Vechit Marquee

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

To Dumbo, with Love

  • फेसबुक नि त्यासारखी समाजमाध्यमे ही बव्हंशी पेंढा भरलेल्या बुजगावण्यांना आधार देऊन उभी करणारी काठी असते. नसलेल्या गुणांची जाहिरात करुन आपल्याला अपेक्षित अशी आपली ओळख वा व्यक्तिमत्त्व कृत्रिमरित्या उभे करण्यास साहाय्यभूत होणारे हे मंच. पण क्वचित हरवलेल्या संवाद नि संवेदनांच्या अभिव्यक्तीसाठी काही सुज्ञ मंडळी याचा वापर करतात तेव्हा सुखद धक्का बसतो. खाली दिलेली पोस्ट हा असाच एक सुखद धक्का होता.


    When Do We Lose Our Compassion?

    DumboWithMother

    I was thinking about Dumbo the other day—the scene where they lock up Dumbo’s mom, calling her a “mad” animal just because she wanted to protect her baby. They tore them apart, and little Dumbo just wanted his mother. I remember how much that scene hurt as a child. I felt it. I knew it was wrong.

    But then I started wondering… at what point do we stop feeling so deeply?

    As kids, we see suffering, and we care. We don’t ask whether it’s “just the way things are” or whether someone deserves it. We don’t think about money, tradition, or industry. We just feel. We cry when animals get hurt. We get angry when something isn’t fair.

    And then, slowly, society tells us to stop.

    We hear: “That’s just life.” “Don’t be so sensitive.” “Animals are here for us.”

    We’re told to accept things we once knew were wrong.

    But what if that childlike empathy wasn’t a weakness? What if it was the truth before the world tried to make us forget? So, I want to ask—when do you think we lose our compassion? And why? And to those who never let society mute their compassion—to those who stood up for what they believed in even when the world told them not to—I admire you so much. You’ve been fighting for what’s right all along, and the rest of us are just catching up.

    Maybe we don’t need to “grow out of” caring. Maybe we need to grow back into it.

    (A post by user 'Earth Mazing' in Facebook-group 'David Attenborough Fans')

    या पोस्टवरुन विद्याधर पुंडलिकांनी ‘गुड बाय मि. चिप्स’ या पुस्तकासंदर्भात सांगितलेला एक अनुभव आठवला. तो त्यांच्याच शब्दात:

    ई.आर. ब्रेथवेट या कृष्णवर्णीय-ब्रिटिश लेखकाच्या आत्मचरित्रात्मक ‘टु सर, विद लव्ह’ या पुस्तकात भेटणारा मार्क, सरंजामी ब्रिटिश काळातील ‘ओल्ड सेंटिमेन्टल फूल’ मि. चिप्स हे दोन शिक्षक (शांताबाईं शेळकेंमुळे माझी ओळख झालेल्या ‘गुड मॉर्निंग, मिस डव्ह’मधील मधल्या मिस डव्ह देखील) ज्या विचारवृत्तीचे आहेत, अस्तंगत होत जाणारी तीच वृत्ती मला या पोस्टमध्ये दिसली.

    एक तर चलच्चित्रे अथवा अ‍ॅनिमेशनचे माध्यम हे लहान मुलांसाठी म्हणून मोठ्यांनी– मुख्य म्हणजे उन्नतनासिका समीक्षकांनी– अनुल्लेखाने मारलेले असते. त्यात डिस्नेचे चित्रपट/लघुपट लोकप्रिय– म्हणजे कलात्मक दृष्ट्या गौण हे आधीच ठरवून टाकलेले. याच डिस्नेपटांतून मला अनेक मार्मिक, भेदक नि अचूक भाष्य पाहायला मिळाली आहेत. पण ती माझी आजची वैचारिक जागरुक प्रवृत्ती आहे. काही दशकांपूर्वी हेच चित्रपट/लघुपट पाहताना मनात उमटलेल्या भावना वेगळ्या असणार हे उघड आहे. त्या आज पुन्हा तितक्याच असोशीने प्रतिबिंबित होणे शक्य नाही. पण मी त्यांच्याबद्दल साररूपाने भावना व्यक्त करायच्या म्हटलं तर या पोस्टचा हात धरुनच वाटचाल करतील.

    आज हे सारे हास्यास्पद वाटावे अशा वळणावर आपण आहोत. आजची परिस्थिती पाहता मला दळवींच्या ‘सारे प्रवासी घडीचे’मधील वार्षिक स्नेहसंमेलनातील प्रसंग आठवतो. ‘सुगीचा हंगाम’ या गीतावर बसवलेल्या नृत्यादरम्यान सहभागी मुलांची सुसूत्रता बिघडते नि एकाचा विळा दुसर्‍या विद्यार्थ्याला चाटून जातो. त्यातून ठिबकलेले रक्त पाहून त्या मुलाचा बाप धावतो. इकडे या सार्‍याचा पत्ता नसलेले गुरुजी विंगेत ‘कापा कापा झटुनी सारे’ म्हणून पुढची ओळ पुन्हा पुन्हा म्हणत असतात. मुलाचा बाप खवळतो नि गरजतो, ‘कापा कापा काय, कापला तेवडा पुरे नाय झाला?’

    पण आजची परिस्थिती अशी आहे की ‘कापले तेवढे पुरे झाले’ असे अनेकांना वाटत नाही. त्यांना निसर्ग, त्यावर अवलंबून असणारे प्राणी, पक्षी वर इतर जीव कापून समाधान नाही. त्यांना खूप माणसे कापायची आहेत. मुडद्यांच्या राशींवर आपला झेंडा रोवायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये धिटुकल्या डम्बो वा त्याच्या आईच्या भावना समजून घेण्याची तसदी कोण घेणार आहे?

    दुसरीकडे विकासाची खायखाय इतकी सुटली आहे, की अहद हंसदेव तहद हैदराबाद विद्यापीठ, व्हाया आरे, ताडोबा सर्व ठिकाणी वरवंटा फिरवून, डम्बोसारख्या तेथील जिवांचे निर्दालन करुन हा तथाकथित विकास साधायचा आहे. ‘ताटात असलेला ब्रेड, बटर पुरेसे नाही; सोबत वाईन हवी नि ती ही उंची हवी, महाग हवी’ या हपापलेपणाला आधार देईल इतका.

    मग त्या अस्तंगत जिवांचे फोटो आपापल्या वॉलवर टाकून त्यावर समाजमाध्यमी अश्रूंचे दोन थेंब टाकायचे आहेत, महिनोन्‌ महिने खबरबात न घेतलेल्या माता-पित्यांसाचे फोटो टाकून उसन्या शब्दांचे कढ काढून मातृ-पितृ दिन साजरे करावेत तसे. किंवा तुमच्या बापदाद्याकडे, तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर त्या-त्या प्रजातींचे मोजके जीव ‘वनतारा’मध्ये प्रदर्शनार्थ ठेवून, त्यावरही आपल्या नावाचा शिक्का मारून ठेवायचा आहे.

    नागरी मानव हाच ‘कली’ आहे नि तो पृथ्वीचा विध्वंस करण्यासच जन्माला आलेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपण प्रगतीची, विकासाची किंमत काय मोजतो याची जाणीव त्याला नाही.

    श्रमविभागणीच्या तत्त्वाचा अतिरेक झाल्याने कच्चामाल ते ग्राहक ही साखळी इतकी प्रचंड मोठी झाली आहे, की प्रत्येक टप्प्यावर विध्वंसाचे कुठले नव-नवे हत्यार निर्माण होते आहे याची ग्राहकाला जाणीव नि फिकीर, दोन्हीही नाही.

    परवाच्या पहलगाम हत्याकांडानंतर एका बाजूने आपली नसलेली संवेदनशीलता नि उसने शौर्य यांचा बाजार काही जणांनी समाजमाध्यमांवर मांडला आहे. काही जण कोयते परजत आहेत तर काही जण तलवारी. कळपाबाहेर उभे राहिले तर सुई उचलण्याची ताकद नसणारे, शाळकरी वयातच थांबलेली समज दाखवून ‘आता तलवारच उचलली पाहिजे’ वगैरे गर्जना करत आहेत.

    कोयते, तलवारी जमा करुन ‘कापा कापा झटुनि सारे’ म्हणणार्‍या या सार्‍या मंडळींना विनंती. लवकरात लवकर आपले काम चालू करा. माणसाचा निर्वंश करा. एवढी एक प्रजाती संपवलीत, की पृथ्वी नि त्यावरील इतर जीव सुखाने श्वास घेऊ शकतील.

    - oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा