकडे परतते, राजकारणात प्रस्थापित होते.
पुढे कधीतरी योगायोगाने एकदा जे.के.शी झालेल्या भेटीमधून तिला जाणवते की, ती जे मागे सोडून आली त्यापासून पूर्ण मुक्त होऊ शकलेली नाही. त्यातील बंधांचे काही अवशेष अजून शिल्लक आहेत. भौतिक यशाचा कोणताही टप्पा साध्य करण्यास शिल्लक नसल्याने असेल कदाचित– पण आता तिला त्या जगातील काही खुणावते आहे. शक्य असल्यास त्या दोन्ही जगांतले साध्य तिला साधायचे आहे. इंग्रजीत म्हणतात तसे ‘She wants the best of both worlds.’(३) आता कुटुंब-संस्थेकडून मिळणारा भावनिक आधार, तसंच त्याचे प्रतिबिंब म्हणून राजकारणात सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणारी आपुलकी हे दोन्ही एकाच वेळी हवे आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत आरती देवींच्या या भूतकाळाला राजकारणाच्या उकिरड्यावर खेचून आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो. हा डाव उलटवण्यासाठी आरती देवी वेगाने हालचाली करुन स्वत:च तो उघड करते, ‘पत्नी म्हणून, आई म्हणून आपली जबाबदारी टाळल्याची’ खंत व्यक्त करते. तसेच ‘आपण आपल्या कुटुंबाकडे परतून जाणार असल्याचे’ही जाहीर करते.
या जाहीर वचनामध्ये भावनेचा तात्कालिक उठाव किती नि राजकारणी डावपेचाचा भाग किती हे सांगता येत नाही. यात पुन्हा कालिदासाप्रमाणेच नात्याची प्रामाणिक बूज किती, नि त्याच्या आधाराने आपल्या मतदात्यांसमोर ‘एक कुटुंबवत्सल होऊ पाहणारी, कौटुंबिक पातळीवर केलेल्या चुका(?) प्रामाणिकपणे मान्य करणारी एक नेता असे रूप उभे करण्याचा प्रयत्न किती?’ असा प्रश्न विचारण्यास वाव आहे. या भाषणा-दरम्यान ती “मी ‘तुमच्या सेवेस इथे होते म्हणून’ मी माझ्या कौटुंबिक जबाबदार्या पार पाडू शकले नाही”, हा त्याग आम्ही तुमच्यासाठी केलेला आहे, असेही ठसवताना दिसते.
परंतु निवडणुकीची धामधूम शांत झाल्यावर, कदाचित मागे जाण्याची इच्छा व्यक्त करणारी ती भावनिक लाट ओसरून गेल्यावर, ‘You cannot go back home'ची जाणीव तिला होते. सामान्य महत्त्वाकांक्षा असलेला तिचा पतीही, समजूतदारपणे तिला हवा होता तोच– राजकारण प्रधान मानणारे वर्तमान आयुष्य पुढे चालू ठेवण्याचा– सल्ला देतो. त्याद्वारे त्या निर्णयाचा दोष अप्रत्यक्षपणे स्वत:कडे घेतो, नि तिला वचनभंगाच्या अपराधगंडातून मुक्त करतो... कालिदासाला मल्लिकेने केले होते तसेच!
- (क्रमश:) -
पुढील भाग >> भाग - ३ : ययाती, बुधा आणि... माणूस
टीपा:
(१). युरोपिय उमरावांचे पाच वर्ग आहेत– ड्यूक, मार्क्विस, अर्ल किंवा काऊंट, वाय-काऊंट आणि बॅरन. त्यातील बॅरन ही सर्वात खालची श्रेणी. कांदिदचा मामा हा जर्मनीतील Westphalia या (वास्तविक) प्रांतातील Thunder-ten-Tronckh नामे काल्पनिक राज्याचा बॅरन आहे.जाताजाता:
जर्मनी हा ‘प्रशिया’ या नावाने राजसत्ताक असताना, तिथे ‘Prussian House of Lords’ नावाचे ‘वरिष्ठ’ सभागृह अस्तित्वात होते. जे केवळ उमराव घराण्यातील सदस्यांचे प्रतिनिधीगृह असे. यातील सदस्यत्व जन्मसिद्ध, कुलसिद्ध असे. महायुद्धोत्तर जर्मनीमध्ये मात्र हे समागृह बरखास्त करुन, नव्या संघराज्य व्यवस्थेला अनुसरून ‘राज्यांच्या प्रतिनिधींचे सभागृह’ अशी नवी रचना असलेले 'German Bundesrat' प्रस्थापित करण्यात आले.ब्रिटनमधील ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ची संकल्पना त्याच धर्तीवर आहे. तिथे हे पाच उमराव-वर्ग १९९९ सालापर्यंत या हाऊसचे पदसिद्ध सदस्य असत.
थोडक्यात संभावितांना, प्रतिष्ठितांना ब्रिटिश, जर्मन राज्यव्यवस्थेने स्वतंत्र स्थान, विशेष अधिकार दिले आहेत वा होते. ‘राज्यसभा’ या भारतातील वरिष्ठ सभागृहाची जडणघडण मात्र लोकशाहीच्या पायावर झालेली आहे, हा महत्त्वाचा फरक इथे नोंदवून ठेवायला हवा.
(२). पुस्तक: आषाढातील एक दिवस - ले. मोहन राकेश (अनुवाद: विश्वनाथ राजपाठक). प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन.
(३). आरती देवींप्रमाणेच गिरीश कार्नाडांच्या ‘हयवदन’ नाटकामधील मधील पद्मिनी आणि प्रशांत दळवींच्या ‘चारचौघी’ मधील विनी दोन भिन्न पुरुषांमध्ये असलेले गुणसमुच्चय एकाच वेळी आयुष्यात राखू इच्छितात. फँटसीच्या वळणाने जाणार्या हयवदनमध्ये पद्मिनी देवदत्ताचे शिर (पक्षी: बुद्धिमत्ता) आणि कपिलचे शरीर (पक्षी: बाहुबळ) अशा संकरित शरीराला पती म्हणून स्वीकारू इच्छिते, तर विनीला वीरेन आणि प्रकाश दोघांसोबत सहजीवन सुरू करण्याची इच्छा आहे.
---
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा ... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता
-
जेक पेराल्टा:
काही काळापूर्वी Brooklyn Nine-Nine ही मालिका पाहात होतो. मालिकेची पार्श्वभूमी एका पोलिस ठाण्याची. पण मालिका पोलिसकथा असूनही थरारपटांच्या वर्गात न मोडणारी. कथानकांचे पेड तपासकथांपेक्षा व्यक्ति त्यांच्या नातेसंबंधांच्या विविध पैलूंभोवती विणलेले. मुख्य पात्र असलेला जेक पेराल्टा हा धडाडीचा तपास-अधिकारी ऊर्फ डिटेक्टिव्ह. एका केसच्या संदर्भात, आधीच तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराकडून काही माहिती काढून घेण्यासाठी, तो गुन्हेगार असल्याची बतावणी करून त्याला तुरुंगात डांबले जाते. आपण ज्या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माचे फळ भोगायला पाठवतो, त्यांचे ते जग त्याला आतून पाहण्याची संधी मिळते.
न्यायव्यवस्थेचा(!) एक तुकडा म्हणता येईल, अशी ती ‘व्यवस्था’ वास्तवात किती अव्यवस्थित, भोंगळ, शोषक, दाहक आहे, याचा अनुभव तो घेतो. व्यवस्थेच्या ठेकेदारांची मनमानी, त्यांच्याकरवी सामान्य कैद्यांप्रती केली जाणारी हिंसा, या ठेकेदारांना पुरून उरणारे नि वचक राखणारे ‘बडे’ कैदी, तथाकथित सुरक्षा व्यवस्था असून कैद्यांसाठी अनेक वस्तूंची सुखेनैव चाललेली तस्करी, वगैरे अनुभवताना ‘आपल्या कर्तृत्वाची फलश्रुती या अव्यवस्थेला कच्चा माल पुरवते’ हे ध्यानात येऊन तो अस्वस्थ होतो. बाहेरच्या जगातील अत्याचारांना कायद्याचा निदान काही प्रमाणात वचक राहातो, इथे मात्र ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने निरंकुश सत्ता, निष्ठुरपणे राबवली जाताना तो पाहातो(१).
पुढे तो परतून येतो तेव्हा, एखादा ‘संशयित हाच गुन्हेगार’ असल्याचा दावा तो पूर्वीइतक्या ठामपणे करू शकत नाही. ‘समजा आपला निवाडा चुकला, तर त्याच्यासमोर काय वाढून ठेवले आहे’ हे आता त्याला ठाऊक असल्याने, संभ्रमाचा फास त्याच्या विचारांना पडलेला आहे. एका संशयित चोराला जरा तकलादू पुराव्याच्या आधारे तो अटक करतो. पण भक्कम पुरावा मिळत नाही हे पाहताच, ‘निरपराधाला ताब्यात ठेवणे योग्य नाही’ असा विचार करून सोडून देतो. तुरुंगवारीपूर्वीचा जेक अशा एखाद्या प्रसंगी, अशा आरोपीला ताब्यात ठेवण्यास कायद्याने दिलेले अठ्ठेचाळीस तास पुरेपूर वापरून, त्याच्याकडून गुन्ह्याची उकल करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असे.
या केसमध्ये, पुढे तो सोडून दिलेला संशयितच गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे त्या संशयिताला अशा तर्हेने घाईने सोडून दिल्याबद्दल त्याचा कॅप्टन त्याला जाब विचारतो. त्यावर जेक म्हणतो, “तुरुंगातून परत आलेला जेक आता तोच राहिलेला नाही. आता निरपराधांना त्रास होऊ नये, याची तो अधिक काळजी करू लागला आहे.” इतकेच नव्हे तर तो नि:संदिग्धपणे म्हणतो, “I used to see everything black and white while serving (the police force), now it's all grey!”
अन्य एका केसमध्ये, एका मोठ्या गुन्हेगारी कुटुंबातील प्रत्यक्ष गुन्हेगारी जगाशी संबंध नसलेल्या, सर्वात धाकट्या, बुद्धीने काहीसा मागास असलेल्या भावाशी अशीच सलगी करून, त्याच्याकरवी त्या कुटुंबातील त्याचे लक्ष्य (सीमस हा त्याचा काका) साध्य करतो. पण पुढे या धाकट्यावर – ‘काईल’वर – संशयाची सुई जाते आहे हे समजताच, एका खोट्या गुन्ह्याखाली त्यालाच अटक करून त्याच्या कुटुंबापासून सुरक्षितही ठेवतो. एरवी, ‘गुन्हेगारांचाच भाऊ, त्याला काय वाचवायचे’ असा विचार त्याने केला असता. ‘त्याच्यावरील कारवाईच्या निमित्ताने त्या कुटुंबात फूट पडली तर बरेच’ असाही विचार केला असता. पण आता तो काईलकडे ‘एका गुन्हेगार कुटुंबाचा सदस्य’ म्हणून न पाहाता, त्याच्या छायेतील निरपराध व्यक्ती म्हणून पाहतो, त्याला झळ पोहोचू नये याची काळजी घेतो. (कथानकाचा हा भाग पाहताना, ‘शत्रू मानलेल्या धर्मातील लहान मूलही मारले, तरी ते समर्थनीय मानणार्या’ संभावित समाजातील टोळी-समाज मानसिकतेच्या जनतेला बहुधा हे ध्यानातही येणार नाही.)
जेकला जोवर त्या व्यवस्थेचा अनुभव नव्हता, तोवर त्याला संभ्रम नव्हता, तसंच हा नीरक्षीरविवेकही! ‘परके सारे शत्रू/गुन्हेगार’ या मानसिकतेच्या अर्वाचीन समाजात तो राहातो आहे. त्यामुळे काळ्या-पांढर्या निवाड्याच्या अंगभूत प्रवृत्तीला अनुसरून ‘हा गुन्हेगार नि तो निरपराध’ असे निवाडे धडाधड करून, तो त्या दिशेने तपास करत असे. त्यातून त्याच्या तपासाचा वेग अधिक राहून, तो त्या ठाण्यातील सर्वाधिक गुन्ह्यांचा तपास तडीस नेणारा अधिकारी होता. पण आता त्याच्या विचारांमध्ये हा संभ्रम आहे, नि त्याने त्याची गती कुंठित होते आहे. आता त्याला तपास वेगाने तडीस नेण्यापेक्षा, डोळसपणे तडीस नेणे अधिक महत्त्वाचे वाटते आहे.
संख्याशास्त्रीय निवाडा-पद्धतींमध्ये दोन प्रकारच्या संभाव्य त्रुटींचे मोजमाप महत्त्त्वाचे मानले जाते. पहिली म्हणजे ‘गुन्हेगार असून निरपराध ठरणे’ आणि दुसरी म्हणजे ‘निरपराध असून गुन्हेगार ठरणे.’ दोन्ही त्रुटींचे कारण एकच: तपास वा न्यायव्यवस्थेतील त्रुटी!. जेक आता या दुसर्या प्रकारच्या त्रुटीकडे(२) अधिक बारकाईने पाहू लागला आहे, तिला टाळणे ही आपली जबाबदारी मानू लागला आहे.
न्यायव्यवस्थेने तुरुंगाकडे पाठवलेले बहुसंख्य लोक जिवंतपणे परत येत असतात. जगण्याला मिळालेले हे निर्णायक वळण – क्वचित एक पिढी बदलते इतके दीर्घ – एक वळसा ठरुन जगण्याची गाडी मूळ ठिकाणी येते, तेव्हा ती व्यक्ती पूर्वी होती, तिथूनच आपले जगणे सुरु करते का? बाहेरच्या समाजाचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतो हे तर उघड आहेच. पण तिचा स्वत:चा जगाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलतो का, कसा नि किती? ती व्यक्ती स्वत:कडे, आपल्या कुवत-कौशल्यांकडे, आपल्या धारणा नि विचारांकडे, महत्वाकांक्षा अथवा साध्यांकडे तसेच पाहाते– पाहू शकते का? हे कळीचे प्रश्न आहेत. हे सारे सामाजिक-मानसिक अभ्यास, हा मानसशास्त्राचे तसेच गुन्हा-उकलशास्त्राचे भाग आहेत.
ऑर्फियस आणि युरिडिसी:
तुरुंग, त्यातील नरकयातना हे वास्तव जगाचा भाग आहेत. पण ते तात्पुरते आहेत. मानवी जीवनांचा अंत म्हणजे मृत्यू– त्याला स्पर्श करुन परतलेल्या मर्त्य मानवांच्या कथाही मिथ्यकथांमधून रंगवल्या गेल्या आहेत. ग्रीक मिथ्यकथेतील ऑर्फियस हा दस्तुरखुद्द अपोलो देवाच्या आशीर्वादाने संगीत वश झालेला, अलौकिक असा कलाकार असतो. लायर (Lyre) हे ‘हार्प’सदृश वाद्य वाजवण्यात तो निष्णात असतो. त्याच्या संगीताने सजीव-निर्जीव सारेच मंत्रमुग्ध होत असत.
या ऑर्फियसचे त्याची पत्नी युरिडिसीवर अतोनात प्रेम असते. दुर्दैवाने एकदा जंगलात नृत्य करत असता, ती सर्पदंशाने मरण पावते. तिच्या विरहाने ऑर्फियस वेडापिसा होतो. अखेर तो तिला परत मिळवण्याच्या ईर्षेने पाताळलोकात अथवा मृत्युलोकात जाण्याचा निर्णय घेतो. आपल्या अलौकिक संगीताच्या साहाय्याने, अनेक अडथळे पार करत अखेर तो पाताळलोकाचा देव हेदिस नि त्याची पत्नी पर्सिफोनी यांच्यासमोर जाऊन दाखल होतो. त्यांनाही आपल्या संगीताने रिझवल्यानंतर हेदिस त्याला युरिडिसी परत देण्याचे मान्य करतो.
मिथ्यकथांवरील चित्रमालिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या Tyler Miles Lockett यांचे चित्र.परंतु त्यासाठी तो एक अट घालतो. ‘ऑर्फियस पुढे चालत राहील, नि युरिडिसी पाठीमागून येईल. पाताळलोकाची वेस ओलांडेपर्यंत त्याने मागे वळून पाहता कामा नये. तसे घडले तर युरिडिसी पुन्हा एकवार मृत्युलोकात येऊन पडेल’ असे बजावतो. पुढे चाललेल्या ऑर्फियसला, मागून येत असलेल्या युरिडिसीच्या पावलांची चाहूल ऐकू येत नसते. (याचे कारण म्हणजे, जोवर ती मृत्युलोकाच्या हद्दीत आहे तोवर ती मूळ युरिडिसीची केवळ ‘छाया’ असते. तेथून बाहेर पडल्यानंतरच तिचे मूळ व्यक्तीमध्ये रूपांतर होणार असते. जिला शरीर नाही तिचा पदरवही नसतो.) त्यातून ‘हे मृत्युदेव आपल्याला फसवत तर नाहीत ना?’ हा संभ्रम त्याच्या मनात बळावतो. अखेर पाताळलोकातून बाहेर पडण्यास काही पावलांचेच अंतर बाकी असताना तो अधीरपणे मागे वळतो, नि युरिडिसीला गमावतो.
मिथ्यकथांची प्रतिबिंबे तपासण्यात निष्णात असलेले जी. ए. कुलकर्णी ऑर्फियस-युरिडिसीची कथा(३) वेगळ्या प्रकारे मांडतात. ते असा युक्तिवाद करतात, की ऑर्फियसला युरिडिसीकडे पाहण्याचे स्वातंत्र्य नाही हे खरे, पण मागून येणार्या युरिडिसीशी बोलण्यास त्याला प्रतिबंध नाही(४). तेव्हा बाहेरच्या वाटेवर असताना, तो तिच्याशी संवाद साधत वाटचाल करु शकतो.
तिच्याशी बोलत बोलत पुढे चालला असताना त्या संवादातून त्याला जाणवते की, त्याने मृत्युदेवाकडून परत मिळवली ती त्याची युरिडिसी नव्हेच. आधीच्या उत्फुल्ल, आनंदी नि जीवनासक्त युरिडिसीचा अंशही आता तिच्यात शिल्लक नाही. मृत्यूच्या दर्शनाने अंतर्बाह्य बदलून गेलेली युरिडिसी नावापुरती जिवंत असली, तरी तिच्या मूळ वृत्तीचे, व्यक्तिमत्त्वाचे कलेवरच आहे. जगण्याची तिची आस संपुष्टात आली आहे. जीवनातील सार्थकतेऐवजी, आता त्यातील निरर्थकता, वैफल्य तिला अधिक घट्टपणे वेटाळते आहे. एवढ्या संघर्षानंतर जे मिळवले ते आता आपले राहिलेच नाही, किंवा जे मिळवले ते ज्याची आस होती ते नव्हेच, ही विदारक जाणीव त्याला होते. तोच क्षण त्याच्या – आणि तिच्याही – सुटकेचा असतो. मूळ कथेमध्ये तो संशयाधीन झाल्यामुळे युरिडिसीला गमावतो. इथे तो अनवधानाने नव्हे, तर निर्धारपूर्वक मागे वळून पाहतो नि तिला मुक्ती देतो.
पण ही कथा भावना आणि विचार यांच्यातील द्वंद्वाची आहे. कारण ऑर्फियसला आपल्या या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा पस्तावा होतो, नि तो पुन्हा देवाकडे येतो. देव त्याची कान-उघाडणी करून पुन्हा एकवार युरिडिसीला घेऊन जाण्यास फर्मावतो. पण या संवादातून युरिडिसीलाही भान आले आहे. ज्या क्षणी ऑर्फियसवर भावना पुन्हा स्वार होत आहेत, तेव्हा तिचे विचार मात्र तिला थोपवत आहेत. आता ऑर्फियसबरोबर परतून येण्यास तीच नकार देते. या सार्या सव्यापसव्यातून मृत्युदेवतेच्या ज्ञानातही भर पडते. इतकेच नव्हे तर आपल्या मर्यादा, आपले दौर्बल्य ती उघड करते.
ही मिथ्यकथा असल्याने थेट मृत्युशी सामना रंगवला आहे. वास्तवातील युरिडिसीने स्वत:चा मृत्यू नव्हे, तर जिवलगांचे, प्रिय व्यक्तींचे मृत्यू अनुभवले असतील(५). त्यानंतर मृत्यु ही संकल्पना वास्तव आहे, याचे भान तिला आले असेल. आपल्या जगण्यातील सारे शुभंकर, सुंदर, सुखकर असे जे काही आहे, ते– आपल्यासह सारे, काही काळाने विरून जाणार आहे याची जाणीव झाली असेल. त्यातून उत्फुल्ल जिण्यावर मृत्युची ती कृष्णछाया पसरली असेल. सर्वच समाजात– विशेषत: भारतीय वा आशियाई समाजामध्ये मुलांचे आई-वडिलांशी असलेले बंध स्वत: आईवडील होऊनही जिव्हाळ्याचे असतात. अशा वेळी या मागील पिढीतील व्यक्तींचे मृत्यु ही त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक दु:खदायक घटना असते. मागची पिढी सरली, आता मृत्युचा फास आपल्याकडे सरकू शकतो, याची जाणीव तेव्हा होत असते.
ही मागची पिढी एक प्रकारे मृत्यु आणि पुढील पिढी यांच्या दरम्यान असणारे कुंपण असते. ते ढासळले, की मृत्युसेना नव्या पिढीच्या आवारात प्रवेश करण्यास सज्ज होत असते. आणि ते भान आले की तारुण्यातील अनेक गुणांचा र्हास सुरु होतो. संवेदनशील व्यक्तींना केवळ जवळच्याच नव्हे तर आसपासच्या व्यक्तींचे मृत्यूही जगण्यातील वैफल्याची, अगतिकचेही लख्ख जाणीव करुन देतात. आई-वडिलांचा, पहिल्या पत्नीचा मृत्यु आणि दुष्काळात पाहिलेले मृत्युचे थैमान, सुखवस्तू जिणे जगणार्या तुकोबाला अध्यात्म मार्गावर आणून सोडते.
ऑर्फियसची भारतीय आवृत्ती म्हणून सावित्रीकडे कथा पाहाता येईल. सावित्री नि ऑर्फियस यांच्यातील कथेतील आणखी एक साम्य म्हणजे ‘त्यांचे दांपत्यजीवन अल्पायुषी राहील’ असे भाकित आधीच केले गेले होते. फक्त त्यात थोडा फरक होता. सत्यवान हा अल्पायुषी ठरेल असे वैय्यक्तिक भाकित होते, तर ऑर्फियस-युरिडिसी यांच्या दांपत्यजीवनाबाबत ते केले गेले होते. सावित्रीसारखी बाणेदार स्त्री स्वत:हून असा संभाव्य अल्पायुषी पती स्वीकारते. या विवाहाला ऑर्फियस-युरिडिसीप्रमाणे विवाहपूर्व प्रीतीचा आधार नाही.
ऑर्फियसला संगीताचे वरदान होते, तर सावित्रीला बुद्धिमत्तेचे. तिच्या साहाय्याने चाणाक्षपणे ती यमाला शब्दाचा खोडा अडकवून आपल्या पतीचे प्राण परत मिळवते. वर उल्लेख केलेल्या कथेमध्ये युरिडिसीला मृत्यूकडून परत मिळवल्यानंतरच्या ऑर्फियसचा मानसिक आंदोलनाचा पट जीएंनी सुंदर रंगवला आहे. जीएंनीच अनुवाद(६) केलेल्या, डी. एच. लॉरेन्सच्या ‘द मॅन हू डाईड’ मधे पुनर्जात येशूचे संभाव्य आयुष्य त्याने कल्पनेने साकार केले आहे. यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवल्यानंतरच्या, सत्यवानाच्या वैय्यक्तिक नि सत्यवान-सावित्रीच्या दांपत्यजीवनाबद्दल, आपल्याकडे काहीच नोंदवलेले दिसत नाही. मृत्यूपूर्व सत्यवान नि पुनर्जात सत्यवान ही व्यक्ती म्हणून एकच असली, तरी प्रवृत्तीने तशीच होती का? जीएंच्या युरिडिसीच्या व्यक्तिमत्त्वाला मृत्यूचे अदृश्य अवगुंठन जसे वेटाळून राहते, तसे सत्यवानाबाबत काही घडले असावे का? कदाचित ते ही एका कथेचा विषय होऊ शकेल.
नचिकेता:
https://www.lifelords.com/story/nachiketa-story/ येथून साभार.मृत्युशी सामना करणार्या आणखी एका मर्त्य मानवाची– नचिकेताची कथा आपल्याकडील कठोपनिषदामध्ये सुरुवातीलाच सापडते. परंतु फरक असा की, नचिकेत मर्त्य जगातील काही परत मिळवण्याच्या उद्देशाने यमाला सामोरा गेलेला नाही. त्याच्या वडिलांनी दिलेले दान म्हणून तिथे गेला आहे. स्वत: यम त्यावेळी यमलोकात नसल्याने त्याला तीन दिवस तिष्ठत राहावे लागते. त्याला झालेल्या या त्रासाची भरपाई म्हणून यम त्याला तीन वर देऊ करतो. त्या वरांना अनुसरून तो प्रथम आपल्या लोभी वडिलांसाठी सुखसमृद्धी मागतो. दुसरा नि तिसरा वर मात्र स्वत:साठी मागतो.
हे दोनही वर त्याच्या जिज्ञासू वृत्तीला अनुसरून मागितलेले आहे. यामुळे त्याला प्राचीन भारतातील आद्य जिज्ञासू मानले जाते. दुसर्या वराने तो यज्ञीय अग्निबाबतचे ज्ञान मागतो. यम त्याला ते देऊ करताना, ‘त्या यज्ञीय अग्निलाच ‘नचिकेत’ हे नाव रूढ होईल’ असा वर देतो. तिसर्या वरानुसार तो ‘मृत्यूपश्चात अस्तित्वाचे रहस्य’ उकलण्याची विनंती करतो. खुद्द देवादिकांनाही अज्ञात असलेले हे ज्ञान त्याला देण्यास यम भरपूर टाळाटाळ करतो, त्याला अनेक प्रलोभने दाखवतो. पण नचिकेता अविचल राहातो नि अखेर हे ज्ञान मिळवतो.
या यमभेटीनंतर तो मर्त्य जगात परतून येतो. परंतु सावित्री-सत्यवानाप्रमाणेच त्याच्याही मृत्युभेटीपश्चात उत्तरायुष्याबद्दल आपल्याला काहीही ठाऊक नाही. त्याने मिळवलेल्या त्या ज्ञानाचा, त्याच्या भावी आयुष्यावर काय नि कसा परिणाम झाला, याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. लॉरेन्सच्या ‘द मॅन हू डाइड’च्या धर्तीवर ‘द सन हू सर्व्हाईव्हड’ नावाने नचिकेताचे उत्तरायुष्य कुण्या लेखकाने चितारून पाहायला हवे(७). त्याच्या आधारे इतिहासभोगी, पाठांतरप्रधान आणि अनुनयवादी देशात नि समाजात जिज्ञासेचे एक लहानसे रोपटे कदाचित कुठेतरी रुजवता येईल.
- (क्रमश:) -
पुढील भाग >> भाग - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी
टीपा :
(१). तुरुंगाधिकारी व त्याच्या हाताखाली राबणार्या व्यवस्थेचे वेधक चित्र अनिल बर्वे यांच्या ‘थँक यू, मि. ग्लाड’ मध्ये उभे केले आहे. जेलर ग्लाडच्या दहशतीचे वर्णन करताना बर्वे केवळ माणसेच नव्हे तर तुरुंगातील निसर्गही ग्लाडच्या दहशतीमध्ये होता याचे उल्लेख करतात:
‘पाखरांची किलबिल एकदम शांत झाली. रस्ता निर्मनुष्य झाला. काळ्याशार डांबरी रस्त्यावर पावले खाड् खाड् वाजू लागली...’
‘ग्लाडसाहेबाला पाहताच तुरुंगातील वडा-पिंपळाची झाडे अंग चोरून उभी राहिली आणि फाशी गेटला कापरे भरले...’
‘ग्लाडसाहेब चार दिवसांच्या रजेवर जातोय हे पाहून तुरुंगातल्या वडापिंपळाच्या झाडांनाही एकदम मुक्त झाल्यासारखे वाटू लागले...’(२). ‘अनेक गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये’ हे भारतीय न्यायव्यवस्थेचे धोरणही, या दुसर्या त्रुटीलाच अधिक गंभीर मानणारे आहे. संख्याशास्त्राचा पायाही हीच त्रुटी मर्यादित ठेवणार्या निवाडापद्धती विकसित करण्याच्या दृष्टीने घातलेला आहे.
(३). पुस्तक: ‘पिंगळावेळ’ - ले. जी. ए. कुलकर्णी. पॉप्युलर प्रकाशन.
(४). मध्यंतरी ‘श्रॉडिंजर्स कॅट’ या प्रसिद्ध प्रयोगाबाबतही, ‘खोक्यातले ते मांजर जिवंत आहे की मृत, हे त्याच्या ‘म्यांव’ करण्यावरुन, वा न करण्यावरुन समजू शकेल की’ असा युक्तिवाद करणारे एक भाष्यचित्र पाहण्यात आले होते त्याची आठवण झाली.
(५). ‘क्लॅश ऑफ टायटन्स’ या चित्रपटामधील आयो पर्सिअसला म्हणते, ‘मला चिरंजीवित्वाचा शाप आहे. माझ्या सार्या जिवलगांचे मृत्यू सोसत मला जगावे लागते आहे.’
(६). कथा: ‘मेला होता तो माणूस’. पुस्तक: पैल पाखरे - ले. जी. ए. कुलकर्णी. प्रकाशक: परचुरे प्रकाशन मंदिर.
(७). अशा लेखनावर वादंग निर्माण करण्यास टपून बसलेल्या गल्ली-बोळातल्या फुटकळ सेना, ब्रिगेड वा संघटना आणि रचनात्मक, सर्जनशील लेखनापेक्षा अस्मिताजन्य वादंगांमध्ये अधिक रस असलेली माध्यमे नि समाजात हे धाडस करण्याच्या फंदात कुणी पडेल असे वाटत नाही.
---
संबंधित लेखन: अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास.
बुधवार, १८ डिसेंबर, २०२४
‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी
-
(‘थँक यू, मि. ग्लाड’ या अनिल बर्वे लिखित कादंबरी/नाटक यांबाबत विवेचन करणारे दोन लेख ‘वेचित चाललो’ वर लिहिले होते. विषयसंगतीनुसार काही तपशील वगळून हा मजकूर एकत्रितरित्या ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर-२०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
कवितासंग्रह: ‘थॅंक यू, मिस्टर ग्लाड’
लेखक: अनिल बर्वे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०)
—काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्यूट ठोकला नि आपली सेवा तिरंग्याला रुजू केली. ग्लाडसाहेबांची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्याला होती...
(पान ७).... नक्षलवादी चळवळीचा वाढता जोर पाहून साहेबाच्या उरात धडकी भरे. भारतात खरेच ‘कम्युनिस्ट रेव्होल्यूशन’ होणार असे त्याला वाटू लागे. अर्थात जरी भारतात कम्युनिस्ट रेव्होल्यूशन झाले असते, तरी फारसे काही बिघडले नसते. तिरंगा उतरून लाल बावटा वर चढल्यावर ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडकडीत सॅल्यूट ठोकला असता, नि आपली सेवा लाल बावट्यालाही रुजू केली असती."
(पान १४)
---
अनिल बर्वे यांच्या अतिशय गाजलेल्या ‘थँक यू, मि. ग्लाड’ या कादंबरीतील हे दोन परिच्छेद! निष्ठेचे सातत्य, निष्ठाविषय मात्र बदलता हे वरवर पाहता परस्परविसंगत वाटते. पण थोडा विचार करुन जाऊन पाहिले, तर असे दिसते की हे शक्य आहे– नव्हे हे फारच सार्वत्रिक आहे. सद्य राजकारणातील एखाद्या एखाद्या नेत्याने पक्ष बदलला, की त्याच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठाही त्याला अनुसरून बदलतात. नव्या पक्षाशी त्यांच्या निष्ठा जुन्या पक्षावर होत्या तितक्याच तीव्र असतात. सध्याचे राजकारण पाहिले तर राजकारणातली गणितं बदलली की सर्वसामान्यांच्या निष्ठाही त्यानुसार हेलकावे खाताना दिसतात. काल ज्याचे गुणगान गाताना थकत नव्हती; परिस्थिती बदलताच, आज त्याच्या नावे शंख करणारी माणसे दिसतात. त्यामुळे ग्लाडच्या प्रवृत्तीचे हे वर्णन वाचल्यावर हा मि. ग्लाड मला सर्वसामान्यांच्या प्रवृत्तीचे एक रूपच वाटू लागला.
एकीकडे ‘आपला महान देश...’ वगैरे जपमाळ ओढणारी जमात दुसरीकडे ब्रिटिशांनी आणलेल्या नोकरशाहीची कास धरुन आपले पोट भरत होती. त्यावेळी तिला ब्रिटिश सत्ता ही उत्थानकारी वाटत होती. देश बिटिश सत्तेच्या अंमलाखालून मुक्त झाल्यावर, निर्माण झालेल्या संधींचा सर्वाधिक लाभही याच जमातीने घेतला. एका बाजूने हा फायदा घेत असतानाच, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील लढ्याच्या धुरिणांना बदनाम करुन ते ही श्रेय आपल्या खाती ओढून आणण्याचा त्यांचा आटापिटा सुरु झाला. आता ते स्वत:ला ब्रिटिशविरोधी लढ्याचे वारसदार म्हणून सिद्ध करण्याची खटपट करु लागले.
वर ग्लाडबाबत म्हटल्याप्रमाणे उद्या जर खरोखरच कम्युनिस्ट क्रांती झाली, नि देश लोकशाहीकडून तथाकथित श्रमिकांच्या एकाधिकारशाहीकडे सरकला, तर आज विरोधी मताच्या व्यक्तीला तुच्छतेने ‘अर्बन नक्षलवादी’ संबोधणारी ही जमात एकमेकाला ‘कॉम्रेड’ म्हणून संबोधू लागेल यात शंका नाही.
‘जे आपले आहे ते– नव्हे फक्त तेच– श्रेष्ठ आहे’ हा दुराग्रह असणारी ही जमात कोणत्याही समाजात बहुसंख्येनेच असते. ‘आपण नेमके श्रेष्ठ जातीमध्ये, धर्मामध्ये, देशामध्ये, सत्तेच्या मॉडेलमध्ये कसे काय जन्माला आलो बुवा?’ असा प्रश्न तिला पडत नसतो. न निवडलेल्या, अनायासे मिळालेल्या आपल्या गटाचे निर्विवाद श्रेष्ठत्व ती अत्यंत आक्रमकपणे प्रतिपादित असते.
या जमातीमधील प्रत्येक जण एका बाजूने शोषित असतो, तर दुसर्या बाजूने शोषकाच्या भूमिकेत जाऊन आपल्या शोषकांचा सूड आपल्याहून दुबळ्या, आपल्या अधीन व्यक्तींवर उगवत असतो. काही वर्षांपूर्वी एक सुरेख लघुकथा वाचली होती. अडचणीत आलेल्या, वैतागलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सुरु झालेली साखळी— मंत्री, त्यांचा सचिव, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, त्याच्या हाताखाली काम करणारा तात्यापर्यंत पोचते. घरी पोहोचलेला तात्या तिथला राग/वैताग बायकोवर काढतो, मग ती त्यांच्या मुलावर आणि तो एका भटक्या कुत्र्यावर... त्याने पेकाटात हाणल्याने केकाटलेले कुत्रे, ते धडकल्यामुळे पडलेला भय्या, त्याच्या धक्क्याने हेलपाटलेली बुरख्यातली बाई आणि त्यातून निर्माण झालेला हिंदू-मुस्लिम तणाव पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर नवी समस्या उभी करतो. प्रत्येक टप्प्यावरचा शोषित हा शोषक बनून शोषणाला खालच्या टप्प्याकडे टोलवत जातो आणि मागच्या समस्येच्या निराकरणाऐवजी नव्या समस्येला जन्म देत जातो.
‘थँक यू, मि. ग्लाड’ मधील जेलर ग्लाड हा असाच एका टप्प्यावरचा शोषित आहे. जर्मनीत असताना त्याच्यादेखत त्याच्या ज्यू पत्नीला– ‘मारा’ला– गेस्टापो ओढून घेऊन गेले. आडदांड प्रकृतीचा ग्लाड त्यांच्यासमोर पार हतबल ठरला होता; प्रतिकार करणे तर सोडाच, पण माराला सोडावे म्हणून तो त्यांच्यासमोर गयावया करत लीन झाला होता. इतके पुरेसे नव्हते; माराने त्याच्या भेकड लाचारीचा अधिक्षेप केला होता. यातून एक प्रकारे त्याच्यातल्या पौरुषाचा निर्णायक पराभव झालेला होता. त्याने त्याचा अहंकार दुखावला गेला.
ती खदखद घेऊनच तो भारतात आला आहे, मनातून सूडाने पेटलेला आहे. त्याच्या लाडक्या माराला ठार मारणार्या नाझींचा त्याला सूड घ्यायचा आहे. पण त्या वेळी नाझींशी दोन हात करणे त्याच्या कुवतीचा भाग नव्हते. तिथे शोषित असलेला ग्लाड आता शोषकाच्या भूमिकेत जाऊन त्याच्या हाती सापडलेल्या कैद्यांवर सूड उगवून आपल्या गमावलेल्या पौरुषाला पुन्हा पुन्हा आळवत राहातो. त्यातून ‘माराची हत्या करणार्या नाझींचाच जणू आपण सूड घेत आहोत’ अशी काहीशी भावना त्याच्या नेणिवेमध्ये निर्माण होत असावी.
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधील क्रौर्य हे अनेकदा त्याच्या मनाच्या तळाशी असलेल्या वैफल्याचा, न्यूनगंडाचा अवतार असते. भाषिक संवादामध्ये कमकुवत बाजू असलेला ज्याप्रमाणे आवाज वाढवून वा समोरच्याची मुस्कटदाबी करुन आपले म्हणणे सिद्ध करण्याचा आटापिटा करतो, त्याचप्रमाणे हा क्रूरपणा म्हणजे वास्तविक न्यूनगंडावर या तथाकथित शौर्याचे ढिगारे चढवून त्याला गाडून टाकण्याचा प्रयत्न असतो.
सर्वसामान्य माणसेही ग्लाडसारखीच असतात. कुठे तरी झालेल्या अन्यायाचा कुठे तरी सूड घेतला याचे समाधान त्यांना पुरेसे असते. कुणीतरी केलेल्या गुन्ह्याची कुणाला तरी वा कुठे तरी शिक्षा मिळाली की ते आनंदी होतात. कुठल्याशा दुबळ्या धाग्याने का होईना– मूळ गुन्हेगाराशी ज्याचा संबंध लागतो अशा कुणाला शिक्षा देता आली तरी ते पुरेसे समजले जाते. ‘नाझी हे गुन्हेगार होते नि आपल्या हाती सापडलेलेही गुन्हेगारच आहेत’ हा धागा ग्लाडला पुरेसा वाटत असतो. हीच वृत्ती सामान्य नागरिकाचीही असते, मग ते अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातले असोत की भारतासारख्या देशातले. बहुसंख्या ही ‘अमुक गुन्ह्याचा गुन्हेगार अमुक जात वा धर्माचा आहे, म्हणून त्या गटातील कुणालाही त्याची शिक्षा झाली तरी ते न्याय्य आहे’ असे मानणारी असते.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड तेथील जनतेला हवा होता. पण अशा प्रकारच्या संघटित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृत्यामधले मुख्य सूत्रधार सापडणे जवळजवळ अशक्यच असते. त्यामुळे मग ते नाही, निदान त्यांच्या गटाची– धर्माची माणसे मारून सूड घेतल्याचे समाधान तेथील जनतेला हवे होते. अध्यक्ष बुश यांनी ‘Weapons of Mass Destruction'ची भुमका उठवून इराकचा— एका मुस्लिम राष्ट्राचा! — विध्वंस केला आणि जनतेला ते समाधान दिले. गुन्हा केला कुणी नि त्याची शिक्षा कुणाला मिळाली. पण लोकक्षोभ शांत झाला. (आणि बुश राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले.)(१)
भारतातही अशा तात्कालिक सूडाच्या कथा भरपूर सापडतात. यातूनच ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ नावाची जमात निर्माण होते. लोकांना हा झटपट न्याय आवडतो... अर्थात जोवर तो आपल्या अंगाशी येत नाही तोवर! म्हणून मग हैदराबादमधील नृशंस बलात्काराने उठलेल्या जनक्षोभाला शांत करण्यासाठी पोलिस चार फाटक्या जिवांना संशयित म्हणून समोर आणतात, त्यांना आरोपी म्हणून घोषित करतात आणि नंतर तथाकथित एन्काउंटरमध्ये त्यांचा निकालही लावतात. सर्वसामान्य तर सोडाच सेलेब्रिटी मंडळीही पोलिसांची स्तुती करताना थकत नाहीत. त्या पोलिसांवर पुष्पवृष्टी केली जाते. ज्यांच्याविरोधात अद्याप तपासही पूर्ण झालेला नाही अशा आरोपींच्या घरावर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे शासन सरळ बुलडोझर चालवते, आणि स्वत:ला संभावित म्हणवणारे या न्यायाबद्दल (?) शासनाचे कौतुक करताना थकत नाहीत.
हैदराबाद एन्काउंटर(?)मध्ये मारले गेलेले हे संशयित हे गुन्हेगार सोडा, अद्याप आरोपीही नव्हते. तीच बाब म.प्र. नि उ.प्र. मध्ये आपला निवारा गमावून बसलेलेही. मग खरेच गुन्हेगार होते का? असा प्रश्नही फारसा कुणाला पडत नाही. असले, तरी ‘त्यांना न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून शिक्षा व्हायला हवी’ असा आग्रह कुणी धरला नाही. पोलिस म्हणाले म्हणजे ते गुन्हेगार होतेच असे समजणार्या या संभावितांनी ‘सर्वच गुन्ह्यांच्या केसेसमध्ये आपण असे मान्य करतो का?’ असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहिला नाही.
ज्या गटाने हैदराबादचे तथाकथित एन्काउंटर ‘पोलिस म्हणतात म्हणजे ते गुन्हेगार होते’ असा दावा केला होता, त्याच गटाने ‘त्यांच्यावर’ सूड घेतला गेला या आनंदात, आठ वर्षांच्या चिमुरडीवर अनेकांनी अनेकवार केलेला बलात्कार नि तिची हत्या अप्रत्यक्षरित्या समर्थनीय ठरवली होती. त्यावेळी मात्र पोलिसांनी जाहीर केलेल्या आरोपींना गुन्हेगार मानायची त्यांची तयारी नव्हती. उलट आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढले गेले होते.
जनता ही अशी स्वार्थी नि नीच वृत्तीची असते. बहुसंख्य प्रत्यक्ष कृती करत नसले, तरी त्यांच्यात ती प्रवृत्ती जिवंत असते. म्हणून आठ वर्षांच्या असिफावर केलेल्या बलात्काराने ती तिला विकृत आनंद होतो, चार फाटक्या जिवांच्या एन्काउंटरने तिला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते; पण त्याचवेळी एखाद्या मद्यधुंद हिंदी हीरोने गाडीखाली चिरडलेल्या पाच जिवांना न्याय मिळावा यापेक्षा, त्याची सुखरूप सुटका व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसते...
... आणि हीच जनता जेलर ग्लाडने क्षुल्लक कारणाने बडवून काढलेल्या कैद्यांबद्दल काडीची सहानुभूती न राखता, ‘मग काय गुन्हेगारच तर आहेत’ म्हणत निर्लज्ज समर्थन करते! पण नेमक्या त्याच वेळी नक्षलवाद्याने केलेल्या तशाच प्रकारच्या कृतीला ती भयंकर समजते, ‘त्याला तातडीने फाशी दिली पाहिजे’ असे म्हणते. आणि आता हे एकदा सोयीचे झाले, की गैरसोयीची मते मांडणार्या कुणालाही ‘अर्बन नक्षलवादी’ असल्याचा शिक्का मारुन तुरुंगात घालू पाहाते... कारण ‘सध्या’ नक्षलवादी सत्ताधारी नाहीत; असते... तर त्यांचे मूल्यमापन वेगळे झाले असते !
दुसरीकडे ग्लाडसमोर उभा ठाकलेला वीरभूषण पटनाईक हा पोलिस चौकी उडवून सात पोलिस आणि एक सब-इन्स्पेक्टरची हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा झालेला नक्षलवादी. मार्क्सवादाचा हा अतिआक्रमक अवतार नक्षलवाद मध्यपूर्व भारतात अजूनही मूळ धरुन आहे. नक्षलवादी लोकशाही व्यवस्था आपापत:च भांडवलशाहीची बटीक आणि म्हणून शोषक मानतात. या व्यवस्थेचे सर्व घटक हे शोषकांचे हस्तक आहेत असे ते मानतात. लोकशाही व्यवस्थेची उपव्यवस्था असलेल्या दंडव्यवस्थेचे नि न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधी असलेले पोलिस आणि अन्य सशस्त्र दले त्यांचे शत्रूच आहेत. इतकेच नव्हे तर लोकनियुक्त प्रतिनिधी, प्रशासनातील लोक, त्यांच्या वतीने लोकाभिमुख कार्य करणारेही अप्रत्यक्षरित्या या ‘शोषक’ व्यवस्थेचे आधार असल्याने क्रांतीचे शत्रू आहेत असा त्यांचा दावा असतो.
ती लोकशाही व्यवस्था उलथून टाकून नवी लोकाभिमुख व्यवस्था उभी करण्याचा उद्देश असल्याचा दावा करतात. सर्वात महत्वाचा मुद्दा हा, की या त्यांच्या तथाकथित ‘स्वातंत्र्यलढ्यात’ अगदी सामान्य व्यक्तीप्रती केलेल्या हिंसेचा वापरही ते त्याज्य मानत नाहीत. किंबहुना तेच त्यांचे मुख्य हत्यार आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला समांतर अशा ‘पीपल्स कोर्ट’ नामक व्यवस्थेकरवी त्यांचा निवाडा करण्याचा त्यांचा प्रघात आहे. आणि अशा क्रांतिशत्रूंना त्यांच्याकडे एकच शिक्षा आहे, देहदंड !
थोडक्यात आजच्या लोकशाहीमध्येही ‘कॉल द डॉग मॅड अँड शूट हिम’ मानसिकतेच्या बहुसंख्येला अभिप्रेत असलेली व्यवस्थाच नक्षलवादालाही अभिप्रेत आहे. आणि म्हणून उद्या नक्षलवादी व्यवस्था प्रस्थापित झाली, तर ग्लाडप्रमाणेच देशभक्तीची जपमाळ पेटीत ठेवून, देशभक्तीचा झगा उतरवून, बहुसंख्य लोक लाल कफनी चढवतील आणि न पटणारी मते मांडणार्याला ‘देशद्रोही’ वा ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणण्याऐवजी ‘क्रांतिशत्रू’ किंवा ‘प्रतिक्रांतिवादी’ म्हणून हिणवू लागतील. त्यांच्या दृष्टीने फरक झाला तर इतकाच होईल... आणि म्हणून जेलर ग्लाड अशा जनतेचा डार्लिंग असतो.
जेलर ग्लाड हा ही नक्षलवाद्याप्रमाणेच आपल्या व्यवस्थेच्या अंतर्गत गुन्हेगारांविरोधात हिंसेचा सढळपणे वापर करणारा आहे. त्याअर्थी हे दोघे दोन विरोधी व्यवस्थांमधले एकमेकांचे प्रतिबिंबच म्हणावेत असे. तो तुरुंग म्हणजे ग्लाडसाहेबाचे साम्राज्य. तिथले कर्मचारीच काय पण त्या आसमंतातले सजीव-निर्जीव सारेच साहेबासमोर चळचळा कापणारे. नक्षलवादी प्रमुख तुरुंगाधिकारी असलेल्या ग्लाडला ‘जेलरसाहेब’ या उपाधीने न संबोधता सरळ ‘मि. ग्लाड’ म्हणून संबोधतो आहे. एक प्रकारे त्याच्या सत्तास्थानाला, अधिकाराला आणि पर्यायाने तो ज्या व्यवस्थेचा भाग आहे तिच्या सार्वभौमत्वाला आपण नाकारतो असा स्पष्ट संकेत देतो आहे.
ग्लाडची ख्याती पाहता सुरुवातीला एकतर्फी होईल असा सामान्य तर्क असलेला दोघांचा सामना पाहता-पाहता तुल्यबलांचा होऊन जातो. बाहुबळ, हिंसा ही प्रमुख हत्यार मानणार्या दोघांचा हा सामना मात्र मनोबलाचा सामना होऊन राहतो. आणि या कादंबरीचे तेच वैशिष्ट्य आहे. यात कुठेही लोकशाही आणि नक्षलवादाला अभिप्रेत असलेल्या व्यवस्थांचा, दृष्टिकोनाचा संघर्ष नाही. संघर्ष आहे तो दोन व्यक्तिंमधला. ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला!
संघर्षाच्या अखेरीस ग्लाडची मान किंचित झुकते. ब्रिटिशांची चाकरी करत असताना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना त्याने गुन्हेगारांप्रमाणे निष्ठुरपणे वागवले होते. पण वीरभूषणला तो निव्वळ गुन्हेगार न मानता क्रांतिकारक म्हणून मान्यता देतो. अर्थात याचा अर्थ त्याला नक्षलवाद्याची विचारधारा पटली आहे असा नाही. व्हॉल्टेअरच्या उक्तीला अनुसरून आपल्याला न पटणार्या विचारधारेचा निष्ठावान पाईक म्हणून त्याला तो क्रांतिकारक म्हणतो आहे. आणि याला त्या नक्षलवाद्यामधल्या माणसाचे त्याला झालेले दर्शन अधिक कारणीभूत आहे. दुसरीकडे लोकशाही धिक्कारुन पर्यायी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी शस्त्र उचलणार्या नक्षलवाद्याचा स्वत:च्या स्थानाबद्दलचा भ्रमनिरासही ग्लाडमुळे होतो. त्याअर्थी त्याचा कणाही झुकतो आहे.
‘...ग्लाड’मध्ये वीरभूषणने जेनीची प्रसूती करण्याच्या आणि ताठ कण्याच्या कैद्याप्रती जेलरच्या मनात सहानुभूती निर्माण होण्याच्या प्रसंगांच्या आवृत्या पुढे नाटक-चित्रपटांत पुन्हा पुन्हा येत राहिल्या. ‘थ्री इडियट्स’ या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामधील प्रि. सहस्रबुद्धेंच्या मुलीच्या प्रसूतीचा क्लायमॅक्स आठवून पाहा. तशीच धुवांधर पावसाळी रात्र, तसेच तुंबलेले रस्ते, तसाच तुटलेला संपर्क आणि प्रिन्सिपलच्या नावडत्या विद्यार्थ्यानेच केलेली त्याच्या मुलीची प्रसूती ! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ मध्ये वैचारिकदृष्ट्या दुसर्या अक्षावर असलेल्या- पण नक्षलवाद्याप्रमाणेच हिंसा हे हत्यार समर्थनीय मानणार्या नथुरामच्या व्यक्तिमत्वामध्ये नाटककाराने वीरभूषण पटनाईकचे बरेच रंग मिसळून दिलेले दिसतात. त्यातील जेलर शेखची तर वाक्येच्या वाक्ये ग्लाडची आठवण करुन देतात.
कादंबरी वाचत असताना त्यातील वीरभूषण पटनायक या कैद्याच्या (नक्षलवाद्याच्या) ताठ कण्याच्या व्यक्तिमत्वाचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडत जातो. अखेरच्या प्रसंगामध्ये जेलर ग्लाड त्याचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्षपणे मान्य करतो असा उतावळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो- काढला गेला. त्यातून नकळत वीरभूषण या पात्राचे उदात्तीकरणही झाले.
यातून झालं असं की एखाद्या एकांगी विचाराच्या व्यक्तिमत्वावर मानवी वृत्तीचा शेंदूर लावून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी या व्यक्तिमत्वाने एक आराखडाच (template) देऊ केला. महात्मा गांधीच्या खुन्याचे समर्थन करण्यासाठी याच नाटकावर हिंदुत्ववादी संस्करण करुन रंगभूमीवर आणण्यात आले. आजच्या प्रचार-लढाईच्या कालखंडात भानावर राहणे किती मोलाचे आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या कादंबरी/नाटकाकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहणे, भारावून न जाणे हे महत्त्वाचे ठरते.
‘थँक यू मि. ग्लाड’च्या शेवटाकडे झुकताना ‘वीरभूषण हा आपला शत्रू असला तरी आपल्या विचारांवर निष्ठा असणारा, त्यासाठी सर्वस्व झोकून देणारा आहे, त्या अर्थी क्रांतिकारक आहे’ अशी जाणीव ग्लाडला होते. म्हणूनच एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला फाशी न देतात क्रांतिकारकाला साजेसा मृत्यू तो देऊ करतो. आणि यातून वाचकाला वीरभूषणबाबत निर्माण झालेली सहानुभूती अधिक गाढ होत जाते. पण...
...‘हा विचार ग्लाडचा आहे’(!) हे विसरून चालणार नाही! वीरभूषणने सात-आठ व्यक्तींची हत्या केली आहे, पण ती त्याच्या ‘वैचारिक निष्ठेतून केली आहे’ असे त्याचे म्हणणे आहे. आणि जेलर ग्लाडलाही अखेरीस - परिस्थितीवश - मान्य झालेले दिसते. ग्लाड असा विचार करु शकतो, कारण ज्यांच्याशी आपले प्रत्यक्ष वैर वा संघर्ष नाही अशांप्रती एकतर्फी शारीरिक हिंसा हे त्याच्याही दृष्टीने स्वसत्ता प्रस्थापित करण्याचे अथवा राबवण्याचे वैध हत्यार आहे. तेव्हा आपल्या निष्ठेसाठी विरोधी(?) बाजूंच्या काही जणांवर अत्याचार झाले तर त्यात काही गैर नाही, असाच त्याचाही समज आहे... आपल्या आसपासच्या बहुसंख्येचाही असतो! त्यामुळे ‘पाशवी वृत्ती तीच, फक्त वैचारिक भूमिका वेगळी’ असणार्या वीरभूषणकडे ‘मला न पटणार्या विचारांचा क्रांतिकारक’ म्हणून जेलर ग्लाड पाहू शकतो.
ग्लाड ‘बळी तो कान पिळी’ याच विचाराचा असला, तरीही वीरभूषणने त्याच्यातील विचाराला जागवले आहे, उपकृतही केले आहे. म्हणून तो असा विचार करु शकतो. एरवी विरोधकांवर मात करण्यासाठी ‘पुरा तयांचा वंश खणावा’ वृत्तीचा एखादा अतिरेकी मानसिकतेचा हिंदुत्ववादी नक्षलवाद्यांबद्दल असा विचार करु शकेल? किंवा उलट दिशेने एखादा नक्षलवादी अशा हिंसाप्रेमी हिंदुत्ववाद्याबद्दल असा विचार करु शकेल? विशिष्ट वैचारिक दृष्टिकोन असणार्यांचे सोडा, तुमच्या-आमच्यासारखे वैचारिकतेचा केवळ झेंडा खांद्यावर मिरवणारे, एरवी वैचारिकतेमधील री पहिली की दुसरी हे ही माहित नसणारे हे करु शकतील का?
माझ्यापुरते याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण माझ्या विचारांचे पोषण लोकशाही मूल्यांवर झाले आहे. आणि माझ्या दृष्टीने ती मूल्ये म्हणजे डाव्यांप्रमाणे वा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे ‘मला हवी तशी हुकूमशाही प्रस्थापित होईतो- नाईलाजाने घालावी लागणी टोपी’ नाही. तिच्यातील दोष मान्य करुनही ती मला निर्विवादपणे स्वीकारार्ह असलेली व्यवस्था व विचारसरणी आहे.
निरपवाद, निरपेक्ष अशी न्यायाची कोणतीही कल्पना या जगात अस्तित्वात नसते! जो तो आपल्याला अभिप्रेत व्यवस्थेला अनुसरूनच न्याय-संकल्पना मांडत असतो. वीरभूषणने तेच केले आहे नि ग्लाडनेही. मी ही माझ्या व्यवस्थेला अनुसरूनच माझी कल्पना विकसित करणार हे साहजिक आहे. आणि माझ्या न्याय-संकल्पनेच्या परिघामध्ये या दोघांचेही वर्तन निषेधार्ह आहे— दंडनीय आहे!
मानवी समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये माणसे एकक (subjects) असतात आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांच्या तंट्यांचे, संघर्षाचे, हक्काचे निवाडे करता येतात. पण दोन व्यवस्थांना पोटात घेणारी एखादी मातृ-व्यवस्था (super-system) नसते, जिथे त्या दोन्हींना त्या व्यवस्थेअंतर्गत एकक (subject) मानून त्यांच्या परस्परसंबंधांचे निवाडे तिच्या अंतर्गत करणे शक्य व्हावे. तेव्हा अशा दोन व्यवस्थांचे परस्पर-वर्तन आणि मूल्यमापन हे उभयपक्षी अधिकृत वा अनधिकृतपणे मान्य केलेल्या द्विपक्षीय करार वा संकेतांनुसारच होत असते.
मला अभिप्रेत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असणार्या सामान्य पोटार्थी व्यक्तींनाही त्याच्या व्यवस्थेचा शत्रू मानून वीरभूषण त्यांची हत्या करत असतो. लोकशाही व्यवस्थेनेही त्याच्याबाबत उलट दिशेने तीच भूमिका घेतली, तर माझ्या मानवतावादी भूमिकेला अनुसरून तिचा निषेध करणे मला अवघड होत असते. त्याच्या व्यवस्थेतील ‘पीपल्स कोर्ट’ जर लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्तींचा एकतर्फी निवाडा करत असेल, तर लोकशाही व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेनेही त्याचा एकतर्फी निवाडा केला, तर अन्याय म्हणता येईल का? पण लोकशाही व्यवस्था- निदान सैद्धांतिक पातळीवर- तसा करत नाही हेच माझ्या लोकशाही व्यवस्थेवरील निष्ठेचे मुख्य कारण आहे.
दोन व्यवस्थांमधील परस्पर-संघर्षामध्ये ‘न्याय’ ही संकल्पना मोजायची ती कशाच्या आधारे? त्याच्या व्यवस्थेत देहदंड हा चौकी बॉम्बने उडवून दिला जात असेल, तर या व्यवस्थेत दोराला लटकवून फाशी देऊन दिला जातो एवढाच काय तो फरक आहे. ‘फाशी देणे योग्य आहे का?’ ही चर्चा आपण लोकशाही व्यवस्थेअंतर्गतच करु शकतो. ती त्या व्यवस्थेच्या अंतर्गत बाब आहे. त्या व्यवस्थेअंतर्गत जोवर ती अस्तित्वात आहे, तोवर तिला अनुसरून निवाडे होत राहणार. ग्लाडची गोष्ट आणखी वेगळी आहे. तो तांत्रिकदृष्ट्या लोकशाही व्यवस्थेअंतर्गत असला, तरी तुरुंग ही त्याच्या अखत्यारितील व्यवस्था आहे. आणि तिच्याअंतर्गत तो त्याची दंडव्यवस्था राबवतो आहे, जी बव्हंशी वीरभूषणप्रमाणेच एकतर्फी निवाडा करणारी आहे.
यातील योग्य कुठले वा अयोग्य कुठले याबद्दल नैतिक निवाडा करणे अशक्यच आहे. कारण नैतिकतेची कल्पना ही नेहमीच व्यक्ती तसंच व्यवस्थासापेक्ष असते. आणि वर म्हटले तसे दोन व्यवस्थांच्या संदर्भात सामूहिक नैतिकतेच्या कल्पनांना आधार देणारी सामायिक व्यवस्थाही अस्तित्वातच नाही. आणि म्हणून ग्लाडने वीरभूषणचा निवाडा क्रांतिकारक म्हणून केला असला, तरी लोकशाहीवादी व्यवस्था मानणार्या माझ्यासारख्याला तसा करणे शक्य नाही.
जो न्याय वीरभूषणला लावावा लागतो, तोच ‘न्यायालयात न्याय मिळत नाही’ असा कांगावा करत विध्वंसाचा वडवानल पेटवणार्या, स्वत:ला धर्मयोद्धे समजणार्यांनाही ! यांच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्थेचे पाईक हे शोषकांचे अथवा अन्य धर्माला पक्षपाती आणि म्हणून दंडनीय असतात. त्याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने हे दोघेही गुन्हेगारच असतात, क्रांतिकारक नसतात!
त्यामुळे ग्लाडच्या वैय्यक्तिक अनुभवातून- कदाचित उपकाराच्या ओझ्याखाली – ग्लाडचा कणा झुकला असला, तरी ते वीरभूषणच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानण्याची गरज नाही! ग्लाड असो की वीरभूषण, दोघांच्याही परस्परसंबंधात यथावकाश आपुलकीचा एक धागा निर्माण होतो आहे. तरीही ते दोघेही मूलत: हिंसेचे उपासक आहेत आणि सामान्यांचे कर्दनकाळ आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यांच्या परस्पर-आपुलकीचा प्रादुर्भाव आपल्या मनात होऊ न देणेच शहाणपणाचे आहे.
ग्लाडची परिस्थिती वीरभूषणहून वेगळी आहे. जरी तो वीरभूषणबाबत ‘माझ्या विपरीत विचारांचा क्रांतिकारक’ या निष्कर्षाप्रत पोहोचत असला तरी यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, ‘आपल्याला वैचारिक भूमिका आहे, दृष्टिकोन आहे’ हा त्याचा भ्रमच आहे. कुणीतरी आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन इतर कुणावर तरी अत्याचार करुन करण्याचा प्रयत्न करणे यात कुठलीही वैचारिक भूमिका नाही. असलाच तर भेकडाचा सूड आहे.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे तो सत्तेच्या बाजूला राहणारा, निष्ठा बदलणारा आहे. आपल्या वैफल्याचे विरेचन व्यवस्थेने आपल्या तावडीत आणून सोडलेल्या, त्याअर्थी दुबळ्या, जीवांवर करणारा तो एक भेकड जीव आहे. आपली भीरूता जाहीर होऊ नये म्हणून त्याला क्रौर्याचा आधार घेऊन आपला दरारा निर्माण करावा लागतो, राखावा लागतो. आक्रमकता हा अनेकदा न्यूनगंडाचाच आविष्कार असतो याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे.
वीरभूषणने नाममात्र का होईना सर्वकल्याणकारी तत्त्वज्ञान अंगीकारले आहे— म्हणजे कदाचित ते अभ्यासले आहे. त्याच्या या सर्व-कल्याणाच्या व्याख्येमधून इतर व्यवस्थांचे पाईक वा लाभधारक सोयीस्करपणे वगळलेले आहेत. ते केवळ परकेच नव्हे तर थेट शत्रू मानले आहेत. त्यांचे निर्दालन करण्यास हिंसेचा वापर समर्थनीय मानला आहे.
हे ज्यांना असमर्थनीय वाटते त्यांनी समाजाअंतर्गत अन्य-धर्मीयांच्या अथवा अन्य-जातीयांबाबत आपली भावना अशीच आहे का हे स्वत:ला विचारून पाहायला हरकत नाही. इतकेच कशाला आपला देश महासत्ता व्हावा, इतर देशांवर त्याने वर्चस्व गाजवावे या वेडाने झपाटलेले लोक अन्य देशांतील- अथवा शत्रू म्हणून निवडलेल्या देशांतील - सामान्य नागरिकांची बॉम्बस्फोट वा तत्सम मार्गाने केली जाणारी हत्याही समर्थनीय मानत नाहीत काय? ‘पुरा तयांचा वंश खणावा’ ही प्रवृत्ती या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठाण मांडून बसलेली नसते का? वीरभूषणच्या विचारांतून येणारी हिंसा ही किती भयंकर द्रोही, मानवतेविरोधात आहे वगैरे म्हणत असताना देश, धर्म, वंश वगैरे आधारावर होणार्या एकतर्फी हिंसेचे मात्र आडवळणी समर्थन करताना आढळतात.
याचे कारण माणसांनी भौतिक प्रगती कितीही साधली असेल पण मूलत: माणूस हा अजूनही टोळ्या करून राहणारा प्राणी आहे. आणि अन्य टोळीच्या कोणत्याही सभासदाबद्दल तो तीव्र शत्रुत्व मनात बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेले सर्व धर्म, स्वत:ला सर्व-कल्याणकारी म्हणवणारी तत्त्वज्ञाने, व्यवस्था या शत्रूलक्ष्यी मांडणीच करत असतात. त्यातून मनुष्यप्राण्याच्या मनातील हिंसेचे विरेचन होण्यास एक वाट निर्माण होत असते. बहुसंख्य व्यक्तींना शाब्दिक विरेचन पुरते, गल्लीतल्या गुंडांना दुबळ्यांच्या मर्यादित वर्तुळात हिंसेचा वापर करुन पाहावासा वाटतो. पाठीशी जात, देव, देश, धर्माचे अधिष्ठान असले की या हिंसेला आणखी मोठे पाठबळ मिळते नि त्याची व्याप्ती वाढते.
या सार्याचा विचार करता वीरभूषण काय की ग्लाड काय या भेकड, टोळीबद्ध प्राण्यांतील एक प्राणी आहेत इतकेच. तुम्ही या दोहोंशी सहमत नसाल, तर तुमच्या भूमिकेचे मी स्वागत करेन. परंतु तेवढे पुरेसे नाही. या दोहोंच्या विचारांचे मूळ असलेली, मित्र-शत्रूंच्या व्याख्येमध्ये सरसकटीकरण करणारी शत्रूलक्ष्यी मांडणी टाळून- त्या कुबड्या टाकून निरपवाद, स्वत:च्या पायावर उभी असणारी विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. लोकशाही ही तुम्हा-आम्हाला उपलब्ध असणारी अशी एक व्यवस्था आहे. ती स्वीकारायची असेल तर वीरभूषणचा ताठ कणा वा ग्लाडचा तथाकथित मनाचा मोठेपणा यांनी फार भारावून न जाण्याचे भान राखायला हवे आहे. त्याचबरोबर त्या दोहोंमधील दोषच वेगळ्या रंगात रंगवून मांडणार्या तथाकथित पर्यायी व्यवस्थांनाही नाकारणे आवश्यक आहे.
- oOo -
(१) शिफारस: बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली
शनिवार, ७ डिसेंबर, २०२४
दोन बोक्यांनी... (एक सामाजिक-राजकीय रूपककथा)
-
AI-Generated Image for this article (Courtesy: deepai.org)
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे...
एक लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं... पण ते नावाचं जाऊ द्या. ते महत्त्वाचं नाही, कुठल्याही गावासारखं ते एक गाव होतं. गावात शेत कसणारे कुणबी होते, नांगर ओतणारे लोहार होते, चपला बांधणारे चांभार होते, मडकी घडवणारे कुंभार होते, घाणा चालवणारे तेली होते... या सार्यांवर राज्य करणारे पाटील होते, त्यांच्या मदतीला कुलकर्णी होते. शाळा चुकवणारी पोरे होती, पारावरची पाले होती; नदीवरची धुणी होती, चोरट्या प्रेमाची कहाणी होती. कुठे कुणाचे दाजी होते, कुठे कुणाचे ‘माजी’ होते; काही काही पाजी होते, बाकी उडदामाजि होते...
गावाच्या गरजा मर्यादित होत्या. अन्नाची गरज शेती व गावालगतचे जंगल यांतून भागत असे. इतर किरकोळ गरजा भागवण्यास गावात महिन्यातून दोनदा एक व्यापारी येई. त्याचं नाव पुरुषोत्तमभाई. गावात न मिळणार्या वस्तू घेऊन येई, त्याच्या बदल्यात चोख दाम मोजून घेई. कुणाला पैशाचीच नड असेल, तर पुरुषोत्तमभाई त्यांच्याकडचे किडुकमिडुक विकत घेई नि त्या बदल्यात त्या गावकर्याला पैसे देई. पुरुषोत्तमभाईची फेरी झाली, की गावात लहान-लहान सुखाची पावले उमटत नि पुरुषोत्तमभाईच्या खिशात पैशाची. एकुण गावाचं सारं काही छान चाललं होतं. गावाच्या या संथ, सुस्थिर जगण्यात खडा टाकला तो अलबत्त्या नि गलबत्त्याच्या भांडणाने. भांडण तरी कसलं... सारं एक रुपयाचं!
तर झालं असं की अलबत्त्या नि गलबत्त्या हे दोघे मित्र. दोघांच्याही घरी थोडी जमीन होती, ती कसणारे बापदादे होते, मदत करायला कुळवाडी होते. या दोघांनी कधीमधी त्यांना मदत केली, तरी बहुतेक वेळा दिवसातून दोनदा भाकरी मुरगाळण्यापुरते घरी येणारे हे दोघे तरूण एरवी पारावर, देवळात वा रानात बसून प्राचीन भारतातील सुवर्णकाळाची उजळणी करत बसत. ‘ऑस्ट्रेलिया म्हणजे अस्त्रालय’, ‘मॉरिशस म्हणजे मारिचस्’ वगैरे शोध ते एकमेकाला सांगून प्रबोधन करत. सोन्याचा धूर येणारा देश कसा कचर्यात चालला आहे यावर हळहळ व्यक्त करत.
एखाद्या भेटीत ‘फ्रान्स हा अपरान्त म्हणजे कोकणस्थ मंडळींनी तिकडे जाऊन वसवलेला देश आहे’ हे अलबत्त्या अपरान्त → अप्रान्त → प्रान्त → फ्रान्स या व्युत्पत्तीच्या आधारे सांगे. तर त्याचे म्हणणे खोडून काढताना गलबत्त्या प्रान्तचा अपरान्तशी काहीही संबंध नसून ‘हिंदुस्थानचा मुख्य भूभागापासून दूर असलेला प्रान्त’ एवढ्याच अर्थाने प्रान्त हा शब्द वापरला जात होता असे प्रतिपादन करी. असा तपशीलात मतभेद असला तरी ‘प्रान्त’चे फ्रान्स झाले’ यावर मात्र दोघांचे चटकन एकमत होई.
भूतकाळाचे दळण दळण्याचा कधी कंटाळा आलाच तर ते भविष्याकडे वळून ‘देश महासत्ता झाल्याची’ किंवा ‘आपण(!) पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकल्याची’ स्वप्ने रंगवत बसत. क्वचित एखादा तिसरा गडी त्यांना सामील झाला, तर त्यांच्या चर्चेची गाडी वळण घेऊन अमेरिकेच्या अध्यक्षाच्या निवासस्थानामध्ये असलेल्या सुखसोयींपासून ‘प्राचीन काळी द. अमेरिकेने केलेल्या नेत्रदिपक प्रगतीमध्ये भारतीयांचा सिंहाचा वाटा’ वगैरेपर्यंत भरधाव सुटे. तिसर्याने त्यात स्वत:ची अशी काही भर घालण्याचा प्रयत्न केला की दोघे एक होऊन त्याचे म्हणणे खोडून काढत.
गप्पांचा भर ओसरला की तिथेच एखाद्या झाडाखाली ताणून देत. या कार्यक्रमात त्यांचा दिवस सुखाने सरत असे. सूर्य क्षितिजापार गेला, की ते रमतगमत घरी परतत आणि दोन भाकरी मुरगाळून उद्याची चिंता न करता गाढ झोपी जात.
असेच एक दिवशी एकदा सूर्य कलला आणि दोघे घरी निघाले. रानाकडून गावाकडे येणार्या वाटेला शिवेवरच एक चिंचोळा फाटा फुटला होता. तो सरळ गावकुसाबाहेरच्या वस्तीकडे जात होता. येता येता तिकडे काही कामासाठी निरोप देऊन ये असे बापाने सांगितल्याची अलबत्त्याला आठवण झाली. त्यामुळे फाट्यावर पोहोचताच त्याने गलबत्त्याला ‘तू पुढे हो’ म्हणून सांगितले.
AI-Generated Image (Courtesy: Freepik.com)गलबत्त्या गावच्या वाटेवर चालू लागला. इतक्यात गलबत्त्याच्या पुढे रस्त्यावर काहीतरी चमकलेले अलबत्त्याने पाहिले. ते एक रुपयाचे नाणे असल्याचे त्याच्या ध्यानात आले. ते उचलण्यास तो पुढे होणार इतक्यात तो रुपया नेमका गलबत्त्याच्या पायाखाली आला. काय टोचले म्हणून गलबत्त्याने उचलला. अलबत्त्या म्हणाला ‘मी आधी पाहिला, तेव्हा तो माझा आहे–’ गलबत्या म्हणे, ‘छे: मी आधी उचलला, तो माझा आहे.’
कधी नव्हे ते दोघांचे भांडण पेटले. गलबला ऐकून गावाच्या वाटेवर थोडा पुढे चाललेला पुरुषोत्तमभाई परत मागे आला. दोघांनी आपापले म्हणणे त्याच्या कानी घातले. पुरुषोत्तमभाई हसला नि म्हटला, ‘अरे भाई, झगडा कशाला करता. हा माझा एक रुपया घ्या नि दोघांनी एक-एक रुपया घेऊन भांडण मिटवा’.
असे म्हणताना खिशात हात घालताच त्याला पडलेल्या भोकातून त्याचे एक बोट भस्सदिशी आरपार गेले. तो रुपया आपल्याच खिशातून पडला असल्याचे त्याच्या लक्षात आले. आता ‘तो रुपया माझा आहे’ म्हणावे, तर दोघांत तिसरा सामील होणार नि भांडण वाढणार. निवाडा काहीच होणार नाही. म्हणजे शेवटी रुपयावर पाणी सोडावेच लागणार, हे त्याला ध्यानात आले.
त्याने थोडा विचार केला नि अखेर त्याच्या चेहर्यावर हसू फुटले. ‘जाऊ द्या, तुम्ही दोन इतके चांगले मित्र, एका रुपयासाठी का भांडता? तो रुपया मला भांडवल म्हणून द्या. मी महिन्याभरात दुप्पट करून देतो. मग दोघेही एक एक रुपया घ्या.’ पण दोघेही हट्टाला पेटले होते. महिनाभर थांबायची त्यांची तयारी नव्हती.
तणतणत दोघे गावात पोहोचले, ते थेट चावडीवर गेले. गावची चार संभावित नि ज्येष्ठ मंडळी जमली. आधी दोघांची समजूत घालणे सुरू झाले. पण दोघे हट्टाला पेटलेले. मग त्यांच्या घरी निरोप गेला. दोघांच्या घरचे हजर झाले. या दोघांच्या भांडणाचे कारण ऐकून त्यांनीही कपाळाला हात लावला. पण हे दोघे त्यांचेही ऐकेनात. मग नाईलाजाने पंचांसमोर निवाडा करावा असा निर्णय झाला. पंचांनी दोन्ही पक्षांना ‘निवाड्याचा खर्च’ म्हणून प्रत्येकी पाच रुपये जमा करण्यास सांगितले. शिवाय प्रथेनुसार प्रत्येकी एक टॉवेल, टोपी आणि निवाड्याच्या दिवशी कोंबड्याचे जेवण द्यायचे होते. आणि निवाडा होईतो तो रुपया पंचांकडे जमा करून घ्यावा असे ठरले.
अखेर पंचायत बसली. दोघांनी मोठा जोरदार आरडाओरडा केला.
अलबत्त्या म्हणे, “मी आधी पाहिला. तेव्हा तो माझा.”
गलबत्त्या म्हणे, “पण मी तो प्रथम उचलला. ज्याच्या हाती रुपया तो त्याचा.”
गलबत्त्या म्हणे, “आज माझे भविष्य होते,‘अचानक धनलाभ’; तेव्हा रुपया माझ्याचसाठी आला आहे.”
अलबत्त्या म्हणे, “माझे भविष्य होते ‘अनपेक्षित धनलाभ’; तेव्हा तो रुपया देवाने माझ्यासाठीच धाडला आहे.”
तुंबळ वाद-प्रतिवाद झाले. तरी तिढा सुटेना. दोघे थकले. मग इतर लोक उभे राहिले.
अलबत्त्याच्या बाजूने गणपा उभा राहिला. तो म्हणे, “डोळे हे शरीरावर हाताहून वरच्या स्थानावर असतात. तेव्हा पाहण्याला अधिक महत्त्व आहे. ज्याने प्रथम पाहिले, रुपया त्याचा.” चावडीवर उपस्थित असलेल्या काही गावकर्यांनी माना डोलावल्या.
राजाभाऊ गलबत्त्याच्या बाजूने उभा राहिला. तो म्हणे, “हॅ: डोळ्यांनी काय आपण हिमालयही पाहू हो, म्हणून तो अलबत्त्याचा होईल काय? अन्न हाताने उचलून तोंडात न घालता नुसते नजरेने पाहिले तर पोट भरेल काय?” काही गावकर्यांना त्याचेही म्हणणे पटले.
आता समोर बसलेले सारेच आपापल्या परीने युक्तिवाद करू लागले. चावडीचा आखाडा झाला.
त्या गोंधळातच गावच्या इतर कुणाहीपेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेला धोंडिबा म्हणाला, “आरं पोरानो, जानी दोस्त तुम्ही. यका रुपयापायी कशाला तंडतायसा. दोघंबी अधेली-अधेली वाटून घ्या की.” पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिले नाही.
अखेर पंचांनी आपण उद्या निर्णय देऊ असे जाहीर करून सभा संपवली. पण निर्णय द्यायचा म्हटले तरी पंचामध्येही मत-मतांतरे होतीच. जे चावडीसमोर झाले तेच त्यांच्या खासगी बैठकीत पुन्हा घडणार असा रंग दिसू लागला. त्यामुळे त्यांनी ‘पुढल्या आईतवारी निर्णय देऊ’ असे सांगून डोक्याचा आजचा ताप एक आठवडा पुढे ढकलून दिला.
त्या दरम्यान पुरुषोत्तमभाई अलबत्त्याच्या कानी लागला. ‘गावोगावीचा अनुभव आहे माझा. पंचांना काहीतरी देऊन आले पाहिजे’, तो म्हणाला. ‘पाच रुपये आणि टॉवेल-टोपी दिली की,’ अलबत्त्या भाबडेपणाने म्हणाला. पुरुषोत्तमभाई लबाड हसला. ‘अरे येड्या तो पंचायत बसल्याचा मेहनताना झाला. निवाडा आपल्या बाजूने व्हायचा तर जास्तीचा पैसा द्यायला हवा.’ अलबत्त्या विचारात पडला. त्या रुपयापायी आधीच दहा-एक रुपयाला चुना बसला होता. त्याच्या म्हातार्याने त्याबद्दल फैलावर घेतला होता. आता ‘आणखी पैसे कुठून आणणार?’ असा प्रश्न त्याला पडला.
पण त्यासाठी पुरुषोत्तमभाई होता ना. अलबत्त्याला आवश्यक तो पैसा द्यायला तो एका पायावर तयार होता. जमतील तसे, सावकाशीने, रुपया-दोन रुपये परत करण्याची सवलत द्यायचीही त्याची तयारी होती. फक्त अलबत्त्याला त्यावर माफक व्याज द्यावे लागणार होते. ‘माझ्या धंद्यातला पैसा तुला देणार. मग त्यावरचा माझा नफा बुडणार. तो तू मला द्यायला नको का?’ त्याने आर्जवी स्वरात विचारले. अलबत्त्या तयार झाला. पंचांपैकी कुणाला नि किती पैसे द्यायचे याचा अदमास घेण्याची नि ते पोहोचवण्याची जबाबदारीही पुरुषोत्तमभाईने स्वत:कडे घेतली. अलबत्त्या निश्चिंत झाला.
पुरुषोत्तमभाईने पंचांना एक-एकटे गाठून पटवायला सुरुवात केली. त्यांना पैसे देऊन त्याने निवाडा पुढे ढकलण्याची गळही घातली. त्यानुसार पंचानी निवाड्यासाठी आणखी एक आठवडा वाढवून घेतला. आणि त्याचबरोबर सुरुवातीला अलबत्त्या नि गलबत्त्याला दिलेला प्रस्ताव त्याने त्यांनाही दिला. तो रुपया आपल्या धंद्यात गुंतवावा नि महिन्याभराने दोन रुपये मिळतील. त्यातला एक रुपया अनायासे पंचांना मिळेल अशी लालूच त्याने दाखवली. पंचाना हा ‘हपापाचा माल गपापा’ सल्ला भलताच पसंत पडला नि त्यांनी तो रुपया पुरुषोत्तमभाईच्या स्वाधीन केला.
सारे काही उरकून पुरुषोत्तमभाई अलबत्त्याकडे आला आणि त्याने पैशांचा हिशोब त्याच्या कानी घातला. त्याचवेळी गलबत्त्याने थोडे पैसे देऊन निवाड्याची तारीख पुढे ढकलून घेतल्याचेही कानावर घातले. ‘तो आणखी पैसे जमवण्याच्या खटपटीत असून ते जमले की पंचांना ते देऊन तो निकाल आपल्याकडे फिरवून घेईल’ अशी धोक्याची घंटाही वाजवली. निवाड्याची तारीख येईतो अलबत्त्याच्या अपरोक्ष पुरुषोत्तमभाईने गलबत्त्यालाही गाठले आणि हाच सोपस्कार पार पडला. पण त्याचा म्हातारा ‘पैसे देत नाही’ म्हटल्यावर गलबत्त्याने त्याच्या नकळत घरातले पैसे चोरून पुरुषोत्तमभाईच्या स्वाधीन केले.
असे दोन-तीन वेळा झाल्यावर दोघेही घायकुतीला आले. ‘आता काय तो पाड लाव’ अशी गळ अलबत्त्याने पुरुषोत्तमभाईला घातली. गलबत्त्याने ‘घरचे पैसे चोरणे आता दिवसेंदिवस अवघड झाले आहे. म्हातारा बारीक ध्यान ठेवून असतो.’ अशी तक्रार करायला सुरुवात केली. मग पुरुषोत्तमभाईनेही कौल दिला आणि दहा दिवसांनी पंचांनी निर्णय जाहीर केला.
(Courtesy: getty images)या निकालानुसार ‘दोघांनाही प्रत्येकी एक अधेली’ देण्यात येणार होती. पुरुषोत्तमभाईने त्या सापडलेल्या रुपयाच्या बदली दोन अधेल्यांची मोड देऊन त्याबद्दल कमिशन म्हणून दोघांकडून प्रत्येकी पाच पैसे घ्यावेत असे पंचांनी सुचवले होते. ‘मग मी तरी दुसरं काय सांगिटलो होतो. उगा पंचाचं धन केलो आन् चावडीवर सोंगं नाचिवली.’ वैतागाने धोंडिबा पुटपुटला नि काठी उचलून निघून गेला.
‘घे मुडद्या अधेली. रुपया मला दिला असतास, तर स्वत:हून तुला चहा पाजला असता. फुंक आता अर्धी विडी त्या अधेलीची.’ अलबत्त्या संतापाने म्हणाला नि तरातरा निघून गेला. गलबत्त्याही संतापाने पेटला नि पुटपुटत घरच्या वाटेने गेला.
पंचांनी दोनही बाजूंना काही देऊ करणारा सोपा निकाल दिला असला, तरी त्याने उलट दोघेही अधिकच असंतुष्ट झाले. आपला रुपया आपल्याच दोस्ताने घशात घालण्याचा प्रयत्न करावा याने आधीच दुखावलेले ते दोघे आता पंचानीही अन्याय केल्याच्या भावनेने धुमसत होते. यथावकाश पुरुषोत्तमभाई पुन्हा दोघांच्या कानी लागला. नेहमीचा रतीब सोडून आता तो वारंवार गावात येऊ लागला. अशाच एका फेरीदरम्यान इतर सामानासोबत त्याने चपट्या बाटल्याही आणल्या. प्रथम गप्पा मारताना सोबत म्हणून त्याने प्रत्येकासोबत एक-एक बाटली फोडली. तिच्या संगतीने निर्घोर मनाने नि आवेशपूर्ण वृत्तीने मारलेल्या गप्पांमुळे दोघांमधील वीरश्री चैतन्याने सळसळू लागली. दोघांनाही ती हवीहवीशी वाटू लागली. बाटलीतील प्रत्येक घोटासोबत दोघांमधील दरी वाढत चालली, आणि आधीच्या कर्जासोबत बाटल्यांचे कर्जही आता वाढू लागले.
या आवेशपूर्ण चर्चांदरम्यान बव्हंशी ऐकण्यापुरते– आणि चणे खाण्यापुरते – सामील असणार्या पुरुषोत्तमभाईने कोर्टात जाऊन न्याय मिळवण्याचे पिल्लू हळूच सोडून दिले. दोघांपैकी एकाच्या गळी जरी हे उतरवता आले तरी त्याचे काम होणार होते. त्याच्या सुदैवाने दोघांनाही ही कल्पना पसंत पडली. वकील गाठून देणे, कोर्टाच्या कार्यवाहीची माहिती देणे, जाण्यायेण्याची सोय करणे वगैरे सारे काही पुरुषोत्तमभाईने अंगावर घेतले. त्याने ही जबाबदारी तालुक्याच्या गावातील दोन परिचित वकीलांवर सोपवून गावाला यांत आपला थेट संबंध दिसू नये याची खातरजमा करुन घेतली. त्याचबरोबर वकीलांना या दोघांकडून मिळणार्या पैशांमध्ये रुपयात चार आणे भागीदारीही नक्की करून टाकली. ते वकीलही मुरलेले असल्याने त्यांनी हे दोन बकरे ‘झटका’ पद्धतीने न कापता ‘हलाल’ करावेत असे ठरवून टाकले.
आता कोर्टाच्या कामासाठी लागणारा पैसा उभा करावा लागणार होता. दोघेही अपरिहार्यपणे पुरुषोत्तमभाईला शरण गेले. पण मागच्या कर्जाचा बोजा हलका केल्याखेरीज नव्या कर्जांची खाती उघडण्यास पुरुषोत्तमभाईने असमर्थता व्यक्त केली. ‘मी आपला लहानसा व्यापारी. गावोगाव हिंडून किडुकमिडुक विकतो तेव्हा चार पैसे मिळतात. आधीच माझ्या धंद्याचे अर्ध्याहून अधिक पैसे व्याजाच्या आमिषाने तुम्हाला देऊन बसलोय. त्याने धंद्याची तंगी झाली आहे.’ तो अजिजीने म्हणाला.
परतफेडीसाठी दोघांकडे अर्थातच पैसे नव्हते. त्यांनी हात नि काखा वर केल्यावर भाईने त्यांच्या जमिनींचा विषय हलकेच पुढे सरकवला. अलबत्त्याच्या बापाची जमीन ही वंशपरंपरागत असल्याने त्याने आपली वाटणी मागावी असे त्याने सुचवले. मग त्याला आपल्या वाट्याची जमीन विकून वा तारण ठेवून त्याला हवे तितके कर्ज उभारता येईल, आपले पैसे देऊन उरलेल्या पैशांत बसल्या जागी करण्याजोगा काही व्यवसाय करता येईल असे त्याने सुचवले. शेतातील कष्ट आपल्याच्याने व्हायचे नाहीत हे ठाऊक असलेल्या अलबत्त्याला हा उपाय एकदम पसंत पडला.
अलबत्त्याने घरी पोहोचताच म्हातार्याकडे आपली मागणी नोंदवली. म्हातारा हबकलाच. जमिनीचे तुकडे करणे याचा अर्थ दोघांकडेही तुटवडा निर्माण होणे आणि अखेरीस जमिनी पुरुषोत्तमभाई वा अन्य कुणाच्या घशात जाणे आहे हे अनुभवाने ठाऊक होते. त्याने आणि कोंडिबाने अलबत्त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अलबत्त्या ऐकेना. ‘माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. गलबत्त्याचे नाक खाली केल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही.’ अशी गर्जना करत निर्वाणीचा उपाय म्हणून त्याने वाटणीसाठी कोर्टात जाण्याची धमकी दिली.
आता म्हातारा खचला. एकतर कोर्टाचे काम म्हणजे पैसे नि वेळ यांचा सत्यानाश हे त्याला ठाऊक. त्यातच हट्टाला पेटलेलं आपलं हे पोरगं घरच्या नि गलबत्त्यावरच्या अशा दोन खटल्यांमध्ये भिकेला लागणार हे त्याला स्वच्छ दिसत होते. अखेर सुज्ञपणे म्हातार्याने वाटणी करण्यास रुकार दिला. अलबत्त्याच्या त्याच्या वाटणीची जमीन त्याला देऊन टाकली नि आपल्या वाट्याची वाचवली.
पण इकडे गलबत्त्याच्या म्हातार्याने पैसे वा जमीन देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्याच्या त्राग्याला न जुमानता त्याला सरळ घराबाहेर काढले. एव्हाना पुरुषोत्तमभाईने गावातच एक घर घेतले होते. खाली दुकान नि वर राहण्याची जागा अशी तजवीज त्याने केली होती. गावच्या मंडळींना किडुकमिडुक विकणे वा विकत घेणे सोडून त्याने गावच्या मंडळींच्या धान्याचा अडता म्हणून जम बसवला होता. त्याने गलबत्त्याला सरळ दुकानातील अंगमेहनतीच्या कामाला जुंपला, नि बदल्यात दोनही वेळचे जेवण नि दुकानाच्या बाहेरील फळीवर झोपण्याची परवानगी दिली. कुणब्याचा गलबत्त्या आता पुरुषोत्तमभाईचा गडी आणि राखणदार म्हणून राहू लागला.
दरम्यान कोर्टात पहिली तारीख पडली...
.
.
.
... आणि तारखांमागून तारखा पडू लागल्या.अलबत्त्याच्या वाटची जमीन आता पुरुषोत्तमभाईकडे आली होती. त्यावर त्याची कुळे कसत होती, त्यांच्या कष्टाचे फळ गोण्यांमध्ये भरून दुकानामागे असलेल्या कोठीच्या खोलीमध्ये जमा होऊ लागले. गलबत्त्या डोळ्यांत तेल घालून त्यांवर लक्ष ठेवू लागला आणि दारी ट्रक उभा राहिला की त्या गोण्या त्यांतून चढवू लागला. अलबत्त्या-गलबत्त्यांप्रमाणेच गावचे इतर लोकही अडी-अडचणीला पुरुषोत्तमभाईकडे हात पसरू लागले. पहिला रुपया त्याने गमावला असला तरी गावातील सार्यांचेच रुपये आता बिनबोभाटपणे त्याच्याकडे येऊ लागले. पुरुषोत्तमभाई आता पुरुषोत्तमसेठ म्हणून ओळखला जाऊ लागला.
(Courtesy: shuttercock images)पुरुषोत्तमभाईच्या खिशातून जिथे तो रुपया पडला, त्या जागी त्याने मारुतीचे एक देऊळ बांधले होते. लोक त्याला गंमतीने ‘रुपया-मारुती’ म्हणू लागले. यासोबतच ‘बाटलीपे चर्चा’ करत असताना पुरुषोत्तमसेठने रुपया-मारुती नवसाला पावत असल्याचे विविध किस्से बाटली-भक्त झालेल्या गावकर्यांच्या मनात सोडून दिले. ‘त्या शिवेवरून जात असताना आपल्याला मारुतरायाचा दृष्टांत कसा झाला, त्यातून मारुतरायाने सांगितल्याप्रमाणे आपण वागत गेल्याने आपला उत्कर्ष कसा होत गेला’ याचा किस्सा त्याने प्रथम रंगवून रंगवून सांगितला. पुरुषोत्तमसेठची भरभराट लोक पाहात आलेच होते. कधी काळी किडुकमिडुक विकणारा आज दुमजली घराचा नि बर्याच मोठ्या जमिनीचा मालक झालेला त्यांनी पाहिला होता. ‘हे कुण्या देवाच्या कृपाप्रसादाखेरीज शक्य नाही’ असे त्यांनाही वाटत होतेच. त्यामुळे ‘ही रुपया-मारुतीची कृपा’ या दाव्यावर त्यांचा चटकन विश्वास बसला.
मग मारुतरायाची कृपादृष्टी आपल्याकडेही वळावी नि त्याने आपल्याही आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ते त्याला साकडे घालू लागले. त्याला साकडे घातले की – बहुतेक वेळा – रुपयाला दहा पैसे व्याजाने पुरुषोत्तमसेठ कर्ज देऊन त्या गावकर्याची अडचण दूर करी. त्याबदल्यात त्या गावकर्याचे भविष्यातील रुपये पुरुषोत्तमसेठच्या तिजोरीची वाट चालू लागत. त्यामुळे रुपया-मारुतीनेच आपल्या अडचणीचे निवारण केल्याची भावना गावकर्यांच्या मनात रुजून जाई. त्यातून ‘नवसाला पावणारा’ अशी त्या मारुतीची ख्याती पंचक्रोशीत पसरू लागली.
अलबत्त्या, गलबत्त्या आणि गावच्या लोकांच्या रुपयाची वाट आपल्या खिशापर्यंत आणून पोहोचवल्यानंतर गावाबाहेरील इतर लोकांच्या खिशातील पैसा पुरुषोत्तमसेठला खुणावू लागला होता. त्याच हेतूने त्याने देवस्थानभोवती नवसाला पावत असल्याच्या किश्शांची तटबंदी बांधली होती. त्यातून ‘रुपया-मारूती’ची ख्याती पंचक्रोशीतील गावांत पसरू लागली होती. तेथील लोकही त्याच्या कृपाप्रसादाच्या आशेने गावाची वाट तुडवू लागले होते. त्यांची सेवा करता यावी म्हणून देवस्थानच्या आसपासची बरीचशी जमीन पुरुषोत्तमसेठने ताब्यात घेतली होती. तिथे गाळे बांधून त्याने पूजेचे साहित्य, रेवडी-बत्तासे, शेव-चिवडा, चहा-भजी आदी विक्रीसाठी भाड्याने देऊन टाकले. रुपया-मारुतीच्या कृपेने हे उत्पन्न विनासायास त्याच्या तिजोरीमध्ये जमा होऊ लागले. पाहता पाहता देवळाचा विस्तार होऊन देवस्थान उभे राहिले.
रुपया-मारुतीच्या कृपेने भरभराट झालेला पुरुषोत्तमसेठ हा पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेत्यांमध्ये त्याची उठबस सुरू झाले. त्यांतील काही अधूनमधून त्याच्या बंगल्यावर पायधूळ झाडू लागले. आलेला प्रत्येक पाहुणा आवर्जून देवस्थानला भेट देई. तिथे मारुतरायासमोर नतमस्तक झालेल्या नेत्याचे अनेक फोटो त्यांचे चेले काढून घेत. त्यांचा उपयोग पुढे नेत्याला आपली इमेज उजळण्यासाठी, तर पुरुषोत्तमसेठला देवस्थानची इमेज उजळण्यासाठी होत असे. या सार्या राजकीय लागेबांध्यांच्या आधारे येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुरुषोत्तमसेठ सरपंचपद हस्तगत करण्याच्या खटपटीत असल्याची वदंता होती. तसे झाले तर तो गावाचे कसे भले करू शकेल याच्या अनेक शक्यतांची उजळणी अलबत्त्या, गलबत्त्या आणि बाटली-भक्त करू लागले होते. गावाचे मुघलकालीन नाव बदलून ‘रुपयाची वाडी’ ठेवावे अशी मागणी पुढे येऊ लागली होती.
असेच आणखी काही महिने गेले...
एके दिवशी सरकारने ‘आता किमान चलन पाच रुपयाचे असेल’ असे जाहीर करून त्याहून कमी दर्शनी किंमतीची सर्व नाणी चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. ‘आता आपल्या रुपयाचे काय?’ या प्रश्नाचे भूत अलबत्त्या नि गलबत्त्याच्या मेंदूत एकाच वेळी थैमान घालू लागले.
- oOo -
टीप: कथेची नाळ ‘दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ’ सांगणार्या पंचतंत्रातील तात्पर्यकथेशी जुळते हे बहुतेक वाचकांच्या ध्यानात आले असेलच. (कथेचे शीर्षकही त्या कथेवरुन लिहिल्या गेलेल्या ‘दोन बोक्यांनी आणला हो आणला, चोरून लोण्याचा गोळा’ या बडबडगीतावरुनच घेतले आहे.) या खेरीज निकोलाय गोगोल या रशियन लेखकाच्या ‘The Tale of How Ivan Ivanovich Quarreled with Ivan Nikiforovich’ या कथेशीही ती नाते सांगते. (जिच्यावरून ‘एनएफडीसी’ने ‘कथा दोन गणपतरावांची’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता.) परंतु तिचा प्रवास ‘एक लहानशी, नगण्य घटना एका व्यापक बदलास गती देऊ शकते’ हे सांगणार्या ‘बटरफ्लाय इफेक्ट’च्या वाटेवरून होतो. कथानकाला अर्वाचीन सामाजिक नि राजकीय घटनांचे संदर्भ आहेत हे सहज दिसून यावे.
---
(ही कथा ‘पुरुष उवाच - २०२४’ दिवाळी अंकामध्ये प्रथम प्रसिद्ध झालेली आहे.)