-
१.
सारी धुमश्चक्री संपली. सारे आवाज शांत झाले.
थोडा वेळ गेला नि मूषकराज न्हाणीघराच्या बिळातून बाहेर डोकावता झाला. त्याने कानोसा घेतला. घरात शांतता असल्याची खात्री झाल्यावर तो बाहेर आला. तेथून तो माजघरात प्रवेश करता झाला.
कानोसा घेऊन घरची स्त्री तिथे नसल्याची खात्री करुन घेतली. मग तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला.
घरात नि घराबाहेर मघाशी झालेल्या हाणामारीतील जखमी मंडळी परसात नि मागच्या वाडीमध्ये दिसत होती. त्यांची तावातावाने काही चर्चा चालू होती. इतक्या दूरवरुन त्यातील तपशील ऐकू येत नव्हता. मूषकराज वैतागला.
त्याने मागचे दार आतून बंद असल्याची खात्री करुन घेतली नि मग तो खिडकीच्या एका गजावर उभा राहिला.
त्या सार्यांना दरडावणारे एक जोरदार भाषण त्याने ठोकले. पण खाली त्याच्या बिळातील पोराबाळांनाही केवळ किचकिचाट ऐकू आला.
भाषण उरकून मूषकहृदयसम्राट पुन्हा आपल्या बिळात थाटात प्रवेशकर्ते झाले. बिळातून बाहेर येण्याचीही तसदी न घेतलेल्या त्याच्या पोराबाळांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
२.रात्र पडली. दिवसभरात ‘काय कमावले, काय गमावले’ याचा हिशोबही संपवून माणसे शांत झोपली. सर्वत्र सामसूम झाली. कुत्र्यांच्या टोळ्या अंग झाडून आजच्या सीमायुद्धाची तयारी करु लागल्या.
घुबडाचा पहिला घुत्कार ऐकला नि मूषकराजा न्हाणीघराच्या गुहेतून (आता बिळाला गुहा म्हणावे असा फतवा त्याच्या प्रचाराधिकार्याने काढला होता) बाहेर डोकावला. थोडे बाहेर येऊन त्याने कानोसा घेतला. सारे काही शांत असल्याची खात्री झाल्यावर तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला.
परसात शांतता होती. राखणीचा मोत्या दिसत नव्हता. बहुधा युद्धात आपली पार्टी निवडायला निघून गेला असावा.
एकुणात आसपास धोका दिसत नव्हता. ‘चार पावले पुढे, दचकून सहा पावले मागे’ अशा गतीने मूषकराज मागल्या दारातून बाहेर पडेतो तास मोडला होता.
पहिले पाऊल बाहेर टाकतो न टाकतो तोच कुत्र्यांच्या सीमायुद्धाच्या रणभेरी वाजल्या. त्या आवाजाने दचकलेला मूषकराज जिवाच्या आकांताने धावत परत आपल्या बिळात– आय मिन गुहेत घुसला. पुढची काही मिनिटे त्याचे हृदय मालकाच्या ट्रॅक्टरच्या दुप्पट वेगाने धडधड करत होते.
थोड्या वेळाने मूषकराज शांत झाला. कुत्र्यांच्या सीमायुद्धात अलिकडच्या टोळीची सरशी झाली असावी, त्यांनी थोडा प्रदेश बळकावून पलिकडच्यांना दूर लोटले असावे. कारण भुत्कार आता दुरून येऊ लागले होते. मूषकराजाच्या जिवात जीव आला. पुन्हा एकवार ‘चार पावले पुढे, दचकून सहा पावले मागे’ या वेगाने तो कसाबसा बाहेर परसात आला. धपापलेल्या उराने तो सावधपणे इकडे-तिकडे पाहात होता.
अखेर मूषकराजाने आपली आजची निश्चित केलेली कामगिरी पुरी करण्याचा निश्चय केला. त्याने खालच्या पट्टीमध्ये आपल्या जातभाईंना हाकारायला सुरुवात केली. त्याच्या घराच्या परसातील बिळात राहाणारे, शेजारच्या घराखालील बिळात राहणारे, परसातील झाडाखालच्या बिळात राहाणारे त्याचे पाच-पंचवीस जातिबांधव एक-एक करुन हजर झाले.
आता मूषकराज बोलू लागला, “कालच्या युद्धात आमच्या माणूस-सेनापतीला मोठा विजय मिळाला. मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याचा पुरेपूर वापर करुन त्याने शेजारच्या त्या कस्पटाबरोबर झालेल्या महायुद्धामध्ये देदिप्यमान विजय मिळवला...”
“...संध्याकाळी युद्ध संपल्यावर तो महाराजांच्या गुहेसमोर जाऊन साष्टांग प्रणिपात करुन ‘महाराज हा विजय तुमच्यामुळे’ असे डोळ्यांत पाणी आणून म्हणताना मी पाहिला.” महाराजांचा एक चमचा तत्परतेने उद्गारला.
आपली भाषणाची लिंक तोडल्याबद्दल महाराज त्यावर नाराज झाले. हातानेच त्याला दूर लोटून त्यांनी आपले भाषण पुढे चालू केले. “माझ्यासारख्या श्रेष्ठ मूषकराजाच्या राज्यात तुम्ही राहाता हे तुमचे भाग्य आहे. शेजारच्या त्या कस्पटाला माझी महती ठाऊक नाही. माझ्या रक्तातून लाव्हा वाहात असतो...”
“पण महाराज चार दिवसांपूर्वी तुम्ही बंदुकीची दारु वाहात असते असे म्हणाला होतात...” एक अज्ञ जातिबांधक मध्येच म्हणाला. इतर जातिबांधवांनी चटकन त्याच्याभोवती कडे करुन त्याचे बोलणे थांबवले नि महाराजांना पुढे बोलण्याची विनंती केली.
इतक्यात महाराजांची गुहा ज्या घरात होती त्या घरात हालचाल ऐकू आली. महाराज सावध झाले. एक कान घराकडे ठेवून ते पुढे बोलू लागले. बोलताना ते अधूनमधून थांबून पुन्हा पुन्हा चाहूल घेत होते. अचानक घरात ठाण्णकन् आवाज झाला नि महाराज दचकले नि पलायनाच्या हेतूने झाडाकडे धावले.
इतक्यात एक म्हातारा श्रोता म्हणाला, ‘मालक रातच्याला पाणी प्याला उटलेला दिसतोय.’ महाराजांचा जीव भांड्यात पडला.
आता ते माघार घेतलेल्या त्या स्थानापाशीच झाडापायथ्याच्या एक दगडावर चढून भाषण देऊ लागले. “अरेऽ, असले छप्पन्न कस्पट मी अनेकदा चिरडून टाकले आहेत. मी पाळलेला माणूसच या सार्यांना पुरून उरतो. मला प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घ्यायची गरजही पडत नाही आता.”
इतक्यात श्वानयुद्धाचे वारे फिरुन पलिकडील श्वानसंप्रदाय वरचढ झाल्याने युद्धभूमी महाभारतात प्रतिदिन सरके तशी अलिकडे सरकली नि भुंकण्याचा कलकलाट जवळून येऊ लागला.
ते ऐकून महाराजांचे पाय लटपटू लागले. ‘हे असेच चालू राहिले तर आपल्याला पुन्हा एकवार ‘स्थलांतर’ करण्याची वेळ येणार’ हे त्यांच्या ध्यानात आले. तेव्हा त्यांनी ताठ मानेने त्याची तयारी करावी अशी खूणगाठ बांधली.
श्वानसंवाद अधिकच जवळून ऐकू येऊ लागला नि महाराज घाईघाईने बोलू लागले. “मित्रों, आज श्वानवंशीयांशी आपले घनघोर युद्ध होणार असे दिसते आहे. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कुमक हवी. यासाठी दूरदृष्टीने मी कस्पटाच्या मूषकसैन्यातील काही जणांशी आधीच संधान बांधले होते. ती कुमक आणण्यासाठी मी जातो आहे. दरम्यान इथला मोर्चा तुम्ही सांभाळा. तुम्ही माझे सैनिक आहात. येणार्या संकटाशी कसे लढायचे हे तुम्हाला माहित आहे. श्वानवंशीयांना धडा शिकवण्यासाठी मी तुम्हाला खुली छूट देतो आहे.”
कार्यकर्ते बुचकळ्यात. आपण सैनिक कधीपासून झालो? कुत्र्यांशी कसे लढायचे हे आपल्याला कुठे ठाऊक आहे? मग लढणार कसे? त्यातील एकाने धीर करुन म्हटले, “महाराज आम्ही तुमच्यासाठी नक्की लढू. पण लढावे कसे यावर आम्हाला मार्गदर्शन करा.”
इतक्यात श्वानयुद्धात एका बाजूची फळी फुटली, त्या पार्टीने कच खाल्ली नि त्यातील सैनिक सैरावैरा धावत सुटले. युद्धातून साफ माघार घेतलेला मोत्या मूषकमहाराजांच्या जवळून बुलेट ट्रेनच्या वेगाने पसार झाला. धडकी भरलेले महाराजही मार्गदर्शनाऐवजी ‘मागलं दर्शन’ देत विद्युतवेगाने पसार झाले.
-oOo-
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
गुरुवार, २९ मे, २०२५
मूषकान्योक्ती
संबंधित लेखन
अन्योक्ती
राजकारण
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा