-
कर्जाच्या विळख्यात अडकलेले अनिल अंबानी यांची ‘रिलायन्स एनर्जी’ ही कंपनी, अखेर अदानींच्या छावणीत दाखल झाली. ग्राहक विजेची बिलं भरायला रांगेत उभे राहिले, ‘रिलायन्स’च्या जागी ‘अदानी’ हे नाव त्यांना दिसले! दुसरीकडे केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या त्यांच्या कंपनीला, सरकारी आशीर्वादाने राफेल विमानांच्या उत्पादनाचे मिळालेले कॉन्ट्रॅक्ट हा राजकीय वर्तुळात सर्वाधिक वादग्रस्त (अगदी बोफोर्सपेक्षाही) प्रश्न बनला. धीरूभाईंच्या मृत्यूनंतर ज्यांच्याकडे त्यांचा खरा वारस म्हणून पाहिले गेले, त्यांचीच उतरती भाजणी सुरू झाली.
राजकारणात असो की व्यावसायिक क्षेत्रात, एका पार्टीच्या दोन पार्ट्या झाल्या की, नकळत आपण म्हणजे समाज एका बाजूला झुकतो. अमुक एक हाच खरा वारसदार, असे आपण समजू लागतो. पुढे हाच प्रगती करेल नि दुसऱ्या बाजूला माघार घ्यावी लागेल, असा काहीसा आपला होरा असतो. अनेकदा यात त्या त्या व्यक्तीची जाहीर छबी, किंवा त्याने उभी केलेली आपली प्रतिमा, यांचा मोठा वाटा असतो. किंवा आपल्या विचारात संस्कृती वा परंपरा यांच्या रूपाने रुजवलेले पूर्वग्रह असतात.
भारतातील बहुतेक राजकीय पक्ष हे एकचालकानुवर्ती कार्यपद्धती असलेल्या घराणेशाहीवरच चालतात. पक्षाच्या प्रमुख नेत्याचा मुलगा, मुलगी, पत्नी, नातू, अजून शेंबूड पुसता न येणारा पणतू हे त्याचे जन्मसिद्ध वारस मानले जातात. ‘एन. टी. रामाराव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी वा मुलगा हेच त्यांचे वारस असतील. चंद्राबाबू नायडू या त्यांच्या जावयाला पारंपरिक भारतीय मनात असणाऱ्या त्या सहानुभूतीच्या लाटेपुढे टिकाव धरता येणार नाही’ असे म्हणणाऱ्यांना, आणि आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना संपूर्ण धोबीपछाड देऊन चंद्राबाबूंनी आपला पक्ष काढला, इतकेच नव्हे तर तीन वेळा मुख्यमंत्रीपदही भूषवले. एन. टी. आर. यांच्या पत्नीचा ‘मूळ’ पक्ष अखेर चंद्राबाबू यांच्या पक्षात विलीन होऊन संपला! एन.टी.आर. यांच्या मुलांना तर राजकारणात बस्तानच बसवता आले नाही. अशीच किमया तमिळनाडूमध्ये जयललिता यांनी अण्णाद्रमुकबाबत साधली. मात्र चंद्राबाबूंनी आंध्रात केलेली किमया राज ठाकरे यांना महाराष्ट्रात साधली नाही.
‘बाळासाहेबांचा वारस कोण?’ या प्रश्नाचे अध्याहृत उत्तर ‘राज ठाकरे’ हेच होते. उद्धव ठाकरे हे कुणाच्या खिजगणतीतही नव्हते. त्यामुळे बाळासाहेबांनी उद्धव यांना आपला वारस घोषित केले, तेव्हा इतकी वर्षे सोबत असलेल्या राज यांच्यावर अन्याय केल्याची भावना अनेकांच्या मनात उमटली होती.
राज यांनी वेगळी चूल मांडली तेव्हा, ‘मनसे’च कदाचित मोठी होऊन शिवसेनेची जागा घेईल आणि हळूहळू सेनेचे लोक इकडे येऊन मूळ सेना दुय्यम होऊन जाईल, असे बहुतेकांना वाटले. या वाटण्याला राज यांचा करिष्मा आणि उद्धव यांच्याबद्दलची अनभिज्ञता यापलीकडे काहीच आधार नव्हता.
जरी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मिळालेली ‘पुढे चाल’ आणि आयता मिळालेला पक्ष या दोन गोष्टी उद्धव यांना मिळालेल्या असल्या, तरी त्यांनी युती तोडूनही आपल्या आमदार संख्येत केलेली वाढ उल्लेखनीय म्हणावी लागेल. त्याच वेळी राज ठाकरे यांना निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे, तर एकूणच राजकारणातच आलेले अपयश पाहता, हा होरा चुकला आहे हे पुराव्यानिशी म्हणता येते.
आता एक बाजूला, मोदी लाटेने भारावून जाऊन लोकसभेच्या वेळी त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन आत्मघात ओढवून घेणारे राज ठाकरे आहेत, तर दुसरीकडे ‘भाजप हाच किंवा निदान हाही आपला प्रतिस्पर्धीच आहे’ हे ओळखून त्याला कायम शिंगावर घेण्याची भूमिका स्वीकारलेले उद्धव ठाकरे आपली भूमी वाचवू पाहत आहेत. राज यांना सामाजिक वा राजकीय अशी भूमीच निर्माण करता आलेली नाही, हे त्यांचे मोठे अपयश आहे. ‘मराठी अस्मिता’ ही हिंदू अस्मितेच्या नि विकासाच्या भूलभुलय्यामध्ये पाचोळ्यासारखी उडून गेली नि राज यांचा मुद्दा संपला. आज नवी भूमिका, नवी भूमी शोधताना ते चाचपडताना दिसत आहेत.
इकडे रिलायन्स पॉवर, रिलायन्स एनर्जी या दोन कंपन्यांच्या माध्यमांतून मूळ ‘रिलायन्स’ला टक्कर देऊ पाहणारे अनिल अंबानी यांना तो संघर्ष पेलला नाही. उलट ‘जिओ’च्या माध्यमांतून अभिनव योजना राबवून थोरल्या अंबानींनी ‘RCOMM’च्या अपयशाला अधिकच अधोरेखित केले. त्या त्या क्षेत्रांतले तज्ज्ञ या दोन्ही वारसदारांच्या घसरगुंडीचे आपापल्या परीने मूल्यमापन करतीलच. पण ते करत असताना त्यांच्या या स्पर्धक वारसदारांच्या यशाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यातूनच कदाचित यांच्या अपयशाची कारणे अधिक स्पष्टपणे समजून येतील, अशी शक्यता आहे.
धीरूभाईंच्या पश्चात जेव्हा व्यवसायाची दोन बंधूंमध्ये विभागणी झाली, तेव्हाही तरुण आणि तडफदार या विशेषणाने ज्यांचे वर्णन केले जाई, असे धाकटे अंबानी हे थोरल्या भावाच्या सहज पुढे जातील, असा अनेकांचा पक्का समज होता. त्यांच्या फिटनेसबद्दलच्या आग्रहाच्या, हाताखालच्या व्यक्तींसोबत कणखर पण आपलेपणाच्या, वर्तनाचे किस्से चर्चिले जाऊ लागले होते. (यात कुठेतरी हिंदी हिरोईन ‘पटवली’ या यशालाही काही जण मोजत असावेत.) त्या तुलनेत ‘अनफिट’ भासणाऱ्या थोरल्या अंबानींची छबी फारशी प्रॉमिसिंग नव्हती.
पण आज इतक्या वर्षांनंतर, गाळात रुतलेला धाकल्या अंबानींचा रथ आणि थोरल्या अंबानींची घोडदौड पाहता, सुरुवातीची अपेक्षा पूर्ण चुकीची ठरली आहे.
धाकट्या अंबानींची ‘रिलायन्स पॉवर’ ही कंपनी मूळ रिलायन्स इंडस्ट्रीजला पाहता पाहता मागे टाकून एक मोठे ‘उद्योग-संस्थान’ (conglomerate) म्हणून उभी राहील, असे स्टॉक मार्केटमध्ये बोलले जात होते.
सोबतच असलेली रिलायन्स एनर्जी (जी आज अदानींनी ताब्यात घेतली), प्रथम तिरोडकरांना विकलेला टॉवर बिजनेस, मग थोरल्या बंधूंनी विकत घेऊन वाचवलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOMM) आणि तरीही शिल्लक राहिलेले भले थोरले कर्ज, अशा एक एक पायऱ्या ते उतरत गेले आहेत.
त्या गाळातून बाहेर पडण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी केलेले साटेलोटे, त्यातून आर्थिक बदनामीसोबतच पदरी पडत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, या दलदलीत धाकले अंबानी खोल खोल रुतत जात आहेत.
आजच्या राजकारणातले विविध ध्रुव पाहिले, तर राज ठाकरेंच्या पक्षाला फारसे स्थान उरलेले नाही. आज त्या पक्षाला उर्जितावस्था यावी, यासाठी राबवायला राज यांच्याकडे कोणतेही धोरण दिसत नाही. धाकल्या अंबानींनीदेखील सत्ताधाऱ्यांशी लगट करून राफेल किंवा रशियन मिसाइल्सची कॉट्रॅक्ट मिळवली असली, तरी ती पार पाडण्यास लागणारे तांत्रिक कौशल्य त्यांच्याकडे आज नाही. मिळवणे नि राखणे यातला फरक मोठा असतो आणि त्यांचा तोल राखण्यास कशी दमछाक होते याचा पुरेपूर अनुभव राज आणि अनिल अंबानी दोघेही आज घेत असतील. त्यांच्या करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याने, आता त्यांच्या भावी यशाला अधिकच स्वच्छ नि सुस्पष्ट स्वरुपात समोर यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्या गाडीला पुढचा सिग्नल मिळणे अवघड असणार आहे
-oOo-
(पूर्वप्रसिद्धी: दै.'दिव्य मराठी’- रसिक.)
पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती      
रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८
वारसदारांचा अपकर्ष !
भेकड नेते आणि शेंदाड शिपाई
-
ज्या लोकांना वाटतं किंवा वाटत होतं की महात्मा गांधीजींना मारलंच पाहिजे होतं, त्यांना ‘जिना आणि माऊंटबॅटन (किंवा त्यांचे पूर्वसुरी) यांना का मारलं नाही?’ असा प्रश्न पडत नाही. याचं एक कारण म्हणजे विचार करणे त्यांच्या रक्तात नसते, हे तर आहेच पण त्या पलीकडे मुळात गांधींबद्दल द्वेष असणार्यांच्या प्रचाराला बळी पडलेले असतात. या प्रचारकांच्या द्वेषामध्ये एका बनियाने आपल्या सारख्या जन्मजात श्रेष्ठींऐवजी देशातील जनतेचे नेतृत्व करावे, ही अहंकाराला बसलेली मोठी ठेच मुख्यत: कारणीभूत असते. आता ज्यांना जिना किंवा एखादा ब्रिटिश अधिकारी ठार मारण्याऐवजी गांधींवर हत्यार चालवणे, त्यांची हत्या करणे अधिक महत्वाचे का वाटत असावे? याचे एक कारण म्हणजे त्यांना परिणामापेक्षा श्रेयाची अधिक आस होती हे नंतर दिसून आले आहे.
ज्यांना असं वाटत होतं किंवा वाटतं, ते प्रामुख्याने नक्की काय करावं या संभ्रमात असलेले, सुमार विचारशक्तीचे आणि भेकड लोक असतात. त्यामुळे त्यांचा बळी म्हणून ते नि:शस्त्र म्हातार्याची निवड करतात. कुणाला तरी मारल्याने आपण काहीतरी केले, इतके समाधान त्यांना हवे असते.
बुश नाही का ९/११ चा राग म्हणून एका देशाचा विध्वंस घडवतो आणि त्याचे नागरिक ‘वा रे पठ्ठे’ म्हणून शाबासकी देतात? वास्तविक इराकचा काय संबंध होता? पण काहीतरी केले पाहिजे म्हणून कुणावर तरी गोळ्या झाडायच्या, आणि सूड घेतल्याचे समाधान मानायचे. बरं हे करायचे तर, ज्याला मारला तोच दोषी असा कांगावा करावा लागतो. बुशने ‘ वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’चा बागुलबुवा उभा केला. पण ९/११ इराकने घडवले का? असा प्रश्न ‘वॉर ऑन टेरर’ च्या धुंदीत मग्न झालेल्या बहुसंख्य अमेरिकी नागरिकांनी विचारला नाही. माध्यमांनी या दोन्हींचा संबंध आहे असा संभ्रम निर्माण केला नि काम झाले.
भाष्यचित्रकार : आर. के. लक्ष्मण.भारतातही म्हातार्याला ठार मारायचे त्यातून आपले तथाकथित शौर्य सिद्ध करण्यासाठी तोच गुन्हेगार हे सिद्ध करायचे असा फंडा वापरला गेला.
अमेरिकेत माध्यमांचा वापर करावा लागला. गॉसिप आणि चारित्र्यहनन प्रेमी भारतीय समाजात कुजबूज तंत्र अधिक सोपे नि बिनखर्चाचे होते, ते वापरले गेले. जिना किंवा ब्रिटिश अधिकार्यांना ठार मारून येणारा बॅकलॅश सहन करण्याची हिंमत या भेकडांत नव्हती. म्हणून (१) स्वातंत्र्य मिळाल्यावर, म्हणजे ‘ब्रिटिश सत्ता गेल्यावर’ (त्यांच्या राज्यात हिंमत झाली नाही) (२) टार्गेट म्हणून नि:शस्त्र म्हातार्याची निवड करुन यांनी आपले शौर्य (?) दाखवले.
आजही यांचे नेते व्यासपीठावरुन गर्जना करणारी, चिथावणारी भाषणे करतात आणि नंतर ‘जमाव आमच्या नियंत्रणात राहिला नाही होऽ’ म्हणून रडारड करतात. केल्या कृतीची जबाबदारी घेऊन, त्याचे परिणाम भोगण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्यातून क्षणिक भ्रमित कार्यकर्ते खटले अंगावर घेऊन पस्तावतात. हे नामानिराळे राहून तिथून पळ काढतात, आणि आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांमधे आपणच कसे हे केले याच्या गमजा करत बसतात.
यांच्या शौर्याचीच नवी आवृत्ती दोन तीन वर्षांपूर्वी आम्हाला ‘एनएफएआय’ मध्ये पाहायला मिळाली. काही स्थानिकांनी ‘कबीर कला मंचा’चा कार्यक्रम तिथे आयोजित केला होता. आता कबीर कला मंचावर काही शूरवीरांचा(!) आरोप असा की ते नक्षलवादी आहेत. (ते तसे आहेत की नाहीत या दोन्हींबाबत मी अनभिज्ञ आहे. त्यावर चर्चा नको.) त्यामुळॆ त्यांना ‘धडा शिकवायला’ म्हणे एका शूर विद्यार्थी संघटनेचे लोक तिथल्या झाडीत लपून बसले. कार्यक्रम संपल्यावर, कला मंचाचे सारे कलाकार आणि सदस्य निघून गेल्याची खात्री झाल्यावर, हे शूर मावळे ‘हर हर महादेव’ म्हणत प्रगटले नि स्थानिक आयोजकांपैकी एक दोघांना मारु लागले आणि लगेच फरारही झाले. दुसर्या दिवशी स्थानिक ‘’राष्ट्रभक्त’ वगैरे म्हणवणार्या माध्यमांनी ‘धडा शिकवला’ असा मथळा देऊन बातमी केली.
जसे यांच्या पूर्वसुरींनी जिना वा ब्रिटिशांशी पंगा घेण्याचे धाडस केले नाही, तसेच इथे ज्यांच्यावर हे आरोप करतात त्या कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे धाडस केले नाही. उगाच एखादा फटका आपल्याला बसला तर डोळे पांढरे व्हायचे. हास्पिटलात भरती व्हायची वेळ यायची.
यांच्या शौर्याच्या पातळीचे एक उत्तम उदाहरण नुकतेच फेसबुकवर पाहायला मिळाले. यांतलेच एक शूरवीर घरबसल्या हातात वर्तमानपत्राची सुरळी घेऊन एका कोळशाला बडवत बसले होते. ते चित्र अत्यंत बोलके होते असे आमचे मत झाले.
-oOo-
रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८
शर्विलकाचा प्रतिशंखनाद आणि जमाव
-
‘आपले सब्जेक्ट्स* कुठेतरी एक पायरी वर चढताहेत, यातून कदाचित आपल्या स्थानाला धक्का बसू शकतो’ याची जाणीव झालेल्या वर्चस्ववाद्यांच्या चलाख मांडणीचे ट्रम्प यांनी उत्तम उदाहरणच सादर केले आहे. संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी नेहमीच आकडेवारीला प्राधान्य देतो. तिच्या अभावी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष, केलेले आरोप हे केवळ पूर्वग्रहांचे नि स्वार्थाचे अपत्य असतात. (अर्थात अलीकडे खोटे आकडेही तोंडावर फेकण्याची अहमहमिका सुरु झालेली दिसते. त्यामुळे त्या आकड्यांची विश्वासार्हता हा ही एक कळीचा मुद्दा ठरतो.)
‘आमच्या गटावर झालेला एक अन्याय हा आमच्यावरील नियमित होत असलेल्या अन्यायाचे उदाहरण, आणि तुमच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचारांची दहा उदाहरणे मात्र अपवाद आहेत’ हा चलाख तर्क पुरुषी वर्चस्ववादी, जातीय वर्चस्ववादी, धार्मिक वर्चस्ववादी, प्रांतिक वर्चस्ववादी, भाषिक वर्चस्ववादी कायम करताना दिसतात. परस्परांच्या विरोधात उभे असलेल्या गटांनाही ‘चला आपण आकडेवारी जमा करु, नि एकदाचा सोक्षमोक्ष लावू कोण शोषक नि कोण शोषित याचा’ असे म्हटले तर दोन्ही बाजू ते अमान्य करतात. कारण धारणा (perception) नि पूर्वग्रह (prejudices) ही त्यांची हत्यारे आहेत. ती नाहीशी झाली तर त्यांच्या गटाच्या राजकारणाला धक्का बसतो.
मला ‘असे असावे’ असे वाटते तेव्हा मी ठासून ‘असे आहेच’ हे सांगून माझ्यासारख्याच मानसिकतेच्या कमकुवत मनाच्या, अन्य गटाबद्दल (कदाचित त्यातील एका व्यक्तीबद्दल आणि म्हणून सरसकटीकरणाने पूर्ण गटाबद्दल) अढी वा द्वेष असणार्यांचा जमाव जमवू शकतो. त्याच्या आधारे माझ्या स्वार्थानुकूल खेळ्या खेळू शकतो हे बहुतेकांना ठाऊक असते. आपण शोषित असल्याचा हा वर्चस्ववाद्यांचा ‘शर्विलकाचा प्रतिशंखनाद’ मूठभरांचा असला तरी माध्यमे, हत्यारे अनुकूल झाली की वास्तवाच्या, बहुसंख्येच्या आभासात रूपांतरित करता येतो, आणि शोषकांनाच शोषित असल्याचे सर्टिफिकेट मिळून जाते.
आपल्याकडे जात आणि धर्म या दोन्ही हत्यारांचा वापर करुन केलेली, शोषित असल्याची ही ओरड आपण अलीकडे अनुभवत आहोतच. आपले दुर्दैव हे की ‘ट्रेवर नोआ’सारखे स्पष्टवक्ते आपल्या माध्यमांतून फारसे उरलेले नाहीत. राजकीय, जातीय, धार्मिक, वांशिक, प्रांतिक नि भाषिक गुंडांपुढे शेपूट घालून बसलेले, वा सरळ सरळ त्यांची दलालीच करणारे किंवा त्यांनी टाकलेले तुकडे चघळण्यात धन्यता मानणारे, नव्हे ती अभिमानाने मिरवण्याची बाब मानणारेच बरेच दिसू लागले आहेत.
- oOo -
(*याची व्याप्ती कायम राखून केलेला अनुवाद माझ्याकडे नाही. जे प्रतिशब्द आहेत ते त्याची व्याप्ती घटवतात. इथे तर ते मला अजिबातच चालणार नाही.)
शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८
ब्रह्मांडाचे वांझ अंडे
-
ब्रह्मांडाच्या अंड्याला फलित न करु शकलेला शुक्राणु, विश्वाच्या पसार्याला रचून ठेवता येईल इतक्या विस्ताराचे कपाट कपाटाला पुन्हा विश्वातच जागा द्यावी लागेल ही कॅच-२२ सिचुएशन, हे सारे आपल्याच जबाबदारीचा भाग असे समजणारा कुणी मी. क्रोएशियाच्या राजधानीत मिळणारे बेकन, कुर्डुवाडीच्या स्टेशनवर मिळणारे बेसन, राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नावर नेमके मूग गिळून बसणारे बंडातात्या... डायनासोरची वंशावळ सांगणारे आणि ‘कृण्वन्तु विश्वमजुरासिकं’ ची गर्जना करणारे क्रीट काका; त्यांना ‘डायनासोर जुरासिक काळात नव्हते’ असं सांगत मोडीत काढणारे शेरसिंग समीक्षक पाण्याच्या एका थेंबासरशी विरघळणारी काळी आई, आणि ‘आईन्स्टाईनच्या बैलाला ढोल’ म्हणणारे संशोधक गोमयानंद सरस्वती; रक्ताचा थेंब पाहून भोवळ येणारे पण इतरांच्या रक्ताचे पाट वाहवू इच्छिणारे मॅक्डोनल्ड काका जगाची उसवलेली गोधडी शिवून देणार्या ‘विश्वमाता टेलर्स’च्या जाधव काकू रक्तकोमल पहाटेचा रंग नारिंगी झाला म्हणून मोसंबीच्या संगतीने शोक व्यक्त करणारा श्रीपाद या सार्यांची भेळ म्हणजे आमचा मनुष्य समाज ! - रमताराम
- oOo -तळटीप: ’साहित्याचे वांझ(?) अंडे’ या शीर्षकाखाली या कवितेबाबत थोडे विवेचन याच ब्लॉगवर वाचता येईल.