मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

’यशस्वी माघार’ की ’पलायन’

(’माफीवीर सावरकर’ या उल्लेखाला प्रतिवाद म्हणून ’माफी नव्हे , राजनीती : शिवछत्रपती आणि सावरकर’ या प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचा लेख फेसबुकवर शेअर करण्यात आला. त्याला दिलेले हे उत्तर.)

’यशस्वी माघार’ म्हणायचे की ’पलायन’ हे भविष्यातील यशावर अवलंबून असते. तात्पुरती माघार घेऊन नंतर यशाची जुळणी करणॆ शक्य झाले तर त्या पलायनालाही यशस्वी माघार म्हणता येते. नाहीतर प्रत्येक पळपुटा आपल्या पलायनाला ’स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ म्हणूच शकतो. ते आपण मान्य करत जाणार आहोत का? की आपल्या बाब्याचा दावा खरा नि विरोधकाचा खोटा इतके सरधोपट निकष लावणार आहोत?

इतरांसाठी अतर्क्य भविष्यवाणी करणारा द्रष्टा तेव्हाच म्हणवला जातो जेव्हा त्याची भविष्यवाणी खरी होते. (खरंतर त्या भविष्यवाणीलाही तर्काचा, संगतीचा, वारंवारतेचा आधार हवा. पण तो मुद्द्या सध्या सोडू.) एरवी तो डॉन क्विक्झोट ठरतो.

औरंगजेबासमोर हे मेहेंदळे-कथित माफीनामे सादर केलेले महाराज पुढे त्याच्या तावडीतून सुटून बाहेर आल्यावर स्वराज्य वाढवण्यात यशस्वी झाले. या भविष्याने त्यांच्या त्या कृतीला तात्पुरती माघार म्हणणे शक्य झाले. तिथे ते अपयशी ठरले असते तर त्यांच्या त्या कृतीचे मूल्यमापन वेगळ्या दृष्टिकोनातून होऊन ते ही माफीवीर ठरले असते.

कॉम्रेड डांगेंनी माफी मागितल्याबद्दल त्यांना दोष देण्यात आला होता. पण तिथून बाहेर आल्यावर ते - बहुधा - मीरत कटाच्या तयारीला लागले नि पुढे पकडले जाऊन शिक्षाही झाली. त्या भविष्यकालीन कृतीने त्यांच्या माफी मागण्याला समर्थन प्राप्त होते.

WhySavarakarApologized

माफीनामे देणे हा सावरकरांचा गनिमी कावा होता अथवा तात्पुरती चाल होती हे म्हणणे तेव्हाच समर्थनीय ठरते जेव्हा त्याचा वापर करुन सुटका करुन घेतल्यावर त्यांनी आपले कार्य पुढे चालवून अपयशाला यशामध्ये रुपांतरित केले असते तर.

सुटका झाल्यानंतर सावरकर आपल्या मागील कार्याची उंची वाढवण्यात साफ अपयशी ठरले आहेत, नव्हे त्यांनी तसा प्रयत्नही केल्याचे दिसत नाही. त्यामुळॆ हा ’गनिमी कावा’ होता या दाव्याला सावरकर समर्थकांचा तर्क, समर्थन, पळवाट यापलिकडे कोणताही आधार मिळत नाही. त्यांना तशी संधी मिळाली नाही हे कदाचित दुर्दैवाचे असेलही. पण अमुक झाले असते, तर त्यांनी तमुक करुन दाखवले असते हा केवळ दावाच असतो. तो सिद्ध करणारा कोणताही पुरावा अस्तित्वात नसेल तर त्याला वास्तव मानता येणार नाही.

पण सावरकरांच्या जागी मी असतो तरी त्यांनी केले त्याहून वेगळे केले नसते. दिलेल्या शिक्षेचा पूर्णकाळ - जवळजवळ सर्व आयुष्यच - आत बसून आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्ष यातून एक संधी घेण्यात काही गैर नाही. त्यामुळे तसा माफीनामा देण्याला माझा विरोध नाही. की त्यानंतर त्यांना बाहेर येऊन काही साध्य करता आले नाही यातही फार काही आक्षेपार्ह नाही.

आक्षेपार्ह हे आहे की तरीही त्यांना स्वातंत्र्यवीर वगैरे उपाधी दिली जाते, त्यांना नेहरु गांधीच्या पंगतीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तो होत असेल तर राजकारणात 'अरे' ला 'का रे' होणारच. मग गांधी-नेहरुंचे चारित्र्यहनन करणार्‍यांच्या आदर्शाच्या वाट्याला उलट दिशेने तेच येणार हे दुर्दैवी असले तरी अपेक्षित आहे.

माझ्या मते मी स्वतः पुरोगामी गटात मोडतो. पण 'गिव्ह एवरी डेविल इट्स ड्यू' या न्यायाने विज्ञानवादी सावरकर मला अभ्यासनीय आहेत. संन्यस्त खड्गमधील गाणी - प्रामुख्याने दीनानाथांमुळे- गाजली असली तरी ते नाटक प्रचारकी आहे असे माझे मत आहे. तर त्यांचे भाषाशुद्धीबद्दलची मते बहुसंख्येला पटतील न पटतील, पण त्या विषयाची दखल घेणारा तो पहिला राजकारणी होता हे अमान्य करता येणार नाही. त्यांचा हेतू काहीही असला तरी परिणामांचा विचार करता तेवढे गुण द्यायची माझी तयारी आहे.

मुद्दा असा आहे की सावरकर हे हिंदुत्ववाद्यांनी (खरंतर फक्त महाराष्ट्रीय हिंदुत्ववाद्यांनी) आपला आदर्श, आपले प्रतीक बनवले आहेत, गेल्या दोन वर्षात अचानक सावरकर व्याख्यानमाला, स्पर्धा वगैरे सुरू झाल्यात, ज्या फक्त आणि फक्त हिदुत्ववादी सावरकरांना अधोरेखित केले जात आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी रेटली जात आहे. अशा प्रसंगी विरोधकांनी सावरकरांना लक्ष्य करणे अगदीच समजण्यासारखे आहे. नेता पडला की सैन्य सैरभैर होते हा जुना नियम आहे. मोदींनी सत्तेच्या वाटचालीत खर्‍याखोट्याचा विधिनिषेध न बाळगता आरोपांची झड उठवून देत राहुल गांधी, केजरीवाल यांचे राजकीय खच्चीकरण केले. हे राजकीय युद्ध आहे आणि म्हणून मोदींनी केले ते मुळीच गैर नाही.

पण संघटनेच्या पातळीवर संघही गांधी नेहरूंबाबत हेच करत आला आहे. त्यामुळे याबाबतीत पुरोगाम्यांनी सावरकरांवर टीका करू नये ही अपेक्षाच अस्थानी आहे. ज्यांना सावरकरांचे असे पक्षीय राजकारणात भरडले जाणे दुर्दैवी वाटते त्यांना हिंदुत्ववादी नसलेले सावरकर अधिक नेटाने पुढे आणावे लागतील, हिंदुत्ववाद्यांच्या तावडीतून त्यांना सोडवावे लागेल. पण जर त्यांनाही सावरकरांचा हिंदुत्ववादही योग्य वाटतो आहे, जोवर त्यासकट त्यांना शिरीच्या देव्हार्‍यात बसवण्याचा प्रयत्न होतो आहे, तोवर त्यांना तेथून खाली खेचण्याचा प्रयत्नही होणारच. हिंदुत्ववाद्यांनी केवळ विरोधकांचेच नव्हे तर देशाचे आयकॉन असणार्‍या गांधी-नेहरुंच्या चारित्र्यहननाचा अजेंडा वर्षानुवर्षे राबवला आहे. पण विरोधकांनी त्यांच्या आदर्शावर मात्र टीकाही करु नये अशी त्यांची अपेक्षा असते. ती बालिश आहे... किंवा अहंकारी.

तुम्ही म्हणाल यात सावरकरांचा काय दोष? वाजवी प्रश्न आहे, काहीच दोष नाही. तसाच आज नेहरुंचा, गांधीचाही दोष नसतो पण एखाद्या संघटनेने, राजकीय पक्षाने त्यांना खांद्यावर घेतले की ते नेते आजच्या राजकारणात भरडले जाणारच. यात पुरोगाम्यांचे निदान एक बरे आहे, ते थेट टीका करतात. उजव्या मंडळींप्रमाणे पोराबाळांच्या, खोट्या प्रॉपगंडाच्या आडून घाणेरडे चारित्र्यहनन तरी करत नाहीत.

मुळात ऐतिहासिक पुरुषांना राजकारणाच्या आखाड्यात ओढणे ही खुज्या मंडळींची गरज असते. एक प्रकारे त्यांचा वापर हे खुजे लोक घोड्यासारखा करत असतात. त्यावर बसून ते दौड करत असतात. आणि युद्धात स्वाराला पाडताना घोड्यालाही पाडावे लागते, त्यात घोड्याचा काय दोष हा प्रश्न गैरलागू असतो. एकदा एकाने युद्धात घोड्याचा वापर केला, की विरोधी बाजूच्या पायदळाला घोडदळात रुपांतरित व्हावे लागते. आणि युद्धात काहीही हात नसलेल्या घोड्यांवर शरसंधान करावेच लागते. शेजारी राष्ट्राने अणुबॉम्ब बनवला की ’आम्ही त्या सर्वभक्षक अस्त्राच्या विरोधात आहोत म्हणून आम्ही फक्त बंदुकांनी लढू’ असे म्हणता येत नसते. युद्धाचे आयाम बदलले की ते अस्त्र आपल्यालाही निर्माण करावेच लागते. सामान्यांच्या दृष्टिने शौर्य आणि क्रौर्य यात फार फरक नसतो.

तेव्हा संघ-भाजपने नेहरु-गांधींचे चारित्र्यहनन सुरु केले तेव्हाच त्यांच्या आदर्शांवरही शरसंधान होणार हे ठरुन गेले होते. आपले आदर्श अस्पर्श राहावेत अशी त्यांची खरंच इच्छा असती तर त्यांनी ते संघटनेच्या अंतर्गत राखून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. त्या आदर्शांना भारतरत्नच्या निमित्ताने बाजारात आणून बसवले की त्यांच्यावर टीका होणार हे ओघाने आलेच.

’गांधी गेल्यावर त्यांचा पंचा नदीत धुतला तेव्हा दुसर्‍या तीरावरच्या सार्‍या बायका गरोदर राहिल्या’ हा 'विनोद' मी माझ्या शाखाशिक्षकाकडून माझे वय वर्षे आठ ते दहा असताना ऐकला आहे! हिंदुत्ववाद्यांकडून नेहरु मूळ मुस्लिम होते, त्यांच्या अनौरस संतती होत्या वगैरे वैयक्तिक चारित्र्यहनन केले जाते तसे दुसर्‍या बाजूने - अजून तरी - होत नाही. हे थोडे सुचिन्हच समजतो मी. पण हे ही किती काळ टिकेल हे सांगता येत नाही.

गोळाबेरीज ही की सावरकरांवर टीका व्हायला नको असेल तर भाजप-संघाने नेहरु-गांधींच्या नावे गळे काढणे थांबवावे आणि सावरकरांना बाजारात आणून बसवण्याऐवजी देव्हार्‍यात नेऊन ठेवावे. राहुल गांधींसह विरोधकांनीही नेहरु-गांधींना बाजारात आणू नये नि इथे-तिथे सावरकरांना ओढून आणू नये. (यातील पूर्वार्ध ते निष्ठेने पाळत आहेत.)

थोडक्यात परस्परांशी लढताना ऐतिहासिक पुरुषांच्या घोड्यांवर स्वार होण्याऐवजी आपापाल्या छप्पन इंची छातीने एकमेकांशी वर्तमानाच्या आखाड्यातच लढावे. भूतकालभोगी भारतात ही अपेक्षा अनाठायी आहे हे मला ठाऊक आहे. गल्लीच्या नाक्यावर गुटखा खाऊन पोरी न्याहाळत उभा असलेला रिकामटेकडा पोरगाही ’आमच्या खापरपणज्याचा आजा म्हाराजांच्या टायंबाला मोरे सरकारांच्या सवताच्या घोड्याला खरारा करायला होता.’ म्हणून काव आणत असतो. इथे तर मतांचे पीक काढायला राजकारणी बसले आहेत. एकाला त्याची परवानगी आहे नि दुसर्‍याला नाही हा कांगावा अदखलपात्रच असतो.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा