-
पुणे विद्यापीठ हे ‘गव्हर्नर हाऊस’ असण्याच्या काळात मुख्य इमारतीच्या बरोबर समोर, कुण्या ब्रिटिश साहेबाचा ऐसपैस डायनिंग हॉल होता, भक्कम दगडी बांधकामातला. काही शतकांपूर्वी मी पुणे विद्यापीठात शिकत असताना तिथे ‘ओल्ड कॅन्टिन’ या नावाने ओळखले जाणारे एक कॅन्टिन चालवले जात असे. घरचे जेवण नसेल तर कधीमधी दुपारच्या जेवणासाठी, आणि एरवी चहापानासाठी, तिथे फेरी होत असे.
तिथे एक पोरसवदा वेटर होता. तो सदैव घाईत असे. एखाद्या टेबलपाशी ऑर्डर घेण्यास पोहोचला, म्हणून टेबलवरील दोघे-चौघे एकमेकाला विचारून ऑर्डर त्याला सांगेपर्यंत तो लगेच भटारखान्याकडे तरी पळे किंवा दुसर्या टेबलकडे तरी. सोशल मीडियावर यथेच्छ टाईमपास करुन काही कामासाठी किंवा ज्येष्ठ नागरिक आई-वडिलांसाठी वेळ द्यायचा म्हटले, हटकून ‘आयॅम किनी सो बिज्जी बाबा. इतरांसोबत इतर कामांना म्हणजे बघा, टाईमंच मिळत नाही.’ म्हणणारे लोक पाहिले, की मला त्याची आठवण होते. इतर वेटर करत तितकेच इतकेच काम करे– कदाचित कमीच. पण उगा फिरता राहून ‘आपण कित्ती काम करतो’ हे ठसवण्याचे काम चाले. आयटी इंडस्ट्रीमध्ये दिवसभर इंटरनेटवर, स्पोर्ट्स एरियामध्ये टाईमपास करुन, संध्याकाळी काम करण्यास थांबून साहेबावर इम्प्रेशन मारणारे असतात, तसा.
त्याची सतत घाई करणे नि ‘गिर्हाईक कित्ती टाईमपास करते’ असा आविर्भाव पाहून आमच्यापैकी एक-दोघे त्याच्यावर उखडून होते. आमच्या कंपूत पंडित म्हणून आमच्याहून वयाने थोडे मोठे असे कम्प्युटर लॅब इन्चार्ज होते. ते ही त्याच्यावर वैतागले होते. एकदा असेच आम्ही तिघे-चौघेजण नुकते टेबल मिळून जेमतेम बसलोच होतो, तर हा गडी आला. टेबलवर पेनने टिकटिक करत, ‘हां बोलिये’ म्हणाला. आम्ही तोंड उघडतोय तोवर वळून निघू लागला. इतक्यात पंडितांनी मागून पटकन ऑर्डर सांगितली. भटारखान्याच्या दिशेने तरातरा चाललेल्या त्या वेटरने ती ऐकली आणि भटारखान्याच्या खिडकीत जाऊन जोरात आरोळी दिली, ‘चारऽर दहिवडा-सांबाऽऽऽऽऽर’.
भटारखाना क्षणभर स्तब्ध झाला नि मग तिथे जोरदार हशा उसळला. इतक्या जोरात ऑर्डर दिली होती, की ती ऐकलेली जवळच्या दोन-तीन टेबल्सवरील मंडळीही हसली. मग चिरंजीव तणतणत आले नि ‘काय भंकस करता’ म्हणून डाफरू लागले. मग पंडितांनी त्याला रीतसर दमात घेतला.
पंडितांचे ‘दहिवडा-सांबार’ नि हा सारा किस्सा आठवण्याचे कारण हे ‘फ्राईड चिकन आईस्क्रिम सॅण्डविच’. हे केवळ मीम नव्हे, गुगल केलेत तर काही फूड-चेन्स हा प्रकार विकतात असे दिसेल.
त्याच धर्तीवर फ्राईड-ओरिओ नावाचा प्रकारही मिळतो. याच्या तर एकाहुन अधिक रेसिपीज्(?) इंटरनेटवर सापडतील. आधीच क्रीम पोटात घेतलेले ओरिओ नावाचे हे बिस्किट बटाटेवड्यासारखे पिठात लपेटून तळून खायचे म्हणे.
असे काही दिसले, की या विषम-वितरणप्रधान जगात ज्यांच्या किमान गरजाही भागत नाहीत त्यांची क्षमा मागून, ‘माणूस हा अत्यंत माजलेला प्राणी आहे आणि त्याला विकासाची नव्हे, तर काही काळ अधोगतीची, दारिद्र्याची गरज आहे’ असे म्हणावेसे वाटू लागते. तरच ही अशी नावीन्याची खायखाय जरा कमी होईल, हे असे चाळे न सुचता पुन्हा गप मिळेल ते पोटात ढकलण्याची सवय लागेल.
बरं हा खाद्य-व्यभिचार आजचा आहे असे नव्हे. आम्रखंड, आंबा-बर्फी, आंबा-वडी, मँगो-ज्यूस वगैरे व्यभिचार किमान पाच-सहा दशकांपासून आपण सहन करत आलो आहोत. पाश्चिमात्त्य मंडळी चॉकलेट केक, चॉकलेट फज; चॉकलेट आईस्क्रीमच्या ब्लॅक करंटादि विविध प्रजाती, चॉकलेट मिल्क, चॉकलेट ब्राउनी, चॉकलेट पॅनकेक वगैरे भानगडी करुन ठेवतात. मग ‘आम्हीच का मागे राहावे?’ म्हणून पुणेरी-भारतीय ‘चॉकोखंड’ नावाचा अव्वल दर्जाचा गाढवपणा बाजारात आणतात. कहर म्हणजे काही बिनपट्ट्यांचे झेब्रे(१) तो खातातही.
आम्रखंड नि चॉकलेट-आईस्क्रिमच्या हलकट निर्मात्यांनो, एक लक्षात घ्या की आंबा/आमरस(२) आणि चॉकलेट हे दोन स्वर्गीय पदार्थ महाबली हनुमंतासारखे आजन्म ब्रह्मचारी आहेत. त्यांना श्रीखंड, आईस्क्रीम, चिकन, केक, फज, पॅनकेक, ब्राउनी वगैरे पदार्थांशी व्यभिचार करायला लावू नये. आधी तुम्ही आईस्क्रीममध्ये चॉकलेट घुसवून एकाच वेळी दोघांचाही विनयभंग केला तेव्हा मी वैतागलो, पण चिडलो नव्हतो. पण हे अती होते आहे. अत्यंत अनैतिक आहे ते. उद्या बासुंदी-वडा, चिकन-खंड, कोळंबी-आईस्क्रीम असं काहीही द्याल. काही लिमिट? माणसाला आचार-धर्माची जशी गरज आहे, तसेच आचारी-धर्माचीही गरज आहे असे आमचे ठाम मत झाले आहे. तरच पाकसिद्धीगृहांतून सर्रास घडणारे हे व्यभिचार थांबवता येतील.
या किचन-व्यभिचाराचे तीन मुख्य स्रोत आहेत:
पहिला, अर्थातच खाण्याबरोबर नावीन्याचीही खाय खाय सुटलेल्या ग्राहकांसाठी सदैव तत्पर राहून चित्रविचित्र नावाने विविध डिशेस सादर करणारे गल्ली-कोपर्यातल्या गाडीपासून चकचकीत फरशा, झगझगीत दिवे, एसीची थंड हवा यांसह त्या डिशेस सादर करणारी पंचतारांकित होटेल्स. इथे ग्राहक नावीन्याच्या मागे असला, तरी खरेदी करताना खिशाचा सल्ला घेऊनच पुढे जाणारा असतो. फक्त नेहमीच्या पदार्थांचे थोडेफार वेगळे अवतार त्याला अपेक्षित असतात.
इथे प्रामुख्याने ‘वेगळेपणाच्या घाईत’ असलेल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले जाते. गल्लीच्या कोपर्यावरची गाडी अंडा-भुर्जीचे बटर, कांदा, टोमॅटो, क्वचित सिमला मिरची, चीझ वगैरे घटकांचे विविध प्रकारे ‘मिक्स अॅण्ड ड्रॉप’ प्रकार करुन ग्राहकाला पर्याय देऊ करते. वड्याबरोबर चटणीचे प्रकार, कट किंवा सांबार, मिरची, स्वतंत्रपणे वा वड्यातच मिसळलेला ठेचा असे प्रकार मिळतात.
गाडीला मागे सोडून आपण एखाद्या एखाद्या लहानशा उपाहारगृहात शिरलो, तर इथे प्रत्येक खाद्यपदार्थ स्वतंत्रपणे न देता ग्राहकाला पोटभर व्हावे नि उपाहारगृहाला पैसे अधिक मिळावेत (गाडीपेक्षा दुकानाचे खर्च अधिक, तेव्हा प्रत्येक ग्राहकाकडून पैसेही अधिक मिळावेत) या दृष्टीने पदार्थांची ‘नेमणूक’ झालेली असते. बहुधा विश्वाच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात असलेला ‘राईस प्लेट’ हा यातला आद्य ‘कॉम्बो’. त्यात कोणते पदार्थ समाविष्ट असावेत हे अनेकदा उपाहारगृहाला तिची किंमत किती ठेवायची आहे यावरुन ठरते. ती किंमत ते उपाहारगृह कोणत्या परिसरात आहे, संभाव्य ग्राहक कोणता, त्याचा आर्थिक स्तर आदि गोष्टींवर ठरते.
काही महिन्यांपूर्वी मला मिसळ-थाळी या विषयावरील ‘अमुक-तमुक’ या पॉडकास्टचा हा व्हिडिओ मिळाला. यात मिसळ-थाळीचे उलट अर्थशास्त्र दोन वाक्यांत स्पष्ट केले आहे. राईस-प्लेट जर संभाव्य ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत देण्याची खटपट असेल, तर कनवटीला चार पैसे अधिक असलेल्या ग्राहकाची ऐट म्हणून, एरवी ‘पोटभरु अन्न’(३) असलेली मिसळ ही ‘मिसळ थाळी’चा अवतार घेत असते. थोडक्यात खाण्याला खिशाचे अस्तर कायमच लागलेले असते.
इथवर खाद्यगृहांनी तयार केलेले पदार्थ ग्राहकाशी इमान राखून राहतील याची बरीचशी खात्री देता येते. कारण इथवर येणारा ग्राहक मिसळ-थाळीची मागणी करत थोडाफार माज करेल, पण त्याचे मुख्य उद्दिष्ट उदरभरण हेच असते. त्याच्याशी तो तडजोड करत नाही.
पण उपाहारगृहांना चार किंवा त्याहून अधिक चाँद लागले, की शेफच्या प्रयोगशीलतेच्या नाकातील वेसण काढून घेतली जाते. मग पदार्थ खाद्य आहे की नाही हा मुद्दा दुय्यम होऊन जातो. ग्राहकांनी आपल्या पोटाची डागडुजी करुन तो खाद्य करुन घ्यावा लागतो. हा खाद्य-व्यभिचाराचा दुसरा स्रोत.
इथे एरवी आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीमध्ये वेगवेगळ्या जातिधर्माचे, ज्यांच्यामध्ये ‘रोटी-बेटी व्यवहार’ होत नाहीत, असे मानले गेलेले घटक पदार्थ एकत्र शिजवून किंवा न शिजवून ग्राहकाच्या माथी मारले जाते. मग तळलेले आईस्क्रीम, आमरस नि ऑलिव्ह ऑईल एकाच वेळी वापरून केलेला कसलेसे पदार्थ... वगैरे मार्केटिंगच्या तंत्राचा पुरेपूर वापर करुन गरजेपेक्षा अफाट फुगलेल्या खिशांमध्ये - दणकून किंमत लावून - ओतले जात असतात.
१९७० सालातील एका बीचवरील छायाचित्र. यात एकही पोट सुटलेली वा स्थूल व्यक्ती दिसत नाही. त्यानंतर मोकाट सुटलेल्या ‘फूड-इंडस्ट्री’ने स्थूलपणाबरोबच आरोग्याचे नवे प्रश्न निर्माण केले.इथे चवही फार महत्त्वाची राहात नाही. त्या पदार्थाची ‘exotic value' ऊर्फ ‘वैचित्र्य-मूल्य’ त्याच्या विक्रीचे मुख्य कारण असते. गरजेपेक्षा कैकपट कमावल्याने - वर मिसळ-थाळीबाबत म्हटले तसे - ‘प्रीमियम खाण्या’ची तहान लागलेला, आणि ज्याची ती तहान मिसळ-थाळीहून अधिक तीव्र आहे, तो याचा ग्राहक. हा ग्राहक ढीगभर पैसे ओतून हे वैचित्र्य-मूल्य असणारे पदार्थ घशाखाली लोटतो नि वर त्याची तोंडी जाहिरात (काही वेळा ‘मीच एकट्याने का सहन करावे?’ या सुप्त विचाराने) करतो; ती बोनस म्हणायची.
दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या असंख्य नागरिकांच्या भारतीय समाजात एखाद्या भंगार विकून पोट भरणार्या बापाच्या वा रस्त्यावर फुले विकून चरितार्थ चालवणार्या आईच्या मुलालाही सत्तर-ऐंशी हजाराच्या आयफोनची लालसा निर्माण होते नि त्या हातावरचे पोट असलेल्या जीवांना पोटच्या गोळ्यासाठी ती पुरवावीही लागते.
माणूस हा असा हपापलेला प्राणी आहे. तिथे ही ‘शेजार्याने’ केलेली जाहिरात ऐकून त्या अति-कमावत्या व्यक्तिच्या जगण्याच्या परिघातील, त्याच्याहून थोड्या खालच्या स्तरातील व्यक्तिंनाही त्या पदार्थांची ‘तहान’ लागते. माणसाच्या या हपापलेपणाचा फायदा घेत, वैचित्र्यपूर्ण पदार्थ विकून माणसांची पोटे नि आपला बँक बॅलन्स दोन्हीही सुजवण्यात ही ‘फूड-इंडस्ट्री’ यशस्वी होत जाते, आणि अन्न ही गरज न राहाता समस्या होऊन जाते.
हे पुरेसे नव्हते म्हणून, आता ‘अमुक तमुक शेफ’ या नावाने चॅनेलोचॅनली मोकाट सुटलेल्या तथाकथित स्पर्धांमध्ये तर पदार्थ खाण्यालायक असतील याचीही खात्री देता येत नाही. ही पुरी जमात हे ‘नसेल तिथे गरज रुजवा’ म्हणणार्या भांडवलशाहीचे अनौरस अपत्य आहे.
तिसरा स्रोत म्हणजे ‘डाएट फूड’ तयार करण्याचे कंकण बांधून उभे असलेले वीर. या मंडळींनी अनेक उत्तमोत्तम पदार्थांची थडगी उभारली आहेत. ‘बटाटेवडा: स्टीम्ड नॉट फ्राइड’ हा माझा विनोद (तो पदार्थ सुदैवाने अद्याप बाजारात आलेला नाही) या प्रकारातला. ही मंडळी अभिमानाने ‘बेक्ड, नॉट फ्राईड’ या घोषणेसह अनेक चविष्ट पदार्थांची डाएट-कुलोत्पन्न कलेवरे तुमच्या माथी मारू पाहतात. यात परदेशी वंशाच्या चिप्सपासून भारतीय वंशाच्या चकली, करंजीपर्यंत अनेक पदार्थ येतात.
अरे बाबांनो, त्या पदार्थांमध्ये असलेली चरबी नि मीठ हेच त्यांना चव प्रदान करत असते. तेच वगळले तर केवळ ‘मी अमुक पदार्थ खाल्ला’ हे खोटे समाधान काय ते मिळते. एखाद्या कर्मकांडासारखे झाले हे. म्हणजे रस्त्यावरुन गाडी हाकत जाता-जाता एका हाताने केलेला नमस्कार चारशे मीटरवरील देवस्थानातील देवांपर्यंत, मधल्या सगळ्या जड अडथळ्यांना यशस्वीरित्या पार करुन पोहोचला, असे म्हटल्यासारखे आहे. (आणि पोहोचत असेलच, तर घरी जाऊन निवांत कोचावर बसून कर ना बाबा. दोन अडथळे नि थोडे अंतर अधिक इतकेच.)
हे वीर खरवसामध्ये साखरेऐवजी चक्क गूळ घालून (वास्तविक गूळ नि साखर यात रासायनिक नि आहारशास्त्रदृष्ट्या कोणताही फरक नाही) बेचव असा डाएट खरवस सादर करतात. कहर म्हणजे शाकाहारी मंडळींतील दांभिकांना (यांत ‘विगन’(Vegan) म्हणून मिरवणारे(४) हे सर्वात सनातनी शाकाहारी, धर्मांमध्ये जसे जैन तसे) असलेली मांस खाण्याची लालसा भागवण्यासाठी चक्क ‘वनस्पतीजन्य मांस’ निर्माण करतात. हे म्हणजे डुकराला हत्ती समजून त्याच्या पाठीवर अंबारी चढवण्यासारखे आहे. डुकराकडे हत्तीची ऐटही नसते नि बुद्धीही नसते हे ध्यानात घ्यायला हवे.
हे सारे प्रकार पाहून सदोदित शेकायला शेगडीच्या शोधात असलेल्या आमच्या भावनाकाकू चिडल्या आहेत. त्यांनी आणि अस्मितावहिनींनी ‘आमरस-मुक्ती सेना’ आणि ‘चॉकलेट चॉवनिस्ट(५) ब्रिगेड’ स्थापन करुन या विरोधात खळ्ळ् खटॅक करण्याचा निर्धार केला आहे. मँगो वा चॉकलेट आईस्क्रिम किंवा श्रीखंड विकणार्यांनो सावधान, आम्ही येत आहोत.
- oOo-
टीपा:
(१) सध्या ‘ज्युनियर ब्रह्मे’चे ‘ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स’ हे पुस्तक वाचत असल्याने त्यातील झेब्रे माझी नजर चुकवून इथे घुसले आहेत. [↑]
(२). या शब्दाबाबत आमच्या मनात नेहेमीच मोठा संभ्रम असतो.
सदर शब्द मराठी असल्याने ‘आंब्याचा रस एटले आंबरस’ अशी व्युत्पत्ती असायला हवी. परंतु यात धोका असा की ‘आंब’ हा शब्द– आज नागर जीवनात फारसा प्रचलित नसला तरी– वेगळ्याच अर्थाने वापरला जातो. हरभरा वा तत्सम झुडुपांवर पहाटेचे दव पडल्यावर त्यावर कापसापासून बनवलेल्या, सहज शोषक असा कपडा टाकून ती शोषून घेतली जाते. पोटदुखीवर इलाज म्हणून तिचा वापर होतो. मग त्या ‘आंब पासून तयार केलेले औषध म्हणजे आंबरस’ असा अर्था लागू शकतो.
म्हणून ‘आमरस’ चालवून घ्यावा का? पण हिंदी ‘आम’पासून ‘आम का रस’ ही व्युत्पत्ती सिद्ध होते. तूर्त शाळेत हिंदी लादण्याविरोधात असणार्या आमच्यासारख्या मराठी बाण्याच्या माणसाला हे सहन होत नाही.
मग आता तिसरा पर्याय म्हणजे संस्कृतचा आधार घेणे. तिथे ‘आम्र’पासून ‘आम्ररस’ अशा शब्द मिळतो. त्याचा ‘अपभ्रंश म्हणून आमरस’ हे चालवोन घेता येते. परंतु ‘ह्या संस्कृतला तातडीने गाडल्याखेरीज सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही’वाल्यांना हे चालणार नाही; आणि ‘ण’ ला ‘ण’ म्हणणारे ‘अपभ्रंश’ म्हणून नाक मुरडणार. म्हणजे हा पर्याय दोन्ही पार्ट्या रद्द करणार.
इतकं कशाला जे कुणी आंबे रस करून न खाता ‘चिरुन’ (विळी हे आयुध/साधन लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने ‘कापून’ हा शब्द आता अधिक पापिलवार झाला आहे) खातात ते “मुळात शब्दकोषात ‘आमरस’ हा शब्द हवाच कशाला?” म्हणून हटून बसणार. [↑](३). पण असल्या सामान्य पातळीवरील पदार्थाभोवती काही गावांतील काही लोकांनी अस्मितेचे बुरुजही उभे केले आहेत. माणूस हा वैचारिकदृष्ट्या भरकटलेला प्राणी आहे याचे हे उत्तम उदाहरण. [↑]
(४). विगन असणे हे अनुसरण्यासाठी कमी, मिरवण्यासाठी नि चर्चा करण्यासाठी अधिक असते. [↑]
(५). Chauvinistचा आम्ही असाच उच्चार करतो. हे चूक म्हणालात तर ञ-मॅनला त्याची लष्कर-ए-व्याकरणची फौज घेऊन पाठवू. [↑]
---
संबंधित लेखन: काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता >>
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
शनिवार, ७ जून, २०२५
चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही
संबंधित लेखन
अर्थकारण
आहार
बाजार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लेख आवडला. आधीच्या एका लेखात उल्लेख केलेला गुंतवणूक ट्रॅकर पाठवू शकाल का? तुम्हाला ramataram@gmail.com या ID वर मेल केला आहे.
उत्तर द्याहटवा