Vechit Marquee

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

पहलगाम आणि आपण

  • काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जीव गमावलेल्या देशवासियांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना, संवेदना व्यक्त करण्याऐवजी, समाजमाध्यमांवर मोदी-धार्जिण्या नि मोदी-विरोधक गटांतील अनेक नीच मंडळींनी एकमेकांबद्दलच्या फसफसणार्‍या द्वेषाचे दर्शन घडवले.

    मोदी-धार्जिण्या मंडळींनी ‘मणिपूरवाले’ आता बोलत नाहीत असे एकतर्फी जाहीर करत त्या दंगलींच्या वेळी जो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता त्याचे उट्टे काढले.

    तर यांच्या विरोधी गटातील अनेकांनी या निमित्ताने मोदींवर शरसंधान करण्याची संधी साधली; ‘मग मोदी नाही का अशा गोष्टींचं राजकारण करत?’ असा प्रश्न विचारुन एकप्रकारे मोदी-धार्जिण्यांचाच तर्क वापरला. जेणेकरुन आपल्या विरोधी गटाची नि आपली मानसिकता वेगळी नाही, केवळ बाजू वेगळी आहे हेच सिद्ध केले.

    अशा घटनांबाबत झालेल्या चुका, त्रुटी यांबाबत सरकारची जबाबदारी असतेच. परंतु त्यासाठी जाब विचारताना थोड्या संवेदनशीलतेची, तारतम्याची गरज असते. थोडा काळ जाऊ द्यावा लागतो

    दोन्ही जमाती संवेदनाशून्यतेचे प्रदर्शन घडवत आहेत असे माझे मत झाले. झाल्या घटनेनंतर धक्का बसलेली व्यक्ती त्या गेल्या जिवांबद्दल संवेदनशील असेल, तर तिची प्रतिक्रिया विरोधी गटाला धरुन झोडपण्याची होऊच शकत नाही. जे घडत होते त्याला संधिसाधूपणाच म्हणता येईल आणि ही भावना असंवेदनशीलतेच्या वर्तुळातीलच असू शकते.

    दोन बाजूला उभे असूनही तीच असंवेदनशीलता प्रदर्शित करणार्‍या मंडळींसाठी—

    RIP
    (अनिल कांबळे यांच्या गज़लेला अनुसरुन...  )
    
    त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
    सूडांत सुज्ञतेचा संहार पाहिला मी
    
    अंधार वेदनांनी आक्रंदती कितीही
    मूढांमुखी शिव्यांचा भडिमार पाहिला मी
    
    वस्ती उन्हात न्हाली, नि ज्ञान चंद्र झाले
    मेंदूतुनी खुळ्यांच्या अंधार पाहिला मी
    
    ‘थोडा सबूर’ ज्याला सांगावयासि गेलो
    तो सुज्ञही विखारी कलदार* पाहिला मी
    
    - रमताराम
    ---
    * याचे दोन अर्थ होतात. दोन्हींपैकी कोणताही घेतला तरी चालेल.
     				

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा