गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

भाषा: राष्ट्र... आणि हत्यार!

(प्रसिद्ध उर्दू शायर नि कवी जावेद अख़्तर यांनी २०१५ मध्ये 'जश्न-ए-रेख़्ता' या वार्षिक ऊर्दू संमेलनामध्ये केलेल्या भाष्याचा व्हिडिओ यापूर्वी ’वेचित चाललो...’ वर शेअर केला होता. त्या अनुषंगाने भाषा, राष्ट्र ही संकल्पना आणि तदनुषंगिक विद्वेषाचे राजकारण यावर काही भाष्य केले होते. अख़्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर त्या लेखातील बहुसंख्य मुद्दे घेऊन ’तत्रैव’ नियतकालिकाच्या जाने-फेब्रु २०२३ च्या अंकासाठी लिहिलेला लेख.)

JavedAkhtar

पु. ल. देशपांडे यांनी एका दंगलीच्या काळातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. त्या काळात संघाचे स्वयंसेवक गस्त वगैरे घालत असत. एकदा पुलं नि त्यांचे काही मित्र रात्री उशीरा घरी परतत असताना एका अंधाऱ्या बोळातून आवाज आला, ’थांबा. कोण आहे, मित्र की शत्रू?’ पुलंनी खोडसाळपणे उत्तर दिले, ’शत्रू!’ काही क्षण शांतता होती. मग आवाज आला, ’जा.'

किस्सा गंमतीचा असला तरी त्यातून आपली मानसिकता दिसते. समोरून आलेली व्यक्ती ही आपली मित्र असू शकते किंवा शत्रू. याच्या अधले- मधले काही संभवतच नाही, असा बहुसंख्येचा समज असतो. आपल्याला हवे ते बोलले की कौतुक, न रुचणारे बोलले की बोलणारा देशद्रोही, अर्बन नक्षल किंवा उलट दिशेने छुपा मनुवादी, अंधभक्त वगैरे असल्याचे शिक्के मारून मोकळे होणे हा अलिकडच्या काळात प्रकर्षाने दिसू लागलेला प्रकार आहे.

खरंतर एखाद्याचे काही बाबतीत आपले एकमत झाले नाही याचा अर्थ तो थेट शत्रूपक्षात जातो असे नसते. किंबहुना एकुणात शत्रू-पक्ष वा मित्र-पक्ष असे ठोस गट पाडता येत नाहीत. काही वेळा त्याचे नि आपले एकमतही होते. ही परिस्थिती त्याचा द्वेष करण्यास अडचणीची होते. म्हणूनच मग द्वेषसंपृक्त मने जात, धर्म, देश यांसारखे आधीच निश्चित झालेल्या गटांच्या आधारे आपापल्या द्वेषाचे विरेचन करू पाहात असतात.

हे आठवण्याचे कारण हिंदुत्ववाद्यांचे लाडके शत्रू जावेद अख़्तर आहेत. त्यांनी नुकतेच पाकिस्तानात जाऊन पाकिस्तान नि पाकिस्तानी मंडळींना खडे बोल सुनावल्यामुळे त्यांना अचानक अख़्तर यांच्याबद्दल ममत्व वाटू लागले आहे. अगदी कंगना राणावत सारख्या ट्विटरब्रँड अभिनेत्रीनेही त्यांचे कौतुक केले आहे. आजवर आपण ज्यांना देशद्रोही, अर्बन नक्षल वगैरे त्यातल्या त्यात सभ्य नि इतर अश्लाघ्य विशेषणांनी गौरवले, त्याच व्यक्तीने देशाची बाजू थेट शत्रूच्या गोटातच जाऊन मांडल्याने नाईलाजाने का होईना त्यांना अख़्तर यांचे कौतुक करावे लागते आहे.

अख़्तर यांचे उर्दू भाषेवरील प्रेम आणि प्रभुत्व हे संस्कृतप्रेमींना रुचत नसते हे तर उघडच आहे. हिंदुत्ववाद्यांनी आपल्या धार्मिक राष्ट्रवादाला भाषिक राष्ट्रवादाची जोड देण्याचाही आटोकाट प्रयत्न चालवला आहे. त्यातून ’संस्कृत ही प्राचीन नि देवभाषा आणि हिंदी ही समस्त हिंदुस्थानची भाषा’ हा तर्क बहुसंख्येच्या गळी उतरवण्याचा आटापिटा चालू आहे. धार्मिक पातळीवर मुस्लिमांचे जसे खच्चीकरण चालू असते तसेच उर्दू या भाषेचेही. त्यासाठी मुस्लिम आणि उर्दू यांचे अभिन्नत्व वारंवार ठसवण्याचा प्रयत्न हिंदूराष्ट्रवाद्यांकडून होत असतो. २०१६ साली जश्न- ए-रेख़्ता (रेख़्ता = उर्दू) या वार्षिक उर्दू-महोत्सवामध्ये भाषा आणि धर्म यासंबंधी जावेद अख़्तर यांनी भाष्य केले होते. त्या निमित्ताने भाषा आणि राष्ट्र यांच्या परस्परसंबंधाने केलेली ही मांडणी.

राष्ट्र (nation) ही अखेर एक संकल्पना आहे. त्याच्या सीमारेषा तुम्हाला आखाव्या लागतात, संबंधित समाजाच्या गळी उतरवाव्या लागतात. राष्ट्राच्या भौगोलिक, भाषिक, वांशिक अशा अनेक प्रकारच्या व्याख्या निर्माण केल्या गेल्या, रुजवल्या गेल्या. त्याआधारे राजकीय सत्ता उभ्या राहिल्या, देश (state) निर्माण झाले. 'आमच्या देशाला इतक्या वर्षांचा इतिहास आहे’ वगैरे वल्गना वर्तमानात कर्तृत्वाची वानवा असलेले, किंवा त्यासाठी करावे लागणारे कष्ट वा मेहनत करण्याबाबत आळशी असणारेच अधिक करत असतात. भविष्याची भीती गाडून टाकण्यास उत्सुक असणारे भूतकालभोगी समाजच असले आधारहीन दावे कुरवाळत बसतात. वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले, तर काळाच्या प्रवाहात देश निर्माण होत असतात, विखंडित होतात, विलयाला जातात, कधी ते पादाक्रांत केले जातात, आणि भूगोल बदलत राहतो...

अमुक काळात तमुक भूभाग हा ढमुक देशाचा भाग होता म्हणजे आज त्या वारशाने ढमुक देशाचा वारस मिरवणाऱ्या देशाने वा गटाने त्यावर हक्क सांगणे याला सोयीची भूमिका घेणेच म्हणता येते. इतिहासातील काळाचा कोणता तुकडा आपण निवडतो, त्यानुसार त्या भूभागाची मालकी या किंवा त्या - कदाचित त्या काळात अस्तित्वातही नसलेल्या - देशाच्या ओटीत टाकता येते. ही कृती स्वार्थप्रेरित आणि आपल्या गटाची पक्षपातीच असते. भारतामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभेसारख्या संघटनांनी धार्मिकतेला राष्ट्रवादात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. पण मध्यपूर्व आशियामध्ये पसरलेल्या ख्रिश्चनबहुल देशांकडे पाहिले तर धर्म हे राष्ट्र असल्याची संकल्पना मोडीत निघालेली दिसते. इथे राष्ट्र (nation) आणि देश (state) या दोन संकल्पनांतील फरक अधोरेखित होतो आहे. पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानपासून दूर होताना ’उर्दू = मुस्लिम’ हे गणित मोडीत काढले. तिथे भाषा हा राष्ट्रनिश्चितीचा निकष अधिक प्रबळ ठरला.

Hindustani

दोन देशांच्या निर्मितीनंतर हिंदूमहासभेचा प्रभाव ओसरत गेला. तिची जागा घेण्यास सरसावलेल्या संघ परिवाराने धार्मिक राष्ट्रवादासोबतच भाषिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे भारतातील मुस्लिम हे उर्दू भाषिक असल्याची हाकाटी पसरवण्यास सुरुवात केली.

या दाव्याचे महत्व मुस्लिम कट्टरवाद्यांनीही ओळखले होते. विविध स्थानिक भाषा संवादासाठी वापरणाऱ्या भारतीय मुस्लिमांना एकाच सूत्रात बांधण्यास हा धागा उपयुक्त ठरणार होता. हिंदुत्ववाद्यांना द्वेषाला सोयीचे असलेले गृहितकच कट्टरतावादी मुस्लिमांना आपला गट बांधण्यास उपयुक्त ठरत होते. थोडक्यात आपापले स्थान बळकट करण्यासाठी दोनही विरोधकांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या हातात हात घेऊन पावले टाकली... आजही टाकत आहेत. आणि सामान्य त्यांच्यामागे फरफटत जात आहेत.

भूतकालभोगी हिंदुत्ववाद्यांनी संस्कृत ही प्राचीन आणि हिंदी ही अर्वाचीन भाषा आपल्या भाषिक राष्ट्रवादाचे साधन म्हणून पुढे रेटायला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठी उर्दूला मागे रेटणे त्यांना अपरिहार्य ठरले. त्यासाठी याच देशात निर्माण झालेली, गंगा-जमनी संस्कृतीचे एक प्रतीक असलेली उर्दू त्यांनी मुस्लिम समाजाच्या ओटीत टाकली, नव्हे त्यांना करकचून बांधून टाकली. आणि मग ’त्या अमंगळ लोकांची’ भाषा आत्मसात करण्यापासून आपल्या लोकांना परावृत्त करणे सोपे झाले.

द्वेष रुजवणे हा सर्वात सोपा उपाय दोन्ही धार्मिक कट्टरतावादी वापरतात. तो सर्वाधिक परिणामकारकही असतो. एखाद्या झाडाच्या मुळाशी मोरचूद टाकून निश्चिंतपणे निघून जाणाऱ्या आणि त्या झाडाचा तिळतिळ होत जाणारा मृत्यू समाधानाने पाहात राहणाऱ्या विकृत लाकूडतोड्यासारखे हे दोघे गळ्यात गळा घालून या भाषिक लढाईतून समाजातील भेग वेगाने वाढत जाताना पाहून संतोष पावत असतात. माथेफिरु धर्मवेडापायी दंगली पेटवून नरबळी देण्यासही न कचरणारे एखाद्या भाषेच्या हत्येबाबत संवेदनशील असतील ही अपेक्षाच मूर्खपणाची आहे.

अमंगळ लोकांच्या भाषेचा मुद्दा आला आहे तर हिंदुत्ववाद्यांच्या लाडक्या संस्कृतचा उल्लेखही अपरिहार्य आहे. सोयीचा इतिहास, समाजव्यवस्था, नीतिनियम रुजवणे, त्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रॉपगंडा ऊर्फ प्रचार-प्रसारासाठी माध्यमांचे महत्व ब्राह्मणांनी फार प्राचीन काळापासून चोख ओळखले होते. त्यामुळे देवांशी आपले देवांशी ‘हॉटलाईन कनेक्शन’ असल्याचा दावा करणाऱ्या त्या जमातीने देव-भाषा म्हणत तिला इतर अमंगळ समाजामध्ये फारसे रुजू दिले नाही. त्यातून पवित्र देव-भाषा विटाळेल असा त्यांचा दावा होता.

पुढे ब्रिटिशांसोबत आलेल्या इंग्रजी भाषेसोबत आलेल्या रोजगार संधीही सर्वप्रथम साधणाऱ्या याच समाजाने व्यवहारात संस्कृतचे बोट सोडले. त्यातून तिची पीछेहाट होत गेली. त्यांच्याच कर्माने मरु घातलेली ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि प्राचीनत्वाचा सोस मिरवण्यासाठी आता त्याबाबत आक्रोश सुरु आहे. विशेष म्हणजे तो करणारे स्वतः आपल्या पुढच्या पिढीला इंग्रजी आणि चोख व्यावहारिक शिक्षणच देत आहेत. संस्कृत ही भाषा त्यांच्या खांद्यावरचा एक अस्मितेचा झेंडा म्हणूनच शिल्लक राहिली आहे.

थोडक्यात संस्कृतच्या ठेकेदारांनी तिला आपल्याच लोकांपासून दूर ठेवून तिची वाढ खुंटवली, इंग्रजीच्या आगमनानंतर स्वत:ही तिचा हात सोडून तिला वाऱ्यावर सोडली. आता केवळ देव्हाऱ्यातल्या शाळिग्रामासारखी तिची पळभराची पूजा उरकून इंग्रजीची दिवसभराची चाकरी करायला ते चालते होतात.

हिंदुत्ववाद्यांनी आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांनी कितीही भेग पाडण्याचा प्रयत्न केला तरी, संस्कृतला ज्या दुर्भाग्याला सामोरे जावे लागले तसे उर्दूला सामोरे जावे लागलेले नाही. उर्दू ही भारतीय मुस्लिमांची भाषा ही हाकाटी दोन्ही बाजूंनी केल्याने, भाषांनी विभागलेल्या मुस्लिम समाजाला एक सामायिक ओळख मिळत असल्याने ती आनंदाने स्वीकारली हे खरे. पण असे असूनही तिच्यामध्ये निर्माण झालेल्या दर्जेदार साहित्यामुळे, विशेषत: शायरीमुळे, ती मुस्लिम समाजाबाहेरही अंगीकारली नि अभ्यासली गेली आणि वाढत गेली. भाषेच्या आणि लिपीच्या पावित्र्याच्या खुळचट कल्पनांनी आपल्याच भाषेची हत्या करणाऱ्यांच्या हाती उर्दूचा द्वेष करण्यापलिकडे काही उरलेले नाही.

जश्न-ए-रेख़्तामधील त्या मुलाखतीदरम्यान जावेद अख़्तर समोरच्या पंजाबी तरुणांना जावेद तळमळीने विचारतात, ’अरे तुम्ही सर्वाधिक उत्तम साहित्य यात निर्माण केले, ही तुमची भाषा आहे. मग तुम्ही असे कसे तिला इतरांच्या ओटीत टाकून मोकळे होतात, आपल्याच अपत्याला असे कसे नाकारता?’

खरंतर त्यांना हा प्रश्न पडायला नको. इथला करंटा हिंदू समाज 'बेड खाल्ला म्हणन त बाटलास' म्हणत आपल्याच लोकांना ख्रिश्चन धर्माच्या ओटीत टाकून मोकळा होत असे. एखाद्याची जबरदस्तीने सुन्नत केली गेली म्हणून, मूळ धर्म, देव-विचार-परंपरा-रीतीभाती यावरची श्रद्धा कितीही अभंग असली तरी त्याला मुस्लिम मानू लागे. यांना श्रद्धेतून, बांधिलकीतून निर्माण होणारी ओळख मान्य नाही. त्यांना ती कर्मकांडांच्या प्रांतातच शोधायची असते. काहीही नि कुणालाही आपलेसे करण्यापेक्षा दूर ढकलण्यास उत्सुक असलेला हा समाज आहे. त्यातील अगदी पुरोगामी मंडळींमध्येही मला हा दोष ओतप्रोत भरलेला दिसतो.

१७९८ मध्ये, म्हणजे जेमतेम सव्वादोनशे वर्षांपूर्वी कुराण उर्दूमध्ये प्रथम अनुवादित केले गेले. सिंधीतील त्यापूर्वी सातशे वर्षे (हा तपशील अख़्तर यांनी दिलेला, बरोबर चूक मला माहित नाही!) 'अशा अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले' म्हणून हे करणाऱ्याविरोधात मौलवींनी फतवा जाहीर केला होता! थोडक्यात मौलवी लोक अठराव्या शतकाच्या शेवटी उर्दूला अमंगळ भाषा मानत होते! ती मुस्लिमांची असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता! त्यामुळे द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांच्या सोयीसाठीच ती मुस्लिमांची भाषा ठरवली गेली हे उघड आहे.

अख़्तर यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे तो असा की बहुतेक भाषांमधले पहिले साहित्य हे धार्मिक आहे. उर्दू ही अशी पहिली आणि कदाचित एकमेव भाषा आहे जिचे पहिले साहित्य हे विद्रोही आहे. आणि अगदी अख़्तर म्हणतात ते शब्दशः खरे असले/नसले तिचा प्रचार-प्रसार हा शायरीच्या माध्यमातून झाला ज्यात तरक्कीपसंद शायरीचा वाटा मोठा आहे.

उर्दू ही या देशातच तयार झालेली भाषा आहे, सर्वात अर्वाचीन, सर्वात तरुण भाषा आहे. त्या अर्थी ती तरुणांची आहे, तशीच दार्शनिक शायरांचीही. एका धर्माच्या दावणीला तिला बांधणारे द्वेषाने आंधळे झालेले असतात. हे आधी द्वेष करतात, तो परिणामकारक ठरत नाही म्हटल्यावर मग ’ही आमचीच’ म्हणत त्याला आपल्या रंगाचा लेप देण्याचा प्रयत्न करत असतात.

मुळात सजीवांनी भाषा विकसित केली ती संवादासाठी, संदेशांच्या वा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी. माणसांची भाषा तर अधिक समृद्ध. अन्य सजीवांप्रमाणे तिला केवळ वर्तमानाचे बंधन नाही. भूतकाळाचे, भविष्यकाळाचे, इतकेच काय निखळ विचाराचेही पैलू तिला मिळत गेले आहेत. अशा वेळी तिला द्वेषाचे, फाटाफुटीचे साधन बनवणाऱ्या विकृतांच्या झुंडींचा विवेकी विरोध अतिशय महत्वाचा ठरत असतो. जावेद अख़्तर हे त्या विवेकी विरोधाचे एक अध्वर्यू म्हणून उभे आहेत.

त्यामुळे या झुंडींच्या सोयीची काही घडले म्हणून अख़्तरांचे कौतुक करणे हे तात्कालिकच असणार आहे. परंतु यातून ’बरेच मतभेद असणाऱ्यांचे नि आपले काही बाबतीत मतैक्यही असू शकते, त्याला थेट शत्रू मानण्याचे कारण नाही’ हे शहाणपण ही मंडळी शिकतील असे मुळीच नाही. नव्या मतभेदाच्या मुद्द्यावर अख़्तर यांना पुन्हा शिव्याशाप नि पाकिस्तानचे तिकीट(!) मिळेल यात शंका नाही. अख़्तर हे उर्दूचे पक्षपाती आहेत आणि त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम आहेत ही दोन कारणे या मंडळींना त्यांचा द्वेष करण्यास पुरेशी आहेत.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा